🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_धम्म-संस्कार म्हणजे काय?_*
*_- भदन्त विमल कित्ती गुणसिरी_*
*_!! ॐ मणी पद्मे हूँ !!_*
https://mikamblemahesh.blogspot.com/2024/06/blog-post_15.html
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
_संस्कार म्हणजे माणसाच्या नैसर्गिक प्रवृत्तीला वळण लावणे, म्हणजेच सुसंस्कृत करणे. (३.५.२-२३)_
_सत्प्रवृत्ती हीच चिरस्थायी चांगुलपणाचे अधिष्ठान आणि हमी आहे. (३.५.२-३१)_
_म्हणून भगवान बुद्धाने चित्ताच्या साधनेला म्हणजेच माणसाच्या वृत्तीला सुसंस्काराने वळण लावण्यास अगदी पहिले स्थान दिले आहे. (२.५.२-३२)_
_-डॉ. बाबासाहेब आंबेडकर, (भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, आवृत्ती १९७०)_
_धम्म-संस्कार म्हणजे काय याची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या ग्रंथात वरील प्रमाणे व्याख्या केलेली आहे. *हे संस्कार माणसाच्या मनात रुजणे म्हणजे त्याचे धम्म- जीवनमार्गावर चालणे होय. तेव्हाच त्याला बौद्ध म्हणतात.* सुसंस्कृत मनाने वागून, बोलून, करून माणसाच्या हातून जे काही निर्माण होते त्याला संस्कृती असे म्हणतात. ही संस्कृती रीती-रिवाज, शिष्टाचार, धर्मविधी, कला-कौशल्य वगैरे प्रकारातून दृश्य स्वरूपात प्रगट होते. अशा प्रकारे संस्कारातून संस्कृती निर्माण होते आणि सांस्कृतीक रीती-रिवाजातून संस्कार घडतात; म्हणजेच माणसाच्या प्रवृत्तीला योग्य ते वळण लागते. अशा प्रकारे संस्कार आणि संस्कृती एकमेकावर अवलंबून असून परस्परात गुंफलेल्या आहेत._
_*बुद्धधम्मातील काही धार्मिक रीती-रिवाज आणि धार्मिक प्रथांच्या मागे ही भूमिका आहे. धम्म-दीक्षा घेणे, भिक्खू- भिक्खूनी दीक्षा घेणे (म्हणजेच प्रवज्जा आणि उपसंपदा दीक्षा घेणे) या दीक्षा घेतांना त्यामागे जी मानसिकता असते, ती संस्कार करणारी, मन घडविणारी मानसिकता असतो. जर मन घडविण्याच्या मानसिकतेतून हे दीक्षा विधी स्वीकारले तरच ते योग्य फळ देतात. जर मनाला वळण लावून घेण्याची मानसिकता नसेल आणि तसे वळण लावून घेण्यासाठी जे शिकायचे ते शिकण्याची सोय नसेल, तर असे धम्म-विधी केवळ देखावा ठरतात आणि अंधश्रद्धेची रूढी निर्माण करतात. म्हणून या विषयाचे नीट आकलन करून घेणे आवश्यक आहे.*_
_*बुद्धधम्मातील सर्वात श्रेष्ठ विधी म्हणजे भिक्खू- भिक्खूनी दीक्षा-विधी होय. परंतु धर्मांतरीत बौद्ध समाजात या धम्म-विधीचे योग्य त्या मानसिकतेतून पालन केले जात नाही, असे दिसून येते. भगवान बुद्धांनी भिक्खू-भिक्खूनी संघ निर्माण केला तोच मुळी धम्माचा सर्वत्र प्रचार-प्रसार करण्यासाठी होय. जगात फक्त भगवान बुद्धांनीच सर्व मानव जातीवर दया करून अत्यंत करूणेने त्यांच्या हितासाठी आणि सुखासाठी आपल्या धम्माचा प्रचार करणाऱ्या सर्वस्वत्यागी प्रचारकांची निर्मिती केली, तो त्यांचा संघ होय. आणि या संघाला त्यांनी स्वतःएवढे आणि आपल्या धम्माएवढे महत्त्व देऊन संघाचे शरणगमन करणे आवश्यक ठरविले. त्यामुळे तथागत बुद्धांचा संघ बुद्ध आणि धम्माएवढा पवित्र मानून त्या संघाच्या सर्व विधी-संस्कारांकडे मोठ्या पवित्र भावनेने पाहिले जाते. संघाच्या पावित्र्याला जोपासले जाते आणि मोठ्या गांभिर्याने त्या विधी-संस्कारांचे सेवन केले जाते. त्यामुळे संघाच्या वेशभूषेला म्हणजेच भिक्खूच्या चीवराला पवित्र मानण्याची परंपरा निर्माण झाली. चीवरदान हा एक अत्यंत श्रद्धेने केला जाणारा धम्मविधी मानला गेला. हे पावित्र्य जोपासणे फार कठीण असते. म्हणून भिक्खूंच्या वर्षावासाच्या समाप्तीनंतर त्यांना जे चीवरदान दिले जाते, त्याला कठीणदान असे म्हटले जाते. त्यामुळे चीवर धारण करण्यासाठी त्या व्यक्तीची मानसिकता पवित्र, गंभीर आणि अज्ञात ज्ञानाची प्राप्ती करण्याच्या ओढीची असावी लागते आणि चीवर धारण केल्यानंतर त्याने धम्मशिकवण आत्मसात करण्यात आणि त्याप्रमाणे जगण्याचा सराव करण्यात आपला संपूर्ण वेळ घालवायचा असतो. त्यामुळे तो समाजाला दुःखमुक्तीच्या मार्गाने नेण्यास किंवा मार्गदर्शन करण्यास सक्षम होत असतो. ही योग्यता भिक्खूला योग्य त्या प्रशिक्षणातून प्राप्त होत असते. भिक्षु जीवनाला जे महत्त्व आणि पावित्र्य आहे, ते त्याच्या योग्यतेमुळे होय.*_
_*बुद्धधम्मात भिक्खू-भिक्खूनी बनण्याची परंपरा आहे, त्याचा एक खास विधी-संस्कार आहे.* ब्राह्मणाप्रमाणे कोणी जन्माने भिक्खू बनत नसतो किंवा जन्मजात वारसाहक्कानेही भिक्खू बनत नसतो. तर *भिक्खू धम्मानुसार केलेल्या आचरणाने म्हणजेच कर्माने घडत असतो. हे कर्म करण्यासाठी जेव्हा कोणी पुढे येतात तेव्हा त्यांना भिक्खू-भिक्खूनीची दीक्षा घ्यावी लागते आणि आपली जडण-घडण करण्यासाठी प्रशिक्षण घ्यावे लागते, राबावे लागते.* या बाबतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या 'भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म' या ग्रंथात फार योग्य प्रकारे मार्गदर्शन केलेले आहे. ते येणे प्रमाणेः_
_*'संघातील घटकांचे श्रामणेर आणि भिक्खू असे दोन वर्ग पाडले जात.' (५.१.२-१६) 'त्रिशरण आणि दसशील ग्रहण केलेला प्रत्येक मुलगा श्रामणेर बने. ' (५.१.२-१८) 'भिक्खू व्हायला दोन अवस्थांतून जावे लागेः पहिली प्रवज्जा होई आणि दुसरी उपसंपदा. उपसंपदा घेतल्यानंतर तो भिक्खू ठरे.' (५.१.२-२४) 'श्रामणेराला कोणत्याही काळी संघ सोडून उपासक बनता येत असे. श्रामणेर हा भिक्खूच्या स्वाधीन असून भिक्खूच्या सेवेत आपला काळ व्यतीत करीत असे. त्याने उपसंपदा घेतलेली नसे.' (५.१.२-२३) 'श्रामणेराला उपाध्यायाने त्याचा परिव्राजक (श्रामणेर) म्हणून स्वीकार केल्यावर त्याच्या सेवेत आणि संरक्षणात राहावे लागे.' (५.१.२-२६) 'हा शिक्षणाचा काळ संपल्यानंतर उपसंपदेसाठी खास बोलाविलेल्या संघ सभेत उपाध्यायाला श्रामणेरावर उपसंपदेचा अनुग्रह करावा अशी संघाला विनंती करावी लागे.' (५.१.२-२७) 'जो भिक्खूपदाचा प्रार्थी तो श्रामणेर त्या पदाला योग्य आहे की नाही याची खात्री संघाला करून घ्यावी लागे. ही खात्री करून घेण्यासाठी श्रामणेराला काही ठराविक प्रश्नांची उत्तरे द्यावी लागत.' (५.१.२-२८) 'जेव्हा संघ उपसंपदेची अनुमती देईल तेव्हाच श्रामणेराला भिक्खूपद मिळे.' (५.१.२-२९) 'भिक्खूनी संघात प्रवेशासंबंधी नियम भिक्खूसंघ प्रवेशाच्या नियमासारखेच असत.' (५.१.२-३०)*_
_*बौद्ध राष्ट्रात अशा प्रकारे भिक्खू किंवा भिक्खूनी बनण्याची परंपरा चालू आहे. तशीच महिनाभर किंवा वर्षावासाच्या काळातील तीन महिने श्रामणेर बनण्याची परंपरासुद्धा आहे. परंतु एकाएकी कोणी असे टेंपररी श्रामणेर बनत नसतात. तर आचार्यांच्या सान्निध्यात राहून गंभीरपणे धम्म जाणण्याची आणि तसे काही आचरण करून पाहाण्याची जिज्ञासा निर्माण झाली तरच लोक अल्प काळासाठी श्रामणेर बनतात. परंतु श्रामणेर बनल्यानंतर तो कालावधी संपेपर्यंत ते विहारातच आचार्याच्या बरोबर राहून सतत धम्म शिकत आणि आचरण करीत राहतात. त्यांना कोठे एकटे फिरण्याचा, एकटे राहण्याचा, विधी-संस्कार करण्याचा, प्रवचन देण्याचा आणि कोणाकडे काही मागण्याचा मुळीच काही अधिकार नसतो आणि लोक कटाक्षाने या शिस्तीचे पालन करतात. थाईलँडमध्ये तर श्रामणेर एकटा राहतांना किंवा भिक्षाटन करतांना दिसला, तर त्याला अटक केली जाते आणि संघाचरणाचा भंग केला म्हणून तुरूंगवासाची सजा ठोठावली जाते.* त्यामुळे धम्म सखोलपणे जाणण्याची आणि त्याप्रमाणे काही आचरण करून पाहण्याची प्रबळ इच्छा निर्माण झाल्याशिवाय कोणीही अल्प काळासाठीसुद्धा श्रामणेर बनत नसतात. अशा प्रकारची तेथे धम्मश्रद्धेची संस्कृती आहे. म्हणून *एखाद्या तरूणाच्या किंवा तरूणीच्या मनात श्रामणेर किंवा श्रामणेरी बनण्याची इच्छा निर्माण झाली, तर त्यांच्या पालकांना फार आनंद होतो. मग ते त्यांच्या श्रामणेर दीक्षेसाठी दानधर्मात मोठ्या प्रमाणात खर्च करतात. श्रामणेर बनणाऱ्यांची कधी कधी तर हत्तीवरून अभिवादनाची मिरवणूक काढतात. पालकांना वाटते की आपला मुलगा किंवा मुलगी आता सर्वश्रेष्ठ जीवनमार्गाला लागले आहेत. पुढे चालून जर ते भिक्खू किंवा भिक्खूनी बनले तर आपल्या जीवनाचे आणि मुलांच्या जीवनाचे सोने झाले असे त्यांना वाटते. म्हणून अल्पकाळासाठी श्रामणेर बनण्यालासुद्धा तेथे प्रचंड महत्त्व असून ते धम्मश्रद्धेचे महान प्रतिक आणि आदर्श मानला जातो.*_
_या विवेचनावरून पहिली गोष्ट स्पष्ट होते ती अशी की *श्रामणेर बनायचे असते ते भिक्खू बनण्यातील पहिले पाऊन टाकण्यासाठी किंवा धम्माचरणाचा भिक्खू जीवनातून अनुभव घेण्यासाठी होय. म्हणजेच आचार्यांच्या संगतीत राहून गंभीर धम्माचरणाचा धडा गिरविण्याचा प्रयत्न करण्यासाठी होय. त्यातून जर भिक्खू जीवन जगण्याची श्रामणेराला उत्कट इच्छा झाली, तर त्याने भिक्खू बनण्याचे पुढील पाऊल उचलायचे. जर तशी इच्छाशक्ती निर्माण झाली नाही तर चीवर त्याग करून पुन्हा गृहस्थ जीवनात परतायचे. अगोदरच काही दिवस श्रामणेर राहायचे आणि मग पुन्हा गृहस्थ उपासक बनायचे असे ठरवून श्रामणेर दीक्षा घ्यायाची नसते, असे केल्याने धम्माची मूळ चेतना आणि पावित्र्य नष्ट होते आणि श्रामणेर बनणे हा एक पोरखेळ होऊन जातो.* श्रामणेर बनण्याच्या मूळ उद्देशाप्रमाणे धम्मभावना वाढत नाही, धम्माच्या अथांगतेची, धम्माच्या दिव्यत्वाची अजिबात कल्पना येत नाही आणि त्यामुळे धम्म श्रद्धा वाढत नाही. धम्मश्रद्धेच्या अभावी माणूस शुष्क बनतो आणि त्याच्या दृष्टीने धम्म निरस बनतो. अशा प्रकारे माणसाचे अतोनात नुकसान होते._
_*आपल्याकडची परिस्थिती अशी आहे की, अधिकांश पालकांना आपला मुलगा भिक्खू बनावा असे मुळीच वाटत नसते. मुला-मुलींनासुद्धा तसे कधी वाटत नसते. म्हणून मिरविण्याच्या किंवा देखाव्याच्या, किंवा प्रसिद्धीच्या भावनेने किंवा धार्मिक कार्यक्रम आहे म्हणून इतरांनी आग्रह केल्यामुळे काही लोक अल्पकाळासाठी श्रामणेर बनत असतात. म्हणून सुरूवातच मुळी खोटेपणातून होत असते. त्यामुळे भारतात मुळची पवित्र परंपरा आजपर्यंत सुरूच झालेली नाही.*_
_*जाता जाता एका कुप्रथेचा येथे उल्लेख करणे आवश्यक वाटते. हल्ली काही भिक्खू आपला मुलगा किंवा मुलगी संघाला दान करण्याचे लोकांना आवाहन करतांना दिसतात. त्यामुळे भावनिक बनून क्वचित कोणी तरी आपले मूल किंवा मुले अशा प्रकारे दान दिल्याच्या बातम्या कानावर आलेल्या आहेत. परंतु मुलांचे दान देण्याची बौद्धपरंपरेत कोणतीही शिकवण नाही. बुद्धाने सजीव प्राण्यांचे दान देण्यास मनाई केलेली आहे. कारण कोंबडी किंवा बोकड कोणाला दान दिला तर त्याची शेवटी हत्त्याच केली जाते. म्हणून त्या प्राण्याच्या हत्त्येस कारणीभूत झाल्याचे पाप लागते. त्याच प्रमाणे धम्म काय आहे आणि तो आपल्यासाठी कसा उपयोगी आहे हे समजल्याशिवाय बौद्ध बनता येत नाही आणि हे समजण्याचे वय झाल्याशिवाय आणि तशी शिकवण मिळून त्या व्यक्तीने बौद्ध बनण्याचा किंवा भिक्खू बनण्याचा स्वतः निर्णय केल्याशिवाय त्याला दीक्षा दिली जात नाही. अशी बौद्ध परंपरा आहे. विनंती केल्याशिवाय धम्मदीक्षा दिली जात नाही. आपल्या लहान किंवा अज्ञानी मुलांनी काही भिक्खू बनण्याचा निश्चय केलेला नसतो आणि विनंतीसुद्धा केलेली नसते. तर केवळ बालमनाप्रमाणे आई-वडील आपल्या भल्यासाठीच काही तरी करायला सांगतात असे समजून ते होय म्हणत असतात. त्यामुळे मुलांचे दान हे त्यांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेणे ठरते. बौद्ध परंपरेत कोणत्याही माणसास सजीवांचे दान देण्याचा किंवा मुलांच्या इच्छा-आकांक्षांची तमा न बाळगता धर्माच्या नावाने त्यांना भावनिक करून त्यांचे दान करण्याचा अधिकार नाही. जर ही प्रथा योग्य समजली तर देवाच्या नावाने देवदासी आणि वाघ्या- मुरळी सोडणेसुद्धा योग्य म्हणावे लागेल. पण तो किती घोर अन्याय आहे, हे सर्वांना माहित आहे आणि त्या धार्मिक प्रथा अगदी कायद्याने मोडून काढण्याचे प्रयत्न केले जात आहेत. मग धर्माच्या नावाने बौद्ध आपली तशाच प्रकारची परंपरा कशी काय निर्माण करू शकतात? ही फक्त श्रीलंकेत हिंदूधर्माच्या प्रभावामुळे शिरलेली अंधश्रद्धा आहे आणि त्या विरूद्ध तेथेसुद्धा फार मोठ्या प्रमाणात प्रबोधन कार्य चालू आहे. श्रीलंकेत बौद्ध लोकातही जातीप्रथा शिरलेली आहे. त्याविरूद्धही तेथे चळवळ चालू आहे. श्रीलंकेतील बुद्धविहारांमध्येसुद्धा हिंदू देव-देवतांची मंदिरे आहेत. या हिंदूधर्माच्या प्रभावातून मुक्त होण्याची चळवळ तेथील बौद्धांमध्ये सध्या चालू आहे. धम्मासाठी मुले दान देण्याची प्रथा हिंदूधर्मातून बुद्धधम्मात घुसलेली आहे. ती बौद्धलोक आता सत्त्य मानीत नाहीत. काही भारतीय भिक्खू राजा अशोकाने आपला मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांना धम्मासाठी दान दिल्याचे सांगून लोकांना भावनिक बनवित असतात. ते चूक आहे, कारण ते सांगतात तो इतिहास खोटा आहे. राजा अशोकाने बुद्धधम्माचा स्वीकार करण्यापूर्वीच महेंद्र आणि संघमित्रा संघात दाखल झालेले होऊन अर्हतपदाला पोहोचलेले होते. अशोकाने दान दिल्यानंतर काही ते क्षणात अर्हत बनले नव्हते. तर त्यांची अर्हतपदाची योग्यता पाहून राजा अशोकाने त्यांची श्रीलंकेत जाण्यासाठी निवड केलेली होती. म्हणून बुद्धधम्माच्या नावाने मुले दान करण्याच्या या कुप्रथेचा भ्रष्टाचार भारतीय बौद्धांमध्ये येऊ देऊ नये.*_
_चीवर धारण करण्यासाठी त्या व्यक्तीची मानसिकता पवित्र, गंभीर आणि अज्ञात ज्ञानाची प्राप्ती करण्याच्या ओढीची असावी लागते या भावनेतून भारतात कोणीच श्रामणेरदीक्षा घेत नसल्यामुळे धम्म ही केवळ औपचारिकतेची गोष्ट असल्याचा मनावर प्रभाव पडतो, म्हणजे तसे इंप्रेशन निर्माण होते. त्यामुळे धम्माचे मूळ महत्त्व कधीच लक्षात येत नाही. *माणूस श्रामणेर दीक्षा घेऊन चीवर परिधान करतो. पंचशीलासारखे दसशील म्हणतो. त्या दसशीलामागील वैराग्य भावनेची त्याला काहीच कल्पना येत नसते. मग लोक पंचांग प्रणाम करतात, भरभरून दान देतात, पंचपक्वानांचे भोजन देतात. भिक्षापात्र घेऊन फक्त भिक्षाटनाचा देखावा करावा लागतो. काही पाली गाथा म्हणता आल्या म्हणजे पुरे. त्यापेक्षा ना काही शिकण्याचा त्रास, ना शिकविण्याचा त्रास. धम्मावर एखादे प्रवचन द्यावेच लागले तर आपल्या पुस्तकी ज्ञानाच्या बळावर काही तरी भेसळ करून सांगायची. नाही तर बुद्धाची चार आर्यसत्त्ये आहेतच सांगायला. दुःख, दुःखाचे कारण, दुःखाचा निरोध आणि त्या निरोधाचा आर्य अष्टांगिक मार्ग. या तीनही संकल्पनांचा त्या श्रामणेराला काही गंध नसतो. आपल्या जीवनातील दुःख पाहाण्याचा आणि अनुभवण्याचा त्याने कधी प्रयत्न केलेला नसतो आणि ज्या आचार्यांच्या संगतीत राहिल्याने हे जाणता येते, शिकता येते, त्यांच्या वाऱ्यालाही उभे राहण्याचा संबंध नसतो. त्यामुळे श्रामणेराला प्रत्यक्षात समाजात मिळालेला मानसन्मान, पाहुणचार, आदरसत्त्कार आणि दानाचे धन पाहून तो तर आनंदी झालेला असतो. त्याला वाटू लागते की श्रामणेर किंवा भिक्खू बनणे किती फायद्याचे आहे. बिनाकष्ट सर्व काही मिळते. म्हणून श्रामणेर किंवा भिक्खू बनून आपला घर प्रपंच चालविण्याऱ्यांची संख्या भारतात वाढलेली आणि संघ-भावना लयास जाऊन भिक्खूसंघ भ्रष्टाचारात बरबटलेला आहे. त्यामुळे समाजाची तर अतोनात हानी झालीच झाली, परंतु धम्म-चळवळीचे महत्त्व आणि पावित्र्य लयास जाऊन ती एक कुचेष्टेची आणि टीका- टिपण्णीची गोष्ट झाली आहे.* बौद्धजनांमध्येसुद्धा संघ बदनाम झाला आहे. हा सर्व दुष्परिणाम शोभेसाठी किंवा मिरविण्यासाठी श्रामणेर बनण्याच्या प्रथेतून घडून आलेला आहे. असे काही घडू नये म्हणून धम्मपदात एका गाथेचा उपदेश केलेला आहे. _
_धम्मं चरे सुचरितं, न तं दुच्चरितं_
_धम्मचारी सुखं सेति, अस्मिं लोके परम्हि च ।।_
_- अर्थात, सुचरित्रवान बनून धम्माचे आचरण करा, दुश्चरित्रवान बनून नव्हे. सुचरित्रवान बनून जो धम्माचे आचरण करतो तो या लोकी आणि पुढेही सुखाने राहतो. *या गाथेतील सुचरित्रवान याचा अर्थ अगोदर सांगितल्याप्रमाणे चीवर धारण करण्यासाठी त्या व्यक्तीची मानसिकता पवित्र, गंभीर आणि अज्ञात ज्ञानाची प्राप्ती करण्याच्या ओढीची असावी लागते असा आहे. म्हणून अल्प काळासाठी चीवर धारण करून मिरविण्यासाठी श्रामणेर बनणे किंवा याच भावनेने कायमचे भिक्खू बनणे हे पूर्णपणे चूक असून धम्म भ्रष्ट करण्याचे पाप आहे.* संत तुकारामांनी म्हटल्याप्रमाणे 'धर्मापोटीच अधर्म' असतो तो अशा प्रकारे होय. म्हणून मिरविण्यासाठी किंवा कमावण्यासाठी असे कार्यक्रम करणारे लोक एक तर ठार अडाणी असतात किंवा स्वार्थ साधणारे धूर्त तरी असतात. साधी कल्पना करा की कोणी असा कार्यक्रम आयोजित करतात ते काही भारतात चीवर शिवत नाहीत किंवा भिक्षापात्रे बनवित नाहीत. तर ते बौद्धदेशांमधूनच मागवितात. *बौद्ध देशातीत बौद्ध लोक ते नेहमीच दान करीत असतात. पण येथे मात्र आयोजक दीक्षा घेणाऱ्याकडून आणि जनतेकडूनही चीवरदानाच्या आणि संघदानाच्या नावाने पैसे उकळीत असतात. श्रामणेरांचा खाण्या-पिण्याचा किंवा प्रवासाचा खर्च तर स्थानिक मंडळे करीत असतात. मग आयोजकांना जरी प्रत्येक उमेदवारापाठी चीवरदान व संघदानाच्या नावाने चार-पांच हजार रूपये मिळाले आणि त्यांनी समजा शंभर श्रामणेर बनवले तर त्यांना चार ते पाच लाख रूपये सहज मिळून जातात. जर असे घडत असेल तर धम्म-दानाच्या नावाने केली जाणारी ही समाजाची लूटमार आहे, असे म्हणावे लागेल.*_
_*डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी फार मोठ्या श्रद्धेने बुद्धधम्माचा स्वीकार केला आणि आपल्या लाखो अनुयायांना त्याच श्रद्धेने दिला. म्हणून धम्मश्रद्धेचे मोल ओळखून ते कायम जोपासण्याचा बौद्धजनांनी प्रयत्न केला पाहिजे. धम्मश्रद्धेचे मातेरे होईल आणि धम्माच्या नावाने भ्रष्टाचार बोकाळेल अशा प्रकारे धम्मसंस्कृतीचे विडंबन करता कामा नये. धम्म-परंपरांचे विडंबन हे पाप आहे, धम्माप्रतीचा तो प्रमाद आहे. त्यातून कोणाचा काही फायदा तर होत नसतोच परंतु उलट लोकांच्या अंधश्रद्धा बळावतात आणि बौद्ध जीवनमार्गावरील त्यांची वाटचाल कायमची ठप्प होते. ते रूढीग्रस्त बनतात आणि 'नामके वास्ते बौद्ध' बनून राहतात आणि आज तरी भारतात अशाच बौद्धांचा भरणा ज्यास्त असल्याचे दिसते आहे. म्हणून प्रत्येक इमानदार बौद्धाने अत्यंत गंभीरपणे विचार करून असे प्रकार थांबविले पाहिजेत, ही विनंती.*_
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_संकलन - महेश कांबळे_*
*_दिनांक :- १७/०६/२०२४_*
*_संदर्भ :-_*
_*१) भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
No comments:
Post a Comment