🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_सम्यक मार्गानुसरण_*
*_सम्यक मार्ग निवडा आणि त्यापासून विचलित होऊ नका. मार्ग विपुल आहेत. परंतु सर्वच काही सम्यक मार्गाकडे नेत नसतात. सम्यक मार्ग हा केवळ थोडक्यांच्या सुखासाठी नाही. तो बहुजन सुखासाठी आहे. तो प्रारंभी, मध्ये आणि शेवटीही कल्याणप्रद असला पाहिजे. सम्यक मार्गाचे अनुसरण म्हणजे बौद्ध जीवनमार्गाचे अनुसरण होय._*
*_अष्टांगमार्ग हा श्रेष्टमार्ग आहे. सर्वश्रेष्ठ सत्यांमध्ये सत्यचतुष्ट्य आहे; श्रेष्ठ वैषयीक अनासक्ती हा सर्वश्रेष्ठ गुण आहे आणि ज्याला हे पाहण्याची दृष्टी आहे तो श्रेष्ठ पुरुष होय. प्रज्ञाशुद्धीचा हा एकमेव मार्ग आहे. दुसरा नाही, याच मार्गाने जा. जर तुम्ही या मार्गाचे अनुकरण केले तर तुमच्या दुःखाचा निरास होईल. दुःखकंटक कसे काढून टाकता येतील हे कळल्यावर, मी या मार्गाचा उपदेश केला._*
*_तथागत हे केवळ पथ-दर्शक आहेत. (स्वोन्नतीचा) प्रयत्न ज्याचा त्याने स्वतः करावयाचा असतो._*
*_सर्व स्पष्ट पदार्थ हे विनाशाधीन आहेत, हे जो ओळखतो त्याला दुःख विचलित करू शकत नाही. सर्व रूपे अनित्य आहेत. जो हे ओळखतो त्याला दुःख स्पर्श करीत नाही._*
*_जेव्हा जागे व्हायला पाहिजे तेव्हा तो जागा होत नाही, जो तरुण आणि बळकट असूनही सुस्तपणाच्या आहारी गेलेला असतो, ज्याची इच्छा आणि विचार झोपी गेलेले असतात, त्या आळशी मनुष्याला कधीही ज्ञान होणार नाही._*
*_भाषणात सावध असणे, विचारात संयम राखणे, कायेने कोणतेही पाप न करणे, हे काया-वाचा-मनसा आचरावयांचे तीन मार्ग अवलंबिल्यावर प्रज्ञावंतांनी निर्देशिलेल्या मार्गाने माणसाला जाता येते._*
*_वास्तविक ज्ञानाने लाभ होतो आणि त्याच्या अभावाने नाश होतो. लाभाचे आणि नाशाचे हे दुहेरी मार्ग ओळखून ज्ञान वाढेल असा माणसाने उद्योग करावा. शरदऋतुतील कमळाप्रमाणे माणसाने आत्मप्रीती खुडुन काढावी. शांतीचा मार्ग जवळ करावा. सुगताने निर्वाणाचा मार्ग निर्दिष्ट केला आहे. अधर्माने वागू नका. अविचाराने जगू नका. दुष्ट सिद्धांताचे अनुकरण करू नका.जागे व्हा. सुस्त पडू नका. सद्गुणांची कास धरा. जो पूर्वी अविचारी होता आणि नंतर सुविचारी झाला तो घनविमुक्त चंद्राप्रमाणे जग तेजस्वी करतो. जो दुष्कृत्ये सोडून सत्कृत्ये करू लागला आहे तो घनविमुक्त चंद्राप्रमाणे जगाला प्रकाशित करतो._*
*_एका धर्मनियमाचे उल्लंघन करून जो असत्य बोलतो तो कोणते दुसरे दुष्कृत्य करणार नाही, हे सांगवत नाही. जे सदैव सावधान असतात, जे रात्रंदिवस अभ्यास करतात जे निर्वाणासाठी आटोकाट प्रयत्न करीत असतात, त्यांचे दुर्विकार (आसव) शेवटी लोप पावतात._*
*_अशी एक जुनी म्हण आहे की, जो स्तब्ध बसतो, त्याला लोक दूषण लावतात. जो फार बोलतो त्याला लोक दूषण लावतात आणि जो अगदी थोडे बोलतो त्यालाही दूषण लावतात. खरोखर, ज्याला दूषणच लावले जात नाही असा या जगात कोणीच नाही. ज्याला सदैव दूषण देतात किंवा ज्याची सदैव स्तुती करतात असा पुरुष पूर्वी नव्हता, आता नाही आणि पुढेही कधी होणार नाही._*
*_वाणीच्या क्रोधापासून सावध रहा आणि जिभेचा संयम करा. मानसिक पापांचा त्याग करा आणि आपल्या मनानेही सद्गुणांचा आचार करा. अप्रमाद हा निर्वाणाचा मार्ग आहे. प्रमाद मृत्यूचा मार्ग आहे. जे अप्रमादी आहेत ते अमर आहेत आणि जे प्रमादी आहेत ते मृतवत आहेत._*
*संदर्भ:*
*बुद्ध आणि त्यांचा धम्म*
*धम्मपद*
*संकलन : महेश कांबळे*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
No comments:
Post a Comment