Monday, 31 October 2022

सुखी सुरक्षित कोण ?

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_सुखी - सुरक्षित कोण ?_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

                     _पाली वाङ्मयाच्या विशाल फलकावर सव्वीशसे वर्षांपूर्वीच्या भारताचे एक मनोहारी चित्र डोळ्यासमोर उभे राहते. *त्या काळात शेती समवेतच गोपालन एक लोकांचा प्रमुख व्यवसाय होता.* मोठ-मोठे गोपाळ शेकडो, हजारोंच्या संख्येने गायी पाळत असत आणि सुखमय समृद्धीचे जीवन जगत असत._

                _अशाच एका समृद्ध आणि सुखी गृहस्थाच्या जीवनाचे हे चित्र नजरेसमोर आहे. *त्याचे नाव धनिय गोप.* त्याची *प्रेमळ पतिव्रता पत्नी सात आज्ञाधारक मुले, सात सुशील सूना आणि सात मुलींचा भरलेला संसार.* पुष्कळ गोधनामुळे परिवार धन-धान्य संपन्न एकत्र कुटुंबपद्धती. कुटुंबातील सर्व माणसे सदाचारी, परस्परांवर प्रेम, सामंजस्य यामुळे संतोषप्रद वातावरण. सुखसमृद्धतेची ही समाधानी वृत्ती धनिय गोपाच्या प्रसन्न वाणीतून स्पष्टपणे व्यक्त होते आहे._

                 _परंतु भौतिक समृद्धी समवेतच हे अध्यात्मिक नवजागृतीचे युग आहे. भगवान बुद्धांच्या आविर्भावाने अध्यात्मिक वातावरणात गहन गांभीर्य भरले आहे. भगवानांची व त्यांच्याकडून शिकवल्या गेलेल्या मुक्तिदायिनी विपश्यना साधनेची धर्मकीर्ती दूरवर पसरलेली आहे._

                  _*धनिय गोप आपल्या कुटुंबासह आणि गोधनासह महीनदीच्या किनारी राहतो आहे.* नदीकिनारा आणि सभोवतालचा प्रदेश हिरव्यागार कुरणांमुळे गाईंना चरण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे._

                 _संध्याकाळची वेळ, सूर्यनारायण विश्रांतीसाठी पश्चिम क्षितिजाकडे पावले टाकीत चालला आहे. आकाशात मेघ येत आहेत. काळे ढग गर्दी करीत आहेत. अधूनमधून वीज चमकत आहे. मेघांचा गडगडाट आसमंतात भरून राहिला आहे._

               _धनिय गोप आपल्या पर्णकुटीसमोर बसला होता. सांसारिक समृद्धता आणि कौटुंबिक सौख्य यामुळे संतुष्ट आहे, प्रसन्न आहे. त्याच्या सौभाग्याने त्याचवेळी भगवान बुद्ध देखील महीनदीच्या सुंदर किनाऱ्यावर आले._

                  _धनिय गोप आपल्या उल्हसित शब्दांनी गृहसौख्याचे गोड गीत गात आहे. प्रत्युत्तरात भगवान अनुत्तर विमुक्ती सुखाचा उद्घोष करीत आहेत. भौतिक सुख है अखेर भौतिक सुखच आहे. अनित्य, नश्वर, भंगुर आज ना उद्या बदलणारे, नाश पावणारे व परिणामी दुःखदायकच असते. नित्य, शाश्वत, ध्रुव, अनुत्तर विमुक्ती सुखाशी त्याची काय तुलना ?_

_दोघांमधील सुखसंवाद अत्यंत रोचक नव्हे तर प्रेरणादायक, धर्मसंवेग जागृत करणारा आहे._

_यावे! आपण ऐकावे!_

_*धनिय गोप -* "माझे भात पिकले आहे. दूध पिळून झाले आहे. एकत्र कुटुंबात मी गुण्यागोविंदाने नांदत आहे. शेजारून मही नदी संथपणे वाहात आहे. तिच्या काठीच माझे घर आहे. आगोटी पेटविली आहे. आता है वरुणदेवा! वाटेल तेवढी वृष्टी कर. "_

_[सांसारिक गृहस्थ जेव्हा घरातील सर्व कामे आटोपून विश्रांती घेत असतो तेव्हा वाटेल तेवढा पाऊस पडला तरी त्याला त्याची चिंता वाटत नाही.]_

_*भगवान बुद्ध -* "मी क्रोध आणि कठोरता यापासून सर्वस्वी मुक्त झालो आहे. मही नदीच्या किनारी फक्त एका रात्रीसाठी राहात आहे. माझी झोपडी छतविरहित आहे. माझी आग संपूर्णतया विझलेली आहे. आता पाहिजे तेवढी वर्षावृष्टी होऊ दे."_

*_[जीवनमुक्त व्यक्तीसाठी काहीच अडचण उरत नसते. हे भौतिक शरीर म्हणजे एक झोपडीच आहे जी राग, द्वेष, मोह, मत्सर यांनी आच्छादलेली असते. त्यात मर्कटचेष्टा करणारे मन निवास करते. विपश्यना साधनेच्या सहाय्याने या विकार-वासनांवर पडलेले आवरण काढले जाते. जणु काय झोपडीचे छतच काढून टाकले जाते तेव्हा मनाचा मर्कटपणा समाप्त होतो. ते शांत होते, यालाच खुले कपाट किंवा खुली झोपडी म्हणतात. अशा निर्वाणदर्शी व्यक्तीच्या अंतःकरणातील विकार-वासनांची आग पूर्णतया विझून जाते. त्याचे भवभ्रमण चुकते. त्याचे ते अंतिम जीवन असते. म्हणून मही नदी किनारी केवळ एकच दिवस राहण्याचे त्यांनी म्हटले आहे.]_*

_धनिय गोप - "इथे माशा, मच्छर, डास नाहीत. गायी नदी किनारी उगावलेला चारा खात आहेत. कितीही पाऊस पडला तरी तो सहन करण्याची क्षमता त्यांच्यात आहे. म्हणून वरुणदेवते पाहिजे तेवढा पाऊस पाड!"_

*[माशा मच्छर नसणे हे त्या काळातील स्वच्छ ग्रामीण जीवनाचे प्रतीक आहे ]*_

_भगवान बुद्ध - "मी एक नाव तयार केली आहे व भवसागर पार करून आलो आहे. आता तर या नावेचीही आवश्यकता नाही. म्हणून पाहिजे तेवढा पाऊस पडू दे."_

        _*[भवचक्राबाहेर पडलेल्या व्यक्तीला कसल्याच भवबाधा नसतात. आता संसारातील वादळे, पाऊसवारे त्याचे काहीच नुकसान करू शकत नाही.]*_

_धनिय गोप- "माझी पत्नी आज्ञाधारक आहे. अलोलुप व पतिव्रता आहे. दीर्घकालापासून ती माझ्यासमवेत प्रेमाने रहात आहे. तिच्याबाबत मी कधी पापमय गोष्ट ऐकली नाही. आता हे देवा! पाहिजे तेवढा पाऊस पाड."_

_*[एका संसारी माणसाला पतिव्रता स्त्री जीवनसाथी म्हणून लाभल्यास चिंतामुक्त सुखी जीवनाचा लाभ होतो. ]*_

\भगवान बुद्ध - "माझं मन आज्ञाधारक आहे. विमुक्त आहे. दीर्घकालापासून मी ह्यास सुशिक्षित करून ठेवले आहे. सुदन्त बनविले आहे. माझ्यात पापाचा लवलेशही नाही. म्हणून पाहिजे तेवढा वर्षाव व्हावा!"_

_*[ अशा विमुक्त चित्ताच्या साऱ्या काळज्या आपोआपच नष्ट होतात. जो निष्पाप आहे त्याला कसलीही भवबाधा नाही.]*_

_धनिय गोप- "मी स्वतः माझा धनी आहे. वेतन घेणारा नोकर नाही. माझे पुत्र देखील आज्ञाधारक आहेत. माझ्याप्रमाणेच सशक्त आणि संयमी सर्व आहेत. त्यांच्याविषयी देखील मी एकही पापी गोष्ट ऐकली नाही. म्हणून हे देवा! पाहिजे तेवढी वर्षा होऊ दे."_

_भगवान बुद्ध  - "मी चाकर नाही. निवृत्त होऊन साऱ्या जगात माझ्या फिरत राहतो. मला नोकरीची गरज नाही. म्हणून आता हवा तेवढा वर्षाव होऊ दे."_

*_[जो आपल्या मनाचा गुलाम नाही, स्वतःच आपला मालक असतो. तो खया अर्थाने स्वाधीन असतो. म्हणून चितामुक्त असतो.]_*

_धनिय गोप - "माझ्याजवळ तरुण धट्टेकट्टे बैल आहेत. गाभण गायी आहेत. बछडे आहेत. या गायींचा पती वृषभदेखील आहे. म्हणून हे वरुणा! पाहिजे तेवढा पाऊस पडू दे."_

_[धनधान्याने परिपूर्ण, आरोग्य संपन्न, पतिव्रता पत्नी आणि आज्ञाधारक मुले असलेला माणसाला स्वतःला मोठा सुखी, सुरक्षित असल्याचे जाणवते.]_

_भगवान बुद्ध - "माझ्याकडे बैल नाहीत वा वासरे नाहीत, गाभण गायी नाहीत वा पाडे आणि वळू नाहीत म्हणून भरपूर पाऊस पडू दे."_

*_[अपरिग्रही अनासक्त माणसापेक्षा सुखी, सुरक्षित आणखी कोण असणार बरे ?]_*

_धनिय गोप - "माझे खुंट बळकटपणे गाडलेले आहेत. चांगल्या प्रकारे वळलेली मूंजेची नवी मजबूत दोरी आहे. बलवान बैल देखील ती तोडू शकत नाहीत. म्हणून हे देवा! पाहिजे तेवढा पाऊस पडू दे.'_

_[सांसारिक व्यक्ती समजते की धनधान्य, वैभव, पुत्र, पत्नी माझीच आहेत. मी त्यांना बांधून ठेवले आहे. आपल्या ताब्यात ठेवले आहे. हे सारे माझ्या आज्ञेत राहतील. म्हणून भविष्यातही मी नेहमी पूर्ण सुरक्षित राहीन. बिचारा भोळा मनुष्य हे समजत नाही की ज्यांना मी बांधून ठेवले आहे असे समजतो त्यांनीच मला बांधले आहे. ज्या परिवार आणि संपत्तीला मी स्थायी सुरक्षित समजतो, ज्या आधारावर मी मला स्वतःला स्थायी समजतो; माझ्यासहित ते सारेच किती अस्थायी, किती असुरक्षित आहेत. याच जीवनात विवशतेने पाहता पाहता सारेच संपून जाते आणि हे दुःखगर्भा अस्थायी सुख पुढे जन्म-जन्मांतरीसुद्धा चालत रहाते. कसला हा संभ्रम! किती विपर्यास!]_

_आणि *याच्या तुलनेत भगवान बुद्ध- “ज्याप्रमाणे बलवान बैल सारी बंधने तोडतो, जसा मस्त हत्ती साऱ्या लतावेली छिन्न भिन्न करतो तशीच मीदेखील माझी सारी बंधने पूर्णपणे तोडून टाकली आहेत. या भवबंधनातून मी मुक्त झालो आहे आता मला पुनर्जन्म नाही, पुन्हा गर्भावास नाही. म्हणून पाहिजे तेवढी वृष्टी होऊ दे."*_

             _पूर्ण विमुक्तीच्या या मंगलघोषाने सारे वातावरण धर्ममय तरंगांनी भरून गेले. जिथे एकीकडे जवळच्या उंचसखल भूमीला पाण्याने भरून टाकणाऱ्या पर्जन्ययुक्त मेघाने वृष्टी केली, *तिथे त्या बरोबरच साऱ्या प्रकृतीला सद्धर्माच्या अमृतजलाचे सिंचन करणाऱ्या भगवानांच्या वाणीच्या धर्ममेघाने वर्षाव केला. धनिय भाग्यशाली होता. अनेक जन्माच्या पुण्यसंग्रहाचे संचित त्याच्यापाशी होते. धर्मवाणीचा हा मंगल घोष ऐकताच त्याचे तन-मन रोमांचित झाले. अनित्यबोधिनी तरंग लहरींनी युक्त अशी धर्मगंगा साऱ्या शरीरभर प्रवाहित झाली. क्षणभर इंद्रियातीत नित्य, ध्रुव, शाश्वत, निरोध अवस्थेचा त्याला साक्षात्कार झाला. धनिय धन्य झाला. स्रोतापन्न झाला. त्याच्याबरोबर त्याचे काही अन्य कुटुंबीय देखील स्रोतापन्न झाले.*_

                 _अजूनपर्यंत तर केवळ नावच ऐकले होते. आता पाहिले आणि जाणले की हे तर साक्षात भगवान बुद्ध आले आहेत. मी देखील कसा वेडा आहे. यांच्याशी वादविवाद करीत होतो. परंतु हे ठीकच झाले. या निमित्ताने यांचे दर्शन झाले. योग्य दर्शन झाले. केवळ भौतिक शरीराचेच नव्हे तर धर्मकायेचे देखील दर्शन झाले. स्वानुभूतीच्या पातळीवर धर्माचे दर्शन झाले. हेच तर भगवानांचे खरे दर्शन. मी सर्वार्थाने धन्य झालो!_

_प्रचंड मेघमालेच्या वर्षा-ध्वनीमध्ये धनिय गोप भावविभोर होऊन म्हणतो *'लाभा बत नो अनप्पका'* खरंच! आमचा अनल्प [पुष्कळ] लाभ झाला आहे._

           _आम्ही भगवानांचे योग्य दर्शन घेतले आहे. हे चक्षुष्मान ! आम्ही आपल्याला शरण आहोत. हे महामुने! आपण आमचे शासक आहात. गुरु आहात. ही गोपी व मी आपल्या उपदेशाप्रमाणे विशुद्ध ब्रह्मचर्याचे जीवन व्यतीत करून धर्माचे आचरण करू आणि याच मार्गाचा अवलंब करून प्रगत होऊन जन्ममृत्यूच्या पलिकडील भवदुःखांचा नितांत अंत करून घेऊ._

           _धनिय गोप आपल्या भवक्षेत्राच्या बाहेर जात असलेला पाहून देव पुत्र मार म्हणाला, “पुत्रवान, पुत्रांना पाहून आनंदित होतो. गायींना पाहून आनंदित होतो. विषयांचा उपभोग घेतल्यानेच मानवाला आनंद होतो... ज्याच्याजवळ विषयांच्या उपयोगाची साधने नसतात त्याला आनंद कसा मिळणार ?"_

            _*याला उत्तरादाखल भगवानांची गुरुगंभीर वाणी निनादली, "पुत्रवान पुत्रांच्यामुळे चिंताग्रस्त असतो आणि गोपाल गोधनामुळे काळजीत असती. विषयांच्या आसक्तीमुळे मनुष्य नेहमीच चिंताग्रस्त असती. जो विषयासक्तीपासून विमुक्त असतो तोच चिंतामुक्त असती."*_

               _ही धर्ममय वाणी आपल्यासाठीदेखील प्रभूत प्रेरणादायक बनू द्या. आपण देखील धनिय गोपाप्रमाणे एकेक पाऊल प्रगती पथावर टाकीत विषयासक्तीपासून सुटका करून घेऊ या. आणि दुःख विमुक्त होऊन आपले मंगल साधू या._

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_संदर्भ :- जागे पावन प्रेरणा_*

*_संकलन :- महेश कांबळे_*

*_दिनांक :- ३१/१०/२०२२_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2022/10/blog-post_31.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

Sunday, 30 October 2022

निःसंदेह बुद्ध होणार

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_निःसंदेह बुद्ध होणार_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

                 _फार प्राचीन काळची कथा आहे. *प्रत्यंत प्रदेशातील एक नगर, त्या काळी प्रत्यंत प्रदेश, सीमावर्ती प्रदेशाला म्हणत. ज्या ठिकाणी एका राज्याची सीमा संपते व दुसऱ्या राज्याची हद्द सुरू होते तो भाग.*_

                _अशा प्रत्यंत प्रदेशातील हे अत्यंत रमणीय नगर, नावही होते रम्य. आज या नगरात मोठी धावपळ आहे. लोकांनी आपली घरे झाडून पुसून स्वच्छ केली. आहेत. सारवण-रंगरंगोटी करून सुशोभित केली आहेत. घराघराच्या दरवाजांवर आम्रवृक्षाच्या हिरव्यागार पानांची, रंगीबेरंगी फुलांची तोरणे बांधली आहेत. कुठे केळफुले तर कुठे केळ्यांचे लोंगर लोंबत आहेत. पाण्याचे कलश भरून त्यावर नारळ ठेवले आहेत. नारळांच्या खाली गर्द हिरव्या रंगाची आंब्याची पाने आणि हिरव्यागार दुर्वांची हिरवळ त्यांची शोभा वाढवीत आहे. गृहिणींनी उल्हसित अंतःकरणांनी आपापले अंगणात चौक सजविले आहेत. सडा संमार्जने करून रंगीबेरंगी कलात्मक रांगोळ्यांचे उत्कृष्ट नमुने मांडले आहेत._

                    _नगरातील सार्वजनिक चौकात मंडप उभारला गेला आहे. विमल, कोमल, नील नवल उत्पल - पुष्पांनी तो सुशोभित केला गेला आहे. पाच प्रकारच्या मांगलिक लाजलावा - लाह्या भूमीवर पसरल्या आहेत. मंडपावर पांढऱ्याशुभ्र तलम वस्त्राचे छत लावले आहे. त्याच्या चारही बाजूंना सुंदर सुगंधित पत्रपुष्पांच्या माळा बांधल्या आहेत. नाना रंगाचे छोटेमोठे ध्वज व पताका लावल्या गेल्या आहेत. नगराच्या लहानसान गल्लीबोळातील रस्त्यावरही विविध रंगाच्या ध्वज पताका लावल्या आहेत. *सर्व रस्ते विविध रंगाचा गुढ्या तोरणांनी सजविलेले आहेत.*_

                  _लहान मुले मुली, किशोर-किशोरी, तरुण-तरुणी सर्व आपापल्या मनपसंत एकाहून एक सुंदर अशा वस्त्राभूषणांनी नटले आहेत. नगरातील सर्व स्त्री पुरुष आकर्षक पोशाख व अलंकार घालून सुसज्ज झाले आहेत. जणु काही एकाद्या मंगलमय उत्सव समारंभाची तयारी होत आहे._

                 _आदल्या रात्रीच जोराचा पाऊस पडला होता. त्यामुळे नगराबाहेरील एक कच्ची सडक उध्वस्त झाली होती. तिच्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले होते.. काही खड्यातुन पाणी साचले होते व रस्त्यावर ठिकठिकाणी चिखल झाला होता. पुष्कळसे लोक खडी आणि सुकी माती आणून रस्ता दुरुस्तीच्या कामात मग्न होते._

                 _"आपल्या शहरात आज कुठला उत्सव साजरा होणार आहे का?" नगरात आलेल्या एका नवागताने रस्ता दुरुस्त करणाऱ्या लोकांपैकी एकाला विचारले._

               _“हां भाई! स्वागत समारंभ आहे. मला वाटते, तुम्ही परदेशी आहात, इथे नवीनच दिसताहात. तुम्हाला ठाऊक नाही. आमच्या सौभाग्याने *या प्रत्यंत प्रदेशात भगवान दीपंकर बुद्धांचे आगमन होत आहे. आपल्या भिक्षुसंघासमवेत आमच्या या रम्य नगराबाहेरील सुदर्शन नावाच्या महाविहारात उतरले आहेत.* नगरातील प्रमुख लोक त्यांचे काल दर्शन घेऊन आले आणि आज त्यांना इथे भोजनासाठी निमंत्रण देऊन आले आहेत. सारे शहर त्यांच्या स्वागताची तयारी करण्यात मग्न आहे. तेथे त्या मोठ्या मंडपात भोजनदानाचे सामूहिक आयोजन आहे. लोक त्यांना बोलावण्यासाठी गेले आहेत. ते आता एवढ्यातच येथे येतील. या चिखलाने भरलेल्या रस्त्याची दुरुस्ती आम्ही लौकर करीत आहोत कारण या रस्त्यावरून भगवान बुद्धांना व त्यांच्या भिक्षूसंघाला पायी चालतांना कसलाही त्रास होऊ नये._

             _"काय म्हणतां बुद्ध? काय खरंच कोणी व्यक्ती बुद्ध बनला आहे?" तरुण तपस्व्याने विस्फारित डोळ्यांनी विचारले._

            *_हा भाई, भगवान दीपंकर सम्यक सम्बुद्ध बनले आहेत. तुम्हाला ही गोष्टसुद्धा कळली नाही? खरंच तुम्ही अपरिचित नवागत आहात."_*

                 _आणि तो खरंच अपरिचित होता. एका दूर देशात राहणारा. *मध्य देशातील अमरावती नावाच्या नगरांत एका अत्यंत श्रीमंत घराण्यात ब्राह्मण कुलात जन्मलेला सुमेध.*  अनेक जन्मांच्या संस्कारांमुळे बाल्यावस्थेपासूनच सांसारिक प्रापंचिक सुखभोगांविषयी उदासीनता जागली. युवावस्या प्राप्त होताच *वारसाहक्काने मिळालेली सारी धनसंपत्ती लोकात वाटून स्वतः गृहत्यागी बनला आणि सुदूर हिमप्रदेशातील धम्मिक नावाच्या पर्वतावर तपस्या करण्यासाठी निघून गेला. तिथे तपस्या करता करता आठही लोकिय ध्यानसमाधि अवस्था प्राप्त झाल्या. पाचही अभिज्ञान ऋद्धि प्राप्त झाल्या. आपल्या ऋद्धिबलाच्या सामर्थ्यावरच तो आज इथे पोहोचला होता.*_

                _त्याला हे ऐकून सुखद आश्चर्य वाटले की इहलोकी दीपंकर नावाचे सम्यक् सम्बुद्ध उत्पन्न झाले आहेत. त्याचे सारे शरीर पुलकित झाले. अंगावर रोमांच उभे राहिले._

                _*एक बुद्ध व दुसरा बुद्ध यामध्ये एवढा प्रचंड कालावधी असतो की बहुतांश लोक बुद्ध शब्दही विसरून जातात. म्हणून हा शब्द ऐकणेही कठीणच होत असते. वस्तुतः कुणाला बुद्धत्व प्राप्त होणे आणि अशा कुणा बुद्धाची प्रत्यक्ष भेट होणे ही फार मोठ्या भाग्याची गोष्ट आहे. आज बुद्धाचे प्रत्यक्ष दर्शन होणार या विचारानेच युवा तपस्वी सुमेध अतिशय आनंदी झाला.*_

                  _रस्ता दुरुस्ती करणाऱ्या नागरिकांना त्याने हात जोडून प्रार्थना केली. " रस्त्याचा थोडासा भाग दुरुस्त करण्याचे काम माझ्या स्वाधीन करावे या असमतल भूमीला मी समतल करतो. यावरील चिखल दूर करतो. ओला रस्ता सुका करतो. भगवानांना चालण्यासारखा करतो. या पुण्यमय सेवाकार्यात मलाही भागीदार होण्याची संधी द्या."_

                 _*तपस्वी सुमेधाचे व्यक्तीत्व फार भव्य होते. उंच सडपातळ शरीर, गौर वर्ण, विशाल तेजस्वी डोळे, रुबाबदार चेहेरा आणि डोक्यावर काळ्याभोर केसांच्या लांब जटा. शरीरावर वल्कले, काखेत मृगचर्म आणि हातात कमंडलू. लोक त्याच्या भव्योदात्त आकर्षक व्यक्तिमत्वाने प्रभावित झाले. त्याची विनंती नाकारू शकले नाहीत.*_

                 _सुमेध भावविभोर होऊन रस्तादुरुस्तीच्या कामाला लागला. त्याने लोकांकडून एक घमेले घेतले. शेजारची सुकी माती आणून ओल्या चिखलांत टाकू लागला. त्याच्या तेजस्वी चेहेऱ्यावर धर्म बिंदू चमकू लागले. नवोदित सूर्य किरणांमध्ये ते मोत्यांप्रमाणे तेजस्वी दिसू लागले. बुद्धाच्या आगमनाचे चिंतन करताकरता त्याच्या मनात आनंदलहरी उसळू लागल्या व प्रफुल्लित होऊन उत्साहाने आपल्या कामात दंग झाला._

              _एवढ्यात लोक समूहात प्रचंड हर्षध्वनी उठला. भन्ते भगवानांचे आगमन होत आहे. *'बुद्धं सरणं गच्छामि'* चा मंजुळ मंगलघोष निनादला. तपस्वी सुमेधाचे तनमन आनंदाने पुलकित झाले. *खरोखर भगवान दीपंकर बुद्ध समोर आहेत. मंद गतीने, मोजकी ताळमेळ साधणारी पावले टाकीत जवळ जवळ येत आहेत.* डोळ्यांतून करुणेची अजस्त्र अमृतधारा वाहत आहे. *तपस्व्याला केवळ दर्शनानेच धन्य-धन्य वाटले. पण तेवढ्यात त्याच्या लक्षात आले की, रस्त्याचा थोडासा भाग अजून दुरुस्त करायचा आहे. तिथे ओलावा आहे. चिखल आहे. भगवान आणि त्यांच्या भिक्षुसंघाला त्या चिखलातून चालावे लागणार. हे तर फार अयोग्य आहे. त्याने तात्काळ त्या चिखलभऱ्या रस्त्यावर आपले मृगाजिन टाकले. भगवान व भिक्षुसंघ त्यावर पाय ठेवून पुढे येतील. पण पुन्हा त्याने रस्त्याकडे नजर टाकून पाहिले. चार हात जागा अजूनही चिखलाने भरलेली आहे. सुमेधाने विचार केला, माझे हे शरीर काय कामाचे ? याहून त्याचा अधिक चांगला उपयोग काय होणार? म्हणून तो त्या चिखलाने भरलेल्या रस्त्यावर झोपला आणि आपल्या केसांच्या जटा पसरल्या. भगवान व भिक्षुसंघ माझ्या जटांवरून, शरीरावरून चालतील. माझे शरीर ठेचले-चेचले तरी चालेल पण त्यांच्या पायाला चिखल लागता कामा नये.*_

                _*आणि अशा रीतीने पडल्या पडल्या सुमेध तापसी विचार करू लागला. 'मी ध्यानसमाधि अवस्थांची उच्च स्थाने प्राप्त केली आहेत. खरोखर माझ्याकडे पुरेशी पूर्व पुण्याई आहे, अन् आता तर प्रत्यक्ष भगवान बुद्धांचे सान्निध्य प्राप्त झाले आहे. त्यांच्याकडून विपश्यना मुक्तीदायिनी साधना शिकून थोड्याशा परिश्रमांनी नितांत विमुक्त अवस्था प्राप्त करू शकतो. पण त्यामुळे केवळ माझीच मुक्ती होईल. एवढ्याचसाठी पुरुषार्थ करावा काय ? छे! ही तर मोठी तुच्छ, स्वार्थी, लहानशी गोष्ट होणार. मला केवळ माझ्या मुक्तीसाठी प्रयत्न करणे योग्य नाही. मला अधिक परिश्रम करून या भगवान दीपकरांप्रमाणेच सम्यक् संबुद्ध बनले पाहिजे. भले त्यासाठी प्रदीर्घ कालावधी लागो. अनेक कल्प लागोत. भले त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागो. परंतु या प्रकारे सम्यक् संबोधि प्राप्त झाल्यावर मी अनेकांना मुक्तीप्राप्तीसाठी सहाय्यक होईन. आणि सम्यक् सम्बोधि प्राप्त करण्यासाठी अनेक पुण्यसंग्रहाचे पारमितांचे परिमाण अधिक समर्थ होण्यासाठी जो दीर्घ कालावधी लागेल त्या काळातही अगणित लोकांना धर्ममार्गाकडे प्रवृत्त करून पुण्यसंपादन करीन. मला याच जीवनात मुक्ती नको. मला सम्यक सम्बुद्ध बनायचे आहे"*_

                 _तोपर्यंत भगवान दीपंकर बुद्ध अगदी नजिक आले. त्यानी खाली तोड़ करून झोपलेल्या तापसी सुमेधकडे पाहिले. *'चेतोपरिञ्ञाण' या सिद्धीच्या सहाय्याने आपल्या मनोबलाने त्याची अवस्था जाणली आणि मंद स्मित केले. त्रिकालज्ञ भगवानांनी त्या युवा तपस्व्याचा भूतकाल पाहिला. याच्याजवळ अनेक कल्पांच्या संचित पुण्याचा विपुल साठा आहे. या गृहत्यागी माणसाने मनुष्य जीवनही सार्थक केले आहे. कठीण परिश्रमांनी आठही ध्यानावस्था प्राप्त करून घेतल्या आहेत. यावेळी याला विपश्यना साधना मिळाली तर अल्प काळातच ही व्यक्ती भवमुक्त अरहंत अवस्था प्राप्त करून घेईल. भगवानांनी पाहिले की ही व्यक्ती यावेळी अनेकांच्या हितसुखासाठी आपली आशुमुक्ती आनंदाने त्यागण्यासाठी दृढसंकल्प करीत आहे. आगामी असंख्य कल्पांपर्यंत या पारमितांना फार मोठ्या प्रमाणावर आणखी अधिक परिपुष्ट करण्याचा याचा दृढ संकल्प आहे. हा संकल्प केवळ भावावेशात येऊन केलेला नाही. लोककल्याणासाठी दीर्घकाळ परिश्रम करण्याची शक्ति याच्यामध्ये आहे. तेव्हा भगवानांनी त्याचा भविष्यकाळ पाहिला आणि स्मित हास्य केले. सुमेधाच्या डोक्याजवळ उभे राहून त्यांनी ही मंगल आशीर्वाद देणारी उद्घोषणा केली.*_

                 *_“भिक्षूंनो! हा जो जटाधारी उग्र तपस्वी चिखलात खाली तोंड करून पडला आहे हा अत्यंत श्रद्धावान आहे. दृढनिश्चयी आहे. याने यावेळी जो दृढनिश्चय केला आहे तो याच्यासाठी बोधि बीज बनला आहे. हा बुद्धांकुर बोधिसत्त्व अदम्य उत्साहाने जन्मजन्मांतरात आपल्या पुण्यपारमितांना अत्यंत पुष्ट करीत करीत, अनेक प्राण्यांना धर्मपथावर प्रेरणा देत राहील व चार असंखेय्य आणि एक लाख कल्प पूर्ण झाल्यावर सिद्धार्थ गौतम नावाचा सम्यक् सम्बुद्ध होईल."_*

                _भगवानांनी आशीर्वादमय उजवा हात उचलला आणि मेघ गर्जनेसारख्या गंभीर वाणीने ते म्हणाले, *‘धुवं बुद्धो भविस्ससि' निःसंशय हा बुद्ध बनेल.*_

         _साऱ्या वातावरणात ही बुद्ध वाणी निनादली. लोकलोकान्तरातील असंख्य चक्रवालवासीयांच्या मुखावाटे या बुद्धवाणीचा प्रतिध्वनी उमटला..._ 

*'धुवं बुद्धो भविस्ससि'! 'धुवं बुद्धो भविस्ससि'!! 'धुवं बुद्धो भविस्ससि' !!!_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_संदर्भ :- जागे पावन प्रेरणा_*

*_संकलन :- महेश कांबळे_*

*_दिनांक :- ३०/१०/२०२२_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2022/10/blog-post_30.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

Saturday, 29 October 2022

निंदा असो वा प्रशंसा

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_निंदा असो वा प्रशंसा_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

                  _राजगृहाचे महाराज बिम्बिसार यांनी दान दिलेल्या वेणुवनात वा दुसऱ्या एका विहारात वर्षावास संपवून भगवान देश-प्रदेशात वेगवेगळ्या प्रांतात धर्मयात्रेसाठी बाहेर पडत असत. अशाच एका घटनेचे एक दृश्य आपल्यासमोर आहे._

                  _पाचशे भिक्षूंसमवेत भगवान राजगृहापासून नालंदाकडे पदयात्रेस निघाले, *या मोठ्या काफिल्यामागोमाग दोन परिव्राजकदेखील यात्रा करीत होते. त्यांतील एक आचार्य सुप्पिय व दुसरा त्यांचा सेवक शिष्य माणवक ब्रह्मदत्त. साऱ्या रस्त्यात त्या दोघात परस्परांत विवाद होत होता.*_

                     _गुरु परिव्राजक सुप्रिय अनेक प्रकारांनी भगवानांची निंदा करत होता. त्यांच्यावर खोटेनाटे आरोप करीत होता. श्रमण गौतम सर्वज्ञ नाही, अरहंत नाही, लोकांना चुकीचे मार्गदर्शन करीत आहे, वगैरे वगैरे. भगवान देत असलेल्या धर्मशिकवणुकीचीही अनेक प्रकारे निंदा करीत होता. त्यातील सदोषता सांगत होता. हे धर्मशिक्षण नीट प्रकारे समजाविले गेले नाही, मुक्ती मार्गाकडे नेणारे नाही, इत्यादी इत्यादी. भगवानांच्या भिक्षुसंघावरही अनेक प्रकारची टीकाटिप्पणी करीत होता. खोटे नाटे आरोप करीत होता. हा भिक्षुसंघ सुमार्गाने जाणारा नाही, सरळ मार्गी नाही, आदि आदि._

                 _नेमके याच्या उलट त्याचा तरुण शिष्य ब्रह्मदत्त अनेक प्रकारांनी भगवानांची प्रशंसा करीत होता. गुणगाण करीत होता. हे भगवान अरहंत आहेत. लोकविदु आहेत. वगैरे वगैरे. हा धर्म सुआख्यात, सांदृष्टिक आहे. तत्काळ फळ देणारा आहे, मोक्षापर्यंत पोहोचविणारा आहे. इत्यादी इत्यादी. भगवानांच्या भिक्षुसंघाचीही अनेक प्रकारे प्रशंसा करीत होता._

_हा भिक्षुसंघ सन्मार्गाने जाणारा, सरळ, सद्गुणी, शुद्ध मनाचा आहे, वगैरे वगैरे.._

               _गुरुशिष्यांचा हा वादविवाद सारा प्रवासभर चालला होता. दोघेही जण आपापले मनोगत परस्परांना समजाविण्याचा सतत प्रयत्न करीत होते पण त्यांचे एकमत झाले नाही._ 

                _गुरू सुप्पियाच्या मनात भगवान बुद्धांच्याविषयी असीम कटुता होती. त्याचे मन ईर्षा, द्वेषपूर्ण विकारांनी मत्सरग्रस्त होऊन जळत होते. भगवान बुद्धांची यशकीर्ती सर्वत्र पसरली होती. काश्यप बंधुसहित त्यांचे एक हजार जटाधारी शिष्य जेव्हापासून भगवानांचे सेवक बनले तेव्हा त्यांची प्रतिष्ठा उत्तरोत्तर वाढतच गेली. काश्यप बंधु लक्षावधी मगधवासियांचे पूजनीय आचार्य होते. त्यामुळे त्यांचे सारे अनुयायी साहजिकच भगवान बुद्धांचे अनुयायी झाले. स्वतः मगधाचा सम्राट बिम्बिसार भगवान बुद्धांचा श्रावक शिष्य बनला. त्याची श्रद्धा अपरिमित वाढली. कारण त्याला स्वतःला विपुल धर्मलाभ झाला. कुटुंबातील अनेक व्यक्तींनाही चांगला लाभ झाला. *सदाचारी जीवन जगणे, मनातील राग-द्वेष इत्यादी विकारांपासून मुक्त होण्याची शिकवण तर अन्य आचार्य देतच होते. पण त्यांच्याजवळ तो उपदेश कार्यवाहीत आणणारा रास्त उपाय नव्हता. कोणताही वैज्ञानिक मार्ग माहित नव्हता. फारच झाले तर एखादे कर्मकांड, एखादे व्रत किंवा एखाद्या संप्रदायाचे जंजाळ जोडून द्यायचे. परंतु सुनियोजित प्रकारे जो मनाच्या खोल गाभाऱ्यात जाऊन अंतर्मनातील स्वभावाचे मूळापासून परिवर्तन करणारा परिणामकारक विधी देऊ शकत नव्हते. विपश्यना साधनेच्या रुपाने असा विधी भगवान बुद्धांकडून मिळाला तेव्हा कट्टरपंथी अंधविश्वासू लोक सोडून बाकी सर्व समजूतदार बुद्धिशाली लोक भगवान बुद्धांकडे आकर्षिले गेले. याच कारणाने भगवान बुद्धांची शिकवण घराघरांत प्रवेशली. हजारोंच्या संख्येने लोक घरदार सोडून भगवानांच्या भिक्षुसंघात सामील झाले. लाखो लोक सांसारिक जीवन जगतच सद्धर्माच्या मार्गावर चालू लागले.*_

                 _*महाराज बिम्बिसाराने बुद्ध-प्रमुख भिक्षुसंघाला आपले अत्यंत रमणीय वेणुवन दान दिले. त्याचेच अनुकरण करून अन्य राजपुरुषांनी व सधन नागरिकांनी फक्त एका राजगृह नगरात सतरा विहार बांधले, ज्यात नेहमी विकसनशील भिक्षुसंघाने रहावे व धर्मोपदेश करून लोककल्याण करावे.*_

                 _साऱ्या मगध देशात भगवान बुद्ध व त्यांचा भिक्षुसंघ यांची प्रतिष्ठा वाढली तशी अन्य सांप्रदायिक आचार्यांची मानप्रतिष्ठा-आदर सत्कार यात उणीव  निर्माण झाली. *गणाचार्य बेलट्ठपुत्र संजय यांचे प्रमुख शिष्य उपतिस्स [ सारिपुत्र) आणि कोलित [मोग्गलान] यांनी आपल्या आचार्यांचे शिष्यत्व सोडून भगवान बुद्धांचे शिष्यत्व स्वीकारले. त्यामुळे ते आचार्यकुल विस्कळीतच झाले.*_

                   _भगवान बुद्धांच्या संप्रदायविहीन तसेच कल्पनेपासून दूर, अनुभूतीजन्य व सत्यावर आधारीत धर्माची प्रतिष्ठापना झाल्यावर अनेक संप्रदाय-संस्थापक, यशस्वी वयोवृद्ध संघीय, गणश्रेष्ठी, गणाचार्य, यांची लोकमान्यता कमी होऊ लागली. त्यांच्या संघटनांचे वाडे कोसळू लागले. अशाच एखाद्या संप्रदायातील हा परिव्राजक सुप्रिय असावा. त्यामुळेच त्याच्या मनात भगवान बुद्धांविषयी कटुता असावी. व भिक्षुसंघाविषयीची द्वेषभावना प्रबल झाली असावी._

                 _तर दुसरीकडे त्याचा निकटवर्ती ब्रह्मदत्त अजून युवावस्थेत होता. कोणत्याही तत्वज्ञानाच्या किंवा संप्रदायाच्या पाशात तो अडकलेला नव्हता. तो भगवान् बुद्धांच्या तेजस्वी, प्रतापी, ओजस्वी व्यक्तिमत्वानेच नव्हे तर त्यांच्या सहज सुलभ, सरळ भाषेतून सांगितल्या गेलेल्या वैज्ञानिक धर्माकडे आकर्षिला गेला. तसेच सौम्य शांत भिक्षुसंघ त्याला आवडला. तो पहातो की, *भगवान बुद्ध व त्यांचा भिक्षुसंघ चालतात तेव्हा मोजून मापून टाकलेली पावले, व शालीनतेने खाली वळविलेली नजर असते. परंतु अन्य संप्रदायातील संन्याशी उद्धटपणे हातपायांची उर्मट हालचाल करीत डोळे मोठे करून सर्वत्र न्याहाळत चालतात. नम्रता नावाला देखील नसते त्यांच्यात. भगवानांचा भिक्षुसंघ मौन धारण करून वावरतो पण हे लोक किती बडबडतात. किती वाचाळ ! त्यांच्या मनातील अशांती बोलण्यातून प्रकट होत असते. भगवानांचे भिक्षु किती अल्प संतुष्ट, अपरिग्रही, अंगावर थोडीशीच वस्त्रे [चीवर ], हातात फक्त भिक्षापात्र असते. त्यामानाने अन्य सांप्रदायिक संग्रह करणारे आहेत. भांडीकुंडी किती! कपडालत्ता किती! खाद्यपदार्थांची गाठोडीच्या गाठोडी वाहून नेत असतात.*_

                _शिष्य माणवक ब्रह्मदत्त बुद्ध आणि त्यांचा भिक्षुसंघ यांचे गुणगान करतांना मुळीच थकत नव्हता. आणि गुरुवर्य परिव्राजक सुप्पिय त्यांची निंदा करण्यात मागे हटत नव्हता. सारी यात्राभर त्या दोघात हा वादविवाद चालला होता. *राजगृह नालंदापासून एक योजन दूर अंतरावर आहे.* चालत चालत हा काफिला अर्ध्या वाटेवर पोहोचला. महाराज बिम्बिसारने या ठिकाणी यात्रेकरूंना विश्रांतीसाठी एक विश्रामगृह उभारले होते. मोठे राजउद्यान बांधले होते. चारही बाजूंना मजबूत भिंती असलेले उद्यानयुक्त विश्रामधाम. अनेक  फुलाफळांनी डवरलेले वृक्ष, घनदाट सावली. पाण्याने तुडुंब भरलेल्या विहिरी-बावड्या, तलाव सरोवरे. बिम्बिसार व त्याच्यासमवेत आलेली राज्य परिषद ; राजकर्मचारी तसेच सुरक्षा सैनिक यांच्या निवासासाठी विशाल भवने परिषद, होती. *साऱ्या राज्यभर अशी भव्य विश्रामधामे ठिकठिकाणी उभारली असावीत. यांना राजागार म्हणत असत. या राजभवनाच्या प्रवेशद्वारावर एक आम्रवृक्ष उगवला होता. म्हणून त्याचे नाव अम्बलट्ठिक राजागार पडले.*_

                 _श्रद्धाळू बिम्बिसाराने भिक्षुसंघासहित भगवान बुद्धांची यात्राप्रसंगी विश्राम करण्यासाठी अशा प्रकारे राजागार विश्रामधामात सोय केली असावी असे वाटते. म्हणून असे दिसते की, सायंकाळ होताच भगवान आणि त्यांचा भिक्षुसंघ नालंदा आणि राजगृह यांच्या मध्यभागी बनविलेल्या या अम्बलट्ठिक राजागारात रात्रीची विश्रांती घेण्यासाठी उतरलेले होते. त्यांच्या मागे मागे चालत येणाऱ्या परिव्राजकाने व त्याच्या शिष्यानेही या सुखसोयीचा लाभ घेऊन तेथेच मुक्काम केला. भगवान आणि भिक्षुसंघाने नेहमीप्रमाणे रात्रचर्या पूर्ण केली. पण हे गुरुशिष्य रात्रभर त्याच मुद्यावर चर्चा वादविवाद करीत राहिले.._

                  _*नित्यनियमानुसार रात्रीच्या प्रथम प्रहरात भगवानांनी स्नान करून कपडे बदलेले आणि बुद्धासनावर बसून भिक्षूंच्या समवेत एक मुहूर्त ध्यान केले. सारे भिक्षु निःशब्द होऊन मौन पाळून अधिष्ठानास बसले. कुणाच्या ही खास-खोकल्याचाही आवाज नाही. शरीराची जरादेखील हालचाल नाही. सर्वजण निश्चल दीपज्योतीप्रमाणे ध्यान साधनेत मग्न झाले. त्यानंतर भगवानांनी उपदेश केला. ध्यान विधीवर काही प्रकाश टाकणारे भाष्य केले.. ज्या भिक्षूंनी प्रश्न विचारले त्यांना उत्तरे दिली. ज्यांना समस्या होत्या त्या सोडविल्या. त्यांचे समाधान केले. कुणाकुणाला विपश्यना साधनेची सखोलता समजाविली. अशा रीतीने रात्रीचा पहिला प्रहर संपला. सारे भिक्षु विश्रांती घेण्यास निघून गेले.*_

                 _*भगवान आता रात्रीच्या दुसऱ्या प्रहारातील कामाला लागले. नेहमीप्रमाणे या मध्यप्रहरी विभिन्न लोकातून आलेल्या देवांच्या व ब्रह्मांच्या प्रश्नांना उत्तरे देत राहिले. त्यांना धर्मोपदेश देत राहिले. ध्यान शिकवीत राहिले. अशा रीतीने रात्रीचा दुसरा प्रहर संपला.*_

                  _*नित्याप्रमाणे भगवानांनी रात्रीच्या तिसऱ्या प्रहाराचे तीन भागात विभाजन केले. पहिल्या भागात मोकळ्या हवेत चंक्रमण केले. सजग होऊन चालत राहिले. दुसऱ्या भागात आपल्या शयनगृहात उजव्या कुशीवर सिंहशय्यावस्थेत पडून स्मृती संप्रज्ञानात विश्राम घेतला आणि तिसऱ्या भागात बसून मैत्री भावनेने करुण चित्ताने सर्व लोकांचे अवलोकन केले. कुठे कुठे कोण कोणते प्राणी आपल्या पूर्वकृत कुशल कर्मांमुळे मुक्तावस्था प्राप्त करणे योग्य अशा स्थितीत आहेत आणि त्यास कुठे कसे मार्गदर्शन करावे यात रात्रीच्या प्रहराचा तिसरा भागही पुरा झाला.*_

                  _अशा रीतीने तीनही प्रहारांची रात्रचर्या पूर्ण करून भगवान मैत्री ध्यानभावनेतून उठून बाहेर आले. सूर्योदयाच्या पूर्वाभासाचा संदेश देत आकाशात तांबडे फुटले होते. पहाटेच्या या आल्हाददायी वेळी काही भिक्षु मोकळ्या मंडपात बसले आहेत. काही चर्चा चालली आहे. भगवान त्यांच्या जवळ गेले. सर्वांनी वाकून प्रणाम केला. भगवान तेथे असलेल्या एका आसनावर बसले आणि भिक्षूंना विचारले, 'कसली चर्चा चालली आहे ?" भिक्षु उत्तरले, "भगवान क्षमा करावी. काही काळ धर्म चर्चा झाली पण त्यानंतर लोकचर्चा सुरू झाली. भन्ते भगवान! जेव्हा नालंदाहून आपण निघालो होतो तेव्हा परिव्राजक सुप्पिय व त्यांचा शिष्य माणवक ब्रह्मदत्त दोघेही आपल्या मागे मागे चालत होते. सर्व रस्त्यात त्यांचा वादविवाद चालला. एक बुद्ध, धर्म, संघ यांची तोंडभर प्रशंसा करीत होता तर दुसरा तीव्र निंदा करीत होता. जेव्हा आम्ही आपल्याबरोबर राजागारामध्ये रात्री विश्राम घेण्यासाठी थांबलो तेव्हा तेही आपल्या समवेत थांबले. आम्ही पाहिलं की रात्रभर देखील त्यांनी विश्रांती घेतली नाही. सारी रात्र याच वादविवादात गुंतून पडले आहेत."_

                    _*त्यावर भगवान म्हणाले, 'भिक्षुनो! जेव्हा कोणी तुमची निंदा करीत असेल तेव्हा कुपित क्रोधीत होता कामा नये. मनात दुःखी होता कामा नये. शांत चित्ताने स्वतःच स्वतःची परीक्षा करावी. खरंच आपल्यात काही दोष तर नाही ना? जर दोष नसेल तर आपण निर्दोष आहोत या तथ्याचा स्वीकार करावा. निंदा ऐकून रागावलात, दुःखी झालात तर आपणच आपली हानी करून घ्याल. आपल्या प्रगतीत अडथळा निर्माण कराल."*_

                   _*"तसेच कोणी प्रशंसा करू लागला तर ती ऐकून आनंदित होऊ नका. हर्षोत्फुल्ल बनू नका. शांत चित्ताने आपले आपणच निरीक्षण करा की खरंच असा काही सद्गुण आपल्यात आहे का? का ही व्यक्ती अतिशयोक्ती करते आहे? जर असेल तर मात्र त्याचा स्वीकार करावा. जर आनंद आणि हर्ष यांनी फुगून जाल तर आपली हानी करून घ्याल व आपल्याच प्रगतीला बाधा निर्माण कराल."*_

                 _या साधक हो! भगवानांची ही धर्मवाणी विस्तृतपणे समजून घेऊ या व त्याप्रमाणे आचरण करून आपले हित-सुख साधू या._

                 _भगवानांनी सांगितलेल्या साधनाविधीचे साधक या नात्याने आपण चांगल्या रीतीने समजलो आहोत की, *शब्द शब्दच आहेत. निंदा असो वा प्रशंसा फक्त तरंगच तर आहेत. परंतु निंदाव्यंजक शब्द जेव्हा आपल्या कानाला स्पर्श करतात तेव्हा आपल्या जुन्या संस्कारांनी प्रभावित होऊन संज्ञा त्यांचे मूल्यांकन करते आणि या शब्दांना वाईट समजून शरीरात अप्रिय दुःखद संवेदना निर्माण होतात. त्याच्या परिणामस्वरूप अज्ञान अवस्थेत आमच्या मनाचा एक भाग दुर्मन होऊन उठतो आणि द्वेष, क्रोध यांची प्रतिक्रिया व्यक्त करतो.*_

                     _*त्याचप्रमाणे जेव्हा स्तुतीचे शब्द आमच्या कानाला स्पर्श करतात तेव्हा ही संज्ञा उर्ध्वमूल्यन करते आणि त्या शब्दांना चांगले मानल्यामुळे शरीरात प्रिय, सुखद संवेदना उत्पन्न होतात. परिणामस्वरूप अज्ञान अवस्थेत आपल्या मनाचा एक हिस्सा प्रफुल्लित होतो. आणि राग, लोभ, आसक्ती यांच्या प्रतिक्रिया करू लागतो.*_

                  *_प्रतिक्रिया मग ती द्वेषाची असो वा रागाची, आपले मन दूषित कर्मसंस्कारांच्या धुराने धुरकटते. अन् ते सत्याला जसे आहे तसे पाहू शकत नाही. अज्ञानाने प्रभावित होते. आपली समता घालवून बसते. आणि विकारांवर विकार उठत राहतात. आपली विपश्यना साधना दूरावते, सुटते. रागद्वेषांपासून मुक्त होण्याच्या कामात बाधा [अंतराय] निर्माण होते. पाच आवरणात हे दोन्ही प्रमुख आहेत. म्हणून हे दोन्ही अस्तित्वात असेपर्यंत समाधि अवस्था प्राप्त होत नाही. प्रज्ञा जागवून रागविहीन, द्वेष विहीन होणे तर दूरच राहते. निंदा किंवा प्रशंसा ऐकून द्वेष किंवा राग जागृत झाल्यास आपण दुसऱ्याची हानी करू किंवा न करू पण आपली हानी अवश्य होत असते, आपल्या प्रगतीत अडचण निश्चितच निर्माण होत असते._*   

                 _म्हणून साधक हो! हे चांगल्या प्रकारे समजून घेऊन यापासून स्वतःला वाचवावे आणि धर्मपंथावर प्रगतीशील होऊन आपले मंगल साधून घ्यावे._

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_संदर्भ :- जागे पावन प्रेरणा_*

*_संकलन :- महेश कांबळे_*

*_दिनांक :- २९/१०/२०२२_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2022/10/blog-post_29.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

Friday, 28 October 2022

पहाण्यात मात्र केवळ पहाणे

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_पहाण्यात मात्र केवळ पहाणे_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

                   _*मुंबई महानगरापासून सुमारे पन्नास मैल अंतरावर एक लहानसे स्टेशन आहे - नल्ला [नाला]. जवळच छोटेसे गाव आहे सुप्पारा [सोपारा]. आजचे नालासोपारा. दोन हजार पाचशे वर्षांपूर्वी भारतातील हे एक प्रसिद्ध व महत्वपूर्ण बंदर होते. त्या काळातील मुंबई ! नाव होते सुप्पारकपत्तन. पूर्वी पतन म्हणत असत बंदराला.*_

                    _त्या काळात या सुप्पारक महानगरात एक अत्यंत वृद्ध संन्याशी रहात होता. डोक्यावर कापसासारखे पांढरे शुभ्र केस. त्यांच्या जटा झाल्या होत्या. चेहऱ्यावर तशीच लांबलचक दाढी आणि मिशा. कृश शरीरावर वल्कल वस्त्रे या साऱ्यामुळे त्या संन्याशाचे व्यक्तिमत्व भव्य दिसत होते. अफाट लोकसंख्येच्या त्या महानगरात अनेक धनवान प्रतिष्ठीत लोक, त्याचे श्रद्धा भक्त शेकडोंच्या संख्येने त्याचे नित्य दर्शन घेण्यास येत. त्याच्या पायाची धूळ मस्तकाला लावीत. भरपूर दान-दक्षिणा देत, खाद्यसामुग्री अर्पण करीत. फळे, फुले व औषधे अर्पण करून स्वतःला धन्य समजत. भक्तांच्या या श्रद्धेमुळे त्या संन्याशाच्या मनात असा आत्मविश्वास निर्माण झाला की आपल्याला अरहंत अवस्था प्राप्त झाली आहे, जीवनमुक्त झालो आहोत. भवबंधनांतून संपूर्णतया सुटलो आहोत._

                  _परंतु एके दिवशी एका हितचिंतकाने मोठ्या प्रेमाने त्याला समजावून दिले की आपण अजून अरहंत झाला नाहीत, एवढेच नव्हे तर अरहंत होण्याच्या मार्गावरही नाहीत. संन्याशाला धक्का बसला. पण तो समंजस होता. आत्मचिंतन करू लागला. तेव्हा त्याच्या हे लक्षात यायला वेळ लागला नाही की *जोपर्यंत मनात विकारांचा प्रवाह चालू आहे तोपर्यंत कोण कसा अरहंत होऊ शकणार? जीवनमुक्त कसा होणार? त्याला स्वतःलाच हे जाणवले की एकाग्रतेच्या अभ्यासाव्यतिरिक्त त्याची चित्तधारा सर्वथा विकारशून्य झालेली नाही.*_

                  _त्याने उत्सुकतेने विचारले, "या जगात अशी कुणी व्यक्ती आहे की, ज्याच्या मनात वासना विकारांचा लवलेशही नाही? ज्याची चित्तधारा विकारांपासून पूर्णपणे मुक्त झाली आहे ? जो अरहंत झालेला आहे ?"_

                   _त्याला उत्तर मिळाले, "हो तर अवश्य उत्तर भारतातील नगरी कपिलवस्तूचा शाक्यवंशीय राजकुमार सिद्धार्थ गौतम हा गृहत्याग करून परमसत्याचा शोध घेण्यासाठी बाहेर पडला, आणि अनेक वर्षे सतत शोध घेतल्यावर मनातील सगळ्या विकार-वासनांचे निर्मूलन करणारी साधना पद्धती त्याने स्वतःच शोधून काढली व त्या पद्धतीने निरंतर अभ्यास करून अरहंत अवस्था प्राप्त करून घेतली आहे. ते स्वतःच सम्यक् सम्बुद्ध आहे. यावेळी ते भगवान अरहंत सम्यक् सम्बुद्ध श्रावस्तीच्या जेतवनात राहिले आहेत. ज्या साधनेमुळे त्यांना विमुक्ती लाभली. ती साधना अत्यंत करूण चित्ताने कोणताही भेदभाव न करता सर्वांना शिकवीत आहेत. संन्याशाने जेव्हा हे ऐकले तेव्हा मनात आंदोलन उठले. 'मी देखील गृहत्याग करून वर्षे लोटली. साऱ्या भवबंधनातून सुटका व्हावी, नितांत विमुक्त व्हावे म्हणून संन्यास घेतला. पण पाहतो आहे, जे व्हायला हवे ते झालच नाही. ही बाह्य वेशभूषा, कर्मकांड, आणि त्याग तपाची व्रतवैकल्ये यामुळे बाहेरील लोकच आकर्षिले गेले.. सामाजिक प्रतिष्ठा वाढली; मान-सन्मान, वैभव, अभिमान, पूजाअर्चा, दान दक्षिणा सारं मिळत आहे. परंतु माझ्या मानसिक अवस्थेची या लोकांना काय कल्पना ? हे सारेजण तर माझे बाह्यजीवनच पहात आहेत. या खोट्या प्रतिष्ठेच्या मान सन्मानाशी माझे व्यक्तिशः काय देणे घेणे आहे ? ज्या ध्येयासाठी मी गृहत्याग केला, घरदार प्रपंच सोडला ते ध्येय तर बाजूलाच राहिले आहे, ते प्राप्त झालेच नाही. मनाची शुद्धता-परमविशुद्ध विमुक्ती कुठे झालीय? आता तर मी वृद्ध झालो आहे. मनाची शुद्धता या मानवी जीवनातच शक्य असते. माझ्या जीवनाचा केवढा अमूल्य काल मी किती फुकट घालविला !! त्याला वाटले उर्वरित आयुष्य फारच अल्प आहे._

                  _मनात नैराश्य दाटून आलं, एवढ्या थोड्या काळात आता काय होऊ शकेल? तेव्हा त्याच्या अंतरंगात नुकत्याच ऐकलेल्या शब्दांचे गुंजन सुरू झाले : *"ज्या विधीने - साधनेने भगवान बुद्धांना स्वयंमुक्ती लाभली तो साधनाविधी भगवान अरहंत सम्यक सम्बुद्ध सर्वांना कोणताही भेदभाव न ठेवता अत्यंत करुणार्द्र होऊन शिकवितात."*_

                  _या विचाराने उदासीन झालेल्या मनात एका नव्या उत्साहाचा झरा उसळला. त्याच्या वृद्ध दुर्बल शरीरात तारुण्याचे सळसळणारे स्फूर्तिदायक झरे वाहू लागले आणि तात्काळ तो श्रावस्तीकडे चालू लागला. *अतिशय दूर असलेल्या पश्चिम सागर तटावरील अपरांत प्रदेशाची राजधानी सुप्पारक गावाहून उत्तर प्रदेशातील हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या कौशल प्रदेशाची राजधानी असलेले श्रावस्ती नगर यातील लांबचे अंतर त्याला जाणवले नाही.* भगवान अरहंत सम्यक् सम्बुद्धांचे दर्शन, आणि त्यांच्याकडून चित्त विशोधनाची विद्या शिकण्याची अभिलाषा या धर्म-संवेगमुळे त्याच्या मनात अदम्य उत्साह संचारल्याने या प्रदीर्घ प्रवासयात्रेचे श्रम त्याला जरासुद्धा जाणवले नाहीत. म्हणून संबंध प्रवासात फक्त एक रात्रच त्याने विश्रांती घेतली तरी देखील श्रावस्ती नगरात पोहोचल्यावर त्याला मुळीच थकवा जाणवत नव्हता._

                 _श्रावस्तीच्या जेतवन विहार येथे पोहोचल्यावर विहारवासियांनी सांगितले की भगवान भिक्षाटनासाठी शहरात गेले आहेत. थोडावेळ विहारात विश्रांती घ्या. तोपर्यंत भगवान परत येतील._

                 _परंतु प्रबळ धर्मसंवेग निर्माण झालेल्या परिव्राजकाला विसावा कसला ? तो लगेच राजधानी श्रावस्तीकडे निघाला. काही अंतर चालून गेल्यावर त्याला सम्यक् सम्बुद्ध भगवान राजमार्गावरून भिक्षापात्र हातात घेऊन जातांना दिसले. त्यांच्याकडे तो अनिमिष नेत्रांनी मंत्रमुग्ध होऊन पहातच राहिला. किती भव्य मंगल विधायक व्यक्तिमत्व! धीर गंभीर, सौम्य, शांत मुद्रा, कारुण्याने ओतप्रोत नेत्र, शरीराच्या अंगप्रत्यंगातून प्रस्फुटित होणारे संयमी शांत शीतल तेज, आणि शरीराच्या अणू-रेणूतून प्रवाहमान अनंत मैत्रीभावनेच्या लहरी. श्रद्धाविभोर होऊन त्या संन्याशाने त्यांच्या चरणकमलांवर आपले मस्तक ठेवले._

           _''भन्ते भगवान! मला धर्म द्या. सुगत! मला विशुद्ध धर्माची साधना शिकवा, ज्या साधनेमुळे माझे अनंतकालिन कल्याण होईल."_

           _'संन्यासी! धर्म शिकविण्यासाठी ही वेळ योग्य नाही. संन्यासी! तथागत आता भिक्षाटनासाठी निघाले आहेत. विहारात परतताच धर्म-साधना अवश्य शिकवतील, भगवान म्हणाले._

            _'भन्ते भगवान! जीवनाचा काय भरवसा ? मग ते जीवन माझे असो वा आपले. यावेळी आपल्यावरची माझी श्रद्धा सजीव आहे. भगवान कृपा करून आताच धर्म शिकवा. त्यामुळे अनंतकाळपर्यंत माझे जीवन - मांगल्य साधेल.'_

                    _संन्याशाने दोनदा, तीनदा कळकळीने आवाहन केल्यानंतर तिथेच रस्त्याच्या कडेला थोडावेळ थांबून भगवानांनी धर्मदेशना दिली. थोडक्यात धर्मसाधना शिकविली. अन् म्हणाले, 'अशाप्रकारे अभ्यास कर *'दिट्ठे दिट्ठमत्तं भविस्सति' पाहतांना फक्त पाहणेच असू दे. 'सुते सुतपन्तं भविस्सति' ऐकतांना फक्त ऐकणेच असावे. याचप्रमाणे वास घेतांना फक्त वासच, चव घेतांना फक्त चवच, स्पर्श म्हणजे फक्त स्पर्शच, समजून घेणे म्हणजे फक्त समजणेच असावे.'*_

           _त्या जाणकार संन्याशाने भगवानांच्या या सारयुक्त उपदेशाला खूपच खोलवर विस्तारपूर्वक जाणले._

                   _*डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा आणि मन या सहाही इंद्रियांच्या सहाय्याने ज्या क्षणाला ज्या द्वारावर ज्या विषयाचे ज्ञान म्हणजे रुप, शब्द गंध, रस, स्पर्शव्य पदार्थ अथवा विकल्पांचा संस्पर्श होईल, त्याक्षणी जे ज्ञान होईल फक्त त्याचीच जाणीव आणि फक्त जाणीवच असावी. ज्याक्षणी जे होत आहे. त्याक्षणी तीच अनुभूती घ्यावी, पहायचे ते पहाणेच व्हावे. ऐकायचे तर फक्त ऐकणेच व्हावे. वास घेणे म्हणजे फक्त वासाचीच अनुभूती, स्वाद घेतांना केवळ स्वादाची ओळख, स्पर्श करतांना स्पर्शाचीच अनुभूती, विचार करतांना फक्त विचार, केवळ ती अनुभूतीच घ्यावी, त्यावर कोणतीच प्रतिक्रिया करू नये.*_

                 _*सतत अभ्यासाद्वारे तुकडे तुकडे करून काळाच्या त्या लहानात लहान भागापर्यंत पोहोचावे, ज्याला चित्त-क्षण म्हणतात. या चित्त-क्षणात एकाच वेळी दोन घटना होत नाहीत. परंतु ही कालाची धारा अत्यंत जलद, शीघ्र गतीने वाहात असते. ज्यामुळे एकएक क्षणाला घडणारी घटना आपण वेगवेगळी करण्याची व ती समजून घेण्याची क्षमताच हरवून बसतो. वेगाने चालणाऱ्या चलत-चित्राच्या गतिमानतेप्रमाणे या जीवन प्रवाहाला गतिशील स्वरूप प्राप्त होते, आणि मग या चित्राची छोटी छोटी स्वतंत्र रूपे वेगवेगळी बघू शकत नाही. यामुळे दृष्टिभ्रम निर्माण होतो. मृगजळाचा विकास होतो. त्यामुळे मागचा-पुढचा संबंध जोडला जातो प्रपंच वाढू लागतो. राग, द्वेष आणि मोहमूढता यांचा प्रपंच.* हे सारं कसं घडतं? चला! तेही समजून घेऊ या._

               _*सहा इंद्रिये आहेत. ज्या इंद्रियद्वारावर या क्षणाला जी घटना घडते ती घटना फक्त समजूनच आपण थांबत नाही तर चटकन संज्ञेच्या सहाय्याने आपण ते ओळखतो. संज्ञा म्हणजे मनाचाच एक भाग जो पूर्वानुभवांच्या व आठवणीच्या आधाराने ओळख पटविण्याचे काम करतो. एकदा का संज्ञेने ओळखण्याचे काम केले, की झाला प्रपंचाचा आरंभ. त्या क्षणाचे अस्तित्वतच संपते आणि मन भूतकालात भ्रमण करायला लागते. अशीच अनुभूती पूर्वी आली होती का हिच्याशी मिळती जुळती ? आणि त्यावेळी अनूभूती चांगली वाटली होती की वाईट? असे मूल्यमापन सुरू होते. मूल्यमापन होताच प्रपंच पुढे वाढू लागतो व वेदना [ शरीरावर होणारी ही संवेदना ] सुखद तरी वाटते किंवा दुःखद तरी वाटते. आणि तेव्हा मनाचा तो भाग आपले कार्य सुरू करतो ज्याला संस्कार म्हणतात. त्याचे काम प्रतिक्रिया करण्याचे. या क्षणी पहाणे, ऐकणे, वास घेणे, चाखणे, स्पर्शणे आणि चिंतन करणे इ. चांगले वाटले तर राग [अनुराग], वाईट वाटले तर द्वेष अशी प्रतिक्रिया होत असते. मन भविष्य काळात उलटसुलट कोलांट्या घेऊ लागते. असे व्हावे, असे होऊ नये. अशाप्रकारे भूतकाळातील स्मृति आणि भविष्यकाळातील कल्पना, चित्तधारेवर राग [म्हणजे आसक्ती] व द्वेष यांचा भडीमार सुरू करतात. याक्षणी फक्त पहाण्याची सवय लागली आणि फक्त पहाण्याची क्रिया मर्यादित ठेवू लागला तर न आरंभ होतो, न वाढ होते. असा आरंभ न करणारा अनारंभीच प्रपंचमुक्त होत असतो.*_

                  _*साधक लक्षपूर्वक बघतो तर त्याला असे दिसते की, शरीराच्या या पांचही दरवाज्यांवर स्पर्शाच्या आघाताची अनुभूती जितक्या वेळा व जितका काळ होते त्याच्या तुलनेत मनावर होणारी अनुभूती किती तरी जास्त असते. पहाणे, ऐकणे, वास घेणे, स्वाद घेणे, स्पर्शणे यापेक्षा विचार करण्याचे काम कित्येक पटीने अधिक असते. एकादी घटना मनावर घडली तर तिचा भडीमार मनावर चालू राहतोच. परंतु या पांच शरीर इंद्रियांवर काही घडले तर त्याची प्रतिक्रिया मनावरच होत रहाते. हा सारा प्रपंच, विस्तार मनात होत रहातो. कारण असे की, आरंभ मनात होत असतो. जोपर्यंत आपण जिवंत असतो आणि तनमनाचे सहा खिडक्या दरवाजे विषय प्रवेशासाठी उघडे असतात तोपर्यंत प्रत्येक क्षणाला कोणत्या ना कोणत्या तरी खिडकीतून काहीना काही तरी प्रवेश होतच असतो. मग त्याला घेऊन हे वेडपट आरंभी मन राग-द्वेष यांचा आरंभ करीतच असते आणि प्रपंच वाढवीतच अशा अवस्थेत चित्ताची विशुद्धी कुठे आणि चित्तविमुक्ती कशी?*_

                   *_क्षणाक्षणांचे विभाजन करून, बारीक बारीक तुकडे करून त्यांना वेगवेगळे बघितले नाही तर प्रत्युत्पन्न म्हणजेच वर्तमान, भूतकाळ आणि भविष्यकाळ यांच्यात गुंतवत राहतो. त्यामुळे एक आणखी समस्या निर्माण होते. घटनांच्या या जुळवाजुळवीत एक सूत्र गुंफलेले आहे असा आभास निर्माण होतो. अहंभाव, अस्मिताभाव, आत्मभाव यांचे घनदाट सूत्र. यातूनच एक 'मी' चे अस्तित्व फुलते. हळूहळू ह्या 'मी' ची अनुभूती 'हा मी आहे' मध्ये परावर्तीत होते. 'हा मी आहे' ज्याने लहानपणापासून आजमितीपर्यंत अशा प्रकारचे अनुभव आणि 'हा मी आहे' जो भविष्यात अशा अशा अनुभूती येणार आहे. 'हा मी आहे' चा भ्रम या अस्तित्वहीन 'मी'च्या प्रति आसक्ति निर्माण करतो. ही आसक्ती राग आणि द्वेषाचा अग्नी प्रज्वलित करते. 'ही मी आहे' ची अविद्या आहे, ज्यामुळे राग द्वेषाला आणि रागद्वेषाच्या मोहमूढतेमुळे 'मी आहे' च्या भ्रांतीला परस्पर बलवान बनविते._*

               _*साधक आपल्या निरंतर अभ्यासाने प्रसंगाच्या चित्रफितीचे तुकडे तुकडे करून बघू लागतो तर 'मी आहे' चा आभास कोलमडून पडतो. आणि 'मी आहे'चे अस्तित्व केवळ लोकव्यवहारापुरते मर्यादित राहते. यात 'मी च्या वेगळ्या व्यक्तित्वाची भ्रांति दूर होते. एकेका क्षणाचे स्वतंत्र अस्तित्व आपोआप जाणवू लागते. संभ्रम नाहीसा होतो आणि वस्तुस्थिती स्पष्ट होऊ लागते. प्रज्ञा जागृत होते, अविद्येचे सारे क्लेश दूर होतात. राग व द्वेष यांचे नवे गुंते निर्माण होत नाहीत, आणि पूर्वीचे गुंते सुटायला लागतात.*_

                _*तेव्हा पाहण्यातही 'मी पहातो'चा भ्रम नाहीसा होतो. 'पहाणे केवळ पहाणे'च राहते. तसेच ऐकणे ह्या क्रियेत केवळ ऐकणे, वास घेणेत केवळ वास येणे, चाखण्यात केवळ चाखणे, स्पर्शणे केवळ स्पर्शणे राहते, तसेच जाणणे केवळ जाणणे राहून जाते. 'करतो आहे' किंवा 'भोगतो आहे' या ऐवजी 'होत आहे' हे सत्य अनुभवास येते. [म्हणजे पाहिले जात आहे, चाखले जात आहे. जाणले जात आहे. त्यात मी, माझे किंवा माझा ह्याला स्थान नाही. भोक्ताभाव आणि कर्ताभावाची माया विदीर्ण होते. अहंभाव जाऊन अहंकारविहिनता येते. आत्मभाव अनात्मभावात बदलतो.*_

                 *_अजूनपर्यंत साधक केवळ सिद्धांत म्हणूनच हे मानून चालत होता की, है शरीर, हा मनोव्यापार 'मी' नव्हे, 'माझे' नव्हे, 'माझा आत्मा' नव्हे. परंतु ती आता निव्वळ मानायची बाब नाही राहिली. आता तर साधक स्वानुभूतीच्या बळावर ह्या सत्याला स्वतः जाणतो आणि त्याला हे स्पष्ट होते की, त्या इंद्रियक्षेत्राच्या अनुभूतींमुळे कुणा 'मी'चे अस्तित्व नाही. ना ह्या ऐंद्रिय अनुभूती कुणा 'मी' ला धारण करीत आहेत. आणि ना कुणी 'मी' ह्या इंद्रियांना धारण करीत आहे._*

                 _हीच गोष्ट भगवानांनी संन्याशाला समजावून सांगितली की जेव्हा *'दिट्ठे दिट्ठमत्तं भविस्सति म्हणजे 'पहाणे हे केवळ मात्र पहाणे' इत्यादि होईल. तेव्हा ‘ततो त्वं न तेन' त्या सर्व बघणे ऐकणे वगैरे ह्यामुळे तू आहेस ही भ्रांति आणि तेव्हा 'ततो तं न तत्थ' म्हणजे ह्या बघणे, ऐकणे वगैरे मध्ये तू आहेस हा भ्रम दूर होईल. ही खोटी धारणा नाहीशी होईल. अशा 'अहंशून्य' अवस्थेला पोहोचताच लोकोत्तर निर्वाणाचा साक्षात्कार होईल. 'एसेवन्तो दुक्खस्स' हाच दुःखाचा अंत आहे.* मेधावी संन्याशी भगवानांनी दिलेल्या संक्षिप्त उपदेशाला विस्ताराने केवळ समजूनच थांबला नाही तर त्याचा त्याने तसा अभ्यास केला. ज्याला आपला मृत्यू समोर दिसतो आहे त्याला प्रमाद करण्यास वेळ कुठला ? त्याच ठिकाणी एका बाजूला बसून तो अंतर्मुखी झाला आणि अविरळ घनीभूत चित्तधारेचे तुकडे तुकडे करून प्रत्येक क्षण जसा आहे तसा स्वतंत्रपणे पाहू लागला. पहाता पहाता अस्मिताभाव गेला, पूर्वसंचित संस्कारांपासून विमुक्त झाला आणि चित्त अनासक्त होऊन आस्रवमुक्त झाले. *परमपद निर्वाणाचा साक्षात्कार झाला.* संन्याशी कृतकृत्य झाला. धन्य झाला. राहिलेले अल्पजीवन सफल-सार्थक झाले. *भगवान भिक्षाटन करून परत येईपर्यंत त्याची जीवनलीला समाप्त झाली होती. भिक्षूंनी भगवानांना विचारले, 'याची गति काय झाली?' तेव्हा भगवान म्हणाले, 'तो आता गति पलिकडे गेला, गतिमुक्त झाला. जीवनमुक्त झाला. परिनिर्वाणावस्थेला गेला.'* त्यावेळी भगवानांच्या तोंडून सहजोद्गार बाहेर पडले, ज्यात अनिर्वचनीय अशा निर्वाणिक अवस्थेसाठी नकारात्मक भाषेचाच प्रयोग केला आहे._

*_यत्थ आपो च पठवी, तेजो वायो न गाधति ।_*

*_न तत्थ सुक्का जोतन्ति, आदिच्चो नप्पकासति ॥_*

*_न तत्थ चंदिमा भाति, तमो तत्थ न विज्जति ।_* 

*_यदा च अत्तनावेदि, मुनि मोनेन ब्राह्मणो ।_*

*_अथ रूपा च अरूपा च सुखदुक्खा पमुच्चति ॥_*

               *_जेथे पृथ्वी नाही, पाणी नाही, अग्नी आणि वायु यांना प्रवेश नाही, जिथे न शुक्रांची चांदणी आहे न चंद्रसूर्याचा प्रकाश आहे तसेच आलोकाचा अभाव नाही म्हणजे अंधार विद्यमान नाही. कुणी ब्राह्मण मुनि मौन मार्गाने जाऊन याची स्वतःच अनुभूती घेतो तेव्हा सारे रूप, अरूप लोक ओलांडून पलिकडे जातो. सुख दुःखाच्या द्वंद्वातून मुक्त होतो._*

             *_इथे ‘अत्तनावेदि’ शब्द साधकांच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहे. कोणी साधक परम सत्याला स्वतः जाणून घेऊनच मुक्त होऊ शकतो._*

               _*सुप्पारकपत्तनमध्ये त्या संन्याशाला कोणत्या नावाने ओळखत हे माहित नाही. पण पाली वाङ्मयात तो 'बाहिय दारुचीरिय' या नावाने प्रसिद्ध आहे. कोणालाही त्याचे नाव विचारण्यास आणि त्याला आपले नाव सांगण्यास वेळच कुठे होता? बाहेरच्या प्रांतातून आला होता म्हणून कदाचित ‘बाहिय’ [बाहेरचा ] म्हटले असावे. अथवा हे देखील संभव आहे की बाहेरील एकाद्या संप्रदायाचा होता म्हणून 'बाहिय' म्हटले गेले असावे. 'दारू' म्हणजे 'झाडाची साल' अर्थात झाडाच्या सालाची वल्कले चीवर अंगावर होती. ज्याने पाहिले त्याने 'दारुचीरिय' म्हटले.*_

                 _*याप्रकारे ‘बाहिय दारुचीरिय' नाव अमर झाले. पण नावात काय आहे ? संप्रदाय, देश याला काय महत्व आहे? जो कोणी या आंतरिक सत्याचा स्वतः सूक्ष्मतेने अनुभव घेतो तो ‘अत्तनावेदि' म्हणवला जातो, तोच जीवनमुक्त होतो.*_

                _धन्य आहे ही धर्मगंगा! या धर्मगंगेच्या प्रवाहात डुबकी मारून कुणीही शुद्ध-बुद्ध, विमल-विमुक्त होतो. ही न विचारते जात, गोत्र, देश वेश, वर्ग, वर्ण, समुदाय, संप्रदाय ! इथे हा आपला, तो दुसऱ्याचा हा आतला, तो बाहेरचा; हा देशातला, तो परदेशातला; असा फरक नाही. या धर्मगंगेच्या प्रवाहात जो पडला तो पावला!_

              _*अशी कल्याणकारी सार्वजनीन धर्मगंगा सर्वांना मिळो! सर्वांचे भले होवो! सर्वांचे मंगल होवो! सर्वांनाच विशुद्ध विमुक्ती प्राप्त होवो!*_


*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_संदर्भ :- जागे पावन प्रेरणा_*

*_संकलन :- महेश कांबळे_*

*_दिनांक :- २८/१०/२०२२_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2022/10/blog-post_28.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

Thursday, 27 October 2022

लोक कल्याणाचा मार्ग

                 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_लोक कल्याणाचा मार्ग_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼


                  *_कुशीनगर येथेच भगवान तथागत सम्यक् सम्बुद्धांचे महापरिनिर्वाण झाले. हेच ते स्थान आहे, ज्या ठिकाणी महापुरुषाच्या बत्तीस लक्षणांनी परिपूर्ण असलेल्या महामानवाच्या मोहक शरिराचे दहन केले गेले. अग्निला अर्पण केले गेले._*

                     _जन्म, वृद्धत्व, व्याधी, मृत्यू. निसर्गाचा अटळ नियम. जन्म घेणारा कोणीही प्राणी वृद्धत्व, व्याधी आणि मरण यातून वाचू शकत नाही. मग तो सम्यक् सम्बुद्ध का असेना! *परंतु त्यांचे मरण सामान्य मरण नव्हते. त्या मृत्यूद्वाराच भगवान सम्यक सम्बुद्धांनी मृत्यूराज मारवर नितांत विजय संपादिला होता. कारण ते त्यांचे अखेरचेच मरण होते. त्यांनतर त्यांना मरणच नव्हते. कारण त्यानंतर त्यांना जन्मही नव्हता. निरुद्ध जिथे जन्म, तिथे वृद्धत्व, व्याधी व मृत्यू यांचाही निरोधच.*_

                  _अशा पावन भूमीवर साधना शिबीर चालवितांना मनात आनंद-प्रत्यानंदाचे रोमांच फुलतात. येथील भूमीवर धुळीच्या कणांतून, येथील वायूलहरींच्या तरंगातून, सद्धर्माच्या अस्तित्वाची क्षणाक्षणाला जाण होत असते. येथील अणुरेणूत त्या करुणेच्या महासागराची करुणा सामावून राहिली आहे. त्या प्रेमाचा अपार असीम प्रेमरस पाझरतांना आढळतो. त्या महान सत्यवादी पुरुषांची अचल सत्यनिष्ठा प्रकाशमान झालेली दिसते._

               _*करुणा, मैत्री आणि सत्य यांचा त्रिवेणी पावन संगम म्हणजेच तर तथागत बुद्ध होय. या तीन गुणांच्या समुच्चयाचे एकत्रित व्यक्तिमत्व म्हणजेच सम्यक् सम्बुद्ध, मूर्तिमंत करुणा म्हणजेच सम्यक् सम्बुद्ध! बुद्ध म्हणजे मूर्तिमंत मैत्री, प्रेम! बुद्ध म्हणजे मूर्तिमंत सत्य!* येथे भगवानांची ही त्रिमूर्ती वारंवार मनःपटलावर येत उभी राहते. त्यांच्या असीम करुणेची एक लहानशी लहर मन-मानसावर उमटली आणि सारं हृदय करुणरसाने तुडुंब भरून आले. ओथंबून वाहू लागले._

                        _अडीच हजार वर्षांपूर्वीचे प्राचीन असे हे दृश्य नजरेसमोर तरळू लागले. भगवान बुद्धांनी देह त्यागाचा दिवस तीन महिने अगोदर जाहीर केला आणि आता पूर्वनिर्धारित स्थानावर शरीर सोडण्यासाठी यात्रा सुरू झाली. शरीर सोडण्या दिवसही आता. भगवानांची यात्रा सुरूच होती. *वाटेत चुंद नावाच्या लोहाराने भगवानांना अत्यंत श्रद्धापूर्वक भोजनाचे निमंत्रण दिले.* पण भोजन गरिष्ठ होते. पचनास जड होते. तेव्हा स्वाभाविकच तथागतांच्या वृद्ध व्याधीयुक्त शरीराला ते पचले नाही. कष्टदायकच ठरले. *त्यांना अतिसार झाला.* शरीर दुर्बल झाले. *मृत्यूशय्येवर पडलेल्या त्यांच्या मनात एकच कारुण्याचा विचार जागला. जेव्हा श्रद्धाळू चुंदला हे कळेल की त्याच्या गरिष्ठ भोजनामुळे भगवानांचा अंत झाला तेव्हा तो दुःखीकष्टी होईल, व्यथित होईल, दुःखाने व्याकूळ होईल, अडाणी लोक त्याला नावे ठेवतील. म्हणतील भगवानांना कसले भोजन दिले, आणि किती पाप मिळविलं ? ही टीका, धिक्कार ऐकून, तो व्यथा वेदनांनी अधिकच पीडीत होईल. या चिंतनाने चिंताग्रस्त झालेल्या त्या महाकारुणिक भगवानांचे हृदय कारुण्याने भरून निघाले. ते आनंदाला म्हणाले, 'आनंदा! ध्यानात ठेव. त्या श्रद्धावान चुंद उपासकाला कोणत्याही प्रकारची चिंता व्हायला नको. माझ्यामुळे त्याला दुःख होता कामा नये. त्याला समजावून सांग की तुझे हे भोजनदान म्हणजे तुझ्यासाठी पाप नव्हे, तर फार मोठे पुण्यच सिद्ध झाले आहे. जे भोजन घेऊन तथागतांनी पापी 'मार'वर विजय मिळविला आणि सम्यक् सम्बोधी प्राप्त करून घेतली ती सुजाताची खीर, तिने दिलेले भोजनदान, जसे तिच्या असीम पुण्याला कारण ठरले, तद्वतच तुझ्या भोजनाचे ग्रहण करून तथागत अनुपादिशेष-निर्वाण धातूचे धनी ठरले आहेत, मृत्यूराज मारच्या पंजातून मुक्त झाले आहेत. म्हणून हे दिलेले भोजन सुजाताच्या खीरीच्या भोजनापेक्षा किंचितही कमी पुण्यदायी नाही वा कमी फलदायी नाही. आनंद! असं सांगून चुंदच्या मनाची उदासीनता दूर कर. त्याला उल्हसित कर."*_

                     _धन्य आहे तथागतांची ही करुणा! मृत्यूशय्येवर असतांनाही त्यांना फक्त चिंता आहे ती ही की आपल्यामुळे कुणी दुःखी होऊ नये. त्यांच्या हृदयांतील ही असीम करुणा कुणालाही दुःखी झालेलं पाहू शकत नव्हती._

                   _भगवान बुद्धांच्या अतुल मैत्रीभावनेचा प्रकाश स्त्रोत एकदम मानसाकाशांत प्रज्वलित झाला. भगवान बुद्ध युग्म शाल वृक्षाच्या घनदाट छायेत एका जाजमावर रुग्णावस्थेत पडले होते. वैशाखी पौर्णिमचा उदास चंद्रमा साऱ्या वातावरणावर उदासीनतेची छाया पसरवीत मावळतीला कलला होता. *भगवानांच्या परिनिर्वाणाची वेळ जवळ येत चालली होती. श्रद्धाळू उपासकांची गर्दी वाढतच होती. त्यावेळी सुभद्र नावाचा एक नवीन मुमुक्षु साधक भगवानांकडून धर्मदेशना प्राप्त करण्यासाठी आला होता.* परंतु, 'भगवान खूपच थकले भागलेले आहेत. त्यांना कष्ट देऊ नकोस' असे दुरुनच सांगून आनंद त्याला थोपवीत होता._

                       _आनंदाचा आवाज भगवानांच्या कानी पडतो. ते करुणाविव्हल होतात. तुषार्त आपली तृष्णा शमन करण्यासाठी धर्मगंगेजवळ आला आहे आणि काठावर पोहोचूनही कुणी तरी त्याला पाणी प्यायला मनाई करतो आहे. त्याची अगतिक अवस्था पाहून धर्मगंगाच उचंबळून वर आली. त्यात प्रेम आणि करुणेची भरती सुरू झाली. आनंदाला थांबवीत मैत्री-मूर्ती भगवान म्हणाले, “नको रे आनंदा! सुभद्रला अडवू नकोस. येऊ दे त्याला माझ्याजवळ, तो मला कष्ट नाही देणार. खरा धर्म जिज्ञासू आहे तो. थोड्यातच धर्म समजेल त्याला. धर्मरहस्य जाणण्याची त्याची योग्यता आहे. त्याला अडवू नकोस. येऊ दे त्याला माझ्याजवळ."_

                  _*आणि अशा प्रकारे आपल्या जीवनाच्या अंतीम क्षणापर्यंत, आपल्या जीवाची तमा न बाळगता, कष्टाची पर्वा न करता, मैत्री भावनेच्या त्या अथांग सागराने त्या धर्म जिज्ञासू सुभद्रला धर्म देशना दिली. खऱ्या धर्माचा मार्ग दाखविला ज्यामुळे त्याचे जीवन कल्याणमय झाले, सुखमय बनले. भगवानांच्या अंतःकरणात अपरिमित, अपार, मंगल मैत्रीचा सागर सदैव उसळत होता. अखेरच्या श्वासापर्यंत सर्व प्राण्यांची अविश्रांत सेवा करण्यासाठी ते उद्युक्त होते. मंगलधर्म सांगतांना थकवा कसला ? त्यापासून विमुख होऊन त्यांना आराम कसला? विश्रांती कुठली ?*_

                      _आणि तेव्हा असाच त्यांच्या सत्यनिष्ठेचा एक पावन प्रसंग मनांत उभा राहतो. अंतर्मनांत साद आली. शेवटचा निःश्वास सोडण्यापूर्वीच्या त्यांच्या अंतीम अमृतवाणीचे हे अमूल्य बोल, *'वय धम्मा सङ्खारा, अप्पमादेन सम्पादेथ।' हे भिक्षुनो ऐका ! सारे संस्कार व्ययधर्माचे, नष्ट होणारे, मरण पावणारे आहेत. जेवढ्या म्हणून संस्कृत म्हणजे बनलेल्या, निर्माण झालेल्या वस्तू आहेत, व्यक्ती आहेत, घटना आहेत, अवस्था आहेत त्या साऱ्या नश्वर आहत, भंगूर आहेत, मरणाधीन आहेत, परिवर्तनशील आहेत, अनित्य आहेत, हे प्रकृतीचे कठोर सत्य आहे. प्रमाद न करता, आळस न करता सतत सचेत, जागृत, सावध राहून प्रकृतीच्या नियमाच्या या कठोर सत्याचे संपादन करा. या सत्यात स्थिर राहून आपले कल्याण साधून रहा.*_      

                _कशी आहे ही मानव जातीला दिलेली अमूल्य देणगी, अमोल भेट! अनुपम अनमोल अखेरची भेट! हे मृत्यूपूर्व दान कसे आहे ! सहयोग्याचा वारसा ! हाच आहे मंगल प्राकृतिक धर्माचा अमूल्य उपहार!_

                    *_या महान सत्यनिष्ठ जीवनाने आयुष्यभर स्वतः सत्याचाच पाठपुरावा केला. लोकांनाही सत्यदर्शनासाठीच प्रेरीत केले, प्रोत्साहन दिले. हे सारं इंद्रिय जगत, ही नाम आणि रूप यांची संयुक्त जीवनधारा, ही शरीर आणि मनाची सहयोगी जीवनसरिता केवढी क्षणभंगुर आहे! किती नश्वर आहे ! किती परिवर्तनशील आहे! क्षणाक्षणाला बदलणारी ही प्रवाह संतती प्रत्येक क्षणी निरासक्त, ‘निर्विकार' तटस्थ भावनेने पाहात राहणे याचेच नाव विपश्यना आहे. हेच सत्याचे शुद्ध दर्शन आहे. यातच विमुक्तीचे मांगल्य सामावले आहे._*

                     _प्रमाद न करता आपणही या सत्याचे दर्शन घेत राहिले पाहिजे आणि आपल्या जीवनाचे अंतीम ध्येय संपादन केले पाहिजे. *शरीर, संवेदना, मन आणि धर्म यांच्या सत्याचा विपश्यना साधनेच्या सहाय्याने साक्षात्कार करीत राहिले पाहिजे. 'अनित्य, आणि अनात्माचा साक्षात्कार केला पाहिजे. प्रज्ञा जागृत ठेवली पाहिजे, विपश्यना साधनेची ही जागृती जीवनाचा अविभाज्य घटक बनली पाहिजे, स्वभावाचे अंग व्हायला पाहिजे. भगवान अंतीम अमृत बोल म्हणजे आपली निरंतर प्रेरणाच होय. याहून अधिक मोलाचे उद्बोधन कोणते होणार ?*

 *_वयधम्मासङ्खारा,अप्पमादेन सम्पादेथ ।_*

*_अप्पमादेनसम्पादेथ| अप्पमादेन सम्पादेथ ।_*

                  *_त्यांनी उपदेशिलेल्या मागनि जाऊन आपल्यात ही त्यांच्याप्रमाणे असीम करुणा जागी होवो. आपल्यालाही त्यांच्यासारखी अविचल सत्यनिष्ठा लाभो, यातच आपले मंगल, आपली भलाई, आपले कल्याण आपली मुक्ती सामावलेली आहे._*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_संदर्भ :- जागे पावन प्रेरणा_*

*_संकलन :- महेश कांबळे_*

*_दिनांक :- २७/१०/२०२२_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2022/10/blog-post_27.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

Wednesday, 26 October 2022

मित्रता सफल झाली

 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_पुक्कुसाति कथा_*

*_३. मित्रता सफल झाली_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

                   _*नगराबाहेर भार्गव कुंभाराचे एक लहानसे घर.* कुंभाराला मातीची भांडी तयार करण्यासाठी फार मोठ्या प्रमाणावर मातीची आवश्यकता असते. म्हणून गावाबाहेर जिथे अशी सोय असते तिथे त्याचा निवास असणे स्वाभाविक असते. *भार्गव हे कुंभाराचे नाव होते की त्याचे गोत्र होते माहित नाही. पण लोक त्याला त्या नावाने हाक मारीत. आज ज्या प्रमाणे कुंभाराला प्रजापती या नावाने हाक मारतात त्याप्रमाणे त्या काळी भार्गव नावाने हाक मारीत असावेत. कारण प्राचीन साहित्यात आपल्याला एकाहून अनेक भार्गव कुंभारांचा उल्लेख आढळतो.*_

                      _काय असेल ते असो हा भार्गव कुंभार अतिशय श्रद्धाळू आहे. साधू-संतांची सेवा करणे व सत्संगात राहणे त्याला आवडते. त्यांच्या सुखसोयीसाठी त्याने घरानजिक एक विश्रामधाम बांधले आहे. कुंभारशाला या नावे ते प्रसिद्ध आहे. या ठिकाणी यात्रेकरू, साधू-संन्यासी एक दोन दिवस रहातात. कधी भगवान बुद्ध तर कधी सारिपुत्र इत्यादी त्यांचे शिष्य रात्रीच्या निवासासाठी या कुंभाराच्या विश्रामशाळेत थांबले आहेत. आजदेखील भगवान बुद्ध सूर्यास्तानंतर या कुंभाराकडे आले आहेत आणि त्याला विचारत आहेत, “भार्गव कुंभार, मी तुझ्या विश्रामशाळेत आजची रात्र राहू का ? तुला त्रास नाही ना होणार ?"_

                  _'नाही, भन्ते भगवान! ही तर माझ्या असीम पुण्यलाभाचीच गोष्ट आहे. कुंभार शाळेचे दालन फार मोठे आहे. त्यात एकाचवेळी अनेक लोक आराम करू शकतात. परंतु आत्ताच काही वेळापूर्वी मी एका श्रमणाला तेथे राहण्याची अनुमती दिली आहे. त्याला विचारावे, त्याची हरकत नसेल तर भगवानांनी सुखाने राहावे!"_

                    _भगवान कुंभारशाळेत गेले. पाहिले तो फाटकी भगवी वस्त्रे परिधान करून एक श्रमण बसला आहे. गौर वर्ण, उन्नत भाल प्रदेश, विशाल नेत्र, लांब सरळ नाक, डोक्याचे, दाढी मिशांचे कापलेले केस दोन दोन बोटे वाढलेले. योयाप्रमाणे भरदार रुंद छाती. बळकट सुगठीत हातपाय. सारे भव्य-दिव्य व्यक्तिमत्व आहे. भगवान त्याच्याकडे पाहून हसतात व विचारतात, "भिक्षु, या दालनात मी तुमच्या समवेत एक रात्र घालवू का? तुम्हाला त्रास नाही ना होणार ?"_

                   _"नाही, आयुष्मान, जरा देखील नाही. कुंभारशालेचे हे दालन फार मोठे आहे. मोठ्या आनंदाने इथे रात्र घालवा. मला फक्त मांडी घालून बसण्यापुरती जागा हवी आहे. तुम्ही खुशाल रहा. "_

                   _तृणासन [चटई] पसरून भगवान एका बाजूला बसले आणि ध्यानमग्न झाले. पूर्वी आलेला भिक्षुही ध्यानसाधनेस बसला आणि लौकरच चवथ्या ध्यान समापत्तीमध्ये समाधिस्थ झाला._

                   _हळू हळू रात्र संपत गेली. रात्रीचा पहिला प्रहर संपला, दुसरा प्रहर संपला, आता तिसरा सुरू झाला. पौर्णिमा होती. सारी रात्र आकाशात चांदणे पसरले होते. पृथ्वीच्या प्रांगणात चांदण्याची बरसात होत होती. उघड्या खिडकीतून चांदणे दालनातही पसरत होते. *भगवान बुद्ध व भिक्षु दोघांनाही चंद्र किरणांचा स्पर्श होत होता. भगवान तर स्वतः बोधिरश्मीने प्रभास्वर होतेच, भिक्षुचा चेहेरा देखील ध्यानसमापत्तीच्या प्रभेने उज्ज्वल दिसत होता.* चंद्राचे पांढरेशुभ्र चांदणे त्या दोघांच्या चेहेऱ्यांना अधिक उजाळा देत होते. भिक्षु बराच वेळ निश्चल अधिष्ठानात बसून राहिला. तिसऱ्या प्रहरात त्याने डोळे उघडले. भगवानांनी त्याच्याकडे पाहिले आणि स्मित केले. त्यांनी विचारले, “भिक्षु, तू कोणाच्या आश्रयाने गृहत्यागी झाला आहेस ? तुझा शास्ता आचार्य कोण आहे? कोणाकडून उपदेशित धर्मात तुला रुची आहे?" भिक्षूने उत्तर दिले, ' आयुष्मान, या लोकी सम्यक् सम्बुद्ध उत्पन्न झाले आहेत, ज्यांची किर्ती सर्वत्र पसरली आहे, मी त्या शाक्यमुनी भगवान गौतम बुद्धांच्या आश्रयाने घर सोडून बेघर झालो आहे. तेच माझा शास्ता आहेत. त्यांनी उपदेशिलेल्या धर्मात मला रुची आहे. "_

                   _पुन्हा स्मित हास्य करीत त्यांनी विचारले, “भिक्षु, तू या आपल्या शास्त्याला कधी पाहिलं आहेस का ? आणि त्याला पाहिलंस तर ओळखशील का ?"_

_"नाही आयुष्मान मी ओळखू शकणार नाही. मी त्यांना कधी पाहिले नाही."_

                   _"यावेळी तुझा शास्ता कुठे आहे ?" "इथे आल्यावर कळले की, ते श्रावस्तीच्या जेतवनात विहार करीत आहेत. रस्त्यात मी जेतवनाच्या समोरून आलो पण तेव्हा मी समजत होतो की, त्यांना मगधदेशात संबोधि प्राप्त झाली म्हणून ते मगधातच विहार करीत आहेत. आता पुन्हा त्यांना भेटण्यासाठी पंचेचाळीस योजने श्रावस्तीकडे जावे लागेल."_

                       _*भगवान पुन्हा हसले. त्यांनी आपल्या बोधिचित्ताने पाहिले की भिक्षूचे जीवन फारच थोडे शिल्लक उरले आहे. सूर्योदयानंतर काही वेळानेच ह्याला मृत्यू आहे. माझ्यासाठीच हा प्रव्रजित झाला आहे. अतिशय योग्य पात्र आहे. अनेक जन्मांच्या पूर्वपुण्याईचा धनी आहे. विपश्यना शिकविली तर आत्ताच विमुक्तीच्या उच्च अवस्थेला जाईल. म्हणून त्यांनी मोठ्या करुणचित्ताने सांगितले, "हे भिक्षु! एकाग्रचित्ताने ऐक! मी तुला धर्मदेशना देत आहे."*_

_भगवानांच्या वाणीत असे काही आकर्षण होते की तो नाही म्हणू शकला नाही._

_तो म्हणाला, "फार छान, आयुष्मान्!" आणि एकाग्र चित्ताने तो त्यांची कल्याणकारी वाणी ऐकू लागला._

_*पूर्वजन्मीच्या अभ्यासामुळे सुवर्ण पत्रावर आनापान साधनेचे वर्णन वाचूनच तो स्वतः चौथ्या ध्यान समापत्तिच्या अवस्थेपर्यंत पोहोचला होता. भगवानांनी आता त्याला धातूंचा विभंग समजावून विपश्यनेच्या गहराईत उतरविले.*_

                   *_पृथ्वी, अग्नी, जल, वायु, आकाश ही पांच भौतिक तत्वे आहेत आणि विज्ञान हे एक मानसिक तत्व आहे. या सहांचा समुच्चय म्हणजे मनुष्य होय. या सहा मूलतत्वांचे विभाजन करून त्यांच्या स्वभावधर्माला अनुभूतीच्या पातळीवर समजून घेणे म्हणजे 'धातु-विभंग' आहे. या सहा तत्वांखेरीज डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा आणि विज्ञान [मानस] या सहा इंद्रियांद्वारे आपापल्या विषयांच्या संस्पशनि उत्पन्न होणाऱ्या सुख-दुःखद किंवा असुखद-अदुःखद संवेदनांच्या अठरा प्रकारच्या अनुभूतीत विचरण करणाऱ्या स्वभावाचे विभाजन करून पाहणे; यांना मी, माझे किंवा माझा आत्मा न मानता मिथ्या 'अहं'च्या भ्रांतीजनक मरिचिकेतून, अहंच्या मृगजळातून आणि मिथ्यामान्यतेच्या गुलामीतून मुक्त होणे हीच 'विपश्यनेची' विभंग साधना आहे. या साधनेच्या सहाय्याने निरंतर अनित्य बोधाच्या संप्रज्ञानामध्ये अधिष्ठित रहाणे म्हणजे स्थितप्रज्ञ होणे. इंद्रिय जगतातील अनित्य व इंद्रियातीत नित्य स्वभावाच्या सत्याचे स्वानुभवाने ज्ञान करून सतत सत्यात अधिष्ठित राहणे, खोट्या अहंभावामुळे उत्पन्न होणाऱ्या राग, द्वेष, आणि मोह यासारख्या विकारांच्या त्यागात सतत स्थिर राहणे आणि विकारमुक्तिद्वारा प्राप्त चित्ताच्या शांतीमध्ये अधिष्ठित राहणे हेच धातु विभंग उपदेशाचे चार प्रमुख उद्देश्य आहेत._*

                    *_भगवानांनी जसजसे ह्या उपदेशातील बारकावे समजावून दिले तसतसा पुक्कुसाति लोकीय ध्यानास संप्रज्ञानाशी संलग्न करून लोकोत्तर ध्यानात बदलत गेला. आता त्याची समाधी केवळ ध्यान समापत्तिपर्यंतच सीमित राहिली नाही. संप्रज्ञानाच्या विपश्यनासाधनेद्वारे अधोगतीकडे जाणाऱ्या संपूर्ण संस्कारांचा क्षय करून घेऊन त्याने पाहिले स्रोतापत्तिचे निर्वाणफल अनुभवले आणि त्यानंतर सकदागामीची फलसमापत्ति अनुभवली._*

                      _*भगवान समजावून देत होते आणि त्या समवेतच मैत्रीधातु, धर्मधातु आणि निर्वाणधातु यांनी वातावरण तरंगित करीत होते. श्रद्धाशील पुक्कुसाति केवळ उपदेश ऐकतच नव्हता तर आतल्या आत विपश्यना प्रज्ञेच्या सहाय्याने सघन सत्याचे विच्छेदन करीत उरल्या सुरल्या कर्म संस्कारांचे निःसारण-उच्छेदन करीत जात होता.*_

                    _रजनीकांत निशाकर आपली रुपेरी किरणे एकत्र करून पश्चिम क्षितिजीवर अस्ताला जात होता. भुवन भास्कर आपली स्वर्ण-किरणे विकिर्ण करीत पूर्व क्षितिजावर उदयास येत होता. याचवेळी *पुक्कुसाति भगवानांच्या महाकारुणिक धर्मतरंगलहरींच्या सहाय्याने विपश्यनेच्या सूक्ष्मतम सखोलतेकडे वेगाने जात होता. एकाएकी त्याला चौथ्या ध्यानसमाधीबरोबरच पहिल्या निरोध समापत्तिची निर्वाणिक अनुभूती आली. तो अनागामी फललाभी झाला!* या निरोध समापत्तीतून तो कृतज्ञता विभोर होऊन उठला. असली मुक्तीदायिनी विपश्यना भगवान बुद्धांव्यतिरिक्त आणखी कोणी शिकवू शकणार नाही. अवश्य हे भगवान बुद्धच आहेत हे विचार मनात येताच त्याच्या तोंडून भावपूर्ण आनंदोद्गार बाहेर पडले._

                  _"ओ हो! मला माझ्या शास्त्याची प्राप्ती झाली. सुगत मिळाले. सम्यक सम्बुद्ध मिळाले," असे म्हणत पुक्कुसातिने आपले डोके भगवानांच्या पायी ठेवले. नंतर *उजवे उत्तरासंग म्हणजे अंगावरील वस्त्र डाव्या खांद्यावर घेतले. [हा त्या काळातील सन्मानदर्शक रिवाज होता]* व हात जोडून म्हणाला,_

                     _'भगवान भन्ते! न कळत माझ्याकडून फार मोठा अपराध झाला. मी माझ्या अज्ञानावस्थेत मूढावस्थेत आपल्याला ओळखू शकलो नाही. म्हणून आपल्याला आयुष्मान संबोधन वापरले आणि अत्यंत अकुशल काम केले. *[पद वा वयाने लहान असलेल्या व्यक्तीसाठी त्या काळी आयुष्मान शब्दाचा उपयोग करीत.]* भगवान! मला माझ्या या अपराधाची क्षमा करा. भविष्यकाळात माझ्याकडून अशी चूक होणार नाही. "_

                     _*'भिक्षु ! नकळत झालेली आपली चूक तू स्वीकारली आहेस. तिचा योग्य प्रतिकार केला आहेस. आर्य, धर्म-विनयात हे प्रगतीचे लक्षण आहे जेव्हा कोणी आपली चूक कबूल करतो, त्याचा प्रतिकार करतो आणि भविष्यकाळात ती न करण्याचा संकल्प करतो. "*_

_“भगवान! मला आपल्याकडून उपसंपदा मिळावी. "_

_'भिक्षु, तुझ्याजवळ परिपूर्ण पात्र - चीवर आहे ?"_

_"नाही भन्ते, परिपूर्ण नाहीये."_

*_“भिक्षु ! अपूर्ण पात्र - चीवर असणाऱ्याला तथागत उपसंपदा देत नाहीत."_*

                        _तेव्हा आयुष्मान पुक्कुसातिने भगवानांच्या वचनाचे अभिनंदन केले. आपल्या आसनावरून उठून अभिवादन केले, प्रदक्षिणा घालून पात्र व चीवर यांच्या शोधासाठी नगराकडे निघाला._

                _सूर्योदय होताच नगराचा दरवाजा उघडला. नगरातील काही नागरिक आणि भिक्षु बाहेर आले तो भार्गव कुंभाराच्या अतिथीशाळेत अकस्मात भगवान बुद्ध बसलेले पाहिले. त्यांनी भगवानांना सादर अभिवादन केले. काही लोक धावत पळतच बिम्बिसाराकडे गेले. तो देखील तात्काळ भगवानांच्या सेवेसाठी आला. भगवानांना पंचांग प्रणाम करून भार्गव कुंभाराच्या अतिथीशाळेत बसला._

                _एवढ्यात बातमी आली की पात्रचीवराच्या शोधार्थ बाहेर पडलेला एक भिक्षु अपघातात मरण पावला आहे._

                      _*भगवान म्हणाले की ती व्यक्ती गंधारनरेश पुक्कसाति होती. आपल्या मित्राचा धर्मसंदेश मिळाल्यामुळे राज्य सोडून प्रव्रजित होण्यासाठी तो मगध प्रगत देशात आला होता. पुक्कुसाति समजूतदार होता. तो महान सत्यशोधक होता. जसजसा शुद्ध धर्म ऐकत गेला तसतसा स्थूल सत्याकडून सूक्ष्म सत्याकडे होत गेला. मुक्तीच्या मार्गाकडे वेगाने निघाला. धर्म समजून घेण्यात व धारण करण्यात कोणताच हेका धरला नाही, आडमुठेपणा दाखवला नाही. आजच्या रात्रीच त्याने विपश्यना साधनेच्या मदतीने अनागामी फल प्राप्त केले. त्यामुळे त्याची सारी अवरभागीय बंधने तुटून पडली. आता तो ओपपातिक ब्रह्मलोकात जन्मला आहे. तिथे साधना करीत अरहंत फळप्राप्ति करील. तिथे शरीर त्याग केल्यावर परिनिर्वाणलाभी होऊन सर्व लोकांच्या, भवचक्राच्या भ्रमणातून सर्वथा विमुक्त होईल.*_

                  _बिम्बिसार आपल्या न पाहिलेल्या मित्राच्या मृत्यूच्या वृत्ताने दुःखी तर झाला पण त्या दुःखाचे आनंदात परिवर्तन झाले. जेव्हा त्याने ऐकले की त्याचा मित्र अनागामी फल प्राप्त करून घेऊन मरण पावला. तेव्हा लौकरच त्याला वाटले की त्याचा धर्म संदेश अतिशय योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचला आणि तो भगवानांच्या व विपश्यना साधनेच्या संपर्कात आल्यामुळे यथोचित लाभाचा धनी झाला.._

                 _बिम्बिसारने भगवानांचे बोलणे ऐकून प्रसन्नता व्यक्त केली आणि तीनदा "साधु, साधु, साधु" म्हणून त्यांच्या चरणी वंदन केले._

                   _खरेच त्याची धर्ममैत्री सफल झाली, सार्थक झाली. त्याच्या मित्राचे मंगल-कल्याण झाले. असेच मंगल-कल्याण सर्वाचे होवो._

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_संदर्भ :- जागे पावन प्रेरणा_*

*_संकलन :- महेश कांबळे_*

*_दिनांक :- २६/१०/२०२२_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2022/10/blog-post_26.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

Tuesday, 25 October 2022

चालला त्यागुन राज्यसुख

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_पुक्कुसाति कथा_*

*_२. चालला त्यागुन राज्यसुख_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

                    _बिम्बिसारने हे पत्र एका रत्नजडित सोन्याच्या पेटीत ठेवून एकात एक अशा दहा बहुमूल्य पेट्यात बंद केले. वर लाखेची सीलबंद मोहर लावली. नंतर ते मूल्यवान वस्त्रांनी सजविले. एका मंगल हत्तीच्या अंबारीत ठेवून राजकीय पांढऱ्या शुभ्र छत्राने आच्छादित करून एका श्वेत ध्वजाने युक्त सैनिक तुकडीसह वाजतगाजत तक्षशिला नगरीस रवाना केले._

                    _रस्त्यावर वाळू पसरून टाकली. दोन्ही बाजूला गुढ्या तोरणे उभारली, स्वच्छ पाण्याचे कलश ठेवले आणि आपल्या नगर सीमेपर्यंत स्वतः त्यासमवेत पायी चालत गेला व यापुढे यात्रा नेणाऱ्यांना ही भेट तक्षशिलेपर्यंत अत्यंत सन्मानपूर्वक घेऊन जा व तेथे पोहोचल्यावर माझ्या वतीने माझ्या मित्राला हा संदेश द्यावा की अत्यंत एकांत स्थानी आदरपूर्वक हा संदेश उघडून वाचावा._

                      _*पुक्कुसातिने आपली भेट सार्वजनिकरित्या लोकांसमोर उघडून पाहण्याचा संदेश दिला होता कारण दोन्ही राजांच्या मित्रत्वाचा ठसा सर्वांच्यावर पडावा. बिम्बिसार आपली भेट एकांतात एकट्यानेच उघडून वाचण्याचा संदेश पाठवितो. बिम्बिसारला माहित होते की, पुक्कुसातिजवळ पूर्वसंचित पुण्याई असेल तर त्यामुळे तो हा धर्मसंदेश वाचून राज्यत्यागाचा विचार करील. अशा परिस्थितीत त्याचे कुटुंबीय, राजमंत्री, नगरातील सन्माननीय उपस्थित लोक त्याच्या उत्साहावर पाणी ओततील. म्हणून त्याच्यासाठी एकांतवासच कल्याणप्रद होईल.*_

                       _हजारो मैलाची प्रदीर्घ यात्रा पूर्ण करून हा शाही काफिला जेव्हा गंधार देशाच्या सीमेवर पोहोचला तेव्हा पुक्कुसातिने आपले मंत्रीगण पाठवून या राजकीय भेटीचे यथायोग्य स्वागत केले आणि तक्षशिलेपर्यंतची यात्रा मोठ्या उत्साहाने वाजत गाजत सन्मानाने केली. तक्षशिला राजधानीच्या सीमेवर स्वागतासाठी स्वतः पुक्कुसाति पोहोचला आणि राजमहालापर्यंत पायी चालून यात्रेत सामील झाला._

                     _मित्र बिम्बिसारच्या सूचनेनुसार त्याने हा अमूल्य पेटारा राजमहालाच्या एकांत कक्षात पोहोचविला. दरवाज्यावर एक रक्षक बसविला व एकांतात स्वतः आपल्या हातांनी उपहाराची पेटी उघडली. लाखेची राज्याची मोहर तोडली व पेटीतून पेटी काढत शेवटी रत्न जडित सोन्याची पेटी काढली व ती उघडल्यावर गोल गुंडाळलेले लांबच लांब सुवर्णपत्र अत्यंत आदराने बाहेर काढले._

                     _माझ्या मित्राने माझ्यासाठी धर्माची ही अमूल्य भेट पाठविली आहे. जी मध्यदेशसारख्या पवित्र भूमीमध्ये उपजली आहे. इथे मिळणे असंभवनीय आहे. म्हणून मोठ्या श्रद्धायुक्त अंतःकरणाने ते सुवर्णपत्र उघडून वाचण्यास सुरुवात केली. पाहू तर खरं! माझ्या मित्राचा धर्मसंदेश काय आहे?_

_पहिलीच ओळ होती,_

*_'इध तथागतो लोके उप्पन्नो।'_*

*_इथे या लोकात तथागत उत्पन्न झाले आहेत._*

                   _काय खरंच तथागत बुद्ध उत्पन्न झाले आहेत! मी खरंच का बुद्धकाळात जन्मलो आहे! केवळ या चिंतनानेच त्याच्या मनात प्रसन्नतेचा एक प्रबळ प्रवाह वाहू लागला आणि जेव्हा पुढे,_

_*“इतिपि सो भगवा - आदि” -*_

                 _या शब्दांमध्ये भगवानांच्या गुणांचे वाचन सुरू केले तर ते वाचता वाचता शरीराची अकरा हजार रोमरंध्रे पुलकित झाली. सारे शरीर रोमांचित झाले. सारे मन आनंदले. काही काळ तो अशा प्रसन्न विभोर अवस्थेत धुंद फुंद झाला. उभा आहे की बसलो आहे याचेही त्याला भान राहिले नाही. पुढील ओळी तो वाचूही शकला नाही. अशा भाव विभोर अवस्थेत बराच वेळ गेल्यावर जेव्हा भावावेश कमी झाला तेव्हा त्याने पुढे वाचण्यास सुरुवात केली._

_पुढे शुद्ध धर्म गुणांची व्याख्या होती._

*_“स्वाक्खातो भगवता धम्मो - आदि"_*

                _वाचता वाचता पुन्हा सारे तनमन पहिल्या प्रमाणेच फुलून शहारून गेले. पुन्हा तीव्र भावावेश जागृत झाला. पुन्हा काही काळ त्याची शुद्ध हरपली. काही वेळानंतर त्याचे मन शांत झाले तेव्हा पुढील संघाच्या गुणांच्या पंक्ती वाचल्या._

_*“सुप्पटिपन्नो भगवतो सावकसंघो...आदि!”*_

                   _हे वाचल्यावर पुन्हा तशीच अवस्था झाली. त्यानंतर पत्राचा चौथा भाग वाचू लागला. *त्यांत आनापान साधनेचे विवेचन होते.* ते वाचता वाचता शरीरात आणि मनात आनंदाची अशी धाराप्रवाह अनुभूती येऊ लागली की सहजच मनाची एकाग्रता साधली. अनेक जन्माचे पूर्वपुण्याईचे संचितामुळे समाधि अवस्था साधली. चित्ताने तात्काळ प्रथम ध्यानसमाधि अवस्था साधली, थोड्याच अवधीत पहिल्या अवस्थेतून दुसरी, दुसऱ्यातून तिसरी, तिसऱ्यातून चौथी अशी गहनतापूर्वक अवस्था त्याला प्राप्त झाली. बाह्य आलंबनांचे जरा देखील भान राहिले नाही. ही अवस्था बराच वेळ राहिली. *जरी विपश्यनेची उच्चावस्था प्राप्त झाली नाही तरी चौथ्या ध्यान-समापत्तीचा धर्मरसच एवढा अपूर्व होता की वारंवार तो त्याच अवस्थेचा अभ्यास करीत राहिला आणि त्या रसास्वादनात दोन आठवडे सहज गेले.*_

                 _दालनाच्या दारावर रखवालदार बसला होता. केवळ व्यक्तिगत सहाय्यकाखेरीज इतरांना प्रवेश बंद होता. पंधरा दिवसांपर्यंत देशाचा राजा राज महालाच्या राणीवंशात नव्हता की राजदरबारात नव्हता, न्यायालयात नव्हता की सेनालयात नव्हता. राज्यातील प्रमुख लोकांना चिंता वाटू लागली की राजाला अशी कोणती भेट मिळाली आहे की तो त्यातच रंगून राहिला आहे ?_

                  *_चौथ्या समाधि ध्यानानंतर शांत रसाच्या स्वानुभूतीने प्रभावित झालेल्या राजा पुक्कसातिला आपल्या मित्राचे अंतीम बोल आठवले. खरंच मला राज्य त्याग करून त्वरित अभिनिष्क्रमण केले पाहिजे. माझे सद्भाग्य आहे की याकाळात बुद्ध निर्माण झाले आहेत. त्यांच्या सान्निध्यात राहून संसार चक्राच्या सर्व दुःखातून मुक्त करणारी विपश्यना साधना शिकून मानवी जीवन सार्थक केले पाहिजे. कुणाला ठाऊक जीवन थोडेच शिल्लक असेल. हे माझ्या मित्राचे महान उपकार आहेत ज्याने मला ही कल्याणकारी सूचना पाठविली._*

                  _यासाठी जीवनमुक्त अरहंत होण्याच्या उद्देशाने भगवान बुद्धांनी सांगितलेल्या मार्गाने जाण्यासाठी त्याने राजसिंहासन, घरदार त्याग करण्याचा दृढ निश्चिय केला. आपल्या हातातील कृपाणाने डोक्याचे व दाढी मिशीचे केस काढले आणि सहाय्यक सेवकाकडून दोन भगवी वस्त्रे मागविली. एक अधोवस्त्र व दुसरे उर्ध्ववस्त्र बनवून अंगावर घेतले. एक मातीचे भिक्षा पात्र व लाकडाचा दंड मागविला. हातात घेऊन महालातून खाली उतरला._

                 _राजपरिवारातील लोक राजाला या वेषात ओळखू शकले नाहीत. त्यांना वाटले कोणी संन्याशी राजाला भेटायला आला असावा तोच आता परतला असेल. राजदरबारांतील राजपुरुषही त्याला ओळखू शकले नाहीत. पण जेव्हा स्वीय सहाय्यकानेच साऱ्या परिस्थितीचा वृत्तांत कथन केला तेव्हा राणी महालात आणि राजदरबारात एकच हाहा:कार उडाला. वणव्याप्रमाणे हे वृत्त साऱ्या नगरात पसरले. पुक्कुसातिसारख्या प्रजावत्सल राजाने राज्यत्याग केला. या वृत्ताने सारी प्रजा दुःखसागरात बुडाली. प्रजेवर प्रचंड वज्राघात झाला.. शोकमग्न, आकांत करणारे नगरवासी, राज्याचे शासनाधिकारी, राज कुटुंबातील माणसे, भिक्षुवेषधारी पुक्कुसातिच्या मागे लागली. क्रंदन करीत म्हणाले, 'महाराज! आपल्यावाचून आम्ही अनाथ होऊं."_

                    _पुक्कुसाति सांत्वनपर शद्बात म्हणाला, 'इथे अनेक योग्य व्यक्ती आहेत. त्या माझ्या अनुपस्थितीत राज्याचे प्रशासन योग्य प्रकारे सांभाळतील. अत्यंत कुशलतेने सर्वांचा सांभाळ करतील. '_

                     _मंत्र्यांनी त्याला समजाविण्याचा प्रयत्न केला, “महाराज, मध्यदेशचे राजे मायावी असतात. कपटी असतात. कुटील असतात. त्यांची कूटनीती - राजनैतिक चालबाजी छल-कपटांने भरलेली असते. कुणाला ठाऊक! या लोकी सम्यक सम्बुद्ध निर्माण झाले की नाही ? ही सारी फसवणूक-प्रवचनाहि असु शकेल. आपल्याला राज्यत्याग करायला लावून गंधार देश दुर्बल करण्याचा हा त्याचा उद्देश असावा. वेळ येताच हा देश गिळंकृत करण्याचा डाव असावा._

                   _“नाही, मंत्रीगण हो! माझ्या परममित्राविषयी अशा शंका व्यक्त करू नका. मगधाचे राज्य गंधार देशाहून खूपच दूर आहे. *मगध आणि गंधार देशांमध्ये कौशल, चेदिय, पांचाल, कुरु या सारखी सामर्थ्यसंपन्न गणराज्ये आहेत.* त्यांच्यावर अतिक्रमण केल्यानंतर गंधार देशावर सत्ता प्रस्थापित करता येईल. एरव्ही ते अशक्य आहे. हा न पाहिलेला मित्र माझा परमहितैषी आहे. भगवान मगध देशात विहार करीत आहेत हे त्याला माहित आहे. म्हणून तो स्वतः गृहस्थी जीवन जगूनही त्यांच्या सहवासाचा प्रदीर्घ लाभ घेऊ शकतो.._

                   _परंतु भगवान मध्यदेश सोडून इतक्या दूरवर विहार करण्यासाठी येणार नाहीत त्यामुळे मी त्यांच्या सान्निध्यापासून वंचित राहीन. म्हणून त्याने मला गृहत्याग करून त्यांच्या सहवासात राहण्यासाठी प्रोत्साहित केले आहे. मंत्रीगण हो ! माझ्या मित्राविषयी मिथ्या संशय व्यक्त करून दोषाचे धनी होऊ नका. तो माझे कल्याण इच्छिणारा सन्मित्रच आहे._

*_“बुद्धप्पादो दुल्लभो लोकस्मि"_*

                  *_राजमंत्रीहो! लोकात मूळात 'बुद्ध' निर्माण होणेच कठीण आहे. मी व माझ्यासारख्या अनेकांच्या सुदैवाने ही दुर्लभ घटना सुलभ झाली आहे. मला त्याला शरण जाऊ दे. अनेक जन्म मी मुक्तीच्या शोधात उगाचच व्यर्थ भटकलो आहे. आता मुक्ती प्राप्त करण्याची सुसंधी आली आहे. म्हणून मला या लाभापासून वंचित करण्याचा प्रयत्न करू नका."_*

                    _अशा रीतीने पुष्कळ प्रकारांनी समजावले तरी लोकांनी मानले नाही. रडत आक्रंदन करीत त्याच्यामागे जातच राहिले. तेव्हा पुक्कुसातिने निर्धारपूर्वक पावले उचलली. त्याने आपल्या हातातील दण्डाने एक रेषा काढली व म्हणाला, "मी गृहजीवनाचा त्याग केला आहे. परंतु अजूनदेखील तुम्ही मला राजा मानीत असाल तर ऐका. ही राजाची आज्ञा आहे. कोणीही या सीमारेषेचे उल्लंघन करू नये."_

                 _राजा पुक्कुसातिची दृढ निश्चयपूर्वक केलेली राजाज्ञा ऐकून हताश झालेले लोक आक्रोश करीत राजाज्ञेला नमस्कार करून नगरात परतले. गृहत्यागी भिक्षु पुक्कुसाति गंधारहून मगधाकडे जाणाऱ्या राजमार्गावरून पायी प्रवास करू लागला._

                    _तक्षशिलेहून राजगिरीचा रस्ता फार लांबचा होता. पण भूतपूर्व गंधार नरेश एक सामान्य भिक्षु बनून, दृढनिश्चयाने खंबीरपणे पावले टाकीत चालला होता. "भगवान बुद्ध आपल्या हातांनी आपले केस कापून भगवी वस्त्रे धारण करून निघाले होते. तेव्हा एकटेच सत्याचा शोध घेण्यासाठी चारिकेला निघाले होते. मीदेखील एकट्यानेच पदयात्रा करीन. त्यांनी पायात पायताणही घातले नव्हते. मी देखील अनवाणीच यात्रा करीन. त्यांनी कोणतेच वाहन वापरले नव्हते. मीदेखील कोणत्याच वाहनाचा उपयोग करणार नाही. त्यांनी डोक्यावर छायेसाठी पानेही वापरली नव्हती. मी देखील उघड्या डोक्यानेच प्रवास करीन. त्यांनी अयाचित जे मिळेल ते घेऊन यात्रा केली. तशीच मीही दान न मागता [ याचना न करता ] यात्रा करीन. दातवणासाठी सुद्धा कोणत्याही झाडाची डहाळी सुद्धा स्वतः तोडणार नाही. कोणत्याही जलाशयाचे पाणी स्वतः तोंड धुण्यासाठी वापरणार नाही. कुणी दिले नाही तर भोजनही ग्रहण करणार नाही."_

                    _या व्रतांचे अतूट संकल्प करून भिक्षु पुक्कुसातिने हळु हळु प्रगतीपथावर पावले टाकण्यास आरंभ केला. तक्षशिलेहून राजगिरीची यात्रा केवळ दूरच नव्हती तर दुर्गमही होती. राजमहालाच्या सुखसोयीत व वैभव विलासात जन्मलेला, वाढलेला पुक्कुसाति खडतर खडकाळ जमिनीवरून अनवाणी पावले चालला आहे. चालता चालता जखमा झाल्या आहेत. पायाची सालटी निघत आहेत. जखमात पू होत आहे. तो पू वाहत आहे. पायी चालण्याचे कष्ट तर आहेतच. या फोडांनी कातडी फाटलेली आहे, त्यामुळे वेदनांची तीव्रताही कमी नाही.._

                     _पुढे व्यापाऱ्यांचा एक काफ़िला चालतो आहे. मागे मागे पुक्कुसाति दृढ संकल्पाने पदयात्रा करीत आहे. खरेदी विक्रीच्या सामानाने भरलेल्या शेकडो बैलगाड्या समोरून चालल्या होत्या. त्यासमवेत रथासारख्या भव्य बैलगाड्यांची रांग होती. त्यांत काफिल्याचे मालक बसले होते. त्यांना आराम करण्यासाठी त्यात तक्के, लोड, झालर लावलेल्या गाद्या, पडदे इ. लावले होते. एकेका गाडीला पांढऱ्या रंगाचे दणकट बांध्याचे दोन दोन बैल जुंपले होते. त्यांची विशाल गोलाकर शिंगे सुंदर दिसत होती. आल्हाददायक रंगांनी ती शिंगे रंगविली होती. गळ्यात एक-एक घंटा बांधली होती. प्रत्येक बैलाच्या पाठीवर सुंदर कशिदा काढलेली रंगी बेरंगी झूल शोभत होती. त्या झुलेच्या कडेला लहान लहान घंटिका बांधलेली झालर शोभत होती. गाडीच्या चाकावरील आऱ्यांवरही घुंगरे बांधली होती. प्रत्येक रथाला जुंपलेले बैल आपली डोकी समतोलपणे हालवीत डुलत डुलत गाडी ओढत. ज्यावेळी या घंटा, घंटिका, घुंघरु याचा संमिश्र आवाज निर्माण होई, तेव्हा ही रुणझुणाहट मोठी चित्ताकर्षक वाटत असे. परंतु त्या मागून जाणाऱ्या भिक्षूचे त्याकडे लक्षही जात नव्हते. तो पायतळी नजर लावून आपली कष्टसाध्य यात्रा पायीच पूर्ण करीत आहे._

                   _सूर्यास्त होताच काफिला कुठे तरी थांबतो. मालकांसाठी खूप सुंदर आरामदायी व अन्य लोकांसाठी सर्व साधारण तंबू उभारले जातात. रात्री त्यांना त्यात विश्रांती घ्यायची असते. परंतु भिक्षू त्यांच्याजवळ जात नाही. काहीशा दूरअंतरावर एका वृक्षाखाली मांडी घालून बसतो. जखमी पाय धुण्यासाठी पाणी नाही. दुखऱ्या पाठीवर हळुवारपणे फिरणारा हात नाही. साधन नाही. परंतु *आनापान साधनेची उपाय योजना करीत अर्पणा समाधीकडे जात जात पहिल्या ध्यानावस्थेतून चौथ्या ध्यानसमापत्तीत सामावून जातो. रात्रभर त्या ध्यान अवस्थेत मग्न  राहिल्यामुळे शरीराची सारी थकावट, कसर, दूर होत आहे. दुसऱ्या दिवशी पुन्हा ताजातवाना होऊन यात्रेस आरंभ करीत आहे.*_

                     _काफिल्यातील लोक आपली सकाळची न्याहरी आटोपून शिल्लक राहिलेला नाश्ता काही उष्टे पाष्टे भिक्षूच्या भिक्षापात्रात घालतात. भोजन कधी अर्धवट शिजलेले तर कधी फार शिजलेले. कधी कोरडे तर कधी पातळ, कधी अळणी तर कधी खारट. गृहत्यागी भिक्षूच्या झोळीत पडेल तेच स्वादिष्ट मानून आनंदाने ग्रहण करीत आहे. आणि केवळ एक वेळ आहार घेऊन दिवसभर यात्रा करीत आहे.._

                      _काफिल्यातील लोकांना जर कळले असते की, हा जो फाटका भिकारी आपल्या मागे मागे येत आहे तो गंधार नरेश पुक्कुसाति आहे, ज्याच्या कृपेमुळे आपल्याला तक्षशिला नगरीत आयात करात सूट मिळाली, आपला नफा कित्येक पटीने वाढला, तर श्रद्धाविभोर अंतःकरणाने कृतज्ञतेने भारावून जाऊन त्यांनी त्यांच्याजवळ असलेल्या सर्व सुखसोयी त्याला उपलब्ध करून दिल्या असत्या. परंतु पुक्कुसातिला त्याची मुळीच अपेक्षा नव्हती. त्याला तर एका श्रमणाचे श्रमसाध्य कष्टमय जीवन श्रेष्ठ दर्जाचे वाटत होते. या अतीव कष्टात त्याला विपुल मानसिक प्रसन्नता आणि अत्यानंद मिळत होता. या *प्रसन्नतेतच त्याने सुमारे १९२ योजन लांबीची दीर्घयात्रा पूर्ण केली.*_

                     _रस्त्यात काफिला श्रावस्ती नगरातून बाहेर पडला. नगराबाहेरील जेतवन उद्यानातील विहारासमोरून निघाला. पुक्कुसातिने ऐकले होते हा बुद्धाचा विहार आहे. पण त्याने विचार केला की, अनेक लोक 'बुद्ध' असल्याचा दावा विहार करतात. माझा त्यांच्याशी काही संबंध नाही. माझा कल्याणमित्र बिम्बिसार ह्याने ज्या भगवान बुद्धांविषयी लिहिले आहे तेच माझे बुद्ध आहेत व ते मगधाची राजधानी राजगिरी येथेच भेटतील. या विचाराने तो उल्हासित झाला व त्या उत्साहात त्याने *आणखी पंचेचाळीस योजन दूरची यात्रा पूर्ण केली.'*_

                     _जेव्हा राजगिरीला पोहोचला तेव्हा सूर्य मावळला होता. आणि राज्याच्या कठोर नियमानुसार नगराचे दरबाजे बंद केले गेले होते. प्रातःकालपूर्वी ते कोणालाही उघडले जात नसत. म्हणून त्याने राजधानी बाहेरच विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला. तिथेच त्याला अशी माहिती कळली की ज्या भगवान बुद्धांना भेटण्यासाठी तो आला आहे ते यावेळी जेतवनात विहार करीत आहेत. म्हणून त्याने निर्णय घेतला की एक रात्र येथेच घालवून उद्या भगवानांच्या दर्शनासाठी परतीच्या यात्रेला निघावे._

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_संदर्भ :- जागे पावन प्रेरणा_*

*_संकलन :- महेश कांबळे_*

*_दिनांक :- २५/१०/२०२२_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2022/10/blog-post_25.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...