🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_पुक्कुसाति कथा_*
*_३. मित्रता सफल झाली_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
_*नगराबाहेर भार्गव कुंभाराचे एक लहानसे घर.* कुंभाराला मातीची भांडी तयार करण्यासाठी फार मोठ्या प्रमाणावर मातीची आवश्यकता असते. म्हणून गावाबाहेर जिथे अशी सोय असते तिथे त्याचा निवास असणे स्वाभाविक असते. *भार्गव हे कुंभाराचे नाव होते की त्याचे गोत्र होते माहित नाही. पण लोक त्याला त्या नावाने हाक मारीत. आज ज्या प्रमाणे कुंभाराला प्रजापती या नावाने हाक मारतात त्याप्रमाणे त्या काळी भार्गव नावाने हाक मारीत असावेत. कारण प्राचीन साहित्यात आपल्याला एकाहून अनेक भार्गव कुंभारांचा उल्लेख आढळतो.*_
_काय असेल ते असो हा भार्गव कुंभार अतिशय श्रद्धाळू आहे. साधू-संतांची सेवा करणे व सत्संगात राहणे त्याला आवडते. त्यांच्या सुखसोयीसाठी त्याने घरानजिक एक विश्रामधाम बांधले आहे. कुंभारशाला या नावे ते प्रसिद्ध आहे. या ठिकाणी यात्रेकरू, साधू-संन्यासी एक दोन दिवस रहातात. कधी भगवान बुद्ध तर कधी सारिपुत्र इत्यादी त्यांचे शिष्य रात्रीच्या निवासासाठी या कुंभाराच्या विश्रामशाळेत थांबले आहेत. आजदेखील भगवान बुद्ध सूर्यास्तानंतर या कुंभाराकडे आले आहेत आणि त्याला विचारत आहेत, “भार्गव कुंभार, मी तुझ्या विश्रामशाळेत आजची रात्र राहू का ? तुला त्रास नाही ना होणार ?"_
_'नाही, भन्ते भगवान! ही तर माझ्या असीम पुण्यलाभाचीच गोष्ट आहे. कुंभार शाळेचे दालन फार मोठे आहे. त्यात एकाचवेळी अनेक लोक आराम करू शकतात. परंतु आत्ताच काही वेळापूर्वी मी एका श्रमणाला तेथे राहण्याची अनुमती दिली आहे. त्याला विचारावे, त्याची हरकत नसेल तर भगवानांनी सुखाने राहावे!"_
_भगवान कुंभारशाळेत गेले. पाहिले तो फाटकी भगवी वस्त्रे परिधान करून एक श्रमण बसला आहे. गौर वर्ण, उन्नत भाल प्रदेश, विशाल नेत्र, लांब सरळ नाक, डोक्याचे, दाढी मिशांचे कापलेले केस दोन दोन बोटे वाढलेले. योयाप्रमाणे भरदार रुंद छाती. बळकट सुगठीत हातपाय. सारे भव्य-दिव्य व्यक्तिमत्व आहे. भगवान त्याच्याकडे पाहून हसतात व विचारतात, "भिक्षु, या दालनात मी तुमच्या समवेत एक रात्र घालवू का? तुम्हाला त्रास नाही ना होणार ?"_
_"नाही, आयुष्मान, जरा देखील नाही. कुंभारशालेचे हे दालन फार मोठे आहे. मोठ्या आनंदाने इथे रात्र घालवा. मला फक्त मांडी घालून बसण्यापुरती जागा हवी आहे. तुम्ही खुशाल रहा. "_
_तृणासन [चटई] पसरून भगवान एका बाजूला बसले आणि ध्यानमग्न झाले. पूर्वी आलेला भिक्षुही ध्यानसाधनेस बसला आणि लौकरच चवथ्या ध्यान समापत्तीमध्ये समाधिस्थ झाला._
_हळू हळू रात्र संपत गेली. रात्रीचा पहिला प्रहर संपला, दुसरा प्रहर संपला, आता तिसरा सुरू झाला. पौर्णिमा होती. सारी रात्र आकाशात चांदणे पसरले होते. पृथ्वीच्या प्रांगणात चांदण्याची बरसात होत होती. उघड्या खिडकीतून चांदणे दालनातही पसरत होते. *भगवान बुद्ध व भिक्षु दोघांनाही चंद्र किरणांचा स्पर्श होत होता. भगवान तर स्वतः बोधिरश्मीने प्रभास्वर होतेच, भिक्षुचा चेहेरा देखील ध्यानसमापत्तीच्या प्रभेने उज्ज्वल दिसत होता.* चंद्राचे पांढरेशुभ्र चांदणे त्या दोघांच्या चेहेऱ्यांना अधिक उजाळा देत होते. भिक्षु बराच वेळ निश्चल अधिष्ठानात बसून राहिला. तिसऱ्या प्रहरात त्याने डोळे उघडले. भगवानांनी त्याच्याकडे पाहिले आणि स्मित केले. त्यांनी विचारले, “भिक्षु, तू कोणाच्या आश्रयाने गृहत्यागी झाला आहेस ? तुझा शास्ता आचार्य कोण आहे? कोणाकडून उपदेशित धर्मात तुला रुची आहे?" भिक्षूने उत्तर दिले, ' आयुष्मान, या लोकी सम्यक् सम्बुद्ध उत्पन्न झाले आहेत, ज्यांची किर्ती सर्वत्र पसरली आहे, मी त्या शाक्यमुनी भगवान गौतम बुद्धांच्या आश्रयाने घर सोडून बेघर झालो आहे. तेच माझा शास्ता आहेत. त्यांनी उपदेशिलेल्या धर्मात मला रुची आहे. "_
_पुन्हा स्मित हास्य करीत त्यांनी विचारले, “भिक्षु, तू या आपल्या शास्त्याला कधी पाहिलं आहेस का ? आणि त्याला पाहिलंस तर ओळखशील का ?"_
_"नाही आयुष्मान मी ओळखू शकणार नाही. मी त्यांना कधी पाहिले नाही."_
_"यावेळी तुझा शास्ता कुठे आहे ?" "इथे आल्यावर कळले की, ते श्रावस्तीच्या जेतवनात विहार करीत आहेत. रस्त्यात मी जेतवनाच्या समोरून आलो पण तेव्हा मी समजत होतो की, त्यांना मगधदेशात संबोधि प्राप्त झाली म्हणून ते मगधातच विहार करीत आहेत. आता पुन्हा त्यांना भेटण्यासाठी पंचेचाळीस योजने श्रावस्तीकडे जावे लागेल."_
_*भगवान पुन्हा हसले. त्यांनी आपल्या बोधिचित्ताने पाहिले की भिक्षूचे जीवन फारच थोडे शिल्लक उरले आहे. सूर्योदयानंतर काही वेळानेच ह्याला मृत्यू आहे. माझ्यासाठीच हा प्रव्रजित झाला आहे. अतिशय योग्य पात्र आहे. अनेक जन्मांच्या पूर्वपुण्याईचा धनी आहे. विपश्यना शिकविली तर आत्ताच विमुक्तीच्या उच्च अवस्थेला जाईल. म्हणून त्यांनी मोठ्या करुणचित्ताने सांगितले, "हे भिक्षु! एकाग्रचित्ताने ऐक! मी तुला धर्मदेशना देत आहे."*_
_भगवानांच्या वाणीत असे काही आकर्षण होते की तो नाही म्हणू शकला नाही._
_तो म्हणाला, "फार छान, आयुष्मान्!" आणि एकाग्र चित्ताने तो त्यांची कल्याणकारी वाणी ऐकू लागला._
_*पूर्वजन्मीच्या अभ्यासामुळे सुवर्ण पत्रावर आनापान साधनेचे वर्णन वाचूनच तो स्वतः चौथ्या ध्यान समापत्तिच्या अवस्थेपर्यंत पोहोचला होता. भगवानांनी आता त्याला धातूंचा विभंग समजावून विपश्यनेच्या गहराईत उतरविले.*_
*_पृथ्वी, अग्नी, जल, वायु, आकाश ही पांच भौतिक तत्वे आहेत आणि विज्ञान हे एक मानसिक तत्व आहे. या सहांचा समुच्चय म्हणजे मनुष्य होय. या सहा मूलतत्वांचे विभाजन करून त्यांच्या स्वभावधर्माला अनुभूतीच्या पातळीवर समजून घेणे म्हणजे 'धातु-विभंग' आहे. या सहा तत्वांखेरीज डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा आणि विज्ञान [मानस] या सहा इंद्रियांद्वारे आपापल्या विषयांच्या संस्पशनि उत्पन्न होणाऱ्या सुख-दुःखद किंवा असुखद-अदुःखद संवेदनांच्या अठरा प्रकारच्या अनुभूतीत विचरण करणाऱ्या स्वभावाचे विभाजन करून पाहणे; यांना मी, माझे किंवा माझा आत्मा न मानता मिथ्या 'अहं'च्या भ्रांतीजनक मरिचिकेतून, अहंच्या मृगजळातून आणि मिथ्यामान्यतेच्या गुलामीतून मुक्त होणे हीच 'विपश्यनेची' विभंग साधना आहे. या साधनेच्या सहाय्याने निरंतर अनित्य बोधाच्या संप्रज्ञानामध्ये अधिष्ठित रहाणे म्हणजे स्थितप्रज्ञ होणे. इंद्रिय जगतातील अनित्य व इंद्रियातीत नित्य स्वभावाच्या सत्याचे स्वानुभवाने ज्ञान करून सतत सत्यात अधिष्ठित राहणे, खोट्या अहंभावामुळे उत्पन्न होणाऱ्या राग, द्वेष, आणि मोह यासारख्या विकारांच्या त्यागात सतत स्थिर राहणे आणि विकारमुक्तिद्वारा प्राप्त चित्ताच्या शांतीमध्ये अधिष्ठित राहणे हेच धातु विभंग उपदेशाचे चार प्रमुख उद्देश्य आहेत._*
*_भगवानांनी जसजसे ह्या उपदेशातील बारकावे समजावून दिले तसतसा पुक्कुसाति लोकीय ध्यानास संप्रज्ञानाशी संलग्न करून लोकोत्तर ध्यानात बदलत गेला. आता त्याची समाधी केवळ ध्यान समापत्तिपर्यंतच सीमित राहिली नाही. संप्रज्ञानाच्या विपश्यनासाधनेद्वारे अधोगतीकडे जाणाऱ्या संपूर्ण संस्कारांचा क्षय करून घेऊन त्याने पाहिले स्रोतापत्तिचे निर्वाणफल अनुभवले आणि त्यानंतर सकदागामीची फलसमापत्ति अनुभवली._*
_*भगवान समजावून देत होते आणि त्या समवेतच मैत्रीधातु, धर्मधातु आणि निर्वाणधातु यांनी वातावरण तरंगित करीत होते. श्रद्धाशील पुक्कुसाति केवळ उपदेश ऐकतच नव्हता तर आतल्या आत विपश्यना प्रज्ञेच्या सहाय्याने सघन सत्याचे विच्छेदन करीत उरल्या सुरल्या कर्म संस्कारांचे निःसारण-उच्छेदन करीत जात होता.*_
_रजनीकांत निशाकर आपली रुपेरी किरणे एकत्र करून पश्चिम क्षितिजीवर अस्ताला जात होता. भुवन भास्कर आपली स्वर्ण-किरणे विकिर्ण करीत पूर्व क्षितिजावर उदयास येत होता. याचवेळी *पुक्कुसाति भगवानांच्या महाकारुणिक धर्मतरंगलहरींच्या सहाय्याने विपश्यनेच्या सूक्ष्मतम सखोलतेकडे वेगाने जात होता. एकाएकी त्याला चौथ्या ध्यानसमाधीबरोबरच पहिल्या निरोध समापत्तिची निर्वाणिक अनुभूती आली. तो अनागामी फललाभी झाला!* या निरोध समापत्तीतून तो कृतज्ञता विभोर होऊन उठला. असली मुक्तीदायिनी विपश्यना भगवान बुद्धांव्यतिरिक्त आणखी कोणी शिकवू शकणार नाही. अवश्य हे भगवान बुद्धच आहेत हे विचार मनात येताच त्याच्या तोंडून भावपूर्ण आनंदोद्गार बाहेर पडले._
_"ओ हो! मला माझ्या शास्त्याची प्राप्ती झाली. सुगत मिळाले. सम्यक सम्बुद्ध मिळाले," असे म्हणत पुक्कुसातिने आपले डोके भगवानांच्या पायी ठेवले. नंतर *उजवे उत्तरासंग म्हणजे अंगावरील वस्त्र डाव्या खांद्यावर घेतले. [हा त्या काळातील सन्मानदर्शक रिवाज होता]* व हात जोडून म्हणाला,_
_'भगवान भन्ते! न कळत माझ्याकडून फार मोठा अपराध झाला. मी माझ्या अज्ञानावस्थेत मूढावस्थेत आपल्याला ओळखू शकलो नाही. म्हणून आपल्याला आयुष्मान संबोधन वापरले आणि अत्यंत अकुशल काम केले. *[पद वा वयाने लहान असलेल्या व्यक्तीसाठी त्या काळी आयुष्मान शब्दाचा उपयोग करीत.]* भगवान! मला माझ्या या अपराधाची क्षमा करा. भविष्यकाळात माझ्याकडून अशी चूक होणार नाही. "_
_*'भिक्षु ! नकळत झालेली आपली चूक तू स्वीकारली आहेस. तिचा योग्य प्रतिकार केला आहेस. आर्य, धर्म-विनयात हे प्रगतीचे लक्षण आहे जेव्हा कोणी आपली चूक कबूल करतो, त्याचा प्रतिकार करतो आणि भविष्यकाळात ती न करण्याचा संकल्प करतो. "*_
_“भगवान! मला आपल्याकडून उपसंपदा मिळावी. "_
_'भिक्षु, तुझ्याजवळ परिपूर्ण पात्र - चीवर आहे ?"_
_"नाही भन्ते, परिपूर्ण नाहीये."_
*_“भिक्षु ! अपूर्ण पात्र - चीवर असणाऱ्याला तथागत उपसंपदा देत नाहीत."_*
_तेव्हा आयुष्मान पुक्कुसातिने भगवानांच्या वचनाचे अभिनंदन केले. आपल्या आसनावरून उठून अभिवादन केले, प्रदक्षिणा घालून पात्र व चीवर यांच्या शोधासाठी नगराकडे निघाला._
_सूर्योदय होताच नगराचा दरवाजा उघडला. नगरातील काही नागरिक आणि भिक्षु बाहेर आले तो भार्गव कुंभाराच्या अतिथीशाळेत अकस्मात भगवान बुद्ध बसलेले पाहिले. त्यांनी भगवानांना सादर अभिवादन केले. काही लोक धावत पळतच बिम्बिसाराकडे गेले. तो देखील तात्काळ भगवानांच्या सेवेसाठी आला. भगवानांना पंचांग प्रणाम करून भार्गव कुंभाराच्या अतिथीशाळेत बसला._
_एवढ्यात बातमी आली की पात्रचीवराच्या शोधार्थ बाहेर पडलेला एक भिक्षु अपघातात मरण पावला आहे._
_*भगवान म्हणाले की ती व्यक्ती गंधारनरेश पुक्कसाति होती. आपल्या मित्राचा धर्मसंदेश मिळाल्यामुळे राज्य सोडून प्रव्रजित होण्यासाठी तो मगध प्रगत देशात आला होता. पुक्कुसाति समजूतदार होता. तो महान सत्यशोधक होता. जसजसा शुद्ध धर्म ऐकत गेला तसतसा स्थूल सत्याकडून सूक्ष्म सत्याकडे होत गेला. मुक्तीच्या मार्गाकडे वेगाने निघाला. धर्म समजून घेण्यात व धारण करण्यात कोणताच हेका धरला नाही, आडमुठेपणा दाखवला नाही. आजच्या रात्रीच त्याने विपश्यना साधनेच्या मदतीने अनागामी फल प्राप्त केले. त्यामुळे त्याची सारी अवरभागीय बंधने तुटून पडली. आता तो ओपपातिक ब्रह्मलोकात जन्मला आहे. तिथे साधना करीत अरहंत फळप्राप्ति करील. तिथे शरीर त्याग केल्यावर परिनिर्वाणलाभी होऊन सर्व लोकांच्या, भवचक्राच्या भ्रमणातून सर्वथा विमुक्त होईल.*_
_बिम्बिसार आपल्या न पाहिलेल्या मित्राच्या मृत्यूच्या वृत्ताने दुःखी तर झाला पण त्या दुःखाचे आनंदात परिवर्तन झाले. जेव्हा त्याने ऐकले की त्याचा मित्र अनागामी फल प्राप्त करून घेऊन मरण पावला. तेव्हा लौकरच त्याला वाटले की त्याचा धर्म संदेश अतिशय योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचला आणि तो भगवानांच्या व विपश्यना साधनेच्या संपर्कात आल्यामुळे यथोचित लाभाचा धनी झाला.._
_बिम्बिसारने भगवानांचे बोलणे ऐकून प्रसन्नता व्यक्त केली आणि तीनदा "साधु, साधु, साधु" म्हणून त्यांच्या चरणी वंदन केले._
_खरेच त्याची धर्ममैत्री सफल झाली, सार्थक झाली. त्याच्या मित्राचे मंगल-कल्याण झाले. असेच मंगल-कल्याण सर्वाचे होवो._
*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_संदर्भ :- जागे पावन प्रेरणा_*
*_संकलन :- महेश कांबळे_*
*_दिनांक :- २६/१०/२०२२_*
https://mikamblemahesh.blogspot.com/2022/10/blog-post_26.html
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
No comments:
Post a Comment