Wednesday, 24 July 2024

करुणेच्याही पलीकडे मैत्री आवश्यक आहे

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_सद्धम्म म्हणजे काय?_*

_*(क) धम्म मैत्रीचा पुरस्कार करतो तेव्हा धम्म सद्धम्म होतो*_

*_३. करुणेच्याही पलीकडे मैत्री आवश्यक आहे, अशी शिकवण असेल तर धम्म सद्धम्म होतो_*

*_(क्रमशः)_*

*_!! ॐ मणी पद्मे हूँ !!_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2024/07/blog-post_24.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_बुद्धांनी करुणेला धम्माची इतश्री मानले नाही. करुणा म्हणजे मनुष्यमात्राप्रती प्रेम. बुद्ध त्याही पलीकडे गेले. त्यांनी मैत्रीचा विचार केला. मैत्री म्हणजे सर्व जिवंत प्राणिमात्रांविषयी प्रेम._*

_बुद्धांना असे वाटत होते की, माणसाची माणसांप्रती करुणा येथेच थांबू नये. माणसाने मनुष्यमात्रापलीकडे जावे, त्याने सर्व प्राणिमात्रांशी मैत्री जोडावी. जेव्हा तथागत श्रावस्ती येथे वास्तव्याला होते, तेव्हा त्यांनी एका सुक्तात ही बाब योग्य प्रकारे स्पष्ट करून सांगितली. मैत्रीविषयी कथन करताना तथागत भिक्खूंना उद्देशून म्हणाले,_

_"समजा, एखादा माणूस धरणी खोदतो तेव्हा धरणी त्याच्यावर क्रोधित होते काय?"_

_"नाही भगवन" भिक्खू उत्तरले._

_"समजा, एखादा माणूस लाख आणि रंग घेऊन हवेत चित्रे चितारू लागला तर काय तुम्हाला असे वाटते की तो चित्रे चितारू शकेल?"_

_"नाही भगवन"_ 

_"का?"_

_"कारण हवेत असे काळे फलक नाहीत की ज्यावर रंग भरता येतील."_

_*"त्याचप्रमाणे तुमच्या चित्तावरही काळे डाग असू नयेत. हे काळे डाग तुमच्या अपवित्र तृष्णेचे प्रतीक होत."*_

_"समजा एखादा माणूस हाती मशाल घेऊन गंगेला आग लावण्यास निघाला तर त्याला ते शक्य होईल काय?"_

_"नाही भगवन."_

_"का?"_

_"कारण गंगेच्या जलात ज्वलनशीलता नाही."_

_आपल्या धम्मदेशनेचा समारोप करताना तथागत वदले, *"ज्याप्रमाणे पृथ्वीला आहत (घायाळ) झाल्यासारखे वाटत नाही, ती क्रोधित होत नाही. ज्याप्रमाणे हवा आपल्यावर कोणत्याही क्रियेची प्रतिक्रिया होऊ देत नाही, ज्याप्रमाणे गंगेचे जल अग्नीने विचलित होत नाही. तर निरंतर प्रवाहित राहते. त्याचप्रमाणे हे भिक्खूंनो, तुमचा कोणी अपमान केला तरी, तुमच्यावर कोणी अन्याय केला तरी असे करणाऱ्याप्रती तुम्ही मैत्रीभावनाच व्यक्त केली पाहिजे."*_ 

_"हे भिक्खूंनो, *मैत्री आणि मैत्रीची धारा निरंतर प्रवाहित राहिलीच पाहिजे. तुमचे चित्त पृथ्वीसम दृढ असावे, वायूसम निर्मल असावे, गंगेसम गहन गंभीर असावे. हे तुमचे पवित्र कर्तव्य आहे., तुम्ही असे कराल तर कोणत्याही अप्रीतीकर व्यवहाराने तुम्ही मैत्रीभावनेपासून विचलित होणार नाही. आणि जे तुमच्यावर आघात करतील, अन्याय करतील तेच शेवटी दमून जातील."*_

_*"तुमची मैत्री विश्वासारखी व्यापक असावी. तुमच्या भावना, तुमचे विचार असीम असावेत. त्यात द्वेषाला कोठेही थारा असू नये."*_

_*"माझ्या धम्मानुसार करुणा आचरणेच पर्याप्त नाही. मैत्रीचे आचरण अनिवार्य आहे."*_ 

_प्रवचनात तथागतांनी एक कथा कथन केली. ती स्मरणात ठेवण्यायोग्य आहे._

_"कोणे एकेसमयी *श्रावस्ती नगरीत विदेसिका नामक कुलीन स्त्री* वास्तव्य करीत होती. ती सभ्यता, नम्रता आणि सौम्यता या गुणाकरिता ख्यात होती. *तिची एक सेविका होती. तिचे नाव काली.* ती हुशार होती. ती प्रातःकाळी लवकर उठणारी कामसू सेविका होती. *काली एकदा स्वतःशीच विचार करती झाली, 'माझ्या स्वामिनीची अशी ख्याती आहे की, तिला कधीच क्रोध येत नाही. मला याचे आश्चर्य वाटते. खरेच तिला कधीच क्रोध येत नाही. अथवा ती आपला क्रोध प्रकट करीत नाही. अथवा मी माझे गृहकार्य एवढ्या दक्षतेने करीत असावी की, तिला क्रोध व्यक्त करण्याची संधीच मिळत नसावी. मी एकदा तिची परीक्षाच घेऊन पाहावी म्हणते.'*_

_असा विचार करून दुसऱ्या दिवशी प्रातःकाळी ती जरा उशिराच उठली. 'काली! स्वामिनी ओरडली, ' 'होय, बाईसाहेब.' काली उत्तरली. 'तू आज उशिरा का उठलीस?' 'यात काही विशेष नाही बाईसाहेब.' त्यात काही विशेष नाही म्हणतेस ! लबाड कुठली. काही विशेष नाही.' संताप आणि क्रोधाने उद्विग्न स्वामिनी मनाशीच म्हणाली.'_

_'सेविकेने विचार केला, *माझ्या स्वामिनीला क्रोध येतो तर. पण ती दाखवीत नाही एवढेच.* मी माझे काम एवढ्या चोखपणे बजाविते की तिला क्रोध करण्याची संधीच मिळत नाही. मी पुन्हा प्रयत्न करते. ती मनाशीच म्हणाली. दुसऱ्या दिवशी प्रातःकाळी काली अधिक उशिरा उठली. 'काली! काली!' तिची स्वामिनी ओरडली. 'काय बाईसाहेब' काली उत्तरली. 'तू आज उशिरा का उठलीस?' 'काही विशेष नाही बाईसाहेब.' 'काही विशेष नाही म्हणतेस, लबाड कुठली.' ती गृहस्वामिनी आपला क्रोध आणि चीड शब्दात व्यक्त करीत चित्कारली._ 

_*'होय हिला क्रोध येतो तर,'* सेविका विचार करती झाली. मी माझे काम चोखपणे बजाविते म्हणून ती तो क्रोध व्यक्त करीत नाही एवढेच. मी पुन्हा तिची परीक्षा घेणार. दुसऱ्या दिवशी प्रातःकाळी ती अधिक उशिरा उठली. 'काली! काली!' तिची स्वामिनी ओरडली. 'काय बाईसाहेब' काली उत्तरली. 'तू इतक्या उशिरा का उठलीस?' स्वामिनी विचारती झाली. 'काही विशेष नाही बाईसाहेब' काली उत्तरली._

_"इतक्या उशिरा उठूनही काही विशेष नाही म्हणतेस. लबाड कुठली." असे किंचाळत अप्रसन्नतेने क्रोधाने बेभान होऊन गृहस्वामिनीने सेविकेच्या डोक्यात अडसर घातला. सेविकेच्या डोक्यातून रक्त ओघळू लागले._

_"डोक्याला जखम झालेली, त्यातून रक्त ओघळत असलेली काली, तिने आक्रोश करून सारे शेजारी-पाजारी जागे केले. ती लोकांना ओरडून सांगू लागली, 'पहा रे जनहो, ही माझी शांत स्वभावाची स्वामिनी पहा. पहा रे जनहो! ही माझी सौम्य स्वभावाची स्वामिनी पहा. तिने काय केले ते पहा. आणि हे तिने कशासाठी केले तर, तिची एकुलती एक सेविका उशिरा उठली म्हणून. या क्षुल्लक कारणास्तव ती इतकी चिडली, इतकी क्रोधित झाली की, तिने क्रोधाच्या भरात अडसरच माझ्या डोक्यात घातला. आणि माझ्या डोक्याला जखम केली."_

_*"याचा परिणाम असा झाला की विदेसिका ही शांत, सौम्य स्वभावाची स्त्री नसून ती क्रोधी आणि हिंसक स्वभावाची स्त्री आहे अशी तिची ख्याती झाली."*_

*_"याचप्रमाणे चीड, क्रोध येण्यासारखे काही बोलले जात नाही तोपर्यंतच भिक्खू शांत, सौम्य, सभ्य असण्याचा संभव आहे. अप्रीतिकर शब्द बोलले जातात तेव्हाच त्या भिक्खुठायी मैत्रीभावना आहे अथवा नाही, बंधुभाव आहे अथवा नाही याची परीक्षा होते."_*

_"त्यानंतर तथागत पुढे वदले, *"केवळ अन्नवस्त्र मिळविण्यासाठी भिक्खूंनी मैत्रीभाव व्यक्त केला तर, त्यांच्याठायी मैत्रीभाव आहे असे मी मानत नाही. ज्याची मैत्रीभावना धम्मसिद्धांतातून उगम पावते त्यालाच मी खरा भिक्खू मानतो."*_

_"हे भिक्खूंनो, *पुण्यार्जनासाठी केलेल्या कोणत्याही कर्माचे मोल हे मैत्रीभावनेच्या सोळाव्या भागाइतकेही नाही. मैत्री म्हणजे चित्ताची विमुक्ती. ही भावना सर्व पुण्यकर्माना आपल्यात सामावून घेते. मैत्रीभावना ही प्रकाशमान आहे, प्रदीप्त आहे. प्रज्वलित आहे."*_

_"आणि याच प्रकारे हे भिक्खूंनो, *ताऱ्यांचा प्रकाश हा चंद्रप्रभेच्या सोळाव्या भागाइतकाही नसतो. चंद्रप्रभेच्या प्रकाशात साऱ्याच ताऱ्यांचे तेज सामावते. चंद्रप्रभा स्वतेजाने प्रकाशते. प्रदीप्त होते. प्रज्वलित होते. त्याचप्रमाणे हे भिक्खूंनो, पुण्यकर्मासाठी केलेल्या सर्व कर्माचे मोल हे मैत्रीभावनेच्या सोळाव्या भागाइतकेही नसते. मैत्रीभावनेतच ही सर्व कर्मे समाविष्ट असतात. मैत्री म्हणजे चित्ताची मुक्ती. मैत्री ह्या सर्वांना आत्मसात करून प्रदीप्त होते, प्रकाशित होते. प्रज्वलित होते."*_

_"आणि त्याचप्रमाणे हे भिक्खूंनो, *जसे वर्षाऋतूच्या समाप्तीनंतर अन्ध आकाशात प्रकाशणारा भास्कर (सूर्य) सारे किलमिष नाहीसे करतो. तो प्रकाशतो. तो प्रदीप्त होतो. तो प्रज्वलित होतो. आणि जसे रात्रीच्या अंतिम प्रहरी प्रभात तारा प्रज्वलित होतो, प्रकाशित होतो. प्रदीप्त होतो. त्याचप्रमाणे हे भिक्खूंनो, पुण्यार्जनासाठी केलेल्या कोणत्याही कर्माचे मोल मैत्रीच्या सोळाव्या भागाइतकेही नाही. मैत्री म्हणजे चित्ताची मुक्ती. मैत्री या सर्व कर्माना सामावून घेते. ती प्रकाशते ती प्रदीप्त होते. ती प्रज्वलित होते.*_

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

*_संकलन - महेश कांबळे_*

*_दिनांक :- २५/०७/२०२४_*

*_संदर्भ :-_*

_*१) भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, तिसरा खंड भाग ५*_

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

No comments:

Post a Comment

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...