Tuesday, 25 October 2022

चालला त्यागुन राज्यसुख

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_पुक्कुसाति कथा_*

*_२. चालला त्यागुन राज्यसुख_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

                    _बिम्बिसारने हे पत्र एका रत्नजडित सोन्याच्या पेटीत ठेवून एकात एक अशा दहा बहुमूल्य पेट्यात बंद केले. वर लाखेची सीलबंद मोहर लावली. नंतर ते मूल्यवान वस्त्रांनी सजविले. एका मंगल हत्तीच्या अंबारीत ठेवून राजकीय पांढऱ्या शुभ्र छत्राने आच्छादित करून एका श्वेत ध्वजाने युक्त सैनिक तुकडीसह वाजतगाजत तक्षशिला नगरीस रवाना केले._

                    _रस्त्यावर वाळू पसरून टाकली. दोन्ही बाजूला गुढ्या तोरणे उभारली, स्वच्छ पाण्याचे कलश ठेवले आणि आपल्या नगर सीमेपर्यंत स्वतः त्यासमवेत पायी चालत गेला व यापुढे यात्रा नेणाऱ्यांना ही भेट तक्षशिलेपर्यंत अत्यंत सन्मानपूर्वक घेऊन जा व तेथे पोहोचल्यावर माझ्या वतीने माझ्या मित्राला हा संदेश द्यावा की अत्यंत एकांत स्थानी आदरपूर्वक हा संदेश उघडून वाचावा._

                      _*पुक्कुसातिने आपली भेट सार्वजनिकरित्या लोकांसमोर उघडून पाहण्याचा संदेश दिला होता कारण दोन्ही राजांच्या मित्रत्वाचा ठसा सर्वांच्यावर पडावा. बिम्बिसार आपली भेट एकांतात एकट्यानेच उघडून वाचण्याचा संदेश पाठवितो. बिम्बिसारला माहित होते की, पुक्कुसातिजवळ पूर्वसंचित पुण्याई असेल तर त्यामुळे तो हा धर्मसंदेश वाचून राज्यत्यागाचा विचार करील. अशा परिस्थितीत त्याचे कुटुंबीय, राजमंत्री, नगरातील सन्माननीय उपस्थित लोक त्याच्या उत्साहावर पाणी ओततील. म्हणून त्याच्यासाठी एकांतवासच कल्याणप्रद होईल.*_

                       _हजारो मैलाची प्रदीर्घ यात्रा पूर्ण करून हा शाही काफिला जेव्हा गंधार देशाच्या सीमेवर पोहोचला तेव्हा पुक्कुसातिने आपले मंत्रीगण पाठवून या राजकीय भेटीचे यथायोग्य स्वागत केले आणि तक्षशिलेपर्यंतची यात्रा मोठ्या उत्साहाने वाजत गाजत सन्मानाने केली. तक्षशिला राजधानीच्या सीमेवर स्वागतासाठी स्वतः पुक्कुसाति पोहोचला आणि राजमहालापर्यंत पायी चालून यात्रेत सामील झाला._

                     _मित्र बिम्बिसारच्या सूचनेनुसार त्याने हा अमूल्य पेटारा राजमहालाच्या एकांत कक्षात पोहोचविला. दरवाज्यावर एक रक्षक बसविला व एकांतात स्वतः आपल्या हातांनी उपहाराची पेटी उघडली. लाखेची राज्याची मोहर तोडली व पेटीतून पेटी काढत शेवटी रत्न जडित सोन्याची पेटी काढली व ती उघडल्यावर गोल गुंडाळलेले लांबच लांब सुवर्णपत्र अत्यंत आदराने बाहेर काढले._

                     _माझ्या मित्राने माझ्यासाठी धर्माची ही अमूल्य भेट पाठविली आहे. जी मध्यदेशसारख्या पवित्र भूमीमध्ये उपजली आहे. इथे मिळणे असंभवनीय आहे. म्हणून मोठ्या श्रद्धायुक्त अंतःकरणाने ते सुवर्णपत्र उघडून वाचण्यास सुरुवात केली. पाहू तर खरं! माझ्या मित्राचा धर्मसंदेश काय आहे?_

_पहिलीच ओळ होती,_

*_'इध तथागतो लोके उप्पन्नो।'_*

*_इथे या लोकात तथागत उत्पन्न झाले आहेत._*

                   _काय खरंच तथागत बुद्ध उत्पन्न झाले आहेत! मी खरंच का बुद्धकाळात जन्मलो आहे! केवळ या चिंतनानेच त्याच्या मनात प्रसन्नतेचा एक प्रबळ प्रवाह वाहू लागला आणि जेव्हा पुढे,_

_*“इतिपि सो भगवा - आदि” -*_

                 _या शब्दांमध्ये भगवानांच्या गुणांचे वाचन सुरू केले तर ते वाचता वाचता शरीराची अकरा हजार रोमरंध्रे पुलकित झाली. सारे शरीर रोमांचित झाले. सारे मन आनंदले. काही काळ तो अशा प्रसन्न विभोर अवस्थेत धुंद फुंद झाला. उभा आहे की बसलो आहे याचेही त्याला भान राहिले नाही. पुढील ओळी तो वाचूही शकला नाही. अशा भाव विभोर अवस्थेत बराच वेळ गेल्यावर जेव्हा भावावेश कमी झाला तेव्हा त्याने पुढे वाचण्यास सुरुवात केली._

_पुढे शुद्ध धर्म गुणांची व्याख्या होती._

*_“स्वाक्खातो भगवता धम्मो - आदि"_*

                _वाचता वाचता पुन्हा सारे तनमन पहिल्या प्रमाणेच फुलून शहारून गेले. पुन्हा तीव्र भावावेश जागृत झाला. पुन्हा काही काळ त्याची शुद्ध हरपली. काही वेळानंतर त्याचे मन शांत झाले तेव्हा पुढील संघाच्या गुणांच्या पंक्ती वाचल्या._

_*“सुप्पटिपन्नो भगवतो सावकसंघो...आदि!”*_

                   _हे वाचल्यावर पुन्हा तशीच अवस्था झाली. त्यानंतर पत्राचा चौथा भाग वाचू लागला. *त्यांत आनापान साधनेचे विवेचन होते.* ते वाचता वाचता शरीरात आणि मनात आनंदाची अशी धाराप्रवाह अनुभूती येऊ लागली की सहजच मनाची एकाग्रता साधली. अनेक जन्माचे पूर्वपुण्याईचे संचितामुळे समाधि अवस्था साधली. चित्ताने तात्काळ प्रथम ध्यानसमाधि अवस्था साधली, थोड्याच अवधीत पहिल्या अवस्थेतून दुसरी, दुसऱ्यातून तिसरी, तिसऱ्यातून चौथी अशी गहनतापूर्वक अवस्था त्याला प्राप्त झाली. बाह्य आलंबनांचे जरा देखील भान राहिले नाही. ही अवस्था बराच वेळ राहिली. *जरी विपश्यनेची उच्चावस्था प्राप्त झाली नाही तरी चौथ्या ध्यान-समापत्तीचा धर्मरसच एवढा अपूर्व होता की वारंवार तो त्याच अवस्थेचा अभ्यास करीत राहिला आणि त्या रसास्वादनात दोन आठवडे सहज गेले.*_

                 _दालनाच्या दारावर रखवालदार बसला होता. केवळ व्यक्तिगत सहाय्यकाखेरीज इतरांना प्रवेश बंद होता. पंधरा दिवसांपर्यंत देशाचा राजा राज महालाच्या राणीवंशात नव्हता की राजदरबारात नव्हता, न्यायालयात नव्हता की सेनालयात नव्हता. राज्यातील प्रमुख लोकांना चिंता वाटू लागली की राजाला अशी कोणती भेट मिळाली आहे की तो त्यातच रंगून राहिला आहे ?_

                  *_चौथ्या समाधि ध्यानानंतर शांत रसाच्या स्वानुभूतीने प्रभावित झालेल्या राजा पुक्कसातिला आपल्या मित्राचे अंतीम बोल आठवले. खरंच मला राज्य त्याग करून त्वरित अभिनिष्क्रमण केले पाहिजे. माझे सद्भाग्य आहे की याकाळात बुद्ध निर्माण झाले आहेत. त्यांच्या सान्निध्यात राहून संसार चक्राच्या सर्व दुःखातून मुक्त करणारी विपश्यना साधना शिकून मानवी जीवन सार्थक केले पाहिजे. कुणाला ठाऊक जीवन थोडेच शिल्लक असेल. हे माझ्या मित्राचे महान उपकार आहेत ज्याने मला ही कल्याणकारी सूचना पाठविली._*

                  _यासाठी जीवनमुक्त अरहंत होण्याच्या उद्देशाने भगवान बुद्धांनी सांगितलेल्या मार्गाने जाण्यासाठी त्याने राजसिंहासन, घरदार त्याग करण्याचा दृढ निश्चिय केला. आपल्या हातातील कृपाणाने डोक्याचे व दाढी मिशीचे केस काढले आणि सहाय्यक सेवकाकडून दोन भगवी वस्त्रे मागविली. एक अधोवस्त्र व दुसरे उर्ध्ववस्त्र बनवून अंगावर घेतले. एक मातीचे भिक्षा पात्र व लाकडाचा दंड मागविला. हातात घेऊन महालातून खाली उतरला._

                 _राजपरिवारातील लोक राजाला या वेषात ओळखू शकले नाहीत. त्यांना वाटले कोणी संन्याशी राजाला भेटायला आला असावा तोच आता परतला असेल. राजदरबारांतील राजपुरुषही त्याला ओळखू शकले नाहीत. पण जेव्हा स्वीय सहाय्यकानेच साऱ्या परिस्थितीचा वृत्तांत कथन केला तेव्हा राणी महालात आणि राजदरबारात एकच हाहा:कार उडाला. वणव्याप्रमाणे हे वृत्त साऱ्या नगरात पसरले. पुक्कुसातिसारख्या प्रजावत्सल राजाने राज्यत्याग केला. या वृत्ताने सारी प्रजा दुःखसागरात बुडाली. प्रजेवर प्रचंड वज्राघात झाला.. शोकमग्न, आकांत करणारे नगरवासी, राज्याचे शासनाधिकारी, राज कुटुंबातील माणसे, भिक्षुवेषधारी पुक्कुसातिच्या मागे लागली. क्रंदन करीत म्हणाले, 'महाराज! आपल्यावाचून आम्ही अनाथ होऊं."_

                    _पुक्कुसाति सांत्वनपर शद्बात म्हणाला, 'इथे अनेक योग्य व्यक्ती आहेत. त्या माझ्या अनुपस्थितीत राज्याचे प्रशासन योग्य प्रकारे सांभाळतील. अत्यंत कुशलतेने सर्वांचा सांभाळ करतील. '_

                     _मंत्र्यांनी त्याला समजाविण्याचा प्रयत्न केला, “महाराज, मध्यदेशचे राजे मायावी असतात. कपटी असतात. कुटील असतात. त्यांची कूटनीती - राजनैतिक चालबाजी छल-कपटांने भरलेली असते. कुणाला ठाऊक! या लोकी सम्यक सम्बुद्ध निर्माण झाले की नाही ? ही सारी फसवणूक-प्रवचनाहि असु शकेल. आपल्याला राज्यत्याग करायला लावून गंधार देश दुर्बल करण्याचा हा त्याचा उद्देश असावा. वेळ येताच हा देश गिळंकृत करण्याचा डाव असावा._

                   _“नाही, मंत्रीगण हो! माझ्या परममित्राविषयी अशा शंका व्यक्त करू नका. मगधाचे राज्य गंधार देशाहून खूपच दूर आहे. *मगध आणि गंधार देशांमध्ये कौशल, चेदिय, पांचाल, कुरु या सारखी सामर्थ्यसंपन्न गणराज्ये आहेत.* त्यांच्यावर अतिक्रमण केल्यानंतर गंधार देशावर सत्ता प्रस्थापित करता येईल. एरव्ही ते अशक्य आहे. हा न पाहिलेला मित्र माझा परमहितैषी आहे. भगवान मगध देशात विहार करीत आहेत हे त्याला माहित आहे. म्हणून तो स्वतः गृहस्थी जीवन जगूनही त्यांच्या सहवासाचा प्रदीर्घ लाभ घेऊ शकतो.._

                   _परंतु भगवान मध्यदेश सोडून इतक्या दूरवर विहार करण्यासाठी येणार नाहीत त्यामुळे मी त्यांच्या सान्निध्यापासून वंचित राहीन. म्हणून त्याने मला गृहत्याग करून त्यांच्या सहवासात राहण्यासाठी प्रोत्साहित केले आहे. मंत्रीगण हो ! माझ्या मित्राविषयी मिथ्या संशय व्यक्त करून दोषाचे धनी होऊ नका. तो माझे कल्याण इच्छिणारा सन्मित्रच आहे._

*_“बुद्धप्पादो दुल्लभो लोकस्मि"_*

                  *_राजमंत्रीहो! लोकात मूळात 'बुद्ध' निर्माण होणेच कठीण आहे. मी व माझ्यासारख्या अनेकांच्या सुदैवाने ही दुर्लभ घटना सुलभ झाली आहे. मला त्याला शरण जाऊ दे. अनेक जन्म मी मुक्तीच्या शोधात उगाचच व्यर्थ भटकलो आहे. आता मुक्ती प्राप्त करण्याची सुसंधी आली आहे. म्हणून मला या लाभापासून वंचित करण्याचा प्रयत्न करू नका."_*

                    _अशा रीतीने पुष्कळ प्रकारांनी समजावले तरी लोकांनी मानले नाही. रडत आक्रंदन करीत त्याच्यामागे जातच राहिले. तेव्हा पुक्कुसातिने निर्धारपूर्वक पावले उचलली. त्याने आपल्या हातातील दण्डाने एक रेषा काढली व म्हणाला, "मी गृहजीवनाचा त्याग केला आहे. परंतु अजूनदेखील तुम्ही मला राजा मानीत असाल तर ऐका. ही राजाची आज्ञा आहे. कोणीही या सीमारेषेचे उल्लंघन करू नये."_

                 _राजा पुक्कुसातिची दृढ निश्चयपूर्वक केलेली राजाज्ञा ऐकून हताश झालेले लोक आक्रोश करीत राजाज्ञेला नमस्कार करून नगरात परतले. गृहत्यागी भिक्षु पुक्कुसाति गंधारहून मगधाकडे जाणाऱ्या राजमार्गावरून पायी प्रवास करू लागला._

                    _तक्षशिलेहून राजगिरीचा रस्ता फार लांबचा होता. पण भूतपूर्व गंधार नरेश एक सामान्य भिक्षु बनून, दृढनिश्चयाने खंबीरपणे पावले टाकीत चालला होता. "भगवान बुद्ध आपल्या हातांनी आपले केस कापून भगवी वस्त्रे धारण करून निघाले होते. तेव्हा एकटेच सत्याचा शोध घेण्यासाठी चारिकेला निघाले होते. मीदेखील एकट्यानेच पदयात्रा करीन. त्यांनी पायात पायताणही घातले नव्हते. मी देखील अनवाणीच यात्रा करीन. त्यांनी कोणतेच वाहन वापरले नव्हते. मीदेखील कोणत्याच वाहनाचा उपयोग करणार नाही. त्यांनी डोक्यावर छायेसाठी पानेही वापरली नव्हती. मी देखील उघड्या डोक्यानेच प्रवास करीन. त्यांनी अयाचित जे मिळेल ते घेऊन यात्रा केली. तशीच मीही दान न मागता [ याचना न करता ] यात्रा करीन. दातवणासाठी सुद्धा कोणत्याही झाडाची डहाळी सुद्धा स्वतः तोडणार नाही. कोणत्याही जलाशयाचे पाणी स्वतः तोंड धुण्यासाठी वापरणार नाही. कुणी दिले नाही तर भोजनही ग्रहण करणार नाही."_

                    _या व्रतांचे अतूट संकल्प करून भिक्षु पुक्कुसातिने हळु हळु प्रगतीपथावर पावले टाकण्यास आरंभ केला. तक्षशिलेहून राजगिरीची यात्रा केवळ दूरच नव्हती तर दुर्गमही होती. राजमहालाच्या सुखसोयीत व वैभव विलासात जन्मलेला, वाढलेला पुक्कुसाति खडतर खडकाळ जमिनीवरून अनवाणी पावले चालला आहे. चालता चालता जखमा झाल्या आहेत. पायाची सालटी निघत आहेत. जखमात पू होत आहे. तो पू वाहत आहे. पायी चालण्याचे कष्ट तर आहेतच. या फोडांनी कातडी फाटलेली आहे, त्यामुळे वेदनांची तीव्रताही कमी नाही.._

                     _पुढे व्यापाऱ्यांचा एक काफ़िला चालतो आहे. मागे मागे पुक्कुसाति दृढ संकल्पाने पदयात्रा करीत आहे. खरेदी विक्रीच्या सामानाने भरलेल्या शेकडो बैलगाड्या समोरून चालल्या होत्या. त्यासमवेत रथासारख्या भव्य बैलगाड्यांची रांग होती. त्यांत काफिल्याचे मालक बसले होते. त्यांना आराम करण्यासाठी त्यात तक्के, लोड, झालर लावलेल्या गाद्या, पडदे इ. लावले होते. एकेका गाडीला पांढऱ्या रंगाचे दणकट बांध्याचे दोन दोन बैल जुंपले होते. त्यांची विशाल गोलाकर शिंगे सुंदर दिसत होती. आल्हाददायक रंगांनी ती शिंगे रंगविली होती. गळ्यात एक-एक घंटा बांधली होती. प्रत्येक बैलाच्या पाठीवर सुंदर कशिदा काढलेली रंगी बेरंगी झूल शोभत होती. त्या झुलेच्या कडेला लहान लहान घंटिका बांधलेली झालर शोभत होती. गाडीच्या चाकावरील आऱ्यांवरही घुंगरे बांधली होती. प्रत्येक रथाला जुंपलेले बैल आपली डोकी समतोलपणे हालवीत डुलत डुलत गाडी ओढत. ज्यावेळी या घंटा, घंटिका, घुंघरु याचा संमिश्र आवाज निर्माण होई, तेव्हा ही रुणझुणाहट मोठी चित्ताकर्षक वाटत असे. परंतु त्या मागून जाणाऱ्या भिक्षूचे त्याकडे लक्षही जात नव्हते. तो पायतळी नजर लावून आपली कष्टसाध्य यात्रा पायीच पूर्ण करीत आहे._

                   _सूर्यास्त होताच काफिला कुठे तरी थांबतो. मालकांसाठी खूप सुंदर आरामदायी व अन्य लोकांसाठी सर्व साधारण तंबू उभारले जातात. रात्री त्यांना त्यात विश्रांती घ्यायची असते. परंतु भिक्षू त्यांच्याजवळ जात नाही. काहीशा दूरअंतरावर एका वृक्षाखाली मांडी घालून बसतो. जखमी पाय धुण्यासाठी पाणी नाही. दुखऱ्या पाठीवर हळुवारपणे फिरणारा हात नाही. साधन नाही. परंतु *आनापान साधनेची उपाय योजना करीत अर्पणा समाधीकडे जात जात पहिल्या ध्यानावस्थेतून चौथ्या ध्यानसमापत्तीत सामावून जातो. रात्रभर त्या ध्यान अवस्थेत मग्न  राहिल्यामुळे शरीराची सारी थकावट, कसर, दूर होत आहे. दुसऱ्या दिवशी पुन्हा ताजातवाना होऊन यात्रेस आरंभ करीत आहे.*_

                     _काफिल्यातील लोक आपली सकाळची न्याहरी आटोपून शिल्लक राहिलेला नाश्ता काही उष्टे पाष्टे भिक्षूच्या भिक्षापात्रात घालतात. भोजन कधी अर्धवट शिजलेले तर कधी फार शिजलेले. कधी कोरडे तर कधी पातळ, कधी अळणी तर कधी खारट. गृहत्यागी भिक्षूच्या झोळीत पडेल तेच स्वादिष्ट मानून आनंदाने ग्रहण करीत आहे. आणि केवळ एक वेळ आहार घेऊन दिवसभर यात्रा करीत आहे.._

                      _काफिल्यातील लोकांना जर कळले असते की, हा जो फाटका भिकारी आपल्या मागे मागे येत आहे तो गंधार नरेश पुक्कुसाति आहे, ज्याच्या कृपेमुळे आपल्याला तक्षशिला नगरीत आयात करात सूट मिळाली, आपला नफा कित्येक पटीने वाढला, तर श्रद्धाविभोर अंतःकरणाने कृतज्ञतेने भारावून जाऊन त्यांनी त्यांच्याजवळ असलेल्या सर्व सुखसोयी त्याला उपलब्ध करून दिल्या असत्या. परंतु पुक्कुसातिला त्याची मुळीच अपेक्षा नव्हती. त्याला तर एका श्रमणाचे श्रमसाध्य कष्टमय जीवन श्रेष्ठ दर्जाचे वाटत होते. या अतीव कष्टात त्याला विपुल मानसिक प्रसन्नता आणि अत्यानंद मिळत होता. या *प्रसन्नतेतच त्याने सुमारे १९२ योजन लांबीची दीर्घयात्रा पूर्ण केली.*_

                     _रस्त्यात काफिला श्रावस्ती नगरातून बाहेर पडला. नगराबाहेरील जेतवन उद्यानातील विहारासमोरून निघाला. पुक्कुसातिने ऐकले होते हा बुद्धाचा विहार आहे. पण त्याने विचार केला की, अनेक लोक 'बुद्ध' असल्याचा दावा विहार करतात. माझा त्यांच्याशी काही संबंध नाही. माझा कल्याणमित्र बिम्बिसार ह्याने ज्या भगवान बुद्धांविषयी लिहिले आहे तेच माझे बुद्ध आहेत व ते मगधाची राजधानी राजगिरी येथेच भेटतील. या विचाराने तो उल्हासित झाला व त्या उत्साहात त्याने *आणखी पंचेचाळीस योजन दूरची यात्रा पूर्ण केली.'*_

                     _जेव्हा राजगिरीला पोहोचला तेव्हा सूर्य मावळला होता. आणि राज्याच्या कठोर नियमानुसार नगराचे दरबाजे बंद केले गेले होते. प्रातःकालपूर्वी ते कोणालाही उघडले जात नसत. म्हणून त्याने राजधानी बाहेरच विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला. तिथेच त्याला अशी माहिती कळली की ज्या भगवान बुद्धांना भेटण्यासाठी तो आला आहे ते यावेळी जेतवनात विहार करीत आहेत. म्हणून त्याने निर्णय घेतला की एक रात्र येथेच घालवून उद्या भगवानांच्या दर्शनासाठी परतीच्या यात्रेला निघावे._

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_संदर्भ :- जागे पावन प्रेरणा_*

*_संकलन :- महेश कांबळे_*

*_दिनांक :- २५/१०/२०२२_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2022/10/blog-post_25.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

No comments:

Post a Comment

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...