🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_मेण्डकारंभ कथा_*
*_बुद्ध पुजा_*
*_मिलिंद राजाने आयुष्यमान नागसेनांना अंजलीबद्ध प्रणाम केला व म्हणाला -_*
*_"भंते, निरनिराळ्या मतांच्या लोकांचे म्हणणे आहे की, भगवान बुद्धांच्या मानसन्मानार्थ केलेली पूजा जर भगवान बुद्ध स्वीकारतात. तर त्यांना निर्वाणपदाचा लाभ झाला असे म्हणता येणार नाही आणि ते या संसारात कोठे निश्चितच भटकत असतील. त्यांचे सद्यस्थितीत संसारातील अस्तित्व मुळीच नाकारता येणार नाही. हे जर खरे असेल तर भगवान बुद्ध अगदीच साधारण व्यक्ती झालेत, मग त्यांची पूजा करण्यात अर्थ तो काय?"_*
*_"आणि समजा, त्यांना जर निर्वाणपद लाभले असेल, संसाराशी आता त्यांचा मुळी संबंधच राहिलेला नसेल आणि ते समस्त स्थितीतून मुक्त झाले असतील, तर त्यांची पूजा करण्यात काय स्वारस्य? कारण ते जर आहेतच नाहीत, तर पूजा करावी कोणाची? त्याचप्रमाणे भगवान बुद्धाला निर्वाणपद मिळाले असे म्हटले तरी प्रश्न सुटत नाही व निर्वाणपद नाही मिळाले म्हटले तरी प्रश्न सुटत नाही. त्यामुळे दोन्ही बाजूंनी विवादात सापडलेल्या भगवान बुद्धाची पूजा करण्यात काहीच अर्थ उरत नाही."_*
*_"हा प्रश्न सामान्य बुद्धी असलेल्या माणसाच्या शक्तींच्या पलीकडला आहे. सामान्य लोकांसाठी हा विषय नाही. महान लोकच हा प्रश्न सोडवू शकतात. आता आपणच कृपाकरुन या प्रश्नाचे सडेतोड उत्तर देऊन मिथ्या तर्काचे खंडन करावे. या प्रश्नामुळे उत्पन्न होणाऱ्या स्थितीचा विरोधकांना फायदा घेता येणार नाही, तेव्हा भावी बौद्धांच्या सोयीसाठी या कोड्याची सोडवणूक करून प्रकाश पाडावे, जेणेकरून ते दुसऱ्या मताच्या लोकांच्या कुतर्कास झणझणीत उत्तर देऊ शकतील."_*
यावर स्थविर म्हणाले, *_"महाराज, भगवान बुद्धांना महापरिनिर्वाणाचा लाभ झाला हे सूर्यप्रकाशा इतकेच खरे आहे. ते आता कोणत्याही पूजेचा स्वीकार किंवा अस्वीकार करीत नाहीत. बोधिवृक्षाखाली बुद्धत्वाची प्राप्ती करुन ते या प्रश्नाच्या पलीकडे गेले होते. तेव्हा आत्ता संसारातून पूर्णतः मुक्त होऊन निर्वाण प्राप्त केल्यानंतर प्रश्न उरतोच कुठे"_*
*_"महाराज, धर्म सेनापती सारिपुत्रांनी सुद्धा म्हंटले आहे की, ज्यांची बरोबरी करू शकणारा आजपर्यंत कोणी झाला नाही. ते भगवान बुद्ध देवता व मनुष्य या उभयतांनी केलेल्या पूजेचा स्वीकारही करीत नाही की, अस्वीकारही करीत नाहीत. युगानुयुगापासून सर्व बुद्धांचा हा सिद्धांन्त चालत आला आहे."_*
_राजा म्हणाला,_ *_"भंते, पुत्र आपल्या पित्याची किंवा आपल्या पुत्राची स्तुती करीत असेल तर त्याला पुरावा म्हणता येणार नाही. त्या तर आपापल्या मनातील भावना आहेत. परंतु खोट्या सिद्धांताचा पाठराखणी करणाऱ्या लोकांचा भ्रम दूर करण्याकरिता आणि आपल्या सद्धर्माचा प्रकाश पसरविण्याकरिता आपण योग्य तऱ्हेने समजावून सांगावे."_*
_स्थविर म्हणाले,_ *_"महाराज, भगवान बुद्ध तर पुर्णतः मुक्त झाले आहेत. तेव्हा ते आता कोणाच्या पूजेचा स्वीकार किंवा अस्वीकार कसे करतील? परंतु देवता आणि मनुष्य लोक त्यांची विहारे व स्तूप बांधून त्यात त्यांच्या अस्थी, कोश, दात इत्यादी शरीर धातूंची स्थापना करून ठेवतात, ज्यांच्या पुण्य फळाने अर्हतपद किंवा बोधिसत्व पद प्राप्त करता यावे. याशिवाय त्या धातूची पूजा करून त्यांनी सांगितलेल्या ज्ञान रत्नानुसार आचरण करून तिन्ही समापत्तीचा लाभ करून घेतात. यासाठीच विहारादी उभारणे किंवा पूजा करणे आवश्यक आहे."_*
*(१) अग्नीची उपमा*
_"महाराज, समजा एखाद्याने फार मोठा अग्नी पेटवून नंतर तो विझवून टाकला, तर तो निर्जीव अग्नी पुनः त्यात टाकलेल्या गवताच्या लाकडाचा किंवा अशाच दुसऱ्या प्रकारच्या इंधनाचा स्वीकार करील काय?_
_"नाही भंते, जवळ असलेला अग्नीच जर स्वतः होऊन इंधनाचा स्वीकार करीत नाही तर तो एकदम विझून शांत झालेला अग्नी कसा काय लाकडादि इंधनाचा स्वीकार करील?"_
_"महाराज, तर काय मोठा अग्नी विझून शांत झाल्यानंतर जगातील सर्वच अग्नी नष्ट झाला काय?"_
_"मुळीच नाही भंते, अग्नी तर वाळलेल्या लाकडातून उत्पन्न होतो. ज्या कोणाला अग्नीची आवश्यकता असेल तो आपल्या सामर्थ्याने अरणीचे (दोन लाकडाचे) घर्षण करून अग्नी उत्पन्न करू शकेल आणि त्यापासून आपले कार्येही त्याला करता येईल."_
*_महाराज, तर मग त्या खोट्या सिद्धांताची पाठराखण करणाऱ्या दुसऱ्या मतांच्या लोकांनी भगवान बुद्धाबद्दल जे आक्षेप ते सर्व खोटे ठरतात. की "पूजेचा स्वीकार न करणारांची पूजा करणे व्यर्थ आहे."_*
*_महाराज, जसा तो मोठा अग्नी पेटविण्यात आला तसेच भगवान बुद्ध सुद्धा आपल्या ज्ञान तेजाने या समस्त दहा हजार लोक विश्वात विशाल अग्निपूजासारखे प्रकाशमान झालेत आणि जसा तो अग्नी विझून शांत झाला, तसेच भगवंताने निर्वाणपदाची प्राप्ती करून त्यांनी संसारातून एकदम आपली आवागमनापासून सुटका करून घेतली. ज्याप्रमाणे पूर्णपणे पेटविलेला अग्नी विझून थंड झाल्यानंतर तो कोणत्याही लाकडादी इंधनास जाळू शकत नाही तसेच संसारावर महान उपकार करणारे भगवान बुद्ध स्वीकार व अस्वीकार या प्रश्नापासून अगदी मुक्त झालेत आणि ज्याप्रमाणे अग्नी विझून गेल्यानंतर सुद्धा अग्नीची आवश्यकता भासल्यास कोणी अरणीचे घर्षण करून अग्नी उत्पन्न करू शकतो तद्वतच देवता आणि मनुष्य भगवंताच्या अष्टधातूंची पूजा करून किंवा विहार, स्तुपादी उभारून आणि तथागतांनी सांगितलेल्या सद्धर्मानुसार आचरण करून ते बुद्ध तेज निर्माण करू शकतात आणि तिन्ही सभापतींचा लाभ करून घेऊ शकतात."_*
*_"महाराज, यामुळेच भगवान बुद्धाने जर महापरिनिर्वाण प्राप्त केले असले तरी त्यांच्या प्रति केली जाणारी पूजा अचूक फळ देणारी ठरते आणि ध्येय साध्य करून देणारी ठरते."_*
*(२) वादळाची उपमा*
_"महाराज, भगवान बुद्धाने महापरिनिर्वाणाचा लाभ करून घेतला असला तरी त्यांच्या प्रती केली जाणारी पूजा अचूक फळ देणारी व सत्कारणी ठरते याविषयी अजून एक कारण ऐकावे."_
_"महाराज, समजा, एकदा खूप मोठे वादळ आले आणि हळूहळू ते शांत झाले. तर ते एकदा शांत पावल्यानंतर पुनः फिरून येईल काय?"_
_"नाही भंते, शांत पावलेले वादळ पुनः कसे काय फिरून येऊ शकेल?"_
_"असे का होऊ नये?"_
_"कारण की, वादळ म्हणजे अगदीच अचेतन वस्तू आहे. त्याला इच्छा ती कशी नसतेच."_
_"महाराज, ते शांत पावल्यानंतरही त्यास वादळ नावानेच ओळखले जाते काय?"_
_"नाही भंते, परंतु पंखा हेही एक वारा निर्माण करण्याचे साधन आहे. ज्या कोणाला उकाडा जाणवत असेल किंवा ताप आल्यामुळे वाऱ्याची गरज भासत असेल तर पंख्याच्या साहाय्याने वारा निर्माण करता येतो. काही प्रमाणात का होईना पण त्या वाऱ्यापासून उकाडा किंवा ताप या अवस्थेत आराम मिळविता येते."_
_*"महाराज, तर मग त्या खोट्या सिद्धांताची पाठराखणी करणाऱ्या दुसऱ्या मतांच्या लोकांनी भगवान बुद्धाबद्दल घेतलेला आक्षेप खोटा ठरतो की, 'पूजेचा स्वीकार न करणारांची पूजा व्यर्थ आहे."*_
*_"महाराज, जसे वादळ आले, त्याचप्रमाणे भगवान बुद्ध सुद्धा आपल्या शीतल, मधुर, शांत, सुखदायक आणि मैत्रिरूपी वायू लहरींनी या दहा हजार लोक धातूंवर वहात राहिले. ज्याप्रमाणे ते वादळ येऊन शांत झाले तद्वतच भगवान बुद्धाने निर्वाणाचा लाभ करून संसारातून मुक्ती प्राप्त करून घेतली. जसे शांत झालेले वादळ पुनः परत येण्याची इच्छा करीत नाही, तसेच या जगतावर महान उपकार करणारे तथागत स्वीकार किंवा अस्वीकाराच्या कामनेतून पुर्णतः मुक्त झाले. जसे ते मनुष्य गर्मीमुळे किंवा तापामुळे तळमळत होते, तसेच देवता आणि मनुष्य लोक लालसा, दुष्टपणा व भ्रमरूपी तापाने तळमळत आहेत. ज्याप्रमाणे पंखा हा वायू उत्पन्न करण्याचे साधन आहे तद्वतच भगवान बुद्धाचे शरीर-धातू-रत्न हे तिन्ही समापती आणण्याकरिता साधन आहेत. ज्याप्रमाणे गर्मी व तापाने तळमळणारे लोक पंखा हलवून वारा उत्पन्न करतात आणि ताप दूर करतात त्याचप्रमाणे देवता आणि मनुष्य लोक शरीर धातूंची पूजा करून व भगवान बुद्धाने सांगितलेल्या ज्ञान रत्न-मार्गाचे आचरण करून पुण्य लाभ करतात आणि लालसा, दुष्टपणा व भ्रमरूपी अग्नीच्या तापास दूर करतात._*
*_"महाराज, याच कारणाने जरी भगवान बुद्धाने महापरिनिर्वाण प्राप्त केले असले तरी त्यांच्या प्रति केली जाणारी पूजा ही तत्काळ फळ देणारी आणि ध्येय साध्य करून देणारी ठरते."_*
*(३) ढोलाची उपमा*
_"महाराज, भगवान बुद्धाने महापरिनिर्वाणाचा लाभ करून घेतला असला तरी त्यांच्या प्रती केली जाणारी पूजा अचूक फळ देणारी व सत्कारणी ठरते याविषयी अजून एक कारण ऐकावे."_
_"महाराज, कोणी एका मनुष्याने ढोलावर थाप मारली असता आवाज निघून नंतर बंद झाला, तर काय तो बंद झालेला आवाज पुन्हा फिरून येण्याची इच्छा करील काय?"_
_"नाही भंते, शिवाय आवाजास विचार नाही की, कल्पना नाहीत. एकदा आवाज निर्माण होऊन बंद पडला म्हणजे पुनः निर्माण होण्याची त्याला इच्छा ती कशी व्हावी? ढोलाचा आवाज निर्माण होऊन बंद पडला की, तो कायमचाच बंद होतो. परंतु आवाज काढण्याकरिता ढोल हे एक साधन आहे. तेव्हा जर तसा प्रसंग आलाच तर कोणीही मनुष्य ढोलावर थाप मारून आवाज उत्पन्न करू शकतो."_
*_"महाराज, याच उदाहरणाप्रमाणे भगवान बुद्ध शील, समाधी, प्रज्ञा, विमुक्ती, विमुक्तीज्ञान आणि दर्शनाने परिभावीत शरीर धातुरुपी रत्ने, धर्म आणि विनय इत्यादी देऊन स्वतः निर्वाण लाभ करून संसारातून स्वतःची सुटका करून घेतली परंतु भगवान जरी मुक्त झाले असले तर तिन्ही समापत्तींचा लाभ काही थांबत नाही. सांसारिक दुःखाने त्रस्त झाल्यामुळे जे कोणी या तिन्ही समापत्तीचा लाभ करू इच्छितात, ते भगवान बुद्धांच्या विहारांची निर्मिती करून त्यात त्यांच्या शरीर धातूंची स्थापना करतात आणि श्रद्धाभावे त्या धातूंची पूजा करून त्यांनी सांगितलेल्या ज्ञान मार्गाचे आचरण करून ते तिन्ही समापत्तींचा लाभ करून घेऊ शकतात."_*
*_"महाराज, याच कारणाने जरी भगवान बुद्धाने परिनिर्वानाचा लाभ करून घेतला असला तरी त्यांच्या प्रति केली जाणारी पूजा अचूक फळ देणारी आणि ध्येय साध्य करून देणारी आहे."_*
*_"महाराज, भगवंताने भविष्यात घडून येणारा हा प्रसंग तेव्हाच आपल्या दूरदृष्टीने जाणून घेतला होता. म्हणूनच त्यांनी समजावून सांगितले होते की -_*
*_आनंद, तुमच्यापैकी कोणाच्या तरी मनात असे विचार येऊ शकतात की, आम्हाला मार्गदर्शन करणारे शास्ता तर निघून गेले. आता आम्हाला सद्धर्माची वाट दाखविणारा गुरू कोणी उरला नाही. परंतु तुम्ही असे समजून घेऊ नये. आनंद, असे पश्चाताप करण्यासारखे काहीही कारण नाही. मी ज्या सद्धर्माचा आजपर्यंत उपदेश केला. संघासाठी पालन करावयाचे जे नियम सांगितले. माझ्यानंतर तेच तुम्हाला मार्ग दाखवतील म्हणून त्यांनाच तुम्ही माझ्यास्थानी मानले पाहिजे."_*
*_याही कारणाने जरी आता भगवान बुद्ध राहिले नाही व त्यांनी परिनिर्वाण प्राप्त केले असले तरी त्यांच्या प्रति केली जाणारी पूजा निरर्थक होऊ शकत नाही. इतर पंथांच्या लोकांनी घेतलेले आक्षेप अगदी खोटे, अन्यायी, वस्तुस्थितीस सोडून आणि केवळ विरोधाभास निर्माण करणारे आहेत, हे आता सिद्ध झाले. हे दुःखाचे कारण आहे, कारण दुःख हे खोटेपणाचे फळ आहे व अध:पाताच्या मार्गाने नेणारे आहे."_*
*(४) पृथ्वीची उपमा*
_"महाराज, भगवान बुद्धाने महापरिनिर्वाणाचा लाभ करून घेतला असला तरी त्यांच्या प्रती केली जाणारी पूजा अचूक फळ देणारी व श्रेयस्कर का ठरते याविषयी अजून एक कारण ऐकावे."_
_"महाराज, पृथ्वीला अशी इच्छा असते का की आपणात सर्वच प्रकारचे बीज पेरले जावे?"_
_"नाही भंते, ती अशी इच्छा कशी करील?"_
_"मग पृथ्वीची इच्छा किंवा मान्यता नसताही बीज फुटून रोपटे वाढून मोठमोठ्या खोडांचे, विस्तीर्ण शाखांचे वृक्ष होऊन जमिनीत आपली मुळे रुतवून ताठ उभे राहतात, फुलतात, ते पृथ्वीच्याच आधाराने हे कसे घडते? त्यात बीज का पेरले जाते?"_
_"भंते, पृथ्वीकडून जरी मान्यता मिळाली नाही, हे खरे असले, तरी पण बीज फुटून रोपटे तयार होण्यासाठी व त्याच्या विकासासाठी पृथ्वीच आश्रय देते. पृथ्वीतच पेरलेले बीज उगवून ते विकसित होऊन शेवटी खोड तयार झाल्यानंतर फुले, फळे व विस्तीर्ण असा शाखासंभार धारण करणारे मोठे वृक्ष होतात."_
*_"महाराज, तर मग त्या खोट्या सिद्धांताची पाठराखण करणाऱ्या दुसऱ्या मताच्या लोकांनी भगवान बुद्धाबद्दल घेतलेला आक्षेप म्हणजे स्वीकार न करण्याप्रति केल्या जाणाऱ्या व्यवहारात कांहीच अर्थ नाही. हा एकदम अशिष्ट, निरर्थक आणि खोटा ठरतो."_*
*_"महाराज, भगवान अर्हत सम्यक सम्बुद्धांना या महान पृथ्वी समान समजले पाहिजे. या महान पृथ्वीप्रमाणे ते कशाचाही स्वीकार किंवा अस्वीकार करीत नाही. ज्याप्रमाणे पृथ्वीच्या आश्रयाने बीज उगवून त्यांचेच मोठमोठे वृक्ष होतात, त्याचप्रमाणे भगवान बुद्धाच्या शरीर धातूंच्या सुरक्षिततेसाठी विहार व स्तुपांची उभारणी करून त्या अवशेषांची पूजा व भगवंताच्या आदेशाचे पालन इत्यादींचा आश्रय घेऊन देवता आणि मनुष्यलोक पुण्य फळरूपी मुळांनी मजबूत पकडून समाधी-स्कंध, धर्म-सार आणि शीला (सदाचार) चा शाखा संभार केलेलं मोठमोठे वृक्ष तयार होतात आणि त्या वृक्षांना श्रामण्यरूपी फुले व विमुक्तीरूपी फळे येतात."_*
*_"महाराज, याच कारणाने जरी भगवान बुद्धाने परिनिर्वाण प्राप्त केले असले, तरी त्यांच्याप्रती केली जाणारी पूजा ही अचूक फळ देणारी ध्येयसिद्धीस कारण होणारी आहे."_*
*(५) पोटातील कृमींची उपमा*
_"महाराज, भगवान बुद्धाने महापरिनिर्वाणाचा लाभ करून घेतला असला तरी त्यांच्या प्रती केली जाणारी पूजा अचूक फळ देणारी व श्रेयस्कर का ठरते याविषयी अजून एक कारण ऐकावे."_
_"उंट, बैल, गाढवे, बकरे तसेच इतर जनावरे आणि मनुष्यप्राणी आपल्या उदरात कृमींनी उत्पन्न व्हावे म्हणून सम्मती देतात काय?"_
_"नाही भंते, तशी सम्मती ते कशी काय देणार?"_
*_"तर मग महाराज, हे कृमी त्यांची मान्यता न घेताच त्यांच्या उदरात जन्मास येतात आणि असे ठाण मांडून बसतात की, जणू त्यांचीच हक्काची भूमी आहे. तेवढ्या वरच ते थांबत नाही तर संतती देखील इतकी जन्मास घालतात की, विचारच करीत रहावे लागते."_*
_"भंते, असे त्या प्राण्यांच्या वाईट कर्माने घडते."_
*_"महाराज, अगदी याच उदाहरणाप्रमाणे जरी भगवान बुद्धाने परिनिर्वाण प्राप्त केले असले आणि संसारातून एकदम आपली सुटका करून घेतली तरी पण त्यांच्याप्रती केली जाणारी पूजा अचूक फळ देणारी आणि ध्येयसिद्धीस कारण होणारी ठरते."_*
*संदर्भ:*
*मिलिन्द प्रश्न*
*मेण्डक प्रश्न*
*संकलन : महेश कांबळे*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼