*_प्रश्न ६३ - साऱ्या जगभर परामानस शास्त्राचा अभ्यास चालू असताना त्याचे अस्तित्व नाकारणे हा एक आंधळेपणा नव्हे का?_*
*उत्तर* 👉 इंद्रियाद्वारे माणसाला जे ज्ञान होते, त्या पलीकडे माणसाला वास्तवाचे ज्ञान देणारी काही शक्ती अस्तित्वात आहे असे अनेकांना वाटत आले आहे. त्यामुळे या अतींद्रिय शक्ती वा परामानस शास्त्राबद्दल मानवी संस्कृतीत दीर्घकाळ कुतूहल आढळते. या बाबी सुरुवातीस धर्माचे तंत्र मंत्र अथवा गूढविद्या यांच्याशी संबंधित मानल्या जात होत्या. या घटनांचा अभ्यास करण्यासाठी *इंग्लंडमध्ये प्रथम १८८२ साली सोसायटी फॉर सायंटिफिक रिसर्च स्थापन झाली. १८८७ साली अमेरिकेतही याच स्वरूपाची संस्था स्थापन झाली.* काही शास्त्रज्ञांनी या संशोधनात भाग घेतला.
*परंतु या अभ्यासातून या शास्त्राचे अस्तित्व अजूनही सिद्ध झालेले नाही. जगातील नामवंत विद्यापीठाची ज्ञानशाखा म्हणूनही याला मान्यता नाही.*
याबाबत जे प्रयोग यशस्वी झाले असे सांगण्यात येते, त्याच्या विश्लेषणात ही असे दिसले आहे की,
*१.* प्रयोग करत असताना अवलंबलेली पद्धत चुकीची वा अपुरी होती.
*२.* प्रयोग गलथानपणे करण्यात आले आहेत. या अतींद्रिय शक्तीमुळे जी माहिती मिळाल्याचा दावा केला, ती त्या माणसापर्यंत आधीच पोहोचली होती असे आढळून आले.
*३.* प्रयोगातून निष्कर्ष काढताना वापरण्यात आलेली संख्याशास्त्रीय पद्धत चुकीची होती. काही बाबी योगायोगाच्या होत्या. पुन्हा केलेल्या प्रयोगात त्या सिद्ध होऊ शकल्या नाहीत.
*४.* या स्वरूपाची शक्ती अस्तित्वात नाहीच असा ज्यांचा ठाम विश्वास आहे व ती सिद्ध करा अशा आव्हानात्मक पवित्र्यात जे आहेत व प्रयोग तपासण्यास जे तयार आहेत त्यांच्यावार या चाचण्या घेण्यात आल्या नाहीत.
अशा घटना घडतात हे आधी सिद्ध व्हावयास हवे आणि ते कधी काळी झालेच तर त्याचा अभ्यास वीज, रेडीओ लहरी, वाफ, अणुशक्ती यांचा होतो त्याप्रमाणे होणार. अंधश्रद्धा न ठेवता असा अभ्यास करण्यात बुद्धीप्रामाण्याशी विसंगत काही नाही. पण अशा घटना घडल्या असा दावा करून, विज्ञानाला डावलून त्याची स्पष्टीकरणे दिली जातात. लोकांची अंधश्रद्धा पोसण्यास त्याचा उपयोग होतो, हे मात्र आक्षेपार्हच आहे. उत्क्रांतीमध्ये माणसाच्या जीवनकलहात त्याला उपकारक ठरणाऱ्या क्षमतांचा निसर्गतः विकास होत गेला. त्यामुळे त्यांचा खरे तर अधिकाधिक विकास व्हावयास पाहिजे होता. परंतु असा विकास अजिबात झाला नाही. ही कारणमीमांसाही अतींद्रिय शक्तीच्या विरोधात जाणारी आहे.
या घटना सिद्ध झाल्या आहेत असे सांगणाऱ्याचा त्याच्या स्पष्टीकरणाबद्दल एक दावा असतो, की या घटनांना वैज्ञानिक चिकित्सेचे ज्ञान व नियम लागू नाहीत. वैज्ञानिक प्रक्रियेच्या व आधुनिक प्रयोगशाळेच्या कुवतीबाहेरच्या या घटना आहेत. वरपांगी बरोबर वाटणारे हे स्पष्टीकरण विसंगत वा फसवे आहे . *एकेकाळी विज्ञानाच्या सर्वस्वी आवाक्याबाहेरच्या वाटणाऱ्या अनेक घटना वैज्ञानिक दृष्टीकोनाचा वापर करून मानवाने ज्ञात करून घेतल्या.* याच मार्गाने आजच्या अज्ञात घटनांचे कार्यकारणभाव उद्या समजणार आहेत. परंतु ज्यावेळी विज्ञानाच्या पायाभूत पद्धतीलाच डावलण्याचा हेका धरला जातो, त्या वेळी परामानस शास्त्राच्या पुराव्यासाठी पुढे केलेल्या घटनांच्या खरेपणाबद्दल शंका निर्माण होते. ज्या अनेकांचे डंके ही शक्ती सिद्द्ध झाल्याचे पुरावे म्हणून पिटले गेले, त्या प्रत्येकाचे बिंग या ना त्या प्रकारे फुटले आहे. या स्वरूपाच्या घटनांचा वादातीत पुरावा आजही उपलब्ध नाही. यामुळे या घटना नाकारणे, हे आंधळेपणाचे नसून डोळसपणाचे लक्षण आहे.
*-डॉ. नरेंद्र दाभोलकर व प्रा. प. रा. आर्डे यांनी लिहिलेल्या 'अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम' या पुस्तकातून साभार*
https://mikamblemahesh.blogspot.com/