Friday, 9 September 2022

धर्म धारणा

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_धर्म धारणा_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

              _*कोशल देशाचा राजा प्रसेनजित यांचा पुरोहित ब्राह्मण बावरी याने वृद्धावस्थेत गृहत्याग करून संन्यस्त जीवन स्वीकारले.* आणि श्रावस्ती नगर सोडून उत्तरेकडून दक्षिणपथाकडे निघाला. *आंध्र प्रदेशातील अश्वक आणि नलक या राज्यामधून वाहणाच्या गोदावरी नदीच्या किनारी त्याने आपला आश्रम बांधला.* भिक्षा आणि कंदमुळे, फळे खाऊन संन्यासी बावरी तेथेच तपस्व्याचे जीवन व्यतीत करू लागला. जेव्हा त्याची वयाची शंभर वर्षे पूर्ण झाली, तेव्हा त्याने आसपासच्या गावांतून काही धनधान्य गोळा केले आणि महायज्ञ आरंभिला. यज्ञ पूर्ण होताच उरलेले धन लोकांना वाटून टाकले. त्यानंतर एक ब्राह्मण पाचशे मोहरा दान मागण्यासाठी आला. बावरीने विनम्रतेने आपली असमर्थता व्यक्त केली. असंतुष्ट याचक रागावला आणि बावरीला शाप दिला की. 'सात दिवसात त्याच्या मस्तकाचे सात तुकडे होऊन पडतील. "_

          _वृद्ध बावरी अत्यंत उदास आणि खिन्न झाला. त्याला धड जेवण सुचेना की ध्यानसाधनेत मन रमेना. तेव्हा त्याच्या एका सन्मित्राने सांत्वन केले की, अशा ढोंगी माणसाच्या शापाने चिंतित होण्याचे काहीच कारण नाही. कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते. तुझा काहीच दोष नाही. 'कुणी धनलोभी व अज्ञानी माणसाने दिलेल्या शापाने तुझे काय वाईट होणार ? ज्या व्यक्तीला हेही माहित नाही की खऱ्या अर्थाने शिर काय आहे आणि शिरविखंडन होणं म्हणजे काय, तो अज्ञानीच तर आहे. " वृद्ध बावरीचे समाधान झाले. पण त्याची उत्सुकता वाढली. जिज्ञासा जागृत झाली व त्याने विचारले की *शिर आणि शिराचे विखंडण होणे याचा नेमका अर्थ काय आहे ?* काही अर्थ असेल तर समाजवून सांग._

           _तो मित्र म्हणाला की कोणी सम्यक् संबुद्धच याचा नीट अर्थ सांगू शकेल. आणि सुदैवाने यावेळी सम्यक् सम्बुद्धही उत्पन्न झाले आहेत. त्यांना जाऊन विचार. त्याची माहिती देतांना तो म्हणाला._

*_पुरा कपिलवत्थुम्हा, निक्खन्तो लोकनायको ॥_* 

*_अपच्चो ओक्काकराजस्त, सक्यपुत्तो पभङ्करो ॥_*

         _काही वर्षापूर्वी इक्ष्वाकुवंशीय प्रभाकारी शाक्य पुत्राने कपिलवस्तुतुन गृहत्याग केला आहे व संन्यस्त जीवन जगत आहे._

*_सो हि ब्राह्मण सम्बुद्धो सव्वधम्मान पारगू।_* 

*_सब्बाभिञ्ञाबलप्पतो , सब्बधम्मेसु चक्खुमा ।_*

*_सब्बकम्मक्खयं पत्तो, विमुत्तो उपधिक्खये॥_*

        _हे ब्राह्मणा तोच सम्बुद्ध झाला आहे, जो सर्व धर्मात पारंगत, सर्वज्ञ चक्षुमान, सर्व अभिज्ञाबलसंपन्न आहे. त्याची सारी कर्मे [पापे] क्षय पावली आहेत. तो कृतार्थ आणि धन्य झाला आहे. त्याने दुःखाची मुळेच उखडुन टाकली असून तो परमविमुक्तपदी पोहोचला आहे._

*_बुद्धो सो भगवा लोके, धम्मं देसेति चक्खुमा ।_*

*_तं त्वं गत्वान पुच्छस्सु, सो ते तं व्याकरिस्सति ॥_*

_ते सर्वज्ञ चक्षुमान भगवान बुद्ध लोकांना धर्म शिकवीत आहेत. तुम्ही त्यांच्याकडे जाऊन त्यांना विचारावे. ते तुम्हाला विस्ताराने समजावून सांगतील_

*_सम्बुद्धो 'ति वचो सुत्वा, उदग्गो बावरी अहु ।_*

*_सोकस्स तनुको आसि, पीतिं च विपुलं लभि ॥_*

 _'सम्बुद्ध' शब्द ऐकताच बावरी प्रफुल्लित झाला. त्याची उदासिनता दुर झाली. तो विपुल प्रीतीप्रमोद भरल्या हृदयाने पुलकित होऊन उठला._

        अशा प्रकारे रोमांचयुक्त, श्रद्धाशील बावरीने आतुरतेने विचारले. 

*_कतमम्हि गामे निगमम्हि वा पुन, कतमम्हि वा जनपदे लोकनाथो ?_*

 _ते लोकनाथ भगवान बुद्ध यावेळी कोणत्या गावी आहेत? कोणत्या नगरात आहेत? कोणत्या जनपदात आहेत ?_

*_यत्थ गन्त्वा नमस्सेमु, सम्बुद्धं दिपदुत्तमं ।_*

        _- तिथे जाऊन त्या पुरुषोत्तम बुद्धाला मी नमस्कार करू शकेल. त्यावर आगंतुक म्हणाला :_

*_सावत्थियं कोसलमन्दिरे जिनो, पहूतपञ्ञो वरभूरिमेधसो।_* 

*_सो सक्यपुत्तो विधुरो अनासवो, मुद्धाधिपातस्स विदू नरासभो ॥_*

         _ते महाप्रज्ञावान, अत्यंत बुद्धिमान, भारमुक्त, आस्त्रवमुक्त शिरन्छेदनाचे ज्ञाता, नरश्रेष्ठ शाक्य पुत्र भगवान जिन, बुद्ध यावेळी कौशल देशाची राजधानी श्रावस्ती नगरात रहात आहेत._

         _शतायुषी बावरी आंध्रप्रदेश ते कौशल प्रवास करण्यास असमर्थ होता. आपल्या सर्व शिष्यांना एकत्र बोलावून त्यांना म्हणाला :_

*_यस्सस्सो दुल्लभो लोके, पातुभावो अभिण्हसो ।_*

*_स्वाज्ज लोकम्हि उप्पनो, सम्बुद्धी' ति विस्सूतो ।_*

*_खिप्पं गन्तान सावत्थिं, पस्सव्हो दिपदुत्तमं ॥_* 

            _नेहमीच लोकात निर्माण होणे दुर्लभ अशा लोकोत्तर युगपुरुष 'सम्बुद्ध' बिरुदावलीने प्रसिद्ध झालेल्या मनुज श्रेष्ठाला त्वरीत श्रावस्ती नगरात जाऊन भेटा._

           _अशा प्रकारे त्याने आपल्या शिष्यांना बुद्धाच्या दर्शनासाठी व त्यांच्याकडून ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी उत्साहित केले. *बावरीचे जटा आणि मृगाजिनधारी सोळा प्रमुख शिष्योत्तम अजित, तिस्स-मेत्तैय्य, पुन्नक, मेत्तगु, धोतक, उपसीव, नन्द, हेमक, तोदेय्य, कप्प, जातुकण्णी पंडित, भद्रायुध, उदय, ब्राह्मण पोसार, मेधावी मोघराजा, आणि महर्षि पीगिय सर्व शिष्यगण ध्यानसाधना करणारे होते.* पूर्वजन्मातील पुण्यसंचित संपन्न होते. तसेच वर्तमानकालातील लोकमान्य विभुत होते. ते सर्वजण आचार्य बावरींना साष्टांग नमस्कार घालून, प्रदक्षिणा घालून उत्तरेकडे निघाले._

         _*ते प्रथम अलकहून पैठणला आले. तेथून सध्याच्या मध्यप्रदेशातील महिष्मती, उज्जयिनी, गोधपूर, विदिशा [भेलसा] तुंगवन अशी यात्रा करीत करीत सध्याच्या उत्तर प्रदेशातील कोशाम्बी [कोशम], साकेत [अयोध्या] असा प्रवास करून श्रावस्तीला पोहोचले.* तेथे पोहचल्यानंतर त्यांना कळले की *भगवान पूर्व दिशेला मगध देशात भ्रमण यात्रेकरिता गेले आहेत. म्हणून सारेजण सेतव्य कपिलवस्तु, कुसीनारा आणि पावाहून भोगनगर मार्गे वैशालीला पोहोचले व तेथून राजगिरी. तेथील एक मनोहारी पाषाणाच्या चैत्यात त्यांना भगवान बुद्धांचे दर्शन घडले.*_

        _*भगवानांनी त्यांचे आचार्य बावरी यांच्या प्रश्नांचे समाधानकारक उत्तर दिले. शिर म्हणजे अज्ञान-अविद्या आणि श्रद्धा, वीर्य, स्मृति आणि समाधि युक्त प्रज्ञा [विद्या] द्वारे या अविद्येचे निराकरण [भेदन] होते. खरोखर कपोल कल्पनेला धर्म मानणारे अथवा दुसऱ्यांच्या ज्ञानाधारित तर्कवितर्कजन्य बुद्धिविलासाला धर्म मानणारे हे या अज्ञानाचे शिकार असतात. श्रद्ध वीर्य-पुरुषार्थ, स्मृति-सावधानता आणि समाधि यांच्या बळावर जेव्हा स्वतः आपली प्रज्ञा जागृत होते तेव्हा सर्वांगीण सत्याची प्रत्यक्ष अनुभूती होते तेव्हा शिरच्छेदन होते. अविद्येचा पडदा दूर होतो, नष्ट होतो. जिज्ञासू प्रश्नकर्ते उत्तराने संतुष्ट झाले.*_

           _त्यानंतर त्या सोळाही तपस्वी साधकांनी एक एक करीत भगवान बुद्धांना धर्मविषयक अनेक प्रश्न विचारले. भगवान बुद्धांनी सर्वांनाच समाधानकारक संतोषप्रद उत्तरे दिली. ही प्रश्नोत्तरे अत्यंत प्रगल्भ आहेत. ही प्रत्येक धर्म जिज्ञासूला अपरिमित प्रेरणादायक, धर्मपथ प्रदर्शक आहेत. याबाबत योग्य निराकरण केले गेले आहे. विवेचन केले आहे ते असे :-_

*_एकमेकस्स पञ्हस्स, यथा बुद्धेन देसितं ।_* 

*_यथा यो पटिपज्जेय्य, गच्छे पारं अपारतो ॥_*

           _एक एक प्रश्नाचं उत्तर देतांना भगवानांनी जो उपदेश दिला त्याचे प्रतिपादन करणारा ऐलतीरावरून पैलतीरावर सहज पार जाईल._

*_मग्गो सो पारगमनाय, तस्मा पारायनं इति ।_*

           _*- हा [भव] पार करणारा मार्ग आहे म्हणून याला 'पारायण' म्हणतात.*_

          _*खरंच आहे ते. धर्म पारायणच तर आहे. पारायण याचा अर्थ केवळ पाठ करणे हा नाही. त्याचे प्रतिपादन करून, भवसागर तरून जाणे याला पार करणे म्हणतात.* आणि त्या सोळा साधकांनी हेच केले. त्यांची प्रश्नोत्तरे म्हणजे केवळ बुद्धिविलास नव्हता. त्या प्रश्नापैकी कोणत्याही एक प्रश्नाचे उत्तर अर्थ समजून घेऊन, जर कुणी धर्म-अनुधर्म याबद्दल प्रतिपादन करून, म्हणजेच त्याप्रमाणे पावले टाकून, तो धर्म धारण केला तर तो जन्म मृत्यूच्या फेऱ्याच्या पलिकडे जाईल व निर्वाणाची त्याला प्राप्ती होईल._

*_पञ्हस्स अत्थं अञ्ञाय, धम्मं अञ्ञाय, धम्मानुधम्मं पटिपज्जेय, गच्छेय्येव जरा मरणस्स पारं ।_*

         _प्रश्नोत्तरांचा हाच हेतू होता. पारायण हा हेतू होता. भव पार करण्याचे उद्दिष्ट होते._

        _म्हणून जेव्हा त्यापैकी एक [ऋषी धोतक] भक्तिभावपूर्ण श्रद्धायुक्त अंतःकरणाने भगवान बुद्धांना म्हणाले._

*_पस्सामहं देवमनुस्सलोके, अकिञ्चनं ब्राह्मणं इरियमानं ।_* 

*_तं तं नमस्सामि समन्तचक्खु, पमुञ्चं मं सक्क कथङ्कपाहि ॥_*

         _देव मनुष्यांमध्ये आपल्यासारखे अपरिग्रही ब्राह्मण विद्यमान असलेले पाहतो. हे समन्त चक्षु [समदृष्टीने पाहणारा] मी आपणास वंदन करतो. हे शक्र मला संशयमुक्त करा._

तेव्हा भगवान म्हणाले :

*_नाहं गमिस्सामि पमोचनाय कथङ्कथिं धोतक कञ्चि लोके ।_*

*_धम्मं च सेट्ठं अभिजानमानो, एवं तुवं ओघमिमं तरेसि ॥_*

              _- हे धोतक, मी कोणा संशयग्रस्ताला मुक्त करू शकत नाही. जेव्हा तू स्वतःच या श्रेष्ठ धर्माला अनुभूतीच्या आधारे समजशील तेव्हा स्वतःच या महापूरातून पार होशील._

        _या ठिकाणी *'अभिजानमानो'* हा शब्द फार महत्वपूर्ण आहे. *स्वतःच्या अनुभूतीने जाणणाऱ्यालाच 'अभिजानमानो' म्हटले जात होते. मनातील संशय केवळ अंधश्रद्धेच्या बळावर दूर केले गेले किंवा दूर झाले तर ते 'अभिजानन' होत नाही. याप्रमाणेच केवळ तर्कवितर्क करून 'अभिजानन' होत नाही. या दोहो व्यतिरिक्त प्रत्यक्ष अनुभूतीच्या सहाय्याने जाणणे हेच बुद्धांचे सांगणे आहे. मनोगत आहे खऱ्या अर्थाने तेच 'अभिजानमानो' होय त्याआधारेच 'ओघमिमं तरेसि' होता येते. खऱ्या अर्थाने हेच पारायण होय.*_

        _या साधकांपैकी एक साधक महर्षि पीगिय म्हणतो भगवानांच्या संपर्कात येण्यापूर्वी मी नेहमी ऐकत आलो होतो. *'इच्चासि इति भविस्सति' म्हणजे 'असे होते, असे होईल' हे जे ऐकत होतो ते केवळ काल्पनिकच काल्पनिक होतं. 'सब्बेते इतिहेतिहं' अंधविश्वास आणि परंपरागत मान्यतांनी भरलेल्या कोचा कल्पनाच होत्या. अथवा 'सब्बं  तं तक्कवद्धनं' - साराच तर्कवितर्कांच्या मायाजालाने भरलेले बुद्धिविलासच होते. वास्तविकता कुठे होती? प्रत्यक्ष अनुभूती कुठे होती? परंतु आता मात्र धन्य वाटू लागले.* कारण की,_

*_यो मे धम्मं देसेसि संदिट्टिकमकालिकं ।_* 

*_तण्हक्खयमनीतिकं यस्स नत्थि उपमा क्वचि॥_*

          _आता जो धर्म मला शिकविला गेला तो तर सांदृष्टिक म्हणजे अनुभूतीजन्य आहे. *'असं झालं होतं, असं झालं होत'ची केवळ कोरी कल्पना नाही अकालिक आहे. म्हणजे लगेच फळ देणारा आहे. 'असं होईल, असं होईल'ची मिथ्या मृगतृष्णा नाही. इथे याच जीवनात तृष्णेचा अंत, दुःखाचा विनाश करणारा आहे. ज्यांनी हे शिकविले त्यांना कोणतीच उपमा देता येणार नाही अनुपमच आहेत.*_

         _ज्या भगवानांनी मला हे शिकविले त्या धर्माची अनुभूती त्यांनी घेतली होती. ती केवल अंधश्रद्धा किंवा तर्क पांडित्य नव्हते._

*_यथा अद्दक्खि तथा अक्खासि विमलो भूरिमेधसो ।_* 

*_निक्कामो निब्बनो नाथो, किस्स हेतु मुसा भणे ॥_*

           _निर्मळ महाप्रज्ञावंताने जसे पाहिले तसेच सांगितले. स्वामी स्वतः निष्काम आहेत, वितृष्ण निरिच्छ आहेत. ते खोटं कसे बरं बोलतील ?_

           _आणि त्यांनी जे शिकविले ते साधकांनी जाणावे म्हणूनच शिकविले. धर्म मान्यतेसाठी नव्हे, तर जाणून घेण्यासाठी आहे. स्वतः साक्षात्कार करून घेण्यासाठी आहे. म्हणून सांदृष्टिक आहे. तात्काळ फळ देणारा आहे. याच जीवनात इथेच फळ देणारा आहे._

           *_पुण्यपावन प्रसंगी धर्मानुधर्माच्या प्रतिपादनाप्रमाणे बुद्धाची पूजा करा. बुद्ध वंदना करा. भगवानांनी सांगितलेल्या मार्गाची फक्त चर्चा वादविवाद करू नका. केवळ त्या मार्गाविषयी श्रद्धा व्यक्त करून थांबू नका. परंतु यथाशक्ती त्या मार्गाची प्रत्यक्ष अनुभूती घ्या. त्या प्रमाणे धर्माचरण करा. हे जीवन सफल बनविण्याचा दृढनिश्चय करा. हळूहळु प्रगती करीत सर्व दुःखांचे निराकरण करा व धर्मपारायण नावाचे सार्थक करा. आपले खरे मंगल आहे. खरे कल्याण आहे._*

*_कल्याणकारी मार्ग सर्वांना लाभो !_*

*_मुक्तीदायिनी प्रेरणा सर्वांत जागृत हावो.._*

*_!! धन्य होवो ! मंगल होवो ! कल्याण होवो !!_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_संदर्भ :- जागे पावन प्रेरणा_*

*_संकलन :- महेश कांबळे_*

*_दिनांक :- ०९/०९/२०२२_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2022/09/blog-post_9.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼





No comments:

Post a Comment

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...