Saturday, 14 December 2024

प्रतित्यसमुत्पाद - सृष्टिचक्राचे विज्ञान


 

*_प्रतित्यसमुत्पाद - सृष्टिचक्राचे विज्ञान_*

_गेली अडीच हजार वर्षे अभ्यासकांमध्ये 'बुद्धविचार' हा गहण चर्चेचा विषय झाला आहे. त्या काळापासून बुद्धविचाराने ज्याप्रमाणे सर्वसामान्यांना जगण्याचा एक नवीन दृष्टिकोन दिला त्याप्रमाणे विद्वानांना देखील एक नवा तत्वज्ञानिक दृष्टिकोन दिला आहे. *सर्वसामान्यांना दुःखमुक्तीचा मार्ग सांगताना बुद्ध त्यांना अरिय अष्टांगिक मार्ग दाखवितात तर विद्वानांना अनित्य आणि अनात्माचा सिद्धांत उलगडून दाखविताना प्रतित्यसमुत्पाद सांगतात.* म्हणूनच बुद्धविचार जसे सामान्यांना प्रिय वाटतात तसे ते अभ्यासकांना देखील विचारप्रवर्तक वाटतात!_ 

_*विनयपिटकातील महावग्ग मधील महाखन्धको सुत्तात, भ. बुद्धांच्या संबोधी ज्ञानाचे  वर्णन केले आहे. त्यात म्हटल्या प्रमाणे, बुद्धांनी त्या रात्रीच्या प्रथम प्रहरात 'प्रतित्यसमुत्पाद'च्या कड्या ओळखून त्याचे अनुलोम आणि प्रतिलोम जाणल्यावर, त्या कड्यांचा निरोध कसा करता येतो हेही जाणले. प्रतित्यसमुत्पादाचे महत्त्व यातच आहे कि जसे ते दुःखाचे कारण सांगते तसेच ते दुःखमुक्तीचा मार्गही दाखवते. प्रतित्यसमुत्पादच्या सिद्धांतानुसार, "इमस्मि सति इदं होति.... इमस्मि असति, इदं न होति" म्हणजे 'या'च्या मुळे 'हे' होते, 'हे' जर नसेल तर 'हे' होणार नाही. या सिद्धांतानुसार प्रत्येक घटना उत्पन्न होण्यासाठी अनेक कारणांची मालिका कारणीभूत ठरते. जर ती घटना नष्ट करायची असेल तर ती घटना उत्पन्न करणाऱ्या कारणांना नष्ट करावे लागेल!*_ 

_सतत सहा वर्षे कठोर ध्यानसाधना केल्यानंतर, बुद्धांना दुःखाची उत्पत्ती आणि त्याचा नष्ट करण्याचा मार्ग समजला. *हा सिद्धांत केवळ  बुद्धविचाराचाच कणा नव्हे तर संपूर्ण सृष्टीचक्राचे विज्ञान आहे!*_

_*दीघनिकाय मधील 'महानिदानसुत्त' मध्ये* भ. बुद्ध, भन्ते आनंद यांच्याशी बोलताना म्हणतात,_

_"मा हेवं आनंद, अवच, मा हेवं आनंद, अवच I_

_गम्भीरो चायं, आनंद, पटिच्चसमुप्पादो गम्भीरभासो च I_

_एतस्स, आनंद, धम्मस्स अननुबोधा अप्पटिवेधा एवमयं पजा तंताकुलकजाता कुलगंठीकजाता मुंजपब्बजभूता अपायं दुग्गतिं विनिपातं संसारं नातिवत्तति"_

_म्हणजे  *'आनंद, हे प्रतित्यसमुत्पाद गंभीर आहे, आणि गंभीर पण दिसते. आनंद, हे न जाणल्यामुळे, सूक्ष्मपणे न अभ्यासल्यामुळे, सर्व लोक गुंता झालेल्या सुतळीसारखी, गांठ पडल्यामुळे, या संसारचक्रात अडकवून पडले आहेत'.*_

_*मज्झीम निकायातील "ओपम्मवग्गो" सुत्तात भिक्खूंना देशना देताना बुद्ध म्हणतात, "यो पटिच्चसमुप्पादं पस्सति सो धम्मं पस्सति; यो धम्मं पस्सति सो पटिच्चसमुप्पादं पस्सतिति" म्हणजे जो प्रतित्यसमुत्पाद पाहतो, तो धम्म (वस्तूंचे अंतर्बाह्य स्वरूप) पाहतो; जो धम्म पाहतो, तो प्रतित्यसमुत्पाद पाहतो.*_

_एके ठिकाणी बुद्ध स्पष्ट म्हणतात कि *प्रतित्यसमुत्पाद मध्ये कुशलता प्राप्त केल्याशिवाय भिक्खूंना पंडित म्हणता येणार नाही! याचाच अर्थ बुद्धांनी प्रतित्यसमुत्पादाला अतिशय महत्त्वाचे स्थान दिले आहे.* त्याकाळी आणि नंतरही *अस्तित्वात असलेल्या अनेक धार्मिक पंथांनी, सृष्टीच्या निर्मितीबद्दल काही काल्पनिक आणि अतिरंजित गोष्टी रचल्या होत्या आणि जीवनातील दुःख हे पूर्वजन्माची कर्मांमुळे आहे असे सांगितले. या सर्व अंधश्रद्धा आणि कर्मकांडांना प्रतित्यसमुत्पाद चोख उत्तर देते.* हा सिद्धांत संपूर्ण जीवसृष्टीतील अनित्यता, अनात्मता आणि दुःखता यांचे स्पष्टीकरण वैज्ञानिक पद्धतीने देते._ 

_आयुष्यात दुःख आहे हे अरिय सत्य आहे. प्रतित्यसमुत्पादच्या आधारावर दुःखाचा उदय कसा होतो आणि निरोध कसा होऊ शकतो हे बुद्धांनी सर्वात पहिल्यांदा दाखवून दिले आहे. हा सिद्धांत सांगतो कि आपल्या आंतरिक किंवा बाह्य वातावरणात, प्रति क्षण उत्पन्न होत असलेल्या घटनेच्या मागे पूर्वी घडलेली एखादी घटना कारणीभूत असते आणि ही पूर्वीची घटना देखील दुसऱ्या एका घटनेमुळे उत्पन्न झालेली असते. या "कारण-कार्य" मुळेच घटनेचे चक्र अबाधित चालू राहते. हाच नियम सृष्टीतील अस्तित्व असलेल्या प्रत्येक घटकासाठी आधारभूत ठरतो. *अरिय सत्याचे पहिले सत्य म्हणजे दुःखाचे मूळ कारण अज्ञान किंवा अविद्या आहे. अविद्यापासून सुरु झालेला हा प्रवास मृत्यूपर्यंत कसा पोहोचतो याचे अतिशय शास्त्रीय पद्धतीने बुद्धांनी सांगितले आहे. यातुन सुरु होते बारा घटनांचे "कारणसमूह" ज्याला "भवचक्र" म्हटले जाते. या कारणसमूहाचा निरोध (नष्ट) केला तर भवचक्राचा निरोध होऊ शकेल असे प्रतिपादन बुद्धांनी केले आणि त्याची सैद्धांतिक मांडणी केली. हे भवचक्र जेव्हा नष्ट होते तेव्हा ती 'निब्बाण' अवस्था असते!*_  

_*या भवचक्रात बारा अंग आहेत आणि या बारा कड्या दुःखाची कारण मालिका म्हणजे दुःखसमुदाय आहेत. चार अरिय सत्याची जाणीव न होणे, म्हणजे जीवनातील अनित्यता, अनात्मता आणि दुःखता न ओळखणे म्हणजेच "अविद्या". आपल्या पूर्वायुष्याच्या म्हणजेच होऊन गेलेल्या काळातील अविद्येमुळे कायिक, वाचिक आणि मानसिक, रागयुक्त "संस्कार" निर्माण होतात. बौद्ध तत्वज्ञानात रूप, रस, भय, इत्यादी ५२ प्रकारचे संस्कार सांगितले आहेत. पूर्वायुष्यातील संस्कारामुळे कुशल अथवा अकुशल चित्त म्हणजे "विज्ञान" उत्पन्न होते. विज्ञान हे ज्ञानमूलक, भावनामूलक आणि क्रियाशील असते. विज्ञानाच्या या त्रिविध प्रकृतीमुळे रूप, रस, गंध, स्मृती, हर्ष, लज्जा, इत्यादी संस्कारांना एकत्र ठेवून त्यांच्यात संबंध राखणे व त्यांना योग्य त्या कामाला लावणे हे विज्ञानाचे काम आहे. विज्ञानामुळे "नामरूप" उत्पन्न होते. बुद्धांच्या मते प्राणी हा भौतिक व मानसिक तत्त्वे मिळून बनलेला आहे. भौतिक तत्वांमध्ये पृथ्वी, जल, वायू व अग्नी ही चार तत्वे आहेत तर मानसिक तत्त्वांमध्ये विज्ञान, वेदना, संज्ञा व संस्कार ही तत्वे आहेत. हीच भौतिक आणि मानसिक तत्वे म्हणजे नामरूप होय. नामरूपमुळे "षडायतन" म्हणजे सहा इंद्रिय डोळे, कान, नाक, जिव्हा, त्वचा आणि मन उत्पन्न होतात ज्यामुळे सृष्टीतील निरनिराळ्या वस्तूंचे ज्ञान होते व त्याप्रमाणे संस्कार तयार होतात. प्रत्येक इंद्रियाचे वस्तूशी झालेला संपर्क म्हणजे "स्पर्श". षडायतनचा जेव्हा बाह्य जगताशी झालेल्या स्पर्शामुळे जी अनुभूती येते, ती "वेदना" (संवेदना) होय. एखाद्या विषयांप्रती प्रचंड इच्छा म्हणजे "तृष्णा". वेदनेमुळे तृष्णाची उत्पत्ती होते. विषयांप्रती प्रचंड आसक्ती म्हणजे "उपादान". जीवाचे अस्तित्व म्हणजेच "भव". याला उपादान हे कारण आहे. जन्मउत्पत्ती म्हणजेच "जाति" तर इंद्रियांची शिथिलता, स्कंदांचे जीर्णता व मरण म्हणजेच "जरामरण" होय. जन्मामुळेच जरा व मरण होते असे बुद्ध महानिदानसूत्तात म्हणतात. याचाच अर्थ अविद्यामुळे संस्कार, संस्कारामुळे विज्ञान, विज्ञानामुळे नामरूप, नामरूपामुळे षडायतन, षडायतनमुळे स्पर्श, स्पर्शामुळे वेदना, वेदनांमुळे तृष्णा, तृष्णेमुळे उपादान, उपादानामुळे भव, भवामुळे जाति व जातीमुळे जरामरण होते. अविद्यापासून सुरु होऊन जरामरण पर्यंत आलेल्या साखळीला प्रतित्यसमुत्पादाचे अनुलोम म्हटले आहे. अविद्यामुळे मरण म्हणजेच अंतिमतः दुःख हे कसे होते हे आपल्याला ही साखळी दाखविते. दुःखमुक्तीचा मार्ग म्हणजे प्रतित्यसमुत्पादाचे प्रतिलोम. यात शेवटून सुरुवात करीत, प्रत्येक कडीला नष्ट करीत, शेवटी अविद्येचा निरोध हा चार अरिय सत्यांच्या आचरणाने होतो.*_

_जर आपण आपल्या आयुष्यातील एक दिवस क्षणांच्या कालखंडात विभाजित केला तर असे दिसेल कि प्रत्येक क्षणाचा जन्म होतो, तो उत्कर्ष पावतो व त्याचा भंग होतो. त्यानंतर लगेच दुसऱ्या क्षणाचा जन्म होतो. या दृष्टीने पाहिल्यास प्रत्येक क्षणी जन्म व मृत्यू होतच राहतो. एका क्षणाचा मृत्यू हा दुसऱ्या क्षणाचा जन्म असतो. म्हणजेच जन्म आणि मृत्यू मध्ये अंतर नसून ती एक निरंतर अशी साखळी आहे. नदीच्या पाण्याची धारा देखील अनेक थेंबांची मालिका असते.  सृष्टीतील प्रत्येक घटकाचे मूळ स्वरूप पाहणे हाच 'साक्षीभाव' आहे. *प्रतित्यसमुत्पादातील या बारा कड्या या भूत, वर्तमान आणि भविष्य या काळाशी संबंधित दिसतील. अविद्या आणि संस्कार हे भूत काळ म्हणजेच पूर्वीचा क्षण दर्शवितात, तर विज्ञान, नामरूप, षडायतन, स्पर्श, वेदना, तृष्णा, भव, उपादान हे वर्तमान काळ म्हणजेच आत्ताच्या क्षणाचा जन्म दर्शवितो. यामुळे येणारे जरा, मरण हे दुःख म्हणजेच भविष्य काळ किंवा पुढचा क्षण दर्शवितात. याचाच अर्थ प्रत्येक क्षणी आपला जन्म व मृत्यू होत असतो. मात्र हे सर्व क्षण एकामागून एक सतत प्रवाही असल्यामुळे आपल्याला ते जाणवत नाही. आणि म्हणूनच दुःखाची ही अखंड मालिका आपण अनुभवत असतो. या दुःखातून मुक्त होण्याचा प्रत्येक क्षणी विचार करणे हा "सम्यक मार्ग" आहे तर या दुःखनिरोधासाठी प्रत्येक क्षणी प्रयत्न करणे हा "अरिय अष्टांगिक मार्ग" आहे. म्हणूनच प्रतित्यसमुत्पादाला बुद्ध विचारांचे केंद्रस्थान म्हटले जाते. या सृष्टीतील प्रत्येक घटकाचे अस्तित्व हे प्रतित्यसमुत्पाद सिद्धांताने मांडता येते आणि म्हणूनच ईश्वर, आत्मा, व्रतवैकल्य या धारणा फोल ठरतात.*_

_*राजगृहामध्ये भिक्षाटन करताना भन्ते अस्साजी यांच्याकडून सारीपुत्तने प्रतित्यसमुत्पादाची व्याख्या ऐकूनच धम्माची दीक्षा घेतली होती. आचार्य नागार्जुनांनी याच सिद्धांताच्या आधारावर "शून्यवाद" ही संकल्पना मांडली. बुद्धपालित, चंद्रकीर्ती, भावविवेक यांनी प्रतित्यसमुत्पादावर अनेक ग्रंथ लिहिले. आधुनिक विज्ञानातील अनेक सिद्धांत हे प्रतित्यसमुत्पादाच्या सिद्धांताशी साधर्म्य पावतात यातच या सिद्धांताचे महत्त्व आहे.*_  

                     *_अतुल मुरलीधर भोसेकर_*

                         ९५४५२७७४१०

No comments:

Post a Comment

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...