*_प्रश्न ५७ - अचूक जन्मवेळेवरून तुम्हांला कुंडली मांडता येते का? ती येत नसल्यास ज्योतिष हे शास्त्र नाही हा आरोप कशासाठी?_*
*उत्तर* 👉 या प्रश्नातील खोच लक्षात घ्यावयास हवी. जसे वैद्यकीय, अभियांत्रिकी ही शास्त्रे आहेत तसेच ज्योतिष हे एक शास्त्र आहे. वेगवेगळ्या व्यक्तींना, ज्ञानशाखांना तज्ज्ञता असणार. त्यामुळे कोणीच दुसऱ्या ज्ञानशाखेतील व्यक्तींना हिणवू नये. कारण त्यांना त्या विषयाबद्दल काही कळत नसते. ज्यांना साधा रक्तदाब मोजता येत नाही त्यांना जसे वैद्यकीय शास्त्राबद्दल बोलण्याचा अधिकार नाही, ते अज्ञानाचे द्योतक होईल तसेच ज्यांना साधी कुंडली मांडता येत नाही, त्यांनी ज्योतिषाबद्दल बोलू नये; ते चुकीचे ठरेल अशी ही मखलाशी आहे. यामध्ये चलाखी आहे ती अशी, की ज्योतिष हे जणू सिद्ध शास्त्र आहेच असे मानून युक्तिवाद केलेला आहे.
हठयोगाचा अभ्यास नाही तर त्याच्यामुळे सिद्धी प्राप्त होत नाही हे कसे बोलता? वेदाचा अभ्यास नाही, तर यज्ञाने पाउस पडत नाही असे ठाम विधान कसे करता असे विचारण्याच्या प्रकारांपैकीच हा प्रकार आहे.
व्यक्ती अन्य कसलीही सुविधा न वापरता केवळ योगसामर्थ्याने पाण्यावरून चालत जाऊ शकत नाही. कारण ते ज्ञात वैज्ञानिक नियमांच्या विरुद्ध आहे. चार समिधा आणि धनधान्य, तूप मंत्राग्नीसह जाळून पाऊस पडत नाही; कारण पाऊस का पडतो याची सुसंगत माहिती आता उपलब्ध आहे. त्यांपैकी कोणतीच गोष्ट या अशा यज्ञाने घडून येते असे मानायला जागा नाही. ‘ग्रहांच्या आधारे सांगितल्या जाणाऱ्या भविष्याबद्दल नेमकी अशीच स्थिती आहे. *_कुंडलीचा मुळात पायाच अशास्त्रीय आहे. नवग्रहांच्या यादीत सूर्य कसा? तो तर मुळात तारा आहे. चंद्र तर पृथ्वीचा उपग्रह आहे. माणसाच्या सर्व जीवनात अत्यंत महत्वाचा असणारा ग्रह ज्यावर त्याचे अस्त्वित्व उभे राहते त्या पृथ्वीचा समावेश कुंडलीत का नाही? याचे उत्तर देण्यात येते, की पृथ्वी सूर्यमालेचा एक केंद्रबिंदू आहे. पृथ्वी सूर्यमालेचा केंद्रबिंदू आहे असे मानणे म्हणजे कोपर्निकस, केप्लर पासून हॉईल -नारळीकरांच्यापर्यंत सर्वांना एका झटक्यात मोडीला काढणे व शास्त्राच्या सर्वमान्य सिद्धांताची उलटापालट करणे._* या ग्रहांत मानवात आढळणारे सत्त्व, रज, तम गुण कोठून आले? चंद्र शीतल प्रकाश देतो म्हणून सात्विक, तर पृथ्वी विलयाला नेऊ शकेल इतके ज्याचे रूप जहाल तो रवि सात्विक कसा? शुक्र स्त्रीलिंगी का? शनि व बुध नपुंसक का? साडे एकोणतीस वर्षांच्या शनीच्या परिभ्रमणात तो साडेसात वर्षेच पीडा का देतो? कुंडली मांडण्याची गरजच नाही. सध्या कार्यकारण भावानेही ज्योतिषाचा शास्त्र म्हणून फोलपणा स्पष्टपणे समजू शकतो.
*_अचूक जन्मवेळेप्रमाणे कुंडली मांडतात पण गंमत अशी की, जन्मवेळ अचूक कोणती याबाबत तज्ज्ञांत एकवाक्यता नाही, खरेतर मूल जन्मते त्या वेळी मातेच्या उदरात स्त्रीबीज व पुरुष बीजाचे मिलन होते. पण ती वेळ कशी समजणार? मुलाचा जन्म म्हणजे रॉकेटचे उड्डाण नव्हे, पहिल्यांदा त्याचे डोके बाहेर येते. नंतर क्रमाक्रमाने शरीर, यात काही वेळ जातो. काही वेळा पायाकडून मूल जन्मते. बाहेर आलेले अर्भक श्वास घेते. नाळ कापून आईपासून बाळाला बाजूला केले जाते. यापैकी कोणता क्षण अचूक जन्मवेळ मानायचा? औषधे देऊन, प्रसूती वेदना वाढवून प्रसूती आधी करता येते. सिझेरिनचे ऑपरेशन ठरवून करता येते. डॉक्टरांनी इच्छेनुसार घडवलेल्या या गोष्टींनी जन्मवेळ काही तासांनी वा दिवसांनी बदलते. मग फटक्यात मुलाचे सर्व भविष्य बदलून जाते काय?_*
कोणी असा दावा करेल की, ज्योतिष अनुभवाच्या आधारे बेतलेले शास्त्र आहे. अमुक ग्रहस्थितीत अमुक घटना घडतात हे खरे. कशाने घडते माहीत नाही. त्याचे कार्यकारणभाव आजच्या विज्ञानाला ज्ञात नाहीत. क्षणभर हेही खरे मानू. परंतु या स्वरूपाच्या तपासणीचा तटस्थ पद्धतीने जमवलेला माहितीचा साठा तरी त्यांनी पुढे मांडावयास हवा व त्याच्या वस्तुनिष्ठ चिकित्सेतून ज्योतिषाला शास्त्र ठरविण्यास काही आधार मिळतो हे दाखवून द्यावयास हवे. अन्यथा अचूक जन्मवेळेवरून तुम्हाला कुंडली मांडता येत नसताना ज्योतिष हे शास्त्र कसे म्हणता, हा प्रश्न त्यांनाच हास्यास्पद ठरवत असतो.
*-डॉ. नरेंद्र दाभोलकर व प्रा. प. रा. आर्डे यांनी लिहिलेल्या 'अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम' या पुस्तकातून साभार*
https://mikamblemahesh.blogspot.com/
No comments:
Post a Comment