*_जातक - सर्वात प्राचीन नीतिकथा_*
_फार प्राचीन काळापासून मनुष्यासाठी कथा या नेहमीच मनोरंजनाचे साधन राहिले आहे. पिढी दर पिढी या कथांमध्ये बदल होत गेले आणि त्यांची संख्या देखील वाढत गेली. बुद्धपूर्व काळात मनोरंजन म्हणून सांगितलेल्या या कथांना, बुद्धकाळात व नंतर एक नवीन विचार लाभला आणि त्या नीतीच्या कथा म्हणून जनसामान्यात प्रसिद्ध पावल्या. _भ. बुद्धांच्या काळात या कथा, शीलसंवर्धन तसेच पारमिता यांचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या ठरल्या आणि म्हणूनच मनुष्याला त्याच्या आयुष्यातील 'स्वत्व' गवसावें यासाठी या नीतिकथा नंतर शृंखलाबद्ध पद्धतीने मांडण्यात आल्या.*_
_*पालि साहित्यात ज्या नऊ अंगाने भ. बुद्धांचे विचार मांडले गेले आहेत त्यांना 'नवांगबुद्धसासना' म्हटले गेले आहे. हे नऊ अंग म्हणजे सुत्त, गेय्य, वैय्याकरण, गाथा, उदान, इतिऊत्तक, जातक, अब्भुतधम्म आणि वेदल्ल. एका अर्थाने बुद्धविचार समजून घेण्याचे हे वेगवेगळे "जॉनर" आहेत.*_
_जातककथा या भ.बुद्धांच्या पूर्वायुष्याशी निगडित असून, त्या जन्मी 'बोधिसत्त्व' असलेले बुद्ध, हे कधी प्राणी, कधी झाड, कधी मनुष्य अथवा कोणी असामान्य जीव म्हणून केलेले नीतिकार्य, कथेच्या स्वरूपात लोकांसमोर मांडण्यात आले आहे. *जर सगळ्या कथा वाचल्या तर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते कि कथेचा नायक असलेला बोधिसत्त्व, नीतीशी कधीही प्रतारणा करीत नाही. एवढेच नव्हे, तर वेळ पडल्यास, शीलाचे पालन करण्यासाठी स्वतःचा जीव देखील देऊ शकतो. याचाच अर्थ, या कथांमध्ये 'शीलसंवर्धन' याला परमोच्च स्थान आहे! त्यामुळे 'जातककथा' या बुद्धांच्या पूर्वायुष्याशी संबंधित आहेत असे जरी दाखवल्या असल्या तरी मूलतः त्या "रूपक कथा" आहेत.* त्याकाळी सर्वसामान्य जनतेला शीलसंवर्धन अथवा नीतिमान आयुष्याचे महत्त्व कळावे म्हणून या कथा बुद्धांच्या पूर्वायुष्याची जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे नकळतपणे लोकांच्या मनावर बिंबवले जाते कि चांगले, शीलवान, नीतिमत्तेने आयुष्य जगले तर या आयुष्यात बुद्धत्त्वापर्यंत पोहचू शकता. दुसरे असे, कि बोधिसत्त्वाने दहा पारमिता प्राप्त केल्यानंतरच तो बुद्धत्त्वापर्यंत पोहोचतो हे दर्शविण्यासाठी अनेक जन्माच्या या कथा रचण्यात आल्या आहेत. *बुद्धविचारांना अभिप्रेत असलेले कम्म सिद्धांत म्हणजे कायिक, वाचिक आणि मानसिक आचार-विचार या बोधिसत्त्वामध्ये दिसतात ज्यांचा मुळात हा हेतूच आहे कि सर्वसामान्यांनी त्यातून शिकावे आणि अशा पाचशे पेक्षा जास्त कथांमधून, हे बुद्धविचार पिढी दर पिढी, त्याकाळात पोहचल्या.*_
_खरं तर 'बुद्धत्त्व' हे अढळ स्थान नव्हे. त्या स्थानावर पोहचल्यानंतर सतत जागरूकता महत्त्वाची आहे अन्यथा स्थानभ्रष्ट देखील होऊ शकते हे बुद्धांनी अनेकवेळा भिक्खू संघाला सांगितले आहे. सर्वसामान्य लोकांनी या कथांमधून बोध घ्यावा, आपल्या आयुष्याच्या जवळपास असलेल्या अनुभवातून शिकावे म्हणून या कथांची पार्श्वभूमी देखील वेगवेगळी आहे. तसेच काही जातक उदा. 'गूथपाणजातकं' या जातकात बोधिसत्त्वाची काहीच भूमिका दिसत नाही. या कथेत बोधिसत्त्व फक्त एक झाड म्हणून दाखविले आहे. त्या कथेतील पात्रांशी त्याचा कुठलाही संबंध येत नाही. किंवा 'अण्डभूतजातकं' ज्यात बोधिसत्त्व एक जुगारात जिंकण्यासाठी वाट्टेल त्या थराला जातो. याचाच अर्थ, *जातक कथा या मानवी भावभावनांचे दर्शन घडवत असतानाच, त्यातील नीती-अनीतीचे प्रश्न उपस्थित करून, विचार करायला लावून, मानवी मनाला उत्तर द्यायला भाग देखील पाडतात. अशा प्रकारच्या जातक आपल्याला 'काय करू नये' याची शिकवण देतात.*_
_*जातकात आपल्याला अनेक लोकप्रिय कथांचे मूळ दिसते. 'दसरथ जातकं' आणि 'जनक जातकं' मध्ये रामायणाची बीजे आहेत. 'देवधम्म जातकं' मधला संपूर्ण प्रसंग हा जसाच्या तसा महाभारताच्या काव्यात आला आहे. ग्रीक मधील काही मिथके, इसापनीती, पर्शियन लोककथा आणि त्याच्यातून निर्माण झालेल्या इंग्लंड मधील चौसर लोककथा आणि इटलीच्या बोकाशीओ लोककथा या सर्वांचा उगम, जातक कथांमधूनच झाला आहे. पंचतंत्रातील अनेक कथा जातक कथांशी साम्य दर्शवितात. जातक कथांमधला नायक हा मनुष्यांव्यतिरिक्त, झाडे, पशु किंवा पक्षी आहे, मात्र त्यांच्यातही मनुष्यांमधे आढळणारे सारे गुणदोष दिसतात. या जीवांमध्ये हे गुण दाखविण्याचे कारण म्हणजे बुद्धविचारां मध्ये असलेली 'वैश्विकता' ज्यामध्ये झाडे, पशु-पक्षी किंवा प्रत्येक जीवांप्रती असलेली करुणा आणि मेत्ता भावना होय. त्यामुळेच या सर्व जीवांचे 'मानवीयकरण' करून या कथांना लोकरंजक आणि उद्बोधक करण्यात आल्या आहेत.*_
*_आधुनिक काळातील किपलिंग, महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर यांच्या कथांमधून अथवा चित्रांमधून जातक डोकावताना दिसतात तर पाकिस्तान स्थित जगप्रसिद्ध उर्दू लेखक इंतिजार हुसेन यांच्या 'पत्ते', 'बस्ती', 'कच्छवे', 'बंदर' किंवा 'वापस' या कथा जातकांवर आधारित आहेत. अंटोनीन दोवारीक या चेक नाटककाराने 'रुसाल्का' नावाचा ऑपेरा लिहिला ज्याचे मूळ देवधम्म जातक आहे._*
_*सुत्त पिटकातील खुद्दक निकायातील 'जातक', हा ५४७ जातकांचा एक ग्रंथ आहे. यात अनेक कथांची पुनरुक्ती असल्यामुळे, एवढी संख्या दिसते. या सर्व कथांची रचना सारखीच आहे. सुरुवातीला कथेच्या प्रारंभी एक गाथा आहे जी संपूर्ण कथेचे सार सांगते नंतर दुसऱ्या भागात बुद्धांच्या काळातील एखाद्या वर्तमान घटनेशी ती जोडली जाते (पचुपन्नावत्थु). ही चर्चा भिक्खुंमध्ये सुरु असते आणि त्यामुळे बुद्ध पूर्वायुष्यातील एखाद्या घटनेशी ही कथा जोडतात (अतितावत्थु). तिसऱ्या भागात भ.बुद्ध त्या घटनेचे अन्वयार्थ लावत, पूर्वजन्मातील आणि वर्तमान जन्मातील व्यक्तिंचा संबंध सांगतात.*_
_जातक कथांचा लेखक कोण आहे किंवा किती जणांनी लिहिले हे स्पष्ट नाही, मात्र भ.बुद्धांच्या महापरिनिर्वाण पश्चात अंदाजे पाचशे वर्षामध्ये या लिहिल्या गेल्या आहेत हे निश्चित आहे. या कथांना किंबहुना त्यातील विचारांना महत्त्व प्राप्त व्हावे म्हणून ते बुद्धांनी म्हटल्याचे सांगितले गेले आहे. भौगोलिक दृष्ट्या पहिले तर या सर्व कथा कपिलवस्तू, श्रावस्ती, काशी आणि राजगृह येथे म्हटल्या गेल्या आहेत. *यातील काही निवडक पस्तीस कथा निवडून 'चारियापिटक' या नावाचा स्वतंत्र ग्रंथ त्रिपिटकात आढळतो. भारहूत, अमरावती आणि सांची येथील स्तूपाच्या कुम्पणपट्टीवर जातक कोरलेली दिसतात तर अजंठा बुद्ध लेणींत या कथांचे चित्र पाहायला मिळतात.* या वरूनच आपल्याला लक्षात येते कि जनसामान्यात जातककथा किती प्रसिद्ध होत्या. या कथांमधून प्राचीन भारतातील मनुष्य स्वभावाचे सटीक चित्रण आपल्याला पाहायला मिळते. *म्हणूनच भारत, श्रीलंका, चीन, तिबेट, नेपाळ येथील कलाकारांमध्ये या कथा अतिशय प्रिय आहेत. त्यातील कथांच्या रचनेवरून आणि त्यांचे त्रिपिटकातील संदर्भावरून जातकांच्या रचनेचा काळ अंदाजे इ.स.पूर्व तिसऱ्या शतकाचा मानण्यात येतो. 'अवदानशतक' मध्ये वीस जातककथा आहेत.*_
_*व्ही फॉसबॉल या जर्मन अभ्यासकाने सर्वात पहिल्यांदा पालि जातकठ्ठकथांचे रोमन लिपीमध्ये लिप्यांतरण केले. सिंहलीमध्ये प्राचीन ताडपत्रांवर लिहिलेल्या जातकठ्ठकथा गोळा करून त्यांच्या भाषांतर आणि त्यानंतर छपाईसाठी त्यांनी तब्बल वीस वर्षे कष्ट घेतले. त्यांच्या संस्करणाचाच उपयोग जगभरातील अभ्यासकांना आजही होत आहे. पालि त्रिपिटक लिपिबद्ध होई पर्यंत बुद्धवचन तोंडपाठ असणाऱ्या भिक्खूंना 'भाणक' म्हणत. 'जातकभाणक' म्हणवणाऱ्या भिक्खूंना संपूर्ण जातक त्यांच्या अठ्ठकथांसह तोंडपाठ असे. कालांतराने इ.स.पूर्व पहिल्या शतकात हे सर्व लिपिबद्ध झाले.*_
_*आर्यशूर या चवथ्या शतकातील बौद्ध आचार्यांनी संस्कृत भाषेमध्ये 'जातकमाला' काव्य लिहिले ज्यात मूळ पालितील ३४ जातक असून त्या सर्व बोधिसत्त्वाच्या पारमिते वर आधारित आहेत. १८९० साली एच केर्न यांनी सर्वात पहिल्यांदा या काव्याचे भाषांतर केले. जातककथा या सुत्त आणि विनय पिटकात देखील पाहायला मिळतात. उदा. सुखविहारी, तित्तिर, खंडवत्त जातकं. काही गाथा धम्मपद मध्ये देखील पाहायला मिळतात.* जातक अनेक निपात (भाग) मध्ये विभागले आहे. पहिल्या निपातात दीडशे गोष्टी असून प्रत्येक गोष्टीत एक गाथा आहे, दुसऱ्या निपातात शंभर गोष्टी आहेत ज्यात प्रत्येक गोष्टीत दोन गाथा आहेत, तिसऱ्या आणि चवथ्या निपातात प्रत्येकी पन्नास गोष्टी असून, त्यात तीन आणि चार गाथा अनुक्रमे आहेत तर एकविसाव्या निपातात पाच गोष्टी असून त्यात प्रत्येकी ऐंशी गाथा आहेत आणि बाविसाव्या निपातात दहा गोष्टी असून त्यांच्या गाथांची संख्या जास्त आहे._
_*जातकात मानवी स्वभावातील आसक्ती, लोभ, राग, द्वेष, मत्सर, मूर्खपणा, सत्ता तसेच करुणा, मेत्ता, दान, आदर, सत्य, अहिंसा, प्रज्ञा, अनुमोदन यांच्याबद्दल रूपके आहेत. या कथा मानवी स्वभावाच्या हुबेहूब व्यक्तिरेखन असल्यामुळे त्या केवळ वाचनीयच नाही तर उद्बोधक देखील आहेत.* अभ्यासकांनी जातककथांना वेगवेगळा अन्वयार्थ लावला आहे. त्यात काही मते एकमेकांना पूरक आहेत तर काही अतिशय विरोधाभासी आहेत. *जातकातील उदाहरण देऊन सांगायचे झाल्यास "किंसुकोपम जातकं" मध्ये राज्याचा सारथी तेथील चार राजकुमारांना किंसुक या प्रसिद्ध वृक्षाला वेगवेगळ्या काळात दाखवितो. त्यामुळे प्रत्येकाला किंसुक या वृक्षाबद्दल वेगवेगळे मत तयार होते. जेव्हा ते त्याचे वर्णन करतात तेव्हा एकाला तो खोडासारखा दिसतो, तर दुसरा त्याला पालवी फुटलेली असताना पाहतो, तिसऱ्या राजकुमाराला तो वृक्ष झुपकेदार दिसतो तर चवथ्या राजकुमाराला तो डेरेदार दिसतो. प्रत्येकजण आपापल्या मतावर ठाम असतो, मात्र राजा, जो बोधिसत्त्व आहे, तो सांगतो कि वृक्ष एकच आहे मात्र प्रत्येकाने त्याला वेगवेगळ्या स्थितीत पाहिल्यामुळे वेगळा भासतो. हेच जातककथांचे गुण आणि सामर्थ्य देखील आहे.*_
_जातक कथा या उत्क्रांती, अंतर्यात्रा आणि नवीन दृष्टीकोनाची सुरुवात दर्शवितो. या गोष्टींमध्ये बोधिसत्व एखाद्या जिवासारखा जन्म घेतो किंबहुना त्याचे रूपांतर होते. या गोष्टींतून दिलेला नीतीचा संदेश मनुष्याचा 'स्वत्व' शोधण्यासाठी केलेला प्रवास हा 'आतल्या' दिशेला आहे. आधुनिक मानसशास्त्र सांगते कि पशु-प्राण्यांचे अनेक गुण-अवगुण मनुष्यात त्याच्या वेगवेगळ्या मनाच्या अवस्थेत दिसतात. जातक कथांनी पशु-पक्ष्यांमध्ये मनुष्याचे गुण दाखविले आहेत! एकाच व्यक्तीचे, अनेक वेळा, वेगवेगळ्या रूपात जन्म दाखविणे हे चराचर सृष्टीचे परस्पर संबंधाचे धोतक होय. गोष्टींमधल्या सार तत्वांची पुनरुवृत्ती म्हणूनच गरजेची आहे._
_*जातक सारख्या नीतिकथा या लोककथेचे माध्यम बनून लोकसमूहामध्ये प्रसारित होत राहतात. प्रत्येक कथेतील बोधिसत्वाच्या भूमिकेशी आपण जोडले जातो आणि कळत-नकळत आपण बुद्धांच्या विचारांकडे आकर्षित होतो. अडीच हजार वर्षांपूर्वी बुद्धांनी दिलेला हा नरेटिव्ह म्हणूनच आजही तितकाच सशक्त भासतो.*_
*_अतुल मुरलीधर भोसेकर_*
*_बौद्ध संस्कृती अभ्यासक_*
९५४५२७७४१०
No comments:
Post a Comment