बहुश्रुत धम्मभांडागारिक - भन्ते आनन्द
भिक्खू संघाला उद्देशून बुद्ध म्हणाले, "पंडितो, भिक्खवे, आनंदो; महापञा, भिक्खवे, आनंदो, यत्र हि नाम मया संखित्तेंन भासितस्स वितथारें अथं आजानिस्सति....." म्हणजे भिक्खुंनो, आनन्द पंडित आहे, महाप्रज्ञावन आहे. मी संक्षेपाने सांगितलेले त्याने विस्ताराने समजून घेतले'.
मगध राज्यातील आखीव रेखीव भातशेती पाहताना बुद्धांना मनोमन वाटले कि भिक्खूसंघाला अशाच प्रकारे चीवर शिवून घ्यावे. त्यांनी तसे आनन्दला सांगितले असता, काही दिवसांनी भन्ते आनन्द यांनी अगदी बुद्धांच्या मनात होते तसे आणि भातशेती प्रमाणेच काटेकोरपणे शिवून एक चीवर आणले होते. अनेक गुणांपैकी भन्ते आनन्द यांचा हा एक गुण बुद्धांना खूप आवडे.
कपिलवस्तू मध्ये नंद आणि राहुल यांची प्रवज्जा झाल्यानंतर भ.बुद्ध, मल्लांच्या प्रदेशातील अनुपिया येथील आम्रवनात थांबले होते. बुद्धांनी दिलेल्या देशनेचा विचार केल्यानंतर आणि ते पटल्यानंतर, भ.बुद्ध यांचा चुलत भाऊ, राजकुमार आनन्द आणि शाक्य गणातील भद्दीय, अनिरुद्ध, भृगु, किंबिल, देवदत्त आणि उपाली यांनी अनुपिया येथे येऊन प्रवज्जा घेतली. त्यानंतर बुद्धांनी राजगृह मधील सितवन या स्मशानवनात दुसरा वर्षावास व्यतीत केला. म्हणजेच भ. बुद्धांच्या संबोधी प्राप्त केल्यानंतर थोड्याच अवधीत आनन्द यांनी धम्माची दीक्षा घेतली होती. त्या समयी धम्माचा प्रसार आणि संघाची बांधणी जोमाने होत होती आणि यात भन्ते आनन्द इतर भिक्खुंप्रमाणे सहभागी असे. भ.बुद्धांनी सांगितलेल्या मार्गावर अतिशय श्रद्धापूर्वक वाटचाल करीत, एका वर्षातच भन्ते आनन्द हे स्रोतापन्न झाले. बुद्धांनी पाचवा वर्षावास वैशाली मध्ये व्यतीत केला. त्यावेळेस महापजापतिने पुन्हा एकदा बुद्धांना विनंती केली कि त्यांना प्रवज्जा द्यावी. मात्र बुद्धांनी पुन्हा नकार दिला. यावेळेस भन्ते आनन्द यांनी शिष्टाई केली. त्यामुळे भिक्खुणी संघाची स्थापना झाली. आजतागायत जगभरातील भिक्खुणी संघ भन्ते आनन्द यांच्याप्रती आदर व्यक्त करतात.
भ.बुद्धांना त्यांच्या दैनंदिन कार्यात मदत करायला अनेक भिक्खू तत्पर असत, मात्र कोणी स्थायी असे नव्हते. मेघीय, सागत, राध, नागसमाल, उपवना, नगिता, चुंदा अशा अनेक भिक्खूंची नांवे पालि साहित्यात आढळतात जे पूर्वी बुद्धांचे सेवक होते. विसाव्या वर्षावासात, बुद्धांनी स्थायी उपस्थाक (स्वीय सचिव) नेमण्याची सूचना केली होती. त्यांनी भन्ते आनन्द यांना आपले उपस्थाक नेमले, मात्र आनंदांनी बुद्धांना आठ विनंती मान्य करण्यास सांगितल्या. त्यांपैकी पहिले चार म्हणजे - बुद्धांना मिळालेले अन्न किंवा भेटी आनन्दला देऊ नये, बुद्धांना मिळालेले चीवर आनन्दला देऊ नये, आनंदासाठी विशेष राहण्याची सोय करू नये, जेथे बुद्धांना घरी जेवणाचे आमंत्रण मिळाले आहे, तेथे आनन्दला येण्याची सक्ती करू नये. हे यासाठी कि लोकांना वाटू नये कि भन्ते आनन्दने वैयत्तिक स्वार्थासाठी हे पद स्वीकारले आहे. उरलेले चार म्हणजे - भन्ते आनन्दना मिळालेले भोजनाचे आमंत्रण योग्य वाटल्यास ते बुद्धांकडे वर्ग करतील, बाहेरगावचे लोक आले कि भन्ते आनन्दच त्यांची भेट बुद्धांशी घडवून आणतील, धम्मासंबंधी असलेले प्रश्न, बुद्धांना ते कधीही विचारू शकतील आणि जर एखाद्या ठिकाणी आनन्द बुद्धांसोबत जाऊ शकत नसेल, तर त्या ठिकाणी दिलेली देशना आणि झालेले प्रश्नोत्तर, बुद्धांनी हे विहारात आल्यानंतर आनन्दला पूर्णपणे सांगतील.
धम्माच्या प्रसारासाठी आणि बुद्धविचार संवर्धनासाठी या शेवटच्या चार विनंती महत्त्वाच्या होत्या.
भन्ते आनन्द हे अत्यंत कुशाग्र बुद्धीचे, एकपाठी आणि तीव्र स्मरणशक्तीचे होते. धम्माचा प्रत्येक विचार, बुद्धांची प्रत्येक कृती, लेखनाअभावी, स्मृतीत संकलित करून ठेवणे आणि ते जसेच्या तसे पुढील पिढीतील किंवा दूरच्या प्रदेशातील भिक्खुंपर्यंत पोहचविणे गरजेचे होते हे जाणून, भन्ते आनन्द यांनी ही विनंती केली होती. त्यांच्या या दूरदृष्टीचे कौतुक करीत बुद्धांनी हे सर्व मान्य केले आणि मग सुरु झाला पुढील पाव शतकाचा प्रवास ज्यात परस्पर सहवास, संवाद, सहवेदना आणि सतधम्माच्या प्रसाराचा ध्यास होता!
बुद्धांचा उपस्थाक म्हणून भन्ते आनन्द यांचा जवळपास संपूर्ण दिवस जायचा. मात्र तरीही दुपारी जेव्हा बुद्ध विश्रांती घेत, तेव्हा त्यावेळात आनन्द, भिक्खू-भिक्खुणी संघात जाऊन त्यांची विचारपूस करायचे, त्यांच्या अडचणी जाणून घ्यायचे तसेच आलेल्या उपासकांना मार्गदर्शन करायचे. पालि साहित्यात भन्ते आनन्द यांच्याबद्दल खूप गौरवपूर्ण उल्लेख आढळतो. अनेकवेळा बुद्ध देशना सुरु करत आणि भन्ते आनन्दला ती पूर्ण करण्यास सांगत. असा गौरव त्यांच्या व्यतिरिक्त फक्त सारीपुत्त आणि महाकच्चायन यांना प्राप्त होता! मज्झीम निकायातून कळते कि राजा पसनेदि यांना धम्म चांगला समजावून सांगितला म्हणून बुद्धांनी भन्ते आनन्द यांचा गौरव केला होता तर दीघनिकाय मध्ये भिक्खू संघाला उद्देशून बुद्ध म्हणतात, "आनन्द मध्ये चार गुण आहेत - तो जेव्हा भिक्खू संघाकडे जातो, तेव्हा त्यांचा उल्हास वाढतो, जेव्हा तो त्यांना धम्म सांगतो तेव्हा धम्माप्रती त्यांची श्रद्धा वाढते, त्याचे प्रवचन संपूच नये असे त्यांना वाटते, आणि हेच विचार भिक्खुणी, राजे, उपासक आणि उपसिकांचे देखील आहेत".
'सिलब्बतसुत्त' मध्ये भ.बुद्ध, भिक्खूंना उद्देशून म्हणतात, "सेखो, भिक्खवे,आनंदो; न च पनस्स सुलभरुपो समसमो पञञाया'ति" म्हणजे भिक्खुंनो, आनन्द अजूनही शिकतो आहे पण त्याच्या सारखा विवेकी आणि प्रज्ञावान सापडणे सोपे नाही". एका उपासकाने श्रद्धेपोटी बुद्धांचा आणि संघाचा उच्च भेटी देऊन आदर व्यक्त केला आणि विचारले कि धम्माप्रती आदर कसा व्यक्त करू. बुद्धांनी त्याला सांगितले कि धम्माप्रती आदर व्यक्त करायचा असेल तर आनन्दचा सत्कार कर कारण त्यालाच धम्माचा प्रत्येक शब्द तोंडपाठ आहे. त्या उपासकाने भन्ते आनन्दना एक अतिशय उच्च प्रतीची शाल दिली जी त्यांनी भन्ते सारीपुत्तांना दिली कारण आनंदांच्या मते बुद्धांनंतर सारीपुत्त हेच श्रेष्ठ होय! विनम्रता हा भन्ते आनन्द यांचा स्थायी स्वभाव होता.
श्रावस्ती येथे असताना, भन्ते आनन्द यांनी बोधीवृक्षाच्या बी पासून एक रोपटे तयार केले होते जे त्यांनी जेतवनाराम विहाराच्या प्रवेशद्वाराच्या जवळ लावले व त्याला खूप ममतेने वाढविले. सगळेजण याला "आनन्दबोधी" म्हणत. याच झाडाच्या सावलीत 'पदुम आणि कालिंग जातक' सांगितल्या गेल्या होत्या. आजही त्या मूळ झाडाचे वारसदार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते.
थेरगाथेमध्ये भन्ते आनन्द यांनी आपल्या आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या क्षणांचे वर्णन केले आहे. त्यांच्या मनात उमटणारे विचार हे एका प्रगल्भ, अभ्यासू, पारदर्शी धम्मधराचे मनोगत आहे. बुद्धवचनांचे वर्णन करताना ते म्हणतात - द्वासीति बुद्धतो गणहीहं, द्वे सहस्सानि भिक्खुतो I चतुरासीतिसहस्सानि, ये मे धम्मा पवत्तीनो II म्हणजेच ८२,००० सुत्त बुद्धांनी दिले आणि २००० सुत्त भिक्खुंनी दिले आणि या सगळ्या ८४,००० सुत्त मला माहित आहेत.
संपूर्ण भिक्खू संघामधून, भ.बुद्धांनी फक्त दोनच भिक्खूंना पदे दिली होती. भन्ते सारीपुत्त यांना "धम्मसेनापती" आणि भन्ते आनन्द यांना "धम्मभंडागारिक" म्हणजे 'धम्माचा सांभाळ करणारा' ही ती पदे होय. विशेष म्हणजे सारीपुत्त आणि आनन्द यांच्यामध्ये प्रचंड मैत्री होती. भन्ते सारीपुत्त यांचे परिनिब्बाण झाल्यानंतर भन्ते आनंद यांना खूप दुःख झाले होते. आपले आवडते मित्र सारीपुत्त, मोग्गल्लय्यान तसेच राहुल आणि भद्द कात्तायणी (यशोधरा) यांचे एका पाठोपाठ जाण्यावर भन्ते आनन्द व्यथित होऊन म्हणतात - ये पुराणा अतीता ते, नवेहि न समेति मे I स्वज्ज एकोव झायामि, वस्सूपेतोव पक्खिमा II म्हणजे जुने आता निघून गेले, नव्यात मी सामावलो नाही, आज मी एकटाच ध्यान करतो, जसा एखादा पक्षी आपल्या घरट्यात गेला आहे.
भ.बुद्धांचे महापरिनिर्वाण झाल्यानंतर भन्ते आनन्द यांना अतीव दुःख झाले. ते म्हणतात - न पक्खन्ती दिसा सब्बा, धम्मा न पटिभन्ती मं I गते कल्याण मित्तम्हि, अन्धकारंव खायति II म्हणजे, सगळ्या दिशा धूसर झाल्या आहेत, धम्मही मला दिसत नाही, माझा कल्याणमित्र गेला आहे, सगळीकडे अंधकार आहे.
बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर भरविण्यात आलेल्या पहिली संगिती मध्ये ५०० अर्हत भिक्खू घ्यावे असे ठरले. महाकाश्यप यांनी ४९९ अर्हत निवडले आणि १ जागा मोकळी ठेवली कारण भन्ते आनन्द अर्हत नव्हते. संगितीच्या पूर्वरात्रीला भन्ते महाकाश्यप आणि अनिरुद्ध यांनी आनन्द यांना मार्गदर्शन केले आणि ध्यान करत असतानाच, आनन्द यांना अर्हत्व प्राप्त झाले. याचे वर्णन करताना ते म्हणतात - गतिमन्तो सतिमन्तो, धितिमन्तो च यो इसि i सद्धम्मधारको थेरो, आनन्दो रतनाकारो II म्हणजे जो शीलवान, प्रज्ञावान, बलवान आणि धिरोदत्त धम्मधर आनन्द आहे, तो आता विझून गेला आहे (निब्बाण प्राप्त). "एवं मय सुत्त" म्हणजे 'असे मी ऐकले आहे' अशी सुरुवात करत भन्ते आनन्द यांनी संपूर्ण सुत्तपिटक पहिल्या संगितीमध्ये सविस्तरपणे सांगितले. प्रत्येक सुत्त भ.बुद्धांनी कुठे म्हटले, कोणाला उद्देशून म्हटले, काय कारण घडले होते अशी सर्व माहिती त्यात आहे. त्यामुळे सुत्तपिटकाच्या अभ्यासातून त्याकाळातील संपूर्ण परिस्थिती लक्षात येते. याच संगितीमध्ये भन्ते आनन्द यांच्यावर काही आरोप लावण्यात आले होते. ते त्यांनी स्पष्टीकरण देत मान्य केले नाही मात्र संघात फूट पडू नये म्हणून औपचारिकता म्हणून क्षमा याचना केली.
वयाच्या १२०व्या वर्षी मृत्यू आता जवळ आला आहे हे उमजून, भन्ते आनन्द वैशालीकडे निघाले कारण ती त्यांची आवडती नगरी होती. मात्र आपल्या परिनिब्बाणाची घोषणा त्यांनी राजगृहामध्ये केली होती. त्यामुळे दोन्ही राज्याला वाटत होते कि भन्ते आनन्द यांनी त्यांच्या नगरीत परिनिब्बाण प्राप्त करावे. म्हणून भन्ते आनन्द यांचे माघ पौर्णिमेला, रोहिणी नदीच्या मध्यावर ध्यानसमाधीच्या मार्गाने परिनिब्बाण प्राप्त केले. त्यांच्या अस्थींवर वैशाली मध्ये एक स्तूप बांधण्यात आला जो आजही दिसतो तर राजा अजातसत्तूने देखील एक स्तूप बांधला ज्याचे अवशेष आजही पाहायला मिळतात.
अतुल मुरलीधर भोसेकर
९५४५२७७४१०
No comments:
Post a Comment