➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*_खरें बंधुप्रेम_*
*_(असदिस जातककथा)_*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
_वाराणसीच्या राजाला दोन पुत्र होते. थोरल्याचें नांव असदृशकुमार, आणि धाकट्याचें नांव ब्रह्मदत्तकुमार असें होतें. त्यांत असदृशकुमार हा बोधिसत्त्व होता. वयाच्या १६ व्या वर्षी त्यानें तक्षशिलेला जाऊन एका प्रसिद्ध आचार्याच्या हाताखालीं तीन वेदांचें आणि अठरा शास्त्रांचें अध्ययन केलें आणि तो परत वाराणसीला आला. त्याचा पिता मरतेवेळीं असदृशकुमाराला राज्य देऊन ब्रह्मदत्ताला युवराज करावें असें प्रधानमंडळाला सांगून मरण पावला. त्याचें उत्तरकार्य झाल्यावर प्रधानमंडळानें बोधिसत्त्वाला राज्याभिषेक करण्याची सर्व व्यवस्था केली. परंतु बोधिसत्त्व म्हणाला, ''मला राज्यकारभाराचा भार नको आहे. शास्त्राध्ययन आणि धनुर्विद्या यांतच ती आनंद मानीत असतों. माझा धाकटा भाऊ सर्व तर्हे नें राज्यभार वाहण्याला योग्य आहे आणि राजा होण्याची त्याला फार इच्छाहि आहे. तेव्हां त्यालाच राज्यपदावर बसवावें अशी मी सर्वांना विनंति करतों.''_
_सर्व प्रधानमंडळानें आणि वाराणसीवासी प्रजाजनांनीं बोधिसत्त्वाला राज्यपद स्वीकारण्याविषयीं फार आग्रह केला. परंतु त्यांचा इलाज चालला नाहीं. शेवटीं बोधिसत्त्वाच्या इच्छेप्रमाणें ब्रह्मदत्तालाच त्यांनीं अभिषेक केला. ब्रह्मदत्त आपल्या वडील भावाच्या सल्ल्यानेंच सर्व राज्यकारभार पहात असे. पण हळु हळु राज्यपदाच्या धुंदींत तो सांपडला. हांजी हांजी करणार्याा लबाड लोकांची त्याच्या भोंवतीं मालिका जमली. आपल्या धन्याला संतुष्ट करण्यासाठीं ज्याच्या त्याच्या खोट्या नाट्या चुगल्या करण्याचा धंदा त्यांनीं सुरूं केला. एकानें तर राजाला असें सांगितलें कीं, वडील भाऊ असदृशकुमार राजाला मारून राज्य बळकावण्याचा कट करीत आहे. झालें ! ही गोष्ट निघाल्याबरोबर दुसरा म्हणाला, ''मला या संबंधानें मागेंच बातमी लागली होती. परंतु म्हटलें उगाच महाराजांचें आपल्या वडील बंधूविषयीं मन कलुषित कां करा ? म्हणून चुप राहिलों.''_
_त्यावर तिसरा म्हणाला, ''अहो पण तुमचें हें करणें अगदींच अयोग्य झालें. राजेसाहेब अन्नदाते, त्यांच्या जिवावर जर कोणी उठला- मग तो वडील भाऊ किंवा आजा असो- आम्हीं त्याच्या कटाची बातमी महाराजांना ताबडतोब दिली पाहिजे. पण तुम्ही इतके दिवस मौन धरून बसलां याला काय म्हणावें ?''_
_अशा रीतीनें त्या लुच्चा लोकांनीं राजाचे मन बिघडवून टाकलें आणि त्यामुळें एके दिवशीं राजानें आपल्या भावास पकडून कैद करण्याचा हुकूम दिला. बोधिसत्त्वाचा एक अत्यंत जिवलग मित्र प्रधानमंडळांत होता. त्यानें ही बातमी त्याला कळवली. अशा लबाड लोकांच्या हातीं लागण्यापेक्षां येथून पलायन केलेलें बरें, असा सुविचार करून बोधिसत्त्व रात्रींच्या रात्रीं वाराणसींतून पळून गेला. तो दूरच्या एका मांडलिक राजापाशीं जाऊन नोकरीस राहिला. त्या राजानें बोधिसत्त्वाचें धनुर्विद्या-कौशल्य पाहून त्याचा फार सन्मान केला, आणि त्याला सदोदित आपल्याजवळ ठेऊन घेतलें._
_एके दिवशीं राजा उद्यानक्रीडेसाठीं आपल्या आम्रवनांत गेला होता. तेथें आंब्याच्या झाडाच्या अग्रशाखेवर एक आंबा पिकला होता. तो काठीनें किंवा दगडानें खालीं पाडणें शक्य नव्हतें. कां कीं, तें झाड फार उंच होतें आणि त्याच्या शाखांतून हा पिकलेला आंबा तेवढा दिसत होता. तेव्हां राजानें सर्व धनुर्ग्राहकांना बाण मारून तो आंबा खालीं पाडण्यास सांगितलें. परंतु त्यांतील एकजणदेखील नीट शरसंधान करून आंबा पाडूं शकला नाहीं. नंतर बोधिसत्त्वाला हें काम सांगितलें. त्यानें अचूक बाण मारून आंबा आणि बाण दोन्ही वरच्यावर झेलून धरले. तें आश्चर्य पाहून राजानें बोधिसत्त्वाचा फार गौरव केला; आणि त्यामुळें त्याची कीर्ति देशोंदेशीं पसरली._
_इकडे असदृशकुमार वाराणसी सोडून दुसरीकडे गेला असें जाणून आसपासचे सात लहान लहान राजे एकवटून वाराणसीवर चाल करून आले. वाराणसींत बोधिसत्त्वासारखा शूर शिपाई आणि दूरदर्शी मुत्सदी नाहीं. तेव्हां आपण क्षणार्धांत ब्रह्मदत्ताला शरण आणूं व त्याच्याकडून भरपूर खंडणीं घेऊं असें त्यांना वाटलें होतें. परंतु वाराणसींचा कोट फारच बळकट असल्यामुळें त्यांच्या मनोरथाप्रमाणें एकदम तें शहर जिंकतां आलें नाहीं. तेव्हां शहराला वेढा घालून ते तेथेंच राहिले. ब्रह्मदत्तावर हें मोठेंच संकट कोसळलें. आतां त्याला वडील बंधूची आठवण झाली. तो आपल्या हांजी हांजी करणार्याद नोकरांना म्हणाला, ''तुम्ही खोटें नाटें सांगून माझ्या वडील बंधूला येथून घालवून दिलेंत. परंतु तो जर येथें असता तर आज आपल्याला या संकटापासून रक्षण केले असते. आतां देखील आपण त्याच्याजवळ एक गुप्ते हेर पाठवूं. आपल्यावर आलेले संकट त्याला समजलें, तर माझे अपराध पोटीं घालून आपल्या मदतीला तो धांवत आल्यावांचून रहाणार नाहीं. त्याचें बंधुप्रेम इतकें अलौकिक आहे कीं, माझ्यासारख्या कृतघ्न भावाच्या दुर्वर्तनानें तें मलिन होणार नाहीं.''_
_ब्रह्मदत्तानें गुप्त' हेर पाठवून वाराणसीच्या वेढ्याचें वर्तमान कळवल्याबरोबर बोधिसत्त्व आपल्या धन्याचे कांहीं निवडक योध्दे बरोबर घेऊन वाराणसीला आला. मी असदृशकुमार आपल्या भावाला मदत करण्यासाठीं आलों आहे अशा तर्हेाचा मजकूर लिहून तीं पत्रें बाणाला बांधून त्यानें शत्रुसेनेच्या मध्यभागीं पाडलीं. बोधिसत्त्वाचें नांव ऐकिल्याबरोबर त्या सात राजांची सेना फार गडबडून गेली; आणि जो तो जिकडे वाट सांपडेल तिकडे पळूं लागला ! एका तासाच्या आंत वाराणसी शहराचा वेढा उठला व मोठ्या जयजयकारानें बोधिसत्त्वानें शहरांत प्रवेश केला. ब्रह्मदत्तानें पुढें येऊन त्याचे पाय घट्ट धरले, आणि केलेल्या अपराधाची क्षमा मागितली. तेव्हां बोधिसत्त्व म्हणाला, ''तुझ्या दुष्ट सोबत्यांनी तुझें मन बिघडविलें असलें तथापि तूं माझा भाऊ आहेस; आणि म्हणून तुझ्यावरचें माझें प्रेम कधींहि कमी झालें नाहीं. लुच्च्या लोकांच्या तूं नादास लागलास हें पाहून मला मात्र फार वाईट वाटलें. पण आतां तुला वाईट संगतीचें फळ कोणतें हें पक्के समजून चुकलें आहे, व ह्या पुढें तुझ्या हातून पुन्हां अयोग्य गोष्ट होणार नाहीं अशी मला आशा आहे.''_
.
_ब्रह्मदत्तानें आपल्या वडील भावाला मोठ्या आग्रहानें आपल्याजवळ ठेवून घेतलें, आणि तेव्हांपासून त्याच्या सदुपदेशाबाहेर आजन्म पाऊल टाकलें नाहीं._
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*संदर्भ : - जातक कथा संग्रह*
*संकलन :- महेश कांबळे*
*२५/१२/२०२०*
https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
No comments:
Post a Comment