🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_मगधाचा भाग्योदय_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
_*सव्विसशे वर्षांपूर्वी उत्तर भारतात १६ प्रमुख गणराज्ये होती.*_
_१. अंग. २. मगध, ३. काशी, ४. कोशल, ५. बिजी [बज्जि] ६. मल्ल, ७. चेतीय, ८. वंस [ग], ९. कुरू, १०. पंचाल, ११. मत्स्य, १२. सुरशेन, १३. अश्यक. १४. अवन्ती, १५. गंधार आणि १६. कंबोज._
_यातील काही गणतंत्र होती व बाकी राजतंत्र शासनाखाली होती. *यात मगध हे फार मोठे व सामर्थ्यसंपन्न राज्य होते. तेथे राजकुलीन शासनाचा शासक महाराज भाति होता. त्याला महाराणी बिम्बिपासून एक पुत्ररत्न प्राप्त झाले. बिम्बिचा मुलगा म्हणून तो बिम्बिसार या नावाने प्रसिद्ध झाला.*_
_बिम्बिसार फार महत्वाकांक्षी राजा होता. किशोरावस्थेतच त्याच्या मनात राज्याभिषेक करवून घेण्याची प्रबळ इच्छा निर्माण झाली. राजा भातिचे आपल्या पुत्रावर निरतिशय प्रेम होते. त्याने पंधरा वर्षांच्या किशोर बिम्बिसारचा राज्याभिषेक करून टाकला व स्वतः राज्यकारभारातून निवृत्त झाला. बिम्बिसारची महत्वाकांक्षा वाढत गेली. युवावस्थेपर्यंत तो शस्त्र विद्येत प्रवीण झाला आणि सैन्याचे संचालनाच्या रण कौशल्यात निपुण झाला. त्याने आपली सेना विविध शस्त्रास्त्रांनी सुसज्ज केली. या विपुल सैन्य बळावर आणि रणांगणातील युद्ध चातुर्यामुळे त्याने शेजारच्या अंग देशाचे राज्य जिंकले. *अंग आणि मगध दोन राज्ये एक झाल्यावर बिम्बिसारची शक्ती वाढली. सेना वाढली. या विशाल सैन्याचा अधिपती झाल्यामुळे तो स्वतःला सेनिय म्हणजे सेनापती बिम्बिसार म्हणवू लागला.* त्याच्या सेनेचा झेंडा शुभ्र पांढरा होता. त्या श्वेतकेतू-सेनेचा दबदवा वाढला आणि ती सेना आसपासच्या जनपद गणराज्यावर अधिपत्य गाजवू लागली._
_*मगधाच्या पश्चिगोत्तर सीमेवर कोशल देखील एक फार मोठे व शक्तीशाली राज्य होते. त्याचा राजा होता महाराज महाकोशल. त्याच्या मुलाचे नाव प्रसेनजित व मुलीचे नांव कोशलदेवी होते. राजकुमार प्रसेनजितचा विवाह मगधाचा राजा भाति याच्या कन्येशी म्हणजे बिम्बिसारच्या बहिणीशी झाला होता. भातिचे उत्तराधिकारी सेनिय बिम्बिसारचे वाढते सामर्थ्य पाहून कोशल नरेश प्रभावित झाला आणि त्याने राजकुमारी कोशलदेवीचा विवाह मगधाच्या युवा नरेशाशी करून टाकला व आपले संबंध बळकट केले.* महाराज कोशलने आपल्या कन्येला काशीचे राज्य वरदक्षिणेदाखल देऊन टाकले. त्यामुळे बिम्बिसारच्या साम्राज्याची शक्ती अधिकच वाढली. आता तो अंग, मगध व काशी या सारख्या तीन महाजनपदांचा सम्राट झाला. त्याच्या राज्याची संपदा-ऐश्वर्य आणि सैन्याचे शौर्य उत्तरोत्तर वाढू लागले. व त्या बरोबरच युवावस्थेतील कामपिपासा भोगवादी वृत्ती वाढू लागली. पट्टराणी कोशलदेवी व्यतिरिक्त आजुबाजूच्या देवांगना सदृश सौंदर्यवान राजकुमारींनी आणि अन्य सौंदर्य शालिनी स्त्रियांनी त्याचा राणीवास वाढतच गेला. तरी देखील त्याचं सौंदर्य पिपासा कमी झाली नाही._
_*दूरच्या मद्र [मद्द] देशाची राजधानी सागलची [आधुनिक पाकिस्तानी पंजाबमधील लाहोरनजीकचे सियालकोट शहर] ची राजकन्या खेमा सुवर्णरंगी होती. सर्वांगसुंदर सौंदर्यवती होती. तिच्या अतुलनीय रूपमाधुर्याची चर्चा बिम्बिसारने ऐकली तेव्हा तिच्याशीही त्याने विवाह केला. आपल्या अंतःपुरात तिला महत्वपूर्ण स्थान दिले.*_
_तो ज्या कोणी गणराज्यातील एखाद्या सौंदर्यवतीचे नाव ऐकत असे तिच्याशी विवाह करण्यासाठी, तिच्या प्राप्तीसाठी तळमळू लागे. त्या काळात काही काही गणराज्यात आपल्या प्रदेशातील सर्वश्रेष्ठ सुंदरी आणि नृत्य गायन, वादन इ. ललित कलात नितांत निपुण युवतींच्या स्पर्धा होत असत गणराज्यांतील अनेक राजकुमार, राजपुरुष, शक्तीशाली सामंत इत्यादी त्या सौंदर्यसम्राज्ञीशी विवाहबद्ध होण्यासाठी उतावीळ होत असत. परस्पर कलह भांडण, तंटे होऊ नयेत या भीतीने त्या युवतीला गणिका पद देऊन मानसन्मान दिले जात असत. जनपदकल्याणी नावाने विभूषित केले जात असे. तिला जनपदाच्या प्रमुख गणिकेचे जीवन व्यतीत करावे लागत असे, आणि राज्यामार्फत तिच्या शरीरसुखाची किंमत फार मोठी ठरवून दिली जात असे._
_*अशीच एक सौंदर्य सम्राज्ञी होती. नगर वधू आम्रपाली, ती वज्जि [लिच्छवी] गणराज्याची जनपद-कल्याणी होती.* तिच्या सौंदर्याची ख्याती ऐकून बिम्बिसार तिची प्राप्ती व्हावी म्हणून विव्हळ झाला. वञ्जि राज्याशी मगधाचे संबंध फारसे चांगले नव्हते. आणि कोणाही जनपद कल्याणीशी विवाहसंबंध न ठेवण्याची अलिखित प्रथा होती. म्हणून आपली कामवासना शमविण्यासाठी तो आपल्या काही सैनिकांसह वारंवार वज्जिची राजधानी वैशाली येथे वेश बदलून जात असे, आणि तिच्या शरीर सौंदर्याचा उपभोग घेत असे._
_याचप्रमाणे उज्जैनची जनपदकल्याणी पद्मावतीची ख्याती ऐकून तो तेथेही गेला._
_अशाप्रकारे अन्य प्रादेशिक सौंदर्य सम्राज्ञीच्या मागे ही तो भ्रमराप्रमाणे भ्रमण मंडले करीत असावा. परंतु आम्रपाली आणि पद्मावतीशी असलेला त्याचा संबंध जगजाहिर झाला. कारण दोघींनाही त्याच्यापासून एक एक मुलगा झाला. *बिम्बिसारपासून आम्रपालीला 'विमलकौंडन्य' आणि पद्मावतीला 'अभय' नावाचा पुत्र झाला.*_
_धन-मद आणि राज्य-मद यांच्यामुळे त्याचा काम-मद फारच वाढला. परंतु तरी देखील बिम्बिसारने मानवी जीवनमूल्यांची पायमल्ली केलेली नाही, असे आपल्याला दिसते. या *शरीरविक्रयातून गणिकांना जी मुले झाली त्या मुलांचा त्याने सहर्ष स्वीकार केला होता. त्यांच्याबाबतच्या नैतिक जबाबदाऱ्या, उत्तरदायित्व त्याने सांभाळले. ते टाळले नाही. गर्भावस्थेपासूनच त्यांच्या उदर भरणाची जबाबदारी घेऊन आपल्यामार्फत पर्याप्त धन तो त्यांच्याकडे पाठवीत राहिला. आणि नंतर संगोपन-संवर्धनाची जबाबदारीही पार पाडली. पद्मावतीने सात वर्षानंतर पुत्र अभय याला त्याचा पिता बिम्बिसार यांच्याकडे पाठविले तेव्हा त्याने त्याच्याशी किंचितही दुर्व्यवहार केला नाही. अन्य राजकुमारांप्रमाणेच वागविले, कोणताही भेदभाव केला नाही. अन्य राजकुमारांप्रमाणेच अभयही राजमहालात राहात असे. राजकुमार अभयविषयी बिम्बिसारच्या मनात अन्य राजपुत्राप्रमाणेच प्रेम व वात्सल्य भावना होती. पुढे एकदा तर त्याने त्याला सात दिवसांसाठी मगधाच्या राजसिंहासनावरही बसविले.*_
_*बिम्बिसारच्या आणखीही काही राजराण्या होत्या. म्हणून त्याला आणखीही काही मुले असण्याची शक्यता आहे. परंतु विपश्यनेच्या प्राचीन इतिहासाचे संशोधन करतांना जी अन्य काही नावे समोर आलीत त्यात आहेत राजकुमार अजातशत्रू, राजकुमार शीलव, राजकुमार धुंद आणि राजकुमारी चुंदी..*_
_बिम्बिसारला आपले कुटुंब फार प्रिय होते, त्याला राण्या, राजपुत्र आणि राज्यकन्या अत्यंत आवडत होत्या. पंधरा वर्षाच्या किशोरअवस्थेत राज्याभिषेक झाल्यावरही सोळा वर्षे पर्यंत त्याने मगध साम्राज्याचे सूत्र संचालन केले. *वयाच्या एकतीसाव्या वर्षी बिबिसारची भगवान गौतम बुद्धांशी राजगृहाच्या लट्ठिवनामध्ये पहिली भेट झाली. [तसा तो बोधिसत्व परिव्राजक सहा वर्षापूर्वी पांडव पर्वतावर भेटला होताच.]* पहिल्या प्रथम भगवान बुद्धांचा उपदेश ऐकून बिम्बिसार अंतर्मुखी झाला व त्याला सत्याच्या दर्शनामुळे स्त्रोतापत्र अवस्था प्राप्त होऊन त्याचे मन कृतज्ञता भावनेने भरून आले. विपश्यनेद्वारा आपल्या अंतरंगातील सत्याचा थोडासा जरी अनुभव आला तरी साधक कृतज्ञताविभोर होतो. ही तर स्रोतापत्र अवस्था होती. कृतज्ञतेचे तेथे सांगावे?_
_त्याचा जीवनप्रवाहच बदलला. कामक्रिडेत, रतिरसात धुंदफुंद झालेला माणूस धर्मरसात गोडी घेऊ लागला. आपल्या अनुभवावरून त्याला समजले की *'सब्बरसं धम्मरसं जिनाति' धर्मरस हाच सर्व रसात श्रेष्ठ रस आहे.* हा धर्म सर्वांनी प्राशन करावा-चाखावा. आणि त्याच वेळी आपल्या प्रिय पत्नी, पुत्र, कन्या सर्वांनाच याचा लाभ मिळावा या सदिच्छेने भगवान बुद्धांसमवेत सर्व भिक्षूंना भोजनासाठी राजमहालात दुसऱ्या दिवशी सकाळी येण्याचे निमंत्रण दिले. भगवानांनी मौन स्वीकृती दिली. दुसऱ्या दिवशी भिक्षुसंघासह भगवान भिक्षेसाठी राजमहालात पोहोचलो. बिम्बिसारने अत्यंत सन्मानपूर्वक त्यांना भोजन वाढले. त्यानंतर भगवानांना उच्चासनावर बसवून व आपण खालच्या आसनावर बसून भगवानांचा कल्याणकारी धर्मोपदेश ऐकला. कानावर शुद्ध धर्माचा अमृतरस वर्षु लागला. तिथेच बसल्या बसल्या आपल्या प्रजेची आठवण झाली. माझी सारी प्रजा म्हणजे माझीच मुलेबाळे सर्वांनाच हा विशुद्ध मुक्तीचा मार्ग मोकळा व्हावा, कळावा. पण भगवान दीर्घ काळ राजगृहात राहिले तरच हे शक्य आहे आणि भविष्यातही वेळोवेळी त्यांचे येथे आगमन होत राहावे._
_राजधानी राजगृहाच्या कल्याणार्थ असे एखादे योग्य ठिकाण असावे की जिथे भिक्षु संघासहित भगवानांचा निवास व्हावा आणि शुद्ध धर्म मार्गाने जाण्यासाठी नागरिकांना व ग्रामीण जनतेलाही त्यांचे मार्गदर्शन व्हावे. हे स्थान राजधानीच्या कोलाहलापासून दूर असावे. कारण ध्यानसाधनेसाठी शांत एकांतवासाच असावा लागतो. पण ते राजधानीपासून इतके दूर ही नसावे की लोकांना तिथे निर्वेध जाणे शक्य नसावे. *एकाएकी अकस्मात त्याला वेणुवनाची आठवण झाली. हे ठिकाण या धर्मकार्यासाठी सर्वथैव उपयुक्त होते. अत्यंत विनम्र भावाने त्याने आपल्या मनातील ही धर्मभावना भगवानांना बोलून दाखविली. भगवानांनी मौन स्वीकृती दिली. बिम्बिसार पुन्हा एकदा कृतज्ञता विभोर झाला. 'सब्बदानं धम्मदानं जिनाति' धर्माचे दान सर्व दानात श्रेष्ठ दान असते. भगवानांनी राजगृहाचे वेणुवन, साधक संघासाठी स्वीकारले,* मगध नरेश कृतार्थ झाला. 'इथे अनेक लोकांना शुद्ध धर्माचा लाभ होईल, ते सांसारिक मुक्ततेच्या मार्गावर आरूढ होणारी 'विपश्यना' शिकतील. माझा परिवार धन्य होईल. माझी प्रजा धन्य होईल.'_
_आणि खरोखरच तसे घडून आले. *वेणूवनाच्या कलंदप निवासात साधक संघाचा पहिला विहार-मठ स्थापन झाला. मगधाचे भाग्य उदयाला आले. राजपरिवार आणि मगध राष्ट्र त्याचप्रमाणे त्या राज्याबाहेरील अनेक लोक शुद्ध धर्माच्या संपर्कात आले, आणि मांगल्याचे धनी झाले.*_
आजही भारतात पुन्हा शुद्ध धर्माचा उदय झाला आहे. अनेक लोक त्याच्या सान्निध्यात यावेत व कल्याणकारी मांगल्याचा लाभ करून घ्यावा._
*_कल्याणकारी मार्ग सर्वांना लाभो !_*
*_मुक्तीदायिनी प्रेरणा सर्वांत जागृत हावो.._*
*_!! धन्य होवो ! मंगल होवो ! कल्याण होवो !!_*
*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_संदर्भ :- जागे पावन प्रेरणा_*
*_संकलन :- महेश कांबळे_*
*_दिनांक :- २३/०९/२०२२_*
https://mikamblemahesh.blogspot.com/2022/09/blog-post_22.html
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
No comments:
Post a Comment