Saturday, 25 March 2023

मैत्री भावनेचे फळ

 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_।। मैत्री भावनेचे फळ ।।_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

        _दस पारमितांपैकी *"मैत्री पारमिता"* अतिशय महत्वपूर्ण पारमिता आहे. *"मेत्ता" या पालि शब्दाला समानार्थी मराठी शब्द मैत्री आहे.* मेत्ता म्हणजे अघाद सदिच्छा भावना. मेत्ता भावना कुल,गोत्र, जात धर्म,वंश वर्ण,श्रीमंति, सौंदर्य, सत्ता, शत्रुत्व असा भेदभाव करावयास शिकवत नाही. मेत्ता भावना केवळ मनुष्यप्राण्याकरिता सिमित नसते. मेत्ता भवना सर्व लहान, मोठ्या, दृश्य, अदृश्य, पाळीव, हिंस्त्र, पृथ्वीवरील, भूमिगत, अन्तरिक्षातील ,जीवसृष्टिमधील प्राण्यांविषयी असू शकते._

               _*आपल्या विरोधात  कटकारस्थाने रचणारा "देवदत्त" याच्या बाबतीत समसमान "मैत्री भावना" बुद्धाने जोपासलि. ते सुडबुद्धिने वागणारे, विघ्नसंतोषी नव्हते. बुद्ध हे समस्त मानव जातीचे नैतिक शास्ता आहेत. बुद्धांच्या अन्तःकरणात सर्व मनुष्य तथा प्राण्यांबाबत समान "मैत्री भाव" होता.*_

        _इतर कोणत्याही सद्गुणांपेक्षा मैत्री ही शांतता, समजूतदारपणा आणि परिपक्वता लोकांमध्ये वाढविण्यास प्रेरणादायी ठरते. ज्या युगात वैर, द्वेष, अशांतता, हिंसाचार यांचे थैमान लोकांमध्ये माजले आहे त्या युगात मैत्री खरोखरी दूर्मिळ आहे. अज्ञानामुळे आपण विरोधी किंवा स्पर्धात्मक धोरण स्वीकारतो. वैयक्तिक आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा हे खरे आहे की, आपण प्रकटपणे परोपकाराच्या बाता मारतो परंतू प्रत्यक्षात वागताना मात्र प्राण्यांसारखेच वागतो. परिस्थितीनुसार गुरगुरतो, चावतो, भितीमुळे लपतो किंवा चापलूसी करतो. मानवद्वेष्टा म्हणून घेण्याचा धोका पत्करून असे म्हणावेसे वाटते की, उच्चभ्रू वर्गात आणि सर्वसाधारण लोकात अशीच माणसे जास्त असतात._

_*करणिमेय सुत्तात* खालील गाथा आली आहे :-_

_*तिट्ठं चरं निसिन्नौवा सयानो वा यावतस्स विगतमिद्धो ।*_

_*एतं सतिं अधिठ्ठेय्य, ब्रह्ममेत्तं विहारं इधमाहु।।*_

       _अर्थात उभे असताना, चालताना, बसले असता, अथवा अंथरूणात जोपर्यंत निद्रा आली नाही तोपर्यंत ही मैत्रीभावनेची स्मृति कायम ठेवावी. हिलाच इहलोकी सर्वश्रेष्ठ मैत्रीजीवन असे म्हणतात._

         _*भगवंत म्हणतात- 'हे भिक्षूंनो, चित्ताला विमुक्त करणाऱ्या मैत्री भावनेनुसार आचरण करीत असता तिचे चिंतन करीत राहिल्याने, तिचा सतत अभ्यास करीत राहिल्याने, आपल्या मनात तिचा विस्तार होऊ दिल्याने, तिलाच मुख्य आधार मानल्याने, तिचे अनुष्ठान केल्याने, तिला योग्यरीतीने आत्मसात केल्याने आणि तिच्या भावनेत पूर्णतः रममाण झाल्याने अकरा प्रकारचे फळ प्राप्त होऊ शकते. ते असे :-*_

_*१) सुखाने झोप येते*_

_*२) उत्साहपूर्वक जाग येते*_ 

*_३) वाईट स्वप्न पडत नाही_*

_*४) इतर मनुष्यांशी मैत्री जडते*_ 

_*५) अमनुष्यांशीही मैत्री घडून येते*_

_*६) देवता त्यांचे रक्षण करतात*_

_*७) अग्नी, विष किंवा हत्यामुळे त्याला कधीच हानी पोचत नाही*_ 

_*८) तात्काळ चित्त स्थिर होऊन समाधी लागते*_

_*९) त्याला नेहमी प्रसन्नता लाभते*_ 

_*१०) न घाबरता प्रसन्नतापूर्वक मृत्यू पावतो आणि*_

*_११) तो अर्हतपदापर्यंत पोचू शकला नाही, तरी तो निश्चितच ब्रह्मलोकात जन्म ग्रहण करतो._*

         _कोणी एखादा लढवैय्या सैनिक अभेद्य जाळीदार कवच अंगात घालून रणमैदानात उतरतो तेव्हा त्याच्यावर कितीही बाण मारले तरी ते सर्व कवचाला लागून खाली पडतात. त्यामुळे त्या सैनिकाचे काही एक बिघडत नाही. तेव्हा हा गुण त्या सैनिकाचा समजला जाणार नाही, तर हा गुण त्याने अभेव कवचाच होय. *त्याचप्रमाणे वरील गुण त्या व्यक्तीचे नसून मैत्रीभावनेचे आहेत. ज्यावेळी कोणी मनुष्य मैत्रीभावनेत रमून गेलेला असतो, त्यावेळी त्याचे अग्नी, विष किंवा तीक्ष्ण हत्यारसुद्धा काही एक बिघडवू शकत नाहीत. आणि दृष्ट विचाराने कोणी एखादा त्याच्यावर चाल करून आलाच तर त्या मैत्रीभावनेच्या चिंतनात मग्न असलेल्या व्यक्तीकडे पाहण्याची हिंमतसुद्धा होणे शक्य नाही, तर त्याचे काही बरे वाईट करणे तर दूरच राहिले. हे गुण व्यक्तीचे नसून त्या मैत्री भावनेचे होत, असे समजले पाहिजे."*_

          *_कोणी एक मनुष्य आपल्या हातात धरलेली जादूची कांडी घेतो. ती कांडी हातात घेता क्षणीच तो गायब होतो. त्यामुळे तो सामान्य माणसाच्या दृष्टीस पडत नाही. तेव्हा हा गुण त्या व्यक्तीचा नसून या मंथरलेल्या कांडीचाच समजला जाईल. याप्रमाणेच वरील गुण त्या व्यक्तीचे नसून मैत्री भावनेचे होत असे समजावे._*

        _जेव्हा व्यक्ति 'जे जसं आहे तसं' पाहायचं शिकते आणि आपल्या संपर्कात येणाऱ्यांना समजायचा प्रयत्न करते तेव्हा ती त्याच्याशी मैत्री करू लागते. विरोध करणे किंवा स्पर्धा करणे सोडून मदत करायला लागते. त्यांचा द्वेषही करीत नाही अगर त्यांना कंटाळतही नाही. होईल तेवढी मदत करते अन्यथा त्यांचे मंगल होवो अशी सदिच्छा व्यक्त करते._

       _*बौद्ध साहित्यात / त्रिपिटकातील "धम्मपदं" मध्ये एक पद आहे. श्रीलंकेतील लोकांच्या जीवनावर आणि विचारांवर अत्यंत खोल ठसा जर कोणी उमटविला असेल तर ती "मेत्ता भावना" होय.*_ 

_*न हि वेरेन वेरानि सम्मन्तिध कुदाचनं । अवेरेन च सम्मन्ति एस धम्मो सनन्तनो ।।*_

       _निर्भयता, समन्वय, मित्रत्वाचे संबंध, मैत्रीची वृद्धी ज्यामुळे मानव उच्च अवस्थांप्रत जाऊ शकतो हे वैशिष्टय आहे बुद्ध शिकवणीचे. विरळ पण मौल्यवान अशी ही मैत्री एक दुसऱ्याला समजून घेते आणि मदतीला तत्पर असते. *मेत्ता भावनेचा प्राणच जणू उपरोक्त गाथेत आलेला आहे.*_

          _या पृथ्वीतलावरी आजवरचा महान सम्राट अशोक कलिंग युद्धानंतर  बौद्ध धम्माच्या अधिक समीप आला तेव्हा तो बुद्धमय झाला......मैत्रिमय झाला. एक राजा - सम्राट युद्ध केल्याशिवाय राहू शकत नाही त्यावेळी ह्या जंबुद्विपाचा हा सम्राट युद्धबंदीचा निर्णय घेतो....संपूर्ण प्रजेस आपल्या मुलांप्रमाणे प्रेम करतो....मुलांवरच नाहीतर पशु-पक्षांवर ही अमर्याद मैत्रीची भावना व्यक्त करतो हे त्याच्या शिलालेखावरून आपल्याला ज्ञात होते._

*मेत्ता भावनेचे एक उदाहरण जयमंगल अष्टगाथेतील एक पदात आलेले आहे :-*

*_नालागिरि गजवरं अतिमत्तभूतं,_*

*_दावग्गिचक्कमसनीव सुदारूणन्तं।_*

*_मेत्तम्बुसेक विधिना जितवा मुनिन्दो,_*

*_तं तेजसा भवुत ते जयमंगलानि।।_*

              *_ज्या मुनींद्राने, दावाग्नीचक्र आणि विजेप्रमाणे अत्यंत भयानक आणि मदोन्मत अशा नालागीरी हत्तीला आपल्या मैत्री अभिषेकाने जिंकले, त्या भगवान बुद्धाच्या प्रतापाने तुमचे कल्याण होवो..._*

         _त्रिपिटकात मैत्री कशी असावी याबद्दल सारिपूत्त आणि मोग्गल्लान या दोन घनिष्ट मित्रांची कथा आली आहे. *या द्वयीचा भगवान बुद्ध किती सन्मान, आदर करायचे ते सच्च विभंग सुत्तावरून स्पष्ट होते. (मज्झिमनिकाय) बुद्ध म्हणतात-* "भिक्खूंनो, सारिपुत्त आणि मोग्गल्लान यांचेशी सौख्य बाळगा, त्यांचा कित्ता गिरवा कारण ते समंजस आणि आपल्या धम्मबंधुंसाठी त्यांच्या धम्मजीवनात पाठिराखे आहेत. सारिपुत्त आईसारखे तर मोग्गल्लान सेवा करणाऱ्या दाईसारखे आहेत. सारिपुत्त तुम्हाला निब्बाणाकडे जाणाऱ्या प्रवाहात सोडून देण्यास समर्थ आहेत तर मोग्गल्लान तुमच्यातील अत्युच्च आदर्शाचे दर्शन करून देण्यास सक्षम आहेत. चार आर्यसत्यांचे दर्शन, आकलन, मिमांसा स्पष्ट करून देण्यास सारिपुत्ताचा हातखंड आहे."_

       _*चार ब्रह्मविहारांपैकी एक ब्रह्म विहार म्हणजे मेत्ता / मैत्री.* हीच मैत्री भावना तथागतांचा आदर्श घेऊन, सम्राट अशोक यांच्या पावलावर पाऊल टाकून आपण ही सर्व ह्या चराचरात विहार करीत असलेल्या सर्व प्राणीमात्रांबद्दल, मित्रांबद्दल आपल्या अपत्यांसाठी, आपल्या जोडीदारासाठी, आकाशात-जमिनीवर-पाण्यामध्ये सर्व ठिकाणच्या जीवजंतुंसाठी मङ्गल मैत्री करूया आणि आपले जीवन एक एक पाऊल टाकून निब्बान अवस्था गाठण्यासाठी प्रयत्न करूया._

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_महेश कांबळे_*

*_दिनांक :- २५/०३/२०२३

*_संदर्भ :-_*

_*१) करणियमेत्त सुत्त*_ 

_*२) धम्मपद*_ 

_*३) मिलिंद प्रश्न*_

_*४) अंगुत्तर निकाय*_

*_५) सच्च विभंग सुत्त (मज्झिमनिकाय)*_

*_६) जयमङ्गल अष्टगाथा_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2023/03/blog-post_25.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

No comments:

Post a Comment

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...