Thursday, 10 September 2020

मेण्डकारंभ कथा - बुद्ध पुजा

 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

  

                   *_मेण्डकारंभ कथा_*

                       *_बुद्ध पुजा_*

     

    *_मिलिंद राजाने आयुष्यमान नागसेनांना अंजलीबद्ध प्रणाम केला व म्हणाला -_*


        *_"भंते, निरनिराळ्या मतांच्या लोकांचे म्हणणे आहे की, भगवान बुद्धांच्या मानसन्मानार्थ केलेली पूजा जर भगवान बुद्ध स्वीकारतात. तर त्यांना निर्वाणपदाचा लाभ झाला असे म्हणता येणार नाही आणि ते या संसारात कोठे निश्चितच भटकत असतील. त्यांचे सद्यस्थितीत संसारातील अस्तित्व मुळीच नाकारता येणार नाही. हे जर खरे असेल तर भगवान बुद्ध अगदीच साधारण व्यक्ती झालेत, मग त्यांची पूजा करण्यात अर्थ तो काय?"_*

       *_"आणि समजा, त्यांना जर निर्वाणपद लाभले असेल, संसाराशी आता त्यांचा मुळी संबंधच राहिलेला नसेल आणि ते समस्त स्थितीतून मुक्त झाले असतील, तर त्यांची पूजा करण्यात काय स्वारस्य? कारण ते जर आहेतच नाहीत, तर पूजा करावी कोणाची? त्याचप्रमाणे भगवान बुद्धाला निर्वाणपद मिळाले असे म्हटले तरी प्रश्न सुटत नाही व निर्वाणपद नाही मिळाले म्हटले तरी प्रश्न सुटत नाही. त्यामुळे दोन्ही बाजूंनी विवादात सापडलेल्या भगवान बुद्धाची पूजा करण्यात काहीच अर्थ उरत नाही."_*

    *_"हा प्रश्न सामान्य बुद्धी असलेल्या माणसाच्या शक्तींच्या पलीकडला आहे. सामान्य लोकांसाठी हा विषय नाही. महान लोकच हा प्रश्न सोडवू शकतात. आता आपणच कृपाकरुन या प्रश्नाचे सडेतोड उत्तर देऊन मिथ्या तर्काचे खंडन करावे. या प्रश्नामुळे उत्पन्न होणाऱ्या स्थितीचा विरोधकांना फायदा घेता येणार नाही, तेव्हा भावी बौद्धांच्या सोयीसाठी या कोड्याची सोडवणूक करून प्रकाश पाडावे, जेणेकरून ते दुसऱ्या मताच्या लोकांच्या कुतर्कास झणझणीत उत्तर देऊ शकतील."_*


         यावर स्थविर म्हणाले, *_"महाराज, भगवान बुद्धांना महापरिनिर्वाणाचा लाभ झाला हे सूर्यप्रकाशा इतकेच खरे आहे. ते आता कोणत्याही पूजेचा स्वीकार किंवा अस्वीकार करीत नाहीत. बोधिवृक्षाखाली बुद्धत्वाची प्राप्ती करुन ते या प्रश्नाच्या पलीकडे गेले होते. तेव्हा आत्ता संसारातून पूर्णतः मुक्त होऊन निर्वाण प्राप्त केल्यानंतर प्रश्न उरतोच कुठे"_*

         *_"महाराज, धर्म सेनापती सारिपुत्रांनी सुद्धा म्हंटले आहे की, ज्यांची बरोबरी करू शकणारा आजपर्यंत कोणी झाला नाही. ते भगवान बुद्ध देवता व मनुष्य या उभयतांनी केलेल्या पूजेचा स्वीकारही करीत नाही की, अस्वीकारही करीत नाहीत. युगानुयुगापासून सर्व बुद्धांचा हा सिद्धांन्त चालत आला आहे."_*


_राजा म्हणाला,_ *_"भंते, पुत्र आपल्या पित्याची किंवा आपल्या पुत्राची स्तुती करीत असेल तर त्याला पुरावा म्हणता येणार नाही. त्या तर आपापल्या मनातील भावना आहेत. परंतु खोट्या सिद्धांताचा पाठराखणी करणाऱ्या लोकांचा भ्रम दूर करण्याकरिता आणि आपल्या सद्धर्माचा प्रकाश पसरविण्याकरिता आपण योग्य तऱ्हेने समजावून सांगावे."_*


       _स्थविर म्हणाले,_ *_"महाराज, भगवान बुद्ध तर पुर्णतः मुक्त झाले आहेत. तेव्हा ते आता कोणाच्या पूजेचा स्वीकार किंवा अस्वीकार कसे करतील? परंतु देवता आणि मनुष्य लोक त्यांची विहारे व स्तूप बांधून त्यात त्यांच्या अस्थी, कोश, दात इत्यादी शरीर धातूंची स्थापना करून ठेवतात, ज्यांच्या पुण्य फळाने अर्हतपद किंवा बोधिसत्व पद प्राप्त करता यावे. याशिवाय त्या धातूची पूजा करून त्यांनी सांगितलेल्या ज्ञान रत्नानुसार आचरण करून तिन्ही समापत्तीचा लाभ करून घेतात. यासाठीच विहारादी उभारणे किंवा पूजा करणे आवश्यक आहे."_*


                                       *-क्रमशः*


*संदर्भ:*

*मिलिन्द प्रश्न*

*मेण्डक प्रश्न*

              

*संकलन : महेश कांबळे*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

No comments:

Post a Comment

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...