Friday, 28 October 2022

पहाण्यात मात्र केवळ पहाणे

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_पहाण्यात मात्र केवळ पहाणे_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

                   _*मुंबई महानगरापासून सुमारे पन्नास मैल अंतरावर एक लहानसे स्टेशन आहे - नल्ला [नाला]. जवळच छोटेसे गाव आहे सुप्पारा [सोपारा]. आजचे नालासोपारा. दोन हजार पाचशे वर्षांपूर्वी भारतातील हे एक प्रसिद्ध व महत्वपूर्ण बंदर होते. त्या काळातील मुंबई ! नाव होते सुप्पारकपत्तन. पूर्वी पतन म्हणत असत बंदराला.*_

                    _त्या काळात या सुप्पारक महानगरात एक अत्यंत वृद्ध संन्याशी रहात होता. डोक्यावर कापसासारखे पांढरे शुभ्र केस. त्यांच्या जटा झाल्या होत्या. चेहऱ्यावर तशीच लांबलचक दाढी आणि मिशा. कृश शरीरावर वल्कल वस्त्रे या साऱ्यामुळे त्या संन्याशाचे व्यक्तिमत्व भव्य दिसत होते. अफाट लोकसंख्येच्या त्या महानगरात अनेक धनवान प्रतिष्ठीत लोक, त्याचे श्रद्धा भक्त शेकडोंच्या संख्येने त्याचे नित्य दर्शन घेण्यास येत. त्याच्या पायाची धूळ मस्तकाला लावीत. भरपूर दान-दक्षिणा देत, खाद्यसामुग्री अर्पण करीत. फळे, फुले व औषधे अर्पण करून स्वतःला धन्य समजत. भक्तांच्या या श्रद्धेमुळे त्या संन्याशाच्या मनात असा आत्मविश्वास निर्माण झाला की आपल्याला अरहंत अवस्था प्राप्त झाली आहे, जीवनमुक्त झालो आहोत. भवबंधनांतून संपूर्णतया सुटलो आहोत._

                  _परंतु एके दिवशी एका हितचिंतकाने मोठ्या प्रेमाने त्याला समजावून दिले की आपण अजून अरहंत झाला नाहीत, एवढेच नव्हे तर अरहंत होण्याच्या मार्गावरही नाहीत. संन्याशाला धक्का बसला. पण तो समंजस होता. आत्मचिंतन करू लागला. तेव्हा त्याच्या हे लक्षात यायला वेळ लागला नाही की *जोपर्यंत मनात विकारांचा प्रवाह चालू आहे तोपर्यंत कोण कसा अरहंत होऊ शकणार? जीवनमुक्त कसा होणार? त्याला स्वतःलाच हे जाणवले की एकाग्रतेच्या अभ्यासाव्यतिरिक्त त्याची चित्तधारा सर्वथा विकारशून्य झालेली नाही.*_

                  _त्याने उत्सुकतेने विचारले, "या जगात अशी कुणी व्यक्ती आहे की, ज्याच्या मनात वासना विकारांचा लवलेशही नाही? ज्याची चित्तधारा विकारांपासून पूर्णपणे मुक्त झाली आहे ? जो अरहंत झालेला आहे ?"_

                   _त्याला उत्तर मिळाले, "हो तर अवश्य उत्तर भारतातील नगरी कपिलवस्तूचा शाक्यवंशीय राजकुमार सिद्धार्थ गौतम हा गृहत्याग करून परमसत्याचा शोध घेण्यासाठी बाहेर पडला, आणि अनेक वर्षे सतत शोध घेतल्यावर मनातील सगळ्या विकार-वासनांचे निर्मूलन करणारी साधना पद्धती त्याने स्वतःच शोधून काढली व त्या पद्धतीने निरंतर अभ्यास करून अरहंत अवस्था प्राप्त करून घेतली आहे. ते स्वतःच सम्यक् सम्बुद्ध आहे. यावेळी ते भगवान अरहंत सम्यक् सम्बुद्ध श्रावस्तीच्या जेतवनात राहिले आहेत. ज्या साधनेमुळे त्यांना विमुक्ती लाभली. ती साधना अत्यंत करूण चित्ताने कोणताही भेदभाव न करता सर्वांना शिकवीत आहेत. संन्याशाने जेव्हा हे ऐकले तेव्हा मनात आंदोलन उठले. 'मी देखील गृहत्याग करून वर्षे लोटली. साऱ्या भवबंधनातून सुटका व्हावी, नितांत विमुक्त व्हावे म्हणून संन्यास घेतला. पण पाहतो आहे, जे व्हायला हवे ते झालच नाही. ही बाह्य वेशभूषा, कर्मकांड, आणि त्याग तपाची व्रतवैकल्ये यामुळे बाहेरील लोकच आकर्षिले गेले.. सामाजिक प्रतिष्ठा वाढली; मान-सन्मान, वैभव, अभिमान, पूजाअर्चा, दान दक्षिणा सारं मिळत आहे. परंतु माझ्या मानसिक अवस्थेची या लोकांना काय कल्पना ? हे सारेजण तर माझे बाह्यजीवनच पहात आहेत. या खोट्या प्रतिष्ठेच्या मान सन्मानाशी माझे व्यक्तिशः काय देणे घेणे आहे ? ज्या ध्येयासाठी मी गृहत्याग केला, घरदार प्रपंच सोडला ते ध्येय तर बाजूलाच राहिले आहे, ते प्राप्त झालेच नाही. मनाची शुद्धता-परमविशुद्ध विमुक्ती कुठे झालीय? आता तर मी वृद्ध झालो आहे. मनाची शुद्धता या मानवी जीवनातच शक्य असते. माझ्या जीवनाचा केवढा अमूल्य काल मी किती फुकट घालविला !! त्याला वाटले उर्वरित आयुष्य फारच अल्प आहे._

                  _मनात नैराश्य दाटून आलं, एवढ्या थोड्या काळात आता काय होऊ शकेल? तेव्हा त्याच्या अंतरंगात नुकत्याच ऐकलेल्या शब्दांचे गुंजन सुरू झाले : *"ज्या विधीने - साधनेने भगवान बुद्धांना स्वयंमुक्ती लाभली तो साधनाविधी भगवान अरहंत सम्यक सम्बुद्ध सर्वांना कोणताही भेदभाव न ठेवता अत्यंत करुणार्द्र होऊन शिकवितात."*_

                  _या विचाराने उदासीन झालेल्या मनात एका नव्या उत्साहाचा झरा उसळला. त्याच्या वृद्ध दुर्बल शरीरात तारुण्याचे सळसळणारे स्फूर्तिदायक झरे वाहू लागले आणि तात्काळ तो श्रावस्तीकडे चालू लागला. *अतिशय दूर असलेल्या पश्चिम सागर तटावरील अपरांत प्रदेशाची राजधानी सुप्पारक गावाहून उत्तर प्रदेशातील हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या कौशल प्रदेशाची राजधानी असलेले श्रावस्ती नगर यातील लांबचे अंतर त्याला जाणवले नाही.* भगवान अरहंत सम्यक् सम्बुद्धांचे दर्शन, आणि त्यांच्याकडून चित्त विशोधनाची विद्या शिकण्याची अभिलाषा या धर्म-संवेगमुळे त्याच्या मनात अदम्य उत्साह संचारल्याने या प्रदीर्घ प्रवासयात्रेचे श्रम त्याला जरासुद्धा जाणवले नाहीत. म्हणून संबंध प्रवासात फक्त एक रात्रच त्याने विश्रांती घेतली तरी देखील श्रावस्ती नगरात पोहोचल्यावर त्याला मुळीच थकवा जाणवत नव्हता._

                 _श्रावस्तीच्या जेतवन विहार येथे पोहोचल्यावर विहारवासियांनी सांगितले की भगवान भिक्षाटनासाठी शहरात गेले आहेत. थोडावेळ विहारात विश्रांती घ्या. तोपर्यंत भगवान परत येतील._

                 _परंतु प्रबळ धर्मसंवेग निर्माण झालेल्या परिव्राजकाला विसावा कसला ? तो लगेच राजधानी श्रावस्तीकडे निघाला. काही अंतर चालून गेल्यावर त्याला सम्यक् सम्बुद्ध भगवान राजमार्गावरून भिक्षापात्र हातात घेऊन जातांना दिसले. त्यांच्याकडे तो अनिमिष नेत्रांनी मंत्रमुग्ध होऊन पहातच राहिला. किती भव्य मंगल विधायक व्यक्तिमत्व! धीर गंभीर, सौम्य, शांत मुद्रा, कारुण्याने ओतप्रोत नेत्र, शरीराच्या अंगप्रत्यंगातून प्रस्फुटित होणारे संयमी शांत शीतल तेज, आणि शरीराच्या अणू-रेणूतून प्रवाहमान अनंत मैत्रीभावनेच्या लहरी. श्रद्धाविभोर होऊन त्या संन्याशाने त्यांच्या चरणकमलांवर आपले मस्तक ठेवले._

           _''भन्ते भगवान! मला धर्म द्या. सुगत! मला विशुद्ध धर्माची साधना शिकवा, ज्या साधनेमुळे माझे अनंतकालिन कल्याण होईल."_

           _'संन्यासी! धर्म शिकविण्यासाठी ही वेळ योग्य नाही. संन्यासी! तथागत आता भिक्षाटनासाठी निघाले आहेत. विहारात परतताच धर्म-साधना अवश्य शिकवतील, भगवान म्हणाले._

            _'भन्ते भगवान! जीवनाचा काय भरवसा ? मग ते जीवन माझे असो वा आपले. यावेळी आपल्यावरची माझी श्रद्धा सजीव आहे. भगवान कृपा करून आताच धर्म शिकवा. त्यामुळे अनंतकाळपर्यंत माझे जीवन - मांगल्य साधेल.'_

                    _संन्याशाने दोनदा, तीनदा कळकळीने आवाहन केल्यानंतर तिथेच रस्त्याच्या कडेला थोडावेळ थांबून भगवानांनी धर्मदेशना दिली. थोडक्यात धर्मसाधना शिकविली. अन् म्हणाले, 'अशाप्रकारे अभ्यास कर *'दिट्ठे दिट्ठमत्तं भविस्सति' पाहतांना फक्त पाहणेच असू दे. 'सुते सुतपन्तं भविस्सति' ऐकतांना फक्त ऐकणेच असावे. याचप्रमाणे वास घेतांना फक्त वासच, चव घेतांना फक्त चवच, स्पर्श म्हणजे फक्त स्पर्शच, समजून घेणे म्हणजे फक्त समजणेच असावे.'*_

           _त्या जाणकार संन्याशाने भगवानांच्या या सारयुक्त उपदेशाला खूपच खोलवर विस्तारपूर्वक जाणले._

                   _*डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा आणि मन या सहाही इंद्रियांच्या सहाय्याने ज्या क्षणाला ज्या द्वारावर ज्या विषयाचे ज्ञान म्हणजे रुप, शब्द गंध, रस, स्पर्शव्य पदार्थ अथवा विकल्पांचा संस्पर्श होईल, त्याक्षणी जे ज्ञान होईल फक्त त्याचीच जाणीव आणि फक्त जाणीवच असावी. ज्याक्षणी जे होत आहे. त्याक्षणी तीच अनुभूती घ्यावी, पहायचे ते पहाणेच व्हावे. ऐकायचे तर फक्त ऐकणेच व्हावे. वास घेणे म्हणजे फक्त वासाचीच अनुभूती, स्वाद घेतांना केवळ स्वादाची ओळख, स्पर्श करतांना स्पर्शाचीच अनुभूती, विचार करतांना फक्त विचार, केवळ ती अनुभूतीच घ्यावी, त्यावर कोणतीच प्रतिक्रिया करू नये.*_

                 _*सतत अभ्यासाद्वारे तुकडे तुकडे करून काळाच्या त्या लहानात लहान भागापर्यंत पोहोचावे, ज्याला चित्त-क्षण म्हणतात. या चित्त-क्षणात एकाच वेळी दोन घटना होत नाहीत. परंतु ही कालाची धारा अत्यंत जलद, शीघ्र गतीने वाहात असते. ज्यामुळे एकएक क्षणाला घडणारी घटना आपण वेगवेगळी करण्याची व ती समजून घेण्याची क्षमताच हरवून बसतो. वेगाने चालणाऱ्या चलत-चित्राच्या गतिमानतेप्रमाणे या जीवन प्रवाहाला गतिशील स्वरूप प्राप्त होते, आणि मग या चित्राची छोटी छोटी स्वतंत्र रूपे वेगवेगळी बघू शकत नाही. यामुळे दृष्टिभ्रम निर्माण होतो. मृगजळाचा विकास होतो. त्यामुळे मागचा-पुढचा संबंध जोडला जातो प्रपंच वाढू लागतो. राग, द्वेष आणि मोहमूढता यांचा प्रपंच.* हे सारं कसं घडतं? चला! तेही समजून घेऊ या._

               _*सहा इंद्रिये आहेत. ज्या इंद्रियद्वारावर या क्षणाला जी घटना घडते ती घटना फक्त समजूनच आपण थांबत नाही तर चटकन संज्ञेच्या सहाय्याने आपण ते ओळखतो. संज्ञा म्हणजे मनाचाच एक भाग जो पूर्वानुभवांच्या व आठवणीच्या आधाराने ओळख पटविण्याचे काम करतो. एकदा का संज्ञेने ओळखण्याचे काम केले, की झाला प्रपंचाचा आरंभ. त्या क्षणाचे अस्तित्वतच संपते आणि मन भूतकालात भ्रमण करायला लागते. अशीच अनुभूती पूर्वी आली होती का हिच्याशी मिळती जुळती ? आणि त्यावेळी अनूभूती चांगली वाटली होती की वाईट? असे मूल्यमापन सुरू होते. मूल्यमापन होताच प्रपंच पुढे वाढू लागतो व वेदना [ शरीरावर होणारी ही संवेदना ] सुखद तरी वाटते किंवा दुःखद तरी वाटते. आणि तेव्हा मनाचा तो भाग आपले कार्य सुरू करतो ज्याला संस्कार म्हणतात. त्याचे काम प्रतिक्रिया करण्याचे. या क्षणी पहाणे, ऐकणे, वास घेणे, चाखणे, स्पर्शणे आणि चिंतन करणे इ. चांगले वाटले तर राग [अनुराग], वाईट वाटले तर द्वेष अशी प्रतिक्रिया होत असते. मन भविष्य काळात उलटसुलट कोलांट्या घेऊ लागते. असे व्हावे, असे होऊ नये. अशाप्रकारे भूतकाळातील स्मृति आणि भविष्यकाळातील कल्पना, चित्तधारेवर राग [म्हणजे आसक्ती] व द्वेष यांचा भडीमार सुरू करतात. याक्षणी फक्त पहाण्याची सवय लागली आणि फक्त पहाण्याची क्रिया मर्यादित ठेवू लागला तर न आरंभ होतो, न वाढ होते. असा आरंभ न करणारा अनारंभीच प्रपंचमुक्त होत असतो.*_

                  _*साधक लक्षपूर्वक बघतो तर त्याला असे दिसते की, शरीराच्या या पांचही दरवाज्यांवर स्पर्शाच्या आघाताची अनुभूती जितक्या वेळा व जितका काळ होते त्याच्या तुलनेत मनावर होणारी अनुभूती किती तरी जास्त असते. पहाणे, ऐकणे, वास घेणे, स्वाद घेणे, स्पर्शणे यापेक्षा विचार करण्याचे काम कित्येक पटीने अधिक असते. एकादी घटना मनावर घडली तर तिचा भडीमार मनावर चालू राहतोच. परंतु या पांच शरीर इंद्रियांवर काही घडले तर त्याची प्रतिक्रिया मनावरच होत रहाते. हा सारा प्रपंच, विस्तार मनात होत रहातो. कारण असे की, आरंभ मनात होत असतो. जोपर्यंत आपण जिवंत असतो आणि तनमनाचे सहा खिडक्या दरवाजे विषय प्रवेशासाठी उघडे असतात तोपर्यंत प्रत्येक क्षणाला कोणत्या ना कोणत्या तरी खिडकीतून काहीना काही तरी प्रवेश होतच असतो. मग त्याला घेऊन हे वेडपट आरंभी मन राग-द्वेष यांचा आरंभ करीतच असते आणि प्रपंच वाढवीतच अशा अवस्थेत चित्ताची विशुद्धी कुठे आणि चित्तविमुक्ती कशी?*_

                   *_क्षणाक्षणांचे विभाजन करून, बारीक बारीक तुकडे करून त्यांना वेगवेगळे बघितले नाही तर प्रत्युत्पन्न म्हणजेच वर्तमान, भूतकाळ आणि भविष्यकाळ यांच्यात गुंतवत राहतो. त्यामुळे एक आणखी समस्या निर्माण होते. घटनांच्या या जुळवाजुळवीत एक सूत्र गुंफलेले आहे असा आभास निर्माण होतो. अहंभाव, अस्मिताभाव, आत्मभाव यांचे घनदाट सूत्र. यातूनच एक 'मी' चे अस्तित्व फुलते. हळूहळू ह्या 'मी' ची अनुभूती 'हा मी आहे' मध्ये परावर्तीत होते. 'हा मी आहे' ज्याने लहानपणापासून आजमितीपर्यंत अशा प्रकारचे अनुभव आणि 'हा मी आहे' जो भविष्यात अशा अशा अनुभूती येणार आहे. 'हा मी आहे' चा भ्रम या अस्तित्वहीन 'मी'च्या प्रति आसक्ति निर्माण करतो. ही आसक्ती राग आणि द्वेषाचा अग्नी प्रज्वलित करते. 'ही मी आहे' ची अविद्या आहे, ज्यामुळे राग द्वेषाला आणि रागद्वेषाच्या मोहमूढतेमुळे 'मी आहे' च्या भ्रांतीला परस्पर बलवान बनविते._*

               _*साधक आपल्या निरंतर अभ्यासाने प्रसंगाच्या चित्रफितीचे तुकडे तुकडे करून बघू लागतो तर 'मी आहे' चा आभास कोलमडून पडतो. आणि 'मी आहे'चे अस्तित्व केवळ लोकव्यवहारापुरते मर्यादित राहते. यात 'मी च्या वेगळ्या व्यक्तित्वाची भ्रांति दूर होते. एकेका क्षणाचे स्वतंत्र अस्तित्व आपोआप जाणवू लागते. संभ्रम नाहीसा होतो आणि वस्तुस्थिती स्पष्ट होऊ लागते. प्रज्ञा जागृत होते, अविद्येचे सारे क्लेश दूर होतात. राग व द्वेष यांचे नवे गुंते निर्माण होत नाहीत, आणि पूर्वीचे गुंते सुटायला लागतात.*_

                _*तेव्हा पाहण्यातही 'मी पहातो'चा भ्रम नाहीसा होतो. 'पहाणे केवळ पहाणे'च राहते. तसेच ऐकणे ह्या क्रियेत केवळ ऐकणे, वास घेणेत केवळ वास येणे, चाखण्यात केवळ चाखणे, स्पर्शणे केवळ स्पर्शणे राहते, तसेच जाणणे केवळ जाणणे राहून जाते. 'करतो आहे' किंवा 'भोगतो आहे' या ऐवजी 'होत आहे' हे सत्य अनुभवास येते. [म्हणजे पाहिले जात आहे, चाखले जात आहे. जाणले जात आहे. त्यात मी, माझे किंवा माझा ह्याला स्थान नाही. भोक्ताभाव आणि कर्ताभावाची माया विदीर्ण होते. अहंभाव जाऊन अहंकारविहिनता येते. आत्मभाव अनात्मभावात बदलतो.*_

                 *_अजूनपर्यंत साधक केवळ सिद्धांत म्हणूनच हे मानून चालत होता की, है शरीर, हा मनोव्यापार 'मी' नव्हे, 'माझे' नव्हे, 'माझा आत्मा' नव्हे. परंतु ती आता निव्वळ मानायची बाब नाही राहिली. आता तर साधक स्वानुभूतीच्या बळावर ह्या सत्याला स्वतः जाणतो आणि त्याला हे स्पष्ट होते की, त्या इंद्रियक्षेत्राच्या अनुभूतींमुळे कुणा 'मी'चे अस्तित्व नाही. ना ह्या ऐंद्रिय अनुभूती कुणा 'मी' ला धारण करीत आहेत. आणि ना कुणी 'मी' ह्या इंद्रियांना धारण करीत आहे._*

                 _हीच गोष्ट भगवानांनी संन्याशाला समजावून सांगितली की जेव्हा *'दिट्ठे दिट्ठमत्तं भविस्सति म्हणजे 'पहाणे हे केवळ मात्र पहाणे' इत्यादि होईल. तेव्हा ‘ततो त्वं न तेन' त्या सर्व बघणे ऐकणे वगैरे ह्यामुळे तू आहेस ही भ्रांति आणि तेव्हा 'ततो तं न तत्थ' म्हणजे ह्या बघणे, ऐकणे वगैरे मध्ये तू आहेस हा भ्रम दूर होईल. ही खोटी धारणा नाहीशी होईल. अशा 'अहंशून्य' अवस्थेला पोहोचताच लोकोत्तर निर्वाणाचा साक्षात्कार होईल. 'एसेवन्तो दुक्खस्स' हाच दुःखाचा अंत आहे.* मेधावी संन्याशी भगवानांनी दिलेल्या संक्षिप्त उपदेशाला विस्ताराने केवळ समजूनच थांबला नाही तर त्याचा त्याने तसा अभ्यास केला. ज्याला आपला मृत्यू समोर दिसतो आहे त्याला प्रमाद करण्यास वेळ कुठला ? त्याच ठिकाणी एका बाजूला बसून तो अंतर्मुखी झाला आणि अविरळ घनीभूत चित्तधारेचे तुकडे तुकडे करून प्रत्येक क्षण जसा आहे तसा स्वतंत्रपणे पाहू लागला. पहाता पहाता अस्मिताभाव गेला, पूर्वसंचित संस्कारांपासून विमुक्त झाला आणि चित्त अनासक्त होऊन आस्रवमुक्त झाले. *परमपद निर्वाणाचा साक्षात्कार झाला.* संन्याशी कृतकृत्य झाला. धन्य झाला. राहिलेले अल्पजीवन सफल-सार्थक झाले. *भगवान भिक्षाटन करून परत येईपर्यंत त्याची जीवनलीला समाप्त झाली होती. भिक्षूंनी भगवानांना विचारले, 'याची गति काय झाली?' तेव्हा भगवान म्हणाले, 'तो आता गति पलिकडे गेला, गतिमुक्त झाला. जीवनमुक्त झाला. परिनिर्वाणावस्थेला गेला.'* त्यावेळी भगवानांच्या तोंडून सहजोद्गार बाहेर पडले, ज्यात अनिर्वचनीय अशा निर्वाणिक अवस्थेसाठी नकारात्मक भाषेचाच प्रयोग केला आहे._

*_यत्थ आपो च पठवी, तेजो वायो न गाधति ।_*

*_न तत्थ सुक्का जोतन्ति, आदिच्चो नप्पकासति ॥_*

*_न तत्थ चंदिमा भाति, तमो तत्थ न विज्जति ।_* 

*_यदा च अत्तनावेदि, मुनि मोनेन ब्राह्मणो ।_*

*_अथ रूपा च अरूपा च सुखदुक्खा पमुच्चति ॥_*

               *_जेथे पृथ्वी नाही, पाणी नाही, अग्नी आणि वायु यांना प्रवेश नाही, जिथे न शुक्रांची चांदणी आहे न चंद्रसूर्याचा प्रकाश आहे तसेच आलोकाचा अभाव नाही म्हणजे अंधार विद्यमान नाही. कुणी ब्राह्मण मुनि मौन मार्गाने जाऊन याची स्वतःच अनुभूती घेतो तेव्हा सारे रूप, अरूप लोक ओलांडून पलिकडे जातो. सुख दुःखाच्या द्वंद्वातून मुक्त होतो._*

             *_इथे ‘अत्तनावेदि’ शब्द साधकांच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहे. कोणी साधक परम सत्याला स्वतः जाणून घेऊनच मुक्त होऊ शकतो._*

               _*सुप्पारकपत्तनमध्ये त्या संन्याशाला कोणत्या नावाने ओळखत हे माहित नाही. पण पाली वाङ्मयात तो 'बाहिय दारुचीरिय' या नावाने प्रसिद्ध आहे. कोणालाही त्याचे नाव विचारण्यास आणि त्याला आपले नाव सांगण्यास वेळच कुठे होता? बाहेरच्या प्रांतातून आला होता म्हणून कदाचित ‘बाहिय’ [बाहेरचा ] म्हटले असावे. अथवा हे देखील संभव आहे की बाहेरील एकाद्या संप्रदायाचा होता म्हणून 'बाहिय' म्हटले गेले असावे. 'दारू' म्हणजे 'झाडाची साल' अर्थात झाडाच्या सालाची वल्कले चीवर अंगावर होती. ज्याने पाहिले त्याने 'दारुचीरिय' म्हटले.*_

                 _*याप्रकारे ‘बाहिय दारुचीरिय' नाव अमर झाले. पण नावात काय आहे ? संप्रदाय, देश याला काय महत्व आहे? जो कोणी या आंतरिक सत्याचा स्वतः सूक्ष्मतेने अनुभव घेतो तो ‘अत्तनावेदि' म्हणवला जातो, तोच जीवनमुक्त होतो.*_

                _धन्य आहे ही धर्मगंगा! या धर्मगंगेच्या प्रवाहात डुबकी मारून कुणीही शुद्ध-बुद्ध, विमल-विमुक्त होतो. ही न विचारते जात, गोत्र, देश वेश, वर्ग, वर्ण, समुदाय, संप्रदाय ! इथे हा आपला, तो दुसऱ्याचा हा आतला, तो बाहेरचा; हा देशातला, तो परदेशातला; असा फरक नाही. या धर्मगंगेच्या प्रवाहात जो पडला तो पावला!_

              _*अशी कल्याणकारी सार्वजनीन धर्मगंगा सर्वांना मिळो! सर्वांचे भले होवो! सर्वांचे मंगल होवो! सर्वांनाच विशुद्ध विमुक्ती प्राप्त होवो!*_


*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_संदर्भ :- जागे पावन प्रेरणा_*

*_संकलन :- महेश कांबळे_*

*_दिनांक :- २८/१०/२०२२_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2022/10/blog-post_28.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

No comments:

Post a Comment

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...