🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_बुद्धविचारांचा विस्तार - शाखेय आणि भौगोलिक_*
https://mikamblemahesh.blogspot.com/2024/11/blog-post_30.html
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
_*पालि ग्रंथातून कळते कि भ. बुद्धांच्या हयातीतच धम्माचा प्रसार पश्चिम आणि दक्षिण पश्चिम भागात झाला. बुद्धांचे एक प्रमुख शिष्य, आचार्य महाकच्चायान हे अवन्ती प्रदेशातील होते. त्यांनी बुद्धांची परवानगी घेऊन अवंतीप्रदेशात धम्माचा प्रसार सुरु केला. त्यावेळेस अपरान्त प्रदेशातील सोणकुतीकन्न या तरुणाला धम्माची दीक्षा दिल्याचा उल्लेख "आगमग्रंथात" वाचायला मिळतो.*_
_बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर भन्ते आनंद यांनी धम्माचा प्रसार अतिशय जोमाने सुरु केला. *त्यांचा शिष्य, भन्ते सनकवासी हे पश्चिम दिशेला तर भन्ते सब्बकामीं हे पूर्वेला प्रचारार्थ गेले. अर्हत रेवत यांनी देखील पश्चिम दिशेला अतिशय प्रभावीपणे धम्माचा प्रसार केला.* याच दरम्यान काही भिक्खुंनी तक्रार केली कि वैशाली येथील भिक्खू संघ विनयाच्या विरुद्ध आचरण करतो. त्यावेळेस काही जेष्ठ आचार्यांनी यावर चर्चा करण्यासाठी दुसऱ्या संगितीचे आयोजन केले. या वेळेस भिक्खू संघात, विनय आणि बुद्धविचार यांतील काही मुद्द्यांवर फूट पडली. या संगितीच्या वेळेस मोठ्या प्रमाणात काही भिक्खुंनी स्थविरांचे म्हणणे अमान्य केले व स्वतःची "महासांघिक" शाखा सुरु केली. उरलेले जेष्ठ स्थविर आचार्यांच्या शाखेला "स्थविरवादी" संबोधण्यात आले. *मगध राज्यात सुरु झालेला महासांघिक विचार पुढे मथुरा, वाराणसी, अमरावती आणि नागार्जुनकोंडा येथे पोहचला.*_
_सम्राट अशोकांच्या काळापर्यंत संघामध्ये विनयाने वागणारे खूप कमी राहिले आणि लोकांच्या सद्भावनेचा, त्यांनी दिलेल्या दानाचा, अनेक भिक्खू गैरफायदा घेऊ लागले. त्यावेळेस उपगुप्त आणि मोगलीपुत्ततिस्स हे दोन अर्हत आचार्य होते. जेव्हा सम्राट अशोक यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला तेव्हा आचार्य उपगुप्त यांनी सम्राटांना, भ. बुद्धांच्या आयुष्याशी निगडित सर्व स्थळे स्वतः फिरवून दाखविली. त्या त्या ठिकाणी सम्राटांनी स्तूप अथवा स्तंभ उभारले. पुढे संघाला विनयचे अनुशासन व्यवस्थित लागावे म्हणून आचार्य मोगलीपुत्ततिस्स यांनी सम्राटांच्या मदतीने तिसरी धम्मसंगीती भरविली व विनयाचे पालन न करणाऱ्या साठ हजार भिक्खूना संघातून निष्कासित केले. आचार्य मोगलीपुत्ततिस्स यांच्या सांगण्यावरूनच धम्मप्रसार करण्याकरिता, अशोकांनी वेगवेगळ्या प्रांतात भिक्खूंना पाठवले._
_सम्राट अशोकांच्या परिनिर्वाणानंतर संघ एकसंध नाही राहू शकला. बुद्धांच्या अनेक तत्वज्ञानिक विचारांपैकी काहींनी एकाच तत्वज्ञानाचा आग्रह धरला तर काहींनी दुसरा एखादा विचार प्रमाण मानला._
👉 *याच काळात स्थविरवादी संघातून फारकत घेत "सर्वास्तिवादी" ही एक शाखा सुरु झाली. हे अभिधम्मला मानणारे होते. इ.स. ७व्या शतकापर्यंत यांचं अस्तित्व होते. या शाखेचा प्रसार काश्मीर पासून अफगाणिस्तान, चीन, मंगोलिया पर्यंत झाला होता. या शाखेने कनिष्काच्या काळात, अभिधम्मावर आधारित "महाविभाषासूत्र" नावाचा महाग्रंथ लिहिला.*
👉 *मात्र पुढे या संघातील काही भिक्खुंनी केवळ हाच ग्रंथ प्रमाण मानून, "वैभाषिक" नावाची वेगळी शाखा निर्माण केली. या शाखेने संस्कृत भाषेत "अभिधर्म" ग्रंथ लिहिला. हेतुप्रत्यय हा सिद्धांत महत्त्वाचा मानणाऱ्या या शाखेला "हेतूवादी" असेही नाव पडले होते.*
👉 *सर्वास्तिवादी मधून "मुलसर्वास्तिवादी" ही शाखा सुरु झाली; मात्र ते कोणत्या कारणासाठी विभक्त झाले यावर संशोधकांच्यात एकमत नाही. मात्र हा संघ इंडोनेशिया मध्ये प्रमुख होता असे दिसते. स्वतःचा 'विनय' लिहिणारा हा संघ होता.*
👉 *सर्वास्तिवादी मधून केवळ बुद्धसूत्रांना मानणारे काही भिक्खू बाहेर पडून "सौत्रांतिक" ही शाखा सुरु केली. या शाखेची सुरुवात आचार्य कुमारलत यांनी केली ज्यांनी "कल्पनामंडीटिका" नावाचा ग्रंथ लिहिला. प्रसिद्ध तत्वज्ञानी साहित्यिक वसुबंधू आणि प्रमाणवादाचे जनक दिग्नाग आणि धर्मकीर्ती याच विचारातून तयार झाले होते.*
👉 *कालांतराने, *सर्वास्तिवादी मधून आचार्य वत्सीपुत्र यांनी "वत्सीयपुत्र" शाखा निर्माण केली जिला राजा हर्षवर्धनच्या काळात खूप प्रोत्साहन मिळाले. पुद्गल म्हणजेच मनुष्य आणि त्याचे सत्व हेच सत्य असून, कम्म, जन्ममृत्यू आणि निब्बाण हे त्याच्याशी निगडित आहे असे ही शाखा मानत.*
👉 *तिसऱ्या धम्मसंगितीच्या वेळी, सर्वास्तिवादी आणि पुद्गलवादी विचार सोडून एक नवीन विचार "विभाज्यवादी" स्थापन झाला. त्यांच्या मते प्रत्येक उद्भवणाऱ्या धम्मस्कंदाचे विश्लेषण करणे गरजेचे आहे. हा संघ गांधार, काश्मीर, श्रीलंका आणि आंध्र प्रदेशात प्रामुख्याने विस्तारला होता.*
👉 *विभाज्यवादी मधून "महिषासक" ही नवीन शाखा तयार झाली. यांच्या मते जी घटना वर्तमानात आहे फक्त तिचेच अस्तित्व असते. भूतकाळ किंवा भविष्यकाळातील घटना ग्राह्य धरू नये. श्रीलंकेमध्ये देखील त्यांनी विस्तार केला होता आणि त्यांचे स्वतःचे विनय देखील होते. स्त्रियांना दीक्षा देणे किंवा त्या अर्हत होणे हे महिषासकांना मान्य नव्हते.*
👉 *महिषासक मधून "धर्मगुप्तका" शाखा तयार झाली. त्यांच्या मते श्रावक आणि बोधिसत्त्व या दोन्ही वेगवेगळ्या संकल्पना आहेत. खोतान प्रदेशात धर्मगुप्तका सर्वात पहिल्यांदा पोहचले. "दीर्घ आगम", "सारीपुत्रअभिधर्मशास्त्र", "धर्मगुप्तका त्रिपिटक" तर भ. बुद्धांचे चरित्र असलेले "अभिनिष्क्रमणसूत्र" हे त्यांचे काही प्रमुख ग्रंथ होय. ही शाखा महायानाच्या विचारधारेशी साधर्म्य दाखवते.*
👉 *"काश्यपीय" ही शाखा बौद्ध आचार्य कश्यप यांनी सुरु केली होती. त्यांचे मते अर्हत झालेले भिक्खू हे जर सतत जागरूक नाही राहिले तर ते पदच्युत होऊ शकतात. काही संशोधकांच्या मते गांधारी भाषेतील 'धर्मपद' काश्यपीय संघाने लिहिले आहे. ६व्या शतकानंतर बहुतेक त्यांचे महायानात विलीन झाले असावे.*
👉 *स्थविरवादी परंपरेत "थेरवादा"ची बीजे आहेत. भन्ते महिन्द यांनी श्रीलंकेत बुद्धविचारांचा प्रसार करताना तेथे पालि त्रिपिटकाचा परिचय करून दिला होता. अनुराधापुर येथील महाविहारातील भिक्खू संघ हा भारतातील स्थविरवादी भिक्खुंनी स्थापन केला होता. याच ठिकाणी पालि त्रिपिटक सर्वात पहिल्यांदा लिपिबद्ध करण्यात आले होते. येथूनच थेरवाद परंपरा पुढे लाओस, कंबोडिया, म्यानमार, थायलंडला पोहचली होती. "सारीपुत्रपरिपृच्छासूत्र", "दीपवंस", बुद्धघोषांच्या "कथावत्थु अठ्ठकथा", वसुमित्रांचे "समयभेदोपरचमचक्र" ग्रंथातून आणि तारानाथ, परमार्था आणि विनीतदेवा सारख्या बौद्ध आचार्य लेखकांच्या कृतीतून कळते कि गेल्या अडीच हजार वर्षात बुद्धविचारांच्या तीस शाखा तयार झाल्या. काळाच्या ओघात अनेक शाखा एकत्रित झाल्या तर काही लुप्त झाल्या.*
_महायानाची सुरुवात भ.बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर अंदाजे ५०० वर्षांनी झाली. त्यावेळेसची राजकीय, धार्मिक परिस्थिती ही बौद्ध धम्माला प्रतिकूल होती. थेरवाद परंपरेत विना प्रतिकार, शांतपणे धम्माचे आचरण करीत राहणे अभिप्रेत होते. अशा परिस्थिती, बुद्धविचार प्रभावीपणे लोकांसमोर मांडणे आणि त्याचा प्रचार करणे गरजेचे होते. *सर्वसामान्य लोकांना केंद्रभूत ठेवून धम्माचा प्रचार आणि प्रसार करायचा या विचाराने महायानाची सुरुवात झाली. इ.स.पूर्व पहिल्या शतकापासून हा विचार भिक्खू संघात दृढ व्हायला लागला. बौद्ध आचार्य व कवी अश्वघोष तसेच तत्वज्ञानी नागार्जुन आणि वसुबंधू यांनी महायानाची विचारधारा सर्वत्र पोहचवली.* थेरवाद परंपरेत अर्हत किंवा बुद्धत्त्वप्राप्ती या अतिशय कठीण बाबी असून भिक्खुंनी केवळ त्यासाठी प्रयत्न करीत राहणे आणि उपासकांनी त्यांना भोजनदान किंवा इतर मदत करणे ही कर्तव्य होती._
_*महायानात बोधिसत्त्वाची व्याख्या करताना "महाप्रज्ञापारमितोपदेश" या ग्रंथात नागार्जुन म्हणतात, "बोधिसत्त्व हा लोकांमध्ये जातो, त्यांची दुःख समजून घेतो, त्यावर उपाय सांगतो, लोकांना दुःखातून बाहेर काढण्यासाठी सर्व शक्तीनिशी प्रयत्न करतो; त्याला सर्व धर्माची (विचारांची) सत्यता माहित असते कारण त्याला संबोधी माहित असते आणि म्हणूनच त्याला बोधिसत्त्व म्हणतात". पुढे ते असे लिहितात,"जो बुद्धांच्या मार्गाने जात, सर्व लोकांना अज्ञानातून बाहेर काढतो, सन्मार्गाचा जीवन शिकवतो, तो बोधिसत्त्व".*_
_लोकाभिमुख असलेली महायान विचारधारा, उत्तर भारतासह काश्मीर, तिबेट, भूतान येथे स्थिरावली._
👉 *साधारणतः ६व्या शतकात, उत्तर राष्ट्रांतून शिरकाव झालेल्या "तंत्र" पद्धतीचे पडसाद भारतातील अनेक धर्मांवर किंवा पंथांवर पडले. महायानातील काही विचार घेऊन या तंत्राने "वज्रयान" शाखा विकसित केली. ध्यानसाधने बरोबरच काही तंत्र, मंत्र, जप यांच्या साह्याने बोधिसत्त्वाचा मार्गावर लवकर आरूढ होता येते अशी संकल्पना असल्यामुळे काही देशांत ही शाखा "तंत्रयान", "मंत्रयान" म्हणून लोकप्रिय झाली.*
_नागपूर येथे बौद्धधम्म स्वीकार दिनाच्या आदल्या दिवशी, बाबासाहेब आंबेडकरांना काही पत्रकारांनी मुद्दाम विचारले कि ते कोणता बौद्धधम्म स्वीकारणार - हीनयान (थेरवाद), महायान कि आणखीन काय? त्यावेळेस बाबासाहेबांनी उत्तर दिले - कोणताच नाही. मी बुद्ध्यान स्वीकारणार. म्हणजेच जे निकष बुद्धांनी धम्मविचारांबद्दल सांगितले, त्यांनाच सत्य मानणार._
_अनेक देशांत बुद्धविचारांचा प्रसार अतिशय प्रभावीपणे झाला. बुद्धविचाराने तेथील संस्कृतीशी मैत्री केली आणि त्यांच्या काही तत्वांचा स्वीकारही केला. त्यातूनच नवीन शाखा तयार होत गेल्या. *"मनुष्याचे सर्वंकष कल्याण" हा एकमेव "धम्म" असणारा बुद्धविचार अडीच हजार वर्षांनंतर देखील लोकप्रिय आहे ते केवळ याच कारणांमुळे!*_
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_लेखक :- अतुल मुरलीधर भोसेकर_*
९५४५२७७४१०
*_संकलन :- महेश कांबळे_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
खुप खुप धन्यवाद
ReplyDelete