Wednesday, 31 July 2024

पराप्राकृतिक शक्तीवर श्रद्धा म्हणजे अधम्म

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_अधम्म म्हणजे काय?_*

_*१. परप्राकृतिक शक्तीवर श्रद्धा म्हणजे अधम्म*_

*_(क्रमशः)_*

*_!! ॐ मणी पद्मे हूँ !!_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2024/07/blog-post_31.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

               _जेव्हा केव्हा एखादी घटना घडते तेव्हा ती कशी घडली? ती घडण्याचे कारण काय? हे जाणून घेण्याची जिज्ञासा ही माणसाची स्वाभाविक प्रवृत्ती आहे. बरेचदा कारण आणि फलित होणारे कर्म एक दुसऱ्याच्या इतके निकट असतात की, त्या कर्माचे कारण जाणून घेणे फारसे कठीण जात नाही. परंतु काही वेळा कारण आणि फलित होणारे कर्म एक दुसऱ्यापासून इतके दूर असतात की, कर्माचे कारण जाणून घेणे कठीण होते. सकृतदर्शनी या परिणामाचे कारणच नाही असे वाटते._ 

_*तेव्हा प्रश्न उपस्थित होतो की, ही घटना कशी घडली त्याचे सर्वसामान्य उत्तर असे की, ही घटना परप्राकृतिक कारणांचा परिणाम होय. यालाच बरेचदा चमत्कार म्हटले जाते.*_

_बुद्धांच्या पूर्ववर्तीनी या प्रश्नांची विविध उत्तरे दिली._

१. _पक्कुद कच्चान म्हणतो, प्रत्येक कार्याला कारण असतेच असे नाही. त्याच्या मते घटना कारणाविना स्वतंत्रपणे घडत असतात._

२. _मख्खली घोषाल हे मान्य करतो की, घटनेला कारण असते, परंतु तो असा प्रचार करीत होता की, हे कारण दैव यासारख्या घटकात शोधले पाहिजे._

*_बुद्धांनी या सिद्धांताचे खंडन केले. त्यांनी हे ठामपणे प्रस्थापित केले की, प्रत्येक घटनेला कारण असतेच. हे कारण नैसर्गिक प्राकृतिक नियमांचा परिणाम तरी असते किंवा मानवीय कर्माचा परिणाम तरी असते._*

_काल, प्रकृती आणि आवश्यकता इत्यादींना घटनांचे कारण म्हणून स्वीकारण्यास त्यांचा विरोध होता. त्याचे स्पष्टीकरण असे. जर काल, प्रकृती, आवश्यकता आदी तत्त्वे घटना घडण्याचे एकमात्र कारण असतील तर आम्ही कोण आहोत? आमचे प्रयोजन काय ? मनुष्य काल, प्रकृती, आकस्मिकता, ईश्वर, देव, आवश्यकता आदींच्या हातातील केवळ कळसूत्री बाहुली आहे काय ?_

*_मानव मुक्त नसेल तर त्याच्या अस्तित्वाचे प्रयोजनच काय? परप्राकृतिक कारणावर त्याची श्रद्धा असेल तर त्याच्या बुद्धिवंत होण्याचे प्रयोजन काय?_*

_जर मानव मुक्त असेल तर प्रत्येक घटना ही त्याच्या कृतीत परिणाम असावयास पाहिजे. कोणतीही घटना अशी असू शकत नाही की, त्याला परप्राकृतिक कारण असेल. ही शक्यता आहे की, *एखादी घटना घडल्यानंतर त्या पाठीमागचे खरे कारण शोधणे माणसाला शक्य झाले नसेल. परंतु मनुष्य बुद्धिवंत असेल तर एक ना एक दिवस त्या कारणांचा शोध घेईलच.*_

_परप्राकृतिक वादाचे खंडन करण्यात बुद्धांचे तीन हेतू होते._ 

१. _त्यांचा प्रथम हेतू माणसाला विवेक पथावर अग्रेसर करणे हा होता._

२. _त्यांचा द्वितीय हेतू माणसाला सत्य शोधण्यासाठी मुक्त करणे हा होता._ 

३. _त्यांचा तृतीय हेतू मिथ्या विश्वास, अंधश्रद्धेच्या प्रमुख कारणांचा समूळ उच्छेद करणे हा होता. कारण मिथ्या विश्वास, अंधश्रद्धा या मानवाच्या सत्य शोधण्याच्या प्रवृत्तीची हत्या करतात._

*_याला बुद्ध धम्मात कर्म सिद्धांत किंवा हेतुवाद म्हणतात. कर्म सिद्धांत किंवा हेतुवाद हा बौद्ध धम्माचा केंद्रीय सिद्धांत आहे. हा सिद्धांत विवेकवादाचा पुरस्कार करतो आणि बौद्धधम्म म्हणजे विवेकवादाशिवाय दुसरे काहीही नाही. म्हणून परप्राकृतिक शक्तीची उपासना म्हणजे अधम्म होय._*

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

*_संकलन - महेश कांबळे_*

*_दिनांक :- ०१/०८/२०२४_*

*_संदर्भ :-_*

_*१) भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, तिसरा खंड भाग ४*_

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

Saturday, 27 July 2024

धम्म माणसामाणसात समता वाढविण्याची शिकवण देतो

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_सद्धम्म म्हणजे काय?_*

_*(ड) धम्माने सर्व सामाजिक भेदभावांना मूठमाती दिली तरच धम्म सद्धम्म होतो*_

_*३. धम्म माणसामाणसात समता वाढविण्याची शिकवण देतो तेव्हाच धम्म सद्धम्म होतो*_

*_(समाप्त)_*

*_!! ॐ मणी पद्मे हूँ !!_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2024/07/blog-post_27.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

_माणसे असमानच जन्माला येतात. काही धष्टपुष्ट असतात तर काही दुर्बल असतात. काही अधिक बुद्धिमान असतात. काही कमी बुद्धिमान असतात. तर काहींना बुद्धीच नसते. काहींची क्षमता अधिक असते तर काहीची क्षमता न्यून असते. काही संपन्न असतात तर काही विपन्न असतात._

_परंतु सर्वांनाच ज्याला जीवनसंघर्ष म्हणतात त्यात प्रवेश करावाच लागतो. या जीवनसंघर्षात असमानता ही जीवनाची स्वाभाविक स्थिती म्हणून स्वीकारली तर जे दुर्बल आहेत त्यांना या जीवनसंघर्षात काहीही स्थान असणार नाही. ते नेहमीच शेवटी राहतील. *या असमानतेच्या नियमाला जीवनाचा स्वाभाविक नियम म्हणून स्वीकारले जावे काय?*_

_काही या नियमाला जीवनाचा स्वाभाविक नियम म्हणून स्वीकारतात. त्यांचा तर्क असा की या नियमामुळेच जो जीवनसंघर्षात टिकून राहण्यास योग्य आहे तोच टिकून राहील._

_*"प्रश्न असा आहे की, जीवन संघर्षात जो टिकून राहण्यास समर्थ आहे ; काय तोच समाजाच्या दृष्टीनेही श्रेष्ठतम आहे?" याला कोणीही सकारात्मक उत्तर देऊ शकला नाही.*_

_*हा संदेह आहे म्हणूनच धम्म समानतेची देशना देतो. कारण या समानतेच्या सिद्धांतामुळेच समाजाच्या दृष्टीने जे श्रेष्ठतम आहे ते जीवनसंघर्षात जिवंत राहण्यास समर्थ नसले तरीही ते जिवंत राहील.*_

_समाजाला श्रेष्ठतम हवे आहे. समर्थतम नको. म्हणून याच प्राथमिक कारणास्तव धम्म समानतेचा समर्थक आहे, धम्म समानतेचा पुरस्कार करतो._

_*हाच बुद्धांचा दृष्टिकोन होता आणि याच कारणास्तव बुद्धांचा तर्क असा होता की, जो धर्म समानतेचा पुरस्कार करीत नाही तो धर्म माणसासाठी स्वीकारण्यायोग्य धर्मच नव्हे.*_

_*जो धर्म एकाच्या सुखासाठी दुसऱ्याचे जीवन दुःखी करतो किंवा दुसऱ्याच्या सुखासाठी स्वतःचे जीवन दुःखी करतो किंवा स्वतःचेही जीवन दुःखी करतो आणि इतरांचेही जीवन दुःखी करतो काय तुम्ही अशा धर्माचा आदर करणार? काय तुम्ही अशा धर्मावर श्रद्धा ठेवणार?*_

_*जो धम्म स्वतःच्या सुखासोबत इतरांच्याही सुखात वृद्धी करतो आणि कोणत्याही प्रकारचा अत्याचार सहन करीत नाही काय असा धम्म अधिक योग्य धम्म नाही काय?*_

_जे ब्राह्मण समानतेच्या तत्त्वाचे विरोधी होते त्यांना बुद्धा़ंनी असे काही विशेष महत्त्वाचे प्रश्न विचारले._

*_बुद्धांचा धम्म हा माणसाच्या सद्-प्रवृत्तीतून उद्भवणारा न्यायप्रधान असा श्रेष्ठतम धम्म आहे._*

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

*_संकलन - महेश कांबळे_*

*_दिनांक :- २८/०७/२०२४_*

*_संदर्भ :-_*

_*१) भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, तिसरा खंड भाग ५*_

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

Friday, 26 July 2024

बौद्ध संस्कार विधिंसंबंधी

 *नव्या वाटा शोधताना..... बौद्ध संस्कार विधिंसंबंधी थोडे काही....*


जुन्या काळात सात वर्षे पुर्ण झाल्यावर आपण इयत्ता पहिलीत प्रवेश घेत होतो. आणि दगडी पाटीवर पेन्सिलने अ आ इ ई लिहायला शिकत होतो. जेव्हा आपण पेन्सिलने पाटीवर लिहायला शिकत होतो तेव्हा आपले मोठे बहिण भाऊ वहीवर पेनने लिहीत होते. आणि ते पाहून आपल्याला वही आणि पेनाचे आकर्षण वाटत होते. असेच चौथीत गेल्यावर कम्पास पेटीचे आकर्षण वाटु लागे आणि गरज नसतानाही आपण आई वडीलांकडे कम्पास पेटीची मागणी करत असू. पण गम्मत अशी की कम्पास पेटीतील पट्टीशिवाय दुस-या कुठल्याही साहित्याचा उपयोग आपल्याला माहित नसे. इतकेच काय कम्पास, काटकोन, इ. साहित्याचा उपयोग कसा केला जातो हे सुद्धा आपल्याला माहित नसे. अगदी 8व्या, 9व्या इयत्तेत पोहोचेपर्यंत!!!

बौद्ध धम्माच्या बाबतीत आपण आजही काहीसे असेच चाचपडत आहोत असे म्हणावे लागेल. मी बौद्ध धम्माच्या संस्कार पाठासंबंधी बोलत आहे. 1950 सालि बोधिसत्व डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी श्रीलंकेत जाऊन, तेथे प्रचलीत संस्कार विधिंचे संकलन करून, ते पुस्तक रूपाने छापून आपली संस्कार विधिंची अडचण दुर केलेली आहे. तरीसुद्धा आपण त्यातील शब्दांविषयी संभ्रमित होऊन त्या सुत्त अथवा गाथा संस्कार विधीत घ्याव्या अथवा घेऊ नये या विषयी वेगवेगळी मते मांडत असतो.

आपली धार्मिक संस्था या विषयी वेळोवेळी निर्णय घेऊन कोणती सुत्ते आणि गाथा घ्याव्यात या विषयी आदेश पारीत करीत असते.

*हे संस्कार विधी पालि भाषेत असल्याने आणि आपल्याकडे पालि भाषेचा फारसा प्रचार प्रसार नसल्याने, तसेच त्या संस्कार विधींचा मागचा पुढचा संदर्भ लक्षात घेत नसल्याने, केवळ त्यातील शब्द लक्षात घेऊन ब-याच वेळेस आपण त्यांना अंधश्रद्धेच्या अडगळीत टाकण्यास मागेपुढे पहात नाही. ब-याच वेळेस भाषेच्या उच्चाराच्या अडचणीमुळे अथवा पाठांतराच्या अडचणीमुळे बौद्धाचार्य त्या गाळून संस्कार विधी आटोपून घेण्याचा प्रयत्न करीत असतात.*

आपण विज्ञानाधिष्ठीत बौद्ध धम्माचा पुरस्कार करीत असल्याने संस्कार पाठात येणारे स्वर्ग, नरक, ब्राह्मण या शब्दांना बुद्धांच्या उपदेशांचा संदर्भ लक्षात न घेता त्यावर आक्षेप घेत कधी कधी त्यात सोईनुसार बदल करीत असतो.

*अशाप्रकारे आजपर्यंत आपण पत्तिदानासारख्या गाथा गाळलेल्या आहेत. सध्या करणीयमेत्तसुत्त, रतनसुत्त त्यांच्या कठीण उच्चारामुळे आणि पाठांतरास कठीण असल्याने गाळण्याची चर्चा सुरू आहे. विवाहाच्या वेळी वधुवरांकडून वदवून घ्यायची पालि भाषेतील कर्तव्ये सुद्धा अशीच बंद करण्यात आली आहेत.*

पालि भाषेचा विद्यार्थी म्हणून मी या सुत्त आणि गाथांचा तसेच कर्तव्यांचा संदर्भ तिपिटकात शोधण्याचा प्रयत्न केला. आणि त्याचा शोध घेत असताना काही नव्या गोष्टी माझ्या लक्षात आल्या.

येथे मी पती-पत्नीची कर्तव्ये आणि पत्तिदान गाथा याविषयी चर्चा करणार आहे.

पहिल्यांदा मी विवाह प्रसंगी वधुवरांकडून वदवून घ्यावयाची पालि भाषेतील कर्तव्ये सांगणार आहे -

*पतीची कर्तव्ये* 1)सम्माननाय 2)अनवमाननाय 3)अनतिचरियाय 4)इस्सरियवोस्सगेन 5)अलंकारानुप्पदानेन

*पत्नीची कर्तव्ये* 1)सुसंविहित कम्मन्ता च होति 2)संगहितपरिजनाच 3)अनतिचारिनी च 4)सम्भतञ्च अनुरक्खति 5)दक्खा च होति अनलसा सब्बकिच्चेसु

वरील उपदेशात एका सर्वसामान्य गृहस्थाची आणि गृहीणीची कर्तव्ये सांगीतली आहेत. आणि तो भगवान  बुद्धांनी सिगाल नावाच्या गृहपतीपुत्राला दिलेला उपदेश आहे.

भगवंतांचा हा उपदेश आपल्याला *सुत्तपिटकातील दिघनिकाय या ग्रंथातील पाथिक वग्गातील सिंगाल सुत्तातील छद्दिसापटिच्छादनकण्डामध्ये* वाचावयास मिळतो. पालि भाषेतील सुत्ताचा तो अंश आपल्या माहीतीसाठी जसाच्यातसा येथे देत आहे-

0269. “पञ्चहि खो, गहपतिपुत्त, ठानेहि सामिकेन पच्छिमा दिसा भरिया पच्चुपट्ठातब्बा -- *सम्माननाय अनवमाननाय [ अविमाननाय ] अनतिचरियाय इस्सरियवोस्सग्गेन अलङकारानुप्पदानेन.* इमेहि खो, गहपतिपुत्त, पञ्चहि ठानेहि सामिकेन पच्छिमा दिसा भरिया पच्चुपट्ठिता पञ्चहि ठानेहि सामिकं अनुकम्पति -- *सुसंविहितकम्मन्ता च होति, सङगहितपरिजना [सुसङगहितपरिजना] च, अनतिचारिनी च, सम्भतञ्च अनुरक्खति, दक्खा च होति अनलसा सब्बकिच्चेसु.* इमेहि खो, गहपतिपुत्त, पञ्चहि ठानेहि सामिकेन पच्छिमा दिसा भरिया पच्चुपट्ठिता इमेहि पञ्चहि ठानेहि सामिकं अनुकम्पति. एवमस्स एसा पच्छिमा दिसा पटिच्छन्ना होति खेमा अप्पटिभया.

सुत्तातील या भागाचा अर्थ असा  होतो -

"हे गृहपतीपुत्रा, पतीने पत्नीला पश्चिम दिशा मानून पाच प्रकारे सेवा करावी. तीचा सन्मान करावा, तीचा अवमान करू नये, अनाचार करू नये, तीला अन्नधान्याने संतुष्ट ठेवावे, तीला अलंकारादि भूषणाने संतुष्ट ठेवावे.

हे गृहपतीपुत्रा, या पाच प्रकारे पतीने पत्नीला पश्चिम दिशा मानून तीची सेवा केल्यावर ती पाच प्रकारे पतीवर अनुकम्पा करते - घराची उत्तम व्यवस्था ठेवते, परिजनांची काळजी घेते, अनाचारापासून अलिप्त रहाते, पतीच्या संपत्तीचे रक्षण करते, घरकामात आळस न करता दक्ष राहते".

हीच ती पतीची आणि पत्नीची कर्तव्ये आहेत, जी विवाह प्रसंगी वधुवरांकडून वदवून घेतली जात असत. त्याला प्रत्यक्ष भगवंतांच्या उपदेशाचा संदर्भ आहे. विवाहाच्या पुर्वसंध्येला जीथे हळदिसारखे कार्यक्रम आयोजित करून वेळ आणि पैसा उधळला जातो तीथे बौद्धाचार्य अशा प्रकारच्या बुद्ध उपदेशांचा आधार घेवून वधु-वरांना समुपदेशन करू शकतात. परंतु त्या कर्तव्यांना संस्कार विधितून सध्या बगल देण्यात आलेली आहे.

*विधी संस्कारातून वगळण्यात आलेली दुसरी गाथा म्हणजे पत्तिदान गाथा होय.*

पत्तिदान गाथा ही प्रामुख्याने अंतिम संस्काराच्यावेळी आणि पुण्यानुमोदनाच्या वेळी घेतली जात असे. सध्या ती बंद करण्यात आलेली आहे.

*पुण्यानुमोदनालाच जलदान विधी असे देखील म्हटले जाते. जलदान विधी हा शब्द बहुधा पत्तिदान गाथा घेताना जे पाणी सोडले जात असे त्यामुळे अस्तित्वात आला असावा. परंतू येथे एका पात्रातून (तांब्याने किंवा पेल्याने) दुस-या पात्रात पाणी सोडणे हे केवळ प्रतिकात्मक आहे.*

*पुण्यानुमोदन म्हणजे आपल्या मृत नातेवाईकांच्या पुण्य कर्माचे अनुमोदन करणे किंवा त्यांना धन्यवाद देणे. या प्रसंगी भिक्खू संघाला दान दिल्यानंतर सुद्धा ते आपल्या दानाचे अनुमोदन करतात. अनुमोदन या शब्दाचा अर्थ स्विकार करणे, सहमती दर्शवणे, धन्यवाद देणे असा होतो.*

येथे ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती ही की जेथे दान दिले जाते तेथे ही गाथा समर्पक आहे. परंतु जेथे दान दिले जात नसेल तरीही तेथे ही गाथा घेणे हे निरर्थक आहे.

मला इथे नमुद करावेसे वाटते की पत्तिदान म्हणजे जलदान नव्हे. *पत्तिदान* हा पालि शब्द पत्ति आणि दान अशा दोन शब्दांचा बनलेला आहे. यात पत्ति म्हणजे प्राप्ती आणि दान हा त्यातला दुसरा शब्द आहे. आपण प्राप्तिदान असा या शब्दाचा अर्थ लाऊ शकतो.

प्राप्ती कसली तर गृहस्थी मनुष्य जीवन जगत असताना जी काही दानादी कुशल कर्में करून पुण्य अर्जित करतो ती पुण्याची प्राप्ती. त्या पुण्य कर्मांचे मैत्री भावनेने आपल्या आप्तजनांना वितरण करणे म्हणजे प्राप्तिदान अर्थात *पत्तिदान होय.* याला पुण्य वितरण असे म्हणतात.

साधना करीत असताना अखील जगातील प्राणीमात्रांविषयी जी मेत्ता भावना व्यक्त केली जाते त्यातलाच हा संदर्भ आहे.

पत्तिदान गाथेत खालिल गाथा अंतर्भूत करण्यात आलेल्या आहेत.

इदं वो ञातिनं होतु, सुखिता होन्तु ञातयो.

उन्नमे उदकं वुठ्टं, यथा निन्नं पवत्तति.

एवमेव इतोदिन्नं, पेतानं उपकप्पति.

यथा वारिवहा पुरा, परिपूरेन्ति सागरं.

एवमेव इतोदिन्नं, पेतानं उपकप्पति.

इच्छितं पत्तितं तुय्हं खिप्पमेव समिज्झतु.

सब्बेपुरेन्तु चित्तसंकप्पा चन्दोपन्नरसो यथा.

आयुरारोगसम्पति, सग्गसम्पतिमेवच.

ततो निब्बाणसम्पति इमिना ते समिज्झतु.

अनिच्चवत संखारा उप्पाद वय धम्मिनो

उपजित्वा निरूज्झन्ति तेसं उपसमो सुखो.

कालकतानं अम्हाकं ञातिनं पुञ्ञत्थइमं भिक्खं भिक्खुसंघस्स देमं.

तिपिटकात वरील गाथांचा शोध घेतल्यास त्या एकाच सुत्तातील नसून वेगवेगळ्या सुत्तांतून संकलीत केलेल्या आहेत असे दिसून येते.

*यातील पहिल्या कडव्यातील पाच ओळी 'इदं वो ञातिनं. .....' या सुत्तपिटकातील खुद्दकनिकायातील पेतवत्थु या ग्रंथातील उरगवग्गो, तिरोकुट्टपेतवत्थुमध्ये तसेच खुद्दकपाठातील तिरोकुट्टसुत्तामध्ये वाचावयास मिळतात.*

*अट्ठकथेनूसार भगवान बुद्ध जेव्हा ज्ञानप्राप्तिनंतर राजगृहात राजा बिम्बीसाराला भेटावयास आले तेव्हा बिम्बीसाराने भिक्खुसंघाला भोजनदान दिले. त्या रात्री राजाला अकुशल स्वप्ने पडली आणि तो अस्वस्थ झाला. दुस-यादिवशी राजाने ही गोष्ट बुद्धांना सांगीतली. तेव्हा बुद्धांनी राजाला सांगीतले की तू काल जे भोजनदान दिले त्याचे पुण्याचे वितरण तू तुझ्या पेतलोकातील आप्तांस केले नाहीस. म्हणून तूला भयकारक स्वप्ने पडली. म्हणून दुस-या दिवशी जेव्हा राजाने भिक्खू संघाला दान दिले तेव्हा बुद्धांच्या सांगण्यावरून या दानफळाने माझे मृत्यूपावलेले आप्तजन सुखी होवो असे म्हणाला (इदं वो ञातिनं....). अट्ठकथेत याला उपकथासुद्धा आली आहे. ती येथे देत नाही. तिरोकुट्ठ सुत्ताच्या अट्ठकथेतील हा संदर्भ विनयपिटकातील महावग्गाध्ये मात्र आलेला नाही. त्यात म्हटले आहे की राजाने सोन्याच्या झारीतून बुद्धांच्या हातावर पाणी सोडून वेळूवन दान केले.*

*मात्र खुद्दकपाठ अट्ठकथेत अंगुत्तर निकायातील - दसकनिपात, चतुत्थपण्णासकं, जाणुस्सोणिवग्गो, जाणुस्सोणिसुत्तं या सुत्ताचा संदर्भ देण्यात आला आहे. हा जाणुस्सोणि ब्राह्मण आणि बुद्ध यांच्यात झालेला संवाद आहे. या संवादावरून असे दिसून येते की बुद्धपुर्व काळात आपल्या मृत आप्तस्वकीयांसाठी दान पुण्य करण्याची प्रथा ब्राह्मण धर्मात प्रचलीत होती. जाणुस्सोणि ब्राह्मणाने बुद्धांना विचारले की आम्ही ब्राह्मण लोक आमच्या मृत नातेवाईकांना मिळावे म्हणून दान धर्म करतो. काय ते आमच्या मृत नातेवाईकांना मिळते? बुद्धांनी उत्तर दिले की निरय, तिरच्छान, असुर, मनुष्य, देव या योनितील लोकांना मिळत नाही कारण ते त्या त्या योनितील उपलब्ध साधनांनूसार जीवन यापन करतात. त्यांना असल्या दानाची आवश्यकता नाही. परंतू पेतयोनितील लोक परावलंबी असल्याने येथून त्यांचे जे आप्तजन देतात त्यावर ते जीवन यापन करतात. त्यामुळे त्यांना ते मिळते.*

यात बुद्धांनी नमुद केले आहे की, जरी दान मृत आप्तजनांच्या सुखासाठी दिले जाते तरी दान दाता निष्फळ रहात नाही. तर त्याच्या कर्मानूसार तो ज्या ज्या योनित भवसंसरण करीत असतो तेथे तेथे त्याला या पुण्यकर्माच्या निमित्ताने सम्पन्नता लाभते. येथे संवादाचा विषय सोडला तर *या उपदेशात बुद्धांनी मनुष्य जीवनात शील पालनाचे महत्व, कुशल कर्म, कर्मानूसार प्राण्यांनी सुगती अथवा दुर्गती, दानाचे महत्व स्पष्ट केले आहे.*

आता आपण वरील गाथांच्या अर्थासंबंधी चर्चा करूयात.

आधिच म्हटल्याप्रमाणे पत्तिदान गाथा या कोणत्याही एकाच उपदेशातील नसून त्या वेगवेगळ्या उपदेशांतून आणि अट्ठकथांमधून निवडलेल्या आहेत. अट्ठकथांचा काळ हा चवथ्या पाचव्या शतकाचा मानला जातो त्यामुळे या निवडून तयार केलेल्या गाथांचा काळ हा त्यानंरचा मानला जाऊ शकतो.

यातील-

इदं वो ञातिनं होतु, सुखिता होन्तु ञातयो.

उन्नमे उदकं वुठ्टं, यथा निन्नं पवत्तति.

एवमेव इतोदिन्नं, पेतानं उपकप्पति.

यथा वारिवहा पुरा, परिपूरेन्ति सागरं.

एवमेव इतोदिन्नं, पेतानं उपकप्पति.

ही गाथा खुद्दकपाठ आणि पेतवत्थु या ग्रंथातील असल्याने मुळ तिपिटकातील आहे. 

याचा अर्थ -

आप्तजनांसाठी दिलेल्या या दानाने, आप्तजन सुखी होवोत.

पावसाचे पाणी जसे वरून खाली वाहात जाते, त्याचप्रमाणे इथून दिलेले प्रेतांना प्राप्त होवो.

वाहणा-या नद्या जशा सागराला मिळतात, तसे इथून दिलेले प्रेतांना मिळो, असा होतो. आणि ही एक प्रतिकात्मक गाथा आहे.

या गाथांना अट्ठकथेनूसार बिम्बिसार राजाच्या दानकथेचा संदर्भ आहे. 

पुण्यानुमोदन प्रसंगी मृताचे नातेवाईक भिक्खू संघाला भोजनादी दान देत या गाथा उच्चारून आपल्या या दानाने अर्जित पुण्य आपल्या मृत आप्तजनांना वितरीत करतो.

इथे एक गोष्ट लक्षात घ्यावी की, दिलेले दान हे आमच्या आप्तजनांना मिळो असे म्हटले असले तरी, प्रत्यक्ष दान भिक्खू संघाला दिले जाते आणि या दानाचे अनुमोदन भिक्खुसंघ त्यापुढील गाथेत करतो ते असे....

इच्छितं पत्तितं तुय्हं खिप्पमेव समिज्झतु.

सब्बेपुरेन्तु चित्तसंकप्पा चन्दोपन्नरसो यथा.

आयुरारोगसम्पति, सग्गसम्पतिमेवच.

ततो निब्बाणसम्पति इमिना ते समिज्झतु.

अट्ठकथेनूसार वरील पहिल्या गाथेत पच्चेकबुद्ध अधिष्टान करणा-या बोधिसत्वाचे अधिष्टान पुर्ण होवो असे आशीर्वचन देत आहेत.

मात्र पत्तिदान गाथेत ही गाथा दान देणा-या मृताच्या नातेवाइकांच्या दानाचे अनुमोदन करण्यासाठी भिक्खुसंघ उच्चारीत आहे.

त्याचा अर्थ असा -

तुमचे इच्छित तुम्हाला शिघ्रगतीने प्राप्त होवो. तुमच्या चित्तातले सर्व  संकल्प पौर्णिमेच्या चन्द्राप्रमाणे पुर्ण होवोत.

आणि दुस-या गाथेचा अर्थ -

तुम्हाला आयुष्य, आरोग्य, स्वर्गादि संम्पत्ति तसेच निब्बाणसम्पति प्राप्त होवोत असा होतो.

यातील 'आयुरारोग्यसम्पत्तिसग्गसम्पत्तिमेवच ततो निब्बाणसम्पति' या शब्दांविषयी थोडीशी अधिक माहिती घेऊया.

पालि साहित्यात तीन प्रकारच्या सम्पत्ती सांगीतल्या आहेत, त्या म्हणजे मनुष्यसम्पत्ती, दिव्यसम्पत्ती, निब्बानसम्पत्ती.

यात आयुष्य, आरोग्य या श्रेष्ठ मनुष्य सम्पत्ती होत.

दिव्य सम्पत्ती म्हणजे कुशल कर्मांच्या योगाने प्राप्त होणा-या स्वर्गादी सुगती.

आणि तीसरी निर्वाण ही यातील सर्वश्रेष्ठ सम्पत्ती होय.

प्रस्तुत गाथेत दान दात्याच्या दानाचे अनुमोदन करताना, भिक्खुसंघ तुम्हाला या तीनही प्रकारच्या श्रेष्ठ संम्पत्ति प्राप्त होवोत असे आशिर्वचन उच्चारीत आहे.

यानंतर पुढील गाथा येते -

अनिच्चा वत सङखारा, उप्पादवयधम्मिनो. 

उप्पज्जित्वा निरुज्झन्ति, तेसं वूपसमो सुखो”

*हा बुद्धांचा मुळ उपदेश आहे. सर्व संस्कार अनित्य आहेत. उत्पन्न होणे आणि नाश पावणे हा त्यांचा स्वभाव आहे. जे उत्पन्न होऊन नाश पावणारे आहे त्यांचे उपशमन करणे सुखदायक आहे. असा त्याचा अर्थ आहे.*

येथे मृत व्यक्तीच्या पुण्यानुमोदन प्रसंगी मृताच्या आप्तजनांना भिक्खुसंघ हा धम्मोपदेश देत आहेत.

आणि मग शेवटी मृताचे आप्तजन पुन्हा म्हणत आहेत -

कालकतानं आम्हाकं ञातिनं पुञ्ञत्थइमं भिक्खं भिक्खुसंघस्स देमं.

*अर्थात आमच्या मृतपावलेल्या आप्तजनांच्या पुण्यप्राप्तिसाठी आम्ही हे दान (भिक्षा) भिक्खुसंघाला देत आहोत.*

अशाप्रकारे ही पत्तिदान गाथा इथे पुर्ण होते.

गृहस्थी जीवन जगत असताना माणूस मनःशांतीच्या शोधात असतो. त्यात त्याला कधी कधी आप्तजनांच्या मृत्यू सारख्या भयंकर दु:खद प्रसंगाना सामोरे जावे लागते. अशा आप्तजनांच्या शोकातून मनाला उभारी देण्यासाठी त्या आप्तजनांच्या पुण्यकर्मांचे अनुमोदन करून त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचे पुण्यानुमोदन हे एक साधन आहे असे आपणास म्हणता येईल.

पुण्यानुमोदनाची ही प्रथा केवळ भारतातच अस्तित्वात आहे असे नव्हे तर श्रीलंका, चीन, जपान, तिबेट या सारख्या सर्वच बौद्ध देशात अस्तित्वात आहे.

*विज्ञानावर आधारीत बौद्ध धम्म स्विकारताना बोधिसत्व डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी तिपिटकाला न नाकारता 'बुद्ध आणि त्यांचा धम्म' या ग्रंथाच्या माध्यमातून तो विज्ञानवादी दृष्टीकोनातून नव्याने तपासून मांडला आहे.*

मग भारतातील बौद्धांनी,  त्यांनी जे सध्या बौद्ध रितीरिवाज म्हणून स्विकारले आहेत, परंतू त्यात त्यांना काही प्रमाणात अंधश्रद्धा वाटते,  तरीही जगभरातील बौद्ध देशातसुद्धा ते प्रचलीत आहेत अशा रीतिरिवाजांना न नाकारता त्यांना विज्ञानवादी दृष्टीकोनातून तपासून त्यांची नव्याने मांडणी का करू नये?

समाजात मैत्री आणि करूणेची भावना रूजवण्यासाठी अशा प्रकारची दानादी पुण्य कर्मे करण्याच्या या प्रथा म्हणजे सिद्धांत आणि तो प्रत्यक्ष कृतीत उतरवण्यासाठी उपलब्ध केलेले क्षेत्र आहे असे का मानू नये?

*_आयु. किरण कृष्णा जाधव - एम.ए. - पालि (मुंबई विद्यापीठ)_*

_*केन्द्रिय शिक्षक - बी.एस.आय.*_

मो. 7887556729

संदर्भ - 1) दीघनिकाय - सिगालसुत्त 2)अंगुत्तरनिकाय, चतुत्थपण्णासकं, जाणुस्सोणिवग्गो 3)विनयपिटक - महावग्ग 4)खुद्दकनिकाय - खुद्दकपाठ, सुत्तनिपात, पेतवत्थु आणि त्यांच्या अट्ठकथा 5)Merit Transference in Sinhalese Buddhism : A case study of the interaction between Doctrine and Practice - By Richard Gombrich

माणूस जन्माने नव्हे, कमनि श्रेष्ठ किंवा कनिष्ठ होतो

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_सद्धम्म म्हणजे काय?_*

_*(ड) धम्माने सर्व सामाजिक भेदभावांना मूठमाती दिली तरच धम्म सद्धम्म होतो*_

_*२. माणूस जन्माने नव्हे, कमनि श्रेष्ठ किंवा कनिष्ठ होतो. अशी शिकवण असेल तेव्हाच धम्म सद्धम्म होतो*_

*_(क्रमशः)_*

*_!! ॐ मणी पद्मे हूँ !!_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2024/07/blog-post_26.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

_ब्राह्मण ज्या चातुर्वर्ण्य सिद्धांताचा पुरस्कार करतात तो सिद्धांत जन्माधिष्ठित आहे. एक व्यक्ती ब्राह्मण आहे कारण ती व्यक्ती ब्राह्मण मातापित्याच्या उदरी जन्माला आली आहे. एक व्यक्ती क्षत्रिय आहे कारण ती व्यक्ती क्षत्रिय मातापित्याच्या उदरी जन्माला आली आहे. एक व्यक्ती वैश्य आहे कारण ती व्यक्ती वैश्य मातापित्याच्या उदरी जन्माला आली आहे. आणि एक व्यक्ती शूद्र आहे कारण ती व्यक्ती शूद्र मातापित्याच्या उदरी जन्माला आली आहे._

*_माणसाचे श्रेष्ठत्व ब्राह्मणांच्या मतानुसार त्याच्या जन्मावर अवलंबून आहे. अन्य कशावरही नाही._*

*_बुद्धांनी जसा चातुर्वर्ण्यचा सिद्धांत धिक्कारला तसाच हाही सिद्धांत धिक्कारला._* _त्यांचा सिद्धांत ब्राह्मणांच्या या सिद्धांताच्या सर्वथा विरोधी असा होता. *"मनुष्य आपल्या जन्माने नव्हे तर आपल्या कर्माने श्रेष्ठ किंवा कनिष्ठ ठरतो."* असा त्यांचा सिद्धांत होता. *माणसाचे मूल्यांकन त्याच्या जन्माने नव्हे तर त्याच्या कर्माने व्हावे अशी त्यांची मान्यता होती.*_

_ज्याप्रसंगी बुद्धांनी आपल्या या सिद्धांताची देशना दिली तो प्रसंगसुद्धा विशेष होता. एकदा तथागत अनाथपिंडकाच्या जेतवनारामात श्रावस्ती येथे वास्तव्याला होते. एके दिवशी माध्याह्नापूर्वी त्यांनी आपले भिक्षापात्र धारण केले आणि ते चारिकेस्तव श्रावस्ती नगरीत प्रवेश करते झाले._

_त्यावेळी यज्ञाग्नी प्रज्वलित होता आणि यज्ञाची तयारी सुरू होती तेव्हा तथागत द्वारोद्वारी चारिका करीत ब्राह्मण याज्ञिकाच्या द्वारी पोहोचले._

_दुरूनच तथागतांना येताना पाहून तो ब्राह्मण क्रोधित झाला आणि म्हणाला, "हे मुंडका, तेथेच थांब, हे करंट्या तेथेच थांब, हे दीन वृषला, हे दीन बहिष्कृता, तेथेच थांब."_

_*जेव्हा तो ब्राह्मण असे बोलला तेव्हा तथागत त्याला उद्देशून म्हणाले, "हे ब्राह्मणा, वृषल कोण, बहिष्कृत कोण हे तुला माहीत आहे काय? किंवा माणूस कशामुळे वृषल होतो, कशामुळे बहिष्कृत होतो हे तू जाणतोस काय?"*_

_"नाही श्रमण गौतमा, वृषल कोण? बहिष्कृत कोण? हे मी जाणत नाही. आणि खरेच माणूस कशामुळे वृषल होतो बहिष्कृत होतो हेही मी जाणत नाही."_

_तथागत वदले, "जर वृषल कोण आणि तो वृषल कसा होतो, हे तू जाणून घेतलेस तर त्यात तुझी काहीही हानी होणार नाही." जर तुझा आग्रहच आहे की मी हे जाणून घ्यावे तर" ब्राह्मण याज्ञिक म्हणाला, "मग तू मला ते स्पष्ट करून सांगावे.'_

_ब्राह्मणाचा असा प्रतिसाद मिळाल्यावर तथागत पुढीलप्रमाणे बोलले,_

१. *"जो माणूस क्रोधी आहे, लोभी आहे, अनैतिक आहे. चहाडीखोर आहे, मिथ्यादृष्टी आहे, वंचक आहे त्याला वृषल जाणावे.*

२. *"कोणीही एकज अथवा द्विज असो, जो या जगी प्राणिमात्रांना आहत करतो, ज्याच्या चित्तात प्राणिमात्रांविषयी करुणा नाही त्याला हे ब्राह्मणा, वृषल जाणावे."*

३. *"जो गावांना, नगरांना वेढा घालून उद्ध्वस्त करतो त्याला हे ब्राह्मणा, वृषल जाणावे."*

४. *"अरण्यात असो अथवा नगरात असो जो दुसऱ्याच्या वस्तूचा अपहार करतो, जो चौर्यकर्म करतो त्याला हे ब्राह्मणा, वृषल जाणावे."*

५. *"जो कोणाचे ऋण घेतो आणि असे म्हणतो की, मी कोणाचेही काहीही देणे लागत नाही आणि पलायन करतो त्याला हे ब्राह्मणा, वृषल जाणावे."*

६. *"जो कोणी एखाद्या क्षुल्लक वस्तूच्या कामनेने वाटसरूचा वध करतो आणि त्याला लुबाडतो त्याला हे ब्राह्मणा, वृषल जाणावे."*"

७. *जो कोणी स्वहितास्तव अथवा अन्य कोणाच्याही हितास्तव अथवा धनलोभाने साक्षीकरिता बोलाविल्यावर खोटी साक्ष देतो त्याला हे ब्राह्मणा, वृषल जाणावे."

८. *"जो कोणी बलप्रयोगाने अथवा त्यांच्या संमतीने आपल्या आप्तमित्रांच्या भार्याशी व्यभिचार करतो त्याला हे ब्राह्मणा, वृषल जाणावे.*

९. *"जो धनधान्य संपन्न असून ज्यांचे यौवन ओसरले आहे अशा आपल्या मातापित्याचा प्रतिपाळ करीत नाही त्याला हे ब्राह्मणा, वृषल जाणावे."*

१०. *"जो कोणी कुशल धर्माची विचारणा केल्यावर अकुशल धर्माची शिक्षा देतो आणि तीही गूढ रहस्य ठेवून, तेव्हा हे ब्राह्मणा, अशा व्यक्तीला वृषल जाणावे."*

_*"कोणीही जन्माने वृषल नाही आणि कोणीही जन्माने ब्राह्मण नाही."* याज्ञिकाने जेव्हा हे श्रवण केले तेव्हा, त्याने तथागतांना शिव्याशाप दिल्याबद्दल तो लज्जित झाला._

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

*_संकलन - महेश कांबळे_*

*_दिनांक :- २७/०७/२०२४_*

*_संदर्भ :-_*

_*१) भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, तिसरा खंड भाग ५*_

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

Thursday, 25 July 2024

धम्म माणसामाणसातील भेदभाव नष्ट करीत असेल तरच धम्म सद्धम्म होतो

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_सद्धम्म म्हणजे काय?_*

_*(ड) धम्माने सर्व सामाजिक भेदभावांना मूठमाती दिली तरच धम्म सद्धम्म होतो*_

_*१. धम्म माणसामाणसातील भेदभाव नष्ट करीत असेल तरच धम्म सद्धम्म होतो*_

*_(क्रमशः)_*

*_!! ॐ मणी पद्मे हूँ !!_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2024/07/blog-post_64.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

_आदर्श समाज काय आहे? ब्राह्मणांच्या मतानुसार वेदांनी आदर्श समाज व्याख्यायित केला आहे आणि वेद हे प्रमादातीत आहेत. त्यामुळे माणसांकरिता आदर्श समाज म्हणजे वेदांनी व्याख्यायित केलेला समाजच होय. *वेदांनी पुरस्कारलेली आदर्श समाज- व्यवस्था 'चातुर्वर्ण्यव्यवस्था' म्हणून संबोधिली जाते.* अशा आदर्श समाजव्यवस्थेने वेदानुसार तीन अटींची पूर्तता करणे अनिवार्य आहे. *या समाज व्यवस्थेत चार वर्ग असलेच पाहिजेत. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र.*_

_या चार वर्गातील परस्पर संबंधाचे नियमन आणि नियंत्रण स्तरीकृत असमानतेच्या तत्त्वानुसारच व्हावे. दुसऱ्या शब्दात हे सर्व वर्ग समान स्तरावर नसतील. तर एकावर दुसरा याप्रकारे स्तरीकृत असतील. त्यांच्यात सामाजिक दर्जा, अधिकार आणि विशेष सुविधा यांच्या संदर्भात स्तरीकृत असमानता असेल. सर्वोपरी ब्राह्मण, क्षत्रियांचे स्थान ब्राह्मणांपेक्षा कनिष्ठ पण वैश्यांपेक्षा श्रेष्ठ, वैश्यांचे स्थान क्षत्रियांपेक्षा कनिष्ठ पण शुद्रांपेक्षा श्रेष्ठ आणि शूद्र सर्वात शेवटी, निकृष्टतम._

_*या व्यवस्थेचे तिसरे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक वर्गाने त्या वर्गासाठी निर्धारित नियोजित व्यवसायच करावा. ब्राह्मणांचा व्यवसाय म्हणजे अध्ययन, अध्यापन आणि धर्मसंस्कार करणे, क्षत्रियांचा व्यवसाय म्हणजे शस्त्रधारणा आणि युद्ध करणे, वैश्यांचा व्यवसाय म्हणजे व्यापार उदीम आणि शूद्रांचा व्यवसाय वरच्या त्रैवर्णिकांची सेवा चाकरी. शारीरिक श्रमाची, सामाजिक प्रतिष्ठेच्या दृष्टीने हलकी कामे करणे.*_

_*कोणताही वर्ग दुसऱ्या वर्गाच्या व्यवसाय क्षेत्रात अतिक्रमण करू शकत नव्हता. आपल्या व्यवसाय सीमेचे उल्लंघन करू शकत नव्हता. ही आदर्श समाजाची संकल्पना ब्राह्मणांनी स्वीकारली, उचलून धरली आणि लोकांना शिकविली.*_ 

_या सिद्धांताचा गाभा स्वाभाविकच असमानता हा आहे. सामाजिक असमानता हा ऐतिहासिक विकास प्रक्रियेचा परिणाम नव्हे. असमानता हा ब्राह्मणवादाद्वारा पुरस्कृत सिद्धांत होय._

*_बुद्धांनी याच सिद्धांताचा पाळामुळा-सहित विरोध केला. बुद्ध जातिव्यवस्थेचा घोर विरोधक होते. ते समानतेचे पाईक आणि खंबीर समर्थक होते. जातिव्यवस्थेचे समर्थन करणारा असा कोणताही तर्क नाही, असा कोणताही युक्तिवाद नाही ज्याचा त्यांनी धिक्कार केला नाही, खंडन केले नाही. बुद्धांना या विषयावर अनेक ब्राह्मणांनी आव्हान दिले. परंतु बुद्धांपुढे ते सर्व पूर्णाशाने मौन झाले, शांत झाले._*

_*अश्वलायन सुत्तात* एक कथा कथन करण्यात आली आहे. एकदा ब्राह्मणांनी आपल्या-पैकी एकाला, अश्वलायनाला बुद्धांकडे जाऊन जातिव्यवस्था आणि असमानता यासंबंधी त्यांच्या विचारांच्या सत्यतेसंबंधी वाद उपस्थित करण्यासाठी प्रेरित केले. अश्वलायन बुद्धांकडे गेला आणि ब्राह्मण कसे सर्वश्रेष्ठ आहेत हा पक्ष त्याच्या समक्ष प्रस्तुत केला._

_तो म्हणाला, "हे श्रमण गौतमा, ब्राह्मणांची धारणा आहे की, फक्त ब्राह्मणच श्रेष्ठवर्गीय आहेत. अन्य सर्व हे कनिष्ठ वर्गाचे आहेत. फक्त ब्राह्मणच शुक्लवर्णीय आहेत. अन्य सर्व कृष्णवर्णीय आहेत. अन्य सर्व कनिष्ठ वर्गाचे आहेत. पावित्र्य हे फक्त ब्राह्मणांतच वास करते. अब्राह्मणात पावित्र्य वास करीत नाही. ब्राह्मणच ब्रह्माची औरस संतती होत. ब्राह्मण ब्रह्माच्या मुखातून जन्मले आहेत. ब्राह्मणच फक्त ब्रह्माची अपत्ये आहेत ब्रह्माची निर्मिती आहेत. त्याचे उत्तराधिकारी आहेत. या विषयावर श्रमण गौतमाचे काय म्हणणे आहे."_

_बुद्धांच्या उत्तराने अश्वलायन हतप्रभच झाला. *बुद्ध कथन करते झाले, "अश्वलायना, काय ब्राह्मणांच्या ब्राह्मण भार्या ऋतुमती होत नाहीत, त्या गर्भ धारणा करीत नाहीत, काय त्या संतती प्रसवत नाहीत ? एवढे सर्व असूनही तू सांगितलेस तशीच ब्राह्मणांची धारणा आहे काय? जरी तेही इतरांसारखेच स्त्रीच्या गर्भातून जन्मले असले तरीही."*_

 _अश्वलायनाने कोणतेही उत्तर दिले नाही._

_बुद्धांनी पुढे जाऊन अश्वलायनास दुसरा प्रश्न केला. *"समजा हे अश्वलायन, एक युवा क्षत्रिय ब्राह्मण कन्येबरोबर सहवास करतो. तर होणारी संतानोत्पत्ती काय असेल?" "काय तो मनुष्यप्राणी असेल ? अथवा अन्य प्राणिमात्र असेल?"*_

_यावरही अश्वलायनाने कोणतेही उत्तर दिले नाही._

_*"जेथपर्यंत नैतिक उन्नतीचा संबंध आहे. फक्त ब्राह्मणच आपल्या चित्तात राग, द्वेष, दुर्भावना विरहित प्रेम उत्पन्न करू शकतात काय? अन्य त्रैवर्णिकांना हे शक्य नाही काय?"*_

_"नाही. असे काहीही नाही. सर्वच चारही वर्णातील जनांना हे शक्य आहे." अश्वलायन उत्तरला._

_*" अश्वलायना, तू हे ऐकले आहेस काय?" बुद्धांनी विचारणा केली. "यवन आणि काम्बोज देशात आणि त्या देशांच्या आसपासच्या देशांत फक्त दोनच वर्ग आहेत. हे दोन वर्ग म्हणजे स्वामी आणि दास हे होत. आणि त्या व्यवस्थेत स्वामीचा दास होऊ शकतो आणि दासाचा स्वामी होऊ शकतो."*_

_"होय मी हे ऐकले आहे." अश्वलायन उत्तरला._

_*"जर तुमची चातुर्वर्ण्य व्यवस्था आदर्श आहे तर मग ती सार्वत्रिक का नाही?"*_

_यापैकी कोणत्याही मुद्यावर अश्वलायन आपल्या जातीव्यवस्था आणि असमानतेच्या सिद्धांताचे समर्थन करू शकला नाही. तो पूर्णपणे मौनच राहिला. अंततः त्याने बुद्धांचे अनुगामित्व स्वीकारले._ 

_*वासेट्ठ नावाच्या ब्राह्मणाने तथागतांचा धम्म स्वीकारला होता.* त्याच्या धम्मग्रहणाविषयी इतर ब्राह्मण त्याची निंदा करीत असत. एकदा तो बुद्धांकडे गेला आणि इतर ब्राह्मण त्याची कशी निंदा करतात हे त्याने कथन केले._

_तेव्हा वासेठ्ठ म्हणाला, "तथागत, ब्राह्मण असे म्हणतात की, ब्राह्मणांचा सामाजिक दर्जा श्रेष्ठ आहे. इतरांचा सामाजिक दर्जा कनिष्ठ आहे. फक्त ब्राह्मणच शुक्लवर्णाचे आहेत. इतर सर्व कृष्णवर्णाचे आहेत. फक्त ब्राह्मणच शुद्ध बीजोत्पत्र आहेत. अब्राह्मण नाहीत. फक्त ब्राह्मणच ब्रह्माची औरस संतती आहेत. तेच त्याच्या मुखातून जन्म पावले. तेच ब्रह्माचे पुत्र आहेत. ब्रह्माची निर्मिती आहेत. ब्रह्माचे उत्तराधिकारी आहेत._

_*"तुमच्याविषयी बोलावयाचे झाल्यास ते म्हणतात, तुम्ही अभिजात वर्गाचा त्याग करून कनिष्ठतम वर्गाची संगती केली आहे. तुम्ही त्या मुंडन केलेल्या श्रमणात सामील झाला आहात. तुम्ही कृष्णवर्गीयात सामील झाला आहेत. तुम्ही ब्रह्माच्या चरणातून उत्पत्र शुद्रांच्या वंशजात सामील झाला आहात. असंस्कृत श्रमणात सामील झालात. तुमच्याकरिता हे करणे उचित नव्हे. असे करणे योग्य नव्हे. काय हे योग्य आहे की, तुम्ही आपल्या अभिजात वर्गाचा त्याग करून कनिष्ठत्तम वर्गाची संगती करावी. मुंडन केलेल्या श्रमणात सामील व्हावे. सामान्यजनात, यजनात, श्रमणात, कृष्णवर्णीयात, आमच्या जातीच्या चरणातून उत्पन्न झालेल्यांच्या वंशात सामील व्हावे."*_ 

_"भगवन् या शब्दात ब्राह्मण मला दोष देतात. माझी निंदा करतात. मला शिव्याशाप देतात आणि हे सर्व करताना त्यात ते कोणतीही कसर ठेवीत नाही."_

_*बुद्ध वदले, "वासेष्ठ, ब्राह्मण जर असे कथन करीत असतील तर ब्राह्मण निश्चितच आपली प्राचीन परंपरा विसरले आहेत. इतर वर्णीयाप्रमाणेच ब्राह्मणांच्या भार्याही संतानोत्पत्ती करताना, त्यांचे पालनपोषण करताना दिसतात. स्त्रीच्या गर्भातून जन्मलेले हेच ब्राह्मण असे म्हणतात की, ते ब्रह्माचे औरस पुत्र आहेत. ब्रह्माच्या मुखातून जन्मले आहेत. ते ब्रह्माची संतान आहेत. ते ब्रह्माची निर्मिती आहेत. ते ब्रह्माचे उत्तराधिकारी आहेत. ते असे बोलून ब्रह्माची प्रकृती आणि प्रवृत्तीची चेष्टाच करतात."*_ 

_एकदा *एसुकारी ब्राह्मण* तीन प्रश्न घेऊन बुद्धाशी शास्त्रार्थ करण्याकरिता गेला. त्याने उपस्थित केलेला प्रथम प्रश्न हा व्यवसायाच्या स्थायी विभाजनाशी, वर्गीकरणाशी संबंधित होता. या व्यवस्थेच्या समर्थनार्थ त्याचा युक्तिवाद असा होता की, "हे तथागता, मी तुला एक प्रश्न विचारणार आहे. ब्राह्मण असे म्हणतात की ते कोणाचीही सेवा करणार नाहीत. कारण ते सर्वश्रेष्ठ आहेत. इतर सर्व त्यांची सेवा करण्यासाठीच जन्म पावले आहेत."_

_"श्रमण गौतमा, सेवेचे चार वर्ग आहेत. १. ब्राह्मणाद्वारा केली जाणारी सेवा, २. क्षत्रियाद्वारा केली जाणारी सेवा. ३. वैश्याद्वारा केली जाणारी सेवा आणि ४. शुद्राद्वारा केली जाणारी सेवा. परंतु एका शुद्राची सेवा दुसरा शुद्रच करू शकतो. अन्य कोण शुद्राची सेवा करणार? श्रमण गौतमाचे या संबंधात काय विचार आहेत?" बुद्धांनी विचारणा केली की, "संपूर्ण जगच ब्राह्मणांच्या या वर्गीकरणाशी सहमत आहे काय?"_

_बुद्धांनी त्याला प्रतिप्रश्न विचारून उत्तर दिले. *"माझ्या संबंधात बोलावयाचे झाल्यास मी असे म्हणणार नाही की सर्व सेवा केल्याच पाहिजेत. आणि मी असेही म्हणणार नाही की, सर्व सेवा न केल्या पाहिजे. परंतु एखादी सेवा केल्याने माणसाची स्थिती अवनत होत असेल. उन्नत होत नसेल. तर ती सेवा केली जाऊ नये. पण ती सेवा केल्याने त्याची स्थिती उन्नत होत असेल. अवनत होत नसेल तर ती सेवा केली पाहिजे."*_

_*"हेच एकमेव असे सूत्र आहे की, ज्याच्या आधारे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शुद्रांच्या सेवांचा समानतेने विचार व्हावा. प्रत्येकाने ती सेवा नाकारावी जी त्याला अवनत अवस्थेला नेते. प्रत्येकाने तीच सेवा करावी जी त्याला उन्नत अवस्थेला नेण्यास सहायक ठरते."*_

_एसुकारीने दुसरा प्रश्न उपस्थित केला, "माणसाचा सामाजिक दर्जा निर्धारित करतेसमयी, त्याचे पूर्वज, त्याची वंशपरंपरा याचा विचार का केला जाऊ नये?"_ 

_या प्रश्नाला बुद्धांनी अशाप्रकारे उत्तर दिले, *"वंशपरंपरेच्या अभिमानाबाबत एवढेच म्हणता येईल की, माणूस ज्या वंशात जन्म ग्रहण करतो त्या आधारावर हा ब्राह्मण वंशात जन्मला, हा क्षत्रिय वंशात जन्मला, हा वैश्य वंशात जन्मला, हा शूद्रवंशात जन्मला, अग्नीसुद्धा ज्या इंधनातून उत्पन्न होतो त्याच्या नावानेच ओळखला जातो. जसे ओंडक्याचा अग्नी, ढलप्याचा अग्नी, काट्याकुट्यांचा अग्नी, शेणीचा अग्नी एवढेच. माणसाकरिता सद्धम्म म्हणजेच वास्तविक संपदा होय. जन्माने माणसाची गणती कोणत्या ना कोणत्या वर्णात होईल एवढेच." "वंशपरंपरा, सुंदर मुख किंवा धनसंपदा यामुळे माणूस चांगला किंवा वाईट होत नाही. कारण तुला असे दिसेल की श्रेष्ठ कुलोत्पन्न हिंसा करणारा आहे. चोर आहे. व्यभिचारी आहे. मिथ्या कथन करणारा आहे. चहाडी करणारा आहे. कटु वचन बोलणारा आहे. व्यर्थ बडबड करणारा आहे. लोभी आहे. दोषी आहे. मिथ्या दृष्टीचा आहे. म्हणून माझे असे ठाम मत आहे की, माणूस जन्माने श्रेष्ठ होत नाही. उलट असे दिसेल की कनिष्ठ कुलोत्पत्र माणूसही या सर्व दोषापासून मुक्त असेल. म्हणून माझी अशी मान्यता आहे की, माणूस वंशपरंपरेने वाईट होईलच असे नाही."*_

_एसुकरी ब्राह्मणाने उपस्थित केलेला तिसरा प्रश्न, प्रत्येक वर्णासाठी निर्धारित जीविकोपार्जनाच्या व्यवसायाशी संबंधित होता._

_ब्राह्मण एसुकरी तथागतांना वदला, "ब्राह्मणाच्या मतानुसार चार प्रकारच्या व्यवसायाची धारणा आहे. १) ब्राह्मणांकरिता शिक्षण, २) क्षत्रियांकरिता धनुर्धारणा, ३) वैश्यांकरिता कृषी आणि पशुपालन आणि ४) शूद्रांकरिता खांद्यावर पीकपाणी वाहून नेणे. यापैकी कोणीही कोणत्याही कारणास्तव आपल्या व्यवसायाचा त्याग केला तर, त्याने जे करू नये ते तो करीत असेल तर, त्याची कृती ही संरक्षकाने संपत्तीचा अपाहार करावा अशीच कृती होय. श्रमण गौतमा, यावर आपले काय म्हणणे आहे.'_

_*तथागतांनी प्रतिप्रश्न केला, "संपूर्ण जग या ब्राह्मणी वर्गीकरणाचे समर्थक आहे काय ? संपूर्ण जगाने हे वर्गीकरण, ही व्यवस्था स्वीकारली आहे?"*_

_"नाही." एसुकरी उत्तरला._ 

_*वासेठ्ठाला तथागतांनी म्हटले की, "श्रेष्ठ आदर्श असणे महत्त्वाचे आहे. श्रेष्ठ कुळात जन्म घेणे महत्त्वाचे नाही."*_

*_"जात नाही, असमानता नाही, श्रेष्ठता नाही, कनिष्ठता नाही. सर्व समान आहेत." हीच तथागतांची देशना होती. हीच तथागतांची धारणा होती. "दुसऱ्याशी एकरूप व्हा. तो तसा मी, मी तसा तो." हीच तथागतांची देशना होती. हीच तथागतांची धारणा होती._*

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

*_संकलन - महेश कांबळे_*

*_दिनांक :- २६/०७/२०२४_*

*_संदर्भ :-_*

_*१) भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, तिसरा खंड भाग ५*_

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

मिनँडर उर्फ मिलींद

*_मिलींद हा बौद्ध धम्माची दीक्षा घेतलेला पहिला परकीय (ग्रीक) सत्ताधीश होता --_*

_मिनँडर उर्फ मिलींद (इ.स. पू.२०६ ते इ. स. पू. १३० ) हा ग्रीक वंशीय भारतीय राजा पंजाब, मथुरा या प्रदेशावर साधारणत: इ. स.पू.१६५ ते इ.स.पू.१३० पर्यंत राज्य करणाऱ्या ग्रीक राजांमध्ये सर्वात उल्लेखनिय राजा होता. यालाच मिनँडर पहिला असेही संबोधले जाते._

_*मिलींद हा बौद्ध धम्माची दीक्षा घेतलेला पहिला परकीय (ग्रीक) सत्ताधीश होता. “मिलींदो पन्हो ” ( मिलींद प्रश्न ) या प्रसिद्ध बौद्ध ग्रंथामध्ये प्रसिद्ध बौद्ध भिक्षू भन्ते नागसेन यांच्याशी झालेले प्रश्नोत्तरात्मक, जिज्ञासू संवाद आहेत. मिलींद चा जन्म ” युथीडीमस “च्या वंशामध्ये इ. स.पू.२०६ मध्ये आई ” दिमित्री ” व वडील “हेलियोकल” या दांपत्याच्या पोटी ” कलासी ” म्हणजेच सध्याच्या ” बघराम ” या अफगाणिस्तानातील शहरी झाला. तो इ. स. पू.१६५/१५५च्या दरम्यान राज्यपदावर रुढ झाला.*_

_*मिलींदच्या पत्नीचे नांव “अभोक्लेइया “असे होते व त्याला दोन मुले होती. त्या दोघांचेही नांव ” स्ट्रँटो-१ , व स्ट्रँटो -२. असे होते. मिलींदच्या राज्याचा विस्तार बँक्ट्रिया, अफगाणिस्तान, पाकिस्तान व उत्तर भारतात पंजाब- मथुरेपर्यंत होता. दक्षिणेस यमुना नदीपासून उत्तरेस ऑक्सस नदीपर्यंत त्याचे राज्य पसरले होते. ” शाकल ” (सियालकोट) ही त्याची राजधानी, तर “बल्ख ” (बाल्हीक) ही त्याची उपराजधानी असून, ही दोन्हीही नगरे पाटलिपुत्र नगराप्रमाणेच भरभराटीस आली होती.* या प्रदेशात भ्रमण करणाऱ्या बौद्ध भिक्षू व श्रमणांच्या संपर्कात आल्यानंतर आपल्या जिज्ञासू व चौकस वृत्तीमुळे अनेक विद्वानांचा वादविवादात त्याने पराभव केला. त्यामुळे त्याला आपल्या ज्ञानाचा गर्व वाटू लागला व तो ज्ञानी जनांना व विद्वानांना वादविवादासाठी आव्हान देऊ लागला._

_प्रख्यात विद्वान बौद्ध भिक्षू भन्ते नागसेन यांनी त्याचे हे आव्हान स्विकारून वादविवादात त्याचा जाहीर पराभव केला. आपला पराभव मान्य करून मिलींदने भन्ते नागसेन यांना आपले गुरु मानून , त्यांच्याच हातून बौद्ध धम्माची दीक्षा घेतली, व तो तो बौद्ध धम्माचा अनुयायी बनला. भन्ते नागसेन यांच्याशी झालेला त्याच्या प्रश्नोत्तर रूपी संवादाचे सार म्हणजेच प्रख्यात पाली बौद्ध धम्म ग्रंथ ” मिलींदो पन्हो ” अर्थात… ” मिलींद प्रश्न ” होय….._

_*ग्रीक इतिहासकार ” प्लुटार्क ” याने मिलींद बद्दल लिहून ठेवले आहे, की मिलींद हा मोठा न्यायी, विद्वान व लोकप्रिय असा राजा होता. इतका, की त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या अस्थि-अवशेषांवर मोठे मोठे स्तूप बनवले गेले.*_

_मिलींद ला शास्त्रचर्चा व वादविवादाची मोठी आवड होती. अनेक विद्वानांना त्याने वादविवादात पराभूत केले होते. ”मिलींद प्रश्न ” या पाली ग्रंथात त्याने बौद्ध धम्माचा स्विकार करण्यामागचे विवरण दिले आहे. मिलींदच्या अनेक नाण्यांवर धर्मचक्र प्रवर्तनाचे प्रतिक चिन्ह ” धर्मचक्र ” कोरलेले असून , आपल्या नावासमोर ” ध्रमिक ” अर्थात..” धार्मिक “हे विशेषण (पदवी) मोठ्या अभिमानाने तो लावत होता….!!!_

Wednesday, 24 July 2024

करुणेच्याही पलीकडे मैत्री आवश्यक आहे

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_सद्धम्म म्हणजे काय?_*

_*(क) धम्म मैत्रीचा पुरस्कार करतो तेव्हा धम्म सद्धम्म होतो*_

*_३. करुणेच्याही पलीकडे मैत्री आवश्यक आहे, अशी शिकवण असेल तर धम्म सद्धम्म होतो_*

*_(क्रमशः)_*

*_!! ॐ मणी पद्मे हूँ !!_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2024/07/blog-post_24.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_बुद्धांनी करुणेला धम्माची इतश्री मानले नाही. करुणा म्हणजे मनुष्यमात्राप्रती प्रेम. बुद्ध त्याही पलीकडे गेले. त्यांनी मैत्रीचा विचार केला. मैत्री म्हणजे सर्व जिवंत प्राणिमात्रांविषयी प्रेम._*

_बुद्धांना असे वाटत होते की, माणसाची माणसांप्रती करुणा येथेच थांबू नये. माणसाने मनुष्यमात्रापलीकडे जावे, त्याने सर्व प्राणिमात्रांशी मैत्री जोडावी. जेव्हा तथागत श्रावस्ती येथे वास्तव्याला होते, तेव्हा त्यांनी एका सुक्तात ही बाब योग्य प्रकारे स्पष्ट करून सांगितली. मैत्रीविषयी कथन करताना तथागत भिक्खूंना उद्देशून म्हणाले,_

_"समजा, एखादा माणूस धरणी खोदतो तेव्हा धरणी त्याच्यावर क्रोधित होते काय?"_

_"नाही भगवन" भिक्खू उत्तरले._

_"समजा, एखादा माणूस लाख आणि रंग घेऊन हवेत चित्रे चितारू लागला तर काय तुम्हाला असे वाटते की तो चित्रे चितारू शकेल?"_

_"नाही भगवन"_ 

_"का?"_

_"कारण हवेत असे काळे फलक नाहीत की ज्यावर रंग भरता येतील."_

_*"त्याचप्रमाणे तुमच्या चित्तावरही काळे डाग असू नयेत. हे काळे डाग तुमच्या अपवित्र तृष्णेचे प्रतीक होत."*_

_"समजा एखादा माणूस हाती मशाल घेऊन गंगेला आग लावण्यास निघाला तर त्याला ते शक्य होईल काय?"_

_"नाही भगवन."_

_"का?"_

_"कारण गंगेच्या जलात ज्वलनशीलता नाही."_

_आपल्या धम्मदेशनेचा समारोप करताना तथागत वदले, *"ज्याप्रमाणे पृथ्वीला आहत (घायाळ) झाल्यासारखे वाटत नाही, ती क्रोधित होत नाही. ज्याप्रमाणे हवा आपल्यावर कोणत्याही क्रियेची प्रतिक्रिया होऊ देत नाही, ज्याप्रमाणे गंगेचे जल अग्नीने विचलित होत नाही. तर निरंतर प्रवाहित राहते. त्याचप्रमाणे हे भिक्खूंनो, तुमचा कोणी अपमान केला तरी, तुमच्यावर कोणी अन्याय केला तरी असे करणाऱ्याप्रती तुम्ही मैत्रीभावनाच व्यक्त केली पाहिजे."*_ 

_"हे भिक्खूंनो, *मैत्री आणि मैत्रीची धारा निरंतर प्रवाहित राहिलीच पाहिजे. तुमचे चित्त पृथ्वीसम दृढ असावे, वायूसम निर्मल असावे, गंगेसम गहन गंभीर असावे. हे तुमचे पवित्र कर्तव्य आहे., तुम्ही असे कराल तर कोणत्याही अप्रीतीकर व्यवहाराने तुम्ही मैत्रीभावनेपासून विचलित होणार नाही. आणि जे तुमच्यावर आघात करतील, अन्याय करतील तेच शेवटी दमून जातील."*_

_*"तुमची मैत्री विश्वासारखी व्यापक असावी. तुमच्या भावना, तुमचे विचार असीम असावेत. त्यात द्वेषाला कोठेही थारा असू नये."*_

_*"माझ्या धम्मानुसार करुणा आचरणेच पर्याप्त नाही. मैत्रीचे आचरण अनिवार्य आहे."*_ 

_प्रवचनात तथागतांनी एक कथा कथन केली. ती स्मरणात ठेवण्यायोग्य आहे._

_"कोणे एकेसमयी *श्रावस्ती नगरीत विदेसिका नामक कुलीन स्त्री* वास्तव्य करीत होती. ती सभ्यता, नम्रता आणि सौम्यता या गुणाकरिता ख्यात होती. *तिची एक सेविका होती. तिचे नाव काली.* ती हुशार होती. ती प्रातःकाळी लवकर उठणारी कामसू सेविका होती. *काली एकदा स्वतःशीच विचार करती झाली, 'माझ्या स्वामिनीची अशी ख्याती आहे की, तिला कधीच क्रोध येत नाही. मला याचे आश्चर्य वाटते. खरेच तिला कधीच क्रोध येत नाही. अथवा ती आपला क्रोध प्रकट करीत नाही. अथवा मी माझे गृहकार्य एवढ्या दक्षतेने करीत असावी की, तिला क्रोध व्यक्त करण्याची संधीच मिळत नसावी. मी एकदा तिची परीक्षाच घेऊन पाहावी म्हणते.'*_

_असा विचार करून दुसऱ्या दिवशी प्रातःकाळी ती जरा उशिराच उठली. 'काली! स्वामिनी ओरडली, ' 'होय, बाईसाहेब.' काली उत्तरली. 'तू आज उशिरा का उठलीस?' 'यात काही विशेष नाही बाईसाहेब.' त्यात काही विशेष नाही म्हणतेस ! लबाड कुठली. काही विशेष नाही.' संताप आणि क्रोधाने उद्विग्न स्वामिनी मनाशीच म्हणाली.'_

_'सेविकेने विचार केला, *माझ्या स्वामिनीला क्रोध येतो तर. पण ती दाखवीत नाही एवढेच.* मी माझे काम एवढ्या चोखपणे बजाविते की तिला क्रोध करण्याची संधीच मिळत नाही. मी पुन्हा प्रयत्न करते. ती मनाशीच म्हणाली. दुसऱ्या दिवशी प्रातःकाळी काली अधिक उशिरा उठली. 'काली! काली!' तिची स्वामिनी ओरडली. 'काय बाईसाहेब' काली उत्तरली. 'तू आज उशिरा का उठलीस?' 'काही विशेष नाही बाईसाहेब.' 'काही विशेष नाही म्हणतेस, लबाड कुठली.' ती गृहस्वामिनी आपला क्रोध आणि चीड शब्दात व्यक्त करीत चित्कारली._ 

_*'होय हिला क्रोध येतो तर,'* सेविका विचार करती झाली. मी माझे काम चोखपणे बजाविते म्हणून ती तो क्रोध व्यक्त करीत नाही एवढेच. मी पुन्हा तिची परीक्षा घेणार. दुसऱ्या दिवशी प्रातःकाळी ती अधिक उशिरा उठली. 'काली! काली!' तिची स्वामिनी ओरडली. 'काय बाईसाहेब' काली उत्तरली. 'तू इतक्या उशिरा का उठलीस?' स्वामिनी विचारती झाली. 'काही विशेष नाही बाईसाहेब' काली उत्तरली._

_"इतक्या उशिरा उठूनही काही विशेष नाही म्हणतेस. लबाड कुठली." असे किंचाळत अप्रसन्नतेने क्रोधाने बेभान होऊन गृहस्वामिनीने सेविकेच्या डोक्यात अडसर घातला. सेविकेच्या डोक्यातून रक्त ओघळू लागले._

_"डोक्याला जखम झालेली, त्यातून रक्त ओघळत असलेली काली, तिने आक्रोश करून सारे शेजारी-पाजारी जागे केले. ती लोकांना ओरडून सांगू लागली, 'पहा रे जनहो, ही माझी शांत स्वभावाची स्वामिनी पहा. पहा रे जनहो! ही माझी सौम्य स्वभावाची स्वामिनी पहा. तिने काय केले ते पहा. आणि हे तिने कशासाठी केले तर, तिची एकुलती एक सेविका उशिरा उठली म्हणून. या क्षुल्लक कारणास्तव ती इतकी चिडली, इतकी क्रोधित झाली की, तिने क्रोधाच्या भरात अडसरच माझ्या डोक्यात घातला. आणि माझ्या डोक्याला जखम केली."_

_*"याचा परिणाम असा झाला की विदेसिका ही शांत, सौम्य स्वभावाची स्त्री नसून ती क्रोधी आणि हिंसक स्वभावाची स्त्री आहे अशी तिची ख्याती झाली."*_

*_"याचप्रमाणे चीड, क्रोध येण्यासारखे काही बोलले जात नाही तोपर्यंतच भिक्खू शांत, सौम्य, सभ्य असण्याचा संभव आहे. अप्रीतिकर शब्द बोलले जातात तेव्हाच त्या भिक्खुठायी मैत्रीभावना आहे अथवा नाही, बंधुभाव आहे अथवा नाही याची परीक्षा होते."_*

_"त्यानंतर तथागत पुढे वदले, *"केवळ अन्नवस्त्र मिळविण्यासाठी भिक्खूंनी मैत्रीभाव व्यक्त केला तर, त्यांच्याठायी मैत्रीभाव आहे असे मी मानत नाही. ज्याची मैत्रीभावना धम्मसिद्धांतातून उगम पावते त्यालाच मी खरा भिक्खू मानतो."*_

_"हे भिक्खूंनो, *पुण्यार्जनासाठी केलेल्या कोणत्याही कर्माचे मोल हे मैत्रीभावनेच्या सोळाव्या भागाइतकेही नाही. मैत्री म्हणजे चित्ताची विमुक्ती. ही भावना सर्व पुण्यकर्माना आपल्यात सामावून घेते. मैत्रीभावना ही प्रकाशमान आहे, प्रदीप्त आहे. प्रज्वलित आहे."*_

_"आणि याच प्रकारे हे भिक्खूंनो, *ताऱ्यांचा प्रकाश हा चंद्रप्रभेच्या सोळाव्या भागाइतकाही नसतो. चंद्रप्रभेच्या प्रकाशात साऱ्याच ताऱ्यांचे तेज सामावते. चंद्रप्रभा स्वतेजाने प्रकाशते. प्रदीप्त होते. प्रज्वलित होते. त्याचप्रमाणे हे भिक्खूंनो, पुण्यकर्मासाठी केलेल्या सर्व कर्माचे मोल हे मैत्रीभावनेच्या सोळाव्या भागाइतकेही नसते. मैत्रीभावनेतच ही सर्व कर्मे समाविष्ट असतात. मैत्री म्हणजे चित्ताची मुक्ती. मैत्री ह्या सर्वांना आत्मसात करून प्रदीप्त होते, प्रकाशित होते. प्रज्वलित होते."*_

_"आणि त्याचप्रमाणे हे भिक्खूंनो, *जसे वर्षाऋतूच्या समाप्तीनंतर अन्ध आकाशात प्रकाशणारा भास्कर (सूर्य) सारे किलमिष नाहीसे करतो. तो प्रकाशतो. तो प्रदीप्त होतो. तो प्रज्वलित होतो. आणि जसे रात्रीच्या अंतिम प्रहरी प्रभात तारा प्रज्वलित होतो, प्रकाशित होतो. प्रदीप्त होतो. त्याचप्रमाणे हे भिक्खूंनो, पुण्यार्जनासाठी केलेल्या कोणत्याही कर्माचे मोल मैत्रीच्या सोळाव्या भागाइतकेही नाही. मैत्री म्हणजे चित्ताची मुक्ती. मैत्री या सर्व कर्माना सामावून घेते. ती प्रकाशते ती प्रदीप्त होते. ती प्रज्वलित होते.*_

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

*_संकलन - महेश कांबळे_*

*_दिनांक :- २५/०७/२०२४_*

*_संदर्भ :-_*

_*१) भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, तिसरा खंड भाग ५*_

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

Tuesday, 23 July 2024

प्रज्ञा आणि शील यांच्यासमवेत करुणाही आवश्यक आहे

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_सद्धम्म म्हणजे काय?_*

_*(क) धम्म मैत्रीचा पुरस्कार करतो तेव्हा धम्म सद्धम्म होतो*_

*_२. प्रज्ञा आणि शील यांच्यासमवेत करुणाही आवश्यक आहे_*

*_(क्रमशः)_*

*_!! ॐ मणी पद्मे हूँ !!_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2024/07/blog-post_23.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

_*प्रज्ञा आणि शील यांच्यासमवेत करुणाही आवश्यक आहे अशी शिकवण असेल तरच धम्म सद्धम्म होतो.* बुद्धांच्या धम्माचे अधिष्ठान काय ? यासंबंधी मतभिन्नता आहे. *काय फक्त प्रज्ञाच बुद्धांच्या धम्माचे अधिष्ठान आहे? काय फक्त करुणाच त्यांच्या धम्माचे अधिष्ठान आहे?*_

_या वादामुळे बुद्धानुगामी दोन शाखात विभाजित झाले._

१. *एका शाखेचे मत असे की फक्त प्रज्ञाच बुद्धांच्या धम्माचे अधिष्ठान आहे.

२. *तर दुसरी शाखा म्हणते की फक्त करुणाच बुद्धांच्या धम्माचे अधिष्ठान आहे.*

_या दोन शाखा अद्यापही एकमेकांपासून विभाजित आहेत. विलग आहेत. *बुद्ध वचनांच्या आधारावरच यांचे परीक्षण केले तर या दोन्ही शाखा चूक आहेत असे वाटते.*_

_बुद्धांच्या धम्माच्या दोन आधारस्तंभां- पैकी *एक आधारस्तंभ प्रज्ञा आहे यात वादच नाही.* पण वादाचा मुद्दा हा आहे की, *काय करुणा ही धम्माचा आधारस्तंभ आहे.?*_

_करुणा ही धम्माचा आधारस्तंभ आहे ही बाब वादातीत आहे. याच्या समर्थनार्थ बुद्ध वचनांनाच उद्धृत करता येते._

_प्राचीन काळी गांधार देशात भयानक रोगाने पीडित असा एक भिक्खू होते. ते ज्या ठिकाणी उठत बसत असे ती जागा घाण होत असे. ते एका अशा विहारात वास्तव्याला होते की, तेथे त्यांची सहायता कोणीही करीत नव्हते._

_एकदा बुद्ध आपल्या पाचशे अनुगामींसह तेथे गेले. त्यांनी आपल्यासोबत आवश्यक ती पात्रे आणि पाणी घेतले. त्या सर्वांनी ते भिक्खू जेथे होते त्या स्थानाला भेट दिली._

_त्या ठिकाणी एवढी भयानक दुर्गंधी होती की त्या सर्व भिक्खूंना त्या भिक्खूविषयी घृणा वाटू लागली. परंतु त्या जगद्वद्य तथागतांनी स्वहस्ते त्या भिक्खूस स्नान घातले आणि आजारावर उपचार करण्यास प्रारंभ केला._

_तेव्हा राजा, त्याचे अमात्य, स्वर्गदेवता (देव आणि नाग) सर्व त्या ठिकाणी उपस्थित झाले. त्या सर्वांनी बुद्धांची पूजा बांधली. त्यांची वंदना केल्यावर त्या सर्वांनी जगद्वंद्याला उद्देशून प्रश्न केला, "आपण श्रेष्ठ, आपण थोर असूनही या निम्नस्तरावर उतरून एवढे हलके काम का करावे?" यावर बुद्धांनी आपल्या कृतीचे स्पष्टीकरण केले ते असे._

_*"तथागतांचा या इहलोकी येण्याचा हेतूच हा की, जे दरिद्री आहेत, जे असहाय आहेत. जे असुरक्षित आहेत त्यांचे मित्र होणे. ज्यांना कायिक पीडा आहे त्यांची सेवा सुश्रूषा करणे. ते श्रमण असोत अथवा कोणत्याही धर्माची माणसे असोत त्यांची सेवा करणे. दरिद्रींना, अनाथांना, वृद्धांना मदत करणे आणि इतरांनी असेच करावे याकरिता प्रवृत्त करणे हाच तो हेतू होय."*_

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

*_संकलन - महेश कांबळे_*

*_दिनांक :- २४/०७/२०२४_*

*_संदर्भ :-_*

_*१) भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, तिसरा खंड भाग ५*_

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

Monday, 22 July 2024

धम्म मैत्रीचा पुरस्कार करतो

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_सद्धम्म म्हणजे काय?_*

_*(क) धम्म मैत्रीचा पुरस्कार करतो तेव्हा धम्म सद्धम्म होतो*_

*_१ प्रज्ञेला शीलाची जोड असलीच पाहिजे_*

*_(क्रमशः)_*

*_!! ॐ मणी पद्मे हूँ !!_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2024/07/blog-post_22.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

👉 *_१ फक्त प्रज्ञाच पर्याप्त नाही. प्रज्ञेला शीलाची जोड असलीच पाहिजे, अशी शिकवण असेल तरच धम्म सद्धम्म होतो._*

             _*प्रज्ञा आवश्यक आहे. परंतु शील त्यापेक्षा अधिक महत्त्वाचे आहे. शीलाविना प्रज्ञाही धोकादायक आहे. फक्त प्रज्ञा ही धोकादायक आहे. प्रज्ञा ही माणसाच्या हाती असलेल्या तलवारीसारखी आहे.*_

             _*शीलवान माणसाच्या हाती असली तरच तो प्रज्ञेचा उपयोग संकटात सापडलेल्या माणसाच्या रक्षणासाठी करू शकेल. पण शीलहीन माणूस त्याच प्रज्ञेचा उपयोग एखाद्याच्या विनाशासाठीही करू शकेल.*_

 *_म्हणूनच प्रज्ञेपेक्षा शील महत्त्वाचे आहे._*

_प्रज्ञा हा विचारधम्म होय. सम्यक विचार करणे म्हणजे प्रज्ञा. शील हा आचारधम्म होय. सम्यक आचरण म्हणजे शील._

*_बुद्धांनी  पाच मूलतत्त्वांचा उल्लेख केला आहे._*

१. *एक तत्त्व हे जीवहिंसेसंबंधी आहे.*

२. *दुसरे तत्त्व चौर्यकर्मासंबंधी आहे.

३. *तिसरे तत्त्व कामभोगासंबंधी, मिथ्याचाराशी संबंधित आहे.*

४. *चवथे तत्त्व मिथ्या कथनाशी संबंधित आहे.*

५. *पाचवे तत्त्व सुरापानाशी संबंधित आहे.*

          _या पाच मूलतत्त्वांसंबंधात तथागतांनी सामान्यजनांना हिंसा न करणे, चौर्यकर्म न करणे, मिथ्या कथन न करणे, कामभोगासंबंधी मिथ्याचार न करणे, आणि सुरापान न करणे, अशी देशना दिली आहे._

*_बुद्धांनी विद्येपेक्षा शीलाला अधिक महत्त्व देण्याचे कारण स्पष्ट आहे._*

            _*विद्येचा उपयोग माणसाच्या शीलावर अवलंबून आहे. शीलाशिवाय विद्येलाका हीही मोल नाही ही बुद्धांची देशना आहे. अन्य प्रसंगी बुद्ध म्हणतात, "शीलासमान या इहलोकी दुसरे काहीही नाही." शील हा आरंभबिंदू आहे. शील हे शरणस्थल आहे. शील हेच सर्व कुशलांची जननी आहे. सर्व उत्तम अवस्थांत शील ही सर्वोत्तम अवस्था होय. म्हणून आपले शील शुद्ध असावे.*_

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

*_संकलन - महेश कांबळे_*

*_दिनांक :- २३/०७/२०२४_*

*_संदर्भ :-_*

_*१) भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, तिसरा खंड भाग ५*_

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

Sunday, 21 July 2024

सर्वप्रथम प्रज्ञा आवश्यक आहे

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_सद्धम्म म्हणजे काय?_*

_*३. सर्वप्रथम प्रज्ञा आवश्यक आहे अशी शिकवण असेल तरच धम्म सद्धम्म होतो*_

*_(क्रमशः)_*

*_!! ॐ मणी पद्मे हूँ !!_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2024/07/blog-post_21.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

            _*ब्राह्मणांना विद्या (ज्ञान, विद्या) विद्या म्हणूनच अमोल वाटते. एखादा माणूस विद्वान आहे, विद्यावान आहे एवढ्याच कारणास्तव तो त्यांच्याकरिता पूजनीय आहे. तो माणूस शीलवान आहे अथवा नाही हा प्रश्न त्यांच्याकरिता अप्रस्तुत आहे.* त्यांच्या मते राजा आपल्या देशातच पूजला जातो. परंतु विद्वान मात्र सर्वत्र पूजला जातो. यातून त्यांना एवढेच सुचवावयाचे आहे की, विद्वान राजापेक्षा श्रेष्ठ आहे._

_*बुद्धांनी विद्या आणि प्रज्ञा यात भेद केला आहे. हा भेद म्हणजे ज्ञान आणि सुज्ञता यामधील भेद होय.*असेही म्हटले जाऊ शकते की ब्राह्मणांनीही विद्या आणि प्रज्ञा यात भेद केला आहे. हे कदाचित सत्य असेलही. परंतु *ब्राह्मणांना अभिप्रेत प्रज्ञा आणि बुद्धाला अभिप्रेत प्रज्ञा यात महदअंतर आहे.*_

_बुद्धांनी हा भेद *अंगुत्तर निकायमध्ये* उल्लेखित एका प्रवचनात सुस्पष्टपणे मांडला आहे. एकेसमयी तथागत राजगृही जेथे खारींना दाणे भरवीत त्या वेळूवनात वास्तव्याला होते. त्यावेळी मगध राजाचा अमात्य *वर्षकार ब्राह्मण* तथागतांच्या भेटीला आला. त्याने तथागतांना वंदना केली. परस्परांचे कुशलक्षेम विचारल्यावर त्याने बाजूलाच आसन ग्रहण केले. अशाप्रकारे आसनस्थ झाल्यावर तो वर्षकार ब्राह्मण तथागतांना वदला,_

_"श्रमण गौतमा, *जेव्हा एखाद्याच्या अंगी आम्ही ब्राह्मण चार गुण पाहतो तेव्हा त्याला आम्ही श्रेष्ठ विद्वान म्हणून घोषित करतो.* ते चार गुण असे._

_*"श्रमण गौतमा, तो विशेषज्ञ असतो. तो जे ऐकतो त्याचक्षणी त्याला त्याचा अर्थ ज्ञात होतो. तो असे म्हणतो की या कथनाचा हा अर्थ आहे. त्याचप्रमाणे त्याची स्मरणशक्ती तीव्र असते. तो फार पूर्वी घडलेली घटना किंवा कथन केलेली घटना स्मरणात ठेवू शकतो. तो ती पुनरुक्त करू शकतो."*_ 

_*"तो आपल्या गृहकार्यात कुशल असतो, दक्ष असतो. तो हे जाणतो की, काय करणे उचित आहे. कोणती व्यवस्था करणे उचित आहे."*_

_"हे श्रमण गौतमा, *एखादा माणूस या चार गुणांनी युक्त असतो तेव्हा आम्ही त्याला सुज्ञ माणूस, विद्वान माणूस म्हणून घोषित करतो.* जर श्रमण गौतमाला, या गुणांच्या आधारे माझी प्रशंसा कराविशी वाटत असेल तर, त्याने माझी प्रशंसा करावी किंवा मला दोष द्यावासा वाटत असेल तर त्याने मला दोष द्यावा."_

_"हे ब्राह्मणा, यास्तव मी तुझी प्रशंसाही करणार नाही किंवा तुला दोषही देणार नाही. मी सुद्धा ज्या माणसात पुढील चार गुण आहेत त्याला विद्वान म्हणून घोषित करतो. परंतु पुरस्कारिलेले चार गुण हे तू व्यक्त केलेल्या गुणांपेक्षा सर्वथा भिन्न आहेत."_ 

१. *_"ब्राह्मणा, जो माणूस बहुजनांचा हितैषी आहे. बहुजनांचा कल्याणकर्ता आहे, त्याच्यामुळेच बहुजन कल्याणमयी हितकारी आर्य पथाचे अनुगामी झाले आहेत."_*

२. *_"तो ज्या विचारात रममाण होऊ इच्छितो त्याच विचारात रममाण होतो. तो ज्या विचारात रममाण होऊ इच्छित नाही, त्या विचारात रममाण होत नाही."_*

३. *_"तो चित्तात ज्या संकल्पाची कामना करतो, तोच संकल्प करतो. तो ज्या संकल्पाची कामना करीत नाही तो संकल्प तो करीत नाही. अशाप्रकारे त्याने आपले चित्त, विचार संयमित, नियंत्रित केले आहेत."_*

४. *_तो आपल्या इच्छेने विनासायास, विना कष्टाने चार लोकोत्तर ध्यानात मग्न होतो. ही चार ध्याने याच जगी याच जीवनी सुखाची साधने आहेत._*

_*"आणि हे ब्राह्मणा, त्याने याच इहलोकी याच जन्मी आपल्या अस्तित्वाचा क्षय केला आहे. त्याने चित्ताची विमुक्ती प्राप्त केली आहे. त्याने प्रज्ञेद्वारा विमुक्ती प्राप्त केली असून तो त्यात विहार करतो आहे.*_

_"हे ब्राह्मणा, मी तुझी प्रशंसाही करणार नाही आणि तुला दोषही देणार नाही. परंतु *मी या चार गुणांनी युक्त माणसाला विशेषज्ञ माणूस, सुज्ञ माणूस म्हणून घोषित करेन."*_ 

_"श्रमण गौतमा, हे अद्भुत आहे. हे आश्चर्यजनक आहे. श्रमण गौतमांनी याची किती सुंदर व्याख्या केली आहे."_

_"मला असे जाणवते की, श्रमण गौतम या चार गुणांनी युक्त आहे. खरोखरच श्रमण गौतमांनी स्वतःला बहुजन हितार्थ समर्पित केले आहे. त्याने बहुजनांच्या कल्याणार्थ स्वतःला समर्पित केले आहे. श्रमण गौतमामुळेच बहुजन कुशल हितकर अशा आर्यपंथात प्रस्थापित झाले आहेत. प्रतिष्ठित झाले आहेत."_ 

_"खरेच श्रमण गौतम ज्या विचारात स्वतःला रममाण करू इच्छितात त्याच विचारात ते रममाण होतात. याप्रकारे त्यांनी आपले विचार आपले चित्त संयमित केले आहे, नियंत्रित केले आहे."_

_"खरेच श्रमण गौतम स्वेच्छेने विनासायास, विनाप्रयास चार लोकोत्तर ध्यानात मग्न होऊ शकतात. निश्चितच श्रमण गौतमाने आपल्या अस्तित्वाचा याच जन्मी क्षय केला आहे. आस्त्रव क्षयाचे ज्ञान त्यांना प्राप्त झाले आहे. त्यांचे चित्त विमुक्त आहे. त्यांनी प्रज्ञेद्वारा चित्ताची विमुक्ती प्राप्त केली आहे आणि ते त्यात विहार करत आहे."_

_या ठिकाणी बुद्धांची प्रज्ञा आणि ब्राह्मणाची प्रज्ञा यातील भेद निःसंदिग्धपणे, सुस्पष्टपणे मांडण्यात आला आहे._

_*याच ठिकाणी बुद्ध प्रज्ञेला विद्येपेक्षा अधिक महत्त्वाचे का मानतात, असंदिग्धपणे, सुस्पष्टपणे मांडण्यात आले आहे.*_


*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

*_संकलन - महेश कांबळे_*

*_दिनांक :- २२/०७/२०२४_*

*_संदर्भ :-_*

_*१) भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, तिसरा खंड भाग ५*_

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

Saturday, 20 July 2024

धम्म देशना ग्रहण करणे एवढेच पर्याप्त नाही

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_सद्धम्म म्हणजे काय?_*

_*२) धम्म देशना ग्रहण करणे एवढेच पर्याप्त नाही*_

*_(क्रमशः)_*

*_!! ॐ मणी पद्मे हूँ !!_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2024/07/blog-post_19.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

             _धम्म सद्धम्म व्हावयाचा असेल तर, *धम्म देशना ग्रहण करणे एवढेच पर्याप्त नाही. फक्त धम्म देशना ग्रहण केल्याने माणूस नियमांचा, कर्मकांडांचा दास होतो, अशी शिकवण अपरिहार्य आहे.*_

            _एकेसमयी बुद्ध कोसम्बीच्या सुस्वर विहारात वास करीत होते. बुद्ध तेथे उपस्थित लोकांना धम्मोपदेश देत असे. त्याच समयी कोसम्बी येथे एक ब्राह्मण ब्रह्मचारी वास्तव्याला होता. त्याच्यासारखा शास्त्रांचा ज्ञाता कोणीही दुसरा नाही. म्हणून तो जेथे जात असे तेथे हाती एक पेटती मशाल घेऊन जात असे._

             _एकदा एका नगरीतील बाजारपेठेत एका माणसाने त्याला हाती मशाल घेऊन पाहिले. त्याने त्याला हाती पेटती मशाल धारण करण्याचे कारण विचारले. तो उत्तरला._

           _"संसार अंध:कारमय आहे. लोक पथभ्रष्ट आहेत. माझ्या क्षमतेनुसार त्यांच्या पथप्रदर्शनासाठी, त्यांचा पथ आलोकित करण्यासाठी मी ही मशाल धारण केली आहे."_

_बुद्धांनी हे जाणिले आणि त्या ब्राह्मणाला बोलावणे पाठविले आणि विचारणा केली, "अरे ही मशाल कशासाठी? ही मशाल घेऊन तू का भ्रमण करतो आहे?"_

_तो ब्रह्मचारी उत्तरला, "सामान्यजन अज्ञान आणि अंधःकाराने ग्रस्त आहेत. त्यांच्या पथप्रदर्शनासाठी, त्यांचा पथ आलोकित व्हावा यासाठी मी ही मशाल धारण केली आहे."_ 

_नंतर तथागतांनी त्याला पुनरपी विचारणा केली. "तर खरेच तू विद्वान आहेस काय? धर्मग्रंथात उल्लेखीत शब्दविद्या, नक्षत्रविद्या आणि युद्धविद्या, या विद्यांचा तू ज्ञाता आहेस काय?"_

_खूप आग्रह केल्यावर त्या ब्रह्मचाऱ्याला हे मान्य करावे लागले की, त्याला या विद्या अवगत नाहीत. त्याने ती मशाल फेकून दिली. तेव्हा बुद्ध पुढे म्हणाले,_

_*जर कोणी माणूस विद्वान असो अथवा नसो, स्वतःला इतका महान समजतो की, तो दुसऱ्याप्रती घृणा करू लागतो. तेव्हा तो हाती मशाल घेतलेल्या अंधासम होय. तो स्वतः आंधळा आहे पण दुसऱ्याचे पथ आलोकित करू इच्छितो.*_

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

*_संकलन - महेश कांबळे_*

*_दिनांक :- २१/०७/२०२४_*

*_संदर्भ :-_*

_*१) भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, तिसरा खंड भाग ५*_

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

Friday, 19 July 2024

धम्माने प्रज्ञेचा पुरस्कार केलाच पाहिजे

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_सद्धम्म म्हणजे काय?_*

_*(ब) धम्म सद्धम्म व्हावयाचा असेल तर धम्माने प्रज्ञेचा पुरस्कार केलाच पाहिजे !*_

*_(क्रमशः)_*

*_!! ॐ मणी पद्मे हूँ !!_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2024/07/blog-post_19.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_१ धम्माची देशना सर्वांकरिता मुक्त असेल, तेव्हा धम्म सद्धम्म होतो._*

_ब्राह्मणी सिद्धांत असा होता की, "सर्वच ज्ञान प्राप्त करू शकत नाही. ज्ञानप्राप्ती ही अनिवार्यरित्या सीमित लोकांपुरतीच मर्यादित असावी." त्यांनी ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य यांनाच फक्त ज्ञानप्राप्तीची अनुमती दिली. परंतु ही अनुमतीसुद्धा या त्रैवर्गियांपैकी फक्त पुरुषांनाच होती._

*_सर्वच महिला- त्या ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य वर्गातील असल्या तरीही आणि सर्वच शूद्र स्त्री-पुरुष यांना ज्ञान प्राप्तीसाठी प्रतिबंध करण्यात आला होता. एवढेच नव्हे तर त्यांना साक्षरताही प्रतिबंधित करण्यात आली होती._*

👉 *_बुद्धांनी या अत्यंत अन्यायी अत्याचारी सिद्धांताविरुद्ध विद्रोह केला. त्यांची देशना होती की, ज्ञानप्राप्तीचे मार्ग सर्वांना मुक्त असावे. पुरुष आणि महिला दोघांनाही समानपणे मुक्त असावे._*

_अनेक ब्राह्मणांनी बुद्धांच्या या सिद्धांताचे शास्त्रार्थ करून खंडन करण्याचा प्रयत्न केला. *लोहीच्च्य ब्राह्मणांशी बुद्धांचा झालेला शास्त्रार्थ त्यांच्या या मतावर बराच प्रकाश टाकतो.*_

_एकदा तथागत भिक्खू संघासमवेत कोशल जनपदात चारिका करीत असताना सालवाटिका येथे आले. सालवाटिका हे गाव साल वृक्षांनी वेढलेले होते. त्यावेळी सालवाटिकेत लोहीच्च्य ब्राह्मण वास्तव्याला होता. ही सालवाटिका जीवन परिपूर्ण होती. या सालवाटिकेत कुरणे, अरण्ये आणि धनधान्य विपुल होते. *हा भूप्रदेश कोशल नरेश प्रसेनजिताने लोहीच्च्य ब्राह्मणाला सर्वाधिकारासहित दान केला होता.* त्या गावावर त्या ब्राह्मणाचा राजासमच अधिकार होता._

👉 *_"श्रमण किंवा ब्राह्मणाने ज्ञान प्राप्त केल्यावर त्यांनी ते ज्ञान स्त्री शुद्रांना प्रक्षेपित करू नये," अशी लोहीच्च्य ब्राह्मणाची मान्यता होती."_*

_त्यानंतर तथागत सालवाटिकेत वास्तव्याला आहे ही वार्ता लोहीच्च्य ब्राह्मणाच्या कर्णी आली. ही वार्ता समजल्यावर त्याने भेसिक नापिताला बोलाविले. आणि तो ब्राह्मण त्या नापिताला म्हणाला, "हे भेसिका, यावे इकडे यावे. जेथे श्रमण गौतम वास करीत आहे तेथे जावे. तेथे गेल्यावर त्यांना वंदन करावे. माझे नाव घेऊन त्यांचे कुशलक्षेम विचारावे. त्यांना विचारावे तुमचे आरोग्य ठीक आहे ना. त्यांना विचारावे तुमचे प्रकृतिस्वास्थ्य उत्तम आहे ना. हे कुशलक्षेम विचारल्यावर त्यांना त्यांच्या भिक्खुसंघासमवेत उद्याच्या भोजनाचे निमंत्रण द्यावे. म्हणावे की त्यांना आणि भिक्खुसंघाला लोहीच्च्य ब्राह्मणाने आमंत्रित केले आहे."_

_"ठीक आहे महोदय" तो नापित उत्तरला. लोहीच्य ब्राह्मणाच्या आज्ञेप्रमाणे तो भेसिक नापित तथागतांकडे गेला. त्या ब्राह्मणाने त्याला जे सांगितले होते तेच त्याने तथागतांना कथन केले. तथागतांनी मौन राहूनच ती प्रार्थना स्वीकारली._ 

_दुसऱ्या दिवशी प्रातःकाळी तथागताने चीवर पात्र धारण केले आणि भिक्खुसंघासमवेत सालवाटिकेकडे प्रस्थान करते झाले._

_लोहीच्च्य ब्राह्मणाने भेसिक नापितालाच तथागतांस आणण्यासाठी पाठविले होते. तो नापित तथागतांपाठोपाठच एक एक पाऊल टाकीत मार्गक्रमणा करीत होता. वाटेत त्याने तथागतांना त्या लोहीच्च्य ब्राह्मणाची ही मिथ्या धारणा कथन केली की, "श्रमण ब्राह्मणांनी स्त्री शुद्रांना ज्ञानदान करू नये. विद्यादान करू नये."_ 

_"भेसिक हे शक्य आहे. भेसिक हे शक्य आहे." तथागत उत्तरले. आणि तथागत लोहीच्च्य ब्राह्मणाच्या निवासस्थानी पोहोचले. त्यांच्यासाठी मांडलेल्या आसनावर तथागत आसनस्थ झाले. लोहीच्च्य ब्राह्मणाने  भिक्खुसंघप्रमुख तथागतांना आणि - भिक्खुसंघाला स्वहस्ते मृदु मधुर अन्नदान  केले. त्याने त्यांना आग्रहपूर्वक भोजन - दिले. जेव्हा त्यांनी नकार दिला तेव्हाच तो थांबला._

_तथागतांनी आपले भोजन संपविले. तथागतांनी आपले कर आणि - पात्र धुवून स्वच्छ केले. लोहीच्च्य ब्राह्मणाने आपल्यासाठी एक कनिष्ठ आसन आणले. आणि तो तथागतांनिकटच आसनस्थ झाला._

_अशाप्रकारे आसनस्थ झालेल्या - *लोहीच्च्य ब्राह्मणास तथागत म्हणाले, "लोहीच्य लोक असे म्हणतात की, श्रमण आणि ब्राह्मणांनी शुद्रांना किंवा महिलांना ज्ञानदान करू नये, विद्यादान करू नये. - अशी तुझी मान्यता आहे. हे खरे आहे काय?"*_

 _"होय श्रमण गौतमा, ते खरे आहे" लोहीच्च्य ब्राह्मण उत्तरला._

_"लोहीच्च्य, तुला काय वाटते? काय तू सालवाटिकेत नांदत नाहीस?" होय गौतमा, हे खरे आहे._

 _"आणि समजा लोहीच्च्य कोणी असे म्हणत असेल की, लोहीच्च्य ब्राह्मणाचा सालवाटिकेवर अधिकार आहे. म्हणून त्यानेच सालवाटिकेतून प्राप्त सर्व आगमाचा (मिळकतीचा) आणि उत्पादाचा उपभोग घ्यावा. त्याने इतरांना काहीही देऊ नये. अशी धारणा व्यक्त करणारी व्यक्ती जे तुझ्यावर आश्रित आहेत त्यांना संकटात टाकणारी आहे, असे तुला वाटत नाही काय?"_ 

_"होय श्रमण गौतमा, मी त्या व्यक्तीला माझ्या आश्रितांकरिता संकटाचा निर्माताच मानणार."_ 

_"तर असा संकटाचा निर्माता तुझ्या आश्रितांचा हितचिंतक मानला जावा काय??"_

_"नाही, तो. त्यांचा हितचिंतक मानला जाणार नाही. त्यांचा कल्याणकर्ता मानला जाणार नाही. श्रमण गौतमा," लोहीच्च्य उत्तरला._

_"जर ती व्यक्ती त्यांच्या हिताची चिंता करणारी नाही तर ती व्यक्ती त्यांची मित्र होईल की शत्रू?"_ 

_"ती व्यक्ती त्यांची शत्रूच होईल. श्रमण गौतमा."_ 

_"तर मग जो सिद्धांत एकाला दुसऱ्याचा शत्रू घोषित करतो तो सिद्धांत तू योग्य मानशील की अयोग्य??"_

 _"लोहीच्च्य, तुला काय वाटते? काशी आणि कोशल जनपदावर राजा प्रसेनजिताचा अधिकार नाही काय?"_

_"होय श्रमण गौतमा, या जनपदांवर राजाचाच अधिकार आहे."_

_"लोहीच्च्य, जर कोणी असे म्हणत असेल की, कोशल नरेश प्रसेनजित काशी आणि कोशल जनपदाचा स्वामी आहे. त्याने काशी आणि कोशल जनपदातील सर्व आगम आणि उत्पाद यांचा उपभोग घ्यावा. अन्य कोणालाही त्याने त्या उपभोगात सहभागी होऊ देऊ नये. असे प्रतिपादन करणारी व्यक्ती जे राजा प्रसेनजितावर आश्रित आहेत. तू आणि अन्य लोक- त्यांच्याकरिता त्यांना संकटात लोटणारी होय असे तू मानशील अथवा नाही?"_ 

_"होय श्रमण गौतमा, ती व्यक्ती त्या आश्रितांकरिता संकटाची निर्माताचं होय."_

_"आणि अशा संकटाचा निर्माता त्यांचा हितचिंतक होऊ शकतो काय?"_

_"नाही श्रमण गौतमा, तो त्यांचा हितकर्ता होऊच शकत नाही."_

_"जर तो त्यांचा हितकर्ता नाही तर त्याच्या चित्तात त्यांच्याविषयी प्रेम असेल की वैर असेल."_

_"निश्चितच त्याच्या चित्तात त्यांच्या-विषयी वैर असेल श्रमण गौतमा."_

_"मग असा सिद्धांत एकाला दुसऱ्याचा शत्रू घोषित करतो तो सिद्धांत योग्य मानावा की अयोग्य मानावा?"_

_"तो सिद्धांत अयोग्यच मानावा श्रमण गौतमा."_

_*"मग लोहीच्च्य, जो असे म्हणतो की, सालवाटिकेवर तुझे स्वामित्व आहे म्हणून तूच सालवाटिकेचा सारा आगम आणि उत्पाद यांचा उपभोग घ्यावा. इतरांना काहीही देऊ नये. आणि कोणी असे म्हणत असेल की, राजा प्रसेनजित काशी आणि कोशल जनपदाचा स्वामी आहे म्हणून राजा प्रसेनजितानेच काशी आणि कोशल जनपदातील सर्व आगम (मिळकतीचा) आणि उत्पाद यांचा उपभोग घ्यावा. इतरांना काहीही देऊ नये. तर असा माणूस त्या सर्वांकरिता जे तुझ्यावर आश्रित आहेत. आणि तुझ्यासहित त्या सर्वांकरिता जे कोशल नरेशावर आश्रित आहेत त्या सर्वांना संकटात टाकणाराच ठरणार आणि जो दुसऱ्यांना संकटात टाकतो तो त्यांचा हितचिंतक होऊच शकत नाही. आणि जो हितचिंतक नाही तो शत्रूच असतो. आणि जो सिद्धांत एकाला दुसऱ्याचा शत्रू घोषित करतो तो अयोग्य होय. तू हे मान्य करतोस."*_

 👉 *_"त्याचप्रमाणे हे लोहीच्च्य, जो माणूस असे म्हणतो की, श्रमण आणि ब्राह्मणांनी शूद्र आणि महिलांना ज्ञानदान करू नये, विद्यादान करू नये तो सुद्धा त्याच माणसासारखा आहे."_*

👉 *_"असे म्हणणारा माणूस दुसऱ्याच्या मार्गात अडचणी उभ्या करतो. तो त्यांचा हितचिंतक नसतो. आणि जो हितचिंतक नाही तो शत्रूच होय. अशाप्रकारे जो माणूस दुसऱ्याचा हितचिंतक नसल्याने तो त्यांचा शत्रू होतो तेव्हा असा सिद्धांत एकाला दुसऱ्याचा शत्रू घोषित करतो तो सिद्धांत अयोग्य सिद्धांत होय."_*

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

*_संकलन - महेश कांबळे_*

*_दिनांक :- २०/०७/२०२४_*

*_संदर्भ :-_*

_*१) भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, तिसरा खंड भाग ५*_

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

Thursday, 18 July 2024

सद्धम्माची कार्ये

 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_सद्धम्म म्हणजे काय?_*

_*अ) : सद्धम्माची कार्ये*_

*_(क्रमशः)_*

*_!! ॐ मणी पद्मे हूँ !!_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2024/07/blog-post_18.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

_*१. अपवित्रतेपासून चित्ताची शुद्धता*_

              एकदा तथागत श्रावस्ती येथे वास्तव्याला होते. कोशल नरेश प्रसेनजित तथागत वास करीत होते तेथे आले. आपल्या रथातून पायउतार होऊन आणि मोठ्या श्रद्धेने तथागतानिकट गेले._

          _त्यांनी तथागतांना नगर प्रवेशाची आणि त्यांचे निमंत्रण स्वीकारून आतिथ्य ग्रहण करण्याची प्रार्थना केली. राजाने तथागतांनी नगर प्रवेश करावा आणि लोकांना सार्वजनिक धम्मोपदेश द्यावा अशीही प्रार्थना केली. *हेतू हा की सामान्यजनांना तथागतांचे दर्शन व्हावे. सामान्यजनांना तथागतांचा धम्म अवगत व्हावा आणि सामान्यजनांनी तो ग्रहण करावा.*_

_तथागतांनी प्रार्थना स्वीकारली. दुसऱ्या दिवशी तथागत नगरात प्रवेश करते झाले. त्यांच्यासह भिक्खूंचा मोठा समुदाय होता. ते सर्व नगरपथ आक्रमित नियोजित स्थळी पोहोचले. तथागत स्थानापन्न झाले. इतरांनीही आपले स्थान ग्रहण केले._

_अन्न ग्रहण केल्यावर राजाने तथागतांना प्रार्थना केली की, तथागतांनी चारही वाटा ज्याठिकाणी जुळतात त्या ठिकाणी सार्वजनिक धम्मोपदेश द्यावा. राजाने हे प्रवचन खुल्या प्रांगणातच आयोजित केले होते. मोठा जनसमुदाय त्या स्थळी उपस्थित होता._

त्या स्थानी दोन व्यापारीही बुद्धाचा धम्मोपदेश श्रवण करण्यास्तव उपस्थित होते. 

१. _एकाने प्रतिक्रिया व्यक्त केली. "अशा प्रकारची सार्वजनिक सभा आयोजित करून, सार्वजनिक धम्मोपदेशाचे आयोजन करून राजाने खरेच सुज्ञपणाचा परिचय दिला आहे. ही धम्म देशना किती व्यापक आहे हा धम्मोपदेश किती गहन गंभीर आहे."_

२. _यावर दुसऱ्याने प्रतिक्रिया व्यक्त केली, "राजाने या माणसाला येथे सार्वजनिक धम्मोपदेश देण्यासाठी आमंत्रित केले हा राजाचा मूर्खपणाच नव्हे तर काय?"_

          _"जसे गाडीला बांधलेली गाय जिकडे जाईल तिकडे तिचे वासरूही जाते. त्याचप्रमाणे हा बुद्ध राजाशी बांधलेला आहे आणि राजा जिकडे नेईल तिकडे जातो आहे." दोघाही व्यापाऱ्यांनी नगराचा निरोप घेतला आणि एका पथिकाश्रमात वास्तव्याला आले._

१. _*सुरापान करताना जो भला व्यापारी होता त्याला चतुर्दिक्कपालानी संयत राखले. त्याचे संरक्षण केले.*_

२. *_दुसऱ्या व्यापाऱ्याला दुष्ट प्रेतात्म्याने अतिरिक्त सुरापानाची प्रेरणा दिली. परिणामी तो अतिरिक्त सुरापानामुळे अचेतन अवस्थेला प्राप्त झाला. आणि पथिकाश्रमाबाहेरच्या वाटेवर जाऊन पडला._*

           _दुसऱ्या दिवशी प्रातः समयी व्यापाऱ्यांच्या मालवाहू गाड्या त्या वाटेने जात होत्या. वाटेवर कोणी पडलेला आहे हे चालकांच्या ध्यानीही आले नाही आणि तो दुसरा व्यापारी त्या मालवाहू गाड्यांच्या चाकाखाली चिरडला गेला आणि मरणा पावला._

             _पहिला व्यापारी दूरदेशी जाऊन पोहोचला. तेथे एका पवित्र अश्वाने त्याच्यापुढे गुडघे टेकले. याचा परिणाम म्हणून त्याला त्या देशाचा राजा म्हणून घोषित करण्यात आले आणि तो सिंहासनारूढ झाला._

_यानंतर घडलेल्या घटनांच्या विचित्रांवर विचार करीत तो मायदेशी परत गेला. त्याने बुद्धांना आमंत्रित केले आणि  सामान्यजनांना धम्मदेशना देण्याची प्रार्थना केली._ 

_त्याप्रसंगी त्या जगद्वंद्य तथागतांनी त्या दुष्टप्रवृत्ती व्यापाऱ्याच्या मृत्यूचे कारण - घोषित केले अणि जो सुज्ञपणाने वागला त्या व्यापाऱ्याला जे ऐश्वर्य प्राप्त झाले त्याचे कारणही स्पष्ट केले. त्यांनी पुढील गाथा गायिली-

*_"चित्त सर्वांचे मूळ आहे. चित्तच स्वामी आहे. चित्तच निमित्त आहे."_*

              _*"चित्तातच दुष्ट प्रवृत्ती उगम पावतात. त्यामुळे माणूस अकुशल वचन बोलतो. दुष्ट कर्म करतो. त्याच्या या पापकर्माचे फळ म्हणून, ज्याप्रमाणे रथाची चक्रे रथ ओढणाऱ्या वारूच्या पाठोपाठ जातात, - त्याचप्रमाणे दुःखे त्या माणसाच्या पाठोपाठ येतात. त्याच्या वाट्याला येतात.*_

_*"चित्तच सर्वांचे मूळ आहे. चित्तच - सर्वांचा स्वामी आहे. चित्तच नियोजन करते, प्रयोजन करते."*_

*_"जर चित्तात कुशल विचार असतील तर त्याची वाणी कुशल असते. त्याचे कर्म कुशल असते. त्याचा परिणाम म्हणून वस्तूंच्या पाठोपाठ येणाऱ्या छायेप्रमाणे त्या कुशल कर्माचे फळ त्याला प्राप्त होते."_*

_हे कथन श्रवण केल्यावर राजा, त्याचे अमात्य आणि अगणित सामान्यजन धम्माची दीक्षा ग्रहण करते झाले. तथागतांचे अनुगामी झाले._

*_२. या इहलोकी धम्मराज्याची स्थापना_*

_धम्माचे प्रयोजन काय? विविध धर्मानी याची अनेकानेक उत्तरे दिली आहेत._

_या प्रश्नाचे, *माणसाला ईश्वरप्राप्तीच्या मार्गी लावणे आणि त्याला आत्म्याची मुक्ती, आत्म्याचा मोक्ष याचे महत्त्व विशद करून सांगणे हे एक सर्वसामान्य उत्तर आहे.*_

_बहुतांश धर्म तीन राज्यांविषयी बोलतात._

१. _एकाला ते स्वर्गाचे राज्य म्हणतात._

२. _दुसऱ्याला ते इहलोकीचे राज्य म्हणतात._ 

३. _तिसऱ्याला ते नरकाचे राज्य म्हणतात._

              _स्वर्गाच्या राज्यात ईश्वराचे शासन आहे असे बोलले जाते. नरकाच्या राज्यात सैतानाचा एकाधिकार आहे असेही मानले जाते. पण इहलोकीच्या राज्यावर शासनासंबंधी मात्र स्थिती विवादास्पद आहे. इहलोकीच्या राज्यावर सैतानाचा अधिकार नाही त्याचवेळी या राज्यावर ईश्वराचा एकाधिकार आहे असेही मानले जात नाही. परंतु अशी आशा केली जाते की, एक ना एक दिवस या इहलोकी ईश्वराचे राज्य येईल._

       _काही धर्म असे मानतात की, स्वर्गाचे राज्य हे धर्मराज्य आहे यात शंकाच नाही. कारण स्वर्गाचे राज्य हे प्रत्यक्षपणे ईश्वरीय शासनाधीन आहे._

_काही इतर धर्मानुसार स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करणे हाच मानवी जीवनाचा एकमेव हेतू आहे. आणि ते कसे साध्य व्हावे हे धर्माचे सार आहे._

*_"धम्माचा हेतू काय?" या प्रश्नाला बुद्धांनी दिलेले उत्तर सर्वथा भिन्न आहे."_*

         _*त्यांनी लोकांना काल्पनिक स्वर्गाची प्राप्ती हाच मानवीय जीवनाचा एकमेव हेतू आहे हे सांगितले नाही. त्यांनी लोकांना अशी देशना दिली की, धम्माचे राज्य याच इहलोकी आहे आणि त्याची प्राप्ती धम्मप्रवण आचरणाने होऊ शकते.*_

          _*त्यांनी लोकांना सांगितले की, तुम्हाला तुमच्या दुःखांचा अंत करावयाचा असेल तर, तुम्हाला इतर मनुष्यमात्रांसोबत धम्मसंगत, न्यायसंगत व्यवहार करावा लागेल. तेव्हाच या इहलोकी धम्मराज्याची स्थापना होईल.*_

_अन्य सर्व धर्माच्या तुलनेने तथागतांच्या धम्माचे हे आगळेवेगळे वैशिष्ट्य आहे._

_*बुद्धांनी धम्मात पंचशीलांवर भर दिला आहे, अष्टांगिक मार्गावर भर दिला आहे आणि पारमितांवर भर दिला आहे.* बुद्धांनी या सर्वांना आपल्या धम्माचे आधार म्हणून का स्वीकारले? *कारण ते सर्व मिळून एक अशी जीवनप्रणाली आहेत की, त्यांचा स्वीकार करूनच माणूस धम्मप्रवण होऊ शकतो. सदाचरणी होऊ शकतो.*_

_माणसाचा माणसांप्रती भेदभाव, माणसाची माणसांप्रती असमानता याचाच परिणाम म्हणून माणूस दुःखी होतो. माणसाच्या वाट्याला दुःखे येतात. *केवळ धम्माचरणानेच माणसा- माणसातील असमानता, माणसामाणसातील हा अनुचित भेदभाव दूर होऊ शकतो आणि त्याचा परिणाम म्हणून उत्पन्न दुःखाचा क्षय होतो.*_

           _म्हणूनच बुद्ध म्हणतात की, *धम्माचे काम केवळ देशना देणे हे नाही. धम्माचे प्रथम उत्तरदायित्व हे आहे की, दैनंदिन आचरणात धम्माचरण आणि सदाचरण यांची आवश्यकता आणि महत्त्व, धम्माने माणसाच्या चित्ती बिंबवावे, रुजवावे. माणसाच्या चित्ती धम्माचरण आणि सदाचरण यांची आवश्यकता आणि महत्त्व रुजविण्यासाठी, धम्माने काही इतर कार्येही करणे आवश्यक आहे.*_

१. *_कुशल कर्म कोणते आणि त्यापासून कसे परावृत्त व्हावे याची देशना धम्माने माणसाला द्यावी._*

२. *_अकुशल कर्म कोणते आणि त्यापासून कसे परावृत्त व्हावे याची देशना धम्माने माणसाला द्यावी._*

_धम्माच्या या दोन हेतुशिवायही त्यांनी धम्माचे दुसरे दोन अत्यंत महत्त्वपूर्ण उद्देश कथन केले आहेत._

१. _प्रथम म्हणजे *माणसाची प्रकृती आणि प्रवृत्ती यांना प्रशिक्षित करणे हे प्रशिक्षण, हे प्रार्थना करण्यापेक्षा भित्र आहे. व्रतवैकल्यापासून भिन्न आहे. यज्ञयागापासून भिन्न आहे.*_

_*देवदह सुत्तात* जैनधर्माची चर्चा करताना बुद्धांनी हा विषय स्पष्ट केला आहे. *जैन धर्माचे संस्थापक महावीर यांची अशी धारणा होती की, माणूस जे काही सुख किंवा दुःख अनुभवतो ते त्यांच्या पूर्वजन्मीच्या कर्माचा परिणाम होय.*_

              _असे होत असल्याने गतजन्मीच्या अकुशल कर्माचे विवेचन आणि या जन्मी अकुशल कर्म न करणे यामुळे भविष्यासाठी अकुशल कर्माचा क्षय होतो. अकुशल कर्माचा क्षय होतो तेव्हा दुःखाचा क्षय होतो. जेव्हा दुःखाचा क्षय होतो तेव्हा संवेदना क्षय पावते. जेव्हा संवेदना क्षय पावते तेव्हा सर्व दुःखांचा मूलोच्छेद होतो. दुःख लयास जाते. *हीच जैन धर्माची देशना होती.*_

_*यावर बुद्धांनी असा प्रश्न केला की, "काय तुम्ही जाणता की, येथेच आणि याच क्षणी अकुशल प्रवृत्तींचा क्षय झाला आहे आणि येथेच आणि याच क्षणी कुशल प्रवृत्तीची स्थापना झाली आहे."*_

_याला "नाही" असेच उत्तर आहे._

*_तेव्हा बुद्ध विचारणा करतात, "मग गतजन्मीच्या अकुशल कर्माचे विरेचन करण्याचे प्रयोजनच काय? आणि या जन्मी नवीन अकुशल कर्म न करण्याचे प्रयोजनच काय?" जर चित्ताला अकुशल प्रवृत्तींना कुशल प्रवृत्तीत परिवर्तीत करण्याची साधना साधली नसेल तर या सर्वांचे काहीही प्रयोजनच नाही."_*

_*त्यांच्या मते धर्मातील हाच सर्वात महत्त्वाचा दोष होता. "शुभप्रवृत्ती आणि शुभसंस्कार हेच माणसाच्या चिरस्थानी चांगुलपणाचे अधिष्ठान आणि हमी आहेत."*_

_*म्हणूनच बुद्धांनी चित्ताच्या साधनेला प्रथम स्थान दिले आहे. चित्ताची साधना याचाच अर्थ प्रकृती आणि प्रवृत्तीचे कुशल मार्गावर परिवर्तन.*_

२. _*ज्या दुसऱ्या विषयाला बुद्धाने महत्त्वपूर्ण स्थान दिले तो विषय म्हणजे, "माणूस एकटा असला तरीही त्याने साहसपूर्वक श्रेष्ठत्तम मार्गाचे अनुसरण करावे." हा होय.*_

_*सल्लेखसुत्तात* बुद्धांनी हा विषय आग्रहपूर्वक प्रतिपादित केला आहे. ते असे म्हणतात की,_

 १. _"आपल्या चित्ताला निर्मल राखण्या-साठी तुम्ही असा संकल्प करावा की, दुसऱ्यांनी माझी हानी केली तरी मी मात्र कोणाचीही हानी करणार नाही."_

२. _*"इतरांनी हिंसा केली तरी मी मात्र हिंसा करणार नाही."_

३. _"इतरांनी चौर्यकर्म केले तरी मी मात्र चौर्यकर्म करणार नाही."_

४. _"इतरांनी श्रेष्ठ जीवनाचा मार्ग स्वीकारला नाही तरी मी मात्र श्रेष्ठ जीवनाचा मार्गच अनुसरणार._

५. _"इतरांनी मिथ्या कथन केले. चहाडी केली, कटु वचन वदले, अथवा व्यर्थ बडबड केली तरी मी मात्र हे सर्व काही करणार नाही."_

६. _"इतरांनी लोभ केला तरी मी मात्र लोभ करणार नाही."_

७. _"इतरांनी द्वेष केला तरी मी मात्र द्वेष करणार नाही."_

८. _"इतर मिध्यादृ‌शी, मिथ्या संकल्प, मिथ्या वाणी, मिथ्या कर्मान्त, मिथ्या समाधी यांचे आचरण करीत असोत मी मात्र (आर्य अष्टांगिक मार्गाचेच) सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाणी, सम्यक कर्मान्त, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी याच मार्गाचे अनुसरण करणार."_

९. _"इतर सत्याविषयी अपलाप करीत असतील, मुक्तीविषयी अपलाप करीत असतील तरी मी मात्र सत्याविषयी आणि मुक्तीविषयी योग्य मार्गाचाच अवलंब करणार._

१०. _"इतर जरी आलस्य आणि जडतायुक्त असतील तरी मी मात्र आलस्य आणि जडतामुक्त असेन."_

११. _"इतर जरी उदंड स्वभावाचे असले तरी मी मात्र विनम्र स्वभावाचाच असेन."_

१२. _"इतर जरी विचिकित्सायुक्त असले तरी मी मात्र विचिकित्सामुक्त असेन."_

१३. _"इतर जरी क्रोधी, दुष्टबुद्धी. द्वेषी, ईर्षाग्रस्त, कृपण, लोभी, दांभिक, कपटी, निर्बुद्ध, उदंड, आगाऊ, दुष्टसंगत करणारे, आलस्ययुक्त, अश्रद्ध, निर्लज्ज, सत् आणि असत् विवेकांचा अभाव असलेले, अविद्याग्रस्त, निष्क्रिय, जड, सुज्ञतेचा अभाव असलेले असतील तरी मी मात्र या सर्वांच्या विरुद्ध आचरण करणार._

१४. _"इतर जरी लौकिक वस्तूंवर आसक्त असले, त्यांच्यावरील आपली माया किंचितही कमी होऊ देणार नसले तरी मी मात्र अशा वस्तूंवर आसक्त असेन ज्या भौतिक नाहीत, लौकिक नाहीत. मी परित्यागशील आचरणच करणार."_

              _*"माझी अशी धारणा आहे की, चेतना शक्ती विकसित झाल्याने वाणी आणि कर्मच नव्हे तर विज्ञान (जाणीव) सुद्धा प्रभावित होते.* म्हणून हे चुंद, माणसाने करावयाचे संकल्प हे मी वर कथन केल्यानुसार असावेत. तसे संकल्प करावयाचे असतील तर त्यासाठी आवश्यक चेतनाशक्ती विकसित करावयास पाहिजे."_

_*बुद्धांच्या मतानुसार धम्माचा उद्देश हा असा आहे.*_

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

*_संकलन - महेश कांबळे_*

*_दिनांक :- १९/०७/२०२४_*

*_संदर्भ :-_*

_*१) भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, तिसरा खंड भाग ५*_

_*२) धम्मपद*_

*_३) देवदह सुत्त_*

*_४) सल्लेख सुत्त_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...