Sunday, 25 September 2022

एकाग्रतेची शिकवणूक [समाधि ]

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_एकाग्रतेची शिकवणूक [समाधि ]_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

          _शीलाच्या अभ्यासाने आपण शाब्दिक व शारीरिक कर्मावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करतो. पण *आपल्या दुःखाचे खरे कारण आपल्या मानसिक क्रियात असते.* आसक्तीने, द्वेषाने व दुष्ट विचाराने मन खदखदत असतांना फक्त आपल्या शाब्दिक व शारीरिक क्रियांवर घातलेले बंधन काय कामाचे ? अशा मनाच्या द्विधा अवस्थेत आपण आनंदी वा सुखी कसे होणार? कधी ना कधी आसक्ती वा द्वेष उफाळून वर येणारच. त्यामुळे आपला शीलभंग होऊन आपण आपले व इतरांचे नुकसान करणारच._

            _अहितकारी कर्मे करणे हे योग्य नाही. हे नुसते बौद्धिक स्तरावर समजून उपयोगाचे नाही. *आजपर्यंत हजारो वर्षे प्रत्येक पंथाने शील सदाचाराची शिकवण दिली आहे. तरी सुद्धा जेव्हा मोहाचा क्षण येतो, तेव्हा मनावरील नियंत्रण सैल होते व शीलभंग होतो.* मद्यपान करणाऱ्यांना मद्य हे आपल्याला अपायकारक आहे हे पक्के माहित असते. पण जेव्हा अभिलाषा निर्माण होते, तेव्हा दारू पिऊन तो बेहोष होतोच. मनावर नियंत्रण नसल्यामुळे तो आपल्याला आवरूच शकत नाही. पण जेव्हा आपण मनाच्या अपायकारक, हानिकारक क्रिया आपल्या नियंत्रणात आणण्यास शिकतो, तेव्हा त्या प्रकारच्या शाब्दिक व शारीरिक क्रिया आपोआपच नियंत्रणात आणणे सोपे होते._

          _*कोणत्याही समस्येचे मूळ आपल्या मनात असल्यामुळे आपण तिच्याशी मानसिक स्तरावरच सामना केला पाहिजे. आणि असे करण्यासाठीच आपण भावना केली पाहिजे. भावना याचा शब्दशः अर्थ 'मानसिक प्रगती' असा आहे. त्याचा सर्वसाधारण अर्थ ध्यानधारणा असा आहे. भगवान बुद्धांच्या काळातील 'भावना' या शब्दाचा खरा अर्थ काळाच्या ओघात, त्याचा अभ्यास कमी झाल्याने, अस्पष्ट झाला. अलिकडच्या काळात या शब्दाचा वापर सर्व प्रकारचा आध्यात्मिक, मानसिक व सांस्कृतिक विकास या अर्थाने केला जातो.* धार्मिक ग्रंथांचे वाचन करणे, प्रवचने देणे, धार्मिक चर्चा श्रवण करणे अथवा धर्म विचारांचे चिंतन करणे यासाठीदेखील या शब्दाचा वापर केला जातो. सर्व साधारणपणे इंग्रजी भाषांतरात हा शब्द फारच संदिग्धपणे वापरला जातो. त्यात मानसिक विश्रांती, दिवास्वप्ने, मुक्त मैत्री यापासून स्वतःच्या संमोहनापर्यंत सगळ्या गोष्टी येतात. हे सर्व अर्थ भगवान बुद्धांना अभिप्रेत असणाऱ्या अर्थापासून फारच दूर आहेत. *त्यांना ह्या शब्दाचा अर्थ मनाचा विशिष्ट व्यायाम व मनाच्या एकाग्रतेचा व शुद्धिकरणाचा सुयोग्य विधि असाच अभिप्रेत होता.*_

         _*'भावना' या शब्दात दोन प्रकारच्या शिकवणुकीचा समावेश होतो. एक म्हणजे एकाग्रता वा समाधि व दुसरी म्हणजे प्रज्ञा. एकाग्रतेच्या अभ्यासालाच ‘मानसिक शांततेचा विकास' [समता-भावना] म्हणतात व प्रज्ञेला 'अंतर्दृष्टीचा विकास' [विपश्यना-भावना] असे म्हणतात. भावनेच्या अभ्यासाची सुरुवात आर्य अष्टांग मार्गाच्या दुसऱ्या भागात सांगितलेल्या एकाग्रतेपासून होते. एकाग्रता हीच आपल्या मानसिक क्रियांवर नियंत्रण आणणारी व आपल्याला आपल्या स्वतःचे मालक, नियंत्रक बनविण्यास शिकविणारी हितकारी क्रिया आहे. या शिकवणुकीतच सम्यक् प्रयत्न, सम्यक् सजगता [जागरुकता ] जाणीव आणि सम्यक एकाग्रता यांचा समावेश होतो.*_

*_सम्यक् प्रयत्न_*

          _*योग्य प्रयत्न ही भावनेच्या अभ्यासाची पहिली पायरी आहे.* मन हे अतिशय वेगाने अविद्या, राग व द्वेष यांच्या नियंत्रणात वाहत जाते. त्यांच्या अधीन होते आपण त्याला एकाग्र व स्थिर करावयास शिकले पाहिजे. *स्थिर मन हे खऱ्या स्वभावाचा अतिशय सूक्ष्म स्तरावराचा अभ्यास करण्याचे. आपल्या मनावरचा परंपरागत पगडा घालवण्याचे, जुने संस्कार दूर करण्याचे अतिशय उपयुक्त असे साधन आहे.*_

          _ज्या डॉक्टरांना रोग्याच्या आजाराचे निदान करावयाचे आहे. ते रोग्याच्या रक्ताचा नमुना घेऊन प्रथम तो सूक्ष्मदर्शकाखाली ठेवतात. रक्ताचे निरीक्षण करण्यापूर्वी डॉक्टर तो सूक्ष्मदर्शक प्रथम वरखाली करून त्याचा केंद्रबिंदू रक्ताच्या नमुन्यावर स्थिर करतात. नंतर त्या रक्ताची तपासणी करून, त्याचे योग्य निदान करून, रोगाचे कारण शोधून, रोग्यास योग्य ते औषध दिल्यावरच त्याला रोगमुक्त करणे डॉक्टरांना शक्य होते. त्याचप्रमाणे आपल्याला एखाद्या गोष्टीवर आपले मन केंद्रित करून स्थिर करावे लागते आणि मगच आपण त्याचा सूक्ष्मतम सत्य संशोधनाचे साधन म्हणून उपयोग करू शकतो._

         _*भगवान बुद्धांनी मनाच्या एकाग्रतेसाठी त्यांच्याकडे येणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या माणसांना उपयोगी होतील असे वेगवेगळे अनेक मार्ग सांगितले आहेत त्यातल्या त्यात जो सर्वसामान्य लोकांना उपयोगी पडला व बुद्धांनी स्वतः ज्या विधिचा उपयोग केला तो आहे. 'आनापानसती-श्वासोच्छ्वासाची सजगता'.*_

            _श्वासोच्छ्वास ही गोष्ट प्रत्येकाला अगदी सहज उपलब्ध असणारी आहे. कारण जन्मापासून मृत्यूपर्यंत आपण प्रत्येकजण सतत श्वासोच्छ्वास करीत असतो. म्हणूनच हे सार्वजनिक व सर्वमान्य असे ध्यानाचे साधन होऊ शकते. साधक हा सुरुवातीला आपल्याला सोईस्कर अशा आसनात मान-पाठ सरळ ठेवून बसतो व आपले डोळे बंद करून घेतो. त्याने ध्यानासाठी वर्दळीपासून दूर व एकांत अशा एखाद्या खोलीची निवड करावी म्हणजे मनाची एकाग्रता भंग होणार नाही. बाह्य जगातून आपले मन काढून त्याला अंतर्मुख करताना त्याच्या असे लक्षात येईल की, आपला श्वास ही सगळ्यात पट्कन लक्षात येणारी गोष्ट आहे. मग त्याला त्याच्यावर लक्ष केंद्रित करणे सहज साध्य होईल. नासिकेतून हवा आत कशी येते, ती बाहेर कशी जाते, याचे निरीक्षण करता येईल._

          _*'आनापान' हा काही प्राणायामाचा अभ्यास नाही, तर हा जागृतीचा, सजगतेचा अभ्यास आहे. यात श्वासावर नियंत्रण करावयाचे नाही तर तो स्वाभाविक कसा आहे त्याबद्दल आपली सजगता वाढवावयाची आहे.* तो लांब [दीर्घ] आहे की आखूड [हस्व], जड आहे की हलका, हळुवार आहे की जोराचा याचे फक्त निरीक्षण करावयाचे आहे. त्यात मुद्दाम बदल घडवून आणावयाचा नाही. जेवढी शक्य आहे तेवढी अखंडता या निरीक्षणात आणावयास पाहिजे. सातत्य आणावयास पाहिजे. ही सातत्याची शृंखला भंग होणार नाही याबद्दल सतत सावधानता राखली पाहिजे._

         _एकदा ध्यानास सुरुवात केली म्हणजे त्यात सातत्य आणणे किती अवघड आहे हे आपल्या लक्षात येईलच. श्वासावर आपले मन केंद्रित करता क्षणीच आपल्याला आपल्या दुखणाऱ्या पायाची वेदना जाणवू लागते. त्रास होऊ लागतो. खोडसाळ विचार बाजूला करण्याच्या प्रयत्नातच आपल्या लक्षात येते की एक विचार बाजूला केला की. बाकी हजारो विचार उफाळून डोके वर काढतात. जुन्या आठवणी, बांधलेले मनोरे, आशाआकांक्षा, भीती यापैकी एखादी गोष्ट वर उफाळून येते व बऱ्याच वेळाने श्वासापासून आपण पूर्णपणे भरकटलो आहोत याची जाणीव आपल्याला होते. पुन्हा आपण संकल्प करून श्वासोच्छ्वासावर लक्ष केंद्रित करावयाचे म्हटले तर थोड्यावेळातच आपणाला चकवून मन आपल्या नियंत्रणातून सुटून गेले आहे हे आपल्या ध्यानी येते. येथे आवर कोण घालणार? एखादा अवखळ मुलगा खेळतांना कसा एक खेळणे घेतो, कंटाळतो, मग दुसऱ्या खेळण्याकडे धाव घेतो, कंटाळतो. तिसऱ्या खेळण्यामागे जातो, कंटाळतो. त्याप्रमाणे ही साधना सुरू केल्यावर लवकरच आपल्या असे स्पष्ट लक्षात येते की आपले मनही त्या मुलासारखेच चंचल, नटखट आहे. ते एका विचारावर स्थिर रहातच नाही. सतत ह्या विचारावरून त्या विचारावर कोलांट्या घेतच असते. या कल्पनेवरून त्या कल्पनेवर, वर्तमान सत्यापासून नेहमीच दूर पळत असते._

               _*चंचलता हा मनाचा स्थायीभाव झाला आहे.* आतापर्यंतच्या जगण्यात अशा वागण्याची त्याला सवयच जडली आहे. पण एकदा का आपण आपल्या सत्य स्वभावाचे संशोधन सुरू केले की, मनाची वर्तमान क्षणापासून पळून जाण्याची सवय थांबते की नाही पहा. ती थांबलीच पाहिजे. आपल्या मनाच्या सवयीचा साचा बदलून सत्याबरोबर रहायला त्याने शिकलेच पाहिजे. मनाची ही सवय मोडण्याची सुरुवात श्वासोच्छ्वासावर सारे लक्ष केद्रित करायला लावुन करावयाची आहे. *जेव्हा मन दिलेल्या कामापासून पळाले आहे हे आपल्या लक्षात येईल तेव्हा परत त्याला शांतपणे, धीराने कामाला लावले पाहिजे.* ह्या प्रयत्नात आपण परत परत अयशस्वी झालो तरी पुन्हा पुन्हा प्रयत्न करून मनाला ताळ्यावर आणले पाहिजे. हसत हसत कोणत्याही प्रकारचा ताण, निराशा न आणता मनाला नवीन वळण लावण्याचा अभ्यास सतत करत राहिले पाहिजे. कारण आयुष्याची सवय काही मिनिटातच दूर होणारी नसते. *ह्या कामाला प्रयत्नाचे सातत्य, चिकाटी, शांतपणा व धैर्य लागतेच अशा प्रकारे सत्याबद्दलची सजगता वाढू लागते. आणि यालाच 'सम्यक प्रयत्न' असे म्हणतात.*_

*_भगवान बुद्धांनी चार प्रकारचे सम्यक् प्रयत्न सांगितले आहेत._*

१] दुष्ट विचार किया दुर्भावना यांचा मनात उदयच होऊ न देणे.

२] मनात त्यांची निर्मिती होत असेल तर त्यांना दूर करणे.

३] आत्तापर्यंत निर्माण न होणाऱ्या सद्भावना निर्माण करणे.

४] सद्भावना निर्मितीचे सातत्य टिकवून ठेवणे, त्यांचा विकास करणे व हा विकास उत्कृष्टतेपर्यंत पोहोचविणे.

        _श्वासोच्छ्वासाच्या अभ्यासाने आपला वरील चारही प्रयत्नांचा अभ्यास होत असतो. आपण साधनेस बसतो तेव्हा कोणत्याही विचारांची ढवळाढवळ होऊ न देता, मन श्वासावर केंद्रित करतो. असे करताना आपण आपल्या मनात सद्भावनेच्या निर्मितीची प्रक्रिया सुरू करतो व त्यात सातत्य आणून स्वतःची सजगता स्थिर करतो. आपण मनाला विचलित होण्यापासून, विचारात हरवून जाण्यापासून, तसेच भासमान सत्यात रमण करणाऱ्या स्वभावापासून जाणीवपूर्वक परावृत्त करतो. कदाचित एखादा खोडसाळ विचार आलाच तर त्याचा पाठपुरावा न करता आपण मनाकडून श्वासोच्छ्वासामार्फत निरीक्षणाचे कार्य परत सुरु करतो. अशा प्रकारे आपण एकाच गोष्टीवर केंद्रित होऊन स्थिर होण्याची व ज्या गोष्टींमुळे या स्थितीला बाधा येते त्या दूर करण्याची मनाची क्षमता वाढवीत असतो. मनाच्या एकाग्रतेसाठी या दोन्हीही गुणाची फार आवश्यकता आहे._

*_सम्यक् सजगता [जागरुकता ]_*

         _*श्वासोच्छ्वासाचे निरीक्षण हे सम्यक सजगतेचे आणखी एक साधन आहे.* आपणास आपल्या बद्दलच्या सत्याचे ज्ञान नसल्यामुळे आपण काय करतो ही जाणीव आपल्याला नसते व आपण अंध प्रतिक्रिया करीत असतो. या अज्ञानातूनच दुःखाचा वृक्ष उभा करतो. *आपले मन सदैव अतिरंजित कल्पनांच्या मृगजळामागे धावत असते.* सध्याच्या सुखाच्या वा दुःखाच्या अनुभवांना सोडून भविष्याची कल्पना, भीती यानेच आपले मन सदैव पछाडलेले असते. भविष्याबद्दल त्याला जास्त उत्सुकता दिसते. आणि अशा भविष्याच्या राग-द्वेषात गुंतल्यामुळे वर्तमानाची दखलच मन घेत नाही. आता आपण काय करतो आहोत याची आपल्याला पर्वाच नसते. तरी देखील निश्चितच आपल्या दृष्टीने हा क्षण, हा वर्तमान, फारच महत्त्वाचा असतो. आपण भूतकाळात जगू शकत नाही. कारण तो पूर्णपणे संपलेला असतो. आपण भविष्यातही जगू शकत नाही, कारण तो पूर्णपणे आपल्या आवाक्याबाहेरचा असतो. असे जर आहे, तर आपण फक्त वर्तमानकाळातच जगू शकतो, नाही का?_

          _आपण आपल्या वर्तमान कृत्याबद्दल जर अनभिज्ञ असलो तर आपणाकडे आपल्या त्याच त्याच चुका परत करीत राहण्याचा दोष येईल व भविष्याबद्दलची आपली स्वप्ने आपल्याला कधीच साकार करता येणार नाहीत. पण वर्तमान काळाबद्दल जागृत राहण्याची आपली क्षमता जर आपण विकसित केली तर आपण आपल्या भूतकाळाच्या अनुभवाचा उपयोग आपल्या भविष्याला दिशा देण्यासाठी करून घेऊ शकतो व त्यातून आपली भविष्यातील योजना साकारू शकतो._

         _धर्म हा आत्ता आणि इथेच मार्गदर्शक होणारा आहे. उपयोगी पडणारा आहे. आपल्याला आपल्या सध्याच्या क्षणाची सत्यता जाणण्यासाठी, त्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी, उपयोगी पडेल अशा साधनाविधिची खरी गरज आहे. *'आनापानसती' हा असाच साधनाविधि आहे की जो आपल्याला चालू घडीच्या सत्याबद्दल जागृत बनवतो. ह्या विधिचा अभ्यास आत्ता व इथल्या क्षणाबद्दल आपली सजगता, जागरुकता विकसित करतो. या क्षणाला आत येणारा श्वास, या क्षणाला बाहेर जाणारा श्वास, यांच्या निरीक्षणाच्या सवयीमुळे आपण ह्या क्षणाबद्दल जागृत होतो. सजग होतो.*_

            _श्वास निरीक्षणाचे दुसरे कारण म्हणजे आपल्याला अंतिम अनुभव घ्यावयाचा आहे. श्वासोच्छ्वासावर लक्ष केंद्रित केल्यामुळे आपल्याला आपल्याबद्दलच्या अज्ञानाचा शोध घेता येईल, जे अज्ञात आहे ते ज्ञात होईल. आपल्या ज्ञात व अज्ञात मनातील पडदा दूर होण्यास ते उपयुक्त ठरेल. कारण श्वासोच्छ्वास ही क्रिया मुद्दाम, जाणीवपूर्वक वा आपोआप अशा दोन्ही प्रकार करता येते. आपण एखाद्या विशिष्ट प्रकाराने श्वासोच्छ्वास करू शकतो. श्वासोच्छ्वासावर नियंत्रण आणू शकतो. काही क्षणापुरता आपण तो थांबवूही शकतो. इतकेच काय, पण आपण त्यावरील आपले नियंत्रण काढून घेतले की तो आपोआप आपल्या सूचनेशिवाय नैसर्गिकपणे चालू राहतो._

              _उदाहरणार्थ, आपण मुद्दामच आपले लक्ष सहज केंद्रित करण्यासाठी थोड्या वेगाने श्वास घेणे चालू केले. लक्ष श्वासावर स्थिरावल्यावर, त्यात स्पष्टता आल्यावर, आपण श्वासावरचे नियंत्रण काढून त्याला त्याच्या नैसर्गिक गती प्रमाणे जलद वा मंद, उथळ वा खोल वा आखूड, जड वा हलका होऊ देतो. त्यानंतर आपण त्यावर कोणतेही नियंत्रण ठेवावयाचे नाही. फक्त जे काय आपोआप होते आहे, स्वाभाविकपणे होते आहे, त्याबद्दल जागरूकता मात्र ठेवावयाची._

             _श्वासोच्छ्वासाबाबत जागरुक असल्याचा तिसरा एक मोठा फायदा होतो. तो म्हणजे, राग, द्वेष व अविद्या यांच्या निर्मितीपासूनच आपण जागृत असलो, तर त्यांच्या अस्तित्वाच्या जाणीवेमुळेच आपण त्यांच्यापासून आपली सुटका करून घेऊ शकतो. विकारमुक्तीच्या या कामात श्वास आपल्याला चांगलीच मदत करू शकतो. कारण आपल्या मानसिक क्रियांचे प्रतिबिंबच श्वासोच्छ्वासात पडत असते. जेव्हा आपले मन शांत व निश्चल असते, तेव्हा श्वासाची गती नियमित व हळुवार असते. या उलट जेव्हा जेव्हा मनात विध्वंसक विचार जन्मतात, मग ते क्रोधाचे, तिरस्काराचे, भीतीचे किंवा वासनेचे असोत, श्वास आपली नेहमीची गती बदलून क्षुब्ध, जड व जलद होतो. अशा प्रकारे श्वासोच्छ्वास आपल्याला आपल्या मनाच्या स्थितीची पूर्व सूचना देतो व येणाऱ्या घटनेशी योग्य पद्धतीने सामना करण्याची तयारी आपण करू शकतो._

            _श्वासाची सजगता विकसित करण्यात अजून एक फायदा आहे. आपले मन सर्व प्रकारच्या विध्वसंक विचारापासून मुक्त करणे हे आपले ध्येय आहे. या ध्येयाकडे नेणारी आपली प्रत्येक कृती ही आपल्याला शुद्धीकडे व सत्कृत्याकडे नेणारीच असली पाहिजे. समाधीच्या विकासाच्या सुरुवातीच्या अवस्थेतही ध्यानाचे साधन शुद्ध व सत्य असावयास पाहिजे व श्वास हे त्यासाठी अगदी योग्य साधन आहे. आपल्याला श्वासाबद्दल राग वा द्वेष, अभिलाषा वा तिटकारा असूच शकत नाही. श्वास हा भ्रामक कल्पनांपासून खूप दूर अशी संपूर्ण सत्य गोष्ट आहे. आणि म्हणूनच तो ध्यानासाठी अगदी योग्य असे साधन आहे._

             _ज्या क्षणी मन श्वासोच्छ्वासावर केंद्रित केलेले असते, तेव्हा ते राग, द्वेष, अविद्या यांपासून पूर्णपणे मुक्त असते. हा क्षण कितीही लहान असला तरी खूपच शक्तीशाली असतो. तो पूर्व संस्कारांचे आव्हान पेलण्यास मनाला समर्थ बनवतो. पूर्वी गोळा केलेल्या संस्कारांच्या गाठी सोडण्यास तो सुरुवात करतो. त्या शरीरावर किंवा मनात विविध अडचणींच्या स्वरूपात बाहेर पडतात व आपल्या सत्यसंशोधनाच्या कार्यात अडथळा निर्माण करतात. आपल्या प्रगतीसाठी कधी कधी आपण उतावीळ झाल्याचा अनुभव येतो. ही एक प्रकारची अभिलाषाच आहे. याउलट कधी आपली प्रगती फारच मंद आहे असे वाटून आपण संतापतो, निराश होतो व तिटकाऱ्याचा, द्वेषाचा अनुभव येतो._

        _केव्हा केव्हा आळस भेडसावतो व ध्यानास बसल्याबरोबरच डुलक्या येऊ लागतात. काही वेळा आपण इतके प्रक्षुब्ध होतो की ध्यान टाळण्यासाठी काही तरी सबबी शोधू लागतो. केव्हा केव्हा संशयखोर वृत्ती उफाळून येते व आपली साधनेची इच्छाच मारून टाकते. कधी कधी या शिकवणुकीविषयी व शिक्षकांविषयी मनाला नाना शंका ग्रासून टाकतात. आपल्या साधनेच्या क्षमतेबद्दलही मन संशयित होते. या अचानक उद्भवलेल्या परिस्थितीमुळे हा विपश्यना साधनेचा अभ्यास एकदाचा बंद करावा असेही वाटू लागते._

             _अशा परिस्थितीत मात्र एक गोष्ट खात्रीने मनात बाळगा की अशा अडचणी आपण करीत असलेल्या श्वासोच्छ्वासाच्या साधनेतील झालेल्या प्रतिक्रिया म्हणूनच उद्भवल्या आहेत. प्रयत्नांची निरंतरता जर आपण टिकवू शकलो तर ही परिस्थिती पण निघून जाईल. असे झाले तर आपले काम अधिक सुलभ होईल. कारण अभ्यासाच्या सुरुवातीलाच जुन्या संस्काराचे काही थर आपण आपल्या मनावरून दूर करण्यात यशस्वी झालो आहोत. अशा प्रकारे श्वासाच्या जाणीवेच्या अभ्यासातसुद्धा आपण आपल्या मनाच्या शुद्धिकरणास सुरवात केली व मुक्तीच्या मार्गात प्रविष्ट झालो._

*_सम्यक् समाधि [एकाग्रता ]_*

         *_श्वासावर सगळे लक्ष केंद्रित करून वर्तमान क्षणाच्या सजगतेचा विकास करणे. क्षणाक्षणांनी ही जाणीव, जागरुकता टिकवून शक्य तेवढी लांबवणे, तिचा कालावधी वाढवणे म्हणजेच 'सम्यक् समाधि'._*

         _सामान्य जीवनातील दैनंदिन कामात एकाग्रतेची जरुरी असतेच. पण ही एकाग्रता म्हणजे सम्यक् एकाग्रताच असावी लागते असे नाही. आपण आपली भीती घालविण्यासाठी किवा शारीरिक सौख्यासाठीही एकाग्रतेने कामे करतो. बिळातून बाहेर येणाऱ्या उंदराच्या शिकारीसाठी मांजर देखील आपले सगळे लक्ष तिथे लावून उंदराची वाट पहात टपून बसते. पाकीट मारणारा पाकिटावर अगदी एकाग्रतेने ते लांबवण्याची संधी मिळण्याची वाट पहात असतो. लहान मुलगा रात्री खोलीतल्या अंधाऱ्या कोपऱ्यात कोणीतरी दैत्य दबा धरून बसला आहे या कल्पनेने भयंकर भीतीने बघत असतो. यापैकी कोणतीही एकाग्रता आपल्याला मुक्तावस्थेस नेणारी सम्यक् एकाग्रता होऊ शकत नाही. समाधीच्या केंद्रस्थानी असणारे साधन हे सर्व प्रकारच्या रागापासून, सर्व प्रकारच्या द्वेषापासून, सर्व प्रकारच्या भ्रामक कल्पनांपासून दूर असले पाहिजे._

            _श्वासाच्या सजगतेचा अभ्यास करणाऱ्यास त्याचे अखंडित सातत्य टिकवणे किती अवघड आहे याची चांगलीच कल्पना येते. श्वासोच्छ्वासासावर लक्ष केंद्रित करण्याचा कितीही पक्का निर्धार केला तरी नकळत मन सटकून जाते. आपण एखाद्या दारूड्यासारखे आहोत असे वाटते. तो सरळ चालण्याचा प्रयत्न करतो. पण सारखा ह्या किंवा त्या बाजूला झोकांड्या खातच असतो. खरे तर आपल्यालाही आपल्या अज्ञानाने व अतिरंजित कल्पनांनी बेहोषी आलेली असते व म्हणूनच आपण भूत, भविष्य, राग वा द्वेष या बाजूंना झोकांड्या खात असतो. दीर्घ सजगतेतील सातत्याच्या सरळ रस्त्यावर आपण चालूच शकत नाही._

            _ध्यानसाधनेचे साधक म्हणून आपण जेव्हा अशा अडचणींशी सामना तेव्हा आपल्याला निराशेने घेरणे उपयोगाचे नाही, किंवा आपण धैर्यही सोडता कामा नये. याउलट आपल्याला हे समजले पाहिजे की, मनाची वर्षानुवर्षांची प्रस्थापित दृढ सवय जायला वेळ हा लागणारच. ही सवय प्रयत्नांच्या सातत्याने. निरंतरतेने व चिकाटीने बदलणे सहज शक्य आहे. पळालेल्या, निसटलेल्या मनाला आपल्या लक्षात आल्यावर पुन्हा पुन्हा श्वासाच्या कामावर लावणे इतकेच आपले काम आहे. आपण हे केले की, मनाच्या धावण्याच्या, निसटून जाण्याच्या स्वभावाला आळा घालण्याच्या कामात आपण महत्त्वाचे पाऊल उचलले असे म्हणता येईल. या अभ्यासातील सातत्यामुळे पळणारे मन लवकर काबूत आणून परत कामाला लावणे सोपे होते. कालांतराने असावधानतेची वेळ कमी कमी होत जाते व जागरूकता वाढत जाते व समाधीची प्रदीर्घताही वाढत जाते._

             _जसजशी समाधि दृढ होत जाते तसतशी आपली प्रक्षुब्धता कमी होते. सुख, समाधान व उत्साह वाढतो. हळूहळू श्वासात बदल होतो. तो मंद, नैसर्गिक, हलका व र्हस्व होऊ लागतो. कधी कधी तर श्वास बंद झाला आहे की काय असेच वाटते. प्रत्यक्षात जसजसे मन शांत होत जाते तसतसे शरीरही शांत होते व त्याच्या चयापचय क्रियाही मंद होतात. त्यामुळेच त्याची प्राणवायूची गरजही कमी होते._

           _श्वासोच्छ्वासाच्या सजगतेचा अभ्यास करतांना कधीकधी साधकांना नेहमीपेक्षा वेगळे अनुभव येऊ शकतात. डोळे बंद असतांना सुद्धा प्रकाश दिसतो, दृष्टांत होतात. अवर्णनीय संगीत कानावर पडते. हे सर्व अनुभव म्हणजे ध्यानात साधलेली उच्च दर्जाची लय होय. मनाच्या उच्च दर्जाच्या समाधिमुळेच असे दिव्य अनुभव येतात. त्यांना बाकी फार महत्त्व नाही व आपण त्यांना फारशी किंमतपण देऊ नये. आपल्या ध्यानाचे साधन मात्र श्वासोच्छ्वास हेच ठेवावे. कारण इतर कोणतीही गोष्ट ही ध्यानात केवळ व्यत्ययच असते. आपण अशा अनुभवाची अपेक्षापण करू नये. कारण काही जणांच्या बाबतीत असे अनुभव येतात, तर काहींच्या बाबतीत ते येत नाहीत. असे अनुभव म्हणजे या मार्गातील प्रगतीच्या मैलाच्या दगडासारख्या केवळ खुणा आहेत. केव्हा केव्हा या खुणा झाकलेल्या असतात किंवा मार्गावरून आपण इतक्या वेगाने, एकाग्रतेने जात असतो की या खुणांकडे आपले लक्षच जात नाही. पण आपण जर या मैलाच्या दगडांनाच महत्त्व दिले, त्यांनाच चिटकून बसलो, तर आपल्या उद्दिष्टापर्यंत कसे पोहोचणार ? प्रगती येथेच खुंटेल. कारण असे इंद्रियजन्य, असामान्य अनुभव अगणित असतात. धर्म पालन करणारे अशा अनुभवांची कधीच अपेक्षा करत नाहीत. तर आपल्या खऱ्या स्वभावाचे, स्वानुभवाने विकसित झालेले अंतर्ज्ञान मिळवतात, की ज्याच्या आधारेच दुःखमुक्तीपर्यंत पोहोचता येते. हेच त्यांचे उद्दिष्ट असते._

          _म्हणूनच आपण श्वासावरच आपले लक्ष केंद्रित करणे चालू ठेवावे. जसजसे मन जास्त एकाग्र होईल, तसतसा श्वास मंद मंद होऊन त्याची जाणीव अस्पष्ट होत जाईल व त्याचा मागोवा घेण्यासाठी परत आपल्याला मनही अधिकाधिक एकाग्र करावे लागेल. त्यासाठी प्रयत्नही जास्त करावे लागतील. वरवरच्या सत्याला छेदून अंतिम सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी अशा प्रकारे आपल्याला सतत आपल्या मनाला धारदार बनवावे लागते._

          _मनाची एकाग्रता वाढवणारी अजूनही पुष्कळ तंत्रे आहेत. त्यात काही शारीरिक क्रिया परत परत करणे, एखाद्या मंत्राचा जप सतत करणे व वेगवेगळ्या मूर्ती ध्यानासाठी वापरणे हे येते. आपले मन ह्या ध्यान साधनामध्ये एवढे तादात्म्य पावते की त्यामुळे आपण भौतिक जगाच्या पलिकडचा प्रासादिक आनंद उपभोगु शकतो. ही अवस्था जोपर्यंत टिकून राहते तोपर्यंत तो आनंदही टिकून राहतो याबद्दल संशयच नाही. पण जेव्हा ही अवस्था संपते, त्यानंतर परत आपण आपल्या नेहमीच्या जगात येतो व पूर्वी सारख्याच नेहमीच्या समस्या आपल्या पुढे हजर होतात._

            _ही तंत्रे मनाच्या वरच्या पृष्ठभागावर शांतीचा व आनंदाचा थर निर्माण करण्यापुरतीच कामी येतात. परंतु मनाचा आतील वा खोलवरचा भाग तसाच अस्पर्शी राहतो. ह्या ध्यानात जी साधने वापरली जातात त्यांचा प्रत्येक क्षणाच्या आपल्याबद्दलच्या खऱ्या सत्याशी कोणताही संबंध नसतो. आपणास त्यामुळे मिळणारा आनंद वा सुखकारक अनुभव हा उत्स्फूर्तपणे मनाच्या शुद्धतेमुळे त्याच्या खोलीतून निर्माण झालेला असण्यापेक्षा मनावर लादलेला किंवा जाणून-बुजून निर्माण केलेला असतो. *सम्यक् समाधि म्हणजे आध्यात्मिक बेहोषी असू शकत नाही. ती सर्व प्रकारच्या अनैसर्गिक, अतिरंजित भ्रामक कल्पनांपासून पूर्णपणे मुक्त असायला हवी.*_

         _भगवान बुद्धांच्या शिकवणुकीत पण ध्यानातील वेगवेगळ्या तादात्म्याच्या ध्यानावस्था मानल्या आहेत. मुक्तावस्था प्राप्त करण्यापूर्वी गौतमांना सुद्धा अशा आठ वेगवेगळ्या समाधि अवस्था शिकविल्या गेल्या होत्या व पुढील आयुष्यातही ते त्यांचा अभ्यास करत होते. परंतु ह्या सर्व समाधि अवस्था देखील त्यांना संपूर्ण मुक्त करू शकल्या नव्हत्या आणि म्हणूनच अशा अवस्थांचे कार्य फक्त प्रगतीच्या मार्गावरील विकासाचे टप्पे दाखवणे हेच आहे, यावर भगवान बुद्धांनी भर दिला आहे. ध्यानामुळे एकाग्रतेची क्षमता वाढवावयाची असते. अर्थात् ती प्रासादिक आनंद उपभोगण्यासाठी नाही तर मनाला आपल्यातील खऱ्या सत्याचा शोध घेण्याचे तीक्ष्ण हत्यार बनविण्यासाठी की ज्याने योग्य संशोधन करून आपण मनावरचा पूर्व संस्कारांचा पगडा दूर करू शकू. हा पगडा, हे अज्ञानच आपल्या दुःखास कारणीभूत होते. सम्यक् समाधि हीच!_

*_कल्याणकारी मार्ग सर्वांना लाभो !_*

*_मुक्तीदायिनी प्रेरणा सर्वांत जागृत हावो.._*

*_!! धन्य होवो ! मंगल होवो ! कल्याण होवो !!_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_संदर्भ :- जगण्याची कला.....विपश्यना साधना_*

*_संकलन :- महेश कांबळे_*

*_दिनांक :- २५/०९/२०२२_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2022/09/blog-post_25.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼


Friday, 23 September 2022

शील सदाचाराची शिकवणूक

 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_शील सदाचाराची शिकवणूक_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

          *_अविद्या, राग व द्वेष यांचे समूळ उच्चाटन करून दुःखमुक्ती करून घेण हे आपले मुख्य उद्दिष्ट आहे. या आवाक्यातील उद्दिष्टांपर्यंत आपल्याला पोहचवू शकेल असा मार्ग भगवान बुद्धांनी शोधला, अवलंबिला व इतरांना शिकविला. या मार्गाला त्यांनी 'आर्य अष्टांगिक मार्ग' असे म्हटले आहे._*

       _सोप्या शब्दात हा मार्ग समजावून सांगा अशी विनंती एकदा भगवान बुद्धांना केल्यावर ते म्हणाले,_

         *_'सर्व दुष्कृत्यांपासून दूर रहा, सर्व सत्कृत्यांचाच संचय करा. आणि आपले मन शुद्ध करा."_*

          _हीच मुक्तावस्था प्राप्त केलेल्या माणसांची शिकवणूक आहे. हे विवेचन अगदी स्पष्ट व सर्वमान्य होण्यासारखे आहे. दुसऱ्यांना इजा करणारी कामे आपण करू नयेत, त्याप्रमाणेच सर्वांना हितकारी कामे आपण करावीत. याबद्दल कुणाचाही विरोध असणार नाही. पण काय फायद्याचे व काय तोट्याचे हे कसे ठरवावे? कोणते कृत्य हे सत्कृत्य होते व कोणते दुष्कृत्य ठरते, हा विचार जेव्हा आपण करतो, तेव्हा आपण आपल्या स्वतःच्या मतांवर अवलंबून असतो, आपल्या परंपरागत श्रद्धांवर विसंबतो. आपली पसंती व पूर्वग्रह यांना महत्त्व देतो व त्यामुळेच त्यांच्या अशा संकुचित व्याख्या तयार होतात की, समाजातील काही पंथांना त्या मान्य होतात तर इतरांना अमान्य असतात. अशा प्रकारच्या उथळ स्पष्टीकरणापेक्षा जगन्मान्य होईल अशी सत्कृत्य व दुष्कृत्य, पाप व पुण्य यांची व्याख्या आपल्याला दिली आहे._

           _कोणतेही कृत्य की जे दुसऱ्यांना अहितकारक ठरते, त्यांची मनःशांती घालवते ते दुष्कृत्य वा पाप समजावे. जे कृत्य दुसऱ्यांना हितकारक असते. त्यांच्यात सुखशांती, एकात्मता व सुसंवाद निर्माण करते ते पुण्य वा सत्कर्म समजावे. तसेच कोणतेही कर्मकांड, बौद्धिक कसरती वा क्रियाकर्म करून मनाचे शुद्धिकरण होत नाही, तर पद्धतशीरपणे स्वतःबद्दलच्या खऱ्या सत्याचा स्पष्ट अनुभव घेऊन मनावरचे जुने संस्कार पद्धतशीरपणे काढून टाकून दुःखमुक्तीपर्यंत जाण्यानेच मन शुद्ध होते._

              *_वर सांगितलेल्या आर्य अष्टांगिक मार्गाची शिकवणूक मुख्य तीन भागात विभागली आहे. ती म्हणजे शील, समाधी व प्रज्ञा. शील म्हणजे सदाचार शरीराच्या किवा वाणीच्या सगळ्या दुष्कृत्यांपासून दूर राहणे. समाधी म्हणजे मनाला एकाग्र करण्याचा अभ्यास. आपल्या मनाच्या क्रियांवर नियंत्रण ठेवणाऱ्या शक्तीचा जाणीवपूर्वक केलेला विकास, प्रज्ञा म्हणजे शहाणपण स्वतःच्या अंतर्दृष्टीचा स्वाभाविक विकास व शुद्धिकरण._*

*_सदाचाराचे मूल्य_*

       _ज्या कोणाला धर्माचे आचरण करावयाचे आहे, त्याने सुरुवातच सदाचारापासून करावयाला हवी. धर्म प्रवेशाची ही पहिली पायरी आहे. त्याशिवाय प्रगती होणारच नाही. दुसऱ्याला अहितकारी होतील अशी कृत्ये, क्रिया यांपासून आपण दूरच राहिले पाहिजे. हे समजायला अगदी सोपे आहे. कारण अशा वागणुकीची समाजाच्या स्थैर्यासाठी फार गरज आहे. असे न केले तर समाजाची एकसंघता कशी टिकणार? पण खरंतर आपण अशा कृत्यांपासून दूरच रहायला पाहिजे. कारण यामुळे दुसऱ्याचे तर सोडाच पण आपले स्वतःचेही नुकसान होते. खून, चोरी, दुसऱ्याचा अपमान किंवा बलात्कार ही कृत्ये मनात प्रचंड राग, लोभ किंवा प्रक्षोभ निर्माण केल्याशिवाय घडणे अशक्यच आहेत. आसक्तीचा व द्वेषाचा हा क्षण आत्ताच दुःख निर्माण करतो असे नाही तर भविष्यातही त्याचे ओझे मोठे करतो. *भगवान बुद्ध म्हणतात,*_

        *_'या क्षणी विकाराने जळणे भविष्यातही जाळते. दुष्कृत्य आपल्यासाठी प्रचंड दु:ख निर्माण करते. या क्षणाचा आनंद भविष्याच्या आनंदाची नांदी ठरतो. आताचा सद्गुण भविष्यातही खूप सुख देतो.'_*

         _स्वर्ग किंवा नरक यांचा अनुभव घेण्यासाठी आपल्याला मृत्यूची वाट पाहण्याची गरज नाही. या जन्मात व आपल्यातच, येथेच तो अनुभव घेऊ शकतो. आपल्या हातून जेव्हा दुष्कृत्ये घडतात तेव्हा अभिलाषा व तिटकारा यांच्यामुळे आपल्याला नरकाचे दर्शन होते. जेव्हा आपण सत्कृत्ये करतो तेव्हा आपल्या मनःशांतीतून आपल्याला स्वर्गाचाच अनुभव येतो. म्हणूनच दुसऱ्यांच्या भल्यासाठी नव्हे तर आपल्या फायद्यासाठी, आणि आपल्यालाच होणारी हानी टाळण्यासाठी आपण सर्व प्रकारच्या शाब्दिक वा शारीरिक दुष्कृत्यांपासून दूर राहिले पाहिजे._

       _शील आचरण का करावयाचे याचे कारण म्हणजे आपल्याला आपला स्वतःचा शोध घ्यावयाचा आहे. आपल्या संबंधीच्या सत्यात खोलवर जाऊन बुडी मारावयाची आहे व आपले अंतरंग जाणावयाचे आहे. हे करण्यासाठी मन अतिशय शांत व अविचल असण्याची गरज आहे. अस्थिर व खवळलेल्या तलावात जसे खोलवर काय आहे ते दिसणे अशक्यच आहे, तसेच अंतर्निरीक्षणासाठी प्रक्षुब्धतेपासून मुक्त व शांत अशा मनाची जरुरी आहे. जेव्हा आपण दुष्कृत्य करतो. तेव्हा आपले मन प्रक्षुब्धतेने भरून ओसंडत असते. जेव्हा आपण वाणीच्या व शरीराच्या दुष्कृत्यापासून परावृत्त असतो. तेव्हाच मनाला पाहिजे तेवढी शांती मिळू शकते व अंतर्निरीक्षणाच्या कार्यात प्रगती होऊ शकते._

        _अजून एका कारणासाठी शील-पालनाची आवश्यकता आहे. जो धर्माचरण करतो तो आपले अंतिम लक्ष्य दुःखमुक्ती, या उद्दिष्टाकडे वाटचाल करीत असतो. हे काम करीत असतांना आपण आपल्या मनाची गुंतवणूक अशा गोष्टीत करता कामा नये की ज्यामुळे मनाची नेहमीची सवय वाढीला लागेल. कोणतीही क्रिया की जी दुसऱ्याचे अहितच करते, ती नेहमीच अभिलाषा, हेवा, द्वेष व अज्ञान यांना सोबतच करते. अशी कामे करणे म्हणजेच एक पाऊल पुढे व दोन पाऊल मागे जाणे नव्हे का? असे केले तर मग आपण आपले साध्य कसे व केव्हा साधणार? हा आपल्या प्रगतीतील एक अडथळाच नाही का ?_

         _*शीलपालनाची गरज ही फक्त समाजाच्या हितासाठीच नाही तर त्यातील प्रत्येक घटकाच्या हितासाठी पण आहे. प्रत्येकाच्या शाश्वत सुखासाठीच नव्हे तर त्याच्या धर्माचरणाच्या मार्गासाठी आध्यात्मिक उन्नतीसाठीही आहे. शील-पालनात आर्य अष्टांगिक मार्गातील शिकवणुकीचे तीन भाग येतात. सम्यक् वाचा अथवा वाणी, सम्यक् कर्मान्त व सम्यक् उपजीविका म्हणजेच योग्य वाचा, योग्य कर्म आणि योग्य उदरनिर्वाह.*_

*_सम्यक् वाणी_*

          _आपले बोलणे शुद्ध, सात्विक व हितकारक असले पाहिजे. शुद्धी ही अशुद्धता दूर करूनच मिळवता येते. आणि म्हणूनच पहिल्यांदा वाणीची अशुद्धता म्हणजे काय ते आपण समजावून घेतले पाहिजे. अशुद्ध वाणीत खोटे बोलणे म्हणजेच सत्याला सोडून मोघम बोलणे, दोन मित्रांची मैत्री तुटेल अशा गोष्टी करणे, व्यक्तीच्या पश्चात त्यांची निंदानालस्ती करणे, बदनामी करणे, दुसऱ्याचा शांतताभंग करील वा त्यांना फायद्याचे होणार नाही अशा कठोर शब्दांचा वापर करणे. निरर्थक कुजबुज, अर्थहीन गप्पागोष्टी ज्यांच्यामुळे आपण आपला व इतरांचा वेळ वाया घालवतो, अशी कृत्ये करणे, या व अशा गाष्टी वाणीची अशुद्धी करतात. या सगळ्या गोष्टी सोडल्या तर बाकी सर्व गोष्टी या शुद्ध वाणीतच येतात._

         _सम्यक् वाणी ही काही नकारात्मक संकल्पना नाही. सम्यक वाणी आचरणारा कोण असतो हे भगवान बुद्धांनी असे विशद केले आहे :-_

            _*तो असत्य भाषण सोडून, त्यापासून दूर राहत, सत्यवादी बनून, सत्यसन्ध [सत्याचे आचरण करणारा], लोकांत विश्वासपात्र बनून जसे पाहिले ऐकले तसेच बोलणारा असतो. एक दुसऱ्यांची चहाडी सोडून त्यापासून दूर राहतो, कुणाची गोष्ट इथे ऐकून तिथे सांगत नाही, तिथे ऐकून परस्पर फूट पाडण्यासाठी इकडे सांगत नाही. याप्रमाणे तो भांडणाऱ्यांना जोडण्यासाठी व मिळून राहाणाऱ्यांनी भांडू नये यासाठी आपल्या वाणीचा प्रयोग करतो. ह्याप्रकारे तो सर्वांच्या एकतेत प्रसन्न, सर्वाच्या एकतेत रत सर्वांच्या एकतेत आनंदी राहणारा व एकता निर्माण करणारी वाणी बोलणारा असतो. कठोर वाणीचा व्यवहार सोडून त्यापासून दूर राहतो. तो अशी वाणी बोलण्याचा प्रयत्न करतो जी इतरांना ऐकण्यास चांगली वाटेल, प्रिय वाटेल, हृदयंगम असेल, सभ्य असेल, अधिक लोकांसाठी रूचणारी, आवडेल अशी असेल, निरर्थक गोष्टी सोडून त्यापासून दूर राहतो व अशा प्रकारे तो प्रासंगिक, सार्थक, धर्मयुक्त, अनुशासन प्रमाणित एकोपा घडविणारी वाणीच बोलतो. त्याची वाणी स्मरणयोग्य, समयोचित व्यवहारयुक्त आटोपशीर, परिणामकारक व सार्थक असते.*_

*_सम्यक् कर्मान्त [शारीरिक कर्म ]_*

          _शारीरिक कर्म देखील शुद्ध हवे. वाणीप्रमाणे शारीरिक कर्माचीही शुद्धता समजण्यासाठी आपल्याला दूषित कर्मे कोणती हे समजावून घेतले पाहिजे. म्हणजे आपण त्यापासून दूर राहू शकू. अशुद्ध कर्मे म्हणजे जिवंत प्राण्यांची हत्या, चोरी, व्यभिचार, नशापाणी की ज्यामुळे माणूस आपली सारासार बुद्धी गमावून बसतो व आपण काय बोलतो, कसे वागतो याची त्याला शुद्ध राहत नाही. या चारही गोष्टी सोडल्या तर जी कर्मे राहतात ती सर्व शुद्धच राहतात. ती सारी सत्कर्मेच आहेत._

           _सम्यक् कर्मे ही देखील नकारात्मक संकल्पना नाही. सम्यक कर्मे आचरणाऱ्याचे वर्णन करताना भगवान बुद्ध म्हणतात, *'जो तलवार व दंड बाजूला ठेवून शांततेच्या मार्गाने कुणालाही इजा न करता सर्वांवर दयाच करतो. जगातील सर्व प्राण्यांचे भले अपेक्षितो, चोरीपासून दूर असतो आणि जो स्वतः अतिशय शुद्ध आचरण करतो, तोच सम्यक् कर्म आचरणारा.*_

*_शील_*

          _संसारी सर्वसामान्य जीवन जगण्यासाठी सम्यक् वाणी व कर्म अवलविण्यासाठी खालील पाच नियम पाळणे आवश्यक आहे :-_

      _महत्त्वाच्या पायऱ्या आहेत दुसऱ्याच्या किंवा आपल्या अहितापासून आपणास सुरक्षित ठेवण्याचा हा एक व्यवहार्य तोडगाच आहे._

[१] कोणत्याही सजीव प्राण्याची हत्या न करणे

[२] चोरी न करणे

[३] व्यभिचार न करणे

[४] खोटे न बोलणे

[५] कोणत्याही प्रकारचे नशापान न करणे.

        _वरील पाचही नियमांचे काटेकोर पालन करणे हे धर्माचरण करणाऱ्यांसाठी फारच आवश्यक आहे._

         _आपल्या आयुष्यात कधी कधी दैनंदिन व्यवहार थांबवून कदाचित थोड्या दिवसांकरिता किंवा एक दिवसाकरिता का होईना मनाच्या शुद्धिकरणासाठी किंवा मुक्तीसाठी काम करण्याची संधी येते. अशा वेळी मोठ्या निष्ठेने धर्मपालन करण्याची जरूरी असते. आणि म्हणूनच, नेहमीपेक्षा आपला आचार-विचार जरा काळजीपूर्वकच व्हावा लागतो. स्वतःच्या शुद्धिकरणास मारक ठरतील अशा गोष्टी ह्या वेळी टाळणे जास्त महत्त्वाचे असते व म्हणूनच अशा वेळी पाच ऐवजी आठ नियमांचे पालन करावयाचे असते. त्यात पहिल्या पाच नियमांमध्ये एक बदल केला जातो. तो म्हणजे केवळ व्यभिचारापासून दूर राहण्यापेक्षा संपूर्ण ब्रह्मचर्य पाळले जाते. त्याचबरोबर अवेळी म्हणजे दुपारी बारानंतर अन्न ग्रहण करू नये. कोणत्याही प्रकारची शरीर सजावट वा मौजमजा, करमणूक व आरामदायी विलासी शय्या टाळावी. ब्रह्मचर्य व इतर नियमांमुळे स्वनिरीक्षणासाठी लागणारी मनाची शांती व जागरुकता वाढण्यास व तिचे पोषण होण्यास मदत होते. तसेच बाह्य गोष्टींमुळे होणाऱ्या शांतताभंगापासून मनाची सुटका होते. या आठ नियमांचे पालन फक्त निष्ठेने धर्म साधनेच्या वेळीच होणे जरूरीचे आहे. नंतर आपल्या दैनंदिन जीवनात सदाचारासाठी सांगितलेले पाच नियमच पाळणे पुरेसे आहे._

         _ज्यांनी घरादाराचा त्याग करून एकांतवास किंवा भिक्षु व भिक्षुणीचे जीवन पत्करले आहे, त्यांच्यासाठी हे नियमपालन आठवरून दहावर जाते. पहिल्या आठ नियमांखेरीज त्यांनी अर्थाजन करू नये, कोणत्याही कामासाठी पैसे घेऊ नयेत भिक्षेवरच आपला उदरनिर्वाह करावा, म्हणजे आपल्या स्वतःसाठी व समाजाच्या फायद्यासाठी आपला संपूर्ण वेळ ते मनाच्या शुद्धिसाठी देऊ शकतील._

          _*पाच, आठ वा दहा नियमांचे पालन म्हणजे काही निरर्थक रूढी नाहीत. त्या भगवान बुद्धांची शिकवणूक पाळून पुढे जाण्याच्या खऱ्या अर्थी अतिशय महत्वाच्या पायऱ्या आहेत दुसऱ्याच्या किंवा आपल्या अहितापासून आपणांस सुरक्षित ठेवण्याचा हा एक व्यवहार्य तोडगाच आहे.*_

*_सम्यक्-उपजीविका_*

             _आपल्या सर्वांना उदरनिर्वाहासाठी कोणत्या ना कोणत्या योग्य मार्गाचा अवलंब करावयास पाहिजे. योग्य उपजीविकेची दोन मोजमापे आहेत. एक म्हणजे ती दुसऱ्याला कोणत्याही प्रकारची इजा पोहोचवणारी नसावी. म्हणजेच तिच्यामुळे वर सांगितलेल्या पहिल्या पाच नियमांचा भंग होता कामा नये. *इतकेच काय पण आपण असा कोणताही व्यवसाय निवडू नये की त्यामुळे इतरांना वरील पाच नियम मोडण्यास प्रोत्साहन मिळेल व त्यापासून त्यांची हानी होईल.*_

           _आपल्या उपजीविकेच्या मार्गाने प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष दुसऱ्याला इजा होता कामा नये. *म्हणजे ती उपजीविका ज्यात माणसांची किंवा अन्य प्राण्यांची हत्या करावी लागते, ती सम्यक् उपजीविका होऊच शकत नाही. इतकेच काय पण दुसऱ्याने मारलेल्या प्राण्यांची हाडे, मांस, कातडी किंवा अन्य भाग यांची विक्रीही योग्य ठरत नाही कारण ती दुसऱ्याने केलेल्या अयोग्य कर्मावरच आधारित असते. दारूची किंवा इतर मादक पदार्थांची विक्री कितीही फायद्याची असली व आपण स्वतः त्यापासून दूर असलो तरी ती दुसऱ्यांना व्यसनाधीन करण्यास प्रवृत्त करते व त्यांना हानीकारक असते म्हणून सम्यक् उपजीविका होऊ शकत नाही. जुगाराचा अड्डा चालवणे आर्थिकदृष्ट्या खूप फायद्याचे असेलही परंतु तेथे येणाऱ्यांचे मात्र नुकसानच होते. विष किंवा शस्त्रे, मारक हत्यारे, दारूगोळा, बॉम्ब, दूर पल्ल्याची शस्त्रे यांचाही व्यवसाय खूप पैसा मिळवून देत असेलही. पण तो हजारो लोकांची शांती व समन्वय बिघडवतो व त्यामुळे सम्यक् व्यवसाय होऊ शकत नाही.*_

              _ज्या कर्मामुळे लोकांचे उघड उघड नुकसान होणार नाही, पण त्यामागे मनाची प्रेरणा चांगली नसेल, शुद्ध नसेल, तर असे काम सम्यक् उपजीविकेत येणार नाही. उदा. एखादा चांगला डॉक्टर आहे, पण तो एखादी मोठी साथ यावी व मला भरपूर पैसा मिळावा अशी इच्छा करतो. एखादा व्यापारी साठेबाजी करून किंवा दुष्काळ पडून माझा माल चढ्या किंमतीत विकला जावा अशी इच्छा करतो, या सम्यक उपजीविका होऊ शकत नाहीत._

           _आपण प्रत्येकजण समाजाचे घटक आहोत. आपण समाजाची बांधिलकी मानून काही कामे करतो, कोणाची तरी गरज पूर्ण करतो व आपला निर्वाह भागवीत असतो. भिक्षु किंवा घरादाराचा त्याग केलेला संन्यासी सुद्धा आपल्या मनाचे शुद्धिकरण करून आध्यात्मिक प्रगती साधून आपले व समाजाचे हित साधतो. यांनादेखील समाजाकडून भिक्षा व माधुकरी मिळते. पण जर त्याने आपल्या शक्तीचा दुरुपयोग करून समाजाची फसवणूक किंवा दिशाभूल केली, लोकांना चमत्कार वगैरे दाखवून आपल्या आध्यत्मिक उन्नतीचे वृथा प्रदर्शन केले, तर ती देखील सम्यक उपजीविका म्हणता येणार नाही._

        *_आपल्या कामाबद्दल मिळणारा मोबदला आपण आपल्या कुटुंबियांच्या भरण पोषणासाठी वापरतो. त्यातील जास्तीचा भाग, ते शक्य नसेल तर कमीत कमी काही भाग समाजाकडे परत गेला पाहिजे, समाजात जे कमी सुदैवी लोक आहेत. त्यांच्या उपयोगी पडला पाहिजे. समाजातील एक उपयोगी घटक होऊन आपण आपल्या व समाजाच्याही उपयोगी पडावे या प्रेरणेने केलेली सर्व कामे सम्य उपजीविकेत येतील._*


*_विपश्यना साधनेच्या शिबिरातील शील पालन व अनुशासन_*

         *_सम्यक वाचा, सम्यक् कर्मात व सम्यक उपजीविका हे आपल्या व समाजाच्या हिताचे आहेत. म्हणून त्यांना धरून आचरण केले पाहिजे. विपश्यना साधनेच्या शिबिरात सर्व प्रकारच्या शीलपालनाचा अभ्यास करण्याची फार उत्तम संधी मिळते. धर्मपालनाचा चांगला अभ्यास करण्यासाठी मुद्दाम राखून ठेवलेला हा काळ असतो. म्हणूनच प्रत्येक शिबिरार्थीने आठही नियमांचा प्रयत्नपूर्वक अभ्यास करावयाचा असतो. तरी देखील नेहमीच्या सवयीचा विचार करून प्रथमच भाग घेणाऱ्यांना किंवा शारीरिक त्रास असणाऱ्यांना सवलत दिली जाते. त्यांना संध्याकाळी थोडासा आहार दिला जातो. आणि म्हणूनच जरी ते जवळ जवळ आठ नियमांचे पालन करीत असले तरी त्यांना पाचच शीलपालनाची प्रतिज्ञा दिली जाते._*

            *_ह्या नियमांबरोबर शिबिरार्थींनी कडक मौन पाळावयाचे असते. त्यामुळे शेवटच्या दिवसापर्यंत शिबिरात भाग घेणाऱ्यांना आपापसात बोलण्यास सक्त मनाई आहे. आपल्या अडचणीसंबंधी ते आपल्या शिक्षकांशी किंवा व्यवस्थापकाशी संपर्क साधू शकतात. अशा प्रकारे कमीत कमी अडथळ्यामुळे त्यांना साधनेत खूपच मदत होते. एकमेकांना अडथळा न करता लोक बंदिस्त जागेत राहून काम करू शकतात. अशा या एकांत, प्रसन्न व शांततामय वातावरणात स्वनिरीक्षणासारखा हळूवार, नाजूक अभ्यास करणे शक्य होते._*

            *_इथे प्रशिक्षणार्थीना अन्न व निवास दिला जातो. त्याचा खर्च इतरांनी दिलेल्या दानावरच चालतो. अशा प्रकारे प्रशिक्षणाच्या काळात सर्वजण जवळ जवळ घरादाराचा त्याग केलेल्या संन्याशासारखे राहतात व इतरांनी केलेल्या दानावरच आपला निर्वाह करतात. आपल्या कार्यक्षमतेप्रमाणे काम करून शिबिरार्थी आपले व इतरांचे भले करतात. विपश्यना साधनेच्या अभ्यासाच्या प्रशिक्षणात भाग घेऊन साधक अशा प्रकारे सम्यक उपजीविकेचा अभ्यास करतात._*

                 _*शीलपालन हा धर्मपालनाचाच एक अविभाज्य घटक आहे.* ह्याशिवाय धर्माच्या मार्गात प्रगतीच होऊ शकत नाही. कारण ह्याशिवाय मन फारच प्रक्षुब्ध असते व त्यामुळे आतील सत्याचा शोध घेणे शक्य होत नाही. *असे काही आचार्य आहेत की जे शीलपालनाशिवाय आध्यात्मिक प्रगतीची शिकवणूक देतात. ते जे काही शिकवतात ती भगवान बुद्धांची शिकवणूक नाही हे मात्र नक्की.* त्यामुळे शीलाचे पालन न करता वेगवेगळ्या अतीआनंददायक अवस्थांचा अनुभव करता येत असेल पण त्यांना आध्यात्मिक मार्गातील साध्य समजणे चुकीचेच ठरेल. *शीलपालनाखेरीज माणूस दुःखापासून मुक्त होऊ शकणार नाही. अंतिम सत्यापर्यंत पोहोचूही शकणार नाही हे मात्र निश्चित.*_

*_कल्याणकारी मार्ग सर्वांना लाभो !_*

*_मुक्तीदायिनी प्रेरणा सर्वांत जागृत हावो.._*

*_!! धन्य होवो ! मंगल होवो ! कल्याण होवो !!_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_संदर्भ :- जागे पावन प्रेरणा_*

*_संकलन :- महेश कांबळे_*

*_दिनांक :- २४/०९/२०२२_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2022/09/blog-post_23.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

Thursday, 22 September 2022

मगधाचा भाग्योदय

 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_मगधाचा भाग्योदय_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

         _*सव्विसशे वर्षांपूर्वी उत्तर भारतात १६ प्रमुख गणराज्ये होती.*_ 

          _१. अंग. २. मगध, ३. काशी, ४. कोशल, ५. बिजी [बज्जि] ६. मल्ल, ७. चेतीय, ८. वंस [ग], ९. कुरू, १०. पंचाल, ११. मत्स्य, १२. सुरशेन, १३. अश्यक. १४. अवन्ती, १५. गंधार आणि १६. कंबोज._

        _यातील काही गणतंत्र होती व बाकी राजतंत्र शासनाखाली होती. *यात मगध हे फार मोठे व सामर्थ्यसंपन्न राज्य होते. तेथे राजकुलीन शासनाचा शासक महाराज भाति होता. त्याला महाराणी बिम्बिपासून एक पुत्ररत्न प्राप्त झाले. बिम्बिचा मुलगा म्हणून तो बिम्बिसार या नावाने प्रसिद्ध झाला.*_

       _बिम्बिसार फार महत्वाकांक्षी राजा होता. किशोरावस्थेतच त्याच्या मनात राज्याभिषेक करवून घेण्याची प्रबळ इच्छा निर्माण झाली. राजा भातिचे आपल्या पुत्रावर निरतिशय प्रेम होते. त्याने पंधरा वर्षांच्या किशोर बिम्बिसारचा राज्याभिषेक करून टाकला व स्वतः राज्यकारभारातून निवृत्त झाला. बिम्बिसारची महत्वाकांक्षा वाढत गेली. युवावस्थेपर्यंत तो शस्त्र विद्येत प्रवीण झाला आणि सैन्याचे संचालनाच्या रण कौशल्यात निपुण झाला. त्याने आपली सेना विविध शस्त्रास्त्रांनी सुसज्ज केली. या विपुल सैन्य बळावर आणि रणांगणातील युद्ध चातुर्यामुळे त्याने शेजारच्या अंग देशाचे राज्य जिंकले. *अंग आणि मगध दोन राज्ये एक झाल्यावर बिम्बिसारची शक्ती वाढली. सेना वाढली. या विशाल सैन्याचा अधिपती झाल्यामुळे तो स्वतःला सेनिय म्हणजे सेनापती बिम्बिसार म्हणवू लागला.* त्याच्या सेनेचा झेंडा शुभ्र पांढरा होता. त्या श्वेतकेतू-सेनेचा दबदवा वाढला आणि ती सेना आसपासच्या जनपद गणराज्यावर अधिपत्य गाजवू लागली._

       _*मगधाच्या पश्चिगोत्तर सीमेवर कोशल देखील एक फार मोठे व शक्तीशाली राज्य होते. त्याचा राजा होता महाराज महाकोशल. त्याच्या मुलाचे नाव प्रसेनजित व मुलीचे नांव कोशलदेवी होते. राजकुमार प्रसेनजितचा विवाह मगधाचा राजा भाति याच्या कन्येशी म्हणजे बिम्बिसारच्या बहिणीशी झाला होता. भातिचे उत्तराधिकारी सेनिय बिम्बिसारचे वाढते सामर्थ्य पाहून कोशल नरेश प्रभावित झाला आणि त्याने राजकुमारी कोशलदेवीचा विवाह मगधाच्या युवा नरेशाशी करून टाकला व आपले संबंध बळकट केले.* महाराज कोशलने आपल्या कन्येला काशीचे राज्य वरदक्षिणेदाखल देऊन टाकले. त्यामुळे बिम्बिसारच्या साम्राज्याची शक्ती अधिकच वाढली. आता तो अंग, मगध व काशी या सारख्या तीन महाजनपदांचा सम्राट झाला. त्याच्या राज्याची संपदा-ऐश्वर्य आणि सैन्याचे शौर्य उत्तरोत्तर वाढू लागले. व त्या बरोबरच युवावस्थेतील कामपिपासा भोगवादी वृत्ती वाढू लागली. पट्टराणी कोशलदेवी व्यतिरिक्त आजुबाजूच्या देवांगना सदृश सौंदर्यवान राजकुमारींनी आणि अन्य सौंदर्य शालिनी स्त्रियांनी त्याचा राणीवास वाढतच गेला. तरी देखील त्याचं सौंदर्य पिपासा कमी झाली नाही._

       _*दूरच्या मद्र [मद्द] देशाची राजधानी सागलची [आधुनिक पाकिस्तानी पंजाबमधील लाहोरनजीकचे सियालकोट शहर] ची राजकन्या खेमा सुवर्णरंगी होती. सर्वांगसुंदर सौंदर्यवती होती. तिच्या अतुलनीय रूपमाधुर्याची चर्चा बिम्बिसारने ऐकली तेव्हा तिच्याशीही त्याने विवाह केला. आपल्या अंतःपुरात तिला महत्वपूर्ण स्थान दिले.*_

         _तो ज्या कोणी गणराज्यातील एखाद्या सौंदर्यवतीचे नाव ऐकत असे तिच्याशी विवाह करण्यासाठी, तिच्या प्राप्तीसाठी तळमळू लागे. त्या काळात काही काही गणराज्यात आपल्या प्रदेशातील सर्वश्रेष्ठ सुंदरी आणि नृत्य गायन, वादन इ. ललित कलात नितांत निपुण युवतींच्या स्पर्धा होत असत गणराज्यांतील अनेक राजकुमार, राजपुरुष, शक्तीशाली सामंत इत्यादी त्या सौंदर्यसम्राज्ञीशी विवाहबद्ध होण्यासाठी उतावीळ होत असत. परस्पर कलह भांडण, तंटे होऊ नयेत या भीतीने त्या युवतीला गणिका पद देऊन मानसन्मान दिले जात असत. जनपदकल्याणी नावाने विभूषित केले जात असे. तिला जनपदाच्या प्रमुख गणिकेचे जीवन व्यतीत करावे लागत असे, आणि राज्यामार्फत तिच्या शरीरसुखाची किंमत फार मोठी ठरवून दिली जात असे._

      _*अशीच एक सौंदर्य सम्राज्ञी होती. नगर वधू आम्रपाली, ती वज्जि [लिच्छवी] गणराज्याची जनपद-कल्याणी होती.* तिच्या सौंदर्याची ख्याती ऐकून बिम्बिसार तिची प्राप्ती व्हावी म्हणून विव्हळ झाला. वञ्जि राज्याशी मगधाचे संबंध फारसे चांगले नव्हते. आणि कोणाही जनपद कल्याणीशी विवाहसंबंध न ठेवण्याची अलिखित प्रथा होती. म्हणून आपली कामवासना शमविण्यासाठी तो आपल्या काही सैनिकांसह वारंवार वज्जिची राजधानी वैशाली येथे वेश बदलून जात असे, आणि तिच्या शरीर सौंदर्याचा उपभोग घेत असे._

        _याचप्रमाणे उज्जैनची जनपदकल्याणी पद्मावतीची ख्याती ऐकून तो तेथेही गेला._

          _अशाप्रकारे अन्य प्रादेशिक सौंदर्य सम्राज्ञीच्या मागे ही तो भ्रमराप्रमाणे भ्रमण मंडले करीत असावा. परंतु आम्रपाली आणि पद्मावतीशी असलेला त्याचा संबंध जगजाहिर झाला. कारण दोघींनाही त्याच्यापासून एक एक मुलगा झाला. *बिम्बिसारपासून आम्रपालीला 'विमलकौंडन्य' आणि पद्मावतीला 'अभय' नावाचा पुत्र झाला.*_

          _धन-मद आणि राज्य-मद यांच्यामुळे त्याचा काम-मद फारच वाढला. परंतु तरी देखील बिम्बिसारने मानवी जीवनमूल्यांची पायमल्ली केलेली नाही, असे आपल्याला दिसते. या *शरीरविक्रयातून गणिकांना जी मुले झाली त्या मुलांचा त्याने सहर्ष स्वीकार केला होता. त्यांच्याबाबतच्या नैतिक जबाबदाऱ्या, उत्तरदायित्व त्याने सांभाळले. ते टाळले नाही. गर्भावस्थेपासूनच त्यांच्या उदर भरणाची जबाबदारी घेऊन आपल्यामार्फत पर्याप्त धन तो त्यांच्याकडे पाठवीत राहिला. आणि नंतर संगोपन-संवर्धनाची जबाबदारीही पार पाडली. पद्मावतीने सात वर्षानंतर पुत्र अभय याला त्याचा पिता बिम्बिसार यांच्याकडे पाठविले तेव्हा त्याने त्याच्याशी किंचितही दुर्व्यवहार केला नाही. अन्य राजकुमारांप्रमाणेच वागविले, कोणताही भेदभाव केला नाही. अन्य राजकुमारांप्रमाणेच अभयही राजमहालात राहात असे. राजकुमार अभयविषयी बिम्बिसारच्या मनात अन्य राजपुत्राप्रमाणेच प्रेम व वात्सल्य भावना होती. पुढे एकदा तर त्याने त्याला सात दिवसांसाठी मगधाच्या राजसिंहासनावरही बसविले.*_

         _*बिम्बिसारच्या आणखीही काही राजराण्या होत्या. म्हणून त्याला आणखीही काही मुले असण्याची शक्यता आहे. परंतु विपश्यनेच्या प्राचीन इतिहासाचे संशोधन करतांना जी अन्य काही नावे समोर आलीत त्यात आहेत राजकुमार अजातशत्रू, राजकुमार शीलव, राजकुमार धुंद आणि राजकुमारी चुंदी..*_

        _बिम्बिसारला आपले कुटुंब फार प्रिय होते, त्याला राण्या, राजपुत्र आणि राज्यकन्या अत्यंत आवडत होत्या. पंधरा वर्षाच्या किशोरअवस्थेत राज्याभिषेक झाल्यावरही सोळा वर्षे पर्यंत त्याने मगध साम्राज्याचे सूत्र संचालन केले. *वयाच्या एकतीसाव्या वर्षी बिबिसारची भगवान गौतम बुद्धांशी राजगृहाच्या लट्ठिवनामध्ये पहिली भेट झाली. [तसा तो बोधिसत्व परिव्राजक सहा वर्षापूर्वी पांडव पर्वतावर भेटला होताच.]* पहिल्या प्रथम भगवान बुद्धांचा उपदेश ऐकून बिम्बिसार अंतर्मुखी झाला व त्याला सत्याच्या दर्शनामुळे स्त्रोतापत्र अवस्था प्राप्त होऊन त्याचे मन कृतज्ञता भावनेने भरून आले. विपश्यनेद्वारा आपल्या अंतरंगातील सत्याचा थोडासा जरी अनुभव आला तरी साधक कृतज्ञताविभोर होतो. ही तर स्रोतापत्र अवस्था होती. कृतज्ञतेचे तेथे सांगावे?_

       _त्याचा जीवनप्रवाहच बदलला. कामक्रिडेत, रतिरसात धुंदफुंद झालेला माणूस धर्मरसात गोडी घेऊ लागला. आपल्या अनुभवावरून त्याला समजले की *'सब्बरसं धम्मरसं जिनाति' धर्मरस हाच सर्व रसात श्रेष्ठ रस आहे.* हा धर्म सर्वांनी प्राशन करावा-चाखावा. आणि त्याच वेळी आपल्या प्रिय पत्नी, पुत्र, कन्या सर्वांनाच याचा लाभ मिळावा या सदिच्छेने भगवान बुद्धांसमवेत सर्व भिक्षूंना भोजनासाठी राजमहालात दुसऱ्या दिवशी सकाळी येण्याचे निमंत्रण दिले. भगवानांनी मौन स्वीकृती दिली. दुसऱ्या दिवशी भिक्षुसंघासह भगवान भिक्षेसाठी राजमहालात पोहोचलो. बिम्बिसारने अत्यंत सन्मानपूर्वक त्यांना भोजन वाढले. त्यानंतर भगवानांना उच्चासनावर बसवून व आपण खालच्या आसनावर बसून भगवानांचा कल्याणकारी धर्मोपदेश ऐकला. कानावर शुद्ध धर्माचा अमृतरस वर्षु लागला.  तिथेच बसल्या बसल्या आपल्या प्रजेची आठवण झाली. माझी सारी प्रजा म्हणजे माझीच मुलेबाळे सर्वांनाच हा विशुद्ध मुक्तीचा मार्ग मोकळा व्हावा, कळावा. पण भगवान दीर्घ काळ राजगृहात राहिले तरच हे शक्य आहे आणि भविष्यातही वेळोवेळी त्यांचे येथे आगमन होत राहावे._

     _राजधानी राजगृहाच्या कल्याणार्थ असे एखादे योग्य ठिकाण असावे की जिथे भिक्षु संघासहित भगवानांचा निवास व्हावा आणि शुद्ध धर्म मार्गाने जाण्यासाठी नागरिकांना व ग्रामीण जनतेलाही त्यांचे मार्गदर्शन व्हावे. हे स्थान राजधानीच्या कोलाहलापासून दूर असावे. कारण ध्यानसाधनेसाठी शांत एकांतवासाच असावा लागतो. पण ते राजधानीपासून इतके दूर ही नसावे की लोकांना तिथे निर्वेध जाणे शक्य नसावे. *एकाएकी अकस्मात त्याला वेणुवनाची आठवण झाली. हे ठिकाण या धर्मकार्यासाठी सर्वथैव उपयुक्त होते. अत्यंत विनम्र भावाने त्याने आपल्या मनातील ही धर्मभावना भगवानांना बोलून दाखविली. भगवानांनी मौन स्वीकृती दिली. बिम्बिसार पुन्हा एकदा कृतज्ञता विभोर झाला. 'सब्बदानं धम्मदानं जिनाति' धर्माचे दान सर्व दानात श्रेष्ठ दान असते. भगवानांनी राजगृहाचे वेणुवन, साधक संघासाठी स्वीकारले,* मगध नरेश कृतार्थ झाला. 'इथे अनेक लोकांना शुद्ध धर्माचा लाभ होईल, ते सांसारिक मुक्ततेच्या मार्गावर आरूढ होणारी 'विपश्यना' शिकतील. माझा परिवार धन्य होईल. माझी प्रजा धन्य होईल.'_

        _आणि खरोखरच तसे घडून आले. *वेणूवनाच्या कलंदप निवासात साधक संघाचा पहिला विहार-मठ स्थापन झाला. मगधाचे भाग्य उदयाला आले. राजपरिवार आणि मगध राष्ट्र त्याचप्रमाणे त्या राज्याबाहेरील अनेक लोक शुद्ध धर्माच्या संपर्कात आले, आणि मांगल्याचे धनी झाले.*_

         आजही भारतात पुन्हा शुद्ध धर्माचा उदय झाला आहे. अनेक लोक त्याच्या सान्निध्यात यावेत व कल्याणकारी मांगल्याचा लाभ करून घ्यावा._

*_कल्याणकारी मार्ग सर्वांना लाभो !_*

*_मुक्तीदायिनी प्रेरणा सर्वांत जागृत हावो.._*

*_!! धन्य होवो ! मंगल होवो ! कल्याण होवो !!_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_संदर्भ :- जागे पावन प्रेरणा_*

*_संकलन :- महेश कांबळे_*

*_दिनांक :- २३/०९/२०२२_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2022/09/blog-post_22.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

Wednesday, 21 September 2022

डॉक्टरांनी दिलेली औषधाची चिट्ठी

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_डॉक्टरांनी दिलेली औषधाची चिट्ठी_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

              _एक माणूस आजारी पडतो व डॉक्टरांकडे उपचारासाठी जातो. डॉक्टर त्याची पूर्ण तपासणी करून त्याला काही औषधे एका चिट्ठीवर लिहून देतात. या माणसाची आपल्या डॉक्टरांवर खूप श्रद्धा असते. घरी परतल्यावर तो आपल्या प्रार्थनेच्या खोलीत डॉक्टरांचा एक सुरेख फोटो मांडतो, नंतर तो त्या फोटोला अतिशय श्रद्धेने नमस्कार करतो व त्याच्यापुढे बसतो, तीन वेळा वाकून नमस्कार करतो. फुले वाहतो, उदबत्ती लावतो. मग तो डॉक्टरांनी त्याच्यासाठी दिलेल्या औषधाची चिट्ठी बाहेर काढतो व मोठ्या आदराने ती चिट्ठी पुन्हा पुन्हा वाचतो. 'दोन गोळ्या सकाळी दोन गोळ्या दुपारी ! दोन गोळ्या रात्री!' साऱ्या दिवसभरच काय, पण आयुष्यभर तो त्या चिट्ठीचा जप करीत राहतो, कारण डॉक्टरांवर त्याची नितांत श्रद्धा असते. आणि तरी देखील चिट्ठीचा त्याला रोग बरा होण्यासाठी काहीही उपयोग होत नाही.._

           _मग तो माणूस त्या चिट्ठीबद्दल जास्त माहिती गोळा करण्याचे ठरवितो. व म्हणूनच तो धावत आपल्या डॉक्टरांकडे जातो व त्यांना विचारतो, 'आपण मला हीच औषधे का बरे लिहून दिलीत ? त्या औषधांनी मला मदत कशी होणार ?" डॉक्टर आपल्या व्यवसायात निपूण असल्याने ताबडतोब सांगतात, 'असं बघा, तुम्हाला अमुक अमुक रोग झाला आहे व त्या रोगाचे मूळ कारण असे आहे की मी दिलेले औषध जर आपण सांगितल्याप्रमाणे घेतले तर ते त्या कारणाचा संपूर्ण नाश करील. ते कारण दूर होईल. एकदा हे कारण दूर झाले की आपोआपच तुम्हाला झालेला रोग बरा होईल. '_

            _तो माणूस विचार करतो, 'ओ; फारच छान! माझे डॉक्टर किती हुशार आहेत नाही! त्यांनी लिहून दिलेली औषधे किती उपयुक्त आहेत नाही!' घरी आल्यावर तो आपल्या शेजाऱ्यांशी व संबंधितांशी भांडू लागतो व आग्रह धरतो की, 'माझे डॉक्टर हे सर्वोत्तम डॉक्टर आहेत, इतर सर्व डॉक्टर निरुपयोगी आहेत.' पण या चर्चेमुळे त्याला काय मिळणार? साऱ्या आयुष्यभर जरी तो यासाठी भांडत राहिला तरी त्याचा त्याला यत्किंचितही फायदा होणार नाही. जर त्या माणसाने औषध घेतले तरच तो त्या आजारातून मुक्त होईल, तेव्हाच त्या औषधाचा त्याला खरा फायदा होईल._

           *_प्रत्येक 'मुक्त' झालेला माणूस हा त्या डॉक्टरसारखा असतो. तो समाजातील माणसांना दुःखमुक्त कसे व्हायचे याचे मार्गदर्शन करतो, त्या मार्गावर चालायचे याचे विवेचन करणारी चिट्ठी देतो. जर लोकांनी त्या महापुरुषाबद्दल नुसतीच अंधश्रद्धा बाळगली, त्याने दिलेल्या चिट्ठीचे त्यांनी पुराणात रूपांतर केले व दुसऱ्या पंथातल्या लोकांशी मोट्या आवेशाने भांडायला सुरुवात केली, आमच्या धर्मसंस्थापकांची शिकवणूक ही सर्वश्रेष्ठ आहे, पण कोणीही ती शिकवणूक आचरणात आणली नाही; तर काय होणार? दुःखमुक्ती कशी होणार?_*

        *_डॉक्टरांवरील श्रद्धा जर त्यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार रोग्याला औषधे घेण्यास प्रवृत्त करणारी असेल तर नक्कीच उपयोगाची आहे. औषधांचा परिणाम कसा होतो हे जाणणे जर औषध घेण्यास प्रवृत्त करणारे असेल तरच ते उपयोगी पडेल. पण प्रत्यक्षात कोणतेही औषध न घेता नुसत्या डॉक्टरांवरील श्रद्धेने कोणीही आपल्या आजारातून बरा होऊ शकणार नाही. दुःखमुक्तीसाठी आपण स्वतः औषध हे घेतलेच पाहिजे._*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_संदर्भ :- जगण्याची कला_*

                      _*विपश्यना साधना*_

*_संकलन :- महेश कांबळे_*

*_दिनांक :- २२/०९/२०२२_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2022/09/blog-post_21.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

Saturday, 17 September 2022

दोन टोकांच्या मध्ये मध्यममार्ग

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

 *_दोन टोकांच्या मध्ये मध्यममार्ग_*

*_[ अतिरेक नको ]_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

            _त्या काळात लोक दोन प्रवाहात वहात होते. *दोन अतिरेकाच्या दोन धारा एक प्रवृत्तीची व दुसरी निवृत्तीची.* पण दोन्ही प्रवाह कमालीचे दूषित झाले होते. प्रवृत्ती मार्गातील लोक, काम-भोग विलासांच्या चिखलात गळ्यापर्यंत रुतलेले होते आणि निष्पाप पशूंच्या हत्या करवून भिन्न प्रकारचे रक्तरंजित  यज्ञ धंदेवाईक पुरोहितांकडून करवून घेत आणि असे मानत की यामुळे अग्नि देव, इंद्र, ब्रह्म इत्यादी प्रसन्न होऊन आपल्याला अमरत्व प्रदान करतील. निश्चितच हा मार्ग शुद्ध धर्माच्या विरोधी व पापे वाढविणाराच होता. म्हणून त्याला_

*_हीनो गम्मो पोथुज्जनिको अनरियो अनत्थसंहितो_*

          _- म्हटले गेले. म्हणजे हीन, अडाणी, पृथकजनांचा आनार्यांचा अनर्थकारक मार्ग._

   _दुसरा मार्ग निवृत्तीमार्ग. त्याने देखील एकांतिक टोक गाठले होते._

*_'अत्तकिलमथानुयोगो दुक्खो अनरियो अनत्थसंहितो'_*

         _दुःखदायक आत्मक्लेशांचा मार्ग अनार्यांचा अनर्थ संग्राहक मार्गच बनला आहे. मुक्ती मार्गाला सर्वथैव प्रतिकूल. भगवान बुद्धांनी या दोन्ही एकांतिक मार्गाहून भिन्न असा पुरातन, सनातन मध्यममार्ग स्वीकारला व तोच सर्वांना कल्याणकारक मंगल मार्ग सिद्ध झाला. जे लोक अति एकांतिक मार्गावर सैरभैर भटकत होते, त्यांना मुक्तीचा सन्मार्ग मिळाला. दृढतापूर्वक या सन्मार्गाने जाऊन धर्मासंबंधी निःशंक होऊन मुक्त झाले व त्यांनी आपले कल्याण करून घेतले._

     _या संदर्भात भगवानांच्या जीवन कालातील एक श्रवणीय घटना ती अशी :-_

     _*जम्बुक नांवाचा एक अत्यंत गरीब घराण्यात जन्मलेला माणूस. युवावस्थेत येताच प्रव्रजित होऊन मुक्ती प्राप्तीसाठी त्याने आत्मक्लेशाचा मार्ग स्वीकारला आणि चुकीच्या मार्गाने 'मुक्ती' पासून दूरच होत गेला. या आत्यंतिक आत्मक्लेशांच्या मार्गालाच तो 'मुक्ती'चा मार्ग समजू लागला. अत्यंत शारीरिक यातना सहन करणे हाच मनाच्या शुद्धिकरणाचा एक साधना मार्ग समजू लागला.* जीवनाचा अधिकांश वेळ याच मिथ्या मार्गाचा अवलंब करू लागला. पण काहीच फळ त्याच्या पदरी पडले नाही._

           _एक दिवस त्याच्या सुदैवाने भगवान बुद्ध त्या मार्गाने जात होते. त्याची दयनीय दशा पाहून त्यांनी त्याला मंगलमय मध्यम मार्गाचा निर्दोष-प्रतिपदाचा उपदेश केला. पूर्व जन्माच्या कोणत्या तरी सत्कर्माचे फळ म्हणून तो उपदेश त्याच्या चांगला पचनी पडला, त्याला मानवला. चुकीचा एकांतिक मार्ग सोडून तो विपश्यना साधनेचा अभ्यास करू लागला. थोड्याच दिवसांत स्रोतापन्नाचे फल प्राप्त झाले. त्यामुळे त्याचा उत्साह आणखीनच वाढला. सातत्याने अखंड साधना करू लागला. योग्य वेळ येताच तो परम विमुक्त अरहंत अवस्थेला पोचला. समस्त सांसारिक दुःख यातनातून नितांत विमुक्त झाला. जीवनाच्या तर सायंकाली-वृद्धावस्थेत जेव्हा शरीरत्याग करण्याची वेळ आली तेव्हा त्याला आपल्या निरर्थक क्लिष्ट जीवनाचा त्याग करून सम्यक् मार्गाने जाऊन विमुक्त होण्याची गतायुष्याची घटना आठवली आणि धर्मासंबंधी कृतज्ञता विभोर होऊन त्या अंतःकाली खालील आनंदोद्गार बाहेर पडले._

*_पञ्चपञ्ञसवस्सानि रजोजल्लमधारयिं ।_*

        _पंचावन्न वर्षे पर्यंत स्नान न करता धूळ मातीने शरीर माखीत राहिलो._ 

*_भुञ्जन्तो मासिकं भत्तं केसमस्सुं अलोचयिं ।_*

          _एक एक महिना केवळ एक वेळच बाहेरचे भोजन करीत राहिलो आणि डोक्याचे दाढी मिशांचे केस हातांनी उपटीत राहिलो._

*_एक पादेन अट्ठासिं आसनं परिवज्जयिं ।_*

      _आसनाचा त्याग करून इतकी वर्षे दोन्ही हात वर करून एका पायावर उभा राहिलो होतो._

*_सुक्खगूथानि च खादिं उद्देसञ्च न सादियिं ।_*

     _अधून मधून सुकी विष्ठा खाल्ली पण कुणाही गृहस्थाचे [भोजनाचे ] निमंत्रण स्वीकारले नाही._

*_एतादिसं करित्वान बहुं दुग्गतिगामिनं ।_*

       _अशाप्रकारे अनेक प्रकारची दुःख देणारी कर्मे मी करीत राहिलो._

*_वुय्हमानो महोघेन बुद्धं सरणमागमं ।_*

        _अशा प्रकारच्या महादुःखांच्या प्रवाहात असतांनाच भगवान बुद्धांना मी शरण गेलो. - *सरणगमनं परस पस्स धम्मसुधम्मतं।*_

        _आणि पहा! या कल्याणकारी शरणागमनाची महत्ता [मोठेपणा] पहा. मुक्तीविधायक धर्माची महत्ता तर पहा!_

*_तिस्सोविज्जा अनुष्पत्ता कतं बुद्धस्स सासनं_*

        _मी आम्रवहीन अवस्थेच्या तीनही विद्या प्राप्त केल्या आणि बुद्धांचे शासन पूर्ण केले, म्हणजे त्यांची शिकवण पूर्ण केली._

        _*"धन्य बुद्ध ! धन्य शुद्ध धर्म! "धन्य सफल झालेला तो धर्मपथिक!"*_

         _याच संदर्भात भगवान बुद्धांच्या जीवन कालातील आणखी एक घटना -_ 

          _*हिमवंतच्या नजिक उत्कट्ट [उत्कृष्ट] नगरांत एका वैभव संपन्न घराण्यात अंगणिक भारद्वाज नावांचा ब्राह्मण जन्मला होता. युवावस्थेपर्यंत अनेक प्रकारच्या लोकीय विद्या आणि शिल्पकलेत म्हणजे हस्तकलेत निष्णात बनला परंतु अकस्मात विरक्तीभाव निर्माण झाल्यामुळे संन्यासी बनून अमरत्व प्राप्तीसाठी तपस्या करण्याकरिता घराबाहेर पडला. शास्त्रोक्त विधिप्रमाणे अनेक प्रकारांनी अग्नीची उपासना केली आणि शारीरिक कष्टावर आधारित क्लेशदायक असे बाह्यतप केले. त्याची अशी समजूत होती की या उपासना मार्गानी चित्ताची निर्मलता वाढेल. संसार बंधनातून मुक्ती होईल. पण तसं घडलं नाही. सुदैवाने भगवान बुद्ध यात्रा करीत त्या प्रदेशातून चालले होते. त्या तरुण तपस्व्याने त्यांचे धर्म प्रवचन ऐकले आणि प्रभावीत होऊन तो त्यांना शरण गेला. प्रव्रजा घेतली आणि विपश्यना साधनेचा विधि शिकला. दीर्घ कालपर्यंत त्याने स्मृति आणि संप्रज्ञान यांचा सतत अभ्यास केला आणि शेवटी अरहंत अवस्थेत पोचला. विमुक्तीच्या सुखाने आनंदविभोर होऊन तो आपल्या जन्मगांवी परतला. आणि आपल्या पूर्वपरिवारातील अशा अनेक लोकांना उत्साहित करून खऱ्या धर्मात प्रतिष्ठित करून देण्यात तो सफल झाला.*_

           _निःष्प्राण निर्जीव कर्मकांड आणि आत्मक्लेशयुक्त मिथ्या तप यांच्या खोट्या बंधनात जखडलेल्या अनेक लोकांच्या विषयी अपार करुणा भावनेने प्रेरीत होऊन त्यांना या खोट्या मिथ्या मार्गातून मुक्त करून सन्मार्ग दाखविण्याच्या कल्याणकारी सदिच्छेने भगवान बुद्धाप्रमाणे त्याने भ्रमण यात्रा-चारिक आरंभिली. कुरु प्रदेशातील कुण्डिय नावाच्या भागापासून काहीशा दूर अशा अरण्यातून जात असताना तो उत्तरेकडे वळला तेव्हा एके ठिकाणी त्याने ब्राह्मणांचा एक समूह एकत्र पाहिला. त्यांतील काहीजण त्याच्या पूर्व परिचयातील होते. त्यांनी विचारले, *“भो! भारद्वाज! आपल्याला हे काय सुचलंय ? आपली [ब्राह्मण] परंपरा सोडून तुम्ही ही श्रमण परंपरा का अंगिकारलीत ?*_

            _*अंगणिक भारद्वाज त्यांना अत्यंत करुणचित्ताने म्हणाला "भव विमुक्तिसाठी मनाला निर्मल करण्याची आवश्यकता असते. या पूर्वी त्यासाठी या वनात मी अग्नीची उपासना करीत होतो! पण अनेक प्रकारच्या आत्मक्लेशप्रद तपश्चर्या करूनही त्या साऱ्या निरर्थकच ठरल्या. मी त्यात अडकून पडलो होतो कारण मनाच्या शुद्धिकरणाचा योग्य मार्ग मला मुळीच माहित नव्हता. आणि जेव्हा खराखुरा कल्याणकारी मार्ग सापडला तेव्हा मी सर्व त-हेने तृप्त झालो. कृतकृत्य झालो व मानव जीवन सफल झाले."*_

      _"मी एका आश्रमातून दुसऱ्या आश्रमात एका तपोवनातून दुसऱ्या तपोवनात अशा प्रकारचे पोकळ कर्मकांड, आत्मक्लेशदायक तप त्यामुळेच करीत राहिलो. [कारण खरा मार्ग सापडला नव्हता. ]_

_*तं सुखेन सुखं लद्धं पस्स धम्मसुधम्मतं ।*_

_*तिस्सो विज्जा अनुप्पत्ता कतं बुद्धस्स सासनं ॥*_

         _विपश्यनेचा विशुद्धि-मार्ग शारीरिक क्लेशदायक तपाचरणापेक्षा तौलनिक दृष्ट्या अत्यंत सुखद मार्ग आहे. साधकाने एकांतिक टोकाचा मार्ग सोडून सुखाचा मध्यम मार्ग स्वीकारला की परम सुखमय निर्वाण पदाची प्राप्ती त्याला होते. म्हणून म्हणतोय की, 'मी सुखाच्या मार्गाने परम सुखास पोहोचलो. पहा धर्माचे महात्म्य कसे आहे! मी मुक्तीच्या तीन विद्या उपलब्ध केल्या आणि भगवान बुद्धांचे शासन स्वीकारले, पूर्ण केले. त्यांनी दिलेले सर्व शिक्षण प्रारंभापासून अंतापर्यंत आचरणात आणले आणि जीवनाचे उद्दिष्ट गाठले.'_

      _त्यानंतर सत्यदर्शी ब्राह्मण भारद्वाज आपल्या निर्मल अंतःकरणाने लोककल्याणासाठी उद्घोषणा करतांना म्हणतो :_

*_ब्रह्मबंधु पुरे आसिं इदानि खो 'म्हि ब्राह्मणो_*

*_तेविज्जो न्हातको चम्हि सोत्थियो चम्हि वेदगू ॥_*

         *_प्रथम मी फक्त नावाचा ब्राह्मण होतो. ब्राह्मणी नावाच्या आईच्या पोटी जन्मलो म्हणून मी स्वतःला अहंकाराने ब्रह्मबंधु म्हणत होतो. परंतु आता माझा नवा जन्म झाला आहे. त्या भगवान सम्यक् सम्बुद्धाच्या अंतःकरणातून निर्माण झालो, आणि त्यांचा औरस पुत्र आहे जे की ब्रह्मकाय, ब्रह्मभूत आहेत. धर्मभूत आहेत, धर्मकाय आहेत. धर्माने मला नवा जन्म दिला आहे. आता मी धर्मनिर्मित आहे. ब्रह्मचारी म्हणजे ब्रह्मजीवन जगत आहे म्हणून अर्थानि ब्राह्मण झालो आहे._*

        *_प्रथम केवळ तीन वेदांचे ग्रंथ वाचल्याने फक्त नावाचा त्रिवेदी होतो. परंतु आता तीनही विद्यांना पूर्णपणे आत्मसात करून खऱ्या अर्थाने त्रिवेदी आहे. केवळ दिव्य दृष्टी आणि पूर्वजन्मांची स्मृतीच नव्हे तर त्या दोहोंहूनही उन्नत विद्या - तिसरी विद्या आम्रवक्षयाचा पूर्ण साक्षात्कार घडवून आणणारी विद्या प्राप्त झाल्यामुळे खराखुरा त्रिवेदी झालो आहे._*

        _"पहिल्यांदा तर कोणत्याही नदीत स्नान केल्याने अथवा एकाद्या धर्म शास्त्राचे पारायण करून स्वतःला स्नातक म्हणवत असे. केवळ नावाचा स्नातक होतो परंतु आता पवित्र धर्मगंगेत अवगाहन केल्यामुळे राग, द्वेष, मोह इ. वासनांचे निर्मूलन-प्रक्षालन करून अक्षय निर्वाणाच्या मुक्ती महासागरांत  बुडी घेतल्यामुळे खन्या अर्थाने स्नातक बनलो आहे."_

        _'श्रुति-स्मृती ग्रंथांचे वाचन केल्यामुळे मी स्वतःला श्रोत्रिय म्हणवत असे पण आता मुक्ती मार्गाच्या प्रवाहात येऊन पूर्णपणे मुक्त झालो आहे. म्हणुन खरा श्रोत्रिय झालो आहे._

        _“वेदांचे अध्ययन-पारायण करून स्वतःला नावाने वेदगू म्हणवत होतो. पण आता स्ववेदनांच्या आधाराने आत्मज्ञान जागवून आपल्या मनावरील किल्मिषे दूर करून संपूर्ण इंद्रिय जगतच नव्हे इंदियातीत अनंत अक्षय परमसत्व स्वानुभूतीच्या आधारे जाणून संवेदनांच्या आधारे वेदनांच्या पार झालो. म्हणजे वेदपारगू, अर्थातच वेदगू झालो आहे."_

         _"म्हणून तर म्हणतो आहे की आधी मी केवळ नाममात्र होतो. पण आता तसा नाही. खरा ब्राह्मण, त्रैविद्य, स्नातक, श्रोत्रिय आणि वेदगू आहे."_ 

         _धन्य आहे तो खरा ब्राह्मण, खरा त्रिवेदी, खरा स्नातक! धन्य आहे तो खरा श्रोत्रिय आणि खरा वेदगू! धन्य आहे योग्य साधनेचा योग्य सफल साधक !!_ 

        यावे. साधकांनो आपण देखील असेच खरेखुरे ब्राह्मण, त्रिवेदी, स्नातक, श्रोत्रिय, वेदगू बनून संसार चक्राच्या भोवऱ्यांतून पूर्ण मुक्त होऊन आपले कल्याण करून घेऊ या._

*_कल्याणकारी मार्ग सर्वांना लाभो !_*

*_मुक्तीदायिनी प्रेरणा सर्वांत जागृत हावो.._*

*_!! धन्य होवो ! मंगल होवो ! कल्याण होवो !!_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_संदर्भ :- जागे पावन प्रेरणा_*

*_संकलन :- महेश कांबळे_*

*_दिनांक :- १७/०९/२०२२_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2022/09/blog-post_17.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼





Thursday, 15 September 2022

सविवेक श्रद्धा : डोळस श्रद्धा

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_सविवेक श्रद्धा : डोळस श्रद्धा_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

            _*तीन वेदात पारंगत विद्वान वक्कलि नावाचा ब्राह्मणपंडित भगवान बुद्धांच्या आश्रमात गेला.* बत्तीस लक्षणांनी परिपूर्ण असे तथागतांचे सुंदर, तेजस्वी शरीर पाहून, तसेच प्रभावशाली ओजस्वी व्यक्तिमत्व पाहून तो भावुक ब्राह्मण प्रभावित होऊन त्यांच्याकडे आकर्षिला गेला. त्या भगवान बुद्धांच्या अंगप्रत्यंगातून जे प्रभाकिरण प्रस्फुटित होत होते त्याने वक्कलि भावविभोर होऊन गेला. शिवाय त्यांच्या अंतःकरणांतून ओघवणाऱ्या अपरिमित मैत्री आणि करुणामय तरंगांचा परिणाम तर होताच. वक्कलिने मनाशीच पक्का निर्णय घेतला की भगवानांच्या या दैवी रूपसंपदेचं सदैव दर्शन घ्यायचं. म्हणून गृहत्याग दाढीमिशा मंडण करून प्रव्रजित झाला आणि भिक्षु संघात सामील झाला. हेतू हाच की भगवानांचे सान्निध्यसुख नियमित मिळावे. आता भावभक्तीने प्रेरित होऊन रस-लोलुप भ्रमराप्रमाणे तो भगवानांच्या रूपसौंदर्याने भाळून नेहमी त्यांच्यासभोवतालीच भ्रमण करीत राहिला. न शीलाची चिंता, ना समाधीने मनाची एकाग्रता, ना विपश्यना साधनेच्याद्वारा प्रज्ञा जागृती. जेव्हा पहावे तेव्हा भगवानांच्या समोर, सुंदर ते ध्यान अनिमिष नेत्रांनी पाहणे हेच एकमेव काम. कारुण्य सिंधू भगवान तथागतांनी पाहिलं की *हा नवागत भिक्षु रूपसौंदर्याच्या भावनेने इतका पछाडलेला आहे आंधळा झाला आहे की धर्माच्या सत्य स्वरूपाला दुरावला आहे. त्याची कान उघाडणी करतांना ते म्हणाले, 'हे भोळ्या भिक्षु भाविका! माझ्या या शरीराकडेच काय वेड्याप्रमाणे पहात राहिला आहेस? माझे शरीरही आंत तितकेच घाणेरडे आहे जेवढे कुणाही सामान्य माणसाचे असते. मला पाह्यचं असेल तर माझ्यात सामावलेला धर्म पहा. जो धर्माचे स्वरूप पाहतो त्यालाच माझ्या सत्य स्वरूपाचे दर्शन घडते. खऱ्या अर्थाने मला बघायचं असेल तर माझ्यात सामावलेल्या सत्य स्वरूपाकडे पहा. बाह्य शरीर पाहू नकोस :-*_

*_यो खो धम्मं पस्सति, सो मं पस्सति, यो मं पस्सति, सो धम्मं पस्सति ।_*

     _महाकारुणिक भगवानांचा हा धर्मफटकार, भावावेशामुळे अंधःकारात बुडणाऱ्या वक्कलि ब्राह्मणाचे प्रज्ञाचक्षु उघडता झाला._

           *_धर्माचे मूर्तिमंत स्वरूप म्हणजे भगवान बुद्धच आहेत ही गोष्ट त्या तात्काळ समजली. म्हणून केवळ बाह्य शरीर दर्शनावर समाधान मानणे निव्वळ वेडेपणा आहे, हे ही लक्षात आले. त्यांचे सत्यधर्मदर्शन होणेच आवश्यक आहे. 'दिट्ठ धम्मं निब्बाणं' दर्शन झाले पाहिजे. आणि हा सांदृष्टिक निर्वाणधर्म तर अंतर्मुख होऊन आपण स्वतःच आपल्या अंतरंगात पाहिला पाहिजे. बाह्योपचार-बाह्यदर्शन काही कामाचे नाही. ही गोष्ट त्याच्या लक्षात आली. विपश्यना प्रज्ञाद्वारे जर आपण आपल्या अंतरंगाचे सत्य दर्श घेतले नाही, तर जीवनभर बुद्धाचे चीवर वस्त्र धरून त्यांच्यामागे राहून देखील सत्यधर्मापासून मैलोगणति दूरच राहणार. परंतु भगवानांपासून हजारो मैल दुर राहून कुठेही एकांतात अंतर्मुखी होऊन आपल्या हृदयांतील सत्यधर्माचा साक्षात्कार करून घेऊ लागला तर तो साधक बुद्धाच्या जवळच असतो. धर्माचा साक्षात्कार म्हणजेच बुद्धाचा साक्षात्कार. धर्माशी जवळिक हीच बुद्धांशी जवळीक नाही का? अखेर बुद्ध म्हणजे तरी काय ? सम्यक् सम्बोधिचं जिवंत-जागृत स्वरूप म्हणजेच बुद्ध होय._*

           _एकदा ही गोष्ट लक्षात येताच वक्कलिचे अंधश्रद्धेचे काळे ढग दूर झाले. सत्यधर्माच्या स्वच्छ प्रकाशांत त्याची वाटचाल सुरू झाली. त्याने भगवान बुद्धांपासून विपश्यना साधनेचे कर्मस्थान घेतले. अंतर्मुखी होण्याची सरळ विधी घेतली. आणि दूर एकांतवासांत जाऊन अभ्यास करण्यास सुरूवात केली. पुर्व भक्तीभावाने अधून मधून अडचणी निर्माण केल्या तरी शेवटी वक्कलिने निष्ठेने साधना करून सच्च्या साधकाप्रमाणे निर्वाणचा साक्षात्कार करून घेऊन कृतकृत्य झाला. सर्व आस्रवे, क्लेश, संयोजने व बंधने तोडून मृत्यूपूर्वी तो ह्या जीवनांत विमुक्तावस्थेला पोचला._

           _तर असे दिसून येते की *अंधभक्ती, अंधविश्वास आणि अंधश्रद्धेच्या भावावेशाने अभिभूत झालेला साधक खऱ्या अर्थाने प्रगती करू शकत नाही.* हे भाववेश नेहमीच बाधक असल्याचे अनुभवाला येते. भगवान म्हणतात,

*_'तुम्हेहि किच्चं आतप्पं अक्खातारो तथागता'_*

          _*म्हणजे तथागत फक्त मार्गदर्शन करणारे आहेत. साधना विधी शिकविणारे आहेत पण शेवटी काम करण्यासाठी पाऊल तर तुम्हालाच उचलावे लागणार आहे. सारा मार्ग तुम्हालाच आक्रमावयाचा आहे. याकडे डोळे झाकून भावूकतेने जर आपण बुद्धाला अथवा दुसऱ्या कुठल्यातरी लहान मोठ्या गुरुला आपला उद्धारकर्ता-तारक मानून केवळ त्याच्यावरील अंधश्रद्धा व अंधभक्ती मध्ये बुडून त्याचा आश्रित होऊन बसलो व साधनेचा अभ्यास सोडून आपल्या स्वतःला अक्षरशः दुर्बल, असमर्थ समजू लागलो आणि खरोखरीच पंगु तसेच निष्क्रीय होऊ लागलो तर धर्माच्या नावावर अशी भक्ती भावावेशवाली हीन भावना आपल्यासाठी कधीही कल्याणकारी होणार नाही. खरे कल्याण आपले आत्मबळ जिवंत ठेवले तरच आहे. *आत्मबल जीवित ठेवणे आणि मुक्ती मार्गावरील जबाबदारीची जाणीव ठेवून सावध रहाणे याला अहंकार म्हटले जाणार नाही.*

      _विमुक्ती मार्गाने जातांना आत्मभावाप्रति अहंमन्यता ठेवण्यापासून अलिप्त राहणे नितांत आवश्यक आहे. आपल्यातील सुप्त अहंकार आणि मीपणा मनांतून साफ काढून टाकणे अनिवार्य आहे. परंतु अहंकाराला काढण्याच्या नावाखाली हीनभाव म्हणजे न्यूनगंड बाळगून स्वतःला दुर्बल व परावलंबी बनविणे म्हणजे विनाशकारी अहंकाराविरुद्ध उचललेले असे पाऊल की, जे आम्हाला ह्या टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे नेणारे आहे. हा एक प्रकारचा अतिरेकच आहे, की जो आमच्यासाठी तितकाच हानीकारक आहे. आम्हाला मधला मार्ग चोखाळायचा आहे. दोन्ही अतिरेकी टोकांना सोडून कल्याणकारी मध्यममार्ग स्वीकारायचा आहे. ज्यात एकीकडे अहंभाव आणि आत्मभावामुळे डोक्यात वारे भरत नाही. ज्यामुळे अहंगंड निर्माण होऊन आपल्याशिवाय इतरांना काही स्थान नसल्यासारखे वागत नाही तर दुसरीकडे असा न्यूनगंड टाळतो ज्यामुळे दुसऱ्याच्या आधारावर स्वतःला अगदीच निष्क्रीय बनवण्यापासून वाचवतो._

      _ही अस्मिता जागरूक ठेवणे आणि मुक्ति मार्गावर चालण्यासाठी आपल्या जबाबदारीच्या संबंधी जागरूक रहाणे अहंकार नव्हे._

       _आपल्या कल्याणमित्र मार्गदर्शक धर्मगुरुच्या प्रति नैसर्गिक श्रद्धा, भक्ति आणि कृतज्ञतायुक्त नम्रतेने राहणे चुकीचे नाही. परंतु त्यावेळी आपले विवेकाचे ज्ञानचक्षु उघडे हवेतच. डोळस श्रद्धा हवी. *आपल्या गुरुविषयी अंधश्रद्धा, अंधभक्ती आणि अंधविश्वास बाळगून त्याच्या प्रत्येक कामात चमत्कार, . तसेच त्याचे बोलणे अद्भुत अलौकिक मानणे, जेवढे साधकाला तेवढेच आचार्यालाही हानीकारक असते.* अशा प्रकारे गुरू आणि शिष्य दोघेही अंधभावावेशांत राहिले, तर दोघाचेही अंधःपतन होऊन तो साधनामार्गही पतित होतो. इतिहास याला साक्ष आहे. *भगवान बुद्धांची ही कल्याणकारी विपश्यना साधनाविधी सिद्धी आणि चमत्कारांच्या नादी लागणाऱ्या धर्ममार्तंडांनी आणि त्यांच्या अंधविश्वासु अनुयायांनी विलुप्त करून टाकली. स्वतः गुरुंनी गुरूंचे गुणगान करीत गुरुच्या अलौकिक शक्तीचा वारेमाप अतिरंजित प्रचार करीत लोकांमधील अंधश्रद्धा वाढविली.* तिचे भरण पोषण केले. ज्यामुळे त्यांच्या गुरुजींचा मानसन्मान वाढावा आदरसत्कार वाढावा हा हेतूच उराशी बाळगला. परिणाम काय झाला? आचार्याांच्या या प्रसिद्धी यश लोलुपतेने हा विशुद्धीमार्ग दूषित केला आणि अशा प्रकारे भगवान तथागतानंतर काही शतकातच या कल्याणकारी विपश्यना साधनेचा भारतातून लोप झाला. शील, समाधी आणि प्रज्ञा यांनी युक्त, परम परिशुद्ध धर्म, विपश्यना साधनेच्या मदतीने प्रदीर्घ कालावधीनंतर पुन्हा या देशांत आला आहे. या साधनामार्गाची शुद्धता कायम राहिली तर त्यामुळे सत्-धर्म चिरकाल प्रतिष्टित होऊन लोकांना त्याचा मिळत राहील. यासाठी हे नितांत आवश्यक आहे की कोणीही साधक किंवा साधिकांनी आपल्या मार्ग निर्देशक आचार्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा अलौकिक चमत्कार शोधत बसू नये किंवा थोपू नयेत. त्यांच्यावर मिथ्या ईश्वरत्वाचा भार ठेवून अंधश्रद्धेमध्ये बुडू नये. तरच गुरु शिष्याची एक स्वस्थ, आदर्श, स्वच्छ परंपरा स्थापित होईल. ती शुद्ध परंपरा बहुजन हिताय बहुजन सुखाय अशी राहील. पूर्व संस्कारांच्या प्रभावामुळे कुठे कुठे कुणा कुणा विपश्यना साधकांमध्ये असा अंधविश्वास निर्माण होऊ लागतो तेव्हा लगेचच त्याला थांबविले पाहिजे._

        _आपले सर्वांचे कल्याण ह्याच गोष्टीत सामावलेले आहे की आम्ही ह्या ध्रुव सत्याला व्यवस्थित समजून घेऊ, 'आपल्या आतच जागलेल्या ह्या अनित्यबोधाच्या विपश्यना चेतनेपेक्षा अधिक संरक्षण देणारा अभय देणारा दुसरा श्रेष्ठ मार्ग नाही. खोट्या आशा आणि फोल कल्पनांमध्ये बुडून न जाता आपल्यातील ह्या विपश्यना चैतन्याला सतत जागृत ठेवणे श्रेयस्कर आहे'._

        _प्रत्येक क्षणी आपल्या आत जे अनुभवाला येत आहे, ते अनित्य आहे, क्षणभंगूर आहे, नष्ट होणारे आहे, परिवर्तनशील, सतत बदलणारे आहे, असा त्याचा स्वभाव आहे. ही त्याची प्रकृति आहे. हा त्याचा धर्मच आहे. सूक्ष्मातिसूक्ष्म अष्टकलापांनी बनलेले अणु-रेणू परमाणु-कणांनी बनलेला हा शरीराचा प्रपंच पाण्याच्या बुडबुड्या प्रमाणे प्रत्येक क्षणाला उत्पन्न होतो व नष्ट होत आहे. याच परमाणूंच्या कणांशी एकरूप अशी ही चित्तसंतती आहे. ती देखील त्याचप्रमाणे उत्पन्न होते व नष्ट होत आहे. शरीर आणि मन यांचा संयुक्त जीवनप्रवाह किती भग्न होणारा आहे. हा भंग प्रत्येक क्षणाला कशा प्रकारे होत आहे. या सत्याचे-वास्तवाचे विपश्यनेच्या दृष्टीने दर्शन घेत रहाणे हेच महत्वाचे. ज्यामुळे कोणत्याही प्रकारची आसक्ती ह्या जीवनधारेच्या प्रती रहाणार नाही. हाच मनाच्या शुद्धीचा मंगल मार्ग आहे. या क्षणाला ज्या वास्तवाचे- सत्याचे दर्शन होत आहे. त्याचे प्रति सजग रहाणे हाच आपला धर्म आहे. कुठल्यातरी भावी स्वप्नील रमणीय स्थितीच्या मधुर कल्पना व आसक्तीयुक्त आकांक्षा आपल्या प्रगतीला मारक ठरणारी सर्वांत मोठी धोंड आहे. त्यापासून स्वतःला वाचवा._

        _*विपश्यना धर्म वर्तमानात जगण्याचा धर्म आहे.* यावेळी जे जसे अनुभवात येत आहे तेच आपल्याला उपयुक्त आहे. न भूतकाळ, जो मांगे पडला आहे आणि न भविष्यकाल, जो अजून आलेला नाही. तेव्हा कल्पना आणि कामनांपासून दूर रहा. कल्पना आणि इच्छा आकांक्षा यांच्या पासून सावध रहा. निस्सार परावलंबी बनू नका. आपली प्रज्ञा स्वतःच जागवून या क्षणाचेच यथार्थ दर्शन करीत रहा. परावलंबनापासून दूर रहा._

       _हीच *'अत्तसम्मा पणिधि'* आहे. सम्यक् आत्म प्राणिधान आहे. स्वावलंबन आहे. स्वतःच्या ठिकाणी असलेले स्व-स्थित सत्याचे आलंबन आहे. धर्माचे आलंबन आहे. ज्ञान, विवेक, विद्या, आलोक, प्रज्ञा, आणि बोधीचे आलंबन आहे. आपण सारे ह्या आलंबनातच जगू या!_


*_कल्याणकारी मार्ग सर्वांना लाभो !_*

*_मुक्तीदायिनी प्रेरणा सर्वांत जागृत हावो.._*

*_!! धन्य होवो ! मंगल होवो ! कल्याण होवो !!_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_संदर्भ :- जागे पावन प्रेरणा_*

*_संकलन :- महेश कांबळे_*

*_दिनांक :- १५/०९/२०२२_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2022/09/blog-post_15.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

Friday, 9 September 2022

धर्म धारणा

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_धर्म धारणा_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

              _*कोशल देशाचा राजा प्रसेनजित यांचा पुरोहित ब्राह्मण बावरी याने वृद्धावस्थेत गृहत्याग करून संन्यस्त जीवन स्वीकारले.* आणि श्रावस्ती नगर सोडून उत्तरेकडून दक्षिणपथाकडे निघाला. *आंध्र प्रदेशातील अश्वक आणि नलक या राज्यामधून वाहणाच्या गोदावरी नदीच्या किनारी त्याने आपला आश्रम बांधला.* भिक्षा आणि कंदमुळे, फळे खाऊन संन्यासी बावरी तेथेच तपस्व्याचे जीवन व्यतीत करू लागला. जेव्हा त्याची वयाची शंभर वर्षे पूर्ण झाली, तेव्हा त्याने आसपासच्या गावांतून काही धनधान्य गोळा केले आणि महायज्ञ आरंभिला. यज्ञ पूर्ण होताच उरलेले धन लोकांना वाटून टाकले. त्यानंतर एक ब्राह्मण पाचशे मोहरा दान मागण्यासाठी आला. बावरीने विनम्रतेने आपली असमर्थता व्यक्त केली. असंतुष्ट याचक रागावला आणि बावरीला शाप दिला की. 'सात दिवसात त्याच्या मस्तकाचे सात तुकडे होऊन पडतील. "_

          _वृद्ध बावरी अत्यंत उदास आणि खिन्न झाला. त्याला धड जेवण सुचेना की ध्यानसाधनेत मन रमेना. तेव्हा त्याच्या एका सन्मित्राने सांत्वन केले की, अशा ढोंगी माणसाच्या शापाने चिंतित होण्याचे काहीच कारण नाही. कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते. तुझा काहीच दोष नाही. 'कुणी धनलोभी व अज्ञानी माणसाने दिलेल्या शापाने तुझे काय वाईट होणार ? ज्या व्यक्तीला हेही माहित नाही की खऱ्या अर्थाने शिर काय आहे आणि शिरविखंडन होणं म्हणजे काय, तो अज्ञानीच तर आहे. " वृद्ध बावरीचे समाधान झाले. पण त्याची उत्सुकता वाढली. जिज्ञासा जागृत झाली व त्याने विचारले की *शिर आणि शिराचे विखंडण होणे याचा नेमका अर्थ काय आहे ?* काही अर्थ असेल तर समाजवून सांग._

           _तो मित्र म्हणाला की कोणी सम्यक् संबुद्धच याचा नीट अर्थ सांगू शकेल. आणि सुदैवाने यावेळी सम्यक् सम्बुद्धही उत्पन्न झाले आहेत. त्यांना जाऊन विचार. त्याची माहिती देतांना तो म्हणाला._

*_पुरा कपिलवत्थुम्हा, निक्खन्तो लोकनायको ॥_* 

*_अपच्चो ओक्काकराजस्त, सक्यपुत्तो पभङ्करो ॥_*

         _काही वर्षापूर्वी इक्ष्वाकुवंशीय प्रभाकारी शाक्य पुत्राने कपिलवस्तुतुन गृहत्याग केला आहे व संन्यस्त जीवन जगत आहे._

*_सो हि ब्राह्मण सम्बुद्धो सव्वधम्मान पारगू।_* 

*_सब्बाभिञ्ञाबलप्पतो , सब्बधम्मेसु चक्खुमा ।_*

*_सब्बकम्मक्खयं पत्तो, विमुत्तो उपधिक्खये॥_*

        _हे ब्राह्मणा तोच सम्बुद्ध झाला आहे, जो सर्व धर्मात पारंगत, सर्वज्ञ चक्षुमान, सर्व अभिज्ञाबलसंपन्न आहे. त्याची सारी कर्मे [पापे] क्षय पावली आहेत. तो कृतार्थ आणि धन्य झाला आहे. त्याने दुःखाची मुळेच उखडुन टाकली असून तो परमविमुक्तपदी पोहोचला आहे._

*_बुद्धो सो भगवा लोके, धम्मं देसेति चक्खुमा ।_*

*_तं त्वं गत्वान पुच्छस्सु, सो ते तं व्याकरिस्सति ॥_*

_ते सर्वज्ञ चक्षुमान भगवान बुद्ध लोकांना धर्म शिकवीत आहेत. तुम्ही त्यांच्याकडे जाऊन त्यांना विचारावे. ते तुम्हाला विस्ताराने समजावून सांगतील_

*_सम्बुद्धो 'ति वचो सुत्वा, उदग्गो बावरी अहु ।_*

*_सोकस्स तनुको आसि, पीतिं च विपुलं लभि ॥_*

 _'सम्बुद्ध' शब्द ऐकताच बावरी प्रफुल्लित झाला. त्याची उदासिनता दुर झाली. तो विपुल प्रीतीप्रमोद भरल्या हृदयाने पुलकित होऊन उठला._

        अशा प्रकारे रोमांचयुक्त, श्रद्धाशील बावरीने आतुरतेने विचारले. 

*_कतमम्हि गामे निगमम्हि वा पुन, कतमम्हि वा जनपदे लोकनाथो ?_*

 _ते लोकनाथ भगवान बुद्ध यावेळी कोणत्या गावी आहेत? कोणत्या नगरात आहेत? कोणत्या जनपदात आहेत ?_

*_यत्थ गन्त्वा नमस्सेमु, सम्बुद्धं दिपदुत्तमं ।_*

        _- तिथे जाऊन त्या पुरुषोत्तम बुद्धाला मी नमस्कार करू शकेल. त्यावर आगंतुक म्हणाला :_

*_सावत्थियं कोसलमन्दिरे जिनो, पहूतपञ्ञो वरभूरिमेधसो।_* 

*_सो सक्यपुत्तो विधुरो अनासवो, मुद्धाधिपातस्स विदू नरासभो ॥_*

         _ते महाप्रज्ञावान, अत्यंत बुद्धिमान, भारमुक्त, आस्त्रवमुक्त शिरन्छेदनाचे ज्ञाता, नरश्रेष्ठ शाक्य पुत्र भगवान जिन, बुद्ध यावेळी कौशल देशाची राजधानी श्रावस्ती नगरात रहात आहेत._

         _शतायुषी बावरी आंध्रप्रदेश ते कौशल प्रवास करण्यास असमर्थ होता. आपल्या सर्व शिष्यांना एकत्र बोलावून त्यांना म्हणाला :_

*_यस्सस्सो दुल्लभो लोके, पातुभावो अभिण्हसो ।_*

*_स्वाज्ज लोकम्हि उप्पनो, सम्बुद्धी' ति विस्सूतो ।_*

*_खिप्पं गन्तान सावत्थिं, पस्सव्हो दिपदुत्तमं ॥_* 

            _नेहमीच लोकात निर्माण होणे दुर्लभ अशा लोकोत्तर युगपुरुष 'सम्बुद्ध' बिरुदावलीने प्रसिद्ध झालेल्या मनुज श्रेष्ठाला त्वरीत श्रावस्ती नगरात जाऊन भेटा._

           _अशा प्रकारे त्याने आपल्या शिष्यांना बुद्धाच्या दर्शनासाठी व त्यांच्याकडून ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी उत्साहित केले. *बावरीचे जटा आणि मृगाजिनधारी सोळा प्रमुख शिष्योत्तम अजित, तिस्स-मेत्तैय्य, पुन्नक, मेत्तगु, धोतक, उपसीव, नन्द, हेमक, तोदेय्य, कप्प, जातुकण्णी पंडित, भद्रायुध, उदय, ब्राह्मण पोसार, मेधावी मोघराजा, आणि महर्षि पीगिय सर्व शिष्यगण ध्यानसाधना करणारे होते.* पूर्वजन्मातील पुण्यसंचित संपन्न होते. तसेच वर्तमानकालातील लोकमान्य विभुत होते. ते सर्वजण आचार्य बावरींना साष्टांग नमस्कार घालून, प्रदक्षिणा घालून उत्तरेकडे निघाले._

         _*ते प्रथम अलकहून पैठणला आले. तेथून सध्याच्या मध्यप्रदेशातील महिष्मती, उज्जयिनी, गोधपूर, विदिशा [भेलसा] तुंगवन अशी यात्रा करीत करीत सध्याच्या उत्तर प्रदेशातील कोशाम्बी [कोशम], साकेत [अयोध्या] असा प्रवास करून श्रावस्तीला पोहोचले.* तेथे पोहचल्यानंतर त्यांना कळले की *भगवान पूर्व दिशेला मगध देशात भ्रमण यात्रेकरिता गेले आहेत. म्हणून सारेजण सेतव्य कपिलवस्तु, कुसीनारा आणि पावाहून भोगनगर मार्गे वैशालीला पोहोचले व तेथून राजगिरी. तेथील एक मनोहारी पाषाणाच्या चैत्यात त्यांना भगवान बुद्धांचे दर्शन घडले.*_

        _*भगवानांनी त्यांचे आचार्य बावरी यांच्या प्रश्नांचे समाधानकारक उत्तर दिले. शिर म्हणजे अज्ञान-अविद्या आणि श्रद्धा, वीर्य, स्मृति आणि समाधि युक्त प्रज्ञा [विद्या] द्वारे या अविद्येचे निराकरण [भेदन] होते. खरोखर कपोल कल्पनेला धर्म मानणारे अथवा दुसऱ्यांच्या ज्ञानाधारित तर्कवितर्कजन्य बुद्धिविलासाला धर्म मानणारे हे या अज्ञानाचे शिकार असतात. श्रद्ध वीर्य-पुरुषार्थ, स्मृति-सावधानता आणि समाधि यांच्या बळावर जेव्हा स्वतः आपली प्रज्ञा जागृत होते तेव्हा सर्वांगीण सत्याची प्रत्यक्ष अनुभूती होते तेव्हा शिरच्छेदन होते. अविद्येचा पडदा दूर होतो, नष्ट होतो. जिज्ञासू प्रश्नकर्ते उत्तराने संतुष्ट झाले.*_

           _त्यानंतर त्या सोळाही तपस्वी साधकांनी एक एक करीत भगवान बुद्धांना धर्मविषयक अनेक प्रश्न विचारले. भगवान बुद्धांनी सर्वांनाच समाधानकारक संतोषप्रद उत्तरे दिली. ही प्रश्नोत्तरे अत्यंत प्रगल्भ आहेत. ही प्रत्येक धर्म जिज्ञासूला अपरिमित प्रेरणादायक, धर्मपथ प्रदर्शक आहेत. याबाबत योग्य निराकरण केले गेले आहे. विवेचन केले आहे ते असे :-_

*_एकमेकस्स पञ्हस्स, यथा बुद्धेन देसितं ।_* 

*_यथा यो पटिपज्जेय्य, गच्छे पारं अपारतो ॥_*

           _एक एक प्रश्नाचं उत्तर देतांना भगवानांनी जो उपदेश दिला त्याचे प्रतिपादन करणारा ऐलतीरावरून पैलतीरावर सहज पार जाईल._

*_मग्गो सो पारगमनाय, तस्मा पारायनं इति ।_*

           _*- हा [भव] पार करणारा मार्ग आहे म्हणून याला 'पारायण' म्हणतात.*_

          _*खरंच आहे ते. धर्म पारायणच तर आहे. पारायण याचा अर्थ केवळ पाठ करणे हा नाही. त्याचे प्रतिपादन करून, भवसागर तरून जाणे याला पार करणे म्हणतात.* आणि त्या सोळा साधकांनी हेच केले. त्यांची प्रश्नोत्तरे म्हणजे केवळ बुद्धिविलास नव्हता. त्या प्रश्नापैकी कोणत्याही एक प्रश्नाचे उत्तर अर्थ समजून घेऊन, जर कुणी धर्म-अनुधर्म याबद्दल प्रतिपादन करून, म्हणजेच त्याप्रमाणे पावले टाकून, तो धर्म धारण केला तर तो जन्म मृत्यूच्या फेऱ्याच्या पलिकडे जाईल व निर्वाणाची त्याला प्राप्ती होईल._

*_पञ्हस्स अत्थं अञ्ञाय, धम्मं अञ्ञाय, धम्मानुधम्मं पटिपज्जेय, गच्छेय्येव जरा मरणस्स पारं ।_*

         _प्रश्नोत्तरांचा हाच हेतू होता. पारायण हा हेतू होता. भव पार करण्याचे उद्दिष्ट होते._

        _म्हणून जेव्हा त्यापैकी एक [ऋषी धोतक] भक्तिभावपूर्ण श्रद्धायुक्त अंतःकरणाने भगवान बुद्धांना म्हणाले._

*_पस्सामहं देवमनुस्सलोके, अकिञ्चनं ब्राह्मणं इरियमानं ।_* 

*_तं तं नमस्सामि समन्तचक्खु, पमुञ्चं मं सक्क कथङ्कपाहि ॥_*

         _देव मनुष्यांमध्ये आपल्यासारखे अपरिग्रही ब्राह्मण विद्यमान असलेले पाहतो. हे समन्त चक्षु [समदृष्टीने पाहणारा] मी आपणास वंदन करतो. हे शक्र मला संशयमुक्त करा._

तेव्हा भगवान म्हणाले :

*_नाहं गमिस्सामि पमोचनाय कथङ्कथिं धोतक कञ्चि लोके ।_*

*_धम्मं च सेट्ठं अभिजानमानो, एवं तुवं ओघमिमं तरेसि ॥_*

              _- हे धोतक, मी कोणा संशयग्रस्ताला मुक्त करू शकत नाही. जेव्हा तू स्वतःच या श्रेष्ठ धर्माला अनुभूतीच्या आधारे समजशील तेव्हा स्वतःच या महापूरातून पार होशील._

        _या ठिकाणी *'अभिजानमानो'* हा शब्द फार महत्वपूर्ण आहे. *स्वतःच्या अनुभूतीने जाणणाऱ्यालाच 'अभिजानमानो' म्हटले जात होते. मनातील संशय केवळ अंधश्रद्धेच्या बळावर दूर केले गेले किंवा दूर झाले तर ते 'अभिजानन' होत नाही. याप्रमाणेच केवळ तर्कवितर्क करून 'अभिजानन' होत नाही. या दोहो व्यतिरिक्त प्रत्यक्ष अनुभूतीच्या सहाय्याने जाणणे हेच बुद्धांचे सांगणे आहे. मनोगत आहे खऱ्या अर्थाने तेच 'अभिजानमानो' होय त्याआधारेच 'ओघमिमं तरेसि' होता येते. खऱ्या अर्थाने हेच पारायण होय.*_

        _या साधकांपैकी एक साधक महर्षि पीगिय म्हणतो भगवानांच्या संपर्कात येण्यापूर्वी मी नेहमी ऐकत आलो होतो. *'इच्चासि इति भविस्सति' म्हणजे 'असे होते, असे होईल' हे जे ऐकत होतो ते केवळ काल्पनिकच काल्पनिक होतं. 'सब्बेते इतिहेतिहं' अंधविश्वास आणि परंपरागत मान्यतांनी भरलेल्या कोचा कल्पनाच होत्या. अथवा 'सब्बं  तं तक्कवद्धनं' - साराच तर्कवितर्कांच्या मायाजालाने भरलेले बुद्धिविलासच होते. वास्तविकता कुठे होती? प्रत्यक्ष अनुभूती कुठे होती? परंतु आता मात्र धन्य वाटू लागले.* कारण की,_

*_यो मे धम्मं देसेसि संदिट्टिकमकालिकं ।_* 

*_तण्हक्खयमनीतिकं यस्स नत्थि उपमा क्वचि॥_*

          _आता जो धर्म मला शिकविला गेला तो तर सांदृष्टिक म्हणजे अनुभूतीजन्य आहे. *'असं झालं होतं, असं झालं होत'ची केवळ कोरी कल्पना नाही अकालिक आहे. म्हणजे लगेच फळ देणारा आहे. 'असं होईल, असं होईल'ची मिथ्या मृगतृष्णा नाही. इथे याच जीवनात तृष्णेचा अंत, दुःखाचा विनाश करणारा आहे. ज्यांनी हे शिकविले त्यांना कोणतीच उपमा देता येणार नाही अनुपमच आहेत.*_

         _ज्या भगवानांनी मला हे शिकविले त्या धर्माची अनुभूती त्यांनी घेतली होती. ती केवल अंधश्रद्धा किंवा तर्क पांडित्य नव्हते._

*_यथा अद्दक्खि तथा अक्खासि विमलो भूरिमेधसो ।_* 

*_निक्कामो निब्बनो नाथो, किस्स हेतु मुसा भणे ॥_*

           _निर्मळ महाप्रज्ञावंताने जसे पाहिले तसेच सांगितले. स्वामी स्वतः निष्काम आहेत, वितृष्ण निरिच्छ आहेत. ते खोटं कसे बरं बोलतील ?_

           _आणि त्यांनी जे शिकविले ते साधकांनी जाणावे म्हणूनच शिकविले. धर्म मान्यतेसाठी नव्हे, तर जाणून घेण्यासाठी आहे. स्वतः साक्षात्कार करून घेण्यासाठी आहे. म्हणून सांदृष्टिक आहे. तात्काळ फळ देणारा आहे. याच जीवनात इथेच फळ देणारा आहे._

           *_पुण्यपावन प्रसंगी धर्मानुधर्माच्या प्रतिपादनाप्रमाणे बुद्धाची पूजा करा. बुद्ध वंदना करा. भगवानांनी सांगितलेल्या मार्गाची फक्त चर्चा वादविवाद करू नका. केवळ त्या मार्गाविषयी श्रद्धा व्यक्त करून थांबू नका. परंतु यथाशक्ती त्या मार्गाची प्रत्यक्ष अनुभूती घ्या. त्या प्रमाणे धर्माचरण करा. हे जीवन सफल बनविण्याचा दृढनिश्चय करा. हळूहळु प्रगती करीत सर्व दुःखांचे निराकरण करा व धर्मपारायण नावाचे सार्थक करा. आपले खरे मंगल आहे. खरे कल्याण आहे._*

*_कल्याणकारी मार्ग सर्वांना लाभो !_*

*_मुक्तीदायिनी प्रेरणा सर्वांत जागृत हावो.._*

*_!! धन्य होवो ! मंगल होवो ! कल्याण होवो !!_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_संदर्भ :- जागे पावन प्रेरणा_*

*_संकलन :- महेश कांबळे_*

*_दिनांक :- ०९/०९/२०२२_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2022/09/blog-post_9.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼





कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...