*_प्रश्न ५४- भविष्यशास्त्राला हजारो वर्षांचा जगभराचा इतिहास आहे, अशा उपयुक्त शास्त्राने माणसाचे जीवन सुखी होणार नाही काय?_*
*उत्तर* 👉 मानवाने आपल्या आदिम अवस्थेत आकाशात चमचमणारे तारे पहिले. ती त्याला देवाची निवासस्थाने वाटली. मानवाला दिवसा प्रकाश मिळावा व रात्री शीतल चांदणे मिळावे यासाठी आकाशातल्या बापाने ही झुंबरे नभात लटकवली आहेत, असाही उल्लेख बायबलात आढळतो. या उघड्या डोळ्यांनी दिसणाऱ्या ग्रहगोलांचे माणसांनी दीर्घकाळ, शतकानुशतके निरीक्षण केले. त्यांच्या गतिबद्धतेचे गणित मांडले. पृथ्वीवरील घडामोडींशी आपल्या बुद्धीप्रमाणे त्यांचा संबंध जोडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मानवी संस्कृतीच्या सुरुवातीच्या कळत खगोलशास्त्र, गणित व फलज्योतिष या तिन्ही बाबी हातात हात घालून नांदल्या.
पुढे परिस्थिती पूर्णपणे बदलली. खगोलशास्त्र हे एक स्वतंत्र शास्त्र म्हणून पुढे आले. रात्री चमचमणारे आकाशातील ग्रह कोणते, तारे कोणते, त्यांची अंतरे काय, त्यांच्या गती कोणत्या, त्यांचे परिणाम काय, याबद्दल प्रचंड माहिती पुढे आली. वैज्ञानिकदृष्ट्या ती मान्य झाली. ही घोडदौड आजही चालू आहे. गणित तर एक स्वायत्त विज्ञान शाखाच बनलीय. परंतु अडचण झाली ती फलज्योतिष्याची. नवग्रहातील ग्रहताऱ्यांचे भौतिक स्वरूप माणसाला समजू लागल्यावर अमका ग्रह वा तारा, तमक्या गुणाचा वा प्रवृत्तीचा कारक आहे, याला काडीचा अर्थ राहिला नाही. भविष्यशास्त्राच्या हजारो वर्षांच्या इतिहासाचा दाखला जेव्हा दिला जातो व मान्यता मागितली जाते, त्या वेळी हा सर्व संदर्भ नजरेसमोर आल्यावर काय दिसते? फलज्योतिष हे शास्त्र नाहीच. परंतु हजारो वर्षांचा संस्कार व स्वतःच्या भविष्याबद्दलची दुर्दम्य जिज्ञासा त्यामुळे व्यक्तीला फलज्योतिषाबाबत कुतूहल असते. याचा आधार घेऊन त्याची उपयुक्ततता माणसाचे जीवन अधिक सुखी करण्यासाठी वापरण्यास काय हरकत आहे, असा प्रश्न विचारला जातो. या ठिकाणी दोन महत्त्वाचे प्रश्न उपस्थित होतात. एकतर लोकांना बरे वाटते, आधार मिळावा यासाठी आम्ही ज्योतिष वापरतो असा प्रयत्न कोणी केल्यास मनाला समाधान व आनंद देणारी कला एवढेच फार तर ज्योतिषाबद्दल म्हणता येईल. शास्त्र हा त्याचा दावाच रद्द होतो. दुसरे असे, की माणसाला या पद्धतीने येणारे समाधान हे प्रसंगी त्याला तात्पुरते समाधान देणारे असेलही; परंतु व्यक्तीच्या स्वतःच्या वा कुटुंबियांच्या जीवनात त्याचा दीर्घकाळ तोटा होण्याची शक्यता असते. ‘ग्रहदशा अतिशय चांगली. चिंताच नको. रुग्ण हमखास बरा होणार’ असा सल्ला पत्रिका पाहून मांडून देणारा ज्योतिषी रुग्णाला व त्याच्या कुटुंबियांना पुढील आघात व त्याबद्दल घ्यावयाची काळजी याबद्दल गाफील करत असतो. या उलट ग्रहस्थिती बिघडली आहे, काहीही होऊ शकेल असे सांगणारा भविष्यवेत्ता अकारण घाबरवून टाकत असतो. याने ना माणसाच्या जीवनाला शास्त्रीय दृष्टीने मदत व मार्गदर्शन मिळते, ना माणसाचे जीवन अधिक सुखी बनते.
*-डॉ. नरेंद्र दाभोलकर व प्रा. प. रा. आर्डे यांनी लिहिलेल्या 'अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम' या पुस्तकातून साभार*
https://mikamblemahesh.blogspot.com/
No comments:
Post a Comment