Tuesday, 28 March 2023

सोपाऱ्यातील शिलालेख


सध्याच्या नालासोपारा - सोपारा परिसरात सम्राट अशोक यांच्या धर्माज्ञा असलेले दोन शिलालेख सापडले आहेत. सम्राट अशोकाच्या शाही आज्ञा आणि त्याच्या अन्य आलेखांचे बृहद शिलालेख, लघु शिलालेख, विशाल स्तंभालेख, लघु स्तंभालेख आणि गुंफा शिलालेख असे पाच प्रकारचे शिलालेख आहेत. सोपारा परिसरातील हे दोन्ही शिलालेख सध्या प्रिन्स ऑफ वेल्स वस्तू संग्रहालय मुंबई येथे आहेत. त्यापैकी एक १८८२ साली पंडित भगवानलाल इंद्रजी यांना सोपाऱ्याच्या पूर्वेस असलेल्या भातेला गावातील तलावाजवळ सापडला. तर दुसरा शिलालेख मुंबईच्या एशियाटिक सोसायटीचे ग्रंथपाल एन ए गोरे यांना १९५६ साली सोपाऱ्याजवळील भुईगाव येथून शोधून काढला. 

सोपारा येथील पहिल्या शिलालेखात सम्राट अशोक यांनी धर्मयात्रा करण्यास सुरू केल्याचा उल्लेख केला आहे. त्याच परीसरातील दुसऱ्या शिलालेखात सम्राट अशोकाचे म्हणणे आहे. लोक अनेक मंगल कार्य करतात तसेच अनेक प्रकारच्या विधी करतात त्यामुळे कोणतीही फलप्राप्ती होत नाही. पण ज्यामुळे फलप्राप्ती होते तो म्हणजे धर्ममंगल विधी होय. यात नोकरांशी चांगले वर्तन, गुरुजनांबद्दल आदर, प्राण्यांची हिंसा न करणे. ब्राह्मण व भिक्खूंना दान करणे म्हणजेच धर्ममंगल होय. अशा अर्थाचे धर्मोपदेश या शिलालेखात कोरलेले आहेत. हा दुसरा शिलालेख खालील प्रमाणे :- 

"देवानंपिये पियदसि लाजा आहा। जने उचाबुचं मंगल कलेति आबाधसि आवाहसी विवाहसि पजोपदाने यावाससि एताये अंनाये चा एदिसाये जने बहू मंगल कलेति । हेतु चु अबक अनियो बहूचा बहुविध चा खुद चा निलथिया चा मंगल कलंति से । कटवि चेव खो मंगले। अपफले चुखो एसे। इयं चु खो महाफले ये धर्ममंगले। हेता इथं दासभटकसि सम्पापटिपाति गुलुना अपचिति पानानं संयमे समनबंभनान दाने एसे अंनेचा हेडिसे। धंममंगले नामा। से वतविये पितिना पि पुतेन पि भातिना पि सुवामिकेन पि मित संधुतेना अव पटिवेसियेना पि इयं साधु इयं साधु इयं कटविये मगले आवतसा अथसा निवुतिसा इमं कछामि ति । एहि इतले मगले संसयिक्ये से। सियावतं अठनिवटेया सियापुनानो। हिद लोकिके चे वसे । इयं पुना धममगले अकालिक्ये हंचे पुन तं अठं नो निटेति हिद अठं पलत अनंत पुना पवसति। हंचे पुन तं अठं निवतेति हिंदा ततो उभयेसं लथे होति हिदचा से अठे पलत चा अनंतं पुना पसवति तेना धंम मगलेना"

मूळ पाली शिलालेखाचे भाषांतर -

देवानांप्रिय प्रियदर्शी राजाचे म्हणणे असे आहे की, जनता अनेक प्रकारचे मंगलकार्य करते. आजारपणात, लग्नकार्यात, विविध निमंत्रणात, पुत्रजन्माचे वेळी, बाहेर जातेवेळी व अशाच विविध प्रसंगी लोक नानाप्रकारचे विधि करतात. विविध विधि करावेत याबद्दल वाद नाही. परंतु अशाप्रकारच्या विधिपासून थोडेसे फळ मिळते. ज्या विधीपासून पुष्कळ फळ प्राप्त होते तो विधि म्हणजे धर्ममंगल होय. कारण यात दास व नोकर यांचेशी योग्य वर्तन करणे याचाही समावेश आहे. गुरुजनांबद्दल आदर व पूजा केली जाते. प्राणिमात्रासंबंधी संयम, अहिंसा पाळली जाते. ब्राह्मण व भिक्षुना दानधर्म केला जातो. ह्या पुण्यकारक बाबींचा धर्ममंगल कार्यात समावेश होतो. ह्या व अशा प्रकारच्या बाबी म्हणजे धर्ममंगल. 


अशोकाचे शिलालेख हे अशोकाच्या कारकिर्दीच्या इतिहासाची अतिशय महत्त्वाची अशी साधने आहेत.ज्या ज्या ठिकाणी हे आलेख सापडले त्यावरून मौर्य साम्राज्याच्या सीमा निश्चित करणे शक्य होते.अशोकाने बौद्ध धर्माचा स्वीकार केल्याचा पुरावा यामधून मिळतो. बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी अशोकाने केलेल्या कामगिरीचे वर्णन यातून मिळते. बौद्ध धर्माची दीक्षा घेतली असली तरी, अशोक कर्मठ नव्हता तसेच आपल्या प्रजाजनांवर बौद्ध धर्म सक्तीने लादण्याचा अशोकाने कधीच प्रयत्न केला नसल्याचेही या आलेखांतून स्पष्ट होते. परदेशात बौद्ध धर्म आणि भारतीय संस्कृतीचा प्रसार करण्यासाठी अशोकाने बौद्ध भिक्षूंना पाठवल्याचा लेखी पुरावा या शिलालेखांतून मिळतो.

९ 


सोपारादीप, अशोकाचे शिलालेख

सम्राट अशोक आणि त्याचे शिलालेख

सोपारा बौद्ध संस्कृतीचे केंद्र

Saturday, 25 March 2023

मैत्री भावनेचे फळ

 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_।। मैत्री भावनेचे फळ ।।_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

        _दस पारमितांपैकी *"मैत्री पारमिता"* अतिशय महत्वपूर्ण पारमिता आहे. *"मेत्ता" या पालि शब्दाला समानार्थी मराठी शब्द मैत्री आहे.* मेत्ता म्हणजे अघाद सदिच्छा भावना. मेत्ता भावना कुल,गोत्र, जात धर्म,वंश वर्ण,श्रीमंति, सौंदर्य, सत्ता, शत्रुत्व असा भेदभाव करावयास शिकवत नाही. मेत्ता भावना केवळ मनुष्यप्राण्याकरिता सिमित नसते. मेत्ता भवना सर्व लहान, मोठ्या, दृश्य, अदृश्य, पाळीव, हिंस्त्र, पृथ्वीवरील, भूमिगत, अन्तरिक्षातील ,जीवसृष्टिमधील प्राण्यांविषयी असू शकते._

               _*आपल्या विरोधात  कटकारस्थाने रचणारा "देवदत्त" याच्या बाबतीत समसमान "मैत्री भावना" बुद्धाने जोपासलि. ते सुडबुद्धिने वागणारे, विघ्नसंतोषी नव्हते. बुद्ध हे समस्त मानव जातीचे नैतिक शास्ता आहेत. बुद्धांच्या अन्तःकरणात सर्व मनुष्य तथा प्राण्यांबाबत समान "मैत्री भाव" होता.*_

        _इतर कोणत्याही सद्गुणांपेक्षा मैत्री ही शांतता, समजूतदारपणा आणि परिपक्वता लोकांमध्ये वाढविण्यास प्रेरणादायी ठरते. ज्या युगात वैर, द्वेष, अशांतता, हिंसाचार यांचे थैमान लोकांमध्ये माजले आहे त्या युगात मैत्री खरोखरी दूर्मिळ आहे. अज्ञानामुळे आपण विरोधी किंवा स्पर्धात्मक धोरण स्वीकारतो. वैयक्तिक आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा हे खरे आहे की, आपण प्रकटपणे परोपकाराच्या बाता मारतो परंतू प्रत्यक्षात वागताना मात्र प्राण्यांसारखेच वागतो. परिस्थितीनुसार गुरगुरतो, चावतो, भितीमुळे लपतो किंवा चापलूसी करतो. मानवद्वेष्टा म्हणून घेण्याचा धोका पत्करून असे म्हणावेसे वाटते की, उच्चभ्रू वर्गात आणि सर्वसाधारण लोकात अशीच माणसे जास्त असतात._

_*करणिमेय सुत्तात* खालील गाथा आली आहे :-_

_*तिट्ठं चरं निसिन्नौवा सयानो वा यावतस्स विगतमिद्धो ।*_

_*एतं सतिं अधिठ्ठेय्य, ब्रह्ममेत्तं विहारं इधमाहु।।*_

       _अर्थात उभे असताना, चालताना, बसले असता, अथवा अंथरूणात जोपर्यंत निद्रा आली नाही तोपर्यंत ही मैत्रीभावनेची स्मृति कायम ठेवावी. हिलाच इहलोकी सर्वश्रेष्ठ मैत्रीजीवन असे म्हणतात._

         _*भगवंत म्हणतात- 'हे भिक्षूंनो, चित्ताला विमुक्त करणाऱ्या मैत्री भावनेनुसार आचरण करीत असता तिचे चिंतन करीत राहिल्याने, तिचा सतत अभ्यास करीत राहिल्याने, आपल्या मनात तिचा विस्तार होऊ दिल्याने, तिलाच मुख्य आधार मानल्याने, तिचे अनुष्ठान केल्याने, तिला योग्यरीतीने आत्मसात केल्याने आणि तिच्या भावनेत पूर्णतः रममाण झाल्याने अकरा प्रकारचे फळ प्राप्त होऊ शकते. ते असे :-*_

_*१) सुखाने झोप येते*_

_*२) उत्साहपूर्वक जाग येते*_ 

*_३) वाईट स्वप्न पडत नाही_*

_*४) इतर मनुष्यांशी मैत्री जडते*_ 

_*५) अमनुष्यांशीही मैत्री घडून येते*_

_*६) देवता त्यांचे रक्षण करतात*_

_*७) अग्नी, विष किंवा हत्यामुळे त्याला कधीच हानी पोचत नाही*_ 

_*८) तात्काळ चित्त स्थिर होऊन समाधी लागते*_

_*९) त्याला नेहमी प्रसन्नता लाभते*_ 

_*१०) न घाबरता प्रसन्नतापूर्वक मृत्यू पावतो आणि*_

*_११) तो अर्हतपदापर्यंत पोचू शकला नाही, तरी तो निश्चितच ब्रह्मलोकात जन्म ग्रहण करतो._*

         _कोणी एखादा लढवैय्या सैनिक अभेद्य जाळीदार कवच अंगात घालून रणमैदानात उतरतो तेव्हा त्याच्यावर कितीही बाण मारले तरी ते सर्व कवचाला लागून खाली पडतात. त्यामुळे त्या सैनिकाचे काही एक बिघडत नाही. तेव्हा हा गुण त्या सैनिकाचा समजला जाणार नाही, तर हा गुण त्याने अभेव कवचाच होय. *त्याचप्रमाणे वरील गुण त्या व्यक्तीचे नसून मैत्रीभावनेचे आहेत. ज्यावेळी कोणी मनुष्य मैत्रीभावनेत रमून गेलेला असतो, त्यावेळी त्याचे अग्नी, विष किंवा तीक्ष्ण हत्यारसुद्धा काही एक बिघडवू शकत नाहीत. आणि दृष्ट विचाराने कोणी एखादा त्याच्यावर चाल करून आलाच तर त्या मैत्रीभावनेच्या चिंतनात मग्न असलेल्या व्यक्तीकडे पाहण्याची हिंमतसुद्धा होणे शक्य नाही, तर त्याचे काही बरे वाईट करणे तर दूरच राहिले. हे गुण व्यक्तीचे नसून त्या मैत्री भावनेचे होत, असे समजले पाहिजे."*_

          *_कोणी एक मनुष्य आपल्या हातात धरलेली जादूची कांडी घेतो. ती कांडी हातात घेता क्षणीच तो गायब होतो. त्यामुळे तो सामान्य माणसाच्या दृष्टीस पडत नाही. तेव्हा हा गुण त्या व्यक्तीचा नसून या मंथरलेल्या कांडीचाच समजला जाईल. याप्रमाणेच वरील गुण त्या व्यक्तीचे नसून मैत्री भावनेचे होत असे समजावे._*

        _जेव्हा व्यक्ति 'जे जसं आहे तसं' पाहायचं शिकते आणि आपल्या संपर्कात येणाऱ्यांना समजायचा प्रयत्न करते तेव्हा ती त्याच्याशी मैत्री करू लागते. विरोध करणे किंवा स्पर्धा करणे सोडून मदत करायला लागते. त्यांचा द्वेषही करीत नाही अगर त्यांना कंटाळतही नाही. होईल तेवढी मदत करते अन्यथा त्यांचे मंगल होवो अशी सदिच्छा व्यक्त करते._

       _*बौद्ध साहित्यात / त्रिपिटकातील "धम्मपदं" मध्ये एक पद आहे. श्रीलंकेतील लोकांच्या जीवनावर आणि विचारांवर अत्यंत खोल ठसा जर कोणी उमटविला असेल तर ती "मेत्ता भावना" होय.*_ 

_*न हि वेरेन वेरानि सम्मन्तिध कुदाचनं । अवेरेन च सम्मन्ति एस धम्मो सनन्तनो ।।*_

       _निर्भयता, समन्वय, मित्रत्वाचे संबंध, मैत्रीची वृद्धी ज्यामुळे मानव उच्च अवस्थांप्रत जाऊ शकतो हे वैशिष्टय आहे बुद्ध शिकवणीचे. विरळ पण मौल्यवान अशी ही मैत्री एक दुसऱ्याला समजून घेते आणि मदतीला तत्पर असते. *मेत्ता भावनेचा प्राणच जणू उपरोक्त गाथेत आलेला आहे.*_

          _या पृथ्वीतलावरी आजवरचा महान सम्राट अशोक कलिंग युद्धानंतर  बौद्ध धम्माच्या अधिक समीप आला तेव्हा तो बुद्धमय झाला......मैत्रिमय झाला. एक राजा - सम्राट युद्ध केल्याशिवाय राहू शकत नाही त्यावेळी ह्या जंबुद्विपाचा हा सम्राट युद्धबंदीचा निर्णय घेतो....संपूर्ण प्रजेस आपल्या मुलांप्रमाणे प्रेम करतो....मुलांवरच नाहीतर पशु-पक्षांवर ही अमर्याद मैत्रीची भावना व्यक्त करतो हे त्याच्या शिलालेखावरून आपल्याला ज्ञात होते._

*मेत्ता भावनेचे एक उदाहरण जयमंगल अष्टगाथेतील एक पदात आलेले आहे :-*

*_नालागिरि गजवरं अतिमत्तभूतं,_*

*_दावग्गिचक्कमसनीव सुदारूणन्तं।_*

*_मेत्तम्बुसेक विधिना जितवा मुनिन्दो,_*

*_तं तेजसा भवुत ते जयमंगलानि।।_*

              *_ज्या मुनींद्राने, दावाग्नीचक्र आणि विजेप्रमाणे अत्यंत भयानक आणि मदोन्मत अशा नालागीरी हत्तीला आपल्या मैत्री अभिषेकाने जिंकले, त्या भगवान बुद्धाच्या प्रतापाने तुमचे कल्याण होवो..._*

         _त्रिपिटकात मैत्री कशी असावी याबद्दल सारिपूत्त आणि मोग्गल्लान या दोन घनिष्ट मित्रांची कथा आली आहे. *या द्वयीचा भगवान बुद्ध किती सन्मान, आदर करायचे ते सच्च विभंग सुत्तावरून स्पष्ट होते. (मज्झिमनिकाय) बुद्ध म्हणतात-* "भिक्खूंनो, सारिपुत्त आणि मोग्गल्लान यांचेशी सौख्य बाळगा, त्यांचा कित्ता गिरवा कारण ते समंजस आणि आपल्या धम्मबंधुंसाठी त्यांच्या धम्मजीवनात पाठिराखे आहेत. सारिपुत्त आईसारखे तर मोग्गल्लान सेवा करणाऱ्या दाईसारखे आहेत. सारिपुत्त तुम्हाला निब्बाणाकडे जाणाऱ्या प्रवाहात सोडून देण्यास समर्थ आहेत तर मोग्गल्लान तुमच्यातील अत्युच्च आदर्शाचे दर्शन करून देण्यास सक्षम आहेत. चार आर्यसत्यांचे दर्शन, आकलन, मिमांसा स्पष्ट करून देण्यास सारिपुत्ताचा हातखंड आहे."_

       _*चार ब्रह्मविहारांपैकी एक ब्रह्म विहार म्हणजे मेत्ता / मैत्री.* हीच मैत्री भावना तथागतांचा आदर्श घेऊन, सम्राट अशोक यांच्या पावलावर पाऊल टाकून आपण ही सर्व ह्या चराचरात विहार करीत असलेल्या सर्व प्राणीमात्रांबद्दल, मित्रांबद्दल आपल्या अपत्यांसाठी, आपल्या जोडीदारासाठी, आकाशात-जमिनीवर-पाण्यामध्ये सर्व ठिकाणच्या जीवजंतुंसाठी मङ्गल मैत्री करूया आणि आपले जीवन एक एक पाऊल टाकून निब्बान अवस्था गाठण्यासाठी प्रयत्न करूया._

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_महेश कांबळे_*

*_दिनांक :- २५/०३/२०२३

*_संदर्भ :-_*

_*१) करणियमेत्त सुत्त*_ 

_*२) धम्मपद*_ 

_*३) मिलिंद प्रश्न*_

_*४) अंगुत्तर निकाय*_

*_५) सच्च विभंग सुत्त (मज्झिमनिकाय)*_

*_६) जयमङ्गल अष्टगाथा_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2023/03/blog-post_25.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

Tuesday, 21 March 2023

बुद्धावशेषांचे महत्त्व

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_।।  बुद्धावशेषांचे महत्त्व ।।_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

 *_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

          _भगवान बुद्धांचे अवशेष थायलंड या देशातून भारतीय लोकांना त्यांचे दर्शन व्हावे, त्यांनी ही त्यास वंदन करावे या उदात्त हेतूने ते अवशेष भारतात आणले गेले होते. मनुष्यजातीच्या उत्थानाकरिता ज्यांनी अत्यंत तळमळीने प्रयत्न केले, अपूर्व त्याग केला आणि मानव जातीला सुख-समाधान मिळवून दिले अशा राष्ट्रीय आणि समाज पुरुषांचे ज्या उत्स्फूर्ततेने पुष्पमाला, धूप दिपांनी पूजिले जाते, गौरविले जाते त्याचप्रमाणे देव-मानवांचे शास्ता, मार्गदर्शक सम्यक सम्बुद्धाला सर्व जगात गौरविले जाते, वंदिले जाते._

_*बुद्धांच्या अवशेषांचे पूजन धम्मानुकूल आहे काय?*_ 

         _*भगवान बुद्धांच्या अवशेषांना दिला जाणारा सन्मान, आदर, पूजा हे बुद्ध शिकवणीच्या सुसंगत आहेत काय? असा प्रश्न पडू शकतो. प्रत्यक्ष बुद्धांनी महापरिनिब्बाण सुत्तात चार प्रकारच्या मानवांना चैत्य किंवा स्तूपाचा सन्मान मिळतो असे सांगितले आहे. तथागत, अर्हत सम्मासम्बुद्ध आणि पच्चेक बुद्ध.*_

        _*अर्हत महेन्द्र थेरो यांनी त्यांच्या नेहमीच्या संयत आणि शीतल वाणीने राजा देवानामपिय तिस्स याला बुद्ध धातुवर चैत्य निर्मितीकरिता सुचविले तेव्हा "थूपाराम" या विशाल चैत्याची निर्मिती श्रीलंकेतील अनुराधपूर येथे बुद्धधातूंवर करण्यात आली.* प्रत्यक्ष बुद्धांचाच येथे निवास आहे अशी श्रीलंकेतील लोकांची भावना आहे. श्रीलंकेत किंवा जगाच्या कोणत्याही भागात जेथे जेथे बुद्ध धम्म गेला आहे त्या त्या भागातील बुद्धानुयायी भगवान बुद्धांच्या शारीरिक अवशेषांना अतिशय पवित्र मानतात आणि त्या प्रति सर्वोच्च आदरभाव, कृतज्ञता व्यक्त करतात._

          _*"सुमंगल विलासिनी"* या ग्रंथात असे नमूद आहे की, जेव्हा एखादा धार्मिक माणूस असा म्हणतो की चला, चैत्याची किंवा बोधिवृक्षाची पूजा करू तेव्हा हे त्याचे *"मेता वाची कम्म"* ठरते आणि जेव्हा ती व्यक्ती एखाद्या चैत्याची स्तूपाची यात्रा करते तेव्हा हे त्याचे *"मेत्ता काय कम्म"* ठरते._

*_बुद्धावशेषांची पूजा करण्याचा उद्देश_*

          _गैर बौद्ध आणि कधी कधी बौद्ध व्यक्तिकडून बुद्धमूर्तिची, बोधिवृक्षाची, चैत्याची. स्तूपाची पूजा अर्चा यावर टिका केली जाते. प्रथमतः हे समजून घेतले पाहिजे की, बौद्ध व्यक्ति इतर धर्मियांप्रमाणे लौकिक गोष्टींच्या प्राप्ती करीता तसे करीत नाहीत._

        _टिकाकारांनी केलेली टिका योग्य अथवा अयोग्य हे तपासून पाहिले पाहिजे. *भगवान बुद्धांनी संबोधि प्राप्ती करीता प्राणांतिक प्रयत्न केलेत, अतुलनिय त्याग केला. प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि संबोधि प्राप्तीनंतर ते ज्ञान मुक्त हस्ते वाटले. बहुजनांचे अनंत कल्याण केले. मानवाला दुःखमुक्त करण्याचा मध्यम मार्ग सांगितला. ह्या सर्व गोष्टींची जाण ठेवून बौद्ध लोक आपल्या आदर्शाप्रती आणि त्यांनी वापरलेल्या वस्तूंप्रति आदरभाव आणि सन्मान व्यक्त करतात त्यातून त्यांना अपार आनंद मिळतो. सुखसमाधान लाभते.*_

*_बुद्धावशेष हे एक ध्यानाचे आलंबन_*

        _बाह्य पूजेपेक्षा जास्त महत्त्वाचे व अधिक सखोल अनुभूति देणारे आलंबन म्हणजे भगवान बुद्धाचे पवित्र अवशेष होत. बुद्ध, धम्म आणि संघाच्या अतुलनिय आणि अत्युच्य गुणधर्माची अनुभूति देणारे हे आलंबन होय. पवित्र बुद्धावशेष ज्या चैत्यात किंवा स्तूपात ठेवले आहेत असे चैत्य / स्तूप उदात्त प्रकारचे आलंबन होय. *बुद्धावशेष है बुद्धांचे प्रतिनिधित्व करतात, सिद्धार्थ नावाच्या व्यक्तीचे नव्हे.* निर्वाणाचे ते साकार रूप होय. आणि निर्वाण हे प्रत्येक बौद्धाचे अंतिम लक्ष्य आहे. बुद्धावशेषांवर ध्यान करून बौद्ध व्यक्ति निर्वाणाची प्रेरणा मिळवू शकतात._

         _भगवान बुद्धांच्या अवशेषांचे बौद्ध धम्मात काय महत्त्व आहे याची चर्चा करणे या प्रसंगी उचित ठरेल. *महापरिनिब्बान सुत्तात बुद्ध म्हणतात - "आनंदा, या प्रमाणे बुद्धावशेषांची व्यवस्था करावी. त्या अवशेषांवर स्तूप बांधावे. पुष्प, धूप, दिप अर्पण करावे. मनःपूर्वक वंदन करावे. त्यांच्या सान्निध्यात मन स्थिर व शांत ठेवून बसावे. अशा लोकांना प्रसन्नता प्राप्त होईल आणि त्यांची उन्नति होईल*_

       _भगवान बुद्धांच्या आशादायी व उपयुक्त वाणीने निःसंशयपणे अनेक धार्मिक राजेरजवाड्यांना विशालकाय स्तूप बांधण्यास प्रेरित केले. तथागतांच्या महापरिनिर्वाणानंतर अनेक चढ उतार आले. शांती सुखाचे, समाधानाचे तसेच उद्वेगाचे, खिन्नतेचे, निराशेचे दुःखाचे दिवस आले आणि गेले परंतू या विशालकाय स्तूपांनी, जे प्रत्यक्ष बुद्धाचे रूपकात्मक दर्शन आहे, भारतातील तसेच साऱ्या जगातील बौद्ध अनुयायांना आकर्षित केले आहे. त्यांना सुख-समाधान आणि पवित्र भावनांच्या उच्च शिखरावर विराजमान केले आहे._

_*आदरांजलीसाठी तीन स्मारके*_

      _भगवान बुद्धांच्या पश्चात बौद्ध जगत तीन प्रकारच्या चैत्यांची पूजा करते. *आनंदाच्या एका प्रश्नाच्या उत्तरादाखल भगवान बुद्धाने तीन प्रकारच्या चैत्यांचा उल्लेख केला -*_ 

*_१) बुद्धाचे शारीरिक अवशेष_*

*_२) पारिभोगीका (भगवान बुद्धाने) वापरलेल्या वस्तू_* 

*_३) उद्देसिका (कलिंगबोधि जातक)_*

*बुद्धावशेष*

          _*दीघ निकायातील महापरिब्बाण सुत्तात* असा उल्लेख आहे की, भगवान बुद्धाच्या अंत्यसंस्कारानंतर एका स्वर्णपात्रात बुद्धावशेष गोळा करून सन्मानाने, अत्यंत आदरपूर्वक कुसीनारा येथे सात दिवस ठेवले. त्यानंतर त्याचे आठ भागात विभाजन करून आठ विभिन्न राज्यात पाठविले. त्यावर भव्य स्तूप उभारण्यात आले. सम्राट अशोकाने या स्तूपांचे उत्खनन करविले आणि त्यात सापडलेल्या बुद्धावशेषांवर चौऱ्यांशी हजार स्तूपांची निर्मिती केली._

_*धम्माचरण करणे हिच बुद्धांना सर्वोच्च श्रद्धांजली*_

         _*महापरिनिब्बाण सुत्तात* सांगितले आहे कि, धर्माचे बाह्य ढोंग, दिखावा करण्याला बौद्ध धम्मात मान्यता नाही. हे स्पष्टपणे लक्षात घेतले पाहिजे, आत्यंतिक पूजापाठ कर्मकांड किंवा आत्यंतिक तार्किकता यात अडकून न पडता तथागतांच्या मध्यम मार्गाच्या शिकवणीचा अवलंब करावा. *तथागतांच्या उपदेशानुसार प्रामाणिकपणे धम्माचरण करत जगणे ही तथागतांना सर्वात मोठी श्रद्धांजली होय.*_

*_चैत्य पूजेचे महत्त्व_*

          _बुद्धावशेष ज्या चैत्यात, स्तूपात ठेवले आहेत अशा चैत्याची किंवा स्तूपाची पूजा करणे, फूल-हार अर्पण करणे, दीप प्रज्वलीत करणे हे निव्वळ अर्थहीन कर्मकांड आहे काय? अबौद्ध व्यक्तीला तसे वाटू शकते. पण ज्या व्यक्तीला बुद्धांची शिकवण माहीत आहे आणि हे कर्मकांड जाणिवपूर्वक केल्या गेले तर त्याचे किती महत्त्व आहे हे समजल्यावर कोणीही हे कर्मकांड निरर्थक आहे असे म्हणणार नाही. *जेव्हा कोणी एक बौद्ध व्यक्ती बुद्धरूपासमोर फुले अर्पितो, दिप प्रज्वलित करतो आणि क्षणभर शांत राहातो त्यावेळी तो काही प्रार्थना करीत नसतो, काही मागत नसतो. बुद्धाच्या लोकोत्तर गुणांचे स्मरण करून ते आचरणात आणण्याविषयी चिंतन करीत असतो.* वाहीलेली फुले कोमेजतात, प्रज्वलित केलेला दिप विझतो यावरून अनित्यतेचा बोध होतो. *बुद्धरूप ध्यान आणि एकाग्रता प्राप्त होण्यास साहाय्यभूत होते. बुद्धगुणांचे स्मरण प्रेरणा देते ज्यांना ही साधी गोष्ट कळत नाही ते घाईगर्दीने ही मूर्तिपूजा होय असे म्हणून मोकळे होतात. हा सत्याचा विपर्यास होय.*_

          _भगवान बुद्धांनी संपूर्ण दुक्खमुक्तीचा जो मार्ग सांगितला त्यात दान, शील, भावना ही अंतर्भूत आहेत. या मार्गाच्या आचरणाने परिपूर्ततेने त्रिदोषांचे (लोभ, द्वेष, मोह) यांचे समुळ उच्चाटन होण्यास मदत होते. मनाचे हे तीन मळ माणसाला सुखापासून आणि विमुक्ती पासून रोखून ठेवतात. बुद्धमूर्तीसमोर फुले अर्पण करणाऱ्या व्यक्तिच्या मनात दान, शील, भावना या असतात._

          _*आता हे तीन गुण (दान, शील, भावना) त्रिदोषांचे कसे शमन करतात हे पाहू या. "पुष्प" हे निसर्गाच्या परिपूर्णतेचा कळस होय. पुष्प मुलतः सुंदर असते. त्याचा मनोहारी रंग दृष्टीला सुखावतो. त्याचा कोमल स्पर्श त्वचेला सुखद वाटतो. त्याचा सुगंध घाणेंद्रियाला प्रिय वाटतो. पुष्पा बद्दल मनात विचार उठताक्षणी आनंद होतो. अशी सुंदर, सुखद वस्तु बुद्धावशेषा समोर एक व्यक्ती ठेवतो हे निश्चितच 'दान' होय. आणि त्या क्षणापुरते तरी त्या व्यक्तिचे मन लोभापासून दूर झालेले असते. ही फुले जेव्हा ही व्यक्ती श्रद्धेने अर्पण करते तेव्हा स्वाभाविकच ही व्यक्ती वाचेने आणि शरीराने अनुशासित झालेली असते. 'शील' त्याच्या मनात उपस्थित असते. त्यावेळी तो द्वेषापासून मुक्त असतो. जेव्ही ही व्यक्ति चिंतन करते की, हे पुष्प यदा न कदा असेच टवटवीत राहणार नाही, ते कालांतराने कोमेजणारच, नष्ट होणारच त्याचप्रमाणे सृष्टीच्या नियमानुसार माझे शरीर सुद्धा कालपरत्वे नष्ट होणार आणि येथे अनित्यता दृष्टीगोचर होते. फुलाचे कोमेजणे, शरीराचे नष्ट होणे याचा कर्ता करविता कोणी नाही, आत्मा नाही (अनत्ता) ही भावना होय. अतः पुष्प हे एखाद्या खुंटीप्रमाणे होत की, ज्यावर आपण आपले प्रेरक विचार टांगून ठेवू शकतो. मन हे कधीच विश्रांती घेत नसते, ते साध्या सोप्या विचारांचे लोकोत्तर दृष्टीमध्ये परिवर्तन करते.*_

        _एखादी समंजस व्यक्ती आपल्या दिवंगत अथवा जीवंत माता-पित्याविषयी कृतज्ञता लपवू शकेल काय? शिक्षकाने, आचार्याने केलेल्या उपकारांशी कृतज्ञ होवू शकेल काय? ज्या आचार्याने आपले आयुष्य सन्मार्गावर आरूढ करून दिले अशा आचार्यांप्रति आदरभाव प्रकट करण्याचे थांबवेल काय? आचार्यांची तशी 'योग्यता' असेल तरच त्या आचार्यांविषयी पूज्य भाव प्रकट होईलच. *स्वतः बुद्धांनी महामंगलसुत्तात "पुजा च पुजनियानं" अर्थात पूजनिय लोकांची पूजा करावी असे म्हटले आहे.* ज्यांच्याप्रति सर्वोच्च सन्मान प्रकट करावा असे भगवान बुद्ध नाहीत काय? त्या योग्यतेचे नाहीत काय? म्हणून भगवान बुद्धाचे अवशेष हे धार्मिक आदरभाव प्रकट करण्याचे अमूल्य प्रतिक आहे._

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_महेश कांबळे_*

*_दिनांक :- २२/०३/२०२३

*_संदर्भ :-_*

_*१) महावंस*_ 

_*२) महापरिनिब्बाण सुत्त*_ 

_*३) कलिंगबोधी जातक*_ 

_*४) सुमंगल विलासिनी*_ 

_*५) महामंगलसुत्त*_

_*६) बौद्ध पौर्णिमा*_

https://mikamblemahesh.blogspot.com/2023/03/blog-post_21.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

Monday, 20 March 2023

विशेष ज्ञान

 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_।।  बुद्धांचे विशेष ज्ञान ।।_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

 *_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

           _*पटिसम्भिदामग्गात उल्लेख आहे की, बुद्धांना सहा विशेष प्रकारचे ज्ञान होते.* या प्रकारचे ज्ञान त्यांचे अग्रश्रावक सारिपुत्त आणि मोग्गलान यांना देखील नव्हते. केवळ संबोधि प्राप्त व्यक्तिंचेच ते वैशिष्ट्य आहे. या विशेष ज्ञानामुळेच भगवान बुद्ध अनंत सत्त्वांचे कल्याण करू शकले._

_*पहिले विशेष ज्ञान आशय- अनुशय ज्ञान-* सुप्त शक्तींचे ज्ञान. व्यक्तीच्या मनातील सुप्त बरे, वाईट बुद्ध परिपूर्ण रितीने जाणत. व्यक्तीच्या मनातील सात अनुशय कोणत्या प्रकारचे, स्तराचे आहेत हे त्यांना कळत असे. कोण्या व्यक्तीत कामानुशय जास्त प्रमाणात असेल तर भगवान तसे जाणून शरीराच्या अशुद्धतेबद्दल उपदेश देऊन त्या व्यक्तीच्या मनातील सुप्त प्रज्ञा जागृत करीत आणि कामानुशयाच्या काळ्याकुट्ट ढगांमुळे अस्पष्ट असलेली प्रज्ञा स्पष्ट करीत असत. युवराज नंद आपल्या पत्नीवर, जनपद कल्याणीवर अत्यंत अनुरक्त होता. तसेच रूपगर्विता खेमा ही अशा प्रकारातील दोन उदाहरणे होत. तृष्णा आणि आसक्ती यांचे मळ दूर झाल्यावर त्यांच्यात प्रज्ञेचा स्वच्छ प्रकाश पडला._

      _कोण्या एकाचे व्यक्तिमत्त्व क्रोध आणि द्वेषाने भरलेले असेल तर भगवान असा उपदेश करीत की, ती व्यक्ती क्रोधमुक्त आणि द्वेषमुक्त होत असे. गर्व आणि दंभ बाळगणाऱ्या व्यक्तीला शून्यता आणि अहंकार रहितता यावर उपदेश देऊन त्यांना धम्मजीवनात आरूढ होण्याकरिता एखाद्या रेल्वेगाडी प्रमाणे व्यक्तीचे मन मुक्तीच्या गंतव्य स्टेशनकडे धाव घेई. पंचवर्गिय ब्राह्मणाचे उदाहरण या विषयी घेता येईल._

_*दुसरे विशिष्ट ज्ञान* माणसाच्या मनातील प्रवृत्तीचे *इंद्रिय परोपरियत्ती ज्ञान-* श्रद्धा, स्मृति, विरिय, समाधि, प्रज्ञा इत्यादिंचे वेगवेगळे स्तर बुद्ध जाणत आणि समोरच्या व्यक्तिमध्ये ते किती प्रमाणात आहेत त्यानुसार त्यांना धम्मदेसना देत असत._ 

_*तिसरे विशिष्ट ज्ञान - महाकरुणा समापत्ति ज्ञान-* पहाटेस दोन तास आणि दुपारी दोन तास भगवान सर्व प्राण्यांविषयी असीम, अनंत, अमर्याद करुणा पसरवित. सूर्य आपल्या अनंत रश्मी सर्व प्राण्यांवर वर्षवितो त्याप्रमाणे भगवान बुद्ध आपली करुणा पसरवित. आज कोणास धम्मदेसना देऊन कल्याण करावयाचे, कोणास सदाचाराच्या मार्गावर आरूढ करायचे हे आपल्या प्रज्ञा चक्षुने पाहायचे. इतिहासात बुद्धांशिवाय इतर कोणत्याही धर्मोपदेशकाने असे केल्याचे विदित नाही._

_*चौथे विशिष्ट ज्ञान - यमक प्रातिहारिय ज्ञान* दुहेरी आश्चर्याचे ज्ञान. या विशिष्ट ज्ञानाचा प्रयोग भगवान बुद्धांनी तीनदा केल्याचे ज्ञात आहे. *गर्विष्ठ, घमेंडखोर व्यक्तीमध्ये धम्माविषयी आस्था जागावी म्हणून हा प्रयोग केला होता.* हवेत उंच उठून शरिराच्या वरच्या भागातून अग्नी आणि खालच्या भागातून जल निर्माण केले. उपस्थितांनी हे आश्चर्य एकसाथ होतांना पाहिले. भगवान बुद्धांचे पिता व कपिलवस्तुतीत आप्तेष्ट भगवान बुद्धांना लोकगुरु, लोकशिक्षक मानायला प्रथम तयार नव्हते. आपल्या पुत्राचे हे अचाट कर्म, सामर्थ्य पाहून ते अवाक झाले._

_*पाचवे विशिष्ट ज्ञान - सब्बञ्ञुता ज्ञान* सर्वज्ञता. भगवान बुद्धाचे समकालीन भगवान महावीर आणि इतर काही धर्मगुरू सर्वज्ञ असल्याचा दावा करीत. बुद्धांची सर्वज्ञतेची व्याख्या अशी कोणत्याही वेळी, कोणत्याही स्थळी, कोणत्याही दिशेला वस्तूवर चित्त केंद्रीत करण्याची आणि त्या वस्तूबद्दल संपूर्ण ज्ञान मिळविण्याची मनाची योग्यता होय. तर भगवान महावीर यांची व्याख्या एकाच वेळी पाहाणे, ऐकणे आणि सदासर्वदा सगळीकडे जे काही घडते ते जाणणे._

        _भगवान बुद्ध म्हणतात, अशी योग्यता कोणालाही प्राप्त होणे शक्य नाही. *भगवान बुद्ध कोणत्याही वेळी जगातील कोणत्याही वस्तुला आपल्या ज्ञानाच्या कक्षेत आणून त्याबद्दल संपूर्ण जाणू शकत. या ज्ञानाला 'सामंत चक्षु' असेही म्हणतात.*_

_*सहावे विशिष्ट ज्ञान - अनावरण ज्ञान - स्पष्ट ज्ञान.* अस्तित्वात येणारे आणि अस्तित्वात नसलेल्याचे ज्ञान आवृत सत्य आणि अनावृत्त सत्य याचे विना अडथडा संपूर्ण ज्ञान._

        _जगभरातील प्रसिद्ध विचारवंत आणि विद्वानांनी बुद्धांच्या अंतर्दृष्टीची मुक्त कंठाने प्रशंसा केली आहे. एच. जी. वेल्स, बर्नट्रान्ड रसेल, अल्बर्ट आईनस्टाईन, अनातोली फ्रेंन्ड इत्यादिनी बुद्धांच्या अंतरंगात प्रवेश करणाऱ्या प्रज्ञेची आणि असीम करुणेची मुक्त कंठाने स्तुती केली आहे. आपल्या पंचेचाळीस वर्षांच्या प्रदिर्घ चारिकेत बुद्धांनी आपल्या मनाची समता, शांतता कधीच ढळू दिली नाही. अगदी शेवटच्या क्षणी सुद्धा आपल्या अनुयायांचा उत्साह, प्रसन्नता वाढवित राहीले. अध्यात्माच्या उच्चतम अवस्था त्यांनी प्राप्त कराव्यात याकरिता ते सतत प्रयत्नशील राहिले.

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_संकलन :- महेश कांबळे_*

*_दिनांक :- २०/०३/२०२३

*_संदर्भ :-_*

_*१) पटिसम्भिदामग्ग*_

_*२) बौद्ध पौर्णिमा*_

https://mikamblemahesh.blogspot.com/2023/03/blog-post_20.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼


Thursday, 16 March 2023

महाबोधी विहार आणि आर्किटेक्ट जे. डी. बेगलर

 *महाबोधी विहार आणि आर्किटेक्ट जे. डी. बेगलर* J.D.Beglar: Architect in Bodh Gaya's revival.


बोधगया येथील महाबोधी विहारात १४ व्या शतकात सारिपुत्त नावाचे एक बौद्ध भिक्षू होते. परंतु ते नेपाळ येथे निघून गेल्यानंतर पुढे चारशे वर्षे बोधगयाचे नाव भारतीय नोंदीतून गडप झाले. सन १८११ मध्ये फ्रान्सिस हे ब्रिटिश अधिकारी तेथे आले असता महाबोधी विहाराची झालेली पडझड त्यांनी बघितली. त्यानंतर ७० वर्षांनी म्हणजे सन १८८० मध्ये बंगाल प्रांताचे गव्हर्नर लेफ्टनंट सर ॲशले एडन यांनी जे.डी. बेगलर यांची बोधगया येथील विहाराच्या दुरुस्ती आणि पुनर्निर्माण कामासाठी नेमणूक केली. त्यांनी अलेक्झांडर कनिंगहम व मित्रा यांच्या सल्ल्याने महाबोधी विहाराचे दुरुस्तीचे काम नेटाने पार पाडले. म्हणून आज आपण जे महाबोधी विहाराचे दर्शन घेत आहोत त्याच्या पुनर्निर्माण कार्याचे श्रेय जे. डी.बेगलर यांच्याकडे जाते.


जे.डी. बेगलर यांनी काळजीपूर्वक उत्खनन करून सम्राट अशोककालीन मूळ विहाराचे आधारस्तंभ व कुंपण शोधून काढले. सर्वात विलक्षण म्हणजे सम्राट अशोक यांनी बोधीवृक्षाच्या पायथ्याशी ठेवलेले वज्रासन देखील त्यांना सापडले. आज वज्रासनाचा बराचसा भाग सुशोभीत आवरणाखाली झाकला गेला आहे. जुन्या आकाराच्या विटा परत घडवून त्यांनी प्रवेशद्वार आणि विहाराची दुरुस्त केली. तसेच बेगलर यांनी महाबोधी विहाराच्या आजूबाजूस उद्यान उभारले व परिसर सुशोभित केला. अलेक्झांडर कनिंगहम यांना अगोदर तेथे बुद्धांची काळया पाषाणाची क्षतिग्रस्त मूर्ती सापडली होती. ती आज तेथील संग्रहालयात आहे. तसेच त्यांनी तेथे बोधीवृक्षाची फांदी रुजविली. आज त्याचा डेरेदार वृक्ष झालेला आहे. 


सदर दुरुस्ती कामाचे फोटो जोसेफ डेव्हिड बेगलर यांनी त्यावेळी काढले.  सुदैवाने १४२ वर्षानंतर आज ते आपण  पहात आहोत हे मोठे भाग्याचे आहे. या महाबोधी विहाराच्या प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूस वरती एक कोनशीला बसविली आहे. त्यामध्ये लिहिले आहे की, " This ancient temple of Mahabodhi, erected on the holy spot where Prince Sakya Sinha became the Buddha, was repaired by the British government under Sir Ashley Eden, Lieutenant-Governor of Bengal, Archaeological advisor to the government, Major General A Cunningham, Architect Joseph David Beglar 1880 " भारताची मूळ संस्कृती शोधण्यात अलेक्झांडर कनिंगहम आणि जोसेफ डेव्हिड बेगलर वाटा निश्चितच मोलाचा आहे. 


--- संजय सावंत

🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶






Sunday, 12 March 2023

पर्वताचे पाच गुण

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_।। पब्बतङ्गपञ्हो ।।_*

*_।। पर्वताचे पाच गुण ।।_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

 *_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

        _"भन्ते नागसेन, 'पब्बतस्स पञ्च अङ्गानि गहेतब्बानी'ति यं वदेसि, कतमानि तानि पञ्च अङ्गानि गहेतब्बानी'ति? "यथा, महाराज, पब्बतो अचलो अकम्पितो असम्पवेधी, एवमेव खो महाराज, योगिना योगावचरेन सम्मानने विमानने सक्कारे अक्कारे गरुकारे अगरुकारे यसे अयसे निन्दाय पसंसाय सुखे दुक्खे इट्ठानिट्ठेसु सब्बत्थ रूपसद्ददगन्धरसफोट्ठब्बधम्मेसु रजनीयेसु न रज्जितब्बं, दुस्सनीयेसु न दुस्सितब्बं, मुय्हनीयेसु न मुय्हितब्बं, न कम्पितब्बं न चलितब्बं, पब्बतेन विय अचलेन भवितब्बं । इदं, महाराज, पब्बतस्स पठमं अङ्गं गहेतब्बं  |_ *_भासितम्पेतं महाराज, भगवता देवातिदेवेन -_*

*_"सेलो यथा एकघनो, वातेन न समीरति ।_*

*_एवं निन्दापसंसासु, न समिञ्जन्ति पण्डिता'ति ॥_*

             _"भंते नागसेन, तुम्ही म्हणता की, पर्वताचे पाच गुण असले पाहिजे, तर ते पाच गुण कोणते ?"_

              *_"महाराज, पर्वत अचल, अकंप्य आणि स्थिर असतो. त्याचप्रमाणे योगसाधना करणाऱ्या भिक्षूंनी सन्मान, अपमान, सत्कार, दुत्कार, प्रतिष्ठा, अप्रतिष्ठा, यश, अपयश, निदा, प्रशंसा, सुख, दुःख, इष्ट, अनिष्ट आणि सर्वच रूप, शब्द, गंध, रस, स्पर्श इत्यादी धर्माच्या मोहक स्वरूपापासून स्वतःचे रक्षण केले पाहिजे. द्वेषास कारण ठरणाऱ्या धर्माविषयी द्वेष करू नये. मोह उत्पन्न करणाऱ्या धर्माविषयी द्वेष करू नये. मोह उत्पन्न करणाऱ्या धर्मासंबंधी कधीच मोह उत्पन्न होणार नाही, याची काळजी बाळगली पाहिजे. त्यापासून कधी विचलीत होऊ नये. अगदी पर्वतासमान अचल आणि स्थिर झाले पाहिजे, महाराज, पर्वताचा हाच पहिला गुण असावयास पाहिजे._*

_महाराज, देवाधिदेव भगवान बुद्धांनी म्हटलं सुद्धा आहे की,_                 *_'ज्याप्रमाणे एकदम घनदाट असा पर्वत कधीही वाऱ्याने हालत नाही किंवा डोलत नाही त्याचप्रमाणे पंडित पुरुष निंदा किवा प्रशंसेने मुळीच अस्थिर व चंचल होत नाहीत'._*

_"पुन चपरं महाराज, पब्बतो थद्धो न केनचि संसट्ठो, एवमेव खो, महाराज, योगिना योगावचरेन थद्धेन असंसट्ठेन भवितब्बं, न केनचि संसग्गो करणीयो। इदं, महाराज, पब्बतस्स दुतियं अङ्गं गहेतब्बं ।_ *_भासितम्पेतं महाराज, भगवता देवातिदेवेन -_*

*_"असंसट्ठं गहट्ठेहि, अनागारेहि चूभयं ।_* 

*_अनोकसारिमप्पिच्छं, तमहं ब्रूमी ब्राह्मण'न्ति ॥_*

         _*"महाराज, आणखी, कठोर पर्वत कधी कोणाशी लागाबांधा लावित नाही, तर तो एकटाच आपल्या मस्तीत पडून राहतो. त्याचप्रमाणे योगसाधना करणाऱ्या भिक्षूंनी कोणाशीही भेटीगाठी घेण्यासंबंधी कठोर होऊन राहिले पाहिजे. संसर्गापासून दूर एकांतात मग्न राहिले पाहिजे. महाराज, पर्वताचा हाच दुसरा गुण असला पाहिजे.*_

*_महाराज, देवाधिदेव भगवान बुद्धांनी म्हटले आहे की, 'गृहस्थ आणि प्रव्रजित यांच्याशी अधिक संसर्ग न ठेवता एकटेच आपल्या साध्याची वाटचाल करणाऱ्या अल्पेच्छू अशा प्रव्रजितास मी श्रेष्ठ ब्राह्मण आहे असे मानतो. "_*

_"पुन चपरं, महाराज, पब्बते बीजं न विरूहति, एवमेव खो, महाराज, योगिना योगावचरेन सकमानसे किलेसा न विरूहापेतब्बा । इदं, महाराज, पब्बतस्स ततियं अङ्गं गहेतब्बं ।_ _*भासितम्पेतं महाराज, थेरेन सुभूतिना -*_

*_"रागूपसंहितं चित्तं, यदा उप्पज्जते मम ।_* 

*_सयंव पच्चवेक्खामि, एकग्गो तं दमेमहं ॥_*

*_रज्जसे रजनीये च, दुस्सनीये च दुस्ससे।_* 

*_मुय्हसे मोहनीये च, निक्खमस्सु वना तुवं ॥_*

_*“विसुद्धानं अयं वासो, निम्मलानं तपस्सिनं।*_ 

*_मा खो विसुद्धं दूसेसि, निक्खमस्सु वना तुव'न्ति ॥_*

            _*“महाराज, आणखी, पर्वतावर बी रूजत नसते. त्याचप्रमाणे योगसाधना करणाऱ्या भिक्षूंनी आपल्या मनात कधीच क्लेश रूजू देऊ नये. महाराज, पर्वताचा हाच तिसरा गुण असला पाहिजे.*_

           *_महाराज, स्थविरसुभूती यांनीही म्हटले आहे की, 'माझ्या मनात जेव्हा मनोविकार उत्पन्न होतात, तेव्हा मी ते पाहून घेतो आणि स्वतः एकटाच त्यांचे निर्दालन करीत असतो. जर तुम्ही वासना उत्पन्न करणाऱ्या धर्माकडे पाहून वासनायुक्त होत असाल, द्वेष उत्पन्न करणाऱ्या कर्माकडे पाहून द्वेषी होत असाल आणि मोहक वस्तूंना पाहून मुढ बनत असाल, तर या वनातून खुशाल निघून जा. निर्मळ मनाच्या विशुद्ध तपस्व्यांचीच ही भूमी आहे. आपल्या दुर्गुणानेही भूमि अपवित्र करून घेऊ नका. या वनातून तत्काळ निघून जा."_*

_"पुन चपरं, महाराज, पब्बतो अच्चुग्गतो, एवमेव खो, महाराज, योगिना योगावचरेन ञाणच्चुग्गतेन भवितब्बं । इदं, महाराज, पब्बतस्स चतुत्थं अङ्गं गहेतब्बं ।_ _*भासितम्पेतं महाराज, भगवता देवातिदेवेन -*_

*_''पमादं अप्पमादेन, यदा नुदति पण्डितो।_* 

*_पञ्ञापासादमारुय्ह, असोको सोकिनिं पजं ।_*

*_पब्बतट्ठोव भूमट्ठे, धीरो बाले अवेक्खती'ति ॥_*

           _*“महाराज, याशिवाय पर्वताचे शिखर फार उंच असते. त्याचप्रमाणे योगसाधना करणाऱ्या भिक्षूंनी सुद्धा आपल्या ज्ञानाची उंची गाठावयास पाहिजे. महाराज, पर्वताचा हाच चौथा गुण असावयास पाहिजे.*_

         *_महाराज, देवाधिदेव भगवान बुद्धांनी सुद्धा म्हटले आहे की, 'ज्यावेळी पंडितपुरुष अप्रमादाने प्रमाद दूर करतो, त्यावेळी तो प्रज्ञेच्या उंच सोपानावर चढून शोकमुक्त होऊन शोकाकून अज्ञ लोकांना बघत असतो. जसे की, एखाद्या पर्वत शिखरावर चढलेला माणूस खालच्या लोकांना बघत असतो."_*

_"पुन चपरं, महाराज, पब्बतो अनुन्नतो अनोनतो, एवमेव खो, महाराज, योगिना योगावचरेन उन्नतावनति न करणीया। इदं महाराज, पब्बतस्स पञ्चमं गहेतब्बं।_ *_भासितम्पेतं, महाराज, उपासिकाय चूळसुभद्दाय सकसमणे परिकित्तयमानाय -_*

*_"लाभेन उन्नतो लोको, अलाभेन च ओनती।_* 

*_लाभालाभेन एकत्था, तादिसा समणा ममा"ति ॥_*

          *_"महाराज, आणखी, पर्वताला कधी उचलले जाऊ शकत नाही किंवा जमिनीत गाडल्याहि जाऊ शकत नाही. त्याचप्रमाणे योगसाधना करणाऱ्या भिक्षूंनी इतरांच्या स्तुतीमुळे चढून जाऊ नये किंवा निंदेमुळे खचूनहि जाऊ नये, महाराज, पर्वताचा हाच पाचवा गुण असला पाहिजे._* 

         *_महाराज, आपल्या मिक्षूंनी वाखाणणी करीत असता लहान सुभद्रा म्हणाली होती की, 'संसारातील लोक लाभ झाला असता फुगून जातात आणि अलाभामुळे खट्ट होतात, परंतु माझे श्रमण लाभ आणि हानि या दोन्ही अवस्थेत समान भावगुणाने स्थिर राहतात, "_*

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_संकलन :- महेश कांबळे_*

*_संदर्भ :-  मिलिन्द प्रश्न - ओपमवग्गो_*

            *_(खंड ६, प्रकरण ३ रे उपमा कथा प्रश्न)_*

*_दिनांक : १४/०३/२०२३_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2023/03/blog-post_12.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

Saturday, 11 March 2023

एकाग्रता करते अर्थपूर्ण सुसंवाद

 *एकाग्रता करते अर्थपूर्ण सुसंवाद*

 Mindful Communication


मनुष्यप्राणी हा मोठा गप्पिष्ट आहे. दोन-चार लोक आजूबाजूला जमले की गप्पा चालू होतात. पुरुषांच्या गप्पांचे विषय वेगळे असतात. स्त्रियांच्या गप्पांचे विषय वेगळे असतात. सर्वसामान्य माणसांच्या गप्पा या त्यांच्या जीवनात आलेल्या बऱ्यावाईट अनुभवावर आधारित असतात. गप्पा मारताना माणूस सहजपणे अनेक वेळा खोटे बोलून जातो. काही वेळेला निरर्थक गप्पा मारतो. काही वेळेला दुसऱ्याप्रती त्यात शिवीगाळ असते तर काही वेळेला स्वतःचा उदोउदो केलेला असतो. काही वेळेला हीन विनोद असतो तर काही वेळेला मोठ्या धार्मिक गप्पा हाणतो. कधी मूर्खासारखे बडबडतो तर काही वेळेला  विद्वान असल्यासारखे प्रवचन झोडतो. आपले बोलणे सर्वांनी ऐकावे व मान्य करावे हाच उद्देश त्यामागे असतो. थोडक्यात माणूस बराच असंबद्ध बडबडतो.


परंतु जो पंचशीलाचे दररोजच्या व्यवहारात पालन करतो आणि सकाळ-संध्याकाळ ध्यानसाधना करतो अशा व्यक्तीचे बोलणे अर्थपुर्ण आणि मोजकेच होते. धम्माचे आकलन ज्याला झाले आहे असा साधक चित्त व शरीर यांचे प्रती जागृत राहून यथार्थ व कळेल असेच बोलतो. शील पालन केल्याने आणि साधनेच्याप्रती निष्ठावान राहिल्याने अनेक चांगल्या गोष्टी चित्त व शरीरधारेस बळकटी देतात. बाष्कळ बडबड बंद होते. ताणतणाव नष्ट होतात. वाणी आपोआप सुधारते. सर्वांप्रती प्रेम भावना वाढीस लागते. लोभ व द्वेष नष्ट होऊ लागतो. जे जे कार्य हाती घेतले जाते त्यात यश प्राप्त होते. आर्थिक स्तर आपोआप उंचावतो. कुटुंबांमध्ये शांती वाढीला लागते. छोटे-मोठे आजार पळून जातात. उत्साह वाढीस लागतो. बुद्धांच्या शिकवणुकीचे योग्य आकलन होत जाते. एकमेकांतील संवाद सुधारतो. अशा अनेक महत्वपूर्ण चांगल्या बाबी घडून येतात.


"शील, समाधि आणि प्रज्ञा" यामधील शील या घटकातील वाणी सुधारण्याचे काम साधनेच्या अभ्यासानेच होते. आपली वाणी खालील चार बाबींनी युक्त असावी असे पाली भाषेतील गाथांमध्ये म्हटले आहे.

सुभाषित बोलावे - दुर्भाषित बोलू नये.

धर्मच बोलावे - अधर्म बोलू नये. 

प्रिय बोलावे - अप्रिय बोलू नये.

सत्यच बोलावे - असत्य बोलू नये.


साधकाने अशी वाणी बोलावी की जिच्यामुळे आपल्यावर पश्चाताप करण्याची पाळी येत नाही व इतरांनाही त्रास होत नाही. अशी वाणी हीच खरी सुभाषित वाणी होय. प्रत्येकाने आपण काय बोलतो याकडे जागृततेने लक्ष ठेवावे. निरर्थक गप्पागोष्टी, असंबद्ध बडबड नसावी. स्वतःचे शरीराप्रती होणाऱ्या संवेदनांना साक्षी राहून बोललेली वाणी ही धर्मवाणी होय. यामुळे सर्व प्राणीमात्रांचा हितचिंतक आणि त्यांच्याप्रती अनुकंपीत होऊन विहरता येते. सत्यवादी झाल्याने लोकांच्या विश्वासास पात्र होता येते. लोकांमध्ये  एकीचे बळ वाढविता येते. म्हणून दुसऱ्यांना समजेल, उमजेल असे बोलावे. त्यामध्ये उपहास, निंदा, क्रोध नसावा. जी वाणी कानाला सुख देणारी आहे, प्रेमळ आहे, हृदयाला जाऊन भिडणारी आहे, सभ्य आहे, बहुजनांना मान्य आहे अशी भाषा बोलणारा निश्चितच समाधी आणि प्रज्ञेत निपुण होतो. म्हणूनच म्हटले आहे वाचाळ न होता विनयवादी व्हावे. त्यातच सौख्य सामावले आहे. 


--- संजय सावंत (नवी मुंबई) https://sanjaysat.in


( सोबत बुद्धांचा शिष्य आणि सहाय्यक 'आनंद' यांचे व्हिएतनाम देशातील शिल्प )


💎💎💎



Wednesday, 8 March 2023

बुद्ध धम्म आणि स्त्री स्वातंत्र्य

 *बुद्ध धम्म आणि स्त्री स्वातंत्र्य* 

प्राचीन भारतात स्त्रियांची स्थिती दयनीय होती. समाजात त्यांना शिक्षणापासून ज्ञानापासून वंचित ठेवले जात होते. 

भगवान बुद्धांच्या आगमनानंतर स्त्रियांना त्यांच्या धम्मात संघात जे स्थान प्राप्त झाले जे अधिकार मिळाले याची बौद्ध इतिहासात बरीच उदाहरणे मिळतात. 

बुद्धांच्या संघात प्रवज्जित झालेल्या स्त्रिया ह्या वेगवेगळ्या परिस्थितीतून वेगवेगळ्या प्रकारच्या समाज जिवनातून संघात आल्या होत्या कठिण परिस्थितीतून त्यांनी आपल्या जिवनाचे उत्थान कसे केले याचे वर्णन आपल्याला थेरीगाथेत मिळते. 

आज बुद्धांवर त्यांच्या धम्मावर अनेक निराधार आरोप करण्यात येतात त्यातील एक आरोप म्हणजे बुद्धांचा स्त्रियांबाबतचा दृष्टीकोन हा भेदभावाचा होता अथवा बुद्ध हे स्त्री स्वातंत्र्याच्या विरोधात होते. 

यामध्ये आरोपकर्ते हे बुद्धांनी स्त्रियांना संघात घेण्यास प्रथमत नापसंती दर्शविली तसेच विनयपिटकात स्त्रियांना दुय्यमस्थानी ठेवले आहे. असे आरोप करतात. 

आता आपण यांच्या आरोपांचे खंडन करणारी उदाहरणे पाहू. 

भिक्खूनी संघाच्या स्थापनेचा इतिहास असा आहे की, बुद्धांची मावशी महापजापतीगोतमी हिने बुद्धांजवळ जाऊन स्त्रियांना संघामध्ये घेण्याची विनंती केली. परंतु बुद्धांनी तसे करण्यास नकार दिला. त्यानंतर महापजापतीगोतमी आनंदाकडे गेली व म्हणाली. आनंदा, गृहत्याग करून भगवंतांचा धम्म व विनय याचा स्विकार करून गृहहीन जिवन जगण्याची अनुमती तथागत स्त्रियांना देत नाहीत. नंतर आनंद ज्या ठिकाणी तथागत होते. त्या ठिकाणी गेला व तथागतांना अभिवादन करून म्हणाला. भगवान महापजापतीगोतमी प्रवेश द्वाराजवळ उभी आहे. तिचे पाय सुजले आहेत आणि ते धुळीने माखलेले आहेत. दुखी कष्टी होऊन ती रडत अश्रू ढाळीत आहे. कारण गृहत्याग करून भगवंतांचा धम्म व विनय यांचा स्विकार करून गृहहीन जिवन जगण्याची अनुमती भगवान स्त्रियांना देत नाहीत. भगवान तिच्या इच्छेनुसार स्त्रियांना अनुमती दिली तर बरे होईल. 

यावर बुद्धांनी आनंदाचे म्हणणे नाकारले. 

नंतर आनंदाने याचे कारण विचारले असता तथागतांनी उत्तर दिले. 

"आनंदा, गैरसमज करून घेऊ नकोस. निब्बाणप्रत पोहचण्यास स्त्रियासुध्दा पुरूषाइतक्याच समर्थ आहेत असे माझे मत आहे. माझ्याविषयी गैरसमज करून घेऊ नकोस. स्त्री पुरूषाच्या विषमतेच्या तत्वांचा मी पुरस्कर्ता नाही. महापजापतीगोतमी च्या विनंतीला मी दिलेला नकार हा स्त्री पुरूषातील विषमतेवर आधारलेला नाही तर तो व्यवहारीक कारणांवर आधारलेला आहे. 

आता ही व्यवहारीक अडचण आपल्याला तत्कालीन समाजव्यवस्थेतच शोधावी लागेल. 

बुद्धकाळात आजच्यापेक्षा वैचित्र्यपूर्ण अशी समाज व्यवस्था होती. 

*आम्रपाली* वरून तत्कालीन समाजव्यवस्थेची कल्पना येते. 

आम्रपाली ही वैशालीची गणिका होती. ती जनमान्य राजमान्य गणिका होती. अर्थात जनमान्य राजमान्य गणिका असणे हे काय दर्शविते ? 

ते हेच दर्शविते की त्या काळात लैंगिक दुराचार होत असत. त्यामुळे अश्या व्यवसायाला मान्यता देणे क्रमपाप्त होते. लैंगिक गुन्ह्यांना वाव मिळू नये म्हणून एखादी गणिका असणे हे जनतेला मान्य होते. 

अशा समाजव्यवस्थेत बुध्दाने स्त्रियांना प्रवज्जित करून भिक्खूनी बनविणे हे एक धाडसाचे काम होते. भिक्खुणींना भिक्षा मागण्यासाठी पिंडपातासाठी लोकवस्तीत जाणे सुध्दा धोकादायक बाब होती. यासाठी 'शुभा' भिक्खूणीवर आलेला प्रसंग लक्षात घ्या. 

शुभा एके दिवशी जिवक वैद्याच्या आम्रवनात एकटीच जात होती. वाटेत तिला एका लबाड मनुष्याने गाठले. तिच्या सुंदर रूपाकडे पाहून तो भुलून गेला आणि आपली वासना तृप्त करण्यासाठी तिचे मन वळवू लागला. तिने त्याला अनेक प्रकारे उपदेश केला. परंतु त्या कामांध माणसावर त्याचा काहीएक परिणाम झाला नाही. शेवटी तो बलात्कार करण्यास सुध्दा तयार आहे असे जेव्हा त्या भिक्खूणीला दिसून आले तेव्हा ती त्याला म्हणाली, 'अरे तू मला का अडवीत आहेस ?' तेव्हा तो तिच्या नैत्रादी सुंदर अवयवांचे वर्णन करू लागला. आणि म्हणाला, हे सुंदरी, हे तुझे सुंदर नेत्र पाहून मी कामविकाराने पिडीत झालो आहे. 

त्यावर भिक्खूनी म्हणाली, एवढंच ना ? माझ्या डोळ्यांचीच तुला गरज आहे ना. घे हा डोळा असे म्हणून आपल्या दोन बोटांनी डोळा उपटून त्याला दिला. हे तिचे साहसी कृत्य पाहून तो मनुष्य घाबरून गेला व तिची क्षमा मागितली. 

असे प्रसंग भिक्खूनींवर येतील म्हणूनच बुद्धांनी स्त्रियांना संघात घेण्यास विरोध केला होता. 

दुसरी बाब म्हणजे बुद्धांच्या भिक्खू संघात औषध, भोजन मिळण्यासाठी, शिक्षेतून बचाव होण्यासाठी अनेक संधीसाधू, स्वार्थी लोक भिक्खू होऊन संघात प्रवेश करीत. जर स्त्रियांना भिक्खूणी करून संघात घेतले तर कित्येक व्याभिचारी लोक स्त्रियांसाठी संघात घुसून विघ्न करतील व त्यायोगे अखंड भिक्खूसंघाला धोका पत्करावा लागेल. या हेतुने बुद्धांनी स्त्रियांना भिक्खूणी बनविण्यास नापसंती व्यक्त केली तर त्यात बिघडले कुठे ?

असे अनेक प्रसंग आपणाला थेरींच्या चरित्रात गाथेत सापडतात. 

इथे बुद्ध हे स्त्री विरोधी होते असे म्हणणारे आणखी एक गोष्ट सांगतात की, बुद्ध एकदा आनंदाजवळ म्हणाले होते 'हे आनंद, भिक्खू संघात जर स्त्रियांना प्रवज्जित केले नाही तर माझा धम्म एक हजार वर्ष सुस्थितीत राहिल. परंतु त्या प्रवज्जित झाल्याने केवळ पाचशे वर्ष पर्यंत राहण्याची शक्यता आहे. 

तथागतांच्या या वाक्यांचा उलगडा स्थविर नागसेनाने राजा मिलिंद याला दिलेल्या उत्तरात केला आहे. स्थविर नागसेन म्हणतात. धम्माची मुळे चारित्र्यात आहेत. जो पर्यंत लोकांचे चारित्र्य बिघडणार नाही, तो पर्यंत भगवान बुद्धांच्या धम्माचा कधीही लोप होणार नाही. 

यामधून नागसेनास हे सुचवायचे आहे की बुद्धांनी कितीही चांगला धम्म सांगितला तरी अनुयायांनी त्याचा अभ्यास व तदनुसार आचरण करणे महत्वाचे आहे. स्त्रियांना भिक्खूनी केल्याने त्यांचा आणि भिक्खूचा जवळचा संबंध येणार आहे. येथेच धम्माला आवश्यक असणाऱ्या चारित्र्याची कसोटी आहे. स्त्री आणि पुरूष निसर्गातच असे घटक आहेत की ते जवळ येताच त्यांची वासना जागृत होते. भिक्खू आणि भिक्खूणी सुध्दा यास अपवाद नाहीत. भिक्खू भिक्खूणी आपल्या इंद्रियावर ताबा प्राप्त करेपर्यंत असे होणे साहजिकच आहे. जो पर्यंत बुद्ध व त्यानंतर ज्येष्ठ भिक्खू आहेत तो पर्यंत ठिक. परंतु नंतर असा दबदबा न राहिल्यास अनाचार नक्कीच माजेल. शिवाय बुद्ध धम्माला बदनाम करण्यासाठी काही लोक तत्पर असतच. हे ओळखून भगवान बुद्धांनी असे विधान केले की, स्त्रियांना प्रवज्जित केल्याने धम्म पाचशे वर्षच टिकेल. यातून बुद्धांचा दूरदर्शीपणा दिसून येतो. 

बुद्ध स्त्री स्वातंत्र्याच्या विरोधात होते हे दाखविणारी एक बाब काही लोक  बुद्धांचा दृष्टीकोन व अनुभव लक्षात न घेता सर्वसामान्यांपुढे ठेवतात ती अशी की, एकदा आनंद बुद्धांना विचारतात. 

भगवान आमचा स्त्रियांशी संबंध आला तर आम्ही त्याच्यांशी कसे वागावे ? 

तथागत - आपण त्यांना पाहिलेच नाही असे वागावे. 

आनंद - परंतु त्यांना पाहणे भाग पडले तर ? 

तथागत - तुम्ही त्यांच्याशी बोलू नये. 

आनंद - आणि बोलणे भाग पडले तर ? 

तथागत - अशावेळी तुम्ही स्मृतिवान, स्मृतिसंपन्न वृत्तीने त्यांच्याशी वागले पाहिजे. 

हा प्रसंग सुत्तपिटकात आला आहे. त्याची उदाहरणे समजून घेण्यासाठी आपण बौद्ध वाङ्गमयातून काही उदाहरणे घेऊ. 

भगवान बुद्ध श्रावस्ती येथे जेतवनात अनाथपिंडकाच्या आरामात होते. तेव्हा उदायी नावाचा भिक्खू श्रावस्तीतील अनेक कुटुबांत जात येत असे. त्याच्या ओळखीची एक तरूण कुमारिका दुसऱ्या एका घरी विवाह करून दिली होती. एके दिवशी उदायी तिच्या सासऱ्याच्या घरी जाऊन एका एकान्त जागी बसून तिच्याशी गोष्टी करित बसला ही बाब तिथे उपस्थित असलेल्या विशाखेने पाहीली व उदायीला म्हणाली, "तुम्ही जरी कामवासनेपासून मुक्त असला तरी पुष्कळ लोकांना याची खात्री वाटणार नाही. असे सांगूनही उदायीने ते ऐकले नाही. तेव्हा विशाखेने याबाबत वर्तमान भिक्खूंना याची कल्पना दिली. तेव्हा भिक्खूंनी झाल्याप्रकाराची  निंदा केली. 

जेव्हा बुद्ध श्रावस्तीत होते. त्या काळी उपनंद शाक्यपुत्र आपल्या मित्राच्या घरी जाऊन त्याच्या बायकोबरोबर एकान्तात बसला ते पाहून तो मित्र त्याच्यावर टिका करू लागला. 

एकदा भिक्खू अनुरूध्द कोसल देशात प्रवास करित श्रावस्तीला जात असता एका गावात आले. तेथे एका स्त्रीची धर्मशाळा होती. अनुरूध्दाने एक रात्र तेथे राहण्यास जागा मागितली. त्या स्त्रीने त्यांना जागा दिली. त्यानंतर तेथे काही पायस्थ आले. त्यांनाही त्या धर्मशाळेत जागा मिळाली. अनुरूध्दाला पाहिल्याबरोबर त्या स्त्रीचे मन विकृत झाले. ती त्यांना म्हणाली भदंत येथे तुम्हाला फार दाटी होईल. आतल्या बाजूस तुमची निजण्याची सोय करते. त्यावर काहीही न बोलता अनुरूध्दाने ही गोष्ट मान्य केली. रात्री ती स्त्री सर्व अलंकार घालून अनुरूध्द जेथे झोपला होता तेथे आली व त्यांना म्हणाली भदंत तुम्ही जसे सुरूप आहात तसेच मी ही सुरूप आहे. आपण माझा स्विकार करावा, माझी सर्व संपत्तीही स्विकारावी, मला आपली पत्नी करा. त्यावर अनुरूध्द काहीच बोलला नाही. तेव्हा ती स्त्री अनुरूध्दाला नानाप्रकारे वश करण्याचा प्रयत्न करू लागली. परंतु अनुरूध्दाने आपल्या इंद्रियाचे दमन करून तिच्याकडे मुळीच लक्ष दिले नाही. 

वरील तिन घटना पाहिल्यावर जरी बुद्धांनी आनंदाजवळ जे उद्गार काढले की, स्त्रियांना पाहिलेच नाही असे वागा. स्त्रीयांशी मौन धारण करा आणि बोलण्याची वेळ आलीच तर सावधान वृत्तीने वागा. असे सांगणे किंवा तशा सूचना देणे गैर आहे असे कोण म्हणेल ? 

या काही उदाहरणांवरून बुद्धांनी सुरूवातीला स्त्रियांना संघप्रवेश का नाकारला होता याची प्रचिती येते. 

आता दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे विनयपिटकातील आठ गुरूधम्म या नियमांचे पालन. 

आचार्य धर्मानंद कोसंबी यांच्यामतानुसार हे आठ गुरूधम्म हे तथागतांच्या काळात बनले नसावेत कारण एखादी गोष्ट दृष्टोत्पतीस पडल्यानंतरच भगवान बुद्ध तसा नियम घालून देत असत. महापजापतीगोतमी आणि इतर स्त्रिया संघात दाखल झाल्या झाल्या असे नियम घालून दिले नसावेत. भगवान बुद्धांच्या काळात जेथे गणसत्ताक राज्ये होती तेथे स्त्रियांचा चांगलाच मान ठेवण्यात येत आहे. अशोक काळानंतर ही परिस्थिती पालटली. या देशावर यवन व शक लोकांच्या स्वाऱ्या होऊ लागल्या आणि उत्तरोत्तर स्त्रियांचा दर्जा अगदी खालचा ठरून समाजात त्यांचा मान राहिला नाही. त्याकाळात भिक्खुणीसंबधाने अशा प्रकारचे नियम अस्तित्वात आले तर त्यात  काहीच नवल नाही.

इथे काही विचारवंत भिक्खुणींना जे विनय घालून दिलेत ते किती जाचक व कठिण आहेत यावर लक्ष केंद्रित करतात परंतु तसेच नियम भिक्खूंना सुध्दा पाळावे लागतात धम्म हा विनयावरच टिकून आहे हे विचारवंत विसरतात. त्यामुळे प्रथम त्यांनी भिक्खु भिक्खूणी या दोहोंचा विनयाचा नीट अभ्यास करावा व नंतरच त्यावर आपले मत मांडावे. 

गृहस्थी स्त्रियांचे जिवन व भिक्खुणी जिवन यात खुप फरक असतो. त्यामुळे स्त्री स्वातंत्र्याच्या विचार करताना स्त्रियांच्या या दोन्ही जिवनांना एकाच तराजूत तोलू नये. 

भगवान बुद्धांचे स्त्रियांविषयीचे काही मत आपण पाहूया. 

*भगवान बुद्ध चुल्लवेदल्ल सुत्तात म्हणतात. अर्हत्वपदास नेणारा पावित्र्याचा परमोच्च मार्ग जसा पुरूषांकरिता मोकळा आहे. तसाच स्त्रीयांसाठी मोकळा आहे. 

*कोसलनरेश पसेनदीला मुलगी झाल्यावर तो खिन्न झाला होता. 

भगवान बुद्ध पसेनदीला म्हणाले. 

'हे राजा ! स्त्रीपण पुरूषांपेक्षा श्रेष्ठ होऊ शकते अशी ही स्त्री मधुरभाषिनी, शीलवती, सासऱ्याला देव मानणारी व पतिव्रता असते. ती त्या बालकास जन्म देते, जो पुढे शूर, छत्रपती राजा होतो. अशा भाग्यशाली स्त्रीचा पुत्र राज्यावर शासन करतो. अनेक बालकांना महापुरूष बनवणाऱ्या त्यांच्या माताच असतात.

*सिगाल सुत्तात तरूणास उपदेश देताना पत्नीस कसे वागवावे हे बुद्धांनी सांगितले आहे. 

*एकदा एका भिक्खु नी बुद्धांना प्रश्न विचारला होता की, काही कुटुंबे भरभराटीस येतात आणि काही नष्ट होतात असे का होते? 

या प्रश्नास बुद्धांनी दिलेले उत्तर स्त्री जातीचा सन्मान करणारेच आहे. 

बुद्ध म्हणतात, "जर कुटुंबाची सूत्रे कर्तबगार स्त्री अथवा पुरूषाच्या हाती असतील तर ती भरभराटीस येतात आणि जर ती नितीभ्रष्ट स्त्री अथवा पुरूषाच्या हाती असतील तर ती कुटुंबे रसातळाला जातात. 

*एकदा भिक्खु बुद्धांना विचारतात या जगात चक्रवर्ती राजा जन्माला येतो तेव्हा काय होते? 

भगवान बुद्ध म्हणतात, जेव्हा एखादा चक्रवर्ती राजा जन्माला येतो तेव्हा सात भांडारे अस्तित्वात येतात. रथ, हत्ती, घोडे, रत्ने, स्त्रिया, कुटुंबाचा शास्ता पिता आणि गादीचा वारसदार राजपुत्र ही ती भांडारे होत. 

*स्त्री ही जगाला किती मौल्यवान देणगी आहे. याबद्दल आपल्या एका उपदेशात भगवान बुध्द म्हणतात. 

स्त्री ही जगातील सर्वोकृष्ट देणगी आहे. कारण तिची उपयुक्तता अमोल आहे. तिच्यापासून बोधिसत्व व चक्रवर्ती हे जन्म घेतात. 

बुद्धांनी स्त्रियांना संघात प्रवेश नाकारला तो पक्षपाती पणा करत होता व विनयपिटकात स्त्रियांचे दुय्यमस्थान आहे असे म्हणणाऱ्या अभ्यासकांनी त्याच थेरींच्या तोंडून बाहेर पडलेले उद्गार थेरीगाथेतून अभ्यासावेत. 

मुक्ता ही ब्राम्हण कन्या भिक्खुणी झाल्यानंतर उद्गार काढते "मी खरोखरच स्वतंत्र आहे, माझ्या स्वातंत्र्याला सीमा नाही. 

भिक्खुणी सोमा म्हणते, स्त्रीचे नैसर्गिक जिवन हे आमच्या अरियांच्या आड कसे येऊ शकते ? 

अशा असंख्य भिक्खुणींची उदाहरणे आपण थेरीगाथेतून घेऊ शकतो. 

तथागतांच्या अग्गसावकांमध्ये जसे भिक्खू अग्गसावक होते तसे भिक्खुणी सुध्दा अग्गसावक होत्या. यावरून धम्मात प्रवज्जित झाल्यावर त्या भिक्खूणींनी स्त्रियांनी किती प्रगती साधली होती याचे उदाहरण मिळते. 

पाश्चात्य विद्वान सर लेपेल ग्रिफिन म्हणतात, " इतर कोणत्याही संप्रदायापेक्षा बुद्ध धम्मात स्त्रियांच्या सुखाकरिता आणि दास्यमुक्ती करिता अधिक कार्य केले आहे. 

सर चार्ल्स एलिएट यांच्या मते बर्मा, थायलंड, तिबेट इत्यादि देशात स्त्रिया पाश्चिमात्य देशातील स्त्रियांप्रमाणेच स्वातंत्र्य उपभोगतात. 

चीन आणि जपान या देशात जेव्हा बुद्ध धम्म आपल्या पूर्ण ऊर्जितावस्थेत होता ( इसवीसन १० वे १२ शतक ) तेव्हा तिथे काही महिला लेखक सुध्दा उदयास आल्या होत्या. 

वरील लेखातील सर्व विवेचन पाहिल्यास कोण म्हणेल बुध्द हे स्त्रियांविरोधी होते व नंतर तो बदलत गेले ? 

स्वातंत्र्य, समता व बंधुत्व या त्रयींचा पुरस्कार करणाऱ्या बुद्धांवर केलेले आरोप हा त्यांची महती न पचणाऱ्या निर्बुध्द माणसाला शोभणारा आहे असेच खेदाने म्हणावे लागेल. 

- अरविंद भंडारे 

पालि रिसर्च इन्स्टिट्यूट मुंबई

संदर्भ - 

थेरीगाथा. 

बुद्ध धर्मावरील १६ आरोप व त्याचे खंडन.

विनयपिटक. 

भगवान बुद्ध. 

आणखी खोलात उतरण्यासाठी Woman in Buddhist Literature - B. C. Law 

Women Under Primitive Buddhism - I.B. Horner.

Women in Early Buddhist Literature - I. B. Horner.

Psalms of the Sisters - Mrs. Caroline Rhys Davids

 हि पुस्तके अभ्यासावित.

Tuesday, 7 March 2023

विभक्ती

विभक्ती :- वाक्य शब्दांपासून बनलेले असते परंतु नुसते शब्द एकापुढे एक ठेवल्याने वाक्याचा बोध होत नाही.वाक्याचा बोध व्हावा व शब्दाचा संबंध जुळावा म्हणून शब्दाच्या रुपात प्रत्ययाद्वारे बदल करावा लागतो. हा बदल एकूण सात प्रकारे करता येतो किंवा एकच शब्द सात भागांमध्ये विभाजित करता येतो  यालाच विभक्ति म्हणतात. 

प्रत्यय : नामाचे किंवा सर्वनामाचे, विशेषणाचे रूपे तयार करताना त्यांना शेवटी जी अक्षरे जोडली जातात त्यांना प्रत्यय म्हणतात.

पालीभाषेत एकूण सात विभक्ती आहेत ते पुढीलप्रमाणे 

१) कर्ता : स्वतः क्रिया करणारा व्यक्ति किंवा वस्तूला कर्ता म्हणतात.

२) कम्म : ज्या वस्तू किंवा व्यक्तीवर क्रिया केली जाते तिला कम्म म्हणतात.

३) करण : ज्या वस्तूच्या किंवा व्यक्तीच्या मार्फत किंवा त्याच्या सहाय्याने क्रिया केली जाते 

त्या शब्दाला करण म्हणतात. 

४) सम्पदान : ज्या वस्तू किंवा व्यक्तीसाठी  किंवा व्यक्ती करीता क्रिया केली जाते तेव्हा त्या शब्दाला सम्पदान म्हणतात

५) अपदान: जेव्हा एका वस्तूपासून एखादी वस्तू दूर जात असेल किंवा एका व्यक्तीपासून एखादी व्यक्ती दूर जात असेल म्हणजेच दोघांमधे विरह होत असेल तर ज्या व्यक्ती किंवा वस्तुपासून विरह  होतो त्या शब्दाला अपदान म्हणतात

६) सम्बध : जेव्हा व्यक्ती व्यक्ती मध्ये किंवा वस्तू वस्तू मध्ये नातेसंबंध,मालकी हक्क दर्शवयाचा असेल तेव्हा त्या शब्दाला सम्बध म्हणतात.

७)अधिकरण : वस्तु  किंवा व्यक्तींची जागा दर्शवायची असेल तेव्हा त्या शब्दाला अधिकरण म्हणतात. 

-------------------------------------------------- 

१) पठमा विभक्ति :- कर्ता - जो  क्रिया करतो                

२) दुतीया विभक्ति :- कम्म - ज्याचावर क्रिया केली जाते (स,ला,ना)

३) ततिया विभक्ति :- करण - ज्याद्वारे क्रिया केली जाते (च्याद्वारे,च्या मार्फत )

४) चतुत्थी विभक्ति :- सम्पदान - च्यासाठी क्रिया केली जाते (च्यासाठी,च्याकरिता)

५) पञ्चमी विभक्ति :- अपदान - विरह होणे,च्यापासून दूर जाणे (च्यापासून)

६) छट्ठी विभक्ति :- सम्बध - एकमेकांमधील संबध सांगणे (चा,ची,चे)

७) सत्तमी विभक्ति :- अधिकरण   निश्चित स्थान सांगणे (च्यावर, च्याखाली, च्याआत, च्याबाहेर)

Saturday, 4 March 2023

बहुश्रुत धम्मभांडागारिक - भन्ते आनन्द

 बहुश्रुत धम्मभांडागारिक - भन्ते आनन्द


भिक्खू संघाला उद्देशून बुद्ध म्हणाले, "पंडितो, भिक्खवे, आनंदो; महापञा, भिक्खवे, आनंदो, यत्र हि नाम मया संखित्तेंन भासितस्स वितथारें अथं आजानिस्सति....." म्हणजे भिक्खुंनो, आनन्द पंडित आहे, महाप्रज्ञावन आहे. मी संक्षेपाने सांगितलेले त्याने विस्ताराने समजून घेतले'.


मगध राज्यातील आखीव रेखीव भातशेती पाहताना बुद्धांना मनोमन वाटले कि भिक्खूसंघाला अशाच प्रकारे चीवर शिवून घ्यावे. त्यांनी तसे आनन्दला सांगितले  असता, काही दिवसांनी भन्ते आनन्द यांनी अगदी बुद्धांच्या मनात होते तसे आणि भातशेती प्रमाणेच काटेकोरपणे शिवून एक चीवर आणले होते. अनेक गुणांपैकी भन्ते आनन्द यांचा हा एक गुण बुद्धांना खूप आवडे. 


कपिलवस्तू मध्ये नंद आणि राहुल यांची प्रवज्जा झाल्यानंतर भ.बुद्ध, मल्लांच्या प्रदेशातील अनुपिया येथील आम्रवनात थांबले होते. बुद्धांनी दिलेल्या देशनेचा विचार केल्यानंतर आणि ते पटल्यानंतर, भ.बुद्ध यांचा चुलत भाऊ, राजकुमार आनन्द आणि शाक्य गणातील भद्दीय, अनिरुद्ध, भृगु, किंबिल, देवदत्त आणि उपाली यांनी अनुपिया येथे येऊन प्रवज्जा घेतली. त्यानंतर बुद्धांनी राजगृह मधील सितवन या स्मशानवनात दुसरा वर्षावास व्यतीत केला. म्हणजेच भ. बुद्धांच्या संबोधी प्राप्त केल्यानंतर थोड्याच अवधीत आनन्द यांनी धम्माची दीक्षा घेतली होती. त्या समयी धम्माचा प्रसार आणि संघाची बांधणी जोमाने होत होती आणि यात भन्ते आनन्द इतर भिक्खुंप्रमाणे सहभागी असे. भ.बुद्धांनी सांगितलेल्या मार्गावर अतिशय श्रद्धापूर्वक वाटचाल करीत, एका वर्षातच भन्ते आनन्द हे स्रोतापन्न झाले. बुद्धांनी पाचवा वर्षावास वैशाली मध्ये व्यतीत केला. त्यावेळेस महापजापतिने पुन्हा एकदा बुद्धांना विनंती केली कि त्यांना प्रवज्जा द्यावी. मात्र बुद्धांनी पुन्हा नकार दिला.  यावेळेस भन्ते आनन्द यांनी शिष्टाई केली. त्यामुळे भिक्खुणी संघाची स्थापना झाली. आजतागायत जगभरातील भिक्खुणी संघ भन्ते आनन्द यांच्याप्रती आदर व्यक्त करतात. 


भ.बुद्धांना त्यांच्या दैनंदिन कार्यात मदत करायला अनेक भिक्खू तत्पर असत, मात्र कोणी स्थायी असे नव्हते. मेघीय, सागत, राध, नागसमाल, उपवना, नगिता, चुंदा अशा अनेक भिक्खूंची नांवे पालि साहित्यात आढळतात जे पूर्वी बुद्धांचे सेवक होते. विसाव्या वर्षावासात, बुद्धांनी स्थायी उपस्थाक (स्वीय सचिव) नेमण्याची सूचना केली होती. त्यांनी भन्ते आनन्द यांना आपले उपस्थाक नेमले, मात्र आनंदांनी बुद्धांना आठ विनंती मान्य करण्यास सांगितल्या. त्यांपैकी पहिले चार म्हणजे - बुद्धांना मिळालेले अन्न किंवा भेटी आनन्दला देऊ नये, बुद्धांना मिळालेले चीवर आनन्दला देऊ नये, आनंदासाठी विशेष राहण्याची सोय करू नये, जेथे बुद्धांना घरी जेवणाचे  आमंत्रण मिळाले आहे, तेथे आनन्दला येण्याची सक्ती करू नये. हे यासाठी कि लोकांना वाटू नये कि भन्ते आनन्दने वैयत्तिक स्वार्थासाठी हे पद स्वीकारले आहे. उरलेले चार म्हणजे - भन्ते आनन्दना मिळालेले भोजनाचे आमंत्रण योग्य वाटल्यास ते बुद्धांकडे वर्ग करतील, बाहेरगावचे लोक आले कि भन्ते आनन्दच त्यांची भेट बुद्धांशी घडवून आणतील, धम्मासंबंधी असलेले प्रश्न, बुद्धांना ते कधीही विचारू शकतील आणि जर एखाद्या ठिकाणी आनन्द बुद्धांसोबत जाऊ शकत नसेल, तर त्या ठिकाणी दिलेली देशना आणि झालेले प्रश्नोत्तर, बुद्धांनी हे विहारात आल्यानंतर आनन्दला पूर्णपणे सांगतील.


धम्माच्या प्रसारासाठी आणि बुद्धविचार संवर्धनासाठी या शेवटच्या चार विनंती महत्त्वाच्या होत्या. 


भन्ते आनन्द हे अत्यंत कुशाग्र बुद्धीचे, एकपाठी आणि तीव्र स्मरणशक्तीचे होते. धम्माचा प्रत्येक विचार, बुद्धांची प्रत्येक कृती, लेखनाअभावी, स्मृतीत संकलित करून ठेवणे आणि ते जसेच्या तसे पुढील पिढीतील किंवा दूरच्या प्रदेशातील भिक्खुंपर्यंत पोहचविणे गरजेचे होते हे जाणून, भन्ते आनन्द यांनी ही विनंती केली होती. त्यांच्या या दूरदृष्टीचे कौतुक करीत बुद्धांनी हे सर्व मान्य केले आणि मग सुरु झाला पुढील पाव शतकाचा प्रवास ज्यात परस्पर सहवास, संवाद, सहवेदना आणि सतधम्माच्या प्रसाराचा ध्यास होता!  


बुद्धांचा उपस्थाक म्हणून भन्ते आनन्द यांचा जवळपास संपूर्ण दिवस जायचा. मात्र तरीही दुपारी जेव्हा बुद्ध विश्रांती घेत, तेव्हा त्यावेळात आनन्द, भिक्खू-भिक्खुणी संघात जाऊन त्यांची विचारपूस करायचे, त्यांच्या अडचणी जाणून घ्यायचे तसेच आलेल्या उपासकांना मार्गदर्शन करायचे. पालि साहित्यात भन्ते आनन्द यांच्याबद्दल खूप गौरवपूर्ण उल्लेख आढळतो. अनेकवेळा बुद्ध देशना सुरु करत आणि भन्ते आनन्दला ती पूर्ण करण्यास सांगत. असा गौरव त्यांच्या व्यतिरिक्त फक्त सारीपुत्त आणि महाकच्चायन यांना प्राप्त होता! मज्झीम निकायातून कळते कि राजा पसनेदि यांना धम्म चांगला समजावून सांगितला म्हणून बुद्धांनी भन्ते आनन्द यांचा गौरव केला होता तर दीघनिकाय मध्ये भिक्खू संघाला उद्देशून बुद्ध म्हणतात, "आनन्द मध्ये चार गुण आहेत - तो जेव्हा भिक्खू संघाकडे जातो, तेव्हा त्यांचा उल्हास वाढतो, जेव्हा तो त्यांना धम्म सांगतो तेव्हा धम्माप्रती त्यांची श्रद्धा वाढते, त्याचे प्रवचन संपूच नये असे त्यांना वाटते, आणि हेच विचार भिक्खुणी, राजे, उपासक आणि उपसिकांचे देखील आहेत". 


'सिलब्बतसुत्त' मध्ये भ.बुद्ध, भिक्खूंना उद्देशून म्हणतात, "सेखो, भिक्खवे,आनंदो; न च पनस्स सुलभरुपो समसमो पञञाया'ति" म्हणजे भिक्खुंनो, आनन्द अजूनही शिकतो आहे पण त्याच्या सारखा विवेकी आणि प्रज्ञावान सापडणे सोपे नाही". एका उपासकाने श्रद्धेपोटी बुद्धांचा आणि संघाचा उच्च भेटी देऊन आदर व्यक्त केला आणि विचारले कि धम्माप्रती आदर कसा व्यक्त करू. बुद्धांनी त्याला सांगितले कि धम्माप्रती आदर व्यक्त करायचा असेल तर आनन्दचा सत्कार कर कारण त्यालाच धम्माचा प्रत्येक शब्द तोंडपाठ आहे. त्या उपासकाने भन्ते आनन्दना एक अतिशय उच्च प्रतीची शाल दिली जी त्यांनी भन्ते सारीपुत्तांना दिली कारण आनंदांच्या मते बुद्धांनंतर सारीपुत्त हेच श्रेष्ठ होय! विनम्रता हा भन्ते आनन्द यांचा स्थायी स्वभाव होता.


श्रावस्ती येथे असताना, भन्ते आनन्द यांनी बोधीवृक्षाच्या बी पासून एक रोपटे तयार केले होते जे त्यांनी जेतवनाराम विहाराच्या प्रवेशद्वाराच्या जवळ लावले व त्याला खूप ममतेने वाढविले. सगळेजण याला "आनन्दबोधी" म्हणत. याच झाडाच्या सावलीत 'पदुम आणि कालिंग जातक' सांगितल्या गेल्या होत्या. आजही त्या मूळ झाडाचे वारसदार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. 


थेरगाथेमध्ये भन्ते आनन्द यांनी आपल्या आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या क्षणांचे वर्णन केले आहे. त्यांच्या मनात उमटणारे विचार हे एका प्रगल्भ, अभ्यासू, पारदर्शी धम्मधराचे मनोगत आहे. बुद्धवचनांचे वर्णन करताना ते म्हणतात - द्वासीति बुद्धतो गणहीहं, द्वे सहस्सानि भिक्खुतो I चतुरासीतिसहस्सानि, ये मे धम्मा पवत्तीनो II म्हणजेच ८२,००० सुत्त बुद्धांनी दिले आणि २००० सुत्त भिक्खुंनी दिले आणि या सगळ्या ८४,००० सुत्त मला माहित आहेत. 


संपूर्ण भिक्खू संघामधून, भ.बुद्धांनी फक्त दोनच भिक्खूंना पदे दिली होती. भन्ते सारीपुत्त यांना "धम्मसेनापती" आणि भन्ते आनन्द यांना "धम्मभंडागारिक" म्हणजे 'धम्माचा सांभाळ करणारा' ही ती पदे होय. विशेष म्हणजे सारीपुत्त आणि आनन्द यांच्यामध्ये प्रचंड मैत्री होती. भन्ते सारीपुत्त यांचे परिनिब्बाण झाल्यानंतर भन्ते आनंद यांना खूप दुःख झाले होते. आपले आवडते मित्र सारीपुत्त, मोग्गल्लय्यान तसेच राहुल आणि भद्द कात्तायणी (यशोधरा) यांचे एका पाठोपाठ जाण्यावर भन्ते आनन्द व्यथित होऊन म्हणतात - ये पुराणा अतीता ते, नवेहि न समेति मे I स्वज्ज एकोव झायामि, वस्सूपेतोव पक्खिमा II म्हणजे जुने आता निघून गेले, नव्यात मी सामावलो नाही, आज मी एकटाच ध्यान करतो, जसा एखादा पक्षी आपल्या घरट्यात गेला आहे. 


भ.बुद्धांचे महापरिनिर्वाण झाल्यानंतर भन्ते आनन्द यांना अतीव दुःख झाले. ते म्हणतात - न पक्खन्ती दिसा सब्बा, धम्मा न पटिभन्ती मं I गते कल्याण मित्तम्हि, अन्धकारंव  खायति II म्हणजे, सगळ्या दिशा धूसर झाल्या आहेत, धम्मही मला दिसत नाही, माझा कल्याणमित्र गेला आहे, सगळीकडे अंधकार आहे. 


बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर भरविण्यात आलेल्या पहिली संगिती मध्ये ५०० अर्हत भिक्खू घ्यावे असे ठरले. महाकाश्यप यांनी ४९९ अर्हत निवडले आणि १ जागा मोकळी ठेवली कारण भन्ते आनन्द अर्हत नव्हते. संगितीच्या पूर्वरात्रीला भन्ते महाकाश्यप आणि अनिरुद्ध यांनी आनन्द यांना मार्गदर्शन केले आणि ध्यान करत असतानाच, आनन्द यांना अर्हत्व प्राप्त झाले. याचे वर्णन करताना ते म्हणतात - गतिमन्तो सतिमन्तो, धितिमन्तो च यो इसि i सद्धम्मधारको थेरो, आनन्दो  रतनाकारो II म्हणजे जो शीलवान, प्रज्ञावान, बलवान आणि धिरोदत्त धम्मधर आनन्द आहे, तो आता विझून गेला आहे (निब्बाण प्राप्त). "एवं मय सुत्त" म्हणजे 'असे मी ऐकले आहे' अशी सुरुवात करत भन्ते आनन्द यांनी संपूर्ण सुत्तपिटक पहिल्या संगितीमध्ये सविस्तरपणे सांगितले. प्रत्येक सुत्त भ.बुद्धांनी कुठे म्हटले, कोणाला उद्देशून म्हटले, काय कारण घडले होते अशी सर्व माहिती त्यात आहे. त्यामुळे सुत्तपिटकाच्या अभ्यासातून त्याकाळातील संपूर्ण परिस्थिती लक्षात येते. याच संगितीमध्ये भन्ते आनन्द यांच्यावर काही आरोप लावण्यात आले होते. ते त्यांनी स्पष्टीकरण देत मान्य केले नाही मात्र संघात फूट पडू नये म्हणून औपचारिकता म्हणून क्षमा याचना केली.  


वयाच्या १२०व्या वर्षी मृत्यू आता जवळ आला आहे हे उमजून, भन्ते आनन्द वैशालीकडे निघाले कारण ती त्यांची आवडती नगरी होती. मात्र आपल्या परिनिब्बाणाची घोषणा त्यांनी राजगृहामध्ये केली होती. त्यामुळे दोन्ही राज्याला वाटत होते कि भन्ते आनन्द यांनी त्यांच्या नगरीत परिनिब्बाण प्राप्त करावे. म्हणून भन्ते आनन्द यांचे माघ पौर्णिमेला, रोहिणी नदीच्या मध्यावर ध्यानसमाधीच्या मार्गाने परिनिब्बाण प्राप्त केले. त्यांच्या अस्थींवर वैशाली मध्ये एक स्तूप बांधण्यात आला जो आजही दिसतो तर राजा अजातसत्तूने देखील एक स्तूप बांधला ज्याचे अवशेष आजही पाहायला मिळतात. 


अतुल मुरलीधर भोसेकर

९५४५२७७४१०

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...