Wednesday, 23 December 2020

माकडाचा वानराचें दूरदर्शित्व

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 
 *_माकडाचा वानराचें दूरदर्शित्व_* 
 *_(तिण्डुक जातककथा)_* 
 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 

                         _बोधिसत्त्व वानरयोनींत जन्म पावून वयांत आल्यावर एका मोठ्या वानरसमुदायाचा राजा झाला होता. तो जंगलात रहात असे, त्याच्याजवळच एक टेंभुर्णीचा मोठा भव्य वृक्ष होता. त्या झाडाच्या आसपास वर्षांतून कांहीं दिवस एक गांवच वसत असे व कांहीं दिवस तेथें कोणीहि रहात नसत. तेव्हां तेथें लोकांची वस्ती नसे, तेव्हां बोधिसत्त्व आपल्या परिवारासह जाऊन त्या वृक्षाचीं फळें यथेच्छ खात असे. परंतु एका वर्षी अशी गोष्ट घडली कीं त्या झाडाला फळें येण्याची आणि लोकांची वसाहत होण्याची एकच गांठ पडली तेव्हां बोधिसत्त्वाला तेथें जाण्याचें सोडून देणें भाग पडले. पण त्याच्या कळपांतील माकडांना ही गोष्ट आवडली नाहीं. ते म्हणाले ''आम्हीं प्रतिवर्षी त्या झाडाची गोड फळें खात आलों आहों. आतां त्यांच्या आसपास माणसांची वस्ती झाली म्हणून फळें खाण्याचें सोडून देणें हा नामर्दपणा आहे. दिवसा लोक दुपारच्यावेळी झोपत असतात, त्यावेळीं हळूच जाऊन आपण फळें खाऊन घेऊं.'' बोधिसत्त्वानें वानरगणांचें मन वळवण्याचा पुष्कळ प्रयत्न केला. परंतु बहुमतापुढें त्याचें कांहीं चाललें नाहीं तेव्हां त्यानें तेथें जाण्याचा ठराव केला, आणि एकांती सेनक नांवाच्या आपल्या भाच्याला बोलावून आणून तो म्हणाला, ''सेनका, तूं देखील इतर वानरासारखा फळलोभी आहेस काय ?''_  

                _सेनक म्हणाला, ''आपल्या आज्ञेपुढें मला दुसर्‍या कोणत्याहि वस्तूची चाड वाटत नाहीं. आपण जर सांगाल तर मी केवळ पाणी पिऊन देखील राहीन.''_ 

         _यावर बोधिसत्त्व म्हणाला, ''मी या गणाचा राजा असल्यामुळें मला यांच्याबरोबर गेलेंच पाहिजे. जर का मी मागें राहिलों तर मला भ्याड म्हणून हे माझी निंदा करतील; आणि माझ्याविषयीं त्यांची आदरबुद्धि पार नष्ट होईल. म्हणून आज आम्हीं फळें खावयास जाऊं त्यावेळीं तूं मागें रहा, आणि जर आम्हीं संकटांत सांपडलों असें दिसलें, तर मी सांगतों त्या उपायानें आम्हांला त्या संकटांतून सोडव.''_ 

             _बोधिसत्त्वाची आज्ञा सेनकानें मान्य केली. बोधिसत्त्वानें आपण संकटांत सांपडलों तर कोणती युक्ती योजावी या संबंधानें त्याला नीटपणें सर्व कांहीं सांगून ठेविलें. आणि वानर-गणांला घेऊन दुपारच्या वेळी तो त्या वृक्षावर फळें खात बसला. उन्हाळा फार असल्यामुळें सर्व लोक आपापल्या झोपडींत विश्रांती घेत बसले होते; किंवा कांहींजण झोपीं गेले होते. परंतु कांहीं कारणानिमित्त त्यांतील एकजण झोपडीच्या बाहेर आला, आणि पहातो तों टेंभुणींचें झाड माकडांनीं भरून गेलेलें ! त्यानें सर्व लोकांना उठवून जागें केलें, आणि त्या सर्वांनीं शस्त्रास्त्रें घेऊन त्या वृक्षाला वेढा दिला. वानरगणाची पांचावर धारण बसली. ते गयावया करीत बोधिसत्त्वाला म्हणाले, ''महाराज, आपला सल्ला आम्हीं मानला असता तर या संकटांत सांपडलों नसतों. आम्हींच अशा कचाट्यांत सांपडलों असें नाहीं, पण आपणाला देखील आम्ही दुःखांत पाडलें आहे !''_ 

                 _बोधिसत्त्व म्हणाला, ''आतां झालेल्या गोष्टीबद्दल खेद करण्यांत अर्थ नाहीं. तुम्ही धीर धरा. माझा भाचा सेनक मागें राहिला आहे. तो आम्हाला या संकटांतून मुक्त करील.''_ 

             _बोधिसत्त्वानें धीर दिला नसता, तर ते माकड गर्भगळित होऊन खाली पडले असते, व प्राणाला मुकले असते._ 

           _इकडे सेनक त्या गांवाबाहेर आपल्या जातभाईंची काय वाट होते हें पहात बसला होता. सर्व मर्कटसमुदायाला सशस्त्र मनुष्यांनीं वेढलेलें पाहून त्यानें मामानें शिकवलेली युक्ति अंमलांत आणली. झोंपडींत शिरून तेथें जळत असलेली आगीची कोलीत घेऊन त्यानें दोन चार झोंपड्या पेटवून दिल्या ! आग जिकडे तिकडे फैलावत चालल्यामुळें गांवांतील बायकामुलांत एकच हाहाःकार उडाला. माकडांला घेरा घालून राहिलेले लोक आपलीं शस्त्रास्त्रें घेऊन आग लागली होती त्या दिशेनें ती विझवण्याला मदत करण्यासाठीं धावत सुटले, तेव्हां बोधिसत्त्व आपल्या समुदायासह तेथून कांहीं एक इजा न होतां पळून गेला. सर्व मर्कटगणानें त्याच्या दूरदर्शित्वाची फार तारीफ केली. बोधिसत्त्वानेंहि सेनकानें आपली आज्ञा पाळली म्हणून त्याचा योग्य गौरव केला._ 


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 
 *संदर्भ : - जातक कथा संग्रह* 
 *संकलन :- महेश कांबळे* 
 *२३/१२/२०२०* 
 https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1 
 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

No comments:

Post a Comment

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...