Monday, 31 March 2025

मृत्यू मंगल

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

*_मृत्यू मंगल_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2025/03/blog-post_31.html

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

_विपश्यी साधकासाठी मृत्यू मंगलकारी आहे! अमंगल नाही. आल्हाददायक आहे! भयावह नाही. अभिनंदनीय आहे! तिरस्करणीय नाही!_

_जेव्हा समय पक्व होतो आणि आयू-संस्कार पूर्ण होतात तेव्हा शरीर-च्युति अवश्यम्भावी आहे. नियतीच्या या अतूट नियमाला कोणी टाळू शकत नाही._

_*परिपक्व साधक या अपरिहार्य मृत्यू क्षणांना हसत हसत स्वीकारतो. चित्त धारेवर तीळमात्रही भय रहात नाही, शोक होत नाही, तो घाबरून जात नाही. मृत्युसमयी जरी पीडा झाली तरी चित्त विचलित होत नाही. जसे अधिष्ठानमध्ये बसलेला साधक शारीरिक पीडा झाल्या तरी चित्त विचलीत होऊ देत नाही, तसेच जरी मृत्युसमयी पीडा झाली तरीही अविचल राहतो, सजग, सचेत राहतो. अनित्य बोधाची चेतना जागरुक असते. अशा चित्त क्षणांमध्ये जेव्हा च्युती होते म्हणजे, शरीर सुटते तेव्हा पुढील क्षणाची प्रतिसंधि म्हणजे पुढील जीवनाचे प्रथम चित्त निःसंदेह कोणत्याही सद्गतीच्या क्षेत्रामध्ये होते. दुर्गतीची किंचितही आशंका नाही.*_

_जो साधक जेव्हापासून विपश्यना मिळाली तेव्हापासून शेष जीवनापर्यंत विपश्यनेचा अभ्यासी राहतो, तोच सद्धर्माचा पथिक आहे. *'औपनेय्यिको' म्हणजे, एक-एक पावलाने पुढेच जाणार आहे.* मृत्यू त्याच्या प्रगतीला रोखू शकत नाही. मृत्यूमुळे चित्त धारेमध्ये धर्म चेतनेचा अवरोध होत नाही. प्रगती कायम राहते. निष्ठावान साधकासाठी धर्म साधनेचा 'ओपनेय्यिको' स्वभाव मृत्यूच्या क्षणी सहाय्यक म्हणून उपस्थित होतो. उन्नत भविष्य सुरक्षित होते. सद्गती सुनिश्चित होते._

_म्हणूनच खऱ्या साधकाला मृत्यूचे भय राहत नाही. तो ना जीवनाची घृणा करत मृत्यूची कामना करतो आणि ना जीवनात आसक्त होऊन मृत्यूला घाबरतो. पूर्णपणे विश्वस्त असतो की *मृत्यु पदोन्नती आहे, प्रमोशन आहे. तेव्हा तो प्रसन्नतेचा विषय आहे, शोकाचा नाही. विलापाचा नाही. विपश्यी साधक जीवन जगण्याची कला शिकतो.* जीवन जगण्याच्या कलेमध्येच मंगल मृत्यूची कला सामावली आहे. तरीही मरणासन्न विपश्यीच्या निकट जे अन्य साधक असतील त्यांनी त्याची मदत केली पाहिजे. साऱ्या वातावरणाला समतामयी धर्मचेतनेने परिप्लावित ठेवले पाहिजे. *जर कोणी अस्थिर चित्ताची आणि दुर्बल हृदयाची अश्रू वाहणारी व्यक्ती जवळ असेल तर तिला शीघ्रतेने बाजूला केले पाहिजे. कारण ती मरणासन्न व्यक्तीच्या महत्त्वपूर्ण चित्त-संततीला दूषित करण्याचे कारण बनू नये.*_

*_मरणासन्न व्यक्ती खूप पक्व नसेल तर त्याने आपल्या परिवारातील कोणा व्यक्तीला शोकाकुल पाहून स्वतः शोक ग्रस्त न व्हावे आणि आपला परलोक बिघडवू नये. सर्व उपस्थित साधकांनी त्यावेळी मरणासन्न व्यक्तीच्या आजूबाजूला बसून विपश्यना केली पाहिजे. अनित्यबोधिनी चेतनेच्या धर्म तरंगांचे प्रजनन करावे अथवा रोग्याप्रति मंगल मैत्री करावी. त्यावेळी सारे वातावरण धर्म चेतनेच्या विद्युत तरंगांनी ऊर्मिल राहिले पाहिजे._*

_*मृत्यूनंतर कोणीही रडू नये, विलाप करू नये, उलट मृताच्या सद्गतीवर चित्ताला प्रसन्न ठेवावे. त्याच्याप्रति मंगल मैत्रीचे प्रजनन करावे, त्याला आपले पुण्य वितरणच करावे. यामुळे मृत व्यक्ती जेथे कुठे जन्मली असेल, तिच्या चित्तधारेमध्ये धर्म चेतनेचा स्पर्श होतो आणि त्याच्या परिणामाने त्याची चित्त-चेतना प्रशांत, प्रसन्न, प्रफुल्ल राहते. शोक आणि विलाप केल्याने आपल्या चित्ताची दुःख-जन्य तरंगे आपल्या प्रिय मृत व्यक्तीच्या चित्तधारेला शोक संतप्त करतात. तिला व्याकुळ बनवून तिच्या सुख-शांतीचे हनन करतात. न स्वतः शोक-संकुल व्हावे आणि ना अन्य कोणाच्या शोकाचे कारण व्हावे. स्वतः प्रसन्नचित्त राहावे आणि अन्य कोणाच्या चित्त प्रसन्नतेचे कारण व्हावे. मंगल-मृत्यूचे हेच मंगल विधान आहे !*_

*_भवतु सब्ब मङ्गलं !_*

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

*_लेखक :- श्री सत्यनारायण गोयंका गुरुजी_*

_'विपश्यना' वर्ष ९, अंक १२, ज्येष्ठपौर्णिमा, दि २९/०५/१९८० मधून साभार_

*_संकलन :- महेश कांबळे_*

*_दिनांक :-_* ३१/०३/२०२५

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

Thursday, 27 March 2025

दट्ठब्ब सुत्ताचे पारायण

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

*_दट्ठब्ब सुत्ताचे पारायण_*

*_(वेदनासंयुक्त, संयुक्तनिकाय)_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2025/03/blog-post_27.html

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

_श्री सत्यनारायण गोयंकाजी धम्मगिरी, इगतपुरी, भारत १८ जानेवारी १९९४_

*_नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स !!!_*

_या, थोडावेळ भगवत-वाणीचे पारायण करू या आणि त्या वाणीला समजण्याचा प्रयत्न करू._

_भगवानांच्या वाणीत सर्वत्र अमृतच अमृत भरलेले आहे. ही वाणी साधकांसाठी प्रेरणेचा स्रोत आहे आणि मार्गदर्शिका सुद्धा आहे. असा विषय जो आमच्या साधनेशी सरळ-सरळ संबंधित आहे, त्याची एक दोन सूत्त वाचू आणि त्यांना समजण्याचा प्रयत्न करू._

_वेदनांवर भगवानांनी खूप काही सांगितले आहे, आम्हाला समजले पाहिजे की हाच भगवान बुद्धांचा सर्वात मोठा शोध आहे. आमच्या इंद्रियांचे जे विषय आहेत डोळ्यांचा विषय रूप आहे, कानांचा विषय शब्द आहे, नाकाचा विषय गंध आहे, जिभेचा विषय रस आहे, त्वचेचा विषय स्पृष्टव्य पदार्थ आहेत आणि मनाचा विषय चिंतन आहे या विषयात अडकून राहू नका, ह्या विषयात रस घेऊ नका. असू शकते ही गोष्ट भगवान बुद्धांच्या पूर्वीच्या लोकांनी सुद्धा सांगितली असावी, हा संशोधनाचा विषय आहे. पण भगवान बुद्धानंतर अध्यात्माच्या क्षेत्रात जे साहित्य निर्माण झाले त्यात सर्वत्र हेच म्हटले गेले की इंद्रिय विषयांच्या बंधनात बांधले जाऊ नका. त्याला चांगले मानून त्याच्याप्रती आसक्ती करू नका व त्याला वाईट मानून त्याच्याप्रती द्वेष करू नका. असे वाटते की ही भारताच्या अध्यात्माची आणि त्या परंपरेत चालत आलेली एक शिकवण आहे आणि ती खूप चांगली शिकवण आहे._

_*भगवान बुद्धांनी यामध्ये एक नवी कडी जोडली. त्या काळच्या भाषेत सळायतन - हे आमचे सहा दरवाजे आहेत- सहा इंद्रिय आणि जे ह्यांचे विषय आहेत, त्यांनाही सळायतन म्हटले गेले - त्यांच्या बंधनापासून दुर राहा. एवढे सांगून राहिले नाहीत कारण त्यांनी शरीर आणि चित्त तसेच त्यांच्या परस्पर संबंधाचे खूप खोलपर्यंत संशोधन केले. केवळ बुद्धी विलास नाही उलट अनुभूतीच्या स्तरावर संशोधन केले आणि त्या पलीकडील अवस्था पाहिली, तेव्हा सगळी गोष्ट समजली.* जसे हातात एक आवळा ठेवला आहे, त्याला तळहातावर चहूबाजूंनी फिरवून-फिरवून पाहिले, त्याप्रमाणे सगळी गोष्ट त्यांना समजली. त्यांनी पाहिले की ही इंद्रिय आणि ह्या इंद्रियांचे विषय आणि त्यांच्यामुळे आमच्या मनात आसक्ती, द्वेष जागतो, हे सत्य आहे- *सळायतनं पच्चया फस्स.* ही सहा इंद्रिय आणि जेव्हा यांचा आपल्या आपल्या विषयांशी स्पर्श होतो, तेव्हा ह्या सत्याची खूप खोल अशी आणखी एक कडी आहे- *फस्स पच्चया वेदना* - ह्या स्पर्शाच्या कारणामुळे शरीरावर संवेदना जागते. हा विषय चांगला वाटला तर सुखद संवेदना जागते आणि वाईट वाटला तर दुःखद संवेदना जागते. परंतु पहिल्यांदा संवेदना जागते त्यानंतर तृष्णा जागते किंवा असे म्हणू की तिच्याच आधारावर तृष्णा जागते - *वेदना पच्चया तण्हा.* तिला पकडून ठेवण्याची किंवा दूर करण्याची तृष्णा, म्हणजे संवेदना चांगली वाटली तर तिला कसे पकडून ठेवावे यांची तृष्णा आणि वाईट वाटली तर तिला दूर करण्याची तृष्णा- दोन्ही तृष्णाच आहेत. *ह्या तृष्णा जागल्या की बंधन सुरु झाले.*_

_वर वर असे वाटते की आमच्या डोळ्यांना रुपाच्या विषयापासून दूर केले, कानाला शब्दाच्या विषयापासून, नाकाला गंधाच्या विषयापासून, जिभेला रसाच्या विषयापासून, त्वचेला स्पृष्टव्य पदार्थापासून दूर केले तर सुटका झाली. पण नाही, आमचे मन आतल्या आत सगळे खेळ खेळत राहते. आता या वेळी डोळ्यांना कोणते रूप दिसत नाही पण पूर्वी केव्हातरी पाहिले होते. त्या रूपाचे चिंतन चालू होते- चांगले आहे, वाईट आहे. *अर्थात या इंद्रियाचा जो विषय आहे तो बंद झाला नाही, मन आपले काम करीतच आहे.* कानांनी कोणता शब्द ऐकला होता- कोणी शिवी दिली, कोणी प्रशंसा केली, चालूच आहे मनात. असेच नाकाने कोणता गंध, जीभेने कोणता रस, शरीराला लागलेला कोणता स्पृष्टव्य पदार्थ, ह्या सर्वांवर मन आपला खेळ खेळत राहते आणि त्यामुळे संवेदना होतात. त्या संवेदनांमुळे आम्ही आसक्ती उत्पन्न करतो, द्वेष उत्पन्न करतो, त्यांना दूर करण्याचा प्रयत्न करतो. अंतर्मनात खोलवर हा क्रम चालतच राहतो. मनाच्या वर-वरच्या भागावर मनाला दाबून आम्ही स्वतःला वाचविण्याचा प्रयत्न केला किंवा मनाला दुसऱ्या विषयात लावून भुलवून ठेवले की अरे बाबा सोड ह्या गंधाला, रसाला. पहा ह्या वेळी ही किती चांगली धर्माची गोष्ट चालू आहे, याचे चिंतन कर. पण नाही, अंतर्मनातील विचारांचे ते तूफान चालूच राहते. *भगवान बुद्धांची बोधी ह्याच गोष्टीची आहे की अंतर्मनात खूप खोलपर्यंत काय होत आहे?* अंतर्मनात खूप खोलवर प्रतिक्षण शरीरावर ज्या संवेदना होत आहेत, त्यांचा स्पर्श होत आहे. ही धारा सतत चालू आहे. जोपर्यंत आम्ही जिवंत आहोत *कायसम्फस्सजा वेदना* - शरीराच्या संस्पर्शाने वेदना होत आहेत. मन शरीराला स्पर्श करीत आहे, वेदना होत आहे, सुखद होत आहे, दुःखद होत आहे आणि प्रतिक्रिया चालू आहे. तेव्हा कुठे सुटका झाली बाबा? पळून जाण्याने प्रश्नाचे समाधान होत नाही. *पलायन करून आम्ही मुक्ती प्राप्त करू शकत नाही.*_

_हे पाहून ते म्हणाले- *पुब्बे अननुसुतेसु धम्मेसु चक्खूं उदपादि, ञाणं उदपादि, पञ्ञा उदपादि, विज्जा उदपादि, आलोको उदपादि.* हा सगळा प्रपंच मन आणि शरीराचा, त्यांच्या कारणामुळे उत्पन्न होणाऱ्या संवेदनांना आणि त्या संवेदनामुळे प्रतिक्रिया करण्याचा, हा सगळा प्रपंच पाहिला. पहाता-पहाता त्याच्या पलीकडचे सत्य काय आहे, हे सुद्धा पाहिले. अरे, असे तर कधी ऐकलेच नाही. कुठून ऐकणार? अशी कोणती गोष्ट समाजात नव्हतीच. खूप झाले तर ध्यान करा. आपल्या मनाला दुसरीकडे कोठे दुसऱ्या गोष्टीत लावा म्हणजे सुटका होईल. सुटका होणार नाही, अंतर्मनात खूप खोलपर्यंत काय चालू आहे त्याला जाणण्याचे कामच केले नाही. *तर पुब्बे अननुसुतेसु- पूर्वी अशी जी गोष्ट कधी ऐकली नव्हती, त्याविषयी चक्खूं उदपादि ज्ञानाचे चक्ष उघडले, अंतर्चक्षू उघडले. ञाणं उदपादि- ज्ञान जागले आणि बुद्धीच्या स्तरावर समजलेही हा काय प्रपंच आहे? पहा, सुखद वाटतो, चांगला वाटतो, तेव्हा आसक्ती उत्पन्न करतो. दुःखद वाटतो, तेव्हा द्वेष उत्पन्न करतो. हा काय प्रपंच आहे? हे समजले म्हणजे पञ्ञा उद्पादि- आता प्रत्यक्ष अनुभूतीच्या स्तरावर समजले, केवळ बुद्धीच्या स्तरावर नाही.* पहा, ही संवेदना जागली ना आणि पहा ही चांगली वाटली तेव्हा आसक्ती जागू लागली ना. संवेदना जागली, आम्हाला चांगली वाटली, आसक्ती जागली आणि समाप्त सुद्धा झाली. अरे, हे अनित्य आहे बाबा, हे नश्वर आहे. पहा, दुःखद संवेदना जागली आणि तिच्यावर प्रतिक्रिया करणे सुरू झाले, द्वेष जागला. संवेदना चांगली वाटली नाही, तिला दूर करा, तिला दूर करा, ते सुद्धा जाणले. आणि जेव्हा तिला पाहणे शिकलो, तेव्हा तिला पाहता-पाहता, अरे ही सुद्धा समाप्त झाली ना. *उत्पन्न होणे, नष्ट होणे हा तिचा स्वभाव आहे. अरे, तिचा स्वभावही अनित्य आहे, नश्वर आहे, भंगुर आहे. तेव्हा काय वेडेपणा आहे, जे भंगुर आहे, त्याच्याप्रती काय आसक्ती करू, त्याच्याप्रती काय द्वेष करू? अशाप्रकारे आपल्या मनाला खोलपर्यंत सुधारता सुधारता सुधारता संवेदनांच्या पलिकडे पोहोचला. त्या इंद्रियातीत अवस्थेपर्यंत पोहोचला, जेथे इंद्रियं काम करीतच नाहीत. आता मनाला तुडवण्याची जरुरी नाही, दाबण्याची जरुरी नाही. त्या निर्वाणिक अवस्थेचा साक्षात्कार झाला, जेथे कोणते इंद्रिय काम करीत नाही, शरीर आणि चित्ताच्या पलीकडील अवस्था आहे. तिला पाहिले तेव्हा सगळा प्रपंच समजला. अंतर्चक्षु जागले, ज्ञान जागले, प्रज्ञा जागली म्हणजे विद्या जागली.*_

_खरी विद्या तिला म्हणतात जिच्यामुळे सगळी गोष्ट समजेल. ह्यापूर्वी अविद्याच विद्या होती. जे दुःख आहे, त्याला सुख मानत होतो. ध्यान करता-करता खूप वेळा सुखद संवेदना आल्या, खूप चांगले आहे, येथे तर खूप सुख आहे. आता समजलो यात काय सूख आहे? समाप्त होते ना, काय सुख आहे यात? हे जाणले तर विद्या जागली. तिच्याप्रती आसक्ती किंवा द्वेष का जागतो, हे समजले. ह्याला कसे थांबवू शकतो हे समजले. ह्याला थांबवून याच्या पलीकडच्या अवस्थेचा अनुभव कसा केला जाऊ शकतो हे ही समजले. *विज्जा उदपादि-* सगळी अविद्या आणि ह्या सत्यांना न जाणणाऱ्या सगळ्या गोष्टी दूर झाल्या. तर जाणले *आलोको उदपादि.* इंद्रियांच्या पलिकडची ती अवस्था, जेथे अंधकार नाही, जेथे प्रकाशच प्रकाश आहे. पण ध्यान करीत असताना केव्हा केव्हा हे जे *उग्गह निमित्त* जागते, डोळ्यासमोर प्रकाशाची थोडीशी एक झलक येते, नंतर दूर होते. हे जे थोड्या वेळासाठी *पटिभाग निमित्त* जागते, ते त्या आलोकाच्या खूप दूरचे आहे. त्याची तुलना न सूर्याच्या प्रकाशाशी करू शकतो, न चंद्राच्या प्रकाशाशी करू शकतो, न ताऱ्यांच्या प्रकाशाशी. कोणत्याही प्रकारच्या ह्या सांसारिक, लोकीय प्रकाशाशी त्याची तुलना करू शकत नाही, असा *आलोको उदपादि.* जेव्हा *पुब्बे अननुसुतेसु थम्मेसु, हे शोधून काढले तेव्हा बुद्ध बुद्ध झाला, नाहीतर बुद्ध नाही. चक्खूं उदपादि, ञाणं उदपादि, पञ्ञा  उदपादि, विज्जा उद्पादि, आलोको उदपादी 'ति.*_

_वेदनांचे खूप मोठे महत्त्व आहे. आज ह्या वेदनांसंबंधित एक-दोन सूत्तांचे पारायण करू या._

*_तीन प्रकारच्या वेदना_*

_"तिस्सो इमा, भिक्खवे वेदना।" "हे भिक्षुनो', जेव्हा भगवान 'भिक्षु' शब्दाचा प्रयोग करतात तेव्हा हे ठीक आहे की त्यांच्या सभोवती अधिकांशतः गृहत्यागी पिवळे वस्त्रधारी भिक्षुच राहत असत, पण भगवानांनी ही विद्या केवळ त्या भिक्षूंना शिकविली नाही, गृहस्थांना सुद्धा शिकविली. त्यांच्या काळात एक नाही, दोन नाही, लाखोंच्या संख्येने लोक स्रोतापन्न अवस्थांमध्ये, सकदागामी अवस्थांमध्ये, अनागामी अवस्थांमध्ये गृहस्थ होते आणि थोडे गृहस्थ असे होते की जे गृहस्थ असून देखील अर्हत अवस्थेपर्यंत पोहोचले होते. विद्या सर्वांनी शिकली होती. म्हणून जेव्हा असे म्हणतात. "भिक्षुंनो" तेव्हा गृहस्थ असो की संन्याशी असो, जो जो आपल्या दुःखांचे भेदन करण्याच्या कामात लागला, आपल्या दुःखांपासून सुटका करून घेण्याच्या कामात लागला, तोच भिक्षु. म्हणून त्यांना म्हटले "भिक्षुंनो"_

_*कतमा तिस्सो? कोणत्या तीन आहेत?* तेव्हा सांगतात, *सुखा वेदना, दुक्खा वेदना, अदुक्खमसुखा वेदना.* आज *भारतातच नाही तर भारताच्या बाहेर सुद्धा श्रीलंकेमध्ये, बर्मामध्ये, थायलंडमध्ये, कंबोडियामध्ये आम्ही पाहिले की आजच्या त्यांच्या भाषेत तसेच भारतातील सर्व भाषेत वेदना शब्दाचा अर्थ केवळ दुःखच राहिला आहे आणि तो ठीकच आहे. कारण भगवानांची सगळी वाणी अशीच आहे की ज्या सगळ्या वेदना आहेत त्या दुःखच आहेत. कदाचित याच कारणामुळे असू शकते की ही गोष्ट पसरली. परंतु आज जर कोणी म्हणते सुखद वेदना तर लोकांचे कान उभे राहतात. वेदना आहे तर मग ती सुखद कशी झाली? वेदना तर पीडेला म्हणतात तर पीडा सुखद कशी झाली? याला समजले पाहिजे. म्हणून येथे आल्यावर वेदना शब्दाचा प्रयोग न करता 'संवेदना' शब्दाचा प्रयोग करणे सुरू केले म्हणजे लोक समजतील की ही सुखद सुद्धा असू शकते, दुःखद सुद्धा असू शकते आणि अशी सुद्धा असू शकते जी न सुखद आहे न दुःखद. याप्रकारे तीन प्रकारच्या वेदनांची माहिती दिली गेली.*_

_*सुखा, भिक्खवे, वेदना दुक्खतो दठ्ठब्बा,* हा त्यांचा उपदेश सुरू होतो की बाबा! जी सुखद वेदना आहे हे तिला सुखद मानू नकोस कारण वस्तुतः ती सुखद नाही. उलट एक भ्रम आहे, माया आहे, एक मृगजळ आहे. खूप चांगले वाटले, अरे धारा प्रवाह झाला, खूप चांगले वाटले-तरंगच तरंग, तरंगच तरंग. हा विजेसारखा करंट सुरू झाला, अरे खूप चांगले वाटले, खूप चांगले. आणि आता समाप्त झाला ना? तर काय चांगला ? आणि यालाच सर्व काही मानून अडकून गेलात तर पुढे पाऊल ठेवू शकणार नाही ना? तर मुक्त अवस्थेपर्यंत कसे पोहोचाल? जर ह्याच गोंधळात पडाल की सुखद वेदना हेच अंतिम लक्ष्य आहे आमच्या साधनेचे तर मुक्त अवस्थेपर्यंत पोहोचणार नाही. अरे ही दुःखद आहे बाबा, जी आम्हाला सुखद वाटत आहे. ती केवळ वाटत आहे वास्तविक स्थिती ही आहे की ती दुःखद आहे. पुढे ते म्हणतात *दुक्खा वेदना सल्लतो दटुब्बा,* जी दुःखद संवेदना आहे, अरे ती तर अशी आहे जसे कुठला बाण लागला, कुठला भाला घुसला. यातून बाहेर पडायचे आहे. हे कसे जीवन आहे! प्रतिक्षण आतमध्ये कधी सुखद अनुभव आहे तर कधी दुःखद अनुभव आहे, या दोन्हीतून बाहेर पडायचे आहे ना! तर सुखदला सुद्धा दुःखद आहे असेच समजेल. बुद्धांनी  सांगितले म्हणून मानत आहात तर काही पल्ले पडणार नाही. अनुभूतीने समजाल हे जे सुखद आहे ते समाप्त झाले तर दुःखच आहे ना! अरे जे दुःखद आहे आणि अधिकांशतः दुःखदच असते, ते तर जसे बाण लागला आहे. किती जन्मांपासून हा बाण लागला आहे. किती जन्म घालवले दुःखातच. बाण लागला आहे ना, दुःखाचा बाण लागला आहे. भाला घुसला आहे आणि जीवन घालवित आहोत, एका जीवनानंतर दुसरे जीवन, दुसऱ्यानंतर तिसरे, अंत नाही, कशाप्रकारे अडकून गेलो, यातून बाहेर पडायचे आहे. तर दुःखवाल्याला समजले पाहिजे की आमच्या आत बाण लागला आहे, हा भवचक्राचा बाण आहे. हा भवचक्राचा बाण जोपर्यंत आहे तोपर्यंत अशा प्रकारचे दुःख येणारच आहे. कधी या गोष्टीने दुःख, कधी त्या गोष्टीने दुःख आणि त्यामुळे शरीरात अशा प्रकारच्या दुःखद संवेदना किंवा तशा प्रकारच्या दुःखद संवेदना. हे दुःख मागे लागले आहे, भवतृष्णेचा बाण जो लागला आहे, भव-संसरणाचा बाण जो लागला आहे, त्यातून बाहेर पडण्यासाठी विद्या मिळाली, नाहीतर दुःखच दुःख, दुःखच दुःख._

_*अदुक्खमसुखा वेदना अनिच्चतो दट्ठब्बा.* आता हा दटुब्बा, या शब्दाला सुद्धा समजले पाहिजे. जसे विपश्यना, तर पश्यना म्हणजे पाहणे, बघणे, बघतो आहे, पहातो आहे. आजच्या भारतात या शब्दाचा असा एक अर्थ प्रचलित झाला ज्याने सर्व साधना विस्मरणात गेली. आम्ही विसरून गेलो की साधना काय असते, मुक्तीचा मार्ग काय असतो. आज तर बघणे शब्दाचा अर्थ झाला कुठले रूप बघा, रंग बघा, प्रकाश बघा, आकृती बघा. डोळ्यांचा प्रयोग करा, तर जे समोर आहे त्याला बघितले. नाही नाही, भारताच्या पुरातन भाषेमध्ये असा अर्थ सुद्धा होता परंतु साधनेच्या क्षेत्रात बिलकुल पण नाही, जरासुद्धा नाही. अनुभव करा! रूप बघायचे नाही आहे. सुखद संवेदना आली तर तिचे काय रूप बघणार? ती काळी आहे का गोरी आहे, का प्रकाशमान आहे का अंधारलेली आहे, काय बघणार? या आकाराची आहे की त्या आकाराची आहे? नाही, अनुभव करा, सुखद संवेदना आहे तिला अनुभव केले सुखद आहे. दुःखद आहे तर दुःखद आहे व असुखद आहे तर असुखद आहे, अदुःखद आहे तर अदुःखद आहे- तिला अनुभवा. आजच्या भारतातील भाषेत सुद्धा तो जुना अर्थ उपयोगी होताना दिसतो. आम्ही विसरलो, कधी ध्यानपूर्वक पाहात नाही. आपल्या भाषेला आम्ही नीट समजले नाही. जसे एक माणूस म्हणतो-बघ, हा रसगुल्ला खूप गोड आहे, तू खाऊन तर बघ! तर खाऊन काय बघणार? खाऊन त्याचे रूप बघणार, की त्याचा रंग बघणार, काय बघणार? खाऊन त्याचा अनुभव करून बघ, कसा आहे. हे रेशीम खूप मुलायम आहे, अरे जरा हात लावून तर बघ. हात लावून काय बघणार, त्याचा रंग बघणार? हे खूप सुगंधित आहे, खूप छान आहे, वास घेऊन तर बघ ! हा 'बघ' शब्द आजही ही आपल्या भाषेत वापरला जातो, अनुभव करण्याच्या अर्थाने. आणि साधना तर अनुभवायचीच गोष्ट आहे. *विपश्यना, तर अनुभव करणे, दट्ठ, अनुभव करणे, दट्ठब, अनुभव करण्यायोग्य. हे सर्व अनुभव करण्याच्या अर्थाने घेतले पाहिजे.* रूप, रंग प्रकाश, आकार यांच्याशी त्यांचा दुरान्वयानेही संबंध नाही, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे._

*_सम्यकदर्शी_*

_*येतो खो, भिक्खवे, भिक्खुनो सुखा वेदना दुक्खतो दिट्ठा होति, दुक्खा वेदना सल्लतो दिट्ठा होति, अदुक्खमसुखा वेदना अनिच्चतो दिट्ठा होति,* जेव्हा कोणा भिक्षुला असे होऊ लागते की ही जी सुखद वेदना आहे, अरे ती तर दुःखद आहे ना, ही जी दुःखद वेदना आहे ती तर बाणाप्रमाणे दुःख देणारी आहे आणि ही जी असुखद अदुःखद वेदना आहे, ती तर अनित्य आहे ना, तेव्हा *अयं वुच्चति, भिक्खवे,* तेव्हा असे म्हटले जाते की *भिक्खु सम्मद्दस्सो, आता त्याचे दर्शन 'सम्यक दर्शन' होऊ लागले आहे.*_

_आता कोठे गोंधळात पडलात सम्यक दर्शनाला घेऊन आमची दार्शनिक मान्यता ही आहे, याला मानणारा व्यक्ती सम्यकदर्शी आहे, यावर श्रद्धा ठेवणारा व्यक्ती सम्यकदर्शी आहे आणि जी यावर श्रद्धा ठेवत नाही, याला मानत नाही ती मिथ्यादर्शी अरे, काय देणे-घेणे या गोष्टीचे. दर्शन झाले, अनुभूती झाली- अनुभूती सम्यक रूपात झाली, योग्य प्रकारे झाली. अन्यथा अनुभूती झाली, सुख आले व आम्ही आसक्ती जागवणे सुरू केले तर सम्यक अनुभूती कोठे झाली? अनुभूती झाली, दुःख आले आणि आम्ही रडू लागलो, तर अनुभूती तर झाली, सम्यक कोठे झाली? असुख-अदुःख आले आणि आम्ही त्यालाच अंतिम अवस्था मानू लागलो तर सम्यक अनुभूती कोठे झाली? त्याचा योग्य स्वभाव पाहत आहोत आणि साक्षीभाव आहे, 'भोक्ता भाव नाही, तर त्याला म्हटले पाहिजे की सम्यक दर्शन होणे सुरू झाले. दुःख आहे, त्याचे सम्यक दर्शन, दुःखाचे कारण आहे, त्याचे अनुभूतीच्या स्तरावर सम्यक दर्शन, त्याला दूर करण्याचा उपाय आहे, ह्याचे सम्यक दर्शन आणि ते दूर झाले, त्या अवस्थेचे सम्यक दर्शन तर सम्मद्दस्सो असे होते तेव्हा काय होते? *अच्छेच्छि तण्हं,* तृष्णेला कापून टाकले, तृष्णेचे बंधन आम्हाला बांधून ठेवत होते, असे करता करता, सम्यक रुपाने बघता-बघता, सर्व तृष्णेच्या बंधनांना कापून टाकतो. *विवत्तयि संयोजनं,* ही संयोजन जी आम्हाला बांधून ठेवत आहेत, ही संयोजन जी आम्हाला लपेटलेली आहेत, त्याचे विवर्तन सुरू केले त्याने, त्यांना उघडणे सुरू केले. जी बंधन होती ती उघडली जात आहेत, उघडली जात आहेत, आमची संयोजन दूर होत आहेत. *सम्मा मानाभिसमया,* खूप कठीण काम आहे. हे सर्व करीत असताना सुद्धा साधकाचा 'मी' निघत नाही. मी, मी करीत आहे, मी बंधनात आहे, मला मुक्त व्हायचे आहे, मी मुक्त होईनच, अशा प्रकारे चालत मुक्त होईन. मी-मी, माझे-माझे, उंच अवस्थांवर जाऊन सुद्धा सुटत नाही. तर हा जो मान आहे, मी, माझेचा भाव आहे, त्याला खूप चांगल्या प्रकारे समजतो, कसा वेडेपणा आहे, मी आणि माझेच्या नावावर काय वेडेपणा चालला आहे, तर त्याला मानाभिसमया. आणि *अन्तमकासि दुक्खस्सा,* मग अशा अवस्थेला पोहोचतो, जेथे दुःख नितांत समाप्त झाले, नाहीच आहे, शेवट झाला._

_*हे सर्व केव्हा होते? जेव्हा सुखद संवेदनेला दुःखद असे मानतो, दुःखद संवेदनेला बाण लागल्यावर होणाऱ्या दुःखासारखे मानतो आणि असुखद-अदुःखदला अनित्य आहे, असे समजतो, तेव्हा त्या अवस्थेला पोहोचतो.* विपश्यना कशा प्रकारे केली पाहिजे, हे सगळे यात समजावले आहे._

*_यो सुखं दुक्खतो अद्द, दुक्खमद्दक्खि सल्लतो।_*

_*यो सुखे दुक्खतो अद्द,* अद्द चा अर्थ येथे, जसे पुढे *अद्दक्खि,* त्याच अर्थाने, की जो सुखाला दुःखाप्रमाणे पाहतो, हे दुःख आहे असे समजतो. *दुक्खमद्दक्खि सल्लतो*, जे दुःख आहे त्याला बाण टोचलेल्या पीडेप्रमाणे पहात आहे, समजत आहे. आणि_

*_अदुक्खमसुखं सन्तं, अद्दक्खि नं अनिच्चतो ॥_*

_*अदुक्खमसुखं सन्तं,* हे समजले पाहिजे, साधना करताना बऱ्याच वेळा अशा प्रकारची अनुभूती होते, जिला आम्ही म्हणू शकत नाही की सुखद आहे, जिला आम्ही म्हणू शकत नाही की दुःखद आहे. परंतु ही खूप वरवरच्या स्तरावरील गोष्ट आहे, भगवान जेव्हा असुख-अदुःखची गोष्ट करतात तेव्हा खूप खोलवरच्या अनुभूतीची गोष्ट करतात. यासाठी *सन्तं* शब्दाचा वापर केला गेला आहे. ध्यान करता-करता उदय-व्यय, उदय-व्यय, उदय-व्यय, त्यानंतर भंग-भंग, असे करता करता आम्ही *ओळारिको,* स्थूलापासून सूक्ष्मतेकडे जात आहोत, *सुखमा-सुखमा-सूखमा.* पुढे जात-जात एक अशी अवस्था येते की आतमध्ये अनुभव होत आहे, परंतु नाही सांगू शकत की ही सुखद संवेदना आहे, नाही सांगू शकत की ही दुःखद संवेदना आहे, खूप शांतता आहे, *सन्तं, खूप शांतता आहे.* मनाच्या त्या खोलीमधून खूप विकार निघून गेले. खूप विकार निघून गेले तर आतमध्ये खूप शांतता, खूप प्रश्रब्धि, अशी शांती आहे की त्यावेळी कळतच नाही की यामध्ये काही उत्पाद-व्यय सुद्धा होत आहे. कारण की इतक्या सूक्ष्म अवस्थेमध्ये उत्पाद-व्यय होत आहे, मानस त्याला जाणू शकत नाही. तेव्हा अधिकांशतः ही अडचण येते, हा धोका होतो की साधक समजतो की मला अंतिम अवस्था प्राप्त झाली. *निब्बानं परमं सुखं-* निर्वाणामध्ये सुखशांती असते, तर आम्हाला सुखशांती मिळाली. बघा, किती शांती आहे, पोहोचलो ना! नाही, धोका आहे, अविद्या आहे, तुम्हाला होश नाही आहे. अजून इंद्रिय क्षेत्रातच भ्रमण करीत आहात._

_खूप साधक येतात, जे महिन्याच्या शिबिरामध्ये बसतात, दीड महिन्याच्या शिबिरात बसतात. येतात की आम्हाला निर्वाणाची अनुभूती झाली. काय झाले बाबा? आतमध्ये इतकी शांतता प्राप्त झाली, इतकी शांतता. चांगली गोष्ट आहे. आता जेव्हा कधी अशी अवस्था येईल तेव्हा जरा बघा डोळे उघडून, बघा की तुमचे डोळे काम करत आहेत का? कानाने ऐकून बघा की ऐकू येत आहे का? अशाप्रकारे सगळ्या इंद्रियांना बघा. चिमटा घेऊन बघा, शरीरात काही जाणवत आहे ना? अरे, तर मग कुठले निर्वाण बाबा. अजून इंद्रिय अवस्थाच आहे ना? हो, इंद्रिय अवस्थेत शांतता आली, ही खूप चांगली गोष्ट आहे. पण हे अंतिम लक्ष्य नाही ना! अजून याच्या पुढे जायचे आहे. खूप लक्षपूर्वक बघाल तर त्यात ही एक खूप सूक्ष्म असा उदय-व्यय, उदय-व्यय चालू आहे. उत्पन्न होत आहे. नष्ट होत आहे. खूप सूक्ष्म स्तरावर होत आहे. पण हे सुद्धा अनित्य आहे, असे समजत राहील. अन्यथा त्यालाच नित्य, शाश्वत, ध्रुव मानेल, तर अविद्येत पडेल, बेहोशी मध्ये पडेल, मोह-मूढतेत अडकेल. अरे नाही, अजून माझी इंद्रिय काम करीत आहेत. ती तर इंद्रियांच्या पलीकडील अवस्था आहे, अजून ती आली नाही. हिला लक्षपूर्वक बघू तर या. *ही जी असुख-अदुःखची अवस्था आहे, त्या अवस्थेला भगवान म्हणतात की जी खूप शांत अवस्था आहे, तेथे जाऊन अनित्य बोधाला अजून दृढ करायचे आहे. अनुभूतीच्या स्तरावर अजून दृढ करावे लागते.* तेव्हा साधक वेगाने पुढे जात राहतो आणि इंद्रियांच्या पलीकडील अवस्थेला पोहोचतो. येथे मन अडकवेल तर ही मधली धर्मशाळा आहे. मधल्या धर्मशाळेमध्येच अडकला तर पुढे जाणे बंद होईल._

_आम्ही आपल्या अनुभवाने हे बघितले आणि अनेकांच्या अनुभवाने सुद्धा की जी-जी लोक कुठल्या प्रकारच्या दार्शनिक मान्यतेमध्ये अडकले आहेत, त्यांच्यासाठी दार्शनिक मान्यताच प्रमुख आहे. मुक्त होणे त्यांच्यासाठी प्रमुख नाही. विकारांपासून सुटका मिळवणे त्यांच्यासाठी प्रमुख नाही. त्यांच्यासाठी प्रमुख आहे की आमची जी दर्शनाची मान्यता आहे, ती कशी सिद्ध होईल आणि तिला कसे आम्ही अनुभवू, तर जेव्हा अशा प्रकारची अवस्था येऊ लागली की सर्व शरीर केवळ तरंगच तरंग, तरंगच तरंग, जी वरवरची अवस्था आहे अजून. बस, एक-एक अणू चेतन झाला. आम्हाला परम चैतन्याची अनुभूती झाली, तर ईश्वराची अनुभूती झाली, ब्रह्माची अनुभूती झाली, आम्ही मुक्त झालो. असे समजणारी व्यक्ती पुढे कशी जाईल? त्या चेतन अवस्थेतून पुढील उंच अशी एक शांत अवस्था आली आणि तिलाच समजून बसला की ही परम शांतीची अवस्था आहे, ही ईश्वराच्या दर्शनाची अवस्था आहे, त्याच्या अनुभूतीची अवस्था आहे किंवा ही आमच्या आत्म्याच्या अनुभवाची अवस्था आहे- तर अडकला आहे, आपल्या मान्यतांमध्ये अडकला आहे ना? खरे हे आहे की तुमची मान्यता जी काही आहे तिला एका बाजूला ठेवा. तुम्ही अनुभव घ्या, प्रत्येक गोष्टीचा अनुभव, अनुभव, अनुभव. हे मानून चला की अंतिम अवस्था इंद्रियांच्या पलीकडली अवस्था आहे, तर प्रत्येक पडावात हे बघत राहा की ही जी काही अवस्था आहे, अजून इंद्रिय क्षेत्रातील आहे ना? इंद्रिय क्षेत्रातील आहे तर निश्चितच ती अनित्य आहे आणि ध्यानपूर्वक बघाल तर स्पष्टपणे माहिती होईल की ती अनित्य आहे. तर योग्य मार्गाने पुढे जात राहील. अन्यथा आरोपण करू लागेल, जे अनित्य आहे त्यावर नित्याचे आरोपण करू लागला. जे दुःख आहे त्यावर सुखाचे आरोपण करू लागला. जे मी नाही, माझे नाही त्यावर मी-माझे अशा कोणत्या दार्शनिक मान्यतेचे आरोपण करू लागला तर सर्व मार्गच बंद होईल. बस गाडी थांबली, पुढे जाऊ शकणार नाही._

_असे खूप जणांविष जणांविषयी बघितले. येतात पळत पळत, आम्ही आम्ही आत्म्याचे दर्शन केले, आम्ही आत्म्याने आत्म्याला बघितले. आश्चर्य आहे तुम्ही आत्म्याने आल्यास बघितले, काय बघितले? बस, हेच की अशी कोणती तरी अवस्था आली आणि आम्ही आल्याने आत्म्याला बघितले, आम्ही परमात्म्याला बघितले, आम्ही हे बघितले, आम्ही ते बघितले अरे, अनित्य आहे बाबा! *जे अनित्य आहे त्याला अनित्यच समजा आणि मग बघा कसे पुढे जात राहाल. ही जी तिसरी अवस्था आहे, खूप शांतीची अवस्था आहे, तिला कधी अंतिम अवस्था मानू नका, ती सुद्धा अनित्य आहे. हेच समजत, हेच अनुभव करीत पुढे जाल तर वेगाने पुढे जात राहाल.*_

_*स वे सम्मद्दस्सो भिक्खु,* अशा प्रकारचा कोणी भिक्षु, साधना करणारा, याप्रकारे सम्यक दर्शन करीत आहे- सत्याला यथाभूत बघणे हेच सम्यक दर्शन आहे. जे जसे आहे, तसे आहे. त्याचा स्वभाव अनित्य आहे तर अनित्य आहे. ही ही दुःखद आहे तर खूप पीडादायक आहे, ही सुखद आहे तर ही सुद्धा दुःखच आहे, अशा प्रकारे सम्यक रूपाने पहातो, तेव्हा *परिजानाति वेदना.* वेळोवेळी ऐकला आहे परिजानाति शब्द तर वेदनांची सर्व परिधी बघितली, त्यांची जी सीमा आहे, जेथे जेथे वेदना आहेत, ते सर्व क्षैत्र बघितले. मग त्या सुखद आहेत, दुःखद आहेत अथवा असुखद अदुःखद, शांत आहेत, सर्व बघितले. त्याने सर्व बघितले किंवा बघितले नाही, नाही, त्याने परिपूर्ण रूपाने या क्षेत्राला जाणले किंवा नाही, याचे प्रमाण काय? एकच प्रमाण की त्याने पलीकडील अवस्था पाहिली की नाही? पाहिली तर माहित झाले की वेदनांचा खेळ इथं पर्यंतच होता, त्यापुढे नाही. तेव्हा त्याला परिजानाति म्हणावे. तेव्हा अशा अर्थाने म्हणतात की परिजानाति वेदना, वेदनांच्या संपूर्ण क्षेत्राला बघितले, काही बाकी राहिले नाही, कुठलाही काना-कोपरा शिल्लक राहिला नाही, सर्वांच्या पलीकडे गेला._

_*सो वेदना परिय,* अशी व्यक्ती वेदनांना जाणून, त्यांच्या सगळ्या क्षेत्राला जाणून, *दिद्वे धम्मे अनासवो,* आता त्याने पाहिले, त्याचा साक्षात्कार केला. कशाचा? त्या अवस्थेचा जी कोणाला अनाश्रव बनविते. सगळे आश्रव समाप्त झाले. जोपर्यंत आश्रव आहेत, जोपर्यंत मनात मळ आहे, तोपर्यंत अरहंत अवस्था प्राप्त झाली नाही, नितांत मुक्त अवस्था प्राप्त झाली नाही. तो वेदनेचे क्षेत्र पाहून, त्याच्या पलीकडे जाऊन या अवस्थेला पोहोचला की जेथे त्याने अनाश्रव अवस्थेचा साक्षात्कार केला._

_अशी व्यक्ती, कायस्स भेदा, तिच्या शरीराचे भेदन होते म्हणजे जेव्हा तिचा मृत्यू होतो तेव्हा *धम्मट्ठो,* ती व्यक्ती धर्मिष्ठ झाली. बौद्ध धर्मामध्ये पक्क झाली असे नाही, हिंदू धर्मामध्ये पक्व झाली असे नाही, जैन धर्मामध्ये पक्व झाली असे नाही, बिल्कुल नाही, मूर्ख लोकांच्या गोष्टी आहेत ह्या. यात अडकून पडाल तर धर्म मिळणार नाही. हिंदुधर्म मिळेल कारण की हिंदुत्वाचे प्रभुत्व आहे तेथे, बौद्ध धर्म मिळेल कारण की बुद्धाच्या वचनांचे प्रभुत्व आहे तेथे-केवळ गोष्टी, अनुभव काही नाही; जैन धर्म मिळेल कारण जैन लोकांचे प्रभुत्व आहे तेथे. काही मिळणार नाही. *धर्म म्हणजे जे सत्य आहे, प्रकृतीचे जे नियम आहेत, त्यांना जाणले तर धर्मिष्ठ झाला, जीवनात धर्म उतरू लागला. अशा व्यक्तीच्या शरीराचे भेदन झाल्यावर म्हणजे मृत्यू झाल्यावर काय होते? सगळ्या वेदनेच्या क्षेत्राला जाणले तो वेदगू झाला. वेदनांच्या साऱ्या क्षेत्राला जाणणारी व्यक्ती सङ्ख्यं नोपेति वेदगू झाली. काय सङ्ख्यं ? म्हणजे या इंद्रिय जगताचा सारा खेळ, लोकिय जगताचा सारा खेळ, निरय लोकापासून अरूप ब्रम्ह लोकापर्यंतचे सारे क्षेत्र सङ्ख्यं आहे.* मोजले जाऊ शकते. किती मोठे आहे, काय आहे, याचे वर्णन केले जाऊ शकते. परंतु तो तर वर्णनातीत अवस्थेत पोहोचला. त्या अवस्थेत पोहोचला जिचे वर्णन होऊ शकत नाही, निर्वाणिक अवस्थेत गेला. असा अर्हत मृत्यूनंतर त्या अवस्थेत पोहोचला जी वर्णनातीत आहे. आता त्या वर्णनातीत अवस्थेतून परत पुन्हा या वर्णन होऊ शकणाऱ्या अवस्थेमध्ये तो येत नाही. ती जी अनंताची अवस्था आहे तिचा होऊन परत पुन्हा या अवस्थेत येत नाही, जिला मोजले जाऊ शकते. म्हणजे नेहमीकरता मुक्त झाला आणि साधकाचे सगळे लक्ष्य हेच आहे की या भवचक्रातून बाहेर कसे पडावे. या संवेदनांचे परिज्ञान यासाठी करीत आहोत की मग तो रूप ब्रह्मलोक असो, अरूप ब्रह्मलोक असो, तेथेसुद्धा हे उत्पाद-व्यय, उत्पाद-व्ययचेच क्षेत्र चालू आहे, तेथेसुद्धा या पलीकडची अवस्था आली नाही. या सर्वांना पार करून जाईल तेव्हा बघेल की आता हा उत्पाद-व्यय समाप्त झाला, आता वेदनेचे हे सारे क्षेत्र समाप्त झाले, आता हे इंद्रियांचे क्षेत्र समाप्त झाले, तेथे पोहोचायचे आहे. त्यासाठी या छोट्याशा सूत्रामध्ये सारा मार्ग सांगितला आहे, सगळा विधी सांगितला आहे.

*_भवतु सब्ब मङ्गलं !_*

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

*_लेखक :- श्री सत्यनारायण गोयंका गुरुजी_*

_बुद्धवर्ष २५६४, ज्येष्ठ पौर्णिमा (ऑनलाईन), ५ जून, २०२०, वर्ष ४, अंक ४_

*_संकलन :- महेश कांबळे_*

*_दिनांक :-_* २७/०३/२०२५

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

Sunday, 23 March 2025

निर्वाण काय आहे?

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

*_निर्वाण काय आहे?_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2025/03/blog-post_59.html

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

भगवानांनी याविषयी सांगितले-

_जेथे (निर्वाणिक स्थितीत) पृथ्वी, जल, अग्नी आणि वायू थांबत नाहीत (ही अवस्था या महाभूतांच्या पलीकडील आहे) तेथे शुक्र ग्रहाचा प्रकाश नसतो आणि सूर्याचाही प्रकाश नसतो, तेथे चंद्रही उगवत नाही; पण तेथे अंधकारही नसतो. जेव्हा कोणी क्षीणास्त्रव भिक्षु या स्थितीचा स्वतः साक्षात्कार करतो तेव्हा तो रूप ब्रह्मलोक किंवा अरूप ब्रह्मलोकापासून (म्हणजे लौकिक क्षेत्राचा सर्वोच्च लोक) मुक्त होतो. म्हणजे त्यांचे अतिक्रमण करतो, त्याची सर्व सुख-दुःखापासून मुक्ती होते, म्हणजे त्याचे भवसंसरण समाप्त होते. जोपर्यंत भवसंसरण चालू राहते तोपर्यंत केव्हा सुख, केव्हा दुःख येतच राहते; पण त्या लोकोत्तर अवस्थेत लौकिक सुख नाही व लौकिक दुःखही नाही._

_एका शैक्ष्य भिक्षुने भगवानांना विचारले की काय खरोखर अशी अवस्था आहे की जेथे जन्म नाही व मृत्यही नाही? तेव्हा भगवानांनी सांगितले -_

*_अत्थि, भिक्खवे, अजातं अभूतं अकतं असङ्खतं,..._* *_(- उदान ७३)_*

_- भिक्षूनो, आहे! अवश्य आहे! जी अजात, अभूत, अकृत, असंस्कृत आहे. भिक्षूंनो, जर अजात, अभूत, अकृत आणि असंस्कृत नसते तर जे जात आहे, भूत आहे, कृत आहे, संस्कृत आहे त्याचे कधी अतिक्रमण करु शकलो नसतो, (विपश्यनेद्वारा) त्यापासून निस्सरण झाले नसते. हे भिक्षूनों, कारण ते अजात, अभूत, अकृत आणि असंस्कृत आहे. म्हणून जे जात आहे, भूत आहे, कृत आहे, संस्कृत आहे त्याचे अतिक्रमण केले जाऊ शकते. त्यापासून निस्सरण होऊ शकते. *त्या निस्सरण अवस्थेला स्वानुभूतीद्वारे जाणता येते. म्हणजे अनित्याच्या पलीकडील नित्यापर्यंत, मृत्यूच्या पलीकडील अमृत अवस्थेपर्यंत पोहोचणेच अंतिम लक्ष्य आहे.*_

*_कसे पोहोचणार?_*

*_अमृत निर्वाणापर्यंत पोहोचण्यासाठी भगवानांनी शील, समाधी, प्रज्ञेच्या आठ अंगाच्या आर्य मार्गावर चालण्याचा उपदेश दिला आहे._*

*_अमृताचा दरवाजा उघडला_*

_सम्यकसंबोधी बरोवर जे अमरत्व प्राप्त झाले ते वाटण्याचा निर्णय करीत असतांना भगवान बुद्धांनी ही घोषणा केली-_

*_अपारुता तेसं अमतस्स द्वारा।_* *_(- दीघनिकाय २.७१)_*

*_जो आपल्या अंधविश्वासाचा त्याग करुन श्रद्धापूर्वक ऐकण्यासाठी तयार आहे, त्याच्यासाठी अमृताचा दरवाजा उघडला._*

_ऐकेल तरच समजेल. समजले तरच अमृताकडे नेणाऱ्या मार्गावर चालेल. स्वतः मार्गावर चालेल तरच अमृताचा साक्षात्कार करु शकेल._

*_अमृत काय आहे?_*

_अमृत एक स्थिती आहे. जी *(निब्बान)* निर्वाण आहे, जी *(अक्खय)* अक्षय आहे, जी *(अक्खर)* अक्षर आहे, *(सिव)* शिव आहे, *(अच्युत)* अच्यूत आहे, अजर आहे, अचल आहे, *(धुव)* ध्रुव आहे, *(सस्सत)* शाश्वत आहे, *(अनुप्पाद)* अनुत्पाद आहे, *(अजाति)* अजन्मा आहे, *(अनिमित्त)* निरालंब आहे, *(अगति)* भव-संसरणाच्या गतीपासून मुक्त आहे, *(सन्तिपद्)* शांतीपद आहे, परमसुख आहे, विरज आहे, विमल आहे, अमल आहे, अविपरिणाम धर्मा आहे. निर्वाणासाठी न जाणो असे आणखी किती पर्यायी शब्द बुद्ध वाणीत वापरलेले आहेत, जे या अपरिवर्तनीय, कूटस्थ अवस्थेचे द्योतक आहेत._

ही अवस्था समजावत असतांना भगवानांनी सांगितले 

_*रागक्खयो दोसक्खयो मोहक्खयो इदं वुच्चति अमतं... निब्बानं ॥*_ *_(- संयुत्तनिकाय २.४.३१५)_*

_जी रागक्षय, द्वेषक्षय आणि मोहक्षय अवस्था आहे तिला अमृत म्हणतात, निर्वाण म्हणतात._

*_छन्दरागविनोदनं निब्बानपदमच्युतं ।_* *_(- सुत्तनिपात १०९२)_*

_- आसक्तीच्या तृष्णेतून मुक्त होणे हे अच्युत निर्वाणपद आहे._

*_निक्खन्त वानतो'ति निब्बानं।_* *_(-मज्झिमनिकाय अट्ठकथा १.२८१)_*

_- तृष्णेतून बाहेर निघून जाणे निर्वाण आहे._

*_निब्बानं परमं वदन्ति बुद्धा ।_* *_(- दीघनिकाय २.९०)_*

_बुद्धांनी निर्वाणाला श्रेष्ठ (अवस्था) म्हटले आहे._

_बुद्ध वाणीत अनेकदा निर्वाणाच्या श्रेष्ठपणाचे वर्णन आहे. जसे-_

*_यो च वस्ससतं जीवे, अपस्सं अमतं पदं।_* 

*_एकाहं जीवितं सेय्यो, पस्सतो अमतं पदं।_*

*_धम्मपद ११४_*

_अमृत पदाला (निर्वाणाला) न पाहणाऱ्याच्या शंभर वर्षाच्या जीवनापेक्षा अमृतपद पाहाणाऱ्याचे एक दिवसाचे जीवन श्रेयस्कर असते._

_याच नित्य, ध्रुव, शाश्वत अमृतपदाच्या प्राप्तीसाठी भगवानांनी जीवन'भर उपदेश दिले. केवळ त्यांनी उपदेशच दिले नाहीत; उपदेश देणारे तर आपल्या देशात अनेक झालेत पण या महापुरुषाने त्या उपदेशांचा सक्रिय अभ्यास करायला शिकविले. त्यासाठी उपयुक्त विधी सांगितली. हे अमृतपद कोणाच्या कृपेने, अनुकंपेने, आशीर्वादाने, वरदानाने प्राप्त होत नाही. उलट असे सांगितले की मुमुक्षुला स्वतः अप्रमादी राहून परिश्रम, पराक्रम, पुरुषार्थ करावा लागतो. त्यांनी हेच करणे शिकविले आणि म्हटले-_

_*तुम्हेहि किच्चमातप्पं, अक्खातारो तथागता।*_*_धम्मपद २७६_*

_- तप तर तुम्हालाच करावे लागेल, तथागत तर केवळ (मार्ग) आख्यात करतात._

_तेव्हा म्हणाले- *अप्पमादो अमतं पदं ।*_ *_(धम्मपद २१)_*

_प्रमाद न करणे अमृत (निर्वाण) पद आहे. म्हणजे प्रमादरहित होऊन आणि सतत सजग राहूनच अमृतपद प्राप्त करु शकतो. त्यासाठी त्यांनी मार्ग प्रशस्त केला. जसे वसंत ऋतूत वृक्ष-वेली फळाफुलांनी बहरून येतात-_

*_तथूपमे धम्मवरं अदेसयि, निब्बानगामि परमं हिताय। - खुद्दकपाठ ६.१३_*

_- त्याच प्रकारे (फळ देणारा) उत्तम धर्म शिकविला; जो परम हितकारी आहे, निर्वाणाकडे घेऊन जाणारा आहे._

*_सो धम्मं देसेति आदिकल्याण मज्झेकल्याण परियोसानकल्याण ..। - दीघनिकाय १.१९०_*

_असा धर्म शिकविला जो सुरुवातीला कल्याणकारी आहे. मध्ये कल्याणकारी आहे आणि शेवटीही कल्याणकारी आहे._

*_आदिम्हि सीलं दस्सेय, मज्झे मग्गं विभावये। परियोसानम्हि निब्बानं...। -दीघनिकाय अट्ठकथा १.१९०_*

_- सुरुवातीला शील धारण कसे करावे ते शिकविले. मध्ये मार्गावर कसे चालावे ते शिकविले आणि शेवटी निर्वाणापर्यंत कसे पोहोचावे हे शिकविले._

_भगवानांनी जे-जे शिकविले ते सर्व कल्याणकारीच आहेत. सर्वांचे एकच उद्दिष्ट हेच आहे की साधक विपरिणामधर्मी अनित्यच्या बंधनातून मुक्त होऊन नित्य, शाश्वत, ध्रुव, अपरिणामी सत्याचा स्वतः साक्षात्कार करो._

_*विमुत्तिसारा सब्बे धम्मा* भगवानांनी शिकविलेले सर्व धर्म विमुक्तीसाठीच आहेत आणि ते सर्व सार रूपात आहेत._

_*अमतोगधा सब्बे धम्मा-* सर्व धर्म अमृतात डुबकी मारण्यासाठी आहे._

_*निब्बानपरियोसाना सब्बे धम्मा* सर्व धर्म शेवटी निर्वाणासाठी आहेत._ *अङ्गुत्तरनिकाय ३.१०.५८*

_मार्गाचे शेवटचे पोहोचण्याचे ठिकाण निर्वाण आहे._

*_ते यन्ति अच्युतं ठानं, यत्थ गन्त्वा न सोचरे। - धम्मपद २२५_*

_ते त्या पतन-रहित अच्युत (शाश्वत) स्थानाला (निर्वाण) प्राप्त करतात तेथे पोहोचल्यावर शोक असत नाही._

_मार्गाचे अंतिम लक्ष्य म्हणजे हीच अवस्था आहे की ती-_

*_अजरं अमरं खेमं, परियेसिस्सामि निब्बुतिं । - बुद्धवंस अट्ठकथा ७, सुमेधपत्थनाकथावण्णना_*

_अजर आहे, अमर आहे, क्षेमपूर्ण आहे, निर्वाणापर्यंत घेऊन जाणारी आहे. जिच्या शोधात आहे ती हीच अवस्था आहे. तिचा साक्षात्कार झाल्यावर-_

*_न च ते पुनमुपेन्ति गब्भसेय्यं, परिनिब्बानगता हि सीतिभूता। - विमानवत्यु ९०९_*

_ते सीतलीभूत परिनिर्वाण प्राप्त झाल्यानंतर *"पुनरपि जननी जठरे शयनम् "* च्या भयंकर दुःखात पडत नाही._

*_त्यासाठी भगवानांनी कोणाची प्रार्थना करणे शिकविले नाही तर आर्य अष्टांगिक मार्गावर चालायला शिकविले._*

*_अट्ठङ्गिको च मग्गानं, खेमं अमतगामिनन्ति। -मज्झिमनिकाय २.२१५-१६_*

_अष्टांगिक मार्ग क्षेमपूर्ण अमृत अवस्थेपर्यंत घेऊन जातो._

_हाच *अमतोगंध मग्ग-* अमृतात डुबकी लावणारा मार्ग आहे._

_हाच *निब्बानगामिनी पटिपदा* निर्वाणाकडे नेणारा मार्ग आहे._

_म्हणून सतिपट्टानची विपश्यना साधना शिकवित असतांना सांगितले की ही विद्या-_

_*सत्तानं विसुद्धिया-* लोकांच्या विशुद्धीसाठी, विमुक्तीसाठी आहे._

_*सोकपरिदेवानं समतिक्क‌माय* दुःख आणि संताप यांचे चांगल्याप्रकारे अतिक्रमण करण्यासाठी आहे._

_*दुक्खदोमस्सानं अत्थङ्गमाय-* दुःख आणि दुर्भावना मावळण्यासाठी आहे._

_*आयस्य अधिगमाय-* श्रेष्ठ ज्ञानाच्या प्राप्तीसाठी आहे._

_*निब्बानस्स सच्छिकिरियाय* निर्वाणाचा साक्षात्कार करण्यासाठी आहे._ *दीघनिकाय, २.४०५*

परंतु त्यासाठी खूप परिश्रम घ्यावे लागतात.

*_ते झायिनो साततिका, निच्चं दळ्हपरक्कमा ।_*

_- ते जे सतत ध्यान करणारे आहेत. नित्य दृढ पराक्रम करणारे आहेत._

*_फुसन्ति धीरा निब्बानं, योगक्खेमं अनुत्तरं। -धम्मपद २३_*

_- ते धीरोदात्त पुरुष उत्कृष्ट योगक्षेम असलेले निर्वाण प्राप्त करतात._

_*बुद्धांचा उपदेश कोणत्या वाद-विवादी दार्शनिक मान्यतेच्या तर्क-वितर्कासाठी नाही.* कोणाला नीच लेखून स्वतःला उच्च दाखवण्यासाठी नाही. ती पूर्णपणे भव विमुक्त झालेल्या महाकारुणिकाची स्वानुभूतीजन्य अमृतवाणी आहे. त्या करुणानिधीची हीच करूण इच्छा होती की भव-संसरणाने होरपळलेला मानव ही लोकहितकारिणी विद्या शिकून आणि त्यात परिपक्व होऊन नित्य शाश्वत, ध्रुव, अमर, अचल, अटल निर्वाणाचा साक्षात्कार करून "पुनरपि जननम् पुनरपि मरणम्, पुनरपि जननी जठरे शयनम्" च्या दुःखद संसार-संसरणातून मुक्त होवो. जो त्यांनी सांगितलेल्या मार्गावर चालतो *तो न हि जातुगब्भसेय्यं पुनरेति* पुन्हा-पुन्हा गर्भात पडण्याच्या दुःखातून पूर्णपणे मुक्त होतो. *- खुद्दकपाठ ९.१०*

_बुद्धांनी उपदेश केलेल्या या सक्रिय व्यावहारिक विद्येचा लाभ घेऊन त्यांच्या जीवनकाळातच अनेक लोक भव-मुक्त झाले. त्या हजारोंपैकी काहींचे उद्गार पाहा-_

*_अज्झगा अमतं सन्ति, निब्बानं पदमच्युतं ।_"

_मला अमृताची शांती आणि निर्वाणाच्या अच्युतपदाची प्राप्ती झाली._

*_धम्मोसधं पिवित्वान, विसं सब्बे समूहनिं।_*

_धर्माचे औषध सेवन करुन सर्व (सांसारिक) विषाला दूर केले._

*_अजरामर सीतिभावं, निब्बानं फस्सयिं अहं।_* *_- अपदान १.२०६, ४९५, १२_*

_- त्या अजर, अमर शीतल निर्वाणाला मी प्राप्त केले._

*_येन ञाणेन पत्तोसि, अच्चुतं अमतं पदं।_* *_- विमानवत्थु ८६०_*

_- त्या ज्ञानाने मी अच्युतपद प्राप्त केले._

_*पत्ता ते अचलट्ठानं* मला अचल स्थान (निर्वाण) प्राप्त झाले._

 *_कतन्तं पच्चवेक्खन्ता, इममत्थमभासिसुं।_* *_थेरगाथा निदानगाथा_*

_- त्याचा साक्षात्कार करीत असतांना हे सत्य प्रकट केले जात आहे. जो कोणी या मुक्तीमार्गावर चालतो तो -_

*_संयोजनानि पहाय सच्छिकरिस्सति । -अङ्गुत्तरनिकाय २.६.६८_*

_संयोजनांचे बंधन नष्ट करुन (निर्वाण) चा साक्षात्कार करुन घेतो._

_मुक्तीच्या या मार्गावर जे भूतकाळात चालले, जे आज चालत आहेत आणि जे भविष्यात चालतील त्यांना अशीच प्राप्ती झाली आणि होईल. कारण -_

_*निब्बानभावं न जहतीति* निर्वाण आपला निर्वाणभाव सोडत नाही._

काय आहे निर्वाणाचा सहज निर्वाणभाव?

*_निब्बानं निच्चं धुवं सस्सतं अविपरिणामधम्मन्ति । - कथावत्थु २८६_*

_निर्वाण नित्य आहे, ध्रुव आहे, शाश्वत आहे, अविपरिणाम धर्मा आहे._

_भगवान बुद्धांच्या वाणीत निर्वाणाची चर्चा भरपूर आहे. निर्वाणापर्यंत पोहोचण्याच्या मार्गाचा आणि निर्वाणापर्यंत पोहोचलेल्या मुमुक्षेच्या अनुभूतीची चर्चासुद्धा भरपूर आहे. आजसुद्धा या विद्येचे लाभ स्पष्ट आहेत. जो जेवढा जेवढा पुरुषार्थ करतो तेवढा-तेवढा तो अंतिम उद्दिष्टाच्या म्हणजे निर्वाणाच्या जवळ पोहोचतो._

_*दुर्भाग्याने भगवानांच्या मूळ वाणीचे विपुल साहित्य आणि त्यांच्या कल्याणाचा मार्ग दाखविणारी विपश्यना विद्या दोन्हीही या देशातून पूर्णपणे विलुप्त झाले.* नाही तर विवेकानंदजीसारख्या उच्च कोटीच्या आणि बुद्धिमान संताला जर हे उपलब्ध झाले असते तर ते काय म्हणू शकले असते की चार्वाकवादीप्रमाणे बुद्धांच्या उपदेशातसुद्धा अपरिवर्तनशील काहीही नाही. नित्य, शाश्वत, ध्रुव काहीही नाही? किंवा दाक्षिणात्य बौद्धाजवळ अपरिवर्तनशील काहीही नाही? उलट त्या देशात प्रत्येक बुद्धानुयायी अपरिवर्तनशील निर्वाणाला जीवनाचे अंतिम उद्दिष्ट समजतो. (आत्मकथन भाग दोन मधून साभार)_

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

*_लेखक :- श्री सत्यनारायण गोयंका गुरुजी_*

_बुद्धवर्ष २५६३, भाद्रपद पौर्णिमा, १४ सप्टेंबर, २०१९, वर्ष ३, अंक ६_

*_संकलन :- महेश कांबळे_*

*_दिनांक :-_* २४/०३/२०२५

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

आनापानसति सुत्त

*_आनापानसति सुत्त प्रवचन_*

(धम्मगिरी, जानेवारी १४, १९९१-स. ना. गोयन्का) 

पालि-हिन्दी- मज्झिमनिकाये, ततियो वग्गो


।। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासम्बुद्धस्स।।


आनापानस्सतिसुत्तं - आनापानच्या साधनेशी संबंधित सुत्त


_*पुब्बारामे भिक्खुनं धम्मदेसना-* पूर्वाराम मध्ये भिक्षूना धर्मदेशना *पुब्बाराम -* पूर्वाराम. श्रावस्तीच्या पूर्वेकडे एक ध्यान केंद्र बनविले, भगवान राजगिरीमध्ये राहात असतांना *श्रावस्ती नगरातील अनाथपिण्डिक नावाचा एक श्रीमंत माणूस भगवानांच्या संपर्कात आला. त्याने स्रोतापन्न अवस्था प्राप्त केली. जेव्हा माणूस धर्मरस चाखतो तेव्हा त्याला राहवत नाही. त्याला वाटते की जास्तीत जास्त लोकांना असा धर्मरस मिळावा. जसा निर्वाणाच्या परमसुखाचा रस मी चाखला, असा रस अनेकांना चाखायला मिळो.* त्यासाठी श्रावस्तीमध्ये एक ध्यान केंद्र बनले पाहिजे. म्हणून भगवानांना आग्रह करुन अनुमती घेतो. तो जमिनीवर मोहरा पसरवून जागा विकत घेतो व जेतवनामध्ये एक ध्यान केंद्र बनवितो. भगवान तेथे जातात. वर्षावास करतात. ही ती वेळ होती जेव्हा श्रावस्ती भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले नगर होते. अनेक पारमी संपन्न लोक त्यावेळी तेथे जन्मले, त्या नगरात राहिले आणि भगवानांच्या संपर्कात आले. अनेकांचे कल्याण झाले._

_तेथेच राहणारी माता विशाखा एक अत्यंत श्रीमंत महिला होती. ती खूप पूर्वी भगवानांच्या संपर्कात आली होती. आता तिकडे तिचा विवाह झाला. श्रावस्तीमध्ये राहत असे तेव्हा वारंवार 'भगवानांच्या ह्या आश्रमात येत असे. साधना करीत असे. धर्म श्रवण करीत असे, लोकांची सेवा करीत असे. साधकांची भिक्ष-भिक्षुणींची सेवा करीत असे. दानही खूप देत असे._

_अनाथपिण्डिकने बनविलेला हा विहार खूप भव्य होता. त्यात दहा हजार लोक राहात होते व साधना करीत होते. तरीही लोकांची संख्या वाढतच होती. म्हणून तिच्या मनात वारंवार येत होते की मी सुद्धा असे एक मोठे दान करीन की ज्या ठिकाणी बसून लोक विपश्यना करु शकतील, मुक्तीचा रस्ता प्राप्त करु शकतील. हे विचार तिच्या मनात वारंवार येत होते._

_एकदा अशी एक वेळ आली की जेव्हा ती भगवानांच्या दर्शनासाठी आली तेव्हा एक खूप मौल्यवान ओढणी पांघरुन आली, जिची किंमत खूप जास्त होती. ती सोन्याच्या तारांनी बनविलेली होती आणि तिला मौल्यवान हिरे-रत्न लावलेली होती. त्या ओढणी बरोबर एक रत्नजडीत मुकुट डोक्यावर होता. ती दुसऱ्या कोणत्यातरी कामासाठी बाहेर गेली होती. येतांना भगवानांच्या आश्रमात ती मौल्यवान ओढणी पांघरुन तशीच आली. नंतर तिच्या लक्षात आले की हे मी काय केले? म्हणून ती ओढणी काढून एकीकडे ठेवून दिली. भगवानांचे प्रवचन ऐकून बाहेर निघून गेली. नंतर आठवण झाली की ओढणी तेथेच राहिली. तेथे जाऊन पाहिले की कोणीतरी तेथून उचलून बाजूला ठेवली आहे. *ती आनंदित झाली की कोणीतरी उचलून बाजूला ठेवली. कोणीतरी उचलली म्हणून आता माझी नाही, त्याची झाली. मला दान द्यायचेच होते. ह्या ओढणीला विकून जेवढे पैसे येतील त्यातून एक विहार बनविन.*_

_*ती ओढणी इतकी मौल्यवान होती की दुसरा कोणी तिला खरेदी तर करणार नाही. म्हणून स्वतःच काही करोड रुपयाची किंमत ठरवून तितक्या करोड रुपयात ती ओढणी स्वतः विकत घेतली आणि त्यातून एक विहार बनविला, जेथे पाच हजार लोक बसून ध्यान करु शकतील आणि राहू शकतील. त्याचे नाव पुब्बाराम पूर्वाराम. ह्या पूर्वाराममध्ये 'भगवानांनी दिलेला हा महत्वाचा उपदेश.*_


_*"एवं में सुतं। एकं समयं भगवा सावत्थिये विहरति पुब्बारामे मिगारमातुपासादे ॥"* विशाखाला लोक मिगारमाता म्हणत असत. *मिगारमातुपासादे सम्बहुलेहि अभिञ्ञातेहि अभिञ्ञातेहि थेरेहि सावकेहि सद्धिं।"* एकदा भगवान श्रावस्तीमध्ये मिगारमातेने बनविलेल्या पुब्बाराम विहारात राहात होते. त्या वेळी अनेक प्रसिद्ध-प्रसिद्ध भिक्षु स्थविर त्यांच्यासोबत होते. जसे *"आयस्मता च सारिपुत्तेन आयस्मता च महामोग्गल्लानेन आयस्मता च महाकस्सपेन आयस्मता च महाकच्चायनेन आयस्मता च महाकोहितेन आयस्मता च महाकप्पिनेन आयस्मता च महाचुन्देन आयस्मता च अनिरुद्धेन आयस्मता च रेवतेन आयस्मता च आनन्देन अञ्ञेहि च अभिञ्ञातेहि अभिञ्ञातेहि थेरेहि सावकेहि सद्धिं।"*अशा प्रकारचे प्रसिद्ध-प्रसिद्ध भिक्षु त्यांच्यासोबत होते, जसे सारिपुत्त, महामोग्गल्लायन, महाकश्यप, महाकात्यायन, महाकोद्वित, महाकप्पिन, महाचुन्द, अनिरुद्ध, रेवत, आनंद आणि अशा प्रकारचे आणखीसुद्धा प्रसिद्ध स्थविर भिक्षू होते._

_*"तेन खो पन समयेन थेरा भिक्खु नवे भिक्खु ओवदन्ति अनुसासन्ति."* त्या वेळी जे जुने-जुने स्थविर होते, म्हातारे स्थविर भिक्षु होते ते नव्या भिक्षूना उपदेश देत होते. अनुशासित करीत होते म्हणजे विपश्यना शिकवित होते._

_*"अप्पेकच्चे थेरा भिक्खू दसपि भिक्खू ओवदन्ति अनुसासन्ति, अप्पेकच्चे थेरा भिक्खू वीसम्पि भिक्खू ओवदन्ति अनुसासन्ति, अप्पेकच्चे थेरा भिक्खू तिसम्पि भिक्खू ओवदन्ति अनुसासन्ति, अप्पेकच्चे थेरा भिक्खू चत्तारिसम्पि भिक्खू ओवदन्ति अनुसासन्ति। ते च नव भिक्खू थेरेहि भिक्खुहि ओवदियमाना अनुसासियमाना उळारं पुब्बेनापरं विसेस जानन्ति।"* त्या वेळी काही ज्येष्ठ भिक्षु दहा नव्या भिक्षुना सोबत घेऊन त्यांना ध्यान शिकवित होते, धर्म शिकवित होते. काही ज्येष्ठ भिक्षु वीस भिक्षूना, तीस भिक्षूना, काही चाळीस भिक्षूना ध्यान शिकवित होते. अशा प्रकारे जेवढे ज्येष्ठ भिक्ष होते ते सगळे ध्यान शिकविण्याचे काम करीत होते. त्यामुळे नव्या भिक्षूंना लाभ होत होता, ते धर्म शिकत होते._

_*"तेन खो पन समयेन भगवा तदहुपोसथे पण्णरसे पवारणाय पुण्णाय पुण्यमाय रत्तिया भिक्खुसङ्घपरिवृत्तो अब्भोकासे निसिन्नो होति।"* त्या वेळी भगवान खुल्या आकाशाखाली म्हणजे मोकळ्यावर पौर्णिमेच्या रात्री बसले होते. त्यांना भिक्षूनी घेरलेले होते._

_*"अथ खो भगवा तुण्हीभूतं तुण्हीभूतं भिक्खुसङ्घ अनुविलोकेत्वा, भिक्खू आमन्तेसि।"* त्या वेळी गुप-चूप बसलेल्या भिक्षूंना भगवानांनी बोलवून आमंत्रित केले म्हणजे उपदेश ऐकण्यास सांगितले._

_*"आरद्वोस्मि, भिक्खवे, इमाय पटिपदाय आरद्वचित्तोस्मि, भिक्खवे, इमाय पटिपदाय।"* ही बुद्धाची विशेषतः आहे. उपदेश देणारे खूप असतात, खूप झाले. भारत धर्माच्या उपदेशात अग्रणी राहिला. ही व्यक्ती जो उपदेश देते म्हणते मी असे केले आहे. मी असा अभ्यास स्वतः केला आहे- म्हणून सांगतो की असा अभ्यास तुम्हीही करा. मी स्वतः ह्या रस्त्यावर चाललो आहे म्हणून तुम्हाला सांगतो की तुम्हीसुद्धा ह्या रस्त्यावरुन चाला. कारण असा अभ्यास करुन, अशा रस्त्यावरुन चालून मी आपले कल्याण साधले आहे. म्हणजे आपल्या अनुभवाने जे प्राप्त झाले तेच लोकांना शिकवले. ही खूप श्रेष्ठ विशेषतः आहे. *बुद्धांची नाहीतर केवळ धर्माच्या सिद्धातांचे प्रवचन देणे, लोकांना समजविणे ही वेगळी गोष्ट आहे, सामान्य माणूस सुद्धा करु शकतो. बुद्धांसारखी व्यक्ती असे करणार नाही. जे काही स्वतःच्या अनुभूतीवर उतरविले तेच सांगितले म्हणून आरंभच असा करतात.*_

_*"आरद्धाोस्मि, भिक्खवे, इमाय पटिपदाय"* ह्या प्रतिपदेवर मी स्वतः आरुढ झालो आहे. ह्या प्रतिपदेवर मी चाललो किंवा ह्या रस्त्यावर ह्या मज्झिमा पटिपदेवर. *आरद्ध चित्तस्मि, भिक्खवे, इमाय पटिपदाय.* मी आपले चित्त यावर आरुढ केले आहे, ह्या रस्त्यावर मी आपले चित्त लावले आहे._


आणि नंतर म्हणतात-


काय आहे बुद्धांची शिकवण - भाग ५

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

*_काय आहे बुद्धांची शिकवण_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2025/03/blog-post_23.html

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

*_लोकधातू आणि धर्मधातू_*

_बुद्धांच्या उपदेशात आम्ही लोकधातू आणि धर्मधातूमध्ये फरक मानतो. *धातूचा अर्थ आहे स्वभाव तत्व किंवा स्वभाव शक्ती. म्हणून लोकधातूचा अर्थ झाला 'भौतिक जगात व्याप्त प्राकृतिक तत्व किंवा प्राकृतिक शक्ती. आणि धर्मधातूचा अर्थ झाला चित्त, चित्तवृती आणि प्रकृतीची सूक्ष्म मौलिक तत्व, जी भौतिक जगाऐवजी मानसिक जगाशी संबंधित आहेत.* आधुनिक विज्ञान लोकधातुपर्यंतच मर्यादित आहे. लोकधातू मनोजगताच्या धर्मधातूचा आधारस्तंभ आहे. बस, लोकधातूच्या वर एक पाऊल चढलो की मनोजगात पोहोचलो. परंतु आधुनिक विज्ञानाच्या ज्ञानाने नाही, तर धर्माच्या व्यावहारिक ज्ञानाद्वारेच असे होऊ शकते._

_*"परिपक्व चित्त" नावाच्या पुस्तकाचे लेखक श्री. एच. ए. ओवरस्ट्रीट (प्रकाशक डब्लू. डब्लू. नोर्टन एंड कं. इंक... न्यूयार्क) परिपक्व चित्त असणाऱ्या मानवाच्या उज्वल भविष्याप्रती खूप आस्थावान दिसतात.* ते म्हणतात-_

_"आमच्या शताब्दीचे विशिष्ट ज्ञान मनोवैज्ञानिक आहे. भौतिक आणि रसायन शास्त्रात आम्ही जी काही प्रगती केली ती मुख्यतः संशोधनाच्या नवनवीन पद्धतींच्या प्रयोगाद्वारेच केली. परंतु आमच्या ह्या युगात मानवी स्वभाव आणि अनुभूतींप्रती जो (आध्यात्मिक) दृष्टीकोन उत्पन्न झाला तो पूर्णपणे नवीन आहे."_

_परंतु हा दृष्टीकोन या पूर्वी उत्पन्न होऊच शकला नसता. हा उत्पन्न होण्यापूर्वी खूप लांब काळापर्यंतची तयारी आवश्यक होती. प्रथम शरीरविज्ञान प्रगत होणे आवश्यक होते कारण मनोवैज्ञानिक मनुष्य शरीर वैज्ञानिक सुद्धा तर आहे. त्याचे चित्त निरनिराळ्या वस्तूंबरोबर असा एक भौतिक पदार्थसुद्धा आहे की, ज्यामध्ये ज्ञानतंतू, स्नायू-नाडी, ग्रंथी तसेच स्पर्श, गंध आणि दृष्टीसंबंधीची ज्ञानेंद्रिये सामील आहेत. *सत्तर वर्षापूर्वी प्रसिद्ध शरीर शास्त्रज्ञ विलियम बुड्ट ने आपल्या प्रयोग शाळेत मनोवैज्ञानिक शरीर शास्त्राच्या संशोधनास सुरुवात केली होती. या पूर्वी हे शक्यच नव्हते कारण तो पर्यंत शरीर-विज्ञानच पर्याप्त प्रमाणात प्रगत झालेले नव्हते आणि शरीर विज्ञानापूर्वी जीव-विज्ञान परिपक्व होणे आवश्यक होते.* कारण मेंदू, नाड्या, स्नायू, ग्रंथी आणि बाकी सर्व जीव कोषाच्या विकासावर अवलंबून असतात. म्हणून एक समर्थ शरीर-विज्ञान प्रकट होण्यापूर्वी जीव-कोष विज्ञानाचे परिपक्व होणे आवश्यक होते."_

_"परंतू जीव-विज्ञानापूर्वी रसायन शास्त्र आणि रसायनशास्त्रापूर्वी भौतिकशास्त्र आणि भौतिकशास्त्रापूर्वी गणितशास्त्र पाहिजे होते. अशा प्रकारच्या तयारींचे हे दीर्घ तारतम्य गेल्या काही शतकापासून चालत आले आहे."_

_*"थोडक्यात आम्ही सांगू शकतो की विज्ञानालासुद्धा कालक्रम आहे. प्रत्येक विज्ञानाला जो पर्यंत त्याची वेळ येत नाही तो पर्यंत प्रतीक्षा करावी लागते. आज मनोविज्ञानाची वेळ आली आहे. ह्या दिशेत एका नव्या ज्ञानाची सुरुवात होत आहे."*_

_"वास्तविकतः ह्या नवीन विज्ञानाप्रती लोकांची आवड खूप जुनी आहे. परंतु ह्या क्षेत्रात संशोधनाची सूक्ष्म यथार्तता नवीनच आहे. न्याय-तर्काचा एक कठोर नियम याचे नियंत्रण करतो. आपल्या विशिष्ट यथार्ततेसाठी (बिनचुकपणासाठी) प्रत्येक विज्ञानाला तोपर्यंत प्रतीक्षा करावी लागते जोपर्यंत त्याच्या आधीचे ती सगळी तथ्य आणि उपकरण त्याला देत नाही ज्यामुळे ही यथार्तता बनते. आज विज्ञानाच्या ह्या काळात एक नवी घंटा वाजविली आहे. एक नवी अंतदृष्टी आमच्या सेवेसाठी हजर झाली आहे."_

_*मी हे सांगू इच्छितो की मानवी स्वभावाचे जे सत्य आहे त्याच्या संशोधनासाठी जी नवीन अंतदृष्टी पाहिजे तिला प्राप्त करण्यासाठी आम्हां सगळ्यांना बुद्ध-शिकवणुकीचा अभ्यास करायला पाहिजे. जितके मानसिक विकार मानवाला प्रभावित करतात त्या सगळ्यापासून सुटका मिळविण्याचा उपाय बुद्ध शिकवणुकीत विद्यमान आहे.* विश्वाच्या वर्तमान स्थितीचे उत्तरदायित्व भूत आणि वर्तमानाच्या अकुशल मनोवृत्तीवरच आहे. जवळ जवळ दोन वर्षापूर्वी बर्मावर जेव्हा मोठे संकट आले होते तेव्हा लोकांनी बुद्ध उपदेशाप्रती दृढ आस्था उत्पन्न केली होती. म्हणूनच आम्ही ती संकटग्रस्थ स्थिती पार करु शकलो होतो._

_आजकाल जिकडे पाहावे तिकडे असंतोष पसरलेला दृष्टीस पडतो. असंतोषामुळे दुर्भावना उत्पन्न होते. दुर्भावनेमुळे घृणा उत्पन्न होते, घृणेमुळे शत्रूत्व उत्पन्न उत्पन्न होते, शत्रूत्वामुळे युद्ध उत्पन्न होते, युद्धामुळे शत्रु उत्पन्न होतात. शत्रूंमुळे पुन्हा युद्ध उत्पन्न होते आणि युद्धापासून पुन्हा शत्रु. अशा प्रकारे जग दुष्टतेच्या दुष्चक्रात फसते. असे का होते? *कारण मानव आपल्या मनावर नियंत्रण ठेवू शकत नाही.*_

_शेवटी मानव काय आहे? मानवी मनोवृत्तींचे केवळ अभिव्यक्तीकरणच आहे. अशा प्रकारे पदार्थ काय आहे? पदार्थसुद्धा मनोवृत्तींचे केवळ शरीरीकरण आहे. धनात्मक (कुशल) आणि ऋणात्मक (अकुशल) शक्तींच्या प्रतिक्रियांचा परिणाम आहे. भगवानांनी सांगितले *"चित्तेन नीयति लोको" संसार चित्ताचीच उत्पत्ती आहे म्हणून चित्तच प्रधान आहे.* सर्वात प्रमुख आहे. म्हणून आम्हाला चित्त आणि त्याच्या विशिष्ट वैशिष्ट्यांचा अभ्यास करायला पाहिजे, ज्यामुळे आम्ही विश्वाच्या समस्यांचे योग्य समाधान शोधू शकू._

_*बुद्ध शिकवणुकीत व्यावहारिक प्रयोगात्मक संशोधनासाठी खूप मोठे क्षेत्र आहे.* ज्यांना आमच्या अनुभवांचा लाभ घ्यायचा आहे, त्यांचे आम्ही सहर्ष स्वागत करु._

_आदरणीय महिलांनो आणि सज्जनांनो मी ह्या गोष्टीचा प्रयत्न केला आहे की आपल्याला बुद्ध शिकवणुकीतील सगळी वैशिष्ट्ये सांगावी जी मला ज्ञात आहेत. आपण माझ्या व्याख्यानाला हजर राहून रुची दाखविली यासाठी मी आपले आभार मानतो. मला येथे व्याख्यान देण्याची परवानगी दिली म्हणून गिरजाघरच्या पादरींना पुन्हा एकदा धन्यवाद देतो._

*_सब्बे सत्ता सुखी होन्तु!।_*

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

*_लेखक :- सयाजी ऊ बा खिन_*

_बुद्धवर्ष २५६२, ज्येष्ठ पौर्णिमा, २४ जून, २०१८, वर्ष २, अंक ३_

*_संकलन :- महेश कांबळे_*

*_दिनांक :-_* २३/०३/२०२५

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

Thursday, 20 March 2025

काय आहे बुद्धांची शिकवण - भाग ४

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

*_काय आहे बुद्धांची शिकवण_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2025/03/blog-post_20.html

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

_जो पर्यंत मी *"प्रतीत्य समुत्पाद" (सकारण उत्पत्ती) आणि "पट्ठान" (कार्य कारण संबंध)* च्या नियमांवर थोडासुद्धा प्रकाश टाकत नाही तो पर्यंत "काय आहे बुद्धांची शिकवण?" या विषयावरचे माझे निवेदन पूर्ण झाले असे मानले जाणार नाही._

_पहिल्या प्रवचनाच्या शेवटी मी सांगितले होते की कशाप्रकारे तपस्वी राजकुमार सिद्धार्थ सम्यक संबोधी प्राप्त करुन सम्यक संबुद्ध झाला. आपली आठवण ताजी करण्यासाठी मी पूर्वी सांगितलेल्या निवेदनाची पुनरावृत्ती करतो._

_"राजकुमार सिद्धार्थ खरोखर सम्यक संबोधी प्राप्त करुन सम्यक संबुद्ध झाला- जागृत, प्रकाशमान आणि सर्वज्ञ ! जागृत असा की ज्याच्या तुलनेत बाकी सगळे लोक झोपलेले आणि स्वप्नात होते. प्रकाशमान असा की ज्याच्या तुलनेत बाकी सगळे लोक अंधकारात भटकत होते आणि ठोकरा खात होते. सर्वज्ञ असा की ज्याच्या तुलनेत बाकी सगळे लोक केवळ अविद्येचीच जाणकारी ठेवत होते."_

_सगळे धर्म संप्रदाय निःशंकपणे सत्याचा मार्ग दाखविण्याचा दावा करतात. *बुद्धांच्या शिकवणीनुसारसुद्धा जो पर्यंत कोणी परमार्थ सत्या (चार आर्य सत्य)चा स्वतः साक्षात्कार करीत नाही तो पर्यंत अविद्यायस्तच मानला जातो.* ही अविद्याच आहे जी संस्कारांना जन्म देते. ह्या संस्कारांमुळेच सर्व प्राण्यामध्ये विज्ञानरूपी जीवनधारा प्रवाहित होते. विज्ञानरूपी जीवनधारा स्थापित झाल्याबरोबर नाम आणि रूप स्वतः अन्योन्याश्रित होतात. *नाम आणि रुपाच्या संयोगानेच शरीर बनते.* आणि सहा इंद्रियांचा (सळायतन) विकास होतो. ह्या इंद्रियांनी स्पर्श उत्पन्न होतो आणि इंद्रियांद्वारे विषयांशी स्पर्श झाल्याबरोबर वेदना (सुख, दुःख आणि असुख-अदुःख) उत्पन्न होते. वेदनेमुळे तण्हा (तृष्णा) उत्पन्न होते आणि तृष्णेमुळे उपादान (तीव्र लालसा) उत्पन्न होते. हे उपादानच आहे जे भवचे कारण आहे आणि भवच जन्म, जरा, रोग, मृत्यू, शोक, परिताप, पीडा इत्यादींचे कारण आहे. ते सर्वच्या सर्व दुःखरूप आहेत._

_अशा प्रकारे बुद्धांनी जाणले की *दुःख स्कंधाचे मूळ कारण अविद्याच आहे.*_

भगवानांनी सांगितलेः-

_*"अविद्या प्रत्यय (कारण) आहे संस्कारांचे, संस्कार कारण आहे विज्ञानाचे, विज्ञान कारण आहे नाम-रूपचे, नाम-रूप कारण आहे षडायतनचे, षडायतन कारण आहे स्पर्शाचे, स्पर्श कारण आहे वेदनेचे, वेदना कारण आहे उपादानचे, उपादान कारण आहे भवचे, भव कारण आहे जन्माचे, जन्म कारण आहे जरा, रोग, मृत्यू, शोक, परिताप, पीडा इत्यादींचे जे सगळे दुःखच आहे."*_

_ह्या *उत्पत्ती शृंखलेचेच नाव "प्रतीत्य समुत्पाद" आहे* आणि आम्ही पाहातो की सगळ्या उत्पत्तींच्या मुळात अविद्या आहे. अविद्या म्हणजे सत्यासंबंधी अज्ञान. तसे स्थूलपणे आम्ही सांगतो की दुःखाचे कारण तृष्णा आहे. अगदी सरळ गोष्ट आहे. आम्हाला एखादी वस्तू पाहिजे तेव्हा आमच्या मनात त्या वस्तूप्रती तृष्णा जागते. तृष्णा जागल्याबरोबर आम्ही ती वस्तू प्राप्त करण्याचा प्रयत्न करु लागतो. अनेक दुःख झेलावी लागतात, परंतु फक्त इतकेच जाणणे पर्याप्त नाही. भगवानांनी सांगितले-हे जे पाच स्कंध आहेत, जे केवळ नाम आणि रुपानेच बनले आहेत ते सुद्धा दुःखच आहेत- *बुद्धांच्या उपदेशात दुःख आर्य सत्याचे पूर्ण ज्ञान तेव्हा मानतात जेव्हा नाम आणि रूपाला बाहेर आणि आत त्यांच्या खऱ्या स्वरूपात पाहिले जाईल, केवळ बाह्य दिखाऊ रूपात नाही.*_

_म्हणून *दुःख आर्य सत्याला समजण्यासाठी हे आवश्यक आहे की प्रथम त्याचा अनुभव केला पाहिजे.* एक उदाहरण घेऊ. विज्ञानाने आम्हाला शिकविले आहे की संसारात जे काही विद्यमान आहे ते असंख्य विद्युत कणांच्या संचालनाद्वारा उत्पन्न झालेले केवळ प्रकंपन आहे. परंतु आमच्यापैकी किती लोक ह्या सत्याचा स्वीकार करण्यासाठी तयार आहेत, की आमच्या शरीरावरसुद्धा हाच सिद्धांत लागू होतो. म्हणून आम्ही ह्याच सत्याचा अनुभव कां करुन पाहू नये, जो स्वतः आमच्याशी संबंधित आहे. परंतु यासाठी आवश्यक आहे की आम्ही आपल्या शारीरिक स्थितीपासून वर येऊ. आम्ही आमच्या मानसिक शक्तींचा विकास करु. इतका करु की वस्तुस्थितीचे सत्य निरिक्षण करण्यास योग्य होऊ. विकसित मानसिक शक्तीद्वारा आम्ही इतक्या खोलवर पाहू शकतो, जे आधुनिकतम वैज्ञानिक यंत्राद्वारेसुद्धा शक्य नाही. जर असे आहे तर आम्ही आपल्या आत एक दृष्टी कां टाकू नये आणि पाहूया की तेथे काय होत आहे. पहा. हे अणू, परमाणु, विद्युतकण इत्यादी कशाप्रकारे तीव्र गतीने क्षण प्रतिक्षण परिवर्तित होत आहेत. निरंतर, अनंत. परंतु अशा प्रकारे आत पाहणे सोपे नाही._

_मी आपल्या शिष्याच्या एका डायरीचा थोडासा भाग वाचून ऐकवितो ज्यामुळे आपल्याला भान राहील की हे आंतरिक दुःख वस्तुतः काय आहे? तो डायरीचा भाग या प्रकारे आहे._

२१-८-५१ _साधनेला सुरुवात केल्याबरोबर मला असा अनुभव आला की जणू कोणी माझ्या डोक्यात गिरमिटने भोक पाडत आहे आणि नंतर वाटले की सगळ्या डोक्यावर मुंग्या चालू लागल्या. माझी इच्छा झाली की डोके खाजवू या परंतु गुरुजींनी असे करण्यास मना केले. मी पाहिले की तासाभरात जांभळ्या आणि चमकणाऱ्या निळ्या रंगाचे रेडियम परमाणू हळू हळू माझ्या सगळ्या शरीरात सामावून गेले. ध्यान गुहेत सतत तीन तासापर्यंत साधनेत राहून (बाहेरच्या वातावरणापासून) बिल्कुल संज्ञाशुन्य झालो आणि तेव्हाच माझ्या शरीरात एक भयानक झटका आल्यासारखे वाटले. मी खूप भयभीत झालो. परंतु माझ्या गुरुमहाराजांनी मला साधनेतच राहण्यासाठी प्रोत्साहित केले. मी अनुभव केला की माझे सगळे शरीर गरम झाले आणि माझ्या अंगप्रत्यंगात विजेसारख्या सुया टोचू लागल्या._

२२-८-५१. _आजसुद्धा मी जवळ-जवळ तीन तास साधना केली. मला असा अनुभव झाला की माझे सगळे शरीर आगीच्या ज्वाळेत सामावले आहे. मी पाहिले की निळ्या आणि जांभळ्या रंगाचे किरण स्फुलिंग माझ्या सगळ्या शरीरात बिना कोणत्या उद्दीष्टाने वरुन खाली गतीमान आहेत. तेव्हा माझ्या गुरुने मला समजाविले की शरीरात हे जे (निरंतर) परिवर्तन होत आहे हे "अनिच्च (अनित्य) आहे आणि या पासून जी पीडा होत आहे हेच दुःख आहे आम्हाला ह्या पीडेपासून. ह्या दुःखापासून विमुक्त व्हायचे आहे._

२३-८-५१. _गुरुजींनी मला आदेश दिला की बिना प्रकाश किरणांच्या आधाराने मी आपल्या छातीवर ध्यान केंद्रित करावे आणि हे ही सांगितले की आता आम्ही शरीर दर्शना (कायानुपश्यना) च्या स्थितीवर पोहोचत आहोत. मी असेच केले आणि ह्या निर्णयावर पोहोचलो की आमचे शरीर दुःखाने भरलेले आहे._

_समाधी (एकाग्र चित्त) च्या बळाने विपश्यनेद्वारा आम्ही आत पाहतो आणि आण्विक प्रकंपन, विकीर्णन आणि संघर्षणच्या तीव्र वेदनांचा अनुभव करतो. तेव्हाच आम्हाला ह्या "आंतरिक दुःखा " चा यथार्थ अनुभव होतो. ह्या सत्याला न जाणणेच अविद्या आहे. आणि ह्याला आपल्या परमार्थ रूपात जाणणेच अविद्येचा नाश करणे आहे. त्या अविद्येचा जी दुःखाची जननी आहे, जी कार्य-कारण शृंखलेद्वारा ह्या जीवनधारेला प्रवाहित करते, जी स्वभावानेच जरा, व्याधी, पीडा, आणि चिंता इत्यादींनी भरलेली आहे._

_हे झाले प्रतीत्य समुत्पाद आणि दुःखाच्या मूळ उगमाचे वर्णन. आता आपण कार्य-कारण संबंधाच्या नियमांवरसुद्धा थोडासा दृष्टीक्षेप टाकू. याला भगवानांनी अभिधम्म पिटकच्या पट्टाननीती मध्ये सांगितलेले आहे. भगवानांनी सम्यक संबोधी प्राप्त करुन जेव्हा ४९ दिवसांपर्यंत निरंतर ध्यान केले तेव्हा ह्या सिद्धांताचे विश्लेषणात्मक चिंतन करीत असतांना त्यांच्या शरीरातून सहा रंगाची किरणे प्रस्फुटित झाली होती. पालि साहित्यात ह्या गंभीर विषयावर पाचशे पृष्टांचे पाच ग्रंथ आहेत. मी तर आपल्याला याचा केवळ परिचय मात्र देऊ शकेन._

_*बुद्ध शिकवणीच्या कार्य-कारण सिद्धांताच्या मूलाधारस्वरूप २४ प्रकारचे प्रत्यय मानले जातात.* ते हे आहेत :-_

१) हेतु प्रत्यय, २) आलंबन प्रत्यय, ३) अधिपती प्रत्यय, ४) अनंतर प्रत्यय, ५) समानांतर प्रत्यय, ६) सहजात प्रत्यय, ७) अन्यमन्य प्रत्यय, ८) निश्रय प्रत्यय, ९) उपनिश्रय प्रत्यय, १०) पुरेजात प्रत्यय, ११) पच्छाजात प्रत्यय, १२) आसेवन प्रत्यय, १३) कर्म प्रत्यय, १४) विपाक प्रत्यय, १५) आहार प्रत्यय, १६) इंद्रिय प्रत्यय, १७) ध्यान प्रत्यय, १८) मार्ग प्रत्यय, १९) संप्रयुक्त प्रत्यय, २०) विप्रयुक्त प्रत्यय, २१) अस्ति प्रत्यय, २२) नास्ति प्रत्यय, २३) विगत प्रत्यय, २४) अविगत प्रत्यय.

_आता मी हेतू आणि कर्माचा परस्पर संबंध आणि त्यांच्या कारणामुळे उत्पन्न होणाऱ्या *कर्मफळाला* जेवढे समजू शकलो, ते तुम्हाला सांगतो._

_कायिक, वाचिक किंवा मानसिक कर्माच्या प्रत्येक सचेतन क्षणात जी मनोस्थिती असते तोच हेतू आहे. ह्या कारणाने प्रत्येक कर्म, एक मनोस्थिती उत्पन्न करते ती कुशल असते किंवा अकुशल असते. बुद्ध मान्यतेनुसार यालाच आम्ही कुशल धर्म, अकुशल धर्म आणि अब्याकत धर्म म्हणतो. हे धर्म काय आहेत? ह्या केवळ मानसिक शक्ती आहेत ज्या मिळून मिसळून "संस्कार लोक" निर्माण करतात, ज्याचे वर्णन मी पहिल्या व्याख्यानात सांगितले आहे._

_*कुशल शक्ती-* अशा धनात्मक शक्ती आहेत ज्या दान, सेवा, श्रद्धा, भक्ती, चित्तविशुद्धी या सारख्या सद्वृत्तींनी अनुप्रेरित कायिक, वाचिक आणि मानसिक शुभ-कर्मांद्वारे उत्पन्न होतात._

_*अकुशल शक्ती* अशा ऋणात्मक शक्ती आहेत की ज्या तृष्णा, अभिलाषा, क्रोध, घृणा, असंतोष, प्रवंचना या सारख्या दुष्प्रवृत्तींनी अनुप्रेरित कायिक, वाचिक आणि मानसिक अशुभ कर्माद्वारे उत्पन्न होतात._

_*अब्याकत शक्ती -* ह्या कुशलही नाहीत आणि अकुशलही नाहीत. *ही अरहंताची नित्य अवस्था आहे, ज्यांनी अविद्येला पूर्णपणे मुळापासून नष्ट केले आहे.* अरहंताचे इंद्रिय जेव्हा कोणत्या इंद्रियगम्य विषयाशी स्पर्श करते तेव्हा फळस्वरूप जी वेदना (अनुभूती) उत्पन्न होते ती कुशलधर्मा नाही आणि अकुशलधर्मासुद्धा नाही. म्हणून याने तृष्णामूलक गंभीर प्रभाव पडू शकत नाही. तसेच जसे की सतत परिवर्तनशील प्रवाही पाण्यावर कुठलीही छाप पडू शकत नाही. अरहंतासाठी शरीराचा संपूर्ण सांगाडाच सतत परिवर्तनशील परमाणूचा समूह आहे म्हणून याच्यावर पडलेली कोणतीही छाप ह्या समूहासोबतच विघटित होते._

_या आता पाहू- सहेतुक कर्माद्वारे उत्पन्न झालेल्या कुशल आणि अकुश् शक्तींचा विभिन्न प्राणी लोकांशी काय संबंध आहे? परंतु प्रथम आपल्या प्राणी लोकांचे विभाजन समजून सांगतो - ते आहेत :_

१) _*अरूप आणि रूप ब्रह्मलोक -* हे लोक इंद्रियजन्य वासनांच्या प्रभावापलीकडे आहेत. चित्ताचे चार महान गुण-धर्म आहेत- परम मैत्री, परम करुणा, परम मुदिता (इतरांची सफलता आणि उन्नती पाहून आनंदित होणे) आणि परम उपेक्षा. ह्या धर्मांनी नितांत विशुद्ध, तेजस्वी, विपुल आनंदमयी, शांत आणि लघिष्ठ मानसिक शक्तींचे प्रजनन होते ज्या ह्या सर्वोच्च प्राणी लोकात स्थापित होतात. म्हणून येथील रूप ब्रह्मलोकांचे भौतिक पदार्थ अत्यंत सूक्ष्म आहेत आणि तेथे केवळ प्रकाश आहे. हेच कारण आहे की ह्या लोकांचे निवास आणि शरीर स्थूल भौतिक पदार्थांनी बनलेले नाही. ते केवळ दीप्ती किंवा प्रकाशाने बनलेले आहे. अरूप ब्रह्मलोकात तर भौतिकता अल्पसुद्धा नाही._

२) *काम वासना लोक-* हे तीन आहेत १) देव लोक, २) मानवलोक, ३) अधोलोक.

१. *देव लोक-* ती सगळी कायिक, वाचिक किंवा मानसिक कुशल कर्म जी किंचितच रागरंजित आहेत, अशा मानसिक शक्तींचे सूजन करतात ज्या बऱ्यापैकी विशुद्ध, तेजस्वी, आनंदमयी आणि लघिष्ठ आहेत. ह्या शक्ती अशा उच्च देव लोकात स्थापित होतात, जेथील भौतिक पदार्थसुद्धा बरेचशे सूक्ष्म, प्रकाशमान, आनंदमय, आणि लघिष्ठ आहेत. म्हणूनच ह्या देवलोकात निवास करणाऱ्यांचे शरीर सूक्ष्म आणि वायव्य आहे. वेगवेगळ्या देवांची शारीरिक सूक्ष्मता, तेजस्विता, वर्ण लावण्यता. वेगवेगळ्या देवलोकानुरूप कमी किंवा जास्त आहे. साधारणतः हे देव तो पर्यंत स्वर्गीय आनंदाचा उपभोग करतात जो पर्यंत त्यांच्या कुशल कर्माच्या संचित मानसिक शक्ती कमजोर होत नाहीत आणि असे झाल्यानंतर अधिकतर हे देवता खालच्या लोकातच पुनर्जन्म ग्रहण करतात. विशिष्ट विकसित प्राण्यांची गोष्ट वेगळी आहे.

२) मानव लोकाची चर्चा नंतर करु. 

३. *प्रथम अधोलोकाची चर्चा करु इच्छितो-*

३) *अधोलोक* समस्त कायिक, वाचिक आणि मानसिक अकुशल (द्वेषपूर्ण आणि पापपूर्ण) कर्म अशा मानसिक शक्तीचे सृजन करतात - ज्या स्वभावानेच अपवित्र, अंधकारपूर्ण, ज्वलनशील, गरिष्ठ, कठोर आणि रुक्ष आहेत. यात सुद्धा ज्या सर्वाधिक अपवित्र, अंधकारपूर्ण, ज्वलनशील, गरिष्ठ, कठोर आणि रुक्ष मानसिक शक्ती आहेत त्या चार अधोलोकांचा खालचा भाग निरय (नरक) लोकात स्थान प्राप्त करतात. स्वभावतः ह्या लोकात जे भौतिक पदार्थ आहेत ते कठोर, रुक्ष, उत्तप्त आणि अप्रिय आहेत. हे त्या सर्व प्राण्यांसाठी आहे जे (आपल्या दुष्कर्माच्या परिणामस्वरूप) अशा अधोलोकासाठी निश्चित आहेत. मानवलोक ह्या अधोलोकांपेक्षा थोडा वर आहे. पशू-पक्ष्यांना सोडून ह्या अधोलोकांचे अन्य प्राणी दृश्यमान नाहीत. त्यांना साधारण डोळ्यांनी पाहू शकत नाही. हो, ज्याने समाधी शक्ती द्वारे दिव्य दृष्टी प्राप्त केली आहे, तो यांना अवश्य पाहू शकतो. तेथे दुःखाचीच प्रधानता आहे, शारीरिक आणि मानसिकसुद्धा. हे लोक देवलोकांपासून पूर्णपणे विन्मुख आहेत.

२) *मानव लोक -* आता मी मनुष्य लोकाची थोडीशी चर्चा करीन. हा लोक स्वर्ग आणि नरकाच्या मध्ये स्थित आहे. येथे आम्ही दुःख आणि सुख दोन्हींचा अनुभव करतो. याचे कमी-जास्त प्रमाण आमच्या पूर्वकृत कर्मावर अवलंबून आहे. येथूनच आम्ही आपली मानसिक अवस्था उन्नत करून उर्ध्व लोकांतून आपल्या पूर्व संचित कुशल मानसिक शक्तींना ओढून आणू शकतो, त्यापासून बळ प्राप्त करु शकतो. येथूनच आम्ही दुराचार आणि दुष्प्रवृत्तींच्या खोलीपर्यंत जाऊ शकतो आणि अधोलोकाच्या शक्तींशी संतुलन स्थापित करु शकतो. येथे उर्ध्व लोकासारखे एकांतिक सुख नाही आणि अधोलोकासारखे एकांतिक दुःखही नाही. आज जे संत आहेत उद्या तेच दुष्ट सुद्धा होऊ शकतात. आज जो श्रीमंत आहे उद्या तोच निर्धन होऊ शकतो. येथे जीवनात खूप स्पष्ट चढ-उतार येत राहातात. कोणाचीही स्थिती अपरिवर्तनीय नाही, स्थिर नाही. मनुष्याची नाही, परिवाराची नाही, समाजाची नाही व राष्ट्राचीही नाही. सर्वच्या सर्व कर्म सिद्धांताच्या अधीन आहेत. कारण *कर्माची उत्पत्ती मनातून होते आणि मन सतत परिवर्तन शील आहे. म्हणून कर्मविपाकाचे सुद्धा परिवर्तनशील होणे अनिवार्य आहे.*

_*हा जो जमिनीकडे ओढीचा अर्थात गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आहे याचे मूळ कारण हेच आहे की आमच्या पायाखालच्या जमिनीत विभिन्न प्रकारच्या दुष्ट मानसिक शक्ती सामावलेल्या आहेत. जो पर्यंत मनुष्यात अशुद्धता साठलेली आहे आणि साधारणपणे असे तर आहेच तो पर्यंत त्याला ही अधोमुखी ओढ सहन करावीच लागेल आणि मृत्यूच्या क्षणी त्याची मनोस्थिती अधोलोकाच्या मानसिक शक्तींशी संबद्ध झाली तर आपल्या अकुशल कर्माच्या संचयाची परतफेड करण्यासाठी त्याचा भावी पुनर्जन्म ह्याच लोकात होईल. दुसरीकडे मृत्यूच्या क्षणी जर त्याची मनोस्थिती मानवलोकाच्या शक्तींशी संबद्ध झाली तर त्याचा भावी जन्म पुन्हा मानवलोकातच होऊ शकतो आणि मृत्यूच्या क्षणी त्याची मनोस्थिती आपल्या कुशल कर्माच्या आठवणीमध्ये ध्यानमग्न राहिली तर त्याचा पुनर्जन्म साधारणपणे देवलोकातच होईल. तेथे तो आपल्या कुशल मानसिक शक्तींद्वारा संचित जमा खात्यातील कर्म संपत्तीचा उपभोग करु शकेल. अशाच प्रकारे मृत्यूच्या क्षणी जर कोणाचे चित्त नितांत विशुद्ध आणि प्रशांत आहे, काम-आसक्ती-छंदपासून मुक्त आहे तर तो ब्रह्मलोकाला प्राप्त होतो. अशा प्रकारे आम्ही पाहतो की बुद्धांच्या शिकवणीत कर्मांचा जमाखर्च किती बिनचूक आहे, यथार्थपूर्ण आहे, शुद्ध आहे.*_

_सज्जनांनो आणि सन्माननीय महिलांनो बुद्धांच्या उपदेशांचा हाच सारांश आहे. आपण जाणू इच्छिता की ह्या उपदेशांमुळे कोणत्या व्यक्तीला किती लाभ पोहोचतो? तेवढाच पोहोचतो जेवढा तो याचे पालन करतो. हा नियम जसा व्यक्तीला, तसाच परिवाराला, समाजाला आणि राष्ट्रालासु‌द्धा लागू होतो. आम्ही पाहातो की *काही लोक अशासाठी बुद्धानुयायी आहेत की त्यांची ह्या धर्मावर श्रद्धा आहे आणि काही लोक अशासाठी की ते उपदेशांचे पालन करतात. परंतु बहुतेक लोक तर असे आहेत की जे बुद्धानुयायी परिवारात जन्म घेण्यामुळे स्वतःला बुद्धानुयायी म्हणतात. पण वस्तुतः जे लोक बुद्धाच्या उपदेशांचे योग्य प्रकारे पालन करतात तेच आपली मनोदशा आणि मानसिक दृष्टीकोन सुधारू शकतात. जास्त नाही पण केवळ पंचशीलाचेच पालन केले तर तो काही मर्यादेपर्यंत बुद्धांचा अनुयायी म्हटला जाईल.* बर्मा देशातील बुद्धानुयायींनी जर केवळ पंचशीलाचे पालन केले तर देशात हा जो अंतर्गत गृह कलह होत आहे तो समाप्त होईल. पण आणखी एक अडचण आहे आणि ती आहे शारीरिक आवश्यकतांची पूर्ती. कोणीही असो त्याला जीवनासाठी कमीत कमी आवश्यकता तर पाहिजेच. बहुतेक लोकांच्या दृष्टीने जगणेच अत्यंत आवश्यक आहे. त्यांच्यासाठी जीवनात अधिक मूल्यवान आणखी दुसरे काहीही नाही म्हणून तो आपले आणि आपल्या परिवारातील लोकांचे जीवन कायम ठेवण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या अनुशासनाचे नियम भंग करण्यात मागे-पुढे पहात नाही मग ते धार्मिक अनुशासन असो की सरकारी. परंतु ते याचा विचार करीत नाहीत की वर्तमान जीवनाच्या कष्टाची जबाबदारी त्यांच्या पूर्वकालीन अकुशल वृत्तीवर अवलंबून आहे._

_म्हणून आवश्यकता ह्या गोष्टीची आहे की अधिकाधिक शुद्ध आणि कुशल मानसिक शक्तींचे सृजन आणि विकास केला पाहिजे ज्यामुळे मानव समाजावर पसरलेल्या अकुशल आणि दुष्ट मानसिक शक्तींशी सामना करता येईल. परंतु हे काम इतके सरळ नाही. सद्गुरुंच्या मदतीविना शुद्ध मानसिक स्थितीच्या स्तरापर्यंत पोहचू शकत नाही. दृष्ट प्रवृत्तींशी सामना करण्यासाठी जर आम्हाला प्रभावशाली शक्ती पाहिजे तर त्या धर्माच्या मार्गानेच प्राप्त करु शकतो. आधुनिक विज्ञानाने आम्हाला चांगला किंवा वाईट कसाही असो अणुबॉम दिला. मनुष्याच्या बुद्धीचा अत्यंत चमत्कारपूर्ण परंतु त्या सोबतच अत्यंत भयावह अविष्कार. काय मनुष्य आपल्या बुद्धीचा प्रयोग योग्य दिशेने करीत आहे? तो बुद्धाच्या मान्यतांनुसार चांगल्या मानसिक शक्तींचे सूजन करीत आहे की वाईट शक्तींचे? हे आमच्या स्वतःच्या इच्छा शक्तीवर अवलंबून आहे की आम्ही आमच्या बुद्धीला कोणत्या विषयावर आणि कशा प्रकारे लावावे? *केवळ बाह्य पदार्थजन्य आण्विक शक्तीच्या विषयातच आपली बुद्धी लावण्याऐवजी आम्ही तिला आंतरिक आण्विक शक्तीच्या विजयात कां लावू नये? यामुळे आम्हाला आंतरिक शांती मिळेल. तिला प्राप्त करुन आम्ही इतरांनाही वाटू शकू. आमच्याकडून अशा विशुद्ध आणि शक्तीशाली मानसिक शक्ती प्रवाहित हित होतील, ज्या आमच्या चहूकडे पसरलेल्या दुष्प्रवृत्तींचा यशस्वीपणे प्रतिरोध करु शकतील. एका दिव्याच्या प्रकाशात सगळ्या खोलीतील अंधकाराला दूर करण्याची शक्ती आहे. अशाच प्रकारे कोण्या एका व्यक्तीत जागृत केलेला प्रकाश अनेकांचा अंधकार दूर करु शकण्याची क्षमता ठेवतो.*_

_कोणी असे मानेल की वाईट मार्गाने चांगले होऊ शकते तर त्याचे मानणे केवळ भ्रांती आहे, मृगजळ आहे. कोरीया देशाची बाब घेऊ. आतापर्यंत दोन्हीकडून बहुधा दहा लाखापेक्षाही जास्त लोक मारले गेले. इतके होऊन सुद्धा काय शांतीच्या जवळ पोहचू शकले? यापासून आम्ही हाच घडा शिकतो की *अशा प्रश्नाचे एकच समाधान आहे मानवी मनोवृत्तीला धर्माच्या माध्यमातून परिवर्तित केले पाहिजे. भौतिक पदार्थांवरच प्रभूत्व प्राप्त करणे पर्याप्त नाही. आवश्यकता ह्या गोष्टीची आहे की मनावर सुद्धा प्रभूत्व स्थापित केले पाहिजे.*_

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

*_लेखक :- सयाजी ऊ बा खिन_*

_बुद्धवर्ष २५६२, अधिक ज्येष्ठ पौर्णिमा, २९ मे, २०१८, वर्ष २ अंक २_

*_संकलन :- महेश कांबळे_*

*_दिनांक :-_* २०/०३/२०२५

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

Wednesday, 19 March 2025

बहिष्कृत वर्ग अधिवेशन ठराव

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

*_कुलाबा जिल्हा बहिष्कृत परिषद_*

*_अधिवेशन पहिलें_*

_*महाड - मि. प्रा. ना. मंडळाचे नाटकगृह*_

_मुक्काम महाड_

https://mikamblemahesh.blogspot.com/2025/03/blog-post_19.html

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

_सदरहू परिषदेची बैठक मुक्काम महाड येथे *शनिवार ता. १९ व रविवार ता. २० रोजी भरली होती.* परिषदेत एकंदरीत ३००० वर अस्पृश्य लोकांचा जमाव जमला होता. परिषद एका थिएटरांत भरविण्यांत आली होती. परिषदेस पुष्कळ मंडळी गेली होती. त्यांत *मेसर्स गं. नि. सहस्रबुद्धे, अनंत विनायक चित्रे, सिताराम नामदेव शिवतरकर, बाळाराम आंबेडकर, पांडुरंग नथुराम राजभोज, शांताराम अनाजी उपशाम, मोरे, रामचंद्र शिंदे, मोरे, धोंडीराम नारायण गायकवाड, शिवराम गोपाळ जाधव वगैरे बहिष्कृत वर्गापैकी मंडळी हजर होती.* परिषदेच्या कामास ता. १९ रोजी संध्याकाळी ५ वाजून गेल्यावर सुरवात झाली. *आरंभी परिषदेचे स्वागताध्यक्ष संभाजी तुकाराम गायकवाड यांनी आलेल्या मंडळीचे स्वागत करून परिषद भरविण्याचा हेतु थोडक्यांत सांगितला.* नंतर नियमाप्रमाणें सूचना व अनुमोदन मिळाल्यावर *परिषदेचे नियोजित अध्यक्ष डॉ. भीमराव रामजी आंबेडकर, एम. ए., पी. एच. डी., डी. एस. सी., बार-अॅट-लॉ, हे स्थानापन्न झाले.*

_*परिषदेचे ठराव*_

_*गट १ ला*_ 

_ठराव १ ला_

_बहिष्कृत वर्गांनी चालविलेल्या आत्मोद्वाराच्या चळवळीमुळे वरिष्ठ वर्ग व बहिष्कृत वर्ग याच्यामध्ये परस्परांत तेढ उत्पन्न होऊ नये अशी वरिष्ठ वर्गातील हिंदूची इच्छा असल्यास ही परिषद त्यांना पुढील सूचना करीत आहे._

(अ) बहिष्कृत वर्गातील लोक सार्वजनिक स्थळे ४ व पाणवठे यांचा उपयोग करून आपले नागरिकत्वाचे हक्क बजावण्याचा प्रयत्न करीत असतांना वरिष्ठ वर्गातील लोक त्यांच्याशी सर्व प्रकारचे व्यवहार बंद करून त्यांच्याविरुद्ध हरताळ जाहीर करतात. तसे न करितां अशावेळी वरिष्ठ वर्गातील लोकांनी बहिष्कृत लोकांना सक्रिय सहाय्य करावे.

(ब) वरिष्ठ वर्गातील लोकांनी बहिष्कृतांस घरगुती नोकर म्हणून नोकरीस ठेवावे.

(क) *जातीभेद मोडण्याचा उपाय म्हणून मिश्र विवाह पद्धतीचा प्रघात सुरू करावा.*

(ड) बहिष्कृत वर्गातील गरीब विद्यार्थ्यांचे आपले घरी वार लावून किंवा त्यांच्या भोजनाची तरतूद करून त्यांना मदत करावी.

(इ) मेलेली जनावरे ओढून टाकण्याचे बाबतीत बहिष्कृत लोकांवर अवलंबून न राहता आपली आपन व्यवस्था करावी.

*_गट २ रा_*

ठराव १ ला. *मागील कायदेकौन्सिलामध्ये श्री. सी. के. बोले यांनी सार्वजनिक विहिरी, व तलावासंबंधानेही ठराव आणला आहे त्याची सरकारने अंमल बजावणी करुन त्या ठिकाणी पाटया लावण्याची व्यवस्था करावी. आणि जरूर तर क्रि प्रो. कोड सेक्शन १४४ अंमलात आणून स्थानिक पुढार्यांचे जामीन घेऊन अस्पृश्यांना सदरील हक्क उपभोगण्यास मदत करावी.*

*ठराव २ रा.* ही सभा सरकारास अशी विनंती करीत आहे की, खेडेगांवी कित्येक ठिकाणी अस्पृश्यांची पाणी पिण्याची अत्यंत गैरसोय होते ती दूर करण्याची व्यवस्था करावी.

*ठराव ३ रा.* बहिष्कृत लोकांच्या आर्थिक उन्नतीस्तव फाॅरेस्ट जमिनी लागवडीस द्याव्या.

*ठराव ४ था.* अत्यंत मागासलेल्या बहिष्कृत वर्गाचा आर्थिक दर्जा वाढविण्याकरितां व त्यांचे दू:ख निवारण करण्याकरितां सरकारने खालील गोष्टींकडे लक्ष द्यावे 

अ. अस्पृश्यवर्गातील अन्काॅलिफाईड इसमांस जेथे शक्य असेल तेथे सरकारी नोकऱ्या द्याव्या.

ब. अस्पृश्य लोकांची लष्करात भरती करावी

क. आरमारी खात्यांत अस्पृश्य उमेदवार घ्यावेत.

ड. *सेकंड इअर ट्रेन्ड मास्तरास शाळा खात्यांत सुपरवायझरच्या जागा देण्यात याव्यात.*

इ. अस्पृश्यांतील साक्षर लोकांस मुलकी पोलिस दलाच्या जागा देण्यात याव्यात.

क. अस्पृश्य लोकांची शक्य तितकी जास्त पोलिस खात्यात भरती करावी.

*ठराव ५ वा.* सरकारी कामानिमित्त रयतेकडून बलुते देण्याची पद्धत बंद करून त्याच्याऐवजी गावकरी लोकावर सी. पी. वगैरे प्रांतात ज्याप्रमाणे मेस बसविण्यात आला आहे. त्याप्रमाणे येथे हि सेस बसवून त्यांतून कामगारांस मासिक पगार देण्याची पद्धत अमलात आणावी.

*ठराव ६ वा.* बहिष्कृत वर्गाची मृतमांस खाण्याची चाल सरकारने कायद्याने बंद करावी. कारण तीमुळे आरोग्यास धोका पोचून बहिष्कृतांचा दर्जा अत्यंत हीनपणाचा ठरतो.

*ठराव ७ वा* शिक्षण व दारुबंदी या बाबतीत सक्ती करण्यांत यावी.

*ठराव ८ वा.* श्रीयुत एम. के. जाधव यांस डेप्युटी कलेक्टरची जागा न दिल्याबद्दल या सभेस अत्यंत दिलगिरी वाटते.

*ठराव ९ वा.* १११ व्या पलटणीमध्ये पूर्वी उभारलेल्या फंडांत महाड तालुक्यांतील नोकरीत असलेल्या गृहस्थांची रक्कम आहे. त्यांतून या तालुक्यांतील अस्पृश्य वर्गाच्या मुलांसाठी एक बोर्डींग काढण्यांत यावे.

*ठराव १० वा.* शिक्षणाच्या बाबतीत अधोगतीस गेलेल्या बहिष्कृत समाजाच्या उन्नतीप्रित्यर्थ खालील गोष्टी अंमलांत आणव्या.

अ. शिक्षणाची प्रगति कशी होईल याची चौकशी करण्याकरितां एक कमिटी नेमण्यांत यावी.

ब. जिल्हानिहाय बोर्डींगे उघडावी.

क. खाजगी संस्थांनी चालविलेल्या बोडींगास मुलापाठी प्रत्येकी दरमहा रु. १० ग्रँट द्यावी.

ड. *३० मुले असलेल्या गावी शाळा उघडावी.*

इ. शिष्यवृत्त्या द्याव्या.

*_गट ३ रा_*

*ठराव १ ला.* ही परिषद बहिष्कृत वर्गातील पंचांना पाटलास (वरठ्यास) विनंती करते की मुलांच्या लग्नप्रसंगी ठिकठिकाणच्या पंचानी खालील गोष्टी अमलात आणाव्या

अ. *२० वर्षांच्या आतील मुलांची १५ वर्षाच्या आतील मुलींची लग्न करण्याची चाल बंद करण्यांत यावी.*

ब. *ज्या ठिकाणी शाळा असेल तेथील लोकांनी मुलामुलींस शिक्षण दिलेच पाहिजे अशी पंचांनी ताकीद द्यावी. मोडल्यास दोषास पात्र व्हावे लागेल असा नियम करावा.*

क. *पुनर्विवाह करण्यापूर्वी उभयतां वधुवरांची योग्य चौकशी केल्याशिवाय पुनर्विवाह लावु नये.*

ड. *पुनर्विवाहामध्ये सात रुपये इलोग द्यावा आणि लुगडेंचोळी, पाटल्याचाजोड, नथ व पंचांचे जेवण याशिवाय पंचांचा कर नसावा.*

*ठराव २ रा*

(अ) अस्पृश्य लोकांनी महारकी वगैरे सारखे हलके धंदे करण्याचे सोडून शेती वगैरे सारखे स्वतंत्र धंदे करण्याची पद्धत जोराने अमलात आणावी.

(ब) *_शेतीस जरुर असलेल्या सह‌कारी पतपेढ्या काढण्यात याव्यात._*

(क) दुष्काळ, अत्तिवृष्टीस तोंड देण्यासाठी व त्याचप्रमाणे सावकाराचे मगर मिठीतून सुटण्यासाठी "सहकारी गल्ले " स्थापन करावेत अशी या सभेची बहिष्कृत वर्गास आग्रहाची विनंती आहे.

*_गट ४ था_*

*ठराव १ ला.* स्वामी श्रद्धानंदजींच्या अमानुष खुनाबद्दल या सभेस अत्यंत दुःख होत आहे. व त्यांनी आखून दिल्याप्रमाणें हिंदू जातीने अस्पृश्यतेचें समूळ उच्चाटन करावें.

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

*_संदर्भ : बहिष्कृत भारत अंक_* 

             *_रविवार ता ०३ एप्रिल सन १९२७_*

*_संकलन : महेश कांबळे_*

*_दिनांक : १९/०३/२०२५_*

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

Monday, 17 March 2025

बुद्धांचे उपदेश काय आहेत‌ - भाग ३

 ✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

*_बुद्धांचे उपदेश काय आहेत?_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2025/03/blog-post_17.html

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

_*दुसरे आर्य सत्य- दुःखाचा समुदय काय आहे? भगवानांनी सांगितले की दुःखाचा उदय होण्याचे कारण तृष्णा आणि तीव्र लालसा आहे.* एकदा कामनेचे बी पडले की ते लोभ आणि आसक्ती बनून उगवते. ते तृष्णा आणि लालसेच्या रुपात फुलु-फळू लागते. *तृष्णा धन संपत्तीची असो किंवा अधिकारांची. ज्यामध्ये हे बी पेरले गेले तो बिचारा तृष्णेचा गुलाम झालाच आणि जीवनभर तन-मनाने तिच्या इशाऱ्यावर नाचत राहिला.* परिणाम असा झाला की अंतर्मनात असलेल्या लोभ आणि द्वेषाच्या प्रेरणेने मन, वचन आणि कर्माद्वारा अकुशल वृत्तींची-पाप संस्कारांची-सदैव निर्मिती आणि संकलन करीत राहिला._

_दार्शनिक दृष्टीकोनातून पाहिले तर हेच दिसते की कर्म संस्कार वेळ येते तेव्हा त्या व्यक्तीवर आपली प्रतिक्रिया प्रकट करतात ज्याच्यामुळे त्यांची उत्पत्ती झालेली आहे. ह्याच कर्म संस्कारांमुळे नाम आणि रुपाची संयुक्त धारा वाहू लागते जी आंतरीक दुःखाची जन्मदात्री आहे._

*_दुःख-निरोध-गामिनी-प्रतिपदा (मार्ग)_*

_या, पाहू या, तो कोणता मार्ग आहे जो दुःखाचा निरोध करतो- हा तोच आर्य अष्टांगिक मार्ग आहे ज्याला भगवानांनी आपल्या पहिल्याच प्रवचनात सांगितले होते. ह्या आर्य अष्टांगिक मार्गाचे तीन स्कंध आहेत._

*_(अ) शील स्कंधः_*

(१) सम्मा वाचा, (२) सम्मा कम्मन्ता, (३) सम्मा आजीवा.

*_(आ) समाधि स्कंधः_*

(४) सम्मा वायामो, (५) सम्मा सति, (६) सम्मा समाधि.

*_(इ) प्रज्ञा स्कंध:_*

(७) सम्मा सङ्कप्पो, (८) सम्मा दिद्वि.


(अ) शील स्कंधाची तीन अंग आहेत.

_*(१) सम्मा वाचाः* सम्यक वाणी अशी वाणी बोलावी जी सत्य आहे, कल्याणकारी आहे. ती कटू नसावी, कठोर नसावी, कपटयुक्त नसावी, द्वेष युक्त नसावी._

_*(२) सम्मा कुम्मन्ताः* सम्यक् कर्मात सदाचाराच्या मूळ आधारानुसार नैतिक जीवनाचे पालन करणे, हिंसा, चोरी, व्याभिचार आणि मादक पदार्थांच्या सेवनापासून दूर राहणे._

_*(३) सम्मा आजीवोः* सम्यक आजीविका उपजीविकेचे असे साधन स्वीकारावे की जे अन्य प्राण्यांना दुःखाचे कारण होणार नाही. गुलामांचा व्यापार, अस्त्र-शस्त्र निर्माण, मादक पदार्थाचा व्यापार इत्यादी इत्यादी पासून दूर राहणे._

_*ही आहे भगवानांची आचारसहिंता जी त्यांनी आपल्या पहिल्या उपदेशात प्रज्ञापित केली होती.* या नंतर यात वाढ केली. भिक्षु संघ तसेच गृहस्थ श्रावकांसाठी वेगवेगळी आचारसहिंता निर्धारित केली. भिक्षेच्या आचारसहिंतेवर येथे काही सांगणे मला आवश्यक वाटत नाही. आपण महानुभावांना गृहस्थांची सदाचार सहिंता अवश्य सांगण्याची इच्छा आहे. त्याला पंचशील म्हणतात -_

_*१) पाणातिपातः* प्राणी हिंसेपासून दूर राहण्याचा उपदेश. (ह्या शील विधानात सर्व प्राण्यांप्रती भगवान बुद्धांची अमर्यादित करुणा प्रकट होते)_

_*२) अदिन्नादानः* न दिलेली वस्तू घेण्यापासून दूर राहणे. (हे चोरी न करणे, आवश्यकतेपेक्षा अधिक न घेणे आणि अयोग्य संग्रह वृत्तीवर नियंत्रण आहे._

_*३) कामेसुमिच्छाचारः* काम संबंधी मिथ्याचरण (व्याभिचार) पासून दुर राहण्याचा उपदेश. (काम वासना मनुष्यात व्यापक आहे. याचा नितांत निरोध करणे प्रत्येकाला कठीण आहे म्हणून केवळ व्याभिचारापासून दूर राहण्याचे शील विधान आहे.)_

_*४) मुसावादः* खोटे बोलण्यापासून दूर राहण्याचा उपदेश (ह्या शील विधानात वाणीद्वारा सत्याची प्रतिष्ठा स्थापित केलेली आहे.)_

_*५) सुरामेरय्य:* मादक पदार्थ इत्यादी प्रमादकारी पदार्थाच्या सेवनापासून दूर राहण्याचा उपदेश. (नशेच्या सेवनाने मनुष्य आपल्या मनाची दृढता आणि विवेकबुद्धि हरवून बसतो. परमार्थ सत्याच्या साक्षात्कारासाठी ह्यापासून दूर राहणे अनिवार्य आहे.)_

_आम्ही पाहतो की उपरोक्त पंचशील समस्त कायिक आणि वाचिक कर्मांवर नियंत्रण राखण्यासाठी आहेत आणि हे समाधिसाठी मनाला पूर्णपणे एकाग्र करण्यासाठी नितांत आवश्यक आधार आहेत._

_*(आ) समाधी स्कंधः*_

_सज्जनांनो आणि सन्माननीय महिलांनो! आता आपण बुद्ध शिकवणुकीच्या मानसिक बाजूवर विचार करु. विश्वास आहे की है आपल्याला निश्चितच आवडेल. आर्य अष्टांगिक मार्गाच्या दुसऱ्या स्कंधात म्हणजे समाधीस्कंधात ह्या तिघांचा समावेश आहे._

_*१) सम्मा वाायामो सम्यक व्यायाम.*_

_*२) सम्मा सति सम्यक स्मृती.*_

_*३) सम्मा समाधि - सम्यक समाधी*_

_सम्यक स्मृतीसाठी म्हणजे एकाच गोष्टीचे वारंवार ध्यान करु शकण्यासाठी सम्यक व्यायाम म्हणजे चांगल्याप्रकारे प्रयत्न केला जाणे आवश्यक आहे. दृढतापूर्वक प्रयत्न केल्याविना कोणीही आपले अस्थिर मन स्थिर करुन विचारांच्या परिघाला संकुचित करु शकत नाही. याच्याविना सम्यक समाधी म्हणजे चित्ताची सूक्ष्म एकाग्रता आणि त्याचे सम्यक संतुलन असाध्य आहे. सम्यक समाधीच्या स्थितीत चित्त सगळ्या नीवरणांपासून - काम छंद इत्यादी अडथळ्यांसारख्या विघ्नबाधांपासून मुक्त होते. परम परिशुद्ध होते आणि प्रशांत ज्योतीने आत आणि बाहेरही चमकू लागते. ह्या अवस्थेत चित्त अत्यंत शक्तीशाली आणि उज्ज्वल होते. आतील उज्ज्वल मन बाहेर प्रतिबिंबित होते. ह्या प्रतिबिंबित प्रकाशाचे प्रमाण ताऱ्यापासून सूर्यापर्यंतच्या प्रकाशाइतके असू शकते. नितांत अंधारात अंतर्चक्षुसमोर जी ज्योत प्रकट होते ती दुसरी काहीही नाही, तर ती चित्ताची परिशुद्धता, प्रशांती आणि पवित्नतेची अभिव्यक्ती आहे._

_बाहेर दिसणारी ही ज्योती आतील परिशुद्ध चित्ताचेच प्रतिबिंब आहे आणि विशुद्ध चित्तच धार्मिक जीवनाचे सार स्वरुप आहे. मग तो बुद्धानुयायी असो, हिंदू असो, ख्रिस्ती असो किंवा मुसलमान असो. मनाची पवित्रता सर्व धर्मात समानरुपाने अपेक्षित आहे. मानवा-मानवामधील पारस्परिक एक्तेसाठी प्रेमाच्या सर्वोच्च अवस्थेची नितांत आवश्यकता आहे आणि हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा मन परम पवित्रता आणि इंद्रियातीत परिशद्धीने परिपूर्ण होईल. इतरांच्या असंतुलित मनाला संतुलित करण्यासाठी प्रथम आपले मन संतुलित असले पाहिजे. भगवानांनी सांगितले आहे._

*_"फन्दनं चपलं चित्तं, दुरक्खं दुन्निवारयं ।_*

*_उजुं करोति मेधावि, उसुकारोव तेजनं ॥"_*

*_ह्या चंचल, चपल, सांभाळण्यास अवघड आणि नियंत्रणात ठेवण्यास कठीण असणाऱ्या चित्ताला प्रज्ञावंत व्यक्ती त्या प्रकारे सरळ करते जसा बाण बनविणारा बाणाला._*

_शारीरिक अभ्यासाप्रमाणेच मानसिक अभ्यासाची सुद्धा आवश्यकता आहे. या! मग कां न अभ्यासाद्वारे, साधने द्वारे मनाला दृढ आणि पवित्र करु नये की ज्यामुळे आंतरिक ध्यानिक शांतीचा आनंद प्राप्त करु शकू._

*_जशी जशी आंतरिक शांती मनात सामावली जाईल तसा तसा सत्याचा साक्षात्कार जवळ जवळ येत जाईल._*

_आपल्याला वाटले तर माना किंवा मानू नका परंतु आमचा अनुभव असे सांगतो की जर सद्गुरूंचा संयोग झाला तर प्रत्येक व्यक्ती आंतरिक शांती आणि ज्योतिसोबत चित्तविशुद्धी प्राप्त करु शकते. भलेही ती कोणत्याही धर्म सिद्धांताला मानणारी असो. परंतु, हो, उद्योग खऱ्या मनापासून आवश्यक आहे आणि साधना शिकण्याच्या काळापर्यंत गुरुप्रती संपूर्ण आत्म समर्पणसुद्धा आवश्यक आहे._

_निरंतर अभ्यासाद्वारे साधक आपल्या मनावर पूर्ण अधिकार प्राप्त करुन निर्विकल्प ध्यानिक स्थिती (अर्पणा समाधी) त प्रवेश करु शकतो. तो हळूहळू सर्व ध्यान समापत्ति प्राप्त करुन विभिन्न सिद्धी अधिकृत करतो, जसे की महाराज शुद्धोदनांचे गुरु ऋषि कालदेवलने केल्या होत्या. परंतू ही साधना संन्यासावस्थेमध्ये, गृहस्थांपासून दूर राहून कठोर तपश्चर्येद्वारेच शक्य आहे. जो पर्यंत मनात लेशमात्र वासना आहे तो पर्यंत हा मार्ग स्वीकारणे सुरक्षित नाही. *परंतु अशा लौकिक चमत्कारिक सिद्धीदानी साधनेला भगवानांनी केव्हाही प्रोत्साहन दिले नाही. त्यांच्या मार्गात समाधीच्या साधनेचा उद्देश्य आहे चित्ताची परम विशुद्धी आणि मानसिक शक्तींची उपलब्धी ज्यांच्या बळावर परमार्थ सत्या (निर्वाण) चा साक्षात्कार करता येईल.*_

_*आमच्या येथे बुद्धांच्या उपदेशात समाधी भावनेच्या चाळीस पद्धती आहेत, ज्यामध्ये आनापान पद्धतीच प्रमुख आहे, आनापान म्हणजे स्वाभाविक आश्वास-प्रश्वासावर ध्यान लावणे. सर्व बुद्धांनी स्वतः सुद्धा यालाच स्वीकारले होते.*_

*_(इ) प्रज्ञा स्कंधः_*

_आर्य अष्टांगिक मार्गाचा हा तीसरा स्कंध आहे. याला प्रज्ञा स्कंध म्हणतात. प्रज्ञा स्कंधाचे दोन विभाग आहेत._

*_१) सम्मा संङ्कप्पो - सम्यक संकल्प_*

*_२) सम्मा दिद्वि- सम्यक दृष्टी_*

_परमार्थ सत्याप्रती सम्यक दृष्टी प्राप्त करणेच बुद्धांच्या उपदेशांचे अंतिम लक्ष्य आहे आणि सम्यक संकल्पाद्वारे बाह्य आणि आंतरिक जड आणि चेतन यांचा यथार्थ विश्लेषणात्मक अभ्यास करुनच परमार्थ सत्याचा साक्षात्कार करता येतो._

_नाम आणि रुप म्हणजे चेतन आणि जड यांच्या संदर्भात आपण खूप वेळा ऐकले असेलच. मी ह्या संबंधी थोडेसे आणखी स्पष्टीकरण करुन देऊ इच्छितो. *नाम म्हणतात मनाला कारण की हे इंद्रिय विषयांकडे नमन करते नमति इतिनामे। रुप म्हणतात् पदार्थाला कारण हे निरंतर परिवर्तनशील असल्यामुळे क्षणभंगूर आहे- रुप्पती ति रुपं ।*_

_नामाच्या अंतर्गत हे चार भाग आहेत:_

१. *विज्ञान-* _इंद्रियांद्वारा विषयाशी प्रथम स्पर्श होताच जे ज्ञान होते त्याला विज्ञान म्हणतात._

२. *संज्ञा-* _इंद्रियजन्य विज्ञानाच्या नंतर जे विशेष रुपाने ज्ञान होते त्याला संज्ञा म्हणतात._

३. *वेदना-* _सुख-दुःख किंवा तशाच भावाची जी अनुभूती होते त्याला वेदना म्हणतात._

४. *संस्कार-* _विषयाच्या ज्ञानानंतर मनाच्या निश्चयात्मक शक्तीला संस्कार म्हणतात._

_*वरील चार आणि भौतिक क्षेत्राचे रुप मिळून पंचस्कंध म्हणतात. भगवान बुद्धांच्या अनुसार ह्या पंचस्कंधात समस्त मानसिक आणि भौतिक दृश्य आणि अदृश्य जग सामावलेले आहे. ज्याला सामान्य जनता आपले व्यक्तित्व किंवा अहं म्हणते, तो वस्तुतः मन आणि पदार्थाचा केवळ सामुहिक प्रवाहमाल आहे.*_

_*ज्या साधकाने सम्यक समाधीच्या अभ्यासाद्वारा मनाला एकाग्र करुन शक्तीशाली केलेले आहे तोच सम्यक संकल्पाद्वारा तीक्ष्ण अंतर्दृष्टीच्या मदतीने आत्मनिरिक्षण करु शकतो. असा साधक आंतरिक ध्यानाद्वारा प्रकृतीचा विश्लेषणात्मक अभ्यास करतो. प्रथम रुप (पदार्थ) चा आणि नंतर नाम (चित्त) चा. तो कलापांचा आपल्या वास्तविक स्वरुपात अनुभव करतो आणि केव्हा केव्हा त्यांना प्रत्यक्ष पाहातो सुद्धा. त्याला हा स्पष्ट अनुभव होऊ लागतो की नाम आणि रुप दोन्हीही अनित्य आहेत, सतत परिवर्तनशील आहेत, प्रवाहशील आहेत. जशी जशी त्याची एकाग्रता वाढत जाते तशी तशी आपल्या आंतरिक शक्ती त्याला आधिकाधिक स्पष्ट होतात. तो निश्चित रुपाने जाणतो की हा पंचस्कंध कार्य कारणांच्या नियमांनी बांधलेले केवळ दुःख आहे. आता त्याला कोणता संशय राहात नाही की आत आणि बाहेर सर्वत्र दुःखच दुःख आहे आणि अहं नावाची कोणतीही वस्तू नाही. तो ह्या दुःखमय स्थितीपासून मुक्ती प्राप्त करण्यासाठी तडफडू लागतो. तो हळूहळू दुःख निरोधाकडे जाऊ लागतो आणि दुःखाच्या बंधनातून विमुक्त होऊन, लौकिकपासून लोकोत्तर स्तराकडे येतो आणि स्रोतापन्न अवस्थेत स्थित होतो.*_

_स्रोतापन्न अवस्था ही आर्यांच्या चार पायऱ्यापैकी पहिली आहे. ही अवस्था प्राप्त होताच साधक_ 

१. सत्काय दृष्टी (आत्मबुद्धी), 

२. विचिकित्सा (संशय) आणि 

३. शीलव्रत परामर्श (कर्मकांडाप्रती मोह) च्या बंधनांपासून मुक्त होतो. 

_आर्यांची दुसरी अवस्था सकदागामीची आहे, ही अवस्था प्राप्त करुन साधक काम आसक्ती आणि व्यापाद (द्वेष)ला क्षीणप्राय करतो._

_तिसरी अवस्था अनागामीची आहे, ही अवस्था प्राप्त करुन साधक काम आसक्ती आणि व्यापाद (द्वेष) संपूर्णपणे नष्ट करतो._

_*अंतिम अवस्था अरहंत आहे.* ती अवस्था प्राप्त करुन साधक सगळ्या दुःखांपासून मुक्त होतो. चारही आर्य अवस्थेत निर्वाण रसाचे आस्वादन केले जाऊ शकते. कोणताही साधक पाहिजे तेवढ्या वेळा स्रोतापन्न इत्यादींच्या फळ समापत्तिला प्राप्त करून निर्वाणिक शांतीचा अनुभव करु शकतो._

_ज्या "आंतरिक शांतीला" निर्वाण म्हणतात त्याची कोणती तुलना नाही. ती अनुपम आहे, लोकोत्तर आहे. ज्या ध्यानिक शांती आणि सुखाचा उल्लेख मी समाधी स्कंधात केला होता तो याच्या तुलनेत अत्यंत नगण्य आहे. निर्वाणाची शांती लोकोत्तर आहे. ती आम्हाला ३१ लोकांच्या पलीकडे घेऊन जाते. पण ध्यानाची शांती आम्हाला ह्या लोकीय क्षेत्रातच मर्यादित ठेवते. अधिकहून अधिक सूक्ष्मतम ब्रह्मलोकापर्यंत घेऊन जाते._

*_चित्त विशुद्धीची अशी अवस्था प्राप्त करु शकणे ज्यामुळे ज्योतिचे दर्शन होईल, जेव्हा पाहिजे तेव्हा ध्यानिक अवस्था प्राप्त करणे, निर्वाणाच्या शांतीचा अनुभव प्राप्त करु शकणे हे सर्व आपल्याला सुप्राप्य आहे. म्हणून कमीत कमी पहिल्या दोन अवस्था प्राप्त करण्याचा प्रयत्न का करु नये! ह्या दोन्हीही आपल्या धर्म सिद्धांतांच्या अनुकूल आहेत. ह्यासाठी आवश्यक मदत करण्यासाठी मी तयार आहे._*

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

*_लेखक :- सयाजी ऊ बा खिन_*

_बुद्धवर्ष २५६२, वैशाख पौर्णिमा, ३० एप्रिल, २०१८ वर्ष २, अंक १_

*_संकलन :- महेश कांबळे_*

*_दिनांक :-_* १७/०३/२०२५

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

Friday, 14 March 2025

काय आहे बुद्धांची शिकवण - भाग २

 ✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

*_बुद्ध शिकवण काय आहे?_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2025/03/2540.html

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

*_बुद्धत्वाची प्राप्ती_*

_आजपासून २५४० वर्षांपूर्वी वैशाख पौर्णिमेची रात्र होती. तपस्वी राजकुमार आधु‌निक बोधगयेच्या जवळ उरुवेला अरण्यात नेरंजरा नदीच्या काठी पोहचला आणि तिथे बोधी वृक्षाखाली मांडी घालून बसला. त्याने असा दृढ निश्चय केला की जोपर्यंत तो परमार्थ सत्य व सम्यक संबोधी प्राप्त करणार नाही तोपर्यंत त्याच आसनात अचल बसून राहील, भले या प्रयत्नात त्याला आपले प्राण सुद्धा का न गमवावे लागोत._

_सत्याच्या शोधासाठी एकाग्र चित्त होणे आवश्यक आहे. मनाला एकाग्र करण्यासाठी तपस्वी राजकुमार प्रयत्न करु लागला. शुभ समय समीप येऊ लागला. तपस्व्याने आपल्या समस्त मानसिक शक्तींना संग्रहित केले. त्याने पाहिले साधारणपणे सहजतेने एकाग्र होणारे चित्त आज विचलीत होत आहे. त्याने अनुभवले की उच्च श्रेणीच्या चित्तवृत्तींबरोबर निम्न श्रेणीच्या चित्तवृत्तींचा संघर्ष होत आहे आणि चित्ताला एकाग्रता प्राप्त करण्यात वेळोवेळी बाधा येत आहेत. या विघ्नकारी शक्तींच्या बाधा इतक्या घनीभूत होत्या की आतील प्रकाशाची किरणे यांचे भेदन करु शकत नव्हती. असे संभवतः यासाठी होत होते की बुद्धत्व प्राप्तीचा हा अंतिम संग्राम होता आणि दुषित प्रवृत्तीरुपी आपल्या समस्त विरोधी शक्तींसोबत दुष्ट मार स्वयं युद्धात उतरला होता. तपस्वी हिंमत न हारता धैर्यपूर्वक सर्वं विघ्नांचा जोमाने सामना करीत राहिला. असंख्य जन्मातील संचित कुशल पुण्यांचे बळ ऐन वेळी मदतीला येणे आवश्यक होते आणि आले सुद्धा. पूर्व जन्मांमध्ये ज्या दहा पारमीतांचे महान व्रत पूर्ण केले होते, त्यांच्या साक्षीने सर्व देव-ब्रह्मांना त्याने आवाहन केले आणि वर्तमान संग्रामात विजयी होण्यासाठी त्यांच्या सहयोगाची कामना केली. असे करताच स्व-अर्जित पारमीतांच्या बरोबरीने देव-ब्रह्मांच्या परम परिशुद्ध अतींद्रिय मानसिक शक्तींच्या सहयोगाने चमत्कारी प्रभाव निर्माण केला. त्या सर्व घनीभूत दृष्ट शक्ती ज्या पहिल्यांदा अभेद्य वाटत होत्या, आता छिन्न-विछिन्न होऊ लागल्या, मानसिक नियंत्रण दृढ होऊ लागले. परिणामतः त्या सर्व बाधा नेहमीकरता निघून गेल्या. जेव्हा साऱ्या बाधा दूर झाल्या तेव्हा राजकुमाराने चित्ताची एकाग्रता अजून अधिक तीव्र केली आणि फलस्वरुप मन परम विशुद्ध, प्रशांत आणि स्थिर झाले. आता हळू-हळू आंतरिक प्रज्ञेचे चैतन्य उभरु लागले. त्या परम चैतन्याच्या अवस्थेत त्या साऱ्या प्रश्नांचे समाधान आपोआप होऊ लागले जे अजून अनुत्तरीत होते. साधकाने गंभीर अंतर्दृष्टीने आत्म निरिक्षण केले. *प्रकृतीच्या वास्तविकतेचे परिक्षण केले आणि त्याला स्पष्टपणे जाणवू लागले की त्याचे हे भरीव, ठोस वाटणारे शरीर वस्तुतः किती निस्सार आहे. हे तर केवळ असंख्य-असंख्य परमाणुंचा, कलांपाचा पुंज मात्र आहे* आणि एक-एक कलाप इतका सूक्ष्म की ग्रीष्म काळातील रथाच्या चाकांमुळे उडणाऱ्या धुळीच्या छोट्यातील छोट्या कणाचा ४६६५६ वा हिस्सा मात्र. अजून अधिक लक्ष दिल्यावर त्याने पाहिले की *या परमाणुंचा पुंज सुद्धा सतत प्रवाहमान आहे, सतत परिवर्तनशील आहे, नित्य-स्थिर नाही आहे. हिच दशा मनाची सुद्धा आहे. ते सुद्धा अत्यंत अस्थिर आहे, सतत परिवर्तनशील आहे, सतत उत्पन्नधर्मा व विनाशधर्मा आहे. मन सर्व मानसिक शक्तींचे प्रतीक आहे आणि या मानसिक शक्ती ज्या उत्पादक आहेत त्या आमच्या आतून बाहेरच्या दिशेने आणि ज्या उत्पन्न आहेत त्या बाहेरुन आतल्या दिशेने निरंतर प्रवाहमान आहेत. आणि प्रवाहाचा हा क्रम अनादी काळापासून अखंडितपणे चालत आला आहे.*_

_आता सिद्धार्थ समजला की त्याचे ज्ञानचक्षु उघडले आहेत. जेव्हा या ज्ञानचक्षुंनी त्याने आत्म निरिक्षण केले तेव्हा पाहिले की सर्व काही सारहीन आहे. तीक्ष्ण समाधीच्या अणुवीक्षणीय दृष्टीद्वारे त्याने कलापांचे पुन्हा एकदा परिक्षण केले आणि त्यांच्या अनित्य स्वभावावर लक्ष केंद्रित केले तर पाहिले की ते शून्यवत होत आहेत, त्यांचे स्वतःचे वेगळे काही अस्तित्व नाही, ते केवळ स्वभाव मात्र आहेत. केवळ 'पति' म्हणजे प्रज्ञप्ती मात्र आहेत. आणि अशा प्रकारे या प्रज्ञप्ती सत्यांचे अतिक्रमण करुन त्याने परमार्थ सत्याचा अनुभव घेतला, शक्तींच्या सत्य स्वभावाचा अनुभव घेतला._

_असे जेव्हा त्याने *आपल्या शरीराच्या आत नाम व रुप, चेतन व जड दोघांना निरंतर प्रवाहमान पाहिले तेव्हा क्रमशः दुःखाचा साक्षात्कार केला. असे होताच त्याच्या आतील अहंभाव तटुन शून्यात बदलला आणि तो दुःख निरोधाच्या स्थितीमध्ये पोहचला, तेथे आत्मभाव लेशमात्र देखील राहिला नाही; आपल्याविषयी सारी आसक्ती समाप्त झाली. आता हे स्पष्ट झाले की जड व चेतन दोन्हीही किती निस्सार आहेत, किती पोकळ आहेत. या दोघांचे संयोजन एक असा दिखावा आहे जो सतत प्रवाहमान आहे; सतत परिवर्तनशील आहे; कार्य-कारणाच्या कठोर नियमांनी नियंत्रीत आहे; प्रतीत्य-समुत्पाद, म्हणजे, कारणामुळे उत्पन्न होण्याच्या सिद्धांतावर अवलंबून आहे. हे जाणताच सत्याचा संपूर्ण साक्षात्कार झाला. बोधिसत्वामध्ये संगृहित बुद्धत्वाचे अनंत गुण जागृत झाले आणि वैशाख पौर्णिमेची ती रात्र संपण्यापूर्वी, पूर्व दिशेला सूर्य-किरणे फुटण्यापूर्वीच त्याने बुद्धत्वाचा प्रकाश प्राप्त केला. राजकुमार सिद्धार्थ खरोखरच सम्यक संबोधी प्राप्त करुन सम्यक संबद्ध बनला जागृत ! प्रकाशमान ! आणि सर्वज्ञ !! जागृत असा की त्याच्या तुलनेत बाकी सर्व जण झोपले आहेत आणि स्वप्नांमध्ये आहेत. प्रकाशमान असा की ज्याच्या तुलनेत इतर सर्व जण अंधारात भटकत आहेत आणि ठोकर खात आहेत. आणि सर्वज्ञ असा की ज्याच्या तुलनेत इतर सर्व जण केवळ अविद्येची जाणीव राखतात.*_

_बुद्धांची सर्व शिकवण त्रिपिटकात संग्रहीत आहे. त्रिपिटकात सूत्र (प्रवचन), विनय (भिक्षु जीवनाचे नियम), अभिधम्म (दर्शन) ही तीन पिटक आहेत. हे पाली भाषेत अनेक ग्रंथामध्ये संकलित केले आहे. त्रिपिटकाची विशालता या बाबीने जाणता येऊ शकते की पाली भाषेच्या कोणाही पंडिताला, या ग्रंथांचा पाठ करायला काही महिने लागू शकतात. याकरता मी आजच्या प्रवचनाला बुद्ध शिकवणुकीच्या सारतत्वांपर्यंत-मूलभूत तत्वांपर्यंतच सीमित ठेवणार आहे._

_*धर्माचा उपदेश करण्यापूर्वी भगवान सम्यक संबद्ध ४९ दिवस मौन राहिले. ते सात दिवस बोधिवृक्षाखाली आणि इतर सात-सात दिवस तेथील जवळच्या सहा अन्य ठिकाणी विमुक्ती सुखाचा-निर्वाण सुखाचा आनंद घेत राहिले आणि परमार्थ धर्माच्या सुक्ष्मतांवर चिंतन-मनन करीत राहिले. अशा प्रकारे चिंतन-मनन करतांना जेव्हा त्यांनी पट्ठान (हेतु फलवाद) च्या नियमांचे तसेच चित्त आणि चैतसिक (चित्तवृत्तीं) च्या सूक्ष्मातिसूक्ष्म पारस्परिक संबंधांचे संपूर्ण विश्लेषण केले तेव्हा त्यांच्या शरीरातून सहा रंगांची उज्वल किरणे प्रस्फुटित झाली जी हळू-हळू त्यांच्या मुखमंडळाला प्रकाशून प्रभामंडळाच्या रुपाने स्थिर झाली. भगवानांनी हे सात सप्ताह बिना भोजन करिता घालविले. या काळात भगवानांचे जीवन साधारण लोकांप्रमाणे स्थूल पार्थिव स्तरावर स्थित नसून सूक्ष्म मानसिक स्तरावर स्थित होते. सूक्ष्म लोकातील निवासी देव-ब्रम्हा इत्यादींना आपल्या पोषणासाठी स्थूल पार्थिव भोजनाची आवश्यकता नसते. त्यांचे भोजन ध्यानजन्य-प्रीती सुखच असते जे की स्वयं श्रेष्ठ पोषण तत्व आहे. भगवान बुद्ध सुद्धा सात आठवड्यांसाठी याच पोषण तत्वावर अवलंबून राहिले कारण ते स्थूल पार्थिव स्तराऐवजी सूक्ष्म मानसिक स्तरावर स्थित होते. याविषयी आम्ही जे अनुसंधान केले आहे त्यावर आम्ही पूर्णतया आश्वस्त आहोत की इतक्या उच्च मानसिक आणि बौद्धिक स्तरावर स्थित भगवान बुद्धांसाठी हे असंभव नाही.*_

_सात आठवड्यांच्या या दीर्घ काळानंतर पन्नासांव्या दिवशी पहाटे जेव्हा भगवान ध्यानातून उठले तेव्हा त्यांना भोजनाची इच्छा झाली. असे मात्र नाही की सात आठवड्यांच्या निरंतर उपवासानंतर ते खूप क्षद्धित आणि व्याकुळ झाल्यामुळे उठले होते, परंतु सूक्ष्म मानसिक अवस्थेतून स्थूल पार्थिव अवस्थेत आल्याबरोबर साधारण भूक जागणे स्वाभाविकच होते._

_याच वेळी याच देशातील (बर्मातील) दोन व्यापारी आपल्या कबिल्यासहित उरुवेला अरण्यातून जात होते. या वनातील एक देवता कोणा पूर्वजन्मामध्ये या व्यापाऱ्यांचा जवळचा नातेवाईक होता. त्याने यांना सूचित केले की भगवान सम्यक संबुद्ध नुकतेच आपल्या ध्यानातून उठले आहेत. तसेच त्यांना प्रेरित सुद्धा केले की यांनी भगवान सम्यक संबुद्धांना नमस्कार करावा, त्यांचा सत्कार करावा व या महापुण्यात भागीदार बनावे, हे दोघे तेथे पोहचले जेथे षटरंगी किरणांच्या प्रभामंडळाने सुशोभित भगवान बुद्ध बसले होते. या अपूर्व दर्शनाने दोघे व्यापारी श्रद्धा-विभोर झाले. दोघांनी भगवानांना दंडवत प्रणाम केला आणि आपल्याबरोबर आणलेले तांदळाचे मोदक आणि मध असे पक्वान्न भोजन म्हणून त्यांना अर्पण केले, *भगवान बुद्धांचे हे पहिले भोजन होते. भगवानांनी दोघांना आपले अंजलीबद्ध उपासक आणि श्रद्धाळू गृहस्थ श्रावक म्हणून स्वीकारले. जेव्हा दोघे उपासक जाण्यासाठी निघाले तेव्हा त्यांनी भगवानांकडून आठवणी दाखल काही वस्तू मागितल्या, ज्यांचा ते आपल्या दूर देशी जावून पूजेसाठी उपयोग करु शकतील. भगवानांनी त्यांना आपल्या डोक्यांवरील केसांचे आठ पुंजके दिले. आपल्याला हे जाणून आश्चर्य वाटेल की हे दोघे व्यापारी, तपस्सू आणि भल्लिक, याच रंगूनमधील होते. तेव्हा याचे नाव ओक्कलापा होते आणि आपण हा जो प्रसिद्ध श्वेडगोन स्तूप बघत आहात, याच्याच मध्ये ते आठ पवित्र केसधातू स्थापित केले गेले होते. २५४० वर्षांपूर्वी ओक्कलापाच्या राजाच्या देखरेखीखाली त्या पवित्र केसधातूंवर हा चैत्य निर्माण केला गेला होता. त्यानंतर वेळोवेळी बद्ध शिकवण मानणाऱ्या अनेक राजांनी व उपासकांनी याचे संरक्षण व संवर्धन केले.*_

_*अशा प्रकारे ओक्कलापाच्या या व्यापाऱ्यांना भगवान बुद्धांचे प्रथम उपासक होण्याचे सौभाग्य प्राप्त झाले. परंतु हे त्यांचे दुर्भाग्य सुद्धा मानले जाईल की ते केवळ श्रद्धाळ उपासक मात्र झाले. त्यांनी बुद्धांना प्राप्त झालेल्या धर्माचा किंचित देखील अनुभव केला नाही आणि असे न करता जन्म, जरा आणि मृत्यूच्या दुःखांतून मुक्ती कशी संभव आहे?* हे खरे आहे की साधनेच्या प्रारंभिक अवस्थेत श्रद्धा अनिवार्य आहे परंतु मुख्य काम तर बुद्ध शिकवणुकीचा व्यावहारिक अभ्यास आहे जो साधकाला स्वतः करावा लागतो. तेव्हा तर भगवान म्हणतात-_

*_"तुम्हेहि किच्चं आतप्पं अक्खातारो तथागता"_*

*_"कार्य सिद्धिसाठी उद्योग (तप) तर तुम्हालाच करावा लागेल, तथागत तर केवळ मार्ग-निर्देश करतात."_*

*_बुद्धांची शिकवण -_"

_*शब्दकोषानुसार तथाकथित 'धर्म' शब्दाचा जो अर्थ आहे त्या अर्थी बुद्ध शिकवणुकीला आपण धर्म म्हणू शकत नाही कारण अन्य धर्मानुसार हिच्या केंद्रस्थानी ईश्वर नाही. खरे तर हे आहे की बुद्धांचा धर्म कायिक, वाचिक आणि मानसिक शील-सदाचाराने युक्त एक दर्शन-पद्धती (तत्वज्ञान प्रणाली) मात्र आहे. हिचे अंतिम लक्ष्य आहे "मृत्यू आणि दुःखांपासून विमुक्ती."*_

_*'धर्मचक्रप्रवर्तन' नामक आपल्या पहिल्या प्रवचनात भगवानांनी ज्या चार आर्यसत्यांचा उपदेश केला होता, तेच या दर्शन-पद्धतीचे आधार स्तंभआहेत. वस्तुतः या चारांमधील पहिली तीन आर्य सत्य बुद्धांचे दर्शन (तत्वज्ञान) स्पष्ट करतात आणि चौथे आर्य सत्य उद्दिष्ट प्राप्तीचा मार्ग आहे. या चौथ्या आर्य सत्याला आर्य अष्टांगिक मार्ग म्हणतात आणि ही एक प्रकारे दर्शन आणि सदाचाराची संयुक्त संहिता आहे.* भगवानांनी आपला पहिला उपदेश त्या पंचवर्गीय भिक्षंना (पाच तपस्व्यांना) दिला जे सत्याच्या शोधात त्यांचे सहयोगी राहिले होते. यांच्यात *कौंडण्य प्रमुख होता. कौंडण्यच भगवानांचा प्रथम शिष्य ठरला ज्याने सद्धर्माचा साक्षात्कार केला आणि अर्हत्व (जीवन मुक्ती) प्राप्त केले.*_

या, आपण या चार आर्य सत्यांना समजून घेऊ या-

१. दुःख आर्य सत्य

२. दुःख समुदय आर्य सत्य

३. दुःख निरोध आर्य सत्य

४. दुःख निरोधगामिनी प्रतिपदा (मार्ग) आर्य सत्य

_*बुद्ध दर्शनाच्या मूलभूत सिद्धांतांना योग्य प्रकारे समजण्याकरता दुःख आर्य सत्यांचा साक्षात्कार नितांत आवश्यक आहे. दुःख आर्य सत्याला चांगल्याप्रकारे समजण्यासाठी भगवानांनी दोन मार्ग वापरले, पहिला मार्ग तर्क आणि विवेकाचा होता.* भगवानांनी आपल्या शिष्यांना ही जाणीव करुन दिली की जीवन एक संग्राम आहे, म्हणून दुःखमय आहे. जन्म दुःख आहे, जरा (वृद्धत्व) दुःख आहे, व्याधी दुःख आहे आणि मृत्यू दुःख आहे. इंद्रियजन्य वासनांचाच हा प्रभाव आहे की साधारणपणे मनुष्य आपल्या स्वतःला विसरुन जातो आणि हेच विसरुन जातो की या चुकीची त्याला किती मोठी किंमत चुकवावी लागते. जरा विचार करा! जन्म होण्यापूर्वी आईच्या कुशीत बाळ किती दुःखमय जीवन घालविते आणि जन्मानंतर जीवंत राहण्याकरता काही ना काही करत राहावे लागते._

_शेवटच्या श्वासापर्यंत झुंजत राहावे लागते. यावरुन आपण समजू शकता की जीवन काय आहे? जीवन दुःखच तर आहे, स्वार्थाविषयी ज्याची जितकी मोठी आसक्ती आहे तो तर तितकाच अधिक दुःखी आहे. परंतु होते असे की निबिड अंधकारात कधीतरीच आलेल्या प्रकाशाप्रमाणे जीवनात कधी-कधी थोडेसे इंद्रियसुख मिळते आणि मनुष्य त्याने आपल्या साऱ्या पीडा आणि दुःख विसरुन जातो. हाच मोह आहे जो मनुष्याला दुःख आर्य सत्यापासून दूर ठेवतो अन्यथा तो जन्म आणि मृत्यूच्या चक्रातून सुटका करण्यासाठी स्वतःच प्रयत्नशील राहिला असता, *दुसऱ्या प्रकारे भगवानांनी आपल्या शिष्यांना अनुभव करायला शिकवले की सारे मानव शरीर कलापांनी (परमाणुंनी) बनले आहे आणि प्रत्येक कलाप उत्पन्न होताच नष्ट होतो. आणि हा कलाप सुद्धा एकच घटक नसून एक समूह आहे जो खालील भौतिक जड तत्वांनी बनला आहे.*_

१. पृथ्वी-प्रसरण शक्ती 

२. आप (जल)-संयोजन शक्ती  

३. तेज (अग्नी) संतापन शक्ती 

४. वायु-संचालन शक्ती 

५. वर्ण 

६. गंध 

७. रस 

८. ओज.

_*यातील प्रथम चार शक्ती-तत्व महाभूत म्हटली जातात आणि प्रत्येक कलापात अनिवार्यपणे असतातच. दूसरी चार, पहिल्या चार तत्वांची उपांग मात्र आहेत. भौतिक जगतातील सगळ्यात छोटा कण कलापच आहे आणि हा कलापसुद्धा तेव्हाच बनतो जेव्हा वरील आठही तत्व-जी वस्तुतः गुण धर्म-स्वभाव आहेत-एक साथ एकत्रित होतात. दुसऱ्या प्रकारे असे म्हणता येईल की प्रकृतीच्या गुण-धर्म स्वभावाची विशिष्टता घेऊन या आठ तत्वांचे सहअस्तित्व एका अशा समूहाचे निर्माण करते, ज्याला 'कलाप' म्हणतात.*_

_भगवान बुद्धांच्यानुसार या कलापांमध्ये प्रतिक्षण परिवर्तन होत असते, यांचे संघटन-विघटन होत असते आणि हा क्रम कोणत्याही बाधेशिवाय निरंतर चालू असतो. हे कलाप शक्तीचे स्रोत-प्रवाह आहेत जसे वीजेच्या बल्बमध्ये प्रकाशाचा प्रवाह असतो. हे शरीर जे दिसण्यात ठोस वाटते, वस्तुतः भौतिक पदार्थाचा आणि जीवन शक्तीच्या सहअस्तित्वाचा धारा-प्रवाह मात्र आहे, वाहणे मात्र आहे._

_साधारण व्यक्तीच्यानुसार लोखंडाचा एक तुकडा सर्वथा गतिहिन आहे. परंतु वैज्ञानिक जाणतो की तो सुद्धा असंख्य विद्युत कणांनी (इलेक्ट्रॉन) बनलेला आहे जे प्रतिक्षण परिवर्तीत होत आहेत, प्रवाहित होत आहेत. जेव्हा एका निर्जीव लोखंडाच्या तुकड्याची अशी दशा आहे तर मनुष्यासारख्या प्राण्याची काय दशा असेल! मानवी शरीरात जे परिवर्तन होत आहे, ते तर अधिक तीव्र असेल._

_परंतु काय मनुष्य आपल्या आत होणाऱ्या भीषण परिवर्तनाचा-प्रकंपनांचा अनुभव करतो? सर्व काही परिवर्तनशील आणि प्रवाहमान आहे, असे जाणणारा वैज्ञानिक काय स्वतः हे अनुभव करतो की त्याचे स्वतःचे शरीर सुद्धा परिवर्तनशील व प्रवाहमान आहे-एक शक्ती-समूह आणि प्रकंपन मात्र आहे. त्या माणसाच्या मनात काय प्रतिक्रिया जागेल जो अंतर्दृष्टीद्वारे स्वतः पाहील की त्याचे शरीर केवळ कलापांचा समूह, परमाणुंचा पुंज आणि प्रकंपन मात्र आहे. जेव्हा तहान लागते तेव्हा कोणीही व्यक्ती गावातील विहिरीचे पाणी भाड्यांत घेऊन सहजपणे पिते. परंतु जर त्याची दृष्टी मायक्रोस्कोप प्रमाणे शक्तीशाली झाली आणि त्याने पाहिले की हे पाणी तर असंख्य सूक्ष्म जीवाणूंनी भरलेले आहे, तर निश्चितच असे पाणी पिताना त्याच्या मनात शंका-कुशंका येतील. याच प्रकारे *जेव्हा कोणी आपल्या आत होणाऱ्या निरंतर परिवर्तनाचा, अनित्याचा अनुभव घेते तेव्हा फळस्वरुप तिला दुःख आर्यसत्याचा साक्षात्कार होतो.* जेव्हा तिला आपल्या आत परमाणु समुहांच्या निरंतर होणाऱ्या संघर्षण, प्रकंपन आणि विकीर्णनाचा तीव्र अनुभव होतो तेव्हा तिला समजते की खरोखरच जीवन किती दुःखमय आहे-बाह्य रुपाने सुद्धा आणि आंतरिक रुपाने सुद्धा; संवृत्ती रुपाने सुद्धा आणि परमार्थ रुपाने सुद्धा._

_जेव्हा मी भगवान बुद्धांच्या वाणीनुसार म्हणतो की जीवन दुःखमय आहे तेव्हा आपल्याला असा गैरसमज होता कामा नये की हे जीवन इतके दयनीय आहे की जगण्यायोग्यच नाही आणि बुद्धांची शिकवण इतकी भीषण दुःखवादी आहे की तिच्यात सुख-शांतीपूर्वक जीवन जगण्यासाठी काही आशाच नाही, काही आश्वासनच नाही. शेवटी सुख काय आहे? *आधुनिक विज्ञानाने भौतिक क्षेत्रामध्ये जी प्रगती केली आहे, काय त्यामुळे जगातील लोक सुखी आहेत? हो, त्यांना भौतिक सुविधा काही प्रमाणात मिळतही असतील. परंतु काय त्यामुळे आंतरिक सुख-शांती मिळत आहे? आपल्या आत ते नेहमी असा अनुभव करत आहेत की भौतिक क्षेत्रात जे काही झाले आहे, होत आहे आणि होणार आहे ते सुख-शांती देणारे नाही, असे का बरे? अशामुळे की मनुष्याने भौतिक पदार्थांवर तर प्रभूत्व स्थापित केले परंतु तो स्वतःच्या मनाला वश करु शकला नाही.*_

_बुद्धांच्या ध्यान साधनेमुळे मनाला जी शांतता मिळते, जी प्रीती (आनंद) उत्पन्न होते, त्याची तुलना तुच्छ अशा इंद्रियजन्य सुखाशी केली जावू शकत नाही. इंद्रियजन्य सुखाच्या आधी व नंतर दुःखच होते, जसे त्वचारोग्याने खाज खाजवण्यापूर्वी व नंतर होते तसे. परंतु ध्यानाच्या प्रीती सुखात, आधी व नंतर, कधीही दुःख किंवा पीडा नसते. इंद्रियाच्या क्षेत्रातून पाहताना या अतींद्रिय सुखाला पारखणे, आपल्याला अवघड ठरेल. परंतु मी जाणतो की आपण सुद्धा या सुखाचा अनुभव घेऊ शकता आणि त्यानंतरच आपण याचे योग्य तुलनात्मक मूल्यमापन करु शकाल, असे मानण्याचे कोठलेही कारण नाही की भगवान बुद्धांच्या शिकवणुकीत केवळ दुःख आणि पीडेचा भयावह अनुभवच आहे. आपण माझ्या या म्हणण्यावर विश्वास ठेवा की हा मार्ग आपल्याला जीवनातील साधारण दुःखांपासून मुक्ती देणारा ठरेल. यामुळे आपले जीवन निर्मल सरोवरात उमललेल्या कमळाप्रमाणे होईल, ज्यावर चहूकडील तटावर पसरलेल्या भयानक आगीचा काही परिणाम होत नाही. या मार्गामुळे आपल्याला अभूतपूर्व आंतरिक शांतता मिळेल आणि स्वतःला असा संतोष होऊ लागेल की केवळ दैनिक जीवनातील कष्टच दूर होत नसून हळूहळू परंतु निश्चितपणे आपण जन्म, जरा आणि मृत्यूच्या तावडीतून सुद्धा मुक्त होत आहात._

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

*_लेखक :- सयाजी ऊ बा खिन_*

_बुद्धवर्ष २५६१, चैत्र पौर्णिमा, ३१ मार्च, २०१८ वर्ष १ अंक ९३_

*_संकलन :- महेश कांबळे_*

*_दिनांक :-_* १४/०३/२०२५

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...