➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*_थोराची कृतज्ञता_*
*_(गुण जातककथा)_*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
_एका जन्मीं बोधिसत्त्व सिंह होऊन एका टेकडीवर गुहेंत रहात असे. त्या गुहेच्या पायथ्याशीं एक तलाव होतें. एके दिवशीं एका हरणाला त्या तळ्याच्या काठीं गवत खात असतांना सिंहानें पाहिले व टेकडीवरून खालीं उतरून मोठ्या वेगानें त्यानें त्या हरणावर झडप घातली. सिंहाची चाहूल ऐकल्याबरोबर हरणानें पळ काढला व त्यामुळें बोधिसत्त्वाची उडी चुकून तो तळ्याच्या कांठच्या चिखलांत रुतला. सात दिवसपर्यंत तो तेथेंच अडकून राहिला. त्या बाजूनें एक कोल्हा पाणी पिण्यासाठीं येत होता. सिंहाला पाहिल्याबरोबर तो पळूं लागला. परंतु सिंह मोठ्यानें ओरडून म्हणाला, ''बा कोल्ह्या, असा घाबरून पळून जाऊं नकोस मी चिखलांत रुतून दुःख भोगीत आहें. जर यांतून पार पडण्याचा कांहीं मार्ग असेल तर शोधून काढ.''_
_कोल्हा म्हणाला, ''कदाचित् मला कांहीं युक्ती सुचली असती. परंतु तुम्हाला जीवदान देणें म्हणजे माझ्या जिवावरच संकट ओढवून घेण्यासारखें आहे. तेव्हां तुम्ही दुसर्या कोणाला तरी मदत करण्याला सांगा. घरीं माझीं बायकामुलें वाट पहात असतील. तेव्हां मला लवकर गेलें पाहिजे._
_बोधिसत्त्व म्हणाला, ''बाबारे तुझा मुद्दा खरा आहे. तथापि, तुला मी सर्वथैव मित्राप्रमाणें वागवीन असें अभिवचन देतों. जर तूं मला या संकटांतून पार पाडलेंस तर तुझे उपकार मी कसा विसरेन.''_
_कोल्ह्यानें त्याच्या चारी पायाजवळचा चिखल उकरून काढला व तळ्याच्या पाण्यापर्यंत वाट करून पाणी त्या भोंकांत शिरेल असें केलें. तळ्याचें पाणी आंत शिरल्याबरोबर बोधिसत्त्वाच्या पायाखालचा चिखल मऊ झाला आणि त्याला अनायासें बाहेर पडतां आलें. त्या दिवसापासून सिंहाची आणि कोल्ह्याची फार मैत्री जडली. कोल्ह्याला दिल्यावाचून सिंह पकडलेल्या शिकारीचें मांस खात नसे. कांहीं दिवसांनीं तो कोल्ह्याला म्हणाला, ''तूं दूर रहात असल्यामुळें तुझी भेट घेण्यास मला त्रास पडतो. जर तूं माझ्या गुहेजवळ येऊन राहशील तर बरें होईल. तुला एखादी सोईस्कर जागा मी देईन.'' कोल्हा म्हणाला, ''पण मी विवाहित आहे, तेव्हां माझ्या बायकोची आणि माझी सोय कशी होईल ?''_
_सिंह म्हणाला, ''तुम्हां दोघांचीहि व्यवस्था होण्यास अडचण पडणार नाहीं. शिवाय माझी बायको मी शिकारीस गेल्यावर गुहेंत एकटीच असते. तिला तुझ्या बायकोची मदत होईल, आणि आम्हीं सर्वजण मोठ्या गुण्यागोविंदानें राहूं.''_
_सिंहाच्या सांगण्याप्रमाणें कोल्हा सहकुटुंब येऊन सिंहाच्या शेजारीं एका लहानशा गुहेंत राहिला. सिंह शिकार मारून आणल्यावर प्रथमतः एक वांटा घेऊन कोल्ह्याकडे जात असे, व त्याची आणि त्याच्या बायकोची तृप्ती झाल्यावर मग राहिलेलें मांस आपल्या स्त्रीला देऊन आपण खात असे. कांहीं कालानें कोल्हीला दोन पोरें झालीं व सिंहिणीलाहि दोन पोरें झालीं. तेव्हांपासून सिंहीण कोल्ह्याच्या कुटुंबाचा मत्सर करूं लागली. आपल्या नवर्यानें शिकार मारून आणावी व कोल्ह्याच्या कुटुंबानें यथेच्छ मांस खाऊन चैन करावी, हें तिला बिलकूल आवडेना. या शिवाय बायकांचा स्वभाव फार संशयी असतो. त्यामुळें तिला असें वाटलें कीं, कदाचित सिंहाचें प्रेम त्या कोल्हीवर असावें. नाहींतर आपल्या मुलांना मांस देण्यापूर्वी त्यानें तें तिच्या मुलांना दिलें नसतें. कांहीं असो कोल्हीला तेथून हाकलून द्यावें असा त्या सिंहीणीनें बेत केला. व आपल्या पोरांना पाठवून तिच्या पोरांना त्रास देण्यास सुरुवात केली. कोल्ह्याला घेऊन सिंह शिकारीला गेल्याबरोबर इकडे सिंहाचे पोरगे कोल्ह्याच्या पोरांना भय दाखवीत असत. कोल्हीण सिंहिणीजवळ गार्हाणें घेऊन येत असे. तेव्हां सिंहीण म्हणत असे कीं, येथें राहिली आहेस कशाला ? माझीं पोरें जर तुझ्या पोरांना त्रास देतात, तर चालती हो येथून त्यांना घेऊन. त्यांच्या कागाळ्या घेऊन आलीस तर तें मला मुळींच खपणार नाहीं.''_
_कोल्हीला हा ताप फारच असह्य झाला व तिनें ती गोष्ट आपल्या नवर्याला कळविली. दुसर्या दिवशीं कोल्हा सिंहाला म्हणाला, ''महाराज, मी आपला आश्रित आहें. आश्रितावर आश्रयदात्याचा सदोदित हक्क असतो, असा न्याय आहे. जर आपणाला माझें वास्तव्य येथें नको असेल तर आपण हक्कानेंच मला येथून जाण्यास सांगा. म्हणजे माझ्या कुटुंबाला घेऊन मी ताबडतोब निघून जातों. परंतु आपल्या मुलांकडून आणि कुटुंबाकडून माझ्या बायकामुलांना सतत त्रास होणें हा सरळ मार्ग नव्हे.''_
_सिंहाला खरी गोष्ट काय होती हें मुळींच ठाऊक नव्हतें. परंतु चौकशीं अंतीं त्याला सर्व कांहीं समजून आलें. तेव्हां तो सिंहीणीला म्हणाला, ''भद्रे, मागें एकदां सात दिवसपर्यंत मी या गुहेंत परत आलों नाहीं हें तुला आठवतें काय ?''_
_सिंहीण म्हणाली, ''होय, मला आठवतें. कां कीं त्या वेळीं स्वतःच शिकार करून निर्वाह करण्याचा माझ्यावर प्रसंग आला होता. मला असें वाटलें कीं, आपण कोठें तरी शिकारीच्या नादानें भटकत गेला असाल.''_
_''नाहीं भद्रे मी भडकलों नाहीं. डोंगरा-खालीं असलेल्या तळ्याच्या कांठीं मी चिखलांत रुतून राहिलों होतों. केवळ लाजेखातर ही गोष्ट मी तुला सांगितली नाहीं. त्या प्रसंगी या कोल्ह्यानें मोठ्या युक्तीनें मला त्या संकटांतून पार पाडलें. तेव्हांपासून त्याची माझी मैत्री जडली. भद्रे ! *जरी आपला मित्र आपल्यापेक्षां दुर्बल असला तरी जोंपर्यंत तो मित्रधर्मानें वागत आहे, तोंपर्यंत त्याची अवहेलना करतां कामा नये; तोपर्यंत त्याला आपला बांधव, सखा किंवा मित्र असें म्हणण्यास हरकत नाहीं.* जरी हा कोल्हा यःकश्चित प्राणी आहे तरी त्यानें मला प्राणदान दिलें आहे, हें लक्षांत ठेव आणि मनांतील सर्व कुशंका सोडून दे. आपल्या मुलांप्रमाणें त्याच्याहि मुलांवर प्रेम करीत जा, व त्याच्या स्त्रीला आपल्या बहिणीप्रमाणें मानीत जा.''_
_सिंहाचा उपदेश सिंहिणीनें मोठ्या आदरानें पाळला. आणि असें सांगतात कीं, त्या सिंहाच्या आणि कोल्ह्याच्या कुटुंबाची मैत्री सात पिढयांपर्यंत अव्याहत चालली होती._
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*संदर्भ : - जातक कथा संग्रह*
*संकलन :- महेश कांबळे*
*१६/१२/२०२०*
https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
No comments:
Post a Comment