*_ध्यान - अलिखित ज्ञान_*
_बाह्य जगातून निवृत्त होत जेव्हा मन अंतर्मुख प्रवासाला सुरुवात करतं तेव्हा खऱ्या अर्थाने ध्यानाला सुरुवात होते. सहा वर्षांच्या खडतर तपसाधने नंतर, वैशाख पौर्णिमेच्या पूर्वरात्रीपासून सुरु झालेल्या सिद्धार्थाचा प्रवास, पौर्णिमेच्या पहिल्या प्रहरात संबोधी प्राप्त होऊन बुद्धत्त्वापर्यंत पोहोचतो. *या काळात झालेला प्रवास हे “ध्यान” आहे आणि म्हणूनच ध्यानाला बौद्ध धम्मात अनन्यसाधारण महत्त्व आहे. ध्यान हे बौद्ध धम्माचे हृदय आहे असे म्हटले जाते.* बुद्धांनी सांगितलेल्या ध्यानमार्गाचा अवलंब करून अनेक जण बुद्धत्त्वाच्या मार्गावर आरूढ झाले आणि एक 'ध्यान संप्रदाय' निर्माण झाला आहे._
_ध्यान संप्रदायाची अशी मान्यता आहे कि प्रत्येक जीवामध्ये बुद्ध स्वभाव अथवा बुद्धत्त्वाचे गुण आहेत. हे बुद्धत्त्वाचे गुण विकसित करून बुद्धत्त्वाच्या मार्गावर चालणे हे ध्यान संप्रदायाचे उद्धिष्ट आहे. *भ.बुद्धांनी भिक्खूंना म्हणाले होते, "कुल्लुपमं खो भिक्खवे धम्मं देसिस्सामि सन्तरणठ्ठाय नो गहणठ्ठाय" म्हणजे माझ्या धम्माचा उपयोग एका नावे सारखा ही संसाररूपी नदी पार करण्यासाठी करा". म्हणजेच जसे नदी ओलांडल्यानंतर आपण नावेतून उतरून निघून जातो, नावेला डोक्यावर घेऊन जात नाही, तसेच बोधिचित्त जागृत झाल्यावर धम्माला घट्ट धरून बसू नका.* पालि त्रिपिटक साहित्यात ध्यानासंबंधी अनेक उदाहरणे सापडतात. *वक्कलि नावाचा भिक्खू बुद्धांच्या प्रति आकर्षित होता. तो नेहमी बुद्धांकडे अनिमेष नेत्रांनी पाहत त्यांच्या सारखेच चालण्याचा, बसण्याचा प्रयत्न करी. त्यावेळीस बुद्धांनी त्याला सांगितले कि रूपकायाबद्दल एवढे आकर्षण नको. तुझ्या शरीरात जी घाण आहे ती माझ्याही शरीरात आहे; त्यामुळे धम्मातत्वांवर मन एकाग्र कर, रूपकायेवर नको. पालि त्रिपिटकात अनेक उदाहरणे सापडतात जेथे बुद्धांच्या ध्यानमग्न स्थितीचे वर्णन पाहायला मिळते. बुद्धांनी सर्वात पहिले ध्यान, ते राजकुमार सिद्धार्थ असताना, जांभूळ वृक्षाखाली केले होते. नंतर त्यांनी ध्यानाद्वारे संबोधी प्राप्त केली होती. त्यांना महापरिनिर्वाण देखील ध्यानाच्या वेगवेगळ्या अनुलोम प्रतिलोम अवस्थेत प्राप्त झाले. जो धम्म बुद्धांनी सांगितला त्याचे खरे आकलन ध्यानाशिवाय होऊ शकत नाही. अनेकवेळा बुद्ध स्वतः भिक्खूंना त्यांच्या योग्यतेनुसार ध्यानाचे विषय देत व त्यावर ध्यान करायला सांगत. पालि साहित्यात त्याला 'कम्मठ्ठान' म्हटले आहे. असे चाळीस कम्मठ्ठानाचे वर्णन त्रिपिटकात सापडते. शील, समाधी आणि प्रज्ञा ही बुद्धांची मूळ शिकवण होय. यात शील म्हणजे सदाचरण, नंतर समाधी म्हणजे ध्यान आणि ध्यानाच्या अभ्यासानेच प्रज्ञा प्राप्त होते. याच त्रिसूत्रींवर आचार्य बुद्धघोष यांनी 'विसुध्दिमग्ग' हा अप्रतिम ग्रंथ लिहिला.*_
_*ध्यानाभ्यासाची सुरुवात कशी झाली याचे एक सुंदर उदाहरण बौद्ध साहित्यात सापडते. एकदा गृध्रकूट पर्वतावर एका उपासकाने बुद्धांना देशना सुरु होण्यापूर्वी एक सोनेरी रंगाचे फुल आणून दिले. भ. बुद्ध त्या फुलाकडे बराच वेळ पाहत राहिले मात्र देशना दिली नाही. आचार्य महाकाश्यप यांनी ते पहिले आणि हसून या गोष्टीचे अनुमोदन केले. बुद्धांनी ते फुल महाकाश्यपांना दिले आणि प्रवचन द्यायला सांगितले. त्यावेळेस महाकाश्यप यांनी अनित्येवर प्रवचन दिले. ध्यान तत्वाचे हे सर्वात पहिले उदाहरण देण्यात येते. पुढे भ.बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर देखील आनंदला अर्हत पद प्राप्त झाले नव्हते. त्यामुळे ते पहिल्या धम्म संगितीमध्ये भाग घेऊ शकत नव्हते. त्यावेळेस महाकाश्यपांनी आनंदाला सांगितले, "आनंद, दरवाजावरचा ध्वज खाली उतरव". साहित्य असे सांगते कि आनंदाने या गोष्टीवर ध्यान करताच ते अर्हत झाले. पूर्वी विहारांमध्ये जेव्हा धम्मप्रवचन सुरु असे त्यावेळेस इतरांना कळावे म्हणून दारावर ध्वज लावला जायचा. धम्मध्वज खाली उतरवणे म्हणजे आता धम्मप्रवचन पुरे आणि अंतर्मनाचा प्रवास म्हणजे ध्यान करणे गरजेचे आहे हा संकेत आहे. म्हणजेच जो पर्यंत ध्यानाभ्यासातून धम्माच्या तत्वांचा अभ्यास होत नाही, तोपर्यंत बुद्धांचा धम्म कळणार नाही. बौद्ध धम्मात ध्यानाला एवढे महत्त्व आहे! पालि साहित्यातील त्रिपिटक आणि थेरगाथा किंवा थेरीगाथा मध्ये अनेकवेळा ध्यानाची प्रचिती येते.*_
_ध्यानाची सुरुवात जरी भारतात झाली असली तरी त्याचा प्रसार चीन मध्ये झाला आणि जपान मध्ये तो सार्वत्रिक झाला. *६व्या शतकात बौद्ध आचार्य बोधीधर्म यांनी चीनमध्ये सर्वात पहिल्यांदा ध्यानाचा प्रसार केला. चीन मध्ये ध्यान शब्दाचे रूपांतर 'चान' मध्ये झाले आणि पुढे जपान मध्ये 'झा-झेन' झाले. यालाच नंतर “झेन” म्हणून मान्यता मिळाली. "द सूत्र ऑफ वे लेंग" या पुस्तकात चीन मधील संपूर्ण ध्यान संप्रदायाचा इतिहास समजतो. चीन मधील 'ताओ' पंथ बौद्ध धम्मातील ध्यानसंप्रदायची शाखा आहे. जपान मध्ये ध्यानाचा अभ्यास अंदाजे ८व्या शतकाच्या दरम्यान झाला. चीन मधील येई-साई नावाच्या बौद्ध भिक्खूने जपान मध्ये ११व्या शतकात ध्यानाचा प्रसार केला. ते ज्या पंथाचे होते त्याचे मुख्य प्रवर्तक रिंजई नावाचे बौद्ध आचार्य होते. त्यामुळे त्यांच्याच नावाने जपान मधील ध्यान संप्रदाय अस्तित्वात आला. येई-साई यांनी ध्यानावर आधारित "कोजन-गोकोकू-रोन" नावाचे पुस्तक लिहिले ज्याचा अर्थ होतो "ध्यान मार्गाने राष्ट्राची सुरक्षा". आजही जपानच्या सैनिकांसाठी ध्यानाभ्यास त्यांच्या प्रशिक्षणाचा आणि दैनंदिनाचा भाग असतो. जपान मध्ये सोतो, ओबाकू नावाचे ध्यान संप्रदाय अस्तित्वात आले.*_
_*ध्यानाभ्यासात गुरु-शिष्य प्रश्नोत्तराचा संवाद म्हणजे 'कोआन' तर त्याचे उत्तर म्हणजे 'सटोरी'. कोआन मध्ये आचार्य शिष्याला एक एक प्रश्नाच्या द्वारा मनाच्या व चित्ताच्या एकाग्रते जवळ नेण्याचा प्रयत्न करतात आणि शिष्याला मिळालेले अध्यात्मिक उत्तर सटोरीच्या स्वरूपात असते. उदा. भिक्खुणी पटाचारा एकदा दिव्याकडे पाहत असताना अचानक वाऱ्याचा झोत आला आणि दिवा विझला. त्याक्षणी तिला अनित्याचं बोध झाला. चिनी ध्यानी गुरु तुंग शान हे नदी पार करीत असताना त्यांचे प्रतिबिंब त्यांना पाण्यात दिसले, मात्र लाटांमुळे प्रतिबिंब तुटत होते व पुन्हा जोडले जात होते. हे पाहताच त्यांना बोध झाला. पुढे याच सटोरीचा उपयोग जपानी कवी बशो यांनी 'हायकु' च्या माध्यमातून केला. अगदी मोजक्याच शब्दांत, ध्यानाच्या मार्गाने मनाच्या तळाशी जाण्याचा हा प्रयत्न आहे. जपान मधील 'सामुराई' हे योद्धा भिक्खू याच ध्यान संप्रदायाचे आहेत.*_
_ध्यान संप्रदाय एक परिकल्पना किंवा भावनात्मक कृती नाही. अतिशय वैज्ञानिक तथ्यांवर ती अवलंबून असून सर्व वैज्ञानिक कसोटींवर खरी उतरली आहे. ध्यानी गुरूंनी दिलेल्या उत्तरामुळे ध्यान प्रक्रिया खूप गूढ वाटते मात्र विचार केला तर ते सत्यच सांगतात हे लक्षात येते. हुई-नईंग यांना एका शिष्याने प्रश्न केला 'ध्यान म्हणजे तुम्हांला काय वाटते? गुरूंनी उत्तर दिले 'मला भूक लागली कि मी जेवतो, थकलो कि झोपतो'! ध्यान म्हणजे आपण करीत असलेली प्रत्येक गोष्ट 'साक्षीभावाने' म्हणजेच जागृत अवस्थेत करणे मात्र ती गोष्ट आपल्याला आसक्त करू नये इतकी तटस्था आपल्यात निर्माण झाली पाहिजे. प्रत्येक विचाराचे स्वत्व जाणणे म्हणजे ध्यान. हा ही एक अभ्यास आहे आणि त्यासाठी परिश्रम देखील घ्यावे लागतात._
_*चुल्ल राहुलोवाद सुत्तात भन्ते राहुलला समजावताना भ.बुद्ध त्याला भिक्षापात्रातील पाण्याचे आणि मनाचे उदाहरण देतात. त्या गोष्टींवर ध्यान करतानाच भन्ते राहुल अर्हत झाले. थेरीगाथा मधील उत्तमा ही सतत सात दिवस ध्यान करीत बसली होती. आठव्या दिवशी तिने पाय पसरले आणि आळस देताच तिला अज्ञानांधकाराचा बोध झाला. बुद्धांच्या धम्मात जसे क्रमिक शिक्षणाला (अणुपुब्बसिक्खा) महत्त्व आहे तसेच ते क्रमिक साधनेला (अणुपुब्बकिरिया) देखील महत्त्व आहे. म्हणूनच बुद्धांनी चित्ताच्या अभ्यासाबरोबरच चित्ताची एकाग्रता देखील महत्त्वाची मानली आहे. ही एकाग्रता साधण्यासाठी प्रत्येक क्षणी चित्ता प्रति जागरूकता महत्त्वाची आहे. चित्ताची शांती म्हणजेच 'शमथ ध्यान'. या शमथ ध्यानानंतरच केलेली विपस्सना हे साधकाला अर्हत मार्गासाठी योग्य आहे.* महायान पंथाचा उदय झाल्यानंतर त्याचे उपपंथ, तंत्रयान आणि वज्रयान यांनी देखील ध्यानाच्या विविध उपाय कौशल्य सांगितली आहेत. *बंगालच्या 'बाउल' संप्रदाय, उडीसा येथील धर्म संप्रदाय, महाराष्ट्रातील नाथ संप्रदाय, अद्वैत वेदांत, नागार्जुनांचा शून्यवाद, गोरखनाथांचा सुन्न आणि कबीरांच्या अनेक दोह्यात, ध्यान वेगवेगळ्या नावाने आणि क्रियेने अस्तित्वात आहे. कबीरांच्या भाषेत सांगायचे तर बुद्धांची देशना 'लेख' आहे तर बुद्धांचे ध्यान 'अ-लेख' आहे. म्हणजेच देशना ही ऐकून वाचून कळेल पण ध्यान हे अनुभूती शिवाय कळणार नाही! ध्यानाचे महत्त्व विशद करताना बुद्ध म्हणतात - यम्हि झानं च पञा च स वे निब्बाण सन्तीके (धम्मपद). म्हणजे ज्याने ध्यानाचा लाभ घेतला आहे आणि जो प्रज्ञावान आहे तो निब्बाणाच्या जवळ आहे.*_
*_अतुल मुरलीधर भोसेकर_*
९५४५२७७४१०
No comments:
Post a Comment