*_प्रश्न ५२ - कडेगाव (ता.खानापूर) जि. सांगली या गावी प्राथमिक शाळेतील मुलींच्या डोळ्यांतून बारीक-बारीक खडे येत होते, विज्ञानवादी कार्यकर्त्यांनी हा प्रकार थांबविण्याचा प्रयत्न केला, तरी मुलींच्या डोळ्यांतून खडे कसे येत राहिले?_*
*उत्तर* 👉 कडेगाव येथे ता. १७ फेब्रुवारी १९८८ रोजी तनुजा माने हिच्या डोळ्यांतून हे खडे येणे चालू झाले. तनुजाला शाळेत न पाठवता घरीच थांबवल्यावर त्याचे प्रमाण कमी झाले. तनुजा आपल्या आजोळी (आईच्या वडिलांकडे) आईला सोडून राहत असे. तिला तिच्या आईकडे पाठवल्यावर खडे येणे बंद झाले. मार्चच्या पहिल्या आठवड्यात तनुजा परत आली. पुन्हा तनुजाच्या डोळ्यांतून खडे येणे चालू झाले. आणि त्याबरोबरच वर्गातील आणखी आठजणींच्या डोळ्यांतून खडे येऊ लागले. १३ मार्च १९८८ ला ही बातमी ठळकपणे वृत्तपत्रांत झळकली आणि १५ मार्चला त्या गावी मी व आमच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या चौकशी पथकाने भेट देऊन हा प्रकार उघडकीस आणला. डोळ्यांमध्ये मुली खडे का घालत होत्या, कशा घालत होत्या, यामागचे सत्य पुढे आणले. पुन्हा हा प्रकार करणार नाही अशी त्यांची लेखी कबुली त्यांच्या मुख्याध्यापकांच्यासमोर मिळवली. दुपारी गावात सभा घेऊन ग्रामस्थांनाही हा प्रकार समजावून सांगितला. याबद्दलचा विस्तृत लेख ता. २० मार्च १९८८ च्या रविवार सकाळमध्ये आला आहे.
ग्रामस्थांच्या सभेतच पथकामधील ख्यातनाम मानसोपचार तज्ञ डॉ. प्रसन्न दाभोलकर यांनी भानामती प्रकारामागची मानसिक बाजू समजावून सांगितली होती व “काही मुली कदाचित अधूनमधून हा प्रकार किंवा दातखीळ बसणे, चक्कर येणे यांसारख्या बाबी करतील. त्याची चिंता, चर्चा वा काळजी करू नका. मुलींना दटावून वा खोदून खोदून तेच ते विचारू नका. फक्त दुर्लक्ष करा. हे प्रकार आपोआप थांबतील आणि तसेच वाटले तर केव्हाही मुलींसह सातारला या.” असे सांगितले होते.
याप्रमाणेच घडले. क्वचित एखाद्या मुलीच्या डोळ्यांतून एखादा-दुसरा खडा काही काळ येत राहिला. आम्ही भानामती हुडकणे व संपवणे हे गावातील काही जणांना आवडले नव्हते. त्यांचे त्यात काही हितसंबंध होते. त्यांनी भानामती बंद झालीच नाही, अशी पत्रे वृत्तपत्रांना पाठवली. पुणे सकाळने त्यासाठी विजय साळुंखे यांना विशेष प्रतिनिधी म्हणून पाहणीस पाठवले. भानामतीचा आम्ही घेतलेला शोध पूर्णपणे योग्य व परिणामकारक आहे, असाच निर्वाळा त्यांनी दिला. त्यानंतर हे उरलेसुरले प्रकारही थांबले. त्यामुळे विज्ञानवादी कार्यकर्त्यांनी तपासणी केल्यावरही डोळ्यांतून खडे येण्याचे प्रकार घडतच राहिले, हे पूर्णपणे असत्य आहे. प्रत्यक्षात नेमके उलटे घडले आहे.
*-डॉ. नरेंद्र दाभोलकर व प्रा. प. रा. आर्डे यांनी लिहिलेल्या 'अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम' या पुस्तकातून साभार*
https://mikamblemahesh.blogspot.com/
No comments:
Post a Comment