Tuesday, 20 April 2021

अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम - प्रश्न ५३

 *_प्रश्न ५३ - बहुतेक सर्व सुशिक्षित लोक, समाजातील मान्यवर मंडळी भविष्यावर विश्वास ठेवतात. असं भविष्यशास्त्र नाकारण्याचे कारणच काय?_* 


 *उत्तर* 👉 भविष्य हे शास्त्र म्हणून नाकारण्याचे कारण हेच की ते शास्त्र नाही. शास्त्र म्हणून सिद्धता मिळण्यासाठी ज्या विविध कसोट्या एखाद्या विषयाला पूर्ण कराव्या लागतात, त्या भविष्याने कधीच दिलेल्या नाहीत. त्याल उतरणे तर दूरच राहिले.


               अशा वेळी ज्याचा हमखास आधार घेतला जातो ते प्रतिपादन म्हणजे लहानथोर अशिक्षित, सुशिक्षित, गरीब-श्रीमंत, ग्रामीण, शहरी, गल्लीपासून दिल्लीपर्यंत बहुसंख्य स्त्रीपुरुष भविष्य बघतात. इतक्या व्यापक प्रमाणात लोकांची मान्यता लाभलेली गोष्ट खोटी कशी असेल?


           लोक भविष्य का बघतात आणि ज्योतिष शास्त्र आहे का, या दोन बाबी पूर्णपणे वेगळ्या आहेत, हे प्रथम लक्षात घ्यायला हवे.

भविष्यकाळातील घटनांच्याबद्दल मानवी मनाला स्वाभाविक कुतूहल सदैव वाटत आले आहे. भविष्यकाळात आपल्याला अनुकूल ते घडावे किंवा घडेल या आशेवर व्यक्ती सतत आजचे ताण-तणाव, वैफल्य, सोशीत  असते. हे घडणे वा न घडणे त्या व्यक्तींच्या हाताच्या सर्वस्वी बाहेर असलेल्या अनेक भौतिक घटनांशी, सामाजिक व्यवस्थेशी संबंधित असते. याचा पूर्ण उलगडा व्यक्तीला होणे, अशक्य असते. अशा वेळी भविष्यात आपल्याला चांगले दिवस येणार आहेत हा दिलासा ज्योतिषामुळे माणसाला मिळतो. (कोणत्याही वास्तवाचा आधार नसलेली ) भविष्य काळातील सुखसमाधान या आकांक्षापूर्तीची कल्पना या माणसाच्या मनाला भुरळ पाडते. त्यामध्ये तो रमतो. भविष्यावर विश्वास ठेवण्याची मानसिकता ही अशी असते. बहुसंख्यांच्या बाबतीत हा आशावाद खरा ठरत नाही. परंतु त्यामुळेही ती आशा बाळगणे ते सोडत नाहीत. आशा ही एक अद्भुत साखळी आहे की, ज्याने बांधून ठेवले असताना माणूस पळत असतो व जी सोडली असताना माणूस पांगळ्याप्रमाणे निश्चल होतो. हे संस्कृत सुभाषित बहुतेकांच्या बाबतीत खरेच ठरते. भविष्यकाळात प्रत्यक्ष अपेक्षित न घडता विपरीतच घडले, तरी त्या पूर्वप्राक्तनामुळे वा सध्याच्या जन्मातील पापामुळे वा अशुभ ग्रहस्थितीमुळे घडून आल्या असे मानले जाते. मुळातच पाया नसलेल्या अनुमान पद्धतीला ते भविष्यशास्त्र आहे असे समजले, यातच आपली चूक होत आहे, हे समजावून घेतले जात नाही वा दिले जात नाही. परंतु वास्तवाचा, वस्तुनिष्ठ तपासणीच्या कसोटीचा आधार नसलेल्या फलज्योतिषावर बहुसंख्यांचा विश्वास आहे. यामुळे केवळ त्याला शास्त्राचा दर्जा प्राप्त होत नाही. विज्ञानाचे निर्णय हे बहुमत-अल्पमत असे संख्या बळावर लागत नसतात.


 *-डॉ. नरेंद्र दाभोलकर व प्रा. प. रा. आर्डे यांनी लिहिलेल्या 'अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम' या पुस्तकातून साभार* 


https://mikamblemahesh.blogspot.com/

No comments:

Post a Comment

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...