🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_सत्, असत्, आणि पाप_*
*_शुभ कार्य करीत राहा, अशुभ कर्मात सहयोगी बनू नका. पापकर्म करू नका हा बौद्ध जीवन मार्ग आहे._*
_माणसाने एकदा शुभ कर्म केले की, परत परत शुभ कर्म करीत राहिले पाहिजे. शुभ कर्म इतके अविरत करीत राहावे की, त्यायोगे अंतःकरणातील सर्व इच्छाही शुभ कर्माकडे लागाव्यात. *शुभ कर्माचा संचय करीत राहणे सुखकर आहे.*_
_शुभ कार्य मला साधणार नाही असे म्हणू नका. *थेंबाथेंबाने पात्र भरते थोड्याथोड्या शुभ कर्माने शुभकर्म वाढत राहते.*_
_जे केल्यानंतर खंत किंवा खेद वाटत नाही, पश्चात्तापाची पाळी येत नाही, ज्याचे फळ आनंदाने आणि समाधानाने स्वीकारण्यात येते ते कर्म चांगल्या रीतीने झाले असे समजावे._
_जोपर्यंत शुभ कर्माला परिपक्वता येत नाही तोपर्यंत सज्जन मनुष्यालाही दुर्दिन भोगावे लागतात; परंतु त्याचे शुभ कार्य परिपक्व झाले की त्यांना चांगले दिवस दिसू लागतात. 'ते मला बरोबर साधणार नाही' असे माणसाने शुभ कर्मासंबंधी कधीच बोलू नये, *थेंब पडून पात्र भरते. सुज्ञ मनुष्य जरी थोडे थोडे शुभ कर्म करीत राहिला तरी परिणामी तो चांगुलपणाने भरून जातो.*_
*_चंदन, धूप, कमळ, मधुमालती यांच्या सुगंधापेक्षा शीलाचा (सदाचरणाचा) सुगंध अधिक असतो. धूप आणि चंदनाचा सुवास मंद असतो, परंतु शिलाचा सुवास उच्चपदी दरवळत जातो._*
_अशुभ हे शूद्र समजू नका. ते मजकडून घडणार नाही असे म्हणू नका. थेंबाथेंबाने भांडे भरते. थोडे अशुभ घडता ते वाढत राहते._
_ज्याच्या योगाने / कृत्याने मागाहून खेद किंवा खंत वाटते आणि ज्याचे फळ स्वीकारताना अश्रू ढाळावे लागतात आणि शोक करावा लागतो असे काम करणे बरे नव्हे._
*_जर मनुष्य दुष्टपणे बोलू लागला किंवा वागु लागला तर ज्याप्रमाणे गाडीच्या बैलाच्या खुरामागून गाडीचे चाक धावत असते त्याप्रमाणेच अशा माणसाच्या मागून दुःख धावत राहते._*
_पापाला अनुसरू नका. या बाबतीत अनवधानी राहू नका. मिथ्या कल्पना उराशी बाळगू नका. दुर्विचारांचे दमन करून परिपुर्णतेकडे जाण्याची त्वरा करा. जो शुभ कर्मात मागासलेला राहतो त्याचे मन पापामध्ये रममाण होते._
*_पापकर्म करणाऱ्याला सुद्धा जोपर्यंत त्याची पापे पक्व झाली नाहीत तोपर्यंत सुख दिसत राहते. परंतु ज्या वेळी त्याची पापे परिपक्व होतात त्या वेळी त्याला दुःखाशिवाय काहीच दिसत नाही. अशुभ मजपर्यंत येऊन भिडणार नाही असे बोलत माणसाने अशुभाला कमी लेखू नये. थेंबाथेंबाने भांडे भरते. अगदी अल्प दुष्कृत्ये करता करता, मूर्ख मनुष्य पापमय होऊन जातो._*
_माणसाने आपले विचार अशुभ कर्मापासून परावृत्त करून शुभ कर्मासंबंधी प्रवृत्ती वाढविण्याची त्वरा करावी. जर माणूस शुभ कर्म आचरण्यात आळस करू लागला तर त्याचे मन अशुभामध्ये रममाण होते._
_माणसाने एकदा पाप केले तरी त्याने परत पाप करू नये आणि पापाने आनंद मानू नये. पापाची वाढ ही दुःखकारक होते_
*_कुशल कर्म करीत जा, अकुशल कर्म करू नका. कुशल कर्म करणारे इहलोकी धन्यता मानतात._*
_कामुकतेने दुःख - भय निपजते. कामुकतेपासून मुक्त होतो तो दुःख आणि भय यांपासून विमुक्त होतो._
*_भूक हा सर्वात वाईट असा रोग आहे. संसार हे सर्वांत मोठे दुःख आहे, हे सत्य उमगले की, निब्बान हे सर्वश्रेष्ठ सुख वाटू लागते._*
_ज्याप्रमाणे वज्र एखाद्या मौल्यवान रत्नाचा भंग करते तसे स्वनिर्मीत, स्वपोषित पाप कृत्याचा नाश करते._
*_ज्याप्रमाणे वृक्षाला वेढणारी लता वृक्षाला खाली ओढते, त्याप्रमाणेच ज्याच्या अंगी अतिशय दुष्टपणा असतो, तो त्याच्या शत्रुलाही आनंद वाटावा अशा अधोगतीला स्वतःला नेऊन पोहचवितो._*
*_दुष्कृत्ये आणि स्वतःला मारक ठरणारी कृत्ये माणसाला सहज करता येतात. परंतु जी उपकारक आणि हितकारक कृत्ये असतात ती मात्र करायला कठीण असतात._*
*संदर्भ: बुद्ध आणि त्यांचा धम्म*
*संकलन : महेश कांबळे*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
No comments:
Post a Comment