Friday, 23 April 2021

अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम - प्रश्न ५६

 *_प्रश्न ५६- कुंडलीमुळे व्यक्तीला स्वतःच्या जीवनाविषयी काही संभाव्य कल्पना येतात. त्यामुळे तिचे जीवन धोक्यापासून वाचू शकते, बदलू शकते. उदा. मंगळाच्या मुलीबरोबर मंगळ नसलेल्या मुलाने लग्न करू नये. राहू, केतूची अनिष्टता समजणे हे मोठे फायदेच नाहीत काय?_* 


 *उत्तर*  👉  ही मांडणी फसवी आहे. ज्योतिषावर विश्वास ठेवणाऱ्या पण स्वतःला ‘खुल्या’ विचाराचा वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगतो म्हणणाऱ्या व्यक्ती हे प्रतिपादन करतात. त्याचा सारांश असा: काही विशिष्ट आजारांमुळे अन्य तक्रारी उद्भवण्याची शक्यता वाढत जाते. जसे, रक्तदाबाचा त्रास असणाऱ्या व्यक्तीस हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता अधिक असते. प्रत्येक रक्तदाबाच्या रुग्णास तसा त्रास होतोच असे नाही. परंतु रोग्याबाबत संभाव्यता वर्तवण्यास रक्तदाबाची ही पायाभूत माहिती सहायक मार्गदर्शन ठरू शकते. ही मांडणी तर्कसंगत आहे. कारण, यामध्ये गृहीत धरलेला पाया हा वैद्यकीय शास्त्राबद्दल खरा आहे. परंतु ज्योतिषाबाबत त्याला कोणताच वैज्ञानिक आधार नाही. अमुक ग्रहाच्या वा ग्रहसमूहांच्या स्थितीचा इष्ट वा अनिष्ट असा परिणाम व्यक्तीच्या जीवनावर होतो, यालाही कोणताही संख्याशास्त्रीय वा अन्य वैज्ञानिक पुरावा नाही. वधू-वरांच्या पत्रिकेत अमुक प्रकारे ग्रहस्थिती असल्यास लग्न करू नये असे सांगितले जाते. तशी लग्नं केल्यास अयशस्वी होतील, संतती होणार नाही, वैधव्य प्राप्त होईल अशा संभाव्यता वर्तवल्या जातात. त्याला काडीचाही आधार नाही. *याबाबत सव्वाशे वर्षांपूर्वी महात्मा ज्योतिबा फुलेंनी विचारलेला सवाल परखड आहे. मुहूर्त पाहून आणि छत्तीस गुण जमवून होणाऱ्या आमच्या लग्नात नंतर मोठ्या संख्येने बायकांना वैधव्य भोगावे लागते आणि मुहूर्त न पाहता, पत्रिका न मांडता केलेली लग्ने, इंग्रजांच्या जोडप्यांनी मांडलेला संसार मात्र सुखाचा होतो हे कसे, असा ज्योतीबांचा सवाल होता.* अर्थ स्पष्ट होता. भारतात बालमृत्यूचे प्रमाण त्या काळात खूपच जास्त होते त्यामुळे स्त्रियांना बालवैधव्यही अटळ होते. तो टाळण्याचा उपाय होता, लग्ने प्रौढ वयात करणे.

    

            (तो अस्तित्वात असल्यामुळेच इंग्रजांत पत्रिका न बघताही वैधव्याचे प्रमाण कमी होते.) 

            याउलट पत्रिकेवरून स्त्रीला दीर्घ वैवाहिक सुख आहे, असा तर्क काढून केलेले विवाहदेखील स्त्रीला वैधव्यापासून वाचवू शकत नव्हते, कारण त्याचा संबंध पत्रिकेशी नव्हता, तर प्रचंड प्रमाणातील बालमृत्यूशी होता. पाया चुकीचा धरून संभाव्यता वर्तवली तर निष्कर्ष चुकीचे निघतात ते असे!


          पाया चुकीचा आहे हे तर आता स्पष्टच झाले आहे. *मंगळाची भरपूर माहिती खगोलशास्त्रात उपलब्ध आहे. त्याच विवाहाशी काय संबंध येतो? धुमकेतू काय आहे हे आता समजले आहे. त्याचा शकून–अपशकुनाशी जोडण्याची काय गरज? राहू, केतू हे तर अस्तित्वात नाहीत, तर त्यांच्या वक्रदृष्टीचे भय कशासाठी?*


 *-डॉ. नरेंद्र दाभोलकर व प्रा. प. रा. आर्डे यांनी लिहिलेल्या 'अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम' या पुस्तकातून साभार* 


https://mikamblemahesh.blogspot.com/

No comments:

Post a Comment

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...