Saturday, 30 November 2024

बुद्धविचारांचा विस्तार - शाखेय आणि भौगोलिक

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_बुद्धविचारांचा विस्तार - शाखेय आणि भौगोलिक_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2024/11/blog-post_30.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

_*पालि ग्रंथातून कळते कि भ. बुद्धांच्या हयातीतच धम्माचा प्रसार पश्चिम आणि दक्षिण पश्चिम भागात झाला. बुद्धांचे एक प्रमुख शिष्य, आचार्य महाकच्चायान हे अवन्ती प्रदेशातील होते. त्यांनी बुद्धांची परवानगी घेऊन अवंतीप्रदेशात धम्माचा प्रसार सुरु केला. त्यावेळेस अपरान्त प्रदेशातील सोणकुतीकन्न या तरुणाला धम्माची दीक्षा दिल्याचा उल्लेख "आगमग्रंथात" वाचायला मिळतो.*_

_बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर भन्ते आनंद यांनी धम्माचा प्रसार अतिशय जोमाने सुरु केला. *त्यांचा शिष्य, भन्ते सनकवासी हे पश्चिम दिशेला तर भन्ते सब्बकामीं हे पूर्वेला प्रचारार्थ गेले. अर्हत रेवत यांनी देखील पश्चिम दिशेला अतिशय प्रभावीपणे धम्माचा प्रसार केला.* याच दरम्यान काही भिक्खुंनी तक्रार केली कि वैशाली येथील भिक्खू संघ विनयाच्या विरुद्ध आचरण करतो. त्यावेळेस काही जेष्ठ आचार्यांनी यावर चर्चा करण्यासाठी दुसऱ्या संगितीचे आयोजन केले. या वेळेस भिक्खू संघात,  विनय आणि बुद्धविचार यांतील काही मुद्द्यांवर फूट पडली. या संगितीच्या वेळेस मोठ्या प्रमाणात काही भिक्खुंनी स्थविरांचे म्हणणे अमान्य केले व स्वतःची "महासांघिक" शाखा सुरु केली. उरलेले जेष्ठ स्थविर आचार्यांच्या शाखेला "स्थविरवादी" संबोधण्यात आले. *मगध राज्यात सुरु झालेला महासांघिक विचार पुढे मथुरा, वाराणसी, अमरावती आणि नागार्जुनकोंडा येथे पोहचला.*_ 

_सम्राट अशोकांच्या काळापर्यंत संघामध्ये विनयाने वागणारे खूप कमी राहिले आणि लोकांच्या सद्भावनेचा, त्यांनी दिलेल्या दानाचा, अनेक भिक्खू गैरफायदा घेऊ लागले. त्यावेळेस उपगुप्त आणि मोगलीपुत्ततिस्स हे दोन अर्हत आचार्य होते. जेव्हा सम्राट अशोक यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला तेव्हा आचार्य उपगुप्त यांनी सम्राटांना, भ. बुद्धांच्या आयुष्याशी निगडित सर्व स्थळे स्वतः फिरवून दाखविली. त्या त्या ठिकाणी सम्राटांनी स्तूप अथवा स्तंभ उभारले. पुढे संघाला विनयचे अनुशासन व्यवस्थित लागावे म्हणून आचार्य मोगलीपुत्ततिस्स यांनी सम्राटांच्या मदतीने तिसरी धम्मसंगीती भरविली व विनयाचे पालन न करणाऱ्या साठ हजार भिक्खूना संघातून निष्कासित केले. आचार्य मोगलीपुत्ततिस्स यांच्या सांगण्यावरूनच धम्मप्रसार करण्याकरिता, अशोकांनी वेगवेगळ्या प्रांतात भिक्खूंना पाठवले._ 

_सम्राट अशोकांच्या परिनिर्वाणानंतर संघ एकसंध नाही राहू शकला. बुद्धांच्या अनेक तत्वज्ञानिक विचारांपैकी काहींनी एकाच तत्वज्ञानाचा आग्रह धरला तर काहींनी दुसरा एखादा विचार प्रमाण मानला._

👉 *याच काळात स्थविरवादी संघातून फारकत घेत "सर्वास्तिवादी" ही एक शाखा सुरु झाली. हे अभिधम्मला मानणारे होते. इ.स. ७व्या शतकापर्यंत यांचं अस्तित्व होते. या शाखेचा प्रसार काश्मीर पासून अफगाणिस्तान, चीन, मंगोलिया पर्यंत झाला होता. या शाखेने कनिष्काच्या काळात, अभिधम्मावर आधारित "महाविभाषासूत्र" नावाचा महाग्रंथ लिहिला.*

👉 *मात्र पुढे या संघातील काही भिक्खुंनी केवळ हाच ग्रंथ प्रमाण मानून, "वैभाषिक" नावाची वेगळी शाखा निर्माण केली. या शाखेने संस्कृत भाषेत "अभिधर्म" ग्रंथ लिहिला. हेतुप्रत्यय हा सिद्धांत महत्त्वाचा मानणाऱ्या या शाखेला "हेतूवादी" असेही नाव पडले होते.* 

👉 *सर्वास्तिवादी मधून "मुलसर्वास्तिवादी" ही शाखा सुरु झाली; मात्र ते कोणत्या कारणासाठी विभक्त झाले यावर संशोधकांच्यात एकमत नाही. मात्र हा संघ इंडोनेशिया मध्ये प्रमुख होता असे दिसते. स्वतःचा 'विनय' लिहिणारा हा संघ होता.* 

👉 *सर्वास्तिवादी मधून केवळ बुद्धसूत्रांना मानणारे काही भिक्खू बाहेर पडून "सौत्रांतिक" ही शाखा सुरु केली. या शाखेची सुरुवात आचार्य कुमारलत यांनी केली ज्यांनी "कल्पनामंडीटिका" नावाचा ग्रंथ लिहिला. प्रसिद्ध तत्वज्ञानी साहित्यिक वसुबंधू आणि प्रमाणवादाचे जनक दिग्नाग आणि धर्मकीर्ती याच विचारातून तयार झाले होते.*

👉 *कालांतराने, *सर्वास्तिवादी मधून आचार्य वत्सीपुत्र यांनी "वत्सीयपुत्र" शाखा निर्माण केली जिला राजा हर्षवर्धनच्या काळात खूप प्रोत्साहन मिळाले. पुद्गल म्हणजेच मनुष्य आणि त्याचे सत्व हेच सत्य असून, कम्म, जन्ममृत्यू आणि निब्बाण हे त्याच्याशी निगडित आहे असे ही शाखा मानत.* 

👉 *तिसऱ्या धम्मसंगितीच्या वेळी, सर्वास्तिवादी आणि पुद्गलवादी विचार सोडून एक नवीन विचार "विभाज्यवादी" स्थापन झाला. त्यांच्या मते प्रत्येक उद्भवणाऱ्या धम्मस्कंदाचे विश्लेषण करणे गरजेचे आहे. हा संघ गांधार, काश्मीर, श्रीलंका आणि आंध्र प्रदेशात प्रामुख्याने विस्तारला होता.*

👉 *विभाज्यवादी मधून "महिषासक" ही नवीन शाखा तयार झाली. यांच्या मते जी घटना वर्तमानात आहे फक्त तिचेच अस्तित्व असते. भूतकाळ किंवा भविष्यकाळातील घटना ग्राह्य धरू नये. श्रीलंकेमध्ये देखील त्यांनी विस्तार केला होता आणि त्यांचे स्वतःचे विनय देखील होते. स्त्रियांना दीक्षा देणे किंवा त्या अर्हत होणे हे महिषासकांना मान्य नव्हते.* 

👉 *महिषासक मधून "धर्मगुप्तका" शाखा तयार झाली. त्यांच्या मते श्रावक आणि बोधिसत्त्व या दोन्ही वेगवेगळ्या संकल्पना आहेत. खोतान प्रदेशात धर्मगुप्तका सर्वात पहिल्यांदा पोहचले. "दीर्घ आगम", "सारीपुत्रअभिधर्मशास्त्र", "धर्मगुप्तका त्रिपिटक" तर भ. बुद्धांचे चरित्र असलेले "अभिनिष्क्रमणसूत्र" हे त्यांचे काही प्रमुख ग्रंथ होय. ही शाखा महायानाच्या विचारधारेशी साधर्म्य दाखवते.* 

👉 *"काश्यपीय" ही शाखा बौद्ध आचार्य कश्यप यांनी सुरु केली होती. त्यांचे मते अर्हत झालेले भिक्खू हे जर सतत जागरूक नाही राहिले तर ते पदच्युत होऊ शकतात. काही संशोधकांच्या मते गांधारी भाषेतील 'धर्मपद' काश्यपीय संघाने लिहिले आहे. ६व्या शतकानंतर बहुतेक त्यांचे महायानात विलीन झाले असावे.*

👉 *स्थविरवादी परंपरेत "थेरवादा"ची बीजे आहेत. भन्ते महिन्द यांनी श्रीलंकेत बुद्धविचारांचा प्रसार करताना तेथे पालि त्रिपिटकाचा परिचय करून दिला होता. अनुराधापुर येथील महाविहारातील भिक्खू संघ हा भारतातील स्थविरवादी भिक्खुंनी स्थापन केला होता. याच ठिकाणी पालि त्रिपिटक सर्वात पहिल्यांदा लिपिबद्ध करण्यात आले होते. येथूनच थेरवाद परंपरा पुढे लाओस, कंबोडिया, म्यानमार, थायलंडला पोहचली होती. "सारीपुत्रपरिपृच्छासूत्र", "दीपवंस", बुद्धघोषांच्या "कथावत्थु अठ्ठकथा", वसुमित्रांचे "समयभेदोपरचमचक्र" ग्रंथातून आणि तारानाथ, परमार्था आणि विनीतदेवा सारख्या बौद्ध आचार्य लेखकांच्या कृतीतून कळते कि गेल्या अडीच हजार वर्षात बुद्धविचारांच्या तीस शाखा तयार झाल्या. काळाच्या ओघात अनेक शाखा एकत्रित झाल्या तर काही लुप्त झाल्या.*

_महायानाची सुरुवात भ.बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर अंदाजे ५०० वर्षांनी झाली. त्यावेळेसची राजकीय, धार्मिक परिस्थिती ही बौद्ध धम्माला प्रतिकूल होती. थेरवाद परंपरेत विना प्रतिकार, शांतपणे धम्माचे आचरण करीत राहणे अभिप्रेत होते. अशा परिस्थिती, बुद्धविचार प्रभावीपणे लोकांसमोर मांडणे आणि त्याचा प्रचार करणे गरजेचे होते. *सर्वसामान्य लोकांना केंद्रभूत ठेवून धम्माचा प्रचार आणि प्रसार करायचा या विचाराने महायानाची सुरुवात झाली. इ.स.पूर्व पहिल्या शतकापासून हा विचार भिक्खू संघात दृढ व्हायला लागला. बौद्ध आचार्य व कवी अश्वघोष तसेच तत्वज्ञानी नागार्जुन आणि वसुबंधू यांनी महायानाची विचारधारा सर्वत्र पोहचवली.* थेरवाद परंपरेत अर्हत किंवा बुद्धत्त्वप्राप्ती या अतिशय कठीण बाबी असून भिक्खुंनी केवळ त्यासाठी प्रयत्न करीत राहणे आणि उपासकांनी त्यांना भोजनदान किंवा इतर मदत करणे ही कर्तव्य होती._

_*महायानात बोधिसत्त्वाची व्याख्या करताना "महाप्रज्ञापारमितोपदेश" या ग्रंथात नागार्जुन म्हणतात, "बोधिसत्त्व हा लोकांमध्ये जातो, त्यांची दुःख समजून घेतो, त्यावर उपाय सांगतो, लोकांना दुःखातून बाहेर काढण्यासाठी सर्व शक्तीनिशी प्रयत्न करतो; त्याला सर्व धर्माची (विचारांची) सत्यता माहित असते कारण त्याला संबोधी माहित असते आणि म्हणूनच त्याला बोधिसत्त्व म्हणतात". पुढे ते असे लिहितात,"जो बुद्धांच्या मार्गाने जात, सर्व लोकांना अज्ञानातून बाहेर काढतो, सन्मार्गाचा जीवन शिकवतो, तो बोधिसत्त्व".*_

_लोकाभिमुख असलेली महायान विचारधारा, उत्तर भारतासह काश्मीर, तिबेट, भूतान येथे स्थिरावली._

👉 *साधारणतः ६व्या शतकात, उत्तर राष्ट्रांतून शिरकाव झालेल्या "तंत्र" पद्धतीचे पडसाद भारतातील अनेक धर्मांवर किंवा पंथांवर पडले. महायानातील काही विचार घेऊन या तंत्राने "वज्रयान" शाखा विकसित केली. ध्यानसाधने बरोबरच काही तंत्र, मंत्र, जप यांच्या साह्याने बोधिसत्त्वाचा मार्गावर लवकर आरूढ होता येते अशी संकल्पना असल्यामुळे काही देशांत ही शाखा "तंत्रयान", "मंत्रयान" म्हणून लोकप्रिय झाली.*  

_नागपूर येथे बौद्धधम्म स्वीकार दिनाच्या आदल्या दिवशी, बाबासाहेब आंबेडकरांना काही पत्रकारांनी मुद्दाम विचारले कि ते कोणता बौद्धधम्म स्वीकारणार - हीनयान (थेरवाद), महायान कि आणखीन काय? त्यावेळेस बाबासाहेबांनी उत्तर दिले - कोणताच नाही. मी बुद्ध्यान स्वीकारणार. म्हणजेच जे निकष बुद्धांनी धम्मविचारांबद्दल सांगितले, त्यांनाच सत्य मानणार._

_अनेक देशांत बुद्धविचारांचा प्रसार अतिशय प्रभावीपणे झाला. बुद्धविचाराने तेथील संस्कृतीशी मैत्री केली आणि त्यांच्या काही तत्वांचा स्वीकारही केला. त्यातूनच नवीन शाखा तयार होत गेल्या. *"मनुष्याचे सर्वंकष कल्याण" हा एकमेव "धम्म" असणारा बुद्धविचार अडीच हजार वर्षांनंतर देखील लोकप्रिय आहे ते केवळ याच कारणांमुळे!*_   

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_लेखक :- अतुल मुरलीधर भोसेकर_*

                  ९५४५२७७४१०

*_संकलन :- महेश कांबळे_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

Wednesday, 27 November 2024

सर अलेक्सझांडर कन्नीन्घम

*_सर अलेक्सझांडर कन्नीन्घम_*

*_(२३ जाने. १८१४ - २८ नोव्हे.१८९३)_*

_*सर अलेक्सझांडर कन्नीन्घम यांचा जन्म २३ जानेवारी १८१४ रोजी लंडन मध्ये झाला. वयाच्या १९व्या वर्षी ते बेंगाल इंजिनियर्स मध्ये रुजू झाले आणि २८ वर्षे ब्रिटिश सैन्यात काम करत मेजर जनरल म्हणून निवृत्त झाले. १८३४ मध्ये भारतात आल्यानंतर त्यांची भेट जेम्स प्रिन्सेप बरोबर झाली जिचे रूपांतर जिवलग मैत्रीत झाले. प्रिन्सेप त्यावेळेस अनेक शिलालेखांवर काम करत होते व लिपीचा शोध घेत होता. कन्नीन्घमला देखील भारतीय इतिहासाची आवड निर्माण झाली. ब्रिटिश सैन्यातील त्यांची कामगिरी जरी वाखण्याजोगी  होती तरी इतिहासात त्यांचे नाव कोरले गेले ते त्यांच्या उत्खननातील अनेक शोधांमुळे.*_

_*वयाच्या २१व्या वर्षी, वाराणसी मध्ये सैन्यात काम करताना त्यांचे लक्ष सारनाथ येथील मातीत गाडलेल्या काही अवशेषांकडे गेले. एखादा प्राचीन महाल असावा म्हणून त्यांनी वरिष्ठांकडे उत्खननासाठी परवानगी व निधी मागितला. परवानगी मिळाली पण निधी नाही. कन्नीन्घम यांनी स्वतःचा पगार या उत्खननासाठी दिला. त्यात सापडलेला शिलालेख प्रिन्सेपने लिप्यांतरित करून हा धम्मेक स्तूप असून भ.बुद्धांनी येथे पहिले प्रवचन दिल्याचा उल्लेख असल्याचे सांगितले. १४५ फूट उंचीचा स्तूप पाहून कन्नीन्घम नतमस्तक झाले. नंतर त्यांनी सांची येथील स्तूप, त्याची चारही तोरण, अनेक शिल्पाकृती उत्खननातून बाहेर काढल्या. काही अर्हत आणि सारीपुत्त व मोग्गलान यांच्या अस्थी शोधून काढल्या. येथील सर्व स्तूप पुनर्जीवित केले. हुयान त्सांग या चिनी बौद्ध भिक्खूच्या प्रवास वर्णनातून कन्नीन्घमने अनेक बौद्ध स्थळे शोधण्याचा प्रयत्न केला. त्यांनी कुशीनारा येथील बुद्धांचे महापरिनिर्वाण स्थळ शोधून काढले व तेथील १५०० वर्षे जुनी भ.बुद्धांची महापरिनिर्वाण मुद्रेतील मूर्ती उत्खननातून शोधून काढली. १८४६ मध्ये कन्नीन्घमने त्यावेळेसच्या गव्हर्नर जनरल लॉर्ड कँनिंग यांना प्रस्ताव पाठवून भारतात पुरातत्त्व सर्वेक्षण सुरु करण्याचा आग्रह धरला. त्यांच्या प्रयत्नांना यश आले आणि १८६१ साली Archaeological Survey of India ची स्थापना करण्यात आली आणि त्याचे पहिले डायरेक्टर जनरल म्हणून सर अलेक्सझांडर कन्नीन्घम यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर त्यांनी भारतात उत्खननास खूप चालना दिली.*_

_*१८८१ मध्ये त्यांनी बोधगयेतील उत्खननास प्रारंभ केला. तेथे सम्राट अशोक यांनी बांधलेले वज्रासन व बुद्धांच्या अस्थी कन्नीन्घमने शोधून काढले. कन्नीन्घमना प्रचंड आनंद झाला. नालंदा येथील उत्खनन जरी फ्रान्सिस बुकानन यांनी केले असले तरी ही वास्तू नालंदा विश्वविद्यालय असल्याचा शोध कन्नीन्घम यांनी लावला. तक्षशिला हे सर्वात प्राचीन बौद्ध विद्यापीठ त्यांनी शोधून काढले व उत्खननास प्रारंभ केला जे पुढे वीस वर्षे चालले. कन्नीन्घम यांनी अयोध्या येथे उत्खनन केले व हे पूर्वीचे बौद्ध विहार असल्याचा दाखला दिला.* नंतरच्या काळात झालेल्या उत्खननात सापडलेल्या कसौटी स्तंभ व त्यावरची शिल्पकाम याला पुष्टी देते. कन्नीन्घम यांनी अनेक प्राचीन बौद्ध स्थळांचा शोध घेतला व ते जगासमोर आणले. त्यांनी संपूर्ण भारतात उत्खनन केले व अनेक प्राचीन वास्तूंचा शोध लावला._

_*१८८५ मध्ये अलेक्सझांडर  कन्नीन्घम Archaeological Survey of India मधून निवृत्त झाले,* मात्र त्यांनी जे आदर्श घालून दिलेत ते आजही आधुनिक पुरातत्त्व शास्त्रज्ञांना मार्गदर्शक ठरत आहेत. प्राचीन भारतातील अनेक शहरे व तेथील पुरातत्त्व त्यांनी शोधले. *त्यांनी उत्खनन केलेल्या प्रत्येक वास्तूचे त्यांनी सुंदर स्केचेस काढले तेही संपूर्ण बारीक तपशीलासहित. आजही त्यांचे स्केचेस जगभर अभ्यासले जातात. सम्राट अशोक यांचे संपूर्ण शिलालेख, स्तंभलेख कन्नीन्घमनी तंतोतंत उतरवून काढले. शिलालेख कसे लिहून घ्यावेत याचे ते मूर्तिमंत उदाहरण आहे. कन्नीन्घम यांनी अनेक ग्रंथ लिहिले मात्र त्यांनी सुरु केलेल्या Corpus inscriptionum indicarum ही ग्रंथ मालिका भारतीय इतिहास आणि पुरातत्त्वाचे मानदंड समजले जाते.*_

_त्यांचा पणतू, डॉ.रॉबिन कांनिंघम हे पुरातत्त्वतज्ञ असून ते, अलेक्झांडर कांनिंघाम यांचा वारसा चालवीत आहे._

_आज सर अलेक्सझांडर कन्नीन्घम यांचा 131वा स्मृतिदिन आहे. त्यांना मनापासून त्रिवार वंदन._

अतुल मुरलीधर भोसेकर

9545277410







Monday, 25 November 2024

भारतीय लोकशाहीची मूल्ये आणि बुद्ध विचा

*_भारतीय लोकशाहीची मूल्ये आणि बुद्ध विचार_*

(७४व्या भारतीय संविधान दिन निमित्त)

_राज्यघटनेच्या मसुदा समितीची स्थापना २९ ऑगस्ट १९४७ साली झाली व पहिली बैठक ३० ऑगस्ट रोजी पार पडली व सलग २ वर्षे, ११ महिने आणि १७ दिवसांनंतर म्हणजेच २६ नोव्हेंबर १९४९ रोजी सादर करण्यात आली. येत्या २६ नोव्हेंबरला, त्या ऐतिहासिक घटनेला, ७४ वर्षे पूर्ण होतायत. राज्यघटनेच्या preamble (प्रस्तावना) मधील सुरुवातीच्या ओळींमध्ये म्हटल्या प्रमाणे, भारत एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य म्हणून ओळखले जाणार असे म्हटले आहे._

_*लोकशाहीची व्याख्या आणि व्याप्ती स्पष्ट करताना बाबासाहेब म्हणतात,"लोकांच्या आर्थिक व सामाजिक जीवनात, जिच्याद्वारा रक्तपाताशिवाय मूलगामी क्रांतिकारक बदल घडवून आणता येतात अशी शासनाची घडण आणि पद्धती म्हणजेच लोकशाही होय". म्हणजेच या देशातील प्रत्येक व्यक्तीला राजकीय, आर्थिक आणि सामाजिक लोकशाहीच्या माध्यमातून स्वतःचा उत्कर्ष करण्याचे स्वातंत्र्य असेल. मात्र ते निक्षून सांगतात कि,"राजकीय लोकशाहीने आपण संतुष्ट राहता कामा नये कारण याचे रूपांतर सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीत झाले पाहिजे”. कारण आर्थिक आणि सामाजिक लोकशाही जर नसेल तर राजकीय लोकशाहीला अर्थ उरत नाही आणि मग तिची वाटचाल हुकूमशाही कडे सुरु होते. लोकशाही ही फक्त स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या अखंड आणि अभंग अशा त्रयींवर  टिकून आहे.*_ 

_*सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीला सर्वात मोठा अडथळा येथील जाती व्यवस्थेचा आहे हे देखील बाबासाहेब जाणून होते. कारण जातीनिष्ठ समाज, व्यक्तीला स्वउन्नतीचे शिक्षण किंवा व्यवसाय करण्याचे स्वातंत्र्य नाकारते. त्यामुळे लोकशाही रुजविण्यासाठी जातिभेदाविरुद्ध लढा देणे गरजेचे आहे. बाबासाहेबांचा लढा हा विशिष्ट जाती  विरुद्ध मर्यादित नव्हता तर तो लढा उच्चनीचभेदाला होता. 'बहिष्कृत भारतच्या १ जुलै १९२७च्या अंकात बाबासाहेब लिहितात, "ब्राम्हण लोक आमचे वैरी नसून ब्राम्हण्यग्रस्त लोक आमचे वैरी आहेत असे आम्ही मानतो". ब्राम्हण्याची व्याख्या करताना मनमाड येथील भाषणात बाबासाहेब म्हणतात,"स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यांना नकार म्हणजेच ब्राम्हण्य होय"*_

_बुद्ध विचारातील दुःख या अरिय सत्याला बाबासाहेबांनी सामाजिक दृष्ट्या शोषणाचे स्वरूप दिले आणि सदोष समाज रचना हे या शोषणाचे मूळ कारण आहे असे नमूद केले. या मानवी दुःखाचे निवारण करायचे झाल्यास, मूठभर लोकांना मिळणारा लाभ सामाजिक लोकशाहीच्या मार्गाने सर्वांना मिळावा असे त्यांना वाटे. *जात व वर्ग हे शोषणाचे दोन मार्ग असून त्यांचे उच्चाटन झाल्याशिवाय समाजात स्वातंत्र्य, समता आणि बंधुता नांदणार नाही हे ही बाबासाहेब स्पष्ट करतात.* ते पुढे म्हणतात कि लोकशाहीच्या मूल्यांनुसार धर्माची चिकित्सा करणे गरजेचे आहे. *स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या त्रयींवर आधारित धर्माची बांधणी असावी असा बाबासाहेबांचा आग्रह होता.*_

_*Annihilation of Castes मध्ये बाबासाहेब म्हणतात, "मला विचाराल तर माझा आदर्श समाज म्हणजे स्वातंत्र्य, समता आणि बंधुता वर आधारित समाज असेल". बाबासाहेब या तिन्हींवर जोर देतात त्याचे कारण म्हणजे या तिन्हीं पैकी एक जरी नसेल तरी समाजस्वास्थ्य बिघडू शकेल. याचे महत्त्वाचे कारण या त्रयींचे आपसातील संबंध. समतेशिवाय स्वातंत्र्य आणि बंधुताला अर्थ नाही, बंधुताशिवाय स्वातंत्र्य आणि समतेला अर्थ नाही तर समता आणि बंधुता शिवाय मनुष्याच्या स्वातंत्र्याला स्वार्थीपणा येतो. या तिन्हींचे सहअस्तित्व गरजेचे आहे तरच समाज सुदृढ होऊ शकेल. बुद्धांनी सांगितलेल्या मार्गात या तिन्हींचे सहअस्तित्व आहे असेही बाबासाहेब नमूद करतात.*_

_२५ नोव्हेंबर १९४९ मध्ये घटना समितीच्या शेवटच्या भाषणात बाबासाहेब म्हणाले, "लोकशाही ही प्राचीन भारताची ओळख होती. संसदीय प्रक्रिया ही बुद्धांच्या भिक्खू संघाला लागू होती”. म्हणजेच आजच्या लोकशाहीची मूल्ये ही प्राचीन बुद्ध विचारांची बीजे आहेत. लोकशाहीची मूल्ये जपली नाही तर त्या जागी हुकूमशाही राजवट येईल आणि देश पुन्हा पारतंत्र्यात जाऊ शकेल ही बाबासाहेबांची भीती होती. यासाठी लोकशाहीने प्रदान केलेले स्वातंत्र्य प्राणपणाने जपले पाहिजे असेही आवाहन ते करतात._

_*स्वातंत्र्यावर गदा दोन कारणांनी येऊ शकते: जर लोकांनी पक्षाचे हित राष्ट्रहितापेक्षा मोठे मानले तर आणि दुसरे कारण म्हणजे जर लोकांनी विभूतिपूजेला जास्त महत्त्व दिले तर. यावर बोलताना बाबासाहेब म्हणतात,"माणूस कितीही मोठा असला तरी आपले स्वातंत्र्य त्याच्या पायावर अर्पण करू नये; असे केल्याने त्याच्या हातात संपूर्ण सत्ता दिल्यासारखे होईल आणि अशी व्यक्ती लोकशाही संस्था नाश करू शकेल एवढी सामर्थ्यवान होऊ शकेल. आजची परिस्थिती पाहता बाबासाहेब किती दूरदृष्टी होते हे लक्षात येईल.*_

_लोकशाही आणि त्यायोगे प्रत्येक भारतीयाला मिळालेले स्वातंत्र्य टिकवायचे असेल तर बाबासाहेब तीन मार्ग सांगतात:_

१. *राष्ट्रहिता पेक्षा कोणालाही अथवा कोणत्याही गोष्टीला श्रेष्ठ मानू नये.*

२. *राजकारणातील विभूतिपूजा ही राष्ट्राला अधोगतीकडे नेणारी असून, हुकूमशाही राजवटीचा पाया आहे. त्यामुळे राजकारणातील विभूतिपूजा प्रत्येकाने नाकारावी.*

३. *राजकारणातील लोकशाहीचे रूपांतर सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीत जितक्या लवकर करता येईल ते केले पाहिजे.*

_याचाच अर्थ, जातिविरहित,  समतावादी, मूल्याधिष्ठित समाज व्यवस्था हे बाबासाहेबांचे स्वप्न होते. हे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी लोकशाही मूल्य आणि बुद्ध विचार ही त्यांची साधने होती. *२६ ऑक्टोबर १९५१ मध्ये जालंधर येथील दयानंद कॉलेज मध्ये व्याख्यान देताना बाबासाहेब म्हणाले, "संसदीय लोकशाही भारताला नवीन नाही. महापरिनिर्वाण सुत्तात त्याचे पुरावे आढळतात. आर्थिक, सामाजिक व राजकीय स्वातंत्र्य हे बौद्ध धम्माचे सार आहे. लोकशाहीचा प्रणेता म्हणून भ. बुद्धांची नोंद इतिहासात आहे. म्हणून माणसाला खरे स्वातंत्र्य बुद्ध विचारातच आढळेल”. मग नेमका बुद्ध विचार आपल्याला लोकशाहीची मूल्ये कशा प्रकारे सांगतो?*_

_प्रत्येक मनुष्याला, कुठल्याही जाती, धर्म अथवा पंथाचे निकष न लावता उत्कर्षापर्यंत पोहचविणे हे बुद्धविचारांचे ध्येय आहे. बुद्धांनी आपल्या संघात लोकशाहीची मूल्य पुरेपूर रुजवल्याचे दिसते. प्रत्येकाला बुद्ध विचार जाणून घेण्याचे व ते पटल्यास आचरण करण्याचा पूर्ण अधिकार होता. त्याच बरोबर ज्यांना पटले नाही त्यांना ते नाकारण्याचाही अधिकार होता. म्हणजेच बुद्धांनी कोणावरही जबरदस्ती केली नाही. प्रत्येकला निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य. बुद्धांनी स्वतःला कुठेही मुक्तिदाता अथवा मोक्षदाता म्हणून संबोधले नाही. कालाम सुत्तात बुद्ध म्हणतात कि मी म्हणतोय म्हणून ग्राह्य धरू नका, कुठे लिहिले आहे म्हणून ग्राह्य धरू नका, कोणी बळजबरी करतंय म्हणून मान्य करू नका, तर स्वतःच्या सद्सद्विवेक बुद्धीला विचारून निर्णय घ्या. म्हणजेच बुद्धांनी प्रत्येकाला विचार करण्याचे व त्यायोगे स्वतः निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिले होते. भिक्खूसंघामध्ये बुद्धांनी सर्वांना मुक्त प्रवेश दिला.“एही पस्सिको” म्हणजे या आणि पहा म्हणत त्यांनी नवागतांना संघामध्ये विना दीक्षा राहण्याची परवानगी दिली आणि योग्य वाटल्यास संघामध्ये दीक्षा घ्या हे सांगितले. एवढेच नव्हे तर समजा एखाद्या भिक्खूला संघ त्याग करायचा असेल तर त्याला ते स्वातंत्र्य होते. म्हणजेच संघात आल्यानंतरही कोणावरही जबरदस्ती नव्हती._

_बुद्धांच्या भिक्खू भिक्खुणी संघात अनेक राजपुत्र, व्यापारी, धनिक व सामान्य लोक होते, मात्र सर्वांना नियम सारखाच होता. बुद्धांची देशना ही सर्वांना समान होती व त्यात कुठेही आचार्यामुष्टि हा प्रकार नव्हता. म्हणजेच संघा मध्ये समता होती. स्त्री पुरुष, उच्च नीच, गरीब श्रीमंत, राजा प्रजा असा भेद न करता बुद्धांनी सर्वांना संघात प्रवेश दिला आणि सर्वांना एकाच पद्धतीने, उत्कर्षापर्यंत पोहचण्याची संधी दिली. संघाचे प्रत्येक आचरण समतावादी होते. भिक्खू भिक्खुणी संघात दान म्हणून आलेल्या प्रत्येक वस्तूवर संघाचा अधिकार होता. येणाऱ्या प्रत्येक अडचणींवर संघ एकत्रित येऊन काम करत होता. आजारपणात भिक्खुच एकमेकांची काळजी घेत. एवढेच नव्हे तर आजारी भिक्खूसाठी इतर भिक्खू भिक्षाटन करून त्यांच्या भोजनाची व्यवस्था करत. एखादा महत्त्वाचा निर्णय घेण्यासाठी भिक्खू भिक्खुणींची परिषद बोलावली जात व सर्व सांगोपांग चर्चा झाल्यानंतर सर्वानुमते निर्णय घेतला जात. बुद्धांच्या संघात समता आणि बंधुता रुजवली गेली होती. दुःखमुक्ती हा मानव कल्याणाचा मार्ग कळल्याने अनेक भिक्खू भिक्खुणी सर्वसामान्यांना त्या ज्ञानाचा प्रसार करीत. हे करताना भिक्खुंमध्ये सर्वसामान्यांप्रती करुणा आणि बंधुतेची भावना होती हे लक्षात घेतले पाहिजे._  

_आज धार्मिक कर्मकांडाच्या माध्यमातून आपल्या देशातील लोकांना सर्रासपणे भुलविले जाते व लोकशाहीच्या मूल्यांपासून दूर नेले जाते. हा एक महत्त्वाचा शोषणाचा मार्ग आहे._

_*अडीच हजार वर्षांपूर्वी लोकशाहीची मूल्ये राबविल्यामुळेच बाबासाहेबांनी बुद्धांना लोकशाहीचा प्रणेता म्हटले आहे. बुद्धांच्या प्रत्येक विचारात स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही तत्वे पाहायला मिळतात. यामुळेच बाबासाहेबांनी जाहीरपणे सांगितले कि राज्यघटनेचा मूळ पाया असलेली तत्वे, ही बुद्ध विचारातून घेतली आहेत.*_ 

_आज आजूबाजूला असलेल्या विघातक शक्ती हे मूलमंत्र बिघडून टाकण्याचे काम करताना दिसतात. म्हणूनच स्वातंत्र्यापासून पारतंत्र्याकडे नेणारा प्रत्येक राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि धार्मिक विचार आणि ते राबविणारे विविध माध्यमे, समतेकडून जाती, धर्म आणि उच्च नीच भेदभावाकडे नेणारा असमतेचा विचार आणि या योगे भारतीयांमध्ये बंधुता नष्ट करण्याचा प्रयत्न्न, यांचा आम्ही प्रखर विरोध केला पाहिजे तरच या देशात लोकशाहीची मूल्ये अबाधित राहतील._

*_एडमंड बर्क म्हणतो, “वाईट विचारांच्या लोकांचा विजय तेव्हाच होतो जेव्हा चांगल्या विचारांची लोके शांत बसतात”._*

_लोकशाही मूल्यांच्या संदर्भात हे बोलायचे झाल्यास लोकशाही मूल्ये पायदळी तुडवणाऱ्यांचे मनसुबे उधळून लावण्यासाठी लोकशाही मूल्ये जपणाऱ्यांनी आता एकजूट करायला पाहिजे. ही काळाची गरज नव्हे, तुमच्या आमच्या स्वातंत्र्याची परीक्षा आहे. ही स्वातंत्र्याची परीक्षा आपण सर्वजण चांगल्या मार्कांनी पास होऊ यासाठी प्रयत्न करू यात._

_भारतीय राज्यघटना स्वीकार दिन म्हणजेच "भारतीय संविधान दिवसाचे हे ७४वे वर्ष आहे. हे संविधान आणि त्यातील मूल्ये प्राणपणाने जपणे हे प्रत्येक भारतीयाचे आद्य कर्तव्य आहे!_


अतुल भोसेकर

9545277410

Wednesday, 20 November 2024

जातक - सर्वात प्राचीन नीतिकथा

 *_जातक - सर्वात प्राचीन नीतिकथा_*

_फार प्राचीन काळापासून मनुष्यासाठी कथा या नेहमीच मनोरंजनाचे साधन राहिले आहे. पिढी दर पिढी या कथांमध्ये बदल होत गेले आणि त्यांची संख्या देखील वाढत गेली. बुद्धपूर्व काळात मनोरंजन म्हणून सांगितलेल्या या कथांना, बुद्धकाळात व नंतर एक नवीन विचार लाभला आणि त्या नीतीच्या कथा म्हणून जनसामान्यात प्रसिद्ध पावल्या. _भ. बुद्धांच्या काळात या कथा, शीलसंवर्धन तसेच पारमिता यांचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या ठरल्या आणि म्हणूनच मनुष्याला त्याच्या आयुष्यातील 'स्वत्व' गवसावें यासाठी या नीतिकथा नंतर शृंखलाबद्ध पद्धतीने मांडण्यात आल्या.*_

_*पालि साहित्यात ज्या नऊ अंगाने भ. बुद्धांचे विचार मांडले गेले आहेत त्यांना 'नवांगबुद्धसासना' म्हटले गेले आहे. हे नऊ अंग म्हणजे सुत्त, गेय्य, वैय्याकरण, गाथा, उदान, इतिऊत्तक, जातक, अब्भुतधम्म आणि वेदल्ल. एका अर्थाने बुद्धविचार समजून घेण्याचे हे वेगवेगळे "जॉनर"  आहेत.*_

_जातककथा या भ.बुद्धांच्या पूर्वायुष्याशी निगडित असून, त्या जन्मी 'बोधिसत्त्व' असलेले बुद्ध, हे कधी प्राणी, कधी झाड, कधी मनुष्य अथवा कोणी असामान्य जीव म्हणून केलेले नीतिकार्य, कथेच्या स्वरूपात लोकांसमोर मांडण्यात आले आहे. *जर सगळ्या कथा वाचल्या तर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते कि कथेचा नायक असलेला बोधिसत्त्व, नीतीशी कधीही प्रतारणा करीत नाही. एवढेच नव्हे, तर वेळ पडल्यास, शीलाचे पालन करण्यासाठी स्वतःचा जीव देखील देऊ शकतो. याचाच अर्थ, या कथांमध्ये 'शीलसंवर्धन' याला परमोच्च स्थान आहे! त्यामुळे 'जातककथा' या बुद्धांच्या पूर्वायुष्याशी संबंधित आहेत असे जरी दाखवल्या असल्या तरी मूलतः त्या "रूपक कथा" आहेत.* त्याकाळी सर्वसामान्य जनतेला शीलसंवर्धन अथवा नीतिमान आयुष्याचे महत्त्व कळावे म्हणून या कथा बुद्धांच्या पूर्वायुष्याची जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे नकळतपणे लोकांच्या मनावर बिंबवले जाते कि चांगले, शीलवान, नीतिमत्तेने आयुष्य जगले तर या आयुष्यात बुद्धत्त्वापर्यंत पोहचू शकता. दुसरे असे, कि बोधिसत्त्वाने दहा पारमिता प्राप्त केल्यानंतरच तो बुद्धत्त्वापर्यंत पोहोचतो हे दर्शविण्यासाठी अनेक जन्माच्या या कथा रचण्यात आल्या आहेत. *बुद्धविचारांना अभिप्रेत असलेले कम्म सिद्धांत म्हणजे कायिक, वाचिक आणि मानसिक आचार-विचार या बोधिसत्त्वामध्ये दिसतात ज्यांचा मुळात हा हेतूच आहे कि सर्वसामान्यांनी त्यातून शिकावे आणि अशा पाचशे पेक्षा जास्त कथांमधून, हे बुद्धविचार पिढी दर पिढी, त्याकाळात पोहचल्या.*_  

_खरं तर 'बुद्धत्त्व' हे अढळ स्थान नव्हे. त्या स्थानावर पोहचल्यानंतर सतत जागरूकता महत्त्वाची आहे अन्यथा स्थानभ्रष्ट देखील होऊ शकते हे बुद्धांनी अनेकवेळा भिक्खू संघाला सांगितले आहे. सर्वसामान्य लोकांनी या कथांमधून बोध घ्यावा, आपल्या आयुष्याच्या जवळपास असलेल्या अनुभवातून शिकावे म्हणून या कथांची पार्श्वभूमी देखील वेगवेगळी आहे. तसेच काही जातक उदा. 'गूथपाणजातकं' या जातकात बोधिसत्त्वाची काहीच भूमिका दिसत नाही. या कथेत बोधिसत्त्व फक्त एक झाड म्हणून दाखविले आहे. त्या कथेतील पात्रांशी त्याचा कुठलाही संबंध येत नाही. किंवा 'अण्डभूतजातकं' ज्यात बोधिसत्त्व एक जुगारात जिंकण्यासाठी वाट्टेल त्या थराला जातो. याचाच अर्थ, *जातक कथा या मानवी भावभावनांचे दर्शन घडवत असतानाच, त्यातील नीती-अनीतीचे प्रश्न उपस्थित करून, विचार करायला लावून, मानवी मनाला उत्तर द्यायला भाग देखील पाडतात. अशा प्रकारच्या जातक आपल्याला 'काय करू नये' याची शिकवण देतात.*_

_*जातकात आपल्याला अनेक लोकप्रिय कथांचे मूळ दिसते. 'दसरथ जातकं' आणि 'जनक जातकं' मध्ये रामायणाची बीजे आहेत. 'देवधम्म जातकं' मधला संपूर्ण प्रसंग हा जसाच्या तसा महाभारताच्या काव्यात आला आहे. ग्रीक मधील काही मिथके, इसापनीती, पर्शियन लोककथा आणि त्याच्यातून निर्माण झालेल्या इंग्लंड मधील चौसर लोककथा आणि इटलीच्या बोकाशीओ लोककथा या सर्वांचा उगम, जातक कथांमधूनच झाला आहे. पंचतंत्रातील अनेक कथा जातक कथांशी साम्य दर्शवितात. जातक कथांमधला नायक हा मनुष्यांव्यतिरिक्त, झाडे, पशु किंवा पक्षी आहे, मात्र त्यांच्यातही मनुष्यांमधे आढळणारे सारे गुणदोष दिसतात. या जीवांमध्ये हे गुण दाखविण्याचे कारण म्हणजे बुद्धविचारां मध्ये असलेली 'वैश्विकता' ज्यामध्ये झाडे, पशु-पक्षी किंवा प्रत्येक जीवांप्रती असलेली करुणा आणि मेत्ता भावना होय. त्यामुळेच या सर्व जीवांचे 'मानवीयकरण' करून या कथांना लोकरंजक आणि उद्बोधक करण्यात आल्या आहेत.*_

*_आधुनिक काळातील किपलिंग, महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर यांच्या कथांमधून अथवा चित्रांमधून जातक डोकावताना दिसतात तर पाकिस्तान स्थित जगप्रसिद्ध उर्दू लेखक इंतिजार हुसेन यांच्या 'पत्ते', 'बस्ती', 'कच्छवे', 'बंदर' किंवा 'वापस' या कथा जातकांवर आधारित आहेत. अंटोनीन दोवारीक या चेक नाटककाराने 'रुसाल्का' नावाचा ऑपेरा लिहिला ज्याचे मूळ देवधम्म जातक आहे._*

_*सुत्त पिटकातील खुद्दक निकायातील 'जातक', हा ५४७ जातकांचा एक ग्रंथ आहे. यात अनेक कथांची पुनरुक्ती असल्यामुळे, एवढी संख्या दिसते. या सर्व कथांची रचना सारखीच आहे. सुरुवातीला कथेच्या प्रारंभी एक गाथा आहे जी संपूर्ण कथेचे सार सांगते नंतर दुसऱ्या भागात बुद्धांच्या काळातील एखाद्या वर्तमान घटनेशी ती जोडली जाते (पचुपन्नावत्थु). ही चर्चा भिक्खुंमध्ये सुरु असते आणि त्यामुळे बुद्ध पूर्वायुष्यातील एखाद्या घटनेशी ही कथा जोडतात (अतितावत्थु). तिसऱ्या भागात भ.बुद्ध त्या घटनेचे अन्वयार्थ लावत, पूर्वजन्मातील आणि वर्तमान जन्मातील व्यक्तिंचा संबंध सांगतात.*_

_जातक कथांचा लेखक कोण आहे किंवा किती जणांनी लिहिले हे स्पष्ट नाही, मात्र भ.बुद्धांच्या महापरिनिर्वाण पश्चात अंदाजे पाचशे वर्षामध्ये या लिहिल्या गेल्या आहेत हे निश्चित आहे. या कथांना किंबहुना त्यातील विचारांना महत्त्व प्राप्त व्हावे म्हणून ते बुद्धांनी म्हटल्याचे सांगितले गेले आहे. भौगोलिक दृष्ट्या पहिले तर या सर्व कथा कपिलवस्तू, श्रावस्ती, काशी आणि राजगृह येथे म्हटल्या गेल्या आहेत. *यातील काही निवडक पस्तीस कथा निवडून 'चारियापिटक' या नावाचा स्वतंत्र ग्रंथ त्रिपिटकात आढळतो. भारहूत, अमरावती आणि सांची येथील स्तूपाच्या कुम्पणपट्टीवर जातक कोरलेली दिसतात तर अजंठा बुद्ध लेणींत या कथांचे चित्र पाहायला मिळतात.* या वरूनच आपल्याला लक्षात येते कि जनसामान्यात जातककथा किती प्रसिद्ध होत्या. या कथांमधून प्राचीन भारतातील मनुष्य स्वभावाचे सटीक चित्रण आपल्याला पाहायला मिळते. *म्हणूनच भारत, श्रीलंका, चीन, तिबेट, नेपाळ येथील कलाकारांमध्ये या कथा अतिशय प्रिय आहेत. त्यातील कथांच्या रचनेवरून आणि त्यांचे त्रिपिटकातील संदर्भावरून जातकांच्या रचनेचा काळ अंदाजे इ.स.पूर्व तिसऱ्या शतकाचा  मानण्यात येतो. 'अवदानशतक' मध्ये वीस जातककथा आहेत.*_

_*व्ही फॉसबॉल या जर्मन अभ्यासकाने सर्वात पहिल्यांदा पालि जातकठ्ठकथांचे रोमन लिपीमध्ये लिप्यांतरण केले. सिंहलीमध्ये प्राचीन ताडपत्रांवर लिहिलेल्या जातकठ्ठकथा गोळा करून त्यांच्या भाषांतर आणि त्यानंतर छपाईसाठी त्यांनी तब्बल वीस वर्षे कष्ट घेतले. त्यांच्या संस्करणाचाच उपयोग जगभरातील अभ्यासकांना आजही होत आहे. पालि त्रिपिटक लिपिबद्ध होई पर्यंत बुद्धवचन तोंडपाठ असणाऱ्या भिक्खूंना 'भाणक' म्हणत. 'जातकभाणक' म्हणवणाऱ्या भिक्खूंना संपूर्ण जातक त्यांच्या अठ्ठकथांसह तोंडपाठ असे. कालांतराने इ.स.पूर्व पहिल्या शतकात हे सर्व लिपिबद्ध झाले.*_

_*आर्यशूर या चवथ्या शतकातील बौद्ध आचार्यांनी संस्कृत भाषेमध्ये 'जातकमाला' काव्य  लिहिले ज्यात मूळ पालितील ३४ जातक असून त्या सर्व बोधिसत्त्वाच्या पारमिते वर आधारित आहेत. १८९० साली एच केर्न यांनी सर्वात पहिल्यांदा या काव्याचे भाषांतर केले. जातककथा या सुत्त आणि विनय पिटकात देखील पाहायला मिळतात. उदा. सुखविहारी, तित्तिर, खंडवत्त जातकं. काही गाथा धम्मपद मध्ये देखील पाहायला मिळतात.* जातक अनेक निपात (भाग) मध्ये विभागले आहे. पहिल्या निपातात दीडशे गोष्टी असून प्रत्येक गोष्टीत एक गाथा आहे, दुसऱ्या निपातात शंभर गोष्टी आहेत ज्यात प्रत्येक गोष्टीत दोन गाथा आहेत, तिसऱ्या आणि चवथ्या निपातात प्रत्येकी पन्नास गोष्टी असून, त्यात तीन आणि चार गाथा अनुक्रमे आहेत तर एकविसाव्या निपातात पाच गोष्टी असून त्यात प्रत्येकी ऐंशी गाथा आहेत आणि बाविसाव्या निपातात दहा गोष्टी असून त्यांच्या गाथांची संख्या जास्त आहे._

_*जातकात मानवी स्वभावातील आसक्ती, लोभ, राग, द्वेष, मत्सर, मूर्खपणा, सत्ता तसेच करुणा, मेत्ता, दान, आदर, सत्य, अहिंसा, प्रज्ञा, अनुमोदन यांच्याबद्दल रूपके आहेत. या कथा मानवी स्वभावाच्या हुबेहूब व्यक्तिरेखन असल्यामुळे त्या केवळ वाचनीयच नाही तर उद्बोधक देखील  आहेत.* अभ्यासकांनी जातककथांना वेगवेगळा अन्वयार्थ लावला आहे. त्यात काही मते एकमेकांना पूरक  आहेत तर काही अतिशय विरोधाभासी आहेत. *जातकातील उदाहरण देऊन सांगायचे झाल्यास "किंसुकोपम जातकं" मध्ये  राज्याचा सारथी तेथील चार राजकुमारांना किंसुक या प्रसिद्ध वृक्षाला वेगवेगळ्या काळात दाखवितो. त्यामुळे प्रत्येकाला किंसुक या वृक्षाबद्दल वेगवेगळे मत तयार होते. जेव्हा ते त्याचे वर्णन करतात तेव्हा एकाला तो खोडासारखा दिसतो, तर दुसरा त्याला पालवी फुटलेली असताना पाहतो, तिसऱ्या राजकुमाराला तो वृक्ष झुपकेदार दिसतो तर चवथ्या राजकुमाराला तो डेरेदार दिसतो. प्रत्येकजण आपापल्या मतावर ठाम असतो, मात्र राजा, जो बोधिसत्त्व आहे, तो सांगतो कि वृक्ष एकच आहे मात्र प्रत्येकाने त्याला वेगवेगळ्या स्थितीत पाहिल्यामुळे वेगळा भासतो. हेच जातककथांचे गुण आणि सामर्थ्य देखील आहे.*_

_जातक कथा या उत्क्रांती, अंतर्यात्रा आणि नवीन दृष्टीकोनाची सुरुवात दर्शवितो. या गोष्टींमध्ये बोधिसत्व एखाद्या जिवासारखा जन्म घेतो किंबहुना त्याचे रूपांतर होते. या गोष्टींतून दिलेला नीतीचा संदेश मनुष्याचा 'स्वत्व' शोधण्यासाठी केलेला प्रवास हा 'आतल्या' दिशेला आहे. आधुनिक मानसशास्त्र सांगते कि पशु-प्राण्यांचे अनेक गुण-अवगुण मनुष्यात त्याच्या वेगवेगळ्या मनाच्या अवस्थेत दिसतात. जातक कथांनी पशु-पक्ष्यांमध्ये मनुष्याचे गुण दाखविले आहेत! एकाच व्यक्तीचे, अनेक वेळा, वेगवेगळ्या रूपात जन्म दाखविणे हे चराचर सृष्टीचे परस्पर संबंधाचे धोतक होय. गोष्टींमधल्या सार तत्वांची पुनरुवृत्ती म्हणूनच गरजेची आहे._ 

_*जातक सारख्या नीतिकथा या लोककथेचे माध्यम बनून लोकसमूहामध्ये प्रसारित होत राहतात. प्रत्येक कथेतील बोधिसत्वाच्या भूमिकेशी आपण जोडले जातो आणि कळत-नकळत आपण बुद्धांच्या विचारांकडे आकर्षित होतो. अडीच हजार वर्षांपूर्वी बुद्धांनी दिलेला हा नरेटिव्ह म्हणूनच आजही तितकाच सशक्त भासतो.*_  

*_अतुल मुरलीधर भोसेकर_*

*_बौद्ध संस्कृती अभ्यासक_*

९५४५२७७४१०








Friday, 15 November 2024

ध्यान - अलिखित ज्ञान

*_ध्यान - अलिखित ज्ञान_*

_बाह्य जगातून निवृत्त होत जेव्हा मन अंतर्मुख प्रवासाला सुरुवात करतं तेव्हा  खऱ्या अर्थाने  ध्यानाला सुरुवात होते. सहा वर्षांच्या खडतर तपसाधने नंतर, वैशाख पौर्णिमेच्या पूर्वरात्रीपासून सुरु झालेल्या सिद्धार्थाचा प्रवास, पौर्णिमेच्या पहिल्या प्रहरात संबोधी प्राप्त होऊन बुद्धत्त्वापर्यंत पोहोचतो. *या काळात झालेला प्रवास हे “ध्यान” आहे आणि म्हणूनच ध्यानाला बौद्ध धम्मात अनन्यसाधारण महत्त्व आहे. ध्यान हे बौद्ध धम्माचे हृदय आहे असे म्हटले जाते.* बुद्धांनी सांगितलेल्या ध्यानमार्गाचा अवलंब करून अनेक जण बुद्धत्त्वाच्या मार्गावर आरूढ झाले आणि एक 'ध्यान संप्रदाय' निर्माण झाला आहे._

_ध्यान संप्रदायाची  अशी मान्यता आहे कि प्रत्येक जीवामध्ये बुद्ध स्वभाव अथवा बुद्धत्त्वाचे गुण आहेत. हे बुद्धत्त्वाचे गुण विकसित करून बुद्धत्त्वाच्या मार्गावर चालणे हे ध्यान संप्रदायाचे उद्धिष्ट आहे. *भ.बुद्धांनी भिक्खूंना म्हणाले होते, "कुल्लुपमं खो भिक्खवे धम्मं देसिस्सामि सन्तरणठ्ठाय नो गहणठ्ठाय" म्हणजे माझ्या धम्माचा उपयोग एका नावे सारखा ही संसाररूपी नदी पार करण्यासाठी करा". म्हणजेच जसे नदी ओलांडल्यानंतर आपण नावेतून उतरून निघून जातो, नावेला डोक्यावर घेऊन जात नाही, तसेच बोधिचित्त जागृत झाल्यावर धम्माला घट्ट धरून बसू नका.* पालि त्रिपिटक साहित्यात ध्यानासंबंधी अनेक उदाहरणे सापडतात. *वक्कलि नावाचा भिक्खू बुद्धांच्या प्रति आकर्षित होता. तो नेहमी बुद्धांकडे अनिमेष नेत्रांनी पाहत त्यांच्या सारखेच चालण्याचा, बसण्याचा प्रयत्न करी. त्यावेळीस बुद्धांनी त्याला सांगितले कि रूपकायाबद्दल एवढे आकर्षण नको. तुझ्या शरीरात जी घाण आहे ती माझ्याही शरीरात आहे; त्यामुळे धम्मातत्वांवर मन एकाग्र कर, रूपकायेवर नको. पालि त्रिपिटकात अनेक उदाहरणे सापडतात जेथे बुद्धांच्या ध्यानमग्न स्थितीचे वर्णन पाहायला मिळते. बुद्धांनी सर्वात पहिले ध्यान, ते राजकुमार सिद्धार्थ असताना, जांभूळ वृक्षाखाली केले होते. नंतर त्यांनी ध्यानाद्वारे संबोधी प्राप्त केली होती. त्यांना महापरिनिर्वाण देखील ध्यानाच्या वेगवेगळ्या अनुलोम प्रतिलोम अवस्थेत प्राप्त झाले. जो धम्म बुद्धांनी सांगितला त्याचे खरे आकलन ध्यानाशिवाय होऊ शकत नाही. अनेकवेळा बुद्ध स्वतः भिक्खूंना त्यांच्या योग्यतेनुसार ध्यानाचे विषय देत व त्यावर ध्यान करायला सांगत. पालि साहित्यात त्याला 'कम्मठ्ठान' म्हटले आहे. असे चाळीस कम्मठ्ठानाचे वर्णन त्रिपिटकात सापडते. शील, समाधी आणि प्रज्ञा ही बुद्धांची मूळ शिकवण होय. यात शील म्हणजे सदाचरण, नंतर समाधी म्हणजे ध्यान आणि ध्यानाच्या अभ्यासानेच प्रज्ञा प्राप्त होते. याच त्रिसूत्रींवर आचार्य बुद्धघोष यांनी 'विसुध्दिमग्ग' हा अप्रतिम ग्रंथ लिहिला.*_

_*ध्यानाभ्यासाची सुरुवात कशी झाली याचे एक सुंदर उदाहरण बौद्ध साहित्यात सापडते. एकदा गृध्रकूट पर्वतावर एका उपासकाने बुद्धांना देशना सुरु होण्यापूर्वी एक सोनेरी रंगाचे फुल आणून दिले. भ. बुद्ध त्या फुलाकडे बराच वेळ पाहत राहिले मात्र देशना दिली नाही. आचार्य महाकाश्यप यांनी ते पहिले आणि हसून या गोष्टीचे अनुमोदन केले. बुद्धांनी ते फुल महाकाश्यपांना दिले आणि प्रवचन द्यायला सांगितले. त्यावेळेस महाकाश्यप यांनी अनित्येवर प्रवचन दिले. ध्यान तत्वाचे हे सर्वात पहिले उदाहरण देण्यात येते. पुढे भ.बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर देखील आनंदला अर्हत पद प्राप्त झाले नव्हते. त्यामुळे ते पहिल्या धम्म संगितीमध्ये भाग घेऊ शकत नव्हते. त्यावेळेस महाकाश्यपांनी आनंदाला सांगितले, "आनंद, दरवाजावरचा ध्वज खाली उतरव". साहित्य असे सांगते कि आनंदाने या गोष्टीवर ध्यान करताच ते अर्हत झाले. पूर्वी विहारांमध्ये जेव्हा धम्मप्रवचन सुरु असे त्यावेळेस इतरांना कळावे म्हणून दारावर ध्वज लावला जायचा. धम्मध्वज खाली उतरवणे म्हणजे आता धम्मप्रवचन पुरे आणि अंतर्मनाचा प्रवास म्हणजे ध्यान करणे गरजेचे आहे हा संकेत आहे. म्हणजेच जो पर्यंत ध्यानाभ्यासातून धम्माच्या तत्वांचा अभ्यास होत नाही, तोपर्यंत बुद्धांचा धम्म कळणार नाही. बौद्ध धम्मात ध्यानाला एवढे महत्त्व आहे! पालि साहित्यातील त्रिपिटक आणि थेरगाथा किंवा थेरीगाथा मध्ये अनेकवेळा ध्यानाची प्रचिती येते.*_

_ध्यानाची सुरुवात जरी भारतात झाली असली तरी त्याचा प्रसार चीन मध्ये झाला आणि जपान मध्ये तो सार्वत्रिक झाला. *६व्या शतकात बौद्ध आचार्य बोधीधर्म यांनी चीनमध्ये सर्वात पहिल्यांदा ध्यानाचा प्रसार केला. चीन मध्ये ध्यान शब्दाचे रूपांतर 'चान' मध्ये झाले आणि पुढे जपान मध्ये 'झा-झेन' झाले. यालाच नंतर “झेन” म्हणून मान्यता मिळाली. "द सूत्र ऑफ वे लेंग" या पुस्तकात चीन मधील संपूर्ण ध्यान संप्रदायाचा इतिहास समजतो. चीन मधील 'ताओ' पंथ बौद्ध धम्मातील ध्यानसंप्रदायची शाखा आहे. जपान मध्ये ध्यानाचा अभ्यास अंदाजे ८व्या शतकाच्या दरम्यान झाला. चीन मधील येई-साई नावाच्या बौद्ध भिक्खूने जपान मध्ये ११व्या शतकात ध्यानाचा प्रसार केला. ते ज्या पंथाचे होते त्याचे मुख्य प्रवर्तक रिंजई नावाचे बौद्ध आचार्य होते. त्यामुळे त्यांच्याच नावाने जपान मधील ध्यान संप्रदाय अस्तित्वात आला. येई-साई यांनी ध्यानावर आधारित "कोजन-गोकोकू-रोन" नावाचे पुस्तक लिहिले ज्याचा अर्थ होतो "ध्यान मार्गाने राष्ट्राची सुरक्षा". आजही जपानच्या सैनिकांसाठी ध्यानाभ्यास त्यांच्या प्रशिक्षणाचा आणि दैनंदिनाचा भाग असतो. जपान मध्ये सोतो, ओबाकू नावाचे ध्यान संप्रदाय अस्तित्वात आले.*_

_*ध्यानाभ्यासात गुरु-शिष्य प्रश्नोत्तराचा संवाद म्हणजे 'कोआन' तर त्याचे उत्तर म्हणजे 'सटोरी'. कोआन मध्ये आचार्य शिष्याला एक एक प्रश्नाच्या द्वारा मनाच्या व चित्ताच्या एकाग्रते जवळ नेण्याचा प्रयत्न करतात आणि शिष्याला मिळालेले अध्यात्मिक उत्तर सटोरीच्या स्वरूपात असते. उदा. भिक्खुणी पटाचारा एकदा दिव्याकडे पाहत असताना अचानक वाऱ्याचा झोत आला आणि दिवा विझला. त्याक्षणी तिला अनित्याचं बोध झाला. चिनी ध्यानी गुरु तुंग शान हे नदी पार करीत असताना त्यांचे प्रतिबिंब त्यांना पाण्यात दिसले, मात्र लाटांमुळे प्रतिबिंब तुटत होते व पुन्हा जोडले जात होते. हे पाहताच त्यांना बोध झाला. पुढे याच सटोरीचा उपयोग जपानी कवी बशो यांनी 'हायकु' च्या माध्यमातून केला. अगदी मोजक्याच शब्दांत, ध्यानाच्या मार्गाने मनाच्या तळाशी जाण्याचा हा प्रयत्न आहे. जपान मधील 'सामुराई' हे योद्धा भिक्खू  याच ध्यान संप्रदायाचे आहेत.*_

_ध्यान संप्रदाय एक परिकल्पना किंवा भावनात्मक कृती नाही. अतिशय वैज्ञानिक तथ्यांवर ती अवलंबून असून सर्व वैज्ञानिक कसोटींवर खरी उतरली आहे. ध्यानी गुरूंनी दिलेल्या उत्तरामुळे ध्यान प्रक्रिया खूप गूढ वाटते मात्र विचार केला तर ते सत्यच सांगतात हे लक्षात येते. हुई-नईंग यांना एका शिष्याने प्रश्न केला 'ध्यान म्हणजे तुम्हांला काय वाटते? गुरूंनी उत्तर दिले 'मला भूक लागली कि मी जेवतो, थकलो कि झोपतो'! ध्यान म्हणजे आपण करीत असलेली प्रत्येक गोष्ट 'साक्षीभावाने' म्हणजेच जागृत अवस्थेत करणे मात्र ती गोष्ट आपल्याला आसक्त करू नये इतकी तटस्था आपल्यात निर्माण झाली पाहिजे. प्रत्येक विचाराचे स्वत्व जाणणे म्हणजे ध्यान. हा ही एक अभ्यास आहे आणि त्यासाठी परिश्रम देखील घ्यावे लागतात._  

_*चुल्ल राहुलोवाद सुत्तात भन्ते राहुलला समजावताना भ.बुद्ध त्याला भिक्षापात्रातील पाण्याचे आणि मनाचे उदाहरण देतात. त्या गोष्टींवर ध्यान करतानाच भन्ते राहुल अर्हत झाले. थेरीगाथा मधील उत्तमा ही सतत सात दिवस ध्यान करीत बसली होती. आठव्या दिवशी तिने पाय पसरले आणि आळस देताच तिला अज्ञानांधकाराचा बोध झाला. बुद्धांच्या धम्मात जसे क्रमिक शिक्षणाला (अणुपुब्बसिक्खा) महत्त्व आहे तसेच ते क्रमिक साधनेला (अणुपुब्बकिरिया) देखील महत्त्व आहे. म्हणूनच बुद्धांनी चित्ताच्या अभ्यासाबरोबरच चित्ताची एकाग्रता देखील महत्त्वाची मानली आहे. ही एकाग्रता साधण्यासाठी प्रत्येक क्षणी चित्ता प्रति जागरूकता महत्त्वाची आहे. चित्ताची शांती म्हणजेच 'शमथ ध्यान'. या शमथ ध्यानानंतरच केलेली विपस्सना हे साधकाला अर्हत मार्गासाठी योग्य आहे.* महायान पंथाचा उदय झाल्यानंतर त्याचे उपपंथ, तंत्रयान आणि वज्रयान यांनी देखील ध्यानाच्या विविध उपाय कौशल्य सांगितली आहेत. *बंगालच्या 'बाउल' संप्रदाय, उडीसा येथील धर्म संप्रदाय, महाराष्ट्रातील नाथ संप्रदाय, अद्वैत वेदांत, नागार्जुनांचा शून्यवाद, गोरखनाथांचा सुन्न आणि कबीरांच्या अनेक दोह्यात, ध्यान वेगवेगळ्या नावाने आणि क्रियेने अस्तित्वात आहे. कबीरांच्या भाषेत सांगायचे तर बुद्धांची देशना 'लेख' आहे तर बुद्धांचे ध्यान 'अ-लेख' आहे. म्हणजेच देशना ही ऐकून वाचून कळेल पण ध्यान हे अनुभूती शिवाय कळणार नाही! ध्यानाचे महत्त्व विशद करताना बुद्ध म्हणतात - यम्हि झानं च पञा च स वे निब्बाण सन्तीके (धम्मपद). म्हणजे ज्याने ध्यानाचा लाभ घेतला आहे आणि जो प्रज्ञावान आहे तो निब्बाणाच्या जवळ आहे.*_

*_अतुल मुरलीधर भोसेकर_*

९५४५२७७४१०

Tuesday, 12 November 2024

भिक्षुणी संघाचे विनय

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

*_भिक्षुणी संघाचे विनय_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2024/11/blog-post_12.html

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

_राजगृहातील वैभारगिरीच्या सप्तपर्णी गुहेत सम्राट अजातशत्रू यांच्या आश्रयाखाली महाकास्सप यांच्या अध्यक्षतेखाली ५०० अर्हंत भिक्खुंनी प्रथम धम्म संगितीचे आयोजन केले होते. ह्या संगितीत "विनय आणि धम्म" यांचे संगायान ७ महिने सुरू होते._

_आनंद सांगतात की, “शास्ता अंतिम वेळी मला आणि तुम्हाला उद्देशूनच म्हणाले होते-_

*_"ये वो आनंद ! मयाधम्मोच विनयोच, देसितो पञ्जतो सो वो ममच्चयेन सत्था' ति ।"_*

*_"आनंद ! मी तुम्हाला ज्या धम्म आणि विनयाचा उपदेश दिला, प्रज्ञाप्रकाश केला तोच माझ्या महापरिनिर्वाणानंतर तुमचा शास्ता असेल."_* 

_महाकाश्यप इतर भिक्षुंशी चर्चा करतांना म्हणतात की, , "आवुसो ! भगवंतास आपणासाठी शिक्षाप्रज्ञप्ति (विनयपद) करण्याची आवश्यकता नव्हती. कारण आपला भिक्खू संघ स्वय स्वाभाविक, विमलतामयी स्थितीत होता. सुविसुद्ध शखलिखित बह्मचर्य भिक्खू संघात परिपूर्णतानुरूप मूर्तिमन्त होते किंवा आहे. पण काही वर्षांपूर्वी आपण पाहत आलो आहोत की, *भगवंताची अनुकपा साधून सधीसाधु, अयोग्य व्यक्तिपण प्रव्रजित होऊ लागले आणि म्हणून तथागतास संघीय नियमाची आवश्यकता भासली व त्यासाठी विनयपदाची निर्मिती झाली.*_ 

_ह्या *संगितित धम्म भंते आनंद आणि विनय भंते उपाली यांनी सांगितला होता.* त्यामधील भिक्षुंनी संघासाठी जे विनय सांगितला होता त्याची तोंडओळख आपण ह्या लेखात करणार आहोत._

_तथागतांनी भिक्खूणींसाठी ३११ विनय नियम बनवले होते._

१. पाराजिका -८

२. संघादिसेस-१७

३. निस्सग्गिय पाचित्तिय-३०

४. पाचित्तिय-१६६

५. पाटिदेसनिय-८

६. सेखिय-७५

७. अधिकरणसमथ-७

*_असे ३११ नियमांचे भिक्खूणींना पालन करावे लागत होते._*

*_१ पाराजिक_*

_हे आठ पाराजिक धर्म आहेत, अपराध आहेत, जे केल्यामुळे भिक्षुणी भिक्षुणी राहू शकत नाही. अशा भिक्षुणीला संघातून काढून देण्यात येते. ती प्रव्रजिताच्या योग्य राहत नाही. भिक्षुणी जीवनात पराजित होते._

_ते दोष आहेत -_

१. *मैथून*

२. *चोरी*

३. *मनुष्य हत्त्या*

४. *दिव्यशक्तीचा दावा करणे जी अंगी नसते*

५. *कामासक्तीचे कार्य*

६. *दोष लपविणे*

७. *संघातून काढून टाकल्यावरही त्याचे अनुगमन करणे*

८. *कामासक्तिने पुरुषाचा स्पर्श करणे.* 

_हे आठ पाराजिक दोष म्हणविले गेले आहेत. *ह्यामधून एकही केल्यास भिक्षुणी भिक्षुणीसह राहू शकत नाही. ती भिक्षुणीच्या लायकीची राहत नाही, ती झाडाचा वरचा भाग छाटल्यासारखी होते.*_

*_२ संघादिसेस (९ ते २५)_*

हे १७ दोष संघादिसेस म्हणविल्या जातात. ह्या अपराधाच्या दण्डामुळे काही काळापुरते संघापासून वेगळे-एकटे रहावे लागते.

१. *पुरुषाबरोबर फिरणे*

२. *चोरटी किंवा वांझेला भिक्षुणी बनविणे* 

३. *एकटीच कुठेही घुमो, गाव सोडून नदीवर रात्री, आपला साथीदार सोडून इत्यादी*

४. *संघातून निष्कासित भिक्षुणीबरोबर संघाच्या अनुमतीशिवाय मैत्री करणे*

५. *कामासक्तीने पुरुषाचे दान घेणे*

६. *कामासक्तीकडे जाण्याची प्रेरणा देणे*

७. *कुटीणी होणे* 

८. *उगीचच एखाद्या भिक्षुणीला पाराजिकाचा दोष लावणे* 

९. *नाराज मनाने पूर्वशत्रूता मनात ठेवून एखाद्या भिक्षुणीला पाराजिका दोषारोपण करणे*

१०. *धर्माचे प्रत्याख्यान करणे अथवा दुसऱ्या धर्माच्या श्राविकेबरोबर सहवास करणे*

११. *भिक्षुणी- भिक्षुणीत एकमेकींची निदा करणे*

१२. *निदित, बदनाम, दुराचारिणीच्या ससर्गात राहणे*

१३. *वाईट संसर्गात राहण्याची प्रेरणा देणे*

१४. *सघात फुट पाडणे*

१५. *धम्मभेद करणारी असूनही तिला धम्मभेदीनी न मानणे* 

१६. *चांगली गोष्ट न ऐकणे*

१७. *कुळांना बिघडविणे* 

_हे सतरा संघादिसेस आहेत *त्यातील नऊ प्रथम (बारहित) दोष मानले आहेत. आठ तीन वेळा म्हणून विचारल्यावर संघादिसेस दोष मान्य केल्या जातील.* ह्यातील कोणताही एक अपराध भिक्षुणी करील तर ती भिक्षुणी (भिक्षु भिक्षुणी) दोघेही पक्ष भर मानत्व करतील. *मानत्व पूर्ण झाल्यावर जिथे वीस भिक्षुणींचा भिक्षुंणी संघ असेल, त्या ठिकाणी जाऊन त्या संघात वीसला एक जरी कमी असेल आणि त्या संघाने त्या भिक्षुणीला अपराधमुक्त केले तरी ती भिक्षुणी मानल्या जाणार नाही आणि त्या संघातील सगळ्या भिक्षुणी निंदेच्या पात्र राहतील. ही ह्या दोषमुक्तीची योगक्रिया आहे.*_

*_३ निस्सग्गिय पाचित्तिय (२६ ते ५५)_*

 _तीस (३०) अपराधांना निस्सग्गिय पाचित्तिय म्हणतात. ह्या तीस अपराधांना तीन भागांत विभाजित केले आहे._ 

१. _पहिला भाग *पत्त वग्ग* आहे. ह्या वग्गात भिक्षापात्राचा संचय करणे, चीवर घेऊन पुन्हा बदलणे, चीवराला समयानुसार न वाटणे, एका वस्तुला अगोदर मागून लगेच दुसऱ्या वस्तुलापण मागणे, असे १० अपराध ह्यात येतात._

२. _दुसरा भाग *चीवर वग्ग* आहे. ह्या वग्गात हिवाळ्यातील पांघरण्याच्या वस्त्रासाठी योग्य दाम न मागता जास्त मागणे, कठीण चीवराचे सर्वांना वाटप करून पुन्हा उरलेले चीवर आपल्याजवळ ठेऊन देणे यासारखे १० अपराध ह्यात येतात._

३. _तिसरा भाग आहे *जातरूप वग्ग* ह्या वग्गात चांदी-सोनं, रुपये-पैशांचा व्यवहार करणे, क्रय-विक्रय करणे, नेहमी नेहमी भिक्षापात्र बदलत राहणे (जरी ते फुटले अथवा तुटले नसले तरीही), भैषज्य म्हणजे अर्थात रोगी भिक्षुणीच्या सेवनासाठी लागणारे पथ्य (भैषज्य म्हणजे तूप, लोणी, तेल, मधु (मध, खांड इत्यादी घेऊन) कमीत कमी एक आठवडाभर ठेवून खायला पाहिजे, पण त्यापेक्षा जास्त दिवस ठेवणे, स्वतः दुसऱ्या भिक्षुणीला चीवर देऊन नाराज होऊन ते चीवर हिसकावून घेणे, स्वतः सूत घेऊन विणकरा सुगत कडून चीवर विणून घेणे, त्याच भिक्षुणीला एखादा नवखा गृहस्थ किवा गृहिणी विणकराकडून चीवर विणून देत असेल तेव्हा ती भिक्षुणी त्या चीवराला घेण्याअगोदर विणणाऱ्या विणकराच्या घरी जाऊन चीवरात हेरफेर करायला लावणे._

_कार्तिकी, त्रैमासी, पौर्णिमा येण्यापूर्वी दहा दिवसात जर चीवर पाचाहून अधिक मिळाल्यास ते चीवर अधिक समजून घेऊन ठेवावे (चीवर कालपर्यंत) त्यापेक्षा जास्त वेळ ठेवल्यास *निस्सग्गिय पाचित्तियचा* अपराध होतो. ह्या वग्गात १० अपराध येतात._

_*संघासाठी दिलेल्या वस्तु आपणासाठीच परिवर्तित करून ठेऊन देणे सुद्धा निस्सग्गिय पाचित्तियचा अपराध होतो. हे अपराध स्वीकृती झाल्याबरोबरच त्याचे प्रायश्चित्त (पश्चात्ताप) करावे लागते. तसेच ज्या वस्तुबद्दल अपराध केलेला असतो, ती वस्तुपण त्या भिक्षुणीजवळून हिसकून घेतल्या जाते.*_

*_४ पाचित्तिय (५६ ते २२१)_*

_*हे एकुन एकशे सहाषष्ट (१६६) दोष आहे, ज्यांना 'पाचित्तिय' म्हणतात.* ह्या दोषात दोषी भिक्षुणीला प्रायश्चित्त (पश्चात्ताप) केल्यानंतर ती दोषमुक्त होऊ शकते. *एकशे सहाषष्ट (१६६) दोषाला सोळा भागात विभाजित केले आहेत. म्हणजे ते सोळा प्रकारचे आहेत.*_

१. _*ह्यात पहिला भाग 'लसूण वग्ग' आहे.* ह्या वग्गात एकपासून दहापर्यंत (१-१०) पाचित्तिय आहेत. ते सहा प्रकारचे आहेत._ 

(१) _लसूण खाणे_

(२) _कामासक्तीचे कार्य करणे_ 

(३) _भिक्षूची सेवा करणे_ 

(४) _कच्चे सुगत धान्य आणून शिजविणे_ 

(५) _लघवी आणि सण्डाससबधी-सडास कचऱ्यात किवा गवतात करणे_

(६) _नाच, गाणे, वाद्य पाहणे, ऐकणे_

२. _*दुसरा वग्ग आहे 'रत्तन्धकार वग्ग'* ह्यात १० पाचित्तिय आहेत. ते पाच प्रकारचे आहेत_ 

(१) _पुरुषाबरोबर रात्री अधारात उभे राहून बोलणे_

(२) _गृहस्थाच्या घरात जाऊन (कधीही) बसणे_ 

(३) _भिक्षुणीला दिक् करणे_

(४) _श्राप देणे (शाप)_ 

(५) _ऊर बडवून रडणे_

३. _*तिसरा 'नग्ग वग्ग' आहे ह्यात १० पावित्तिय दोष आहेत.* ते दोन प्रकारचे आहेत._ 

(१) _नग्न होऊन अंघोळ करणे_ 

(२) _चीवरासबंधी अयोग्य वेळी वापरणे_

४. _*चौथा 'तुवट्ठ वग्ग' आहे ह्यात १० पाचित्तिय दोष आहेत* ते पाच भागात वाटले आहेत_

(१) _एका खाटेवर दोघीजणी (भिक्षुणी) झोपणे_

(२) _हैराण करणे (त्रास देणे)_ 

(३) _रोगी शिष्याची सेवा न करणे_ 

(४) _उपाश्रय देऊन काढणे_

(४) _पुरुष ससर्ग करणे_ 

(५) _एकटीच कुठेही विचरण करणे_ 

५. _*पाचवा 'चित्तागार वग्ग' आहे. ह्यात १० पाचित्तिय दोष असून त्याचे सहा प्रकार आहेत.*_ 

(१) _तमाशा पाहणे_

(२) _खुर्ची किंवा पलंगाचा वापर करणे_ 

(३) _सूत कातणे_

(४) _गृहस्थासारखे काम करणे_ 

(५) _गृहस्थाला भोजन देणे_

(६) _विहारातील चीवराची बेपर्वा करणे_

६. _*सहावा 'आराम वग्ग' आहे. ह्यात १० पाचित्तिय दोष आहेत व त्याचे आठ प्रकार आहेत.*_ 

(१) _भिक्षुच्या आरामात (झोपण्याचे ठिकाण) प्रवेश करणे_ 

(२) _निंदा करणे_

(३) _जेवण करून तृप्त झाल्यावर पुन्हा जेवण करणे_

(४) _गृहस्थाचा द्वेष करणे_

(५) _भिक्षु नसेल तेथे वर्षावास करणे_ 

(६) _प्रवारणाचे नियम न पाळणे_

(७) _उपदेशाला ऐकायला किवा विचारावयास न जाणे_ 

(८) _पुरुषाकडून फोड फोडणे_

७. _*सातवा 'गाब्भिनी वग्ग' आहे ह्यात १० पाचित्तिय दोष आहेत व ते एकच प्रकारचे आहे, ज्यात भिक्षुणी कशी बनवावी ह्याबद्दल विवरण आहे, तिच्या प्रतिचे कर्तव्य न पाळणे.*_

८. _*आठवा 'कुमारिभूत वग्ग' आहे. ह्यात १३ पाचित्तिय दोष आहेत आणि ते नवक कुमारी भिक्षुणी बनविणे व तिच्या प्रतिचे कर्तव्य न पालन करणे.*_

९. _*नववा वग्ग 'छत्त वग्ग' आहे आणि त्यात १३ पाचित्तिय दोष असून ते चार प्रकारचे सांगितले आहेत.*_ 

(१) _छत्री, जोडा (जूता) आणि सवारीबद्दल आहेत_ 

(२) _आभूषण, श्रृंगार आणि नटण्या-थटण्याने आहेत_ 

(३) _भिक्षुपुढे आसनावर बसणे आणि प्रश्न विचारणे_ 

(४) _चोळी न वापरता गावात फिरणे_

१०. _*दहावा 'मुसावाद वग्ग' आहे आणि त्यात १० पाचित्तिय दोष असून ते सहा प्रकारचे सागितले आहेत.*_ 

(१) _भाषणाची अनियमता_

(२) _उपसंपन्न भिक्षुणीबरोबर एकसाथ झोपणे_

(३) _धर्मोपदेशात अनियमितता_

(४) _दिव्य शक्तिप्रदर्शन करणे_

(५) _अपराध प्रकाशन_

(६) _जमीन खणणे_

११. _*अकरावा 'भूतगाम वग्ग' हत्रात १० पाचित्तिय दोष असून ते पाच प्रकारचे आहेत.*_

(१) _वृक्ष तोडणे_

(२) _संघाच्या विचारल्यावर चूप राहणे_

(३) _निंदा व बदनामी करणे_

(४) _संघाच्या वस्तुची बेपर्वा करणे_

(५) _गाळलेले पाणी न पिणे_

१२. _*बारावा 'भोजन वग्ग' आहे ह्यात दहा पाचित्तिय दोष असून ते भोजनासंबधी आहेत.*_

१३. _*तेरावा 'चरित्त वग्ग' आहे. ह्यात १० पाचित्तिय दोष आहेत आणि ते तीन प्रकारचे आहेत.*_ 

(१) _सैनिक तमाशा पाहणे_

(२) _मद्यपान करणे_

(३) _हसी-मजाक करणे_

१४.‌ _*चौदावा 'ज्योति वग्ग' आहे. ह्यात ९ पाचित्तिय दोष आहेत आणि ते सहा प्रकारचे आहेत.*_ 

(१) _आग तापणे_

(२) _स्नानाचे नियम तोडणे_

(३) _चीवर पात्राचे नियम तोडणे_

(४) _प्राणिहिंसा करणे_

(५) _झगडा वाढविणे_

(६) _चोराबरोबर यात्रा करणे_

१५. _*पंधरावा 'दिठ्ठि वग्ग' आहे. ह्यात ११ पाचित्तिय दोष असून ते सहा प्रकारचे सांगितले आहेत.*_ 

(१) _वाईट धारणा धरणे_

(२) _धार्मिक गोष्टीला अस्वीकारणे_

(३) _पातिमोक्षातील नियमांचे उल्लघन करणे_

(४) _मारणे किंवा धमकी देणे_

(५) _संघादिसेसाचे दोषारोपण करणे_

(६) _भिक्षुणीची दिक् करणे (सदेह करणे)_

१६. _*सोळावा 'धम्मिक वग्ग' आहे ह्यात १० पाचित्तिय दोष आहेत व ते सहा प्रकारचे सांगितले आहेत.*_ 

(१) _मताचा दुरुपयोग करणे_

(२) _सांघिक लाभ आपलाच म्हणणे (स्वार्थी होणे)_

(३) _मौलिक वस्तु हडपणे_

(४) _सूचीघराला तोडणे_

(५) _अयोग्य चौकी किंवा चारपाई तयार करणे_

(६) _वस्त्राचा दुरुपयोग करणे_

*_५. पाटिदेसनिय (२२२ ते २२९)_*

_*आठ दोषाला पाटिदेसनिय दोष म्हणतात. खाण्याच्या वस्तुला विशेषकरून मागून खाणे*

१. _*जी भिक्षुणी निरोगी असून तूप मागून खाते, तिला प्रतिदेशना करावयास पाहिजे.*_ 

२. *_जी निरोगी असून दही, तेल, मध, लोणी, मासळी, मांस, दूध मागून खाते, तिला प्रतिदेशना करावयास पाहिजे.*_

_त्या भिक्षुणीने सर्वांसमोर म्हणावयास पाहिजे आर्ये! मी निंदनीय, अयुक्त, प्रतिदेशना करण्यासारखे कार्य केले आहे, म्हणून मी त्यासाठी प्रतिदेशना करते. आर्यानो ! हे आठ पाटिदेसनिय दोष म्हणविल्या जातात._

*_६ सेखिय (२३० ते ३०४)_*

_*हे पंचाहत्तर (७५) सेखिय म्हणजे शिकण्यासारख्या गोष्टी आहेत. हे सात वग्गात विभाजित केल्या आहेत.*_

१. _*परिमंडळ वग्ग-* ह्यात चीवर कसे वापरावे ह्याबद्दल शिकविले आहे. तसेच गृहस्थाच्या घरी कसे जायचे, बसायचे, पहायचे हे शिकविले आहे._

२. _*उज्जग्धिक वग्ग* ह्या वग्गात गृहस्थाच्या घरात गेल्यावर न मोठमोठ्याने हासत जाणे, न चूपचाप जाणे यासारखे १० शिकवणूकीच्या गोष्टी आहेत._

३.‌ _*खम्भक वग्ग* ह्या वग्गात भिक्षान्न आणि जेवण कसे करावयाचे ते शिकविले आहे. सत्कारपूर्वक, पात्राकडे लक्ष ठेऊन, मतानुसार जेवण करणे._

४. _*सक्कच्च वग्ग*  ह्या वग्गातही जेवण्याबद्दलच शिकविले आहे._

५. _*कबळ वग्ग* हयातही जेवण्याच्या पद्धती शिकविल्या आहेत. जसे मचमच तोंड न वाजवणे, मोठे तोड न फाडणे, जेवण करता न बोलणे, तोड भरून न खाणे, उष्टे न टाकणे, जीभ न चाटणे इत्यादी._

६. _*सुरू सुरू वग्ग* हयात जेवण आणि उपदेश ह्याबद्दल शिकविले आहे. जसे फुरका मारून न खाणे, हात व बोटे चाटून न खाणे, पात्र चाटून-पुसून न खाणे, ओठ चाटून न खाणे, उष्ट्या हाताने पाणी न पिणे, पात्र न धुऊ देणे तसेच उपदेशाबद्दल सागितले आहे की, हातात छत्री, दंडा, शस्त्र, आयुध धारण करून निरोगी व्यक्तिला धर्म न सांगणे._

७. _*पादुका वग्ग* ह्यात खडाऊ घालून, जोडे घालून, सवारीवर बसलेल्या अंथरूणावर पडलेल्या, पालथी मारून बसलेल्या, डोके बांधून टोपी घालून, आसन उंच असलेल्या निरोगी व्यक्तिला धर्माचा उपदेश न करणे तसेच निरोगी भिक्खुणीने उभ्याने लघवी व संडास करू नये, गवतात लघवी करू नये, पाण्यात लघवी अथवा संडास करू नये._

*_७ अधिकरण समथ (३०५ ते ३११)_*

_*वेळोवेळी निर्माण होणाऱ्या भांडणाच्या निवारणासाठी हे सात अधिकरण समथ सांगत आहे.*_

*_भांडण मिटविण्याचे उपाय_*

१) _सन्मुख विनय दिला पाहिजे._

२) _स्मृति विनय दिला पाहिजे._

३) _अमूढ विनय दिला पाहिजे._

४) _प्रतिज्ञाकरण (स्वीकार) केले पाहिजे._

५) _यद्भूयसिक._

६) _तत्पापियसिक_

७) _तिणवत्थारक_

सारांश रुपाने 

१. _(१ ते ८) आठ पाराजिक दोष आहेत._

२. _(९ ते २५) सतरा संघादिसेस दोष आहेत._

३. _(२६ ते ५५) तीस निस्सग्गिय पाचित्तिय दोष आहेत._

४. _(५६ ते २२१) एकशे सहाषष्ठ पाचित्तिय दोष आहेत._

५. _(२२२ ते २२९) आठ पाटिदेसनिय दोष आहेत._

६. _(२३० ते ३०४) पचाहत्तर सेखिय गोष्टी आहेत._

७. _(३०५ ते ३११) सात अधिकरण समथ आहेत._

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

*_लेखन :- महेश हरिश्चंद्र कांबळे_*

*दिनांक :-* १३/११/२०२४

*_संदर्भ:-_*

१. *विनय पिटक - पातिमोक्ख - भिक्खुणी पातिमोक्ख

🙏🙏🙏 *_भवतु सब्ब मङ्गलं_*🙏🙏🙏

              🙏🙏🙏 *_नमो बुद्धाय_*🙏🙏🙏

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

Monday, 11 November 2024

धम्म चळवळीतील युवकांची भूमिका

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  

*_धम्म चळवळीतील युवकांची भूमिका_* 

https://mikamblemahesh.blogspot.com/2024/11/blog-post_11.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

             _तथागत भगवान बुद्धांनी २५०० वर्षांपूर्वी भारतीय समाजामध्ये जी *"बहूजन हिताय बहुजन सुखाय"* हे ब्रीद असणारी लोककल्याणकारी चळवळ निर्माण केली. तिला धम्मचळवळ हे नामाभिधान प्राप्त झाले. तथागतांनी जो दुःखमुक्तीचा मार्ग शोधला, त्याचा उपदेश आषाढी पौर्णिमेला सारनाथ या ठिकाणी पंचवर्गीय भिक्खूंना केला. त्यानंतर यश नावाचा वैफल्याने ग्रासलेला धनश्रेष्ठीचा मुलगा त्यांच्या संपर्कात आला. तथागतांच्या भेटीने त्याच्या हृदया-मस्तकात जणू सुखप्रवाहाचे गुंजारव निर्माण झाले. त्यामुळे यश तथागतांना शरण आला. *धम्मासारखी अमूल्य गोष्ट एखाद्याला मिळाली, तर ती एकट्यापुरती राहत नाही., मी जसा लाभान्वित झालो, तसेच सर्वजण या मार्गाचा लाभ घेवोत, ही भावना निर्माण होते.* यशचेही तसेच झाले. त्याच्या पुढाकारामुळे त्याचे ५४ मित्र तथागतांना शरण गेले. तथागत, पंचवर्गीय भिक्खू, यश आणि त्याचे ५४ मित्र असे एकूण ६१ जण सारनाथ कडून वाराणसीला गेले आणि तेथे संघाची स्थापना केली. *गया येथे सिद्धार्थांना बोधि प्राप्त झाली, अर्थात बुद्धांचा जन्म झाला. सारनाथ येथे तथागतांनी पहिला उपदेश केला, धम्मचक्रप्रवर्तन केले, अर्थात धम्माचा जन्म झाला. वाराणसी येथे भिक्खूसंघाची स्थापना करण्यात आली, अर्थात संघाचा जन्म झाला.* तथागतांनी या नव्या भिक्खूंना उपदेश करताना म्हटले, "हे भिक्खूंनो मी सर्वप्रकारच्या बंधनांपासून मुक्त आहे आणि तुम्ही सुद्धा मुक्त आहात. सर्व दिशांना जा आणि बहुजनांच्या हितासाठी, बहुजनांच्या सुखासाठी चारिका करा." हा क्षण खऱ्या अर्थाने धम्म चळवळीची सुरुवात होती. *युवकांच्या माध्यमातून सुरु झालेली ही चळवळ भारतातील सुवर्णयुगाची नांदी ठरली.*_

_तथागतांच्या परिनिब्बानानंतर २५०० वर्षांनंतर पुन्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर येथे ऐतिहासिक धर्मांतर केले. धम्मचळवळीला आलेल्या ग्लानीचे आपल्या धम्मक्रांतीने उत्साहात रुपांतर केले. *१४ ऑक्टोबर १९५६ च्या विजयादशमी दिनी स्वतः भन्ते चंद्रमणी यांच्या हस्ते बाबासाहेबांनी दीक्षा ग्रहण केली आणि आपल्या लाखो अनुयायांना धम्मदीक्षा दिली. ही घटना ऐतिहासिकदृष्ट्या अतिशय क्रांतिकारक होती. एखाद्या उपासकाने दुसऱ्या उपासकाला दीक्षा देणे हे बौद्ध परंपरेमध्ये प्रथमच घडले.* बाबासाहेबांनी आपल्या अनुयायांना आणि अखिल बौद्ध जगताला नवा संदेश यामधून दिला. तो संदेश म्हणजे "दरेकाने दरेकाला धम्मदीक्षा दया" हा होय. *जो कोणी धम्माचे आचरण करेल, त्याला दुसऱ्याला धम्म सांगण्याचा अधिकार आहे.*_

👉 *_- क्रांतीची भाषा युवकच बोलू शकतात._*

              _तथागतांनी प्रस्थापित विषमतेच्या व्यवस्थेला झुगारून दिले. बाबासाहेबांनी धम्मक्रांती केली. *वाईटाला वाईट आणि चांगल्याला चांगले म्हणण्याचे धाडस फक्त युवकच करु शकतात.* आजच्या - युवकांपुढे हे दोन्ही आदर्श तीच प्रेरणा घेऊन उभे आहेत. असे म्हटले जाते की, *'वय देहाला असते मनाला नाही, मनाने तरुण असणारी माणसे कधीच म्हातारी होत नाहीत, युवक कोणाला म्हणावे या - संदर्भात ओशो युवा अवस्थेचे वर्णन करताना म्हणतात, 'Living State of Mind' अर्थात चित्ताची जीवंत अवस्था म्हणजे युवा अवस्था होय. शारीरिकदृष्ट्या युवक असणे म्हणजे खऱ्या अर्थाने युवक असणे नव्हे तर, ज्याच्या मनाची अवस्था उत्साही आहे. ज्याचे तारुण्य हे ज्वलंत धमन्यांचे अविरत स्पंदन बनलेले असते तो 'युवक, असतो असे म्हणता येईल. समाजातील विषम व्यवस्था, दुःख, अन्याय पाहून ज्याच्या मनात क्रांतीची आकांक्षा निर्माण होते, असा विद्रोहाचा झरा म्हणजे युवक होय; मग तो शारीरिकदृष्ट्या कोणत्याही वयोगटातील असला तरी हरकत नाही..!!*_

👉 *_युवकांनी धम्माच्या उद्देशाचे आकलन करावे._*'

_भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म' या ग्रंथामध्ये बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्माचे दोन उद्देश्य सांगितले आहेत. युवकांनी या उद्देशाचे आकलन व आचरण करणे हे स्वतःच्या आणि इतरांच्या जीवनाला अधिक उन्नत अवस्थेकडे घेऊन जाणारे ठरेल._

१. _पहिला जो उद्देश आहे तो म्हणजे, *'मनाची मलिनता दूर करणे' होय.* अतिशय मूलभूत अशी ही बाब आहे. आपण जे बोलतो किंवा जी कृती करतो तिच्या पाठीमागे आपल्या मनामध्ये असणारे विचार आणि भावना यांची प्रेरणा असते. मनामध्ये आपण जे रुजवू, तेच आपल्या व्यक्तिमत्वाला आकार देते. लोभ, मोह, द्वेष, मत्सर, दुरार्भिमान वगैरे सारखे चित्तमल नष्ट करून दानभावना, प्रज्ञा, मैत्री, संवेदनशीलता, स्वाभिमान वगैरेसारख्या गुणांचा विकास करण्यासाठी धम्म मार्गदर्शक ठरतो._

२. _धम्माचा दुसरा उद्देश हा *सामाजिक सौहार्द निर्माण करण्यास कटिबद्ध असणारा आहे. तो म्हणजे, 'जग धम्मराज्य बनविणे' होय. जग धम्मराज्य बनविणे याचा अर्थ असा नाही, की जगातले सर्व लोक औपचारिकरीत्या बौद्ध बनविणे किंवा सर्वांनी बौद्ध व्हावे असा कट्टरतावाद जोपासणे, तर धम्मराज्य म्हणजे जगामध्ये सदाचरणावर आधारित जीवन जगणाऱ्या लोकांची संख्या वाढवणे. लोक एकमेकांशी मैत्रीने वागतील, असे वातावरण निर्माण करणे. जो जो दुःखी आहे, निराश आहे, अस्वस्थ आहे, अशा लोकांपर्यंत आनंद, प्रेरणा आणि शांततेचा मार्ग पोचविणे, आपल्या भोवताली अशी लोकमंगलाची परिस्थिती निर्माण करणे याचाच अर्थ धम्मराज्य निर्माण करणे हा आहे.*_

👉 *_धम्माचे आचरण ही व्यक्तिमत्व विकासाची प्रकिया आहे._*

            _जीवनामध्ये प्रत्येकजण विकासासाठी धडपड करीत असतो. अधिक उत्तम आणि मंगलमय गोष्टींचा शोध घेत असतो. *तथागतांनी मंगलसुत्तामध्ये ३८ मंगल गोष्टी सांगितल्या आहेत. त्यापैकी प्राथमिक पातळीवर मुलभूत महत्वाच्या दोन गोष्टी म्हणजे, पहिली वेळोवेळी धम्मश्रवण करणे आणि दुसरी वेळोवेळी धम्मचर्चा करणे होय.* धम्म ही जीवन जगण्याची कला आहे. पण, जोपर्यंत आपण प्रत्यक्ष आचरण करीत नाही, तोपर्यंत ही कला साध्य होऊ शकत नाही. म्हणून चांगल्या, एकमेकांच्या हिताच्या गोष्टींचे श्रवण केले पाहिजे. धम्मविषयक ग्रंथाचे वाचन व आकलन केले पाहिजे. जाणकारांशी चर्चा करून शंकाचे निरसन केले पाहिजे. याप्रकारे निकोप जीवनशैलीचा अंगिकार केला पाहिजे._

           _आपले बोलणे, वागणे आणि विचार करणे यामध्ये ऊर्ध्वगामी परिवर्तन म्हणजेच व्यक्तिमत्वाचा विकास होय. आपल्या मनाला इष्ट प्रशिक्षण देणे हीच धम्माची मूलभूत शिकवण आहे. *डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, "The training of the mind to seek the good is the first step in the path of Righteousness This is the main teaching in the Buddhist way of life" मनाला सुसंस्कृत बनविणे म्हणजे आपल्या जीवनातील नकारात्मक जाणिवांचा क्षय आणि सकारात्मकतेचा विकास होय.*_

👉 *_धम्म हा ऊर्जास्त्रोत आहे._*

            _आधुनिक युगामध्ये युवकांना विविध प्रकारच्या आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे. शैक्षणिक प्रगती, आर्थिक प्रगती, कामाची उपलब्धता इत्यादींसाठी मनाचे संतुलन राखून परिश्रम करणे आवश्यक असते. *विविध प्रकारच्या स्पर्धापरीक्षांना सामोरे जाण्यासाठी सुदृढ शरीराबरोबरच सुदृढ मनाचीही गरज आहे. एकाग्रता, स्थिरता याबाबी आपणाला ध्येयापर्यंत जाण्यासाठी मदतच करत नाहीत, तर एक महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडतात. तथागतांनी मनाच्या एकाग्रतेसाठी ध्यानसाधनेची पद्धती विकसित केली आहे. वैज्ञानिक पद्धतीने मानसिक ऊर्जेचे एकत्रिकरण करून योग्यप्रकारे ती ऊर्जा प्रवाहित करण्याचे काम या ध्यान सरावांमधून साध्य होते. धम्म म्हणजे जागृतीचा सराव आहे. त्यामुळे आळसा सारख्या शत्रूला हद्दपार करण्याची कृती म्हणजे धम्म आहे.* अनेकवेळा लोक काम टाळण्यासाठी वेगवेगळ्या सबबी सांगतात, जसे की, "आज खूप थंडी आहे, खूप गरम होत आहे, आता वेळ झाला, आत्ताच तर पहाट झाली, भूक लागली आहे, खूप खाल्ले आहे..." अशाप्रकारची कारणे सांगणाऱ्यांना यश कधीच मिळत नाही. प्रयत्नवादाचा उपदेश करताना *सिगालसुत्तामध्ये तथागत म्हणतात, "जो मनुष्य थंडी आणि उष्णता यांना गवताच्या काडी इतकीही किंमत देत नाही आणि आपली कर्तव्ये पार पाडतो, त्याचे सुख त्याला सोडून जात नाही." अशाप्रकारे धम्मामध्ये प्रेरणेचा आणि ऊर्जेचा साठा आहे, कधीही न संपणारा....!*_

👉 *_युवकांची जबाबदारी मोठी आहे._*

            _*डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, बौद्धांनी केवळ एक चांगला बौद्ध असणे पुरेसे नाही तर, त्यांनी धम्माचा प्रचार आणि प्रसार करायला हवा, कारण "धम्माचा प्रचार आणि प्रसार करणे हीच खरी मानवसेवा आहे". धम्म प्रयत्नवाद शिकवतो, आशावादी बनवितो, लढण्याची ऊर्मी देतो म्हणून हा परिवर्तनाचा आचरणमार्ग अधिकाधिक लोकांपर्यंत पोचला पाहिजे. या सदाचार आणि मानवतेच्या शिकवणीची आज सर्व मनुष्यमात्राला पूर्वीपेक्षा कितीतरी पटीने आज गरज आहे. व्यक्तिगत विकासाबरोबरच सामाजिक विकासाला गती देण्यासाठी धम्म लोकांपर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून पोचायला हवा. यासाठी स्वतः धम्म जाणून घ्यायला हवा. धम्माच्या मूलभूत शिकवणी जसे, त्रिसरण, पंचशील, पारमिता, धम्मेंद्रिये, सप्त बोध्यांगे, अष्टांगिक मार्ग यांसारख्या जीवनमूल्यांचे बौद्धिक आकलन व आचरण करून स्वतःला एक मॉडेल म्हणून समाजापूढे चांगुलपणा आदर्श ठेवायला हवा.*_

_भारतामध्ये धम्मप्रचार करण्याचा अनेक व्यक्ती व संस्था प्रामाणिक प्रयत्न करीत आहेत. भारतीय बौद्ध महासभा, त्रिरत्न बौद्ध महासंघ यांसारख्या अनेक संघटना धम्म पोचवत आहेत तसेच विपस्सनाचार्य गोएंका गुरुजी, पू. दलाई लामा यांसारख्या धम्मगुरूंचेही काम मोठे आहे. प्रत्येकजपण आपापल्या परीने लोकांपर्यंत बुद्धविचार नेण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशाप्रकारच्या सर्व संस्था, व्यक्ती इत्यादींचा आत्यंतिक कृतज्ञतेने आदर केला पाहिजे. प्रत्येकाची धम्मप्रचाराची शैली वेगळी असेल पण, ध्येय एकच आहे आणि ते म्हणजे 'मानवसेवा' होय._

_स्वतःला परिवर्तित करण्यासाठी युवकांनी धम्मशिबीरांमध्ये सहभागी व्हायला हवे. जसे की, श्रामणेर शिबीर, विपस्सना शिबीर, निवासी धम्मशिबीर इ. स्वतःला अधिक जाणून घेण्याची, क्षमतांचा विकास करण्याची आणि जाणकारांचे मार्गदर्शन मिळण्याची संधी या शिबीरांमधून मिळत असते. आठवड्यातून एकदा बुद्धविहारात जाऊन धम्मश्रवण व धम्मचर्चेत सहभागी झाले पाहिजे. आठवड्यातून किमान एक तास आपले ज्ञान, कौशल्य इ. चा लाभ इतरांना दयायला हवा._

_जे लोक औपचारिकरित्या बौद्ध नाहीत, त्यांच्यापर्यंत करुणेने, मैत्रीने व्यवहार ठेऊन बुद्धांचा मंगलमय विचार पोचविला पाहिजे. कारण सर्वांना सुखाची आणि शांततेची गरज आहे. बुद्धविचार हा सर्वांना सुख आणि शांती प्रदान करणारा आहे, प्रत्येक व्यक्तीला उन्नत अवस्थेकडे नेणारा आहे. आपल्याला मिळालेली ही तीन अमूल्य रत्ने सर्वांपर्यंत पोचविण्याचा संकल्प डॉ. बाबासाहेबांच्या आणि म. जोतिबा फुलेंच्या जयंतीनिमित्त करुया. या मंगल संकल्पाने सर्व मनुष्यमात्र निरामय जीवनाचा आनंद उपभोगतील. स्वतःच्या कल्याणाबरोबरच इतर सर्व प्राणिमात्रांच्या हितासाठी माझ्या युवक बंधु भगिनींनो धम्मचळवळ अधिक गतिमान करुया._

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_लेखन :- आयु. अमित मेधावी (कोल्हापूर)_*

*_संदर्भ:- बुद्धसासन त्रैमासिक अंक एप्रिल, मे, जून २०२१_

*_संकलन :- महेश कांबळे_*

🙏🙏🙏 *_भवतु सब्ब मङ्गलं_*🙏🙏🙏

                 🙏🙏🙏 *_नमो बुद्धाय_*🙏🙏🙏

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

Saturday, 9 November 2024

पालि वाङ्गमयाचा भारतीय संस्कृतीवर प्रभाव

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

*_पालि वाङ्गमयाचा भारतीय संस्कृतीवर प्रभाव_

https://mikamblemahesh.blogspot.com/2024/11/blog-post_9.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

_अनादी काळापासून मानवाने प्रगतीचा आलेख तयार केला. त्यापैकी सर्वात विकसित गोष्ट म्हणजे संस्कृती त्याने एक कल्चर निर्माण केले._

*_Meaning of Culture: संस्कृतीचा अर्थ :-_*

_संस्कृती हा शब्द रोजच्या व्यवहारात आपण वापरतो. विशेष म्हणजे दैनंदिन व्यवहारात वेगवेगळ्या अर्थात हा शब्द वापरला जातो. परंतु समाजशास्त्रीयदृष्ट्या त्याच्या वेगळ्या व्याख्या अनेक शास्त्रज्ञांनी केलेल्या आहेत._

*_डॉ. इरावती कर्वे, एडवर्ड टायलर, राल्फ लिग्टन, किसिंग बोगार्डेस, मॉलिनोव्हस्की यांच्या संस्कृतीबाबतच्या व्याख्या महत्वपूर्ण मानल्या जातात._*

१. _या संदर्भात *एडवर्ड टायलर (Edward Tylor) चे मत असे आहे की, समाजाचा एक सदस्य म्हणून मानव जे ज्ञान, कला, श्रद्धा, नीतीतत्वे, कायदे, परंपरा, इतर क्षमता, सवयी तसेच इतर तत्सम गोष्टी संपादित करतो, त्या सर्वांच्या संमिश्र एकीकरणास संस्कृती असे म्हणतात.*_

२. _*समाजशास्त्रज्ञ हरस्कोव्हिटस (Herskovits) यांचे मते संस्कृती हा वातावरणाचा मानव निर्मित भाग आहे. Culture is the man made part of the environment.*_

३. *_बोगाईस यांचे स्पष्टीकरण असे की, समुहाचे कार्य करणे आणि विचार करण्याच्या सर्व गोष्टी म्हणजे संस्कृती होय._*

४. _त्याचप्रमाणे *मॅलिनोव्हस्की म्हणतात की, ज्यांच्याद्वारे मानव आपली उद्दिष्टे साध्य करतो ती मानव निर्मित साधने व माध्यम म्हणजे संस्कृती होय. Culture is the hardwork of man and the medium through which he actives his ends.*_

*_भारतीय संस्कृती :-_*

_शास्त्रज्ञांच्या या विविध मतांच्या आधारे भारतीय संस्कृती वैदिक, बौद्ध आणि जैन संस्कृतीचे समन्वित रूप आहे. अनेकात्मकता आणि विविधतेत एकात्मता आणि एकता तिची विशेषता आहे. यामुळेच त्यानंतर निर्माण झालेल्या संस्कृतीच्या प्रक्रिया ह्या एक दुसऱ्यांनी प्रभावित झालेली दिसते. याशिवाय प्रत्येक संस्कृतीने भारतीय संस्कृतीला आपल्या योगदानाने समृद्ध केले आहे._

_*बौद्ध धम्म आणि संस्कृती श्रमण संस्कृतीचे प्रेरक प्रणाली आहे. त्याचे प्रासाद सम (समानता) शम (शांती) आणि श्रम (परिश्रम) ह्या तीन प्रमुख स्तंभावर आधारित आहे.* यानुसारच समाजाचे संघटन ह्या तीनही सिद्धान्तावर प्रतिष्ठित झाले आहे. *विषमता विसरून समानता, श्रमशीलता आणि क्षमाशीलता अशा कल्याणमार्गाने समाज आणि राष्ट्राने आपली प्रगती करावी याचे निर्देश यात आहे. व्यक्तीच्या श्रेष्ठत्वाचे प्रमाण त्याची ज्ञानमयकृती आणि चरित्र असावे. अहिंसात्मक साधनेने ह्या तिन्ही साधनेत निर्मलता वाढते आणि समत्वाची प्रतिष्ठा होते. हीच श्रेष्ठ भारतीय - संस्कृतीची आधारशीला मानली जाते. ही संस्कृती पालि वाङ्गमयातून प्रतिबिंबित होते. म्हणूनच पालि वाङ्गमय हे विकसित भारतीय संस्कृतीचे प्रतिक मानल्यास पालि वाङ्गमयाचा म्हणजेच बुद्धवचनाचा भारतीय संस्कृतीवर पोषक प्रभाव असल्याचे निदर्शनास येते.*_

*_पाली वाङ्गमय अर्थात बुद्धवचनः-_*

_पालि वाङ्गमय हेच त्रिपिटक नावाने परिचित झालेले आहे. त्रिपिटक म्हणजे बुद्धवचन भगवान बुद्धाच्या आविर्भावाच्या - समकालीन परिस्थितीचे चित्रण विदारक होते. सहा संप्रदायाचे तत्वचिंतक आपापल्या स्तरावर समाजपरिवर्तनाची आपली जिज्ञासा व्यक्त करण्याच्या प्रयत्नात होते. अशा पार्श्वभूमीवर तथागताचे - पदार्पण समाजाभिमुख ठरले._

_*तथागतांनी सर्वोत्तम ज्ञान, सम्बोधी प्राप्त करून 'बुद्ध' पदाला पोहोचले. तत्कालीन ६२ मिध्यादृष्टींचा पर्दाफाश केला. पंचेचाळीस वर्षे देशभर निरंतर भ्रमंती करून धम्म प्रवेदित केला. त्या धम्मोप्पवेदित देसनेचे संकलित रूप त्रिपिटक वाङ्गमय तयार करण्यात आले. यामधूनच बुद्धांचे प्रामाणिक व्यक्तिमत्व प्रतिबिंबित होते. संगीतीच्या माध्यमातून त्यांच्या देसनेला वाङ्गमयाचे रूप आकारात आणले गेले. हे संपूर्ण साहित्य म्हणजेच बौद्ध वाङ्गमय विश्ववाङ्गमयाचा एक अमूल्य निधी आहे.*_

_*सुत्तपिटकाचे पांचही निकाय, विनयपिटक आणि अभिधम्म यातून तथागतांचे प्रामाणिक वचन दृष्टीगत होतात. यामधून बुद्धांचे प्रमुख चिंतन चार आर्यसत्य, आर्य अष्टांगिक मार्ग, कम्मक्खन्ध, प्रतित्यसमुत्पाद, शून्यवाद, अनित्य, अनात्म, दुःख इत्यादीचे स्पष्टीकरण केलेले आहे. यासोबतच सामाजिक जीवनातील अहिंसा, मैत्री, बंधुभाव, प्रेम, दान, शीलाचार अशा मूल्यांना प्ररोपित केले. ह्या सर्व नैतिक मूल्यांचा, तत्वज्ञानाचा, आदर्शाचा सारासार उहापोह वाङ्ग‌मयातून झळकतो. अर्थातच हेच पालि वाङ्गमय बुद्धवचन आदर्श समाज जीवनाची आधारशीला बनण्यास समर्थ ठरते.*_

*_पाली वाङ्गमयाचा प्रभाव :-_*

_भारतीय संस्कृतीच्या आचार, धर्म, भाषा, शिल्प, ललितकला, शासन आणि तत्वज्ञान इत्यादी क्षेत्रांमध्ये बौद्ध पालि वाङ्गमयाने एक नवीन विशेषता समाविष्ट करून उन्नतीचा मार्ग गाठला आहे. भारतीय संस्कृतीच्या विकासाला व्यापक प्रेरणा मिळाली. त्याचप्रमाणे बुद्ध तत्वज्ञान हे एक गौरवमय अंगच मानले जाते; तो एक मूलभूत गाभा आहे. धम्मपदातील ब्राह्मणवग्गानुसार ब्राह्मण कोणाला म्हणावे याचे सत्य प्रारूप जगासमोर आलेले आहे आणि कृतीला महत्व प्रदान झाले. सामाजिक, धार्मिक-तात्विक अराजकता, नैतिक विडंबन, मिथ्याचार आणि वैचारिक दिशाभूल अशा अंधकारमय वातावरणात भारतीय समाज जेव्हा उद्विग्न झालेला होता, अशा समाजात पुन्हा प्रतिष्ठित, प्रस्थापितांना सम्यक विचार देण्याचे महान कार्य भगवान बुद्धांनी केले. याच विचाराच्या पार्श्वभूमीवर वैदिक तत्वांनी बुद्धांना अवताराच्या रुपाने मान्य करून आपल्या तत्वज्ञानात समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला. कालानुरूप अशा परिवर्तनाच्या दिशेने भारतीय संस्कृती बुद्धांमुळे प्रभावित झाली. संस्कृती संघर्ष होऊन वैचारिक आदान-प्रदानही झाले म्हणूनच जगातील अनेक प्राचीन संस्कृतीमध्ये बौद्ध संस्कृतीचे वैशिष्ट्य कायम स्थिरावलेले आहे. नैतिक मूल्य व तत्वज्ञानाच्या दिशेने संपूर्ण जग पालि वाङ्गमयातील सूचक तत्वांनी प्रभावित झालेले दिसून येते विदेशातील सांस्कृतिक प्रचार-प्रसार आणि भारतीय संबंध हे बुद्धवचनाच्या प्रभावाने समृद्ध झाले. रक्तपाताशिवाय, सक्ती व बळाचा वापर न करता बुद्धांनी आपल्या मैत्रीपूर्ण कल्याणकारी भावनेने सर्वांची मने जिंकली._

_*संक्षेप :-*_

*_'बहुजन हिताय बहुजन सुखाय, लोकांच्या हित व सुखासाठी त्यांनी आपल्या शिष्यांना विचरण करण्याचे संदेश दिले. तथागतांच्या देसनेची सम्यक दृष्टी सामायिक कल्याणाची आहे. त्यांचा प्रत्येक क्षणाचा उपदेश व्यक्ती, मानवप्राणी केंद्रस्थानी ठेवून केलेला आहे. ज्ञान व सदाचार यांची प्रेरणा देणारा आहे. स्वतःच्या प्रज्ञेचा विकास करण्याचे चिंतन करणारा आहे._*

_बुद्धांच्या शिक्षापदाचा संसार यात आहे. सर्व प्रकारच्या वाईट कर्मापासून दूर राहणे कुशल कर्माचा संचय करणे, चित्ताला संयमित करणे हेच त्यांच्या शिक्षणाचे संचित आहे. या विशुद्ध विचाराने भारतीय संस्कृती निश्चितच प्रभावित आहे. *डॉ. भदन्त आनन्द कौसल्यायन यांचे स्पष्ट मत आहे की, हिन्दु धर्माचा मान्यताप्राप्त ग्रंथ जो 'गीता, आहे ते धम्मपद ह्या पालि ग्रंथाची नक्कल आहे.* एक विध्वंसक सत्तेचा विषय सोडला तर संपूर्ण नैतिकतेचा आधार बुद्धधम्म आहे. त्याचप्रमाणे *जातक कथांनी देशांतील नव्हे तर संपूर्ण लोककला साहित्याला प्रभावित केले. इसापनीतीतील अनेक कथा ह्या जातककथांच्या पार्श्वभूमीवरून सांगितल्याचे दिसून येते. भिक्खूंची विहारे ही निवासाची व्यवस्था किंवा स्तूप, चैत्य आणि लेण्या इत्यादीमधून भारतीय संस्कृतीला बुद्ध कर्तृत्वाचे देणे लाभलेले आहे. म्हणूनच असे म्हणता येईल की, जीवनप्रणालीची उत्कृष्ट व्यवस्था ही पालि वाङ्गमयाची देसना आहे. तीच धारण करणे आज काळाची गरज आहे.*_

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_लेखन :- डॉ. मालती साखरे, माजी विभागप्रमुख (पाली - पाकृत) रातुम, नागपूर विद्यापिठ_*

*_संदर्भ:- बुद्धसासन त्रैमासिक अंक एप्रिल, मे, जून २०२१_

*_संकलन :- महेश कांबळे_*

🙏🙏🙏 *_भवतु सब्ब मङ्गलं_*🙏🙏🙏

                 🙏🙏🙏 *_नमो बुद्धाय_*🙏🙏🙏

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

Wednesday, 6 November 2024

नालंदा - बोधिसत्वांची मांदियाळी

 *_नालंदा - बोधिसत्वांची मांदियाळी_*

_कुठल्यातरी शायरने म्हटले होते "खंडहर बता रहें हैं के इमारत कितनी बुलंद थी....". नालंदा विश्वविद्यापीठाचे प्राचीन अवशेष पहिले कि वरील ओळी आपसूक आठवतात! *जगातील सर्वात प्राचीन विश्वविद्यापीठ म्हणून 'नालंदा'चा गौरव आहे!* मुळात विद्यापीठ ही संकल्पना बौद्ध संस्कृतीची देन आहे. प्राचीन भारतात गुरुकुल पद्धत होती ज्यात विद्यार्थी गुरूच्या घरी जाऊन शिकत. मात्र यात ठराविक विद्यार्थ्यांनाच शिक्षण मिळत. सर्वांसाठी शिक्षण नव्हते! *भ.बुद्धांच्या काळात अनेक दानशूर व्यक्तींनी विहार, वने अथवा संघाराम बांधून दान दिली. याच विहारात किंवा संघारामात नवदीक्षित भिक्खू आणि वयस्कर भिक्खू अथवा अर्हत एकत्र राहून अध्ययन आणि अध्यापन करीत. हीच संघराम अथवा विहारे त्याकाळातील विद्यापीठे होती.*_

_सम्राट अशोकांच्या काळी डोंगरांमध्ये लेणीं कोरण्यात आली आणि कालांतराने या बुद्ध लेणीं, विद्यापीठाचे काम करू लागल्या. कान्हेरी, जुन्नर, अजंठा, नाशिक येथील बुद्ध लेणीं काही ठळक उदाहरणे आहेत. मुक्त व स्वतंत्र परंतु मानवकल्याणाचा उद्देश असलेल्या विचारांना, बौद्ध संस्कृतीने नेहमीच प्रोत्साहन दिल्यामुळे, अनेक विषयांमध्ये बौद्ध आचार्यांनी मूलभूत सिद्धांत मांडले ज्यांच्या ज्ञानशाखा आजही जगभरातील विद्यापीठात शिकविले जातात._

_*इ.स.पूर्व ६०० ते इ.स. ११०० हा १५०० वर्षांचा काळ, बौद्ध संस्कृतीचा उत्कर्षाचा काळ होता. इ.स.पूर्व ५व्या शतकात सुरु झालेले तक्षशिला हे जगातील सर्वात प्राचीन शिक्षाकेंद्र होते. नालंदा, एक विश्वविद्यापीठ होण्याची कित्येक शतके आधी, एक बौद्ध विहार म्हणून नावाजलेले होते. तेथे अनेक बौद्ध भिक्खू आणि बौद्ध आचार्य एकत्र राहून धम्म अध्ययन करीत.*_ 

_*इ.स. ४२५ मध्ये गुप्त वंशाच्या सम्राट कुमारगुप्त पहिला याने नालंदा विश्वविद्यापीठाची निर्मिती केली. या विश्वविद्यापीठाला संपूर्ण राजाश्रय होता. कुमारगुप्त पहिलाचे वारसदार, बुद्धगुप्त, तथागतगुप्त, बालादित्य आणि वज्र यांनी देखील नालंदाला सढळ हाताने मदत केली. यानंतर पुर्नवर्मन, हर्षवर्धन आणि पाल राजवंशाने या विश्वविद्यापीठाचा प्रचंड मोठा विस्तार केला. याच दरम्यान नालंदापासून प्रेरणा घेत, सोमपुरा, वल्लभी, विक्रमशिला, जगद्गल्ला, ओदंतपुरी अशा अनेक बौद्ध विद्यापीठांची स्थापना झाली जी जगविख्यात होती.*_  

_हुयांग त्सांग आणि इ त्सिंग या बौद्ध  भिक्खुंनी आपल्या प्रवासवर्णनात नालंदाचे वैभव लिहून ठेवले आहे. भ.बुद्धांच्या काळी नालंदा हे एक प्रसिद्ध गाव होते. भ.बुद्धांनी अनेकवेळा येथे देशना दिली तसेच भ.महावीर यांनी १४ वर्षावास येथे व्यतीत केले होते._

_नालंदा मध्ये एकाच वेळी १०,००० विद्यार्थी आणि २००० प्राध्यापक एकत्र राहून अभ्यास करीत असत. *'धर्मगंज' नावाचा ग्रंथालय परिसर होता ज्यात रत्नसागर, रत्नादधि आणि रत्नरंजका नावाच्या तीन नऊ मजल्याच्या इमरती होत्या, ज्यात ६४ विषयांचे लाखो हस्तलिखित ग्रंथ होते!* या विश्वविद्यापीठामध्ये जगभरातील विद्यार्थी, शिक्षक ज्ञान मिळविण्यासाठी येत. नालंदाच्या प्रवेश मात्र अतिशय कठीण होता. त्यांचा प्रमुख द्वारपाल हा आत्ताच्या काळातील पीएचडी होता व सर्व विद्यार्थ्यांची पहिली परीक्षा तो घ्यायचा! त्याच्या परीक्षेत उत्तीर्ण होणारे विद्यार्थी मग आतमध्ये दुसऱ्या परीक्षेला सामोरे जावे लागे. *येथे राहणे, भोजन आणि शिक्षण सर्व विनामूल्य होते आणि ते सतत ७०० वर्षे चालले होते! म्हणूनच हुयांग त्सांग म्हणतात त्याप्रमाणे याचे नांव 'ना अल इलम दा' म्हणजेच "कधीही न आटणारे दान" असे होते!* त्याकाळी येथे तिबेट, जापान, चीन, पर्शिया, कोरिया, टर्की, इंडोनेशिया आणि ग्रीस येथील विद्यार्थी अभ्यासासाठी येत. १२व्या शतकाच्या दरम्यान संपूर्ण नालंदा विश्वविद्यापीठ जाळून टाकण्यात आले आणि त्यात लाखो ग्रंथ भस्मसात झाले, मात्र तरीही काही भिक्खुंनी थोडीफार हस्तलिखिते आपल्याबरोबर नेली जी सध्या लॉस अंजिलस, न्यू यॉर्क आणि तिबेट मधील संग्रहालयात सुरक्षित आहेत. _   

*_नालंदाची महती जगभरात पसरली ती त्याच्या १७ विद्वान विद्यार्थ्यांमुळे! खऱ्या अर्थाने ते सर्व बोधिसत्व होते! दलाई लामा देखील या सर्वांबद्दल आदर व्यक्त करताना आपण त्यांचे शिष्य असून त्यांच्याच विचारांचा वारसा चालवतोय असे आवर्जून सांगतात!_*

१. _*"नागार्जुन" हे 'माध्यमक', 'शून्यवाद' आणि 'निस्वभाववाद' तत्वज्ञानाचे जनक समजले जातात.* एखादी वस्तू अथवा विचार याला स्वअस्तित्व नसून ते इतरांच्या अस्तित्वावर अवलंबून असतात म्हणजेच त्यांचे स्वतःचे स्वभाव नसतात. उदा. आपले शरीर हे अनेक मज्जारज्जू, हाडे, मांस, रक्त, नसा यांनी बनलेले आहे. म्हणजेच यांचे मूळ घटक म्हणजे पेशी (मांसपेशी, हाडपेशी) आहेत. प्रथिने आणि पाणी यांच्या अनेक रेणू पासून पेशी तयार होतात. अनेक अणुंमुळे रेणू तयार होतात. हे अणू कार्बन, हैड्रोजन आणि ऑक्सिजनच्या संयोगातून तयार होतात आणि हे सर्व घटक आपल्या वातावरणात अस्तित्वात असतात. याचाच अर्थ आपले शरीर हे अनेक घटकांपासून बनले असून त्याचे स्वतःचे असे वेगळे अस्तित्व नाही! मनुष्यात उद्भवणाऱ्या अनेक विकारांना जर हेच प्रमाण लावले तर त्या विकारांचा फोलपणा किंवा मिथ्यापणा समजून येतो. याच अनुषंगाने *नागार्जुनाने 'मुलमाध्यमकाकारिका' हा ग्रंथ लिहिला जो बुद्धांच्या 'प्रतित्यसमुत्पाद' या संकल्पनेवर आधारित आहे.*_

२. _*"आर्यदेव" हे नागार्जुनांचे अतिशय विद्वान शिष्य ज्यांनी अज्ञान, अनित्यता आणि क्षणिकवाद यावर ४०० पदांचे चतुःशतक  लिहिले. महायान माध्यमिका विचारधारेचे ते सहसंस्थापक समजले जातात.* दक्षिण भारतात राहून त्यांनी अनेक विहारे बांधले._

३. _*"असंग" हे ४थ्या शतकातील महायानच्या 'योगाचार'चे संस्थापक असून, त्यांचा भाऊ 'वसुबंधू' सह त्यांनी लिहिलेले 'अभिधर्मसमुच्चय', 'बोधिसत्त्वभूमी', 'योगाचारभूमिशास्त्र', 'महायानसूत्रालंकार' आणि 'विज्ञानवाद' हे संस्कृत भाषेतील सर्वोत्तम ग्रंथ लिहिले.* ध्यानाचे गाढे अभ्यासक म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांनी अनेक विहारांची स्थापना केली ज्यात हजारों अभ्यासू भिक्खू तयार झाले._   

४. _*"वसुबंधू" यांनी 'अभिधर्मकोशकारिका' ही अभिधर्मवर अभ्यासात्मक टीका लिहिली. बौद्ध तत्वज्ञान आणि संकल्पना यावर कोणत्या पद्धतीने आणि कशी व्याख्या करावी याचे अतिशय पांडित्यपूर्ण 'व्याख्यायुक्ती' हा ग्रंथ लिहिला. बुद्धविचारधारेवर त्यांनी लिहिलेली ग्रंथसंपदा मोठी आहे. 'वादविधी', 'विज्ञाप्तिमात्रताशास्त्र', 'दशभूमिकाभाष्य' हे काही महत्त्वपूर्ण ग्रंथ होय. वसुबंधूंनी 'वादविधी' या ग्रंथांमधून बौद्ध तर्कशास्त्रची सुरुवात केली असे म्हणावे लागेल.*_

५. _*"दिग्नाग" हे नालंदा विश्वविद्यापीठाचे अतिशय विद्वान विद्यार्थी आणि अध्यापक होते.* प्रमाणशास्त्र आणि तर्कशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जातात. दिग्नागनुसार कोणत्याही वस्तूची सत्यता ही प्रत्यक्षज्ञान आणि अनुमान ज्ञान या दोन सिद्धांतावर आधारित आहे. भाषा, तर्क आणि अनुमान या त्यांच्या सिद्धांताने भारतीय तर्कशास्त्राचा एक नवीन पाया रचला गेला. *वसुबंधूंचे शिष्य असणारे दिग्नाग यांनी 'प्रमाणसमुच्चया' हा प्रमाणशास्त्रावरचा अजोड ग्रंथ लिहिला. 'हेतुचक्र', 'आलंबनपरीक्षा', 'अभिधर्मकोशमर्मप्रदीपा', 'अष्टसहस्रिकाप्रज्ञापारमिता', 'त्रिकालपरीक्षा' आणि 'न्यायमुख' हे ग्रंथ लिहिले.*_

६. _*"धर्मकीर्ती" हे नालंदा विश्वविद्यापीठाचे प्रमाणशास्त्राचे विद्वान विद्यार्थी होते. धर्मकीर्ती यांनी "प्रमाणवर्तिका" हा ग्रंथ लिहिला.* त्यांच्या नुसार वस्तुच्या अनुभूतीची सत्यता ही त्या वस्तुच्या अपेक्षित कामाची क्षमता असते. प्रत्येक वस्तुचे स्वलक्षण हे क्षणिक असते. बौद्ध तत्वज्ञान दोन सत्य मानते - संवृत्ती सत्य आणि परमार्थ सत्य. 'प्रमाणवाद' सिद्धांताची मांडणी आणि त्याची तत्वज्ञानिक मीमांसा याचे श्रेय दिग्नाग आणि धर्मकीर्ती यांना जाते. *धर्मकीर्ती यांनी 'संबंधपरीक्षावृत्ती', 'प्रमाणाविनिश्चय', 'प्रमाणवृत्तिकाकारिका', 'न्यायबिंदुप्रकरण', 'हेतुबिंदुनामप्रकरण', 'वादन्यायानामप्रकरण'  अशा अभ्यासू ग्रंथांची निर्मिती केली.*_    

७. _*"गुणप्रभा" हे वसुबंधूंचे शिष्य होते आणि विनयपिटकावर स्वतःचे भाष्य "विनायसूत्र" लिहिले जे आजही एक प्रमुख ग्रंथ मानण्यात येतो.*_

८. _*"शक्यप्रभा" हे नालंदाचे आचार्य शांतरक्षित यांचे शिष्य होते व 'विनय' मध्ये अतिशय विद्वान समजले जात.* त्यांनी काश्मीर मध्ये बुद्धविचारांचा जोरदार प्रचार केला._

९. _*"बुद्धपालित" यांनी नागार्जुन आणि आर्यदेव यांच्या ग्रंथावर अतिशय विद्वत्तापूर्ण टीका लिहिली. मध्यमका-प्रासंगिक विचारधारेचे ते संस्थापक समजले जातात. नागार्जुन यांच्या 'मुलशास्त्र' वर त्यांनी 'बुद्धपालितवृत्ति' नावाची टीका लिहिली.*_

१०. _*"भावविवेक" हे बुद्धपालित यांच्या समकालीन होते व त्यांनी देखील नागार्जुनांच्या ग्रंथावर "प्रज्ञाप्रदीपा" नावाची टीका लिहिली.* त्यांच्या मते 'निस्वभाव' किंवा 'स्वभावशून्यता' हे स्वातंत्रानुमना हवी. *प्रासंगिक विचारधारेपेक्षा स्वतंत्र विचारधारा प्रस्थापित केल्यामुळे त्यांना 'स्वतंत्रिका-मध्यमका' विचारधारेचे संस्थापक समजले जातात. 'मध्यमकाहृदयकारिका' आणि त्यावरची स्वटिका 'तर्कज्वाला' हे स्वतंत्र ग्रंथ लिहिले.* भारतीय तर्कशास्त्रात, दोन विधानांवरून निष्कर्ष किंवा अनुमान काढण्याची पद्धत भावविवेक यांनी प्रथम सुरु केली._

११. _*"चंद्रकीर्ती" हे नालंदाचे विद्यार्थी होते ज्यांनी नागार्जुनांच्या विचारधारेचे प्रवर्तक समजले जातात. त्यांनी 'प्रसन्नपदा', 'माध्यमकावतारा', 'चतुःशतकटिका', 'युक्तिशस्तिकावृत्ती', 'शून्यतासप्तवृत्ती', आणि 'त्रिशरणसप्तति' ग्रंथ लिहिले.*_

१२. _*"शांतरक्षिता" यांनी तिबेट मध्ये सर्वात पहिले विहार बांधले आणि अनेक तरुणांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली.* त्यांच्यामुळे तिबेटमध्ये बुद्धविचार विशेषतः महायान विचारधारा यांचा प्रसार झाला. *शांतरक्षिता यांनी 'अष्टतथागतस्तोत्र', 'तत्वसद्धी', 'संवरविमशकवृत्ती', सत्यद्वयविभंगपंजिका', 'परमार्थविनिश्चय', 'वादन्यायटिकाविपणचितार्थ', 'तत्त्वसंग्रह' आणि 'माध्यमकलांकार' हे ग्रंथ लिहिले.*_

१३-१४. _*"कमलशीला" आणि "हरिभद्र" हे दोघे शांतरक्षित यांचे विद्वान शिष्य होय.* प्रमाण आणि ध्यान या विषयांत हे दोघे पारंगत होते. *कमलशीला यांनी 'भावनाक्रम' नावाचे तीन ग्रंथ ध्यानावर लिहिले, तर हरिभद्र यांनी प्रमाण, माध्यमका आणि अभिधम्मावर, 'अभिसमयालंकार-लोकप्रज्ञापारमिता व्याख्या' आणि 'अभिसमयालंकारविवरती' तसेच प्रज्ञापारमितावर पंचवीस हजार ओळींच्या व्याख्येचे पुनर्लिखाण केले.*_

१५. _*"विमुक्तीसेना" हे प्रज्ञापारमितेचे एक आचार्य होते ज्यांनी 'अभिसमलंकार'वर टीका लिहिली. वसुबंधूंच्या चार विद्वान शिष्यांपैकी हे सर्वोत्तम होय.* ते सर्व पारमिता विशेषतः प्रज्ञापारमिता मध्ये अतिशय अभ्यासू आणि दिशादर्शक मानले जातात._    

१६. _*"शान्तिदेवा" हे नालंदाचे विद्वान होते ज्यांनी बोधिचित्त आणि सहा पारमितांवर आधारित 'बोधिचर्यावतर' हा महत्वपूर्ण ग्रंथ लिहिला. शिक्षासमुच्चया कारिका' हा एक ग्रंथ शांतीदेवांनी लिहिला.*_

१७. _*"अतिशा" हे नालंदाच्या 'बोधिसत्व' विद्यार्थ्यांमधले शेवटचे विद्यार्थी होय. 'बोधिपथप्रदिपा' हा ध्यानमार्गाचे अप्रतिम ग्रंथ असून ध्यानाच्या उच्चतम अवस्थाप्रप्तीसाठी अभ्यासनीय आहे. 'बोधिपथप्रदिपापंजिकानामा', 'चरयासंग्रहप्रदिपा', 'बोधिसत्त्वमान्यवली', माध्यमकारत्नप्रदिपा', 'महायानपथसाधनासंग्रह', 'शिक्षासमुच्चया अभिसमया', 'प्रज्ञापारमितापिण्डार्थप्रदिपा', 'एकवीरासाधना' आणि 'विमलरत्नलेखा' हे ग्रंथ अतिशा यांनी लिहिले.*_ 

_नालंदा विश्वविद्यापीठ हे बुद्धांच्या काळानंतरचे प्रथमच असे अभ्यासकेंद्र होते जेथे त्यांच्या प्रत्येक विचारांचा काटेकोर अभ्यास, सटीक विश्लेषण आणि प्रदीर्घ काळापर्यंत ग्रंथनिर्मिती चालू होती. म्हणूनच येथे ज्ञानियांचा मळा सतत बहरलेला होता आणि त्यातूनच बोधिसत्वांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते. नालंदा मधील या "बोधिसत्व" विद्यार्थ्यांनी अनेक नवीन ज्ञानशाखा सुरू केल्या ज्यांचा अभ्यास आजही जगभर चालू आहे. भारतीय इतिहासात कोणत्याही संस्कृतीने येवढे प्रचंड योगदान शिक्षण क्षेत्रात दिले नाही....म्हणून तर त्याकाळी भारत हा खरा "विश्वगुरू" होता!_

*_अतुल मुरलीधर भोसेकर_*

९५४५२७७४१०

Saturday, 2 November 2024

दिवाळी बौद्धांचा सण....?

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_दिवाळी बौद्धांचा सण....?_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2024/11/blog-post_2.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

_६८ वर्षे झाली बाबासाहेबांनी आपल्याला धम्म देवून. पण एवढ्या वर्षात आम्हाला बौध्द धर्माचे सण उत्सव काय होते हे प्रमाणित करता आलेले नाहीत. यापेक्षा मोठे दुर्दैव काय असेल. मानव हा उत्सवप्रिय आहे. सण उत्सव यांच्याशिवाय त्याचे जगणे म्हणजे वाळवंटात रखरखत्या उन्हात जीवन व्यतीत करणे आहे. *मग प्रश्न असा आहे की बौद्ध काळापासून बौद्धांचे काहीच उत्सव होते का नव्हते?*_ 

_दिवाळीच काय.... पण अजून काही बौद्धांचे सण आहेत का म्हणून लहान मुलं प्रश्न विचारत असतांना आई वडिलांना त्याचे  उत्तर आजही देता येत  नाही. आपण दिवाळी साजरी करायची नाही कारण तो तर हिंदूंचा सण आहे म्हणून आम्ही लेबल लावून मोकळे झालोय हे समजून घेणे आवश्यक आहे. *दिवाळी  हा सण विशिष्ट धर्माचा होता असा लिखित पुरावा कुठेही नाही. दुसरी महत्वाची बाब या कालखंडात बौध्द धर्मीय लोकांमध्ये कोणत्या घटना घडल्याच नव्हत्या का?*  बौद्धांचा इतिहास बौद्धांनाच आज माहिती नाही._

_*दिवाळीच्या दिवशी बौध्द लेण्यात दिव्यांची आरास लावली जात होती हे जेंव्हा आपण बौद्ध लेण्यांचा अभ्यास करायला लागू तेंव्हा आपल्याला नेमका इतिहास अभ्यासायला मिळतो, त्यावेळची समाज व्यवस्था, रीत- रिवाज पाहायला मिळतो.*_

👉 *_साधारण इसवी सन १०० ते ६००  या कालखंडात लेण्यामध्ये राहणाऱ्या लोकांचे जीवनमान कसे होते यावर जर आपण प्रकाश टाकला तर याचे  उत्तर नक्की मिळते.  बॉम्बे प्रेसिडेन्सी च्या खंड १४ मध्ये पान नं १४५ वर दिवाळी चा उल्लेख आहे आणि याकाळात कान्हेरी लेणी वर दिवे लावले जात होते असा उल्लेख सापडतो. एकूण सांगायचे झाले तर दिवाळी हा काही विशिष्ट धर्माचा सण नाही तो खऱ्या अर्थाने निसर्गपूजक लोकांनी निर्माण केलेला उत्सव आहे._* 

👉 _*कालांतराने त्यात प्रतिक्रांती झाली आणि हा सण इतर धर्मियांनी आपलासा केला... हे जरी असले तरी दिवाळी हि कान्हेरी लेणी मध्ये साजरी होत असेल तर तो सण बौद्धांचा नक्कीच आहे यात शंका नाही. आणि दिवे लावण्याची बौध्द परंपरा आहेच, मग तो बुद्ध मूर्ती पुढे देखील लावला जात असे आणि त्यासाठी अनुदान दिल्याचे शिलालेख देखील आहेत.*_ 

👉 _*आजही जे जे लेण्यांवर अभ्यास करतात, त्यांचे संवर्धन करतात असे बरेच समूह ह्या दिवसांत आपल्या समाजाला ह्या दिवसाचे महत्व लक्षात राहावे म्हणून लेण्यांवर दिपदानोत्सव साजरा करतात.*_

👉 _बौध्द संस्कृतीनुसार तुम्ही दिवाळी कशी साजरी करायची ह्यासाठी बौध्द संस्कृती  प्रथम स्वतः आपल्याला त्याची माहिती असायला हवी, *आमच्या लोकांनी संशोधक वर्ग उभा करून बौध्द संस्कृतीचे सण उत्सव शोधले पाहिजेत.* आम्ही आमचा नेमका इतिहास विसरून विहारात इतर महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करण्यात आपला मौल्यवान वेळ वाया घालवत आहोत. जो वेळ बौध्द संस्कृतीचे महान नायक यांना शोधण्यात अभ्यासण्यात वापरला गेला असता... *पण ह्या व्हॉट्सपच्या विद्यापीठात कॉपी पेस्टचे आयुष्य जगत असताना आम्हाला नवीन संशोधन करायचं नाही, नवीन काही अभ्यासायचे नाही पण ह्या अश्या करण्याने बौध्द संस्कृतीचे महान नायक आम्ही विसरून गेलो त्याचे काय ?*_

_दिवाळीत आम्हांला बळीराजा आठवतो काय तर म्हणे शेतकऱ्याचा राजा. बळीवंश अभ्यासण्यात आम्ही धन्यता मानतो पण आमच्या हातात..._

१. *सातवाहन वंश आहे का?* 

२. *मौर्य वंश आहे का?* 

३. *कुशाण वंश आहे का?* 

४. *वाकाटक वंश आहे का?*

५. *दिवाळीच्या काळात सम्राट अशोक आठवले पाहिजेत पण आम्हाला ते आठवत नाहीत.*

_असे किती तरी नाव घेता येतील. आमच्या डोक्यात भरला गेलाय तो द्वेष भाव. यामुळे आम्ही आमचा इतिहास विसरून गेलोय._

_इथे एक गोष्ट अजून सांगायची आहे  ती म्हणजे काही लोक *दिवाळी बौद्धांनी का साजरी करू नये, तर महामोगल्लान यांची हत्या झाली म्हणून आपण दिवाळी साजरी करू नये.

_महामोग्गल्लान थेर यांचा मृत्यू कसा झाला याचा लिखित पुरावा त्रिपिटकात आपल्या सापडतो ... तो पुढील प्रमाणे :-_

_सुत्तपिटक 👉🏾 धम्मपद 👉🏾 १० दण्डवग्गो मधील गाथा क्रमांक १३७, १३८, १३८, १४० या गाथा विस्तृतपणे समजण्यासाठी खालीलप्रमाणे 👉_

*_सूत्तपिटक अट्ठकथा 👉🏾 धम्मपद अट्ठकथा 👉🏾 १० दण्डवग्गो 👉🏾 ७ महामोग्गल्लानथेरवत्थु_*

_या अट्ठकथेचा ज्यांनी अभ्यास केला ते असे कधीच म्हणू शकत नाही की *ही हत्या ब्राह्मणांनी करून त्यांच्या कवटीत तेल टाकून दिवाळी सण सुरू करण्यात आला.*_

*_महामोग्गल्लाथेर यांची हत्या आणि दिवाळी यांचा काहीही संबंध येत नाही, हे आपण वरील उदाहरणांवरून सिद्ध करू शकतो_*

_आपण वर महामोगल्लान यांच्या हत्येचा संदर्भ घेतला.... *बुद्ध महामोगल्लान किंवा सारीपुत्त यांचे परिनिर्वान झाल्यानंतर दुःख करीत नाही बसले, तो एक अनित्य सिद्धांतांचा बोध होता. त्यांनी त्या नंतर ही धम्माचा प्रसार प्रचार करण्याचे काम चालूच ठेवले.*_ 

_एक उदाहरण घेऊ ६ डिसेंबरला अखंड भारतातून चैत्यभूमीवर आंबेडकरी अनुयायी येत असतात... पण ते दुःख करीत बसत नाही,_

अ) ते अनुयायी केंडल मार्च काढतात, 

आ) उपोसथ ठेवतात, 

इ) पुस्तके घेऊन एक प्रकारे बाबासाहेबाना मानवंदना देतात, 

इ) बाहेरून येणाऱ्या लोकांना भोजन दान ठेवतात की नाही?.... 

इ) आणि त्या ऊर्जा भूमीवरून ऊर्जा घेऊन, वर्षभराचा संकल्प करतात की मी बाबासाहेबांचे कार्य करीत राहीन._

*_दिवाळीमध्ये काय करू नये..._*

१. _२२ प्रतिज्ञेत सांगितले आहे की, पहिल्या १ ते ५ हिंदू धर्मातील देव देवतांना मानणार नाही आणि त्यांची उपासना करणार नाही... आणि ७ वी प्रतिज्ञा.. मी बौद्धधम्माच्या विरुद्ध विसंगत असे कोणतेही आचरण करणार नाही._

         _म्हणजे जी काही प्रतिक्रांती झाली आहे त्याविरुद्ध मी कार्य करेन म्हणजेच लक्ष्मी पूजन, घरातले दाग - दागिने, झाडू ई. यांचे पूजन करणार नाही._

२.  _प्रतिज्ञा क्रमांक ८  मी कोणतेही क्रियाकर्म ब्राह्मणाचे हातून करवून घेणार नाही. म्हणजेच या वरील पूजा तर मी करणार नाहीत सोबत त्या करण्यासाठी कोणत्याही ब्राह्मणाला बोलवणार नाही._

३. _इतरांना त्रास होईल असे फटाके फोडणार नाही._

४. _हवेचे प्रदूषण रोखण्यासाठी माझ्याकडुन जेवढे होईल तेवढे प्रयत्न मी करेल सोबत इतरांना ही सांगण्याचा मी प्रयत्न करेन._

*_दिवाळीमध्ये काय करावे..._*

१. _बौध्द भिक्खूंना बोलावुन चीवर दान करा आणि दिवाळी साजरी करा._

२. _तुमच्या मुलांमध्ये देखील बौध्द भिक्खू यांच्याबद्दल आदर निर्माण होण्यासाठी दिवाळी साजरी करा कारण एरवी बौध्द भिक्खू तुमच्या घरात येतच नाहीत किंवा तुम्ही तुमच्या मुलांना घेऊन त्यांच्याकडे जात नाहीत._

३. _बौध्द भिक्खू आणि उपासक यांच्यात एक दुरी बनलेली आहे. ती मोडीत काढण्यासाठीच हा उत्सव होता._

४. _आमच्या मुलांना दिवाळी हा बौध्द संस्कृतीचा एक सण आहे हे पटवून द्या._ 

५. _या दिवशी बौध्द भिक्खू एकत्र भेटत असत. (नुकताच वर्षावास संपून भिक्खू संघ धम्म प्रचारासाठी बाहेर पडलेला असे)_

६. _दीप दान उस्तव या शब्दाचा अर्थ काय तर... ह्या दिवसांत अमावस्या असते आणि त्या काळात भिक्खू संघ हा गडद अंधाऱ्या लेण्यांत राहत असत. त्यांना इतर कोणत्याही प्राण्यांपासून ईजा होऊ नये म्हणून उपासक त्यांना दीप दान करीत असे._ 

७. _सोबत त्या दिवशी उपोसथाचे पालन करीत असे._

               _आजही आपण पौर्णिमा, अमावस्या, दोन अष्टमी ह्या दिवसांत उपोसथ ठेवत असतो. शिलांचे पालन करीत असतो._

८. _ज्याप्रमाणे लहान मुलांना दिवाळीत दिवाळीचा अभ्यास असतो तसाच अभ्यास आपण ही करू शकतो आणि बौद्ध संस्कृतीचा अभ्यास मुलांकडून करवून घेऊ शकतो (फक्त तो अभ्यास कोणता असतो हे पालकांना माहीत असावे)..._

९. _ह्या दिवसांत ९०% लोकांना दिवाळीचा बोनस मिळतो. तो बोनस पुस्तके खरेदी करिता, किंवा एखाद्या विद्यार्थ्याची निदान एका महिन्याची शाळेची फी भरण्यासाठी वापरात आणु शकतो._

१०. _त्या काळात आजच्या सारखे दिवे नव्हते म्हणून दीप दान होत होते, आज वीज आहे तर आपल्या जवळच्या भिक्खू संघाला औषधे, त्यांच्या एक महिन्याचे राशन (आज तो उपासक वर्ग राहिला नाही जो संघ जेंव्हा चारीका करायला येत असे तेंव्हा त्यांच्या भोजनव्यवस्थेकडे लक्ष देत असे) ई. देऊ शकतो._

११. _आज बऱ्याच बौद्ध धर्मीय मोनेंस्ट्री काम करीत आहेत, त्यांना विविध प्रकारे आपण मदत करू शकतो_

१२. _बाल संस्कार केंद्र या दिवसांत बऱ्याच ठिकाणी आयोजित केली जातात तिथे आपल्या मुलांना बौद्ध संस्कार मिळावे म्हणून त्यांचा उपयोग करू शकतो_

*_तसे म्हणायला गेले तर ही वर्षभर चालणारी कामे आहेत आणि ती करायलाच हवी. पण आपण दिवाळीच्या दिवसांत अशाही प्रकारे दिवाळी साजरी करून एक आदर्श निर्माण करूच शकतो. त्यासाठी अश्या सणांना नेहमी विरोधच करावा असे काही आहे का?_*

_*लेखाच्या शेवटी बुद्धांनी चार प्रकारचे मनुष्य सांगितले आहेत :-*_

१. *_अंधारातून अंधाराकडे जाणारा_*

२. *_अंधारातून प्रकाशाकडे जाणारा_*

३. *_प्रकाशाकडून आंधराकडे जाणारा_*

४. *_प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाणारा_*

         _बुद्ध वरील २ आणि ४ नंबरच्या मनुष्याचे गुणगान गातात. जे आपल्यातील *"राग, मोह, दोष"* या भावनांचा त्याग करून *बुद्धांनी दाखविलेल्या मार्गाकडे जात आहेत... म्हणजेच प्रकाशाकडे जात आहेत.*-

      _*आत्ता आपल्याला ठरवायचे आहे की आपल्याला सकारात्मक विचार करून, बुद्धांनी दाखविलेल्या मार्गाचे आचरण करून कोणत्या क्रमांकाचे मनुष्य बनायचे आहे?*_

_शेवटी आपण काय करावे आणि काय करू नये हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण आपण मानव प्राणी आहोत, जे संसारात रमतात, त्यांना शेजार धर्म ही आहे. *जर आपण एकमेकांच्या द्वेषात राहिलो, एका धर्माने दुसऱ्या धर्माचा द्वेष करीत राहिलो तर आपण समाजात आनंदी राहू शकतो का? आणि बुद्ध धम्म द्वेष शिकवीत नाही तर मैत्री शिकवितो....*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_लेखन :- महेश हरिश्चंद्र कांबळे_*

*दिनांक :-* ०३/११/२०२४

*_संदर्भ:-_*

१. *बॉम्बे प्रेसिडेन्सी च्या खंड १४ मध्ये पान नं १४५

🙏🙏🙏 *_भवतु सब्ब मङ्गलं_*🙏🙏🙏

                 🙏🙏🙏 *_नमो बुद्धाय_*🙏🙏🙏

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼



कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...