Friday, 30 April 2021

अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम - प्रश्न ६३

 *_प्रश्न ६३ - साऱ्या जगभर परामानस शास्त्राचा अभ्यास चालू असताना त्याचे अस्तित्व नाकारणे हा एक आंधळेपणा नव्हे का?_* 


 *उत्तर*  👉  इंद्रियाद्वारे माणसाला जे ज्ञान होते, त्या पलीकडे माणसाला वास्तवाचे ज्ञान देणारी काही शक्ती अस्तित्वात आहे असे अनेकांना वाटत आले आहे. त्यामुळे या अतींद्रिय शक्ती वा परामानस शास्त्राबद्दल मानवी संस्कृतीत दीर्घकाळ कुतूहल आढळते. या बाबी सुरुवातीस धर्माचे तंत्र मंत्र अथवा गूढविद्या यांच्याशी संबंधित मानल्या जात होत्या. या घटनांचा अभ्यास करण्यासाठी *इंग्लंडमध्ये प्रथम १८८२ साली सोसायटी फॉर सायंटिफिक रिसर्च स्थापन झाली. १८८७ साली अमेरिकेतही याच स्वरूपाची संस्था स्थापन झाली.* काही शास्त्रज्ञांनी या संशोधनात भाग घेतला.

   

           *परंतु या अभ्यासातून या शास्त्राचे अस्तित्व अजूनही सिद्ध झालेले नाही. जगातील नामवंत विद्यापीठाची ज्ञानशाखा म्हणूनही याला मान्यता नाही.*

   

           याबाबत जे प्रयोग यशस्वी झाले असे सांगण्यात येते, त्याच्या विश्लेषणात ही असे दिसले आहे की,


*१.* प्रयोग करत असताना अवलंबलेली पद्धत चुकीची वा अपुरी होती.


*२.* प्रयोग गलथानपणे करण्यात आले आहेत. या अतींद्रिय शक्तीमुळे जी माहिती मिळाल्याचा दावा केला, ती त्या माणसापर्यंत आधीच पोहोचली होती असे आढळून आले.


*३.* प्रयोगातून निष्कर्ष काढताना वापरण्यात आलेली संख्याशास्त्रीय पद्धत चुकीची होती. काही बाबी योगायोगाच्या होत्या. पुन्हा केलेल्या प्रयोगात त्या सिद्ध होऊ शकल्या नाहीत.


*४.* या स्वरूपाची शक्ती अस्तित्वात नाहीच असा ज्यांचा ठाम विश्वास आहे व ती सिद्ध करा अशा आव्हानात्मक पवित्र्यात जे आहेत व प्रयोग तपासण्यास जे तयार आहेत त्यांच्यावार या चाचण्या घेण्यात आल्या नाहीत.

   

        अशा घटना घडतात हे आधी सिद्ध व्हावयास हवे आणि ते कधी काळी झालेच तर त्याचा अभ्यास वीज, रेडीओ लहरी, वाफ, अणुशक्ती यांचा होतो त्याप्रमाणे होणार. अंधश्रद्धा न ठेवता असा अभ्यास करण्यात बुद्धीप्रामाण्याशी विसंगत काही नाही. पण अशा घटना घडल्या असा दावा करून, विज्ञानाला डावलून त्याची स्पष्टीकरणे दिली जातात. लोकांची अंधश्रद्धा पोसण्यास त्याचा उपयोग होतो, हे मात्र आक्षेपार्हच आहे. उत्क्रांतीमध्ये माणसाच्या जीवनकलहात त्याला उपकारक ठरणाऱ्या क्षमतांचा निसर्गतः विकास होत गेला. त्यामुळे त्यांचा खरे तर अधिकाधिक विकास व्हावयास पाहिजे होता. परंतु असा विकास अजिबात झाला नाही. ही कारणमीमांसाही अतींद्रिय शक्तीच्या विरोधात जाणारी आहे.

  

             या घटना सिद्ध झाल्या आहेत असे सांगणाऱ्याचा त्याच्या स्पष्टीकरणाबद्दल एक दावा असतो, की या घटनांना वैज्ञानिक चिकित्सेचे ज्ञान व नियम लागू नाहीत. वैज्ञानिक प्रक्रियेच्या व आधुनिक प्रयोगशाळेच्या कुवतीबाहेरच्या या घटना आहेत. वरपांगी बरोबर वाटणारे हे स्पष्टीकरण विसंगत वा फसवे आहे . *एकेकाळी विज्ञानाच्या सर्वस्वी आवाक्याबाहेरच्या वाटणाऱ्या अनेक घटना वैज्ञानिक दृष्टीकोनाचा वापर करून मानवाने ज्ञात करून घेतल्या.* याच मार्गाने आजच्या अज्ञात घटनांचे कार्यकारणभाव उद्या समजणार आहेत. परंतु ज्यावेळी विज्ञानाच्या पायाभूत पद्धतीलाच डावलण्याचा हेका धरला जातो, त्या वेळी परामानस शास्त्राच्या पुराव्यासाठी पुढे केलेल्या घटनांच्या खरेपणाबद्दल शंका निर्माण होते. ज्या अनेकांचे डंके ही शक्ती सिद्द्ध झाल्याचे पुरावे म्हणून पिटले गेले, त्या प्रत्येकाचे बिंग या ना त्या प्रकारे फुटले आहे. या स्वरूपाच्या घटनांचा वादातीत पुरावा आजही उपलब्ध नाही. यामुळे या घटना नाकारणे, हे आंधळेपणाचे नसून डोळसपणाचे लक्षण आहे.


 *-डॉ. नरेंद्र दाभोलकर व प्रा. प. रा. आर्डे यांनी लिहिलेल्या 'अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम' या पुस्तकातून साभार* 


https://mikamblemahesh.blogspot.com/

Thursday, 29 April 2021

अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम - प्रश्न ६२

 *_प्रश्न ६२ - रशियामध्ये गरोदर स्त्रियांच्या हातांचे ठसे घेऊन त्यावरून भविष्याचे (गरोदर स्त्रीच्या व तिच्या बाळाच्या) आराखडे बांधले जातात, हे खरे आहे काय? असल्यास रशियासारखा पूर्ण भौतिकवादी देशही भविष्याचा पाठपुरावा करत असताना आपण तो का सोडवा?_* 


 *उत्तर*  👉  रशियामध्ये गरोदर स्त्रियांच्या हातांच्या ठशांचा अभ्यास होतो का? असा अभ्यास होतो याबद्दल अधिकृत पुरावा आम्हांला अजून मिळालेला नाही. परंतु त्याने काहीही बिघडत नाही. हा अभ्यास होतो असे मानले तरीही तो त्या मातेच्या उदरातील गर्भाच्या भविष्यकालीन शिक्षण, लग्न, संतती, अपघात याचा वेध घेण्यासाठी होत नसून कशासाठी होतो हे तर्क केल्यास व आधुनिक विज्ञानाची माहिती असल्यास सहज समजू शकेल. यासाठी एक बाब प्रथम मनात पक्की बाळगावयास हवी की, व्यक्तीच्या हातावरच्या विविध रेषांना धनरेषा, आयुष्यरेषा समजणे, हातावरचे ग्रहांचे उंचवटे व त्यावरच्या लहान बारीक रेषा, चिन्हे, चिन्हे यावरून व्यक्तीच्या स्वभावाचे, जीवनाचे चित्र काढता येते असे मानणे याला काडीचा आधार नाही.

   

             मग याबाबत सत्य आहे तरी काय? ज्याप्रमाणे दोन व्यक्तींचे चेहरे सारखे आढळत नाहीत त्याचप्रमाणे दोन व्यक्तींच्या हातांचे ठसेही सारखे नसतात, हे तर आपल्याला माहितच आहे. (म्हणून हाताचा वा बोटाचा ठसा हा विश्वासार्ह पुरावा मानतात.) याचे कारण ज्या स्त्रीबीज व पुरूषबीज मिलनातून पहिली गर्भपेशी तयार होते, त्यामध्ये झालेल्या गुणसूत्राची बेरीज व वजाबाकीतून व्यक्तीच्या हातावरच्या रेषा व चेहऱ्याची जडणघडण ठरत असते. हातावरच्या रेषांमध्ये व्यक्तीच्या अनुवंशिकतेचे प्रतिबिंब काही प्रमाणात आढळते. मंगोलसारखा अनुवंशिक रोग ज्यामध्ये बालक मतिमंद असते, वाढ नीट होत नाही, त्यामध्ये रोग्यात आढळून येणाऱ्या खुणांत हातावरील आडव्या रेषांचा अभाव ही खूण प्रामुख्याने असते. हातावरील रेषांचा अभाव हे रोगाचे निदान करण्याचे वैशिष्ट्य, रोग अनुवंशिक स्वरूपाचा असल्याने आईच्या हातावरील रेषांत सुप्तावस्थेत तरी तो लक्षात येतो का, यासाठी गरोदर स्त्रियांच्या हातांचे ठसे रशियात घेतले जात असणे शक्य आहे. त्याचा हात पाहणाऱ्या ज्योतिषांशी काही एक संबंध नाही. अनुवंशिकतेबद्द्ल अतिशय प्रगत अशा स्वरूपाचे जेनेटिक इंजिनिअरिंग शास्त्र आज जगभर प्रगत होत आहे. त्याला पूरक म्हणून अनेक बाजूंनी अभ्यास चालू असतो. त्यातील हे एक असू शकेल. रशियाही आता हस्तसामुद्रिकाच्या मागे लागला, हा दुरान्वयाने काढलेला त्याचा अर्थ अन्यायकारक ठरेल.


 *-डॉ. नरेंद्र दाभोलकर व प्रा. प. रा. आर्डे यांनी लिहिलेल्या 'अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम' या पुस्तकातून साभार*


https://mikamblemahesh.blogspot.com/

Wednesday, 28 April 2021

अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम - प्रश्न ६१

 *_प्रश्न ६१ - भृगुसंहिता भृगु ऋषींची फार पूर्वीची अत्यंत अचूक अशी भविष्यवाणी आहे असे जगभर मानले जाते, याचा फायदा का घेऊ नये?_* 


 *उत्तर*  👉 भविष्याचे जे विविध प्रकार मानले जातात त्यामध्ये भृगुसंहिता ही फार विश्वासार्ह मानली केलेली आहे.

          

           भूतकाळात होऊन गेलेल्या, वर्तमानकाळात असलेल्या आणि भविष्यकाळात जन्माला येणाऱ्या सर्वांचे भविष्य भृगु ऋषींनी त्यांच्या ग्रंथात लिहून ठेवले आहे असे मानले जाते. तांब्याच्या काही हजार पट्ट्यांवर लिहिलेले हे भविष्य आता पुस्तक रुपात वा पोथी स्वरुपात उपलब्ध आहे. शंभर वर्षांचे कॅलेंडर ज्याप्रमाणे मिळते व त्यामुळे मागील व पुढील सालातील कोणत्या तारखेला कोणता वार येईल वा त्या वर्षातील, महिन्यातील, आठवड्यातील कोणत्या वाराला तारीख काय असेल हे अचूक सांगता येते, तसेच भविष्याबद्दल भूत, वर्तमान भविष्याचा अचूक वेध घेणारी अशी ही संहिता मानली जाते. आपल्याकडे संहितेची अस्सल प्रत आहे असा दावा करणाऱ्या व ती अचूकपणे वाचता येते असे सांगणाऱ्या व्यक्ती आढळतात. *मात्र हा दावा करणाऱ्या व्यक्ती त्यांची चाचणी देण्यास कधीच पुढे येत नाहीत.* दहा व्यक्तींच्या जीवनातील शिक्षण, व्यवसाय, लग्न, संतती, अपघात, प्रमुख घटना याबाबतचे ८०% निदान अचूक करण्याचे आव्हान जसे ज्योतिष शास्त्राचे अभ्यासक म्हणणारे ज्योतिषी स्वीकारत नाहीत, तसेच भृगुसंहितेच्या विश्वासार्हतेचे गुणगान करणारेही स्वीकारत नाहीत. तेव्हा जगभर काय मानले जाते, यापेक्षा काय वस्तुस्थिती आहे, याची शहानिशा करूनच कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवावा.


 *-डॉ. नरेंद्र दाभोलकर व प्रा. प. रा. आर्डे यांनी लिहिलेल्या 'अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम' या पुस्तकातून साभार* 


https://mikamblemahesh.blogspot.com/

Tuesday, 27 April 2021

अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम - प्रश्न ६०

 *_प्रश्न६० - डॉ. पुरंदरे हे जागतिक कीर्तीचे स्त्रीरोगतज्ज्ञ. त्यांनी गर्भवती स्त्रीच्या उदरात मुलगा की मुलगी हे समजण्यासाठी अतिशय सोपी पद्धती रुद्राक्षाच्या आधारे शोधून काढली आहे, हे शास्त्रीय नव्हे काय? त्यांचे असेही मत आहे की हातावरून रुद्राक्ष धरून संबंधित व्यक्ती धनभारित (पॉझिटिव्हली चार्जड) ऋणभारित (नेगेटिव्हली चार्जड) वा तटस्थ आहे का, ते समजू शकते. धनभारित व्यक्तीकडे भविष्य अचूक वर्तविण्याची क्षमता असते, हे खरे आहे काय?_* 


 *उत्तर*  👉  एखाद्याने – मग तो कोणीही असो – नवीन काही शोधून काढणे ही बाब स्वागतार्ह आहे. यातूनच विज्ञान पुढे जात असते. एखाद्या विज्ञान शाखेतील तज्ज्ञांचा दावा असेल तर स्वाभाविकच अपेक्षा अधिक, कारण एखादी गोष्ट शास्त्रीय आहे की नाही हे कसे तपासावे हे त्यांना अधिक चांगले समजत असते. या पार्श्वभूमिवर रुद्राक्षाच्या डॉ. पुरंदरेंच्या दाव्याबाबत प्रत्यक्ष काय आढळून येते? *रुद्राक्षाच्या या विशिष्ट गुणधर्माच्याबाबत कोणत्याही स्वरुपात शास्त्रीय तपासाची सांख्यिकी माहिती प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने हे आव्हान दिले होते व ते आजही कायम आहे.* प्रसूत होण्यासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या व ज्यांची गर्भलिंग निश्चितीची पूर्व तपासणी झालेली नाही, अशा शंभर गरोदर स्त्रियांच्या पोटावर ठेवून त्याची चाचणी घेणे सहज शक्य आहे. यामुळे त्या स्त्रिया पुढील दोन-चार दिवसात प्रसूत होताच हा दावा खरा की खोटा हे समजून येईल.

             

              *व्यक्ती धनभारित वा ऋणभारित वा तटस्थ असतात, हे रुद्राक्षाच्या सहाय्याने ओळखणे ही एक अशीच भूलथाप आहे. याबद्दल कसलाही वैज्ञानिक व संख्याशास्त्रीय पुरावा नाही.* पुरंदरेंनी ज्यांना ज्यांना धनभारीत व्यक्ती म्हणून सांगितले त्यांनी रुद्राक्ष स्वतः डॉ. पुरंदरेंच्या हातावर धरल्यावरही (डॉ. पुरंदरेही त्यांच्या मते धनभारित आहेत) तो अजिबात न फिरल्याचा पुरावा आहे. मग त्या तथाकथित धनभारित्वामुळे अचूक भविष्य सांगण्याची क्षमता येणे दूरच राहिले.


 *-डॉ. नरेंद्र दाभोलकर व प्रा. प. रा. आर्डे यांनी लिहिलेल्या 'अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम' या पुस्तकातून साभार* 


https://mikamblemahesh.blogspot.com/

Monday, 26 April 2021

चैत्र पौर्णिमा / चित्त मासो

 🌕 *चैत्र पौर्णिमा. चित्तमासो* 🌕


*_चैत्र पौर्णिमेच्या दिवशी भगवान बुद्धांच्या जीवनात ५ महत्वपूर्ण घटना घडल्या._*


🔹 *१.* भृगु ऋषींच्या आश्रमात प्रवेश तसेच निरोप.

🔹 *२.* उद्गक रामपुत्त यांच्या आश्रमात प्रवेश तसेच निरोप.

🔹 *३.* कपिल मुनींच्या 'सांख्य दर्शन' तत्वज्ञानाचा अभ्यास.

🔹 *४.* एक शूद्र व्यक्तीने धन दान म्हणून दिले.

🔹 *५.* सुजाताचे खीर दान.


*_१.भृगु ऋषींच्या आश्रमात प्रवेश तसेच निरोप._*

                *भारद्वाजांचे गुरु ' आलारकालाम ' हे योग साधनेत निपुण असे अभ्यासक होते.* त्यावेळी ते वैशाली येते राहत होते. आणि सिद्धार्थ गौतम राजगृहाजवळील गुहाकुटपर्वत टेकडीवर पर्णकुटीत राहत होते. आलारकालाम यांना भेटण्यासाठी सिद्धार्थ गौतम तेथून निघाले. जाता जाता भृग ऋषींचा आश्रम लागला. 

          *भृग ऋषींचे तत्वज्ञान आणि उपासना जाणून घेण्यासाठी आश्रमात प्रवेश केला.*  शाररिक कष्ट करून तपस्वी जीवन जगणे हे त्यांचे तत्वज्ञान होते. सिद्धार्थ गौतमांना हे आवडले नाही आणि त्यांनी निरोप घेतला. 

             दोन्ही हि घटना वेगवेगळ्या चैत्र पौर्णिमेला घडल्या. म्हणजे १ वर्ष सिद्धार्थ गौतम हे भृग ऋषींकडे होते.


*_२. उद्गक रामपुत्त यांच्या आश्रमात प्रवेश तसेच निरोप._*

             *उद्गक रामपुत्त हे समाधी योग साधनेत निपुण होते. सिद्धार्थ गौतमांनी तेथे ' अकियन्या यतन ' नावाची समाधी पर्यंत अभ्यास केला.*

त्यांच्या कडून हि निरोप घेतला तो दिवस चैत्र पौर्णिमेचा होता. म्हणजे इथे ही १ वर्ष सिद्धार्थ गौतम राहिले होते. 


*_३. कपिल मुनींच्या 'सांख्य दर्शन' तत्वज्ञानाचा अभ्यास._*

          त्याकाळी *कपिल मुनी हे सर्व तत्वज्ञानी लोकांमध्ये प्रमुख होते. त्यांचा सांख्य दर्शन तत्वज्ञान/सिद्धांत हा सत्यावर आधारित होता. कुठली वस्तू/गोष्ट सत्य असण्यासाठी तिला प्रमाण असणे अत्यावश्यक आहे.*

              ह्या तत्वज्ञानाचा अभ्यास करून सिद्धार्थाने ३ गोष्टी ग्रहण केल्या. 

१. सत्य प्रमाणावर म्हणजेच पाहिलेले किंवा अनुभवलेले असावे.

२.ईश्वर अस्तित्वाचे कुठले हि प्रमाण नाही म्हणून ईश्वर आणि आत्मा अस्तित्वाविषयीची चर्चा व्यर्थ आहे.

३.जीवनात दुःख आहे.


*_४. एक शूद्र व्यक्तीने धन दान म्हणून दिले._*

         एक शूद्र जातीतील व्यक्ती जो धनगर होता  त्याने तथागताना खूप सारे धन दान म्हणून दिले.


*_५. सुजाताचे खीर दान._*

              इतके सारे ध्यान साधना करून हि ज्ञान प्राप्ती होत नव्हती. मग सिद्धार्थ गौतम फक्त एक फळ खाऊन राहू लागले. 

प्राचीन निरंजना नदीवरील उरुवेला अर्वाचीन बुद्धगयाच्या शेजारी सेनानी गाव होते. सुजाताचे हे जन्म गाव. सध्या त्या गावाचे नाव बकरौर आहे. सुजाता हिला जसा हवा तसा सुशील, सुंदर आणि कमाई करणारा वर मिळाला आणि प्रथम पुत्रप्राप्त झाल्यावर निर्जल दुधाची खीर नैवेद्य म्हणून त्या वटवृक्षाला अर्पण करेल असे मनोगत व्यक्त केले होते. 

               चैत्र पौर्णिमेच्या दिवशी तिची दासी पन्ना तिथे साफसफाई साठी जाता तिला सिद्धार्थ गौतम दिसले. तिने हि घटना सुजाताला सांगितली तर स्वतः सुजाता तिथे सोन्याच्या पात्रात खीर घेऊन आली व सिद्धार्थ गौतमाने ती स्वीकारली. 

             सुजातकडे १००० गायी होत्या. तिने त्या सर्वांना गोड वालमी खायला घालत. त्यामुळे त्या गायींचे दूध अधिक गोड आणि पौष्टिक येत. त्या १००० गायींचे दूध ५०० गायींना, ५००चे २५० गायींना असे करून शेवटी ८ गायींना ते दूध पाजले. आणि ती खीर ह्या ८ गायींच्या दुधापासून बनवली गेलेली होती.

सिद्धार्थ गौतमाचे हे शेवटचे अन्न ग्रहण होते ज्ञान प्राप्ती पूर्वीचे. हा दिवस चैत्र पौर्णिमा इ. स. पू. ५२८ चा होता. संबोधी प्राप्ती नंतर स्वतः भगवान बुद्ध सुजाताला भेटण्यासाठी सेनानी गावी आले आणि तिला दिक्षा दिली.

           बौद्ध इतिहासात सुजाताला व तिच्या खिरीला अनन्य साधारण महत्व आहे.


सर्व उपासक/उपासिकाना चित्तमासो पौर्णिमेच्या हार्दिक सदिच्छा.


                     *जय भीम...!*

                     *जय भारत...!*

                     *नमो बुद्धाय...!*

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम - प्रश्न ५९

 *_प्रश्न ५९ - या ज्योतिष्यांनी सांगितल्याप्रमाणे अनेक महत्त्वाच्या घटना अचूक ठरल्या आहेत. ज्योतिष शास्त्र असल्याचाच हा पुरावा नव्हे काय?_* 


 *उत्तर*  👉  नव्हेच. एखाद्या ज्योतिषाने अचूकपणे सांगितलेल्या काही भविष्याच्या आधारे ज्योतिष हे अजिबात शास्त्र ठरत नाही. किती घटनांचे भविष्य वर्तवले गेले व त्यापैकी किती अचूक आले याचे प्रमाण पाहणे आवश्यक आहे. फक्त बरोबर आलेल्या भविष्यांच्या आधारे शंभर टक्के गुणांची होणारी मागणी हास्यास्पद आहे.

   

             यात अनेक गमती असतात. धर्मयुग या नामवंत हिंदी पाक्षिकाने १९७८ साली इंदिरा गांधींना पुन्हा राजकीय भवितव्य आहे काय? असा प्रश्न देशातील त्यांच्या मते नामवंत अशा सात ज्योतिष्यांना विचारला होता. सहा जणांचे उत्तर नकारार्थी होते. पण फक्त शाहू मोडक यांचे उत्तर होकारार्थी होते. शाहू मोडकांच्याबरोबर ‘ज्योतिष हे शास्त्र आहे काय?’ याबाबत माझी जी चर्चा झाली त्यात त्यांनी स्वतःच्या या अचूकतेचा अभिमानाने उल्लेख केला होता. परंतु त्यांची ही व्यक्तिगत एका निदानाबाबतची अचूकताच एकत्रित विचार केला तर शास्त्र म्हणून फलज्योतिष्याचा फोलपणा उघड करीत नाही काय? त्यांनी अचूक उत्तर दिलेल्या प्रश्नाचे बाकीच्या सहाही ज्योतिषांकडून साफ चुकीचे उत्तर आले, त्याचे काय? दुसरे असे की, ज्योतिष्यास विचारल्या जाणाऱ्या अनेक प्रश्नांना फक्त दोनच उत्तरे असतात. उदा. लग्न होणार की नाही? संतती होणार की नाही? पुत्रयोग आहे की नाही? नोकरी मिळणार की नाही? परदेशगमनाचा योग आहे का? या व या स्वरूपाच्या अनेक प्रश्नांचे उत्तर होय वा नाही असे असते. हे प्रश्न त्या त्या व्यक्तीच्या जीवनात त्याला फार महत्त्वाचे वाटत असतात. आता दोन ज्योतिष्यांनी या प्रश्नांना ठरवून एकाने होकारार्थी व एकाने नकारार्थी उत्तर दिले, तर प्रत्येकाची काही भाकिते शंभर टक्के खरी येणार आणि बरोबर ओळखण्याचाच प्रचार करण्याची मनोवृत्ती लक्षात घेतली तर त्यांना भविष्य अचूक सांगता येते असाही त्यांचा लौकिक निर्माण होणार! परंतु यावरून ज्योतिष शास्त्र ठरत नाही.

   

           नामवंत ज्योतिष्यांनी सांगितलेली गेल्या दहा वर्षांतील प्रमुख भविष्ये घेऊन तपासली तर हे नामवंत म्हणून गणले जाणारे तज्ज्ञ किती चुकले आहेत, हे लगेच सिद्ध होते. सत्याहत्तर साली आणीबाणी उठवून ज्या निवडणुका झाल्या, त्यात न भूतो न भविष्यति असा कौल भारतीय जनतेने दिला. ज्योतिष्यांना या बदलत्या ग्रहस्थितीची कल्पना कधी येणार? (त्यांचे व्यावहारिक ठोकताळे कमी वा जास्त फरकाने परंतु नेहमीप्रमाणे काँग्रेस सत्तेवर येणार असे होते) तरुण भारत २७ मार्च १९७७ च्या अंकात श्री. चं. पं. भिशीकर यांनी निवडणुकीत भविष्ये सांगणारी पोतडी उघडली. त्यातली बहुसंख्य भविष्ये कोसळलेली आढळली.

   

            इतःपरही आपण अचूक भविष्य कथन करतो व केले आहे असा कोण्या ज्योतिष्याचा दावा असेल, तर त्यांची चाचणी घेण्यास अंधश्रद्धा निर्मूलन समिती सदैव तयार आहेच.


 *-डॉ. नरेंद्र दाभोलकर व प्रा. प. रा. आर्डे यांनी लिहिलेल्या 'अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम' या पुस्तकातून साभार* 


https://mikamblemahesh.blogspot.com/

Sunday, 25 April 2021

अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम - प्रश्न ५८

 *_प्रश्न ५८ - तज्ज्ञ डॉक्टरांची निदाने चुकतात. हवामान खात्याचे अंदाज फसतात. मग ज्योतिषाचेच १००% बरोबर यावयास हवे या आग्रहाला काय अर्थ आहे?_* 


 *उत्तर*  👉  तज्ज्ञ डॉक्टरांची निदाने चुकतात हे सरधोपट विधान बरोबर नाही. समजा, पाच खोल्यात पाच तज्ज्ञ डॉक्टर बसविले. त्यांना विषमज्वराचे निदान ज्यावरून होईल असा रक्ताच्या तपासणीचा रिपोर्ट दाखविला, क्षयाचे निदान उघड असेल अशा रुग्णाच्या फुप्फुसाचा एक्स रे दाखवला, काविळीचा दोष असलेली लघवी दाखविली तर सर्व तज्ज्ञ डॉक्टर त्याच्या आधारे रुग्णाबद्दलचे जे निदान करतील ते एकाच असेल. किंबहुना जगभरच्या वेगवेगळ्या ठिकाणच्या तज्ज्ञ डॉक्टरांना या तपासण्या दाखविल्या तरी तेच उत्तर येईल. *कारण वस्तुनिष्ठपणे सिद्ध झालेल्या व शास्त्र म्हणून मान्यता मिळालेल्या निकषांच्या आधारे हे निष्कर्ष काढले जातात. म्हणूनच वैद्यक हे शास्त्र आहे, व त्याची मान्यताप्राप्त पदवी मिळालेली व्यक्ती कोठेही व्यवसाय करू शकते.*

   

            तज्ज्ञ डॉक्टरांची निदानेही चुकतात वा त्यांच्यामध्ये मतभिन्नताही असते हे खरे आहे. परंतु ती वेगळी का आहेत याची कारणमीमांसा मांडली जाते व त्याप्रमाणे चिकित्सेने वा संशोधनाने या चुका दुरुस्त केल्या जातात. विज्ञानाच्या वाढत्या विस्ताराबरोबर अधिकाधिक  निदाने अचूक येण्यास सुरुवात होते. हवामान खात्याचा अंदाज हा पूर्वी उपहासाचा विषय होता. उपग्रहाद्वारे माहिती मिळू लागल्यावर परिस्थितीत बराच बदल झाला आहे.

   

         शास्त्राचा दावा करणाऱ्या भविष्याबद्दलची स्थिती काय आहे? पाच खोल्यांमध्ये स्वतःला तज्ज्ञ समजणारे पाच ज्योतिषी बसविले व त्यांना एकच पत्रिका देऊन भविष्य मांडण्यास सांगितले, तर ते देखील एकसारखे येणार नाही मग ते अचूक येणे तर दूरच राहिले. (ती एकसारखी व अचूक येतील असा दावा असल्यास त्याची चाचणी घेण्यास अंधश्रद्धा निर्मुलन समिती सदैव तयार आहे.) दुसरे म्हणजे, ज्या पायाभूत सिद्धांताच्या गृहीतांच्या आधारावर भविष्याची शास्त्र म्हणून मांडणी केली जाते, तो पायाही अवैज्ञानिक आहे. पृथ्वीला सूर्यकुलाचा केंद्रबिंदू मानणे, राहू, केतू, चंद्र यांना ग्रह समजणे, जन्मवेळ कोणती म्हणावी याबद्दल एकवाक्यता नसणे, कसलाच वैज्ञानिक आधार नसलेले गुणधर्म ग्रहांना चिकटविणे, सूर्याला ग्रह समजणे असे अनेक घोटाळे आहेतच. त्याबरोबरच *‘फलज्योतिषांचे थोतांड’ या आपल्या मार्च १९८२ च्या किर्लोस्करच्या लेखात नामवंत शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांनी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे.* ‘पृथ्वी ज्या धुरेभोवती फिरते ती धुरा हळूहळू आपली दिशा बदलते आहे. ह्या धुरेच्या उत्तरेला सध्या ध्रुवतारा आहे. इसवी सनापूर्वी ३००० वर्षे ह्या काळात हीच धुरा ध्रुवात (अल्फा ड्रायकोनीस) ताऱ्याकडे उत्तर म्हणून बोट दाखवत होती तर आणखी ११ हजार वर्षांनी ही धुरा व्हेगाकडे वळलेली असेल’ सव्वीस हजार वर्षांनी ह्या धुरेचे एक आवर्तन पूर्ण होते. 


          ज्याप्रमाणे पृथ्वीच्या निरीक्षकाकरता ध्रुव तारासुद्धा आपली दिशा बदलतो, त्याप्रमाणे इतर तारेपण दिशा बदलतात. त्यामुळे राशीचक्र आणि तारे यांच्यात पण तफावत वाढत जाते. विषुववृत्तावरील राशीचक्र आणि आधुनिक तारका-समूहांच्या सीमा यांच्यातील आजकालची तफावत ज्या काळी राशींना नावे देण्यात आली, तेव्हापासून आतापर्यंत एका घराइतकी झाली आहे. उदाहरणार्थ, जे तारका समूह वृषभ राशीत आहेत असे म्हणतो ते खरोखर आता मिथुन राशीत गेले आहेत. ह्या तफावतीला फलज्योतिषात काय उत्तर आहे? मूळ नक्षत्रे आहेत त्यानुसार आकाशाचे भाग करायचे, की दोन हजार वर्षांपूर्वी ते जिथे दिसत होते त्यानुसार हे भाग ठरवायचे? जॉ क्लॉड पेकेयर या खगोल शास्त्रज्ञाने आणखी एक मुद्दा मांडला आहे. ध्रुव प्रदेशाच्या जवळच्या देशातही लोक राहतात. (मग ते उत्तर ध्रुव असो वा दक्षिण ध्रुव) जन्माला येतात. परंतु वर्षातील काही काळ येथे ग्रह दिसत नाहीत. उदाहरणार्थ, रशियातील मुर्मारक शहरातून वर्षातून सहा महिने राशीग्रह, राशी चक्रातील तारे दिसू शकत नाहीत. ह्या काळात जन्मलेल्यांच्या कुंडल्याच असू शकणार नाहीत. त्याचा अर्थ काय त्यांना भवितव्यच नाही? तेव्हा वैद्यकशास्त्र व हवामान खात्याचे अंदाज यांच्याशी तुलना करण्याचा ज्योतिषांचा हा अट्टहासच मुळी खोटा, फोल व चुकीच्या पायांवर आधारित आहे.


 *-डॉ. नरेंद्र दाभोलकर व प्रा. प. रा. आर्डे यांनी लिहिलेल्या 'अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम' या पुस्तकातून साभार* 


https://mikamblemahesh.blogspot.com/

Saturday, 24 April 2021

अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम - प्रश्न ५७

 *_प्रश्न ५७ - अचूक जन्मवेळेवरून तुम्हांला कुंडली मांडता येते का? ती येत नसल्यास ज्योतिष हे शास्त्र नाही हा आरोप कशासाठी?_* 


 *उत्तर*  👉  या प्रश्नातील खोच लक्षात घ्यावयास हवी. जसे वैद्यकीय, अभियांत्रिकी ही शास्त्रे आहेत तसेच ज्योतिष हे एक शास्त्र आहे. वेगवेगळ्या व्यक्तींना, ज्ञानशाखांना तज्ज्ञता असणार. त्यामुळे कोणीच दुसऱ्या ज्ञानशाखेतील व्यक्तींना हिणवू नये. कारण त्यांना त्या विषयाबद्दल काही कळत नसते. ज्यांना साधा रक्तदाब मोजता येत नाही त्यांना जसे वैद्यकीय शास्त्राबद्दल बोलण्याचा अधिकार नाही, ते अज्ञानाचे द्योतक होईल तसेच ज्यांना साधी कुंडली मांडता येत नाही, त्यांनी ज्योतिषाबद्दल बोलू नये; ते चुकीचे ठरेल अशी ही मखलाशी आहे. यामध्ये चलाखी आहे ती अशी, की ज्योतिष हे जणू सिद्ध शास्त्र आहेच असे मानून युक्तिवाद केलेला आहे.

             

             हठयोगाचा अभ्यास नाही तर त्याच्यामुळे सिद्धी प्राप्त होत नाही हे कसे बोलता? वेदाचा अभ्यास नाही, तर यज्ञाने पाउस पडत नाही असे ठाम विधान कसे करता असे विचारण्याच्या प्रकारांपैकीच हा प्रकार आहे.

     

             व्यक्ती अन्य कसलीही सुविधा न वापरता केवळ योगसामर्थ्याने पाण्यावरून चालत जाऊ शकत नाही. कारण ते ज्ञात वैज्ञानिक नियमांच्या विरुद्ध आहे. चार समिधा आणि धनधान्य, तूप मंत्राग्नीसह जाळून पाऊस पडत नाही; कारण पाऊस का पडतो याची सुसंगत माहिती आता उपलब्ध आहे. त्यांपैकी कोणतीच गोष्ट या अशा यज्ञाने घडून येते असे मानायला जागा नाही. ‘ग्रहांच्या आधारे सांगितल्या जाणाऱ्या भविष्याबद्दल नेमकी अशीच स्थिती आहे. *_कुंडलीचा मुळात पायाच अशास्त्रीय आहे. नवग्रहांच्या यादीत सूर्य कसा? तो तर मुळात तारा आहे. चंद्र तर पृथ्वीचा उपग्रह आहे. माणसाच्या सर्व जीवनात अत्यंत महत्वाचा असणारा ग्रह ज्यावर त्याचे अस्त्वित्व उभे राहते त्या पृथ्वीचा समावेश कुंडलीत का नाही? याचे उत्तर देण्यात येते, की पृथ्वी सूर्यमालेचा एक केंद्रबिंदू आहे. पृथ्वी सूर्यमालेचा केंद्रबिंदू आहे असे मानणे म्हणजे कोपर्निकस, केप्लर पासून हॉईल -नारळीकरांच्यापर्यंत सर्वांना एका झटक्यात मोडीला काढणे व शास्त्राच्या सर्वमान्य सिद्धांताची उलटापालट करणे._* या ग्रहांत मानवात आढळणारे सत्त्व, रज, तम गुण कोठून आले? चंद्र शीतल प्रकाश देतो म्हणून सात्विक, तर पृथ्वी विलयाला नेऊ शकेल इतके ज्याचे रूप जहाल तो रवि सात्विक कसा? शुक्र स्त्रीलिंगी का? शनि व बुध नपुंसक का? साडे एकोणतीस वर्षांच्या शनीच्या परिभ्रमणात तो साडेसात वर्षेच पीडा का देतो? कुंडली मांडण्याची गरजच नाही. सध्या कार्यकारण भावानेही ज्योतिषाचा शास्त्र म्हणून फोलपणा स्पष्टपणे समजू शकतो.

  

        *_अचूक जन्मवेळेप्रमाणे कुंडली मांडतात पण गंमत अशी की, जन्मवेळ अचूक कोणती याबाबत तज्ज्ञांत एकवाक्यता नाही, खरेतर मूल जन्मते त्या वेळी मातेच्या उदरात स्त्रीबीज व पुरुष बीजाचे मिलन होते. पण ती वेळ कशी समजणार? मुलाचा जन्म म्हणजे रॉकेटचे उड्डाण नव्हे, पहिल्यांदा त्याचे डोके बाहेर येते. नंतर क्रमाक्रमाने शरीर, यात काही वेळ जातो. काही वेळा पायाकडून मूल जन्मते. बाहेर आलेले अर्भक श्वास घेते. नाळ कापून आईपासून बाळाला बाजूला केले जाते. यापैकी कोणता क्षण अचूक जन्मवेळ मानायचा? औषधे देऊन, प्रसूती वेदना वाढवून प्रसूती आधी करता येते. सिझेरिनचे ऑपरेशन ठरवून करता येते. डॉक्टरांनी इच्छेनुसार घडवलेल्या या गोष्टींनी जन्मवेळ काही तासांनी वा दिवसांनी बदलते. मग फटक्यात मुलाचे सर्व भविष्य बदलून जाते काय?_*

   

          कोणी असा दावा करेल की, ज्योतिष अनुभवाच्या आधारे बेतलेले शास्त्र आहे. अमुक ग्रहस्थितीत अमुक घटना घडतात हे खरे. कशाने घडते माहीत नाही. त्याचे कार्यकारणभाव आजच्या विज्ञानाला ज्ञात नाहीत. क्षणभर हेही खरे मानू. परंतु या स्वरूपाच्या तपासणीचा तटस्थ पद्धतीने जमवलेला माहितीचा साठा तरी त्यांनी पुढे मांडावयास हवा व त्याच्या वस्तुनिष्ठ चिकित्सेतून ज्योतिषाला शास्त्र ठरविण्यास काही आधार मिळतो हे दाखवून द्यावयास हवे. अन्यथा अचूक जन्मवेळेवरून तुम्हाला कुंडली मांडता येत नसताना ज्योतिष हे शास्त्र कसे म्हणता, हा प्रश्न त्यांनाच हास्यास्पद ठरवत असतो.


 *-डॉ. नरेंद्र दाभोलकर व प्रा. प. रा. आर्डे यांनी लिहिलेल्या 'अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम' या पुस्तकातून साभार* 


https://mikamblemahesh.blogspot.com/

Friday, 23 April 2021

अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम - प्रश्न ५६

 *_प्रश्न ५६- कुंडलीमुळे व्यक्तीला स्वतःच्या जीवनाविषयी काही संभाव्य कल्पना येतात. त्यामुळे तिचे जीवन धोक्यापासून वाचू शकते, बदलू शकते. उदा. मंगळाच्या मुलीबरोबर मंगळ नसलेल्या मुलाने लग्न करू नये. राहू, केतूची अनिष्टता समजणे हे मोठे फायदेच नाहीत काय?_* 


 *उत्तर*  👉  ही मांडणी फसवी आहे. ज्योतिषावर विश्वास ठेवणाऱ्या पण स्वतःला ‘खुल्या’ विचाराचा वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगतो म्हणणाऱ्या व्यक्ती हे प्रतिपादन करतात. त्याचा सारांश असा: काही विशिष्ट आजारांमुळे अन्य तक्रारी उद्भवण्याची शक्यता वाढत जाते. जसे, रक्तदाबाचा त्रास असणाऱ्या व्यक्तीस हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता अधिक असते. प्रत्येक रक्तदाबाच्या रुग्णास तसा त्रास होतोच असे नाही. परंतु रोग्याबाबत संभाव्यता वर्तवण्यास रक्तदाबाची ही पायाभूत माहिती सहायक मार्गदर्शन ठरू शकते. ही मांडणी तर्कसंगत आहे. कारण, यामध्ये गृहीत धरलेला पाया हा वैद्यकीय शास्त्राबद्दल खरा आहे. परंतु ज्योतिषाबाबत त्याला कोणताच वैज्ञानिक आधार नाही. अमुक ग्रहाच्या वा ग्रहसमूहांच्या स्थितीचा इष्ट वा अनिष्ट असा परिणाम व्यक्तीच्या जीवनावर होतो, यालाही कोणताही संख्याशास्त्रीय वा अन्य वैज्ञानिक पुरावा नाही. वधू-वरांच्या पत्रिकेत अमुक प्रकारे ग्रहस्थिती असल्यास लग्न करू नये असे सांगितले जाते. तशी लग्नं केल्यास अयशस्वी होतील, संतती होणार नाही, वैधव्य प्राप्त होईल अशा संभाव्यता वर्तवल्या जातात. त्याला काडीचाही आधार नाही. *याबाबत सव्वाशे वर्षांपूर्वी महात्मा ज्योतिबा फुलेंनी विचारलेला सवाल परखड आहे. मुहूर्त पाहून आणि छत्तीस गुण जमवून होणाऱ्या आमच्या लग्नात नंतर मोठ्या संख्येने बायकांना वैधव्य भोगावे लागते आणि मुहूर्त न पाहता, पत्रिका न मांडता केलेली लग्ने, इंग्रजांच्या जोडप्यांनी मांडलेला संसार मात्र सुखाचा होतो हे कसे, असा ज्योतीबांचा सवाल होता.* अर्थ स्पष्ट होता. भारतात बालमृत्यूचे प्रमाण त्या काळात खूपच जास्त होते त्यामुळे स्त्रियांना बालवैधव्यही अटळ होते. तो टाळण्याचा उपाय होता, लग्ने प्रौढ वयात करणे.

    

            (तो अस्तित्वात असल्यामुळेच इंग्रजांत पत्रिका न बघताही वैधव्याचे प्रमाण कमी होते.) 

            याउलट पत्रिकेवरून स्त्रीला दीर्घ वैवाहिक सुख आहे, असा तर्क काढून केलेले विवाहदेखील स्त्रीला वैधव्यापासून वाचवू शकत नव्हते, कारण त्याचा संबंध पत्रिकेशी नव्हता, तर प्रचंड प्रमाणातील बालमृत्यूशी होता. पाया चुकीचा धरून संभाव्यता वर्तवली तर निष्कर्ष चुकीचे निघतात ते असे!


          पाया चुकीचा आहे हे तर आता स्पष्टच झाले आहे. *मंगळाची भरपूर माहिती खगोलशास्त्रात उपलब्ध आहे. त्याच विवाहाशी काय संबंध येतो? धुमकेतू काय आहे हे आता समजले आहे. त्याचा शकून–अपशकुनाशी जोडण्याची काय गरज? राहू, केतू हे तर अस्तित्वात नाहीत, तर त्यांच्या वक्रदृष्टीचे भय कशासाठी?*


 *-डॉ. नरेंद्र दाभोलकर व प्रा. प. रा. आर्डे यांनी लिहिलेल्या 'अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम' या पुस्तकातून साभार* 


https://mikamblemahesh.blogspot.com/

Thursday, 22 April 2021

अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम - प्रश्न ५५

 *_प्रश्न ५५- ज्योतिषामुळे संकटात असलेल्या माणसांना काही काळ तरी दिलासा वाटतो. त्याची मानसिकता सावरण्यास मदत होते. तुमचे शास्त्र त्याला या स्वरुपाची मदत करू शकत नसताना ज्योतिषशास्त्रावर आगपाखड कशासाठी?_*


 *उत्तर*  👉  संकटात असलेली व्यक्ती निराश, हताश झालेला माणूस आधाराच्या शोधात असतो. प्रयत्न करूनही मनाजोगते यश लाभले नाही, तर आपल्या हाताबाहेरच्या शक्तीवर त्याची जबाबदारी टाकल्याने त्याला दिलासा वाटतो. ‘माझी काय चूक? ग्रहस्थितीच विपरीत होती; ती काही काळाने बदलेल व मला पुन्हा चांगले यशाचे दिवस येतील’ असे तो स्वतःला बजावतो. फलज्योतिष त्याला हा आधार व उभारी देते, असा भविष्याला शास्त्र म्हणवून घेणाऱ्यांचा दावा असतो. काही माणसांच्या त्रस्त मनाला ज्योतिष हा आधार देत असेलही परंतु ही उपयुक्तता मानली तरी ज्योतिष फार तर माणसाच्या मनाला काही काळ काळजी विसरायला लावेल. परंतु कोऱ्या कागदाच्या कपट्यापासून नोटा करणारा जादूगार हा आपल्या आर्थिक विवंचनेवर इलाज करेल हे समजणे, आणखी त्याच्याकडे संपत्ती निर्मितीचे शास्त्र आहे असे समजून त्याच्या मागे लागणे या मूर्खपणा एवढाच ज्योतिषाकडे खऱ्या आधारासाठी वळवण्यात आहे. माणसाच्या मनाला काही काळ दिलासा देणारे हे सामर्थ्यदेखील उपकारकच आहे, असे म्हणता येणार नाही. ग्रहस्थिती बिघडल्याने वारंवार आजारपण येते. एक वर्षाने ग्रहस्थिती बदलेल व मग निरोगी आयुष्य मिळेल हे भविष्य सतत आजारी पडणाऱ्याला वर्षभर मानसिक बळ टिकवून धरायला मदत करेल असे नाही. त्याचा विपरीत परिणामही घडू शकेल. भविष्यावर पूर्ण विश्वास ठेवणारी व्यक्ती आपल्या आजाराचे कारण ग्रहस्थिती मानून उत्तम तज्ञांकडून सर्व तपासणी करून घेण्याचे टाळेल व मग वर्षभराने वेळीच निदान व्हावयास हवे होते, ते न झाल्याने जीवाशीही खेळ होऊ शकेल. 


             मुलीच्या पत्रिकेत अजून तीन वर्षे विवाह योग नाही असे समजल्यावर वधू-पिता वा ती स्वतः तीन वर्षांनी तरी विवाह जमेल या आशेने उभारी घेण्याऐवजी त्यामुळे मोडून पडणेही शक्य आहे. तेव्हा कला म्हणूनही व्यक्तीवर कोणता परिणाम होईल याची खात्री नाही. त्यामुळे ज्योतिष शास्त्रावर आगपाखड एवढ्याचसाठी, की ते शास्त्राचा दावा करून संकटातल्या माणसाला मार्गदर्शन करते आणि त्याची चिकित्सा केली की, व्यक्तीला आधार देणारी कला म्हणून स्वतःची उपयुक्तता सांगते. हा अंतर्विरोध आहे. 


          *डॉ. वि. म. दांडेकरांनी ‘कुंडली संग्रह – एक अभ्यास’* या पुस्तकाच्या प्रस्तावनेत लिहिले आहे “लौकिक जीवनातील यशापयशाची कारणमीमांसा न कळल्याने मन कुंठीत झाले, म्हणजे जातक निदानाने समाधान लाभते. अपयशाने पराभूत झालेल्या मनाला दिलासा मिळतो. त्यात संशोधनाची कालवाकालव नको, ही व्यावसायिक व्यवहारदृष्टी झाली. त्यात शास्त्रबुद्धी नाही. अशाने शास्त्र प्रगत होत नाही.”

प्रत्यक्ष शास्त्र तर नाहीच, पण निश्चितपणे आधार देणारी कला म्हणणेही शक्य नाही. अशी फलज्योतिषाची स्थिती आहे.


 *-डॉ. नरेंद्र दाभोलकर व प्रा. प. रा. आर्डे यांनी लिहिलेल्या 'अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम' या पुस्तकातून साभार*


https://mikamblemahesh.blogspot.com/

Wednesday, 21 April 2021

अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम - प्रश्न ५४

 *_प्रश्न ५४- भविष्यशास्त्राला हजारो वर्षांचा जगभराचा इतिहास आहे, अशा उपयुक्त शास्त्राने माणसाचे जीवन सुखी होणार नाही काय?_* 


 *उत्तर*  👉  मानवाने आपल्या आदिम अवस्थेत आकाशात चमचमणारे तारे पहिले. ती त्याला देवाची निवासस्थाने वाटली. मानवाला दिवसा प्रकाश मिळावा व रात्री शीतल चांदणे मिळावे यासाठी आकाशातल्या बापाने ही झुंबरे नभात लटकवली आहेत, असाही उल्लेख बायबलात आढळतो. या उघड्या डोळ्यांनी दिसणाऱ्या ग्रहगोलांचे माणसांनी दीर्घकाळ, शतकानुशतके निरीक्षण केले. त्यांच्या गतिबद्धतेचे गणित मांडले. पृथ्वीवरील घडामोडींशी आपल्या बुद्धीप्रमाणे त्यांचा संबंध जोडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मानवी संस्कृतीच्या सुरुवातीच्या कळत खगोलशास्त्र, गणित व फलज्योतिष या तिन्ही बाबी हातात हात घालून नांदल्या.

पुढे परिस्थिती पूर्णपणे बदलली. खगोलशास्त्र हे एक स्वतंत्र शास्त्र  म्हणून पुढे आले. रात्री चमचमणारे आकाशातील ग्रह कोणते, तारे कोणते, त्यांची अंतरे काय, त्यांच्या गती कोणत्या, त्यांचे  परिणाम काय, याबद्दल प्रचंड माहिती पुढे आली. वैज्ञानिकदृष्ट्या ती मान्य झाली. ही घोडदौड आजही चालू आहे. गणित तर एक स्वायत्त विज्ञान शाखाच बनलीय. परंतु अडचण झाली ती फलज्योतिष्याची. नवग्रहातील ग्रहताऱ्यांचे भौतिक स्वरूप माणसाला समजू लागल्यावर अमका ग्रह वा तारा, तमक्या गुणाचा वा प्रवृत्तीचा कारक आहे, याला काडीचा अर्थ राहिला नाही. भविष्यशास्त्राच्या हजारो वर्षांच्या इतिहासाचा दाखला जेव्हा दिला जातो व मान्यता मागितली जाते, त्या वेळी हा सर्व संदर्भ नजरेसमोर आल्यावर काय दिसते? फलज्योतिष हे शास्त्र नाहीच. परंतु हजारो वर्षांचा संस्कार व स्वतःच्या भविष्याबद्दलची दुर्दम्य जिज्ञासा त्यामुळे व्यक्तीला फलज्योतिषाबाबत कुतूहल असते. याचा आधार घेऊन त्याची उपयुक्ततता माणसाचे जीवन अधिक सुखी करण्यासाठी वापरण्यास काय हरकत आहे, असा प्रश्न विचारला जातो. या ठिकाणी दोन महत्त्वाचे प्रश्न उपस्थित होतात. एकतर लोकांना बरे वाटते, आधार मिळावा यासाठी आम्ही ज्योतिष वापरतो असा प्रयत्न कोणी केल्यास मनाला समाधान व आनंद देणारी कला एवढेच फार तर ज्योतिषाबद्दल म्हणता येईल. शास्त्र हा त्याचा दावाच रद्द होतो. दुसरे असे, की माणसाला या पद्धतीने येणारे समाधान हे प्रसंगी त्याला तात्पुरते समाधान देणारे असेलही; परंतु व्यक्तीच्या स्वतःच्या वा कुटुंबियांच्या जीवनात त्याचा दीर्घकाळ तोटा होण्याची शक्यता असते. ‘ग्रहदशा अतिशय चांगली. चिंताच नको. रुग्ण हमखास बरा होणार’ असा सल्ला पत्रिका पाहून मांडून देणारा ज्योतिषी रुग्णाला व त्याच्या कुटुंबियांना पुढील आघात व त्याबद्दल घ्यावयाची काळजी याबद्दल गाफील करत असतो. या उलट ग्रहस्थिती बिघडली आहे, काहीही होऊ शकेल असे सांगणारा भविष्यवेत्ता अकारण घाबरवून टाकत असतो. याने ना माणसाच्या जीवनाला शास्त्रीय दृष्टीने मदत व मार्गदर्शन मिळते, ना माणसाचे जीवन अधिक सुखी बनते.


 *-डॉ. नरेंद्र दाभोलकर व प्रा. प. रा. आर्डे यांनी लिहिलेल्या 'अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम' या पुस्तकातून साभार* 


https://mikamblemahesh.blogspot.com/

Tuesday, 20 April 2021

अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम - प्रश्न ५३

 *_प्रश्न ५३ - बहुतेक सर्व सुशिक्षित लोक, समाजातील मान्यवर मंडळी भविष्यावर विश्वास ठेवतात. असं भविष्यशास्त्र नाकारण्याचे कारणच काय?_* 


 *उत्तर* 👉 भविष्य हे शास्त्र म्हणून नाकारण्याचे कारण हेच की ते शास्त्र नाही. शास्त्र म्हणून सिद्धता मिळण्यासाठी ज्या विविध कसोट्या एखाद्या विषयाला पूर्ण कराव्या लागतात, त्या भविष्याने कधीच दिलेल्या नाहीत. त्याल उतरणे तर दूरच राहिले.


               अशा वेळी ज्याचा हमखास आधार घेतला जातो ते प्रतिपादन म्हणजे लहानथोर अशिक्षित, सुशिक्षित, गरीब-श्रीमंत, ग्रामीण, शहरी, गल्लीपासून दिल्लीपर्यंत बहुसंख्य स्त्रीपुरुष भविष्य बघतात. इतक्या व्यापक प्रमाणात लोकांची मान्यता लाभलेली गोष्ट खोटी कशी असेल?


           लोक भविष्य का बघतात आणि ज्योतिष शास्त्र आहे का, या दोन बाबी पूर्णपणे वेगळ्या आहेत, हे प्रथम लक्षात घ्यायला हवे.

भविष्यकाळातील घटनांच्याबद्दल मानवी मनाला स्वाभाविक कुतूहल सदैव वाटत आले आहे. भविष्यकाळात आपल्याला अनुकूल ते घडावे किंवा घडेल या आशेवर व्यक्ती सतत आजचे ताण-तणाव, वैफल्य, सोशीत  असते. हे घडणे वा न घडणे त्या व्यक्तींच्या हाताच्या सर्वस्वी बाहेर असलेल्या अनेक भौतिक घटनांशी, सामाजिक व्यवस्थेशी संबंधित असते. याचा पूर्ण उलगडा व्यक्तीला होणे, अशक्य असते. अशा वेळी भविष्यात आपल्याला चांगले दिवस येणार आहेत हा दिलासा ज्योतिषामुळे माणसाला मिळतो. (कोणत्याही वास्तवाचा आधार नसलेली ) भविष्य काळातील सुखसमाधान या आकांक्षापूर्तीची कल्पना या माणसाच्या मनाला भुरळ पाडते. त्यामध्ये तो रमतो. भविष्यावर विश्वास ठेवण्याची मानसिकता ही अशी असते. बहुसंख्यांच्या बाबतीत हा आशावाद खरा ठरत नाही. परंतु त्यामुळेही ती आशा बाळगणे ते सोडत नाहीत. आशा ही एक अद्भुत साखळी आहे की, ज्याने बांधून ठेवले असताना माणूस पळत असतो व जी सोडली असताना माणूस पांगळ्याप्रमाणे निश्चल होतो. हे संस्कृत सुभाषित बहुतेकांच्या बाबतीत खरेच ठरते. भविष्यकाळात प्रत्यक्ष अपेक्षित न घडता विपरीतच घडले, तरी त्या पूर्वप्राक्तनामुळे वा सध्याच्या जन्मातील पापामुळे वा अशुभ ग्रहस्थितीमुळे घडून आल्या असे मानले जाते. मुळातच पाया नसलेल्या अनुमान पद्धतीला ते भविष्यशास्त्र आहे असे समजले, यातच आपली चूक होत आहे, हे समजावून घेतले जात नाही वा दिले जात नाही. परंतु वास्तवाचा, वस्तुनिष्ठ तपासणीच्या कसोटीचा आधार नसलेल्या फलज्योतिषावर बहुसंख्यांचा विश्वास आहे. यामुळे केवळ त्याला शास्त्राचा दर्जा प्राप्त होत नाही. विज्ञानाचे निर्णय हे बहुमत-अल्पमत असे संख्या बळावर लागत नसतात.


 *-डॉ. नरेंद्र दाभोलकर व प्रा. प. रा. आर्डे यांनी लिहिलेल्या 'अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम' या पुस्तकातून साभार* 


https://mikamblemahesh.blogspot.com/

Monday, 19 April 2021

अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम - प्रश्न ५२

 *_प्रश्न ५२ - कडेगाव (ता.खानापूर) जि. सांगली या गावी प्राथमिक शाळेतील मुलींच्या डोळ्यांतून बारीक-बारीक खडे येत होते, विज्ञानवादी कार्यकर्त्यांनी हा प्रकार थांबविण्याचा प्रयत्न केला, तरी मुलींच्या डोळ्यांतून खडे कसे येत राहिले?_* 


 *उत्तर*  👉  कडेगाव येथे ता. १७ फेब्रुवारी १९८८ रोजी तनुजा माने हिच्या डोळ्यांतून हे खडे येणे चालू झाले. तनुजाला शाळेत न पाठवता घरीच थांबवल्यावर त्याचे प्रमाण कमी झाले. तनुजा आपल्या आजोळी (आईच्या वडिलांकडे) आईला सोडून राहत असे. तिला तिच्या आईकडे पाठवल्यावर खडे येणे बंद झाले. मार्चच्या पहिल्या आठवड्यात तनुजा परत आली. पुन्हा तनुजाच्या डोळ्यांतून खडे येणे चालू झाले. आणि त्याबरोबरच वर्गातील आणखी आठजणींच्या डोळ्यांतून खडे येऊ लागले. १३ मार्च १९८८ ला ही बातमी ठळकपणे वृत्तपत्रांत झळकली आणि १५ मार्चला त्या गावी मी व आमच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या चौकशी पथकाने भेट देऊन हा प्रकार उघडकीस आणला. डोळ्यांमध्ये मुली खडे का घालत होत्या, कशा घालत होत्या, यामागचे सत्य पुढे आणले. पुन्हा हा प्रकार करणार नाही अशी त्यांची लेखी कबुली त्यांच्या मुख्याध्यापकांच्यासमोर मिळवली. दुपारी गावात सभा घेऊन ग्रामस्थांनाही हा प्रकार समजावून सांगितला. याबद्दलचा विस्तृत लेख ता. २० मार्च १९८८ च्या रविवार सकाळमध्ये आला आहे.

                ग्रामस्थांच्या सभेतच पथकामधील ख्यातनाम मानसोपचार तज्ञ डॉ. प्रसन्न दाभोलकर यांनी भानामती प्रकारामागची मानसिक बाजू समजावून सांगितली होती व “काही मुली कदाचित अधूनमधून हा प्रकार किंवा दातखीळ बसणे, चक्कर येणे यांसारख्या बाबी करतील. त्याची चिंता, चर्चा वा काळजी करू नका. मुलींना दटावून वा खोदून खोदून तेच ते विचारू नका. फक्त दुर्लक्ष करा. हे प्रकार आपोआप थांबतील आणि तसेच वाटले तर केव्हाही मुलींसह सातारला या.” असे सांगितले होते.

             याप्रमाणेच घडले. क्वचित एखाद्या मुलीच्या डोळ्यांतून एखादा-दुसरा खडा काही काळ येत राहिला. आम्ही भानामती हुडकणे व संपवणे हे गावातील काही जणांना आवडले नव्हते. त्यांचे त्यात काही हितसंबंध होते. त्यांनी भानामती बंद झालीच नाही, अशी पत्रे वृत्तपत्रांना पाठवली. पुणे सकाळने त्यासाठी विजय साळुंखे यांना विशेष प्रतिनिधी म्हणून पाहणीस पाठवले. भानामतीचा आम्ही घेतलेला शोध पूर्णपणे योग्य व परिणामकारक आहे, असाच निर्वाळा त्यांनी दिला. त्यानंतर हे उरलेसुरले प्रकारही थांबले. त्यामुळे विज्ञानवादी कार्यकर्त्यांनी तपासणी केल्यावरही डोळ्यांतून खडे येण्याचे प्रकार घडतच राहिले, हे पूर्णपणे असत्य आहे. प्रत्यक्षात नेमके उलटे घडले आहे.


 *-डॉ. नरेंद्र दाभोलकर व प्रा. प. रा. आर्डे यांनी लिहिलेल्या 'अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम' या पुस्तकातून साभार*


https://mikamblemahesh.blogspot.com/

Saturday, 17 April 2021

अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम - प्रश्न ५०

 *_प्रश्न ५० - मनोविकृत व्यक्ती भानामतीसारखे प्रकार करतात, असे मी ऐकले आहे. यावर उपाय काय?_* 


 *उत्तर*  👉 तिरस्कृत वैफल्यग्रस्त व्यक्ती भानामतीच्या नावाने घटना घडवते हे खरे आहे. या पद्धतीने त्रास निर्माण करून लोकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करणे, लोकांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेणे हे चुकीचे असल्याने या स्वरूपाचे वागणे त्या अर्थाने मनोविकृत समजावयास हवे. *(भानामती घडवणारी व्यक्ती मनोरुग्ण असतेच असा मात्र याचा अर्थ नव्हे.)* यावर उपाय खालीलप्रमाणे-


*१.* भानामतीचे प्रकरण नीट तपासून संबंधित कोणती व्यक्ती ते करत आहे, याची खात्री करून घ्यावी.


*२.* संबंधित व्यक्तीस हे प्रकार न करण्याबद्दल योग्य त्या प्रकारे समज द्यावी. अनेकदा ही समज पुरते.


*३.* आवश्यक वाटल्यास मानसोपचार तज्ञाला तिला दाखवावे. त्याच्यामार्फत तिचे भूलीखाली मनोपृथक्करण करून त्या व्यक्तीला योग्य ती समज, सूचना देता येते. संमोहनाचा वापरही यासाठी करता येतो.


*४.* भानामतीचे प्रकार करणारी व्यक्ती कोण हे समजल्यानंतर या प्रकरणात त्रास सोसावा लागणारे जवळचे कुटुंबीय त्या व्यक्तीबद्दल रागाची, उपहासाची, छळवणुकीची भूमिका घेण्याची शक्यता असते. यामुळे परिस्थिती पुन्हा बिघडण्याची शक्यता निर्माण होते. त्यासाठी संबंधित व्यक्तीशी कसे वागावे याबाबत मानसशास्त्रीयदृष्ट्या कुटुंबीयांना सूचना देणे गरजेचे व उपयुक्त असते.


*५.* भानामतीचे प्रकार थांबवण्याचे आश्वासन देणारी व्यक्ती क्वचित प्रसंगी ते आश्वासन मोडून पुन्हा तेच वा अन्य प्रकार सुरु करण्याची शक्यताही घरच्यांना सांगून ठेवावी.


*६.* भानामतीचे प्रकार करणाऱ्या व्यक्तीच्या नावाचा गाजावाजा वृत्तपत्रांतून झाल्यास त्याचे दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे भानामतीचे प्रकार थांबवत असतानाच त्याची सनसनाटी प्रसिद्धी टाळणे योग्य ठरते.


 *-डॉ. नरेंद्र दाभोलकर व प्रा. प. रा. आर्डे यांनी लिहिलेल्या 'अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम' या पुस्तकातून साभार*


https://mikamblemahesh.blogspot.com/

Friday, 16 April 2021

अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम - प्रश्न ४९

 *_प्रश्न  ४९ - भानामतीसारखी शक्ती अस्तित्वात असते काय? नसेल तर वस्तुस्थिती काय?_*

*उत्तर*  👉  वस्तू हालवणारी, कपडे पेटवणारी, घरांवर दगड टाकणारी, पैसे गायब करणारी या स्वरुपांची भानामती नावाची शक्ती ही निश्चित अस्तित्वात नसते.

याबाबतची वस्तुस्थिती खालीलप्रमाणे असते.

वरील प्रकारासारखी कोणतीही गोष्ट कार्यकारणभावांशिवाय घडत नाही. या गोष्टी घडण्यामागे कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या – भौतिक, रासायनिक, यांत्रिक स्वरूपाच्या – शक्तीचा हात असतो, वा दिशाभूल व फसवणूकही असू शकते. हे सर्व घडवून आणणारा ‘हात’ हा शोधून काढला, फसवणूक, हातचलाखी उघडी केली की या प्रकाराबाबातची वस्तुस्थिती लगेच समजते.

वस्तुस्थिती अशी असते की, वैफल्यग्रस्त, तिरस्कृत, अपयशी व्यक्ती बहुदा भानामतीच्या मागे असते. हे वैफल्य वा अपयश पचवण्याची त्या व्यक्तिमत्वाची कुवत नसते. हे अपयश प्रत्येक वेळाला त्या व्यक्तीच्या चुकीमुळे आलेले असते असेही नाही. त्यामुळे लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी आपण किती त्रासात आहोत, हे दाखवून लोकांची सहानुभूती व प्रेम मिळवण्यासाठी या आत्मक्लेशाच्या घटना संबंधित व्यक्तींकडून होतात. लोकांची सहानुभूती मिळावी ही भावना स्वाभाविक असली तरी ती मिळवण्याचा हा मार्ग विकृत आहे. अशा व्यक्ती बहुधा मानसिकदृष्ट्या (सायाकॉलॉजिकली) माल अॅडजेस्टेड किंवा विकृत (अॅबनॉर्मल) असल्याने त्या या स्वरूपाचा मार्ग चोखाळतात. वस्तुस्थितीचा महत्वाचा आणखी एक पैलू म्हणजे या स्वरूपाच्या बाबी नेहमी पराचा कावळा करून सांगितल्या जातात आणि प्रत्यक्ष या बाबी घडताना चिकित्सकपणे पाहिलेले कोणीही नसते. आणखी एक महत्वाची वस्तुस्थिती म्हणजे संबंधित व्यक्तीबद्दल , घराबद्दल, तथाकथित भानामतीकडून होणारे वर्तन त्रास उत्पन्न करणारे आहे असे वर-वर वाटले तरी प्रत्यक्षात तसे ते नसते. अंगावरचे कपडे अचानक पेटले असे सांगितले जाते. पण व्यक्ती जबर भाजली असे कधीच होत नाही. कपाटातून वस्तू बाहेर येतात पण सोन्या-चांदीच्या दागिन्यांऐवजी चिल्लर नाणी बाहेर येतात. घरावर दगड येतात, पण घराच्या खिडक्यांच्या काचा कधीच फुटत नाहीत. वस्तू नाहीशी होते पण थोड्याच वेळात, दिवसांत परत मिळते. त्यावरील मालकी कायमची नाहीशी होणार नाही, हे पहिले जाते.

*-डॉ. नरेंद्र दाभोलकर व प्रा. प. रा. आर्डे यांनी लिहिलेल्या 'अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम' या पुस्तकातून साभार* 

https://mikamblemahesh.blogspot.com/

Thursday, 15 April 2021

अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम - प्रश्न ४८

 

*_प्रश्न ४८ - भानामती म्हणजे काय?_*

 

 *उत्तर 👉* 👉अंगावर वा कपड्यांवर बिब्ब्यांच्या फुल्या उठणे, घरातील वस्तू जागेवरून आपोआप हालू लागणे, बंद कपाटातून वस्तू बाहेर येणे, कपडे आपोआप पेटणे, घरात विष्ठा पडणे, पैसे नाहीसे होणे, घरातले पदार्थ कडू, खारट होणे, डोळ्यांतून काचा, खडे, सुया निघणे, या सर्व गोष्टी भानामतीचे प्रताप म्हणून समजल्या जातात.

भानामतीमुळे कधीही चांगले प्रकार घडत नाहीत. भानामातीमुळे विहिरीला पाणी लागले, अपघातातून बचावलो, मुलीचे लग्न जुळले, लॉटरी लागली असे कधीही होत नाही.

मराठवाड्यातला आंध्रप्रदेशच्या जवळ असलेला भाग (नांदेड, परभणी जिल्हे), आंध्रमधील काही जिल्हे, कर्नाटकातील काही जिल्हे या ठिकाणी स्त्रियांच्या अंगात येऊन घुमण्याच्या प्रकाराला भानामती म्हणतात. मोठ्या संख्येने असे रुग्ण अनेक गावांत तेथे आढळून येतात. या प्रकाराची तपासणी करण्यासाठी कर्नाटक व आंध्र या दोन्ही राज्यांनी पाहणी समिती नेमून या बाबींचा तपशीलवार एक अहवाल केला आहे.

महाराष्ट्रातील या मानसिक भानामतीबद्दल महात्मा फुले समता प्रतिष्ठान व अंधश्रद्धा निर्मूलन समिति यांनी नांदेड, परभणी भागात मानसोपचार शिबिरे घेऊन मदत व मार्गदर्शन केले आहे. आंध्र व कर्नाटक राज्यांप्रमाणेच महाराष्ट्रातही याबाबत भानमती कमिशन नेमावे, अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे. (प्रश्नोत्तराच्या या प्रकरणात मात्र भानामती म्हणजे पहिल्या प्रकारच्या घटना या अर्थानेच उत्तरे दिली आहेत. भानामती म्हणजे अंगात येणे या भानामतीच्या बाबतीतले स्पष्टीकरण भुताने झपाटणे, अंगात येणे या प्रकरणात दिले आहे.)

 

*डॉ. नरेंद्र दाभोलकर व प्रा. प. रा. आर्डे*

*यांनी लिहिलेल्या 'अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम' या पुस्तकातून साभार*

https://mikamblemahesh.blogspot.com/

 

Wednesday, 14 April 2021

अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम - प्रश्न ४७

 

*_प्रश्न ४७ - प्लँचेटच्या सहाय्याने माहिती मिळविता येते. आमच्या प्रश्नांची उत्तरे बरोबर मिळतात हे कसे?_*

 

 *उत्तर 👉*  अशी कल्पना करा की, एखाद्या व्यक्तीची लाडकी मुलगी वारली आहे. तिच्या आत्म्याला प्लँचेटवर बोलावले आहे. अशा आत्म्याला खालील स्वरुपाचे प्रश्न विचारले जातात.

*बेबी तू सुखी आहेस का?

:-प्लँचेट वस्तू ‘नाही’ अगर ‘होय’ या अक्षरावर फिरेल. हे फिरणे प्लँचेट करणारे ठरवितात. समजा ‘होय’ असे उत्तर आले.

*तू कुठे आहेस?

:-पृथ्वीवरच.

*मुक्ती मिळाली का ?

:-नाही.

अशा उत्तरांना जर आपण बरोबर उत्तरे आली असे समजू लागलो, तर हा वेडेपणा होईल. आत्मा सुखी आहे, की दुःखी आहे, स्वर्गात आहे की नरकात आहे हे कसे तपासता येईल? प्लँचेट करणारे समोरच्या व्यक्तीच्या मानसिकतेचा अंदाज घेऊन त्याप्रमाणे उत्तरे ठरवितात. ती खरी असल्याचे आपणांस वाटते.

प्लँचेटने अचूक माहिती मिळविता येत असेल व प्रश्नांची बरोबर उत्तरे येत असतील तर खालील प्रकारे त्याचा पडताळा घेता येईल. १० वस्तू १० ठिकाणी आम्ही लपवून ठेवू. प्लँचेट वाल्याने त्या कोणत्या वस्तू आहेत व कोणत्या ठिकाणी आहेत ते मृताम्याला बोलावून ओळखायचे. प्लँचेट करणारे व त्यांचे सहकारी यांच्याशिवाय निरीक्षण समितीतील लोकांना प्लँचेटवर बसवून उत्तरे मागवावी. प्लँचेट करणारे याला तयार होत नाहीत, हा आमचा अनुभव आहे. कारण ज्या प्रश्नांची उत्तरे तपासता येतात, अशा प्रश्नांना दिलेली उत्तरे बिनचूक निघणे अशक्य आहे याची त्यांना खात्री असते.

प्लँचेटने माहिती मिळविणे शक्य असेल तर सरकारने असा प्लँचेट वाला तज्ज्ञ सी आय डी प्रमुखपदी नेमावा. सरकारचा खर्च वाचेल आणि पंजाबमधील अतिरेक्यांची यादी मिळविण्यासाठी एखादा प्लँचेट वाला शासनाच्या मदतीला येऊ शकेल.

 

*डॉ. नरेंद्र दाभोलकर व प्रा. प. रा. आर्डे*

*यांनी लिहिलेल्या 'अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम' या पुस्तकातून साभार*

https://mikamblemahesh.blogspot.com/

अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम - प्रश्न ४६

 *_प्रश्न ४६ - प्लँचेटच्या साहाय्याने मृतात्म्यास आवाहन करता येते व माहिती मिळविता येते हे खरे की खोटे?_*

 

 *उत्तर 👉*  अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी विविध प्रकारची प्लँचेट करून पाहिलेली आहेत. प्लँचेट करणे ही नवेगिरी आहे, हाच निष्कर्ष निरीक्षणांती अनुभवास येतो. प्लँचेट करताना अक्षरे व अंक रेखाटलेल्या गुळगुळीत पाटीवर अगर बोर्डवर बोटाने सरकवता येईल अशी गुळगुळीत वस्तू ठेवलेली असते. उदाहरणार्थ काचेचा पेला, बॉल बेअरिंग लावलेले लाकडी बदाम इत्यादी.

ज्या व्यक्तीच्या नातेवाईकाचा आत्मा बोलवायचा, त्याने आपले बोट गुळगुळीत वस्तूवर ठेवायचे. प्लँचेट करणाऱ्या एक अगर दोन व्यक्ती असतात. त्या आपली बोटे प्लँचेट वस्तूवर ठेवतात. प्लँचेट करणारे खुबीने त्या वस्तूला असा जोर लावतात की हव्या त्या अक्षराकडे प्लँचेट वस्तू सरकावी. उदा. तू सुखी आहेस का? असा आत्म्याला प्रश्न विचारला व उत्तर नाही असे आणावयाचे असेल तर प्लँचेटवाले न ,, , ी अशा क्रमाने अक्षरावरून प्लँचेट वस्तू सरकवतात. बोटांच्या दाबाचा उपयोग या बनवेगिरीत अशा तऱ्हेने केला जातो. स्वर्गातील अगर पृथ्वीवर भटकत असलेल्या आत्म्याला हवेतून, पोकळीतून सहज संचार करता येत असेल तर प्लँचेट (व ग्लास अगर बदाम)मध्ये प्रवेश करायला त्यास बोटांचा आधार कशाला हवा?

प्लँचेट करणाऱ्या व्यक्तींना बोटे सरळ न ठेवता प्लँचेट वस्तूवर उलटी ठेवायला सांगितली तर त्यामुळे पेलयाला ढकलता येणे अशक्य होते. आत्मा प्लँचेटध्ये येण्यास बोटाचा स्पर्श पुरा असेल तर उलट्या बोटांनी प्लँचेट का करता येत नाही?

बल लावल्याशिवाय वस्तू हलत नाही, हे भौतिक सत्य आहे. बोटाने बल लावून केलेली हातचलाखी म्हणजे प्लँचेट. प्लँचेटध्ये आत्मा येत नाही. कारण आत्मा नसतोच. यामुळेच ज्या व्यक्तींचा प्लँचेटवर विश्वास नाही, अशा तीन व्यक्तींना करण्यास बसवले तर त्यांच्या स्पर्शाने वस्तू कधीही हालत नाही.

 

*डॉ. नरेंद्र दाभोलकर व प्रा. प. रा. आर्डे*

*यांनी लिहिलेल्या 'अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम' या पुस्तकातून साभार*

https://mikamblemahesh.blogspot.com/

अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम - प्रश्न ४५

 *_प्रश्न ४५ - जिवंत व्यक्तीपेक्षा मेलेल्या व्यक्तीचे वजन कमी भरले. काचेच्या बंद पेटीत ठेवलेली मरणोन्मुख व्यक्ती मरतेक्षणी काचेला तडा गेला असे आम्ही वाचले आहे. हे कमी झालेले वजन आत्म्याचे होते. बंद काचेच्या पेटीला तडा गेला कारण त्यातून मृत व्यक्तीचा आत्मा बाहेर गेला, असे सांगितले जाते. हे खरे की खोटे?_*

 

 *उत्तर 👉* वृतपत्रांतून विविध पुस्तकांतून छापलेल्या कथा सत्य असू शकतील वा असत्य असू शकतील. अशा कथांचा खरेखोटेपणा छापणाऱ्यांनी पडताळून पाहिलेला असतोच असे नाही. म्हणून केवळ वृत्तपत्रांत छापलेले आहे अगर पुस्तकात आहे म्हणून एखादी घटना खरी ठरत नाही.

ब्लीट्झमध्ये डॉ. भगवंतम् यांनी सत्य साईबाबांनी जपानी सिको घड्याळकंपनीच्या कारखानदाराला दर्शन देतेवेळी त्याच्या हातावर हवेतून नवे कोरे सिको घड्याळ काढून दिल्याचा चमत्कार वर्णन केला होता. या चमत्काराची शहानिशा डॉ. अ. कोवूर यांनी केली असता वरील चमत्काराची कथा बनावट असल्याचे सिद्ध झाले.

दत्ता बाळ आपल्या प्रवचनात प्रेम प्रक्षेपणाने गुलाबाला फुले लागतात, असा शोध एका जपानी शास्त्रज्ञाने लावल्याचे सांगत. असला महत्वाचा शोध वनस्पतिशास्त्राच्या ज्ञानकोशात नोंदला गेला पाहिजे. श्री. दि. के. बेडेकर यांनी संपूर्ण ज्ञानकोश चाळून पाहिले असता अशा संशोधनाचा कोठेच उल्लेख आढळला नाही.

वर वर्णन केलेल्या घटनांची ज्ञानकोशात कोठेही नोंद नाही. या *केवळ भाकड कथा आहेत.* अशा काल्पनिक कथांचे उदंड पीक धार्मिक ग्रंथांतून वाचावयास मिळेल. शरीरात आत्मा नावाचे काही नसतेच; त्यामुळे मृतशरीराचे वजन कमी होण्याचा व पेटी फोडून तो बाहेर येण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही.

 

*डॉ. नरेंद्र दाभोलकर व प्रा. प. रा. आर्डे*

*यांनी लिहिलेल्या 'अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम' या पुस्तकातून साभार*

https://mikamblemahesh.blogspot.com/

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...