Sunday, 30 June 2024

पुण्णिका थेरी

  🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_पुण्णिका थेरी_*

*_!! ॐ मणी पद्मे हूँ !!_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2024/06/blog-post_30.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

      _भगवान बुद्ध हे स्त्री स्वातंत्र्याच्या विरोधात आहेत असा एक आरोप त्यांच्यावर केला जातो त्याला कारण म्हणजे भिक्षुणि संघाच्या विनयांची संख्या ही भिक्षु संघाच्या विनयापेक्षा अधिक असणे हे होय. पण हे काही खरे नव्हे. भिक्षूणी संघाला त्या काळच्या परिस्थिती नुसार काही कडक नियम तथागतांनी घालून दिले होते._

_बौद्ध स्त्रियांना सर्व धर्मग्रंथ वाचण्याची मोकळीक बुद्ध काळापासून आहे. आजला ब्रह्मदेशात त्रिपिटक ग्रंथाचे अध्ययन केलेल्या आणि करणाऱ्या पुष्कळ स्त्रिया आहेत. इंग्रज सरकारच्या तर्फेने ब्रह्मी राजाच्या पद्धतीस अनुसरून पालिभाषेतील बौद्ध वाङ्मयाची परीक्षा घेऊन काही बक्षिसे वाटण्यात येतात. या परीक्षेत उत्तीर्ण होऊन बऱ्याच स्त्रियांनी बक्षिसे मिळविले आहे._

_*बुद्ध हे स्त्री स्वातंत्र्याचे कधीच विरोधक नव्हते. त्यांनी जसे भिक्षु संघास प्रशिक्षण दिले अगदी तसेच भिक्षूनी संघास ही दिले. त्यांच्या काळात कित्येक भिक्षुनी ह्या अर्हत झाल्या होत्या.* कित्येक प्रसंगी ह्या थेरींनी मोठमोठ्या विद्वान् पुरुषांनाहि आपल्या अधिकारयुक्त वाणीने उपदेश करून सन्मार्गाकडे वळविल्याच्या गोष्टी त्रिपिटकात आढळतात. सुत्त पिटकातील थेरी गाथा ह्याचे मूर्तिमंत उदाहरण आहे. थेरी गाथेतीलच एका थेरीचे उदाहरण आपण पाहूया :-_

_*पुण्णिका नावाची भिक्षुणी* पहाटेस उठून विहारातील भिक्षुणीच्या उपयोगासाठी पाणी आणण्यास नदीवर गेली होती. तेथे एक ब्राह्मण प्रातः स्नान करीत होता. त्याला पाहून ती म्हणाली :-_

_*उदहारी अहं सीते सदा उदकमोतरिं। अय्यानं दण्डभयं भीता वाचादोसभयाट्टिता ।। कस्स ब्राह्मण त्वं भीतो सदा उदकमोतरि। वेधमानेहि गत्तेहि सीतं वेधयसे भुसं ।।*_

_या थंडीमध्ये भिक्षुणीसंघाच्या भयाने (मला दोष देतील या भयाने) पाणी नेण्यासाठी मी या पाण्यात सदोदित उतरते. परंतु हे ब्राह्मणा, या तुझ्या थंडीने आखडून गेलेल्या गात्रांनी तू या पाण्यात कोणाच्या भयाने सदोदित उतरतोस ? थंडीने त् आखडलेला दिसतोस ?_

_ब्राह्मण म्हणाला:-_

_*जानन्तीव तुवं भोति पुण्णिके परिपुच्छसि । करोन्तं कुसलं कम्म रुघन्तं कम्मं पांपकं ।। यो च वुड्‌ढो दहरो वा पापं कम्मं पकुब्बति । दकाभिसेचना सोपि पापकम्मा पमुच्चति ।।*_

_मी पुण्यकर्म करीत आहे, आणि पापकर्माचा निरोध करतो आहे, हे जाणत असता, भवति पुण्णिके, तू हा प्रश्न कसा विचारतेस? *जो कोणी म्हातारा किंवा तरुण पाप करितो, तो प्रातःस्नानाने त्या पापापासून मुक्त होतो.* (हे तुला ठाऊक नाही काय?)_

_पुण्णिका म्हणाली :-_

_*कोनु ते हदमक्खासि अजानन्तस्सजानको । दकाभिसेचना नाम पापकम्मा पमुच्चति ।।१।। सग्गं नून गमिस्सन्ति सब्बे मंडूककच्छपा। नागा च सुंसुमारा च ये चञ्जे उदके चरा ।।२।। ओरब्धिका सूकरिका मच्छिका मिगबंधका। चोरा च वज्झघाता च ये चओ पापकम्मिनो ।। दूकाभिशेचना तेपि पापकम्मा पमुच्चरे ।।३।।*_

१. हे ब्राह्मणा, स्नानाने पापापासून मुक्त होतो हे तुला अजाणाला कोणी अजाणाने सांगितले ? 

२. बेडूक, कासव, सर्प, मगर इत्यादि पाण्यात राहणारे सर्व प्राणी स्वर्गासच जाणार आहेत काय? 

३. बकरे मारणारे, डुकरे मारणारे, मासे मारणारे कोळी, पारधी, चोर, फाशीची शिक्षा झालेले मनुष्य हे आणि दुसरे पापी लोक स्नानानेच पापकर्मापासून मुक्त होतील काय ?

*_सचे इमा नदियो ते पापं पुब्बे कतं बहूं। पुञपिमा बहेय्युं ते तेन त्वं परिबाहिरो ।।४।। यस्स ब्राह्मण त्वं भीतो सदा उदकमोतरि। तमेव ब्रह्मे मा कासि मा ते सीतं छबि हने ।।५।।_*

४. हे ब्राह्मणा, या नद्या जर तुझे पाप वाहून नेतील, तर त्याबरोबर पुण्यहि वाहून नेतील. मग पुण्यालाहि तू मुकशील ! (

५. म्हणून हे ब्राह्मणा, ज्या पापाच्या भयाने तू नित्य या पाण्यात उतरतोस, तेच तू करू नकोस; व्यर्थ थंडीने तुझ्या अंगाला बाधा का करून घेतोस ?

_हा पुण्णिकेचा उपदेश ऐकून संतुष्ट होऊन एक वस्त्र घेऊन तिजपाशी आला, आणि तिला म्हणाला *"भवति पुण्णिके, कुमार्गापासून सन्मार्गाकडे तू मला वळविलेस; म्हणून हे वस्त्र मी तुला देतो."*_

_पुण्णिका म्हणाली : -_

_*तय्हेव साटको होतु नाहमिच्छामि साटकं । सचे भायसि दुक्खस्स सचे ते दुक्खमप्पियं ।। माकासि पापकं कम्मं आवि वा यदि वा रहो ।।१।। सचे च पापकं कम्म करिस्ससि करोसि वा। न ते दुक्खा पमुत्यत्थि उपेच्चापि पलायतो ।।२।। सचे भायसि दुक्खस्स सचे ते दुक्खमप्पियं । उपेहि बुद्धं सरणं धम्मं संघ च तादिनं ।। समादियाहि सीलानि तं ते अत्थाय हेहिति ।।३।।*_

१. हे ब्राह्मणा, तुझे वस्त्र तुझ्याच जवळ ठेव. मी ते इच्छीत नाही. तू जर दुःखास भितोस, तुला जर दुःख अप्रिय आहे, तर एकांती किंवा लोकांती पापकर्म करू नकोस. 

२. जर तू पापकर्म करीत आहेस, किंवा करशील, तर कोठेहि पळून गेलास तरी दुःखापासून तुझी मुक्तता होणार नाही! 

३. जर तू दुःखाला भितोस, दुःख जर तुला अप्रिय आहे, तर तू बुद्धाला शरण जा, धर्माला शरण जा, आणि अर्हन्तांच्या संघाला शरण जा. शीलाचे नियम पाळ. यानेच तुझे हित होईल."

_या उपदेशाने तो ब्राह्मण बौद्धमतानुयायी झाला. पुढे तो मोठा साधु झाला. तेव्हा त्याने हे उद्वार काढिले._

*_ब्रह्मबंधु पुरे आसिं अज्जम्हि सच्चब्राह्मणो। तेविज्जो वेदसंपन्नो सोत्थियो चम्हि न्हातको ।।_*

_*पूर्वी मी केवळ नावाचा ब्राह्मण होतो. परंतु आता मी खरा ब्राह्मण झालो. कारण आता त्रैविद्य (बौद्धधर्मांत सांगितलेल्या तीन विद्या जाणणारा) आहे, मी वेदसंपन्न (ज्ञानसंपन्न) आहे. मी पुरोहित (स्वस्तिसुखाचा लाभी) आहे, मी स्त्रातक (मुक्त) आहे!*_

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

*_!!ॐ मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

*_संकलन - महेश कांबळे_*

*_दिनांक :- ३०/०६/२०२४_*

*_संदर्भ :-_*

_*१) सुत्तपिटक - खुद्दकनिकाय - थेरीगाथा*_

*_२) बुद्ध धर्मावरील चार निबंध_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

Saturday, 29 June 2024

पांढरे वस्त्र

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_पांढरे वस्त्र_*

*_!! ॐ मणी पद्मे हूँ !!_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2024/06/blog-post_29.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

          _*बाबासाहेबांनी आपल्या समाजाला धर्मांतर करण्याच्या दिवशी पांढरे कपडे परिधान करून यायला सांगितले होते.* बाबासाहेबांनी सांगितले आणि त्यावेळच्या त्यांच्या अनुयायांनी केले नाही असं होऊ शकणार नव्हते. त्यावेळच्या अनुयायांनी बाबासाहेबांच्या आदेशाचे पालन करण्यासाठी स्वतः काबाडकष्ट करून एक - एक पै जोडून त्यांनी त्या आदेशाचे पालन केले. *स्वतः बाबासाहेबांनी १४ ऑक्टोबर ला कोरा करकरीत पांढरा लांब कोट, पांढरा सदरा, पांढरे धोतर परिधान करून दीक्षाभूमीवर आले होते.*_

 👉   _*पण आजचा सुशिक्षत समाज सन्मानिय अपवाद वगळता बाबासाहेबांचा हा आदेश मानायला तय्यार नाही आहेत. धार्मिक कार्यक्रमात बराच तरुण वर्ग पांढरे वस्त्र परिधान करीत नाहीत. तीच गोष्ट लग्नातील.... वधू वरांनी पांढरे वस्त्र परिधान करून यावे असं सांगूनही आजचे नव-विवाहित जोडपे फॅशनच्या नावाने पांढरे वस्त्र परिधान करण्यास नकार देतात आणि त्या विवाह मंडपात नियोजित बौद्धाचार्य किंवा भंतेजी यांच्यासोबत दोन्ही बाजूची मंडळी त्यावेळी वाद घालत बसतात.*_

_बाबासाहेबांनी पांढरे वस्त्र परिधान करण्याचा आदेश उगाचच दिला नव्हता. त्याला तशी कारणं ही होती. बौद्ध धम्म आणि पांढरे वस्त्र यांचा संबंध आहे, तो कसा ते आपण आत्ता पाहूया. त्रिपिटकात काही उदाहरणे आपल्याला वाचावयास मिळतात._

          _बुद्धांनी आपल्या भिक्खू संघासाठी वस्त्राच्या रुपाने केशरी रंगाच्या चिवराचे प्रयोजन केले होते. तसेच गृहस्थ उपासक-उपासिकां करिता पांढरा रंगाचा वापर सांगितला होता. यासाठी आपण त्रिपटकातील एक संदर्भ पाहू._

_हा संदर्भ आहे *खुद्दकनिकायातील, दोन भाऊ होते, महापंथक आणि चूलपंथक दोघांनी भगवंताकडून दीक्षा घेतली. चिवर घेतले व संघामध्ये सामील झाले.* एकदा दोघेही चारिकेसाठी त्यांच्या गावात जातात. *साधू / श्रमण समाजात आजही एक रित आहे की, गुरू आपल्या शिष्यांना त्यांच्या स्वतःच्या घरी एकदा तरी पाठवतात. ज्या घराचा त्याग करुन तो साधू बनतो, असे म्हणतात की, जो स्वतःच्या घरुन विचलित न होता भिक्षा घेऊन येतो तो खरा साधू होय. ही पद्धत बुद्धांच्या संघातून साधू समाजात आलेली आहे त्या संघात ही पद्धत होती की भिक्खू ला एकदा त्याच्या घरी चारीका करायला जावे लागे. (पिंडपात म्हणजे भिक्षा.)*_

              _महापंथक सुद्धा भिक्षेकरिता एकदा त्यांच्या घरी गेले. घरातल्या स्त्रिया आणि नातेवाईकांनी महापंथकाला घरातच थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु ते सफल झाले नाही, परंतु *चूलपंथकाचे चिवर त्याचे नातेवाईक व पत्नीने खेचून काढून टाकले आणि त्याला पांढऱ्या वस्त्रात लपेटले. यावरून हे दिसून येते की, बुद्धांच्या काळात विवाहाच्या वेळी वधूला पांढरे वस्त्र घातले जायचे.* हे लाल जोडी, रंगीबिरंगी सूटबूट याची प्रथा जवळजवळ दोनशे तीनशे वर्षात भारतीय समाजात रुढ झाली. *आसाम, बंगाल, अरुणाचल प्रदेश, लदाख येथील पारंपारिक बौद्ध समाजात उपासक-उपासिका लग्नाच्या वेळी आज सुद्धा पांढरे वस्त्र परिधान करतात. ख्रिश्चन समाजातील लग्नाच्या वेळी पांढऱ्या रंगाचा लांबलचक झगा घालण्याची परंपरा बौद्धांकडूनच आलेली आहे.*_

👉 _*प्रत्यक्षात पांढरे कपडे परिधान करणे पवित्रता आणि शांततेचे प्रतीक आहे.*_ 

           _आपण आजही बघतो की, ज्या दिवशी आपण पांढरे कपडे घालतो त्या दिवशी कपड्यांबद्दल जास्त सतर्क राहतो, घातलेले कपडे खराब व्हायला नको की, कुठे डाग लागायला नको._

👉 _*हीच सतर्कता जेव्हा चित्ताविषयी येते, तेव्हा आपण आपल्या मनाबद्दल सतर्क होतो. ते अस्वच्छ व्हायला नको, जेव्हा आपण सर्व एकाच वेळी पांढऱ्या वस्त्रांमध्ये असतो, वावरतो तेव्हा मन प्रयत्न न करता सहज शांत होते.*_

             _आपण शाळेतील विद्यार्थ्यांना बघतो की, जेव्हा सर्व विद्यार्थी एकाच गणवेशात असतात तेव्हा एक सारखेच दिसतात. सर्वजण गणवेशात आहेत आणि एक किंवा दोघे विद्यार्थी-विद्यार्थिनी रंगीत पोशाखात असतील तर, नजर परत परत त्यांच्याकडे स्थिरावते, ते मनाला अस्वस्थ करते._

👉 _*बुद्धांच्या काळात सुद्धा जेव्हा उपासक-उपासिका विहारात पूजेसाठी एकत्र येत होते, तेव्हा सर्वजण पांढऱ्या वस्त्रात असत. तसेच बौद्ध ग्रंथांमध्ये बौद्ध उपासक-उपासिकांना पांढरे वस्त्र परिधान करण्यास सांगितले आहे. पांढरे वस्त्र शुभ्रता व चांगले मन याचे प्रतिक आहे, मात्र विकृत स्वरुपाने ही परंपरा भारतीय समाजात आजही जिवंत आहे.*_

            _आज बौद्ध देशात आणि आपल्या ही विहारात कार्यक्रमांमध्ये आपण धम्मध्वज किंवा बुद्धिस्ट फ्लॅग पाहत असतो. *धम्मध्वजातील सहा रंगांचा अर्थ पुढील प्रमाणे, बौद्ध ग्रंथांमध्ये असा उल्लेख सापडतो की, भगवान बुद्धांच्या शरीरातून सहा रंगांचा प्रकाश परावर्तित होत होता. निळा, पिवळा, लाल, पांढरा, केशरी आणि सहा रंगांचा मिश्रण असलेला एक रंग ज्याला प्रभास्वर म्हणतात. हे सहा रंग बुद्धत्व आणि धम्माच्या पूर्णत्वाचे प्रतीक, प्रतिकात्मक लक्षण आहे. बौद्धांना आठवण ठेवण्याकरीता, स्मरणपत्रासारखे आहेत.* यापैकी प्रस्तुत विषयाला अनुसरून आपण हीते फक्त पांढरा किंवा सफेद रंगाचे किंवा प्रभास्वराचे महत्व पाहणार आहोत._

👉 _*पांढरा किंवा सफेदः - बुद्धांचे दात, नखे, अस्थी धातूपासून पांढरा रंग प्रसारीत होतो. हा रंग शुद्धतेचे व पावित्र्याचे प्रतीक आहे. बुद्धांच्या शिकवणुकीचे प्रतीक आहे. अकालिकता, म्हणजे बुद्धांची शिकवण वेळेनुसार कालातीत होत नाही उलट नवनवीन होत राहते. ते काल जेवढे सत्य होते, तेवढेच आज सुद्धा आहे, व पुढे सुद्धा राहणार.*_

_हे सर्व पाहता बाबासाहेबांनी बौद्ध परंपरेला अनुसरून जे काही सांगितले ते बौद्ध समाजातील प्रत्येक व्यक्तीचं आद्य कर्तव्य आहे की, त्यांनी त्याचे तंतोतंत पालन केले पाहिजे आणि आपल्या कोणत्याही धार्मिक कार्यक्रमात पांढरे वस्त्र परिधान करायलाच हवे. *धार्मिक कार्याकरिता बाबासाहेबांनी आपल्या समाजाला पोशाक दिला तो परिधान करून जेंव्हा आपण विहारात किंवा कोणत्या समारंभात जातो तेंव्हां वर जे शाळेतले उदाहरण दिले त्याप्रमाणे सर्वांचे चित्त कोणतेही अधिक प्रयत्न न करतातच स्थिर होऊन जाईल आणि आपले संपूर्ण लक्ष फक्त न फक्त त्या धार्मिक कार्यक्रमातच राहील, ते अन्य कुठेही भरकटणार नाही.*_

_*विवाह प्रसंगी वधू - वर यांनी कोणते वस्त्र परिधान करावे यासाठी बाबासाहेबांचे विचार पाहू. श्री कर्डक, प्राध्यापक, सिद्धार्थ कॉलेज, मुंबई यांनी स्वतःचा विवाह विधी बौद्ध पद्धतीने करण्याचे ठरविले आणि त्या विधिबद्दलची माहिती बाबासाहेबांना पत्राद्वारे दिनांक २६/०९/१९५६ रोजी विचारले. त्या पत्राला उत्तर बाबासाहेबांनी ०४/१२/१९५६ लिहिले त्यात त्यांनी बौद्ध विवाह विधी कश्याप्रकारे करायची हे सांगताना ते लिहितात Both brid and bridegroom should wear white clothes (वधू आणि वर यांनी पांढरे कपडे घालावेत).* या पत्रावरून आत्ताच्या पिढीने बाबासाहेब काय सांगत आहे याचा बोध घ्यावा आणि विवाहाच्या वेळी फॅशनेबल कपडे न घालता पांढरे कपडे परिधान करावे जेणेकरून कपड्यांवरून बौद्धाचार्य आणि विवाह करण्यासाठी आलेल्या कुटुंबात वाद होणार नाही._ 

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

*_!!ॐ मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

*_संकलन - महेश कांबळे_*

*_दिनांक :- २९/०६/२०२४_*

*_संदर्भ :-_*

_*१) खुद्दक निकाय*_

_*२) मैत्री संपूर्ण धम्म आहे - लेखक राजेश चंद्रा*_

*_३) डॉ बाबासाहेब आंबेडकर चरित्र खंड - १२_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

Friday, 28 June 2024

मल्लिकादेवीचे प्रश्न

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_मल्लिकादेवीचे प्रश्न_*

*_!! ॐ मणी पद्मे हूँ !!_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2024/06/blog-post_28.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

_*भगवान बुद्ध श्रावस्तीमधील जेतवनात असतांना राजा प्रसेनजिताची पत्नी महाराणी मल्लिका भगवंतांच्या दर्शनाला आली, अभिवादन करुन एका बाजूला बसली आणि मनातला प्रश्न भगवंतांना विचारला.*_

_१) भगवान ! काय कारण असेल की, एखादी स्त्री कुरुप, दिसायला खूप भयानक, गरीब आणि अप्रभावी, आकर्षित न दिसणारी, प्रभाव न पाडणारी असते?_

_२) भगवान ! काय कारण असेल की, एखादी स्त्री कुरुप, दिसायला भीतीदायक परंतु प्रचंड श्रीमंत तसेच समाजात मान-सन्मान मिळवणारी असते?_

_३) भन्ते! कोणत्या कारणाने एखादी स्त्री प्रचंड सुंदर, आकर्षक, गोऱ्या वर्णाची तसेच पाहताक्षणी आकर्षित करणारे रुप असलेली, परंतु गरीब, कमीत कमी ऐश्वर्याचा उपभोग घेणारी, तसेच प्रभावहीन असू शकते?_

_४) भगवान ! कोणते कारण असू शकते की, एखादी स्त्री देखणी, सर्वांना प्रिय तसेच प्रचंड संपत्तीची मालक, ऐश्वर्यसंपन्न आणि समाजात प्रभावशाली असण्याचे काय कारण असावे?_

_महाराणीचे चार प्रकारचे प्रश्न ऐकून भगवंतांनी तिच्या चार प्रश्नांची उत्तरं चार प्रकाराने देऊन समाधान केले._

_*१) मल्लिके! जेव्हा एखादी स्त्री नेहमीच रागवत असते, निष्काळजी असते, कोणी काही बोलते यावरुन त्या व्यक्तीबद्दल मनात अढी निर्माण करते, गाठ बांधते, राग-द्वेष करीत राहते, हट्टिपणा करीत राहते, वैरभाव मनात ठेवते आणि संशयी स्वभावाची असते, जेव्हा ती कोणत्याही साधू-समणांना अन्नदान, वस्त्रदान करीत नाही, अंथरुण-पांघरुण दान करीत नाही, तिचे हृदय मत्सर करणारे असते, इतरांना मिळालेला मानसन्मान सत्काराने ती हेवा करणारी असते, त्यांच्यासाठी मनात वाईट विचार करते, अशा प्रकारे त्या शरीरातून मरणोत्तर, पुन्हा स्त्री रुपाने जन्म घेते. त्या त्या ठिकाणी जन्म घेते तिथे दुर्बल, दिसायला कुरुप, तसेच गरीब अल्पसंपन्न निर्धन, कमी ऐश्वर्य भोगणारी तसेच समाजात प्रभाव नसलेली असते.*_

*_२) मल्लिके! जेव्हा एखादी स्त्री सतत रागवत असते, वाईट विचारांची, कोणी काही म्हटलं तरी मनात अढी ठेवणारी, गाठ बांधणारी असते, राग- द्वेष करणारी, हट्टी प्रत्येक वेळी रागावणारी, वैरभाव दुराग्रही तसेच संशयित स्वभावाची, परंतु साधू-समणांना भोजन, कपडे, वाहन, माळ-सुगंधीअत्तर फुले, उटणे, अंथरुण-पांघरुण त्याचे दान करते, परंतु जी मत्सर करणारी नसते, इतरांचा प्रति मनात मत्सर किंवा द्वेष करीत नाही, अशी स्त्री कायेतुन निघून ज्या ज्या ठिकाणी स्त्री जन्म घेते, ती दिसायला खूप वाईट परंतु त्याच वेळी ती ऐश्वर्यसंपन्न श्रीमंती उपभोगणारी असते, तसेच समाजाकडून मानसन्मान मिळवणारी असते._*

*_३) मल्लिके ! इथे एखादी स्त्री अशी सुद्धा असते की, ती रागवत नाही, वाईट चिंतीत नाही, इतरांबरोबर छोट्याश्या वादातून देखील मनात गाठ बांधून ठेवत नाही, राग-द्वेष करीत नाही, हट्टीपणा करीत नाही, पूर्वग्रह ठेवत नाही, अंधविश्वास किंवा शंका घेणारी नसते, परंतु ती कोणत्याही साधू- समणांना भोजनदान, अन्नदान, वस्त्रदान, हार-फुले-सुगंधी उटण्याचे दान, वाहन दान, तसेच अंथरुण पांघरुन याचे दान देत नाही स्वभावाने मत्सरी असते, इतरांना मिळणाऱ्या मानसन्मानाला मत्सराने बघते, अशी स्त्री मृत्यूनंतर ज्या ज्या ठिकाणी स्त्री म्हणून जन्म घेते ती दिसायला अतिशय देखणी, अप्रतिम सौदर्याची खाण परंतु धनसंपत्ती तसेच ऐश्वर्या याबाबत ती पूर्णता गरीब, दारिद्र्य असते तसे समाजात तिला मान सन्मान नसतो._*

*_४) मल्लिके! इथे कुणी एखादी स्त्री अशी ही असते जी स्वभावाने शांत असते. राग-द्वेष करीत नाही, वैरभाव पाळत नाही, स्वभावाने संशयी नसते, सोबत साधूसंतांना अन्नदान-वस्त्रदान-वाहनाचे दान हार-फुले-सुगंधी अत्तर- उटणे तसेच अंथरुण-पांघरुण याचे दान करते, जी मत्सर-द्वेष करणारी नसते, इतरांचा मान सन्मान केल्याने तिला हेवा वाटत नाही, जी आपल्या मनाला स्वच्छ ठेवते, ती मृत्यूनंतर जिथे जिथे स्त्री रुपाने जन्म घेते तेव्हा ती अत्यंत देखणी, आकर्षक, सौंदर्यवान, लोकांना प्रिय तसेच प्रचंड श्रीमंती धन-ऐश्वर्य उपभोगते तसेच समाजात मान सन्मान मिळवणारी असते._*

 *_मल्लिके ! कोणत्याही स्त्री चे सौंदर्य आणि समृद्धी तसेच ऐश्वर्य आणि गरीबीची ही काही कारणे तसेच काही उद्देश असतो._*

            _भगवंतांच्या उद्देशाने समाधान झाल्यावर महाराणी मल्लिकाने शेवटी प्रामाणिकपणे स्विकार केला- भगवान! नक्कीच कधीतरी मी अत्यंत वाईट व्यर्थ चिंता करणारी, लोकांच्या बोलण्याची मनात गाठ बांधून ठेवणारी, राग-द्वेष करणारी असेल, इतरांवर विनाकारण संशय घेणारी असेल, म्हणून याच कारणाने मी आज अशाप्रकारे कुरुप, दिसायला भयानक आहे, तसेच हे सुद्धा नक्की आहे की, मी कधी तरी अन्नदान-वस्त्रदान-वाहनदान, हार- फुले-सुगंधित उटणे, दान केल्याचा प्रभावने मी प्रचंड धनसंपत्तीची मालक व वैभवशाली आहे, त्याचप्रमाणे भन्ते! मी कधीकधी मत्सर प्रवृत्तीची नसून, इतरांच्या लाभ-सन्मानाने मी आनंदी होत असेल, त्या सगळ्यांच्या चांगल्या प्रभावाने मी समाजात आज पूजनीय, मानसन्मान मिळवणारी आहे. हे भगवान ! माझ्या राजवाड्यातील क्षत्रिय, ब्राह्मण, श्रीमंत यांच्या मुली आहेत ज्यांच्यावर माझ्या ऐश्वर्या मुळे प्रभाव पाडते._

*_निर्भयपणे स्वतःचे दोष स्विकार करणे हा देखील एक मोठा गुण आहे. उलट अध्यात्मिक सौंदर्याचे एक लक्षण आहे, असे म्हणायला हरकत नाही._*

_*असे सुद्धा नाही की, भगवंतांनी सौंदर्य व समृद्धी बाबत स्त्रियांसाठी केलेले वर्णन स्त्रियांसाठीच नसून पुरुषांना देखील लागू पडते.*_

_*महाराणी मल्लिका तिच्या धाडसाने स्विकारच करत नाही तर त्याहीपेक्षा धैर्याने म्हणते की, भगवान आजपासून मी हा दृढ निश्चय करते की माझ्या राजकुळातील क्षत्रिय, ब्राह्मण, श्रीमंतांच्या मुलींप्रति मी राग-द्वेष करणार नाही, त्यांच्याबद्दल मनात तिरस्कार करणार नाही, त्यांच्याकरिता मनात काहीही वाईट विचार करणार नाही, त्यांच्यावर कधी रागवणार नाही, साधुसंतांना सर्वप्रकारे अन्नदान-वस्त्रदान वाहनदान, फुले-हार-सुगंधित द्रव्य, अंथरुण-पांघरुण वस्त्रे, यांचे दान नेहमीच करीत राहील, मनातील सर्व वाईट विचार, मत्सर भावन मुळासकट काढून टाकणार, लोकांच्या मानसन्मानाचा मत्सर करणार नाही.*_

_*महाराणी मल्लिका श्रद्धेने, भक्तिभावाने म्हणते- भगवान ! मला सर्वोत्तम उत्कृष्ट उपदेश दिला, ज्याप्रमाणे भरकटलेल्याला रस्ता मिळाला, अंधारात दिवा उजळला, झाकलेले उघड झाले, उलटे सरळ झाले, लपलेले वर आले, आंधळ्याला डोळे प्राप्त झाले. भन्ते! तुम्ही याप्रमाणे उपदेश केला आजपासून शेवटपर्यंत मी तुमची उपासिका झाले.*_

_*किंबहुना तिन रत्नांना शरणागती म्हणजे सुख समृद्धीच्या सर्व प्रकाराला शरण जाणे सौंदर्य समृद्धीचे कारण होय.*_

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

*_!!ॐ मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

*_संकलन - महेश कांबळे_*

*_दिनांक :- २८/०६/२०२४_*

*_संदर्भ :-_*

_*१) अंगुत्तर निकायमधील महावग्गातील मल्लिका सुत्त*_

_*२) मैत्री संपूर्ण धम्म आहे - लेखक राजेश चंद्रा*_

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

Monday, 24 June 2024

भेसज्जगुरू - भगवान बुद्ध

 *भेसज्जगुरू - भगवान बुद्ध*


शरीराला झालेल्या व्याधींना आपण कसे दूर करू शकतो हे एक वैद्य आपणांस सांगू शकतात. आपल्या मनासंदर्भातील ( मानसिक ) होणाऱ्या व्याधींना आपण कसे दूर करू शकतो हे आपणांस एक मानसतज्ञ सांगू शकतो. परंतु या सर्व विकांरावर आपण कसे मात करू शकतो किंवा त्याचा निरोध कसा करू शकतो हे बुद्ध आपणांस सांगतात. 


भगवान बुद्ध हे आयुर्वेदाचे किती जाणकार होते याची उदाहरणे आपणाला विनयपिटकाच्या महावग्गातील भेसज्ज स्कन्धात सापडतात. त्यामध्ये भिक्खूंना होणारे अनेक आजार व त्यावर बुद्धांनी कोणत्या चिकित्सा सांगितल्या हे पहावयास मिळते. 

उदा. १. लवण चिकित्सा 

२. रक्ताल्पता 

३. खाज Ringworm 

४. नेत्ररोगाची चिकित्सा 

५. औषधात चरबीचा वापर 

६. औषधी वनस्पती मूळ 

७. औषधी अर्क 

८. औषधी डिंक 

९. त्वचा रोग 

१०. नस्य चिकित्सा 

११. काविळ चिकित्सा 

१२. पोटातील वायुगोळा 

१३. औषधात मद्याचा वापर व त्याचा हेतू 

१४. लसून चिकित्सा 

१५. शल्य चिकित्सा 

१६. स्वेदन कर्म 

१७. सर्पदंशावर चिकित्सा 

१८. औषधी गूळ 

१९. औषधी पेय्य 

२०. फळरस. 


मनाचे ( मानसिक ) विकार हे अविद्या व तृष्णेमुळे उद्भवतात. आर्य अष्टांगिक मार्गाचा अवलंब केल्याने या विकारांचे निरसण कसे होते. हे भगवान बुद्धांनी सांगितले आहे. 


शारिरिक विकार व मानसिक विकार यावरच बुद्ध थांबले नसून त्यांनी धम्माची स्थापना करून सामाजिक विकार ( वर्ण व्यवस्था, जाति व्यवस्था ) सुध्दा नष्ट करण्याचा मार्ग सांगितला. 


*यामुळेच भगवान बुद्धांना भेसज्ज गुरू असे म्हटले जाते.*


पूर्वी गांधार नावाच्या देशात एका भयानक रोगाने पछाडलेला एक वृध्द भिक्खू होता. तो ज्या ज्या ठिकाणी उठत अथवा बसत असे ती जागा मलिन होई.

तो गांधार देशातील एका विहारात राहात असे. कोणीही त्याच्याजवळ जात नसे किंवा संकटात सहाय्य करत नसे. 

एकदा भगवान बुद्ध भिक्खू संघासह तेथे गेले. त्या जागेला एवढी दुर्गंधी येत होती, की त्या सर्व भिक्खूंना त्या भिक्खूची घृणा वाटू लागली. परंतु बुध्दाने शुक्रदेवाला गरम पाणी आणून ओतायवयास लावून स्वताच्या हाताने त्या भिक्खूचे शरीर स्वच्छ केले. तेव्हा तिथे उपस्थित असणाऱ्या राजा, नागलोक, देवलोक यांनी तथागतांना विचारले. इतक्या थोर, उदात्त महापुरूषाने असले घाणेरडे काम का करावे? 

यावर तथागतांनी आपल्या कृतीचे असे स्पष्टिकरण केले. 

*या जगात जे गरिब आहेत, असहाय्य आणि अनाथ आहेत त्यांचा तथागत मित्र आहे. शारिरिक व्याधींनी पछाडलेले आहेत, मग ते श्रमण असोत किंवा इतर कोणीही असोत त्यांची सेवा करण्यासाठी, जे दरिद्री, अरक्षित आणि वृध्द आहेत त्यांना सहाय्य करण्यासाठी आणि इतरांना आपल्या सारखेच करायला प्रेरणा देण्यासाठी तथागताचा जन्म आहे.*

(बुद्ध आणि त्यांचा धम्म खंड ३ भाग ५ )


*संपूर्ण जगात आज असे समजले जाते की रूग्णांची सेवा ही येशूच्या सेवेपासून सर्व जगात पसरली परंतु त्याही आधी तथागत बुद्धांनी रूग्ण सेवा केल्याची उदाहरणे व रूग्ण सेवा करण्याचा आदेश विनय पिटकाच्या महावग्गातील भेसज्ज स्कन्धात सापडतो.*


- अरविंद भंडारे 

पालि रिसर्च इन्स्टिट्यूट मुंबई

24 जून, 2018

Thursday, 20 June 2024

ॐ मणि पद्मे हुं

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_!! ॐ मणी पद्मे हुं !!_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2024/06/blog-post_20.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

     _बरेच उपासक - उपासिका, गृहस्थ मंडळी वारंवार मला विचारणा करीत की, तुम्ही तुमच्या *प्रत्येक लेखात ॐ मणी पद्मे हुं  असे का लिहिता?* हे धम्माच्या विपरीत नाही का? तसेच या शब्दाचा अर्थ काय? वगैरे....वगैरे......या सर्वांच्या उत्तरासाठी हा लेख प्रपंच._

_*जेंव्हा काही आदरणीय वक्ते , प्रवचनकार तसेच धार्मिक संस्थांमधील पदाधिकारी आपल्या सार्वजनिक प्रबोधन, प्रवचना दरम्यान  "ॐ मणि पद्म हूँ" चा जप खोटे असल्याचे सांगितले जाते तेंव्हा ते अप्रत्यक्षपणे बाबासाहेबांना चुकीचे असल्याचे सांगतात, कारण बाबासाहेबांच्या पुस्तकांमध्ये हा मंत्र जपा च्या स्वरुपात आहे.*_

_*"ॐ मणी पद्मे हुं" आणि "बाबासाहेब" यांचा काही संबंध आहे का?* याबाबत आपण काही संदर्भ पाहू या...._

👉१. _*बाबासाहेब यांनी २४ फेब्रुवारी १९५६ रोजी मुळ मराठीमध्ये प्रकाशित केलेले - "बुद्ध पूजा पाठ".* ज्यामध्ये दैनंदिन व नियमित पूजापाठ यासाठी उपयोगी, त्रिशरण, पंचशील, तीन रत्नांची वंदना, बुद्धपूजेसह रतनसुत्त, या सर्व गाथा मराठी मध्ये लिहिलेले आहे. *या पुस्तकाची प्रस्तावना मराठीतून बाबासाहेबांनी स्वतः लिहिलेली आहे. त्यात त्यांनी हा उल्लेख केला की, या पुस्तिकेतील सुत्त त्यांनी १९५० च्या श्रीलंकेच्या प्रवासादरम्यान एकत्र केले होते. या पुस्तिकेतील सुत्त बाबासाहेबांनी त्यावेळचे प्रसिद्ध गायक मास्टर कृष्णराव यांच्याकडून गाऊन घेतले होते. याची निर्मिती तत्कालीन प्रसिद्ध ग्रामोफोन कंपनी एच. एम. व्हि. ने केली होती.*_

            _बोधिसत्व बाबासाहेब यांनी संकलित आणि स्वतः त्यांच्या जीवनात प्रकाशित केलेल्या या पुस्तिकेच्या शेवटी छोट्याशा शिर्षकात दिले आहे, "जप" व खाली तीन वेळा बोधिसत्व अवलोकितेश्वर याचे एक बौद्ध मंत्र छापले आहे._

*_ॐ मणि पद्मे हुं_*

*_ॐ मणि पद्मे हुं_*

*_ॐ मणि पद्मे हुं_*

👉२. _*महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेल्या बोधिसत्व बाबासाहेबांच्या संपूर्ण साहित्याच्या इंग्रजी आवृत्तीच्या सोळाव्या खंडात वरील पुस्तिका मुळ मराठी स्वरुपात जशीच्या तशी प्रकाशित केली आहे. ज्यामध्ये शेवटच्या अध्यायाचे शिर्षक जप आहे, त्या अंतर्गत बोधिसत्व अवलोकितेश्वर यांचा वरील मंत्र लिखित आहे..... "ॐ मणि पद्मे हुं"*__

👉३. *बोधिसत्व बाबासाहेबांचा सर्वाधिक प्रसिद्ध ग्रंथ The Buddha and His Dhamma (मराठी आवृत्ती, बुद्ध आणि त्यांचा धम्म) १९५७ मध्ये प्रकाशित झाला. या ग्रंथाच्या पहिल्या आवृत्तीच्या शेवटी सुद्धा बोधिसत्व अवलोकितेश्वर यांचा वरील मंत्र तीन वेळा उल्लेखित करण्यात आला आहे "ॐ मणि पद्मे हुं"*_

👉४. _*महापरिनिर्वाणाच्या दोन दिवस अगोदर, ४ डिसेंबर १९५६ रोजी बोधिसत्व बाबासाहेबांनी श्री. वी.एस. कर्डक यांना बौद्ध विवाह सोहळा, विधी बद्दल एक अतिशय संक्षिप्त पत्र लिहिले होते, त्याचा शेवट बाबासाहेबांनी या मंत्राने केला आहे...."ॐ मणि पद्मे हुं"*_

_हे प्रामाणिक व अचूक संदर्भ सिद्ध करतात की, *बोधिसत्व बाबासाहेब करूणेचे बोधिसत्व अवलोकितेश्वराचा मंत्र जप करीत असत. ॐ मणि पद्मे हुं, कारण या मंत्राला त्यांनी आपल्या पुस्तकांमध्ये "जप" या शिर्षका अंतर्गत दिला आहे.*_

👉५. _*बाबासाहेब यांचे सचिव नानकचंद रत्तू यांनी त्यांच्या स्मृती वर इंग्रजीमध्ये एक पुस्तक लिहिले "Reminiscences and Remembrances of Dr. B. R. Ambedkar" डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मरण या नावाने जे मुळात १९९५ मध्ये  प्रकाशित झाले. आणि याची हिंदी आवृत्ती २००९ तसेच २०१२ मध्ये सम्यक प्रकाशन नवी दिल्ली द्वारे "बाबासाहेब डॉ. आंबेडकर संस्मरण और स्मृतिया" या शिर्षकाने प्रकाशित झाले. या प्रकाशनाचे प्रकाशक प्रमुख श्री. शान्ति स्वरुप बौद्ध यांच्या हस्ते २००२ मध्ये लिहिले गेले. या पुस्तकातील इंग्रजी भाषेतील सुप्रसिद्ध कादंबरीकार, विशेषता, "द अनटचेबल" या कादंबरीचे "लेखक मुल्कराज आनंद" यांची बोधिसत्त्व बाबासाहेब यांच्या सोबतची एक मुलाखत प्रकाशित झाली* वरील चर्चेचा मुळ इंग्रजीचा प्रारंभिक उतारा खालील प्रमाणे आहे :-_

_On a balmy evening in May 1950, two gentleman seated themselves on a bench in Bombay,s Cuffe Parade and proceeded to hold a conversation. One of them was the architect of the In- dian Constitution Dr. Bhimrao Ramji Ambedkar. The other was noted writer Mulk Raj Anand, author of "the Untouchable". Forty years later. Dr. Anand recalls the illuminating conversation with the messiah of the downtrodden._

*_B.R.Ambedkar: I prefer the Buddhist greeting - Om mani padmaye! May the lotuses awake._*

_Mulk Raj Anand: I agree. How thoughtless we are! Of course, Namaskar means - I bow before you..._

*_B.R.Ambedkar: That perpetuates submission! May the Lotuses awake' is a prayer for Enlightenment._*

_Mulk Raj Anand: Indeed, old habits die hard. We adopt them un- thinkingly..._

_B.R.Ambedkar: In everything..._

_या संभाषणाच्या सुरूवातीच्या भागाचे भाषांतर खालीलप्रमाणे... ? *मे १९५० च्या एका सुखद संध्याकाळी, मुंबईतील कफ परेड मैदानावर दोन सद्‌गृहस्थ बाकड्यावर बसले आणि त्यांच्यातील संवाद सुरु झाला. त्यापैकी एक होते, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ, भिमराव रामजी आंबेडकर, दुसरे होते, सुप्रसिद्ध साहित्यिक आणि अस्पृश्य या कादंबरीचे लेखक मुल्कराज आनंद... चाळीस वर्षांनंतर डॉ. आनंद यांनी दलितांच्या मसिहाबरोबर त्यांचे झालेले संभाषण पुन्हा प्रकाश झोतात आणतात.*_

_मुल्कराज आनंदः नमस्कार डॉ. आंबेडकर..._

*_भिमराव रामजी आंबेडकरः बौद्धांसाठी मला ह्या शुभेच्छा भावतात... ॐ मणि पद्मे हुं - कमळांना उमलू द्या..._*

_मुल्कराज आनंदः मी तुमच्याशी सहमत आहे. आम्ही किती विचारहिन आहोत. आम्ही शब्दांच्या अर्थाने पुनरावलोकन न करता त्यांना स्विकारतो. हे खरे आहे की, नमस्कार म्हणजे मी तुमच्यापुढे नमन करतो._

*_भिमराव रामजी आंबेडकरः यामुळे समर्पणाकरिता सातत्य लाभते. कमळ कुलू द्या यामध्ये बुद्धत्वाच्या उमलण्यासाठी ची प्रार्थना आहे._*

_मुल्कराज आनंदः खरंतर जुन्या सवयी सहजा जात नाहीत. आम्ही विचार न करता त्यांना स्विकारतो._

_भिमराव रामजी आंबेडकरः प्रत्येक गोष्टीत._

 _ही एक लांबलचक चर्चा आहे. ज्यात या *संभाषणाच्या सुरुवातीच्या भागात बोधिसत्व बाबासाहेबांनी मुल्कराज आनंद यांच्या अभिवादनाला तसाच प्रतिसाद न देता, ॐ मणि पद्मे हुं म्हणून उत्तर दिले,*_

             _*या संभाषणाद्वारे बौद्ध मंत्र, "ॐ मणि पद्मे हुं" याबद्दल बाबासाहेब यांनी एका भावी कल्पनेवर प्रकाश पाडला की, ते केवळ या मंत्राचा जपच करायचे नाही तर त्यांना, याला "नमस्कार" या शब्दा ऐवजी बौद्ध समाजात एकमेकांना अभिवादन करण्यासाठी रूजवायचे होते, म्हणुनच त्यांनी मुल्कराज यांच्या नमस्काराच्या प्रतिक्रियेदाखल आपल्या प्रिय बौद्ध अभिवादनाने म्हणजेच "ॐ मणि पद्मे हुं" ने उत्तर देऊन त्याचे स्पष्टीकरण देखील केले.*_

              _हे अगदी खरे आहे की, नमस्कार या शब्दाचा अर्थ होतो नमन करणे, नतमस्तक होणे, ज्याअर्थी बाबासाहेब भारतात ज्या समाजाचे नेतृत्व करत होते आणि ज्या देश, देशाचे - वेळेचे प्रतिनिधित्व करत होते, ते त्या समाजाला नतमस्तक नाही तर, वर येण्यासाठी, फुलण्याच्या इच्छेने बोलत होते. उठणे व फुलणे हे साधारण अर्थाने नाहीतर बुद्धत्वाच्या पदापर्यंत उठणे व फुलणे होते. म्हणून बहुजन समाजासाठी, एकमेकांना अभिवादनासाठी हा मंत्र त्यांनी निवडला होता. ॐ मणि पद्मे हुं ._

👉६. *_"ॐ मणि पद्म हुं" बोधिसत्व अवलोकितेश्वर यांचा मंत्र आहे त्याचा सरळ अर्थ आहे की, ज्ञानाचे रत्न कमळाच्या हृद्यात आहे... लडाख, सिक्कीम, अरुणाचल आणि तिबेट या पारंपारिक समाजामध्ये हा मंत्र अजूनही प्रचलीत आहे. परमपूज्य दलाई लामा स्वतः या मंत्राचा जप करतात._*

            _*दुःखाची गोष्ट म्हणजे लोक मुळाचा शोध न घेता, आपल्या अल्पज्ञान व खास करून पूर्वग्रहामुळे बाबासाहेबांच्या ग्रंथांमध्ये, संपादनात, काटछाट करीत आहेत. आजच्या प्रकाशकांनी बाबासाहेबांच्या पुस्तकातून व लेखांमधून "ॐ मणि पद्म हुं" हा मंत्र काढला आहे.* सम्यक प्रकाशन कृतज्ञतेसाठी पात्र आहे की, ज्यांनी बाबासाहेबांचे ग्रंथ जसेच्या तसेच छापले आहेत._

👉७. _*बोधिसत्व बाबासाहेब दररोज बुद्धांच्या मूर्ती समोर उभे राहून, हात जोडून नियमितपणे प्रार्थना करायचे आणि नंतर चटईवर बसून नियमितपणे ध्यान करायचे. बाबासाहेबांचे वैयक्तिक सचिव नानकचंद रत्तू यांनी त्यांच्या आठवणीत "डॉ. बाबासाहेब आंबेडकर कुछ अनछुये प्रसंग" या पुस्तकामध्ये पृष्ठ क्रमांक ६०,७५,७७ या तीनही ठिकाणी हे नमूद केले आहे.*_

        _मला आशा आहे की, वरील संदर्भ हे आपल्याला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकली असेल._        

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

*_!!ॐ मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

*_संकलन - महेश कांबळे_*

*_दिनांक :- २०/०६/२०२४_*

*_संदर्भ :-_*

_*१) बुद्ध पूजा पाठ (२४ फेब्रुवारी १९५६)*_

_*२)  डॉ बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड १६*_

_*३) ४ डिसेंबर १९५६ रोजी बोधिसत्व बाबासाहेबांनी श्री. वी.एस. कर्डक यांना बौद्ध विवाह सोहळा विधी बद्दल लिहिलेले पत्र*_

_*४) नानकचंद रत्तू लिखित पुस्तक  Reminiscences and Remembrances of Dr. B. R. Ambedkar*_

*_५) मैत्री संपूर्ण धम्म आहे_*

*_६) बाबासाहेबांच्या भाषणासाठी उभारण्यात आलेल्या मंचावर असलेले ॐ मणी पद्मे हुं चे बॅनर_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

Tuesday, 18 June 2024

अधिशील शिक्षा

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_अधिशील शिक्षा_*

*_!! ॐ मणी पद्मे हूँ !!_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2024/06/blog-post_18.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

                _बौद्ध समाजातील पुरुषांचे गृहस्थ, उपासक, श्रामणेर आणि भिक्षु असे चार वर्ग आहेत. त्याचप्रमाणे गृहिणी, उपासिका, श्रामणेरी आणि भिक्षुणी असे स्त्रियांचे चार वर्ग केले आहेत. पैकी भिक्षुणींचा आणि श्रामणेरींचा वर्ग यांचे भारतातील आजचे अस्तित्त्व खूप कमी आहे. बाकी सहा वर्ग ब्रह्मदेश, सिलोन वगैरे बौद्ध देशांत आढळतात. आपण या लेखात पुरुष व महिलांना बुद्धांनी सांगितलेल्या शिलांबाबत चर्चा करणार आहोत. भिक्खू आणि भिक्षुणी यांनी पाळावयाचे नियम हे विनय पिटकात आहेत त्यांचा स्वतंत्र असा अभ्यास आहे. *शील, समाधी आणि प्रज्ञा या धम्ममार्गातील तीन प्रमुख पायऱ्या आहेत.* यांनाच अनुक्रमे पुढीलप्रमाणे म्हणतात :-_

१. अधिशील शिक्षा

२. अधिचित्त शिक्षा

३. अधिप्रज्ञा शिक्षा

                 _आर्य अष्टांगिक मार्गाच्या आठही अंगांचा या तीन शिक्षातच समावेश होतो._

१. *सम्यक वाचा, सम्यक कर्मांत आणि सम्यक आजीव या तीन अंगांचा अधिशीलशिक्षेत समावेश होतो;* 

२. *सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी या तीन अंगांचा अधिचित्तशिक्षेत समावेश होतो;* 

३. *सम्यक दृष्टी व सम्यक् संकल्प या दोन अंगांचा अधिप्रज्ञाशिक्षेत समावेश होतो.*

              _*गृहस्थ आणि गृहिणी यांना लागू पडणाऱ्या शीलाचे इतर वर्गांना लागू पडणाऱ्या शीलाप्रमाणेच विहितशील (चारित्तसील) आणि निषिद्धशील (वारित्तसील) असे दोन भेद आहेत. बुद्धांनी करण्यास सांगितलेल्या गोष्टी करणे हे विहितशील; व वर्ज्य करण्यास सांगितलेल्या गोष्टी वर्ज्य करणे हे निषिद्धशील होय.*_

                 _महामंगलसुत्त, सिगालसुत्त इत्यादि सुत्तांतून गृहस्थांनी आणि गृहिणींनी आचरण करण्यासाठी भगवंतांनी काही गोष्टी सांगितल्या आहेत. त्यापैकी, विहितशीलाची नीट कल्पना व्हावी म्हणून महा अभ्यासावे, महामंगलसुत्ता मद्ये विहितशीलाचा बराच मोठा भाग आला आहे. महामंगलसुत्तात सांगितलेल्या कित्येक मंगलांचा सम्राट अशोक यांनी आपल्या शिलालेखात धम्म या सदराखाली उल्लेख केला आहे. ९ व्या शिलालेखात ते म्हणतात :-_

*_आवाहविवाहेसु वा पुत्रलाभेसु वा प्रवासम्हि वा एतम्हि च अञ्जह्मि च जनो उचावचं मंगलं करोते। निरर्थ च मंगलं करोते। अपफलं तु खो, एतारिसं मंगलं। अयं तु महाफले मंगले, व धंममंगले। तत दासभतकम्हि सम्यप्रतिपती, गुरूनं अपचिति साधु, पाणेसु संयमो साधु, ब्राह्मणसमणेसु साधु दानं।_*

              _*लग्नकार्यांमध्ये, पुत्रलाभ झाला असता, प्रवासास निघण्याच्या वेळी, व अशाच त-हेच्या अन्य प्रसंगी, लोक मोठ्या समारंभाने मंगल करीत असतात, पण ते निरर्थक होय. तशा प्रकारचे मंगल अल्पफलदायक आहे; परंतु महत्फळ देणारे मंगल म्हटले म्हणजे धर्ममंगल होय. (ते कोणते?) दास आणि भृत्य यांना चांगल्या रीतीने वागविणे; गुरुजनांची सेवा करणे हे चांगले; प्राणिहिंसेविषयी मनाचा संयम करणे हे चांगले; ब्राह्मणाला आणि श्रमणाला दानधर्म करणे हे चांगले.*_

              _पति आणि पत्नी, मातापिता आणि पुत्र, गुरु आणि शिष्य, धनी आणि नोकर इत्यादिकांची परस्परासंबंधी काय कर्तव्ये आहेत, याचे वर्णन सिगालसुत्तांत केले आहे._

*_निषिद्धशीलात प्रथमारंभी गृहस्थांनी आणि गृहिणींनी नित्य पाळावयाचे ५ नियम येतात._*

(१) प्राणघात न करणे; 

(२) चोरी न करणे; 

(३) व्यभिचार न करणे; 

(४) खोटे न बोलणे; व 

(५) दारू वगैरे मादक पदार्थांचे सेवन न करणे, 

*_या पाच गोष्टी बौद्ध म्हणविणाऱ्याने वर्ज्य केल्या पाहिजेत. दोन्ही अष्टमी, पौर्णिमा व कृष्ण चतुर्दशी या चार दिवसास उपोसथ दिवस असे म्हणतात. या दिवशी जे गृहस्थ आणि गृहिणी धर्मचिंतनात काल घालवितात, त्यांना अनुक्रमे उपासक आणि उपासिका असे म्हणतात. उपासकांना आणि उपासिकांना या दिवशी पाळण्यासाठी बुद्धांनी आठ नियम घालून दिले आहेत, त्यांचाहि निषिद्धशीलात अंतर्भाव होतो.* ते नियम येणेप्रमाणे :-_

(१) प्राणघात न करणे; 

(२) चोरी न करणे; 

(३) अब्रह्मचर्य न करणे (म्हणजे ब्रम्हचारी राहणे); 

(४) खोटे न बोलणे; 

(५) दारू वगैर मादक पदार्थांचे सेवन न करणे; 

(६) मध्याह्नानंतर न जेवणे; 

(७) नृत्य, गीत वगैरे कामविकार उद्दीपित करणाऱ्या गोष्टी न पहाणे व मालागंधादि (चैनीच्या) पदार्थांचे धारण न करणे; 

(८) उंच आणि मोठ्या बिछान्यावर न निजणे.

            _(पंचशिलातील ३ ऱ्या नियमात व्यभिचार करू नये अशी आज्ञा आहे; पण येथील ३ ऱ्या नियमाप्रमाणे उपोसथाच्या दिवशी ब्रह्मचारीच राहिले पाहिजे.) वर सांगितलेल्या चार दिवशी उपोसथ पाळण्यास सवड नसेल तर तो गृहस्थांनी आणि गृहिणींनी वाटेल त्या दिवशी पाळण्यास हरकत नाही. ब्रह्मदेशात आजकाल ज्या गृहस्थांना ऑफिसच्या वगैरे कामामुळे वर सांगितलेल्या चार दिवशी उपोसथ पाळण्याची सवड होत नाही ते रविवारी उपोसथ पाळीत असतात._

*_काया-वाचा-मनाने दहा पापांचा त्याग करणे, ही निषिद्धशीलामधिल मुख्य गोष्ट आहे. या दहा पापांना पाली भाषेत "दस अकुसलकम्मपथ" असे म्हणतात.* ती ही-_

*_अ) कायिक पापे_*

(१) प्राणघात 

(२) अदत्तादान 

(३) व्यभिचार 

*_ब) वाचिक पापे_*

(१) असत्य भाषण 

(२) चहाडी 

(३) कठोर भाषण व 

(४) व्यर्थ बडबड 

*_क) मानसिक पापे_*

(१) परद्रव्यासक्ति 

(२) क्रोध व 

(३) नास्तिकता, 

             _*येथे नास्तिकता म्हणजे परोपकार करण्यात काही अर्थ नाही, शील पालन करण्यात अर्थ नाही, समाधिपासून काही लाभ नाही इत्यादि विचार.* बाकी अर्थ स्पष्टच आहे. ज्याला आपले शील पूर्णत्वाला न्यावयाचे असेल त्याने या दहा पापांचा त्याग अवश्य केला पाहिजे. *या दहा पापांच्या त्यागाला पालिभाषेत मनुष्यधर्म असे म्हटले आहे.* प्राचीन काली या देशात या दहा पापांचा त्याग सर्वसंमत झाला होता. *या सर्व शीलाचे-विहित आणि निषिद्ध शीलाचे पुनः हीन, मध्यम आणि उत्तम असे तीन भेद केले आहेत.*_

                 _*कीर्तीच्या आशेने पाळलेले शील हीन, पुण्यफळाच्या आशेने पाळलेले मध्यम व हे माझे कर्तव्यच आहे अशा भावनेने पाळलेले उत्तम समजावे. 'मी मोठा शीलवान्, हे दुसरे लोक दुःशील आहेत, हे पापी आहेत,' अशा प्रकारे ज्या शीलाचा आत्मस्तुति आणि परनिंदा करण्यात उपयोग होतो, ते हीन शील, ज्याचा असा उपयोग होत नाही परंतु जे ज्ञानयुक्त नाही, ते मध्यम, व प्रज्ञापूर्ण शील उत्तम जाणावे. आपणास दुसऱ्या जन्मी सुख मिळावे म्हणून पाळलेले शील ते हीन, आपणाला मोक्ष मिळावा या हेतूने पाळलेले मध्यम, व सर्व प्राणिमात्राच्या हितासाठी पाळलेले शील उत्तम होय.*_

_*टीप :- महामंगल सूत्त व सिगाल सुत्त यांचे मराठीत भाषांतर माझ्या ब्लॉगवर उपलब्ध असल्याने हिते दिले नाही आहे*_

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

*_संकलन :- महेश कांबळे_*

*_दिनांक :- १८/०६/२०२४_*

*_संदर्भ :-_*

*_१) महामङ्गल सुत्त_*

*_२) सिगाल सुत्त_*

*_३) बुद्ध धर्मावरील चार निबंध_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

Saturday, 15 June 2024

धम्म-संस्कार म्हणजे काय?

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_धम्म-संस्कार म्हणजे काय?_*

*_- भदन्त विमल कित्ती गुणसिरी_*

*_!! ॐ मणी पद्मे हूँ !!_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2024/06/blog-post_15.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

_संस्कार म्हणजे माणसाच्या नैसर्गिक प्रवृत्तीला वळण लावणे, म्हणजेच सुसंस्कृत करणे. (३.५.२-२३)_

_सत्प्रवृत्ती हीच चिरस्थायी चांगुलपणाचे अधिष्ठान आणि हमी आहे. (३.५.२-३१)_

_म्हणून भगवान बुद्धाने चित्ताच्या साधनेला म्हणजेच माणसाच्या वृत्तीला सुसंस्काराने वळण लावण्यास अगदी पहिले स्थान दिले आहे. (२.५.२-३२)_

_-डॉ. बाबासाहेब आंबेडकर, (भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, आवृत्ती १९७०)_

               _धम्म-संस्कार म्हणजे काय याची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या ग्रंथात वरील प्रमाणे व्याख्या केलेली आहे. *हे संस्कार माणसाच्या मनात रुजणे म्हणजे त्याचे धम्म- जीवनमार्गावर चालणे होय. तेव्हाच त्याला बौद्ध म्हणतात.* सुसंस्कृत मनाने वागून, बोलून, करून माणसाच्या हातून जे काही निर्माण होते त्याला संस्कृती असे म्हणतात. ही संस्कृती रीती-रिवाज, शिष्टाचार, धर्मविधी, कला-कौशल्य वगैरे प्रकारातून दृश्य स्वरूपात प्रगट होते. अशा प्रकारे संस्कारातून संस्कृती निर्माण होते आणि सांस्कृतीक रीती-रिवाजातून संस्कार घडतात; म्हणजेच माणसाच्या प्रवृत्तीला योग्य ते वळण लागते. अशा प्रकारे संस्कार आणि संस्कृती एकमेकावर अवलंबून असून परस्परात गुंफलेल्या आहेत._

              _*बुद्धधम्मातील काही धार्मिक रीती-रिवाज आणि धार्मिक प्रथांच्या मागे ही भूमिका आहे. धम्म-दीक्षा घेणे, भिक्खू- भिक्खूनी दीक्षा घेणे (म्हणजेच प्रवज्जा आणि उपसंपदा दीक्षा घेणे) या दीक्षा घेतांना त्यामागे जी मानसिकता असते, ती संस्कार करणारी, मन घडविणारी मानसिकता असतो. जर मन घडविण्याच्या मानसिकतेतून हे दीक्षा विधी स्वीकारले तरच ते योग्य फळ देतात. जर मनाला वळण लावून घेण्याची मानसिकता नसेल आणि तसे वळण लावून घेण्यासाठी जे शिकायचे ते शिकण्याची सोय नसेल, तर असे धम्म-विधी केवळ देखावा ठरतात आणि अंधश्रद्धेची रूढी निर्माण करतात. म्हणून या विषयाचे नीट आकलन करून घेणे आवश्यक आहे.*_

                      _*बुद्धधम्मातील सर्वात श्रेष्ठ विधी म्हणजे भिक्खू- भिक्खूनी दीक्षा-विधी होय. परंतु धर्मांतरीत बौद्ध समाजात या धम्म-विधीचे योग्य त्या मानसिकतेतून पालन केले जात नाही, असे दिसून येते. भगवान बुद्धांनी भिक्खू-भिक्खूनी संघ निर्माण केला तोच मुळी धम्माचा सर्वत्र प्रचार-प्रसार करण्यासाठी होय. जगात फक्त भगवान बुद्धांनीच सर्व मानव जातीवर दया करून अत्यंत करूणेने त्यांच्या हितासाठी आणि सुखासाठी आपल्या धम्माचा प्रचार करणाऱ्या सर्वस्वत्यागी प्रचारकांची निर्मिती केली, तो त्यांचा संघ होय. आणि या संघाला त्यांनी स्वतःएवढे आणि आपल्या धम्माएवढे महत्त्व देऊन संघाचे शरणगमन करणे आवश्यक ठरविले. त्यामुळे तथागत बुद्धांचा संघ बुद्ध आणि धम्माएवढा पवित्र मानून त्या संघाच्या सर्व विधी-संस्कारांकडे मोठ्या पवित्र भावनेने पाहिले जाते. संघाच्या पावित्र्याला जोपासले जाते आणि मोठ्या गांभिर्याने त्या विधी-संस्कारांचे सेवन केले जाते. त्यामुळे संघाच्या वेशभूषेला म्हणजेच भिक्खूच्या चीवराला पवित्र मानण्याची परंपरा निर्माण झाली. चीवरदान हा एक अत्यंत श्रद्धेने केला जाणारा धम्मविधी मानला गेला. हे पावित्र्य जोपासणे फार कठीण असते. म्हणून भिक्खूंच्या वर्षावासाच्या समाप्तीनंतर त्यांना जे चीवरदान दिले जाते, त्याला कठीणदान असे म्हटले जाते. त्यामुळे चीवर धारण करण्यासाठी त्या व्यक्तीची मानसिकता पवित्र, गंभीर आणि अज्ञात ज्ञानाची प्राप्ती करण्याच्या ओढीची असावी लागते आणि चीवर धारण केल्यानंतर त्याने धम्मशिकवण आत्मसात करण्यात आणि त्याप्रमाणे जगण्याचा सराव करण्यात आपला संपूर्ण वेळ घालवायचा असतो. त्यामुळे तो समाजाला दुःखमुक्तीच्या मार्गाने नेण्यास किंवा मार्गदर्शन करण्यास सक्षम होत असतो. ही योग्यता भिक्खूला योग्य त्या प्रशिक्षणातून प्राप्त होत असते. भिक्षु जीवनाला जे महत्त्व आणि पावित्र्य आहे, ते त्याच्या योग्यतेमुळे होय.*_

               _*बुद्धधम्मात भिक्खू-भिक्खूनी बनण्याची परंपरा आहे, त्याचा एक खास विधी-संस्कार आहे.* ब्राह्मणाप्रमाणे कोणी जन्माने भिक्खू बनत नसतो किंवा जन्मजात वारसाहक्कानेही भिक्खू बनत नसतो. तर *भिक्खू धम्मानुसार केलेल्या आचरणाने म्हणजेच कर्माने घडत असतो. हे कर्म करण्यासाठी जेव्हा कोणी पुढे येतात तेव्हा त्यांना भिक्खू-भिक्खूनीची दीक्षा घ्यावी लागते आणि आपली जडण-घडण करण्यासाठी प्रशिक्षण घ्यावे लागते, राबावे लागते.* या बाबतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या 'भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म' या ग्रंथात फार योग्य प्रकारे मार्गदर्शन केलेले आहे. ते येणे प्रमाणेः_

                 _*'संघातील घटकांचे श्रामणेर आणि भिक्खू असे दोन वर्ग पाडले जात.' (५.१.२-१६) 'त्रिशरण आणि दसशील ग्रहण केलेला प्रत्येक मुलगा श्रामणेर बने. ' (५.१.२-१८) 'भिक्खू व्हायला दोन अवस्थांतून जावे लागेः पहिली प्रवज्जा होई आणि दुसरी उपसंपदा. उपसंपदा घेतल्यानंतर तो भिक्खू ठरे.' (५.१.२-२४) 'श्रामणेराला कोणत्याही काळी संघ सोडून उपासक बनता येत असे. श्रामणेर हा भिक्खूच्या स्वाधीन असून भिक्खूच्या सेवेत आपला काळ व्यतीत करीत असे. त्याने उपसंपदा घेतलेली नसे.' (५.१.२-२३) 'श्रामणेराला उपाध्यायाने त्याचा परिव्राजक (श्रामणेर) म्हणून स्वीकार केल्यावर त्याच्या सेवेत आणि संरक्षणात राहावे लागे.' (५.१.२-२६) 'हा शिक्षणाचा काळ संपल्यानंतर उपसंपदेसाठी खास बोलाविलेल्या संघ सभेत उपाध्यायाला श्रामणेरावर उपसंपदेचा अनुग्रह करावा अशी संघाला विनंती करावी लागे.' (५.१.२-२७) 'जो भिक्खूपदाचा प्रार्थी तो श्रामणेर त्या पदाला योग्य आहे की नाही याची खात्री संघाला करून घ्यावी लागे. ही खात्री करून घेण्यासाठी श्रामणेराला काही ठराविक प्रश्नांची उत्तरे द्यावी लागत.' (५.१.२-२८) 'जेव्हा संघ उपसंपदेची अनुमती देईल तेव्हाच श्रामणेराला भिक्खूपद मिळे.' (५.१.२-२९) 'भिक्खूनी संघात प्रवेशासंबंधी नियम भिक्खूसंघ प्रवेशाच्या नियमासारखेच असत.' (५.१.२-३०)*_

                 _*बौद्ध राष्ट्रात अशा प्रकारे भिक्खू किंवा भिक्खूनी बनण्याची परंपरा चालू आहे. तशीच महिनाभर किंवा वर्षावासाच्या काळातील तीन महिने श्रामणेर बनण्याची परंपरासुद्धा आहे. परंतु एकाएकी कोणी असे टेंपररी श्रामणेर बनत नसतात. तर आचार्यांच्या सान्निध्यात राहून गंभीरपणे धम्म जाणण्याची आणि तसे काही आचरण करून पाहाण्याची जिज्ञासा निर्माण झाली तरच लोक अल्प काळासाठी श्रामणेर बनतात. परंतु श्रामणेर बनल्यानंतर तो कालावधी संपेपर्यंत ते विहारातच आचार्याच्या बरोबर राहून सतत धम्म शिकत आणि आचरण करीत राहतात. त्यांना कोठे एकटे फिरण्याचा, एकटे राहण्याचा, विधी-संस्कार करण्याचा, प्रवचन देण्याचा आणि कोणाकडे काही मागण्याचा मुळीच काही अधिकार नसतो आणि लोक कटाक्षाने या शिस्तीचे पालन करतात. थाईलँडमध्ये तर श्रामणेर एकटा राहतांना किंवा भिक्षाटन करतांना दिसला, तर त्याला अटक केली जाते आणि संघाचरणाचा भंग केला म्हणून तुरूंगवासाची सजा ठोठावली जाते.* त्यामुळे धम्म सखोलपणे जाणण्याची आणि त्याप्रमाणे काही आचरण करून पाहण्याची प्रबळ इच्छा निर्माण झाल्याशिवाय कोणीही अल्प काळासाठीसुद्धा श्रामणेर बनत नसतात. अशा प्रकारची तेथे धम्मश्रद्धेची संस्कृती आहे. म्हणून *एखाद्या तरूणाच्या किंवा तरूणीच्या मनात श्रामणेर किंवा श्रामणेरी बनण्याची इच्छा निर्माण झाली, तर त्यांच्या पालकांना फार आनंद होतो. मग ते त्यांच्या श्रामणेर दीक्षेसाठी दानधर्मात मोठ्या प्रमाणात खर्च करतात. श्रामणेर बनणाऱ्यांची कधी कधी तर हत्तीवरून अभिवादनाची मिरवणूक काढतात. पालकांना वाटते की आपला मुलगा किंवा मुलगी आता सर्वश्रेष्ठ जीवनमार्गाला लागले आहेत. पुढे चालून जर ते भिक्खू किंवा भिक्खूनी बनले तर आपल्या जीवनाचे आणि मुलांच्या जीवनाचे सोने झाले असे त्यांना वाटते. म्हणून अल्पकाळासाठी श्रामणेर बनण्यालासुद्धा तेथे प्रचंड महत्त्व असून ते धम्मश्रद्धेचे महान प्रतिक आणि आदर्श मानला जातो.*_

                 _या विवेचनावरून पहिली गोष्ट स्पष्ट होते ती अशी की *श्रामणेर बनायचे असते ते भिक्खू बनण्यातील पहिले पाऊन टाकण्यासाठी किंवा धम्माचरणाचा भिक्खू जीवनातून अनुभव घेण्यासाठी होय. म्हणजेच आचार्यांच्या संगतीत राहून गंभीर धम्माचरणाचा धडा गिरविण्याचा प्रयत्न करण्यासाठी होय. त्यातून जर भिक्खू जीवन जगण्याची श्रामणेराला उत्कट इच्छा झाली, तर त्याने भिक्खू बनण्याचे पुढील पाऊल उचलायचे. जर तशी इच्छाशक्ती निर्माण झाली नाही तर चीवर त्याग करून पुन्हा गृहस्थ जीवनात परतायचे. अगोदरच काही दिवस श्रामणेर राहायचे आणि मग पुन्हा गृहस्थ उपासक बनायचे असे ठरवून श्रामणेर दीक्षा घ्यायाची नसते, असे केल्याने धम्माची मूळ चेतना आणि पावित्र्य नष्ट होते आणि श्रामणेर बनणे हा एक पोरखेळ होऊन जातो.* श्रामणेर बनण्याच्या मूळ उद्देशाप्रमाणे धम्मभावना वाढत नाही, धम्माच्या अथांगतेची, धम्माच्या दिव्यत्वाची अजिबात कल्पना येत नाही आणि त्यामुळे धम्म श्रद्धा वाढत नाही. धम्मश्रद्धेच्या अभावी माणूस शुष्क बनतो आणि त्याच्या दृष्टीने धम्म निरस बनतो. अशा प्रकारे माणसाचे अतोनात नुकसान होते._

               _*आपल्याकडची परिस्थिती अशी आहे की, अधिकांश पालकांना आपला मुलगा भिक्खू बनावा असे मुळीच वाटत नसते. मुला-मुलींनासुद्धा तसे कधी वाटत नसते. म्हणून मिरविण्याच्या किंवा देखाव्याच्या, किंवा प्रसिद्धीच्या भावनेने किंवा धार्मिक कार्यक्रम आहे म्हणून इतरांनी आग्रह केल्यामुळे काही लोक अल्पकाळासाठी श्रामणेर बनत असतात. म्हणून सुरूवातच मुळी खोटेपणातून होत असते. त्यामुळे भारतात मुळची पवित्र परंपरा आजपर्यंत सुरूच झालेली नाही.*_

                   _*जाता जाता एका कुप्रथेचा येथे उल्लेख करणे आवश्यक वाटते. हल्ली काही भिक्खू आपला मुलगा किंवा मुलगी संघाला दान करण्याचे लोकांना आवाहन करतांना दिसतात. त्यामुळे भावनिक बनून क्वचित कोणी तरी आपले मूल किंवा मुले अशा प्रकारे दान दिल्याच्या बातम्या कानावर आलेल्या आहेत. परंतु मुलांचे दान देण्याची बौद्धपरंपरेत कोणतीही शिकवण नाही. बुद्धाने सजीव प्राण्यांचे दान देण्यास मनाई केलेली आहे. कारण कोंबडी किंवा बोकड कोणाला दान दिला तर त्याची शेवटी हत्त्याच केली जाते. म्हणून त्या प्राण्याच्या हत्त्येस कारणीभूत झाल्याचे पाप लागते. त्याच प्रमाणे धम्म काय आहे आणि तो आपल्यासाठी कसा उपयोगी आहे हे समजल्याशिवाय बौद्ध बनता येत नाही आणि हे समजण्याचे वय झाल्याशिवाय आणि तशी शिकवण मिळून त्या व्यक्तीने बौद्ध बनण्याचा किंवा भिक्खू बनण्याचा स्वतः निर्णय केल्याशिवाय त्याला दीक्षा दिली जात नाही. अशी बौद्ध परंपरा आहे. विनंती केल्याशिवाय धम्मदीक्षा दिली जात नाही. आपल्या लहान किंवा अज्ञानी मुलांनी काही भिक्खू बनण्याचा निश्चय केलेला नसतो आणि विनंतीसुद्धा केलेली नसते. तर केवळ बालमनाप्रमाणे आई-वडील आपल्या भल्यासाठीच काही तरी करायला सांगतात असे समजून ते होय म्हणत असतात. त्यामुळे मुलांचे दान हे त्यांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेणे ठरते. बौद्ध परंपरेत कोणत्याही माणसास सजीवांचे दान देण्याचा किंवा मुलांच्या इच्छा-आकांक्षांची तमा न बाळगता धर्माच्या नावाने त्यांना भावनिक करून त्यांचे दान करण्याचा अधिकार नाही. जर ही प्रथा योग्य समजली तर देवाच्या नावाने देवदासी आणि वाघ्या- मुरळी सोडणेसुद्धा योग्य म्हणावे लागेल. पण तो किती घोर अन्याय आहे, हे सर्वांना माहित आहे आणि त्या धार्मिक प्रथा अगदी कायद्याने मोडून काढण्याचे प्रयत्न केले जात आहेत. मग धर्माच्या नावाने बौद्ध आपली तशाच प्रकारची परंपरा कशी काय निर्माण करू शकतात? ही फक्त श्रीलंकेत हिंदूधर्माच्या प्रभावामुळे शिरलेली अंधश्रद्धा आहे आणि त्या विरूद्ध तेथेसुद्धा फार मोठ्या प्रमाणात प्रबोधन कार्य चालू आहे. श्रीलंकेत बौद्ध लोकातही जातीप्रथा शिरलेली आहे. त्याविरूद्धही तेथे चळवळ चालू आहे. श्रीलंकेतील बुद्धविहारांमध्येसुद्धा हिंदू देव-देवतांची मंदिरे आहेत. या हिंदूधर्माच्या प्रभावातून मुक्त होण्याची चळवळ तेथील बौद्धांमध्ये सध्या चालू आहे. धम्मासाठी मुले दान देण्याची प्रथा हिंदूधर्मातून बुद्धधम्मात घुसलेली आहे. ती बौद्धलोक आता सत्त्य मानीत नाहीत. काही भारतीय भिक्खू राजा अशोकाने आपला मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांना धम्मासाठी दान दिल्याचे सांगून लोकांना भावनिक बनवित असतात. ते चूक आहे, कारण ते सांगतात तो इतिहास खोटा आहे. राजा अशोकाने बुद्धधम्माचा स्वीकार करण्यापूर्वीच महेंद्र आणि संघमित्रा संघात दाखल झालेले होऊन अर्हतपदाला पोहोचलेले होते. अशोकाने दान दिल्यानंतर काही ते क्षणात अर्हत बनले नव्हते. तर त्यांची अर्हतपदाची योग्यता पाहून राजा अशोकाने त्यांची श्रीलंकेत जाण्यासाठी निवड केलेली होती. म्हणून बुद्धधम्माच्या नावाने मुले दान करण्याच्या या कुप्रथेचा भ्रष्टाचार भारतीय बौद्धांमध्ये येऊ देऊ नये.*_

                 _चीवर धारण करण्यासाठी त्या व्यक्तीची मानसिकता पवित्र, गंभीर आणि अज्ञात ज्ञानाची प्राप्ती करण्याच्या ओढीची असावी लागते या भावनेतून भारतात कोणीच श्रामणेरदीक्षा घेत नसल्यामुळे धम्म ही केवळ औपचारिकतेची गोष्ट असल्याचा मनावर प्रभाव पडतो, म्हणजे तसे इंप्रेशन निर्माण होते. त्यामुळे धम्माचे मूळ महत्त्व कधीच लक्षात येत नाही. *माणूस श्रामणेर दीक्षा घेऊन चीवर परिधान करतो. पंचशीलासारखे दसशील म्हणतो. त्या दसशीलामागील वैराग्य भावनेची त्याला काहीच कल्पना येत नसते. मग लोक पंचांग प्रणाम करतात, भरभरून दान देतात, पंचपक्वानांचे भोजन देतात. भिक्षापात्र घेऊन फक्त भिक्षाटनाचा देखावा करावा लागतो. काही पाली गाथा म्हणता आल्या म्हणजे पुरे. त्यापेक्षा ना काही शिकण्याचा त्रास, ना शिकविण्याचा त्रास. धम्मावर एखादे प्रवचन द्यावेच लागले तर आपल्या पुस्तकी ज्ञानाच्या बळावर काही तरी भेसळ करून सांगायची. नाही तर बुद्धाची चार आर्यसत्त्ये आहेतच सांगायला. दुःख, दुःखाचे कारण, दुःखाचा निरोध आणि त्या निरोधाचा आर्य अष्टांगिक मार्ग. या तीनही संकल्पनांचा त्या श्रामणेराला काही गंध नसतो. आपल्या जीवनातील दुःख पाहाण्याचा आणि अनुभवण्याचा त्याने कधी प्रयत्न केलेला नसतो आणि ज्या आचार्यांच्या संगतीत राहिल्याने हे जाणता येते, शिकता येते, त्यांच्या वाऱ्यालाही उभे राहण्याचा संबंध नसतो. त्यामुळे श्रामणेराला प्रत्यक्षात समाजात मिळालेला मानसन्मान, पाहुणचार, आदरसत्त्कार आणि दानाचे धन पाहून तो तर आनंदी झालेला असतो. त्याला वाटू लागते की श्रामणेर किंवा भिक्खू बनणे किती फायद्याचे आहे. बिनाकष्ट सर्व काही मिळते. म्हणून श्रामणेर किंवा भिक्खू बनून आपला घर प्रपंच चालविण्याऱ्यांची संख्या भारतात वाढलेली आणि संघ-भावना लयास जाऊन भिक्खूसंघ भ्रष्टाचारात बरबटलेला आहे. त्यामुळे समाजाची तर अतोनात हानी झालीच झाली, परंतु धम्म-चळवळीचे महत्त्व आणि पावित्र्य लयास जाऊन ती एक कुचेष्टेची आणि टीका- टिपण्णीची गोष्ट झाली आहे.* बौद्धजनांमध्येसुद्धा संघ बदनाम झाला आहे. हा सर्व दुष्परिणाम शोभेसाठी किंवा मिरविण्यासाठी श्रामणेर बनण्याच्या प्रथेतून घडून आलेला आहे. असे काही घडू नये म्हणून धम्मपदात एका गाथेचा उपदेश केलेला आहे. _

_धम्मं चरे सुचरितं, न तं दुच्चरितं_

_धम्मचारी सुखं सेति, अस्मिं लोके परम्हि च ।।_

                _- अर्थात, सुचरित्रवान बनून धम्माचे आचरण करा, दुश्चरित्रवान बनून नव्हे. सुचरित्रवान बनून जो धम्माचे आचरण करतो तो या लोकी आणि पुढेही सुखाने राहतो. *या गाथेतील सुचरित्रवान  याचा अर्थ अगोदर सांगितल्याप्रमाणे चीवर धारण करण्यासाठी त्या व्यक्तीची मानसिकता पवित्र, गंभीर आणि अज्ञात ज्ञानाची प्राप्ती करण्याच्या ओढीची असावी लागते असा आहे. म्हणून अल्प काळासाठी चीवर धारण करून मिरविण्यासाठी श्रामणेर बनणे किंवा याच भावनेने कायमचे भिक्खू बनणे हे पूर्णपणे चूक असून धम्म भ्रष्ट करण्याचे पाप आहे.* संत तुकारामांनी म्हटल्याप्रमाणे 'धर्मापोटीच अधर्म' असतो तो अशा प्रकारे होय. म्हणून मिरविण्यासाठी किंवा कमावण्यासाठी असे कार्यक्रम करणारे लोक एक तर ठार अडाणी असतात किंवा स्वार्थ साधणारे धूर्त तरी असतात. साधी कल्पना करा की कोणी असा कार्यक्रम आयोजित करतात ते काही भारतात चीवर शिवत नाहीत किंवा भिक्षापात्रे बनवित नाहीत. तर ते बौद्धदेशांमधूनच मागवितात. *बौद्ध देशातीत बौद्ध लोक ते नेहमीच दान करीत असतात. पण येथे मात्र आयोजक दीक्षा घेणाऱ्याकडून आणि जनतेकडूनही चीवरदानाच्या आणि संघदानाच्या नावाने पैसे उकळीत असतात. श्रामणेरांचा खाण्या-पिण्याचा किंवा प्रवासाचा खर्च तर स्थानिक मंडळे करीत असतात. मग आयोजकांना जरी प्रत्येक उमेदवारापाठी चीवरदान व संघदानाच्या नावाने चार-पांच हजार रूपये मिळाले आणि त्यांनी समजा शंभर श्रामणेर बनवले तर त्यांना चार ते पाच लाख रूपये सहज मिळून जातात. जर असे घडत असेल तर धम्म-दानाच्या नावाने केली जाणारी ही समाजाची लूटमार आहे, असे म्हणावे लागेल.*_

                 _*डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी फार मोठ्या श्रद्धेने बुद्धधम्माचा स्वीकार केला आणि आपल्या लाखो अनुयायांना त्याच श्रद्धेने दिला. म्हणून धम्मश्रद्धेचे मोल ओळखून ते कायम जोपासण्याचा बौद्धजनांनी प्रयत्न केला पाहिजे. धम्मश्रद्धेचे मातेरे होईल आणि धम्माच्या नावाने भ्रष्टाचार बोकाळेल अशा प्रकारे धम्मसंस्कृतीचे विडंबन करता कामा नये. धम्म-परंपरांचे विडंबन हे पाप आहे, धम्माप्रतीचा तो प्रमाद आहे. त्यातून कोणाचा काही फायदा तर होत नसतोच परंतु उलट लोकांच्या अंधश्रद्धा बळावतात आणि बौद्ध जीवनमार्गावरील त्यांची वाटचाल कायमची ठप्प होते. ते रूढीग्रस्त बनतात आणि 'नामके वास्ते बौद्ध' बनून राहतात आणि आज तरी भारतात अशाच बौद्धांचा भरणा ज्यास्त असल्याचे दिसते आहे. म्हणून प्रत्येक इमानदार बौद्धाने अत्यंत गंभीरपणे विचार करून असे प्रकार थांबविले पाहिजेत, ही विनंती.*_

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

*_संकलन - महेश कांबळे_*

*_दिनांक :- १७/०६/२०२४_*

*_संदर्भ :-_*

_*१) भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

Wednesday, 12 June 2024

कुर्बानी म्हणजे फक्त पशुबळी देणे ?

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

*_कुर्बानी म्हणजे फक्त पशुबळी देणे ?_*

*_- मोहम्मद सुलेमान (एप्रिल १९९७)_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

                   _बकरी ईदची नमाज रमजान ईदच्या नमाजापेक्षा लवकर होते. कारण कुर्बानी असते. कुर्बानी म्हणजे पशुबळी देणे. हा *बळी देण्याचा कार्यक्रम नमाजनंतर होतो म्हणून नमाज लवकर.*_

                   _*आमच्या समाजात किती लोक कुर्बानी देतात? आणि कुर्बानी देण्याच्या अंधश्रद्धेतून हा समाज केव्हा बाहेर येणार?* पैसेवाल्या मुसलमानांनी या प्रथेला किळसवाणे स्वरूप आणले आहे. ईदपूर्वी बकरी खरेदी करून त्यांचे प्रदर्शन करणे, बकऱ्यांच्या किमतीत चढाओढ लागलेली असते व इतके सर्व करून मटणातील तिसरा हिस्सा नातेवाईक व मित्रांना वाटणे म्हणजे झाली कुर्बानी. मौलाना नमाजानंतर प्रवचनात सांगत होते, बावण्णतोळे चांदी किंवा सव्वा दोन तोळे सोने ज्यांच्या जवळ असेल, त्या प्रत्येकाने कुर्बानी केली पाहिजे, पशूचे रक्त वाहिले पाहिजे._

                 _*चौदाशे वर्षांपूर्वी सुरू झालेली ही प्रथा म्हणजे अंधश्रद्धा होय.* आजच्या विज्ञान युगात या प्रथा बंद होण्याऐवजी मौलाना आता उजळ माथ्याने प्रचार करत असतात व ज्याच्या नावाने बळी द्यायचा, त्याने आपल्या हाताने पशूच्या गळ्यावर सुरी फिरवावी, मग फार पुण्य मिळते, असल्या भाकड कथा सांगत असतात._

           _*यात्रेत होणाऱ्या पशुबळीविरुद्ध 'अंधश्रद्धा निर्मूलन समिती'ने आघाडी उघडली आहे. ती स्वागतार्ह आहे. त्याचबरोबर ईदच्या निमित्ताने होणाऱ्या पशुबळी विरुद्ध आंदोलन उभे करून मुस्लिम समाजात जागृती निर्माण करणे आवश्यक आहे.*_

                _आज ईदचा दिवस; पण शीरखुर्मा खाल्ला, खिलवला जातो, मिठाई वाटली जाते आणि दुरावलेले मित्र एकमेकांना स्नेहभावाने कडकडून अलिंगन देतात, ती ईद नाही. आजची ईद काही वेगळीच आहे. पहाटे उठून कसाई लोक आपापल्या सुऱ्या, कुऱ्हाडी परजून घेतात आणि जास्तीत जास्त पशुंचा जीव घेण्याच्या तयारीला लागतात. तसे पाहू गेल्यास बळीच्या व्यक्तीला ती व्यक्ती एकटी कापू शकते. पण मोठ्या पशूमध्ये सात भागीदार एकत्र येऊन बळी देतात. बोकड, शेळी, मेंढी इत्यादी पशुंमध्ये फक्त एकाच व्यक्तीचा वाटा असतो आणि एकटी व्यक्ती एक पशू कापते. आज या पशूंना कापण्याचा दिवस आहे, हाच बळीचा दिवस. साधारण बोलाचालीच्या भाषेत ही 'खारी ईद' ही आहे. एका पशूला सात माणसं मिळून बळी देतात म्हणून पशूचे सातही मालक 'इजराईल' (जीव घेणारे देवदूत) आले आहेत. ठळकपणे हे सांगता येईल की, आज प्रत्येक मुसलमान रक्त वाहण्यासाठी ठामपणे उभा आहे. हे रक्त वाहवणे आणि पशुंना (हलाल करून) गळा कापून मारण्याला ते कुर्बानी मानतात आणि हे पुण्य कृत्य समजतात. घराच्या ज्या खोलीत मी बसलो आहे, त्याच्या मागे परसदारी थोडी रिकामी जागा आहे. सूर्य उगवण्यापूर्वीच कसाई आपल्या परजलेल्या सुऱ्या आणि कुऱ्हाडीसोबत इथे पोचले आहेत. ही जागा गावाच्या मधोमध आहे. आपल्या पशुंना अखेरच्या पाण्याचा घोट पाजून पाजून 'कुर्बानी देणारे लोक' इथे येऊ लागले आहेत. पहाटेचा गार वारा आणि शुद्ध वातावरण माझ्यासारख्या आळशी माणसाला ताजेपणा आणि स्फूर्ती देत आहे. म्हणून मी खिडक्या जास्तीत जास्त उघड्या ठेवतो. रात्रीच्या गुंतागुंतीच्या प्रश्नांना सकाळी-सकाळी नकळत कोण माझ्या सोबत सोडविण्याचा प्रयत्न करतोय म्हणून आजही खिडक्या उघड्याच आहेत._

              _*अजून एक पशू आला आहे. कसायाने आपल्या शबनममधून सुरीबरोबर नायलॉनची एक लांबी दोरी बाहेर काढली आणि तो पशूजवळ आला. पशूच्या मालकांनी पशूचा दोरखंड कसायाच्या हाती दिला. कसायाने पशूचा जबडा जोराने पकडला आणि सायकलच्या हँडलसारखा असा जोरात हिसडा दिला की, पशू धाडकन जमिनीवरच आदळला. सर्व परंपरेनुसार बळी देणाऱ्या लोकांचे पशूजवळ असणे महत्त्वाचे असते. त्यामुळे पशू जमिनीवर पडल्यामुळे त्या सर्वांनी त्याला दाबून धरले. कसायाने लगेच नायलॉनच्या लांब दोरीने पशूचे चारही पाय एकदम मजबूत बांधून टाकले. पशूने उठण्याचा प्रयत्न केला; पण व्यर्थ. काहीच उपाय नव्हता. कारण की चारही पाय बांधले गेले होते. असहायपणे पडलेल्या पशूने प्रेम आणि करुणेने जवळ उभ्या असलेल्या त्या सर्वांना पाहिले. त्यांचे चेहरे मानवी होते आणि ते आपल्याला (अश-र-फुल मख्लूकात) दहा, जगातल्या सर्व गोष्टी सांगण्याचा दावा करतात. सगळ्यांकडून दयेची भीक आणि जिवाचं दान मागत पशूने सांगितलं, "मी तुमचा नांगर हाकतो, बग्गी ओढतो, तुमच्या सोबत राहतो, तुम्ही मला का मारता आहात?" कोणीच पशूचे ऐकले नाही आणि म्हणाले - "आम्ही यात काहीच करू शकत नाही, हा तर देवाचा हुकूम आहे." पशूने आपल्याला सकाळपर्यंत चारा-पाणी देणाऱ्या मालकाचा शोध घेतला. पण आज त्यानेही आपले तोंड वळवून घेतले होते.*_

                  _घ्या, ते मुल्लाजी आहेत. त्यांना सुरीने गळा कापतेवेळी अल्लाहचे नाव घ्यायचे आहे. *मुल्लाजीने जेव्हा कसायाच्या हातून सुरी आपल्या हातात घेतली, तेव्हा पशूने मुल्लाजीला पाहिले आणि डोळ्यातल्या डोळ्यात फिर्याद करत सांगितले- 'तुम्ही तर देवाचे खास प्रतिनिधी, देवदूत आहात ना? काय तुम्हीही माझ्यावर कृपा करणार नाही? कारण देवाचा गुण (रहीम व करीम आहे) हे तर तुम्ही जाणताच ना?'*_

                 _मुल्लाजीने पशूची भावना जाणून उत्तरादाखल सांगितले- "हे तर मला माहीत आहे की, देव रहीम व करीम आहे; पण काय करू, हा माझ्या पोटाचा सवाल आहे. जर मी तुला सोडून दिले, तर कायमस्वरुपी मुला-बाळांचा रोजगार बंद होऊन जाईल." *मुल्लाजींची गोष्ट ऐकून पशूच्या डोळ्यात दोन मोठमोठी आसवं तरळली. त्याचा आज कोणीच वाली आणि दुःखात सहभागी होणारा नव्हता. पण त्याला आनंद वाटला की, आपला बळी दिल्यामुळे आपण मुलांच्या मोठ्या टोळीचे पोट भरण्याच्या कामी येऊ शकू. त्याने शेवटचा आणि लांब उसासा घेतला. इतका लांब की, त्यात साऱ्या जगाचं दुःख सामावलं जावं.*_

                _कसायाने पशूचे डोके उलटे करून टाकले, त्याचे डोळे खाली जमिनीत गाडले केले आणि मान वरच्या बाजूला ताठर झाली. मुल्लाजींनी सुरी मानेवर ठेवली आणि जोरात म्हटलं, "बिस्मिल्ला हि अल्लाहु अकबर" आणि सुरीचे तीन असे हिसडे दिले की, मानेचा अर्धा भाग कापला गेला. जितकं रक्त होतं, लाल कारंज्यासारखं शरीरातून बाहेर आलं. जवळ उभ्या असलेल्या बळी देणाऱ्या लोकांमधून एकाने सांगितले "पशू फार मोठा आहे, बरीच चरबी आहे." दुसऱ्याने सांगितले, "एक वर्षापासून धान्य आणि चांगले गवत खात होता." नवे आणि भडक कपडे घातलेली मुलं ओरडत होती, "अहा, आमचा पशू कापला गेला, आता याची कलेजी खाऊ."_

                  _*माझ्या घरात बसल्या बसल्या हा चौथा पशू कापला जाताना मी बघत होतो. सर्व पशुंनी आपला बळी देणाऱ्या अलिखान बहादूरजवळ कृपेची दाद-फिर्याद मागितली; पण कोणीही त्याचं काहीएक ऐकलं नाही. रस्त्यावरील आपल्या अधिकारात देवाचं नाव घेत त्या सर्वांना मारून टाकलं गेलं. जेव्हा पाचवा पशू आणला, तेव्हा तर माझी त्याला पाहायची हिम्मत झाली नाही.*_ 

                   _ज्या खिडक्यांमधून दोन तासांपूर्वी सुखद आणि मोहक हवा येत होती, आता पशूच्या रक्त आणि मासांच्या दुर्गंधीने माझी खोली भरली होती, जिथे वृक्षावर काही तासांपूर्वी बुलबुल, कोकीळ आणि चिमण्या आपल्या चिवचिवाटाने आणि गाण्यांनी वातावरणात ताजेपणा भरत होत्या, आता शेकडो कावळे आणि खूप घारी, गिधाडे मांसाच्या बोटीसाठी आपापसात भांडत होती पाहता-पाहता त्या सुंदर जागेचे वातावरण स्मशानघाटात बदलून गेले आणि बुलबलांची, कोकिळांची जागा कावळे, घारी आणि गिधाडांनी घेतली. या दृश्यापासून स्वतःला वेगळे करण्यासाठी मी खिडकी बंद केली आणि त्यावर पडदाही टाकला. सायंकाळी कळले की, आज पंधरा पशू कापले गेले आहेत._

                     _खिडकी बंद करून मी स्वतःला या पशूपासून दृष्टीआड करून घेत होतो. पण मन, हृदय आणि मस्तक अजूनही त्या पशूच्या आत्म्याबरोबर भरकटत होतं. मी पशूच्या आत्म्याबरोबर दूरस्थ आकाशातील शून्यात हरवून गेलो आणि विचार करू लागलो. इतका काळ लोटल्यावरही पशूंना बळी देण्याची प्रथा मुसलमानांमध्ये जशीच्या तशी जिवंत आहे, याचं कारण काय असावं? मुसलमान या प्रथेला का साजरी करतात? पण ते दुसऱ्यांना असे करण्यापासून परावृत्त करतात का? ही प्रथा खोटी आहे की, यात काही सत्यता आहे?"_

               _या प्रश्नांचं मंथन करत-करत मी अरब राष्ट्राच्या भूतकाळात जाऊन पोचलो. त्याकाळी तिथे राहणारे आपल्या घराण्याचा व समाजाच्या मनोकामनेच्या पूर्ततेसाठी आपल्या मूर्तीच्या (ज्यांना ते आपले देव मानत होते) नावांवर, त्यांच्यासमोर, आपल्या एकुलत्या एका (ज्येष्ठ) मुलाचा व मुलीचा बळी देत होते. भारतात आजही एखाद-दुसऱ्या स्थानावर लपून-छपून ही प्रथा पाहिली जाऊ शकते आणि वर्तमानपत्रात वाचायला मिळतं की, अमक्या-अमक्या ठिकाणी अमक्या व्यक्तीने आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी एका मुलाचा बळी दिला._

                _अरब राष्ट्रात ही प्रथा सुरू होती, त्याच लोकांमध्ये एक हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम जन्माला आले. लोकांनी त्यांनाही आपल्या पूर्वजाप्रमाणे आपला मुलगा हजरत इस्माईलचा बळी देण्याची गोष्ट सांगितली. जेव्हा ते आपला मुलगा हजरत इस्माईलचा बळी देऊ लागले, तेव्हा त्यांनी या प्रथेत मोठ्या क्रांतिकारी परिवर्तनाची घोषणा केली. ते म्हणाले होते, 'मनुष्याच्या ऐवजी आजपासून पशुबळी दिला जाईल आणि हा बळी मूर्तीच्या नावावर न दिला जाता, देवाच्या नावावर दिला जाईल, या घोषणेने हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम यांनी मनुष्यांना बळी द्यायची प्रथा थांबवून माणसाचे रक्षण केले होते. त्यांच्याच काळापासून ही बळीची प्रथा सुरू आहे. नुकताच मी अरबातील वाळवंटात इराण, मिस्त्र, इराक, जॉर्डन आणि सीरियाच्या पर्वत प्रदेशांमधून हिंडत होतो. यादरम्यान मनात प्रश्न उभा ठाकला. यहुदी आणि ख्रिश्चन लोक तर मुसलमानांच्या आधीचे आहेत आणि हजरत इब्राहिमला ते नबी मानतात; मग ते इब्राहिम अलैहिस्सलामच्या प्रथेला का साजरी करीत नाहीत? मी परत विचाराच्या गर्तेत हरवून गेलो. तेव्हा माझ्या प्रश्नांचं उत्तर असे मिळाले की, यहुदी आणि ख्रिश्चन हजरत इब्राहिमचा पुत्र मोहम्मद इसाकची लेकरे आहेत. इसाकला बळी दिले गेले नाही, याच कारणास्तव ते लोक या प्रथेला साजरी करीत नाहीत._

                _हजरत मोहम्मद सल्लललाहू अलैहि वसल्लम, हजरत इस्माईलच्या मुलांपैकी आहेत. त्यांना बळीसाठी घेऊन गेले होते. याच दरम्यान एका प्रश्नाने मला घेरले, "हजरत मोहम्मद स.ने या बळी प्रथेवर एवढा भर का दिला? आता मी हजरत मोहम्मद स. च्या अरब राष्ट्राला खोलवर पाहू लागलो, तर ध्यानात आले की, ज्यावेळी हजरत मोहम्मद साहेब मानवता आणि एकेश्वरवादाचा प्रचार करीत होते, त्यावेळीही तिथले निवासी मूर्तीसमोर मुलांचा आणि माणसांचा बळी देऊ लागले होते आणि मुलींना जिवंत जमिनीत पुरू लागले होते. या वाईट प्रवृत्तींचा त्यांनी जोरदार मुकाबला केला आणि आपल्या अनुयायांना (मुसलमानांना) सांगितले, "तुमचा धर्म तुमचा पिता हजरत इब्राहिमच्या आधारावर आहे." याप्रकारे जेव्हा हजरत मोहम्मद स.ने आपल्या लोकांना समजावले, तेव्हा त्यांनी मनुष्याचा बळी देणे आणि मुलींना जिवंत जमिनीत पुरण्याऐवजी त्यांचे रक्षण करण्यासाठी पशुबळींवर भर दिला. त्यामुळे मनुष्याच्या आणि मुलींच्या जीवाचे रक्षण झाले आणि हजरत इब्राहिम अ. ची ही प्रथा दुसऱ्यांदा जिवंत झाली. आजतागायत जिवंत आहे._

                 _याच प्रश्नांच्या घुसळणीला माझ्या मनात एक प्रश्न निर्माण झाला, "काय, आज सुद्धा ही प्रथा उचित आहे? धर्म आणि श्रद्धेनुसार असा विचार करणे योग्य मानले जात नाही; पण आमचे युग हे विज्ञान आणि बौद्धिकतेकडे झुकणारे आहे. त्यामुळे माझ्या मनाने उत्तर दिले, "ही प्रथा उचित नाही." परत प्रश्न निर्माण झाला, 'उचित का नाही?' "जगातील करोडो मुसलमानांनी या प्रथेला, श्रद्धेला पवित्रतेची मान्यता तर देऊन ठेवली आहे ना?" मनात प्रश्न उसळला, "जुन्या श्रद्धेच्या आधारावर उचित मानणे, हा काही सत्याश्रित विचार नाहीच मुळी. आज मनुष्य आपल्या विचारांना आणि श्रद्धेला विज्ञानाच्या कसोटीवर पारखून मानव समाजासाठी एक जसा मार्ग शोधतो आहे, त्यात हिंसा आणि क्रूरतेचा काहीच मागमूस नसावा. म्हणून ती स्थिती प्राप्त करण्यासाठी है चांगले मानले जाऊ लागले आहे की, पशुंनाही मारले जाऊ नये आणि विशेषतः देवाच्या नावावर तर मुळीच नको. कारण पशूना बळी देण्याआधी माणसांना बळी दिले जात होते. त्यांना थांबविण्यासाठी पशुंची योजना करण्यात आली. आता वेळ आली आहे की, पशुंच्या संरक्षणाच्या संबंधातही विचार केला जावा."_

                _*सध्या बळी देण्याच्या प्रथेत बदल होत आहे, जी कोणत्याही कायद्याशिवाय किंवा सुधार आंदोलनाशिवाय स्वतःच मुस्लिम समाजात हळूहळू जोर धरू लागली आहे. बळी देणारी व्यक्ती पशूचा बळी न देता त्या पशूची बाजारातील जी किंमत आहे, ती रोख स्वरुपात एखाद्या मौलवी, मुल्ला किंवा अरबी पाठशाळेत पाठवून देते. ही प्रथा हळूहळू वाढत चालली आहे.*_

                    _माझे एक मित्र आहेत. चांगल्या संपन्न घरचे आहेत. घरचा कारखाना आहे. त्याने पशूची किंमत रोख स्वरुपात अरबी शाळेत पाठविली. मी त्यांना विचारले, "आपल्या हाताने पशूचा बळी दिल्याने कित्येक पट पुण्य लाभते, असा समज आहे; पण तुम्ही बळी न देता रोख पैसे दान केलेत, याचे कारण काय आहे?" माझ्या या प्रश्नावर त्यांचे उत्तर होते "आता कसला बळी आणि कसले पुण्य? हा तर आता मौलवी, मुल्लांचा रोजगार मिळविण्याचा एक मार्ग मात्र उरला आहे. आपल्याला त्यांची मदत करावयाची आहे. हा फायदा आहे की, ते ऐंशी टक्के गरीब मुसलमानांपासून आमचे रक्षण करतात. जोपर्यंत हा पडदा आहे, तोपर्यंत सर्व आलबेल आहे."_

               _आपल्या मित्राच्या स्पष्टीकरणाने मला हसू आले आणि याच हलक्या- फुलक्या वातावरणात मी विचारले, "तर हे सांगा ना की, हे मुल्ला, मौलवी श्रीमंतांकडून गरिबांना आपला अधिकार मागण्यापासून रोखण्यासाठी कवच आणि ढालीची आवश्यकता, तर त्यावेळी लागते, जेव्हा लढाईच्या मैदानात तलवार किंवा भाला उचलला जातो. गरिबांना तर ते (मौलवी) मैदानापर्यंत येऊसुद्धा देत नाहीत."_

                  _आपल्या मित्राची गोष्ट ऐकून मी परत आपल्या खोलीत परतलो आणि प्रश्नोत्तरांच्या खोल गर्तेत बुडालो, याच परिस्थितीत माझा डोळा लागला. यादरम्यान अचानक मला एक आवाज ऐकू आला,_

               _"या सर्व रसूम (कर शुक्ल) आणि अकायद यांच्याशी मनुष्य बांधील आहे. समाजाच्या संघटनेची आवश्यकता आणि तात्कालीन समस्यानुकुलतेला ध्यानी घेऊन आपल्या पूर्वजांनी हे सर्व ठरविले होते. आता काळ बदलला आहे. समाजाच्या गरजा बदलल्यात आणि या प्रथेची उपयोगिताही तेवढी राहिली नाही. यासाठी पुनर्विचार केल्यानंतर पशूचे रक्त सांडण्याऐवजी रोख पैसे दान केले जावेत व त्या पैशांना इकडे-तिकडे न विखरू देता संघटित स्वरुपात त्यापासून नवीन कारखाने आणि शाळा चालविल्या जाव्यात. असे करण्याने नव्या युगातील नवा समाज निर्माण होईल आणि मुस्लिम समाज प्रगतिपथावर पुढे जाईल. *मला विश्वास वाटतो की, समाजातील बुद्धिजीवी, विचारवंत आपल्या चिंतनाला अंधश्रद्धेच्या जाळ्यातून काढून बौद्धिकतेच्या भक्कम आधारावर उभे करतील आणि हरत-हेने मागासलेल्या गरीब मुस्लिम समाजाला उन्नतीच्या मार्गावर लावतील. हे काही धर्मविरोधी कार्य नाही आणि खरे म्हणजे धर्माचा खरा हेतू माणसाला उन्नत करण्याच्या दिशेने पाऊल उचलण्याचे तर आहे.*_

*_संदर्भ :-_*

_*१) खंड ३, पुस्तक ४ - समग्र अंधश्रध्दा निर्मूलन, 'अंनिवा'तील निवडक लेख, अंधश्रद्धांचा विळखा*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

Sunday, 9 June 2024

अंगात येणं

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_अंगात येणं_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2024/06/blog-post_9.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

                     _"आमची तशी भाची लागते हो! घरची परिस्थिती वाईटच म्हणायची. घरच्यांनी आलं ते स्थळ चांगलं म्हणून सोळावं सरतंय तोच लग्न केलं. सासू भयंकर छळायची म्हणून माहेरी आली, तो नवराही पाठ धरून आला. इथंच स्वतंत्र राहूया, म्हणाला. पण नोकरी घड नाही. भाड्याच्या घरातच राहतात. आताशा काय व्हायला लागलंय की, मंगळवारी देवीच्या देवळात आरती सुरू झाली की, तिच्या अंगात येतं. घुमते, पिंगा घालते, वेगळ्याच आवाजात बोलते. सगळेच म्हणतात, तिच्या अंगात देवीचा संचार होतो म्हणून, पण *मागे शेजारच्या गावात तुमचा कार्यक्रम बघितला होता, तेव्हापासून पटलंय की असलं काही नसतं म्हणून, पण पटवता येत नाही हो सगळ्यांना. म्हणून तुमच्याकडे आलोय." चाळिशीचा नवरा आणि पस्तिशीची बायको, असे दोघे एका रविवारी आमच्याकडे गाऱ्हाणं घेऊन आले होते.*_

                  _देवाच्या दर्शनाचा ध्यास अनेक साधू-संतांनी आजवर घेतला. घरदार, तहान-भूक, थंडी-वारा, ऊन-पाऊस कशाकशाचीही पर्वा न करता तपश्चर्या केली. असं म्हणतात की, यापैकी ज्या मोजक्या लोकांना 'देव' दिसला, तो केवळ काही क्षणांपुरताच. *साधू-संतांना वर्षानुवर्षे दर्शन न देणारे देव, गावोगावी आठवडा-पंधरवड्याला सामान्य माणसांच्या शरीरात शिरतात आणि बोलू लागतात. चारचौघांसारखी वागणारी बाई भजनात दंग होऊन वाद्यांच्या गजरात अचानक घुमू लागते, वेगळं बोलू लागते, आवाज बदलते, पाया पडणाऱ्या बायाबापड्यांच्या प्रश्नांना उत्तर देऊ लागते. या सगळ्यावर आपण सहजपणे विश्वास कसा ठेवतो? साधा विजेचा बल्बसुद्धा 'टेस्ट' करून आणणारी शहाणी व्यवहारी मंडळी 'अंगात येणं' मात्र निमूटपणं स्वीकारतात ? देव व धर्म यावरच्या सर्वांच्या श्रद्धेचा योग्य आदर करायचं ठरवलं, तरीही 'अंगातल्या दैवी संचाराची' डोळसपणे चिकित्सा करणं अशावेळी गरजेचं वाटतं.*_

               _*अंगात येण्याचा पहिला प्रकार म्हणजे निव्वळ ढोंग ! लोकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेऊन, त्यांना लुबाडण्यासाठी अंगात 'आणलं' जातं. प्रश्नांची उत्तरं दिली जातात, उपाय सुचवले जातात.* एकंदर प्रकारात अंगात आ (ण)लेल्या व्यक्तीचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष फायदा असतोच. कारण प्रश्न विचारणारे कमीत कमी एखादा नारळ आणि पाच रुपये तरी ठेवतातच. याशिवाय अंगात आलेला अवसर जी 'फी' आकारतो, ती वेगळीच !_

               _*अंगात येण्याचा दुसरा प्रकार म्हणजे ढोंग नसतं, तर तो असतो सौम्य असा मनाचा आजार.* सुरुवातीला जी गोष्ट सांगितली, तशा कितीतरी अभागिनी अजूनही आसपास दिसतात. या मुलीला काय झालं होतं? कोवळं वय. शरीर आणि मन अजून लग्नासाठी पुरेसं तयार नाही. तशातच लग्न झालं. अपरिचित नाती, सासरचा छळ, भांडणं, नवऱ्यानं मूग गिळून बसणं, काय करावं तिनं? आपलं दुःख कुणाला सांगावं? माहेरी येऊनही काहीच उपयोग झाला नाही. नवरा येऊन संसार सुरू झाला खरा; पण नियमित उत्पन्नाअभावी सततचा असुरक्षितपणा. या सगळ्यामुळे तिच्या मनावरचा ताण अतोनात वाढला._

                 _*माणसाच्या मनाचे दोन भाग असतात. आपल्याला सतत जाणवणारं बाह्यमन आणि सुप्त असणारं अंतर्मन. एखाद्या हिमनगाप्रमाणे एक अष्टमांश प्रकट दिसणारं बाह्यमन, तर सात अष्टमांश न दिसणारं अंतर्मन. साहजिकच बाह्यमनापेक्षा अंतर्मन सातपट मोठं असल्यामुळे अधिक प्रभावी असतं. माणसाच्या आयुष्यातील सुख-दुःखं, आशा-निराशा, असं सगळं त्यात साठवलं जातं; पण हे मोठं असणारं अंतर्मनही सततच्या ताण-तणावांनी व्यापलं गेलं तर...? जरा एखाद्या धरणाचं चित्र समोर आणा. धरण जेव्हा तुडुंब भरतं, तेव्हा पाण्याच्या रेट्यानं ते फुटू नये म्हणून त्यात असलेल्या झडपा उघडून जास्तीचं पाणी पुढे सोडावं लागतं, वाहून जाऊ द्यावं लागतं. तसं केलं नाही, तर धरण फुटेल आणि सगळं उद्ध्वस्त होईल. नेमकं असंच काहीसं ज्याला आपण देवानं किंवा देवीनं अंगात येणं म्हणतो, त्याबाबत घडतं. मनाच्या जाणिवेच्या पलिकडच्या पातळीवर अंतर्मनाच्या झडपा उघडल्या जातात. काही काळ मूळ व्यक्तिमत्त्वाचा विसर पडतो. अशी व्यक्ती मग वेगळीच दिसते. वेगळीच वागते. थोड्या वेळानंतर ती पूर्ववत होते. या काहीशा गूढ वाटणाऱ्या प्रक्रियेमुळे अंतर्मनातील ताण बाहेर टाकले जातात. मनाची ही स्वसंरक्षणाची कृती व्यक्तिमत्त्व संपूर्ण उद्ध्वस्त होण्यापासून वाचवते. ही गोष्ट मनाच्या अबोध पातळीवर नकळतपणे घडत असते.* याची ढोबळपणानं तीन कारणं किंवा पातळ्या सांगता येतील._

१. एक- पारंपरिक मान्यताप्राप्त वर्तन, 

२. दोन-ज्ञानेंद्रिय उद्दीपन आणि स्वसंमोहन आणि 

३. तीन-प्रासंगिक मनोविघटन (सोमॅटोफॉर्म डिसोसिएशन).

*_१) पारंपरिक मान्यताप्राप्त वर्तन_*

                    _*एखाद्या विशिष्ट दिवशी किंवा तिथीला एखाद्या विशिष्ट वेळी व्यक्तीच्या अंगात येतं. यामागे 'सूचना-ग्राहकत्व' हे कारण असतं.* लहानपणापासून मंगळवार-शुक्रवार हे देवीचे वार किंवा अष्टमी-नवमी या देवीच्या तिथी असं समीकरण आपल्या डोक्यात पक्कं झालेलं असतं. *वेळेची किंवा तिथीची जाणीव ही बाह्यमनानं अंतर्मनाला केलेली सूचनाच असते. 'अंगात येऊ शकतं' असा संस्कार झालेला असतो. त्यात गैर काहीच नाही, उलट देवाचा संचार होणं ही अभिमानास्पदच अशी अप्रत्यक्ष पारंपरिक मान्यताही असते. त्यावेळी होणारं 'बेभान' वर्तन हे सर्वमान्य आहे, त्यात अयोग्य काहीच नाही, कोणीही हसणार नाही, अशा खात्रीतून बाह्यमनाचं नियंत्रण सुटतं. नेहमीच्या वागण्यातील बंधनं सैल होतात आणि 'अंगात येतं.'*_

*_२) ज्ञानेंद्रिय उद्दीपन आणि स्वसंमोहन_*

               _नवरात्रात रात्री जागरणाच्या ठिकाणी आणि एरव्हीही यात्रा-उत्सवांच्या ठिकाणी देवीच्या अवतीभोवती रोषणाई केलेली असते. त्या लखलखाटामुळं डोळ्यांचं उद्दीपन होतं. ठेक्यावर म्हटल्या जाणाऱ्या आरत्या भजनांमुळे, घंटांच्या आणि वाद्यांच्या गजरामुळे कानांचं उद्दीपन होतं. धुपाच्या वासामुळं नाकाचं उद्दीपन होतं. *या साऱ्या वातावरणाचा परिणाम म्हणून व्यक्तींच्या संवेदनांना आधी एकतानता आणि नंतर बधिरता प्राप्त होते. हळूहळू या व्यक्ती संमोहन अवस्थेत जातात आणि घुमायला सुरुवात करतात. घागरी फुंकण्यामुळं, फुंकलेल्या घागरीत उच्छवासातून बाहेर पडलेला कार्बन डायऑक्साईड वायू साठतो. घेतलेल्या श्वासाबरोबर तो आपल्या रक्तात मिसळू लागतो आणि मेंदूला मिळणाऱ्या ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं. मेंदूच्या तल्लखपणावर याचा विपरीत परिणाम होऊन बेहोषी वाढण्यास मदत होते.*_

*_३) प्रासंगिक मनोविघटन_*

                   _*अंगात येणाऱ्या व्यक्तीच्या मानसिक आरोग्याच्या दृष्टीनं हा सगळ्यात महत्त्वाचा प्रकार. स्त्री-पुरुष असमानतेवर आधारित समाजव्यवस्थेमुळे, विशेषतः स्त्रियांना अनेक प्रकारच्या मानसिक ताणांना तोंड द्यावं लागतं. यात सासुरवास असतो, लैंगिक अतृप्ती असते, मूल किंवा मुलगा न होणं, अशा गोष्टी असतात. आणि मुख्य म्हणजे स्त्रियांच्या मनात या सर्वांमागे उगाचच अपराधी भावना असते. प्रतिष्ठित, सुशिक्षित, सुखवस्तू घरातील स्त्रियांनाही हे त्रास असतात; अंतर्मनातील हे ताण जेव्हा नियंत्रणाबाहेर जातात, त्यावेळी त्यांचा समाजमान्य रीतीनं निचरा होणं आवश्यक असतं. यासाठीच त्या व्यक्तीच्या बाह्यमनाचं विघटन (डिसोसिएशन) होतं. त्या व्यक्तीचा आवाज बदलू शकतो, चेहऱ्यावरचे हावभाव बदलतात, लोकांना नेहमीपेक्षा कोणी वेगळीच व्यक्ती समोर आहे की काय, असं वाटतं. तिथी-वारांचे संस्कार बघणाऱ्यांवरही असतातच. त्यामुळे त्यांनाही वाटतं की देवीच अंगात आली. एखाद्याला चुकून शंका आली तर बाकीचे मूर्खात काढतील आणि अश्रद्धपणाचा शिक्का बसेल, ही भीती असतेच, शिवाय खरंच देवी असेल तर कशाला कोप ओढवून घ्या, असंही वाटत असतं.*_

                        _*हे सगळं सांगितल्यावरही कुणाला अशी शंका वाटू शकते की, अंगात आल्यावर प्रश्नांची उत्तरं कशी मिळतात? त्यावेळी सर्वसाधारणपणे विचारले जाणारे प्रश्न बहुधा प्रापंचिक असतात. उदाहरणार्थ मुलीचं लग्न कधी जमेल? यावेळी मुलाला मुलगा होईल का? नवऱ्याला बढती मिळेल का किंवा बदली होईल का? यावर उपाय म्हणून पाच मंगळवार करायला सांग, नऊ मंगळवार अखंड दिवा तेवत ठेव, अशी काहीतरी उपासना सांगितली जाते. समजा मुलाऐवजी मुलगी झाली तरी पुढच्या वेळेला कोणी जाब विचारायला येणार नसतं. दोष प्रारब्धाला दिला जातो. देवी कशी खोटी असेल? देवी सर्वज्ञ, सर्वसंचारी, सर्वशक्तिमान आणि कल्याणकारी असते, तर मग या देवीला असले प्रापंचिक प्रश्न विचारण्यापेक्षा काश्मीरपासून मुंबईपर्यंत हैदोस घालणाऱ्या दहशतवाद्यांचं निर्दालन ती कधी करणार, हे का विचारू नये? भारतमातेच्या रक्षणासाठी तरी पाकच्या सैन्याच्या हालचाली कुण्या देवीनं आपणहून का सांगू नयेत? पण असं मात्र घडत नाही. ही सगळी माहिती समजून घेतल्यावर आपल्या लक्षात येईल की, खेड्यातल्या एखाद्या अडाणी बाईच्या अंगात येणं काय आणि एखादी शहरातली सुशिक्षित बाई घागर फुंकत असताना तिच्या अंगात येणं काय; दोन्हीही मानसिक आजारच ! तेव्हा अंगात येणाऱ्या बाईच्या कुटुंबियांनी तिच्या पाया न पडता हे लक्षात घ्यायला हवं की, तिचा कोणत्या तरी कारणामुळं मानसिक कोंडमारा होतोय. महत्त्वाचं म्हणजे याबाबतीत तिला दोषी न ठरवता तिच्याशी संवाद साधून तिची घुसमट जाणून घ्यायला हवी. हे ध्यानात ठेवायला हवं की, हा परिस्थितीतील ताणतणावांशी जुळवून घेता न आल्यामुळे झालेला, बरा होऊ शकणारा सौम्य मानसिक आजार आहे. प्रेमाची, सहानुभूतीची वागणूक हाही त्यावरचा एक उपाय आहे. अशी व्यक्ती नक्की बरी होऊ शकते; पण त्यासाठी तिची परिस्थिती बदलायला हवी, छळ रोखायला हवा, सहानुभूतीनं संवाद साधायला हवा. मानसोपचारतज्ज्ञांची मदतही घ्यायला हवी.*_


_*डॉ. आशुतोष मुळ्ये, रत्नागिरी (ऑक्टोबर २०१२)*_

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

*_संकलन - महेश कांबळे_*

*_दिनांक :- १०/०६/२०२४_*

*_संदर्भ :-_*

_*१) खंड ३, पुस्तक ४ - समग्र अंधश्रध्दा निर्मूलन, अंधश्रद्धांचा विळखा*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...