🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*_कुलाबा जिल्हा बहिष्कृत परिषद_*
*_अधिवेशन पहिलें_*
_*महाड - मि. प्रा. ना. मंडळाचे नाटकगृह*_
_मुक्काम महाड_
https://mikamblemahesh.blogspot.com/2025/03/blog-post_19.html
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
_सदरहू परिषदेची बैठक मुक्काम महाड येथे *शनिवार ता. १९ व रविवार ता. २० रोजी भरली होती.* परिषदेत एकंदरीत ३००० वर अस्पृश्य लोकांचा जमाव जमला होता. परिषद एका थिएटरांत भरविण्यांत आली होती. परिषदेस पुष्कळ मंडळी गेली होती. त्यांत *मेसर्स गं. नि. सहस्रबुद्धे, अनंत विनायक चित्रे, सिताराम नामदेव शिवतरकर, बाळाराम आंबेडकर, पांडुरंग नथुराम राजभोज, शांताराम अनाजी उपशाम, मोरे, रामचंद्र शिंदे, मोरे, धोंडीराम नारायण गायकवाड, शिवराम गोपाळ जाधव वगैरे बहिष्कृत वर्गापैकी मंडळी हजर होती.* परिषदेच्या कामास ता. १९ रोजी संध्याकाळी ५ वाजून गेल्यावर सुरवात झाली. *आरंभी परिषदेचे स्वागताध्यक्ष संभाजी तुकाराम गायकवाड यांनी आलेल्या मंडळीचे स्वागत करून परिषद भरविण्याचा हेतु थोडक्यांत सांगितला.* नंतर नियमाप्रमाणें सूचना व अनुमोदन मिळाल्यावर *परिषदेचे नियोजित अध्यक्ष डॉ. भीमराव रामजी आंबेडकर, एम. ए., पी. एच. डी., डी. एस. सी., बार-अॅट-लॉ, हे स्थानापन्न झाले.*
_*परिषदेचे ठराव*_
_*गट १ ला*_
_ठराव १ ला_
_बहिष्कृत वर्गांनी चालविलेल्या आत्मोद्वाराच्या चळवळीमुळे वरिष्ठ वर्ग व बहिष्कृत वर्ग याच्यामध्ये परस्परांत तेढ उत्पन्न होऊ नये अशी वरिष्ठ वर्गातील हिंदूची इच्छा असल्यास ही परिषद त्यांना पुढील सूचना करीत आहे._
(अ) बहिष्कृत वर्गातील लोक सार्वजनिक स्थळे ४ व पाणवठे यांचा उपयोग करून आपले नागरिकत्वाचे हक्क बजावण्याचा प्रयत्न करीत असतांना वरिष्ठ वर्गातील लोक त्यांच्याशी सर्व प्रकारचे व्यवहार बंद करून त्यांच्याविरुद्ध हरताळ जाहीर करतात. तसे न करितां अशावेळी वरिष्ठ वर्गातील लोकांनी बहिष्कृत लोकांना सक्रिय सहाय्य करावे.
(ब) वरिष्ठ वर्गातील लोकांनी बहिष्कृतांस घरगुती नोकर म्हणून नोकरीस ठेवावे.
(क) *जातीभेद मोडण्याचा उपाय म्हणून मिश्र विवाह पद्धतीचा प्रघात सुरू करावा.*
(ड) बहिष्कृत वर्गातील गरीब विद्यार्थ्यांचे आपले घरी वार लावून किंवा त्यांच्या भोजनाची तरतूद करून त्यांना मदत करावी.
(इ) मेलेली जनावरे ओढून टाकण्याचे बाबतीत बहिष्कृत लोकांवर अवलंबून न राहता आपली आपन व्यवस्था करावी.
*_गट २ रा_*
ठराव १ ला. *मागील कायदेकौन्सिलामध्ये श्री. सी. के. बोले यांनी सार्वजनिक विहिरी, व तलावासंबंधानेही ठराव आणला आहे त्याची सरकारने अंमल बजावणी करुन त्या ठिकाणी पाटया लावण्याची व्यवस्था करावी. आणि जरूर तर क्रि प्रो. कोड सेक्शन १४४ अंमलात आणून स्थानिक पुढार्यांचे जामीन घेऊन अस्पृश्यांना सदरील हक्क उपभोगण्यास मदत करावी.*
*ठराव २ रा.* ही सभा सरकारास अशी विनंती करीत आहे की, खेडेगांवी कित्येक ठिकाणी अस्पृश्यांची पाणी पिण्याची अत्यंत गैरसोय होते ती दूर करण्याची व्यवस्था करावी.
*ठराव ३ रा.* बहिष्कृत लोकांच्या आर्थिक उन्नतीस्तव फाॅरेस्ट जमिनी लागवडीस द्याव्या.
*ठराव ४ था.* अत्यंत मागासलेल्या बहिष्कृत वर्गाचा आर्थिक दर्जा वाढविण्याकरितां व त्यांचे दू:ख निवारण करण्याकरितां सरकारने खालील गोष्टींकडे लक्ष द्यावे
अ. अस्पृश्यवर्गातील अन्काॅलिफाईड इसमांस जेथे शक्य असेल तेथे सरकारी नोकऱ्या द्याव्या.
ब. अस्पृश्य लोकांची लष्करात भरती करावी
क. आरमारी खात्यांत अस्पृश्य उमेदवार घ्यावेत.
ड. *सेकंड इअर ट्रेन्ड मास्तरास शाळा खात्यांत सुपरवायझरच्या जागा देण्यात याव्यात.*
इ. अस्पृश्यांतील साक्षर लोकांस मुलकी पोलिस दलाच्या जागा देण्यात याव्यात.
क. अस्पृश्य लोकांची शक्य तितकी जास्त पोलिस खात्यात भरती करावी.
*ठराव ५ वा.* सरकारी कामानिमित्त रयतेकडून बलुते देण्याची पद्धत बंद करून त्याच्याऐवजी गावकरी लोकावर सी. पी. वगैरे प्रांतात ज्याप्रमाणे मेस बसविण्यात आला आहे. त्याप्रमाणे येथे हि सेस बसवून त्यांतून कामगारांस मासिक पगार देण्याची पद्धत अमलात आणावी.
*ठराव ६ वा.* बहिष्कृत वर्गाची मृतमांस खाण्याची चाल सरकारने कायद्याने बंद करावी. कारण तीमुळे आरोग्यास धोका पोचून बहिष्कृतांचा दर्जा अत्यंत हीनपणाचा ठरतो.
*ठराव ७ वा* शिक्षण व दारुबंदी या बाबतीत सक्ती करण्यांत यावी.
*ठराव ८ वा.* श्रीयुत एम. के. जाधव यांस डेप्युटी कलेक्टरची जागा न दिल्याबद्दल या सभेस अत्यंत दिलगिरी वाटते.
*ठराव ९ वा.* १११ व्या पलटणीमध्ये पूर्वी उभारलेल्या फंडांत महाड तालुक्यांतील नोकरीत असलेल्या गृहस्थांची रक्कम आहे. त्यांतून या तालुक्यांतील अस्पृश्य वर्गाच्या मुलांसाठी एक बोर्डींग काढण्यांत यावे.
*ठराव १० वा.* शिक्षणाच्या बाबतीत अधोगतीस गेलेल्या बहिष्कृत समाजाच्या उन्नतीप्रित्यर्थ खालील गोष्टी अंमलांत आणव्या.
अ. शिक्षणाची प्रगति कशी होईल याची चौकशी करण्याकरितां एक कमिटी नेमण्यांत यावी.
ब. जिल्हानिहाय बोर्डींगे उघडावी.
क. खाजगी संस्थांनी चालविलेल्या बोडींगास मुलापाठी प्रत्येकी दरमहा रु. १० ग्रँट द्यावी.
ड. *३० मुले असलेल्या गावी शाळा उघडावी.*
इ. शिष्यवृत्त्या द्याव्या.
*_गट ३ रा_*
*ठराव १ ला.* ही परिषद बहिष्कृत वर्गातील पंचांना पाटलास (वरठ्यास) विनंती करते की मुलांच्या लग्नप्रसंगी ठिकठिकाणच्या पंचानी खालील गोष्टी अमलात आणाव्या
अ. *२० वर्षांच्या आतील मुलांची १५ वर्षाच्या आतील मुलींची लग्न करण्याची चाल बंद करण्यांत यावी.*
ब. *ज्या ठिकाणी शाळा असेल तेथील लोकांनी मुलामुलींस शिक्षण दिलेच पाहिजे अशी पंचांनी ताकीद द्यावी. मोडल्यास दोषास पात्र व्हावे लागेल असा नियम करावा.*
क. *पुनर्विवाह करण्यापूर्वी उभयतां वधुवरांची योग्य चौकशी केल्याशिवाय पुनर्विवाह लावु नये.*
ड. *पुनर्विवाहामध्ये सात रुपये इलोग द्यावा आणि लुगडेंचोळी, पाटल्याचाजोड, नथ व पंचांचे जेवण याशिवाय पंचांचा कर नसावा.*
*ठराव २ रा*
(अ) अस्पृश्य लोकांनी महारकी वगैरे सारखे हलके धंदे करण्याचे सोडून शेती वगैरे सारखे स्वतंत्र धंदे करण्याची पद्धत जोराने अमलात आणावी.
(ब) *_शेतीस जरुर असलेल्या सहकारी पतपेढ्या काढण्यात याव्यात._*
(क) दुष्काळ, अत्तिवृष्टीस तोंड देण्यासाठी व त्याचप्रमाणे सावकाराचे मगर मिठीतून सुटण्यासाठी "सहकारी गल्ले " स्थापन करावेत अशी या सभेची बहिष्कृत वर्गास आग्रहाची विनंती आहे.
*_गट ४ था_*
*ठराव १ ला.* स्वामी श्रद्धानंदजींच्या अमानुष खुनाबद्दल या सभेस अत्यंत दुःख होत आहे. व त्यांनी आखून दिल्याप्रमाणें हिंदू जातीने अस्पृश्यतेचें समूळ उच्चाटन करावें.
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*_संदर्भ : बहिष्कृत भारत अंक_*
*_रविवार ता ०३ एप्रिल सन १९२७_*
*_संकलन : महेश कांबळे_*
*_दिनांक : १९/०३/२०२५_*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
No comments:
Post a Comment