Sunday, 30 October 2022

निःसंदेह बुद्ध होणार

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_निःसंदेह बुद्ध होणार_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

                 _फार प्राचीन काळची कथा आहे. *प्रत्यंत प्रदेशातील एक नगर, त्या काळी प्रत्यंत प्रदेश, सीमावर्ती प्रदेशाला म्हणत. ज्या ठिकाणी एका राज्याची सीमा संपते व दुसऱ्या राज्याची हद्द सुरू होते तो भाग.*_

                _अशा प्रत्यंत प्रदेशातील हे अत्यंत रमणीय नगर, नावही होते रम्य. आज या नगरात मोठी धावपळ आहे. लोकांनी आपली घरे झाडून पुसून स्वच्छ केली. आहेत. सारवण-रंगरंगोटी करून सुशोभित केली आहेत. घराघराच्या दरवाजांवर आम्रवृक्षाच्या हिरव्यागार पानांची, रंगीबेरंगी फुलांची तोरणे बांधली आहेत. कुठे केळफुले तर कुठे केळ्यांचे लोंगर लोंबत आहेत. पाण्याचे कलश भरून त्यावर नारळ ठेवले आहेत. नारळांच्या खाली गर्द हिरव्या रंगाची आंब्याची पाने आणि हिरव्यागार दुर्वांची हिरवळ त्यांची शोभा वाढवीत आहे. गृहिणींनी उल्हसित अंतःकरणांनी आपापले अंगणात चौक सजविले आहेत. सडा संमार्जने करून रंगीबेरंगी कलात्मक रांगोळ्यांचे उत्कृष्ट नमुने मांडले आहेत._

                    _नगरातील सार्वजनिक चौकात मंडप उभारला गेला आहे. विमल, कोमल, नील नवल उत्पल - पुष्पांनी तो सुशोभित केला गेला आहे. पाच प्रकारच्या मांगलिक लाजलावा - लाह्या भूमीवर पसरल्या आहेत. मंडपावर पांढऱ्याशुभ्र तलम वस्त्राचे छत लावले आहे. त्याच्या चारही बाजूंना सुंदर सुगंधित पत्रपुष्पांच्या माळा बांधल्या आहेत. नाना रंगाचे छोटेमोठे ध्वज व पताका लावल्या गेल्या आहेत. नगराच्या लहानसान गल्लीबोळातील रस्त्यावरही विविध रंगाच्या ध्वज पताका लावल्या आहेत. *सर्व रस्ते विविध रंगाचा गुढ्या तोरणांनी सजविलेले आहेत.*_

                  _लहान मुले मुली, किशोर-किशोरी, तरुण-तरुणी सर्व आपापल्या मनपसंत एकाहून एक सुंदर अशा वस्त्राभूषणांनी नटले आहेत. नगरातील सर्व स्त्री पुरुष आकर्षक पोशाख व अलंकार घालून सुसज्ज झाले आहेत. जणु काही एकाद्या मंगलमय उत्सव समारंभाची तयारी होत आहे._

                 _आदल्या रात्रीच जोराचा पाऊस पडला होता. त्यामुळे नगराबाहेरील एक कच्ची सडक उध्वस्त झाली होती. तिच्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले होते.. काही खड्यातुन पाणी साचले होते व रस्त्यावर ठिकठिकाणी चिखल झाला होता. पुष्कळसे लोक खडी आणि सुकी माती आणून रस्ता दुरुस्तीच्या कामात मग्न होते._

                 _"आपल्या शहरात आज कुठला उत्सव साजरा होणार आहे का?" नगरात आलेल्या एका नवागताने रस्ता दुरुस्त करणाऱ्या लोकांपैकी एकाला विचारले._

               _“हां भाई! स्वागत समारंभ आहे. मला वाटते, तुम्ही परदेशी आहात, इथे नवीनच दिसताहात. तुम्हाला ठाऊक नाही. आमच्या सौभाग्याने *या प्रत्यंत प्रदेशात भगवान दीपंकर बुद्धांचे आगमन होत आहे. आपल्या भिक्षुसंघासमवेत आमच्या या रम्य नगराबाहेरील सुदर्शन नावाच्या महाविहारात उतरले आहेत.* नगरातील प्रमुख लोक त्यांचे काल दर्शन घेऊन आले आणि आज त्यांना इथे भोजनासाठी निमंत्रण देऊन आले आहेत. सारे शहर त्यांच्या स्वागताची तयारी करण्यात मग्न आहे. तेथे त्या मोठ्या मंडपात भोजनदानाचे सामूहिक आयोजन आहे. लोक त्यांना बोलावण्यासाठी गेले आहेत. ते आता एवढ्यातच येथे येतील. या चिखलाने भरलेल्या रस्त्याची दुरुस्ती आम्ही लौकर करीत आहोत कारण या रस्त्यावरून भगवान बुद्धांना व त्यांच्या भिक्षूसंघाला पायी चालतांना कसलाही त्रास होऊ नये._

             _"काय म्हणतां बुद्ध? काय खरंच कोणी व्यक्ती बुद्ध बनला आहे?" तरुण तपस्व्याने विस्फारित डोळ्यांनी विचारले._

            *_हा भाई, भगवान दीपंकर सम्यक सम्बुद्ध बनले आहेत. तुम्हाला ही गोष्टसुद्धा कळली नाही? खरंच तुम्ही अपरिचित नवागत आहात."_*

                 _आणि तो खरंच अपरिचित होता. एका दूर देशात राहणारा. *मध्य देशातील अमरावती नावाच्या नगरांत एका अत्यंत श्रीमंत घराण्यात ब्राह्मण कुलात जन्मलेला सुमेध.*  अनेक जन्मांच्या संस्कारांमुळे बाल्यावस्थेपासूनच सांसारिक प्रापंचिक सुखभोगांविषयी उदासीनता जागली. युवावस्या प्राप्त होताच *वारसाहक्काने मिळालेली सारी धनसंपत्ती लोकात वाटून स्वतः गृहत्यागी बनला आणि सुदूर हिमप्रदेशातील धम्मिक नावाच्या पर्वतावर तपस्या करण्यासाठी निघून गेला. तिथे तपस्या करता करता आठही लोकिय ध्यानसमाधि अवस्था प्राप्त झाल्या. पाचही अभिज्ञान ऋद्धि प्राप्त झाल्या. आपल्या ऋद्धिबलाच्या सामर्थ्यावरच तो आज इथे पोहोचला होता.*_

                _त्याला हे ऐकून सुखद आश्चर्य वाटले की इहलोकी दीपंकर नावाचे सम्यक् सम्बुद्ध उत्पन्न झाले आहेत. त्याचे सारे शरीर पुलकित झाले. अंगावर रोमांच उभे राहिले._

                _*एक बुद्ध व दुसरा बुद्ध यामध्ये एवढा प्रचंड कालावधी असतो की बहुतांश लोक बुद्ध शब्दही विसरून जातात. म्हणून हा शब्द ऐकणेही कठीणच होत असते. वस्तुतः कुणाला बुद्धत्व प्राप्त होणे आणि अशा कुणा बुद्धाची प्रत्यक्ष भेट होणे ही फार मोठ्या भाग्याची गोष्ट आहे. आज बुद्धाचे प्रत्यक्ष दर्शन होणार या विचारानेच युवा तपस्वी सुमेध अतिशय आनंदी झाला.*_

                  _रस्ता दुरुस्ती करणाऱ्या नागरिकांना त्याने हात जोडून प्रार्थना केली. " रस्त्याचा थोडासा भाग दुरुस्त करण्याचे काम माझ्या स्वाधीन करावे या असमतल भूमीला मी समतल करतो. यावरील चिखल दूर करतो. ओला रस्ता सुका करतो. भगवानांना चालण्यासारखा करतो. या पुण्यमय सेवाकार्यात मलाही भागीदार होण्याची संधी द्या."_

                 _*तपस्वी सुमेधाचे व्यक्तीत्व फार भव्य होते. उंच सडपातळ शरीर, गौर वर्ण, विशाल तेजस्वी डोळे, रुबाबदार चेहेरा आणि डोक्यावर काळ्याभोर केसांच्या लांब जटा. शरीरावर वल्कले, काखेत मृगचर्म आणि हातात कमंडलू. लोक त्याच्या भव्योदात्त आकर्षक व्यक्तिमत्वाने प्रभावित झाले. त्याची विनंती नाकारू शकले नाहीत.*_

                 _सुमेध भावविभोर होऊन रस्तादुरुस्तीच्या कामाला लागला. त्याने लोकांकडून एक घमेले घेतले. शेजारची सुकी माती आणून ओल्या चिखलांत टाकू लागला. त्याच्या तेजस्वी चेहेऱ्यावर धर्म बिंदू चमकू लागले. नवोदित सूर्य किरणांमध्ये ते मोत्यांप्रमाणे तेजस्वी दिसू लागले. बुद्धाच्या आगमनाचे चिंतन करताकरता त्याच्या मनात आनंदलहरी उसळू लागल्या व प्रफुल्लित होऊन उत्साहाने आपल्या कामात दंग झाला._

              _एवढ्यात लोक समूहात प्रचंड हर्षध्वनी उठला. भन्ते भगवानांचे आगमन होत आहे. *'बुद्धं सरणं गच्छामि'* चा मंजुळ मंगलघोष निनादला. तपस्वी सुमेधाचे तनमन आनंदाने पुलकित झाले. *खरोखर भगवान दीपंकर बुद्ध समोर आहेत. मंद गतीने, मोजकी ताळमेळ साधणारी पावले टाकीत जवळ जवळ येत आहेत.* डोळ्यांतून करुणेची अजस्त्र अमृतधारा वाहत आहे. *तपस्व्याला केवळ दर्शनानेच धन्य-धन्य वाटले. पण तेवढ्यात त्याच्या लक्षात आले की, रस्त्याचा थोडासा भाग अजून दुरुस्त करायचा आहे. तिथे ओलावा आहे. चिखल आहे. भगवान आणि त्यांच्या भिक्षुसंघाला त्या चिखलातून चालावे लागणार. हे तर फार अयोग्य आहे. त्याने तात्काळ त्या चिखलभऱ्या रस्त्यावर आपले मृगाजिन टाकले. भगवान व भिक्षुसंघ त्यावर पाय ठेवून पुढे येतील. पण पुन्हा त्याने रस्त्याकडे नजर टाकून पाहिले. चार हात जागा अजूनही चिखलाने भरलेली आहे. सुमेधाने विचार केला, माझे हे शरीर काय कामाचे ? याहून त्याचा अधिक चांगला उपयोग काय होणार? म्हणून तो त्या चिखलाने भरलेल्या रस्त्यावर झोपला आणि आपल्या केसांच्या जटा पसरल्या. भगवान व भिक्षुसंघ माझ्या जटांवरून, शरीरावरून चालतील. माझे शरीर ठेचले-चेचले तरी चालेल पण त्यांच्या पायाला चिखल लागता कामा नये.*_

                _*आणि अशा रीतीने पडल्या पडल्या सुमेध तापसी विचार करू लागला. 'मी ध्यानसमाधि अवस्थांची उच्च स्थाने प्राप्त केली आहेत. खरोखर माझ्याकडे पुरेशी पूर्व पुण्याई आहे, अन् आता तर प्रत्यक्ष भगवान बुद्धांचे सान्निध्य प्राप्त झाले आहे. त्यांच्याकडून विपश्यना मुक्तीदायिनी साधना शिकून थोड्याशा परिश्रमांनी नितांत विमुक्त अवस्था प्राप्त करू शकतो. पण त्यामुळे केवळ माझीच मुक्ती होईल. एवढ्याचसाठी पुरुषार्थ करावा काय ? छे! ही तर मोठी तुच्छ, स्वार्थी, लहानशी गोष्ट होणार. मला केवळ माझ्या मुक्तीसाठी प्रयत्न करणे योग्य नाही. मला अधिक परिश्रम करून या भगवान दीपकरांप्रमाणेच सम्यक् संबुद्ध बनले पाहिजे. भले त्यासाठी प्रदीर्घ कालावधी लागो. अनेक कल्प लागोत. भले त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागो. परंतु या प्रकारे सम्यक् संबोधि प्राप्त झाल्यावर मी अनेकांना मुक्तीप्राप्तीसाठी सहाय्यक होईन. आणि सम्यक् सम्बोधि प्राप्त करण्यासाठी अनेक पुण्यसंग्रहाचे पारमितांचे परिमाण अधिक समर्थ होण्यासाठी जो दीर्घ कालावधी लागेल त्या काळातही अगणित लोकांना धर्ममार्गाकडे प्रवृत्त करून पुण्यसंपादन करीन. मला याच जीवनात मुक्ती नको. मला सम्यक सम्बुद्ध बनायचे आहे"*_

                 _तोपर्यंत भगवान दीपंकर बुद्ध अगदी नजिक आले. त्यानी खाली तोड़ करून झोपलेल्या तापसी सुमेधकडे पाहिले. *'चेतोपरिञ्ञाण' या सिद्धीच्या सहाय्याने आपल्या मनोबलाने त्याची अवस्था जाणली आणि मंद स्मित केले. त्रिकालज्ञ भगवानांनी त्या युवा तपस्व्याचा भूतकाल पाहिला. याच्याजवळ अनेक कल्पांच्या संचित पुण्याचा विपुल साठा आहे. या गृहत्यागी माणसाने मनुष्य जीवनही सार्थक केले आहे. कठीण परिश्रमांनी आठही ध्यानावस्था प्राप्त करून घेतल्या आहेत. यावेळी याला विपश्यना साधना मिळाली तर अल्प काळातच ही व्यक्ती भवमुक्त अरहंत अवस्था प्राप्त करून घेईल. भगवानांनी पाहिले की ही व्यक्ती यावेळी अनेकांच्या हितसुखासाठी आपली आशुमुक्ती आनंदाने त्यागण्यासाठी दृढसंकल्प करीत आहे. आगामी असंख्य कल्पांपर्यंत या पारमितांना फार मोठ्या प्रमाणावर आणखी अधिक परिपुष्ट करण्याचा याचा दृढ संकल्प आहे. हा संकल्प केवळ भावावेशात येऊन केलेला नाही. लोककल्याणासाठी दीर्घकाळ परिश्रम करण्याची शक्ति याच्यामध्ये आहे. तेव्हा भगवानांनी त्याचा भविष्यकाळ पाहिला आणि स्मित हास्य केले. सुमेधाच्या डोक्याजवळ उभे राहून त्यांनी ही मंगल आशीर्वाद देणारी उद्घोषणा केली.*_

                 *_“भिक्षूंनो! हा जो जटाधारी उग्र तपस्वी चिखलात खाली तोंड करून पडला आहे हा अत्यंत श्रद्धावान आहे. दृढनिश्चयी आहे. याने यावेळी जो दृढनिश्चय केला आहे तो याच्यासाठी बोधि बीज बनला आहे. हा बुद्धांकुर बोधिसत्त्व अदम्य उत्साहाने जन्मजन्मांतरात आपल्या पुण्यपारमितांना अत्यंत पुष्ट करीत करीत, अनेक प्राण्यांना धर्मपथावर प्रेरणा देत राहील व चार असंखेय्य आणि एक लाख कल्प पूर्ण झाल्यावर सिद्धार्थ गौतम नावाचा सम्यक् सम्बुद्ध होईल."_*

                _भगवानांनी आशीर्वादमय उजवा हात उचलला आणि मेघ गर्जनेसारख्या गंभीर वाणीने ते म्हणाले, *‘धुवं बुद्धो भविस्ससि' निःसंशय हा बुद्ध बनेल.*_

         _साऱ्या वातावरणात ही बुद्ध वाणी निनादली. लोकलोकान्तरातील असंख्य चक्रवालवासीयांच्या मुखावाटे या बुद्धवाणीचा प्रतिध्वनी उमटला..._ 

*'धुवं बुद्धो भविस्ससि'! 'धुवं बुद्धो भविस्ससि'!! 'धुवं बुद्धो भविस्ससि' !!!_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_संदर्भ :- जागे पावन प्रेरणा_*

*_संकलन :- महेश कांबळे_*

*_दिनांक :- ३०/१०/२०२२_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2022/10/blog-post_30.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

No comments:

Post a Comment

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...