*_प्रश्न ५५- ज्योतिषामुळे संकटात असलेल्या माणसांना काही काळ तरी दिलासा वाटतो. त्याची मानसिकता सावरण्यास मदत होते. तुमचे शास्त्र त्याला या स्वरुपाची मदत करू शकत नसताना ज्योतिषशास्त्रावर आगपाखड कशासाठी?_*
*उत्तर* 👉 संकटात असलेली व्यक्ती निराश, हताश झालेला माणूस आधाराच्या शोधात असतो. प्रयत्न करूनही मनाजोगते यश लाभले नाही, तर आपल्या हाताबाहेरच्या शक्तीवर त्याची जबाबदारी टाकल्याने त्याला दिलासा वाटतो. ‘माझी काय चूक? ग्रहस्थितीच विपरीत होती; ती काही काळाने बदलेल व मला पुन्हा चांगले यशाचे दिवस येतील’ असे तो स्वतःला बजावतो. फलज्योतिष त्याला हा आधार व उभारी देते, असा भविष्याला शास्त्र म्हणवून घेणाऱ्यांचा दावा असतो. काही माणसांच्या त्रस्त मनाला ज्योतिष हा आधार देत असेलही परंतु ही उपयुक्तता मानली तरी ज्योतिष फार तर माणसाच्या मनाला काही काळ काळजी विसरायला लावेल. परंतु कोऱ्या कागदाच्या कपट्यापासून नोटा करणारा जादूगार हा आपल्या आर्थिक विवंचनेवर इलाज करेल हे समजणे, आणखी त्याच्याकडे संपत्ती निर्मितीचे शास्त्र आहे असे समजून त्याच्या मागे लागणे या मूर्खपणा एवढाच ज्योतिषाकडे खऱ्या आधारासाठी वळवण्यात आहे. माणसाच्या मनाला काही काळ दिलासा देणारे हे सामर्थ्यदेखील उपकारकच आहे, असे म्हणता येणार नाही. ग्रहस्थिती बिघडल्याने वारंवार आजारपण येते. एक वर्षाने ग्रहस्थिती बदलेल व मग निरोगी आयुष्य मिळेल हे भविष्य सतत आजारी पडणाऱ्याला वर्षभर मानसिक बळ टिकवून धरायला मदत करेल असे नाही. त्याचा विपरीत परिणामही घडू शकेल. भविष्यावर पूर्ण विश्वास ठेवणारी व्यक्ती आपल्या आजाराचे कारण ग्रहस्थिती मानून उत्तम तज्ञांकडून सर्व तपासणी करून घेण्याचे टाळेल व मग वर्षभराने वेळीच निदान व्हावयास हवे होते, ते न झाल्याने जीवाशीही खेळ होऊ शकेल.
मुलीच्या पत्रिकेत अजून तीन वर्षे विवाह योग नाही असे समजल्यावर वधू-पिता वा ती स्वतः तीन वर्षांनी तरी विवाह जमेल या आशेने उभारी घेण्याऐवजी त्यामुळे मोडून पडणेही शक्य आहे. तेव्हा कला म्हणूनही व्यक्तीवर कोणता परिणाम होईल याची खात्री नाही. त्यामुळे ज्योतिष शास्त्रावर आगपाखड एवढ्याचसाठी, की ते शास्त्राचा दावा करून संकटातल्या माणसाला मार्गदर्शन करते आणि त्याची चिकित्सा केली की, व्यक्तीला आधार देणारी कला म्हणून स्वतःची उपयुक्तता सांगते. हा अंतर्विरोध आहे.
*डॉ. वि. म. दांडेकरांनी ‘कुंडली संग्रह – एक अभ्यास’* या पुस्तकाच्या प्रस्तावनेत लिहिले आहे “लौकिक जीवनातील यशापयशाची कारणमीमांसा न कळल्याने मन कुंठीत झाले, म्हणजे जातक निदानाने समाधान लाभते. अपयशाने पराभूत झालेल्या मनाला दिलासा मिळतो. त्यात संशोधनाची कालवाकालव नको, ही व्यावसायिक व्यवहारदृष्टी झाली. त्यात शास्त्रबुद्धी नाही. अशाने शास्त्र प्रगत होत नाही.”
प्रत्यक्ष शास्त्र तर नाहीच, पण निश्चितपणे आधार देणारी कला म्हणणेही शक्य नाही. अशी फलज्योतिषाची स्थिती आहे.
*-डॉ. नरेंद्र दाभोलकर व प्रा. प. रा. आर्डे यांनी लिहिलेल्या 'अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम' या पुस्तकातून साभार*
https://mikamblemahesh.blogspot.com/
No comments:
Post a Comment