Thursday, 31 December 2020
बघू काय होतं
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*झेन कथा: बघू काय होतं*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
_*जपानी संस्कृतीतल्या १३व्या शतकात जपानी बौद्ध धर्मगुरू मुजु यांनी सांगितलेल्या झेन कथा रोजच्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलून टाकण्याची ताकद देतात. या गोष्टींना तात्पर्य नसते. अत्यंत हलक्या फुलक्या आणि समजायला सोप्या असणार्या या कथांतून आपण काय व कश्याप्रकारे घेतो हे आपल्यावर निर्भय आहे. अशीच एक झेन कथा.:-*_
_शेतकरी असलेल्या बोधीसत्वाकडे खूप दिवस काम करणारा घोडा एके दिवशी पळून गेला. शेजाऱ्यांना वाईट वाटले. ते शेतकऱ्याकडे जाऊन सहानभूतीपूर्वक हळहळतात, तेव्हा बोधिसत्व म्हणतो, *”बघू काय होतं?”*_
_दुसऱ्या दिवशी घोडा परत येतो आणि येताना तीन जंगली घोडे घेऊन येतो. शेजारी येतात आणि म्हणतात, “कित छान झालं!”_
_बोधिसत्व म्हणतो, *”बघू काय होतं?”*_
_दुसऱ्या दिवशी जंगली घोड्यावरून रपेट मारत असताना बोधीसत्वाचा मुलगा खाली पडतो आणि त्याच्या पायाचे हाड मोडते. शेजारी म्हणतात, “अरेरे! किती वाईट झाले, याचा पाय मोडला”_
_बोधिसत्व म्हणतो, *”बघू काय होतं?”*_
_काही दिवसांनी राजाचा सेनापती येतो आणि युद्धासाठी गावातले सगळे तरुण जबरदस्तीने गोळा करून निघून जातो. मात्र बोधिसत्वाच्या मुलाच्या पायाचे हात तुटल्या कारणाने त्याला नेत नाहीत. शेजारी म्हणतात, “किती छान झाले! युद्धात जाण्यापासून हा वाचला.”_
_बोधिसत्व म्हणतो, *”बघू काय होतं?”*_
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*संदर्भ: - झेनकथा*
*संकलन :- महेश कांबळे*
*३१/१२/२०२०*
https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
सोमा
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*३६ सोमा*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
_हि थेरी राजगृह नगरीतील बिंबिसार राजाच्या पुरोहिताची मुलगी होती. भगवंतांनी राजाला दिलेला धाम्मोपदेश ऐकून तिच्या मनात धम्माबद्दल श्रद्धा निर्माण झाल्याने ती भगवंतांची उपासिका झाली. काही काळानंतर संसारातून उदासीन झाल्याने तिने प्रव्रज्या घेऊन भिक्खुणी संघात प्रवेश केला. परिश्रमपूर्वक ध्यानसाधना केल्यानंतर अल्पावधीतच तिने अर्हतपद प्राप्त केले. श्रावस्तीमध्ये राहत असताना एके दिवशी दुपारची ध्यानाभावना करण्यासाठी अन्धवनांत गेली आणि एका झाडाखाली बसली. तेव्हा तिच्या मार्गात अडचण आणण्याकरिता मार तिला म्हणाला :-_
*_जे पद प्राप्त करण्यासाठी ऋषींनासुद्धा अत्यंत कठीण आहे, ते दोन अंगुली-प्रज्ञाव असलेल्या स्त्रियांनी प्राप्त करणे शक्य नाही. ||६०||_*
_यावर सोमा म्हणाली. :-_
*_हे मारा! चित्त समाधिस्त झाल्यावर सत्याचे ज्ञान झाल्यावर आणि धम्माचे सम्यक दर्शन झाले असताना स्त्री-भाव आमच्या मार्गात कोणते अडथळे आणू शकेल? (स्त्री असल्यामुळे निर्वाण मार्गात अडथळे येऊ शकत नाही). ||६१||_*
*_माझी तृष्णा सर्व ठिकाणातून नष्ट झाली आहे. माझा अज्ञानान्धकार सुद्धा नष्ट झाला आहे. हे पापी मारा, प्राण्याचा नाश करणाऱ्या, आज तुझाच नाश झालेला आहे हे जाणून घे. ||६२||_*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*संदर्भ: - थेरिगाथा*
*संकलन :- महेश कांबळे*
*३१/१२/२०२०*
https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
प्रसंगावधान
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*_प्रसंगावधान_*
*_(सुंसुमार जातककथा)_*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
_बोधिसत्त्व एकदां वानरयोनींत जन्मून गंगेच्या कांठीं एका अरण्यांत रहात होता. गंगेंत एक मोठा मगर रहात असे. त्याची बायको बोधिसत्त्वाला पाहून आपल्या नवर्याला म्हणाली, ''स्वामी हा मोठा वानर येथें रहात असतो. यांचें शरीर इतकें सुंदर दिसतें तर त्याचें हृदय किती गोड असेल ? मला तुम्ही त्याचें हृदय आणून द्या. हाच मला डोहाळा झाला आहे.''_
_मगर म्हणाला, ''भद्रे, आपण जलचर प्राणी आणि वानर पडला स्थलचर; या झाडावरून त्या झाडावर उड्या मारणारा. तेव्हां त्याचें हृदयमांस आम्हांस कसें मिळेल ? तुझा हा डोहाळा तूं सोडून दे, आणि दुसर्या कोणत्या तरी पदार्थावर रुचि ठेव.''_
_मगरीण म्हणाली, ''हें कांहीं चालावयाचें नाहीं. जर मला या वानराचें हृदय मिळालें नाहीं तर मी जीव देईन.''_
_निकरावर गोष्ट आली असें पाहून मगर म्हणाला, ''जरा दम धर, थोडा प्रयत्न करून पाहतों. युक्तिप्रयुक्तीनें जर त्याला पकडतां आलें तर त्याचें हृदय तुला मिळेल.''_
_याप्रमाणें बायकोचें समाधान करून बोधिसत्त्व पाणी पिण्यास गंगेवर आला असतां त्याजजवळ येऊन मगर त्याला म्हणाला, ''बा वानरश्रेष्ठा, तूं या फलरहित अरण्यांत कां वास करून आहेस ? गंगेच्या पलीकडे आंबे, फणस, निंबें वगैरे फळें इतकीं विपुल आहेत कीं, तुला तेथें श्रमावांचून मोठ्या चैनीनें रहातां येईल.''_
_बोधिसत्त्व म्हणाला, ''पण मगर महाराज तिकडे जावें कसें ? गंगा पडली विस्तीर्ण आणि खोल, आणि माझ्यासारख्या स्थलचर प्राण्याला ती तरून जातां येणें शक्य नाहीं.''_
_मगर म्हणाला, ''वा ! माझ्यासारखा बळकट जलचर प्राणी तुमचा मित्र असतां तुम्ही हताश कां होता ? माझ्या पाठीवर बसा म्हणजे मी तुम्हाला परतीरीं नेऊन पोंचवतों.''_
_त्याच्या वचनावर विश्वास ठेऊन बोधिसत्त्व त्याच्या पाठीवर बसला. कांहीं अंतरावर गेल्यावर मगर त्याला पाण्यांत बुडवूं लागला. हें काय आहे असा बोधिसत्त्वानें प्रश्न केल्यावर तो म्हणाला, ''रे मूर्खा, मीं केवळ परोपकारासाठीं माझ्या पाठीवर तुला वाहून नेत नाहीं. माझ्या पत्नीला तुझें हृदयमांस खाण्याचें डोहाळे झाले असल्यामुळें तुला मी माझ्या बिळांत नेत आहें.''_
_आतां प्रसंगावधानावांचून दुसरी गती नाहीं असें जाणून बोधिसत्त्व मगराला म्हणाला, ''रे मित्रा, तूं ही गोष्ट मला सांगितलीस हें फार चांगलें झालें नाहींतर माझा नाश होऊन तूं मात्र फसला असतास ! शिवाय तुझ्यावर विश्वासघाताचा आरोप आला असता तो निराळाच ! आमच्या पोटांत हृदय असतें, तर या झाडावरून त्या झाडावर उड्या मारीत असतांना तें छिन्नविच्छिन्न होऊन गेलें असतें. वानराच्या पोटांत हृदय असतें ही गोष्ट तुला खरी तरी वाटली कशी ?''_
_मगर म्हणाला, ''मग तुमचें हृदय तुम्ही कोठें ठेवीत असतां ?'' बोधिसत्त्वानें फळभारानें नष्ट झालेल्या एका औदुंबर वृक्षाकडे बोट दाखवून म्हणाला, ''ती पहा या अरण्यांत असलेल्या वानरांचीं हृदयें त्या झाडांवर लोंबकळत आहेत.'' औदुंबराची परिपक्व फळें पाहून मगराला वानराचें बोलणें खरें वाटलें, आणि तो म्हणाला, ''जर मी तुला काठावर नेलें तर यांतील एखादें हृदय मला देशील काय !''_
_बोधिसत्त्व म्हणला, ''यांत काय संशय ? तुला वानराचें हृदय पाहिजे आहे हें मला आगाऊ समजलें असलें तर येथपर्यंत मला आणण्याची तसदीच तुला पडली नसती ! एक सोडून दहा हृदयें तुला तेव्हां देऊन टाकलीं असतीं ! आम्हाला त्याचा कांहीं उपयोग होत नसतो. उगाच शोभेंसाठीं आम्हीं तें ठेवीत असतों एवढेंच काय तें !''_
_मगरानें त्याला तीरावर नेऊन सोडल्यावर तो त्या औदुंबराच्या झाडावर चढून बसला आणि म्हणाला, ''अरे मूर्ख मगरा प्राण्यांची हृदयें झाडावर लोंबतात यावर तूं विश्वाश ठेवलास? तुझ्या देहाच्या प्रमाणानें डोक्यांत मेंदू नसल्यामुळें तुला सहज फसवतां आलें. आतां हीं औदुंबराची फळें घेऊन येथून चालता हो आणि पुनः गंगेच्या पलीकडील चांगल्या फळांच्या गोष्टी मला सांगू नकोस, मला माझा औदुंबरच श्रेष्ठ आहे. असें समज.''_
_जुगारांत हजार कार्षापण घालवल्यासारखें दुःख होऊन मगर आंसवें गाळीत अधोमुखानें तेथून निघून गेला !_
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*संदर्भ : - जातक कथा संग्रह*
*संकलन :- महेश कांबळे*
*३१/१२/२०२०*
https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Wednesday, 30 December 2020
निसर्गसौंदर्य
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*झेन कथा: निसर्गसौंदर्य*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
_*जपानी संस्कृतीतल्या १३व्या शतकात जपानी बौद्ध धर्मगुरू मुजु यांनी सांगितलेल्या झेन कथा रोजच्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलून टाकण्याची ताकद देतात. या गोष्टींना तात्पर्य नसते. अत्यंत हलक्या फुलक्या आणि समजायला सोप्या असणार्या या कथांतून आपण काय व कश्याप्रकारे घेतो हे आपल्यावर निर्भय आहे. अशीच एक झेन कथा.:-*_
_झाडांची, फुलांची, बागेची आवड असणाऱ्या एका पुजाऱ्याला एका मोठ्या मंदिराचा पुजारी म्हणून नेमलं जाते. त्या मंदिराच्या बाजूलाच एक छोटासा बौध मठ होता, ज्याची देखभाल एक म्हातारा बोधिसत्व करत होता._
_एके दिवशी मंदिरात खूप पाहूणे येणार असतात तेव्हा पुजारी बागेची खूप स्वच्छता करतो. पालापाचोळा साफ करतो, सुकलेल्या फांद्या छाटतो, तण वगैरे उपटून टाकतो. त्याच्या कामाकडे भिंतीपलीकडून बोधिसत्व मन लावून पाहत असतो. काम संपल्यावर पुजारी बोधीसत्वाजवळ जाऊन विचारतो, “सुंदर दिसतेय ना बाग आता?”_
_बोधिसत्व म्हणाला, “हो पण यात काहीतरी कमतरता आहे. मला जरा हि भिंत चढायला मदत करतोस का?”_
_पुजारी त्याला वर ओढून अलीकडे घेतो. बोधिसत्व हळूहळू चालत बागेतल्या मध्यभागी असलेल्या झाडाजवळ जातो आणि त्याच्या बुंध्याला धरून हलवतो. झाड हलताच पानांचा सडा सर्वत्र पसरतो. तेव्हा बोधिसत्व म्हणतो, “आता ठीक आहे, मला पलीकडे उतरव.”_
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*संदर्भ: - झेनकथा*
*संकलन :- महेश कांबळे*
*३०/१२/२०२०*
https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
सेला
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*३५ सेला*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
_हि थेरी आळवी देशाच्या राजाची मुलगी होती. भगवंतांनी आळवी देशाच्या राजाला दिलेला धाम्मोपदेश ऐकून तिच्या मनात धम्माबद्दल श्रद्धा निर्माण झाली. आधी ती भगवंतांची उपासिका झाली आणि काही काळानंतर तिने प्रव्रज्या घेऊन संघात प्रवेश केला. एके दिवशी विरक्त होऊन ऐहिक वस्तूंवर विचार करीत दिव्यज्ञान प्राप्त केले आणि अर्हतपद प्राप्त केल्यानंतर ती श्रावस्तीमध्ये राहू लागली. एके दिवशी दुपारचे जेवण झाल्यानंतर ध्यानभावना करण्यासाठी अन्धवनांत गेली आणि एका झाडाखाली बसली. तेव्हा मार तिला तिच्या एकाकी जीवनापासून परावृत्त करण्याच्या उद्देशाने म्हणाला :-_
*_हे सेला! जगामध्ये मुक्ती नाही. तेव्हा एकाकी राहण्याचा काय उपयोग? कामसुखाचा उपभोग घे. शेवटी पश्चाताप करणारी होऊ नकोस. ||५७||_*
_माराचे हे प्रलोभनकारक वचन एकून सेला विचार करू लागली. ‘हा मूर्ख मार माझ्या मार्गात अडचण आणण्यासाठी अशा प्रकारच्या इंद्रीयासक्तीच्या गोष्टी बोलत आहे. परंतु मी अर्हतपद प्राप्त साधिका आहे. हे कदाचित ह्याला माहित नसावे. मी ह्याला यथायोग्य उत्तर देईन असा निश्चय करून ती म्हणाली. :-_
*_पापी मारा! शरीराला घायाळ करणाऱ्या भालाच्या टोकाप्रमाणे कामवासना आहेत. त्यांच्यामुळे प्राण्यांचा नाश होतो व ज्याला तू कामसुख म्हणतोस त्याबाबतीत मला आता अनासक्ती आहे. ||५८||_*
*_माझी तृष्णा सर्व ठिकाणातून नष्ट झाली आहे. माझा अज्ञानान्धकार सुद्धा नष्ट झाला आहे. हे पापी मारा, प्राण्याचा नाश करणाऱ्या, आज तुझाच नाश झालेला आहे हे जाणून घे. ||५९||_*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*संदर्भ: - थेरिगाथा*
*संकलन :- महेश कांबळे*
*३०/१२/२०२०*
https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
मैत्रीचा प्रभाव
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*_मैत्रीचा प्रभाव_*
*_(कुरुंगमिग जातककथा)_*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
_एकदां बोधिसत्त्व कुरुंगमृग होऊन एका अरण्यांत सरोवराच्या कांठी रहात होता. तेथेंच एका वृक्षावर एका शतपत्र पक्षानें आपलें घरटें बांधले होतें; आणि त्या सरोवरांत एक कांसव रहात होता. या तिघांची अत्यंत मैत्री जडली होती. एके दिवशीं एक पारधी त्या सरोवराच्या कांठीं हरणाला पकडण्यासाठीं जाळें पसरून घरीं गेला. रात्रींच्या पहिल्या प्रहरीं बोधिसत्त्व पाणी पिण्यासाठीं जात असतां त्या जाळ्यांत सांपडला; आणि आपण जाळ्यांत सांपडलों हें आपल्या मित्रांस कळविण्यासाठीं तो मोठ्यानें ओरडला. तेव्हां सरोवरांतून कांसव वर आला, व शतपत्र पक्षी आपल्या घरट्यांतून खालीं उतरला. बोधिसत्त्वाची ही दीनदशा पाहून शतपत्र कांसवाला म्हणाला, ''पहांट होण्यापूर्वी जर आमच्या मित्राला या पाशांतून मुक्त केलें नाहीं तर तो पारध्याच्या तावडींत सांपडून प्राणास मुकेल. आतां तूं आपल्या दांतांनीं याचे पाश तोडण्यास आरंभ कर, आणि हें काम लवकर आटप.''_
_कांसव म्हणाला, परंतु माझे दांत कांहीं बळकट नाहींत. माझ्या गतीप्रमाणेंच पाश तोडण्याचें कामहि मंदपणें चालेल, आणि इतक्यांत पारधी आला तर माझे सर्व श्रम वांया जातील.''_
_शतपत्र म्हणाला, ''पारधी लवकर येईल याबद्दल तूं काळजी करूं नकोस तो अरुणोदयापूर्वी येणार नाहीं. याबद्दल मी हमी घेतों; आणि त्याला जेवढा उशीर लावतां येईल तेवढा लावण्याचा मी प्रयत्न करतों. पण तूं हे पाश तोडण्याचें काम जारीनें चालव.''_
_कांसवानें एकामागून एक पाश तोडण्यास सुरुवात केली. शतपत्र पारध्याच्या दारांत जाऊन त्याची वाट पहात बसला. पहांट होण्यापूर्वी पारधी हातांत मोठी सुरी घेऊन तलावाच्या कांठीं जाण्यास निघाला. इतक्यांत शतपत्रानें मोठ्यानें शब्द काढून त्याच्या कपाळावर जोरानें चंचुप्रहार केला. बिचारा पारधी आपणाला मोठा अपशकुन झाला असें वाटून पुनः घरांत शिरून निजला, आणि मनांतल्या मनांत म्हणाला, ''आज या अमंगल पक्ष्यानें माझ्यावर टोंच मारून मला अपशकुन केला आहे त्यामुळें शिकार नीट साधेल किंवा नाहीं याची मला काळजी वाटते; तथापि थोड्या वेळानें मागल्या दरवाजांतून निघून जाऊन अपशकुन न होईल असें केलें पाहिजे.''_
_असा विचार करीत तो झोंपी गेला. पुनः अरुणोदयानंतर उठून मागल्या दरवाज्यांतून जाण्याच्या बेतांत होता. पण तेथेंहि शतपत्रानें मोठ्यानें ओरडून त्याच्या कपाळावर चोंच मारली. पारधी संतापून म्हणाला, ''या दुष्ट अमंगल पक्षानें तर माझा पिच्छाच पुरवला ! तथापि थोडा उजेड झाल्यावर हा जवळ आल्यास याची चांगली खोड मोडून मग शिकारीच्या शोधार्थ जाईन.''_
_असें म्हणून कांहीं वेळ घरांत बसून नंतर तो सरोवराकडे जाण्यास निघाला. शतपत्रानें त्याच्या पूर्वीच येऊन कांसवाला त्याच्या आगमनाची खबर दिली. कांसवानें सर्व पाश तोडून टाकले होते. एकच काय तो बाकी होता. परंतु त्याला त्यामुळें इतका त्रास झाला कीं, त्याच्या तोंडावाटे रक्ताच्या धारा वहात होत्या आणि अंगांत त्रास न राहिल्यामुळें तो बेशुद्ध होऊन खालीं पडला. इतक्यांत पारधी जवळ येऊन ठेपला. बोधिसत्त्वानें शिल्लक राहिलेला पाश आपल्या सामर्थ्यानें तोडून टाकून तेथून पलायन केलें. परंतु बिचारा कांसव पारध्याच्या हातीं लागला. पारध्यानें त्याला आपल्या पिशवींत भरलें, आणि खिन्न मनानें तो घरी जाण्यास निघाला. आपणाला मुक्त करण्यासाठीं कांसवानें आपला जीव धोक्यांत घातला हें पाहून बोधिसत्त्वाला फार वाईट वाटलें, आणि जीव गेला तरी बेहेत्तर, कांसवाला मुक्त केल्यावांचून राहणार नाहीं असा निश्चय करून तो मागें वळला, आणि पारध्याजवळ कांहीं अंतरावर पोहोंचल्यावर लंगडत लंगडत चालूं लागला. सर्व रात्र पाशांत गुरफटून पडल्यामुळें या हरिणाच्या पायाला इजा झाली असावी, व तो दुर्बल झाला असावा असें वाटून पारध्यानें आपली पिशवी एका झाडाच्या मेढक्याला अडकावून दिली, आणि सुरी घेऊन तो हरिणाच्या मागें लागला. त्याला लोभवून बोधिसत्त्वानें दूरवर नेलें, व दुसर्या एका आडवाटेनें पळ काढून मेढक्यावर अडकवलेली पिशवी हळूच खालीं पाडून कांसवाला मुक्त केलें. कांसव तात्काल पाण्यांत शिरला. शतपत्र वृक्षावरून खालीं उतरला तेव्हां बोधिसत्त्व या दोघांस उद्देशून म्हणाला, ''तुम्ही दोघांनीं मिळून मला जीवदान दिलें आहे. तेव्हां तुमचे माझ्यावर फार फार उपकार आहेत. परंतु आतां येथें रहाणें धोक्याचें आहे. पारध्याला ही जागा माहित झाली आहे. आणि येथें राहिल्यास केव्हांना केव्हां त्याच्या जाळ्यांत सांपडण्याची मला भीति आहे. तेव्हां पारधी येथें पोंचण्यापूर्वीच मी घोर अरण्यांत जाऊन रहातों.''_
_असें म्हणून बोधिसत्त्वानें तेथून पळ काढला. शतपत्रहि उडून गेला. कांसव तर पाण्यांत शिरलाच होता. पारधी धांवत येऊन पहातो, तो पिशवींतील कांसव देखील निघून गेला होता. तुटकें जाळें आणि रिकामी पिशवी घेऊन खालीं मान घालून अत्यंत खिन्न अंतःकरणानें तो आपल्या घरीं गेला. बोधिसत्त्व आणि त्याचे दोघे मित्र घोर अरण्यांतील दुसर्या एका तलावाच्या कांठीं वास करून राहिले. त्यांच्यावर आलेल्या या प्रसंगानें त्यांची मैत्री दृढतर झाली, आणि तिजमुळें त्यांचा सारा जन्म सुखानें गेला._.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*संदर्भ : - जातक कथा संग्रह*
*संकलन :- महेश कांबळे*
*३०/१२/२०२०*
https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Tuesday, 29 December 2020
असं
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*झेन कथा: असं*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
_*जपानी संस्कृतीतल्या १३व्या शतकात जपानी बौद्ध धर्मगुरू मुजु यांनी सांगितलेल्या झेन कथा रोजच्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलून टाकण्याची ताकद देतात. या गोष्टींना तात्पर्य नसते. अत्यंत हलक्या फुलक्या आणि समजायला सोप्या असणार्या या कथांतून आपण काय व कश्याप्रकारे घेतो हे आपल्यावर निर्भय आहे. अशीच एक झेन कथा.:-*_
_गावातील तरुण अविवाहित मुलगी गरोदर राहिली असता, रागाने आईवडिलांनी विचारले, “या पापाचा धनी कोण?_
_चिंतीत व घाबरलेल्या तरुणीने गावातील बोधीसत्वाकडे बोट दाखविले. बोधीसत्वाला त्याच्या सदाचारी, शुद्ध सात्विक राहण्यामुळे गावात खूप मान होता. संतापलेल्या आईवडिलांनी बोधीसत्वाला त्याच्या कृत्याचा जाब विचारात त्याला जबाबदार ठरविले, तेव्हा तो एवढच म्हणाला, *“असं?”*_
_गावातील लोकांत त्याच्याविषयी असलेला आदर आता नाहीसा झाला होता. तरुणी बाळंत झाल्यानंतर तिच्या आईवडिलांनी ते बाळ बोधिसत्वाच्या घरी नेऊन देत, त्याची जबाबदारी घ्यायला लावली. बाळाला ठेवून घेत बोधिसत्व म्हणाला, *“असं?”*_
_बोधीसत्वाने त्या बाळाची काळ्जी घेतली. तरुणीला आपल्या खोटेपणाची लाज वाटायला लागली आणि तिने खरे काय ते सांगते, कि गावातील तरुणाला वाचवण्यासाठी ती खोटं बोलली होती. आईवडील बोधीसत्वाकडे जाऊन माफी मागून म्हणाले, “त्यांना बाळ परत मिळेल का?”_
_यावर बोधिसत्व म्हणाला, *“असं?”* आणि त्याने ते बाळ परत केले._
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*संदर्भ: - झेनकथा*
*संकलन :- महेश कांबळे*
*२९/१२/२०२०*
https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
सुक्का
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*३४ सुक्का*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
_राजगृहामधील एका प्रतिष्टीत घराण्यात ह्या थेरीचा जन्म झाला होता. भगवंताचा उपदेश ऐकून तिची धम्मावर श्रद्धा बसली. त्यानंतर *धम्मदिना भिक्खुनिचा* उपदेश ऐकल्यानंतर संसारापासून विरक्ती निर्माण झाल्याने तिने तिच्याकडून प्रव्रज्या घेतली. साधना करीत असतानाच अगदी थोड्याच दिवसात तिने अर्हतपद प्राप्त केले. पाचशे भिक्खुनिंचा संघासह ती धम्मप्रचार करू लागली. धम्मोपदेश करण्यात ती अतिशय निष्णात होती. एके दिवशी पिंडपात झाल्यानंतर भिक्खुनिसंघाला खूप प्रभावाने धम्मोपादेश दिला. त्या उपदेशाने सर्व श्रोते मंत्रमुग्ध झाले. एक देवता हा धम्मोपदेश ऐकून खूपच प्रभावित झाली आणि राजगृहामध्ये ठिकठीकाणी सुक्का थेरीचे गुणगान करू लागली.:-_
*_राजगृहातील नागरिकांनो, तुम्ही दारू प्यायल्याप्रमाणे का झोपत आहात? बुद्ध शासनाचा उपदेश देणाऱ्या सुक्का भिक्खुनीची उपासना का करीत नाही? ||५४||_*
*_ज्याप्रमाणे प्रवासी मेघातून झाली पडणारे पाणी पितात, त्याप्रमाणे तिची निब्बाणप्रत नेणारी, ओजपूर्ण आणि जात्याच रसाळ वाणी ज्ञानी लोक पितात असे वाटते. ||५५||_*
_देवतेचे हे उद्गार ऐकून नागरिक धावत तेथे गेले. सुक्का थेरीचा उपदेश ऐकून तृप्त झाले व शेवटी सर्व नागरिक तिचे गुणगान करू लागले|_
*_”सुक्का थेरी! तू पवित्र गोष्टीच्या अभ्यासाने पवित्र झाली आहेस. वासनांपासून विमुक्त होऊन चांगल्याप्रकारे समाधिस्त झाली आहेस. माराला/विकाराला त्याच्या सैन्यासह जिंकून तू अंतीम देह धारण करीत आहेस. ||५६||_*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*संदर्भ: - थेरिगाथा*
*संकलन :- महेश कांबळे*
*२९/१२/२०२०*
https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
साधूच्या सहवासाचें फळ
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*_साधूच्या सहवासाचें फळ_*
*_(सीलानिससं जातककथा)_*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
_काश्यपबुद्धाच्या वेळीं एक श्रद्धावान् उपासक वाराणसींत रहात होता. तो कांहीं कामानिमित्त जहाजांतून परदेशीं जाण्यास निघाला. त्याच जहाजांतून एक न्हावीहि प्रवासास जाणार होता. त्याची बायको या उपासकाला म्हणाली, ''महाराज, माझा पती आपल्याच जहाजांतून जात आहे. त्याची आपण वाटेंत काळजी घ्या.''_
_उपासकानें आपणाकडून होईल तेवढी मदत करीन असें वचन दिलें. आणि ते दोघे जहाजावर चढले. सात दिवस जहाज चांगले चाललें होतें. परंतु आठव्या दिवशीं भयंकर तुफान होऊन त्याचे तुकडे झाले. उपासक आणि न्हावी एका फळ्याच्या आश्रयानें तरंगत जाऊन एका लहानशा बेटाच्या किनार्यावर पडले. त्या बेटावर फारशी फळफळावळें नव्हतीं. तथापि उपासकानें जीं कांहीं कंदमुळें आणि फळें मिळण्यासारखीं होतीं ती खाऊन आपली उपजीविका चालविली पण न्हाव्याला असलें नीरस जेवण आवडेना. तो पक्ष्याला मारून खाऊं लागला. पक्ष्याचें मांस आगीवर भाजून पहिल्यानें तें खाण्याविषयीं तो उपासकाला आग्रह करीत असे. परंतु उपासकानें ते कधींहि खाल्लें नाहीं. आपणाला जें कांहीं मिळालें आहे तेवढें पुरें आहे असें म्हणून पक्ष्याचें मांस खाणें तो नाकारीत असे. त्याची अचल श्रद्धा पाहून त्या बेटावर रहाणार्या एका नागराजाला त्याची दया आली, आणि तो त्याला म्हणाला, ''हे उपासका, तुझ्यासाठीं मी होडी बनवतो. त्यात बसुन तूं तुला ज्या स्थळीं जावयाचें असेल त्या स्थळीं जा.''_
_उपासकानें नागराजाचे फार आभार मानले, आणि त्यानें निर्माण केलेल्या होडींत बसून तो न्हाव्याला म्हणाला, ''बाबारे, तुला जर माझ्याबरोबर यावयाचें असेल तर चल लवकर ये.''_
_तेव्हां नागराजा म्हणाला, ''या न्हाव्याला या होडींत घेतां येत नाहीं. तो मोठा दुष्ट आहे. त्याच्यासाठीं ही होडी मी निर्माण केली नाहीं.''_
_उपासक म्हणाला, ''तो जरी पापकर्मी आहे तरी तो माझ्याबरोबर आलेला आहे; आणि मी जे कांहीं पुण्य केलें असेल त्याचा वाटा मी त्याला देत आहे.''_
_न्हावी म्हणाला, ''या तुझ्या देगणीचें मी अभिनंदन करतों. आजपर्यंत पुण्याचा मार्ग मी स्वीकारला नाहीं. परंतु तुझी संगति हेंच काय तें पुण्य माझ्या पदरीं आहे; आणि तुझ्या पुण्याचा वाटेकरी करून तूं मला फार ॠणी केलें आहेस.''_
_नागराजानें त्या न्हाव्यालाहि त्या होडींत येऊं दिलें. तेव्हां समुद्राचें रक्षण करणार्या देवतेनें होडी चालवण्याचें काम आपल्या हातीं घेतलें. त्या बेटावर सांपडणारीं अमोलिक रत्ने उपासकानें आपल्याबरोबर आणलीं. त्या दोघांना सुरक्षितपणें वाराणसीला आणून सोडल्यावर देवता म्हणाली, *''श्रद्धा, शील, त्याग इत्यादि गुणांचें हें फळ पहा ! या उपासकाच्या आंगीं हें गुण असल्यामुळें नागराजा स्वतः होडी होऊन त्याला घेऊन येथवर आला. मनुष्यानें अशा सत्पुरुषाचाच सहवास करावा.* या न्हाव्यानें जर या उपासकाची कास धरली नसती तर समुद्रांतच त्याचा नाश झाला असता !''_
_असें बोलून ती देवता आणि नागराजा तेथून निघून स्वस्थळीं गेलीं. उपासकानें आपण आणलेल्या धनाचे दोन विभाग करून त्यांतील एक न्हाव्याला दिला. साधूच्या संगतीपासून मिळालेला लाभ न्हाव्याला आजन्म पुरला._
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*संदर्भ : - जातक कथा संग्रह*
*संकलन :- महेश कांबळे*
*२९/१२/२०२०*
https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
मला माहित नाही
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*झेन कथा: मला माहित नाही*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
_*जपानी संस्कृतीतल्या १३व्या शतकात जपानी बौद्ध धर्मगुरू मुजु यांनी सांगितलेल्या झेन कथा रोजच्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलून टाकण्याची ताकद देतात. या गोष्टींना तात्पर्य नसते. अत्यंत हलक्या फुलक्या आणि समजायला सोप्या असणार्या या कथांतून आपण काय व कश्याप्रकारे घेतो हे आपल्यावर निर्भय आहे. अशीच एक झेन कथा.:-*_
_बौद्धधम्माला समर्पित असलेल्या सरदाराने बोधीसत्वाला तत्त्वचर्चेसाठी घरी बोलाविले. “बौद्धधम्माचे सर्वोच्च सत्य कोणते?” सरदाराने विचारले._
“निर्वात अनंत पोकळी आणि पावित्र्यतेचा जराही मागमूस नाही” बोधिसत्व उद्गारला._
_”जर पवित्रता वा शुद्धीच नसेल, तर मग तू कोण आहेस किंवा काय आहेस?”_
*”मला माहित नाही.” बोधिसत्व उद्गारला.*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*संदर्भ: - झेनकथा*
*संकलन :- महेश कांबळे*
*२८/१२/२०२०*
https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
उब्बिरी
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*३३ उब्बिरी*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
_श्रावस्तीमधील कुलीन घराण्यात ह्या थेरीचा जन्म झाला होता. ती दिसायला खूपच सुंदर असल्यामुळे कोसल राजाच्या अंतःपुरात तिला स्थान मिळाले. काही वर्षांनी तिला एक मुलगी झाली तिचे नाव “जीवन्ति” ठेवले. मुलगी सुंदर आहे हे पाहून राजाला खूप आनंद झाला आणि त्याने प्रसन्न होऊन उब्बिरीला राणीचे पद दिले. परंतु थोड्याच दिवसात “जीवन्ति” मरण पावली. या घटनेने उब्बिरीला अत्यंत दुःख झाले. ज्या स्मशानभूमीत मुलीचा अंत्यसंस्कार करण्यात आला तेथे जाऊन ती दिवसरात्र रडत बसत असे. एके दिवशी ती भगवंताकडे जाऊन थोडा वेळ तिथे बसून नंतर ती निघून गेली. त्यानंतर अचीरवती नदीच्या किनार्यावर जाऊन मुलीच्या आठवणीने रडत बसली. भगवान बुद्धांनी हे पाहिले आणि त्यांनी तिथे जाऊन उब्बिरीला म्हणाले, “उब्बिरी! तू विलाप का करीत आहेस?” “भन्ते, मी आपल्या मुलीसाठी विलाप करीत आहे.” उब्बिरीने उत्तर दिले. यावर भगवंतांनी पुन्हा उब्बिरीला म्हणाले, “उब्बिरी, या स्मशानभूमीत तुझ्या चौऱ्यांशी हजार मुलींचा अग्निसंस्कार झालेला आहे. त्यातील तू कोणत्या मुलीसाठी विलाप करीत आहेस?” त्यानंतर भगवंतानी तिला उपदेश दिला, अर्हतपद प्राप्त केल्यानंतर ती ह्या गाथा सतत म्हणत असे :-_
*_’अम्म जीवा’ असे म्हणून तू वनामध्ये भटकून रडत आहेस. हे उब्बिरी तू स्वःताचा शोध घे, ‘जीवन्ति’ असे नाव असलेल्या तुझ्या चौऱ्यांशी हजार मुली येथे जाळल्या गेल्या आहेत. त्यांच्यापैकी कोणासाठी तू शोक करीत आहेस?” ||५१||_*
_भगवान बुद्धाचे हे वचन ऐकून उब्बिरीला आत्मबोध झाला. ती ध्यानामध्ये तल्लीन झाली. तेव्हा तिला दिव्याज्ञानाचा लाभ झाला. त्यानंतर शोकापासून विमुक्त झाल्यावर ती म्हणते :-_
*_माझ्या हृदयाला टोचलेला दूर्दर्श बाण निघाला. शोकाकुल झालेल्या मला आता मुलीचा शोक राहिला नाही. ||५२||_*
*_आज माझे हृद्य शांत, दुःखरहित आहे. शल्य बाहेर उपटून टाकले आहे. मी भगवान बुद्ध, त्यांचा धम्म आणि संघाला शरण जाते. ||५३||_*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*संदर्भ: - थेरिगाथा*
*संकलन :- महेश कांबळे*
*२८/१२/२०२०*
https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
मूर्खाला मौन शोभतें
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*_मूर्खाला मौन शोभतें_*
*_(सीहचम्म जातककथा)_*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
_एकदां बोधिसत्त्व एका गांवांत शेतकरी होऊन रहात असे. त्या वेळी एक फेरीवाला एका गाढवावर आपलें सामान ठेवून दारोदारी त्या सामानाची विक्री करून आपला निर्वाह करीत असे. गाढवाला चारा वगैरे देण्यासाठीं पैसे खर्च होऊं नयेत म्हणून त्यानें एक युक्ती योजिली होती. कोठून तरी एक सिंहाचें चामडें पैदा करून त्यानें तो आपल्या गाढवाला आच्छादित असे आणि लोकांच्या शेतांतून सोडून देत असे. गाढव यथेच्छ खाऊन परत आपल्या धन्याजवळ येत असे. हा प्रकार पुष्कळ दिवस चालला होता. एके दिवशीं तो फेरीवाला त्या गाढवाला घेऊन बोधिसत्त्व रहात होता त्या गांवीं आला. गांवाच्या वेशीजवळ गाढवावरील सामान उतरून घेऊन सिंहाच्या चामड्यानें झाकून त्याला त्यानें एका जवाच्या शेतांत सोडून दिलें; आणि तो आपल्या जेवणाच्या तयारीस लागला. इकडे त्या शेताचा राखणदार सिंह आला असें वाटून घाबरून गेला आणि धांवत जाऊन इतर शेतकर्यांना त्यानें ही खबर दिली. तेवहां बोधिसत्त्व म्हणाला, ''आपण शेतांत जाऊन सिंह कसा असतो तें तरी पाहूं. घाबरण्याचें कांहीं कारण नाहीं. दूर अंतरावरून वाद्ये शंख वगैरे वाजवल्यावर तो पळून जाईल. कदाचित् आपल्यावर चाल करून आलाच तर आपण दांडक्यांनीं त्याला बडवून काढूं.''_
_बोधिसत्त्वाला पुढारी करून सर्व गांवकरी त्या शेताजवळ गेले आणि वाद्यें वाजवून, त्यांनीं एकच घोष केला, व मोठमोठ्यानें आरोळ्या ठोकल्या. तो गाढव हा घोष ऐकून फार घाबरला, आणि जातिस्वभावाला अनुसरून ओरडूं लागला. तेव्हां बोधिसत्त्व जमलेल्या लोकांना म्हणाला, ''अहो ही सिंहाची किंवा व्याघ्राची आरोळी नव्हे. सिंहाच्या कातड्याखालीं हा हलकट गाढव ओरडत आहे.''_
_तेव्हां त्या शेतकर्यांनीं त्याच्यावर हल्ला करून त्याचें तें कातडें काढून घेतलें व त्याला बेदम मार दिला. तो मरणोन्मुख होऊन तेथेंच पडला. पुष्कळ वेळपर्यंत गाढवाची वाट पाहून त्याचा मालक त्याच्या शोधार्थ गेला. तेव्हां त्याला हा गाढव मरण्याच्या वाटेला लागलेला आढळला. ही त्याची दशा पाहून फेरीवाला म्हणाला, ''बा गाढवा, या सिंहाच्या चामड्याखालीं पुष्कळ दिवस तूं लोकांचीं शेतें खाल्लीं असतींस; परंतु एका ओरडण्यानें तूं हें आपणावर मरण ओढवून घेतलेंस !''_
_फेरीवाल्याचें हें भाषण संपतें न संपतें तों गाढवानें प्राण सोडला._
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*संदर्भ : - जातक कथा संग्रह*
*संकलन :- महेश कांबळे*
*२८/१२/२०२०*
https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
ज्ञानी मनुष्य
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*झेन कथा: ज्ञानी मनुष्य*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
_*जपानी संस्कृतीतल्या १३व्या शतकात जपानी बौद्ध धर्मगुरू मुजु यांनी सांगितलेल्या झेन कथा रोजच्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलून टाकण्याची ताकद देतात. या गोष्टींना तात्पर्य नसते. अत्यंत हलक्या फुलक्या आणि समजायला सोप्या असणार्या या कथांतून आपण काय व कश्याप्रकारे घेतो हे आपल्यावर निर्भय आहे. अशीच एक झेन कथा.:-*_
_डोंगराच्या माथ्यावर राहणाऱ्या बोधीसात्वाचा संपूर्ण परगण्यात ज्ञानी मनुष्य म्हणून बोलबाला होता. गावात आलेल्या पाहुण्याने त्या ज्ञानी बोधीसत्वाची भेट घेण्याचे ठरवले. खूप अवघड प्रवास करून जेव्हा तो ज्ञानी माणसाच्या दारात पोहचला तेव्हा दारात त्याचे स्वागत एका म्हाताऱ्या नोकराने केले._
_पाहुणा नोकरास म्हणाला, “मला ज्ञानी माणसास भेटायचे आहे.”_
_हसतच तो म्हातारा म्हणाला, “या आत या.”_
_आत जाताच पाहुणा आजूबाजूला उताविळपणे शोधू लागला, ज्ञानी कुठे दिसतोय का? नोकर पाहुण्याला मागच्या दारी घेऊन गेला व पाहुण्याला बाहेर काढले, तेव्हा पाहुणा म्हणाला, “पण मला ज्ञान्यास भेटायचंय,”_
_म्हातारा म्हणाला, “तू त्याला अगोदरच भेटलायास, आयुष्यात भेटलेल्या प्रत्येकास तू ज्ञानी समज, मग तो कसाही का दिसेना. अजागळ, मूर्ख, साधा आणि अर्थहीन वाटत असला तरी. जर तू असे केलेस, तर जो प्रश्न घेऊन तू आज इथे आला आहेस, तो ताबडतोब सुटेल.”_
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*संदर्भ: - झेनकथा*
*संकलन :- महेश कांबळे*
*२७/१२/२०२०*
https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
दन्तिका
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*३२ दन्तिका*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
_श्रावास्तीमधील कोशल नरेशाच्या ब्राह्म पुरोहिताच्या घरी ह्या थेरीचा जन्म झाला होता. एकदा जेवत असताना धम्माची गोष्टी कानावर आल्यानंतर तिच्यात धम्माप्रती श्रद्धा निर्माण झाली. आणि काही कालानंतर ती उपासिका बनल्यानंतर तिने महापजापती गोतमिकडे प्रव्रज्या घेतली. राज्गृहातील गृधकुट पर्वतावर ध्यानधारणा करण्यासाठी गेली असता तिने माहुताला पाठीवर बसण्यासाठी पाय पसरणार्या हत्तीला पाहिले. ह्या हत्तीलाच ध्यानाचा आधार मानून ती ध्यानस्थ झालि आणि तिला दिव्यज्ञान प्राप्त झाले. त्या दृश्याचे वर्णन करताना ती म्हणते:-_
*_गृधकुट पर्वतावरील दुपारच्या ध्यान-स्थानातून मी बाहेर पडले त्यावेळी पाण्यात डुंबून बाहेर नदीच्या किनार्यावर आलेल्या हत्तीला पाहिले. !!४८!!_*
*_एका अंकुशधारी मनुष्याने ‘पाय दे’ अशी याचना केली, हत्तीने पाय पसरला आणि मनुष्य हत्तीवर चढला. !!४९!!_*
*_सहजासहजी वश न होणाऱ्या हत्तीला वश झालेला व मनुष्यांच्या आधीन झाल्याचे पाहून त्या निर्जन अरण्यात गेल्यावर मी सुद्धा आपले चित्त समाधिस्त केले./ चित्ताचे दमन केले. !!५०!!_*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*संदर्भ: - थेरिगाथा*
*संकलन :- महेश कांबळे*
*२७/१२/२०२०*
https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
सहवासाचें फळ
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*_सहवासाचें फळ_*
*_(दधिवाहन जातककथा)_*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
_एकदां वाराणसींत दधिवाहन नांवाचा राजा राज्य करीत होता; आणि बोधिसत्त्व त्याचा अमात्य होता. एके दिवशीं मगरांना दूर काढण्यासाठीं गंगेंत जाळीं सोडून त्यांच्या आंत दधिवाहन राजा जलक्रीडा करीत असतां हिमालयावरून एक सर्वोत्कृष्ट आंब्याचें फळ वहात येऊन जाळ्यास अडकलें. राजपुरुषांनीं तें फळ काढून घेऊन राजाला अर्पण केलें. राजाला तें फळ इतकें आवडलें कीं, देवलोकींचा अमृतरस त्यापुढें तुच्छ असावा असें त्याला वाटलें. त्यानें त्या आंब्याची कोय मोठ्या समारंभानें आपल्या उद्यानांत लावली आणि दुधाच्या पाण्यानें तिला वाढविली. कांहीं दिवसांनीं आंब्याचें झाड फोफावून तीन वर्षांच्या आंत त्याला फळें येऊं लागलीं. बीजाप्रमाणेंच तीं फळेंहि अत्यंत मधुर होतीं. राजानें त्या झाडाचा फारच सत्कार चालविला. त्याला साखरेचें खत घालीत असत, आणि दुधानें शिंपीत असत, भोंवतालचें कुंपण मखमलीचें होतें, व त्या भोंवती रोज अत्तराचे दिवे जाळण्यांत येत असत._
_दधिवाहन फार मत्सरी होता. आपल्या आंब्यासारखे आंबे दुसर्या राजाच्या उद्यानांत पैदा होऊं नयेत यासाठीं तो फार खबरदारी घेत असे. भेटीसाठीं आंबे पाठवतांना एका विषारी काट्यानें कोयीला भोंक पाडून पाठवीत असे. राजे लोक आंब्याचा आस्वाद घेऊन फार संतुष्ट होत आणि कोय पेरून आंब्याचें झाड उगवण्याची वाट पहात. परंतु त्यांची आशा कधींहि सफळ झाली नाहीं. एका राजाला दधिवाहन मत्सरामुळें आंब्याच्या कोयीला भोकें पाडून पाठवतो ही गोष्ट समजली तेव्हां आपल्या हुषार माळ्याला बोलावून आणून तो म्हणाला, ''दधिवाहनाला आपल्या आंब्याची फार घमेंड आहे. तूं तेथें जाऊन त्याचा आंबा बिघडून जाईल अशी युक्ती करशील काय ?''_
_माळी म्हणाला, ''महाराज, आपली आज्ञा असेल तर दोन चार वर्षांचे आंत दधिवाहन राजाचा आंबा बिघडेल असा उपाय मला करतां येईल. पण येथून मला चार वर्षांची रजा मिळाली पाहिजे.''_
_त्या राजानें माळ्याला मोठ्या आनंदानें रजा दिली. वाराणसीला येऊन दधिवाहनाजवळ तो नोकरीस राहिला. भलत्याच वेळीं फुलें फुलवून दाखवून आणि भलत्याच ॠतूंत झाडांना फळें येतील असे उपाय करून दधिवाहनाला त्यानें प्रसन्न करून घेतलें. तेव्हां दधिवाहनानें जुन्या माळ्याला काढून टाकून मुख्य उद्यानाची सर्व व्यवस्था या नवीन माळ्याच्या हातांत दिली. त्यानें हळु हळु त्या सरस आंब्याच्या आजुबाजुला निंबाची आणि दुसरीं कडू जातीची झाडें लावून दिली आणि त्यांची चांगली जोपासना केली. दोन चार वर्षांत ती झाडें भराभर वाढलीं आणि त्यामुळें आंब्याचें फळ कडू झालें. तें पाहून बागबान तेथून पळून गेला. एके दिवशीं दधिवाहन राजा आपल्या अमात्यांसह उद्यानांत इकडे तिकडे फिरत असतां आंब्याच्या झाडाजवळ आला; आणि आपल्या लोकांकडून एक पिकलेला आंबा त्यानें झाडावरून काढून घेतला. पण तोंडात घातल्याबरोबर तो त्याला इतका कडूं लागला कीं, त्याचा रस त्यानें तेव्हांच थुंकून टाकला, आणि तो बोधिसत्त्वाला म्हणाला, ''मित्रा या आंब्याचें असे परिवर्तन कां झालें ? साखरेचें खत, दुधानें शिंपणें, गंधाच्या दिव्याची पूजा इत्यादि सर्व उपचार चालूं असतां आंब्याचें फळ निंबाच्या पाल्यासारखें कडू कां व्हावें ?''_
_बोधिसत्त्वानें निरीक्षण करून पाहिलें; आणि तो राजाला म्हणाला, *'' महाराज या आंब्याच्या झाडाला निंबाच्या आणि दुसर्या जातीच्या झाडांनीं वेढलें आहे हें तुम्ही पहातच आहां. त्यांच्या शाखा या झाडाच्या शाखेंत मिसळल्या आहेत, त्यांचीं मुळें याच्या मुळाशीं संबद्ध झालीं आहेत आणि त्यामुळें या आंब्याच्या झाडांतील मधुरता जाऊन त्याच्या अंगीं कडुपणा आला आहे. थोडक्यांत सांगावयाचें म्हणजे वाईट सहवासाचें हें फळ आहे.''*_
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*_मूळ गाथा_*
_पुचिमंदपरिवारो अंबो ते दधिवाहन ।_
_मूलं मूलेन संसठ्ठं साखा साखा निसेवरे ।_
_असतं सन्निवासेन तेनम्बो कटुकप्फलो ॥_
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
_राजानें आजुबाजूचीं कडू जातीचीं झाडें तोडून टाकण्यास हुकूम केला. तीं तोडून त्याचीं मुळें खणून काढण्यांत आलीं. तेव्हां त्या आंब्याच्या झाडाला पूर्ववत् मधुर फळें येऊं लागलीं._
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*संदर्भ : - जातक कथा संग्रह*
*संकलन :- महेश कांबळे*
*२७/१२/२०२०*
https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Friday, 25 December 2020
हे निघून जाईल
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*झेन कथा: हे निघून जाईल*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
_*जपानी संस्कृतीतल्या १३व्या शतकात जपानी बौद्ध धर्मगुरू मुजु यांनी सांगितलेल्या झेन कथा रोजच्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलून टाकण्याची ताकद देतात. या गोष्टींना तात्पर्य नसते. अत्यंत हलक्या फुलक्या आणि समजायला सोप्या असणार्या या कथांतून आपण काय व कश्याप्रकारे घेतो हे आपल्यावर निर्भय आहे. अशीच एक झेन कथा.:-_
_विद्यार्थी बोधीसत्वाला म्हणाला, “ध्यानधारणा त्रासदायक आहे, मला खूप विस्कळीत व अस्वस्थ झाल्यासारखं वाटतय. माझे पाय दुखतात, मला सतत झोप येते, हे भयंकर आहे.”_
_बोधिसत्व म्हणाला, *”हे निघून जाईल”.*_
_एक आठवड्यानंतर तोच विद्यार्थी परत येऊन सांगू लागला., “ध्यानधारणा खूप छान आहे, मला खूप मस्त सजग, शांत, चैतन्यमयी झाल्यागत वाटतंय.”_
_ बोधिसत्व सहज म्हणाला, *”हे निघून जाईल”.*_
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*संदर्भ: - झेनकथा*
*संकलन :- महेश कांबळे*
*२६/१२/२०२०*
https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
उत्तमा-दुसरी
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*३१ उत्तमा-दुसरी*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
_कोशल देशाच्या एका प्रतिष्टीत ब्राह्मणाच्या घरी हिचा जन्म झाला होता. भगवान बुद्ध कोशल देशात चारीका करीत असताना एके दिवशी तथागतांचा धम्म ऐकला आणि तो ऐकून तिने प्रव्रजा घेतली. प्रव्राजित झाल्यावर ध्यान-साधना करून थोड्याच दिवसात तीने अर्हत्वपद प्राप्त केले. आपला अनुभव सांगताना ती म्हणते:-_
*_जी हि सात बोध्यंगे आहेत ती निब्बाण प्राप्तीचे मार्ग आहेत. भगवान बुद्धाने उपदेशिल्याप्रमाने त्या सर्वांचा मी अभ्यास केला. !!४५!!_*
*_राग, द्वेष, मोह आदीपासून शून्य अवस्थेत व अनिमित्त असे जे निब्बाण ते मी इच्छेप्रमाणे प्राप्त केले आहे. मी भगवान बुद्धांची वारस कन्या आहे. मी निब्बाणाचा आनंद नेहमी भोगीत आहे.!!४६!!_*
*_माझ्या सर्व कामवासना, दिव्य आणि मानवी, नष्ट झाल्या आहेत. माझे आवागमन थांबले.!!४७!!_*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*संदर्भ: - थेरिगाथा*
*संकलन :- महेश कांबळे*
*२६/१२/२०२०*
https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
लंगडा गुरू
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*_लंगडा गुरू_*
*_(गिरिदंत जातककथा)_*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
_एका काळी वाराणसींत साम नांवाचा राजा राज्य करीत होता. आणि बोधिसत्त्व त्याचा प्रधान होता. राजाला अत्यंत उत्तम घोडा आणून नजर करण्यांत आला. तो जरी उत्तम जातीचा होता तथापि चांगला शिकलेला नव्हता म्हणून गिरिदंत नांवाच्या अश्वशिक्षकाच्या स्वाधीन त्याला करण्यांत आलें. गिरिदंत लंगडा होता, तो घोड्याचा लगाम धरून पुढें चालला असतां लंगडत लंगडत चालत असे. कांहीं दिवसांनीं घोडाहि लंगडूं लागला. घोड्याच्या पायाला रोग झाला असावा असें वाटून सर्व अश्ववैद्यांला बोलावून परीक्षा करविली. पण चिकित्सेअंती घोड्याला कोणताच रोग नाहीं असे ठरलें. तेव्हां राजा मोठ्या काळजींत पडला. इतका चांगला घोडा आपणांस मिळाला असून तो थोडक्यांच दिवसांत लंगडा होऊन बसावा याबद्दल राजाला फार वाईट वाटलें. तें पाहून बोधिसत्त्व म्हणाला, ''महाराज, आपण काळजी करूं नका. मी या संबंधानें नीट विचार करून घोड्याच्या रोगाचें कारण शोधून काढतों.''_
_त्या दिवसापासून बोधिसत्त्वानें घोड्याच्या हालचालींवर बारीक नजर ठेविली. गिरिदंत जेव्हां लगाम हातांत धरून पुढें जाऊं लागला, तेव्हां त्याच्या मागोमाग घोडादेखील त्याच्यासारखा लंगडत चालूं लागला. तें पाहिल्याबरोबर बोधिसत्त्वाच्या डोक्यांत लक्क प्रकाश पडला. तो राजाजवळ जाऊन म्हणाला, ''महाराज घोड्याला कोणताही रोग नाही. *लंगडे गुरुजी आपणाला चालण्याचें कौशल्य शिकवीत आहेत असें वाटून घोडाहि लंगडत आहे.* दुसरा एखादा सर्व अवयवसंपन्न शिक्षक मिळाला असतां हा घोडा लंगडण्याची दुष्ट खोड सोडून देऊन नीट चालूं लागेल.''_
_राजानें बोधिसत्त्वाच्या सल्ल्याप्रमाणें दुसरा शिक्षक ठेविला. तो जातिवंत घोडा नवीन शिक्षकाची चाल पाहून आपणहि नीट चालूं लागला._
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*संदर्भ : - जातक कथा संग्रह*
*संकलन :- महेश कांबळे*
*२६/१२/२०२०*
https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Thursday, 24 December 2020
हलत मन
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*झेन कथा: हलत मन*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
_*जपानी संस्कृतीतल्या १३व्या शतकात जपानी बौद्ध धर्मगुरू मुजु यांनी सांगितलेल्या झेन कथा रोजच्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलून टाकण्याची ताकद देतात. या गोष्टींना तात्पर्य नसते. अत्यंत हलक्या फुलक्या आणि समजायला सोप्या असणार्या या कथांतून आपण काय व कश्याप्रकारे घेतो हे आपल्यावर निर्भय आहे. अशीच एक झेन कथा.:-_
_दोन मित्र रस्त्यात उभे राहून भांडण करत होते. भांडणाचा विषय होता – झेंडा हलतोय कि नाही?_
_”वारा हलतोय”, पहिला मित्र म्हणाला_
_”नाही, झेंडा हलतोय”, दुसरा मित्र म्हणाला._
_त्यांच्या शेजारून बोधिसत्व जात होता. तो म्हणाला, “वारा किंवा झेंडा यांपैकी कोणीच हलत नाहीये. *जे हलतंय ते तुमच मन आहे.*”_
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*संदर्भ: - झेनकथा*
*संकलन :- महेश कांबळे*
*२५/१२/२०२०*
https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
उत्तमा
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*३० उत्तमा*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
_श्रावास्तीच्या एका श्रीमंत व्यापार्याच्या घरी हिचा जन्म झाला होता. पटाचारा भिक्खुनिचा उपदेश ऐकून हिने प्रव्रज्या घेतली. परंतु बरेच दिवस झाले तरी परमज्ञानाची प्राप्ती करणे तिला शक्य झाले नाही. पटाचारेने तिच्या चित्ताची अवस्था पाहून विशेष उपदेश केला. तो उपदेश ऐकून उत्तमा परिश्रमपुर्वक साधना करू लागली. त्यामुळे तिला परमज्ञानाचा साक्षात्कार झाला. ज्ञानप्राप्तीने आनंदित होऊन ती खालील गाथा वारंवार म्हणू लागली.:-_
*_चार पाच वेळा चित्तशांतीसाठी विहारातून बाहेर पडले. परंतु चित्त ताब्यात नसल्यामुळे चित्तशांती मिळाली नाही. !!४२!!_*
*_जी माझी श्रद्देया होती त्या भिक्खुनिकडे मी गेले. तिने मला स्कंध, आयतन व धातू यांचा उपदेश दिला. !!४३!!_*
*_तिने मला जसा उपदेश केला, तसा तिचा धम्म ऐकून मी एक आठवडा एकाच आसनावर बसून ध्यानाच्या आनंदाचा घेऊ लागले. आठव्या दिवशी मी पाय पसरले तेव्हा माझा अज्ञानांधकार नष्ट झाला होता. !!४४!!_*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*संदर्भ: - थेरिगाथा*
*संकलन :- महेश कांबळे*
*२५/१२/२०२०*
https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
खरें बंधुप्रेम
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*_खरें बंधुप्रेम_*
*_(असदिस जातककथा)_*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
_वाराणसीच्या राजाला दोन पुत्र होते. थोरल्याचें नांव असदृशकुमार, आणि धाकट्याचें नांव ब्रह्मदत्तकुमार असें होतें. त्यांत असदृशकुमार हा बोधिसत्त्व होता. वयाच्या १६ व्या वर्षी त्यानें तक्षशिलेला जाऊन एका प्रसिद्ध आचार्याच्या हाताखालीं तीन वेदांचें आणि अठरा शास्त्रांचें अध्ययन केलें आणि तो परत वाराणसीला आला. त्याचा पिता मरतेवेळीं असदृशकुमाराला राज्य देऊन ब्रह्मदत्ताला युवराज करावें असें प्रधानमंडळाला सांगून मरण पावला. त्याचें उत्तरकार्य झाल्यावर प्रधानमंडळानें बोधिसत्त्वाला राज्याभिषेक करण्याची सर्व व्यवस्था केली. परंतु बोधिसत्त्व म्हणाला, ''मला राज्यकारभाराचा भार नको आहे. शास्त्राध्ययन आणि धनुर्विद्या यांतच ती आनंद मानीत असतों. माझा धाकटा भाऊ सर्व तर्हे नें राज्यभार वाहण्याला योग्य आहे आणि राजा होण्याची त्याला फार इच्छाहि आहे. तेव्हां त्यालाच राज्यपदावर बसवावें अशी मी सर्वांना विनंति करतों.''_
_सर्व प्रधानमंडळानें आणि वाराणसीवासी प्रजाजनांनीं बोधिसत्त्वाला राज्यपद स्वीकारण्याविषयीं फार आग्रह केला. परंतु त्यांचा इलाज चालला नाहीं. शेवटीं बोधिसत्त्वाच्या इच्छेप्रमाणें ब्रह्मदत्तालाच त्यांनीं अभिषेक केला. ब्रह्मदत्त आपल्या वडील भावाच्या सल्ल्यानेंच सर्व राज्यकारभार पहात असे. पण हळु हळु राज्यपदाच्या धुंदींत तो सांपडला. हांजी हांजी करणार्याा लबाड लोकांची त्याच्या भोंवतीं मालिका जमली. आपल्या धन्याला संतुष्ट करण्यासाठीं ज्याच्या त्याच्या खोट्या नाट्या चुगल्या करण्याचा धंदा त्यांनीं सुरूं केला. एकानें तर राजाला असें सांगितलें कीं, वडील भाऊ असदृशकुमार राजाला मारून राज्य बळकावण्याचा कट करीत आहे. झालें ! ही गोष्ट निघाल्याबरोबर दुसरा म्हणाला, ''मला या संबंधानें मागेंच बातमी लागली होती. परंतु म्हटलें उगाच महाराजांचें आपल्या वडील बंधूविषयीं मन कलुषित कां करा ? म्हणून चुप राहिलों.''_
_त्यावर तिसरा म्हणाला, ''अहो पण तुमचें हें करणें अगदींच अयोग्य झालें. राजेसाहेब अन्नदाते, त्यांच्या जिवावर जर कोणी उठला- मग तो वडील भाऊ किंवा आजा असो- आम्हीं त्याच्या कटाची बातमी महाराजांना ताबडतोब दिली पाहिजे. पण तुम्ही इतके दिवस मौन धरून बसलां याला काय म्हणावें ?''_
_अशा रीतीनें त्या लुच्चा लोकांनीं राजाचे मन बिघडवून टाकलें आणि त्यामुळें एके दिवशीं राजानें आपल्या भावास पकडून कैद करण्याचा हुकूम दिला. बोधिसत्त्वाचा एक अत्यंत जिवलग मित्र प्रधानमंडळांत होता. त्यानें ही बातमी त्याला कळवली. अशा लबाड लोकांच्या हातीं लागण्यापेक्षां येथून पलायन केलेलें बरें, असा सुविचार करून बोधिसत्त्व रात्रींच्या रात्रीं वाराणसींतून पळून गेला. तो दूरच्या एका मांडलिक राजापाशीं जाऊन नोकरीस राहिला. त्या राजानें बोधिसत्त्वाचें धनुर्विद्या-कौशल्य पाहून त्याचा फार सन्मान केला, आणि त्याला सदोदित आपल्याजवळ ठेऊन घेतलें._
_एके दिवशीं राजा उद्यानक्रीडेसाठीं आपल्या आम्रवनांत गेला होता. तेथें आंब्याच्या झाडाच्या अग्रशाखेवर एक आंबा पिकला होता. तो काठीनें किंवा दगडानें खालीं पाडणें शक्य नव्हतें. कां कीं, तें झाड फार उंच होतें आणि त्याच्या शाखांतून हा पिकलेला आंबा तेवढा दिसत होता. तेव्हां राजानें सर्व धनुर्ग्राहकांना बाण मारून तो आंबा खालीं पाडण्यास सांगितलें. परंतु त्यांतील एकजणदेखील नीट शरसंधान करून आंबा पाडूं शकला नाहीं. नंतर बोधिसत्त्वाला हें काम सांगितलें. त्यानें अचूक बाण मारून आंबा आणि बाण दोन्ही वरच्यावर झेलून धरले. तें आश्चर्य पाहून राजानें बोधिसत्त्वाचा फार गौरव केला; आणि त्यामुळें त्याची कीर्ति देशोंदेशीं पसरली._
_इकडे असदृशकुमार वाराणसी सोडून दुसरीकडे गेला असें जाणून आसपासचे सात लहान लहान राजे एकवटून वाराणसीवर चाल करून आले. वाराणसींत बोधिसत्त्वासारखा शूर शिपाई आणि दूरदर्शी मुत्सदी नाहीं. तेव्हां आपण क्षणार्धांत ब्रह्मदत्ताला शरण आणूं व त्याच्याकडून भरपूर खंडणीं घेऊं असें त्यांना वाटलें होतें. परंतु वाराणसींचा कोट फारच बळकट असल्यामुळें त्यांच्या मनोरथाप्रमाणें एकदम तें शहर जिंकतां आलें नाहीं. तेव्हां शहराला वेढा घालून ते तेथेंच राहिले. ब्रह्मदत्तावर हें मोठेंच संकट कोसळलें. आतां त्याला वडील बंधूची आठवण झाली. तो आपल्या हांजी हांजी करणार्याद नोकरांना म्हणाला, ''तुम्ही खोटें नाटें सांगून माझ्या वडील बंधूला येथून घालवून दिलेंत. परंतु तो जर येथें असता तर आज आपल्याला या संकटापासून रक्षण केले असते. आतां देखील आपण त्याच्याजवळ एक गुप्ते हेर पाठवूं. आपल्यावर आलेले संकट त्याला समजलें, तर माझे अपराध पोटीं घालून आपल्या मदतीला तो धांवत आल्यावांचून रहाणार नाहीं. त्याचें बंधुप्रेम इतकें अलौकिक आहे कीं, माझ्यासारख्या कृतघ्न भावाच्या दुर्वर्तनानें तें मलिन होणार नाहीं.''_
_ब्रह्मदत्तानें गुप्त' हेर पाठवून वाराणसीच्या वेढ्याचें वर्तमान कळवल्याबरोबर बोधिसत्त्व आपल्या धन्याचे कांहीं निवडक योध्दे बरोबर घेऊन वाराणसीला आला. मी असदृशकुमार आपल्या भावाला मदत करण्यासाठीं आलों आहे अशा तर्हेाचा मजकूर लिहून तीं पत्रें बाणाला बांधून त्यानें शत्रुसेनेच्या मध्यभागीं पाडलीं. बोधिसत्त्वाचें नांव ऐकिल्याबरोबर त्या सात राजांची सेना फार गडबडून गेली; आणि जो तो जिकडे वाट सांपडेल तिकडे पळूं लागला ! एका तासाच्या आंत वाराणसी शहराचा वेढा उठला व मोठ्या जयजयकारानें बोधिसत्त्वानें शहरांत प्रवेश केला. ब्रह्मदत्तानें पुढें येऊन त्याचे पाय घट्ट धरले, आणि केलेल्या अपराधाची क्षमा मागितली. तेव्हां बोधिसत्त्व म्हणाला, ''तुझ्या दुष्ट सोबत्यांनी तुझें मन बिघडविलें असलें तथापि तूं माझा भाऊ आहेस; आणि म्हणून तुझ्यावरचें माझें प्रेम कधींहि कमी झालें नाहीं. लुच्च्या लोकांच्या तूं नादास लागलास हें पाहून मला मात्र फार वाईट वाटलें. पण आतां तुला वाईट संगतीचें फळ कोणतें हें पक्के समजून चुकलें आहे, व ह्या पुढें तुझ्या हातून पुन्हां अयोग्य गोष्ट होणार नाहीं अशी मला आशा आहे.''_
.
_ब्रह्मदत्तानें आपल्या वडील भावाला मोठ्या आग्रहानें आपल्याजवळ ठेवून घेतलें, आणि तेव्हांपासून त्याच्या सदुपदेशाबाहेर आजन्म पाऊल टाकलें नाहीं._
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*संदर्भ : - जातक कथा संग्रह*
*संकलन :- महेश कांबळे*
*२५/१२/२०२०*
https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Wednesday, 23 December 2020
रिकामा कप
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*झेन कथा: रिकामा कप*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
_*जपानी संस्कृतीतल्या १३व्या शतकात जपानी बौद्ध धर्मगुरू मुजु यांनी सांगितलेल्या झेन कथा रोजच्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलून टाकण्याची ताकद देतात. या गोष्टींना तात्पर्य नसते. अत्यंत हलक्या फुलक्या आणि समजायला सोप्या असणार्या या कथांतून आपण काय व कश्याप्रकारे घेतो हे आपल्यावर निर्भय आहे. अशीच एक झेन कथा.:-_
_विद्यापीठातील प्राध्यापक बोधीस्त्वाकडे गेला. बोधिसत्व चहा करीत असताना प्राध्यापक तावातावाने तत्वचर्चा करत होता. बोधीसत्वाने पाहुण्याचा कप काठोकाठ भरला, तो भरून वाहू लागला. तरी बोधिसत्व चहा ओततच राहिला. शेवटी न राहवून प्राध्यापक म्हणाला, “कप भरलाय, त्याच्यात आता चहा जाणार नाही.”_
_बोधिसत्व म्हणाला, “तू या कपासारखा आहेस, भरलेला. जोपर्यंत तू स्वतःला रिकामं करत नाहीस, तोपर्यंत तुला मी काय शिकवणार? म्हणून तू आधी तुझा *कप रिकामा कर.”*_
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*संदर्भ: - झेनकथा*
*संकलन :- महेश कांबळे*
*२४/१२/२०२०*
https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
सामा-दुसरी
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*२९ सामा-दुसरी*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
_कोशंबिमधील एका कुलीन घरात हिचा जन्म झाला होता. कोशंबिचा राजा उदयन ह्याच्या पत्नीची ती मैत्रीण होती. उदयनाची पत्नी सामावती हि मरण पावल्यानंतर हि खूप दुःखी झाली आणि त्यामुळे तीने भिक्खुनीकडे जाऊन प्रव्रज्या घेतली. पंचवीस वर्षापर्यंत तिला दिव्यज्ञानाचा साक्षात्कार झाला नव्हता. म्हातारपणी बुद्धोपदेश ऐकून खूप साधना केली व शेवटी तिने दिव्यज्ञान मिळविले. स्वतःच्या पुर्वजीवनाचे अवलोक करीत असताना तिच्या तोंडून खालील उद्गार सहजपणे निघाले :-_
*_प्रव्रज्या घेऊन पंचविस वर्षे झाली तरी मला चित्ताची शांती मिळाली असे वाटत नाही. !!३९!!_*
*_चित्त ताब्यात नसल्यामुळे चित्त शांती लाभली नाही. तेव्हा भगवान बुद्धांचा उपदेश स्मरण करून मला वैराग्य प्राप्त झाले. !!४०!!_*
*_मी पुष्कळ गोष्टीशी सामना करीत दक्ष राहून तृष्णेचा नाश केला आणि भगवान बुद्धांच्या शासनाप्रमाणे आचरण केले. तृष्णा नष्ट केल्यावरची हि माझी सातवी रात्र आहे. !!४१!!_*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*संदर्भ: - थेरिगाथा*
*संकलन :- महेश कांबळे*
*२४/१२/२०२०*
https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
जन्मभूमीचा फाजील अभिमान
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*_जन्मभूमीचा फाजील अभिमान_*
*_(कच्छप जातककथा)_*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
_बोधिसत्त्व एकदां काशीराष्ट्रांत कुंभाराच्या कुलांत जन्मून मोठा झाल्यावर मातीची भांडीं करून आपला निर्वाह करीत असे. त्याच्या गांवाजवळ एक मोठें तलाव होतें. तें उथळ असल्यामुळें त्यांत उन्हाळ्यांत फार पाणी रहात नसे. पावसाळ्यांत नदीला पूर आल्यावर तें तुडुंब भरून जाई. परंतु पूर ओसरून गेल्यावर त्यांतलें पाणी हळु हळु कमी होत जाई व कधीं कधीं तें अगदीं ठणठणीत कोरडें पडत असे. पुराच्या वेळीं त्या तलावात पुष्कळ मासे येत असत. परंतु ज्या वर्षी तें तळें कोरडें पडण्याचा संभव असे त्या वर्षी ते पूर ओसरण्याच्या आधींच नदीला जाऊन मिळत. एका वर्षी पाऊस थोडा पडल्यामुळें सरोवरांत पाणी रहाण्याचा संभव दिसेना. तेव्हां सर्व मासे कच्छप तेथून निघून नदीच्या प्रवाहांत गेले. परंतु एक कांसव तेथेंच राहिला. त्याचे मित्र त्याला म्हणाले, ''बाबारे, सर्व मासे तलाव कोरडा पडण्याचें चिन्ह पाहून येथून निघून जात आहेत. मग तुझा एकट्याचा रहाण्याचा हट्ट कां ?''_
_तो म्हणाला, ''तुम्हाला तुमच्या जन्मभूमीची मुळींच काळजी नाहीं. उगाच कुशंका मनामध्यें आणून आपल्या जन्मभूमीचा त्याग करण्याला तुम्हाला लाज वाटत नाहीं. मी माझ्या जन्मभूमीची सेवा करीत येथेंच रहाण्याचा निश्चय केला आहे.''_
_त्याचे मित्र आणि आप्तवइष्ट त्याचें मन वळवूं शकले नाहींत. ते त्याला एकट्यालाच तेथें सोडून चालते झाले. दूरदशीं माशांनीं भविष्य केल्याप्रमाणें त्या वर्षी त्या तळ्यांतील पाणी पार आटून गेलें ! बोधिसत्त्व त्याच तळ्यांतील चिखल नेऊन भांडीं करीत असे. कासवाला पाणी न मिळाल्यामुळें तो चिखलांत रुतून राहिला. बोधिसत्त्व चिखल उकरीत असतां कुदळीचा धक्का लागून त्याचें कवच फुटलें, आणि तो वर येऊन तळमळत पडला. बाधिसत्त्वाला त्याची ही दीनदशा पाहून अत्यंत कींव आली आणि तो म्हणाला, ''कांसवा तुझा मी मोठा अपराध केला आहे. तूं चिखलांत आहेस, हें न जाणतां त्याच्यावर मी घाव घातला आणि तुझें कवच फोडून टाकलें याबद्दल तूं मला क्षमा कर.''_
_कासव म्हणाला, ''कुंभारा, तुझा यांत कांहींच अपराध नाही. येवींतेवीं भक्ष्य न मिळाल्यामुळें मी या चिखलांत प्राणाला मुकलोंच असतों. तूं माझें मरण जवळ आणलेंस येवढेंच काय तें. *आपल्या जन्मभूमीचा फाजील अभिमान धरून जे तिला चिकटून बसतात त्यांची हीच गत होते! माझ्या या विपत्तीपासून लोकांनीं शिकण्यासारखा धडा म्हटला म्हणजे जेथें आपलें पोट भरून सुखानें वास करतां येईल तीच आपली खरी जन्मभूमी समजली पाहिजे. उगाच फाजील अभिमान धरून जातस्थलीं मरून जाणें यांत मुळींच पुरुषार्थ नाहीं.''*_
_हे उद्गाार काढून कासवानें तेथेंच प्राण सोडला. बोधिसत्त्वानें घरीं येऊन ती गोष्ट आपल्या ज्ञातिबांधवांस सांगितली_.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*संदर्भ : - जातक कथा संग्रह*
*संकलन :- महेश कांबळे*
*२४/१२/२०२०*
https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
जेव्हा थकाल
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*झेन कथा: जेव्हा थकाल*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
_*जपानी संस्कृतीतल्या १३व्या शतकात जपानी बौद्ध धर्मगुरू मुजु यांनी सांगितलेल्या झेन कथा रोजच्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलून टाकण्याची ताकद देतात. या गोष्टींना तात्पर्य नसते. अत्यंत हलक्या फुलक्या आणि समजायला सोप्या असणार्या या कथांतून आपण काय व कश्याप्रकारे घेतो हे आपल्यावर निर्भय आहे. अशीच एक झेन कथा.:-_
_शिष्याने बोधीसत्वाला विचारले, “संबोधि काय आहे?”_
_बोधिसत्व म्हणाला, “जेव्हा भूक लागेल तेव्हा जेवा, थकाल तेव्हा झोपा.”_
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*संदर्भ: - झेनकथा*
*संकलन :- महेश कांबळे*
*२३/१२/२०२०*
https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
माकडाचा वानराचें दूरदर्शित्व
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*_माकडाचा वानराचें दूरदर्शित्व_*
*_(तिण्डुक जातककथा)_*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
_बोधिसत्त्व वानरयोनींत जन्म पावून वयांत आल्यावर एका मोठ्या वानरसमुदायाचा राजा झाला होता. तो जंगलात रहात असे, त्याच्याजवळच एक टेंभुर्णीचा मोठा भव्य वृक्ष होता. त्या झाडाच्या आसपास वर्षांतून कांहीं दिवस एक गांवच वसत असे व कांहीं दिवस तेथें कोणीहि रहात नसत. तेव्हां तेथें लोकांची वस्ती नसे, तेव्हां बोधिसत्त्व आपल्या परिवारासह जाऊन त्या वृक्षाचीं फळें यथेच्छ खात असे. परंतु एका वर्षी अशी गोष्ट घडली कीं त्या झाडाला फळें येण्याची आणि लोकांची वसाहत होण्याची एकच गांठ पडली तेव्हां बोधिसत्त्वाला तेथें जाण्याचें सोडून देणें भाग पडले. पण त्याच्या कळपांतील माकडांना ही गोष्ट आवडली नाहीं. ते म्हणाले ''आम्हीं प्रतिवर्षी त्या झाडाची गोड फळें खात आलों आहों. आतां त्यांच्या आसपास माणसांची वस्ती झाली म्हणून फळें खाण्याचें सोडून देणें हा नामर्दपणा आहे. दिवसा लोक दुपारच्यावेळी झोपत असतात, त्यावेळीं हळूच जाऊन आपण फळें खाऊन घेऊं.'' बोधिसत्त्वानें वानरगणांचें मन वळवण्याचा पुष्कळ प्रयत्न केला. परंतु बहुमतापुढें त्याचें कांहीं चाललें नाहीं तेव्हां त्यानें तेथें जाण्याचा ठराव केला, आणि एकांती सेनक नांवाच्या आपल्या भाच्याला बोलावून आणून तो म्हणाला, ''सेनका, तूं देखील इतर वानरासारखा फळलोभी आहेस काय ?''_
_सेनक म्हणाला, ''आपल्या आज्ञेपुढें मला दुसर्या कोणत्याहि वस्तूची चाड वाटत नाहीं. आपण जर सांगाल तर मी केवळ पाणी पिऊन देखील राहीन.''_
_यावर बोधिसत्त्व म्हणाला, ''मी या गणाचा राजा असल्यामुळें मला यांच्याबरोबर गेलेंच पाहिजे. जर का मी मागें राहिलों तर मला भ्याड म्हणून हे माझी निंदा करतील; आणि माझ्याविषयीं त्यांची आदरबुद्धि पार नष्ट होईल. म्हणून आज आम्हीं फळें खावयास जाऊं त्यावेळीं तूं मागें रहा, आणि जर आम्हीं संकटांत सांपडलों असें दिसलें, तर मी सांगतों त्या उपायानें आम्हांला त्या संकटांतून सोडव.''_
_बोधिसत्त्वाची आज्ञा सेनकानें मान्य केली. बोधिसत्त्वानें आपण संकटांत सांपडलों तर कोणती युक्ती योजावी या संबंधानें त्याला नीटपणें सर्व कांहीं सांगून ठेविलें. आणि वानर-गणांला घेऊन दुपारच्या वेळी तो त्या वृक्षावर फळें खात बसला. उन्हाळा फार असल्यामुळें सर्व लोक आपापल्या झोपडींत विश्रांती घेत बसले होते; किंवा कांहींजण झोपीं गेले होते. परंतु कांहीं कारणानिमित्त त्यांतील एकजण झोपडीच्या बाहेर आला, आणि पहातो तों टेंभुणींचें झाड माकडांनीं भरून गेलेलें ! त्यानें सर्व लोकांना उठवून जागें केलें, आणि त्या सर्वांनीं शस्त्रास्त्रें घेऊन त्या वृक्षाला वेढा दिला. वानरगणाची पांचावर धारण बसली. ते गयावया करीत बोधिसत्त्वाला म्हणाले, ''महाराज, आपला सल्ला आम्हीं मानला असता तर या संकटांत सांपडलों नसतों. आम्हींच अशा कचाट्यांत सांपडलों असें नाहीं, पण आपणाला देखील आम्ही दुःखांत पाडलें आहे !''_
_बोधिसत्त्व म्हणाला, ''आतां झालेल्या गोष्टीबद्दल खेद करण्यांत अर्थ नाहीं. तुम्ही धीर धरा. माझा भाचा सेनक मागें राहिला आहे. तो आम्हाला या संकटांतून मुक्त करील.''_
_बोधिसत्त्वानें धीर दिला नसता, तर ते माकड गर्भगळित होऊन खाली पडले असते, व प्राणाला मुकले असते._
_इकडे सेनक त्या गांवाबाहेर आपल्या जातभाईंची काय वाट होते हें पहात बसला होता. सर्व मर्कटसमुदायाला सशस्त्र मनुष्यांनीं वेढलेलें पाहून त्यानें मामानें शिकवलेली युक्ति अंमलांत आणली. झोंपडींत शिरून तेथें जळत असलेली आगीची कोलीत घेऊन त्यानें दोन चार झोंपड्या पेटवून दिल्या ! आग जिकडे तिकडे फैलावत चालल्यामुळें गांवांतील बायकामुलांत एकच हाहाःकार उडाला. माकडांला घेरा घालून राहिलेले लोक आपलीं शस्त्रास्त्रें घेऊन आग लागली होती त्या दिशेनें ती विझवण्याला मदत करण्यासाठीं धावत सुटले, तेव्हां बोधिसत्त्व आपल्या समुदायासह तेथून कांहीं एक इजा न होतां पळून गेला. सर्व मर्कटगणानें त्याच्या दूरदर्शित्वाची फार तारीफ केली. बोधिसत्त्वानेंहि सेनकानें आपली आज्ञा पाळली म्हणून त्याचा योग्य गौरव केला._
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*संदर्भ : - जातक कथा संग्रह*
*संकलन :- महेश कांबळे*
*२३/१२/२०२०*
https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
सामा-पहिली
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*२८ सामा-पहिली*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
_कोशंबिमधील एका प्रतिष्टीत कुळांत हिचा जन्म झाला होता. कोशंबिचा राजा उदयन ह्याच्या पत्नीची ती मैत्रीण होती. उदयनाची पत्नी सामावती हि मरण पावल्यानंतर हि खूप दुःखी झाली आणि त्यामुळे तीने भिक्खुनीकडे जाऊन प्रव्रज्या घेतली. परंतु सतत चिंताग्रस्त राहिल्याने आर्यमार्गाचा सम्यक अभ्यास करू शकली नाही. ह्यातच पंचवीस वर्षे निघून गेली. शेवटी आनंद थेराचा उपदेश ऐकून चित्त एकाग्र करण्याचा खूप प्रयत्न केला. त्यानंतर तिला दिव्यज्ञानाचा साक्षात्कार झाला. स्वतःच्या पुर्वजीवनाचे अवलोक करीत असताना तिने ह्या गाथा म्हटल्या :-_
*_चार पाचदा विहारातून चित्तशांतीसाठी बाहेर पडले. परंतु चित्त ताब्यात नसल्यामुळे चित्ताला शांती मिळाली नाही. !!३७!!_*
*_माझी हि आठवी रात्र आहे, माझी तृष्णा समूळ नष्ट झाली. तेव्हापासून मी पुष्कळ दुःखद गोष्टीशी सामना करीत दक्ष राहून तृष्णेचा नाश केला आणि भगवान बुद्धांच्या शासनाप्रमाणे आचरण केले. !!३८!!_*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*संदर्भ: - थेरिगाथा*
*संकलन :- महेश कांबळे*
*२३/१२/२०२०*
https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Monday, 21 December 2020
अभया
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*२७ अभया*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
_उज्जैनी नगरीत इका उच्च कुळांत हिचा जन्म झाला होता. हि अभयमातेची मैत्रीण होती. अभय मातेसोबत हि पण प्रव्राजित झाली होती. राजगृहात राहत असताना एके दिवशी अशुभ भावनेकरिता जंगलात गेली. भगवंतांचा उपदेश ऐकून तिला अर्हत्वपद प्राप्त झाले. तेव्हापासून ती खालील गाथा वारंवार म्हणू लागली. :-_
*_”अभये! हा देह भग्न होणारा आहे, असे असूनसुद्धा येथे अज्ञानी लोक आसक्त आहेत. संपूर्ण जाणीव ठेवून व स्मृतीमान होऊन मी हा देह सोडीन.”!!३५!!_*
*_मी पुष्कळ दुःखद गोष्टीशी सामना करीत दक्ष राहून तृष्णेचा नाश केला आणि भगवान बुद्धांच्या शासनाप्रमाणे आचरण केले.!!३६!!_*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*संदर्भ: - थेरिगाथा*
*संकलन :- महेश कांबळे*
*२२/१२/२०२०*
https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
माकडाचा दांभिकपण
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*_माकडाचा दांभिकपणा_*
*_(आदिच्चुपट्ठान जातककथा)_*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
_बोधिसत्त्व एका जन्मीं तापस होऊन मोठ्या तापसपरिवारासह हिमालयावर रहात असे. पावसाळ्यात आपल्या परिवारासह तो जवळपासच्या एका मोठ्या गांवाजवळ येत असे, व पावसाळा संपल्यावर पुनः हिमालयावर जात असे. एका पावसाळ्यांत एका गांवाजवळ तो आपल्या परिवारासह भाविक लोकांनी बांधून दिलेल्या पर्णशालेंत रहात होता. सकाळच्या वेळी तापसगण भिक्षेला गेल्यावर एक माकड त्या पर्णकुटिकेंत शिरून फार नासधूस करीत असे. अग्निकुंडांत राख टाकावी; पाण्याचा घडा उपडा करावा; कमंडलु फोडून टाकावे, व सरते शेवटीं देहधर्म करून तेथून निघून जावें ! अशा रीतीनें त्यानें त्या चातुर्मास्यांत तापसांना फार त्रास दिला. चातुर्मास्य संपल्यावर बोधिसत्त्व आपल्या परिवारासह हिमालयावर जाण्यास निघाला. तेव्हां ग्रामवासी लोकांनीं मोठा उत्सव करून तापसगणांला महादान दिलें. तें पाहून त्या माकडाला फार मत्सर झाला. तो मनाशींच म्हणाला, ''हें जंगलांत राहणारे तपस्वी आहेत. त्यांच्यांत आणि माझ्यांत कांहींच अंतर नसतां लोक यांची पूजा करतात व मी लोकांच्या दाराशीं गेलों असतां दगड मारून मला घालवून देतात. मी जसा फलमूलांवर रहातों, तसे हे तापसलोक फलमूलांवर रहातात. परंतु त्यांच्यासारखें अग्निहोत्रादिकांचें स्तोम मी माजवलें नसल्यामुळें मला त्यांसारखा मान मिळत नसावा !''_
_असा विचार करून हळूच पर्णशाळेंतून आगीची कोलीत चोरून नेऊन त्यानें उघड्या मैदानांत पंचाग्नि साधनाचें व्रत सुरू केलें. चारी दिशांला चार ठिकाणी अग्नि पेटवून आणि अंगाला राख फासून तो त्या अग्नीच्या मध्यभागीं सूर्याकडे टक लावून पहात बसला. तापसाची पूजा करण्यासाठीं जे लोक येत असत ते आश्चर्यचकित होऊन म्हणत, ''कायहो ! सर्व प्राण्यांमध्यें साधू पुरुष आढळतातच. या वानराचें तप पहा ! हा यःकश्चित प्राणी असून यानें पंचाग्नि साधनाचें कडकडित व्रत चालविलें आहे !''_
_याप्रमाणें माकडाची स्तुति बोधिसत्त्वाच्या कानापर्यंत गेली. तेव्हां तो त्या लोकांना म्हणाला, ''बाबांनों, या माकडाच्या तपश्चर्येला पाहून भुलून जाऊं नका ! याचें चरित्र कसें आहे हें तुम्हांस ठाऊक नाहीं. रोजच्या रोज अग्निशाळेची नासधुस करून यानें आमचे पुष्कळ कमंडलु फोडले आहेत ? आतां आम्हीं जाण्याच्या सुमाराला तो तपस्वी बनूं पहात आहे.''_
_बोधिसत्त्वाचें हें भाषण ऐकून ते आपल्या काठ्या वगैरे उगारून त्या माकडावर धांवले. तेव्हां त्याचें धैर्य गलित होऊन तो तेथून पळून गेला._
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*संदर्भ : - जातक कथा संग्रह*
*संकलन :- महेश कांबळे*
*२२/१२/२०२०*
https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
अभय माता
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*२६ अभय माता*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
_उज्जैनी नगरीत या थेरीचा जन्म झाला होता. हि त्या नगरीतील प्रसिद्ध गणिका होती. तिचे नाव पद्मावती होते. बिंबिसार राजाने तिच्या रुपसौंदर्याचे बाबतीत ऐकून पुरोहिताला सांगितले, “उज्जैनीतील पद्मावतीला पाहण्याची इच्छा आहे.” तेव्हा पुरोहिताने पद्मावतीची भेट राजाशी घडवून आणली. त्यानंतर राजापासून तिला एक मुलगा झाला. *त्याचे नाव अभय ठेवण्यात आले.* तो सात वर्षांचा झाल्यावर पद्मावतीने त्याला राजाकडे पाठविले. राजाने त्याचे आपल्या पुत्राप्रमाणे लालनपालन केले. काही वर्षांनी त्याला धम्माप्रती श्रद्धा उत्पन्न झाल्याने त्याने प्रव्रज्या घेतली. मुलाचा उपदेश ऐकून काही दिवसांनी त्याची आईसुद्धा प्रव्रजित झाली. विपस्सना साधना करीत तिने दिव्यज्ञान प्राप्त केले. मुलाने दिलेला उपदेश ती वारंवार म्हणू लागली. :-_
*_”हे आई! पायाच्या तळव्यापासून वर डोक्यापर्यंत आणि डोक्यावरील केसापासून खाली तळव्यापर्यंत तू या अशुद्ध व दुर्गंधयुक्त शरीराचे निरीक्षण कर.” !!३३!!_*
*_अशा प्रकारे उपदेश ऐकून आचरण करीत असता माझी संपूर्ण वासना समूळ नष्ट झाली. पीडा शांत झाली. निब्बाण प्राप्त करून मी परमशांती मिळविली आहे. !!३४!!_*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*संदर्भ: - थेरिगाथा*
*संकलन :- महेश कांबळे*
*२१/१२/२०२०*
https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
खळाला मदत केल्याबद्दल प्रायश्चित
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*_खळाला मदत केल्याबद्दल प्रायश्चित_*
*_(दूभियमक्कट जातककथा)_*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
_एकदा बोधिसत्त्व काशी राष्ट्रांत ब्राह्मणकुलांत जन्मला होता. मोठा झाल्यावर तो कांहीं कामानिमित्त दूरच्या एका गांवीं जाण्यास निघाला. वाटेंत एक मोठें जंगल होतें. त्या जंगलात एकच फार खोल विहीर होती. विहिरीजवळ जनावरांना पाणी पाजण्यासाठीं एक डोणी ठेविली होती आणि वाटसरू लोक पुण्य संपादण्यासाठीं विहिरीचें पाणी काढून त्या डोणींत भरून ठेवीत असत. परंतु दोन तीन दिवस त्या मार्गानें कोणी वाटसरू न गेल्यामुळें डोणी ठणठणीत कोरडी पडली. बोधिसत्त्व त्या विहिरीजवळ जाऊन हातपाय धुऊन व पाणी पिऊन उभा राहिला. इतक्यांत एक तहानेनें तळमळणारा माकड त्याला दिसले. बोधिसत्त्वाला त्या माकडाची फार दया आली, व आपल्या तांब्यानें विहिरींतून पाणी काढून त्यानें ती डोणी भरली. माकड पाणी पिऊन तृप्त झाला व झाडावर बसून बोधिसत्त्वाकडे वेडें वाकडें तोंड करून पाहूं लागला; तेव्हां बोधिसत्त्व त्याला म्हणाला, ''बा माकडा, तुझ्यावर उपकार करण्यासाठीं मी इतके कष्ट सहन केले. या खोल विहिरींतून पाणी काढून तें मी तुला पाजलें आणि आतां तूं अशा प्रकारें माझे उपकार फेडतो आहेस काय ?''_
_बोधिसत्त्व ज्या झाडाखालीं बसला होता, त्यावर उडी मारून माकड म्हणाला, ''वेड्या ब्राह्मणा, आमाच्या जातींत वेडीं वाकडी तोंडें न करणारा असा तुला कोणी आढळला आहे काय ? पण एवढ्यानें तुला संतोष होत नसला तर आणखीं दुसरें कांहीं कांहीं करून तुझें उपकार फेडण्यास मी तयार आहे.''_
_बोधिसत्त्व या नीचाबरोबर संवाद करण्यांत अर्थ नाहीं असें जाणून तेथून जाण्यासाठीं उठून उभा राहिला. इतक्यांत माकडानें झाडावरून त्याच्या उघड्या डोक्यावर देहधर्म केला ! बोधिसत्त्व म्हणाला, ''नीचाला मदत केल्याबद्दल मला योग्य प्रायश्चित्त मिळालें !'' असें बोलून त्या विहिरीवर जाऊन बोधिसत्त्वानें स्नान केलें आणि तेथून निघून गेला._
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*संदर्भ : - जातक कथा संग्रह*
*संकलन :- महेश कांबळे*
*२१/१२/२०२०*
https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
मित्ता
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*२५ मित्ता*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
_कपिलवस्तूमधील शाक्य राजकुळात या थेरीचा जन्म झाला होता. भगवान बुद्धांचा उपदेश ऐकून धम्माप्रती तिची श्रद्धा जागृत झाली व काही दिवसांनी ती तथागतांची उपासिका बनली. कालांतराने महापजापती गौतमीकडे ती प्रव्राजित झाली. थोड्याच दिवसात दीर्घ साधना केल्यानंतर अर्हत्व पदाची प्राप्ती केली आणि आंनदाने गाऊ लागली :-_
*_चतृदर्शी, पौर्णिमा व दोन्ही पक्षातील अष्टमी तसेच पाटीहारीय पक्षाच्या दिवशी मी आठशीलांचे पालन केले. देवयोनीत जन्म व्हावा या इच्छेने उपोसथ ग्रहण करीत असे. !!३१!!_*
*_ती मी आज एकवेळ जेवण करणारी, मुंडण केलेली व चीवर धारण करणारी आहे. अंतःकरणातील भीती नष्ट झाल्यामुळे देवयोनीची मी इच्छा करीत नाही. !!३२!!_*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*संदर्भ: - थेरिगाथा*
*संकलन :- महेश कांबळे*
*२०/१२/२०२०*
https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
हलकटाला आश्रय देऊं नये
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
_*हलकटाला आश्रय देऊं नये*_
_*(मक्कट जातककथा)_*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
_एकदां बोधिसत्त्व काशीदेशांत एका खेडेगांवीं जन्मला होता. वेदाध्ययन वगैरे झाल्यावर त्यानें विवाह केला. परंतु दुःखाची गोष्ट ही कीं, एक मुलगा जन्मल्याबरोबर त्याची बायको मरण पावली. तो मुलगा थोडा चालूं बोलूं लागल्यावर त्याला घेऊन बोधिसत्त्व हिमालयावर जाऊन राहिला. तेथें त्यानें एक सुंदर पर्णशाला बांधली, व अग्निहोत्राची उपासना करून तो कालक्रमणां करूं लागला. एके दिवशीं हिमालयावर गारांचा मोठा पाऊस पडला. त्यामुळें एक वानर थंडीनें गारठला, आणि कोठेंतरी आगीजवळ बसण्यास सांपडतें आहे कीं काय याच्या शोधास लागला. बोधिसत्त्वाच्या आश्रमांत होमकुंड जवळ असलेलें पाहून त्याला मोठें समाधन वाटलें पण दरवाजावर बोधिसत्त्वाचा मुलगा बसला असल्यामुळें मर्कटाला एकदम आंत घुसण्यास भीति वाटली. तेव्हां त्यानें एक नवी युक्ती शोधून काढली. जवळच्या एका पर्णकुटिकेंत एक तापस रहात होता. थोड्या दिवसांमागें तो मरण पावल्यामुळें त्याची वल्कलें वगैरे तापसवेषाला लागणारे सर्व पदार्थ तेथेंच पडून राहिले होते. तीं वल्कलें परिधान करून आणि कमंडलु वगैरे हातांत घेऊन तो माकड बोधिसत्त्वाच्या आश्रमापाशीं आला. त्याला पाहून बोधिसत्त्वाचा पुत्र धांवत धांवत बोधिसत्त्वापाशीं गेला आणि म्हणाला, ''बाबा, एक ठेंगू तापसकुमार आपल्या आश्रमापाशीं आला आहे. त्याचा आपण आदरसत्कार करून आपल्या आश्रमांत ठेऊन घेऊं. आपण फलमूलांसाठीं अरण्यांत गेल्यावर मी येथें एकटाच असतों त्या वेळीं त्याच्या संगतींनें मला बरें वाटेल, आणि आम्हीं दोघेहि बरोबर अध्ययन करूं.''_
_बोधिसत्त्व आश्रमाबाहेर येऊन पहातो तों तापस वेषधारी मर्कटमहाराजाची स्वारी त्याला दिसली आणि तो म्हणाला, ''मुला, हाचना तो तुझा तापसकुमार ?''_
_मुलगा म्हणाला, ''होय बाबा, हाच तो तापसकुमार. याची ओळख करून घेण्याला मी उत्सुक झालों आहें.''_
_बोधिसत्त्व म्हणाला, ''बाबारे जरा दम धर. हा तापसकुमार नसून तापसवेषधारी नीच मर्कट आहे. सुशील ब्राह्मणाचें किंवा तापसाचें तोंड याच्यासारखें विचित्र नसतें. याला जर आम्हीं आश्रय दिला, तर आपल्या पर्णकुटिकेची तो नासधूस करून टाकील. तेव्हां याला येथूनच घालवून द्यावें हें बरें.''_
_असें बोलून बोधिसत्त्वानें अग्निकुंडातील एक कोलीत त्या माकडावर फेंकली. तेव्हां वल्कलें आणि कमंडलु टाकून देऊन माकड खरें स्वरूप प्रकट करून पळून गेला._
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*संदर्भ : - जातक कथा संग्रह*
*संकलन :- महेश कांबळे*
*२०/१२/२०२०*
https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
मेत्तिका
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*२४ मेत्तिका*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
_राजगृहातील एका श्रीमंत कुटुंबात जन्म झाला. पर्वतावर जाऊन श्रमन धम्माप्रमाणे ती साधना करू लागली व थोड्याच दिवसांत तीला अर्हतपद प्राप्त झाले. आनंदित झाल्यामुळे तिने खालील उद्गार काढले. :-_
*_मी दुःखीत, दुर्बल आणि तारुण्य नष्ट झालेली असूनसुद्धा काठी टेकत टेकत जाऊन पर्वतावर चढले.!!२९!!_*
*_खांद्यावरील संघाटी खाली ठेवली व भिक्षापात्रसुद्धा उलटे केले. मी पर्वत शिखरावर बसले तेव्हा माझे चित्त विमुक्त झाले. मी तीन विद्यांचा साक्षात्कार केला आणि भगवान बुद्धांच्या शासनाप्रमाणे आचरण केले. !!३०!!_*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*संदर्भ: - थेरिगाथा*
*संकलन :- महेश कांबळे*
*१९/१२/२०२०*
https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
नीच बोलावयाला लागला, तर थोर मौन धरतात
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*_नीच बोलावयाला लागला, तर थोर मौन धरतात_*
*_(दद्दर जातककथा)_*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
_एकदा बोधिसत्त्व सिंहाचा राजा होऊन हिमालयावरील एका भव्य गुहेंत रहात असे. एके दिवशीं कांहीं कारणानें आजूबाजूचे सर्व सिंह त्याच्या गुहेच्या अंगणांत गोळा झाले होते. तेथें जमल्यावर परंपरेप्रमाणें त्या सर्वांनी गर्जना करण्यास सुरुवात केली. त्या टेकडीच्या जवळच दुसर्या एका टेकडीवर एक कोल्हा रहात होता. त्याला सिंहाची गर्जना आवडली नाहीं. आणि त्यांचें तोंड बंद करण्यासाठीं त्यानें कोल्हेकुईला सुरुवात केली. तो शब्द कानीं पडतांच सर्व सिंह चपापून जागच्याजागीं चूप बसले. सिंहराजाचा पुत्र एकाएकीं स्वस्थ बसलेले पाहून आपल्या पित्यास म्हणाला, ''बाबा, हे सगळे सिंह भीतीनें गांगरून गेले आहेत असें वाटतें. पण असा हा कोणता प्राणी बरें कीं, ज्यांचा शब्द ऐकल्याबरोबर ही दशा व्हावी ?''_
_बोधिसत्त्व म्हणाला, ''बाळ, तुझी अगदींच उलटी समजूत झाली आहे. हा मोठा प्राणी नसून नीच कोल्हा आहे; आणि त्याच्या कोल्हेकुईबरोबर सिंहगर्जना करणें लज्जास्पद असल्यामुळें माझे ज्ञातिबांधव चुप राहिले आहेत.* नीचाबरोबर बोलण्यापेक्षां मौनव्रत चांगलें,* हें तूं लक्षांत ठेव.”_
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*संदर्भ : - जातक कथा संग्रह*
*संकलन :- महेश कांबळे*
*१९/१२/२०२०*
https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Friday, 18 December 2020
हे असं आहे काय?, बरं !
😇 _*झेन कथा : हे असं आहे काय?, बरं !*_
💁♂️ _जपानी संस्कृतीतल्या तेराव्या शतकात जपानी बौद्ध धर्मगुरू मुजू यांनी सांगितलेल्या झेन कथा रोजच्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून टाकण्याची ताकद देतात. या गोष्टींना तात्पर्य नसते. अत्यंत हलक्या फुलक्या व समजायला सोप्या असणाऱ्या या कथांतुन तुम्ही काय व कशाप्रकारे घेता हे तुमच्यावर निर्भर आहे. अशीच एक झेन कथा वाचा..._
• झेन गुरू हाकुईन यांचं नाव आसपासच्या प्रदेशात अत्यंत सन्मानानं घेतलं जाई. शुद्ध चारीत्र्याचा दाखला म्हणून हाकुईन यांच्याकडे लोक पाहत असत.
• शेजारी पाजारी, त्या प्रांतातले लहान थोर असे सगळेचजण हाकुईन यांच्या सत्वशील राहणीचे चाहते होते.
• त्यांच्या मठाजवळच एक सुंदर मुलगी राहत होती. तिच्या वडिलांचं खाद्य पदार्थ विक्रीचं दुकान होतं.
• एकेदिवशी अचानक पालकांच्या लक्षात आलं की, त्यांच्या मुलीला दिवस गेले आहेत. प्रचंड संतापलेल्या तिच्या पालकांनी तिला खडसावत विचारलं, तुझ्या पोटातल्या बाळाचा पिता कोण आहे?
• ती आधी तोंड उघडायला तयार नव्हती. अखेर पालकांनी खूपच दटावणी केल्यानंतर तिनं तोंड उघडलं आणि सांगितलं की हाकुईन तिच्या पोटातील बाळाचा पिता आहे.
• ज्याच्या शुद्ध चारीत्र्याचे गोडवे गायले जातात, तो हाकुईनमुळे आपल्या मुलीला दिवस गेल्याचे समजल्यावर तर त्यांचा राग अनावर झाला.
• ते संतापलेल्या अवस्थेत तसेच हाकुईनकडे गेले आणि त्यांनी हाकुईनना ही घटना सांगत जाब विचारला.
• सगळं शांतपणे ऐकून घेतल्यानंतर हाकुईन यांनी फक्त इतकंच म्हटलं... *हे असं आहे काय?, बरं!*
• मुलाचा जन्म झाल्यानंतर त्या बाळाला हाकुईन यांच्याकडे आणण्यात आलं. हाकुईन यांची सगळी प्रतिष्ठा धुळीला मिळाली होती.
• मानमरातब गेला होता, कुणीही विचारत नाही अशी स्थिती झाली होती. तरीही दैनंदिन आचार विचारात कुठलाही फरक न पडलेल्या हाकुईन यांनी बाळाची चांगली काळजी घेतली.
• बाळाच्या पालनपोषणासाठी जे काही लागतं ते हाकुईन यांनी शेजाऱ्या पाजाऱ्यांकडून आणले आणि त्याची चांगली काळजी घ्यायला सुरूवात केली.
• असंच वर्ष निघून गेलं. त्या मुलीला हा प्रकार सहन होईना. तिनं अखेर पालकांना सत्य सांगितलं की तिच्या बाळाचा पिता हाकुईन नसून दुसराच एक तरूण आहे, जो मच्छीबाजारात काम करतो.
• हे कळल्यावर शरमिंदे झालेले त्या मुलीचे आई वडील पुन्हा हाकुईनकडे गेले. त्यांच्या पाया पडून माफी मागितली आणि बाळाला पुन्हा नेत असल्याचं सांगितलं.
• बाळाची काळजी घेत असलेल्या हाकुईन यांनी हे सगळं शांतपणे ऐकून घेतलं आणि म्हणाले...
*हे असं आहे काय?, बरं!*
चित्ता
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*२३ चित्ता*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
_राजगृहातील एका श्रीमंत कुटुंबात जन्म झाला. राजगृहाच्या प्रवेशद्वाराजवळ भगवान बुद्धांचा उपदेश जेव्हा तिने पहिल्यांदा तिने ऐकला तेव्हाच तिच्या मनात धम्माबाद्द्ल श्रद्धा निर्माण झाली. त्यामुळे तिने महापजापती गोतमी जवळ जाऊन प्रव्रज्या घेतली. वृद्धावस्थेत असताना गृधकृट पर्वतावर जाऊन व तेथे ध्यानभावना करून दिव्यपद प्राप्त केले. आपला अनुभव कथन करताना ती म्हणते :-_
*_मी कृश, आजारी आणि अतिशय दुर्बल असूनसुद्धा काठी टेकत टेकत जाऊन पर्वतावर चढले.!!२७!!_*
*_खांद्यावरील संघाटी खाली ठेवली व भिक्षापात्र उलटे केले. पर्वतावरील दगडाच्या सहाय्याने मी स्वतःला स्थिर केले. आणि त्याबरोबर माझा अज्ञानांधकार नष्ट झाला. !!२८!!_*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*संदर्भ: - थेरिगाथा*
*संकलन :- महेश कांबळे*
*१८/१२/२०२०*
https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1
तरुणाचा उत्साह
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*_तरुणाचा उत्साह_*
*_(सुसीम जातककथा)_*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
_प्राचीनकाळीं वाराणसी नगरींत सुसीम नांवाचा राजा राज्य करीत होता. बोधिसत्त्व त्या राजाच्या पुरोहिताच्या स्त्रीच्या पोटीं जन्मास आला. तो वयांत येण्यापूर्वीच पुरोहित मरण पावला. बोधिसत्त्वाचें अध्ययन संपलें नव्हतें. बाप वारला तेव्हां त्याचें वय सुमारें सोळा सतरा वर्षांचें होतें. इतक्यांत हत्तींचा सण आला._
_हत्तीचा सण म्हणजे त्या दिवशीं हत्तींना घालण्यासाठीं सरदार मानकरी वगैरे लोक नानातर्हेचे अलंकार आणीत असत. याशिवाय पुष्कळ वस्तू गोळा करून त्यांनी हत्तींची पूजा करण्यांत येत असे. आणि पूजाविधी आटपल्यावर तें सर्व साहित्य पुरोहिताला मिळे. वाराणसींतील ब्राह्मणांना पुरोहितालाच सर्व द्रव्य मिळावें, ही गोष्ट आवडत नसे. परंतु परंपरेविरुद्ध जाण्याचें त्यांच्या जवळ सामर्थ्य नव्हतें. पुरोहित गेल्यावर राजगृहीं जमून ते राजाला म्हणाले ''महाराज, यंदाच्या हत्तीच्या सणांतील सर्व दक्षिणा आम्हा सर्वांना मिळाली पाहिजे. कां कीं, पुरोहिताचा मुलगा तरुण असून तो सर्व वेदांत आणि हस्तिसूत्रांत निष्णात नाहीं. तेव्हां जुनी परंपरा मोडून सर्व ब्राह्मणांला या दक्षिणेंचे वाटेकरी करावें, अशी आमची विनंति आहे.''_
_राजाला ही गोष्ट पसंत पडली. व पुढें येणार्या हत्तीच्या सणांतील दक्षिणा सर्व ब्राह्मणांस मिळावी, असा त्याने निकाल दिला. ही गोष्ट बोधिसत्त्वाच्या आईला समजली, तेव्हां अत्यंत खिन्न होऊन ती रडू लागली. बोधिसत्त्व अध्ययन करून घरीं येऊन पाहतो तों आपली आई रडत असताना त्याला दिसली तेव्हां तो आईला म्हणाला, ''तुझ्या रडण्याचे कारण काय तें मला सांग. तूं जर रडणे सोडून दिले नाहींस तर मी अन्नग्रहण करणार नाहीं.''_
_आई म्हणाली, ''बाळा आज माझ्या कानीं एक वाईट बातमी आल्यामुळें माझें मन उद्विग्न झालें आहे. तूं तरुण आहेस अशी संधी साधून गांवांतील ब्राह्मणांनीं आपल्या कुल परंपरेचा हक्क नष्ट करण्याचा खटाटोप चालविला आहे. आणि आपल्या राजानेंहि त्यांच्या प्रयत्नांस आपल्या आज्ञेनें यश दिलें आहे. हत्तीच्या सणांतील सर्व वस्त्रालंकार तुझ्या वाडवडिलांना मिळत असत. परंतु आतां तूं लहान आहेस, व तुझें अध्ययन पुरें झालें नाहीं अशा सबबीवर आमच्या कुलाचा हक्क काढून घेऊन तो वाराणसींतील सर्व ब्राह्मणांला देण्यांत येणार आहे. आम्हांला द्रव्यप्राप्ती होणार नाहीं, याबद्दल मुळींच वाईट वाटत नाहीं. आमच्या घरीं पुष्कळ संपत्ती आहे आणि एवढें संपत्ती येऊन तरी ब्राह्मणाला काय करावयाचें आहे ? तथापि संधी साधून इतर ब्राह्मण आमच्या कुलाचा हक्क बुडवूं पहात आहेत याचेंच मला राहून राहून वाईट वाटत आहे.''_
_हें आपल्या मातोश्रीचें भाषण ऐकून बोधिसत्त्वाचें प्रसुप्त तेज एकदम जागृत झालें. तो म्हणाला, ''आई, आजपर्यंत मी मोठ्या उत्साहानें मुळींच अध्ययन केलें नाहीं. आमच्या घरीं पुष्कळ संपत्ती आहे. आणखी पुष्कळ अध्ययन करून काय करावयाचें अशा वेडगळ समजुतीनें माझें चित्त अध्ययनापेक्षां क्रीडेकडे जास्त लागलें; पण आतां तुला दुःख झालेलें पाहून मला संवेग उत्पन्न झाला आहे आणि हत्तीचा सण येण्यापूर्वी माझें अध्ययन पुरें करण्याचा मी दृढनिश्चय केला आहे. आतां तूं मला एवढेंच सांग कीं, सर्व वेदांत आणि शास्त्रांत पारंगत असा गुरू कोठें सांपडेल ?''_
_आई म्हणाली, ''बाळा आमच्या या वाराणसींत सर्व ब्राह्मण अर्धकच्चे आहेत. उत्तम पंडित एका तक्षशिला नगरींतच सांपडतात. तुला जर सर्व शास्त्रांत पारंगतता संपादावयाची आहे, तर तेथें जाऊन गुरुगृहीं वास केला पाहिजे.''_
_त्याच दिवशीं बोधिसत्त्वानें वाटखर्ची बरोबर घेऊन वाराणसींतून प्रयाण केलें व जितक्या लवकर तक्षशिलेला जाणें शक्य होतें तितक्या लवकर तो तेथें जाऊन पोहोंचला. तेथें एका प्रसिद्ध आचार्याच्या घरीं जाऊन त्यानें अध्ययनास सुरुवात केली. परंतु तेथील मंद अभ्यासक्रमानें हत्तीचा सण येण्यापूर्वीच घरीं पोहोंचणें शक्य नव्हतें म्हणून तो आचार्याला म्हणाला, ''गुरुजी, या रोजच्या अभ्यासक्रमानें माझें काम भागणार नाहीं. मला निकडीच्या कामासाठीं अध्ययन पुरें करून लवकर घरीं गेलें पाहिजे.''_
_त्या आचार्यानें बोधिसत्त्वाला निराळें शिकवून त्याच्या अध्यापनाची फार काळजी घेतली, बोधिसत्त्वानेंहि आपल्या आंगच्या हुषारीनें आचार्याला संतुष्ट करून तीन वेदांचे आणि हस्तिसूत्रानें अध्ययन हत्तीचा सण येण्यापूर्वीच पुरें केलें. आणि त्या सणाच्या पूर्व दिवशीं तो आपल्या घरीं येऊन पोहोंचला. हत्तीच्या सणाची सर्व तयारी झालीच होती. दुसर्या दिवशीं हस्तिशाळेंत ब्राह्मणसमुदाय जमून होमहवनाला सुरुवात झाली. राजाहि आपल्या अमात्यांसह येथें आला. इतक्यांत बोधिसत्त्व या ठिकाणीं येऊन राजाला म्हणाला, ''महाराज, आजच्या सणाची आमच्या कुलांतील कोणीच ब्राह्मण येथें हजर नसतां तयारी चालली आहे हें काय ?''_
_राजा म्हणाला, ''बाबारे, तुझ्या कुलांत तूंच काय तो शिल्लक राहिला आहेस आणि तुझें अध्ययन अपुरें असल्यामुळें यंदाची दक्षिणा शहरांतील सर्व ब्राह्मणांना वांटून देण्यांत येणार आहे. म्हणून तुझी या ठिकाणीं जरूर पडली नाहीं.''_
_बोधिसत्त्व म्हणाला, ''महाराज, माझें अध्ययन पुरें झालें नाहीं ही गोष्ट आपणाला कोणीं सांगितली ? '' राजा म्हणाला, ''हे सर्व ब्राह्मण सांगत आहेत.''_
_बोधिसत्त्व म्हणाला, ''तर मग या ब्राह्मणांनीं पुढें येऊन मला प्रश्न विचारावे किंवा मजबरोबर वेदमंत्र म्हणण्यास आरंभ करावा. आणि जर त्यांतील एक जण देखील मला जिंकू शकला तर आमच्या कुलपरंपरेंत चालत आलेली परंपरा मोडून सर्व दक्षिणा या ब्राह्मणांला द्यावी. पण जर ते हरले, तर त्यांना माझ्याविषयीं विनाकारण गैरसमजूत उत्पन्न केल्याबद्दल योग्य शासन व्हावें.''_
_वेदाविषयीं आणि हस्तिसूत्राविषयीं त्यांतील एक देखील ब्राह्मण बोधिसत्त्वाला प्रश्न करण्यास धजला नाहीं; तेव्हां बोधिसत्त्वानेंच वेदमंत्र आणि हस्तिसूत्र त्या सभेंत म्हणून दाखविलें. तेव्हां ते सर्व ब्राह्मण या तरुणाची बुद्धि पाहून चकित होऊन गेले ! व राजाला भलतीच गोष्ट सांगितल्याबद्दल त्यांनीं त्याची क्षमा मागितली. राजानें पूर्वीची परंपरा कायम करून सर्व दक्षिणा बोधिसत्त्वाला देवविली. आपल्या कुलाची परंपरा एकुलत्या एका तरुण मुलानें राखल्याबद्दल बोधिसत्त्वाच्या आईला फार आनंद झाला._
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*संदर्भ : - जातक कथा संग्रह*
*संकलन :- महेश कांबळे*
*१८/१२/२०२०*
https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
अड्ढ कासी
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*२२ अड्ढ कासी*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
_काशी देशातील एका श्रीमंत व्यापाऱ्याच्या घरी अड्ढ कासीचा जन्म झाला. परंतु काही कारणामुळे ती वेश्या झाली. "श्रावस्तीला जाऊन भगवान बुद्धांचा उपदेश प्रत्यक्ष ग्रहण करावा" अशी तिची खूप इच्छा होती. परंतु दुसऱ्या वेश्यांनी तिच्या मार्गात अनेक अडचणी आणल्या, तेव्हा तिने भगवंतांजवळ एक दूत पाठविला आणि उपसंपदा / भिक्खूनिपदाची दिक्षा मिळविण्याकरिता भगवंतांना विनंती केली. भगवंतांनी तिची विनंती मान्य करून तिला उपसंपदा दिली. अशाप्रकारे मोठ्या कष्टाने उपसंपन्न झाल्यावर तिने लवकरच दिव्यज्ञान प्राप्त केले. अर्हतपद प्राप्त झाल्यावर तिने आनंदित होऊन पुढील उद्गार काढले :-_
*_काशी देशाचे जेवढे उत्पन्न होते तेवढेच उत्पन्न माझे होते. त्यापेक्षा कमी मूल्य घेऊन मी कोणत्याही मनुष्याला आपली सेवा देत नव्हते. ||२५||_*
*_परंतु आज मी त्या सौन्दर्यापासून विरक्त झाले आहे. त्या मोहापासून मुक्त होऊन मी वैराग्यमुक्त झाले आहे. जन्म-मरणाच्या फेऱ्यात मी पुनःपुन्हा धावणार नाही. मी तीन विद्यांचा साक्षात्कार केला आणि भगवान बुद्धांच्या शासनाप्रमाणे आचरण केले आहे. ||२६||_*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*संदर्भ: - थेरिगाथा*
*संकलन :- महेश कांबळे*
*१७/१२/२०२०*
https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1
कांट्याने काढितात कांटा कीं
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*_कांट्याने काढितात कांटा कीं_*
*_(सुहनू जातककथा)_*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
_एकदा बोधिसत्त्व वाराणसी राजाचा मुख्यप्रधान झाला होता. तो राजाची सर्व कामे पहात असे. त्याला अश्वपरिक्षा फारच चांगली करता येत असल्यामुळे दुसऱ्या देशातून घोडे विकावयास आणले असता तोच त्यांची योग्य किंमत ठरवीत असे. राजा हा थोडा लोभी होता, बोधिसत्त्वाने ठरविलेली योग्य किंमत त्याला आवडत नसे. एके दिवशी एक व्यापारी काही घोडे घेऊन वाराणसीला आला व राजाची भेट घेऊन त्यांना ते घोडे विकत घेण्याची विनंती केली. राजाने बोधिसत्त्वाला न सांगता दुसऱ्या एका हांजी हांजी करणाऱ्या अमत्त्याला बोलावून त्या घोड्यांची किंमत करण्यापूर्वी आपल्या पागेत महासोण नावाचा जो उनाड घोडा आहे त्याला त्या घोड्यांवर सोडून दे. लाथा वगैरे मारून त्याने त्या घोड्यांना दुर्बल केल्यानंतर मग त्यांची किंमत ठरव असे राजाने सांगितले. अमात्य फारच आज्ञाधारक असल्याने त्याने महासोणाला त्या घोड्यांवर घातले आणि त्यांचे हाल करून मग राजाच्या इच्छेनुसार अगदीच थोडी किंमत ठरविली. बिचारा व्यापारी चकित होऊन गेला. पहिला चांगला किंमत ठरविणारा प्रधान जाऊन त्याच्याजागी हा भलताच माणूस कसा आला याचे त्याला फार आश्चर्य वाटले. परंतु विषाद मानण्यात काहीच अर्थ नव्हता. ठरलेली किंमत घेता घोडे घेऊन काही फायदा झाला नसता. कारण त्या घोड्यांची इतर ठिकाणी अधिक किंमत आली असती असे नव्हते म्हणून मिळालेले पैसे घेऊन तो बोधिसत्त्वापाशी गेला, आणि दुःखी शब्दात म्हणाला, "आपण योग्य किंमत देत असता, म्हणून इतक्या दुरून मी येथे घोडे घेऊन आलो; परंतु यावेळी भलत्याच माणसाने माझी फजिती करून टाकिली."_
_बोधिसत्त्वाने सर्व माहिती जाणून घेतल्यानंतर म्हणाला, "तुम्ही विषाद न मानता परत स्वदेशी जाऊन दुसरा एक खोडसाळ घोडा मिळत असला तर पहा व त्याला घेऊन येथे या. इकडे महासोणाला घोड्यावर घालण्यात आल्याबरोबर तिकडे त्या खोडसाळ घोड्याला सोडून द्या म्हणजे मग काय गंमत होईल ती पाहू."_
_बोधिसत्त्वाच्या सांगण्याप्रमाणे दुसऱ्या खेपेला तो व्यापारी सहनु नांवाचा एक भयंकर खोडसाळ घोडा बरोबर घेऊन आला आणि आपल्या इतर घोड्यांना घेऊन राजाला त्यांची किंमत ठरविण्याची विनंती केली. वहिवाटीप्रमाणे महासोणाला त्या घोड्यांच्या अंगावर घालण्यात आले तेव्हा त्या व्यापाऱ्याने आपल्या सुहनुला सोडून दिले, त्या घोड्यांची गाठ पडल्याबरोबर ते परस्परांचे अंग चाटु लागले. जणू काय ते सख्खे भाऊच आहेत आई लोकांना वाटले! ते पाहून राजा चकित झाला ! आणि बोधिसत्त्वाला म्हणाला, "हा आपला घोडा इतका द्वाड असून त्याचे या आगंतुक घोड्याशी सख्य कसे जमले?"_
_बोधिसत्त्व म्हणाला, "महाराज, हा नवीन घोडा आपल्या महासोणापेक्षाही अधिक द्वाड आहे. तेव्हा त्या दोघांची मैत्री जमली यांत मोठे नवल नाही. या व्यापाऱ्याने काट्यानेच काटा काढण्याची ही युक्ती योजली आहे. महाराज, धनलोभाला वश होणे आपल्यासारख्या राज्य पदारूढ पुरुषाला शोभत नाही. अशाने दूर देशांतून येणाऱ्या व्यापाऱ्यांची जर आपण हानी केली, तर ते आपल्या देशांत येणार नाहीत आणि त्यामुळे आपल्या देशांत पैदा न होणाऱ्या वस्तूंची किंमत भलतीकडेच जाईल. म्हणून आपल्या फायद्यासाठी देखील सातत्याने आणि न्यायाने वागणे हे आपल्या सर्वांचे हितकारक आहे."_
_बोधिसत्त्वाचा उपदेश ऐकून राजाने धनलोभ सोडून दिला आणि तेव्हापासून तो न्यायाने वागू लागला._
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*संदर्भ : - जातक कथा संग्रह*
*संकलन :- महेश कांबळे*
*१७/१२/२०२०*
https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
सुमंगल-माता
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*२१ सुमंगल-माता*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
_श्रावस्तीमधील एका गरीब कुटुंबात जन्म झाला. बुरूडकाम करणार्या एका पुरुषाशी तिचा विवाह झाला. तिच्या पहिल्या मुलाचे नाव सुमंगल ठेवण्यात आले. तेव्हापासून तिला सुमंगल-माता असे म्हणू लागले. सुमंगलसुद्धा प्रसिद्ध भिकखू होऊन थोडयाच दिवसात त्याला अर्हत्वपद प्राप्त झाले. सुमंगल-माता प्रव्रजित झाल्यावर एके दिवशी आपल्या कष्टपूर्ण आणि दरिद्री सांसारिक जीवनाचे स्मरण करीत असताना तिच्या चित्तात अधिकच वैराग्य उत्पन्न झाले त्यामुळे अधिक जोमाने प्रयत्न करून तिने परमज्ञान प्राप्त केले. अर्हत्व प्राप्तीच्या आनंदाने तिच्या तोंडून खालील गाथा उत्स्फूर्तपणे बाहेर पडल्या :-_
*_अहो! मी मुक्त झाले आहे. माझी मुक्ति धन्य आहे. मी मुसळापासून मुक्त झाले आहे. तसेच निर्लज्ज पतिपासून व छत्र्या करण्याच्या कामापासून मुक्त झाले आहे. तसेच अन्न शिजविण्याच्या भांड्यालाही पाणसपाच्या दुर्गंग्ध येत आहे.!!२३!!_*
*_परंतु आज मी राग व द्वेष नष्ट करून विहार करीत आहे. झाडाखाली जाऊन ‘अहो मी किती सुखी आहे’ अशा प्रकारे सुखाने ध्यान करीत आहे. !!२४!!_*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*संदर्भ: - थेरिगाथा*
*संकलन :- महेश कांबळे*
*१६/१२/२०२०*
https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1
थोराची कृतज्ञता
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*_थोराची कृतज्ञता_*
*_(गुण जातककथा)_*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
_एका जन्मीं बोधिसत्त्व सिंह होऊन एका टेकडीवर गुहेंत रहात असे. त्या गुहेच्या पायथ्याशीं एक तलाव होतें. एके दिवशीं एका हरणाला त्या तळ्याच्या काठीं गवत खात असतांना सिंहानें पाहिले व टेकडीवरून खालीं उतरून मोठ्या वेगानें त्यानें त्या हरणावर झडप घातली. सिंहाची चाहूल ऐकल्याबरोबर हरणानें पळ काढला व त्यामुळें बोधिसत्त्वाची उडी चुकून तो तळ्याच्या कांठच्या चिखलांत रुतला. सात दिवसपर्यंत तो तेथेंच अडकून राहिला. त्या बाजूनें एक कोल्हा पाणी पिण्यासाठीं येत होता. सिंहाला पाहिल्याबरोबर तो पळूं लागला. परंतु सिंह मोठ्यानें ओरडून म्हणाला, ''बा कोल्ह्या, असा घाबरून पळून जाऊं नकोस मी चिखलांत रुतून दुःख भोगीत आहें. जर यांतून पार पडण्याचा कांहीं मार्ग असेल तर शोधून काढ.''_
_कोल्हा म्हणाला, ''कदाचित् मला कांहीं युक्ती सुचली असती. परंतु तुम्हाला जीवदान देणें म्हणजे माझ्या जिवावरच संकट ओढवून घेण्यासारखें आहे. तेव्हां तुम्ही दुसर्या कोणाला तरी मदत करण्याला सांगा. घरीं माझीं बायकामुलें वाट पहात असतील. तेव्हां मला लवकर गेलें पाहिजे._
_बोधिसत्त्व म्हणाला, ''बाबारे तुझा मुद्दा खरा आहे. तथापि, तुला मी सर्वथैव मित्राप्रमाणें वागवीन असें अभिवचन देतों. जर तूं मला या संकटांतून पार पाडलेंस तर तुझे उपकार मी कसा विसरेन.''_
_कोल्ह्यानें त्याच्या चारी पायाजवळचा चिखल उकरून काढला व तळ्याच्या पाण्यापर्यंत वाट करून पाणी त्या भोंकांत शिरेल असें केलें. तळ्याचें पाणी आंत शिरल्याबरोबर बोधिसत्त्वाच्या पायाखालचा चिखल मऊ झाला आणि त्याला अनायासें बाहेर पडतां आलें. त्या दिवसापासून सिंहाची आणि कोल्ह्याची फार मैत्री जडली. कोल्ह्याला दिल्यावाचून सिंह पकडलेल्या शिकारीचें मांस खात नसे. कांहीं दिवसांनीं तो कोल्ह्याला म्हणाला, ''तूं दूर रहात असल्यामुळें तुझी भेट घेण्यास मला त्रास पडतो. जर तूं माझ्या गुहेजवळ येऊन राहशील तर बरें होईल. तुला एखादी सोईस्कर जागा मी देईन.'' कोल्हा म्हणाला, ''पण मी विवाहित आहे, तेव्हां माझ्या बायकोची आणि माझी सोय कशी होईल ?''_
_सिंह म्हणाला, ''तुम्हां दोघांचीहि व्यवस्था होण्यास अडचण पडणार नाहीं. शिवाय माझी बायको मी शिकारीस गेल्यावर गुहेंत एकटीच असते. तिला तुझ्या बायकोची मदत होईल, आणि आम्हीं सर्वजण मोठ्या गुण्यागोविंदानें राहूं.''_
_सिंहाच्या सांगण्याप्रमाणें कोल्हा सहकुटुंब येऊन सिंहाच्या शेजारीं एका लहानशा गुहेंत राहिला. सिंह शिकार मारून आणल्यावर प्रथमतः एक वांटा घेऊन कोल्ह्याकडे जात असे, व त्याची आणि त्याच्या बायकोची तृप्ती झाल्यावर मग राहिलेलें मांस आपल्या स्त्रीला देऊन आपण खात असे. कांहीं कालानें कोल्हीला दोन पोरें झालीं व सिंहिणीलाहि दोन पोरें झालीं. तेव्हांपासून सिंहीण कोल्ह्याच्या कुटुंबाचा मत्सर करूं लागली. आपल्या नवर्यानें शिकार मारून आणावी व कोल्ह्याच्या कुटुंबानें यथेच्छ मांस खाऊन चैन करावी, हें तिला बिलकूल आवडेना. या शिवाय बायकांचा स्वभाव फार संशयी असतो. त्यामुळें तिला असें वाटलें कीं, कदाचित सिंहाचें प्रेम त्या कोल्हीवर असावें. नाहींतर आपल्या मुलांना मांस देण्यापूर्वी त्यानें तें तिच्या मुलांना दिलें नसतें. कांहीं असो कोल्हीला तेथून हाकलून द्यावें असा त्या सिंहीणीनें बेत केला. व आपल्या पोरांना पाठवून तिच्या पोरांना त्रास देण्यास सुरुवात केली. कोल्ह्याला घेऊन सिंह शिकारीला गेल्याबरोबर इकडे सिंहाचे पोरगे कोल्ह्याच्या पोरांना भय दाखवीत असत. कोल्हीण सिंहिणीजवळ गार्हाणें घेऊन येत असे. तेव्हां सिंहीण म्हणत असे कीं, येथें राहिली आहेस कशाला ? माझीं पोरें जर तुझ्या पोरांना त्रास देतात, तर चालती हो येथून त्यांना घेऊन. त्यांच्या कागाळ्या घेऊन आलीस तर तें मला मुळींच खपणार नाहीं.''_
_कोल्हीला हा ताप फारच असह्य झाला व तिनें ती गोष्ट आपल्या नवर्याला कळविली. दुसर्या दिवशीं कोल्हा सिंहाला म्हणाला, ''महाराज, मी आपला आश्रित आहें. आश्रितावर आश्रयदात्याचा सदोदित हक्क असतो, असा न्याय आहे. जर आपणाला माझें वास्तव्य येथें नको असेल तर आपण हक्कानेंच मला येथून जाण्यास सांगा. म्हणजे माझ्या कुटुंबाला घेऊन मी ताबडतोब निघून जातों. परंतु आपल्या मुलांकडून आणि कुटुंबाकडून माझ्या बायकामुलांना सतत त्रास होणें हा सरळ मार्ग नव्हे.''_
_सिंहाला खरी गोष्ट काय होती हें मुळींच ठाऊक नव्हतें. परंतु चौकशीं अंतीं त्याला सर्व कांहीं समजून आलें. तेव्हां तो सिंहीणीला म्हणाला, ''भद्रे, मागें एकदां सात दिवसपर्यंत मी या गुहेंत परत आलों नाहीं हें तुला आठवतें काय ?''_
_सिंहीण म्हणाली, ''होय, मला आठवतें. कां कीं त्या वेळीं स्वतःच शिकार करून निर्वाह करण्याचा माझ्यावर प्रसंग आला होता. मला असें वाटलें कीं, आपण कोठें तरी शिकारीच्या नादानें भटकत गेला असाल.''_
_''नाहीं भद्रे मी भडकलों नाहीं. डोंगरा-खालीं असलेल्या तळ्याच्या कांठीं मी चिखलांत रुतून राहिलों होतों. केवळ लाजेखातर ही गोष्ट मी तुला सांगितली नाहीं. त्या प्रसंगी या कोल्ह्यानें मोठ्या युक्तीनें मला त्या संकटांतून पार पाडलें. तेव्हांपासून त्याची माझी मैत्री जडली. भद्रे ! *जरी आपला मित्र आपल्यापेक्षां दुर्बल असला तरी जोंपर्यंत तो मित्रधर्मानें वागत आहे, तोंपर्यंत त्याची अवहेलना करतां कामा नये; तोपर्यंत त्याला आपला बांधव, सखा किंवा मित्र असें म्हणण्यास हरकत नाहीं.* जरी हा कोल्हा यःकश्चित प्राणी आहे तरी त्यानें मला प्राणदान दिलें आहे, हें लक्षांत ठेव आणि मनांतील सर्व कुशंका सोडून दे. आपल्या मुलांप्रमाणें त्याच्याहि मुलांवर प्रेम करीत जा, व त्याच्या स्त्रीला आपल्या बहिणीप्रमाणें मानीत जा.''_
_सिंहाचा उपदेश सिंहिणीनें मोठ्या आदरानें पाळला. आणि असें सांगतात कीं, त्या सिंहाच्या आणि कोल्ह्याच्या कुटुंबाची मैत्री सात पिढयांपर्यंत अव्याहत चालली होती._
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*संदर्भ : - जातक कथा संग्रह*
*संकलन :- महेश कांबळे*
*१६/१२/२०२०*
https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Subscribe to:
Posts (Atom)
कोलित सुत्त
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 _'कोलित सुत...
-
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 * _दिवाळी बौद्धांचा सण....? _* https://mikamblemahesh.blogspot.com/2024/11/blog-post_2.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 _६...
-
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_ अहिंसा _* *_!! ॐ मणी पद्मे हूँ !!_* https://mikamblemahesh.blogspot.com/2024/07/blog-post_9.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼...
-
🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷 *_ माराच्या दहा सेना _* https://mikamblemahesh.blogspot.com/2021/07/blog-post_10.html 🪷🪷...