*_प्रश्न ५८ - तज्ज्ञ डॉक्टरांची निदाने चुकतात. हवामान खात्याचे अंदाज फसतात. मग ज्योतिषाचेच १००% बरोबर यावयास हवे या आग्रहाला काय अर्थ आहे?_*
*उत्तर* 👉 तज्ज्ञ डॉक्टरांची निदाने चुकतात हे सरधोपट विधान बरोबर नाही. समजा, पाच खोल्यात पाच तज्ज्ञ डॉक्टर बसविले. त्यांना विषमज्वराचे निदान ज्यावरून होईल असा रक्ताच्या तपासणीचा रिपोर्ट दाखविला, क्षयाचे निदान उघड असेल अशा रुग्णाच्या फुप्फुसाचा एक्स रे दाखवला, काविळीचा दोष असलेली लघवी दाखविली तर सर्व तज्ज्ञ डॉक्टर त्याच्या आधारे रुग्णाबद्दलचे जे निदान करतील ते एकाच असेल. किंबहुना जगभरच्या वेगवेगळ्या ठिकाणच्या तज्ज्ञ डॉक्टरांना या तपासण्या दाखविल्या तरी तेच उत्तर येईल. *कारण वस्तुनिष्ठपणे सिद्ध झालेल्या व शास्त्र म्हणून मान्यता मिळालेल्या निकषांच्या आधारे हे निष्कर्ष काढले जातात. म्हणूनच वैद्यक हे शास्त्र आहे, व त्याची मान्यताप्राप्त पदवी मिळालेली व्यक्ती कोठेही व्यवसाय करू शकते.*
तज्ज्ञ डॉक्टरांची निदानेही चुकतात वा त्यांच्यामध्ये मतभिन्नताही असते हे खरे आहे. परंतु ती वेगळी का आहेत याची कारणमीमांसा मांडली जाते व त्याप्रमाणे चिकित्सेने वा संशोधनाने या चुका दुरुस्त केल्या जातात. विज्ञानाच्या वाढत्या विस्ताराबरोबर अधिकाधिक निदाने अचूक येण्यास सुरुवात होते. हवामान खात्याचा अंदाज हा पूर्वी उपहासाचा विषय होता. उपग्रहाद्वारे माहिती मिळू लागल्यावर परिस्थितीत बराच बदल झाला आहे.
शास्त्राचा दावा करणाऱ्या भविष्याबद्दलची स्थिती काय आहे? पाच खोल्यांमध्ये स्वतःला तज्ज्ञ समजणारे पाच ज्योतिषी बसविले व त्यांना एकच पत्रिका देऊन भविष्य मांडण्यास सांगितले, तर ते देखील एकसारखे येणार नाही मग ते अचूक येणे तर दूरच राहिले. (ती एकसारखी व अचूक येतील असा दावा असल्यास त्याची चाचणी घेण्यास अंधश्रद्धा निर्मुलन समिती सदैव तयार आहे.) दुसरे म्हणजे, ज्या पायाभूत सिद्धांताच्या गृहीतांच्या आधारावर भविष्याची शास्त्र म्हणून मांडणी केली जाते, तो पायाही अवैज्ञानिक आहे. पृथ्वीला सूर्यकुलाचा केंद्रबिंदू मानणे, राहू, केतू, चंद्र यांना ग्रह समजणे, जन्मवेळ कोणती म्हणावी याबद्दल एकवाक्यता नसणे, कसलाच वैज्ञानिक आधार नसलेले गुणधर्म ग्रहांना चिकटविणे, सूर्याला ग्रह समजणे असे अनेक घोटाळे आहेतच. त्याबरोबरच *‘फलज्योतिषांचे थोतांड’ या आपल्या मार्च १९८२ च्या किर्लोस्करच्या लेखात नामवंत शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांनी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे.* ‘पृथ्वी ज्या धुरेभोवती फिरते ती धुरा हळूहळू आपली दिशा बदलते आहे. ह्या धुरेच्या उत्तरेला सध्या ध्रुवतारा आहे. इसवी सनापूर्वी ३००० वर्षे ह्या काळात हीच धुरा ध्रुवात (अल्फा ड्रायकोनीस) ताऱ्याकडे उत्तर म्हणून बोट दाखवत होती तर आणखी ११ हजार वर्षांनी ही धुरा व्हेगाकडे वळलेली असेल’ सव्वीस हजार वर्षांनी ह्या धुरेचे एक आवर्तन पूर्ण होते.
ज्याप्रमाणे पृथ्वीच्या निरीक्षकाकरता ध्रुव तारासुद्धा आपली दिशा बदलतो, त्याप्रमाणे इतर तारेपण दिशा बदलतात. त्यामुळे राशीचक्र आणि तारे यांच्यात पण तफावत वाढत जाते. विषुववृत्तावरील राशीचक्र आणि आधुनिक तारका-समूहांच्या सीमा यांच्यातील आजकालची तफावत ज्या काळी राशींना नावे देण्यात आली, तेव्हापासून आतापर्यंत एका घराइतकी झाली आहे. उदाहरणार्थ, जे तारका समूह वृषभ राशीत आहेत असे म्हणतो ते खरोखर आता मिथुन राशीत गेले आहेत. ह्या तफावतीला फलज्योतिषात काय उत्तर आहे? मूळ नक्षत्रे आहेत त्यानुसार आकाशाचे भाग करायचे, की दोन हजार वर्षांपूर्वी ते जिथे दिसत होते त्यानुसार हे भाग ठरवायचे? जॉ क्लॉड पेकेयर या खगोल शास्त्रज्ञाने आणखी एक मुद्दा मांडला आहे. ध्रुव प्रदेशाच्या जवळच्या देशातही लोक राहतात. (मग ते उत्तर ध्रुव असो वा दक्षिण ध्रुव) जन्माला येतात. परंतु वर्षातील काही काळ येथे ग्रह दिसत नाहीत. उदाहरणार्थ, रशियातील मुर्मारक शहरातून वर्षातून सहा महिने राशीग्रह, राशी चक्रातील तारे दिसू शकत नाहीत. ह्या काळात जन्मलेल्यांच्या कुंडल्याच असू शकणार नाहीत. त्याचा अर्थ काय त्यांना भवितव्यच नाही? तेव्हा वैद्यकशास्त्र व हवामान खात्याचे अंदाज यांच्याशी तुलना करण्याचा ज्योतिषांचा हा अट्टहासच मुळी खोटा, फोल व चुकीच्या पायांवर आधारित आहे.
*-डॉ. नरेंद्र दाभोलकर व प्रा. प. रा. आर्डे यांनी लिहिलेल्या 'अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम' या पुस्तकातून साभार*
https://mikamblemahesh.blogspot.com/
No comments:
Post a Comment