🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_सद्धम्म म्हणजे काय?_*
_*(ड) धम्माने सर्व सामाजिक भेदभावांना मूठमाती दिली तरच धम्म सद्धम्म होतो*_
_*१. धम्म माणसामाणसातील भेदभाव नष्ट करीत असेल तरच धम्म सद्धम्म होतो*_
*_(क्रमशः)_*
*_!! ॐ मणी पद्मे हूँ !!_*
https://mikamblemahesh.blogspot.com/2024/07/blog-post_64.html
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
_आदर्श समाज काय आहे? ब्राह्मणांच्या मतानुसार वेदांनी आदर्श समाज व्याख्यायित केला आहे आणि वेद हे प्रमादातीत आहेत. त्यामुळे माणसांकरिता आदर्श समाज म्हणजे वेदांनी व्याख्यायित केलेला समाजच होय. *वेदांनी पुरस्कारलेली आदर्श समाज- व्यवस्था 'चातुर्वर्ण्यव्यवस्था' म्हणून संबोधिली जाते.* अशा आदर्श समाजव्यवस्थेने वेदानुसार तीन अटींची पूर्तता करणे अनिवार्य आहे. *या समाज व्यवस्थेत चार वर्ग असलेच पाहिजेत. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र.*_
_या चार वर्गातील परस्पर संबंधाचे नियमन आणि नियंत्रण स्तरीकृत असमानतेच्या तत्त्वानुसारच व्हावे. दुसऱ्या शब्दात हे सर्व वर्ग समान स्तरावर नसतील. तर एकावर दुसरा याप्रकारे स्तरीकृत असतील. त्यांच्यात सामाजिक दर्जा, अधिकार आणि विशेष सुविधा यांच्या संदर्भात स्तरीकृत असमानता असेल. सर्वोपरी ब्राह्मण, क्षत्रियांचे स्थान ब्राह्मणांपेक्षा कनिष्ठ पण वैश्यांपेक्षा श्रेष्ठ, वैश्यांचे स्थान क्षत्रियांपेक्षा कनिष्ठ पण शुद्रांपेक्षा श्रेष्ठ आणि शूद्र सर्वात शेवटी, निकृष्टतम._
_*या व्यवस्थेचे तिसरे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक वर्गाने त्या वर्गासाठी निर्धारित नियोजित व्यवसायच करावा. ब्राह्मणांचा व्यवसाय म्हणजे अध्ययन, अध्यापन आणि धर्मसंस्कार करणे, क्षत्रियांचा व्यवसाय म्हणजे शस्त्रधारणा आणि युद्ध करणे, वैश्यांचा व्यवसाय म्हणजे व्यापार उदीम आणि शूद्रांचा व्यवसाय वरच्या त्रैवर्णिकांची सेवा चाकरी. शारीरिक श्रमाची, सामाजिक प्रतिष्ठेच्या दृष्टीने हलकी कामे करणे.*_
_*कोणताही वर्ग दुसऱ्या वर्गाच्या व्यवसाय क्षेत्रात अतिक्रमण करू शकत नव्हता. आपल्या व्यवसाय सीमेचे उल्लंघन करू शकत नव्हता. ही आदर्श समाजाची संकल्पना ब्राह्मणांनी स्वीकारली, उचलून धरली आणि लोकांना शिकविली.*_
_या सिद्धांताचा गाभा स्वाभाविकच असमानता हा आहे. सामाजिक असमानता हा ऐतिहासिक विकास प्रक्रियेचा परिणाम नव्हे. असमानता हा ब्राह्मणवादाद्वारा पुरस्कृत सिद्धांत होय._
*_बुद्धांनी याच सिद्धांताचा पाळामुळा-सहित विरोध केला. बुद्ध जातिव्यवस्थेचा घोर विरोधक होते. ते समानतेचे पाईक आणि खंबीर समर्थक होते. जातिव्यवस्थेचे समर्थन करणारा असा कोणताही तर्क नाही, असा कोणताही युक्तिवाद नाही ज्याचा त्यांनी धिक्कार केला नाही, खंडन केले नाही. बुद्धांना या विषयावर अनेक ब्राह्मणांनी आव्हान दिले. परंतु बुद्धांपुढे ते सर्व पूर्णाशाने मौन झाले, शांत झाले._*
_*अश्वलायन सुत्तात* एक कथा कथन करण्यात आली आहे. एकदा ब्राह्मणांनी आपल्या-पैकी एकाला, अश्वलायनाला बुद्धांकडे जाऊन जातिव्यवस्था आणि असमानता यासंबंधी त्यांच्या विचारांच्या सत्यतेसंबंधी वाद उपस्थित करण्यासाठी प्रेरित केले. अश्वलायन बुद्धांकडे गेला आणि ब्राह्मण कसे सर्वश्रेष्ठ आहेत हा पक्ष त्याच्या समक्ष प्रस्तुत केला._
_तो म्हणाला, "हे श्रमण गौतमा, ब्राह्मणांची धारणा आहे की, फक्त ब्राह्मणच श्रेष्ठवर्गीय आहेत. अन्य सर्व हे कनिष्ठ वर्गाचे आहेत. फक्त ब्राह्मणच शुक्लवर्णीय आहेत. अन्य सर्व कृष्णवर्णीय आहेत. अन्य सर्व कनिष्ठ वर्गाचे आहेत. पावित्र्य हे फक्त ब्राह्मणांतच वास करते. अब्राह्मणात पावित्र्य वास करीत नाही. ब्राह्मणच ब्रह्माची औरस संतती होत. ब्राह्मण ब्रह्माच्या मुखातून जन्मले आहेत. ब्राह्मणच फक्त ब्रह्माची अपत्ये आहेत ब्रह्माची निर्मिती आहेत. त्याचे उत्तराधिकारी आहेत. या विषयावर श्रमण गौतमाचे काय म्हणणे आहे."_
_बुद्धांच्या उत्तराने अश्वलायन हतप्रभच झाला. *बुद्ध कथन करते झाले, "अश्वलायना, काय ब्राह्मणांच्या ब्राह्मण भार्या ऋतुमती होत नाहीत, त्या गर्भ धारणा करीत नाहीत, काय त्या संतती प्रसवत नाहीत ? एवढे सर्व असूनही तू सांगितलेस तशीच ब्राह्मणांची धारणा आहे काय? जरी तेही इतरांसारखेच स्त्रीच्या गर्भातून जन्मले असले तरीही."*_
_अश्वलायनाने कोणतेही उत्तर दिले नाही._
_बुद्धांनी पुढे जाऊन अश्वलायनास दुसरा प्रश्न केला. *"समजा हे अश्वलायन, एक युवा क्षत्रिय ब्राह्मण कन्येबरोबर सहवास करतो. तर होणारी संतानोत्पत्ती काय असेल?" "काय तो मनुष्यप्राणी असेल ? अथवा अन्य प्राणिमात्र असेल?"*_
_यावरही अश्वलायनाने कोणतेही उत्तर दिले नाही._
_*"जेथपर्यंत नैतिक उन्नतीचा संबंध आहे. फक्त ब्राह्मणच आपल्या चित्तात राग, द्वेष, दुर्भावना विरहित प्रेम उत्पन्न करू शकतात काय? अन्य त्रैवर्णिकांना हे शक्य नाही काय?"*_
_"नाही. असे काहीही नाही. सर्वच चारही वर्णातील जनांना हे शक्य आहे." अश्वलायन उत्तरला._
_*" अश्वलायना, तू हे ऐकले आहेस काय?" बुद्धांनी विचारणा केली. "यवन आणि काम्बोज देशात आणि त्या देशांच्या आसपासच्या देशांत फक्त दोनच वर्ग आहेत. हे दोन वर्ग म्हणजे स्वामी आणि दास हे होत. आणि त्या व्यवस्थेत स्वामीचा दास होऊ शकतो आणि दासाचा स्वामी होऊ शकतो."*_
_"होय मी हे ऐकले आहे." अश्वलायन उत्तरला._
_*"जर तुमची चातुर्वर्ण्य व्यवस्था आदर्श आहे तर मग ती सार्वत्रिक का नाही?"*_
_यापैकी कोणत्याही मुद्यावर अश्वलायन आपल्या जातीव्यवस्था आणि असमानतेच्या सिद्धांताचे समर्थन करू शकला नाही. तो पूर्णपणे मौनच राहिला. अंततः त्याने बुद्धांचे अनुगामित्व स्वीकारले._
_*वासेट्ठ नावाच्या ब्राह्मणाने तथागतांचा धम्म स्वीकारला होता.* त्याच्या धम्मग्रहणाविषयी इतर ब्राह्मण त्याची निंदा करीत असत. एकदा तो बुद्धांकडे गेला आणि इतर ब्राह्मण त्याची कशी निंदा करतात हे त्याने कथन केले._
_तेव्हा वासेठ्ठ म्हणाला, "तथागत, ब्राह्मण असे म्हणतात की, ब्राह्मणांचा सामाजिक दर्जा श्रेष्ठ आहे. इतरांचा सामाजिक दर्जा कनिष्ठ आहे. फक्त ब्राह्मणच शुक्लवर्णाचे आहेत. इतर सर्व कृष्णवर्णाचे आहेत. फक्त ब्राह्मणच शुद्ध बीजोत्पत्र आहेत. अब्राह्मण नाहीत. फक्त ब्राह्मणच ब्रह्माची औरस संतती आहेत. तेच त्याच्या मुखातून जन्म पावले. तेच ब्रह्माचे पुत्र आहेत. ब्रह्माची निर्मिती आहेत. ब्रह्माचे उत्तराधिकारी आहेत._
_*"तुमच्याविषयी बोलावयाचे झाल्यास ते म्हणतात, तुम्ही अभिजात वर्गाचा त्याग करून कनिष्ठतम वर्गाची संगती केली आहे. तुम्ही त्या मुंडन केलेल्या श्रमणात सामील झाला आहात. तुम्ही कृष्णवर्गीयात सामील झाला आहेत. तुम्ही ब्रह्माच्या चरणातून उत्पत्र शुद्रांच्या वंशजात सामील झाला आहात. असंस्कृत श्रमणात सामील झालात. तुमच्याकरिता हे करणे उचित नव्हे. असे करणे योग्य नव्हे. काय हे योग्य आहे की, तुम्ही आपल्या अभिजात वर्गाचा त्याग करून कनिष्ठत्तम वर्गाची संगती करावी. मुंडन केलेल्या श्रमणात सामील व्हावे. सामान्यजनात, यजनात, श्रमणात, कृष्णवर्णीयात, आमच्या जातीच्या चरणातून उत्पन्न झालेल्यांच्या वंशात सामील व्हावे."*_
_"भगवन् या शब्दात ब्राह्मण मला दोष देतात. माझी निंदा करतात. मला शिव्याशाप देतात आणि हे सर्व करताना त्यात ते कोणतीही कसर ठेवीत नाही."_
_*बुद्ध वदले, "वासेष्ठ, ब्राह्मण जर असे कथन करीत असतील तर ब्राह्मण निश्चितच आपली प्राचीन परंपरा विसरले आहेत. इतर वर्णीयाप्रमाणेच ब्राह्मणांच्या भार्याही संतानोत्पत्ती करताना, त्यांचे पालनपोषण करताना दिसतात. स्त्रीच्या गर्भातून जन्मलेले हेच ब्राह्मण असे म्हणतात की, ते ब्रह्माचे औरस पुत्र आहेत. ब्रह्माच्या मुखातून जन्मले आहेत. ते ब्रह्माची संतान आहेत. ते ब्रह्माची निर्मिती आहेत. ते ब्रह्माचे उत्तराधिकारी आहेत. ते असे बोलून ब्रह्माची प्रकृती आणि प्रवृत्तीची चेष्टाच करतात."*_
_एकदा *एसुकारी ब्राह्मण* तीन प्रश्न घेऊन बुद्धाशी शास्त्रार्थ करण्याकरिता गेला. त्याने उपस्थित केलेला प्रथम प्रश्न हा व्यवसायाच्या स्थायी विभाजनाशी, वर्गीकरणाशी संबंधित होता. या व्यवस्थेच्या समर्थनार्थ त्याचा युक्तिवाद असा होता की, "हे तथागता, मी तुला एक प्रश्न विचारणार आहे. ब्राह्मण असे म्हणतात की ते कोणाचीही सेवा करणार नाहीत. कारण ते सर्वश्रेष्ठ आहेत. इतर सर्व त्यांची सेवा करण्यासाठीच जन्म पावले आहेत."_
_"श्रमण गौतमा, सेवेचे चार वर्ग आहेत. १. ब्राह्मणाद्वारा केली जाणारी सेवा, २. क्षत्रियाद्वारा केली जाणारी सेवा. ३. वैश्याद्वारा केली जाणारी सेवा आणि ४. शुद्राद्वारा केली जाणारी सेवा. परंतु एका शुद्राची सेवा दुसरा शुद्रच करू शकतो. अन्य कोण शुद्राची सेवा करणार? श्रमण गौतमाचे या संबंधात काय विचार आहेत?" बुद्धांनी विचारणा केली की, "संपूर्ण जगच ब्राह्मणांच्या या वर्गीकरणाशी सहमत आहे काय?"_
_बुद्धांनी त्याला प्रतिप्रश्न विचारून उत्तर दिले. *"माझ्या संबंधात बोलावयाचे झाल्यास मी असे म्हणणार नाही की सर्व सेवा केल्याच पाहिजेत. आणि मी असेही म्हणणार नाही की, सर्व सेवा न केल्या पाहिजे. परंतु एखादी सेवा केल्याने माणसाची स्थिती अवनत होत असेल. उन्नत होत नसेल. तर ती सेवा केली जाऊ नये. पण ती सेवा केल्याने त्याची स्थिती उन्नत होत असेल. अवनत होत नसेल तर ती सेवा केली पाहिजे."*_
_*"हेच एकमेव असे सूत्र आहे की, ज्याच्या आधारे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शुद्रांच्या सेवांचा समानतेने विचार व्हावा. प्रत्येकाने ती सेवा नाकारावी जी त्याला अवनत अवस्थेला नेते. प्रत्येकाने तीच सेवा करावी जी त्याला उन्नत अवस्थेला नेण्यास सहायक ठरते."*_
_एसुकारीने दुसरा प्रश्न उपस्थित केला, "माणसाचा सामाजिक दर्जा निर्धारित करतेसमयी, त्याचे पूर्वज, त्याची वंशपरंपरा याचा विचार का केला जाऊ नये?"_
_या प्रश्नाला बुद्धांनी अशाप्रकारे उत्तर दिले, *"वंशपरंपरेच्या अभिमानाबाबत एवढेच म्हणता येईल की, माणूस ज्या वंशात जन्म ग्रहण करतो त्या आधारावर हा ब्राह्मण वंशात जन्मला, हा क्षत्रिय वंशात जन्मला, हा वैश्य वंशात जन्मला, हा शूद्रवंशात जन्मला, अग्नीसुद्धा ज्या इंधनातून उत्पन्न होतो त्याच्या नावानेच ओळखला जातो. जसे ओंडक्याचा अग्नी, ढलप्याचा अग्नी, काट्याकुट्यांचा अग्नी, शेणीचा अग्नी एवढेच. माणसाकरिता सद्धम्म म्हणजेच वास्तविक संपदा होय. जन्माने माणसाची गणती कोणत्या ना कोणत्या वर्णात होईल एवढेच." "वंशपरंपरा, सुंदर मुख किंवा धनसंपदा यामुळे माणूस चांगला किंवा वाईट होत नाही. कारण तुला असे दिसेल की श्रेष्ठ कुलोत्पन्न हिंसा करणारा आहे. चोर आहे. व्यभिचारी आहे. मिथ्या कथन करणारा आहे. चहाडी करणारा आहे. कटु वचन बोलणारा आहे. व्यर्थ बडबड करणारा आहे. लोभी आहे. दोषी आहे. मिथ्या दृष्टीचा आहे. म्हणून माझे असे ठाम मत आहे की, माणूस जन्माने श्रेष्ठ होत नाही. उलट असे दिसेल की कनिष्ठ कुलोत्पत्र माणूसही या सर्व दोषापासून मुक्त असेल. म्हणून माझी अशी मान्यता आहे की, माणूस वंशपरंपरेने वाईट होईलच असे नाही."*_
_एसुकरी ब्राह्मणाने उपस्थित केलेला तिसरा प्रश्न, प्रत्येक वर्णासाठी निर्धारित जीविकोपार्जनाच्या व्यवसायाशी संबंधित होता._
_ब्राह्मण एसुकरी तथागतांना वदला, "ब्राह्मणाच्या मतानुसार चार प्रकारच्या व्यवसायाची धारणा आहे. १) ब्राह्मणांकरिता शिक्षण, २) क्षत्रियांकरिता धनुर्धारणा, ३) वैश्यांकरिता कृषी आणि पशुपालन आणि ४) शूद्रांकरिता खांद्यावर पीकपाणी वाहून नेणे. यापैकी कोणीही कोणत्याही कारणास्तव आपल्या व्यवसायाचा त्याग केला तर, त्याने जे करू नये ते तो करीत असेल तर, त्याची कृती ही संरक्षकाने संपत्तीचा अपाहार करावा अशीच कृती होय. श्रमण गौतमा, यावर आपले काय म्हणणे आहे.'_
_*तथागतांनी प्रतिप्रश्न केला, "संपूर्ण जग या ब्राह्मणी वर्गीकरणाचे समर्थक आहे काय ? संपूर्ण जगाने हे वर्गीकरण, ही व्यवस्था स्वीकारली आहे?"*_
_"नाही." एसुकरी उत्तरला._
_*वासेठ्ठाला तथागतांनी म्हटले की, "श्रेष्ठ आदर्श असणे महत्त्वाचे आहे. श्रेष्ठ कुळात जन्म घेणे महत्त्वाचे नाही."*_
*_"जात नाही, असमानता नाही, श्रेष्ठता नाही, कनिष्ठता नाही. सर्व समान आहेत." हीच तथागतांची देशना होती. हीच तथागतांची धारणा होती. "दुसऱ्याशी एकरूप व्हा. तो तसा मी, मी तसा तो." हीच तथागतांची देशना होती. हीच तथागतांची धारणा होती._*
*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_संकलन - महेश कांबळे_*
*_दिनांक :- २६/०७/२०२४_*
*_संदर्भ :-_*
_*१) भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, तिसरा खंड भाग ५*_
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
No comments:
Post a Comment