Friday, 23 September 2022

शील सदाचाराची शिकवणूक

 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_शील सदाचाराची शिकवणूक_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

          *_अविद्या, राग व द्वेष यांचे समूळ उच्चाटन करून दुःखमुक्ती करून घेण हे आपले मुख्य उद्दिष्ट आहे. या आवाक्यातील उद्दिष्टांपर्यंत आपल्याला पोहचवू शकेल असा मार्ग भगवान बुद्धांनी शोधला, अवलंबिला व इतरांना शिकविला. या मार्गाला त्यांनी 'आर्य अष्टांगिक मार्ग' असे म्हटले आहे._*

       _सोप्या शब्दात हा मार्ग समजावून सांगा अशी विनंती एकदा भगवान बुद्धांना केल्यावर ते म्हणाले,_

         *_'सर्व दुष्कृत्यांपासून दूर रहा, सर्व सत्कृत्यांचाच संचय करा. आणि आपले मन शुद्ध करा."_*

          _हीच मुक्तावस्था प्राप्त केलेल्या माणसांची शिकवणूक आहे. हे विवेचन अगदी स्पष्ट व सर्वमान्य होण्यासारखे आहे. दुसऱ्यांना इजा करणारी कामे आपण करू नयेत, त्याप्रमाणेच सर्वांना हितकारी कामे आपण करावीत. याबद्दल कुणाचाही विरोध असणार नाही. पण काय फायद्याचे व काय तोट्याचे हे कसे ठरवावे? कोणते कृत्य हे सत्कृत्य होते व कोणते दुष्कृत्य ठरते, हा विचार जेव्हा आपण करतो, तेव्हा आपण आपल्या स्वतःच्या मतांवर अवलंबून असतो, आपल्या परंपरागत श्रद्धांवर विसंबतो. आपली पसंती व पूर्वग्रह यांना महत्त्व देतो व त्यामुळेच त्यांच्या अशा संकुचित व्याख्या तयार होतात की, समाजातील काही पंथांना त्या मान्य होतात तर इतरांना अमान्य असतात. अशा प्रकारच्या उथळ स्पष्टीकरणापेक्षा जगन्मान्य होईल अशी सत्कृत्य व दुष्कृत्य, पाप व पुण्य यांची व्याख्या आपल्याला दिली आहे._

           _कोणतेही कृत्य की जे दुसऱ्यांना अहितकारक ठरते, त्यांची मनःशांती घालवते ते दुष्कृत्य वा पाप समजावे. जे कृत्य दुसऱ्यांना हितकारक असते. त्यांच्यात सुखशांती, एकात्मता व सुसंवाद निर्माण करते ते पुण्य वा सत्कर्म समजावे. तसेच कोणतेही कर्मकांड, बौद्धिक कसरती वा क्रियाकर्म करून मनाचे शुद्धिकरण होत नाही, तर पद्धतशीरपणे स्वतःबद्दलच्या खऱ्या सत्याचा स्पष्ट अनुभव घेऊन मनावरचे जुने संस्कार पद्धतशीरपणे काढून टाकून दुःखमुक्तीपर्यंत जाण्यानेच मन शुद्ध होते._

              *_वर सांगितलेल्या आर्य अष्टांगिक मार्गाची शिकवणूक मुख्य तीन भागात विभागली आहे. ती म्हणजे शील, समाधी व प्रज्ञा. शील म्हणजे सदाचार शरीराच्या किवा वाणीच्या सगळ्या दुष्कृत्यांपासून दूर राहणे. समाधी म्हणजे मनाला एकाग्र करण्याचा अभ्यास. आपल्या मनाच्या क्रियांवर नियंत्रण ठेवणाऱ्या शक्तीचा जाणीवपूर्वक केलेला विकास, प्रज्ञा म्हणजे शहाणपण स्वतःच्या अंतर्दृष्टीचा स्वाभाविक विकास व शुद्धिकरण._*

*_सदाचाराचे मूल्य_*

       _ज्या कोणाला धर्माचे आचरण करावयाचे आहे, त्याने सुरुवातच सदाचारापासून करावयाला हवी. धर्म प्रवेशाची ही पहिली पायरी आहे. त्याशिवाय प्रगती होणारच नाही. दुसऱ्याला अहितकारी होतील अशी कृत्ये, क्रिया यांपासून आपण दूरच राहिले पाहिजे. हे समजायला अगदी सोपे आहे. कारण अशा वागणुकीची समाजाच्या स्थैर्यासाठी फार गरज आहे. असे न केले तर समाजाची एकसंघता कशी टिकणार? पण खरंतर आपण अशा कृत्यांपासून दूरच रहायला पाहिजे. कारण यामुळे दुसऱ्याचे तर सोडाच पण आपले स्वतःचेही नुकसान होते. खून, चोरी, दुसऱ्याचा अपमान किंवा बलात्कार ही कृत्ये मनात प्रचंड राग, लोभ किंवा प्रक्षोभ निर्माण केल्याशिवाय घडणे अशक्यच आहेत. आसक्तीचा व द्वेषाचा हा क्षण आत्ताच दुःख निर्माण करतो असे नाही तर भविष्यातही त्याचे ओझे मोठे करतो. *भगवान बुद्ध म्हणतात,*_

        *_'या क्षणी विकाराने जळणे भविष्यातही जाळते. दुष्कृत्य आपल्यासाठी प्रचंड दु:ख निर्माण करते. या क्षणाचा आनंद भविष्याच्या आनंदाची नांदी ठरतो. आताचा सद्गुण भविष्यातही खूप सुख देतो.'_*

         _स्वर्ग किंवा नरक यांचा अनुभव घेण्यासाठी आपल्याला मृत्यूची वाट पाहण्याची गरज नाही. या जन्मात व आपल्यातच, येथेच तो अनुभव घेऊ शकतो. आपल्या हातून जेव्हा दुष्कृत्ये घडतात तेव्हा अभिलाषा व तिटकारा यांच्यामुळे आपल्याला नरकाचे दर्शन होते. जेव्हा आपण सत्कृत्ये करतो तेव्हा आपल्या मनःशांतीतून आपल्याला स्वर्गाचाच अनुभव येतो. म्हणूनच दुसऱ्यांच्या भल्यासाठी नव्हे तर आपल्या फायद्यासाठी, आणि आपल्यालाच होणारी हानी टाळण्यासाठी आपण सर्व प्रकारच्या शाब्दिक वा शारीरिक दुष्कृत्यांपासून दूर राहिले पाहिजे._

       _शील आचरण का करावयाचे याचे कारण म्हणजे आपल्याला आपला स्वतःचा शोध घ्यावयाचा आहे. आपल्या संबंधीच्या सत्यात खोलवर जाऊन बुडी मारावयाची आहे व आपले अंतरंग जाणावयाचे आहे. हे करण्यासाठी मन अतिशय शांत व अविचल असण्याची गरज आहे. अस्थिर व खवळलेल्या तलावात जसे खोलवर काय आहे ते दिसणे अशक्यच आहे, तसेच अंतर्निरीक्षणासाठी प्रक्षुब्धतेपासून मुक्त व शांत अशा मनाची जरुरी आहे. जेव्हा आपण दुष्कृत्य करतो. तेव्हा आपले मन प्रक्षुब्धतेने भरून ओसंडत असते. जेव्हा आपण वाणीच्या व शरीराच्या दुष्कृत्यापासून परावृत्त असतो. तेव्हाच मनाला पाहिजे तेवढी शांती मिळू शकते व अंतर्निरीक्षणाच्या कार्यात प्रगती होऊ शकते._

        _अजून एका कारणासाठी शील-पालनाची आवश्यकता आहे. जो धर्माचरण करतो तो आपले अंतिम लक्ष्य दुःखमुक्ती, या उद्दिष्टाकडे वाटचाल करीत असतो. हे काम करीत असतांना आपण आपल्या मनाची गुंतवणूक अशा गोष्टीत करता कामा नये की ज्यामुळे मनाची नेहमीची सवय वाढीला लागेल. कोणतीही क्रिया की जी दुसऱ्याचे अहितच करते, ती नेहमीच अभिलाषा, हेवा, द्वेष व अज्ञान यांना सोबतच करते. अशी कामे करणे म्हणजेच एक पाऊल पुढे व दोन पाऊल मागे जाणे नव्हे का? असे केले तर मग आपण आपले साध्य कसे व केव्हा साधणार? हा आपल्या प्रगतीतील एक अडथळाच नाही का ?_

         _*शीलपालनाची गरज ही फक्त समाजाच्या हितासाठीच नाही तर त्यातील प्रत्येक घटकाच्या हितासाठी पण आहे. प्रत्येकाच्या शाश्वत सुखासाठीच नव्हे तर त्याच्या धर्माचरणाच्या मार्गासाठी आध्यात्मिक उन्नतीसाठीही आहे. शील-पालनात आर्य अष्टांगिक मार्गातील शिकवणुकीचे तीन भाग येतात. सम्यक् वाचा अथवा वाणी, सम्यक् कर्मान्त व सम्यक् उपजीविका म्हणजेच योग्य वाचा, योग्य कर्म आणि योग्य उदरनिर्वाह.*_

*_सम्यक् वाणी_*

          _आपले बोलणे शुद्ध, सात्विक व हितकारक असले पाहिजे. शुद्धी ही अशुद्धता दूर करूनच मिळवता येते. आणि म्हणूनच पहिल्यांदा वाणीची अशुद्धता म्हणजे काय ते आपण समजावून घेतले पाहिजे. अशुद्ध वाणीत खोटे बोलणे म्हणजेच सत्याला सोडून मोघम बोलणे, दोन मित्रांची मैत्री तुटेल अशा गोष्टी करणे, व्यक्तीच्या पश्चात त्यांची निंदानालस्ती करणे, बदनामी करणे, दुसऱ्याचा शांतताभंग करील वा त्यांना फायद्याचे होणार नाही अशा कठोर शब्दांचा वापर करणे. निरर्थक कुजबुज, अर्थहीन गप्पागोष्टी ज्यांच्यामुळे आपण आपला व इतरांचा वेळ वाया घालवतो, अशी कृत्ये करणे, या व अशा गाष्टी वाणीची अशुद्धी करतात. या सगळ्या गोष्टी सोडल्या तर बाकी सर्व गोष्टी या शुद्ध वाणीतच येतात._

         _सम्यक् वाणी ही काही नकारात्मक संकल्पना नाही. सम्यक वाणी आचरणारा कोण असतो हे भगवान बुद्धांनी असे विशद केले आहे :-_

            _*तो असत्य भाषण सोडून, त्यापासून दूर राहत, सत्यवादी बनून, सत्यसन्ध [सत्याचे आचरण करणारा], लोकांत विश्वासपात्र बनून जसे पाहिले ऐकले तसेच बोलणारा असतो. एक दुसऱ्यांची चहाडी सोडून त्यापासून दूर राहतो, कुणाची गोष्ट इथे ऐकून तिथे सांगत नाही, तिथे ऐकून परस्पर फूट पाडण्यासाठी इकडे सांगत नाही. याप्रमाणे तो भांडणाऱ्यांना जोडण्यासाठी व मिळून राहाणाऱ्यांनी भांडू नये यासाठी आपल्या वाणीचा प्रयोग करतो. ह्याप्रकारे तो सर्वांच्या एकतेत प्रसन्न, सर्वाच्या एकतेत रत सर्वांच्या एकतेत आनंदी राहणारा व एकता निर्माण करणारी वाणी बोलणारा असतो. कठोर वाणीचा व्यवहार सोडून त्यापासून दूर राहतो. तो अशी वाणी बोलण्याचा प्रयत्न करतो जी इतरांना ऐकण्यास चांगली वाटेल, प्रिय वाटेल, हृदयंगम असेल, सभ्य असेल, अधिक लोकांसाठी रूचणारी, आवडेल अशी असेल, निरर्थक गोष्टी सोडून त्यापासून दूर राहतो व अशा प्रकारे तो प्रासंगिक, सार्थक, धर्मयुक्त, अनुशासन प्रमाणित एकोपा घडविणारी वाणीच बोलतो. त्याची वाणी स्मरणयोग्य, समयोचित व्यवहारयुक्त आटोपशीर, परिणामकारक व सार्थक असते.*_

*_सम्यक् कर्मान्त [शारीरिक कर्म ]_*

          _शारीरिक कर्म देखील शुद्ध हवे. वाणीप्रमाणे शारीरिक कर्माचीही शुद्धता समजण्यासाठी आपल्याला दूषित कर्मे कोणती हे समजावून घेतले पाहिजे. म्हणजे आपण त्यापासून दूर राहू शकू. अशुद्ध कर्मे म्हणजे जिवंत प्राण्यांची हत्या, चोरी, व्यभिचार, नशापाणी की ज्यामुळे माणूस आपली सारासार बुद्धी गमावून बसतो व आपण काय बोलतो, कसे वागतो याची त्याला शुद्ध राहत नाही. या चारही गोष्टी सोडल्या तर जी कर्मे राहतात ती सर्व शुद्धच राहतात. ती सारी सत्कर्मेच आहेत._

           _सम्यक् कर्मे ही देखील नकारात्मक संकल्पना नाही. सम्यक कर्मे आचरणाऱ्याचे वर्णन करताना भगवान बुद्ध म्हणतात, *'जो तलवार व दंड बाजूला ठेवून शांततेच्या मार्गाने कुणालाही इजा न करता सर्वांवर दयाच करतो. जगातील सर्व प्राण्यांचे भले अपेक्षितो, चोरीपासून दूर असतो आणि जो स्वतः अतिशय शुद्ध आचरण करतो, तोच सम्यक् कर्म आचरणारा.*_

*_शील_*

          _संसारी सर्वसामान्य जीवन जगण्यासाठी सम्यक् वाणी व कर्म अवलविण्यासाठी खालील पाच नियम पाळणे आवश्यक आहे :-_

      _महत्त्वाच्या पायऱ्या आहेत दुसऱ्याच्या किंवा आपल्या अहितापासून आपणास सुरक्षित ठेवण्याचा हा एक व्यवहार्य तोडगाच आहे._

[१] कोणत्याही सजीव प्राण्याची हत्या न करणे

[२] चोरी न करणे

[३] व्यभिचार न करणे

[४] खोटे न बोलणे

[५] कोणत्याही प्रकारचे नशापान न करणे.

        _वरील पाचही नियमांचे काटेकोर पालन करणे हे धर्माचरण करणाऱ्यांसाठी फारच आवश्यक आहे._

         _आपल्या आयुष्यात कधी कधी दैनंदिन व्यवहार थांबवून कदाचित थोड्या दिवसांकरिता किंवा एक दिवसाकरिता का होईना मनाच्या शुद्धिकरणासाठी किंवा मुक्तीसाठी काम करण्याची संधी येते. अशा वेळी मोठ्या निष्ठेने धर्मपालन करण्याची जरूरी असते. आणि म्हणूनच, नेहमीपेक्षा आपला आचार-विचार जरा काळजीपूर्वकच व्हावा लागतो. स्वतःच्या शुद्धिकरणास मारक ठरतील अशा गोष्टी ह्या वेळी टाळणे जास्त महत्त्वाचे असते व म्हणूनच अशा वेळी पाच ऐवजी आठ नियमांचे पालन करावयाचे असते. त्यात पहिल्या पाच नियमांमध्ये एक बदल केला जातो. तो म्हणजे केवळ व्यभिचारापासून दूर राहण्यापेक्षा संपूर्ण ब्रह्मचर्य पाळले जाते. त्याचबरोबर अवेळी म्हणजे दुपारी बारानंतर अन्न ग्रहण करू नये. कोणत्याही प्रकारची शरीर सजावट वा मौजमजा, करमणूक व आरामदायी विलासी शय्या टाळावी. ब्रह्मचर्य व इतर नियमांमुळे स्वनिरीक्षणासाठी लागणारी मनाची शांती व जागरुकता वाढण्यास व तिचे पोषण होण्यास मदत होते. तसेच बाह्य गोष्टींमुळे होणाऱ्या शांतताभंगापासून मनाची सुटका होते. या आठ नियमांचे पालन फक्त निष्ठेने धर्म साधनेच्या वेळीच होणे जरूरीचे आहे. नंतर आपल्या दैनंदिन जीवनात सदाचारासाठी सांगितलेले पाच नियमच पाळणे पुरेसे आहे._

         _ज्यांनी घरादाराचा त्याग करून एकांतवास किंवा भिक्षु व भिक्षुणीचे जीवन पत्करले आहे, त्यांच्यासाठी हे नियमपालन आठवरून दहावर जाते. पहिल्या आठ नियमांखेरीज त्यांनी अर्थाजन करू नये, कोणत्याही कामासाठी पैसे घेऊ नयेत भिक्षेवरच आपला उदरनिर्वाह करावा, म्हणजे आपल्या स्वतःसाठी व समाजाच्या फायद्यासाठी आपला संपूर्ण वेळ ते मनाच्या शुद्धिसाठी देऊ शकतील._

          _*पाच, आठ वा दहा नियमांचे पालन म्हणजे काही निरर्थक रूढी नाहीत. त्या भगवान बुद्धांची शिकवणूक पाळून पुढे जाण्याच्या खऱ्या अर्थी अतिशय महत्वाच्या पायऱ्या आहेत दुसऱ्याच्या किंवा आपल्या अहितापासून आपणांस सुरक्षित ठेवण्याचा हा एक व्यवहार्य तोडगाच आहे.*_

*_सम्यक्-उपजीविका_*

             _आपल्या सर्वांना उदरनिर्वाहासाठी कोणत्या ना कोणत्या योग्य मार्गाचा अवलंब करावयास पाहिजे. योग्य उपजीविकेची दोन मोजमापे आहेत. एक म्हणजे ती दुसऱ्याला कोणत्याही प्रकारची इजा पोहोचवणारी नसावी. म्हणजेच तिच्यामुळे वर सांगितलेल्या पहिल्या पाच नियमांचा भंग होता कामा नये. *इतकेच काय पण आपण असा कोणताही व्यवसाय निवडू नये की त्यामुळे इतरांना वरील पाच नियम मोडण्यास प्रोत्साहन मिळेल व त्यापासून त्यांची हानी होईल.*_

           _आपल्या उपजीविकेच्या मार्गाने प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष दुसऱ्याला इजा होता कामा नये. *म्हणजे ती उपजीविका ज्यात माणसांची किंवा अन्य प्राण्यांची हत्या करावी लागते, ती सम्यक् उपजीविका होऊच शकत नाही. इतकेच काय पण दुसऱ्याने मारलेल्या प्राण्यांची हाडे, मांस, कातडी किंवा अन्य भाग यांची विक्रीही योग्य ठरत नाही कारण ती दुसऱ्याने केलेल्या अयोग्य कर्मावरच आधारित असते. दारूची किंवा इतर मादक पदार्थांची विक्री कितीही फायद्याची असली व आपण स्वतः त्यापासून दूर असलो तरी ती दुसऱ्यांना व्यसनाधीन करण्यास प्रवृत्त करते व त्यांना हानीकारक असते म्हणून सम्यक् उपजीविका होऊ शकत नाही. जुगाराचा अड्डा चालवणे आर्थिकदृष्ट्या खूप फायद्याचे असेलही परंतु तेथे येणाऱ्यांचे मात्र नुकसानच होते. विष किंवा शस्त्रे, मारक हत्यारे, दारूगोळा, बॉम्ब, दूर पल्ल्याची शस्त्रे यांचाही व्यवसाय खूप पैसा मिळवून देत असेलही. पण तो हजारो लोकांची शांती व समन्वय बिघडवतो व त्यामुळे सम्यक् व्यवसाय होऊ शकत नाही.*_

              _ज्या कर्मामुळे लोकांचे उघड उघड नुकसान होणार नाही, पण त्यामागे मनाची प्रेरणा चांगली नसेल, शुद्ध नसेल, तर असे काम सम्यक् उपजीविकेत येणार नाही. उदा. एखादा चांगला डॉक्टर आहे, पण तो एखादी मोठी साथ यावी व मला भरपूर पैसा मिळावा अशी इच्छा करतो. एखादा व्यापारी साठेबाजी करून किंवा दुष्काळ पडून माझा माल चढ्या किंमतीत विकला जावा अशी इच्छा करतो, या सम्यक उपजीविका होऊ शकत नाहीत._

           _आपण प्रत्येकजण समाजाचे घटक आहोत. आपण समाजाची बांधिलकी मानून काही कामे करतो, कोणाची तरी गरज पूर्ण करतो व आपला निर्वाह भागवीत असतो. भिक्षु किंवा घरादाराचा त्याग केलेला संन्यासी सुद्धा आपल्या मनाचे शुद्धिकरण करून आध्यात्मिक प्रगती साधून आपले व समाजाचे हित साधतो. यांनादेखील समाजाकडून भिक्षा व माधुकरी मिळते. पण जर त्याने आपल्या शक्तीचा दुरुपयोग करून समाजाची फसवणूक किंवा दिशाभूल केली, लोकांना चमत्कार वगैरे दाखवून आपल्या आध्यत्मिक उन्नतीचे वृथा प्रदर्शन केले, तर ती देखील सम्यक उपजीविका म्हणता येणार नाही._

        *_आपल्या कामाबद्दल मिळणारा मोबदला आपण आपल्या कुटुंबियांच्या भरण पोषणासाठी वापरतो. त्यातील जास्तीचा भाग, ते शक्य नसेल तर कमीत कमी काही भाग समाजाकडे परत गेला पाहिजे, समाजात जे कमी सुदैवी लोक आहेत. त्यांच्या उपयोगी पडला पाहिजे. समाजातील एक उपयोगी घटक होऊन आपण आपल्या व समाजाच्याही उपयोगी पडावे या प्रेरणेने केलेली सर्व कामे सम्य उपजीविकेत येतील._*


*_विपश्यना साधनेच्या शिबिरातील शील पालन व अनुशासन_*

         *_सम्यक वाचा, सम्यक् कर्मात व सम्यक उपजीविका हे आपल्या व समाजाच्या हिताचे आहेत. म्हणून त्यांना धरून आचरण केले पाहिजे. विपश्यना साधनेच्या शिबिरात सर्व प्रकारच्या शीलपालनाचा अभ्यास करण्याची फार उत्तम संधी मिळते. धर्मपालनाचा चांगला अभ्यास करण्यासाठी मुद्दाम राखून ठेवलेला हा काळ असतो. म्हणूनच प्रत्येक शिबिरार्थीने आठही नियमांचा प्रयत्नपूर्वक अभ्यास करावयाचा असतो. तरी देखील नेहमीच्या सवयीचा विचार करून प्रथमच भाग घेणाऱ्यांना किंवा शारीरिक त्रास असणाऱ्यांना सवलत दिली जाते. त्यांना संध्याकाळी थोडासा आहार दिला जातो. आणि म्हणूनच जरी ते जवळ जवळ आठ नियमांचे पालन करीत असले तरी त्यांना पाचच शीलपालनाची प्रतिज्ञा दिली जाते._*

            *_ह्या नियमांबरोबर शिबिरार्थींनी कडक मौन पाळावयाचे असते. त्यामुळे शेवटच्या दिवसापर्यंत शिबिरात भाग घेणाऱ्यांना आपापसात बोलण्यास सक्त मनाई आहे. आपल्या अडचणीसंबंधी ते आपल्या शिक्षकांशी किंवा व्यवस्थापकाशी संपर्क साधू शकतात. अशा प्रकारे कमीत कमी अडथळ्यामुळे त्यांना साधनेत खूपच मदत होते. एकमेकांना अडथळा न करता लोक बंदिस्त जागेत राहून काम करू शकतात. अशा या एकांत, प्रसन्न व शांततामय वातावरणात स्वनिरीक्षणासारखा हळूवार, नाजूक अभ्यास करणे शक्य होते._*

            *_इथे प्रशिक्षणार्थीना अन्न व निवास दिला जातो. त्याचा खर्च इतरांनी दिलेल्या दानावरच चालतो. अशा प्रकारे प्रशिक्षणाच्या काळात सर्वजण जवळ जवळ घरादाराचा त्याग केलेल्या संन्याशासारखे राहतात व इतरांनी केलेल्या दानावरच आपला निर्वाह करतात. आपल्या कार्यक्षमतेप्रमाणे काम करून शिबिरार्थी आपले व इतरांचे भले करतात. विपश्यना साधनेच्या अभ्यासाच्या प्रशिक्षणात भाग घेऊन साधक अशा प्रकारे सम्यक उपजीविकेचा अभ्यास करतात._*

                 _*शीलपालन हा धर्मपालनाचाच एक अविभाज्य घटक आहे.* ह्याशिवाय धर्माच्या मार्गात प्रगतीच होऊ शकत नाही. कारण ह्याशिवाय मन फारच प्रक्षुब्ध असते व त्यामुळे आतील सत्याचा शोध घेणे शक्य होत नाही. *असे काही आचार्य आहेत की जे शीलपालनाशिवाय आध्यात्मिक प्रगतीची शिकवणूक देतात. ते जे काही शिकवतात ती भगवान बुद्धांची शिकवणूक नाही हे मात्र नक्की.* त्यामुळे शीलाचे पालन न करता वेगवेगळ्या अतीआनंददायक अवस्थांचा अनुभव करता येत असेल पण त्यांना आध्यात्मिक मार्गातील साध्य समजणे चुकीचेच ठरेल. *शीलपालनाखेरीज माणूस दुःखापासून मुक्त होऊ शकणार नाही. अंतिम सत्यापर्यंत पोहोचूही शकणार नाही हे मात्र निश्चित.*_

*_कल्याणकारी मार्ग सर्वांना लाभो !_*

*_मुक्तीदायिनी प्रेरणा सर्वांत जागृत हावो.._*

*_!! धन्य होवो ! मंगल होवो ! कल्याण होवो !!_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_संदर्भ :- जागे पावन प्रेरणा_*

*_संकलन :- महेश कांबळे_*

*_दिनांक :- २४/०९/२०२२_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2022/09/blog-post_23.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

No comments:

Post a Comment

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...