सध्याच्या नालासोपारा - सोपारा परिसरात सम्राट अशोक यांच्या धर्माज्ञा असलेले दोन शिलालेख सापडले आहेत. सम्राट अशोकाच्या शाही आज्ञा आणि त्याच्या अन्य आलेखांचे बृहद शिलालेख, लघु शिलालेख, विशाल स्तंभालेख, लघु स्तंभालेख आणि गुंफा शिलालेख असे पाच प्रकारचे शिलालेख आहेत. सोपारा परिसरातील हे दोन्ही शिलालेख सध्या प्रिन्स ऑफ वेल्स वस्तू संग्रहालय मुंबई येथे आहेत. त्यापैकी एक १८८२ साली पंडित भगवानलाल इंद्रजी यांना सोपाऱ्याच्या पूर्वेस असलेल्या भातेला गावातील तलावाजवळ सापडला. तर दुसरा शिलालेख मुंबईच्या एशियाटिक सोसायटीचे ग्रंथपाल एन ए गोरे यांना १९५६ साली सोपाऱ्याजवळील भुईगाव येथून शोधून काढला.
सोपारा येथील पहिल्या शिलालेखात सम्राट अशोक यांनी धर्मयात्रा करण्यास सुरू केल्याचा उल्लेख केला आहे. त्याच परीसरातील दुसऱ्या शिलालेखात सम्राट अशोकाचे म्हणणे आहे. लोक अनेक मंगल कार्य करतात तसेच अनेक प्रकारच्या विधी करतात त्यामुळे कोणतीही फलप्राप्ती होत नाही. पण ज्यामुळे फलप्राप्ती होते तो म्हणजे धर्ममंगल विधी होय. यात नोकरांशी चांगले वर्तन, गुरुजनांबद्दल आदर, प्राण्यांची हिंसा न करणे. ब्राह्मण व भिक्खूंना दान करणे म्हणजेच धर्ममंगल होय. अशा अर्थाचे धर्मोपदेश या शिलालेखात कोरलेले आहेत. हा दुसरा शिलालेख खालील प्रमाणे :-
"देवानंपिये पियदसि लाजा आहा। जने उचाबुचं मंगल कलेति आबाधसि आवाहसी विवाहसि पजोपदाने यावाससि एताये अंनाये चा एदिसाये जने बहू मंगल कलेति । हेतु चु अबक अनियो बहूचा बहुविध चा खुद चा निलथिया चा मंगल कलंति से । कटवि चेव खो मंगले। अपफले चुखो एसे। इयं चु खो महाफले ये धर्ममंगले। हेता इथं दासभटकसि सम्पापटिपाति गुलुना अपचिति पानानं संयमे समनबंभनान दाने एसे अंनेचा हेडिसे। धंममंगले नामा। से वतविये पितिना पि पुतेन पि भातिना पि सुवामिकेन पि मित संधुतेना अव पटिवेसियेना पि इयं साधु इयं साधु इयं कटविये मगले आवतसा अथसा निवुतिसा इमं कछामि ति । एहि इतले मगले संसयिक्ये से। सियावतं अठनिवटेया सियापुनानो। हिद लोकिके चे वसे । इयं पुना धममगले अकालिक्ये हंचे पुन तं अठं नो निटेति हिद अठं पलत अनंत पुना पवसति। हंचे पुन तं अठं निवतेति हिंदा ततो उभयेसं लथे होति हिदचा से अठे पलत चा अनंतं पुना पसवति तेना धंम मगलेना"
मूळ पाली शिलालेखाचे भाषांतर -
देवानांप्रिय प्रियदर्शी राजाचे म्हणणे असे आहे की, जनता अनेक प्रकारचे मंगलकार्य करते. आजारपणात, लग्नकार्यात, विविध निमंत्रणात, पुत्रजन्माचे वेळी, बाहेर जातेवेळी व अशाच विविध प्रसंगी लोक नानाप्रकारचे विधि करतात. विविध विधि करावेत याबद्दल वाद नाही. परंतु अशाप्रकारच्या विधिपासून थोडेसे फळ मिळते. ज्या विधीपासून पुष्कळ फळ प्राप्त होते तो विधि म्हणजे धर्ममंगल होय. कारण यात दास व नोकर यांचेशी योग्य वर्तन करणे याचाही समावेश आहे. गुरुजनांबद्दल आदर व पूजा केली जाते. प्राणिमात्रासंबंधी संयम, अहिंसा पाळली जाते. ब्राह्मण व भिक्षुना दानधर्म केला जातो. ह्या पुण्यकारक बाबींचा धर्ममंगल कार्यात समावेश होतो. ह्या व अशा प्रकारच्या बाबी म्हणजे धर्ममंगल.
अशोकाचे शिलालेख हे अशोकाच्या कारकिर्दीच्या इतिहासाची अतिशय महत्त्वाची अशी साधने आहेत.ज्या ज्या ठिकाणी हे आलेख सापडले त्यावरून मौर्य साम्राज्याच्या सीमा निश्चित करणे शक्य होते.अशोकाने बौद्ध धर्माचा स्वीकार केल्याचा पुरावा यामधून मिळतो. बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी अशोकाने केलेल्या कामगिरीचे वर्णन यातून मिळते. बौद्ध धर्माची दीक्षा घेतली असली तरी, अशोक कर्मठ नव्हता तसेच आपल्या प्रजाजनांवर बौद्ध धर्म सक्तीने लादण्याचा अशोकाने कधीच प्रयत्न केला नसल्याचेही या आलेखांतून स्पष्ट होते. परदेशात बौद्ध धर्म आणि भारतीय संस्कृतीचा प्रसार करण्यासाठी अशोकाने बौद्ध भिक्षूंना पाठवल्याचा लेखी पुरावा या शिलालेखांतून मिळतो.
९
सोपारादीप, अशोकाचे शिलालेख
सम्राट अशोक आणि त्याचे शिलालेख
सोपारा बौद्ध संस्कृतीचे केंद्र
No comments:
Post a Comment