Wednesday, 30 December 2020

मैत्रीचा प्रभाव

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 
 *_मैत्रीचा प्रभाव_* 
 *_(कुरुंगमिग जातककथा)_*
 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 

             _एकदां बोधिसत्त्व कुरुंगमृग होऊन एका अरण्यांत सरोवराच्या कांठी रहात होता. तेथेंच एका वृक्षावर एका शतपत्र पक्षानें आपलें घरटें बांधले होतें; आणि त्या सरोवरांत एक कांसव रहात होता. या तिघांची अत्यंत मैत्री जडली होती. एके दिवशीं एक पारधी त्या सरोवराच्या कांठीं हरणाला पकडण्यासाठीं जाळें पसरून घरीं गेला. रात्रींच्या पहिल्या प्रहरीं बोधिसत्त्व पाणी पिण्यासाठीं जात असतां त्या जाळ्यांत सांपडला; आणि आपण जाळ्यांत सांपडलों हें आपल्या मित्रांस कळविण्यासाठीं तो मोठ्यानें ओरडला. तेव्हां सरोवरांतून कांसव वर आला, व शतपत्र पक्षी आपल्या घरट्यांतून खालीं उतरला. बोधिसत्त्वाची ही दीनदशा पाहून शतपत्र कांसवाला म्हणाला, ''पहांट होण्यापूर्वी जर आमच्या मित्राला या पाशांतून मुक्त केलें नाहीं तर तो पारध्याच्या तावडींत सांपडून प्राणास मुकेल. आतां तूं आपल्या दांतांनीं याचे पाश तोडण्यास आरंभ कर, आणि हें काम लवकर आटप.''_ 

                 _कांसव म्हणाला, परंतु माझे दांत कांहीं बळकट नाहींत. माझ्या गतीप्रमाणेंच पाश तोडण्याचें कामहि मंदपणें चालेल, आणि इतक्यांत पारधी आला तर माझे सर्व श्रम वांया जातील.''_ 

             _शतपत्र म्हणाला, ''पारधी लवकर येईल याबद्दल तूं काळजी करूं नकोस तो अरुणोदयापूर्वी येणार नाहीं. याबद्दल मी हमी घेतों; आणि त्याला जेवढा उशीर लावतां येईल तेवढा लावण्याचा मी प्रयत्‍न करतों. पण तूं हे पाश तोडण्याचें काम जारीनें चालव.''_

         _कांसवानें एकामागून एक पाश तोडण्यास सुरुवात केली. शतपत्र पारध्याच्या दारांत जाऊन त्याची वाट पहात बसला. पहांट होण्यापूर्वी पारधी हातांत मोठी सुरी घेऊन तलावाच्या कांठीं जाण्यास निघाला. इतक्यांत शतपत्रानें मोठ्यानें शब्द काढून त्याच्या कपाळावर जोरानें चंचुप्रहार केला. बिचारा पारधी आपणाला मोठा अपशकुन झाला असें वाटून पुनः घरांत शिरून निजला, आणि मनांतल्या मनांत म्हणाला, ''आज या अमंगल पक्ष्यानें माझ्यावर टोंच मारून मला अपशकुन केला आहे त्यामुळें शिकार नीट साधेल किंवा नाहीं याची मला काळजी वाटते; तथापि थोड्या वेळानें मागल्या दरवाजांतून निघून जाऊन अपशकुन न होईल असें केलें पाहिजे.''_ 

            _असा विचार करीत तो झोंपी गेला. पुनः अरुणोदयानंतर उठून मागल्या दरवाज्यांतून जाण्याच्या बेतांत होता. पण तेथेंहि शतपत्रानें मोठ्यानें ओरडून त्याच्या कपाळावर चोंच मारली. पारधी संतापून म्हणाला, ''या दुष्ट अमंगल पक्षानें तर माझा पिच्छाच पुरवला ! तथापि थोडा उजेड झाल्यावर हा जवळ आल्यास याची चांगली खोड मोडून मग शिकारीच्या शोधार्थ जाईन.''_

         _असें म्हणून कांहीं वेळ घरांत बसून नंतर तो सरोवराकडे जाण्यास निघाला. शतपत्रानें त्याच्या पूर्वीच येऊन कांसवाला त्याच्या आगमनाची खबर दिली. कांसवानें सर्व पाश तोडून टाकले होते. एकच काय तो बाकी होता. परंतु त्याला त्यामुळें इतका त्रास झाला कीं, त्याच्या तोंडावाटे रक्ताच्या धारा वहात होत्या आणि अंगांत त्रास न राहिल्यामुळें तो बेशुद्ध होऊन खालीं पडला. इतक्यांत पारधी जवळ येऊन ठेपला. बोधिसत्त्वानें शिल्लक राहिलेला पाश आपल्या सामर्थ्यानें तोडून टाकून तेथून पलायन केलें. परंतु बिचारा कांसव पारध्याच्या हातीं लागला. पारध्यानें त्याला आपल्या पिशवींत भरलें, आणि खिन्न मनानें तो घरी जाण्यास निघाला. आपणाला मुक्त करण्यासाठीं कांसवानें आपला जीव धोक्यांत घातला हें पाहून बोधिसत्त्वाला फार वाईट वाटलें, आणि जीव गेला तरी बेहेत्तर, कांसवाला मुक्त केल्यावांचून राहणार नाहीं असा निश्चय करून तो मागें वळला, आणि पारध्याजवळ कांहीं अंतरावर पोहोंचल्यावर लंगडत लंगडत चालूं लागला. सर्व रात्र पाशांत गुरफटून पडल्यामुळें या हरिणाच्या पायाला इजा झाली असावी, व तो दुर्बल झाला असावा असें वाटून पारध्यानें आपली पिशवी एका झाडाच्या मेढक्याला अडकावून दिली, आणि सुरी घेऊन तो हरिणाच्या मागें लागला. त्याला लोभवून बोधिसत्त्वानें दूरवर नेलें, व दुसर्‍या एका आडवाटेनें पळ काढून मेढक्यावर अडकवलेली पिशवी हळूच खालीं पाडून कांसवाला मुक्त केलें. कांसव तात्काल पाण्यांत शिरला. शतपत्र वृक्षावरून खालीं उतरला तेव्हां बोधिसत्त्व या दोघांस उद्देशून म्हणाला, ''तुम्ही दोघांनीं मिळून मला जीवदान दिलें आहे. तेव्हां तुमचे माझ्यावर फार फार उपकार आहेत. परंतु आतां येथें रहाणें धोक्याचें आहे. पारध्याला ही जागा माहित झाली आहे. आणि येथें राहिल्यास केव्हांना केव्हां त्याच्या जाळ्यांत सांपडण्याची मला भीति आहे. तेव्हां पारधी येथें पोंचण्यापूर्वीच मी घोर अरण्यांत जाऊन रहातों.''_ 

             _असें म्हणून बोधिसत्त्वानें तेथून पळ काढला. शतपत्रहि उडून गेला. कांसव तर पाण्यांत शिरलाच होता. पारधी धांवत येऊन पहातो, तो पिशवींतील कांसव देखील निघून गेला होता. तुटकें जाळें आणि रिकामी पिशवी घेऊन खालीं मान घालून अत्यंत खिन्न अंतःकरणानें तो आपल्या घरीं गेला. बोधिसत्त्व आणि त्याचे दोघे मित्र घोर अरण्यांतील दुसर्‍या एका तलावाच्या कांठीं वास करून राहिले. त्यांच्यावर आलेल्या या प्रसंगानें त्यांची मैत्री दृढतर झाली, आणि तिजमुळें त्यांचा सारा जन्म सुखानें गेला._.

 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 
 *संदर्भ : - जातक कथा संग्रह* 
 *संकलन :- महेश कांबळे* 
 *३०/१२/२०२०* 
 https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1 
 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

No comments:

Post a Comment

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...