🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_निंदा असो वा प्रशंसा_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
_राजगृहाचे महाराज बिम्बिसार यांनी दान दिलेल्या वेणुवनात वा दुसऱ्या एका विहारात वर्षावास संपवून भगवान देश-प्रदेशात वेगवेगळ्या प्रांतात धर्मयात्रेसाठी बाहेर पडत असत. अशाच एका घटनेचे एक दृश्य आपल्यासमोर आहे._
_पाचशे भिक्षूंसमवेत भगवान राजगृहापासून नालंदाकडे पदयात्रेस निघाले, *या मोठ्या काफिल्यामागोमाग दोन परिव्राजकदेखील यात्रा करीत होते. त्यांतील एक आचार्य सुप्पिय व दुसरा त्यांचा सेवक शिष्य माणवक ब्रह्मदत्त. साऱ्या रस्त्यात त्या दोघात परस्परांत विवाद होत होता.*_
_गुरु परिव्राजक सुप्रिय अनेक प्रकारांनी भगवानांची निंदा करत होता. त्यांच्यावर खोटेनाटे आरोप करीत होता. श्रमण गौतम सर्वज्ञ नाही, अरहंत नाही, लोकांना चुकीचे मार्गदर्शन करीत आहे, वगैरे वगैरे. भगवान देत असलेल्या धर्मशिकवणुकीचीही अनेक प्रकारे निंदा करीत होता. त्यातील सदोषता सांगत होता. हे धर्मशिक्षण नीट प्रकारे समजाविले गेले नाही, मुक्ती मार्गाकडे नेणारे नाही, इत्यादी इत्यादी. भगवानांच्या भिक्षुसंघावरही अनेक प्रकारची टीकाटिप्पणी करीत होता. खोटे नाटे आरोप करीत होता. हा भिक्षुसंघ सुमार्गाने जाणारा नाही, सरळ मार्गी नाही, आदि आदि._
_नेमके याच्या उलट त्याचा तरुण शिष्य ब्रह्मदत्त अनेक प्रकारांनी भगवानांची प्रशंसा करीत होता. गुणगाण करीत होता. हे भगवान अरहंत आहेत. लोकविदु आहेत. वगैरे वगैरे. हा धर्म सुआख्यात, सांदृष्टिक आहे. तत्काळ फळ देणारा आहे, मोक्षापर्यंत पोहोचविणारा आहे. इत्यादी इत्यादी. भगवानांच्या भिक्षुसंघाचीही अनेक प्रकारे प्रशंसा करीत होता._
_हा भिक्षुसंघ सन्मार्गाने जाणारा, सरळ, सद्गुणी, शुद्ध मनाचा आहे, वगैरे वगैरे.._
_गुरुशिष्यांचा हा वादविवाद सारा प्रवासभर चालला होता. दोघेही जण आपापले मनोगत परस्परांना समजाविण्याचा सतत प्रयत्न करीत होते पण त्यांचे एकमत झाले नाही._
_गुरू सुप्पियाच्या मनात भगवान बुद्धांच्याविषयी असीम कटुता होती. त्याचे मन ईर्षा, द्वेषपूर्ण विकारांनी मत्सरग्रस्त होऊन जळत होते. भगवान बुद्धांची यशकीर्ती सर्वत्र पसरली होती. काश्यप बंधुसहित त्यांचे एक हजार जटाधारी शिष्य जेव्हापासून भगवानांचे सेवक बनले तेव्हा त्यांची प्रतिष्ठा उत्तरोत्तर वाढतच गेली. काश्यप बंधु लक्षावधी मगधवासियांचे पूजनीय आचार्य होते. त्यामुळे त्यांचे सारे अनुयायी साहजिकच भगवान बुद्धांचे अनुयायी झाले. स्वतः मगधाचा सम्राट बिम्बिसार भगवान बुद्धांचा श्रावक शिष्य बनला. त्याची श्रद्धा अपरिमित वाढली. कारण त्याला स्वतःला विपुल धर्मलाभ झाला. कुटुंबातील अनेक व्यक्तींनाही चांगला लाभ झाला. *सदाचारी जीवन जगणे, मनातील राग-द्वेष इत्यादी विकारांपासून मुक्त होण्याची शिकवण तर अन्य आचार्य देतच होते. पण त्यांच्याजवळ तो उपदेश कार्यवाहीत आणणारा रास्त उपाय नव्हता. कोणताही वैज्ञानिक मार्ग माहित नव्हता. फारच झाले तर एखादे कर्मकांड, एखादे व्रत किंवा एखाद्या संप्रदायाचे जंजाळ जोडून द्यायचे. परंतु सुनियोजित प्रकारे जो मनाच्या खोल गाभाऱ्यात जाऊन अंतर्मनातील स्वभावाचे मूळापासून परिवर्तन करणारा परिणामकारक विधी देऊ शकत नव्हते. विपश्यना साधनेच्या रुपाने असा विधी भगवान बुद्धांकडून मिळाला तेव्हा कट्टरपंथी अंधविश्वासू लोक सोडून बाकी सर्व समजूतदार बुद्धिशाली लोक भगवान बुद्धांकडे आकर्षिले गेले. याच कारणाने भगवान बुद्धांची शिकवण घराघरांत प्रवेशली. हजारोंच्या संख्येने लोक घरदार सोडून भगवानांच्या भिक्षुसंघात सामील झाले. लाखो लोक सांसारिक जीवन जगतच सद्धर्माच्या मार्गावर चालू लागले.*_
_*महाराज बिम्बिसाराने बुद्ध-प्रमुख भिक्षुसंघाला आपले अत्यंत रमणीय वेणुवन दान दिले. त्याचेच अनुकरण करून अन्य राजपुरुषांनी व सधन नागरिकांनी फक्त एका राजगृह नगरात सतरा विहार बांधले, ज्यात नेहमी विकसनशील भिक्षुसंघाने रहावे व धर्मोपदेश करून लोककल्याण करावे.*_
_साऱ्या मगध देशात भगवान बुद्ध व त्यांचा भिक्षुसंघ यांची प्रतिष्ठा वाढली तशी अन्य सांप्रदायिक आचार्यांची मानप्रतिष्ठा-आदर सत्कार यात उणीव निर्माण झाली. *गणाचार्य बेलट्ठपुत्र संजय यांचे प्रमुख शिष्य उपतिस्स [ सारिपुत्र) आणि कोलित [मोग्गलान] यांनी आपल्या आचार्यांचे शिष्यत्व सोडून भगवान बुद्धांचे शिष्यत्व स्वीकारले. त्यामुळे ते आचार्यकुल विस्कळीतच झाले.*_
_भगवान बुद्धांच्या संप्रदायविहीन तसेच कल्पनेपासून दूर, अनुभूतीजन्य व सत्यावर आधारीत धर्माची प्रतिष्ठापना झाल्यावर अनेक संप्रदाय-संस्थापक, यशस्वी वयोवृद्ध संघीय, गणश्रेष्ठी, गणाचार्य, यांची लोकमान्यता कमी होऊ लागली. त्यांच्या संघटनांचे वाडे कोसळू लागले. अशाच एखाद्या संप्रदायातील हा परिव्राजक सुप्रिय असावा. त्यामुळेच त्याच्या मनात भगवान बुद्धांविषयी कटुता असावी. व भिक्षुसंघाविषयीची द्वेषभावना प्रबल झाली असावी._
_तर दुसरीकडे त्याचा निकटवर्ती ब्रह्मदत्त अजून युवावस्थेत होता. कोणत्याही तत्वज्ञानाच्या किंवा संप्रदायाच्या पाशात तो अडकलेला नव्हता. तो भगवान् बुद्धांच्या तेजस्वी, प्रतापी, ओजस्वी व्यक्तिमत्वानेच नव्हे तर त्यांच्या सहज सुलभ, सरळ भाषेतून सांगितल्या गेलेल्या वैज्ञानिक धर्माकडे आकर्षिला गेला. तसेच सौम्य शांत भिक्षुसंघ त्याला आवडला. तो पहातो की, *भगवान बुद्ध व त्यांचा भिक्षुसंघ चालतात तेव्हा मोजून मापून टाकलेली पावले, व शालीनतेने खाली वळविलेली नजर असते. परंतु अन्य संप्रदायातील संन्याशी उद्धटपणे हातपायांची उर्मट हालचाल करीत डोळे मोठे करून सर्वत्र न्याहाळत चालतात. नम्रता नावाला देखील नसते त्यांच्यात. भगवानांचा भिक्षुसंघ मौन धारण करून वावरतो पण हे लोक किती बडबडतात. किती वाचाळ ! त्यांच्या मनातील अशांती बोलण्यातून प्रकट होत असते. भगवानांचे भिक्षु किती अल्प संतुष्ट, अपरिग्रही, अंगावर थोडीशीच वस्त्रे [चीवर ], हातात फक्त भिक्षापात्र असते. त्यामानाने अन्य सांप्रदायिक संग्रह करणारे आहेत. भांडीकुंडी किती! कपडालत्ता किती! खाद्यपदार्थांची गाठोडीच्या गाठोडी वाहून नेत असतात.*_
_शिष्य माणवक ब्रह्मदत्त बुद्ध आणि त्यांचा भिक्षुसंघ यांचे गुणगान करतांना मुळीच थकत नव्हता. आणि गुरुवर्य परिव्राजक सुप्पिय त्यांची निंदा करण्यात मागे हटत नव्हता. सारी यात्राभर त्या दोघात हा वादविवाद चालला होता. *राजगृह नालंदापासून एक योजन दूर अंतरावर आहे.* चालत चालत हा काफिला अर्ध्या वाटेवर पोहोचला. महाराज बिम्बिसारने या ठिकाणी यात्रेकरूंना विश्रांतीसाठी एक विश्रामगृह उभारले होते. मोठे राजउद्यान बांधले होते. चारही बाजूंना मजबूत भिंती असलेले उद्यानयुक्त विश्रामधाम. अनेक फुलाफळांनी डवरलेले वृक्ष, घनदाट सावली. पाण्याने तुडुंब भरलेल्या विहिरी-बावड्या, तलाव सरोवरे. बिम्बिसार व त्याच्यासमवेत आलेली राज्य परिषद ; राजकर्मचारी तसेच सुरक्षा सैनिक यांच्या निवासासाठी विशाल भवने परिषद, होती. *साऱ्या राज्यभर अशी भव्य विश्रामधामे ठिकठिकाणी उभारली असावीत. यांना राजागार म्हणत असत. या राजभवनाच्या प्रवेशद्वारावर एक आम्रवृक्ष उगवला होता. म्हणून त्याचे नाव अम्बलट्ठिक राजागार पडले.*_
_श्रद्धाळू बिम्बिसाराने भिक्षुसंघासहित भगवान बुद्धांची यात्राप्रसंगी विश्राम करण्यासाठी अशा प्रकारे राजागार विश्रामधामात सोय केली असावी असे वाटते. म्हणून असे दिसते की, सायंकाळ होताच भगवान आणि त्यांचा भिक्षुसंघ नालंदा आणि राजगृह यांच्या मध्यभागी बनविलेल्या या अम्बलट्ठिक राजागारात रात्रीची विश्रांती घेण्यासाठी उतरलेले होते. त्यांच्या मागे मागे चालत येणाऱ्या परिव्राजकाने व त्याच्या शिष्यानेही या सुखसोयीचा लाभ घेऊन तेथेच मुक्काम केला. भगवान आणि भिक्षुसंघाने नेहमीप्रमाणे रात्रचर्या पूर्ण केली. पण हे गुरुशिष्य रात्रभर त्याच मुद्यावर चर्चा वादविवाद करीत राहिले.._
_*नित्यनियमानुसार रात्रीच्या प्रथम प्रहरात भगवानांनी स्नान करून कपडे बदलेले आणि बुद्धासनावर बसून भिक्षूंच्या समवेत एक मुहूर्त ध्यान केले. सारे भिक्षु निःशब्द होऊन मौन पाळून अधिष्ठानास बसले. कुणाच्या ही खास-खोकल्याचाही आवाज नाही. शरीराची जरादेखील हालचाल नाही. सर्वजण निश्चल दीपज्योतीप्रमाणे ध्यान साधनेत मग्न झाले. त्यानंतर भगवानांनी उपदेश केला. ध्यान विधीवर काही प्रकाश टाकणारे भाष्य केले.. ज्या भिक्षूंनी प्रश्न विचारले त्यांना उत्तरे दिली. ज्यांना समस्या होत्या त्या सोडविल्या. त्यांचे समाधान केले. कुणाकुणाला विपश्यना साधनेची सखोलता समजाविली. अशा रीतीने रात्रीचा पहिला प्रहर संपला. सारे भिक्षु विश्रांती घेण्यास निघून गेले.*_
_*भगवान आता रात्रीच्या दुसऱ्या प्रहारातील कामाला लागले. नेहमीप्रमाणे या मध्यप्रहरी विभिन्न लोकातून आलेल्या देवांच्या व ब्रह्मांच्या प्रश्नांना उत्तरे देत राहिले. त्यांना धर्मोपदेश देत राहिले. ध्यान शिकवीत राहिले. अशा रीतीने रात्रीचा दुसरा प्रहर संपला.*_
_*नित्याप्रमाणे भगवानांनी रात्रीच्या तिसऱ्या प्रहाराचे तीन भागात विभाजन केले. पहिल्या भागात मोकळ्या हवेत चंक्रमण केले. सजग होऊन चालत राहिले. दुसऱ्या भागात आपल्या शयनगृहात उजव्या कुशीवर सिंहशय्यावस्थेत पडून स्मृती संप्रज्ञानात विश्राम घेतला आणि तिसऱ्या भागात बसून मैत्री भावनेने करुण चित्ताने सर्व लोकांचे अवलोकन केले. कुठे कुठे कोण कोणते प्राणी आपल्या पूर्वकृत कुशल कर्मांमुळे मुक्तावस्था प्राप्त करणे योग्य अशा स्थितीत आहेत आणि त्यास कुठे कसे मार्गदर्शन करावे यात रात्रीच्या प्रहराचा तिसरा भागही पुरा झाला.*_
_अशा रीतीने तीनही प्रहारांची रात्रचर्या पूर्ण करून भगवान मैत्री ध्यानभावनेतून उठून बाहेर आले. सूर्योदयाच्या पूर्वाभासाचा संदेश देत आकाशात तांबडे फुटले होते. पहाटेच्या या आल्हाददायी वेळी काही भिक्षु मोकळ्या मंडपात बसले आहेत. काही चर्चा चालली आहे. भगवान त्यांच्या जवळ गेले. सर्वांनी वाकून प्रणाम केला. भगवान तेथे असलेल्या एका आसनावर बसले आणि भिक्षूंना विचारले, 'कसली चर्चा चालली आहे ?" भिक्षु उत्तरले, "भगवान क्षमा करावी. काही काळ धर्म चर्चा झाली पण त्यानंतर लोकचर्चा सुरू झाली. भन्ते भगवान! जेव्हा नालंदाहून आपण निघालो होतो तेव्हा परिव्राजक सुप्पिय व त्यांचा शिष्य माणवक ब्रह्मदत्त दोघेही आपल्या मागे मागे चालत होते. सर्व रस्त्यात त्यांचा वादविवाद चालला. एक बुद्ध, धर्म, संघ यांची तोंडभर प्रशंसा करीत होता तर दुसरा तीव्र निंदा करीत होता. जेव्हा आम्ही आपल्याबरोबर राजागारामध्ये रात्री विश्राम घेण्यासाठी थांबलो तेव्हा तेही आपल्या समवेत थांबले. आम्ही पाहिलं की रात्रभर देखील त्यांनी विश्रांती घेतली नाही. सारी रात्र याच वादविवादात गुंतून पडले आहेत."_
_*त्यावर भगवान म्हणाले, 'भिक्षुनो! जेव्हा कोणी तुमची निंदा करीत असेल तेव्हा कुपित क्रोधीत होता कामा नये. मनात दुःखी होता कामा नये. शांत चित्ताने स्वतःच स्वतःची परीक्षा करावी. खरंच आपल्यात काही दोष तर नाही ना? जर दोष नसेल तर आपण निर्दोष आहोत या तथ्याचा स्वीकार करावा. निंदा ऐकून रागावलात, दुःखी झालात तर आपणच आपली हानी करून घ्याल. आपल्या प्रगतीत अडथळा निर्माण कराल."*_
_*"तसेच कोणी प्रशंसा करू लागला तर ती ऐकून आनंदित होऊ नका. हर्षोत्फुल्ल बनू नका. शांत चित्ताने आपले आपणच निरीक्षण करा की खरंच असा काही सद्गुण आपल्यात आहे का? का ही व्यक्ती अतिशयोक्ती करते आहे? जर असेल तर मात्र त्याचा स्वीकार करावा. जर आनंद आणि हर्ष यांनी फुगून जाल तर आपली हानी करून घ्याल व आपल्याच प्रगतीला बाधा निर्माण कराल."*_
_या साधक हो! भगवानांची ही धर्मवाणी विस्तृतपणे समजून घेऊ या व त्याप्रमाणे आचरण करून आपले हित-सुख साधू या._
_भगवानांनी सांगितलेल्या साधनाविधीचे साधक या नात्याने आपण चांगल्या रीतीने समजलो आहोत की, *शब्द शब्दच आहेत. निंदा असो वा प्रशंसा फक्त तरंगच तर आहेत. परंतु निंदाव्यंजक शब्द जेव्हा आपल्या कानाला स्पर्श करतात तेव्हा आपल्या जुन्या संस्कारांनी प्रभावित होऊन संज्ञा त्यांचे मूल्यांकन करते आणि या शब्दांना वाईट समजून शरीरात अप्रिय दुःखद संवेदना निर्माण होतात. त्याच्या परिणामस्वरूप अज्ञान अवस्थेत आमच्या मनाचा एक भाग दुर्मन होऊन उठतो आणि द्वेष, क्रोध यांची प्रतिक्रिया व्यक्त करतो.*_
_*त्याचप्रमाणे जेव्हा स्तुतीचे शब्द आमच्या कानाला स्पर्श करतात तेव्हा ही संज्ञा उर्ध्वमूल्यन करते आणि त्या शब्दांना चांगले मानल्यामुळे शरीरात प्रिय, सुखद संवेदना उत्पन्न होतात. परिणामस्वरूप अज्ञान अवस्थेत आपल्या मनाचा एक हिस्सा प्रफुल्लित होतो. आणि राग, लोभ, आसक्ती यांच्या प्रतिक्रिया करू लागतो.*_
*_प्रतिक्रिया मग ती द्वेषाची असो वा रागाची, आपले मन दूषित कर्मसंस्कारांच्या धुराने धुरकटते. अन् ते सत्याला जसे आहे तसे पाहू शकत नाही. अज्ञानाने प्रभावित होते. आपली समता घालवून बसते. आणि विकारांवर विकार उठत राहतात. आपली विपश्यना साधना दूरावते, सुटते. रागद्वेषांपासून मुक्त होण्याच्या कामात बाधा [अंतराय] निर्माण होते. पाच आवरणात हे दोन्ही प्रमुख आहेत. म्हणून हे दोन्ही अस्तित्वात असेपर्यंत समाधि अवस्था प्राप्त होत नाही. प्रज्ञा जागवून रागविहीन, द्वेष विहीन होणे तर दूरच राहते. निंदा किंवा प्रशंसा ऐकून द्वेष किंवा राग जागृत झाल्यास आपण दुसऱ्याची हानी करू किंवा न करू पण आपली हानी अवश्य होत असते, आपल्या प्रगतीत अडचण निश्चितच निर्माण होत असते._*
_म्हणून साधक हो! हे चांगल्या प्रकारे समजून घेऊन यापासून स्वतःला वाचवावे आणि धर्मपंथावर प्रगतीशील होऊन आपले मंगल साधून घ्यावे._
*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_संदर्भ :- जागे पावन प्रेरणा_*
*_संकलन :- महेश कांबळे_*
*_दिनांक :- २९/१०/२०२२_*
https://mikamblemahesh.blogspot.com/2022/10/blog-post_29.html
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
No comments:
Post a Comment