Monday, 11 November 2024

धम्म चळवळीतील युवकांची भूमिका

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  

*_धम्म चळवळीतील युवकांची भूमिका_* 

https://mikamblemahesh.blogspot.com/2024/11/blog-post_11.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

             _तथागत भगवान बुद्धांनी २५०० वर्षांपूर्वी भारतीय समाजामध्ये जी *"बहूजन हिताय बहुजन सुखाय"* हे ब्रीद असणारी लोककल्याणकारी चळवळ निर्माण केली. तिला धम्मचळवळ हे नामाभिधान प्राप्त झाले. तथागतांनी जो दुःखमुक्तीचा मार्ग शोधला, त्याचा उपदेश आषाढी पौर्णिमेला सारनाथ या ठिकाणी पंचवर्गीय भिक्खूंना केला. त्यानंतर यश नावाचा वैफल्याने ग्रासलेला धनश्रेष्ठीचा मुलगा त्यांच्या संपर्कात आला. तथागतांच्या भेटीने त्याच्या हृदया-मस्तकात जणू सुखप्रवाहाचे गुंजारव निर्माण झाले. त्यामुळे यश तथागतांना शरण आला. *धम्मासारखी अमूल्य गोष्ट एखाद्याला मिळाली, तर ती एकट्यापुरती राहत नाही., मी जसा लाभान्वित झालो, तसेच सर्वजण या मार्गाचा लाभ घेवोत, ही भावना निर्माण होते.* यशचेही तसेच झाले. त्याच्या पुढाकारामुळे त्याचे ५४ मित्र तथागतांना शरण गेले. तथागत, पंचवर्गीय भिक्खू, यश आणि त्याचे ५४ मित्र असे एकूण ६१ जण सारनाथ कडून वाराणसीला गेले आणि तेथे संघाची स्थापना केली. *गया येथे सिद्धार्थांना बोधि प्राप्त झाली, अर्थात बुद्धांचा जन्म झाला. सारनाथ येथे तथागतांनी पहिला उपदेश केला, धम्मचक्रप्रवर्तन केले, अर्थात धम्माचा जन्म झाला. वाराणसी येथे भिक्खूसंघाची स्थापना करण्यात आली, अर्थात संघाचा जन्म झाला.* तथागतांनी या नव्या भिक्खूंना उपदेश करताना म्हटले, "हे भिक्खूंनो मी सर्वप्रकारच्या बंधनांपासून मुक्त आहे आणि तुम्ही सुद्धा मुक्त आहात. सर्व दिशांना जा आणि बहुजनांच्या हितासाठी, बहुजनांच्या सुखासाठी चारिका करा." हा क्षण खऱ्या अर्थाने धम्म चळवळीची सुरुवात होती. *युवकांच्या माध्यमातून सुरु झालेली ही चळवळ भारतातील सुवर्णयुगाची नांदी ठरली.*_

_तथागतांच्या परिनिब्बानानंतर २५०० वर्षांनंतर पुन्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर येथे ऐतिहासिक धर्मांतर केले. धम्मचळवळीला आलेल्या ग्लानीचे आपल्या धम्मक्रांतीने उत्साहात रुपांतर केले. *१४ ऑक्टोबर १९५६ च्या विजयादशमी दिनी स्वतः भन्ते चंद्रमणी यांच्या हस्ते बाबासाहेबांनी दीक्षा ग्रहण केली आणि आपल्या लाखो अनुयायांना धम्मदीक्षा दिली. ही घटना ऐतिहासिकदृष्ट्या अतिशय क्रांतिकारक होती. एखाद्या उपासकाने दुसऱ्या उपासकाला दीक्षा देणे हे बौद्ध परंपरेमध्ये प्रथमच घडले.* बाबासाहेबांनी आपल्या अनुयायांना आणि अखिल बौद्ध जगताला नवा संदेश यामधून दिला. तो संदेश म्हणजे "दरेकाने दरेकाला धम्मदीक्षा दया" हा होय. *जो कोणी धम्माचे आचरण करेल, त्याला दुसऱ्याला धम्म सांगण्याचा अधिकार आहे.*_

👉 *_- क्रांतीची भाषा युवकच बोलू शकतात._*

              _तथागतांनी प्रस्थापित विषमतेच्या व्यवस्थेला झुगारून दिले. बाबासाहेबांनी धम्मक्रांती केली. *वाईटाला वाईट आणि चांगल्याला चांगले म्हणण्याचे धाडस फक्त युवकच करु शकतात.* आजच्या - युवकांपुढे हे दोन्ही आदर्श तीच प्रेरणा घेऊन उभे आहेत. असे म्हटले जाते की, *'वय देहाला असते मनाला नाही, मनाने तरुण असणारी माणसे कधीच म्हातारी होत नाहीत, युवक कोणाला म्हणावे या - संदर्भात ओशो युवा अवस्थेचे वर्णन करताना म्हणतात, 'Living State of Mind' अर्थात चित्ताची जीवंत अवस्था म्हणजे युवा अवस्था होय. शारीरिकदृष्ट्या युवक असणे म्हणजे खऱ्या अर्थाने युवक असणे नव्हे तर, ज्याच्या मनाची अवस्था उत्साही आहे. ज्याचे तारुण्य हे ज्वलंत धमन्यांचे अविरत स्पंदन बनलेले असते तो 'युवक, असतो असे म्हणता येईल. समाजातील विषम व्यवस्था, दुःख, अन्याय पाहून ज्याच्या मनात क्रांतीची आकांक्षा निर्माण होते, असा विद्रोहाचा झरा म्हणजे युवक होय; मग तो शारीरिकदृष्ट्या कोणत्याही वयोगटातील असला तरी हरकत नाही..!!*_

👉 *_युवकांनी धम्माच्या उद्देशाचे आकलन करावे._*'

_भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म' या ग्रंथामध्ये बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्माचे दोन उद्देश्य सांगितले आहेत. युवकांनी या उद्देशाचे आकलन व आचरण करणे हे स्वतःच्या आणि इतरांच्या जीवनाला अधिक उन्नत अवस्थेकडे घेऊन जाणारे ठरेल._

१. _पहिला जो उद्देश आहे तो म्हणजे, *'मनाची मलिनता दूर करणे' होय.* अतिशय मूलभूत अशी ही बाब आहे. आपण जे बोलतो किंवा जी कृती करतो तिच्या पाठीमागे आपल्या मनामध्ये असणारे विचार आणि भावना यांची प्रेरणा असते. मनामध्ये आपण जे रुजवू, तेच आपल्या व्यक्तिमत्वाला आकार देते. लोभ, मोह, द्वेष, मत्सर, दुरार्भिमान वगैरे सारखे चित्तमल नष्ट करून दानभावना, प्रज्ञा, मैत्री, संवेदनशीलता, स्वाभिमान वगैरेसारख्या गुणांचा विकास करण्यासाठी धम्म मार्गदर्शक ठरतो._

२. _धम्माचा दुसरा उद्देश हा *सामाजिक सौहार्द निर्माण करण्यास कटिबद्ध असणारा आहे. तो म्हणजे, 'जग धम्मराज्य बनविणे' होय. जग धम्मराज्य बनविणे याचा अर्थ असा नाही, की जगातले सर्व लोक औपचारिकरीत्या बौद्ध बनविणे किंवा सर्वांनी बौद्ध व्हावे असा कट्टरतावाद जोपासणे, तर धम्मराज्य म्हणजे जगामध्ये सदाचरणावर आधारित जीवन जगणाऱ्या लोकांची संख्या वाढवणे. लोक एकमेकांशी मैत्रीने वागतील, असे वातावरण निर्माण करणे. जो जो दुःखी आहे, निराश आहे, अस्वस्थ आहे, अशा लोकांपर्यंत आनंद, प्रेरणा आणि शांततेचा मार्ग पोचविणे, आपल्या भोवताली अशी लोकमंगलाची परिस्थिती निर्माण करणे याचाच अर्थ धम्मराज्य निर्माण करणे हा आहे.*_

👉 *_धम्माचे आचरण ही व्यक्तिमत्व विकासाची प्रकिया आहे._*

            _जीवनामध्ये प्रत्येकजण विकासासाठी धडपड करीत असतो. अधिक उत्तम आणि मंगलमय गोष्टींचा शोध घेत असतो. *तथागतांनी मंगलसुत्तामध्ये ३८ मंगल गोष्टी सांगितल्या आहेत. त्यापैकी प्राथमिक पातळीवर मुलभूत महत्वाच्या दोन गोष्टी म्हणजे, पहिली वेळोवेळी धम्मश्रवण करणे आणि दुसरी वेळोवेळी धम्मचर्चा करणे होय.* धम्म ही जीवन जगण्याची कला आहे. पण, जोपर्यंत आपण प्रत्यक्ष आचरण करीत नाही, तोपर्यंत ही कला साध्य होऊ शकत नाही. म्हणून चांगल्या, एकमेकांच्या हिताच्या गोष्टींचे श्रवण केले पाहिजे. धम्मविषयक ग्रंथाचे वाचन व आकलन केले पाहिजे. जाणकारांशी चर्चा करून शंकाचे निरसन केले पाहिजे. याप्रकारे निकोप जीवनशैलीचा अंगिकार केला पाहिजे._

           _आपले बोलणे, वागणे आणि विचार करणे यामध्ये ऊर्ध्वगामी परिवर्तन म्हणजेच व्यक्तिमत्वाचा विकास होय. आपल्या मनाला इष्ट प्रशिक्षण देणे हीच धम्माची मूलभूत शिकवण आहे. *डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, "The training of the mind to seek the good is the first step in the path of Righteousness This is the main teaching in the Buddhist way of life" मनाला सुसंस्कृत बनविणे म्हणजे आपल्या जीवनातील नकारात्मक जाणिवांचा क्षय आणि सकारात्मकतेचा विकास होय.*_

👉 *_धम्म हा ऊर्जास्त्रोत आहे._*

            _आधुनिक युगामध्ये युवकांना विविध प्रकारच्या आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे. शैक्षणिक प्रगती, आर्थिक प्रगती, कामाची उपलब्धता इत्यादींसाठी मनाचे संतुलन राखून परिश्रम करणे आवश्यक असते. *विविध प्रकारच्या स्पर्धापरीक्षांना सामोरे जाण्यासाठी सुदृढ शरीराबरोबरच सुदृढ मनाचीही गरज आहे. एकाग्रता, स्थिरता याबाबी आपणाला ध्येयापर्यंत जाण्यासाठी मदतच करत नाहीत, तर एक महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडतात. तथागतांनी मनाच्या एकाग्रतेसाठी ध्यानसाधनेची पद्धती विकसित केली आहे. वैज्ञानिक पद्धतीने मानसिक ऊर्जेचे एकत्रिकरण करून योग्यप्रकारे ती ऊर्जा प्रवाहित करण्याचे काम या ध्यान सरावांमधून साध्य होते. धम्म म्हणजे जागृतीचा सराव आहे. त्यामुळे आळसा सारख्या शत्रूला हद्दपार करण्याची कृती म्हणजे धम्म आहे.* अनेकवेळा लोक काम टाळण्यासाठी वेगवेगळ्या सबबी सांगतात, जसे की, "आज खूप थंडी आहे, खूप गरम होत आहे, आता वेळ झाला, आत्ताच तर पहाट झाली, भूक लागली आहे, खूप खाल्ले आहे..." अशाप्रकारची कारणे सांगणाऱ्यांना यश कधीच मिळत नाही. प्रयत्नवादाचा उपदेश करताना *सिगालसुत्तामध्ये तथागत म्हणतात, "जो मनुष्य थंडी आणि उष्णता यांना गवताच्या काडी इतकीही किंमत देत नाही आणि आपली कर्तव्ये पार पाडतो, त्याचे सुख त्याला सोडून जात नाही." अशाप्रकारे धम्मामध्ये प्रेरणेचा आणि ऊर्जेचा साठा आहे, कधीही न संपणारा....!*_

👉 *_युवकांची जबाबदारी मोठी आहे._*

            _*डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, बौद्धांनी केवळ एक चांगला बौद्ध असणे पुरेसे नाही तर, त्यांनी धम्माचा प्रचार आणि प्रसार करायला हवा, कारण "धम्माचा प्रचार आणि प्रसार करणे हीच खरी मानवसेवा आहे". धम्म प्रयत्नवाद शिकवतो, आशावादी बनवितो, लढण्याची ऊर्मी देतो म्हणून हा परिवर्तनाचा आचरणमार्ग अधिकाधिक लोकांपर्यंत पोचला पाहिजे. या सदाचार आणि मानवतेच्या शिकवणीची आज सर्व मनुष्यमात्राला पूर्वीपेक्षा कितीतरी पटीने आज गरज आहे. व्यक्तिगत विकासाबरोबरच सामाजिक विकासाला गती देण्यासाठी धम्म लोकांपर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून पोचायला हवा. यासाठी स्वतः धम्म जाणून घ्यायला हवा. धम्माच्या मूलभूत शिकवणी जसे, त्रिसरण, पंचशील, पारमिता, धम्मेंद्रिये, सप्त बोध्यांगे, अष्टांगिक मार्ग यांसारख्या जीवनमूल्यांचे बौद्धिक आकलन व आचरण करून स्वतःला एक मॉडेल म्हणून समाजापूढे चांगुलपणा आदर्श ठेवायला हवा.*_

_भारतामध्ये धम्मप्रचार करण्याचा अनेक व्यक्ती व संस्था प्रामाणिक प्रयत्न करीत आहेत. भारतीय बौद्ध महासभा, त्रिरत्न बौद्ध महासंघ यांसारख्या अनेक संघटना धम्म पोचवत आहेत तसेच विपस्सनाचार्य गोएंका गुरुजी, पू. दलाई लामा यांसारख्या धम्मगुरूंचेही काम मोठे आहे. प्रत्येकजपण आपापल्या परीने लोकांपर्यंत बुद्धविचार नेण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशाप्रकारच्या सर्व संस्था, व्यक्ती इत्यादींचा आत्यंतिक कृतज्ञतेने आदर केला पाहिजे. प्रत्येकाची धम्मप्रचाराची शैली वेगळी असेल पण, ध्येय एकच आहे आणि ते म्हणजे 'मानवसेवा' होय._

_स्वतःला परिवर्तित करण्यासाठी युवकांनी धम्मशिबीरांमध्ये सहभागी व्हायला हवे. जसे की, श्रामणेर शिबीर, विपस्सना शिबीर, निवासी धम्मशिबीर इ. स्वतःला अधिक जाणून घेण्याची, क्षमतांचा विकास करण्याची आणि जाणकारांचे मार्गदर्शन मिळण्याची संधी या शिबीरांमधून मिळत असते. आठवड्यातून एकदा बुद्धविहारात जाऊन धम्मश्रवण व धम्मचर्चेत सहभागी झाले पाहिजे. आठवड्यातून किमान एक तास आपले ज्ञान, कौशल्य इ. चा लाभ इतरांना दयायला हवा._

_जे लोक औपचारिकरित्या बौद्ध नाहीत, त्यांच्यापर्यंत करुणेने, मैत्रीने व्यवहार ठेऊन बुद्धांचा मंगलमय विचार पोचविला पाहिजे. कारण सर्वांना सुखाची आणि शांततेची गरज आहे. बुद्धविचार हा सर्वांना सुख आणि शांती प्रदान करणारा आहे, प्रत्येक व्यक्तीला उन्नत अवस्थेकडे नेणारा आहे. आपल्याला मिळालेली ही तीन अमूल्य रत्ने सर्वांपर्यंत पोचविण्याचा संकल्प डॉ. बाबासाहेबांच्या आणि म. जोतिबा फुलेंच्या जयंतीनिमित्त करुया. या मंगल संकल्पाने सर्व मनुष्यमात्र निरामय जीवनाचा आनंद उपभोगतील. स्वतःच्या कल्याणाबरोबरच इतर सर्व प्राणिमात्रांच्या हितासाठी माझ्या युवक बंधु भगिनींनो धम्मचळवळ अधिक गतिमान करुया._

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_लेखन :- आयु. अमित मेधावी (कोल्हापूर)_*

*_संदर्भ:- बुद्धसासन त्रैमासिक अंक एप्रिल, मे, जून २०२१_

*_संकलन :- महेश कांबळे_*

🙏🙏🙏 *_भवतु सब्ब मङ्गलं_*🙏🙏🙏

                 🙏🙏🙏 *_नमो बुद्धाय_*🙏🙏🙏

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

No comments:

Post a Comment

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...