Tuesday, 21 March 2023

बुद्धावशेषांचे महत्त्व

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_।।  बुद्धावशेषांचे महत्त्व ।।_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

 *_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

          _भगवान बुद्धांचे अवशेष थायलंड या देशातून भारतीय लोकांना त्यांचे दर्शन व्हावे, त्यांनी ही त्यास वंदन करावे या उदात्त हेतूने ते अवशेष भारतात आणले गेले होते. मनुष्यजातीच्या उत्थानाकरिता ज्यांनी अत्यंत तळमळीने प्रयत्न केले, अपूर्व त्याग केला आणि मानव जातीला सुख-समाधान मिळवून दिले अशा राष्ट्रीय आणि समाज पुरुषांचे ज्या उत्स्फूर्ततेने पुष्पमाला, धूप दिपांनी पूजिले जाते, गौरविले जाते त्याचप्रमाणे देव-मानवांचे शास्ता, मार्गदर्शक सम्यक सम्बुद्धाला सर्व जगात गौरविले जाते, वंदिले जाते._

_*बुद्धांच्या अवशेषांचे पूजन धम्मानुकूल आहे काय?*_ 

         _*भगवान बुद्धांच्या अवशेषांना दिला जाणारा सन्मान, आदर, पूजा हे बुद्ध शिकवणीच्या सुसंगत आहेत काय? असा प्रश्न पडू शकतो. प्रत्यक्ष बुद्धांनी महापरिनिब्बाण सुत्तात चार प्रकारच्या मानवांना चैत्य किंवा स्तूपाचा सन्मान मिळतो असे सांगितले आहे. तथागत, अर्हत सम्मासम्बुद्ध आणि पच्चेक बुद्ध.*_

        _*अर्हत महेन्द्र थेरो यांनी त्यांच्या नेहमीच्या संयत आणि शीतल वाणीने राजा देवानामपिय तिस्स याला बुद्ध धातुवर चैत्य निर्मितीकरिता सुचविले तेव्हा "थूपाराम" या विशाल चैत्याची निर्मिती श्रीलंकेतील अनुराधपूर येथे बुद्धधातूंवर करण्यात आली.* प्रत्यक्ष बुद्धांचाच येथे निवास आहे अशी श्रीलंकेतील लोकांची भावना आहे. श्रीलंकेत किंवा जगाच्या कोणत्याही भागात जेथे जेथे बुद्ध धम्म गेला आहे त्या त्या भागातील बुद्धानुयायी भगवान बुद्धांच्या शारीरिक अवशेषांना अतिशय पवित्र मानतात आणि त्या प्रति सर्वोच्च आदरभाव, कृतज्ञता व्यक्त करतात._

          _*"सुमंगल विलासिनी"* या ग्रंथात असे नमूद आहे की, जेव्हा एखादा धार्मिक माणूस असा म्हणतो की चला, चैत्याची किंवा बोधिवृक्षाची पूजा करू तेव्हा हे त्याचे *"मेता वाची कम्म"* ठरते आणि जेव्हा ती व्यक्ती एखाद्या चैत्याची स्तूपाची यात्रा करते तेव्हा हे त्याचे *"मेत्ता काय कम्म"* ठरते._

*_बुद्धावशेषांची पूजा करण्याचा उद्देश_*

          _गैर बौद्ध आणि कधी कधी बौद्ध व्यक्तिकडून बुद्धमूर्तिची, बोधिवृक्षाची, चैत्याची. स्तूपाची पूजा अर्चा यावर टिका केली जाते. प्रथमतः हे समजून घेतले पाहिजे की, बौद्ध व्यक्ति इतर धर्मियांप्रमाणे लौकिक गोष्टींच्या प्राप्ती करीता तसे करीत नाहीत._

        _टिकाकारांनी केलेली टिका योग्य अथवा अयोग्य हे तपासून पाहिले पाहिजे. *भगवान बुद्धांनी संबोधि प्राप्ती करीता प्राणांतिक प्रयत्न केलेत, अतुलनिय त्याग केला. प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि संबोधि प्राप्तीनंतर ते ज्ञान मुक्त हस्ते वाटले. बहुजनांचे अनंत कल्याण केले. मानवाला दुःखमुक्त करण्याचा मध्यम मार्ग सांगितला. ह्या सर्व गोष्टींची जाण ठेवून बौद्ध लोक आपल्या आदर्शाप्रती आणि त्यांनी वापरलेल्या वस्तूंप्रति आदरभाव आणि सन्मान व्यक्त करतात त्यातून त्यांना अपार आनंद मिळतो. सुखसमाधान लाभते.*_

*_बुद्धावशेष हे एक ध्यानाचे आलंबन_*

        _बाह्य पूजेपेक्षा जास्त महत्त्वाचे व अधिक सखोल अनुभूति देणारे आलंबन म्हणजे भगवान बुद्धाचे पवित्र अवशेष होत. बुद्ध, धम्म आणि संघाच्या अतुलनिय आणि अत्युच्य गुणधर्माची अनुभूति देणारे हे आलंबन होय. पवित्र बुद्धावशेष ज्या चैत्यात किंवा स्तूपात ठेवले आहेत असे चैत्य / स्तूप उदात्त प्रकारचे आलंबन होय. *बुद्धावशेष है बुद्धांचे प्रतिनिधित्व करतात, सिद्धार्थ नावाच्या व्यक्तीचे नव्हे.* निर्वाणाचे ते साकार रूप होय. आणि निर्वाण हे प्रत्येक बौद्धाचे अंतिम लक्ष्य आहे. बुद्धावशेषांवर ध्यान करून बौद्ध व्यक्ति निर्वाणाची प्रेरणा मिळवू शकतात._

         _भगवान बुद्धांच्या अवशेषांचे बौद्ध धम्मात काय महत्त्व आहे याची चर्चा करणे या प्रसंगी उचित ठरेल. *महापरिनिब्बान सुत्तात बुद्ध म्हणतात - "आनंदा, या प्रमाणे बुद्धावशेषांची व्यवस्था करावी. त्या अवशेषांवर स्तूप बांधावे. पुष्प, धूप, दिप अर्पण करावे. मनःपूर्वक वंदन करावे. त्यांच्या सान्निध्यात मन स्थिर व शांत ठेवून बसावे. अशा लोकांना प्रसन्नता प्राप्त होईल आणि त्यांची उन्नति होईल*_

       _भगवान बुद्धांच्या आशादायी व उपयुक्त वाणीने निःसंशयपणे अनेक धार्मिक राजेरजवाड्यांना विशालकाय स्तूप बांधण्यास प्रेरित केले. तथागतांच्या महापरिनिर्वाणानंतर अनेक चढ उतार आले. शांती सुखाचे, समाधानाचे तसेच उद्वेगाचे, खिन्नतेचे, निराशेचे दुःखाचे दिवस आले आणि गेले परंतू या विशालकाय स्तूपांनी, जे प्रत्यक्ष बुद्धाचे रूपकात्मक दर्शन आहे, भारतातील तसेच साऱ्या जगातील बौद्ध अनुयायांना आकर्षित केले आहे. त्यांना सुख-समाधान आणि पवित्र भावनांच्या उच्च शिखरावर विराजमान केले आहे._

_*आदरांजलीसाठी तीन स्मारके*_

      _भगवान बुद्धांच्या पश्चात बौद्ध जगत तीन प्रकारच्या चैत्यांची पूजा करते. *आनंदाच्या एका प्रश्नाच्या उत्तरादाखल भगवान बुद्धाने तीन प्रकारच्या चैत्यांचा उल्लेख केला -*_ 

*_१) बुद्धाचे शारीरिक अवशेष_*

*_२) पारिभोगीका (भगवान बुद्धाने) वापरलेल्या वस्तू_* 

*_३) उद्देसिका (कलिंगबोधि जातक)_*

*बुद्धावशेष*

          _*दीघ निकायातील महापरिब्बाण सुत्तात* असा उल्लेख आहे की, भगवान बुद्धाच्या अंत्यसंस्कारानंतर एका स्वर्णपात्रात बुद्धावशेष गोळा करून सन्मानाने, अत्यंत आदरपूर्वक कुसीनारा येथे सात दिवस ठेवले. त्यानंतर त्याचे आठ भागात विभाजन करून आठ विभिन्न राज्यात पाठविले. त्यावर भव्य स्तूप उभारण्यात आले. सम्राट अशोकाने या स्तूपांचे उत्खनन करविले आणि त्यात सापडलेल्या बुद्धावशेषांवर चौऱ्यांशी हजार स्तूपांची निर्मिती केली._

_*धम्माचरण करणे हिच बुद्धांना सर्वोच्च श्रद्धांजली*_

         _*महापरिनिब्बाण सुत्तात* सांगितले आहे कि, धर्माचे बाह्य ढोंग, दिखावा करण्याला बौद्ध धम्मात मान्यता नाही. हे स्पष्टपणे लक्षात घेतले पाहिजे, आत्यंतिक पूजापाठ कर्मकांड किंवा आत्यंतिक तार्किकता यात अडकून न पडता तथागतांच्या मध्यम मार्गाच्या शिकवणीचा अवलंब करावा. *तथागतांच्या उपदेशानुसार प्रामाणिकपणे धम्माचरण करत जगणे ही तथागतांना सर्वात मोठी श्रद्धांजली होय.*_

*_चैत्य पूजेचे महत्त्व_*

          _बुद्धावशेष ज्या चैत्यात, स्तूपात ठेवले आहेत अशा चैत्याची किंवा स्तूपाची पूजा करणे, फूल-हार अर्पण करणे, दीप प्रज्वलीत करणे हे निव्वळ अर्थहीन कर्मकांड आहे काय? अबौद्ध व्यक्तीला तसे वाटू शकते. पण ज्या व्यक्तीला बुद्धांची शिकवण माहीत आहे आणि हे कर्मकांड जाणिवपूर्वक केल्या गेले तर त्याचे किती महत्त्व आहे हे समजल्यावर कोणीही हे कर्मकांड निरर्थक आहे असे म्हणणार नाही. *जेव्हा कोणी एक बौद्ध व्यक्ती बुद्धरूपासमोर फुले अर्पितो, दिप प्रज्वलित करतो आणि क्षणभर शांत राहातो त्यावेळी तो काही प्रार्थना करीत नसतो, काही मागत नसतो. बुद्धाच्या लोकोत्तर गुणांचे स्मरण करून ते आचरणात आणण्याविषयी चिंतन करीत असतो.* वाहीलेली फुले कोमेजतात, प्रज्वलित केलेला दिप विझतो यावरून अनित्यतेचा बोध होतो. *बुद्धरूप ध्यान आणि एकाग्रता प्राप्त होण्यास साहाय्यभूत होते. बुद्धगुणांचे स्मरण प्रेरणा देते ज्यांना ही साधी गोष्ट कळत नाही ते घाईगर्दीने ही मूर्तिपूजा होय असे म्हणून मोकळे होतात. हा सत्याचा विपर्यास होय.*_

          _भगवान बुद्धांनी संपूर्ण दुक्खमुक्तीचा जो मार्ग सांगितला त्यात दान, शील, भावना ही अंतर्भूत आहेत. या मार्गाच्या आचरणाने परिपूर्ततेने त्रिदोषांचे (लोभ, द्वेष, मोह) यांचे समुळ उच्चाटन होण्यास मदत होते. मनाचे हे तीन मळ माणसाला सुखापासून आणि विमुक्ती पासून रोखून ठेवतात. बुद्धमूर्तीसमोर फुले अर्पण करणाऱ्या व्यक्तिच्या मनात दान, शील, भावना या असतात._

          _*आता हे तीन गुण (दान, शील, भावना) त्रिदोषांचे कसे शमन करतात हे पाहू या. "पुष्प" हे निसर्गाच्या परिपूर्णतेचा कळस होय. पुष्प मुलतः सुंदर असते. त्याचा मनोहारी रंग दृष्टीला सुखावतो. त्याचा कोमल स्पर्श त्वचेला सुखद वाटतो. त्याचा सुगंध घाणेंद्रियाला प्रिय वाटतो. पुष्पा बद्दल मनात विचार उठताक्षणी आनंद होतो. अशी सुंदर, सुखद वस्तु बुद्धावशेषा समोर एक व्यक्ती ठेवतो हे निश्चितच 'दान' होय. आणि त्या क्षणापुरते तरी त्या व्यक्तिचे मन लोभापासून दूर झालेले असते. ही फुले जेव्हा ही व्यक्ती श्रद्धेने अर्पण करते तेव्हा स्वाभाविकच ही व्यक्ती वाचेने आणि शरीराने अनुशासित झालेली असते. 'शील' त्याच्या मनात उपस्थित असते. त्यावेळी तो द्वेषापासून मुक्त असतो. जेव्ही ही व्यक्ति चिंतन करते की, हे पुष्प यदा न कदा असेच टवटवीत राहणार नाही, ते कालांतराने कोमेजणारच, नष्ट होणारच त्याचप्रमाणे सृष्टीच्या नियमानुसार माझे शरीर सुद्धा कालपरत्वे नष्ट होणार आणि येथे अनित्यता दृष्टीगोचर होते. फुलाचे कोमेजणे, शरीराचे नष्ट होणे याचा कर्ता करविता कोणी नाही, आत्मा नाही (अनत्ता) ही भावना होय. अतः पुष्प हे एखाद्या खुंटीप्रमाणे होत की, ज्यावर आपण आपले प्रेरक विचार टांगून ठेवू शकतो. मन हे कधीच विश्रांती घेत नसते, ते साध्या सोप्या विचारांचे लोकोत्तर दृष्टीमध्ये परिवर्तन करते.*_

        _एखादी समंजस व्यक्ती आपल्या दिवंगत अथवा जीवंत माता-पित्याविषयी कृतज्ञता लपवू शकेल काय? शिक्षकाने, आचार्याने केलेल्या उपकारांशी कृतज्ञ होवू शकेल काय? ज्या आचार्याने आपले आयुष्य सन्मार्गावर आरूढ करून दिले अशा आचार्यांप्रति आदरभाव प्रकट करण्याचे थांबवेल काय? आचार्यांची तशी 'योग्यता' असेल तरच त्या आचार्यांविषयी पूज्य भाव प्रकट होईलच. *स्वतः बुद्धांनी महामंगलसुत्तात "पुजा च पुजनियानं" अर्थात पूजनिय लोकांची पूजा करावी असे म्हटले आहे.* ज्यांच्याप्रति सर्वोच्च सन्मान प्रकट करावा असे भगवान बुद्ध नाहीत काय? त्या योग्यतेचे नाहीत काय? म्हणून भगवान बुद्धाचे अवशेष हे धार्मिक आदरभाव प्रकट करण्याचे अमूल्य प्रतिक आहे._

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_महेश कांबळे_*

*_दिनांक :- २२/०३/२०२३

*_संदर्भ :-_*

_*१) महावंस*_ 

_*२) महापरिनिब्बाण सुत्त*_ 

_*३) कलिंगबोधी जातक*_ 

_*४) सुमंगल विलासिनी*_ 

_*५) महामंगलसुत्त*_

_*६) बौद्ध पौर्णिमा*_

https://mikamblemahesh.blogspot.com/2023/03/blog-post_21.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

No comments:

Post a Comment

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...