Thursday, 11 June 2020

सम्मासमाधि - सम्यक समाधी

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

                        *आर्यसत्य*
        *४. दुःख निरोधगामिनी प्रतिपदा*
                     *आर्य अष्टांगिक मार्ग*
         *८. सम्मासमाधि - सम्यक समाधी*

                   _*सम्यक समाधी म्हणजे ठीक समाधी किंवा यथार्थ समाधी. समाधी म्हणजे मनाची एककेंद्रीकरण किंवा चित्ताची एकाग्रता. सम्यक समाधीच्या प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ ध्यान अशा पायऱ्या आहेत. समाधीच्या विषयात जो चित्ताचा प्रथम प्रवेश त्याला वितर्क असे म्हणतात. त्या विषयात रस येऊ लागला म्हणजे त्याला विचार असे म्हणतात. त्यापासून जो आनंद होतो ती प्रीती, त्यामुळे जे शरीराला समाधान वाटते ते सुख, त्या विषयात जी चित्ताची एकवाक्यता ती एकाग्रता आणि त्या विषयाच्या अत्यंत परिचयाने उत्पन्न होणारा जो निर्धास्तपणा किंवा निष्कंपताती उपेक्षा समजावी. वितर्क, विचार, प्रीती, सुख आणि एकाग्रता या पाच चित्तवृत्तींचे पहिल्या ध्यानात प्राधान्य असते. दुसऱ्या ध्यानात वितर्क आणि विचार राहत नाहीत; प्रीती, सुख आणि एकाग्रता या तीनच मनोवृत्तींचे प्राधान्य असते. तिसऱ्या ध्यानात प्रीती राहात नाही केवळ सुख आणि एकाग्रता यांचे प्राधान्य असते, चवथ्या ध्यानात सुख राहत नाही, उपेक्षा आणि एकाग्रता यांचे प्राधान्य असते.*_
             बौद्ध ध्यानभावनांचे स्थूलमानाने दोन प्रकार केले जातात - *एक समथा भावना आणि दुसरी विपश्यना भावना* मन शांत करण्याचे कार्य समथा किंवा समाधीचे आहे. मन शांत करणे म्हणजे चित्तवृत्ती एकाग्र करणे. एका विशिष्ट विषयावर चित्त एकाग्र केले असता ते इकडे तिकडे बहकत नाही आणि अशा तऱ्हेने ते शांत होते. *समथा भावना करणाऱ्याने सम्यक स्मृतीत सांगितल्याप्रमाणे १) कायानुपश्यना २) वेदनानुपश्यना ३) चित्तानुपश्यना ४) धम्मानुपश्यना ह्या चार स्मृती उपस्थानावर मन एककेंद्रीत करावयाचे असते. चार स्मृती उपस्थानांवर मन एकाग्र करण्यासाठी सम्यक व्यायामात सांगितल्याप्रमाणे १) अष्टांग मार्गाशी विरोधी अशा चित्तवृत्तींचा प्रतिरोध करावा २) अशा प्रकारच्या ज्या चित्तवृत्ती अगोदरच उत्पन्न झाल्या असतील त्या दाबून टाकाव्यात ३) अष्टांग मार्गाला आवश्यक अशा चित्तवृत्ती उत्पन्न कराव्यात ४) अशा प्रकारच्या चित्तवृत्ती जर अगोदरच अस्तित्त्वात असतील तर त्याचा विकास करावा. यांना अनुक्रमे संहार, प्रहण, भावना आणि अनुरक्खण सम्यक प्रधान असे म्हणतात.* 
         _*मज्झिमनिकायातील चूलवेदल्लसुत्तात म्हटले आहे की*, "भिक्खुंनो, चित्ताची एकाग्रता म्हणजेच समाधी होय. या आठ गोष्टींचा अंगिकार करणे, अभ्यास करणे आणि त्यांची पुनरावृत्ती व वाढ करणे म्हणजेच समाधी भावना होय." ह्यावरून सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी एकमेकांना कसे पूरक आहेत हे लक्षात येईल._
          *विपश्यना / विपस्सना म्हणजे खोलीत जाऊन सुस्पष्टपणे पाहणे. वस्तुमात्र आहेत तसे यथार्थ रूपाने पाहणे म्हणजे विपश्यना*. विपश्यना भावना करणारा साधक प्रथम स्वतःला यथार्थ रूपाने पाहत असतो. याचाच अर्थ *_तो आपल्यातील अनित्यता, दुःख आणि अनात्मता या तीन लक्षणांना पाहतो आणि त्यांचा अनुभव घेतो._* अशा तऱ्हेचा अनुभव घेत असताना त्याचा लोभ आणि द्वेष लयाला जातात. त्याचे अज्ञान नष्ट होते. तो सत्य पाहतो, त्याला ज्ञान प्राप्त होऊन तो निर्वाण पाहतो.
        *_शीलवान साधकच सम्यक समाधीचा लाभ घेऊ शकतो. सम्यक समाधीसाठी "विसुद्धीमग्गात" दहा प्रतिबंधकारक गोष्टी आणि चाळीस कम्मस्थाने सांगितली आहेत. परिस्थिती अनुकूल असली तरी जोपर्यंत बुद्धीची पाच आवरणे नष्ट झाली नाहीत तोपर्यंत समाधी मार्गात एकही पाऊल पुढे पडणे शक्य नाही._*
          _ज्याचे चित्त कामच्छन्द, व्यापाद (क्रोध), आळस, भ्रांतता आणि संशयग्रस्ता या पाच आवरणांपासून विमुक्त झाले असेल त्यालाच आत्मपरहित यथार्थतया समजते._ *या आवरणांना पाली भाषेत 'निवरणे' असे म्हणतात.* ज्याचे चित्त वारंवार भ्रात होत असते त्याने *प्रथम आनापानस्मृती भावना करावी.*
          _असे म्हटले जाते की, काही विशिष्ट पद्धतीने मन एकाग्र केले असता अशी एक स्थिती येते की ह्यावेळी शरीर आणि न बधिर झालेले असते. त्यावेळी शरीराला टाचणी टोचली किंवा भाजले तरी त्याची जाणीव होत नाही *अशा प्रकारची मनाची एकाग्रता म्हणजे सम्यक समाधी नव्हे.* त्याचप्रमाणे मनात कसल्याही प्रकारचा विचार न आणता एक प्रकारची एक प्रकारची जागृत निंदा आणणे म्हणजेही *सम्यक समाधी नव्हे.*_
            _*श्वासोच्छ्वास दाबून देहाला पीडा देणे हा एक अंत आणि ज्यामुळे कामविकार उद्दीपित होतात अशा विषयाचे ध्यान करणे हा दुसरा अंत. या दोहोंच्या मधील समाधी म्हणजे आर्य अष्टांगिक मार्गातील समाधी. बुद्ध धम्मातील समाधी ही आत्म्याला परमात्म्यात विलीन करण्यासाठी नाही, किंवा काही अचाट अगाध करण्याची ताकद मिळविण्यासाठी नाही, तर केवळ मनातील अशुद्धता काढून टाकून मन शुद्ध करण्यासाठी आहे. चित्तं शुद्ध ठेवणे हा बुद्ध धम्माचा गाभा आहे.*_
             *_माणसाच्या मनातील तृष्णा म्हणजेच लोभ, द्वेष आणि मोह नष्ट झाले म्हणजे माणसाला ह्याच जन्मात निर्वाण मिळते. लोभ, द्वेष आणि मोहाला नष्ट करण्याचा एकच मार्ग म्हणजे शील, समाधी आणि प्रज्ञेने युक्त असा आर्य अष्टांगिक मार्ग. चार आर्यसत्यांची किंवा आर्य अष्टांगिक मार्गाची नुसत्या बौद्धिक स्तरावर माहिती करून घेतल्याने निर्वाण प्राप्त होत नसते तर त्याप्रमाणे आचरण केल्यानेच निर्वाण प्राप्त होते._* ज्याप्रमाणे चुकीचा मार्ग अनुसरला तर निर्वाण प्राप्त होणे शक्य नाही, त्याचप्रमाणे केवळ *पुस्तकी ज्ञानाने निर्वाण प्राप्त होणे शक्य नाही.* आर्य अष्टांगिक मार्गाप्रमाणे योग्य आचरण करणारा मनुष्यच आपला इतका विकास करू शकतो की तो स्वतः बुद्ध बनू शकतो. *_पारंपरिक बुद्धधम्मामध्ये नरक, प्रेतलोक, प्राणिलोक, मनुष्यलोक आणि देवलोक अशा माणसाच्या विकासाप्रमाणे अस्तित्त्वाच्या निरनिराळ्या पातळ्या सांगितल्या आहेत. ह्या निरनिराळ्या अस्तित्त्वांचा अनुभव घेण्यासाठी माणसाला जन्ममृत्यूंच्या फेऱ्यातून जाण्याची आवश्यकता नाही. स्वतःच्या आचारणानेच तो कोणत्या पातळीवरचे जीवन जगत आहे हे ठरत असते. चोऱ्यामाऱ्या करणारा नेहेमी शिवीगाळ करणारा आणि व्यसनाधीन, दारुड्या मनुष्य जिवंतपणीच नरकात असतो, तर स्वतःच्या आणि इतरांच्या कल्याणासाठी सतत झटणारा मनुष्य देव लोकातील जीवन जगत असतो._*

           *_"पाली भाषेत भगवान बुद्धांच्या धम्माचे वर्णन 'स्व'खातो भगवंता धम्मो सन्दिठ्ठिको अकालिको एहि पस्सिको ओपनाय्यिको पच्चत वेदितब्बो विञ्ञूहीती' असे केलेले आहे, म्हणजेच भगवान बुद्धांचा धम्म सर्वसामान्य माणसांना समजेल अशा भाषेत समजावून सांगितलेला आहे तो ह्याच जन्मात फळ देणारा आहे त्याला काळाचे बंधन नसून तो शास्त्रीय दृष्ट्या तपासणी करून घेता येण्यासारखा आहे. तो प्रगतिशील असून पंडितांना स्वतःचा मार्ग स्वतःचा चालण्यास सांगणारा आहे. म्हणून बहुजनांच्या हिताकरिता, लोकांवर अनुकम्पा करण्यासाठी, देव-मनुष्याच्या सुखाकरिता, त्या धम्माचा प्रसार करावा अशी आज्ञा भगवान बुद्धांनी त्यांच्या अनुयायांना केली आहे._*

*समाप्त*

*संकलन : महेश कांबळे*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

Wednesday, 10 June 2020

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

                        *आर्यसत्य*
        *४. दुःख निरोधगामिनी प्रतिपदा*
                     *आर्य अष्टांगिक मार्ग*
         *७. सम्मासति - सम्यक स्मृती*

                   _*सम्यक स्मृती म्हणजे मनाची सतत जागृती. दुष्ट वासनांवर मनाचा पहारा ठेवणे हे सम्यक स्मृतीचे दुसरे नाव आहे.* सम्यक स्मृतीला जागरुकपणा आणि विचारिपणा यांची आवश्यकता असते. सम्यक स्मृती म्हणजे ठीक स्मरण, यथार्थ स्मरण, यथार्थपणे जी स्मरण करते किंवा जिच्यामुळे यथार्थ स्मरण केले जाते ती सम्यक स्मृती_
 *_महासतिपठ्ठानसुत्तात भगवान बुद्ध म्हणतात की, भिक्खु शरीराविषयी जागृत असतो / कायानुपश्यती असतो. तो प्रयत्नशील, ज्ञानयुक्त आणि दक्ष असून जगात जे लोभ आणि दौर्मनस्य / चेतसिक दुःख किंवा असंतोष आहे त्याला दूर करून वावरत असतो. तो  वेदनांविषयी, चित्ताच्या विषयी आणि धर्माच्या विषयी म्हणजेच मनाच्या विषयासंबंधी जागृत, प्रयत्नशील, ज्ञानयुक्त आणि दक्ष असून जगात जे लोभ आणि दौर्मनस्य आहे त्याला दूर करून विहरत असतो._*
     
          *_भिक्खुंनो, प्राण्यांच्या विशुद्धीसाठी, शोक आणि कष्ट यांच्या उपशमनासाठी, दुःख आणि दौर्मनस्य यांच्या नाशासाठी, ज्ञानाच्या प्राप्तीसाठी, निर्वाणाच्या साक्षात्कारासाठी ही चार प्रकारची स्मृतिस्थाने / सतिपठ्ठान एकमेव मार्ग आहे._*

                   *कायानुपश्यना*
             _भिक्खुंनो, भिक्खु कायानुपश्यना / शरीराविषयी जागृत होऊन कसा विहार करीत असतो? भिक्खुंनो, भिक्खु अरण्यामध्ये वृक्षाखाली किंवा घरी एकांतात आसन मांडून, शरीराला सरळ करून स्मृतीला जागृत करून बसतो. *तो जाणत असता श्वास घेतो आणि जाणत असता श्वास सोडतो. दीर्घ श्वास - हळू श्वास घेत असता अनुभव करीत असतो की तो दीर्घ श्वास - हळू श्वास घेत आहे  आणि दीर्घ श्वास - हळू श्वास  सोडीत असताना अनुभव करीत असतो की तो दीर्घ श्वास - हळू श्वास सोडत आहे. तो सर्व शरीराचा अनुभव करीत श्वास घेण्यास शिकतो, श्वास सोडण्यास   शिकतो. शरीराच्या एरव्ही संस्कारांना शांत करीत श्वास घेण्यास आणि श्वास सोडण्यास शिकतो.* अशाप्रकारे आपल्या शरीरात कायानुपश्यी होऊन विहरत असतो. शरीरातील उत्पत्तीधर्माला पाहून, शरीरातील विनाशधर्माला पाहून, शरीरातील उत्पत्ती - विनाश विहरत असतो. 'शरीर आहे' म्हणून त्याची स्मृती केवळ ज्ञानाची स्मृती वाढविण्याच्या अर्थाने उपस्थित राहत असते, तो अनाश्रित होऊन विहरत असतो. *जगातील कोणत्याही वस्तूला 'मी' 'माझे' म्हणून स्वीकार करीत नसतो. भिक्खुंनो, अशा प्रकारे सुद्धा भिक्खु कायानुपश्यी होऊन विहार करीत असतो.*_
        _भिक्खुंनो, भिक्खु चालत - बसलेला - पहुडलेला ज्या ज्या अवस्थेत त्याचे शरीर असेल त्या त्या अवस्थेत तो त्याला जाणत असतो. *भिक्खु जाणत असतो की त्याच्या कृत्यांच्या पाठीमागे कोणी करणारा नाही, कोणी आत्मा नाही, केवळ क्रिया मात्र आहे.*_
          _भिक्खु या शरीराला त्याच्या अवस्थेप्रमाणे, त्याच्या रचनेप्रमाणे पाहतो. *या शरीरामध्ये पृथ्वीमहाभूत, जलमहाभूत, अग्नीमहाभूत आणि वायूमहाभूत आहेत.*ज्याप्रमाणे कुशल कसाई किंवा कसायाचा शिष्य एखाद्या प्राण्याला मारून त्याचे लहान लहान वेगवेगळे तुकडे करून चौररस्त्यावर बसतो त्याचप्रमाणे या शरीराच्या स्थितीच्या अनुसार, त्याच्या रचनेच्या अनुसार भिक्खु शरीराला पाहत असतो.*_
         _भिक्खु पायाच्या तळव्यापासून वर डोक्याच्या केसांपर्यंत खाली त्वचेने बांधलेल्या ह्या शरीराला नाना प्रकारच्या घाणीने भरलेले पाहतो. *या शरीरामध्ये केस, रोम, नखे, दात, कातडी, मांस, स्नायू, हड्डी, मज्जा, वृक्क, काळीज, यकृत, क्लोमक, प्लिहा, फुफ्फुस, आतडी, लहान आतडी, पोटातील वस्तू (उदरस्थ), शौच, पित्त, कफ, पु, रक्त, घाम, मेद, अश्रू, चरबी, नाळ, नासा-मेळ, सांध्यातील पातळ पदार्थ आज मूत्र हे तो पाहतो.*_
        ज्याने *कायास्मृतीचा अभयस केला आहे; कायास्मृतीचा खूप अभ्यास करून त्यात प्रगती केली आहे* त्याला पुढील दहा लाभ झाले पाहिजेत.-
*१)* तो अरति-रती सहन करतो / उदासपणाला धैर्याने तोंड देतो. त्याला उदासपणा त्रास देऊ शकत नाही. उत्पन्न झालेल्या उदासपणाला तो दुरणकरून विहरत असतो.
*२)* तो भय-भैरवाला तोंड देऊ शकतो. त्याला भय-भैरव त्रास देऊ शकत नाही. तो उत्पन्न झालेल्या भय-भैरवाला दूर करून विहरत असतो.
*३)* शीत, उष्ण, तहान-भूख, डंख मारणारे प्राणी, मच्छर, हवा, ऊन, सरपटणाऱ्या प्राण्यांचे डंख, शिव्याशाप, दुष्ट भाषा, त्याचप्रमाणे दुःख देणाऱ्या, तीव्र, कटू, प्रतिकूल, अरुचिकर, प्राण घेणाऱ्या शारीरिक पिडांना तो सहन करू शकणारा होतो.
*४)* सुखपूर्वक विहार करण्यासाठी उपयुक्त अशा ध्यानाच्या चारही अवस्था सहजगत्या प्राप्त करू शकतो.
*५)* तो अनेक प्रकारच्या ऋद्धि प्राप्त करू शकतो.
*६)* तो अमानुष, विशुद्ध, दिव्य श्रोत्रांनी दोन प्रकारचे शब्द ऐकू शकतो. दिव्य - मानवी आणि जवळच्या शब्दांनासुद्धा तो ऐकू शकतो.
*७)* दुसऱ्या सत्त्वांच्या - व्यक्तींच्या चित्ताला चित्ताने जाणतो.
*८)* अनेक प्रकारच्या पूर्वनिवासांना जाणतो.
*९)* अमानुष, दिव्य, विशुद्ध, चक्षुने लय होणारे, उत्पन्न होणारे, भले-बुरे, सुवर्ण-दुर्वर्ण, सुगतीप्राप्त - दुर्गतिप्राप्त सत्त्वांना जाणतो. सत्त्वांच्या कर्मानुसार सत्त्वांच्या उत्पत्तीला जाणतो.
*१०)* आश्रवांच्या क्षयाने चित्ताची जी आश्रवरहीत विमुक्ति आहे, प्रज्ञेची विमुक्ति आहे तिला ह्या जन्मात स्वतः जाणून साक्षात्काराने प्राप्त करून विहार करीत असतो.

                *वेदनानुपश्यना*
            _भिक्खु, सुखवेदनांचा - दुःखवेदनांचा - अदुःख असुख वेदनांचा अनुभव करीत असताना जाणत असतो की तो सुखवेदनांचा - दुःखवेदनांचा - अदुःख असुख वेदनांचा अनुभव करीत आहे. तो भोग पदार्थांनी युक्त सुखवेदनांचा आणि भोग पदार्थांनी रहित सुखवेदनांचा, भोग पदार्थांनी सहित दुःखवेदनांचा आणि भोग पदार्थांनी रहित दुःखवेदनांचा, भोग पदार्थांनी युक्त अदुःख - असुख वेदनांचा आणि भोग पदार्थांनी रहित अदुःख - असुख वेदनांचा *अनुभव करीत असता असता जाणत असतो की, तो भोग पदार्थांनी युक्त सुखवेदनांचा आणि भोग पदार्थांनी रहित सुखवेदनांचा, भोग पदार्थांनी सहित दुःखवेदनांचा आणि भोग पदार्थांनी रहित दुःखवेदनांचा, भोग पदार्थांनी युक्त अदुःख - असुख वेदनांचा आणि भोग पदार्थांनी रहित अदुःख - असुख वेदनांचा अनुभव करीत आहे* अशाप्रकारे आपल्या आतील वेदनांच्यामध्ये तो वेदनानुपश्यी होऊन विहरत असतो._

                *चित्तानुपश्यना*
            _भिक्खु विकारयुक्त चित्ताला जाणतो की, हे विकारयुक्त चित्त आहे, विकाररहीत चित्ताला जाणतो की हे विकाररहित चित्त आहे. त्याचप्रमाणे तो सद्वेष चित्ताला, द्वेषरहित चित्ताला, समोह चित्ताला, मोहरहित चित्ताला, स्थिर चित्ताला, चंचल चित्ताला, महापरिणाम चित्ताला, अहमद्गत चित्ताला, सउत्तर चित्ताला, अनुत्तर चित्ताला, एकाग्र चित्ताला, एकाग्रतारहित चित्ताला, विमुक्त चित्ताला आणि अविमुक्त चित्ताला ते जसे आहे तसे जाणतो._ याप्रकारे तो चित्तामध्ये चित्तानुपश्यी होऊन विहरत असतो. चित्तामध्ये उत्पत्तीला पाहतो, चित्तामध्ये लयाला पाहतो. *चित्त आहे* म्हणून त्याची स्मृती केवळ ज्ञान आणि स्मृती वाढविण्यासाठी उपस्थित राहते. तो अनाश्रित होऊन विहरत असतो. *जगामध्ये कोणत्याही वस्तूला 'मी' 'माझे' म्हणून ग्रहण करीत नाही.*

                    *धर्मानुपश्यना*
         भिक्खु पाच निवारणांना / बंधनांना पाहत असता धर्मानुपश्यी होत असतो.
                  *_पाच निवारणे_*
*१)* त्याच्यामध्ये *कामच्छन्द (कामुकता)* आल्यावर तो 'कामच्छन्द आहे' असे जाणतो. त्याच्यात कामच्छन्द नसल्यास 'कामच्छन्द नाही' असे जाणतो. कामुकतेची उत्पत्ती आणि उत्पन्न झालेल्या कामुकतेचा कसा नाश होतो हे जाणतो. नष्ट झालेली कामुकता परत कशी उत्पन्न झाली नाही हे तो जाणतो.

*२)* त्याच्यामध्ये *व्यापाद (क्रोध)* आल्यावर तो 'व्यापाद आहे' असे जाणतो. त्याच्यात व्यापाद नसल्यास 'व्यापाद नाही' असे जाणतो. व्यापादाची उत्पत्ती आणि उत्पन्न झालेल्या व्यापादाचा कसा नाश होतो हे जाणतो. नष्ट झालेला व्यापाद परत कसा उत्पन्न होत नाही हे तो जाणतो.

*३)* त्याच्यामध्ये *स्थान-मद्ध (आळस)* आल्यावर तो 'आळस आहे' असे जाणतो. त्याच्यात आळस नसल्यास 'आळस नाही' असे जाणतो. आळसाची उत्पत्ती आणि उत्पन्न झालेल्या आळसाचा कसा नाश होतो हे जाणतो. नष्ट झालेला आळस परत कसा उत्पन्न होत नाही हे तो जाणतो.

*४)* त्याच्या मनात *उद्धटपणा आणि वाईट विचार (औद्धत * कौकृत्य)* आल्यावर त्याच्या मनात 'उद्धटपणा आणि वाईट विचार' आले आहेत हे तो जाणतो. त्याच्या मनात उद्धटपणा आणि वाईट विचार' नसल्यास 'उद्धटपणा आणि वाईट विचार नाही' असे जाणतो. उद्धटपणा आणि वाईट विचार यांची उत्पत्ती आणि उत्पन्न झालेल्या उद्धटपणा आणि वाईट विचारांचा कसा नाश होतो हे जाणतो. नष्ट झालेला उद्धटपणा आणि वाईट विचार परत कसा उत्पन्न होत नाही हे तो जाणतो.

*५)* त्याच्यात *संशय (विचिकित्सा)* आल्यावर तो 'संशय आहे' असे जाणतो. त्याच्यात संशय नसल्यास 'संशय नाही' असे जाणतो. संशयाची उत्पत्ती आणि उत्पन्न झालेल्या संशयाचा कसा नाश होतो हे जाणतो. नष्ट झालेला संशय परत कसा उत्पन्न होत नाही हे तो जाणतो.

*भिक्खु पाच उपादान स्कंध धर्मात धर्मानुपश्यी होऊन विहरत असतो.*_भिक्खु चिंतन करतो, "हे रूप - वेदना - संज्ञा - संस्कार आहे. रूपाचा - वेदनेचा - संज्ञाचा - संस्काराचा उदय होणे , अस्त होणे_

*भिक्खु आतील आणि बाहेरील सहा आयतनांमध्ये धर्मानुपश्यी होऊन विहरत असतो.* _भिक्खु डोळ्यांना जाणतो, रुपाला जाणतो, डोळे आणि रूप यांच्या कारणाने जी संवेदना उत्पन्न होते तिला जाणतो, संवेदनांची उत्पत्ती कशी होत असते तिला जाणतो, उत्पन्न झालेली संवेदना कशी नष्ट होते हे जाणतो. नष्ट झालेली संवेदना परत कशी उत्पन्न होत नाही हे जाणतो. त्याचप्रमाणे कानांना, नाकाला, जिभेला, शरीराला, मनाला जाणतो._

    *भिक्खु सात बोधिअंगधर्मामध्ये धर्मानुश्यी होऊन विहरत असतो. भिक्खु स्मृती संबोधी अंग, धर्मविचय संबोधी अंग, वीर्य संबोधी अंग, प्रीती संबोधी अंग, प्रश्रब्धि संबोधी अंग, उपेक्षा संबोधी अंग, हे सर्व असल्यावर 'उपस्थित' आहे असे जाणतो.* उपस्थित नसल्यावर उपस्थित नाही असे जाणतो. या सर्वांची उत्पत्ती कक्षी होते हे जाणतो. उत्पन्न संबोधी अंगाची भावना कशी पूर्ण होते हे जाणतो. *आणि भिक्खु चार आर्यसत्य धर्मामध्ये धर्मानुपश्यी होऊन विहरत असतो.*

          *भगवान बुद्धांनी मनाला जागृत करण्याविषयी सतिपठ्ठानसुत्तात दिलेला हा उपदेश अत्यंत महत्वाचा आहे. त्रिपिटकात हा उपदेश दोन ठिकाणी आढळतो. एकदा मज्झिमनिकायातील दहाव्या सुत्तात "सतिपठ्ठानसुत्त" या नावाने तर दुसऱ्यांदा दीघनिकायातील बावीसाव्या सुत्तात "महासतिपठ्ठानसुत्ता" या नावाने.*

               *_मज्झिमनिकायातील "आनापान सुत्तात" भगवान बुद्ध म्हणतात की, आनापानसतीचा सतत अभ्यास केल्याने आणि तो पूर्णत्वाला नेल्याने ती चार स्मृतिस्थाने  (१.कायानुपश्यना, २. वेदनानुपश्यना, ३. चित्तानुपश्यना, ४. धम्मानुपश्यना) परिपूर्ण करते. चार स्मृतिस्थांनाचा सतत अभ्यास केल्याने सात बोध्यंगे (१. स्मृती, २. धर्मविचय, ३. वीर्य, ४. प्रीती, ५. प्रश्रब्धि, ६. समाधि, ७. उपेक्षा) परिपूर्ण होतात._*.

          *बौद्ध ग्रंथांमध्ये "सति" शब्दाबरोबरच "संपजञ्ञा" हा शब्द नेहमी आढळतो. संपजञ्ञा म्हणजे सुस्पष्ट बोध किंवा सुस्पष्ट आकलन. सति संपजञ्ञा म्हणजे  जागरूकपणा आणि सुस्पष्ट आकलन. वस्तुमात्रांचे सत्यस्वरूप अज्ञानाच्या अंध:काराने झाकलेले असते, पण सति संपजञ्ञामुळे त्यांचे यथार्थ रूप दिसते.* _जागरूकपणे आणि सुस्पष्ट आकलनाने इंद्रियांना लगाम घालता येते. इंद्रिये काबूत आल्यावर वाणीची, शरीराची आणि मनाची अकुशल कर्मे होणार नाहीत. माणूस अकुशल कर्मे करण्याचे बंद करून कुशल कर्मे करू लागला म्हणजे *पंच निवारणे नष्ट होतात. पंच निवारणे नष्ट झाल्यावर आर्य अष्टांगिक मार्गानुसार अप्रमादपूर्वक वाटचाल केल्यावर अज्ञान नष्ट होऊन ज्ञानाचा प्रकाश येतो आणि दुःखापासून मुक्ती मिळते.*_


*क्रमशः*

*संकलन : महेश कांबळे*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

                        *आर्यसत्य*
        *४. दुःख निरोधगामिनी प्रतिपदा*
                     *आर्य अष्टांगिक मार्ग*
         *६. सम्मावायामो - सम्यक व्यायाम*

            *_सम्यक व्यायाम म्हणजे सम्यक प्रयत्न. तो मिथ्या व्यायाम किंवा मिथ्या प्रयत्नाच्या विरुद्ध आहे. अर्थविनिश्चयसूत्रात "जो व्यायाम मिथ्या आहे, तसेच जो व्यायाम लोभ, द्वेष आणि मोहाने प्रेरित आहे असा प्रयत्न न करणे. जो व्यायाम सम्यक आर्यमार्गाकडे आणि सत्याकडे नेणारा आहे, निर्वाणाकडे नेणारा आहे तो करणे म्हणजे सम्यक व्यायाम' अशी व्याख्या केली आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी 'सम्यक व्यायाम म्हणजे अविद्या नष्ट करण्याचा प्राथमिक प्रयत्न होय' असे म्हटले आहे. ते पुढे म्हणतात, अविद्या नष्ट करणे म्हणजे या दुःखदायक कारागृहातून बाहेर जाण्याचा दारापर्यंत पोहोचून पुढील मार्ग मोकळा करणे._*
         
       *सम्यक प्रयत्न चार प्रकारचे आहेत. १) संयमप्रयत्न २) प्रहाणप्रयत्न ३) भावनाप्रयत्न ४) अनुरक्षणप्रयत्न*
          *१) संयमप्रयत्न*
 _एखादा भिक्खु प्रयत्न करतो, जोर लावतो, मन ताब्यात ठेवतो, की जो अकुशल, पापमय विचार आत्तापर्यंत त्याच्या मनात आला नाही तो त्याच्या मनात उत्पन्न होऊ नये. *तो आपल्या डोळ्यांनी एखादे रूप पाहतो, तो आपल्या कानांनी मधुर शब्द ऐकतो, तो जिव्हेने रस चाखतो, तो आपल्या नाकाने सुगंध घेतो, तो आपल्या शरीराने स्पर्श करतो, तो मनाने विचार करत, परंतु त्यात गुंगून जात नाही, आसक्त होत नाही. कारण एखाद्या वेळी डोळ्यांच्या - कानांच्या - जिभेच्या - नाकाच्या - स्पर्शाच्या - मनाच्या असंयमनाने, लोभ, द्वेष इत्यादी अकुशल पापमय विचार त्याच्यात घर करतील. त्या पापमय विचारांना दूर ठेवण्यासाठी तो प्रयत्न करीत असतो. आपल्या डोळ्यांना - कानांना - जिभेला - नाकाला - स्पर्शाला - विचारांना तो काबूत ठेवतो, संयमात ठेवतो.* याला "संयमप्रयत्न" म्हणतात._

           *२) प्रहाणप्रयत्न*
      __एखादा भिक्खु प्रयत्न करतो, जोर लावतो, मन ताब्यात ठेवतो, की असे अकुशल पापमय विचार, जे त्याच्यामध्ये उत्पन्न झाला आहे, ते दूर व्हावेत. त्याच्या मनात जी कामभोगांची इच्छा उत्पन्न झाली आहेत, जो क्रोध उत्पन्न झाला आहे, जो हिंसक विचार उत्पन्न झाला आहे, अशा सर्व अकुशल पापमय विचारांना तो जागा देत नाही, त्यांना सोडून देतो, नष्ट करतो, मिटवून टाकतो._
   *मज्झिमनिकायातील वितक्कसंठानसुत्तात* भगवान बुद्ध म्हणतात, "भिक्खुंनो योगाभ्यासी भिक्खूने वेळोवेळी पाच गोष्टींना मनात स्थान दिले पाहिजे."
    अ) जर एखाद्या भिक्खूला एखाद्या गोष्टीचा विचार केल्याने, एखाद्या गोष्टीला मनात जागा दिल्याने छंद, द्वेष किंवा मुर्खपणाने भरलेले अकुशल किंवा पापमय विचार निर्माण झाले तर, त्या भिक्खूने त्या गोष्टीला सोडून दुसरी शुभ विचार निर्माण करणारी गोष्ट मनात आणली पाहिजे
    ब) किंवा त्या पापमय विचारांच्या दुष्परिणामांचा विचार करावा की, हा नको असलेला विचार आहे, अकुशल आहे, सदोष आहे,
     क) किंवा त्या विचारांना मनात जागा देऊ नये
     ख) किंवा ते विचार संस्कारित / अनित्य आहेत असे समजावे,
     ड) किंवा दातांवर दात ठेवून जीभ टाळ्याला लावून चित्ताचा निग्रह करावा, त्या विचाराला दाबून टाकावे, त्याला निपटून काढावे.
         असे केल्याने त्या भिक्खूचे छंद, द्वेष आणि मुर्खतेने भरलेले अकुशल पापमय विचार नष्ट होतात. त्यांचा नाश झाल्याने चित्त आपोआपच स्थिर होते, शांत होते, एकाग्र होते, समाधिस्त होते याला *'प्रहाणप्रयत्न* म्हणतात.

    *३) भावनाप्रयत्न*
        भिक्खु प्रयत्न करतो, जोर लावतो, मन काबूत ठेवतो की ज्या कुशल, कल्याणमय गोष्टी त्याच्या मनात आल्या नाहीत त्या त्याच्या मनात याव्यात. तो *स्मृती, धर्मविचय, वीर्य, प्रीती, प्रश्रब्धी, समाधी त्याचप्रमाणे उपेक्षा या सात बोध्यांगांचा अभ्यास करतो, ही सात बोध्यांगे निर्वाणाशी संबंधित आहेत, संपूर्ण विकासाच्या मार्गाकडे घेऊन जाणारी आहेत.* याला *'भावनाप्रयत्न* म्हणतात.

       *४) अनुरक्षणप्रयत्न*
        भिक्खु प्रयत्न करतो, जोर लावतो, मन काबूत ठेवतो की ज्या चांगल्या गोष्टी त्याच्या स्वभावात आलेल्या आहेत त्या नष्ट होऊ नयेत, उत्तरोत्तर त्या वाढाव्यात याला *अनुरक्षणप्रयत्न* म्हणतात.

      _जे दुष्ट/अकुशल, अहितकारक विचार आहेत त्यांना निपटून काढणे आणि जे कुशल, हितकारक विचार आहेत त्यांना वाढविणे म्हणजे *सम्यक व्यायाम. सम्यक व्यायामाची चार कामे आहेत.*_
१) प्रतिबंध करणे
२) त्याग करणे
३) विकसित करणे
४) रक्षण करणे
      यांना अनुक्रमे संहार, प्रहण, भावना व अनुरक्खण असे म्हणतात.
         _सम्यक प्रयत्नांवर भगवान बुद्ध फार भर देत असत, कारण प्रत्येक मनुष्याने आपली उन्नती स्वतःच्या प्रयत्नाने स्वतःच करावयाची असते. भगवान बुद्ध फक्त मार्ग दाखविणारे आहेत, मोक्ष देणारे नाही._  *बोधिसत्व म्हणजे मूर्तिमंत वीर्य. ध्येयसिद्धीसाठी प्रयत्नांची पराकाष्टा करणारा मनुष्य. अडीअडचणींना तोंड देऊन ध्येयप्राप्तीसाठी वाटेल तो त्याग करण्याची प्रवुत्ती असणारा मनुष्य. सिद्धार्थ गौतम जेव्हा बोधिसत्व होते तेव्हा असा निर्धार त्यांनी केला होता. बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतर जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत मानवाच्या कल्याणाचा मार्ग दाखविण्याचे काम त्यांनी अव्याहतपणे केले. त्या पंचेशाळीस वर्षांच्या अवधीत त्यांचे शरीर नेहमीच निरोगी होते असे नाही, त्यांना इतरही अनेक अडीअडचणी आल्या पण त्यांची पर्वा न करता, आपले मन हे नेहमीच जागृत ठेवून, अतुलनीय धैर्याने त्यांनी आपले कार्य चालू ठेवले.*
        _बुद्ध धम्मात आळसाला स्थान नाही. आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. *धम्मपदातील गाथेत म्हटले आहे की, 'तरुण आणि सशक्त असूनही जो पुरुष आळसामुळे उद्योगाचे वेळी उद्योग करीत नाही तो आकांक्षाहीन, निष्क्रिय आणि आळशी मनुष्य प्रज्ञेचा मार्ग जाणू शकत नाही.'*
           *सम्यक समाधीत यश मिळविणे हा सम्यक व्यायामाचा हेतू आहे.* _आर्यअष्टांगीक मार्गातील सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी हे 'समाधी' या विभागात मोडतात._ म्हणून सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी यांचा जवळचा संबंध असून ते एकमेकांवर अवलंबून आहेत. *सम्यक प्रयत्नाशिवाय मनाच्या विकासाच्या आड येणारी १) कामछंद २) व्यापाद ३) त्स्थानमिद्ध ४) औद्धत्य ५) विचिकित्सा ही पाच निवारणे / विघ्ने दूर करता येणे शक्य नाही.*
           _बुद्धधम्म प्रयत्नवादी - आशावादी आहे, निराशावादी नाही. आपण कितीही प्रयत्न केला तरी जे दैवलिखित आहे ते टळणार नाही, माणसाला नाउमेद करणाऱ्या तत्त्वज्ञानामुळे भारताचे जितके नुकसान केले आहे तितके नुकसान दुसऱ्या कोणत्याही कारणामुळे झाले नाही. बुद्धधम्मात दैववादाला तिळमात्र जागा नाही. *योग्य प्रयत्न केला तर योग्य फळ मिळेल आणि अयोग्य प्रयत्न केला तर अयोग्य फळ मिळेल, कारण सर्व प्रतित्यसमुत्पादावर अवलंबून आहे अशी बुद्ध धम्माची शिकवण आहे. अयोग्य गोष्टीपासून कसे दूर राहावयाचे आणि योग्य गोष्टी प्रयत्नाने कशा मिळवावयाच्या हेही बुद्धधम्म सांगतो.*_


*क्रमशः*

*संकलन : महेश कांबळे*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

Monday, 8 June 2020

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

                        *आर्यसत्य*
        *४. दुःख निरोधगामिनी प्रतिपदा*
                     *आर्य अष्टांगिक मार्ग*
         *५. सम्माआजीवो - सम्यक आजीविका*

       *'भिक्खुंनो! सम्यक आजीविका काय आहे?"*
           _"भिक्खुंनो, आर्य श्रावक मिथ्या आजीविकेला सोडून सम्यक आजीविकेने आपला चरितार्थ चालवितो. ही सम्यक आजीविका आहे. भिक्खुंनो, या *पाच व्यापारांपैकी कोणताही एक व्यापार उपासकांनी करू नये. कोणते पाच? शस्त्रांचा व्यापार, प्राण्यांचा व्यापार, मासांचा व्यापार, मद्याचा व्यापार आणि विषाचा व्यापार"*_
        _सम्यक आजीविका म्हणजे उत्तम प्रकारे जीवननिर्वाह चालविणे. तथागतांनी निषिद्ध केलेले पाच व्यापार सोडून दुसरा कोणताही उचित व्यापार-उद्योग चरितार्थ चालविण्यासाठी करता येतो. शस्त्रांचा व्यापार, प्राण्यांचा व्यापार, मासांचा व्यापार, मद्याचा व्यापार आणि विषाचा व्यापार निषिद्ध करण्याच्या पाठीमागे लोभासाठी प्राणीहिंसा होऊ न देण्याचा उद्देश आहे. प्राणिहिंसेमुळे माणसाच्या मनातील द्वेष वाढतो. त्याचप्रमाणे मद्याचा व्यापार निषिद्ध करण्याच्या पाठीमागे मद्यामुळे होत असलेल्या अकुशल कर्मांना म्हणजेच अनर्थांना टाळण्याचा उद्देश आहे. मद्याच्या प्याल्यातून सर्व दुर्गुणांची उत्पत्ती होते_
          _अर्थ विनिश्चयसूत्रात सम्यक आजीविकेची दोन भागात विभागणी केली आहे._
*१) उपासकांच्यासाठी सम्यक आजीविका* 
        शस्त्र, मांस, प्राणी, मद्य आणि विष यांचा व्यापार सोडून दुसरा कोणताही योग्य व्यापार-उदीम करून आपला जिवनचरितार्थ चालविणे म्हणजे उपासकांची सम्यक आजीविका समजावी. शस्त्र, मांस, प्राणी, मद्य आणि विष यांचा व्यापार करणे म्हणजे मिथ्या आजीविका आचरणे.

*२) भिक्खुंच्यासाठी सम्यक आजीविका*
         _भिक्खुंनी 'कुहना' 'लपना' 'नैमैत्तिकत्त्व' 'नैष्पेषीकत्त्व' आणि लाभापासून लाभाची प्रत्याकांक्षा न करणे म्हणजे भिक्खूची सम्यक आजीविका आहे._
       *कुहना*
     दानी उपासकाला पाहून त्याच्या मार्गात मांडी घालून बसून किंवा एकांतात बसून 'अमुक अमुक प्रकारचा लाभ-सत्कार मला प्राप्त होवो' असा विचार करीत, ध्यान करीत असल्याचा आभास करीत भिक्खु बसला असता त्याला *'कुहना'* असे म्हणतात.
           *लपना*
         लाभ-सत्काराच्या निमित्ताने 'तू माझी आई आहेस' 'तू माझा पिता आहेस' 'तू माझी बहिण आहेस' 'तू माझी मुलगी आहेस' वगैरे माणसाला वश करणारे प्रिय वचन बोलणे याला *'लपना'* असे म्हणतात.
            *नैमैतिकत्त्व*
           एखाद्या उपासकाच्या घरी भोजन केल्यानंतर परत तेथेच भोजन मिळविण्याच्या इच्छेने दुसऱ्यांना सांगणे की येथे जसे जेवण मिळते तसे दुसऱ्या उपासकांच्या घरी मिळत नाही याला *'नैमैतिकत्त्व'* असे म्हणतात.
          *नैष्पेकत्त्व*
         ज्या उपासकाकडून दान मिळत नाही, त्याच्यापासून दान मिळविण्याच्या इच्छेने असे म्हणणे की 'दान न देणारे नरकात जातात. दान दिले नाही तर तू सुद्धा नरकात जाशील'. नरकाच्या भीतीने मग तो उपासक त्या भिक्खूला दान करतो. अशा तऱ्हेने दान मिळविणे याला *'नैष्पेकत्त्व'* असे म्हणतात.
        *लाभापासून लाभाची अपेक्षा करणे*
      एखाद्या उपासकाच्या पैशाने सुंदर चिवर विकत घेऊन दुसऱ्या उपासकांना सांगणे की, 'मला असले चिवर प्राप्त झाले आहे'. हे ऐकून उपासक लज्जित होऊन तसलेच चिवर दान करतो. अशा तऱ्हेने मिळविलेल्या चिवरांचा वापर करणे म्हणजे *'लाभापासून लाभाची अपेक्षा करणे'* होय.  या मिथ्या आजीविकांच्या साधनांपासून विरत राहणे म्हणजे भिक्खुंची सम्यक आजीविका होय.

*राज्यकर्त्यांची सम्यक आजीविका*
           भगवान बुद्धांनी उपासक व भिक्खु यांच्याबरोबर राज्यकर्त्यांना सुद्धा सम्यक आजीविकेबद्दल उपदेश केला आहे. *दीघनिकायात आणि अंगुत्तरनिकायात राजाने राजधर्माप्रमाणे राज्य करावे असे भगवान बुद्धांनी उपदेश केला आहे* भगवान बुद्ध म्हणतात, राजाने स्वतः धार्मिक व सदाचारी असावे. त्याने दुर्गुणापासून दूर राहून प्रजेला आदर्श घालवून द्यावा. ज्याप्रमाणे पिता आपल्या मुलांच्या कल्याणासाठी नेहमी दक्ष असतो त्याप्रमाणे राजाने आपल्या प्रजेच्या कल्याणासाठी नेहमी दक्ष असले पाहिजे. राजा जर सदवर्तनी असेल तर त्याच्या सर्व राज्यात सुख नांदेल. स्वतःच्या जन्मसिद्ध अधिकाराने मदमत्त झालेला राजा किंवा दुसऱ्यांची पर्वा न करता स्वतःचे लाड करून घेणारा राजा कोणालाही आवडत नाही, उलट त्याच्या पाठीमागे लोक त्याची निंदा करतात. *जगातील सर्व ऐतिहासिक सम्राटांमध्ये सम्राट अशोक न्यायी, दक्ष, कनवाळू आणि धार्मिक असा राजा होऊन गेला. भगवान बुद्धांच्या सम्यक आजीविकेच्या उपदेशाप्रमाणेच सम्राट अशोकाने राज्य केले, प्रसिद्ध इतिहासज्ञ एच. जी. वेल्स यांनी आपल्या ग्रंथात म्हटले आहे की 'हजारो राजांमध्ये सम्राट अशोक एकटाच एकुलत्या एका स्वयंप्रकाशित ताऱ्याप्रमाणे चमकत आहे.' (Outline of History)*
बौद्धग्रंथात पुढील दहा राजधर्म दिले आहेत.
१) दान
२) शील
३) परित्याग म्हणजे निस्वार्थ
४) अज्जव म्हणजे प्रामाणिकपणा
५) मद्दव म्हणजे मार्दव
६) तप म्हणजे ऐषाराम सोडून दक्षता बाळगणे
७) अक्रोध
८) अविहिंसा
९) क्षान्ती म्हणजे तटस्थता किंवा निःपक्षपातीपणा
१०) जात म्हणजे सहनशीलता आणि सुख

          *_दुराचरण म्हणजे तीन शारीरिक अकुशल कर्मे आणि चार वाणीची अकुशल कर्मे. अकुशल कर्मांशी संबंधित असलेल्या मार्गांनी उपजीविका प्राप्त केली तर ती सम्यक उपजीविका होणार नाही. त्याचप्रमाणे शस्त्रांचा, प्राण्यांचा, मांसाचा, मद्याचा आणि विषाचा व्यापार करणे सम्यक आजीविका नाही. जेव्हा दुराचरणांवर आधारलेली उपजीविकेपासून मनुष्य संयम राखतो, तेव्हा तो सम्यक उपजीविका करतो असे म्हणता येईल._*
           सामान्य माणसावर त्याच्या बायकोमुलांसह संसाराचा किती बोजा असतो हे भगवान बुद्धांना माहीत होते, म्हणून भिक्खुंकडून नितीधर्म पाळण्याची जेवढी अपेक्षा होती तेवढी सामान्य माणसाकडून भगवान बुद्धांना नव्हती. *पण सामान्य माणसाने पंचशीलांचे पालन करून धम्मचर्येने आपली उपजीविका करावी अशी तथागतांची अपेक्षा होती.* _व्यक्तीला आणि समाजाला खरे सुख मिळावे म्हणून आणि समाजातील लोकांनी एकोप्याने राहून त्यांच्यात बंधुभाव निर्माण व्हावा म्हणून भगवान बुद्धांनी सम्यक आजीविकेचा शोध लावला आहे._
         _भगवान बुद्धांनी गृहस्थी जीवन जगणाऱ्या लोकांना कधीच कमी अथवा तुच्छ लेखले नाही. उपटपक्षी, त्यांच्याकडे त्यांनी सहानभूतीने पाहून त्यांना भौतिक आणि आध्यात्मिक प्रगतीचा मार्ग दाखवला. *सिगालसुत्त, व्याग्गहपज्जसुत्त वगैरे सुत्तातून भगवान बुद्धांनी सर्वसामान्य जनतेला भौतिक आणि आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी उपदेश केला आहे. सिगालसुत्ताला तर "गृहस्थांसाठी विनय" असे म्हटले जाते.* गृहस्थांची सम्यक आजीविका म्हणजे काय हे सिगालसुत्त वाचल्यावर बर्याच अंशी कळून येते. *सिगालसुत्तात भगवान बुद्धांनी समाजाच्या सर्व घटकांचा विचार करून त्यांनी परस्परसंबंध कसे ठेवावेत म्हणजे समाजात शांती नांदून व्यक्तिविकासास संपुर्ण वाव मिळेल असा उपदेश केला आहे_
             *जेव्हा माणसाला दररोज केवळ अन्न, वस्त्र आणि निवारा या जीवनाच्या अत्यंत आवश्यक अशा गोष्टींसाठी रात्रंदिवस चिंता करावी लागते तेव्हा आध्यात्मिक आणि नीतिमत्तेच्या गोष्टींचा विचार करण्याचा त्याच्याजवळ वेळही नसतो आणि त्यासाठी आवश्यक ती मनाची स्थीरताही नसते. म्हणून भगवान बुद्धांनी कूटदन्तसुत्तात राज्यातील सामाजिक आणि आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी राजाने काय केले पाहिजे यासंबंधी उपदेश केला आहे*

एके ठिकाणी भगवान बुद्ध म्हणतात की, माणसाने आपल्या आयुष्यात पुढील आयात प्रकारचे धन मिळवावे -
१) श्रद्धाधन
२) शिलधन
३) हिरीधन (मनाची लज्जा)
४) ओतप्पधन (जनाची लज्जा किंवा भीती)
५) श्रुतधन
६) त्यागधन
७) प्रज्ञाधन
         अनाथपिण्डकाला उद्देशून केलेल्या एका उपदेशात भगवान बुद्ध म्हणतात. गृहस्थाने चार प्रकारची सुखे उपभोगावीत
*१) आर्थिक स्थैर्य*
*२) भोगसुख* म्हणजे कायदेशीर मार्गांनी मिळविलेल्या संपत्तीचा व्यवहारी दृष्टीने केलेला वापर
*३) अणनसुख* म्हणजे मी कुणाच्या कर्जात नाही किंवा माझ्यावर कुणाचे कर्ज नाही या विचाराने मिळणारे सुख
*४) अनवज्जसुख* म्हणजे मी शरीराने, वाणीने आणि मनाने फक्त कुशल कर्मेच केली आहेत, त्यामुळे मी दोषरहित आहे, या विचाराने मिळणारे सुख.

      *_जीवनाच्या आवश्यक गरजा भागल्यानंतर समाजात आर्थिक स्थैर्य आल्यावर आणि समाजाची नैतिक पातळी वाढल्यावर गुन्हेगारी कमी होते आणि समाजात सुखशांती नांदते._*


*क्रमशः*

*संकलन : महेश कांबळे*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

                        *आर्यसत्य*
        *४. दुःख निरोधगामिनी प्रतिपदा*
                     *आर्य अष्टांगिक मार्ग*
         *४. सम्माकम्मन्तो - सम्यक कर्मान्त*

       *"भिक्खुंनो! सम्यक कर्मान्त म्हणजे काय?"*
       _"भिक्खुंनो, एखादा मनुष्य जीवहिंसा करण्याचे सोडून जीवहिंसेपासून दूर राहतो, तो काठीचा उपयोग करीत नाही, शस्त्राचा उपयोग करीत नाही, तो पापभिरू, दयावान आणि सर्व प्राणीमात्रांवर अनुकम्पा करणारा असतो."_
    _"तो मनुष्य चोरी करण्याचे सोडून चोरी करण्यापासून दूर राहतो, चोरी न करता जे मिळते त्याचेच तो ग्रहण करतो. जो दुसर्याचा माल, गावात असो किंवा जंगलात असो, त्याची तो चोरी करीत नाही."_
    _"ती मनुष्य कामोपभोगाचा जो मिथ्याचार आहे तो सोडून कामोपभोगाच्या मिथ्याचारापासून दूर राहतो. तो अशा स्त्रीशी कामभोग करीत नाही की जी आपल्या आईच्या घरात आहे, पित्याच्या घरात आहे, धर्माने मानलेली मुलगी आहे, जिचा कोणाशी विवाह झाला आहे, जी दासी आहे आणि जी गळ्यात माळा घालून नाच करणारी आहे."_
        *_"भिक्खुंनो, याला सम्यक कर्मान्त असे म्हणतात. सम्यक कर्मान्त याचा अर्थ ठीक कर्म, योग्य कर्म, निर्मल कर्म हे मिथ्या कर्मान्ताच्या विरुद्ध आहे."_*
       *सम्यक कर्मान्तात पंचशीलातील पहिल्या तीन शिलांचा म्हणजे हिंसा न करणे, चोरी न करणे आणि व्यभिचार न करणे यांचा समावेश होतो. चौथे शील हे सम्यक वाचा मध्ये मोडते तर दारू वगैरे मादक पदार्थ न पिणे या पाचव्या शिलाचा भंग झाला तर मनुष्य हिंसा करण्यास, चोरी करण्यास, व्यभिचार करण्यास आणि खोटे बोलण्यात मागेपुढे पाहत नाही. म्हणून पाचवे शील हे सर्वव्यापी समजून माणसाने त्याचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे.*
         भगवान बुद्ध म्हणतात - मूर्ख मनुष्य कोणता आणि संत पुरुष कोणता हे माणसाच्या आचरणावरून ओळखावे. माणसाच्या आचरणामुळेच प्रज्ञेला उजाळा येतो.
       *"ज्याच्याजवळ तीन दुर्गुण आहेत त्याला मूर्ख म्हणावे. कोणते तीन? शरीराचे दुराचरण, दुष्ट भाषा आणि दुष्ट विचार."*
       *"ज्याच्याजवळ तीन सद्गुण आहेत त्याला संत म्हणावे. कोणते तीन? शरीराचे शुद्ध आचरण, उचित भाषा आणि मनातील सद् विचार."*
       बुद्ध धम्मातील नीतीबोधाबद्दल एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात येते, आणि ती म्हणजे बुद्ध धम्मात कोणत्याच गोष्टीबद्दल सक्ती किंवा जबरदस्ती नाही. धम्मातील शिकवणुकीप्रमाणे वागणे, न वागणे किंवा त्याविरुद्ध वागणे हे सर्वस्वी ज्याच्या त्याच्या वर अवलंबून आहे. चांगली कर्मे केली तर त्याचे चांगले फळ मिळेल आणि वाईट कर्मे केली तर त्याचे वाईट फळ मिळेल. *भगवान बुद्धांच्या उपदेशाप्रमाने चालायचे की न चालायचे हे ज्याचे त्याने ठरवायचे आहे. भगवान बुद्ध फक्त मार्गदर्शक आहेत.*
   
           _इतर धर्मसंस्थापकांनी आपापल्या धर्मानुयायांना जशा आज्ञा केल्या आहेत तशा *आज्ञा* भगवान बुद्धांनी आपल्या धर्मात दिल्या नाहीत. त्या अनुत्तर शिक्षकाने कोणत्याही सुज्ञ बुद्धीच्या माणसाला पटेल अशाच शब्दांत चांगले काय आणि वाईट काय आहे आणि त्यांचे भलेबुरे परिणाम काय असतात ते सांगितले आहे. *भगवान बुद्ध म्हणतात, "भिक्खुंनो, दुष्कर्मे सोडून द्या. दुष्कर्मे सोडता येतात. जर दुष्कर्मे सोडता येणे शक्य नसते तर मी तुम्हाला तसे म्हणालो नसतो. ती सोडता येतात म्हणूनच मी तुम्हाला म्हणतो की भिक्खुंनो, दुष्कर्मे सोडून द्या.  भिक्खुंनो, सत्कर्मे करा. सत्कर्मे करता येतात. जर सत्कर्मे करता येत नसतील तर मी तुम्हाला तसे म्हणालो नसतो. ती करता येतात येतात म्हणूनच मी तुम्हाला म्हणतो की भिक्खुंनो, सत्कर्मे करा. जर सत्कर्मे केल्यामुळे नुकसान आणि दुःख होत असते तर मी तुम्हाला म्हणालो नसतो की सत्कर्मे करा. पण त्यामुळे सुखसमाधान मिळत असल्यामुळेच मी म्हणतो की भिक्खुंनो, सत्कर्मे करा"*_

         _हिंसा करणे, चोरी करणे आणि व्यभिचार करणे ही *तीन शारीरिक दुष्कृत्ये आहेत.*_
               
                           *हिंसा*
    खालील पाच गोष्टी असल्या तरच बुद्ध धम्मानुसार हिंसा होते.
१) प्राणी जिवंत असला पाहिजे
२) तो प्राणी आहे याचे भान असले पाहिजे
३) त्याला मारणे हा मनात हेतू असला पाहिजे
४) त्याला मारण्याच्या हेतूने तशी कृती केली पाहिजे
५) अशा कृतीमुळे त्या प्राण्याचा मृत्यू झाला पाहिजे
      जर या पाचही अटी पूर्ण झाल्या तरच त्या माणसाकडून हिंसा झाली असे समजावे.

                     *अहिंसा*
              पंचशीलामधील पहिले शील कोणत्याही प्राण्यांची जीवहिंसा न करण्याबद्दलचे आहे. कोणत्याही प्राण्यांची म्हणजे जे जे काही श्वासोच्छ्वास करून जगत असते अशा लहान-मोठ्या सर्व प्राण्यांची जीवहिंसा करू नये. प्रत्येक जण आपल्या आपापल्या जीवावर प्रेम करीफ असतो, कोणालाही मरण आवडत नाही. खरे म्हणजे जिवंत राहून सुख उपभोगण्याची प्रत्येकाची धडपड असते. *हिंसा न करणे किंवा इतरांना इजा न करणे म्हणजेच बौद्ध असणे. कारण बौद्धांमध्ये मैत्री आणि करुणा ओतप्रोत भरलेली असते.* करुणा आणि मैत्री या भावनांवर बुद्धधम्मातील अहिंसेचा सिद्धांत आधारलेला आहे हे लक्षात आल्यावर बहुतेक सर्व देशांतील बौद्ध मांसाहारी का आहेत हे लक्षात येईल.
         *_बुद्धधम्मातील अहिंसा तत्वाबद्दल डॉ. बाबासाहेब आंबडेकरांनी "The Buddha & His Dhamma" या आपल्या ग्रंथात केलेले विवेचन अभ्यासनीय आहे. ते म्हणतात की, सैनिकांनी अहिंसेच्या नावाखाली किंवा अहिंसेच्या पांघरुणाचा आश्रय घेऊन आपल्या कर्तव्याचा त्याग करावा असा तथागतांचा कधीच हेतू नव्हता. म्हणूनच राज सेवेतील लोकांना भिक्खुसंघात प्रवेश न देण्याबद्दलचा त्यांनी एक नियम केला होता._*

              *_पिंडपाताच्या वेळी भिक्खुंच्या भिक्षापात्रात भिक्षा म्हणून कोणी मांस दिले तर ते खाण्याला भगवान बुद्धांचा विरोध नव्हता. भिक्षा म्हणून दिलेले मांस भिक्खुंनो खाऊ नये या देवदत्ताच्या आग्रहाला भगवान बुद्धांचा विरोध होता. जीवहत्येची इच्छा व जीवहत्येची आवश्यकता ह्यांमध्ये भगवान बुद्ध फरक करीत असत. ज्या ठिकाणी जीवहत्या करण्याची आवश्यकता असते त्याठिकाणी त्यांनी जीवहत्येला प्रतिबंध केला नाही. पण ज्याठिकाणी जीवहत्येची इच्छा ह्याशिवाय जीवहत्येला दुसरे कारण नसते त्याठिकाणी त्यांनी जीवहत्येला प्रतिबंध केला.जीवहत्येची आवश्यकता आहे की नाही याचा निर्णय भगवान बुद्धांनी व्यक्तीवर सोपविला आहे._*
      तथागतांनी भिक्खुंना -
१) एखादा प्राणी खास त्यांच्या जेवणासाठी मारला असेल आणि तो प्राणी मारताना त्यांनी पाहिला असेल तर ते मांस खाण्यास भिक्खुंना मनाई केली होती
२) भिक्खुंना तो प्राणी त्यांच्या जेवणासाठी खास मारला आहे असे सांगण्यात आले असेल तर ते मांस खाण्यास भिक्खुंना प्रतिबंध होता
३) तो प्राणी त्यांच्या जेवणासाठी खास मारला आहे अशी शंका आली तर असे मांस खाण्यास त्यांनी मनाई केली होती.
      *पण जर भिक्खुंनी प्राणिहत्या करतांना पाहिले नसेल किंवा तो प्राणी त्यांच्या खाण्यासाठी मारला आहे असे त्यांना कोणी सांगितले नसेल किंवा त्यांना तशी शंका आली नसेल तर ते मांस खाण्यास भिक्खुंना परवानगी होती.*

                             *चोरी*
        चोरीबद्दलच्या पाच अटी अशा -
१) मालमत्ता दुसऱ्याच्या ताब्यात असली पाहिजे
२) ती दुसऱ्याच्या ताब्यात आहे हे माहीत असले पाहिजे
३) चोरी करण्याचा हेतू मनात असला पाहिजे
४) चोरी करण्याचा हेतूने तसे कृत्य केले असले पाहिजे
५) त्या कृतीने मालमत्ता घेतली गेली पाहिजे
         या सर्व अटी पूर्ण झाल्या तरच न दिलेली वस्तू घेतली म्हणजे चोरी केली असे म्हणता येईल.
              पंचशीलातील दुसरे शील *'जे दिले गेले नाही ते न घेण्याबद्दलचे'* म्हणजेच चोरी न करण्याबद्दलचे आहे. श्रीमंत माणसे असा आपला सोयीस्करपणे समज करून घेत असतात की गरीब माणसे सहसा चोरी करतात. पण गुणात्मक दृष्टीने आणि संख्यात्मक दृष्टीनेसुद्धा असे आढळून येते की श्रीमंत माणसेच गरीब माणसांच्यापेक्षा जास्त चोऱ्या करतात. गरीब माणसे केवळ गरजेपोटी, जीवन जगण्यास आवश्यक म्हणून कदाचीत चोऱ्या करीत असतील, तर श्रीमंत माणसे केवळ लोभामुळे चोऱ्या करीत असतात. *प्रत्येकाने लोभ सोडून द्यावा, कारण लोभ हा आध्यात्मिक प्रगतीच्या मार्गातील एक मोठा अडसर आहे.*


                   *कामेसु मिथ्याचार*
           कामोपभोगातील मिथ्याचार होण्यासाठी खालील गोष्टींची आवश्यकता आहे.
१) ज्या स्त्री किंवा पुरुषाबरोबर केलेला लैंगिक आचार हा मिथ्याचार म्हणून गणला जातो अशी व्यक्ती स्त्री किंवा पुरुष असली पाहिजे.
२) अशा व्यक्तींशी लैंगिक संभोग करण्याची इच्छा असली पाहिजे
३) असा संभोग करण्यासाठी कृती केली पाहिजे
४) त्या संभोगापासून आनंद मिळाला पाहिजे
        यासर्व अटी पूर्ण झाल्या तरच कामोपभोगातील मिथ्याचार झाला असे म्हणता येईल. *विनयपिटक* वाचताना एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात येते आणि ती म्हणजे ही की *आधुनिक कायदेशास्त्राच्या आणि बौद्धांच्या नितीशास्त्रांबद्दल मूलभूत कल्पनांत बरेच साम्य आहे. पण आधुनिक काळात सामाजिक कायदा आणि सुव्यवस्था ही दंडुक्याच्या जोरावर ठेवण्याचा प्रयत्न केला जातो, तर महाकारुणीक भगवान बुद्धांनी 'कर्मनियमांच्या' सहाय्याने समाजात सुव्यवस्था ठेवून व्यक्तीविकासास पोषक वातावरण निर्माण केले.*
           पंचशीलातील तिसरे शील आणि सम्यक कर्मांतातील तिसरे कुशल कर्म हे व्यभिचार न करण्यासंबंधीचे आहे. विषयवासना हा माणसाच्या मनातील सर्वांत मोठा मनोविकार आहे. जगातील मोठमोठ्या लोकांचा अध:पात विषयवासना काबूत न ठेवल्यामुळे झाला आहे. *प्रामुख्याने लोभ हाच माणसाला व्यभिचारी बनवितो.*
            *_भगवान बुद्ध हे व्यावहारिक तत्त्वज्ञानी असल्यामुळे 'अखंड ब्रह्मचर्य पाळा' असा उपदेश गृहस्थांना त्यांनी कधीच केला नाही, उलट गृहस्थांना त्यांनी विषयसुखात आनंद मानणारे/ गृहिकामभोगी असे म्हटले आहे. असे म्हणण्यात गृहस्थांची निंदा करणे किंवा त्यांना कमी लेखणे असा भगवान बुद्धांचा उद्देश नव्हता. पतीपत्नींनी एकमेकांच्या सहवासातील आनंद उपभोगावा आणि एकमेकांच्याविषयी संतुष्ट असावे, उपोसथाच्या दिवशी मात्र ब्रह्मचर्य पाळावे असा त्यांनी गृहस्थांना उपदेश केला आहे. भगवान बुद्धांनी विवाहसंस्थेस किंवा गृहस्थधर्मास कधीच विरोध केला नाही. स्वतःच्या हितासाठी आणि समाजाच्या हितासाठी कामवासनेचा मिथ्याचार करू नये असा त्यांनी गृहस्थांना उपदेश केला आहे._*

                _सम्यक कर्मांतामध्ये हिंसा न करणे, चोरी न करणे आणि व्यभिचार न करणे ही तीन शारीरिक कर्मे येतात त्याचप्रमाणे *अभिध्या, व्यापाद आणि मिथ्या ही तीन मानसिक कर्मेपण येतात.*
                     
                  *अभिध्या*
         दुसऱ्याच्या मालकीची चिजमात्र पाहून 'अरे ही माझी झाली तर' अशी लोभयुक्त भावना म्हणजे अभिध्या होय.

                       *व्यापाद*
       दुसऱ्याची होत चाललेली भरभराट किंवा दुसऱ्याला मिळत असलेले सुख केव्हा नष्ट होते याची भावना करण्याच्या प्रवृत्तीला 'व्यापाद' म्हणतात. मराठीत त्या वृत्तीला *'जळणे किंवा जळफळाट होणे'* असे म्हणतात. व्यापाद दोन प्रकारचे असतात *एक द्वेषप्रधान व्यापादात दुसर्याचा नाश व्हावा किंवा त्याचे सुख नष्ट होऊन त्याला दुःख मिळावे अशी इच्छाअसते आणि दुसरा ईर्ष्याप्रधान व्यापादात दुसऱ्याचे सुख पाहून जळफळाट होत असतो*

                      *मिथ्यादृष्टी*
      जी विपरीत दृष्टीने पाहते ती मिथ्यादृष्टी आहे. कुशल, अकुशल अस्तित्वावर विश्वास न ठेवणे ही मिथ्यादृष्टी आहे. रूप, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान यांच्यातील एकाला किंवा सर्वांना मिळून *हा आत्मा आहे* असे मानणे म्हणजे मिथ्यादृष्टी ठेवणे होय.

             *_माणसाने आपल्या मनाच्या, वाणीच्या आणि शरीराच्या कर्मात संयम ठेवावा. ती कर्मे लोभाने किंवा द्वेषाने करू नयेत. मैत्री आणि करुणेच्या उत्स्फूर्त प्रेरणेने केलेली कर्मे कुशल कर्मे होतात._*

*क्रमशः*

*संकलन : महेश कांबळे*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

Monday, 1 June 2020

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

                        *आर्यसत्य*
        *४. दुःख निरोधगामिनी प्रतिपदा*
                     *आर्य अष्टांगिक मार्ग*
         *३. सम्मावाचा - सम्यक वाणी*

       *"भिक्खुंनो! सम्यक वाणी म्हणजे काय?"*
       _"भिक्खुंनो, एखादा मनुष्य खोटे बोलणे सोडून, खोटे बोलण्यापासून दूर राहून, खरे बोलणारा, यथार्थवादी असतो. तो कोणत्याही ठिकाणी जावो, तेथे त्याची साक्ष विचारली जाते - तू जाणतोस ते ठीक सांग.' तो जर जाणत नसेल तर म्हणतो की 'मी जाणत नाही' आणि जर जाणत असेल तर म्हणतो की मी जाणतो. ज्या गोष्टीला त्याने पाहिले नसेल त्याबाबत तो म्हणतो की 'मी पाहिले नाही', आणि ज्या गोष्टीला त्याने पाहिले असेल त्याबाबत तो म्हणतो की 'मी पाहिले आहे', असे तो म्हणतो. अशा प्रकारे ना स्वतःसाठी, ना दुसऱ्यासाठी, ना कोणत्याही लौकिक स्वार्थासाठी तो जाणून-बुजून खरेच बोलतो._
      *_'तो चहाडी-चुगली करणे सोडून, चहाडी-चुगली पासून दूर राहून, इकडच्या गोष्टी ऐकून तिकडच्या लोकांशी भांडण होईल अशा रीतीने तिकडे सांगत नाही. तो एकमेकांच्यापासून वेगळे झालेल्यांची एकी घडवून आणतो. जे एक झाले आहे त्यांच्यात फूट पाडत नाही. तो अशी वाणी बोलतो की ज्यामुळे लोक एकीने राहतात. तो कठोर भाषा सोडून, कठोर शब्दांच्यापासून दूर राहून, अशी भाषा बोलतो की जी कानांना सुख देणारी आहे, प्रेमाने भरलेली आहे, हृदयाला जाऊन भिडणारी आहे, सुसंस्कृत आहे, बहुजनांना आवडणारी आहे. ती निरर्थक बोलणे सोडून, निरर्थक बडबड करण्यापासून दूर राहून असेच बोलतो की जे समयानुकूल आहे, नियमानूकुल आहे"_*
       *_सम्यक वाचा, सम्यक कर्मांत आणि सम्यक आजीविका ही आर्यअष्टांगिक मार्गातील "शील" या विभागात मोडतात._*
      बुद्धधम्मात अनेक नितीतत्वांची शिकवण दिली आहे, पण या सर्व नितीतत्वांचे किंवा शिलांचे एकच कार्य आहे आणि ते म्हणजे माणसाच्या मनाची, वाणीची आणि शारीरिक कृत्यांची शुद्धता राखणे. *आचरणांची शुद्धता हा बुद्ध धम्मातील नितीत्त्वांचा हेतू आहे. शीलवान मनुष्यच समाधीमध्ये प्रगती करू शकतो.* _समाधी आणि प्रज्ञा संपादन करण्यापूर्वी शील संपादन करा असे अनेकवेळा भगवान बुद्धांनी आपल्या शिष्यांना सांगितले आहे._ *_जो आपल्या वाणीच्या आणि शरीराच्या कृत्यांत शुद्धता राखतो आणि जो आपली आजीविका शुद्ध ठेवतो तो मनुष्य शीलवान आहे असे समजावे._*
            बुद्ध धम्मात शुद्ध आचरणाची सुरुवात पंचशीलांनी होते, प्रत्येकाने आपल्या जीवनातील प्रत्येक दिवशी आचरणात आणावयाचे ते नितीबोध आहेत. *_जो नितीबोध तोंडपाठ करतो, पण ते प्रत्यक्ष आचरणात आणीत नाही, तो अंधारात प्रकाशासाठी दिवा पेटवून डोळे झाकून घेणाऱ्या सारखा आहे'_* अशी तिबेटीयन भाषेत एक म्हण आहे. पंचशीलांपैकी एखादे शील एखाद्या दिवशी न पाळले गेले तर पुन्हा, खंबीर मनाने, ते शील न मोडण्याच्या निर्धार केला पाहिजे. अकुशल कर्म केले तर त्यापासून कर्मनियमांप्रमाने अकुशल फळ मिळणारच, त्याचप्रमाणे कुशल कर्माचे कुशल फळही मिळणारच. कधीकधी जास्त चांगले कुशल कर्म केले तर अकुशल कर्माचा प्रभाव कमी होतो किंवा अजिबात नष्ट होतो. *पंचशीलांचे पालन करण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे मनाला मलीनता आणणाऱ्या लोभ, द्वेष आणि मोह ह्या त्रयीला आपल्या मनातून नष्ट करण्याचा प्रयत्न करणे होय.*

          *_शब्दांच्या सहाय्याने मनुष्य आपले विचार दुसऱ्यांना कळवितो. काय आणि कसे बोलतो यावरुन तो मनुष्य कसा आहे याची पारख केली जाते. शब्दांमुळे मने जोडली जातात आणि शब्दांमुळे ती तोडलीही जातात. शब्दांमुळे जगात शांतता होऊ शकते, शब्दांमुळे अनर्थही होऊ शकतात. म्हणून माणसाने आपले शब्द काळजीपूर्वक वापरावेत. लोभ, क्रोध, हेवा, गर्व, स्वार्थ इ. अकुशल भावनांना आपल्या वाणीचा ताबा घेऊ देऊ नये. या भावनांचा प्रभाव झाल्यामुळेच मनुष्य खोटे बोलतो कटू किंवा कठोर बोलतो आणि बाष्कळ बडबड करतो. माणसाने जर प्रयत्नपूर्वक हे सर्व न करण्याचे ठरविले तर त्यांच्या नेहमीच्या सत्य - मधुर भाषणाने, चहाडी-चुगली आणि बाष्कळ बडबड न करण्याच्या सवयीने त्याच्या मनातील लोभ, द्वेष आणि मोह हळूहळू नष्ट होऊन जातील. मिथ्या भाषण करणे, चहाडी-चुगली करणे, कटू किंवा कठोर भाषण करणे आणि बाष्कळ बडबड करणे ही चार वाणीची अकुशल कर्मे आहेत, तर सत्य बोलणे, चहाडी-चुगली न करणे, प्रिय बोलणे आणि यथायोग्य बोलणे ही चार वाणीची कुशल कर्मे आहेत._*

            *खोटे बोलणे - मुसावादा*
         सम्यक वाणीमध्ये मोडणारा पहिला गुण म्हणजे सत्य बोलणे किंवा असत्या न बोलणे.
१) विधान असत्य असले पाहिजे
२) दुसऱ्याला फसविण्याचा हेतू असला पाहिजे
३) तो हेतू तडीस नेण्यासाठी तसा प्रयत्न केला गेला पाहिजे
४) त्या दुसऱ्या माणसाला त्या असत्य विधानाचा अर्थ कळला पाहिजे
        वरील चार अटी पूर्ण झाल्या तरच मनुष्य खोटे बोलतो असे म्हणता येईल. नेहमी सत्य बोलणारा मनुष्य, *मेत्तसुत्तात म्हटल्याप्रमाणे,* सरळ आणि उजळ मनाचा असतो. तो प्रांजळ, निष्कपट आणि विश्वासपात्र असा असतो. दुसऱ्यांची मर्जी संपादण्यासाठी किंवा प्रतिष्टा मिळविण्यासाठी तो खोटे बोलत नाही. लोकांना तो कडक स्वभावाचा वाटेल, पण लोकांना चांगले वाटावे म्हणून तो असत्य किंवा अर्धसत्य बोलणार नाही. *भगवान बुद्ध एक गोष्ट एके वेळी आणि तिच्या विरुद्धची गोष्ट दुसऱ्या वेळी असे कधीही बोलले नाहीत. ते ज्या प्रमाणे बोलले त्याप्रमाणे वागले म्हणून त्यांना 'तथागत' म्हणतात.*

                  *पिसुणावाचा*
            सम्यक वाणीमध्ये मोडणारा दुसरा गुण म्हणजे चहाडी-चुगली न करणे - निंदानालस्ती न करणे. पिसुणावाचा म्हणजे चहाडी-चुगली करणे - निंदानालस्ती करणे. पिसुण ह्या पाली शब्दाचा अर्थ भेद करणे, दुही माजवणे किंवा बेकी करणे असा आहे. म्हणून चहाडी-चुगली न करणे - निंदानालस्ती न करणे, एक झालेल्यांत फूट न पाडणे म्हणजे सम्यक वाचा.
१) ज्या माणसांत फूट पाडावयाची आहेत अशी माणसे असली पाहिजेत
२) त्या माणसांमध्ये फूट पाडण्याचा हेतू असला पाहिज
३) तो हेतू साध्य करण्यासाठी तसा प्रयत्न केला गेला पाहिजे
४) त्या दुसऱ्या माणसाला किंवा माणसांना, जे काही सांगितले गेले आहे त्याचा अर्थ कळला पाहिजे.
      या सर्व अटी पूर्ण झाल्या तरच त्याला पिसुणावाचा असे म्हणता येईल. *जो मनुष्य दुसऱ्यांची निंदा करतो तो अत्यंत घाणेरडे कृत्य करीत असतो, कारण निंदा करणारा तो खोटी विधाने करून एखाद्याची बदनामी करीत असतो. दुसऱ्याची निंदा करणारा मनुष्य बहुधा एकाच वेळी दोन गुन्हे करीत असतो एक तर केवळ अफवांवर विश्वास ठेवून, खऱ्या खोट्याचा पडताळा न करता तो खोटे बोलत असतो आणि त्याचवेळी दुसऱ्याच्या अनुपस्थितीत त्याची चहाडी-चुगली करण्याचा तो दुसरा गुन्हा करीत असतो.*
       *_"एक व्हा" असा डॉ बाबासाहेब आंबेडकर आपणांस नेहमी संदेश देत असत. माणसाचे जीवन एकमेकांवर अवलंबून आहे, म्हणून आपण एकोप्याने, मैत्रीने वागण्यास आणि एकमेकांना मदत करण्यास शिकले पाहिजे._*


                *फरुसवाचा*
            सम्यक वाणीमध्ये मोडणारा तिसरा गुण म्हणजे कटू किंवा कठोर न बोलणे म्हणजेच मधुर बोलणे.
१) ज्याला शिवीगाळ करावयाची आहे असा मनुष्य असला पाहिजे
२) मनात क्रोध असला पाहिजे
३) त्या मनुष्याला उद्देशून कठोर शब्द किंवा शिवीगाळीचे शब्द बोलले गेले पाहिजेत
             वरील अटी पूर्ण झाल्या तरच 'फरुसवाचा' कठोर बोलणे किंवा शिवीगाळ करणे झाले असे म्हणता येईल. फरुसवाचा किंवा कठोर बोलणे कोणालाही आवडत नाही. मधुर बोलण्याने माणसाचा कार्यभाग तर साधतोच, पण ऐकणाऱ्याच्या मनात त्याच्याबद्दल आपुलकीची भावना उत्पन्न होते. *संयुत्तनिकायातील एका सुत्तात* भगवान बुद्ध म्हणतात की माणसाच्या तोंडात कुऱ्हाड उगवत असते. मूर्ख मनुष्य शिवीगाळ करून स्वतःवरच कुऱ्हाडीचे घाव मारून घेत असतो. *मनापासून किंवा हृदयापासून बोललेली भाषा ही नेहमीच सरळ, सुंदर आणि परिणामकारक असते.*

                  *सम्फप्पलाप*
             सम्यक वाणीमध्ये मोडणारा चौथा गुण म्हणजे निरर्थक बडबड न करणे किंवा यथायोग्य बोलणे हा होय. सम्फप्पलाप म्हणजे निरर्थक बडबड, गप्पाटप्पा, बाष्कळ बडबड. सुरुवातीला वाटणाऱ्या निरर्थक बदबडीतूनच पुढे तिसऱ्यांची निंदानालस्ती करणे, एकमेकांचा हेवादावा करणे इ. अनर्थकारक गोष्टी होतात. *म्हणून भगवान बुद्धांनी भिक्खुंना उपदेश केला की, "भिक्खुंनो, तुम्ही जेव्हा एकत्र येता तेव्हा एकतर धम्माच्याविषयी बोलत जा किंवा आर्यमौन पाळत जा"* अफवा पसरविणे, दुसऱ्यांची निंदा करणे ह्या प्रकारचे बोलणे भगवान बुद्धांना कधीच आवडत नसे. *धम्मपदात म्हटले आहे की, निरर्थक असलेल्या हजारो शब्दांपेक्षा जे ऐकून मन शांत होते, असे एखादे सार्थ वचन केव्हाही श्रेष्ठ आहे.* असे म्हणतात की न बोलणे हे सुवर्णासारखे असते, तेव्हा सुवर्णापेक्षा जास्त किंमतीचे असल्याशिवाय माणसाने बोलू नये. *धम्मपदात एके ठिकाणी म्हटले आहे की एखादा पुष्कळ बोलतो म्हणून तो धर्मधर होत नाही. जो थोडेच बोलतो, ते आपल्या आचरणात आणतो व धर्माची अवहेलना करीत नाही त्यालाच धर्मधर म्हणावे*




*क्रमशः*

*संकलन : महेश कांबळे*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

                        *आर्यसत्य*
        *४. दुःख निरोधगामिनी प्रतिपदा*
                     *आर्य अष्टांगिक मार्ग*
         *२. सम्मासङ्कप्पो - सम्यक संकल्प*

           प्रत्येक माणसाला काही ध्येय, आकांक्षा आणि महत्वाकांक्षा असतात. अशी ध्येये, आकांक्षा आणि महत्वकांक्षा उदात्त आणि प्रशंसनिय असावित, ती शूद्र आणि अयोग्य नसावीत, *हा सम्यक संकल्पाचा आशय आहे. सम्यक संकल्प म्हणजे यथार्थ संकल्प किंवा ठीक विचार.* संकल्प या शब्दाचे अनेक अर्थ आहेत, जसे इच्छा, इरादा, मनोरथ इ. योग्य इच्छा किंवा योग्य विचार म्हणजे सम्यक संकल्प. *सम्यक दृष्टी आणि सम्यक संकल्प या दोघांना मिळून आर्य अष्टांगिक मार्गातील 'प्रज्ञा' विभाग असे मानण्यात येते. सम्यक दृष्टी म्हणजे गोष्टी जशा आहेत तशा यथार्थ रूपाने पाहणे. गोष्टी जशा आहेत तशा यथार्थ रूपाने पाहिल्याचे परिणाम म्हणजेच सम्यक संकल्प.*
         माणसाचे बोलणे आणि करणे हे त्याच्या विचारांवर अवलंबून असल्यामुळे विचार अत्यंत महत्वाचे आहेत.  माणसाच्या विचारांपेक्षा अधिक वेगाने जाणारे असे जगात काहिवंग नाही. माणसाच्या विचारांचा बाह्य जगावर आणि स्वतःवर खूपच परिणाम होत असतो. पण सम्यक दृष्टीने माणसाने सम्यक संकलो केले असता सुंदर विचाराचे प्रतिबिंब त्याच्या कुशल शब्दांत आणि कुशल कृत्यांत दिसून येते.
          *सम्यक संकल्प दोन प्रकारचे असतात. पहिल्या प्रकारचा संकल्प म्हणजे सम्यक संकल्प सास्त्रव आणि दुसऱ्या प्रकारचा सम्यक संकल्प म्हणजे सम्यक संकल्प अनास्त्रव. सास्त्रव संकल्प लोकीय आहे तर अनास्त्रव सम्यक संकल्प लोकोत्तर आहे. नैष्काम्य संकल्प, अव्यापाद संकल्प आणि अविंहिंसा संकल्प हे सास्त्रव आहेत तर अर्पणा, व्यर्पणा (तन्मयता), चित्ताचे अभिनिरोपण हे अनास्त्रव सम्यक संकल्प आहेत.* _निष्काम, अव्यापाद आणि अविंहिंसा म्हणजेच काम रहित केलेले संकल्प, मैत्रीने प्रेरित होऊन केलेले संकल्प आणि करुणेने प्रेरित होऊन केलेले संकल्प हे लौकिक सम्यक संकल्प आहेत._
       *द्वेधा वितक्कसुत्तात* दिलेल्या उपदेशावरून प्रामुख्याने लक्षात येईल की, *_सर्व पापांचे मूळ असलेले लोभ, द्वेष आणि मोह यांना मुळापासून काढून टाकणे हे सम्यक दृष्टी आणि सम्यक संकल्प यांच्यामुळे शक्य होते. मोह (भ्रम-अज्ञान) हा सम्यक दृष्टीने काढून टाकता येतो, तर लोभ आणि द्वेष हे सम्यक संकल्पाने काढून टाकता येतात. या कामात सम्यक दृष्टी आणि सम्यक संकल्प यांना आर्य अष्टांगिक मार्गातील इतर घटकांची मदत मिळत असते._*
       _भगवान बुद्ध फार पद्धतरशिरपणे लोकांना आपला धम्म शिकवीत असत. *धम्माचा जो गाभा चार्य आर्यसत्ये, त्याबद्दल ते एकदम प्रत्येकाशी बोलत नसत. जेव्हा त्यांना वाटे की चार आर्यसत्ये समजण्याची पात्रता अजून श्रोत्यांत आली नाही तेव्हा ते दान, शील इ. फायदे, सरळ गोष्टी शिकवीत असत. जेव्हा भगवान बुद्धांना वाटे की श्रोत्यांची मने धम्म ऐकण्यास तयार आहेत, ती लवचिक झाली आहेत, त्याच्यात अडथळे राहिले नाहीत, ती उन्नत झाली आहेत, प्रसन्न आहेत तेव्हाच ते आपला धम्म समजावून सांगत असत.* हा धम्म तथागतांनी स्वतः शोधून काढला आहे_
        धम्माचे अत्युच्च सत्य समजण्यासाठी माणसाचे मन स्फटिकासारखे स्वच्छ-निर्मळ असावे लागते, मनाला कलुषित करणाऱ्या लोभ आणि द्वेष या विकारांना समूळ निपटून काढल्याशिवाय मन निर्मळ होणार नाही आणि धम्म समजणार नाही. जेव्हा माणसाचे मन लोभ आणि द्वेषरहित होते तेव्हा त्याला सम्यक दृष्टी प्राप्त होते. सम्यक दृष्टी आणि सम्यक संकल्प अशा तऱ्हेने एकमेकांवर अवलंबून आहेत. त्यांच्यामुळे सम्यक प्रज्ञा होते.
    *_सम्यक संकल्प म्हणजे नैष्काम्य संकल्प, अव्यापाद संकल्प आणि अविंहिंसा संकल्प._*
 
                    *नैष्काम्य संकल्प*
           ऐहिक सुखोपभोगाच्या पलीकडे जाणे म्हणजेच नैष्काम्य, म्हणजे कामोपभोगाच्या उलट असलेली स्थिती. अशा स्थितीत नैसर्गिकरित्याच माणसाचे लक्ष निर्वाण हे ध्येय प्राप्त करण्याकडे लागलेले असते. कामोपभोगाच्या जीवनातील धोके आणि गैरफायदे भगवान बुद्धांनी अनेक वेळा आपल्या उपदेशांतून सांगितले आहेत. *त्याच्या पहिल्याच धर्मचक्रप्रवर्तन सूत्रात त्यांनी कामवासनेत आणि विशेषतः विषयासक्तीत सतत डुंबत राहण्याचा, त्यात तृप्ती मिळविण्याचा मार्ग अगदी हलक्या दर्जाचा, रानटीपणाचा, अनार्य, अयोग्य आणि हानिकारक आहे असे सांगितले आहे.* भगवान बुद्ध म्हणतात, विषयसुखे अनित्य आहेत, ती पोकळ आहेत, फसवी आहेत आणि खोटी आहेत. त्यांच्यापासून उत्पन्न होणारे अकुशल विचार तृष्णा उत्पन्न करतात, द्वेष उत्पन्न करतात आणि भांडणे निर्माण करतात. _जे विषयलोलुप आहेत किंवा जे भौतिकमतवादी आहेत त्यांना हे सर्व निरस आणि कंटाळवाणे वाटत असते, पण जे वास्तवता जशी आहे तशा स्वरूपात पाहतात त्यांना भगवान बुद्धांच्या उपदेशाची सत्यता पटते. अलीकडेच *मनोवैज्ञानिक आणि नितीतत्वज्ञसुद्धा २५०० वर्षांपूर्वी विषयवासनेबद्दल जे भगवान बुद्धांनी सांगितले तेच दुसऱ्या शब्दांत सांगत असतात.*_

*अव्यापाद संकल्प आणि अविहिंसा संकल्प*
      अव्यापाद संकल्प आणि अविहिंसासंकल्प म्हणजेच मैत्री आणि करुणा. मैत्री, करुणा, मुदिता आणि उपेक्षा या चार भावनांना ब्रह्मविहार असे म्हणतात.

              *ब्रह्मविहार*
           _करणीय मेत्तसुत्तात म्हटले आहे, आई जशी आपल्या एकुलत्या एका मुलाचे प्रसंग आला तर आपले प्राण खर्ची घालूनसुद्धा, परिपालन करते त्याचप्रमाणे माणसाने आपले मन सर्व प्राणीमात्रांविषयी अपरिमित प्रेमाने भरून ठेवावे - मैत्रीची भावना करावी - वर, खाली आणि चारी बाजू प्रेमाने भरून टाकाव्यात. त्या प्रेमात कोठेही अडथळा असू नये की भेदभाव असू नये. उभे असता, चालत असता, बसले असता किंवा अंथरुणावर पडल्यावर जोपर्यंत झोप येत नाही तोपर्यंत अशी मैत्रीची भावना जागृत ठेवावी. पण्डितजन ह्या स्थितीलाच ब्रह्मविहार असे म्हणतात._ *मैत्री, करुणा, मुदिता किंवा उपेक्षा यांपैकी एखादी मनोवृत्ती म्हणजेच बौद्ध ग्रंथातून अधून-मधून उल्लेखलेला ब्रह्मदेव होय*

                  *मैत्री*
      *संस्कृत भाषेतील मैत्री म्हणजेच पाली भाषेतील 'मेत्ता'. मिज्जती सिनिरहतिती मेत्ता म्हणजे स्नेह करण्यास लावणाऱ्या वृत्तीला मैत्री असे म्हणतात, अभिधम्मात अद्वेष चेतसिकेला मैत्री असे म्हणतात.* सर्व सजीव प्राण्यांवर, कोणताही भेदभाव न करता मैत्री केली जाते. *मैत्री भावनेचे विशेष कार्य म्हणजे द्वेषभावना समूळ उपटून काढणे.* _मैत्रीचा प्रत्यक्ष शत्रू म्हणजे क्रोध आणि दूरचा बुरख्यातला शत्रू म्हणजे स्वार्थी शारीरिक प्रेम._ *स्वार्थी शारीरिक प्रेम म्हणजे मैत्री नव्हे हे खास करून लक्षात ठेवले पाहिजे.* बऱ्याच वेळा शारीरिक आकर्षणामुळे लोक प्रेम करू लागतात. त्यांना वाटते की आपण मैत्री करीत आहोत, पण बुडग धम्मात सांगितलेली ही निर्भेळ-निस्वार्थी मैत्री नव्हे. *जर प्रेम हे काही लालसेने, आसक्तीमुळे किंवा स्वार्थी हेतूने केले जात असेल तर ती बुद्ध धम्मातील मैत्री नव्हे*
          _मैत्रिभावना ही अगदी शुद्ध आणि उदात्त अशी मनाची अवस्था आहे, ती शांत आहे, ती शुद्ध आहे, सर्वांचे हित करणारी आहे. सर्व प्राणीमात्रांवर सारखीच मैत्री करणारा योगी सर्व प्राणीमात्रांना स्वतःच्या सारखेच मानत असल्यामुळे त्याचा अहंपणा नष्ट झालेला असतो. *सुत्तनिपातातील 'मेत्तसुत्त' हे सर्व बौद्धांना सुपरिचित आहे. मैत्रिभावना कशी करावी याबद्दल हे सुत्त मार्गदर्शन करते.*_
         *भगवान बुद्ध स्वतः मैत्रीचे मूर्तिमंत प्रतीक होते. भगवान बुद्धांनी आळवक यक्षाला, अंगुलीमालाला आणि दारु पाजून मस्त केलेल्या नालागिरी नावाच्या हत्तीला आपल्या मैत्रीभावनेने कसे जिंकले हे सर्वांच्या परिचयाचे आहे.*

                  *करुणा*
        सम्यक संकल्पाचा तिसरा पैलू म्हणजे करुणा. करुणा म्हणजे सर्व मानवांविषयीची प्रेमपूर्ण दयाशीलता, करूणेमुळे दुसर्याचे दुःख पाहून दयेने हृदय भरून जाते, सहन हिट नाही. करुणशील पुरुष दुसऱ्यांचा द्वेष करीत नाही, द्वेष करू शकत नाही. निर्दयता आणि जुलूम जे करुणेचे जवळचे शत्रू आहेत तर शोक प्रदर्शित करणे हा तिचा बुरख्यातील शत्रू आहे. *शोक प्रदर्शित करणे हा करुणेचा मित्र असल्यासारखे वाटेल पण असले हे प्रदर्शन बर्याच वेळा फसवे असते.* करुणाशील मनुष्य सर्वांचे दुःख निवारण करण्याचा प्रयत्न करतो आणि कसलाही भेदभाव न करता सर्वांना संरक्षण देतो.
       *महाकारुणीक गौतम बुद्धांचे जीवन आणि उपदेश म्हणजेच करुणा. भगवान बुद्धांच्या उपदेशांतून करुणा काढली तर त्यांच्या उपदेशाचे सारच काढून टाकल्यासारखे होईल. कारण सगळ्या सद्गुणांची, सगळ्या चांगुलपणाची, सगळ्या सात्विक स्वभावाची जननी म्हणजे करुणा होय. करुणा स्वभावाने मृदू आहे तर प्रज्ञा स्वभावाने कठीण आणि मर्मभेदी आहे. करुणेला प्रज्ञेची साथ पाहिजे आणि प्रज्ञेला करुणेची. प्रज्ञा आणि करुणा दोन्ही मिळून जणू काही बुद्धधम्माच्या पाठीचा कणा आहे.*
      भावनाविवशता किंवा शोक करणे म्हणजे करुणा नाही. प्रियांचा वियोग झाला तर आपण रडतो. पण हे रडणे, शोक करणे म्हणजे करुणा नव्हे. *आपण आपाल्या या भावनांचे बारकाईने विश्लेषण केले तर असे दिसून येईल की हा शोक म्हणजे आपल्या आंतरिक स्वार्थाचाच एक आविष्कार आहे.* एखादा विपत्तीत सापडलेला मनुष्य करुणाशील माणसाने पाहिला तर त्याचे हृदय कम्पमान होते आणि हृदयाच्या या कम्पनामुळेच करुणाशील मनुष्य त्या विपत्तीत सापडलेल्या माणसाच्या मदतीला धावून जातो. *हे करण्यासाठी मन खंबीर असावे लागते, करुणा म्हणजे मनाचा कमकुवतपणा नाही.*

                  *मुदिता*
         माणसाच्या जीवनात सुख फक्त जवाएवढे असून दुःख पर्वताएवढे असले तरी ज्या ज्या वेळी माणसाच्या जीवनात सुखाचे क्षण येत असतात त्या त्या वेळी आपण माणसांच्या आनंदात सहभागी होऊन आनंद वाढविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण माणसांना सुख उपभोगण्यास शिकविले पाहिजे. *भगवान बुद्धांचा धर्म म्हणजे दुःखाचा प्रसार करण्याचा धर्म आहे असे काही लोक गैरसमजुतीने म्हणतात, ते बरोबर नाही. वास्तविक भगवान बुद्धांचा धम्म म्हणजे पायरी-पायरीने वाढत जाणारे, शुद्ध, निर्भेळ सुख प्राप्त करून देणारा धम्म आहे. निर्वाण म्हणजेच परमसुखाची अचल अवस्था, दुःख नष्ट करण्याच्या मार्गावर प्रगती करण्यास मुदिता ही मनाची अवस्था मदत करते. ज्याची मनोवृत्ती प्रसन्न आहे, मुदीत आहे तो ती कामे व्यवस्थित करू शकतो. मुदीत अंतःकरणाचाच मनुष्य अज्ञान नष्ट करून मुक्ती देणारी प्रज्ञा प्राप्त करू शकतो.*

                       *उपेक्षा*
         *उपेक्षा म्हणजे ज्ञानाने प्राप्त होणारी स्थिर अवस्था.* या अवस्थेत असलेला मनुष्य आनंदाने बेहोष होत नाही किंवा दुःखाने दुःखीत होत नाही.  उपेक्षा ही ज्ञानी माणसाची तटस्थता आहे. अज्ञानी किंवा आळशी माणसाच्या निष्क्रियतेला बुद्धधम्मात समजली जाणारी 'उपेक्षा' म्हणत नाही. त्याचप्रमाणे एखादं दुसऱ्या प्रसंगीं ओढून ताणून आणलेली त्रयस्थाची भूमिका म्हणजे उपेक्षा नव्हे. उपेक्षावृत्ती जीवनाचे यथार्थ ज्ञान झाल्यावर माणसात सहजपणे येते. *ब्रह्मविहारातील मनाची सर्वोच्च अवस्था म्हणजे उपेक्षावृत्ती, पण याचा अर्थ असा नव्हे की मैत्री, करुणा आणि मुदिता यांना सोडून देऊन फक्त उपेक्षावृत्तीचा अंगिकार करावयाचा. उपेक्षावृत्तीत मैत्री, करुणा आणि मुदिता या वृत्तींचा समावेश झालेला आहे. मैत्री, करुणा आणि मुदिता यांच्याशिवाय असलेली उपेक्षावृत्ती ही अर्थहीन, टाकाऊ वृत्ती आहे.*
      _समाजात वागताना निर्माण होणाऱ्या सर्व समस्यांवर सर्वोत्तम तोडगा मैत्री, करुणा, मुदिता आणि उपेक्षा या ब्रह्मविहाराच्या चार मानसिक अवस्थांनी मिळू शकतो. म्हणूनच त्यांना प्राणीमात्रांशी व्यवहार करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे असे म्हटले आहे._ *अमर्यादित मैत्री, करुणा, मुदिता आणि उपेक्षा प्रत्यक्ष व्यवहारात आणण्यासाठी त्यादृष्टीने मनाचा विकास करणे आवश्यक असते. मनात मैत्रिभावना, करुणा, भावना, मुदिता भावना आणि उपेक्षा भावना ठेवून, ध्यान केल्याने हळूहळू मन या चार भावनांनी परिपूर्ण होते. ध्यानाच्या या अवस्थेला ब्रह्मविहार भावना असे म्हणतात.*

*_सम्यक संकल्प म्हणजे नैष्काम्य संकल्प, अव्यापाद संकल्प आणि अविहिंसा संकल्प. तथागत बोधिसत्व होते तेव्हा मानवाला ग्रासणाऱ्या दुःखाचा नाश कसा करता येईल, त्याला सुखाचा मार्ग कसा दाखविता येईल याचा शोध घेण्यासाठी सम्यक संकल्प करूनच त्यांनी महाभिनिष्क्रमण केले होते._*

*क्रमशः*

*संकलन : महेश कांबळे*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...