➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*_तरुणाचा उत्साह_*
*_(सुसीम जातककथा)_*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
_प्राचीनकाळीं वाराणसी नगरींत सुसीम नांवाचा राजा राज्य करीत होता. बोधिसत्त्व त्या राजाच्या पुरोहिताच्या स्त्रीच्या पोटीं जन्मास आला. तो वयांत येण्यापूर्वीच पुरोहित मरण पावला. बोधिसत्त्वाचें अध्ययन संपलें नव्हतें. बाप वारला तेव्हां त्याचें वय सुमारें सोळा सतरा वर्षांचें होतें. इतक्यांत हत्तींचा सण आला._
_हत्तीचा सण म्हणजे त्या दिवशीं हत्तींना घालण्यासाठीं सरदार मानकरी वगैरे लोक नानातर्हेचे अलंकार आणीत असत. याशिवाय पुष्कळ वस्तू गोळा करून त्यांनी हत्तींची पूजा करण्यांत येत असे. आणि पूजाविधी आटपल्यावर तें सर्व साहित्य पुरोहिताला मिळे. वाराणसींतील ब्राह्मणांना पुरोहितालाच सर्व द्रव्य मिळावें, ही गोष्ट आवडत नसे. परंतु परंपरेविरुद्ध जाण्याचें त्यांच्या जवळ सामर्थ्य नव्हतें. पुरोहित गेल्यावर राजगृहीं जमून ते राजाला म्हणाले ''महाराज, यंदाच्या हत्तीच्या सणांतील सर्व दक्षिणा आम्हा सर्वांना मिळाली पाहिजे. कां कीं, पुरोहिताचा मुलगा तरुण असून तो सर्व वेदांत आणि हस्तिसूत्रांत निष्णात नाहीं. तेव्हां जुनी परंपरा मोडून सर्व ब्राह्मणांला या दक्षिणेंचे वाटेकरी करावें, अशी आमची विनंति आहे.''_
_राजाला ही गोष्ट पसंत पडली. व पुढें येणार्या हत्तीच्या सणांतील दक्षिणा सर्व ब्राह्मणांस मिळावी, असा त्याने निकाल दिला. ही गोष्ट बोधिसत्त्वाच्या आईला समजली, तेव्हां अत्यंत खिन्न होऊन ती रडू लागली. बोधिसत्त्व अध्ययन करून घरीं येऊन पाहतो तों आपली आई रडत असताना त्याला दिसली तेव्हां तो आईला म्हणाला, ''तुझ्या रडण्याचे कारण काय तें मला सांग. तूं जर रडणे सोडून दिले नाहींस तर मी अन्नग्रहण करणार नाहीं.''_
_आई म्हणाली, ''बाळा आज माझ्या कानीं एक वाईट बातमी आल्यामुळें माझें मन उद्विग्न झालें आहे. तूं तरुण आहेस अशी संधी साधून गांवांतील ब्राह्मणांनीं आपल्या कुल परंपरेचा हक्क नष्ट करण्याचा खटाटोप चालविला आहे. आणि आपल्या राजानेंहि त्यांच्या प्रयत्नांस आपल्या आज्ञेनें यश दिलें आहे. हत्तीच्या सणांतील सर्व वस्त्रालंकार तुझ्या वाडवडिलांना मिळत असत. परंतु आतां तूं लहान आहेस, व तुझें अध्ययन पुरें झालें नाहीं अशा सबबीवर आमच्या कुलाचा हक्क काढून घेऊन तो वाराणसींतील सर्व ब्राह्मणांला देण्यांत येणार आहे. आम्हांला द्रव्यप्राप्ती होणार नाहीं, याबद्दल मुळींच वाईट वाटत नाहीं. आमच्या घरीं पुष्कळ संपत्ती आहे आणि एवढें संपत्ती येऊन तरी ब्राह्मणाला काय करावयाचें आहे ? तथापि संधी साधून इतर ब्राह्मण आमच्या कुलाचा हक्क बुडवूं पहात आहेत याचेंच मला राहून राहून वाईट वाटत आहे.''_
_हें आपल्या मातोश्रीचें भाषण ऐकून बोधिसत्त्वाचें प्रसुप्त तेज एकदम जागृत झालें. तो म्हणाला, ''आई, आजपर्यंत मी मोठ्या उत्साहानें मुळींच अध्ययन केलें नाहीं. आमच्या घरीं पुष्कळ संपत्ती आहे. आणखी पुष्कळ अध्ययन करून काय करावयाचें अशा वेडगळ समजुतीनें माझें चित्त अध्ययनापेक्षां क्रीडेकडे जास्त लागलें; पण आतां तुला दुःख झालेलें पाहून मला संवेग उत्पन्न झाला आहे आणि हत्तीचा सण येण्यापूर्वी माझें अध्ययन पुरें करण्याचा मी दृढनिश्चय केला आहे. आतां तूं मला एवढेंच सांग कीं, सर्व वेदांत आणि शास्त्रांत पारंगत असा गुरू कोठें सांपडेल ?''_
_आई म्हणाली, ''बाळा आमच्या या वाराणसींत सर्व ब्राह्मण अर्धकच्चे आहेत. उत्तम पंडित एका तक्षशिला नगरींतच सांपडतात. तुला जर सर्व शास्त्रांत पारंगतता संपादावयाची आहे, तर तेथें जाऊन गुरुगृहीं वास केला पाहिजे.''_
_त्याच दिवशीं बोधिसत्त्वानें वाटखर्ची बरोबर घेऊन वाराणसींतून प्रयाण केलें व जितक्या लवकर तक्षशिलेला जाणें शक्य होतें तितक्या लवकर तो तेथें जाऊन पोहोंचला. तेथें एका प्रसिद्ध आचार्याच्या घरीं जाऊन त्यानें अध्ययनास सुरुवात केली. परंतु तेथील मंद अभ्यासक्रमानें हत्तीचा सण येण्यापूर्वीच घरीं पोहोंचणें शक्य नव्हतें म्हणून तो आचार्याला म्हणाला, ''गुरुजी, या रोजच्या अभ्यासक्रमानें माझें काम भागणार नाहीं. मला निकडीच्या कामासाठीं अध्ययन पुरें करून लवकर घरीं गेलें पाहिजे.''_
_त्या आचार्यानें बोधिसत्त्वाला निराळें शिकवून त्याच्या अध्यापनाची फार काळजी घेतली, बोधिसत्त्वानेंहि आपल्या आंगच्या हुषारीनें आचार्याला संतुष्ट करून तीन वेदांचे आणि हस्तिसूत्रानें अध्ययन हत्तीचा सण येण्यापूर्वीच पुरें केलें. आणि त्या सणाच्या पूर्व दिवशीं तो आपल्या घरीं येऊन पोहोंचला. हत्तीच्या सणाची सर्व तयारी झालीच होती. दुसर्या दिवशीं हस्तिशाळेंत ब्राह्मणसमुदाय जमून होमहवनाला सुरुवात झाली. राजाहि आपल्या अमात्यांसह येथें आला. इतक्यांत बोधिसत्त्व या ठिकाणीं येऊन राजाला म्हणाला, ''महाराज, आजच्या सणाची आमच्या कुलांतील कोणीच ब्राह्मण येथें हजर नसतां तयारी चालली आहे हें काय ?''_
_राजा म्हणाला, ''बाबारे, तुझ्या कुलांत तूंच काय तो शिल्लक राहिला आहेस आणि तुझें अध्ययन अपुरें असल्यामुळें यंदाची दक्षिणा शहरांतील सर्व ब्राह्मणांना वांटून देण्यांत येणार आहे. म्हणून तुझी या ठिकाणीं जरूर पडली नाहीं.''_
_बोधिसत्त्व म्हणाला, ''महाराज, माझें अध्ययन पुरें झालें नाहीं ही गोष्ट आपणाला कोणीं सांगितली ? '' राजा म्हणाला, ''हे सर्व ब्राह्मण सांगत आहेत.''_
_बोधिसत्त्व म्हणाला, ''तर मग या ब्राह्मणांनीं पुढें येऊन मला प्रश्न विचारावे किंवा मजबरोबर वेदमंत्र म्हणण्यास आरंभ करावा. आणि जर त्यांतील एक जण देखील मला जिंकू शकला तर आमच्या कुलपरंपरेंत चालत आलेली परंपरा मोडून सर्व दक्षिणा या ब्राह्मणांला द्यावी. पण जर ते हरले, तर त्यांना माझ्याविषयीं विनाकारण गैरसमजूत उत्पन्न केल्याबद्दल योग्य शासन व्हावें.''_
_वेदाविषयीं आणि हस्तिसूत्राविषयीं त्यांतील एक देखील ब्राह्मण बोधिसत्त्वाला प्रश्न करण्यास धजला नाहीं; तेव्हां बोधिसत्त्वानेंच वेदमंत्र आणि हस्तिसूत्र त्या सभेंत म्हणून दाखविलें. तेव्हां ते सर्व ब्राह्मण या तरुणाची बुद्धि पाहून चकित होऊन गेले ! व राजाला भलतीच गोष्ट सांगितल्याबद्दल त्यांनीं त्याची क्षमा मागितली. राजानें पूर्वीची परंपरा कायम करून सर्व दक्षिणा बोधिसत्त्वाला देवविली. आपल्या कुलाची परंपरा एकुलत्या एका तरुण मुलानें राखल्याबद्दल बोधिसत्त्वाच्या आईला फार आनंद झाला._
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*संदर्भ : - जातक कथा संग्रह*
*संकलन :- महेश कांबळे*
*१८/१२/२०२०*
https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
No comments:
Post a Comment