🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_पालि वाङ्गमयाचा भारतीय संस्कृतीवर प्रभाव_*
https://mikamblemahesh.blogspot.com/2024/11/blog-post_9.html
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
_अनादी काळापासून मानवाने प्रगतीचा आलेख तयार केला. त्यापैकी सर्वात विकसित गोष्ट म्हणजे संस्कृती त्याने एक कल्चर निर्माण केले._
*_Meaning of Culture: संस्कृतीचा अर्थ :-_*
_संस्कृती हा शब्द रोजच्या व्यवहारात आपण वापरतो. विशेष म्हणजे दैनंदिन व्यवहारात वेगवेगळ्या अर्थात हा शब्द वापरला जातो. परंतु समाजशास्त्रीयदृष्ट्या त्याच्या वेगळ्या व्याख्या अनेक शास्त्रज्ञांनी केलेल्या आहेत._
*_डॉ. इरावती कर्वे, एडवर्ड टायलर, राल्फ लिग्टन, किसिंग बोगार्डेस, मॉलिनोव्हस्की यांच्या संस्कृतीबाबतच्या व्याख्या महत्वपूर्ण मानल्या जातात._*
१. _या संदर्भात *एडवर्ड टायलर (Edward Tylor) चे मत असे आहे की, समाजाचा एक सदस्य म्हणून मानव जे ज्ञान, कला, श्रद्धा, नीतीतत्वे, कायदे, परंपरा, इतर क्षमता, सवयी तसेच इतर तत्सम गोष्टी संपादित करतो, त्या सर्वांच्या संमिश्र एकीकरणास संस्कृती असे म्हणतात.*_
२. _*समाजशास्त्रज्ञ हरस्कोव्हिटस (Herskovits) यांचे मते संस्कृती हा वातावरणाचा मानव निर्मित भाग आहे. Culture is the man made part of the environment.*_
३. *_बोगाईस यांचे स्पष्टीकरण असे की, समुहाचे कार्य करणे आणि विचार करण्याच्या सर्व गोष्टी म्हणजे संस्कृती होय._*
४. _त्याचप्रमाणे *मॅलिनोव्हस्की म्हणतात की, ज्यांच्याद्वारे मानव आपली उद्दिष्टे साध्य करतो ती मानव निर्मित साधने व माध्यम म्हणजे संस्कृती होय. Culture is the hardwork of man and the medium through which he actives his ends.*_
*_भारतीय संस्कृती :-_*
_शास्त्रज्ञांच्या या विविध मतांच्या आधारे भारतीय संस्कृती वैदिक, बौद्ध आणि जैन संस्कृतीचे समन्वित रूप आहे. अनेकात्मकता आणि विविधतेत एकात्मता आणि एकता तिची विशेषता आहे. यामुळेच त्यानंतर निर्माण झालेल्या संस्कृतीच्या प्रक्रिया ह्या एक दुसऱ्यांनी प्रभावित झालेली दिसते. याशिवाय प्रत्येक संस्कृतीने भारतीय संस्कृतीला आपल्या योगदानाने समृद्ध केले आहे._
_*बौद्ध धम्म आणि संस्कृती श्रमण संस्कृतीचे प्रेरक प्रणाली आहे. त्याचे प्रासाद सम (समानता) शम (शांती) आणि श्रम (परिश्रम) ह्या तीन प्रमुख स्तंभावर आधारित आहे.* यानुसारच समाजाचे संघटन ह्या तीनही सिद्धान्तावर प्रतिष्ठित झाले आहे. *विषमता विसरून समानता, श्रमशीलता आणि क्षमाशीलता अशा कल्याणमार्गाने समाज आणि राष्ट्राने आपली प्रगती करावी याचे निर्देश यात आहे. व्यक्तीच्या श्रेष्ठत्वाचे प्रमाण त्याची ज्ञानमयकृती आणि चरित्र असावे. अहिंसात्मक साधनेने ह्या तिन्ही साधनेत निर्मलता वाढते आणि समत्वाची प्रतिष्ठा होते. हीच श्रेष्ठ भारतीय - संस्कृतीची आधारशीला मानली जाते. ही संस्कृती पालि वाङ्गमयातून प्रतिबिंबित होते. म्हणूनच पालि वाङ्गमय हे विकसित भारतीय संस्कृतीचे प्रतिक मानल्यास पालि वाङ्गमयाचा म्हणजेच बुद्धवचनाचा भारतीय संस्कृतीवर पोषक प्रभाव असल्याचे निदर्शनास येते.*_
*_पाली वाङ्गमय अर्थात बुद्धवचनः-_*
_पालि वाङ्गमय हेच त्रिपिटक नावाने परिचित झालेले आहे. त्रिपिटक म्हणजे बुद्धवचन भगवान बुद्धाच्या आविर्भावाच्या - समकालीन परिस्थितीचे चित्रण विदारक होते. सहा संप्रदायाचे तत्वचिंतक आपापल्या स्तरावर समाजपरिवर्तनाची आपली जिज्ञासा व्यक्त करण्याच्या प्रयत्नात होते. अशा पार्श्वभूमीवर तथागताचे - पदार्पण समाजाभिमुख ठरले._
_*तथागतांनी सर्वोत्तम ज्ञान, सम्बोधी प्राप्त करून 'बुद्ध' पदाला पोहोचले. तत्कालीन ६२ मिध्यादृष्टींचा पर्दाफाश केला. पंचेचाळीस वर्षे देशभर निरंतर भ्रमंती करून धम्म प्रवेदित केला. त्या धम्मोप्पवेदित देसनेचे संकलित रूप त्रिपिटक वाङ्गमय तयार करण्यात आले. यामधूनच बुद्धांचे प्रामाणिक व्यक्तिमत्व प्रतिबिंबित होते. संगीतीच्या माध्यमातून त्यांच्या देसनेला वाङ्गमयाचे रूप आकारात आणले गेले. हे संपूर्ण साहित्य म्हणजेच बौद्ध वाङ्गमय विश्ववाङ्गमयाचा एक अमूल्य निधी आहे.*_
_*सुत्तपिटकाचे पांचही निकाय, विनयपिटक आणि अभिधम्म यातून तथागतांचे प्रामाणिक वचन दृष्टीगत होतात. यामधून बुद्धांचे प्रमुख चिंतन चार आर्यसत्य, आर्य अष्टांगिक मार्ग, कम्मक्खन्ध, प्रतित्यसमुत्पाद, शून्यवाद, अनित्य, अनात्म, दुःख इत्यादीचे स्पष्टीकरण केलेले आहे. यासोबतच सामाजिक जीवनातील अहिंसा, मैत्री, बंधुभाव, प्रेम, दान, शीलाचार अशा मूल्यांना प्ररोपित केले. ह्या सर्व नैतिक मूल्यांचा, तत्वज्ञानाचा, आदर्शाचा सारासार उहापोह वाङ्गमयातून झळकतो. अर्थातच हेच पालि वाङ्गमय बुद्धवचन आदर्श समाज जीवनाची आधारशीला बनण्यास समर्थ ठरते.*_
*_पाली वाङ्गमयाचा प्रभाव :-_*
_भारतीय संस्कृतीच्या आचार, धर्म, भाषा, शिल्प, ललितकला, शासन आणि तत्वज्ञान इत्यादी क्षेत्रांमध्ये बौद्ध पालि वाङ्गमयाने एक नवीन विशेषता समाविष्ट करून उन्नतीचा मार्ग गाठला आहे. भारतीय संस्कृतीच्या विकासाला व्यापक प्रेरणा मिळाली. त्याचप्रमाणे बुद्ध तत्वज्ञान हे एक गौरवमय अंगच मानले जाते; तो एक मूलभूत गाभा आहे. धम्मपदातील ब्राह्मणवग्गानुसार ब्राह्मण कोणाला म्हणावे याचे सत्य प्रारूप जगासमोर आलेले आहे आणि कृतीला महत्व प्रदान झाले. सामाजिक, धार्मिक-तात्विक अराजकता, नैतिक विडंबन, मिथ्याचार आणि वैचारिक दिशाभूल अशा अंधकारमय वातावरणात भारतीय समाज जेव्हा उद्विग्न झालेला होता, अशा समाजात पुन्हा प्रतिष्ठित, प्रस्थापितांना सम्यक विचार देण्याचे महान कार्य भगवान बुद्धांनी केले. याच विचाराच्या पार्श्वभूमीवर वैदिक तत्वांनी बुद्धांना अवताराच्या रुपाने मान्य करून आपल्या तत्वज्ञानात समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला. कालानुरूप अशा परिवर्तनाच्या दिशेने भारतीय संस्कृती बुद्धांमुळे प्रभावित झाली. संस्कृती संघर्ष होऊन वैचारिक आदान-प्रदानही झाले म्हणूनच जगातील अनेक प्राचीन संस्कृतीमध्ये बौद्ध संस्कृतीचे वैशिष्ट्य कायम स्थिरावलेले आहे. नैतिक मूल्य व तत्वज्ञानाच्या दिशेने संपूर्ण जग पालि वाङ्गमयातील सूचक तत्वांनी प्रभावित झालेले दिसून येते विदेशातील सांस्कृतिक प्रचार-प्रसार आणि भारतीय संबंध हे बुद्धवचनाच्या प्रभावाने समृद्ध झाले. रक्तपाताशिवाय, सक्ती व बळाचा वापर न करता बुद्धांनी आपल्या मैत्रीपूर्ण कल्याणकारी भावनेने सर्वांची मने जिंकली._
_*संक्षेप :-*_
*_'बहुजन हिताय बहुजन सुखाय, लोकांच्या हित व सुखासाठी त्यांनी आपल्या शिष्यांना विचरण करण्याचे संदेश दिले. तथागतांच्या देसनेची सम्यक दृष्टी सामायिक कल्याणाची आहे. त्यांचा प्रत्येक क्षणाचा उपदेश व्यक्ती, मानवप्राणी केंद्रस्थानी ठेवून केलेला आहे. ज्ञान व सदाचार यांची प्रेरणा देणारा आहे. स्वतःच्या प्रज्ञेचा विकास करण्याचे चिंतन करणारा आहे._*
_बुद्धांच्या शिक्षापदाचा संसार यात आहे. सर्व प्रकारच्या वाईट कर्मापासून दूर राहणे कुशल कर्माचा संचय करणे, चित्ताला संयमित करणे हेच त्यांच्या शिक्षणाचे संचित आहे. या विशुद्ध विचाराने भारतीय संस्कृती निश्चितच प्रभावित आहे. *डॉ. भदन्त आनन्द कौसल्यायन यांचे स्पष्ट मत आहे की, हिन्दु धर्माचा मान्यताप्राप्त ग्रंथ जो 'गीता, आहे ते धम्मपद ह्या पालि ग्रंथाची नक्कल आहे.* एक विध्वंसक सत्तेचा विषय सोडला तर संपूर्ण नैतिकतेचा आधार बुद्धधम्म आहे. त्याचप्रमाणे *जातक कथांनी देशांतील नव्हे तर संपूर्ण लोककला साहित्याला प्रभावित केले. इसापनीतीतील अनेक कथा ह्या जातककथांच्या पार्श्वभूमीवरून सांगितल्याचे दिसून येते. भिक्खूंची विहारे ही निवासाची व्यवस्था किंवा स्तूप, चैत्य आणि लेण्या इत्यादीमधून भारतीय संस्कृतीला बुद्ध कर्तृत्वाचे देणे लाभलेले आहे. म्हणूनच असे म्हणता येईल की, जीवनप्रणालीची उत्कृष्ट व्यवस्था ही पालि वाङ्गमयाची देसना आहे. तीच धारण करणे आज काळाची गरज आहे.*_
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_लेखन :- डॉ. मालती साखरे, माजी विभागप्रमुख (पाली - पाकृत) रातुम, नागपूर विद्यापिठ_*
*_संदर्भ:- बुद्धसासन त्रैमासिक अंक एप्रिल, मे, जून २०२१_*
*_संकलन :- महेश कांबळे_*
🙏🙏🙏 *_भवतु सब्ब मङ्गलं_*🙏🙏🙏
🙏🙏🙏 *_नमो बुद्धाय_*🙏🙏🙏
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
No comments:
Post a Comment