Friday, 18 December 2020

कांट्याने काढितात कांटा कीं

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 
 *_कांट्याने काढितात कांटा कीं_* 
 *_(सुहनू जातककथा)_*
 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 

 
                    _एकदा बोधिसत्त्व वाराणसी राजाचा मुख्यप्रधान झाला होता. तो राजाची सर्व कामे पहात असे. त्याला अश्वपरिक्षा फारच चांगली करता येत असल्यामुळे दुसऱ्या देशातून घोडे विकावयास आणले असता तोच त्यांची योग्य किंमत ठरवीत असे. राजा हा थोडा लोभी होता, बोधिसत्त्वाने ठरविलेली योग्य किंमत त्याला आवडत नसे. एके दिवशी एक व्यापारी काही घोडे घेऊन वाराणसीला आला व राजाची भेट घेऊन त्यांना ते घोडे विकत घेण्याची विनंती केली. राजाने बोधिसत्त्वाला न सांगता दुसऱ्या एका हांजी हांजी करणाऱ्या अमत्त्याला बोलावून त्या घोड्यांची किंमत करण्यापूर्वी आपल्या पागेत महासोण नावाचा जो उनाड घोडा आहे त्याला त्या घोड्यांवर सोडून दे. लाथा वगैरे मारून त्याने त्या घोड्यांना दुर्बल केल्यानंतर मग त्यांची किंमत ठरव असे राजाने सांगितले. अमात्य फारच आज्ञाधारक असल्याने त्याने महासोणाला त्या घोड्यांवर घातले आणि त्यांचे हाल करून मग राजाच्या इच्छेनुसार अगदीच थोडी किंमत ठरविली. बिचारा व्यापारी चकित होऊन गेला. पहिला चांगला किंमत ठरविणारा प्रधान जाऊन त्याच्याजागी हा भलताच माणूस कसा आला याचे त्याला फार आश्चर्य वाटले. परंतु विषाद मानण्यात काहीच अर्थ नव्हता. ठरलेली किंमत घेता घोडे घेऊन काही फायदा झाला नसता. कारण त्या घोड्यांची इतर ठिकाणी अधिक किंमत आली असती असे नव्हते म्हणून मिळालेले पैसे घेऊन तो बोधिसत्त्वापाशी गेला, आणि दुःखी शब्दात म्हणाला, "आपण योग्य किंमत देत असता, म्हणून इतक्या दुरून मी येथे घोडे घेऊन आलो; परंतु यावेळी भलत्याच माणसाने माझी फजिती करून टाकिली."_ 

             _बोधिसत्त्वाने सर्व माहिती जाणून घेतल्यानंतर म्हणाला, "तुम्ही विषाद न मानता परत स्वदेशी जाऊन दुसरा एक खोडसाळ घोडा मिळत असला तर पहा व त्याला घेऊन येथे या. इकडे महासोणाला घोड्यावर घालण्यात आल्याबरोबर तिकडे त्या खोडसाळ घोड्याला सोडून द्या म्हणजे मग काय गंमत होईल ती पाहू."_ 

         _बोधिसत्त्वाच्या सांगण्याप्रमाणे दुसऱ्या खेपेला तो व्यापारी सहनु नांवाचा एक भयंकर खोडसाळ घोडा बरोबर घेऊन आला आणि आपल्या इतर घोड्यांना घेऊन राजाला त्यांची किंमत ठरविण्याची विनंती केली. वहिवाटीप्रमाणे महासोणाला त्या घोड्यांच्या अंगावर घालण्यात आले तेव्हा त्या व्यापाऱ्याने आपल्या सुहनुला सोडून दिले, त्या घोड्यांची गाठ पडल्याबरोबर ते परस्परांचे अंग चाटु लागले. जणू काय ते सख्खे भाऊच आहेत आई लोकांना वाटले! ते पाहून राजा चकित झाला ! आणि बोधिसत्त्वाला म्हणाला, "हा आपला घोडा इतका द्वाड असून त्याचे या आगंतुक घोड्याशी सख्य कसे जमले?"_ 

         _बोधिसत्त्व म्हणाला, "महाराज, हा नवीन घोडा आपल्या महासोणापेक्षाही अधिक द्वाड आहे. तेव्हा त्या दोघांची मैत्री जमली यांत मोठे नवल नाही. या व्यापाऱ्याने काट्यानेच काटा काढण्याची ही युक्ती योजली आहे. महाराज, धनलोभाला वश होणे आपल्यासारख्या राज्य पदारूढ पुरुषाला शोभत नाही. अशाने दूर देशांतून येणाऱ्या व्यापाऱ्यांची जर आपण हानी केली, तर ते आपल्या देशांत येणार नाहीत आणि त्यामुळे आपल्या देशांत पैदा न होणाऱ्या वस्तूंची किंमत भलतीकडेच जाईल. म्हणून आपल्या फायद्यासाठी देखील सातत्याने आणि न्यायाने वागणे हे आपल्या सर्वांचे हितकारक आहे."_ 

     _बोधिसत्त्वाचा उपदेश ऐकून राजाने धनलोभ सोडून दिला आणि तेव्हापासून तो न्यायाने वागू लागला._ 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 
 *संदर्भ : - जातक कथा संग्रह* 
 *संकलन :- महेश कांबळे* 
 *१७/१२/२०२०* 
 https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1
 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

No comments:

Post a Comment

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...