🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_एकाग्रतेची शिकवणूक [समाधि ]_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
_शीलाच्या अभ्यासाने आपण शाब्दिक व शारीरिक कर्मावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करतो. पण *आपल्या दुःखाचे खरे कारण आपल्या मानसिक क्रियात असते.* आसक्तीने, द्वेषाने व दुष्ट विचाराने मन खदखदत असतांना फक्त आपल्या शाब्दिक व शारीरिक क्रियांवर घातलेले बंधन काय कामाचे ? अशा मनाच्या द्विधा अवस्थेत आपण आनंदी वा सुखी कसे होणार? कधी ना कधी आसक्ती वा द्वेष उफाळून वर येणारच. त्यामुळे आपला शीलभंग होऊन आपण आपले व इतरांचे नुकसान करणारच._
_अहितकारी कर्मे करणे हे योग्य नाही. हे नुसते बौद्धिक स्तरावर समजून उपयोगाचे नाही. *आजपर्यंत हजारो वर्षे प्रत्येक पंथाने शील सदाचाराची शिकवण दिली आहे. तरी सुद्धा जेव्हा मोहाचा क्षण येतो, तेव्हा मनावरील नियंत्रण सैल होते व शीलभंग होतो.* मद्यपान करणाऱ्यांना मद्य हे आपल्याला अपायकारक आहे हे पक्के माहित असते. पण जेव्हा अभिलाषा निर्माण होते, तेव्हा दारू पिऊन तो बेहोष होतोच. मनावर नियंत्रण नसल्यामुळे तो आपल्याला आवरूच शकत नाही. पण जेव्हा आपण मनाच्या अपायकारक, हानिकारक क्रिया आपल्या नियंत्रणात आणण्यास शिकतो, तेव्हा त्या प्रकारच्या शाब्दिक व शारीरिक क्रिया आपोआपच नियंत्रणात आणणे सोपे होते._
_*कोणत्याही समस्येचे मूळ आपल्या मनात असल्यामुळे आपण तिच्याशी मानसिक स्तरावरच सामना केला पाहिजे. आणि असे करण्यासाठीच आपण भावना केली पाहिजे. भावना याचा शब्दशः अर्थ 'मानसिक प्रगती' असा आहे. त्याचा सर्वसाधारण अर्थ ध्यानधारणा असा आहे. भगवान बुद्धांच्या काळातील 'भावना' या शब्दाचा खरा अर्थ काळाच्या ओघात, त्याचा अभ्यास कमी झाल्याने, अस्पष्ट झाला. अलिकडच्या काळात या शब्दाचा वापर सर्व प्रकारचा आध्यात्मिक, मानसिक व सांस्कृतिक विकास या अर्थाने केला जातो.* धार्मिक ग्रंथांचे वाचन करणे, प्रवचने देणे, धार्मिक चर्चा श्रवण करणे अथवा धर्म विचारांचे चिंतन करणे यासाठीदेखील या शब्दाचा वापर केला जातो. सर्व साधारणपणे इंग्रजी भाषांतरात हा शब्द फारच संदिग्धपणे वापरला जातो. त्यात मानसिक विश्रांती, दिवास्वप्ने, मुक्त मैत्री यापासून स्वतःच्या संमोहनापर्यंत सगळ्या गोष्टी येतात. हे सर्व अर्थ भगवान बुद्धांना अभिप्रेत असणाऱ्या अर्थापासून फारच दूर आहेत. *त्यांना ह्या शब्दाचा अर्थ मनाचा विशिष्ट व्यायाम व मनाच्या एकाग्रतेचा व शुद्धिकरणाचा सुयोग्य विधि असाच अभिप्रेत होता.*_
_*'भावना' या शब्दात दोन प्रकारच्या शिकवणुकीचा समावेश होतो. एक म्हणजे एकाग्रता वा समाधि व दुसरी म्हणजे प्रज्ञा. एकाग्रतेच्या अभ्यासालाच ‘मानसिक शांततेचा विकास' [समता-भावना] म्हणतात व प्रज्ञेला 'अंतर्दृष्टीचा विकास' [विपश्यना-भावना] असे म्हणतात. भावनेच्या अभ्यासाची सुरुवात आर्य अष्टांग मार्गाच्या दुसऱ्या भागात सांगितलेल्या एकाग्रतेपासून होते. एकाग्रता हीच आपल्या मानसिक क्रियांवर नियंत्रण आणणारी व आपल्याला आपल्या स्वतःचे मालक, नियंत्रक बनविण्यास शिकविणारी हितकारी क्रिया आहे. या शिकवणुकीतच सम्यक् प्रयत्न, सम्यक् सजगता [जागरुकता ] जाणीव आणि सम्यक एकाग्रता यांचा समावेश होतो.*_
*_सम्यक् प्रयत्न_*
_*योग्य प्रयत्न ही भावनेच्या अभ्यासाची पहिली पायरी आहे.* मन हे अतिशय वेगाने अविद्या, राग व द्वेष यांच्या नियंत्रणात वाहत जाते. त्यांच्या अधीन होते आपण त्याला एकाग्र व स्थिर करावयास शिकले पाहिजे. *स्थिर मन हे खऱ्या स्वभावाचा अतिशय सूक्ष्म स्तरावराचा अभ्यास करण्याचे. आपल्या मनावरचा परंपरागत पगडा घालवण्याचे, जुने संस्कार दूर करण्याचे अतिशय उपयुक्त असे साधन आहे.*_
_ज्या डॉक्टरांना रोग्याच्या आजाराचे निदान करावयाचे आहे. ते रोग्याच्या रक्ताचा नमुना घेऊन प्रथम तो सूक्ष्मदर्शकाखाली ठेवतात. रक्ताचे निरीक्षण करण्यापूर्वी डॉक्टर तो सूक्ष्मदर्शक प्रथम वरखाली करून त्याचा केंद्रबिंदू रक्ताच्या नमुन्यावर स्थिर करतात. नंतर त्या रक्ताची तपासणी करून, त्याचे योग्य निदान करून, रोगाचे कारण शोधून, रोग्यास योग्य ते औषध दिल्यावरच त्याला रोगमुक्त करणे डॉक्टरांना शक्य होते. त्याचप्रमाणे आपल्याला एखाद्या गोष्टीवर आपले मन केंद्रित करून स्थिर करावे लागते आणि मगच आपण त्याचा सूक्ष्मतम सत्य संशोधनाचे साधन म्हणून उपयोग करू शकतो._
_*भगवान बुद्धांनी मनाच्या एकाग्रतेसाठी त्यांच्याकडे येणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या माणसांना उपयोगी होतील असे वेगवेगळे अनेक मार्ग सांगितले आहेत त्यातल्या त्यात जो सर्वसामान्य लोकांना उपयोगी पडला व बुद्धांनी स्वतः ज्या विधिचा उपयोग केला तो आहे. 'आनापानसती-श्वासोच्छ्वासाची सजगता'.*_
_श्वासोच्छ्वास ही गोष्ट प्रत्येकाला अगदी सहज उपलब्ध असणारी आहे. कारण जन्मापासून मृत्यूपर्यंत आपण प्रत्येकजण सतत श्वासोच्छ्वास करीत असतो. म्हणूनच हे सार्वजनिक व सर्वमान्य असे ध्यानाचे साधन होऊ शकते. साधक हा सुरुवातीला आपल्याला सोईस्कर अशा आसनात मान-पाठ सरळ ठेवून बसतो व आपले डोळे बंद करून घेतो. त्याने ध्यानासाठी वर्दळीपासून दूर व एकांत अशा एखाद्या खोलीची निवड करावी म्हणजे मनाची एकाग्रता भंग होणार नाही. बाह्य जगातून आपले मन काढून त्याला अंतर्मुख करताना त्याच्या असे लक्षात येईल की, आपला श्वास ही सगळ्यात पट्कन लक्षात येणारी गोष्ट आहे. मग त्याला त्याच्यावर लक्ष केंद्रित करणे सहज साध्य होईल. नासिकेतून हवा आत कशी येते, ती बाहेर कशी जाते, याचे निरीक्षण करता येईल._
_*'आनापान' हा काही प्राणायामाचा अभ्यास नाही, तर हा जागृतीचा, सजगतेचा अभ्यास आहे. यात श्वासावर नियंत्रण करावयाचे नाही तर तो स्वाभाविक कसा आहे त्याबद्दल आपली सजगता वाढवावयाची आहे.* तो लांब [दीर्घ] आहे की आखूड [हस्व], जड आहे की हलका, हळुवार आहे की जोराचा याचे फक्त निरीक्षण करावयाचे आहे. त्यात मुद्दाम बदल घडवून आणावयाचा नाही. जेवढी शक्य आहे तेवढी अखंडता या निरीक्षणात आणावयास पाहिजे. सातत्य आणावयास पाहिजे. ही सातत्याची शृंखला भंग होणार नाही याबद्दल सतत सावधानता राखली पाहिजे._
_एकदा ध्यानास सुरुवात केली म्हणजे त्यात सातत्य आणणे किती अवघड आहे हे आपल्या लक्षात येईलच. श्वासावर आपले मन केंद्रित करता क्षणीच आपल्याला आपल्या दुखणाऱ्या पायाची वेदना जाणवू लागते. त्रास होऊ लागतो. खोडसाळ विचार बाजूला करण्याच्या प्रयत्नातच आपल्या लक्षात येते की एक विचार बाजूला केला की. बाकी हजारो विचार उफाळून डोके वर काढतात. जुन्या आठवणी, बांधलेले मनोरे, आशाआकांक्षा, भीती यापैकी एखादी गोष्ट वर उफाळून येते व बऱ्याच वेळाने श्वासापासून आपण पूर्णपणे भरकटलो आहोत याची जाणीव आपल्याला होते. पुन्हा आपण संकल्प करून श्वासोच्छ्वासावर लक्ष केंद्रित करावयाचे म्हटले तर थोड्यावेळातच आपणाला चकवून मन आपल्या नियंत्रणातून सुटून गेले आहे हे आपल्या ध्यानी येते. येथे आवर कोण घालणार? एखादा अवखळ मुलगा खेळतांना कसा एक खेळणे घेतो, कंटाळतो, मग दुसऱ्या खेळण्याकडे धाव घेतो, कंटाळतो. तिसऱ्या खेळण्यामागे जातो, कंटाळतो. त्याप्रमाणे ही साधना सुरू केल्यावर लवकरच आपल्या असे स्पष्ट लक्षात येते की आपले मनही त्या मुलासारखेच चंचल, नटखट आहे. ते एका विचारावर स्थिर रहातच नाही. सतत ह्या विचारावरून त्या विचारावर कोलांट्या घेतच असते. या कल्पनेवरून त्या कल्पनेवर, वर्तमान सत्यापासून नेहमीच दूर पळत असते._
_*चंचलता हा मनाचा स्थायीभाव झाला आहे.* आतापर्यंतच्या जगण्यात अशा वागण्याची त्याला सवयच जडली आहे. पण एकदा का आपण आपल्या सत्य स्वभावाचे संशोधन सुरू केले की, मनाची वर्तमान क्षणापासून पळून जाण्याची सवय थांबते की नाही पहा. ती थांबलीच पाहिजे. आपल्या मनाच्या सवयीचा साचा बदलून सत्याबरोबर रहायला त्याने शिकलेच पाहिजे. मनाची ही सवय मोडण्याची सुरुवात श्वासोच्छ्वासावर सारे लक्ष केद्रित करायला लावुन करावयाची आहे. *जेव्हा मन दिलेल्या कामापासून पळाले आहे हे आपल्या लक्षात येईल तेव्हा परत त्याला शांतपणे, धीराने कामाला लावले पाहिजे.* ह्या प्रयत्नात आपण परत परत अयशस्वी झालो तरी पुन्हा पुन्हा प्रयत्न करून मनाला ताळ्यावर आणले पाहिजे. हसत हसत कोणत्याही प्रकारचा ताण, निराशा न आणता मनाला नवीन वळण लावण्याचा अभ्यास सतत करत राहिले पाहिजे. कारण आयुष्याची सवय काही मिनिटातच दूर होणारी नसते. *ह्या कामाला प्रयत्नाचे सातत्य, चिकाटी, शांतपणा व धैर्य लागतेच अशा प्रकारे सत्याबद्दलची सजगता वाढू लागते. आणि यालाच 'सम्यक प्रयत्न' असे म्हणतात.*_
*_भगवान बुद्धांनी चार प्रकारचे सम्यक् प्रयत्न सांगितले आहेत._*
१] दुष्ट विचार किया दुर्भावना यांचा मनात उदयच होऊ न देणे.
२] मनात त्यांची निर्मिती होत असेल तर त्यांना दूर करणे.
३] आत्तापर्यंत निर्माण न होणाऱ्या सद्भावना निर्माण करणे.
४] सद्भावना निर्मितीचे सातत्य टिकवून ठेवणे, त्यांचा विकास करणे व हा विकास उत्कृष्टतेपर्यंत पोहोचविणे.
_श्वासोच्छ्वासाच्या अभ्यासाने आपला वरील चारही प्रयत्नांचा अभ्यास होत असतो. आपण साधनेस बसतो तेव्हा कोणत्याही विचारांची ढवळाढवळ होऊ न देता, मन श्वासावर केंद्रित करतो. असे करताना आपण आपल्या मनात सद्भावनेच्या निर्मितीची प्रक्रिया सुरू करतो व त्यात सातत्य आणून स्वतःची सजगता स्थिर करतो. आपण मनाला विचलित होण्यापासून, विचारात हरवून जाण्यापासून, तसेच भासमान सत्यात रमण करणाऱ्या स्वभावापासून जाणीवपूर्वक परावृत्त करतो. कदाचित एखादा खोडसाळ विचार आलाच तर त्याचा पाठपुरावा न करता आपण मनाकडून श्वासोच्छ्वासामार्फत निरीक्षणाचे कार्य परत सुरु करतो. अशा प्रकारे आपण एकाच गोष्टीवर केंद्रित होऊन स्थिर होण्याची व ज्या गोष्टींमुळे या स्थितीला बाधा येते त्या दूर करण्याची मनाची क्षमता वाढवीत असतो. मनाच्या एकाग्रतेसाठी या दोन्हीही गुणाची फार आवश्यकता आहे._
*_सम्यक् सजगता [जागरुकता ]_*
_*श्वासोच्छ्वासाचे निरीक्षण हे सम्यक सजगतेचे आणखी एक साधन आहे.* आपणास आपल्या बद्दलच्या सत्याचे ज्ञान नसल्यामुळे आपण काय करतो ही जाणीव आपल्याला नसते व आपण अंध प्रतिक्रिया करीत असतो. या अज्ञानातूनच दुःखाचा वृक्ष उभा करतो. *आपले मन सदैव अतिरंजित कल्पनांच्या मृगजळामागे धावत असते.* सध्याच्या सुखाच्या वा दुःखाच्या अनुभवांना सोडून भविष्याची कल्पना, भीती यानेच आपले मन सदैव पछाडलेले असते. भविष्याबद्दल त्याला जास्त उत्सुकता दिसते. आणि अशा भविष्याच्या राग-द्वेषात गुंतल्यामुळे वर्तमानाची दखलच मन घेत नाही. आता आपण काय करतो आहोत याची आपल्याला पर्वाच नसते. तरी देखील निश्चितच आपल्या दृष्टीने हा क्षण, हा वर्तमान, फारच महत्त्वाचा असतो. आपण भूतकाळात जगू शकत नाही. कारण तो पूर्णपणे संपलेला असतो. आपण भविष्यातही जगू शकत नाही, कारण तो पूर्णपणे आपल्या आवाक्याबाहेरचा असतो. असे जर आहे, तर आपण फक्त वर्तमानकाळातच जगू शकतो, नाही का?_
_आपण आपल्या वर्तमान कृत्याबद्दल जर अनभिज्ञ असलो तर आपणाकडे आपल्या त्याच त्याच चुका परत करीत राहण्याचा दोष येईल व भविष्याबद्दलची आपली स्वप्ने आपल्याला कधीच साकार करता येणार नाहीत. पण वर्तमान काळाबद्दल जागृत राहण्याची आपली क्षमता जर आपण विकसित केली तर आपण आपल्या भूतकाळाच्या अनुभवाचा उपयोग आपल्या भविष्याला दिशा देण्यासाठी करून घेऊ शकतो व त्यातून आपली भविष्यातील योजना साकारू शकतो._
_धर्म हा आत्ता आणि इथेच मार्गदर्शक होणारा आहे. उपयोगी पडणारा आहे. आपल्याला आपल्या सध्याच्या क्षणाची सत्यता जाणण्यासाठी, त्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी, उपयोगी पडेल अशा साधनाविधिची खरी गरज आहे. *'आनापानसती' हा असाच साधनाविधि आहे की जो आपल्याला चालू घडीच्या सत्याबद्दल जागृत बनवतो. ह्या विधिचा अभ्यास आत्ता व इथल्या क्षणाबद्दल आपली सजगता, जागरुकता विकसित करतो. या क्षणाला आत येणारा श्वास, या क्षणाला बाहेर जाणारा श्वास, यांच्या निरीक्षणाच्या सवयीमुळे आपण ह्या क्षणाबद्दल जागृत होतो. सजग होतो.*_
_श्वास निरीक्षणाचे दुसरे कारण म्हणजे आपल्याला अंतिम अनुभव घ्यावयाचा आहे. श्वासोच्छ्वासावर लक्ष केंद्रित केल्यामुळे आपल्याला आपल्याबद्दलच्या अज्ञानाचा शोध घेता येईल, जे अज्ञात आहे ते ज्ञात होईल. आपल्या ज्ञात व अज्ञात मनातील पडदा दूर होण्यास ते उपयुक्त ठरेल. कारण श्वासोच्छ्वास ही क्रिया मुद्दाम, जाणीवपूर्वक वा आपोआप अशा दोन्ही प्रकार करता येते. आपण एखाद्या विशिष्ट प्रकाराने श्वासोच्छ्वास करू शकतो. श्वासोच्छ्वासावर नियंत्रण आणू शकतो. काही क्षणापुरता आपण तो थांबवूही शकतो. इतकेच काय, पण आपण त्यावरील आपले नियंत्रण काढून घेतले की तो आपोआप आपल्या सूचनेशिवाय नैसर्गिकपणे चालू राहतो._
_उदाहरणार्थ, आपण मुद्दामच आपले लक्ष सहज केंद्रित करण्यासाठी थोड्या वेगाने श्वास घेणे चालू केले. लक्ष श्वासावर स्थिरावल्यावर, त्यात स्पष्टता आल्यावर, आपण श्वासावरचे नियंत्रण काढून त्याला त्याच्या नैसर्गिक गती प्रमाणे जलद वा मंद, उथळ वा खोल वा आखूड, जड वा हलका होऊ देतो. त्यानंतर आपण त्यावर कोणतेही नियंत्रण ठेवावयाचे नाही. फक्त जे काय आपोआप होते आहे, स्वाभाविकपणे होते आहे, त्याबद्दल जागरूकता मात्र ठेवावयाची._
_श्वासोच्छ्वासाबाबत जागरुक असल्याचा तिसरा एक मोठा फायदा होतो. तो म्हणजे, राग, द्वेष व अविद्या यांच्या निर्मितीपासूनच आपण जागृत असलो, तर त्यांच्या अस्तित्वाच्या जाणीवेमुळेच आपण त्यांच्यापासून आपली सुटका करून घेऊ शकतो. विकारमुक्तीच्या या कामात श्वास आपल्याला चांगलीच मदत करू शकतो. कारण आपल्या मानसिक क्रियांचे प्रतिबिंबच श्वासोच्छ्वासात पडत असते. जेव्हा आपले मन शांत व निश्चल असते, तेव्हा श्वासाची गती नियमित व हळुवार असते. या उलट जेव्हा जेव्हा मनात विध्वंसक विचार जन्मतात, मग ते क्रोधाचे, तिरस्काराचे, भीतीचे किंवा वासनेचे असोत, श्वास आपली नेहमीची गती बदलून क्षुब्ध, जड व जलद होतो. अशा प्रकारे श्वासोच्छ्वास आपल्याला आपल्या मनाच्या स्थितीची पूर्व सूचना देतो व येणाऱ्या घटनेशी योग्य पद्धतीने सामना करण्याची तयारी आपण करू शकतो._
_श्वासाची सजगता विकसित करण्यात अजून एक फायदा आहे. आपले मन सर्व प्रकारच्या विध्वसंक विचारापासून मुक्त करणे हे आपले ध्येय आहे. या ध्येयाकडे नेणारी आपली प्रत्येक कृती ही आपल्याला शुद्धीकडे व सत्कृत्याकडे नेणारीच असली पाहिजे. समाधीच्या विकासाच्या सुरुवातीच्या अवस्थेतही ध्यानाचे साधन शुद्ध व सत्य असावयास पाहिजे व श्वास हे त्यासाठी अगदी योग्य साधन आहे. आपल्याला श्वासाबद्दल राग वा द्वेष, अभिलाषा वा तिटकारा असूच शकत नाही. श्वास हा भ्रामक कल्पनांपासून खूप दूर अशी संपूर्ण सत्य गोष्ट आहे. आणि म्हणूनच तो ध्यानासाठी अगदी योग्य असे साधन आहे._
_ज्या क्षणी मन श्वासोच्छ्वासावर केंद्रित केलेले असते, तेव्हा ते राग, द्वेष, अविद्या यांपासून पूर्णपणे मुक्त असते. हा क्षण कितीही लहान असला तरी खूपच शक्तीशाली असतो. तो पूर्व संस्कारांचे आव्हान पेलण्यास मनाला समर्थ बनवतो. पूर्वी गोळा केलेल्या संस्कारांच्या गाठी सोडण्यास तो सुरुवात करतो. त्या शरीरावर किंवा मनात विविध अडचणींच्या स्वरूपात बाहेर पडतात व आपल्या सत्यसंशोधनाच्या कार्यात अडथळा निर्माण करतात. आपल्या प्रगतीसाठी कधी कधी आपण उतावीळ झाल्याचा अनुभव येतो. ही एक प्रकारची अभिलाषाच आहे. याउलट कधी आपली प्रगती फारच मंद आहे असे वाटून आपण संतापतो, निराश होतो व तिटकाऱ्याचा, द्वेषाचा अनुभव येतो._
_केव्हा केव्हा आळस भेडसावतो व ध्यानास बसल्याबरोबरच डुलक्या येऊ लागतात. काही वेळा आपण इतके प्रक्षुब्ध होतो की ध्यान टाळण्यासाठी काही तरी सबबी शोधू लागतो. केव्हा केव्हा संशयखोर वृत्ती उफाळून येते व आपली साधनेची इच्छाच मारून टाकते. कधी कधी या शिकवणुकीविषयी व शिक्षकांविषयी मनाला नाना शंका ग्रासून टाकतात. आपल्या साधनेच्या क्षमतेबद्दलही मन संशयित होते. या अचानक उद्भवलेल्या परिस्थितीमुळे हा विपश्यना साधनेचा अभ्यास एकदाचा बंद करावा असेही वाटू लागते._
_अशा परिस्थितीत मात्र एक गोष्ट खात्रीने मनात बाळगा की अशा अडचणी आपण करीत असलेल्या श्वासोच्छ्वासाच्या साधनेतील झालेल्या प्रतिक्रिया म्हणूनच उद्भवल्या आहेत. प्रयत्नांची निरंतरता जर आपण टिकवू शकलो तर ही परिस्थिती पण निघून जाईल. असे झाले तर आपले काम अधिक सुलभ होईल. कारण अभ्यासाच्या सुरुवातीलाच जुन्या संस्काराचे काही थर आपण आपल्या मनावरून दूर करण्यात यशस्वी झालो आहोत. अशा प्रकारे श्वासाच्या जाणीवेच्या अभ्यासातसुद्धा आपण आपल्या मनाच्या शुद्धिकरणास सुरवात केली व मुक्तीच्या मार्गात प्रविष्ट झालो._
*_सम्यक् समाधि [एकाग्रता ]_*
*_श्वासावर सगळे लक्ष केंद्रित करून वर्तमान क्षणाच्या सजगतेचा विकास करणे. क्षणाक्षणांनी ही जाणीव, जागरुकता टिकवून शक्य तेवढी लांबवणे, तिचा कालावधी वाढवणे म्हणजेच 'सम्यक् समाधि'._*
_सामान्य जीवनातील दैनंदिन कामात एकाग्रतेची जरुरी असतेच. पण ही एकाग्रता म्हणजे सम्यक् एकाग्रताच असावी लागते असे नाही. आपण आपली भीती घालविण्यासाठी किवा शारीरिक सौख्यासाठीही एकाग्रतेने कामे करतो. बिळातून बाहेर येणाऱ्या उंदराच्या शिकारीसाठी मांजर देखील आपले सगळे लक्ष तिथे लावून उंदराची वाट पहात टपून बसते. पाकीट मारणारा पाकिटावर अगदी एकाग्रतेने ते लांबवण्याची संधी मिळण्याची वाट पहात असतो. लहान मुलगा रात्री खोलीतल्या अंधाऱ्या कोपऱ्यात कोणीतरी दैत्य दबा धरून बसला आहे या कल्पनेने भयंकर भीतीने बघत असतो. यापैकी कोणतीही एकाग्रता आपल्याला मुक्तावस्थेस नेणारी सम्यक् एकाग्रता होऊ शकत नाही. समाधीच्या केंद्रस्थानी असणारे साधन हे सर्व प्रकारच्या रागापासून, सर्व प्रकारच्या द्वेषापासून, सर्व प्रकारच्या भ्रामक कल्पनांपासून दूर असले पाहिजे._
_श्वासाच्या सजगतेचा अभ्यास करणाऱ्यास त्याचे अखंडित सातत्य टिकवणे किती अवघड आहे याची चांगलीच कल्पना येते. श्वासोच्छ्वासासावर लक्ष केंद्रित करण्याचा कितीही पक्का निर्धार केला तरी नकळत मन सटकून जाते. आपण एखाद्या दारूड्यासारखे आहोत असे वाटते. तो सरळ चालण्याचा प्रयत्न करतो. पण सारखा ह्या किंवा त्या बाजूला झोकांड्या खातच असतो. खरे तर आपल्यालाही आपल्या अज्ञानाने व अतिरंजित कल्पनांनी बेहोषी आलेली असते व म्हणूनच आपण भूत, भविष्य, राग वा द्वेष या बाजूंना झोकांड्या खात असतो. दीर्घ सजगतेतील सातत्याच्या सरळ रस्त्यावर आपण चालूच शकत नाही._
_ध्यानसाधनेचे साधक म्हणून आपण जेव्हा अशा अडचणींशी सामना तेव्हा आपल्याला निराशेने घेरणे उपयोगाचे नाही, किंवा आपण धैर्यही सोडता कामा नये. याउलट आपल्याला हे समजले पाहिजे की, मनाची वर्षानुवर्षांची प्रस्थापित दृढ सवय जायला वेळ हा लागणारच. ही सवय प्रयत्नांच्या सातत्याने. निरंतरतेने व चिकाटीने बदलणे सहज शक्य आहे. पळालेल्या, निसटलेल्या मनाला आपल्या लक्षात आल्यावर पुन्हा पुन्हा श्वासाच्या कामावर लावणे इतकेच आपले काम आहे. आपण हे केले की, मनाच्या धावण्याच्या, निसटून जाण्याच्या स्वभावाला आळा घालण्याच्या कामात आपण महत्त्वाचे पाऊल उचलले असे म्हणता येईल. या अभ्यासातील सातत्यामुळे पळणारे मन लवकर काबूत आणून परत कामाला लावणे सोपे होते. कालांतराने असावधानतेची वेळ कमी कमी होत जाते व जागरूकता वाढत जाते व समाधीची प्रदीर्घताही वाढत जाते._
_जसजशी समाधि दृढ होत जाते तसतशी आपली प्रक्षुब्धता कमी होते. सुख, समाधान व उत्साह वाढतो. हळूहळू श्वासात बदल होतो. तो मंद, नैसर्गिक, हलका व र्हस्व होऊ लागतो. कधी कधी तर श्वास बंद झाला आहे की काय असेच वाटते. प्रत्यक्षात जसजसे मन शांत होत जाते तसतसे शरीरही शांत होते व त्याच्या चयापचय क्रियाही मंद होतात. त्यामुळेच त्याची प्राणवायूची गरजही कमी होते._
_श्वासोच्छ्वासाच्या सजगतेचा अभ्यास करतांना कधीकधी साधकांना नेहमीपेक्षा वेगळे अनुभव येऊ शकतात. डोळे बंद असतांना सुद्धा प्रकाश दिसतो, दृष्टांत होतात. अवर्णनीय संगीत कानावर पडते. हे सर्व अनुभव म्हणजे ध्यानात साधलेली उच्च दर्जाची लय होय. मनाच्या उच्च दर्जाच्या समाधिमुळेच असे दिव्य अनुभव येतात. त्यांना बाकी फार महत्त्व नाही व आपण त्यांना फारशी किंमतपण देऊ नये. आपल्या ध्यानाचे साधन मात्र श्वासोच्छ्वास हेच ठेवावे. कारण इतर कोणतीही गोष्ट ही ध्यानात केवळ व्यत्ययच असते. आपण अशा अनुभवाची अपेक्षापण करू नये. कारण काही जणांच्या बाबतीत असे अनुभव येतात, तर काहींच्या बाबतीत ते येत नाहीत. असे अनुभव म्हणजे या मार्गातील प्रगतीच्या मैलाच्या दगडासारख्या केवळ खुणा आहेत. केव्हा केव्हा या खुणा झाकलेल्या असतात किंवा मार्गावरून आपण इतक्या वेगाने, एकाग्रतेने जात असतो की या खुणांकडे आपले लक्षच जात नाही. पण आपण जर या मैलाच्या दगडांनाच महत्त्व दिले, त्यांनाच चिटकून बसलो, तर आपल्या उद्दिष्टापर्यंत कसे पोहोचणार ? प्रगती येथेच खुंटेल. कारण असे इंद्रियजन्य, असामान्य अनुभव अगणित असतात. धर्म पालन करणारे अशा अनुभवांची कधीच अपेक्षा करत नाहीत. तर आपल्या खऱ्या स्वभावाचे, स्वानुभवाने विकसित झालेले अंतर्ज्ञान मिळवतात, की ज्याच्या आधारेच दुःखमुक्तीपर्यंत पोहोचता येते. हेच त्यांचे उद्दिष्ट असते._
_म्हणूनच आपण श्वासावरच आपले लक्ष केंद्रित करणे चालू ठेवावे. जसजसे मन जास्त एकाग्र होईल, तसतसा श्वास मंद मंद होऊन त्याची जाणीव अस्पष्ट होत जाईल व त्याचा मागोवा घेण्यासाठी परत आपल्याला मनही अधिकाधिक एकाग्र करावे लागेल. त्यासाठी प्रयत्नही जास्त करावे लागतील. वरवरच्या सत्याला छेदून अंतिम सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी अशा प्रकारे आपल्याला सतत आपल्या मनाला धारदार बनवावे लागते._
_मनाची एकाग्रता वाढवणारी अजूनही पुष्कळ तंत्रे आहेत. त्यात काही शारीरिक क्रिया परत परत करणे, एखाद्या मंत्राचा जप सतत करणे व वेगवेगळ्या मूर्ती ध्यानासाठी वापरणे हे येते. आपले मन ह्या ध्यान साधनामध्ये एवढे तादात्म्य पावते की त्यामुळे आपण भौतिक जगाच्या पलिकडचा प्रासादिक आनंद उपभोगु शकतो. ही अवस्था जोपर्यंत टिकून राहते तोपर्यंत तो आनंदही टिकून राहतो याबद्दल संशयच नाही. पण जेव्हा ही अवस्था संपते, त्यानंतर परत आपण आपल्या नेहमीच्या जगात येतो व पूर्वी सारख्याच नेहमीच्या समस्या आपल्या पुढे हजर होतात._
_ही तंत्रे मनाच्या वरच्या पृष्ठभागावर शांतीचा व आनंदाचा थर निर्माण करण्यापुरतीच कामी येतात. परंतु मनाचा आतील वा खोलवरचा भाग तसाच अस्पर्शी राहतो. ह्या ध्यानात जी साधने वापरली जातात त्यांचा प्रत्येक क्षणाच्या आपल्याबद्दलच्या खऱ्या सत्याशी कोणताही संबंध नसतो. आपणास त्यामुळे मिळणारा आनंद वा सुखकारक अनुभव हा उत्स्फूर्तपणे मनाच्या शुद्धतेमुळे त्याच्या खोलीतून निर्माण झालेला असण्यापेक्षा मनावर लादलेला किंवा जाणून-बुजून निर्माण केलेला असतो. *सम्यक् समाधि म्हणजे आध्यात्मिक बेहोषी असू शकत नाही. ती सर्व प्रकारच्या अनैसर्गिक, अतिरंजित भ्रामक कल्पनांपासून पूर्णपणे मुक्त असायला हवी.*_
_भगवान बुद्धांच्या शिकवणुकीत पण ध्यानातील वेगवेगळ्या तादात्म्याच्या ध्यानावस्था मानल्या आहेत. मुक्तावस्था प्राप्त करण्यापूर्वी गौतमांना सुद्धा अशा आठ वेगवेगळ्या समाधि अवस्था शिकविल्या गेल्या होत्या व पुढील आयुष्यातही ते त्यांचा अभ्यास करत होते. परंतु ह्या सर्व समाधि अवस्था देखील त्यांना संपूर्ण मुक्त करू शकल्या नव्हत्या आणि म्हणूनच अशा अवस्थांचे कार्य फक्त प्रगतीच्या मार्गावरील विकासाचे टप्पे दाखवणे हेच आहे, यावर भगवान बुद्धांनी भर दिला आहे. ध्यानामुळे एकाग्रतेची क्षमता वाढवावयाची असते. अर्थात् ती प्रासादिक आनंद उपभोगण्यासाठी नाही तर मनाला आपल्यातील खऱ्या सत्याचा शोध घेण्याचे तीक्ष्ण हत्यार बनविण्यासाठी की ज्याने योग्य संशोधन करून आपण मनावरचा पूर्व संस्कारांचा पगडा दूर करू शकू. हा पगडा, हे अज्ञानच आपल्या दुःखास कारणीभूत होते. सम्यक् समाधि हीच!_
*_कल्याणकारी मार्ग सर्वांना लाभो !_*
*_मुक्तीदायिनी प्रेरणा सर्वांत जागृत हावो.._*
*_!! धन्य होवो ! मंगल होवो ! कल्याण होवो !!_*
*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_संदर्भ :- जगण्याची कला.....विपश्यना साधना_*
*_संकलन :- महेश कांबळे_*
*_दिनांक :- २५/०९/२०२२_*
https://mikamblemahesh.blogspot.com/2022/09/blog-post_25.html
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼