🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_डॉक्टरांनी दिलेली औषधाची चिट्ठी_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
_एक माणूस आजारी पडतो व डॉक्टरांकडे उपचारासाठी जातो. डॉक्टर त्याची पूर्ण तपासणी करून त्याला काही औषधे एका चिट्ठीवर लिहून देतात. या माणसाची आपल्या डॉक्टरांवर खूप श्रद्धा असते. घरी परतल्यावर तो आपल्या प्रार्थनेच्या खोलीत डॉक्टरांचा एक सुरेख फोटो मांडतो, नंतर तो त्या फोटोला अतिशय श्रद्धेने नमस्कार करतो व त्याच्यापुढे बसतो, तीन वेळा वाकून नमस्कार करतो. फुले वाहतो, उदबत्ती लावतो. मग तो डॉक्टरांनी त्याच्यासाठी दिलेल्या औषधाची चिट्ठी बाहेर काढतो व मोठ्या आदराने ती चिट्ठी पुन्हा पुन्हा वाचतो. 'दोन गोळ्या सकाळी दोन गोळ्या दुपारी ! दोन गोळ्या रात्री!' साऱ्या दिवसभरच काय, पण आयुष्यभर तो त्या चिट्ठीचा जप करीत राहतो, कारण डॉक्टरांवर त्याची नितांत श्रद्धा असते. आणि तरी देखील चिट्ठीचा त्याला रोग बरा होण्यासाठी काहीही उपयोग होत नाही.._
_मग तो माणूस त्या चिट्ठीबद्दल जास्त माहिती गोळा करण्याचे ठरवितो. व म्हणूनच तो धावत आपल्या डॉक्टरांकडे जातो व त्यांना विचारतो, 'आपण मला हीच औषधे का बरे लिहून दिलीत ? त्या औषधांनी मला मदत कशी होणार ?" डॉक्टर आपल्या व्यवसायात निपूण असल्याने ताबडतोब सांगतात, 'असं बघा, तुम्हाला अमुक अमुक रोग झाला आहे व त्या रोगाचे मूळ कारण असे आहे की मी दिलेले औषध जर आपण सांगितल्याप्रमाणे घेतले तर ते त्या कारणाचा संपूर्ण नाश करील. ते कारण दूर होईल. एकदा हे कारण दूर झाले की आपोआपच तुम्हाला झालेला रोग बरा होईल. '_
_तो माणूस विचार करतो, 'ओ; फारच छान! माझे डॉक्टर किती हुशार आहेत नाही! त्यांनी लिहून दिलेली औषधे किती उपयुक्त आहेत नाही!' घरी आल्यावर तो आपल्या शेजाऱ्यांशी व संबंधितांशी भांडू लागतो व आग्रह धरतो की, 'माझे डॉक्टर हे सर्वोत्तम डॉक्टर आहेत, इतर सर्व डॉक्टर निरुपयोगी आहेत.' पण या चर्चेमुळे त्याला काय मिळणार? साऱ्या आयुष्यभर जरी तो यासाठी भांडत राहिला तरी त्याचा त्याला यत्किंचितही फायदा होणार नाही. जर त्या माणसाने औषध घेतले तरच तो त्या आजारातून मुक्त होईल, तेव्हाच त्या औषधाचा त्याला खरा फायदा होईल._
*_प्रत्येक 'मुक्त' झालेला माणूस हा त्या डॉक्टरसारखा असतो. तो समाजातील माणसांना दुःखमुक्त कसे व्हायचे याचे मार्गदर्शन करतो, त्या मार्गावर चालायचे याचे विवेचन करणारी चिट्ठी देतो. जर लोकांनी त्या महापुरुषाबद्दल नुसतीच अंधश्रद्धा बाळगली, त्याने दिलेल्या चिट्ठीचे त्यांनी पुराणात रूपांतर केले व दुसऱ्या पंथातल्या लोकांशी मोट्या आवेशाने भांडायला सुरुवात केली, आमच्या धर्मसंस्थापकांची शिकवणूक ही सर्वश्रेष्ठ आहे, पण कोणीही ती शिकवणूक आचरणात आणली नाही; तर काय होणार? दुःखमुक्ती कशी होणार?_*
*_डॉक्टरांवरील श्रद्धा जर त्यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार रोग्याला औषधे घेण्यास प्रवृत्त करणारी असेल तर नक्कीच उपयोगाची आहे. औषधांचा परिणाम कसा होतो हे जाणणे जर औषध घेण्यास प्रवृत्त करणारे असेल तरच ते उपयोगी पडेल. पण प्रत्यक्षात कोणतेही औषध न घेता नुसत्या डॉक्टरांवरील श्रद्धेने कोणीही आपल्या आजारातून बरा होऊ शकणार नाही. दुःखमुक्तीसाठी आपण स्वतः औषध हे घेतलेच पाहिजे._*
*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_संदर्भ :- जगण्याची कला_*
_*विपश्यना साधना*_
*_संकलन :- महेश कांबळे_*
*_दिनांक :- २२/०९/२०२२_*
https://mikamblemahesh.blogspot.com/2022/09/blog-post_21.html
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
No comments:
Post a Comment